मराठी साहित्य – विविधा ☆ “जुई…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत)

? विविधा ?

☆ “जुई…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

बकुळ फुलांनो हळूच या,जुई माझी विसावलीय जरा!नका करू दंगा मस्ती,दुरूनच न्याहाळा तिच्या बंद पापण्यात विसावलेलं आकाश!  खरंच तिला तुम्ही अलवार जोजवा हं !थोडया विसाव्यानंतर ती नक्कीच टवटवीत होईल तिच्या नाजूक बहराला घेऊन,मादक सुगंधासह विहारण्यास वाऱ्याच्या झुळकीवर स्वार होऊन आणि मग अवघा आसमंत एक होईल!तिच्या मादक गंधात दरवळून निघण्यासाठी!गंधात आत्ताच न्हाऊन आलीय ती! तिच्या मोहिनीने वेडावून तिमीर सुद्धा बघा कसा दाट होऊ पाहतोय…हवं तर खात्री करून घ्या,तिच्या गर्द कुंतलामधील मारव्याला हुंगुन!पण हळूच!स्पर्श केलाच आहे तिला तुम्ही

तर थोडं हितगूजही करून जा तिच्या गूढ भावनांशी,पण जरा सुद्धा धक्का लावू नका तिच्या हिरवाईने नटलेल्या स्वाभिमानरुपी देठाला कारण तिनं तिचा उभा जन्म साकारलाय तिच्या स्वप्नांना ओंजळीत सामावून घेण्यासाठी .मृदेतील प्रत्येक कणाशी मृदा बनून दोस्ती केलीय तिनं स्वतः फूल म्हणून जन्मण्यासाठी आणि ती जाणून ही आहे सूर्योदया पूर्वी पर्यंतच तिच्या क्षणभंगूर जगण्याच रहस्य.आणि बकुळफुलांनो तो बघा तो पवन कसा सावरत आहे तिच्या कुंतलाना हळुवार शीळ घालून, गात आहे अंगाई गीत, तिच्या निश्चिन्त निजेसाठी!कारण त्याला जाणीव आहे तिच्या निस्वार्थ जीवनप्रवासाची स्वतःला सिद्ध करणाऱ्या तिच्या अविरत कष्टाची!भाकरीचा चंद्र शोधून पिलांच्या ओढीन घरट्याकडे परतणारी पाखरे पण तिच्या जवळ येऊन पंखांची हलचाल स्थिरावून एक गिरकी घेऊन जात आहेत अंदाज घेऊन तिच्या निजेचा!

जरा धीर धरा बकुळ फुलांनो,तिच्याशी गप्पा मारायला. कारण सांजेला तिनं दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी ती थोड्याच वेळात जागी होईल,नवा सुगंधी जन्म लेवून  आणि तिचा सगळा क्षिणवटा कुठल्या कुठे दूर पळून गेलेला असेल या छोट्या विसाव्याने!आणि गुंग होऊन जाईल ती मंद धुंद मारव्यासह गारव्याला साथीला घेऊन तुम्हा सख्यांशी हितगूज करण्यासाठी!

© सीमा ह. पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन धागे रामासाठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ दोन धागे रामासाठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

“मुखी रामनाम गाऊ, मुखी रामनाम!” हे ऐकतच लहानाची मोठी झाले .गोंदवलेकर महाराजांनी रामनामाची उपासना सांगितली होती, ती आमच्या घरात चालू होतीच.. त्यामुळे घरातील वातावरणाचा मनावर प्रभाव असल्याने ‘जेथे राम, तेथे नाम’ अशी श्रद्धायुक्त भावनेने उपासना चालू आहे.

सध्या अवघ्या पुण्याला या रामवस्त्राने ऊब पांघरली आहे  असे म्हणायला हरकत नाही! डेक्कन जिमखान्यावरील फर्ग्युसन रोडला अनघा घैसास यांच्या “सौदामिनी” साडी सेंटर मध्ये राम वस्त्र विणण्याचे आयोजन केले आहे, असे कळल्यावर आपण तिथे जाऊन दोन धागे तरी विणू या असं मनानं ठरवलं होतं! दोन-तीन दिवस या विचारातच गेले. मग माझ्या दोन तरुण मैत्रिणी जान्हवी आणि योगिता यांच्याबरोबर मी ‘सौदामिनी’ दुकानात गेले. तेथील वातावरण पाहून मन भारावून गेले. त्या दिवशी फारशी गर्दी ही सकाळी नव्हती, त्यामुळे आम्हाला आरामात चार धागे विणण्याची, हात मागाजवळ स्वतःचा फोटो काढून घेण्याची, तसेच रामाच्या मूर्तीचा फोटो काढण्याची संधी मिळाली! मनाला खूप समाधान वाटले. त्यानंतर मात्र रोज राम धागा विणायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आणि त्या भाविक वातावरणाचे वस्त्र सर्वांच्या मनात विणले जाऊ लागले. ‘इतके काय आहे, तिथे बघूया तरी!’ या विचाराने माझ्या मिस्टरांनी मला तिथे जायचंय अशी इच्छा व्यक्त केली. मी काय एका पायावर तयार होते! रामसेवेत आणखी चार धागे विणायला मिळतील म्हणून! आम्ही सकाळी तिथे दहा वाजता पोहोचलो. आता पहिल्यापेक्षा गर्दी खूपच वाढली होती. रांग लावावी लागत होती.

तरीही ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग असल्यामुळे आम्ही दोघे लवकरच आत गेलो.रामनामाचे धागे पुन्हा एकदा विणताना मन भरून आले..हे विणलेले वस्त्र आता अयोध्येला जाणार या कल्पनेने!

श्रीराम हे आपल्या देशाचे उपास्य दैवत आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही! राम आणि कृष्ण हे परमेश्वराची दोन्ही रूपे  आपल्यासाठी पूजनीय आहेत.ग. दि. माडगूळकरांच्या गीत रामायणातील वर्णनाने सुद्धा श्रीरामाची नगरी, अयोध्या आपल्या डोळ्यासमोर येते!” श्रीरामाच्या पूजेसाठी आज *अयोध्या सजली…..”हे गीत पुन्हा एकदा 22 जानेवारीला आपल्या ओठावर येणार आहे. श्रीरामांचा आदर्श कायमच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अयोध्याचा राजाराम, एक पत्नी व्रत असणारा राम, आपल्या माता-पित्याबद्दल आदर दाखवणारा राम, आपल्या बंधूंबद्दल प्रेम असणारा राम, सर्व प्रकारच्या  नात्यांना जोडणारा हा श्रीराम आपल्यासाठी आदर्श आहे!

रामभूमी मुक्त करून घेण्यासाठी खूप मोठा लढा हिंदूंना द्यावा लागला. पण आता खरोखरच ते रामराज्य थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसू लागले आहे.

दोन धागे रामासाठी विणायचे म्हंटल्यावर गेले काही दिवस हजारोंच्या संख्येने राम धागा विणण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. आपली रामा बद्दलची श्रद्धा येथे रामनामात गुंतली आहे. जी वस्त्रे अयोध्येला जाणार आहेत, त्याचा एक अंश भाग तरी आपल्या हातून विणला जावा , या श्रद्धेने येथे लोक येत आहेत. प्रत्येक जण दोन धागे विणतात, तिथं असणाऱ्या मूर्तीला श्रद्धेने नमस्कार करतात आणि कृतार्थ भावनेने परत जाताना म्हणतात,’ रामराया तुझ्या वस्त्राचे दोन धागे विणण्याचे भाग्य मला मिळाले, ही तुझी माझ्यावर तेवढी कृपा आहे! एका श्रध्देने  समाज एकत्र येतो. आपल्यातील एक विचार वाढीला लागतो, हे केवढे मोठे समाज मन जोडण्याचे काम या रामनामाच्या धाग्यांनी केले  आहे. या एकूणच संकल्पनेला माझा मनापासून नमस्कार ! *जय श्रीराम! 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

सध्या आपण रोज इस्राईल आणि हमास युद्धच्या बातम्या ऐकत आहोत. 7 ऑक्टोबर च्या सकाळी हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्राईल वर हल्ला करून क्रूरपणे 1400 निशस्त्र नागरिकांचा बळी घेतला. महिलांवर अत्याचार केले. लहान मुलांचे गळे कापून क्रूरपणे हत्या केली गेली. दोनशेहुन अधिक लोकांना बंदी बनवून गाझा मध्ये नेले गेले. याच्या प्रतिक्रियेत इस्राईलने गाझापट्टीवर बॉम्बहल्ले केले. आता इस्राईली फौजा गाझा मध्ये शिरून हमासला नष्ट करायचे काम करत आहेत.

संपूर्ण युरोप आणि अमेरिकेतील प्रत्येक मोठया शहरांत पॅलेस्टीन आणि हमासच्या समर्थनार्थ प्रदर्शने होऊ लागले. त्याला प्रतिक्रिया म्हणून या शहरांमध्ये इस्राईलच्या समर्थनार्थ प्रदर्शने होऊ लागले आहेत. संपूर्ण जगाचे राजकारण या घटनेमुळे धवळून निघाले आहे. 

पण सतत चर्चेत असलेला हा इस्राईल देश आणि ज्यु धर्म प्रकरण आहे तरी काय?

बायबलनुसार एकेश्वरवादी इस्राईली लोकांची गोष्ट चार हजार वर्षांपूर्वी सुरु होते.

आपण सर्वांनी बायबल मधील नोव्हाच्या नौकेची गोष्ट ऐकली असेलच. बायबलनुसार चार हजार वर्षांपूर्वी या नोव्हाचा नववा वंशज उर या इराकी शहरांत राहत होता. त्याला तीन मुले होती. त्यापैकी अब्राहम नावाच्या मुलाचा जन्म ई स पूर्व 1900 साली झाला. पुढे त्याला एकेश्वरवादी देवाने दर्शन दिले. एकेश्वरवादाचे वचन घेऊन त्याला कॅनन (सध्याचे इस्राईल आणि पॅलेस्टीन) हा भाग कायमस्वरूपी देण्याचे वचन दिले. या भागाला बायबल मध्ये ‘प्रॉमिस्ड लँड’ असे म्हटले आहे.  देवाच्या आज्ञेनुसार अब्रहम आपल्या कुटुंबकबिल्यासह या भागात मुलबाळस्थानन्तरीत झाला. या अब्राहमलाच कुराणात इब्राहिम असे म्हटले आहे. 

अब्रहम 170 वर्षे जगाला. त्याच्या पत्नी साराला बरेच दिवस  झाले नाही. तात्कालिक प्रथेप्रमाणे तिने तिच्या हेगार या दासीमार्फत नवऱ्याकडून एक मूल होऊ दिले. त्याचे नाव इस्मेल असे ठेवले गेले. अब्रहम तोवर शंभरी जवळ पोहचला होता.  इसाक अशी त्यांची नावे होती. पुढे साराला स्वतःला मुलगा झाला. त्याचे नाव इसाक असे ठेवले गेले. थोरला इस्मेल दासीपुत्र असल्याने धाकटा असूनही इसाकला बापाचा वारसा मिळाला. संपत्ती आणि प्रॉमिस्ड लँड मधून बेदखल झालेल्या या इस्मेल (इस्माईल) पासून अरबस्थानातील अरब वंश सुरु झाला असे मुस्लिम मानतात. 

इसाक आणि त्याची पत्नी रेबेकाला जेकब नावाचा मुलगा झाला. या जेकबलाच पुढे इस्राईल असे संबोधले गेले. या जेकबलाच कुराणात याकूब असे म्हटले आहे. 

जेकबला चार बायकांपासून बारा मुले झाली.

जेकबच्या चार बायकांपैकी दोन मुख्य बायका (रेचल आणि लिया या दोघी सख्ख्या बहिणी) होत्या तर दोन उपस्त्रिया स्त्रिया होत्या. त्यांना झालेली बारा मुले खालील प्रमाणे होती.

1) रेचल – जोसेफ आणि बेंझामिन 

2) लिया – रुबेन, सिमियन, लेवी, जुडा, इस्साचर, झेबूलून 

3) बिलहा – डॅन आणि नेफ्ताली 

4) झिलपा – गाड आणि ॲश

या बारा भावांडापैकी जोसेफ बापाचा अतिशय लाडका होता. धाकटा जोसेफ वडिलांचा प्रिय असल्याने बाकी अकरा भावां त्याच्याविषयी ईर्षा वाटे. एक दिवस या इर्षेंपोटी सर्व भावांनी मिळून जोसेफला गुलामांच्या व्यापाऱ्याला विकून टाकला. जोसेफला हिंस्त्र प्राण्याने मारून खाल्ले असे त्यांनी वडिलांना सांगितले.

गुलाम म्हणून विकला गेलेला जोसेफला पुढे इजिप्तमध्ये नेले गेले. जोसेफला स्वप्नांचा अर्थ लावता येत असे. आपल्या अंगभूत गुणांमुळे जोसेफ इजिप्तच्या राजाचा लाडका झाला. राजाने त्याला गुलामगिरीतुन मुक्त होऊन इजिप्तचा मोठा अधिकारी केला. या जोसेफला कुरानात युसूफ असे म्हटले आगे.

जेकबचा कुटुंब कबिला कॅननच्या भागात गुण्यागोविंदाने राहत असताना भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळात खाण्यापिण्याचे वांधे झाल्यामुळे हे बारा भाऊ इजिप्त मध्ये कामधंदा शोधायला गेले. जोसेफने त्यांना ओळखले पण भाऊ त्याला ओळखू शकले नाहीत. इजिप्तमध्ये मोठा अधिकारी झालेल्या जोसेफने दयाळू जोसेफने त्याच्या सर्व भावांना माफ केले. त्या सर्वांना नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशातील पूर्वेकडील सुपीक असलेली गोशेन ही जहागीर म्हणून मिळाली. ते तिथेच स्थायिक झाले. हे सर्व इस पूर्व विसाव्या शतकाच्या आसपास घडले असावे असे मानले जाते.

पुढे इजिप्तमध्ये सत्तांतर झाले आणि सर्व ज्यु कबिले इजिप्शियन लोकांचे गुलाम झाले. 430 वर्षे गुलामगिरीत सडल्यानंतर मोझेस (कुराणात मुसा) या ज्यु पैगंबराने सहा लाख ज्यू लोकांना गुलामीतून मुक्त करून त्यांना आपल्या मायभूमीकडे परत नेले. हे सर्व इस पूर्व पंधराव्या शतकात घडले असावे असे मानले जाते. मोझेसच्या मृत्यू नंतर जोशूवा (येशूवा) या त्याच्या सहकाऱ्याने कॅनॉनचा प्रदेश जिंकून घेतला. या भागात प्रत्येक ज्यु काबील्याने आपले आपले छोटे राज्य स्थापित केले. हेच ते इस्राईलचे बारा कबिले. जेकबच्या बारा मुलांचे हे बारा वंशज होते.

इस पूर्व 1175 मध्ये भुमध्य सागरातील क्रिट बेटावर राहणाऱ्या बहुईश्वरवादी ग्रीक लोकांनी सध्याच्या गाझापाट्टीच्या सुपीक भुभागावर वसाहती वसवल्या. हे विस्तारवादी ग्रीक लोक पॅलेस्टिनी वा फिलिस्टिनी म्हणून ओळखले जात. खरे तर पॅलेस्टिनी आणि इस्राईलच्या लोकांच्या वसाहती शेजारी शेजारी असलेल्या वेगवेगळ्या भुभागवर होत्या. गाझामध्ये राहणाऱ्या ग्रीक पॅलेस्टिनी लोकांना इस्राईली शेजाऱ सहन होत नव्हता. राज्य विस्तारासाठी ते सतत इस्राईलवर हल्ले करु लागले. इस्राईलच्या लोकांचे ग्रीक पॅलेस्टिनी लोकांसोबत वारंवार खटके उडू लागले. त्याविरोधात सम्युअल या पैगंबराने सर्व ज्यु कबिल्यांच्या राजांना एक करून ज्यु लोकांचे संघराज्य स्थापन केल. साऊल या सुज्ञ व्यक्तीला त्यां सर्वाचा महाराज केला. हे सर्व ई.स. पूर्वी अकराव्या शतकात घडले. पुढे इस पूर्व 1000 व्या वर्षी अशाच एका खटक्यात डेव्हिड या मेंढपाळ मुलाने गोलियथ या धिप्पाड पॅलेस्टिनी योध्याला द्वंद्व युद्धात ठार मारले. हा ईश्वरी संकेत आहे असे समजून पॅलेस्टिनी लोक घाबरून युद्धातून पळून गेले. युद्ध टाळले. डेव्हिड महाराज साऊल चा लाडका झाला. त्यांनी त्याला आपला जावई करून घेतला. पुढे पॅलेस्टिन सोबत झालेल्या आणखी एका युद्धात महाराज साऊल आपल्या मुलांसह मारले गेले. मग डेव्हिडला लोकांनी ज्युंचा महाराजा केले. त्याने पुढे मोठा राज्य विस्तार केला. त्याने जेरूसलाम हे शहर जिंकून घेतले आणि तेथे आपली राजधानी वसवली.

डेव्हिड पासून पुढे खऱ्या अर्थाने ज्यु लोकांमध्ये राजघराणेशाही सुरु झाली. डेव्हिड च्या सोलोमन(मुसलमानांसाठी सुलेमान)या मुलाने महाराजा झाल्यावर आर्क ऑफ कोव्हीनंट साठी जेरुसलामचे प्रचंड मंदिर बांधले. तोपर्यंत मोझेस चे दहा ईश्वरी आदेश असलेला दगड ‘आर्क ऑफ कोविंनंट’ या पालखीत टाकून पाठीवर वाहिला जाई. आता त्यासाठी स्थायी मंदिर तयार झाले होते. ज्यु लोकांसाठी शांती, सुरक्षा आणि भरभराटीचा सुवर्णकाळ सुरु झाला होता.

सोलोमनने मंदिर बांधण्यासाठी काही कर लावले होते. पुढे ते कर कमी करण्यावरून ज्यु संघराज्यातील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाद झाला. 931 BC मध्ये इस्राईलच्या संघराज्याचे दोन तुकडे झाले. उत्तरी तुकड्याला उत्तरी इस्राईल म्हटले गेले तर दक्षिणेकडील राज्याला जुडाचे राज्य म्हटले गेले. उत्तरेतील दहा काबील्यांनी करात सवलत देणाऱ्या जेरोबोला आपला राजा घोषित केले. दक्षिणेतील जुडा आणि बेंझमिनया दोन काबील्यांनी सोलोमनचा मुलगा रेहोबोम याला दक्षिणेतील जुडाच्या राज्याचे राजा मानले. उत्तरेतील समारिया हे शहर उत्तरी इस्राईलची राजधानी झाली. त्यामुळे या राज्याला समारियाचे राज्य असेही म्हटले जाते. दक्षिणेतील जुडा राज्याची राजधानी जेरूसलेमच राहिली. या दुफळीमुळे ज्यूंचे राज्य कमजोर झाले. 

723 BC मध्ये उत्तरेकडील सुमारिया राज्यावर अस्सेरिअन लोकांनी हल्ला केला आणि उत्तरी इस्राईलचे राज्य जिंकून घेतले. उत्तरेतील दहा ज्यू काबील्यांना त्यांच्या भूमितून परगंदा व्हावे लागले. या दहा टोळ्यांना इस्राईलच्या हरवलेल्या दहा टोळ्या असे म्हटले जाते. यापैकी काही काबिले अफगाणिस्तानात आणि काही ईशान्य भारतात स्थायिक झाल्याचा समज आहे.

यानंतर दक्षिणेतील जुडाचे राज्य पुढे पन्नास वर्ष टिकले. पण 587 BC मध्ये बॅबीलॉनच्या राजाने दक्षिनेतील जुडाच्या राज्यावर हल्ला करून जेरुसलाम शहर भुईसपाट केले. सोलोमनचे मंदिर पाडून टाकण्यात आले. दक्षिणेतील सर्व ज्यु लोकांना गुलाम बनवून बॅबीलॉनला नेण्यात आले. त्यांची गुलामगिरी पुढे 50 वर्ष चालली.

सायरस महान या पारशी(इराणी) राजाने 538BC मध्ये बॅबीलॉन जिंकून घेतले आणि ज्यु लोकांना गुलामीतून मुक्त केले. ज्यू लोकांना परत त्यांच्या मायभूमीत वसण्याची परवानगी दिली. सगळीकडून ज्यु परत मायभूमीत परत आले. ज्यु लोकांना जेरूसलाममधील जुन्या खंडर झालेल्या सोलोमनच्या मंदिराच्या जागी नवीन मंदिर बांधन्याची परवानगी मिळाली. इस्रा या पुजाऱ्याच्या पुढाकाराने सोलोमनचे दुसरे मंदिर बांधले. 

पुढे अलेक्झांडरच्या नेतृत्वात बहुईश्वरवादी ग्रीकांनी पर्शियन साम्राज्य नष्ट केले. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या सरदारांमध्ये विभागले गेले. ज्यूंचे राज्य सम्राट सेलूसीडच्या वाट्याला आले. पॅलेस्टिनी लोक ग्रीक असल्याने ग्रीक लोक आत्तापर्यंत इस्राईलचे पारंपरिक वैरी झाले होते. आता ग्रीक लोक ज्यू  लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू लागले. ग्रीक आणि इस्राईली ज्यू लोकांमधील तणाव वाढू लागला. शेवटी 167 BC मध्ये माकबीयन या पुजाऱ्याच्या नेतृत्वाखाली ज्यू लोकांनी ग्रीकांच्या विरुद्ध उठाव केला. तीन वर्ष लढा देऊन जेरुसलामला ग्रीकांच्या अंमलातून मुक्त केले. ज्यूंचे जेरुसलेमवर परत राज्य आले.

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बांबूचे बन… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ बांबूचे बन… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोंबालाही पाणी घालत होता.

दिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोंबामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोंबालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या- फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबात काही फराक दिसत नव्हता.

तो माणूस आता विचार करू लागला होता की , हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना? त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते, तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून त्या कोंबाकडे गेला. पाहतो तर काय, त्या कोंबाला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता आशेने त्या कोंबाला पाणी घालू लागला.आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबाला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबाने अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.

असेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेव्हा त्या आंब्या- फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला, तेव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली, तेव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले, व्यापून टाकले.

तसेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल, तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येऊन कितीही पुढे गेले, तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोंबाप्रमाणे करावा. जेव्हा आपल्या क्षमता अजमावण्याची वेळ येते, तेव्हा इतर जन कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.

ही बांबूची गोष्ट वाचून काय तात्पर्य घ्याल?

📍बोध :

इतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेवाद्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या आहेत. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही. बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळविणे होय.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाचावी बहुतांची अंतरे… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

वाचावी बहुतांची अंतरे…  ☆ श्री विश्वास देशपांडे

केवळ दोन वर्षांचा असलेला प्रणाद त्याच्या आईवडिलांसोबत एका पुस्तक महोत्सवात गेला. तेथील एका स्टॉलवर असणारे आकर्षक छोटे पुस्तक पाहून हे पुस्तक मला पाहिजेच म्हणून त्याने हट्ट धरला आणि मग त्याच्या आईबाबांना ते पुस्तक घ्यावेच लागले. त्या लहानग्याला वाचता येत नव्हते पण पुस्तकातील रंगीबेरंगी चित्रांनी त्याला आकर्षित केले. माझ्या मते हा पुस्तकाचा सगळ्यात छोटा ग्राहक असावा आणि हेच पुणे येथे भरलेल्या पुस्तक महोत्सवाचे वेगळेपण आहे असे मला वाटते. आपल्या मुलांना अनेक ठिकाणे दाखवण्यासाठी आपण घेऊन जातो पण पालकांनी आपल्या मुलांना घेऊन या पुस्तक महोत्सवाला जरूर जावे असे मला वाटते आणि अनेक सुज्ञ पालक तसा लाभ आपल्या मुलांना मिळवून देत आहेत.

आजच्या मोबाईलची क्रेझ असलेल्या जमान्यात आपल्या मुलांवर जर वाचनसंस्कार करायचा असेल तर असे हे पुस्तक महोत्सव त्यांना दाखवायलाच हवे. ही आधुनिक पर्यटनाची ठिकाणे समजावीत. अनेक शाळा देखील या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना हा पुस्तक महोत्सव दाखवण्यासाठी घेऊन येताहेत. या पुस्तक महोत्सवात येणाऱ्या रसिकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. आल्याबरोबर त्याचा मोबाईल क्रमांक आणि नाव लिहून घेतले जाते आणि त्याला दोन सुंदर पुस्तकांची भेट दिली जाते. पुस्तक महोत्सवातून हा रसिक वाचक भलेही पुस्तक खरेदी करेल किंवा नाही हे सांगता येणार नाही, पण बाहेर पडताना आपल्या सोबत तो दोन पुस्तके मात्र नक्की घेऊन पडतो आणि सोबतच हृदयात साठवलेले पुस्तक महोत्सवाचे दृश्यही.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात भरलेल्या या महोत्सवात आल्याबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आपले स्वागत करतात आणि आपल्या हातात एक पुस्तक देऊन एक परिच्छेद वाचायची विनंती करतात. यातूनच एक नवा आणि चौथा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. तो म्हणजे ‘ लार्जेस्ट ऑनलाईन अल्बम ऑफ पीपल रिडींग सेम पॅराग्राफ ऑफ मिनिमम ड्युरेशन ऑफ थर्टी सेकंड्स ‘ या अभियानाअंतर्गत तब्बल अकरा हजार पेक्षा जास्त लोकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद वाचला आणि हा एक अनोखा विश्वविक्रम या ठिकाणी नोंदवला गेला. या वाचनात मला सह्भाग देता आला त्याचा आनंद नक्कीच आहे. त्यासोबतच आणखीही तीन विश्वविक्रमांची नोंद या महोत्सवाच्या निमित्ताने झाली. आपल्या पाल्याला गोष्ट सांगण्याच्या उपक्रमात तब्बल ३०६६ पालक सहभागी झाले होते. दुसरा विश्वविक्रम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या १५० विद्यार्थ्यांनी ७५०० पुस्तकांचा वापर करून ‘ भारत ‘ हा शब्द साकारला. आणि तिसरा विश्वविक्रम म्हणजे तब्बल १८ हजार ७६० पुस्तकांच्या साहाय्याने ‘ जयतु भारत ‘ हे प्रेरणादायी शब्द साकारण्यात आले.

साहित्य संमेलनात असतात तसेच अनेक मुलाखतीचे किंवा चर्चासत्राचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले आहेत. अनेक मान्यवर लेखक, शास्त्रज्ञ आणि राजकीय नेते या महोत्सवाला आवर्जून भेट देत आहेत, संबोधित करीत आहेत. हा महोत्सव साकारण्यासाठी राजेश पांडे आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत आणि नियोजन केल्याचे सहजच लक्षात येते. येथे येणाऱ्या रसिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी आयोजकांनी घेतल्याचे लक्षात येते. अनेक नामवंत प्रकाशन संस्था यात सहभागी झाल्या आहेत. अनेक मान्यवर संस्थांनी या महोत्सवाच्या आयोजनात सढळ हाताने मदत केली आहे. सर्वांच्या सहभागाचे आणि सहकार्याचे हे एकत्रित फळ आहे. अशा या महोत्सवांकडे केवळ एक उपक्रम म्हणून पाहून चालणार नाही. हा आपला ज्ञान आणि संस्कृतीचा महोत्सव आहे असे म्हणायला हरकत नाही.

या पुस्तक महोत्सवाच्या काळात माझे काही कारणाने पुण्यात येणे झाले आणि पुण्यातील दोन ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. त्यातील पहिली ऐतिहासिक गोष्ट म्हणजे पुण्यात १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर आणि वर उल्लेख केलेला पुस्तक महोत्सव. दुसरी महत्वाची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे अयोध्येत होणाऱ्या राममंदिरातील प्रभू रामचंद्रांसाठी ‘ दोन धागे रामासाठी ‘ हा सौदामिनी हॅन्डलूम येथे अनघा घैसास यांच्या प्रेरणेतून सुरु आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभे राहते आहे. या मंदिरातील मूर्तीसाठी दोन धागे आपणही विणावे, आपलाही खारीचा वाटा त्यात असावा असे प्रत्येकाला वाटल्यास नवल नाही. याच भावनेतून लाखो पुणेकर आणि अन्य प्रांतातील लोकही येथे एकत्र येऊन जाती, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन रामरायासाठी वस्त्र विणत आहेत. हे एक आगळेवेगळे राष्ट्रभक्तीचे, रामभक्तीचे उदाहरण आहे असे म्हणायला हरकत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे २०२३ या वर्षाचा डिसेंबर महिना यानिमित्ताने निश्चितच माझ्याच काय परंतु समस्त पुणेकर आणि पुस्तकप्रेमी मंडळींच्या लक्षात राहील.

आपण विविध महोत्सव साजरे करतो पण हा एकाच छताखाली साजरा होणारा हा पुस्तक महोत्सव अनेक दृष्टींनी आगळावेगळा आहे. या महोत्सवात पुस्तकांचे जवळपास २५० स्टॉल्स आहेत आणि १५ भाषांतील प्रकाशित पुस्तके या ठिकाणी वाचकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. धार्मिक पुस्तकांपासून तर वैज्ञानिक माहिती देणाऱ्या पुस्तकांपर्यंत आणि बालवाचकांपासून महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी विविध पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी सुमारे दोन लाख पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. या, बघा, खरेदी करा आणि वाचा असं आवाहन जणू ते करीत आहेत. अशा प्रकारचे पुस्तक प्रदर्शन दिल्लीत दरवर्षी होणाऱ्या पुस्तक मेळ्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच होते आहे. या पुस्तक महोत्सवाला वाचकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आबालवृद्ध या महोत्सवाला भेट देत आहेत.

या महोत्सवामुळे अनेक लेखक, कवींची पुस्तके पाहण्याची, वाचण्याची आणि खरेदी करण्याची संधी वाचकांना मिळते आहे. वैचारिक दृष्ट्या समृद्ध व्हायचे असेल तर येथे येऊन ‘ वाचावी बहुतांची अंतरे ‘ असेच म्हणावे लागेल.

© श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनुभव इंग्लंडवारीमधले — ☆ प्रा. डॉ. सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

☆ अनुभव इंग्लंडवारीमधले  — ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

१ ) झोप…

इंग्लंडला  जाण्यासाठी मुंबईच्या  विमानतळावर उभा  होतो. कुठल्याही एस.टी.स्टॅन्डवर  किंवा रेल्वेस्टेशनवर  दिसणारी धावपळ  इथेही  दिसत होती. फरक  इतकाच की, इथे  सगळयाच बाबी चकचकीत होत्या. चेक इन वगैरे प्रक्रिया करून  आपले प्रस्थान  अधिकाधिक सुखकर  आणि  सुलभ कसे  होईल  याचा प्रत्येकजण  प्रयत्न  करत होता. उत्कंठा, आनंद  सगळीकडे भरून  वाहत होता.आम्हीही  या प्रक्रिया  करून  एकदाचे विमानात  बसलो.

एअर  होस्टेलच्या मदतीने  हातातल्या  बॅग्ज  डोक्यावरच्या कपाटांत  बंद  करून विमानाच्या  नियमानुसार सीटबेल्ट  लावून खिडकीतून  बाहेरचे आकाश  निरखत बसलो. मुंबई  ते (इंग्लंडमधील) हिथ्रो  हा जवळपास  नऊ  तासांचा  प्रवास होता. कधी  झोपी गेलो ते कळलंच  नाही.

जीवनाचा  प्रवास साधारणत: असाच असतो…..  जन्मापासून  शिक्षण, उपजिविकेसाठीची धडपड, लहानमोठे आनंदाचे-दुखा:चे, विजय  आणि  पराभवाचे क्षण  या  आवश्यक प्रक्रियांतून  जाताना संसारातून  निवृत्तीचा कालखंड येतो. शरीर आणि  मनही  थकून गेलेले असते.आणि माणूस  झोपी  जातो. मात्र  ती  झोप न उठण्यासाठीची  असते… आणि नंतर असेच काही विचार मनात येऊन गेले 

—–

२ ) ती…

इंग्लंड मुक्कामात अनेकदा आम्ही घराजवळच्या गार्डनमध्ये पाय मोकळे करायला जातो. अशाच एका सायंकाळी गार्डनमधल्या लाकडी बाकड्यावर बसून आजूबाजूचे मखमली सौंदर्य  पहात होतो. अनेक कुटुंबं आपल्या बाहुल्यांसारख्या मुलांबरोबर हसत खेळत होते. दोन तरुण मुली आरामात सिगारेटचे झुरके घेत इकडून तिकडं फिरत होत्या. 

मी पाहिलं; एक सुंदर तरूणी एका झाडाजवळ उभी होती .फिकट निळ्या रंगाचे  जर्कीन तिला उठून दिसत होते. कानातल्या रिंगच्या लोलकातून प्रकाशकिरणे परावर्तित होऊन तिच्या चेहर्‍यावर  पडली  होती.

तिचे  लांबसडक रुपेरी केस  पाठीवरून कमरेवर रूळत होते .बराच वेळ एकाच ठिकाणी ती उभी होती. थोड्या वेळाने तिने सावकाश  हातातला मोबाईल बंद करून पर्समध्ये ठेवला. रूमालाने चष्मा पुसला आणि

झाडाजवळची क्रचेस ( चालताना मदत होणारी काठी)  डाव्या हातात घेऊन  तिच्या आधाराने ती लंगडत लंगडत चालू लागली.

—–

३ ) प्रेम हे प्रेम असतं…

इंग्लंडच्या मुक्कामात एकदा मी सहकुटुंब लंडनला गेलो होतो. सायंकाळी घरी परतताना स्टेशनवर आलो. परतीच्या ट्रेनला थोडा उशीर होता. दिव्यांच्या प्रकाशात झगमगणा-या त्या अलिशान स्टेशनवर एका 

कोपर्‍यातल्या  सिमेंटच्या बाकड्यावर मळकटलेल्या कपड्यातलं एक मध्यमवयीन जोडपं बसलेलं पाहिलं. माझी नजर तिथेच खिळून राहिली. वास्तविक असं कुणाकडं (विशेषत:अनोळखी असतील तर) टक लावून पहात बसणं चुकीचं असतं. पण का कुणास ठाऊक मी पहात राहिलो. तो हमसून हमसून रडत होता. ती त्याला समजावून काहीतरी सांगत होती. शेवटी एखाद्या लहान मुलासारखं तिनं त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन ती थापटत राहिली. थोड्या वेळानं तो उठला आणि तिच्या हाताचं चुंबन घेतलं. ट्रेनमध्ये प्रवास करतानाही माझ्या डोळ्यापुढून ते दृश्य  जात नव्हतं. मी विचार केला, कोण असतील हे दोघं ?

लंडन ही एक मायानगरी.अनेकजण पोट भरण्यासाठी इथं येतात. अशाचपैकी हे जोडपंही इथं आलं असेल. सारं सुरळीत चालू असताना, कदाचित त्याचं काम बंद पडलं असेल. हतबल होऊन तो रडत असेल. पण 

” काळजी करू नकोस.मी आहे तुझ्यासोबत ” . असा धीर दिल्यावर तो सावरला असेल .

‘टाऊन सेंटर ‘  या हिचीनमधल्या बाजारात एकदा चाललो होतो.सायंकाळची वेळ होती. इथे सायंकाळी दुकाने बंद असतात. उघडी असतात हाॅटेल्स आणि बार. एक  आजोबा पुढून येत होते. दोन्ही हातांनी ढकलत एका व्हीलचेअरवर आपल्या अपंग पत्नीला घेऊन चालले होते. मी त्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला.  हे पहाताच ते आजोबा मला म्हणाले,” साॅरी “.

” इट्स ओ.के.”

ते गेल्यावरही मी त्यांच्याकडं पहात राहिलो.

शनिवारचा दिवस होता. उद्या रविवार. सुट्टीचा दिवस. या दिवशी अनेकजण हाॅटेलांत आणि बारमध्ये  येत असतात. अशाच एका हाॅटेलच्या बाहेरच्या बाकावर एक तरूण जोडपं बसलं होतं. समोरच्या पदार्थांकडं त्यांचं लक्ष नव्हतं. एकमेकांच्या डोळ्यांत ते एकटक पहात होते.

लंडनमधील स्टेशनवर दिसलेलं  ते जोडपं ,मगाशी रस्त्यावरून चाललेलं ते वृध्द जोडपं आणि आता मी पहात असलेलं ते तरुण युगूल…या तिघांमध्ये मी प्रेम पाहिलं…. त्यांचे स्वरूप वेगवेगळे  होते .मात्र त्या तिघांतली प्रेमाची तीव्रता उच्च होती, हे मला प्रकर्षाने जाणवलं. 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नंदकुमार सप्रे… ☆ श्री सुनील होरणे ☆

श्री सुनील होरणे

अल्प परिचय

नाव : सुनील नीलकंठ होरणे, अहमदनगर

शिक्षण: बी.ए.(अर्थशास्त्र)

व्यवसाय : इंटेरिअर डिझायनर आणि कॉन्ट्रॅक्टर

छंद : मराठी साहित्य लेखन, मानवी नातेसंबंध, व्यक्ती चित्रण, अध्यात्म आणि हिंदी चित्रपट

सामाजिक कार्य : विविध संस्थांमध्ये कार्यरत, एकाकी वृद्ध व्यक्ती तसेच, विद्यार्थी आणि युवकांसाठी विशेष कार्य. रामकृष्ण  मिशन बेलूर मठ कलकत्ता याना संलग्न असलेल्या संस्थेमध्ये कार्यरत.

? इंद्रधनुष्य ?

||◆||  नंदकुमार  सप्रे  ||◆||  श्री सुनील होरणे ||◆|| 

मध्यंतरी  एका अंत्यविधी साठी अमरधाम मध्ये गेलो होतो. जवळचे नातेवाईक आणि मृताच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते. इतर जे परिचित हजेरी लावण्या साठो आले होते, ते नेहमी प्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर  एकमेकांची ख्याली खुशाली विचारत हास्य विनोदात दंग होते. सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथे आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता.

मृताच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं आणि नंतर पेपर कपमध्ये चहा प्यायला दिला. कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं.

या घटने नंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबल हॉस्पिटलमध्ये कोणालातरी भेटायला गेलो होतो.

ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते. बहुधा त्यांच्या कोणा नातेवाईकांचं आत ऑपरेशन चालू असावं. आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी अमरधाम मध्ये दिसलेले ते गृहस्थ इथं देखील त्या बसलेल्या लोकांना चहा देत होते. आता माझी उत्सुकता वाढली. थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे बाजूला आले, मी ताबडतोब त्यांच्या जवळ गेलो.

“नमस्कार!” मी म्हंटल. त्यांना हे अपेक्षित नसावं ते कावरे बावरे होऊन माझ्याकडं बघू लागले. मी पुन्हा नमस्कार केला, या वेळी त्यांनी फक्त मान हलवली.

“आपलं नाव काय?” मी विचारलं. त्यांचा पुन्हा प्रश्नार्थक चेहरा. यावेळी कपाळावर आठया देखील. 

“तुमचं नाव सांगा.” त्यांनी तुटकपणे मलाच उलटा प्रश्न केला. आता मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो

“अहो महाराज, माझं नाव प्रशांत कदम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं. आपण दोन मिनिटं बोलू शकता का?”

“नाही.” समोरून फटकन उत्तर आलं. आता मला धक्के पचवायची सवय झाली होती.

“नाही म्हणजे आत्ता नाही कारण आत्ता मला आणखी बऱ्याच ठिकाणी जायचंय. आपण नंतर कधीतरी भेटू. आणि माझं नाव नंदू… म्हणजे नंदकुमार सप्रे.”

एवढं बोलून ते तरा तरा चालायला लागले. मी त्यांच्या पाठमोऱ्या छबी कडे बघतच राहिलो.

साधारण साडेपाच फूट उंची,  मध्यम किंवा त्यापेक्षा बारीक शरीरयष्टी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा, पायात चपला. अहो हा माणूस बोलायला तयार नाही.

पण एक गोष्ट लक्षात आली. याला कुठंतरी काहीतरी दुःख आहे, वेदना आहेत. आणि त्या दिवसापासून माझा त्याच्यातील इंटरेस्ट वाढू लागला. आता याला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे.

आणि तो दिवस लौकरच आला. मी कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या कडेला सायकल हातात धरून उभे होते. बहुधा कोणाची तरी वाट पहात असावेत. मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला संगितली आणि पटकन खाली उतरून सप्रेच्या समोर जाऊन उभा राह्यलो.

“सप्रे कोणाची वाट बघताय?” मी.

“नाही वाट नाही बघत, सायकल पंक्चर झालीय.”

“अरेच्चा, थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था करू.” मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर काढायला पाठवलं.

“अहो तुम्ही कशाला त्रास घेता, मी आणली असती करून.” सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले.

“असू द्या हो सप्रे, चला आपण तो पर्यंत गाडीत बसून बोलू.”  सप्रे अक्षरशः बळजबरीने गाडीत येऊन बसले.

अतिशय अस्वस्थ झाले होते. मी बोलायला सुरुवात केली, “सप्रे ही चहाची काय भानगड आहे? जरा सांगता का? सप्रे गप्प. मला कळेना हा माणूस असा का वागतोय, धड बोलत देखील ही.

आणि माझं लक्ष्य त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं, अहो हा माणूस रडत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वहात होत्या. मला एकदम अपराधी असल्या सारखं वाटलं. मी दोन्ही हातांनी सप्रेना धरलं “सप्रे मला माफ करा. तुम्हाला दुखवायचा माझा हेतु नव्हता. जाऊ द्या, मला काही सांगू नका पण कृपा करून तुम्ही शांत व्हा. पुन्हा मी तुम्हाला असले प्रश्न विचारणार नाही. I am sorry.”

दोन तीन मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. “प्रशांतजी, आज पर्यंत या विषयावर मी कोणाशी बोललो नाही पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार, याचं कारण अस आहे की, फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला.

मी आणि माझी पत्नी दोघेही सरकारी अधिकारी.

मुलगा आणि सून दोघेही अमेरिकेत. तीन वर्षांपूर्वी पत्नीचे कोविड मध्ये निधन झाले. आम्ही दोघेही बाधित होतो. मला हॉस्पिटल मिळालं, तिला खाजगी हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं आणि चौथ्या दिवशी ती गेली.

इथं मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, कारण परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिची वेळ भरली होती, त्यामुळे ती गेली, एवढंच सत्य आहे.

आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची कारणमीमांसा तपासत बसू नये असं मला वाटतं.

तिला चहा फार आवडायचा, दिवसातून चार पाच वेळा तरी ती चहा घेत असे. दुर्दैवाचा भाग असा की तिला हॉस्पिटलमध्ये चार दिवसात एकदाही चहा मिळाला नाही. आणि या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याच वेळी मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं.

माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय का? हे देखील कुणी विचारत नाही. म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो. त्यांच्या समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो. हॉस्पिटल मध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात. त्यांना मी जाऊन भेटतो. चहा देतो, चौकशी करतो आणि दिलासा देतो. थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटतं. मी रिटायर असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे.

सुदैवाने आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मोठा बंगला आहे आणि मी एकटाच आहे. म्हणून तिथं पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलीय.

मी प्रचंड भारावून गेलो होतो. काय बोलावे हे देखील मला कळत नव्हते.

“सप्रे तुम्ही फार मोठं काम करताय, You are great.” एवढंच मी बोलू शकलो. सप्रेची सायकल तयार होऊन आली होती.

सप्रे गाडीतून उतरले, मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो.

त्यानंतर सप्रेची आणि माझी गाठ भेट नाही.

एक दिवस कोणीतरी सप्रे गेले अस सांगितलं.

मी सप्रेच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड होता “मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट” आत एक जोशी नावाचे मॅनेजर होते. त्यांनी सांगितलं इथं राहणारे विद्यार्थीच आता सप्रेचं काम करतात.

मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला.

राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथं येतो. त्यावेळी तो दोन वाक्य बोलतो.

“आनंद मरा नहीं,  आनंद मरते नहीं।

© श्री सुनील होरणे

९८२२११६६३६

E-mail : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कायमचा पत्ता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “कायमचा पत्ता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

आमच्‍या संयुक्‍त कौटुंबिक घरात आम्‍ही ५ ते ९५ वयोगटातील १४ जण राहायचो.

माझ्या आईचा रोज  वावर असलेली दोन्ही घरे आता निर्वासित आहेत आणि आता त्यांचा व त्यांच्या बागांचा निसर्गाने  ताबा घेतलेला मी पाहतो. जांभूळ, शेवगा, काही अशोक, कडुनिंब आणि पिंपळ टिकून आहेत.

परंतु आता असंख्य रंगांची मनमोहक फुलं गेली. एकूणच सर्व सौंदर्य क्षणिक आणि नाजूक आहे आणि एन्ट्रॉपीचा नियम शक्तिशाली आहे, हेच सत्य.

माझ्या आईच्या हातातून रोज दाणे टिपणाऱ्या मोराच्या कुटुंबाचे काय झाले असेल, हा मला पडलेला एक अगम्य प्रश्न आहे. बुलबुल, चिमण्या, पोपट, स्पॉट फ्लायकॅचर, कोकिळा, माकडांची एक मोठी टोळी जी महिन्यातून एकदातरी त्या ठिकाणाचा विध्वंस करायची – हे सगळे कुठे आहेत?

माणसे निघून गेली की वास्तू एक घर बनते. सुरुवातीला मला वास्तू विकाविशी वाटली नाही. पण  आता तेथे जावेसेदेखील वाटत नाही. एक तर काळ आमच्या चौदापैकी दहा जणांना घेऊन गेला आहे.

मी आमच्या वास्तुच्या आजूबाजूला फिरतो आणि शेजारील वास्तू बघतो. जवळपास माझ्या घरासारखे चित्र मला दिसते. कधी एकेकाळी आयुष्याने भरलेल्या अनेक घरांचे नशीब आता फिरले आहे, बदलले आहे किंवा ते घरच आता पडलेले आहे.

आपण घरे बांधण्यासाठी एवढे कष्ट का घेतो?

बऱ्याचदा, आपल्या मुलांना त्याची गरज भासणार नाही किंवा त्याहूनही वाईट, ते त्यासाठी भांडणे करतील.

हा कोणता मानवी मूर्खपणा आहे,  की या अनिश्चित कार्यकाळ असलेल्या भाडेतत्त्वावरील आपल्या जीवनासाठी आपण  एक कायमस्वरूपी मालकी स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतो?

 हे आयुष्य आपल्याला मिळाले आहे. त्याच्या कालखंडाबद्दल आपल्याला काहीच अधिकार नाही. त्याच्या अटी- शर्तीवर आपले नियंत्रण शक्य नाही आणि त्याविरुद्ध कोठेही दाद मागणे शक्य नाही. त्यावर अपील नाही त्यासाठी.कुठले न्यायालयदेखील नाही.

एक दिवस, आपण प्रेमाने बांधलेले हे सर्व विश्व आणि मासिक हफ्ते भरून  उभ्या केलेल्या वास्तू, एकतर उद्ध्वस्त होतील किंवा त्यासाठी भांडण केली  जातील किंवा त्या विकल्या जातील किंवा नष्ट होतील.

प्रत्येक वेळी मी एखादा फॉर्म भरतो, तेव्हा ‘कायम पत्ता’ विचारणारा रकाना भरतो तेव्हा मला मानवी मूर्खपणाबद्दल हसू येते.

झेनची एक कथा आहे, एकदा एक वृद्ध भिक्षू एका राजवाड्यात गेला आणि रक्षकाला विचारले की तो या विश्रांती गृहामध्ये एक रात्र घालवू शकतो का? रक्षकांनी त्यावर त्याला खडसावले, “काय विश्रांती गृह?तुला हा राजवाडा आहे, हे दिसत नाही का?”. साधू म्हणाला, “मी काही दशकांपूर्वी इथे आलो. तिथे कोणीतरी राज्य करीत होते. काही वर्षांनी, त्याच्याकडून त्याचे राज्य कोणीतरी घेतले, नंतर कोणीतरी. कोणतीही जागा जिथे रहिवासी सतत बदलत राहतो, ती जागा एक विश्रांती गृह आहे.”

जॉर्ज कार्लिन म्हणतात, “घर हे फक्त एक ठिकाण आहे जिथे  बाहेर जाताना तुम्ही तुमचे सामान ठेवता आणि परत येताना अधिक सामग्री घेऊन येता.”

जसजशी घरं मोठी होत जातात तसतशी कुटुंबं लहान होत जातात. जेव्हा घरात अनेक  रहिवासी सदस्य असतात, तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा घरटे रिकामे होते, तेव्हा आपल्याला सहवास हवा असतो.

आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी जगणे सोडून देणाऱ्या आणि शेवटी, कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून समजलेल्या विश्रांती गृहामधून निघून जाणाऱ्या माणसांवर पक्षी आणि प्राणी नक्कीच हसत असतील.

मानवी इच्छेचा वृत्तीचा खरा फोलपणा!                   

प्रस्तुती: सौ. राधा पै.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆

[३]

हे मातृभूमी! तुजला मन वाहियेले

वक्तृत्व, वाग्विभवही तुज अर्पियेले

तुतेंचि अर्पिली नवी कविता रसाला

लेखाप्रती विषय तूंचि अनन्य झाला

त्वत्स्थंडिली ढकलले प्रिय मित्रसंघा

केले स्वयें दहन यौवन-देह-भोगां

त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा

त्वत्सेवनीच गमली रघुवीर सेवा

त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमत्ता

दावानलात वहिनी नवपुत्रकांता

त्वत्स्थंडिली अतुल-धैर्य वरिष्ठ बंधु

केला हवी परम कारुण पुण्यसिंधु

त्वत्स्थंडिलावरि बळी प्रिय बाल झाला

त्वत्स्थंडिली बघ अतां मम देह ठेला

हे काय, बंधु असतो जरि सात आम्ही

त्वत्स्थंडिलीच असते दिधले बळी मी

संतान या भरतभूमिस तीस कोटी

जे मातृभक्ती-रत सज्जन धन्य होती

हे आपुले कुलहि त्यांमधि ईश्वरांश

निर्वंश होउनि ठरेल अखंड वंश

[४]

कीं तें ठरो अथवा न ठरो परंतु

हे मातृभू, अम्हि असो परिपूर्ण हेतु

दीप्तानलात निज-मातृ-विमोचनार्थ

हा स्वार्थ जाळुनि अम्हि ठरलो कृतार्थ

ऐसें विवंचुनि अहो वहिनी! व्रतातें

पाळोनि वर्धन करा कुल-दिव्यतेतें

श्रीपार्वती तप करी हिमपर्वतीं ती

की विस्तवांत हसल्या बहु राजपूती

तें भारतीय अबला-बलतेज कांही

अद्यापि या भरतभूमिंत लुप्त नाही

हे सिद्ध होइल असेंचि उदार उग्र

वीरांगने, तव सुवर्तन हो समग्र

माझा निरोप तुज येथुनि हाच देवी

हा वत्स वत्सल तुझ्या पदिं शीर्ष ठेवी

सप्रेम अर्पण असो प्रणती तुम्हांते

आलिंगन प्रियकरा मम अंगनेते

कीं घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने

लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग-मानें

जे दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचे

बुध्याचि वाण धरिलें करि हे सतीचें

कवी वि दा सावरकर

(शब्दार्थ – स्थंडिल = यज्ञ, होम इ. करिता केलेला एक हात चौरस व चार अंगुळे उंचीचा मातीचा ओटा, यज्ञपात्र, अंगुळ = बोटाच्या रूंदीचे माप)

रसग्रहण

नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येच्या प्रकरणातील सहआरोपी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना १९१० च्या मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आली. तेथील ब्रिक्स्टन जेलमध्ये असतांना ही कविता सावरकरांनी आपल्या वहिनींना, अंतिम निरोप म्हणून पाठविली होती.

‘विश्वात आजवरी शाश्वत  काय झाले’ या कवितेप्रमाणे ही कविता देखिल ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्तांत निबद्ध आहे. या वृत्ताविषयीची माहिती त्या अंकात आलेली असल्यामुळे द्विरुक्ती टाळून आपण अर्थाकडे वळुया.

या कवितेचे चार भाग असून, ती जवळपास ९५/९६ ओळींची आहे. त्यामुळे आपण त्यातला फक्त तिसरा व चौथा भाग पहाणार आहोत. तथापि पहिल्या दोन भागांचा गोषवारा माहितीसाठी देत आहे.

पहिल्या भागांत कवी आपल्या घराचे वर्णन करून तिथे आजूबाजूचे तरूण, तरुणी कसे जमायचे, वहिनी त्यांना सुग्रास  स्वयंपाक करून कशी जेवायला, खायला द्यायची व नंतर अंगणात बसून पारतंत्र्य, अन्याय, जागतिक  घडामोडी यावर कशी चर्चा व्हायची,  मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी काय केले पाहिजे याविषयी जमलेल्या तरूणांना मार्गदर्शन कसे केले जायचे, वीररसपूर्ण अशा कविता म्हटल्या जायच्या वगैरे गोष्टींचा उल्लेख आहे.

दुसर्‍या भागात आपण केलेल्या प्रयत्नांना केवळ आठ वर्षांतच यश येत असल्याचे पाहून कवी आनंदित आहेत. दीनपणा सोडलेले व वीरश्रीचा संचार झालेले देशातील युवक, युवती स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. या धगधगत्या यज्ञकुंडात पहिलं बलिदान देण्यासाठी श्रीरामांनी आमंत्रण  दिलेलं असताना, हा बहुमान आपल्या कुटुंबाला मिळावा, ही किती अभिमानाची गोष्ट आहे. ज्या आणाभाका आम्ही घेतल्या, त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करून आम्ही कृतार्थ  झालो आहोत. असे वीरश्रीपूर्ण निवेदन करून, सावरकर आपल्या वहिनींनी धैर्यानें अशा प्रसंगांना सामोरं जावं, यासाठी त्याचं मनोबल उंचावत आहेत. ते आठवण करून देतात की आपण हे धगधगते सतीचे वाण, आंधळेपणांने किंवा क्षणिक उत्तेजनाने नाही, तर जाणून बुजून, समजून उमजून हाती घेतले आहे.

तिसऱ्या भागात ते म्हणतात की, मातृभूमीलाच मी माझं मन वाहिले आहे. माझं सारं वक्तृत्व, वाङ्मय तिलाच अर्पण केलय. मी, माझं तारुण्य तसेच सगळ्या देहभोगांचं हवन या स्वातंत्र्य यज्ञामधे केलं आहे. देशकार्य हेच देवकार्य समजून, घरदार, पैसाअडका इतकेच नव्हे तर मित्रपरिवार, वडील बंधू, वहिनी, मुलगा, पत्नी यांनादेखील या यज्ञवेदीवर मी ढकलले आहे. आणि आता त्या वेदीवर आहुती म्हणून बळी जाण्यासाठी माझा देहपण मी ठेवला आहे, आमचा निर्वंश झाला तरी चालेल, पण मातृभूमी स्वतंत्र झाली पाहिजे. आपल्या कुलात नक्कीच  ईश्वरी अंश असला पाहिजे, म्हणूनच आपल्याला हा आहुतीचा मान मिळाला आहे. आम्ही सात बंधू असतो तरी सर्वांनी देशासाठी बलीदान दिले असते. तरी हे वहिनी, जसे पार्वतीने हिमाच्छादित  पर्वतावर तप केलं, जशा हजारो राजपूत स्त्रियांनी हसत हसत अग्निप्रवेश केला, तसेच तुम्ही देखिल या व्रताचे पालन करा. भारतीय स्त्रियांचं तेज लुप्त झालेलं नाही हे दाखवून द्या. इथे कवी, वहिनींना ‘विरांगने’ म्हणून संबोधतात व त्यांना नमन करतात. शेवटी ते पुन्हा एकदा सांगतात की, जर आपण जाणुन बुजून हे सतीचे वाण हातात घेतले आहे, तर अग्नीप्रवेश करण्याची आपली तयारी आहेच. यज्ञवेदीवर चढलो आहोत तर ते हवन होण्यासाठीच!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिकता की प्रदर्शन ?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आधुनिकता की प्रदर्शन ?” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आजकाल खरोखरीच खूप जास्त अच्छे दिन आलेले आहेत . महागाईच्या नावाने ओरडत ओरडत प्रत्येक जण आपले सगळे सणसमारंभ, सोहळे धूमधडाक्यात पार पाडतोय. ऐच्छिक गोष्टी केव्हा आवश्यक सदरातून अत्यावश्यक सदरात शिफ्ट झाल्यात ते आपले आपल्यालाही कळलेच नाहीं.पूर्वीची कुठल्या गोष्टीसाठी किती पैसा द्यायचा असतो ही गणितच मुळी हौस ह्या सदराखाली संपूर्णपणे बदलल्या गेली आहेत. फक्त हे करतांना ह्या ऐच्छिक गोष्टी प्रघात बनून कुणाची गैरसोय बनू नये ही इच्छा.

मध्यंतरी एक बातमी वाचनात आली आणि मन खरचं खूप सुन्न झालं.एक शाळकरी मुलाने त्याच्या आईबाबांनी वाढदिवस आजच्या पध्दतीनुसार साजरा करु दिला नाही म्हणून आत्महत्या केली. सगळ्यां करीताच विचारात पाडणारी दुःखद घटना आणि त्या पालकांच्या सांत्वनासाठी शब्दही सुचेना.

हल्ली  जग बरचसं आभासी झालयं. सोशल मिडीया हे दुधारी शस्त्रासारखं आहे. त्याचा वापर तुम्ही कसा करताय ह्यावर ते फायदेशीर की नुकसानकारक हे ठरणार आहे. जे मोठमोठे इव्हेंट सहज साजरे होताना मोठया स्क्रीनवर बघितल्या जातात ते प्रत्यक्षात अमलात आणणं खूप कठिण असतं हे कुठेतरी सगळ्यांना कळायला हवे.

वाढदिवस, लग्नांचे वाढदिवस ही खरोखरच कुटूंबातील आनंददायी घटना.या प्रसंगातून सगळेजण एकमेकांच्या मनाशी जोडल्या जातात.असे कुटुंबातील छोटेछोटे समारंभ आनंद देतात, एक प्रकारचे चैतन्य निर्माण करतात.

पण दुर्दैवाने ह्याचे स्वरुप, त्याचा अतिरेक हा समाजासाठी खरोखरच डोकेदुखी ठरला आहे.प्रेम म्हणजे मनाशी मनाचे जुळलेले नाते,त्याग ह्या संकल्पना सोडून वरपांगी दिखाऊ प्रदर्शनीय बाब होऊ घातलीय.

हे अवर्णनीय आनंद देणारे कौटुंबिक प्रसंग ज्यांना आम्ही मराठी मध्ये “समारंभ”किंवा “सोहळे” म्हणतो त्याचे रुपांतर आभासी,दिखाऊ अशा “इव्हेंट” मध्ये झालेय.आणि खरोखरच हे “इव्हेंटचे भूत” सर्वसामान्य माणसाच्या अक्षरशः बोकांडी बसलयं

फेसबुक किंवा व्हाट्सएपवर वाढदिवसाचे किंवा लग्नाच्या वाढदिवसाचे केक कापतांनाचे फोटो एकदा आपलोड केले की जणू आपल्या सुखी जीवनाचा पुरावा सादर केल्यासारखी भूमिका काही लोक सादर करतात. कुठल्याही इव्हेंट मध्ये जाणे,तिथे सेल्फी काढून ते भराभर अपलोड करणे, खरचं ही सुखाची परिभाषा आहे का हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे.

वाढदिवस, लग्नांचे वाढदिवस, प्रीवेडींग शूट हे ज्यांना परवडतं त्यांच्यासाठी उत्तमचं . पण ह्या सगळ्या गोष्टींचा पायंडा पडतोय हे खूप घातक.ह्या आभासी सुखामुळे,ह्या पायंड्यामुळे कितीतरी मुलं नैराश्येच्या खाईत लोटल्या जातात आहे हे पालकांना समजूनच यायला मुळी खूप ऊशीर होतोय.

ह्याची सुरवात होतांनाच पालकांनी जागरूकतेने ह्याबद्दल मुलांना नीट समजावून दिले तर ती सगळ्यांसाठीच खूप फायद्याचे ठरेल पण त्यासाठी आधी पालकांनी आधी या “सो काँल्ड आधुनिकतेला” आळा घालणं गरजेचं आहे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares