मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाणं आपलं आपल्यासाठी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ गाणं आपलं आपल्यासाठी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

एखादं गाणं आपल्या आयुष्यात कुठल्या वेळी आपल्या कानावर पडतं त्यावर त्या गाण्याची आणि आपली नाळ किती जुळणार हे अवलंबून असतं असं मला वाटतं. आपल्या मनात त्यावेळी लागलेला एखादा विशिष्ट सूर आणि त्या गाण्याचा सूर जर जुळला तर ते गाणं आपल्या जिव्हाळ्याचं होतं. मग त्याचा राग, त्यातली सुरावट, ते कुणी गायलंय, कुठल्या वेळी गायलंय, त्यातले शब्द, त्याचा अर्थ, या सगळ्या पलीकडे जाऊन ते गाणं आपल्याला एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीने, बऱ्याच भेटीनंतर समोर दिसताच आनंदाने बिलगावं तसं बिलगतं. आणि मग पुढे एखाद्या चित्रपटाच्या पार्श्वसंगितासारखं आयुष्यातल्या अनेक प्रसंगात ते गाणं आपल्या मनात त्याच्या विशिष्ट सुरावटीसह रुणझुणत राहतं. अनेक अर्थाने आपल्याला समृद्ध करत राहतं. अशावेळी त्या गाण्याचा मूळ भाव काय, त्याची रचना कशी आहे, कुठल्या प्रसंगात केली आहे, अशा कुठल्याच गोष्टींचा प्रभाव त्यावर पडत नाही. ते गाणं अगदी आपलं आपल्यासाठीच खास झालेलं असतं. आपण आपल्या मनातले, स्वप्नातले विशेष रंग, विशेष सूर त्या गाण्याला दिलेले असतात. आणि त्या भावनेतूनच आपण ते गाणं पुन्हा पुन्हा आपल्या मनात आळवत राहतो.

काही गाणी अशीच मनाला भिडलेली आहेत. त्या त्या वेळी कुठल्या प्रसंगात ती आपल्यासमोर आलेली आहेत ते सुदैवाने माझ्या लक्षात राहिलं आहे. त्यामुळे त्याला अनुसरून असलेला एखादा प्रसंग समोर आला की आपल्या प्ले लिस्टच्या लूपवर टाकल्यासारखी ती आपोआपच सुरू होतात. 

पण त्यातलं एक गाणं फार खास आहे. कारण बऱ्याचदा ते मनात रुणझुणत असतं….. 

‘भय इथले संपत नाही…’. कविवर्य ग्रेस यांचे अफाट शब्दरचना असलेलं शिवाय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी शब्दबद्ध केलेलं आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं अजरामर ठरेल यात शंकाच नाही. पण या गाण्याची गंमत म्हणजे देवकी पंडित, राहुल देशपांडे यांनी देखील हे गाणं गायलं आहे आणि त्या प्रत्येक वेळी ते तेवढेच प्रभावशाली ठरलं आहे. त्यामुळे ग्रेसांच्या आणि हृदयनाथांच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो. 

हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं, तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. अकरावीतली गोष्ट आहे. स्केचिंग करून घरी परत येताना बरीच संध्याकाळ झाली होती. विठ्ठल मंदिराच्या समोरच्या एका छोट्याशा खाजगी रस्त्यावरून मी आमच्या घराकडे निघाले होते. त्या रस्त्यावर पुष्कळ फुलझाडी आहेत. कारण आजूबाजूला बंगले आणि काही जुन्या अपार्टमेंट आहेत. अगदी कातर म्हणावी अशी ती वेळ. झाडांची स्केचेस काढून आम्ही मैत्रिणी परत घरी निघालो होतो. रात्रीच्या रस्त्यावरच्या लाईटमध्ये झाडांच्या पडणाऱ्या सावल्या किती वेगळ्या दिसतात. या विषयावर मी आणि माझी मैत्रीण गप्पा मारत होतो. या निद्रिस्त सावल्या जास्त मोहक की मूळ झाडं? असा आमचा चर्चेचा विषय होता. गप्पा मारता मारता मधल्या एका टप्प्यावर माझी मैत्रीण दुसरीकडे वळली आणि मग मी एकटीच हळूहळू पावलं टाकत घराकडे निघाले. एकटेपणाने वेढलं तसं दिवसभराचा धावपळीचा थकवा चांगलाच जाणवायला लागला. अगदी थोडं अंतर चालणंसुद्धा नको झालं होतं. त्यात पाठीवर जड सॅक, हातामध्ये मोठं स्केचबुक घेऊन उद्याच्या सबमिशनचा विचार मनात चालू होता.

बाहेरचं वातावरण मात्र प्रसन्न होतं. थंडीचे दिवस होते. हवेत सुखद गारवा होता. रस्त्यावरच्या झाडांमुळे, फुलांचा खूप सुंदर असा मंद वास येत होता. रस्त्यावर बराच शुकशुकाट होता. तुरळक सायकलवरून जाणारे कुणी किंवा बंगल्याबाहेर उभे असणाऱ्या काही व्यक्ती असं सोडलं तर फारशी रहदारी नव्हती. तसाही तो रस्ता खाजगी आणि आतल्या बाजूला असल्यामुळे फारशी वर्दळ त्यावर नसायचीच. त्यामुळे माझा तो लाडका रस्ता होता. त्या रस्त्यावरच एका बंगल्याच्या खाली एक कारखाना होता. कारखाना म्हणजे एक मोठी पत्र्याची दणकट शेड होती आणि त्याला मोठ्या खिडक्या होत्या. आत मध्ये भरपूर लाईट लागलेले असायचे आणि तीन-चार लोकं काहीतरी काम करत असायचे. काय काम करायचे ते माहित नाही पण त्या जागेवर बऱ्याचदा फेविकॉलचा वास यायचा. कसला तरी कटिंगचा आवाज यायचा. तिथे उशिरापर्यंत साधारण नऊ-साडेनऊपर्यंत काम चालायचं. तर त्या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे कधीही, गडबड, गोंधळ ओरडा नसायचा. पण तिथे संध्याकाळ झाली की कायम रेडिओ विशेषतः आकाशवाणी चॅनल चालू असायचा. आणि त्या रेडिओवरची गाणी रस्त्यावर दूरपर्यंत ऐकू यायची. 

त्यादिवशी असाच रेडिओ चालू होता आणि जशी जशी मी त्या कारखान्याच्या जवळ आले तसं माझ्या कानावर हे सूर पडले ‘ भय इथले संपत नाही…’ आणि का कोण जाणे सुरुवातीचे हे शब्द ऐकून मी थबकलेच. हळूहळू जसं ते गाणं पुढे जायला लागलं तशी मी त्याच्यात इतकी रंगून गेले की नकळत मी त्या कारखान्याच्या मागच्या बाजूला असलेल्या चाफ्याच्या झाडाखाली येऊन उभी कधी राहिले ते माझं मलाही कळलं नाही. अगदी शांतपणे कान देऊन जणू झाडांना, गाण्याला किंवा अगदी रस्त्यालासुद्धा माझ्या असण्याचा त्रास होणार नाही अशी काळजी घेत मी ते गाणं ऐकू लागले. वातावरणाची मोहिनी असेल, मनातली स्थिती असेल किंवा आणखीन काही असेल पण त्या गाण्यानं त्या दिवशी मला अगदी अलगदपणे कवेत घेतलं ते आजतागायत. ‘ झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवायचे ‘ हे शब्द माझ्या कानावर पडायला आणि बरोबर त्याचवेळी मी उभ्या असलेल्या झाडावरून चाफ्याचं एक फुल गळून माझ्या पायापाशी पडायला एकच गाठ पडली. त्यासरशी एका विशिष्ट तंद्रीत मी पटकन वर बघितलं. सहज आकाशाकडे लक्ष गेलं. स्वच्छ चांदणं होतं. फुल पडण्याचा योगायोग काहीतरी वेगळाच होता. काय झालं ते कळलं नाही. झाडावरून फुलानं सहजपणे ओघळून पडावं तसं त्या गाण्यानं माझं मी पण बाजूला सारून मला आपल्या कवेत घेतलं. आजही अगदी हे लिहीत असतानासुद्धा मला ती भारावलेली अवस्था आठवते. 

नक्की कशाचं भारावलेपण होतं ते माहित नाही. इतकं जाणवलं की हे सूर आपले आहेत. आपल्यासाठी आहेत. आपल्याला आता कायम सोबत करणार आहेत. आणि ते गाणं माझं झालं. त्यानंतर येणाऱ्या अनेक सुखदुःखाच्या प्रसंगात विशेषतः जेव्हा जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा तेव्हा हे गाणं मला आठवतं. पण वेदना घेऊन नाही तर कसली तरी अनामिक ऊर्जा आणि चैतन्य घेऊन ते गाणं येतं. मला हे गाणं नेहमीच सर्जनशीलतेला उद्देशून म्हटलं आहे असं वाटतं. कदाचित त्यावेळी माझ्या डोक्यात सबमिशनचे विचार असतील ते पूर्ण करण्याचा ताण असेल त्यावर या गाण्यानं थोडं आश्वस्त झाल्यासारखं वाटल्याने असेल. पण मला ते गाणं .. निर्मिकाला निर्मितीचं भय हे कायम व्यापूनच असतं पण तरीही त्या भयाला सहजतेने सामोरं जावं, सश्रद्ध शरण व्हावं मग निर्मिती तुम्हाला पुन्हा संधी देते .. असं सांगणार वाटतं. 

…… निर्मिक आणि निर्मिती यांच्यामधल्या निरंतर चालणाऱ्या खेळात निर्मिकाला लाभणारा उ:शाप वाटतं.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ How is the Josh…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“How is the Josh…! ☆ श्री संभाजी बबन गायके 

— कोण म्हणतं आभाळाला स्पर्श करता येत नाही?

 रमण नावाचा एक तरुण. त्याचे वडील तीस वर्षे सैन्यात शिपाई होते. उत्तम कामगिरी बजावल्याने त्यांना मानद कॅप्टन अशी बढती मिळाली होती. आपल्याही मुलाने सैनिक व्हावे, नव्हे सैन्य अधिकारी व्हावे, अशी त्यांची इच्छा असणं स्वाभाविक होतं. पण रमण अभ्यासात रमला नाही. त्याला हॉटेलचे क्षेत्र खुणावत राहिले. त्यातून Hotel Managementची पदवी प्राप्त करून तो एका मोठ्या हॉटेलात शेफ म्हणून रुजू झाला…ही नोकरी त्याने तीन वर्षे केली!

 पण त्याच्या वडिलांचे स्वप्न त्यालाही पडू लागले होते. वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांच्या जोरावर त्याने आणखी मेहनत घेतली..अभ्यास केला..व्यायाम केला आणि Junior Commissioned Officer म्हणून तो सेनेत भरती झाला. त्याचे पहिले पद होते…नायब सुबेदार. अनुभव आणि ज्ञान पाहून श्री.रमण यांना

इंडीयन मिलिटरी अकॅडमी मध्ये Mess In-Charge पदाची जबाबदारी देण्यात आली.

सैन्य अधिकारी बनत असलेल्या साहेब लोकांना उत्तम भोजन देण्याची त्यांची जबाबदारी बनली. पण इथेच त्यांचा दृष्टिकोन बदलला. प्रशिक्षणार्थी तरुण आणि आपण यांत फरक आहे तो शिक्षणाचा आणि आत्मविश्वासाचा..त्यांनी समजून घेतले. त्या तरुणांशी त्यांनी मैत्री संबंध प्रस्थापित केले. त्यांनी कसा अभ्यास केला, कसे परिश्रम घेतले ते सारे जाणून घेतले. सेवेतील सक्षम लोकांना भारतीय सेनेत अधिकारी होण्याची संधी दिली जाते. श्री.रमण यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर ही संधी साधली. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले..पण रमण खचून गेले नाहीत. त्यांनी अभ्यास आणखी वाढवला…आणि हे करत असताना त्यांनी कर्तव्याकडे दुर्लक्ष केले नाही. याचेच फळ त्यांना तिस-या प्रयत्नात मिळाले. Officer Cadre परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले….वयाच्या पस्तीस वर्षांपर्यंत त्यांना संधी होती….अगदी शेवटच्या क्षणी त्यांना यशश्री प्राप्त झाली.

 जिथे इतरांना जेवण वाढले, अधिकाऱ्यांना salute बजावले, तिथेच मानाने बसून भोजन करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले ..अधिकारी बनून भारत मातेची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले…बाप से बेटा सवाई बनून शेवटी अधिकार पदाची वस्त्रे परिधान केलीच!

नुकत्याच झालेल्या IMA passing out parade मध्ये मोठ्या अभिमानाने त्यांनी अंतिम पग पार केलं…त्यावेळी त्यांच्या मनात किती अभिमान दाटून आला असेल नाही?

 लेफ्टनंट रमण सक्सेना ….एका अर्थाने यश Success ना म्हणत असताना successful होऊन दाखवणारा लढाऊ तरुण!

चित्रपटात हिरो होणं तसं तुलनेने सोपे असेल…हॉटेलात काम करून चित्परपटात हिरो बनलेले आपण पाहिलेत…पण सैन्लायाधिकारी झालेला असा तरुण विरळा! लाखो सक्षम तरुण मुलांमधून निवडले जाणे म्हणजे एक कठीण कसोटी असते!

 सक्सेना साहेबांनी दाखवलेली ही जिद्द प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात सक्सेना साहेबांना उपयोगी पडेल, यात शंका नाही! जय हिंद! 🇮🇳

जय हिंद की सेना! 🇮🇳

यातून सर्वांना प्रेरणा मिळू शकेल.

माझा उद्देश फक्त आपल्या तरूणांचे कौतुक करण्याचा असतो…त्यातून एखादा मुलगा, मुलगी प्रेरणा घेईल…अशी आशा असते. तशी उदाहरणे मी पाहिली आहेत, म्हणून हा लेखन प्रपंच. ज्ञानी माणसांनी या विषयावर अधिक लिहावे. जय हिंद !

(How is the Josh…! ही आपल्या सैनिकांची हल्लीची घोषणा आहे. उरी सिनेमा आल्यापासून ही घोषणा प्रसिद्ध झाली. तुमच्यात किती उत्साह आहे…यावर High sir असे उत्तर दिले जाते !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक उल्लेखनीय धाडस… लेखक : श्री सागर आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ एक उल्लेखनीय धाडस… लेखक : श्री सागर आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

पुण्यातील मराठी मुलीने बदलायला लावला अमेरिकी शाळांतील शिवरायांचा इतिहास; पुढील शैक्षणिक वर्षापासून औरंगजेबाची महती बाद; छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा धडा 11 वीच्या शालेय इतिहास समाविष्ट!

पुण्यातील बाणेर येथील श्री अतुल जयकुमार आवटे यांची पुतणी, त्रिशा सागर आवटे ही अमेरिकेतल्या मॅडिसन स्टेट मधल्या वेस्ट हायस्कूल मध्ये 11वीला शिकते. एकदा त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेब यावर असलेला एक धडा क्लासमध्ये शिकविला जात होता. त्यात औरंगजेब किती सर्वश्रेष्ठ होता, याबद्दल लिहिलेले आहे, ते शिकविले जात होते. त्यावेळेस त्रिशाने धाडस करून क्लासमध्ये टीचरला सांगितले की, हे खरे नाही, हा खोटा इतिहास आहे व छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वश्रेष्ठ होते. शिवरायांबद्दल सगळा खरा इतिहास तिने वर्गात इतिहास सांगितला. अलेक्झांडर च्या कथा ऐकून वाढलेल्या अमेरिकन मुलांना शिवरायांचा हा धाडसी इतिहास रोमांचित करून गेला. टीचरलाही हा इतिहास नवा होता; पण इंटरेस्टिंग वाटला. त्यानंतर त्यांच्या टीचरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खूप वाचन केले व सगळी माहिती मिळवली. याचा परिणाम असा झाला की, आता त्या शाळेमध्ये पुढील वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर संपूर्ण एक धडा समाविष्ट केला जाणार आहे, जेणे करून तेथील विदयार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वश्रेष्ठ होते, हे कळावे.

त्रिशाने केलेल्या या धाडसाबद्दल एक भारतीय म्हणून खरंच खूप अभिमान आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा धडा पुढील शैक्षणिक वर्षांपासून समाविष्ट करणार, याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे पण खूप आभार.

लेखक : सागर आवटे ( Trisha’s father ), Madison City, Wisconsin State.

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “चल उड़ जा रे पंछी… समय हुआ बेगाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “चल उड़ जा रे पंछी… समय हुआ बेगाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

हीच आता आपल्या आयुष्याची दोरी आहे बरं… पहाटेचं तांबडं फुटल्या पासून अखंड दिवसभर पंख पसरून निळ्याशार आकाशात गगन विहार करत राहता येईल.. पण संध्याकाळी तांबुस किरमीजी किरणांचा सडा सांडल्यावर आपल्या सगळ्यांना या दोरीवरच रात्रीचा आसरा घेण्यासाठी हीच एकमेव आता जागा शिल्लक राहिली आहे… थोड्या दाटीवाटीने राहायला लागणार आहे ,पण त्याला इलाज नाही… आता पूर्वीसारखं सुटसुटीत स्वतंत्र घरट्यात राहायची लागलेल्या सवयीला बदलावं लागणार आहे.. कारण आता काळ फारच झपाट्याने बदलत चाललाय बरं.. शहरातील वनराई ची हिरवीगार जंगल भुईसपाट करून तिथं आता सिमेंटच्या टोलेजंग जंगलांची व्याप्ती वाढत चालली असल्याने आपली म्हणणारी झाडांची कत्तल करण्यात आली… ती माणसांची जमात आपली घरं बांधताना आपल्याला बेघर करून राहिली… त्यामुळे आपण आता आपलं छप्परच काय पण दुपारच्या कडक उन्हात झाडाच्या सावलीला सुध्दा मुकलोय.. पोट भरण्यासाठी चारापाणी दाण्यासाठी शहरभर उंच उंच उडत जातोय… पण अन्नाचा कण फारच क्वचित ठिकाणी दिसून येतो… आणि जिथे तो दिसतो तिथं तर आपल्याच जातभाईंची झुंबड उडून गेलेली बघावी लागते… कुणाचं एकाचं तरी अश्याने पोटभरत असेल कि नाही.. काही कळत नाही.. जिथं मोठ्यांची ही कथा तिथं कच्चीबच्ची पिलांना कोण आणि कसं पोसणारं… काळ फारच वाईट आलाय… आपल्या जगण्यावर गदा आलीय.. भुकबळी, तहानबळी आणि दिवसरात्र उन्हाळा पावसाळा नि हिवाळा असं उघड्यावर राहणं आपलं जगणचं संपवून टाकायला लागला.. आपली संख्या रोडावत चाललीय.. आता तो दिवस दूर नसेल इतिहासात नोंद असेल या धरेवर पक्षी गणांचं कोणेऐकेकाळी वास्तव्य होतं… बस्स इतकाच दाखला शिल्लक राहील.. तेव्हा आता आपण जितके आहोत तितके एकत्र राहणे हेच श्रेयस्कर राहील… या दोरीवरच सध्या आपला कठीण काळ कंठावा लागेल… त्या माणूस नावाचा स्वार्थी प्राण्याने स्वताची जमात वाढवत वाढवत गेला नि या वसंधुरेचा, निर्सगाचा र्हास करत सुटला.. ना हवा शुद्ध राहीली ना पाणी… त्याला स्वताला देखील यासाठी खूपच धावाधाव करावी लागत आहेच… मुबलक होतं तेव्हा त्याने नुसती नासाडीच केली. जे जे आयतं मिळत गेलं ते ते नुसतं ओरबाडत गेला… त्याचं भवितव्य उजाडत गेलं नि आपलं मात्र उजाडलं गेलं… कधी भविष्यातील पिढीचा विचार त्यानें केलाच नाही… ना स्वताच्या ना इतर प्राणांच्या.. माणूसकीला कधीच हद्दपार करून बसलेला भूतदयेला कितीसा जागणार म्हणा… आणि मगं भोगावी लागताय त्या दुष्परिणामांची फळं त्याच्याबरोबर विनाकारण आपल्याला… जो चोच देतो तो चारा देखील देतो हे कोरडं तत्वज्ञान ठरलयं आताच्या या काळात.. त्या माणसाचा अलिकडे काही भरंवसाच देता येत नाही.. कुठच्या क्षणाला कसा वागेल ते देवाला देखील सांगता येणार नाही… आता हेच बघा ना ज्या दोरीवर आपण बसलोय ती आपल्या आधाराची जरी असली तरी खऱ्या अर्थाने ती आपल्या आयुष्याची दोरी आहे बरं.. ती कुठून कशी तुटेल, तो माणूस कधी तोडेल,हे काही सांगता यायचं नाही.. ती तशी तुटलीच तरी आपल्या जीवाला धोका असणार नाही.. आपण लगेच सावधगिरीने हवेत पंख पसरून विचरू लागू… मात्र मागच्या पानावरून पुढच्या पानावर आपलं विस्थापिताचं पुन्हा नव्याने जगणं सुरू होताना किती जण मागे उरतील हे त्या परमेश्वरालाच माहीत असेल…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सिंहावलोकन… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ सिंहावलोकन… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

वर्षे येतील व जातील हे कालचक्र आहे. होते आहे व रहाणार आहे यात आपल्याला काय गवसलं हे महत्त्वाचे आहे.

प्रयत्नाचे फळ निश्चित मिळते. प्रयत्न विचार व‌ कृतीतून घडतात‌. इच्छित फळ मिळाले तर आनंदी आनंद पण नाही मिळाले तर निराशा, दुःख! फळाच्या परिणामाची शाश्वती नाही. व आनंद जरी मिळाला तरी तो टिकणारा असत नाही त्यामुळे खरे समाधान मिळणे ही आजच्या क्षणाची आवश्यकता ओळखून निश्चय करणे हाच काळावर मिळवलेला विजय असतो‌, अन्य कोणताही उपाय नाही.

प्रयत्न करणे व ते करत असतांनाच आनंद घेणे हा वेळेचा सदुपयोग आहे. येणारा परिणाम दुय्यम स्थानी ठेवल्यास त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा  किंवा दु:खाचा परिणाम मनावर होणार नाही. सततच समाधान उपभोगता येईल हे जाणवणे म्हणजे स्थिरता प्राप्त होणे आहे.

*

“विचाराइतके देखणे काहीच नाही”

“एक दाणा पेरता मेदिनी माजी कणीस होते”..

*

✍️तो माझा अन् मी त्याची  दुग्धशर्करा योगच हा

मनी वसे ते स्वप्नी दिसे भगवंताचा खेळच हा…

*

“सोहम् सोहम्” शिकवून मजला धाडियले या जगतात

“कोहम् कोहम्” म्हणोनी अडलो उगाच मायापाशात..

*

अंतर्चक्षू प्रदान करुनी रूप दाविले हृदयात

कमलपत्र निर्लेप जसे नांदत असते तीर्थात..

*

सुखदुःखाची जाणीव हरली, ईश्वर चरणी भाव जसा

तसेच भेटे रुप तयाचे,गजेंद्राशी विष्णू तसा …

*

महाजन, साधूळ संत सज्जन काय वेगळे असे तिथे?

प्रेमाची पूर्तता व्हावी, हे ध्येय निश्चित तिथे…

*

“ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः”।

वचन तुझे रे अनुभव घ्यावा, हीच आस रे तुझी पहा…

*

निजानंदी रंगलो मी तव हृदयाशी भेटता

आतच होता,आहे,असशी जाणीव याची तू देता…

*

कृतार्थ मी अन् कृतार्थ तू ही जन्माचा या अर्थ खरा

आनंदाचा कंद खरा तू (मम)हृदयाचा आराम खरा…

*

कृष्ण सखा तू, रामसखा तू प्रेमाचा अवतार सख्या

अयोनिसंभव बीज अंकुरे सात्विक, शुध्द हृदयी सख्या..

*

प्रशांत निद्रा प्रशांत जीवन देहात पावले मज नाथा

प्राणांवर अधिराज्य तुझे रे केशव देतो (जसा)प्रिय पार्था…

*

आदीशक्ती अंबाबाई शक्तिरुपाने वसे इथे

त्याच शक्ती ने जाणीव होते भगवंत असे जेथे…

*

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बखळ, आळी, आणि बागा —

‘बोळ ‘ बंधूंचा आप्तस्वकीयांचा पसारा मोठा होता, बोळांना बऱ्याच बहिणी होत्या त्यावेळी बोळ पुढे बंद होत असेल, तर तो बोळ नसून त्याला ‘बखळ’ म्हणायचे. अहिल्यादेवीकडून शनिवारवाड्याकडे आम्ही जायचो ती होती हसबनीस बखळ. टिळक रोड जवळ स्काऊट समोरची म्हणजे (सध्याचं उद्यान प्रसाद कार्यालय) 1957 पूर्वी तिथे इचलकरंजीकरांची बखळ होती. पुण्यातले बोळ प्रसिद्ध होते तशा ‘आळ्या’ही अनेक होत्या. लोणीविके दामले आळी, गाय आळी, शुक्रवारांतील शिंदे आळी, त्याच रस्त्याने थोडं पुढे गेलात ना! की मग तुम्हाला लागेल खडक माळ आळी. गणपतीच्या दिवसात पायांचे तुकडे पडेपर्यंत पहाटे चार वाजेस्तोवर गणपती पहायला प्रत्येक बोळ् आणि अगदी आळीतले सुद्धा गणपती बघायला आम्ही भटकत होतो. या खडक माळ आळीचा भव्य दिव्य गणपती बघताना डोळे विस्फारायचे. कसब्यातील तांबट आळी अगदी डोकं उठवायची. कारण तांब्याची मोठमोठी सतेली, पातेली, टोप, बंब, अशी ठोक्याची भांडी, ते बनवणारे कारागीर कानात बोळे न घालता ठोक ठोक करून ठोकायची. बुधवारातील दाणे आळी, आणि हो विशेष म्हणजे तिथे एकही शेंगदाणा मिळायचा नाही, चोरखण आळीत चोर राहतात का?असा भाबडा प्रश्न विचारल्यावर आम्हाला टप्पल मारून ‘वेडपटच आहेस ‘असा शिक्का मिळून, अग चोर नाही. चोळखण आळी म्हणायचे त्या आळीला. तिथले धारवाडी खण प्रसिद्ध आहेत. तिथेच पुढे विजयानंद टॉकीजची गवळी आळी होती. तिथे एकही गाय गोठा किंवा डेअरी नव्हती. बहुतेक सगळ्या गाई गाय आळीत गेल्या असाव्यात. पूर्व भागांत होती बोहरी आळी, तिथे मात्र बोहारणींचा तांडा जुन्या कपड्यांच्या ढीगात फतकल मारून बसलेला असायचा. नुसता कलकलाट चालायचा जसा काही मासळी बाजारच भरलाय.

तर मंडळी अशी होती ही, काळा आड लुप्त झालेल्या बोळ ‘आळ्या’ बागा आणि बखळींची ची कथा.

– क्रमशः…

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हरवणे, सापडणे… – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ हरवणे, सापडणे… – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

सोनेरी रंगाचं टोपण असलेलं काळ्याभोर रंगाचं एक जुनं, देखणं, महागाचं फाउंटन पेन माझ्या वडिलांच्या कपाटातून मला नेहमी खुणावत असे. आपण त्या पेनाने छानसं काहीतरी लिहून बघावं असं मला फार वाटत असे. “पैसे देऊनही आता असं पेन मिळणार नाही” असं बाबांचं मत होतं. त्यांचं ते फार आवडतं पेन होतं. पण मग सातवी, आठवीत गेल्यावर मला फार आवडतं म्हणून ते पेन त्यांनी मला दिलं. आणि कसं कोण जाणे, एका शनिवारी सकाळी शाळेतून परत येताना ते पेन माझ्या दप्तरातून रस्त्यात खाली पडलं, हरवलं.

पेन हरवलं म्हणून बाबा मला रागावतील, ही माझी भीती नव्हती. बाबांचं आवडतं पेन आपल्या हातून हरवल्याचं आणि बाबांना त्याचं वाईट वाटेल याचं मला दुःख होतं. पण पेन हरवल्याचं कळल्यावर बाबा मला म्हणाले होते, “ रस्त्यात पडलं असेल तर मिळेलही कदाचित आणि समज जर नाही मिळालं, तर तू मोठी झालीस की यापेक्षा सुंदर पेन तू माझ्यासाठी आण. अशीही कोणती गोष्ट कायम टिकते? “ 

त्यांच्या या वाक्यामुळे, पेन हरवल्याच्या दुःखापेक्षा, हरवलेलं पेन परत मिळू शकतं हा आशावाद आणि आपण मोठे झाल्यावर बाबांसाठी सुंदरसं पेन आणू शकू हा बाबांनी दाखवलेला विश्वास मला उमेद देऊन गेला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलांना शाळेत सोडून परत जाणाऱ्या एका पालकांना हे पेन रस्त्यात मिळालं आणि त्यांनी ते शाळेच्या ऑफिसमध्ये जमा केलं. हरवलेलं पेन परत मिळालं.

“वस्तू हरवणे” ही कोणाच्याही आयुष्यात, कधीही घडू शकणारी एक घटना असते. आपल्या चुकीमुळे वस्तू हरवली की एक प्रकारची चुटपुट लागून राहते, काहीसं अपराधीही वाटतं. वस्तू मौल्यवान असेल तर ती आठवण कायमच स्मरणात राहते. अशावेळी वस्तू हरवणाऱ्या माणसाला, “ धांदरट, बेफिकीर” अशी विशेषणं लागू शकतात आणि ती जास्त दुखावणारी असतात. हरवणाऱ्याचा पुढे वाद घालण्याचा, आपली चूक कशी नव्हती हे सांगण्याचा हक्क जवळजवळ संपुष्टात आलेला असतो. आणि जर आपली चूक असेल तर गप्प बसण्याला पर्याय नसतो.

परंतु हरवणं या अनुभवाला इतरही सकारात्मक बाजू असतात हे मला माझ्या बाबतीत घडलेल्या पेन हरवण्याच्या घटनेवरून कळलं. लोकं चांगली असतात, शाळेच्या आवारात मिळालेले पेन त्यामुळेच परत मिळू शकलं हा चांगुलपणावरचा विश्वास तर वाढलाच, पण “ तू मोठी झाल्यावर माझ्यासाठी एक सुंदर असं पेन आण” या बाबांच्या शब्दांनी पेन हरवण्याच्या बदल्यात मला एक “स्वप्न” बक्षीस दिलं. मोठी झाले की मी माझ्या पहिल्या पगारातून, कमाईतून बाबांसाठी एक किंमती पेन विकत घेण्याचं स्वप्न त्यानंतर मी कायम बघितलं आणि ते पूर्ण झाल्याचा आनंदही घेतला.

वस्तू हरवण्याला अशा कितीतरी बाजू असतात. लाकूडतोड्याची कुऱ्हाड लाकडं तोडताना नदीत पडली म्हणजे हरवलीच. देवाने त्याला त्याच्या लाकडी कुऱ्हाडी बदली सोन्याची, चांदीची कुऱ्हाड देऊ केली. पण प्रामाणिक लाकूडतोड्याने ती नाकारली. मग देवाने त्याला त्याची हरवलेली कुऱ्हाड तर दिलीच पण सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड त्याच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून दिली. बालपणी ऐकलेली ही भाबडी गोष्ट खरी वाटो, न वाटो पण प्रामाणिक असण्याचा संस्कार करते इतकं नक्की.

इथे मला विशेषत्वाने आठवते ती फ्रान्झ काफ्का ( Franz Kafka) ची गोष्ट. आवडती “बाहुली” हरवली म्हणून रडणारी एक लहानशी, गोड मुलगी तुमच्या, माझ्यासमोर येऊन उभी राहिली, तर आपण काय करू? आपण तिची समजूत काढू, तिला नवीन बाहुली आणून देऊ. पण फ्रान्झ काफ्काने तसं केलं नाही.

काफ्का हा जर्मन कथा कादंबरीकार होता. बर्लिनच्या पार्कमध्ये फिरत असताना त्याला बाहुली हरवली म्हणून रडत असलेली एक छोटी मुलगी भेटली. त्या दोघांनी मिळून बाहुली खूप शोधली. परंतु बाहुली मिळाली नाही. काफ्काने ह्या छोट्या मुलीला दुसऱ्या दिवशी परत बाहुली शोधण्यासाठी पार्कमध्ये बोलावले.

दुसऱ्या दिवशी काफ्काने या छोट्या मुलीला बाहुलीने लिहिलेलं एक पत्र दिलं. त्यात बाहुलीने लिहिलं होतं की ती जगप्रवासाला चालली आहे. आणि ती, या प्रवासाचे वर्णन पत्रातून नियमितपणे ह्या छोट्या मुलीला लिहित राहील.

अशा रीतीने, काफ्काने बाहुलीच्या नावाने लिहिलेल्या जगप्रवासाच्या साहस कथांना सुरुवात झाली. काफ्का ही पत्रे स्वतः त्या मुलीला वाचून दाखवत असे. ज्या पत्रातील साहसकथा आणि संभाषणे त्या मुलीला आवडू लागली.

नंतर बरेच दिवसांनी काफ्काने प्रवास करून बर्लिनला परत आलेली बाहुली ( म्हणजे त्याने विकत आणलेली ) छोट्या मुलीला दिली. “ही माझ्या बाहुलीसारखी अजिबात दिसत नाही, ” मुलगी म्हणाली.

काफ्काने तिला दुसरे पत्र दिले ज्यामध्ये बाहुलीने लिहिले होते : “माझ्या प्रवासाने मला बदलले आहे. ” चिमुरडीने हरवलेली बाहुली मिळाली म्हणून तिला आनंदाने मिठी मारली आणि ती बाहुली घरी नेली. बाहुली “हरवण्याच्या निमित्ताने” छोट्या मुलीने पत्रातून जग बघितलं.

काफ्काच्या मृत्यूनंतर, आता वयाने काहीशी मोठी झालेल्या या मुलीला बाहुलीच्या खोक्यात एक पत्र सापडले. काफ्काने स्वाक्षरी केलेल्या छोट्या पत्रात लिहिले होते:

“तुम्हाला जे आवडते ते कदाचित कधी हरवले जाईल, परंतु दुसऱ्या मार्गाने ते नक्कीच परत येईल. “!!!!

काफ्काची गोष्ट इथे संपते.

हरवलेलं बालपण? हरवलेलं प्रेम? हरवलेलं रूप? असे प्रश्न पडले तर त्याची उत्तरं निसर्ग आणि ऋतू देत असतात. ऋतूंना परत बहर येत असतात. बालपण मुलं, नातवंड यांच्या रूपात आजूबाजूला वावरत असतं आणि आयुष्यातील प्रेम कधीच दूर गेलेलं नसतं. आपली माणसं असतातच आपल्या अवतीभवती, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ! 

– – – हे एकदा कळलं की मग हरवणं आणि सापडणं हा केवळ उन्ह सावलीचा खेळ भासतो.

लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव 

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

२ ) विविधा — ( लेख श्री. पंडित पाठवणार आहेत. )

“ तो आणि मी.. “ – भाग ३८ लेखक : अरविंद लिमये

तो आणि मी

 ——-(अरविंद लिमये, सांगली)

 (क्रमश:-दर गुरुवारी)

 भाग-३८

 ————————–

(पूर्वसूत्र- तो प्रसंग लिलाताईच्या दत्तगुरुंवरील श्रध्देची कसोटी पहाणारा ठरला होता आणि माझ्या बाबांकडून तिच्या विचारांना अकल्पित मिळालेल्या योग्य दिशेमुळे ती त्या कसोटीला उतरलीही!

तो दिवस आणि ती घटना दोन्हीही माझ्या मनातील लिलाताईच्या संदर्भातील आठवणींचा अविभाज्य भाग बनून गेलेले आहेत!)

आदल्या दिवशीच्या रात्री घडलेली ती घटना! त्या कॉलनीतली आमची घरं म्हणजे मधे भिंत असलेली दोन जोडघरेच होती.

त्या रात्री निजानीज होऊन बराच वेळ झाल्यानंतर अचानक मी पलिकडून येणाऱ्या जोरजोरात बोलण्याच्या आवाजाने दचकून जागा झालो. पाहिलं तर आई-बाबाही उठून बसलेले. हलक्या आवाजात एकमेकाशी कांहीतरी बोलत होते. इतर भावंडेही झोप चाळवल्याने माझ्या आधीच जागी झाली होती. रडत, मोठ्या आवाजात बोलण्याचा पलीकडून येणारा तो आवाज लिलाताईचा होता! ती तिच्या वडलांना दुखावलेल्या, चिडलेल्या आवाजात ताडताड बोलत होती. बाकी सर्वजण गप्प राहून ऐकत असणार कारण बाकी कुणाचाच आवाज येत नव्हता.

बाबांनी दटावून आम्हाला झोपण्यास सांगितले. ते दोघे मात्र नंतर बराच वेळ जागे असणार नक्कीच.

सकाळी उठलो तसं मी हे सगळं विसरूनही गेलो होतो. पण ते तात्पुरतंच. कारण बाबांनी पादुकांची पूजा आवरली तसं नेहमीप्रमाणे तीर्थप्रसाद घेण्यासाठी बाहेर आलेल्या

लीलाताईने हात पुढे केला तेव्हा तिला प्रसाद न देताच बाबा आत निघून आले आणि त्यामुळे दुखावलेली लिलाताई रात्री घडलेल्या प्रसंगाची पुन्हा आठवण करुन द्यायला आल्यासारखी बाबांच्या पाठोपाठ खाली मान घालून आमच्या घरात आली!

“काका, कां हो असं? आज मला तीर्थ न् प्रसाद कां बरं नाही दिलात?.. ”

” का नसेल दिला?” बाबांनी तिच्याकडे रोखून पहात तिलाच विचारलं. मान खाली घालून तिथेच अभ्यास करीत बसलेल्या मी दचकून बाबांकडे पाहिलं.

“कां? कांही चुकलं का माझं?” तिने विचारलं.

“ते मीच सांगायला हवं कां? सांगतो. ही आत चहा टाकतेय. तूही घे घोटभर. जा. मी आलोच. ”

ती कांही न बोलता खालमानेनं आमच्या

स्वयंपाकघरांत गेली. आई चुलीवर चहाचं आधण ठेवत होती. लिलाताईला पहाताच आईने तिला भिंतीजवळचा पाट घ्यायला सांगितलं. “बैस” म्हणाली. तोवर बाबाही आत आले.

“चहा घे आणि बाहेर जाऊन पादुकांना रोजच्यासारखा एकाग्रतेने मनापासून नमस्कार करून ये. मघाशी तू स्वस्थचित्त नसावीस बहुतेक. त्यामुळेच असेल, आरती होताच तू

नेहमीसारखा देवाला नमस्कार न करताच तीर्थ घ्यायला हात पुढं केला होतास. आठवतंय?म्हणून तुला तीर्थ दिलं नव्हतं. ” बाबा शांतपणे म्हणाले.

तिचे डोळे भरून आले.

“गप. रडू नको. डोळे पूस बरं. ” आई म्हणाली.

“तुम्हा दोघांनाही माझंच चुकलंय असंच वाटतंय माहितीय मला. ” ती नाराजीने म्हणाली.

“तसं नाहीये” बाबा म्हणाले. “आपण चूक की बरोबर हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. तुझं काही चुकलंय कां हे आम्ही कोण ठरवणार? तो निवाडा काल रात्री तू स्वत:च तर करुन टाकलायस आणि तुझ्या दृष्टीने जो चूक, त्याला त्याची पूरेपूर शिक्षाही देऊन टाकलीयस. ”

“म्हणजे माझ्या बाबांना. असंच ना? मी त्यांना जे बोलले त्यातला एक शब्द तरी खोटा होता कां सांगा ना ” ती कळवळून म्हणाली.

“खोटं काहीच नसतं. पण संपूर्ण खरंही काहीच नसतं. आणि खरं असेल तेही कसं बोलावं किंवा बोलावं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं. तू जे आणि जसं बोललीस त्यात तुझं काही चुकलं नाही असं तुला वाटत असेल तर तू अस्वस्थ कां आहेस याचा विचार कर. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझं तुलाच मिळेल. ”

“हो. बाबांना काल बोलले मी खूप. काय चुकलं माझं?मला खूप रागच नव्हता आला त्यांचा तर दुखावलेही गेले होते मी. अजूनही शांत नाहीये मन माझं. मीच सगळं कां सहन करायचं सांगा ना?” आवाज भरून आला तसं ती थांबली. घुसमटत रडत राहिली.

“तू शांत हो बरं आधी. असा त्रागा करुन तुलाच त्रास होईल ना बाळा?” आई म्हणाली.

“तुम्ही आज ओळखता कां काकू मला? तुम्हाला इथं

येऊन चार वर्षं होऊन गेलीयत. इतक्या वर्षात मला एकदा तरी असा इतका त्रागा केलेलं पाहिलंयत कां तुम्ही सांगा बघू…. ” ती बोलू लागली. जखमेला धक्का लागताच ती भळभळून वहात रहावी तसं बोलत राहिली. तिचा प्रत्येक शब्द ऐकणाऱ्यालाही अस्वस्थ करणारा होता. आईचे डोळेही भरुन आले होते तसे बाबाही चलबिचल झाले.

तिची कशाचबद्दल कधीच कांही तक्रार नसायची. जे तिनंच करायला हवं ते कुणी न सांगता तोवर निमूटपणे करतच तर आलेली होती. तिची आई, वडील, सगळी भावंडं ही सगळी आपलीच तर आहेत हीच तिची भावना असायची. आजपर्यंत तिने घरबसल्या स्वकष्टाने मिळवलेल्या पैशातली एक दमडीही कधी स्वत:साठी खर्च केलेली नव्हती. जे केलं ते सर्वांसाठीच तर केलं होतं. स्वत:चं कर्तव्य तोंडातून चकार शब्द न काढता जर ती पार पाडत आली होती तर तिच्या बाबतीतलं त्यांचं कर्तव्यही बाबांनीही कां नाही पार पाडायचं हा तिचा प्रश्न होता! काल रात्री हेच ती आपल्या वडलांना पुन:पुन्हा विचारत राहिली होती. खरं तर असा विचार तोपर्यंत तिच्या मनात खरंच कधीच डोकावलाही नव्हता,… पण काल… ?

काल तिच्या पाठच्या बहिणीसाठी, बेबीताईसाठी सांगून आलेल्या स्थळाला होकार कळवून तिचे बाबा मोकळे झाले होते त्यामुळे ही दुखावली गेली आणि आज तेच सगळं आठवून तिचे डोळे पाझरत राहिले होते..

“माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षानं लहान असलेली माझी बहीण आहे ती. तिचं कांही चांगलं होत असेल तर मी कां वाईट वाटून घेऊ सांगा ना?फक्त बहिणीच नाही तर दोन मैत्रिणींसारख्याच आम्ही लहानाच्या मोठ्या झालोयत. तिचं लग्न होतंय, ती मार्गाला लागतेय याचा आनंदच आहे मला. त्यासाठी चिडेन कां मी? पण हा निर्णय घेताना माझ्या वडलांनी मला गृहीत कां धरायचं? मला विश्वासात घेऊन त्यांनी आधी हे कां नाही सांगायचं? खूप शिकायचं, खूप मोठ्ठं व्हायचं असं स्वप्न होतं हो माझं. पण दोघांचे फॉर्म भरायला पुरेशा पैशाची सोय झाली नाही म्हणून एकाचाच फॉर्म भरायची वेळ आली तेव्हाही मला असंच गृहितच तर धरलं होतं त्यांनी. तेव्हाही प्राधान्य कुणाला दिलं तर आण्णाला. तो हुशार नव्हता, पुढं फारसा शिकणार नव्हता तरीही प्राधान्य त्याला. कां तर तो मुलगा म्हणून. म्हणजे मी… मी मुलगी आहे हाच माझा गुन्हा होता कां?तसं असेल तर मी हुशार असून उपयोग काय त्याचा? तेव्हाही आतल्या आत सगळं गिळून तोंडातून ‘ब्र’ही न काढता मी गप्प बसलेच होते ना हो?असंच कां आणि किती दिवस गप्प बसायचं ?

मला संताप अनावर झाला त्याला हे निमित्त झालं फक्त. पण मला राग यायचं कारण वेगळंच आहे. या स्थळाकडून विचारणा आल्यापासून मला विश्वासात घेऊन एका शब्दानेही कांही सांगावं, विचारावं असं त्यांना वाटलंच नाहीय याचा राग आलाय मला. ‘हिला काय विचारायचं? हिला काय सांगायचं? ही थोडीच नाही, नको म्हणणाराय?’ असं त्यांनी गृहितच धरलं याचा राग आला मला. मीही माणूसच आहे ना हो काका? मलाही मन आहे, भावना आहेत हे जन्मदात्या वडलांनी तरी समजून घ्यायला नको कां? हे सगळं स्वतःच स्वत:च्या तोंडानं ठणकावून सांगताना कालही आनंद नव्हताच झाला हो मला. पण न बोलता होणारी घुसमटही सहन होत नव्हती… “

आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली.

अस्वस्थपणे येरझारा घालणाऱ्या बाबांनी चमकून तिच्याकडे पाहिलं.

“हे बघ, तू हुशार आहेस. मनानं चांगली आहेस. मी सांगेन ते समजून घेशील असं वाटतंय म्हणून सांगणाराय. ऐकशील?” ते म्हणाले.

तिने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली.

“हे बघ. आता या सगळ्याचा तू त्यांच्या दृष्टीकोनातून विचार करुन बघ. बेबीसाठी जे स्थळ आलंय ते बिजवराचं आहे. पहिली तीन वर्षांची एक मुलगी आहे त्याला. तो शिकलेला, सुखवस्तू आहे, तरीही कमी शिकलेली मुलगी स्वीकारायला तो तयार होता कारण पहिल्या मुलीचं सगळं प्रेमानं करणारी मुलगी त्याला हवी होती. याबाबतीत काय निर्णय घ्यावा याचं दडपण आपल्या वडलांच्या मनावर असणाराय याचा विचार स्वतःबद्दलच्या एकांगी विचारांच्या गर्दीत तुझ्या मनात डोकावला होता कां? नव्हता. हो ना? खरंतर तुझ्या आधाराची खरी गरज त्या क्षणी त्यांना होती. इतकी वर्षं मी पहातोय एकही दिवस तो माणूस स्वतःसाठी जगलेला नाहीय. राबतोय, कष्ट करतोय, दिवसभर आणि रात्रपाळ्या असताना आठ आठ तास रात्रीही मशीनसमोर उभं राहून दमून भागून घरी आल्यानंतर समोर येईल तेवढा घोटभर चहा आणि शिळंपाकंही गोड मानून तो राबतोय. तरीही राग, संताप, त्रागा, आरडाओरडा यांचा लवलेश तरी आहे कां त्याच्यात? त्या माणसाची स्वत:च्या मुलीनेच केलेली निर्भत्सना निमूट ऐकून घेऊनही शांत रहाताना त्याच्या मनाची आतल्याआत किती घालमेल झाली असेल याचा विचार कर आणि मग मला सांग. शांतपणे विचार करुन सांग. कारणं कांहीही असोत पण आज तो हतबल आहे हे तुझ्यासारख्या समंजस मुलीने समजून घ्यायचं नाही तर कुणी? आणि लग्नाचं काय गं ?तू काय किंवा बेबी काय तुमची लग्नं ठरवायचा निर्णय घेणारे तुझे वडील कोण? ते तर निमित्त आहेत फक्त. या गाठी बांधणारा ‘तो’ त्या तिथे बाहेर औदुंबराखाली बसलाय हे विसरु नकोस. जा. ऊठ. त्याला नेहमीसारखा मनापासून नमस्कार कर फक्त. कांहीही मागू नकोस. जे त्याला द्यावंसं वाटेल ते तो न मागता देत असतो हे लक्षात ठेव. जा. नमस्कार करुन ये आणि मघाशी राहिलेला तीर्थ न् प्रसाद घेऊन जा” बाबा म्हणाले.

त्यांच्याकडून तीर्थ घेण्यासाठी तिने हात पुढे केला तेव्हाही तिचे डोळे पाझरतंच होते.

“शांत हो. काळजी नको करू. सगळं व्यवस्थित होईल. बेबीचं तर होईलच तसंच तुझंही होईल. येत्या चार दिवसात तुला दत्त महाराजांनी ठरवलेल्या स्थळाकडूनच मागणी येईल. बघशील तू “

बाबा गंमतीने हसत म्हणाले. काहीच न समजल्यासारखी ती त्यांच्याकडे पहातच राहिली…!

हा सगळाच प्रसंग माझ्या कायमचा लक्षात राहिलाय ते बाबांना लाभलेल्या वाचासिद्धीची यावेळीही पुन्हा एकदा प्रचिती आली म्हणूनच नव्हे फक्त तर या सगळ्या प्रसंगाचे धागेदोरे माझ्याशीही जोडले जाणार आहेत हे यथावकाश माझ्या अनुभवाला आल्यामुळेच!!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नौटंकी… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ नौटंकी… ☆ श्री मंगेश मधुकर

रविवारी घराघरात असते तशीच निवांत सकाळ, सर्व काही अस्ते कदम चाललेलं असताना मोबाईल वाजला. अनोळखी नंबर असल्यानं दुर्लक्ष केलं. काही वेळानं पुन्हा त्याच नंबरवरुन फोन आला तेव्हा घेतला हॅलो, संडे डिश का?”

“हो, बोला सर”

“दर रविवारी वाचतो”

“अरे वा !!, धन्यवाद”

“धन्यवाद कशाला?घरबसल्या मिळतं म्हणून वाचतो. ”अनपेक्षित प्रतिक्रियेनं मला ठसका लागला.

“मी लिहिलयं म्हणून आभार मानले. ”

“आजकाल लिहिणारे सतराशे साठ आहेत. लिहिण्याचं कौतुक सांगू नका. ” काकांचा अजून एक तडाखा.

“नाही सांगत. ”

“आणि चार ओळी खरडल्या म्हणून स्वतःला लेखक समजू नका. ”

“अजिबात नाही”.

“सध्या लिहिणारे जास्त अन वाचणारे कमी झालेत. ” 

“शंभर टक्के बरोबर. “

“उगीच हवेत उडू नका”.

“मी होतो तसाच आहे तरीही.. ” 

“त्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. तुमचं संडे डिश हे लिखाण मला ‘नौटंकी’ वाटते ” काकांनी मूळ मुद्द्याला हात घातला.

“डायरेक्ट नौटंकी.. ” आलेला संताप आवरत शक्य तितक्या मृदु आवाजात म्हणालो.

“स्पष्ट बोलण्याचा राग आला का?”

“वाचक देवो भव:”

“फुकट शब्दांची कारंजी उडवू नका. ”

“बरं !!. तुम्ही बोला, मी ऐकतो. ”

“खरंच तुम्ही लेखक आहात की डमी.. ”.. काकांच्या या बोलण्यानं चिडचिड वाढली.

“थोड्या वेळापूर्वी म्हणालात की स्वतःला लेखक समजू नका म्हणून आणि आता तुम्हीच.. ”

“शब्दांचे खेळ करून चुका काढू नका. ”

“राहिलं. उत्सुकता म्हणून विचारतो ‘संडे डिश’ वर एवढा राग?”

“कशाला रागावू. माझा काय संबंध !! कुणीही ‘वाच’ म्हणून बळजबरी, आग्रह केलेला नाही”

“तरीही वाचता” 

“हो”

“चला, म्हणजे चांगलं नसेल पण ‘बरं’ लिखाण माझ्या हातून नक्कीच होतंय. करेक्ट ना !!” काय उत्तर द्यावं हे लक्षात न आल्यानं काकांचा गोंधळ उडाला.

“त्यापेक्षा सरळ सांगा की माझ्या तोंडून कौतुक ऐकायचयं. त्याचीच सवय असेल ना”

“असं काही नाही”

“असंच आहे”

“दर रविवारी लेखनाचा रतीब का घालता”

“समाधान आणि आनंद मिळतो म्हणून.. ”

“माईकवरून द्यायला हे उत्तर ठिक आहे. काही पैसे वगैरे मिळतात की नाही”

“त्यादृष्टिनं कधी विचार केला नाही आणि अपेक्षाही नाही. ”

“एवढं लिहून दोन पैशे हाती येत नसेल तर काय उपयोग !! सगळं लिखाण कवडीमोल”

“पसंद अपनी अपनी आणि प्रत्येक गोष्टीला पैशाचं मोजमाप लावायचं नसतं. ” चढया आवाजात मी उत्तर दिलं.

“राग आला वाटतं” 

“का येऊ नये. इतका वेळ तोंडाला येईल ते बोलताय. ”

“ एक सल्ला देतो ”.. माझ्या चिडण्याचा काकांवर काहीही परिणाम झाला नाही.

“अजून आहेच का?मला वाटलं इतकं बोलल्यावर संपलं असेल. ”

“कसंय, तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत. त्याच अनुभवावर सांगतो. कौतुक सर्वांना आवडतं पण टीका नाही. आजकाल तर माणसं वागताना-बोलताना सुद्धा ‘नौटंकी’ करतात. ”

“संडे डिश मध्ये तुम्हांला काय नौटंकी वाटली”

“कथेतली बहुतेक पात्र इमोशनल असतात. भावनिक होऊन निर्णय घेतात. आजच्या जगात जिथं व्यवहार या एकाच गोष्टीला महत्व आहे तिथे असं लिखाण पटत नाही. ”

“अजून काय वाचता ? “

“व्हॉटसपवर येणारं सगळं !!. ”

“म्हणजे तुम्ही व्हाट्सअप विद्यापीठाचे स्कॉलर”

“टोमणा आवडला. एक आगाऊ सल्ला आता रविवारचा रतीब बंद करा. ” काकांचा बॉम्ब.

“आता स्पष्टच सांगतो. लिखाण चालू ठेवायचं की बंद करायचं हे वाचक ठरवतील आणि आता लिहू नका सांगणारे तुम्ही पहिलेच नाहीत. माझे काही हितचिंतकसुद्धा तेच म्हणतात. जेव्हा बहुसंख्य वाचक सांगतील तेव्हाच ठरवू. ” …. अजून बरंच बोलायचं होतं पण उगीचच तोंडातून वेडावाकडा शब्द जायला नको म्हणून फोन कट केला. डोकं भणभणत होतं. संताप अनावर झालेला. वाचकांचे फोन, मेसेजेस नेहमी येतात पण आज आलेला काकांचा फोन वेगळा, अस्वस्थ करणारा, विस्फोटक होता.

— 

संध्याकाळी पुन्हा त्याच नंबरवरून फोन. मुद्दाम घेतला नाही. चार पाच वेळा रिंग वाजली. दहा मिनिटांनी पुन्हा फोन आल्यावर तेव्हा नाईलाजानं घेतला. “अजून काही राहिलयं का?”

“सॉरी !! रागावू नका. सकाळी मुद्दाम तुम्हांला चिडवलं. खरं सांगायचं तर संडे डिश आवडीनं वाचतो. ”काकांचा एकदम वेगळा सुर.

“सकाळी तर वेगळंच बोलत होता”

“ते मुद्दामच. मुलांच्या कृपेने पंधरा दिवसापूर्वी वृद्धाश्रमी बदली झाली. आता इथंच कायमचा मुक्काम. आयुष्यभर शिकवण्याचं काम केल्यामुळे बोलायची फार आवड आणि इथ कोणीच बोलत नाही. नातेवाईकांना, घरच्यांना फोन केला तर थातुर-मातुर कारणं देऊन फोन कट करतात. नेमकं काल म्हातारपणावरची ‘रिकामेपण’ ही संडे डिश वाचली अन तुमच्याशी बोलावसं वाटलं म्हणून फोन केला आणि ठरवून तिरकस बोललो. त्यामुळेच तर चक्क चौदा मिनिटं आपल्यात बोलणं झालं. नाहीतर माझ्याशी कोणी मिनिटभरसुद्धा बोलत नाही. म्हणून मीच नौटंकी केली ” …. काकांचं बोलणं ऐकून धक्का बसला. खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं.

“काका, सकाळी चुकीचं बोललो असेल तर माफ करा. ”

“तुमच्या जागी मी असतो तर तेच केलं असतं. जे झालं ते झालं. आजकाल संपर्क साधणं खूप सोप्पंयं पण माणसचं एकमेकांशी बोलणं टाळतात. ”

“पुन्हा एकदा सॉरी !!आपण फोनवर भेटत राहू. ”

“क्या बात है. जियो !! संडे डिश छान असतात. असच लिहीत रहा. हाच आशीर्वाद !!आणि ऐकून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद !! “ 

काकांनी फोन कट केला तरी बराच वेळ फोनकडे पाहत होतो. कधी कधी वस्तुस्थिती आपण समजतो त्यापेक्षा फार वेगळी असते.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आईपण…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “आईपण…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आई जाऊन आता ४ वर्षे होऊन गेली. पण आईची आठवण झाली नाही असा एकही दिवस जात नाही. कधी कधी भावूक होऊन आईच्या आठवणीने कासाविस झाले तर बाकीचे म्हणतात, ‘ काय लहान असल्यासारखे करतेस? तुला स्वीकारायला हवं ना? ‘ मग अशाने जास्तच व्यथित व्हायला होते.

अशी अवस्था कितीतरी जणांची होत असेल. पण मग विचार करताना आईभोवती मन पिंगा घालू लागले. आईविषयीचे कितीतरी विचार डोक्यात येऊन गेले.

…. प्रत्येक ठिकाणी देवाला जाता येणे शक्य नसल्याने देवाने आई निर्माण केली.

… स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

… आईची किंमत जो करत नाही त्याला जगाशी लढण्याची हिंमत होत नाही.

… तसेच आईचा महिमा सांगणार्‍या कितीतरी कविता आठवल्या … गदिमा, म भा चव्हाण, यशवंत अशा कितीतरी कवींसोबत अलिकडेच कवी अनिल दिक्षीत, उद्धव कानडे आदि कविंच्या भावपूर्ण कविता मन हेलावून टाकतात.

मग वाटले खरच जगात कुठेही गेले तरी आईला किती महत्व आहे ना? मुलांना जन्म देण्याचे सामर्थ्य एका आईतच असते. तसेच त्यांना वाढवणे संस्कार करणे हे काम जबाबदारी न वाटता फूल उमलते तसं, सकाळी दव पडते तसं, सहज नकळत करण्याचे कसब हे एका आईठायीच असते.

वात्सल्य, प्रेम, ममता तिच्या अंगी ठासून भरलेली असते. आणि मग आई ही कोणी व्यक्ती नसून वृत्ती आहे असे वाचल्याचे आठवले. ती एक वृत्ती म्हणजे भावना असल्याने ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राची तर विठ्ठल हे जगत माऊली झाले. अनेक पुरुष संत हे गुरूमाऊली बनले.

…. म्हणजेच आईपण ही वृत्ती खूप अवघड असूनही ती वृत्ती जो धारण करू शकतो तो आई होऊ शकतो.

सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळणे, सगळ्यांवर सारखे प्रेम करणे, चुका पोटात घेणे, शी-शू मनात कोणतीही घृणा न ठेवता आनंदाने काढणे, मुलांना हृदयाशी धरणे, चांगल्या-वाईट गोष्टिंचे ज्ञान देऊन चांगल्या गोष्टी मनावर बिंबवणे, सतत काहीतरी मुलांसाठी करत रहाणे, स्वत्व विसरून फक्त देत रहाणे, जिच्या सान्निध्यात आल्यावर सुरक्षित वाटते, लढण्याचे बळ येते असा भक्कम आधार होणे, अशी लाखो कारणे देता येतील जी वरवर अगदी सामान्य वाटतील पण करायला गेले तर किती अवघड आहे हे समजते.

मग ज्या लेकरांची आई लवकर देवाघरी गेली त्या लेकरांना आई बापाचे प्रेम एकट्या पुरुषाने दिले अशी कितीतरी उदाहरणेही पहातो.. म्हणजेच तो पुरूष त्याच्या अंगी असलेले आईपण जागृत करून मुले घडवतो. किंवा मुलांसाठी दुसरी आई आणतो. पण अशावेळी ती आई सावत्र बनते. का? तिच्या अंगी आईपण नसते का? असते तिच्या अंगीही आईपण असतेच पण मनात कुठेतरी दुजाभाव असतो म्हणून स्वत: जन्माला घातलेल्या मुलांवर ती मुद्दाम अधिक प्रेम आदर देते. मग अशावेळी ती नवर्‍याच्या मुलाची आई होऊच शकत नाही कारण आईपण असणार्‍या व्याख्येला ती कुठेतरी छेद देत असते.

.. फार कशाला कैकयीने सावत्र पणा जागृत ठेऊन रामाला वनवासात पाठवले हे उदाहरण सगळ्यांना माहित आहेच.

.. तसेच कृष्णाचा सांभाळ करणारी यशोदा, कर्णाला वाढवणारी राधा या खर्‍या अर्थाने आई झाल्या अशी उदाहरणे पण सर्वश्रृत आहेतच की !!

मग आई, आईपण याचे मोठेपण शब्दातीत असल्याची जाणिव होते. प्रत्येक घरात एक आई असते. तुमची आमची सेम असते पण आमच्या आईसारखी दुसरी कोणीच नाही असे सारखे वाटत रहाते.

तरी देखील दुसर्‍यांच्या आईत आपली आई म्हणजे त्या आईतील आईपण जाणून तिच्या चरणीही नतमस्तक होते.

ज्ञानेश्वर विठ्ठल इतर गुरू माऊली यांच्यातील आईपणा पाहून ‘ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ‘ या उक्तीप्रमाणे त्यांनी किती प्रयत्नामधून हे आईपण आपल्या ठायी आणले असेल ते वाटून त्यांचा हेवा वाटतो.

स्वत: आई होऊनही काही गुण स्वभावत:च अंगी आले तरी आपल्या आईसारखे नाहीच जमत असे वाटून तिचे श्रेष्ठत्व मनातच जाणून तिच्यासारखे होण्याचा मन प्रयत्न करते.

…… असे मातृत्व अर्थात ‘ आईपण ‘ जर सगळ्यांच्या हृदयी आले तर ?

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares