मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चारचौघातला नवरोबा… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चारचौघातला नवरोबा… लेखक : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नातेवाईक जमलेले असतात. गप्पाटप्पा , खेचाखेची करता करता कोणीतरी बहिणाबाई ‘काडी टाकते’. आपल्या बंधुराजांबाबत म्हणते,

“सुनील आमचा साधा आहे बिचारा.” हेच स्टेटमेंट मित्रमंडळी जमलेली असली तर त्या सुनीलच्या मित्राने केलेले असते.

हे किंवा याच टाईपची इतर केली जातात जी स्टेटमेंटस्, ती म्हणजे..

आमचा सुनील कसा शांत आहे,

न चिडणारा आहे,

कसल्याही खोड्या नसलेला आहे.

वगैरे वगैरे.

झालं. हे अस जर कोणी बोललं की सुनीलची बायको सरसावून बसते.

अन सुरू करते अटॅक-

“काय म्हणालात? आमचे हे अन साधे बिचारे? एकदा या घरी चार दिवस राहायला. मग कळेल.”

अन मग वहिनी पाढा वाचतात. त्यांच्या ह्यांचा.

हे आमचे कसे साधे बिचारे नाहीत,पक्के ‘हे’ आहेत,

त्यांच्या दिसण्यावर अजिबात जाऊ नका,

लांबून तसं वाटत असेल. मी रोज सोबत असते. खरं काय ते माझं मलाच माहीत,न बोलून शहाणे आहेत, आपल्याला हवं तेच करतात,जेवणाच्या बाबतीत पक्के खोड्याळ आहेत,जरा म्हणून चालवून घेणार नाहीत, हे असं हवं..म्हणजे तस्संच हवं”….अन काय काय.

वहिनी हा पाढा वाचत असतात, तेव्हा त्या नवरोबाचा चेहेरा अगदी पाहाण्यासारखा असतो, बरं का. गालातल्या गालात हसून तो बायकोच्या बोलण्याला जणू मूक संमतीच देत असतो. दुसरा पर्यायच नसतो त्याच्यापुढे. ‘बायकोदाक्षिण्य’. ते दाखवायलाच लागते.

एकूणच, “हे आमचे कसे साधेसुधे नाहीत. मी म्हणून कशी चालवून घेते”, असा टोन असतो. म्हणजे …’पहा, माझ्यावर कसे अत्याचार, जबरदस्ती,… हालाची परिस्थिती आहे’ असले काही गंभीर सांगायचं नसतं बरं का.

घरात दोघांचं छान चाललेलं असतं . खरंतर ‘तिचंच’ घरात चालत असतं . हे सगळं लटक्या रागात चालू असतं. गमतीत. अन हे युनिव्हर्सल असतं बरं का.

पण…‘नवरोबा’ म्हटला की तो असाच हवा, चारचौघांसमोर त्याचं रूप असंच ‘कडक’ असायला हवं, असंच सगळ्या बायकांना वाटत असतं. त्यासाठी ही धडपड. हे सारं ‘तिचं’ ‘त्याला’ बोलणं हे काणेकर म्हणतात त्या प्रमाणे ‘थापा’ या शब्दात मोडणारं.  निरुपद्रवी. गमतीगमतीतलं.

पण हे स्वातंत्र्य नवरोबांना मात्र नसते बरं का. तो म्हणू शकतो का चारचौघात, अगदी गंमत म्हणून देखील? “ही? साधी बिचारी? चांगली पक्की आहे. घरी पहा येऊन कधी!”

चुकून म्हटलं त्याने, तर त्याचं घरी गेल्यावर काही खरं नसतं!

लेखक : श्री अनंत गद्रे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोहळे – ऋतूंचे…भाग १ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सोहळे – ऋतूंचे…भाग १ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

वेलींवर धुंद बहर यावा, निसर्गाने रंग आणि गंध यांची उधळण करावी, फुलपाखरांचे थवे पाहून नयन तृप्त व्हावेत, पक्ष्यांच्या मधुर कूजनाने आसमंत भारून जावा, हळू हळू चोचीत काड्या घेऊन पक्ष्यांचं विणकाम सुरू व्हावं, अशी जर निसर्गात आनंदाची बरसात असेल तर आपलं मन ही त्यात भिजून चिंब होतं. दिवस बदलत जातात, आणि एक दिवस पानगळ सुरू होते. पक्ष्यांचा आधारच नष्ट होतो. पण कुठे त्रागा नाही, कासाविशी नाही, फक्त वाट पहायची पुन्हा बहर येण्याची! निसर्गाची हीच शिकवण आहे, पुढे चालत रहायचं,फक्त चालत रहायचं! बोरकरांची ध्यासपंथे चालणारी ती देखणी पाऊले असतील तर, वाट कशी आहे याची काळजी करायचं कारणच नाही.

रोज उद्याची नव्यानं वाट पाहायची. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस वेगळा असणार आहे. त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे. ही मजा आणखी वाढविण्यासाठी निसर्गाने ऋतु निर्माण केले असावेत. ऋ म्हणजे गती, ऋत म्हणजे क्रमाने येणारी गती, ऋतु म्हणजे क्रमशः विशिष्ट गतीने पुन्हा पुन्हा येणारे. भारतात आपण सहा ऋतू मानतो त्यांची नावे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर!प्रत्येक ऋतु सुखावह असो किंवा नसो त्या त्या वेळी वेगवेगळे सण साजरे करून आपण ते आनंदी करतो.

वसंताने आपले नववर्ष सुरू  होते आणि शिशिराने संपते. जणू नव्या पालवी बरोबर नव्या आकांक्षा, नवं ध्येय, नवा उत्साह वसंत देतो, म्हणून ही नव्या वर्षाची सुरवात! आपोआपच शेवट शिशिराने होतो. जसं पालवी बहरते, पाने, फुले, फळे, शाखा यांनी झाडाची वाढ होते. ही पाने वर्षभर नको असलेल्या गोष्टी काहीही त्रागा न करता साठवतात. वर्षाच्या शेवटी हा सगळा कचरा झाडं अलगद शरीरापासून वेगळा करतात. कारण त्याला माहीत असतं, नवी पालवी फुटणार आहे. आपलं पण असंच असावं, नव्या उमेदीने वर्षाची सुरुवात करायची. जे जे दुःख पदरी पडलं असेल ते हळूच मनाच्या एखाद्या कोपऱ्यात साठवावं अगदी कचरा समजून, आणि असंच मनापासून अलगद वेगळं करून टाकावं, परत नवी उमेद भरून घेण्यासाठी!

वास्तविक कललेली पृथ्वी, तिचे सूर्याभोवती (लंबवर्तुळाकार) व स्वतःभोवती भ्रमण यामुळे जलवायुचे भिन्न भिन्न कालावधी निर्माण होतात. त्यांना ऋतू म्हणतात. भारताचं खास वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य व ईशान्य मोसमी वारे त्यामुळे पावसाळा हा स्वतंत्र ऋतु असतो. सूर्य मृग नक्षत्रात आला की पावसाळा सुरू होतो आणि हस्त नक्षत्रात आला की संपतो.अशी नऊ नक्षत्रे पावसाची असतात.असे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांचा हिशेब चार चार महिन्यांचा असतो. त्यातले बारीक फरक लक्षात घेऊन होतात सहा ऋतू, दोन दोन महिन्यांचे!

आपण जरी चैत्र,वैशाख महिन्यात वसंत आणि याप्रमाणे क्रमाने दोन दोन महिने एक एक ऋतु असं मानलं असलं तरी हे मराठी महिने अंदाजे ऋतू सांगतात कारण प्रत्यक्षात हे चांद्रमास आहेत, म्हणजे पौर्णिमा, अमावस्या यावर ठरणारे आणि ऋतु हे सूर्याभोवती च्या भ्रमणामुळे  होत असल्यामुळे त्यांचा आपल्या मराठी महिन्यांशी काही संबंध नसतो. म्हणून ऋतु आपले रंग त्या मराठी महिन्यात  दाखवेलच असे नाही.

आकाशातील तारका समुहावरून आपण २७ नक्षत्रे ठरवली आहेत. सव्वा दोन नक्षत्रांची एक रास होते. अशा बारा राशी आहेत. म्हणजे सूर्य  प्रत्येक महिन्यात एक रास ओलांडतो. त्याला सूर्य संक्रांत म्हणतात. (उदा.मकर संक्रांत,कर्क संक्रांत) सहा ऋतु मधे शिशिर, वसंत, ग्रीष्म हे उत्तरायणात होतात .२२ डिसेंबर,पासून उत्तरायण सुरू होते ,याचदिवशी शिशिर ऋतु सुरू होतो. पृथ्वी सूर्याच्या जास्त जवळ जवळ जाऊ लागते म्हणून तापमान हळू हळू वाढत जाते.  दिवस मोठे व्हायला सुरवात होते. तर वर्षा, शरद, हेमंत हे दक्षिणायनामुळे होतात. २१ जून ला दक्षिणायन सुरू होते,ह्याच दिवशी वर्षा ऋतू सुरू होतो.त्यानंतर पृथ्वी सूर्यापासून लांब जाऊ लागते, म्हणजेच दिवस लहान होऊ लागतात. तापमान हळू हळू कमी होऊ लागते. म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण ऋतूंचा अंदाज बांधू शकतो, मराठी महिन्याप्रमाणे  नाही.

तैत्तरीय संहिते प्रमाणे ऋतु —

तस्य ते (संवत्सरस्य) वसंता: शिर: || ग्रीष्मो दक्षिण: पक्ष:|| वर्षा: पृच्छं||शरदुत्तर: पक्ष:|| हेमंतो मध्यं ||

म्हणजे संवत्सर ( वर्ष) हा काल्पनिक पक्षी आहे, त्याचे वसंत हे शिर, ग्रीष्म हा उजवा पंख, वर्षा ही शेपूट, शरद हा डावा पंख, व हेमंत हे उदर आहे.

आपला पहिला ऋतु वसंत! आंब्याच्या मोहराचा सुगंध, कोकिळेचं मधुर कूजन, बहरलेली झाडं, वेली, रंगीबेरंगी फुलांनी नटलेली सृष्टी, किती वर्णन करावं तेवढं थोडं आहे. कविमनाला भुरळ घालणारा हा ऋतु! हा ऋतु साजरा करायला असतो चैत्र पाडवा, वसंतोत्सव,अक्षय्य तृतीया, चैत्रागौर! पन्हं,कैरीची डाळ देऊन हळदीकुंकू करायचं, चैत्रागौरीला आरास करायची, कलेला प्रोत्साहन देण्यासाठी! असं म्हणतात की, यौवन व संयम, आशा व सिध्दी, कल्पना व वास्तव, भक्ती व शक्ती यांचा समन्वय साधून जीवनात सौंदर्य, संगीत, स्नेह निर्माण करणारा तो वसंत!

दूसरा ग्रीष्म, अंगाची लाही लाही करणारा! मुलांना मनसोक्त पाण्यात डुंबण्याचं स्वर्गसुख देणारा! अगदीच सृष्टी रुक्ष वाटू नये म्हणून मोगऱ्याचा बहर देणारा! जेंव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो दिवस सर्वात उष्ण असतो. या नक्षत्रावर भात पेरणी करतात. या नक्षत्रात सूर्य नऊ दिवस असतो. जर हे नऊ दिवस तापमान वाढलेले राहिले तर भाताचे पीक चांगले येते. म्हणून रोहिणीचा पेरा अन् मोतियाचा तोरा अशी म्हण पडली आहे. ह्या नौतापात रोहिणी व्रत करतात. ह्या व्रतात चंदन व पाणी यांचे दान करतात, तसंच गरजूंना छत्री व चप्पल देणं पुण्याचं मानतात. किती विचार केला आहे नं, ह्या गोष्टी पाप पुण्याशी जोडून! बाकी हा ऋतु साजरा करण्यासाठी लागतं कैरीचं पन्हं, कलिंगड, आंब्याचा कोणताही प्रकार कोणत्याही प्रकारे स्वाहा करणं.

तिसरा ऋतु वर्षा! प्रियाविण उदास वाटे रात वाला! सृष्टी सौंदर्याचं आणि स्त्री सौंदर्याचं वर्णन करून कवी थकत नाहीत असा! प्रणयातील हुरहूर, अधीरता वाढवणारा! एकाच छत्रीतून, आधे गिले आधे सुखे वाला! चोच उघडून बसलेल्या चातकाचा! आषाढातला पाऊस आणि श्रावणातला पाऊस यांचं   वर्णन मी असं करते

आषाढाचा पाऊस म्हणजे, कुणीतरी याला रोका

श्रावणाचा पाऊस म्हणजे, आनंदाचा झोका

आषाढाचा पाऊस म्हणजे, धरतीवर आक्रमण

श्रावणाचा पाऊस म्हणजे, धरतीचं औक्षण

आषाढाचा पाऊस, अखंड रिपरिप

श्रावणाचा …फक्त टिपटिप

आषाढाचा पाऊस देतो, काळोख आंदण

श्रावणाचा पाऊस करतो, पिवळ्या रंगाची शिंपण

आषाढाचा पाऊस म्हणजे, मातीच्या सुवासाची पखरण

श्रावणाचा पाऊस म्हणजे, वृक्षवेलींवर रंगांची उधळण

आषाढाच्या पावसात, अंगणाच्या बंदरावर गर्दी नावांची

श्रावणाच्या पावसात,अंगणी झिम्मा-फुगडी चिमुरड्यांची

आषाढात सूर्य मारतो दडी

श्रावणात तोच होतो, लपाछपीचा गडी

आषाढाचा पाऊस म्हणजे, नंगा नाच पत्र्यांचा

श्रावणाचा पाऊस म्हणजे, प्रेमळ धाक आईचा

आषाढाच्या पावसासाठी, भरतो चातकांचा मेळा

श्रावणाचा पाऊस करतो, फुलपाखरे गोळा

पण त्याशिवाय काही प्रकारचे पाऊस, त्यांची गमतीदार नावे, म्हणी सांगणार आहे.

१.पडता हत्ती, कोसळती भिंती

२.सासूचा पडेल मघा, तर चुलीपुढे बसा (सतत मारा, घराबाहेर पडताच येत नाही)

३.म्हातारा पडेल पुख(पुष्य), तर चाकरीच्या गड्याला सुख( थांबून थांबून पडतो, पाऊस थांबला म्हणून कामाला सुरवात करावी तोवर पुन्हा पडायला लागतो, त्यामुळे गड्यांना हजेरी आणि विश्रांती दोन्ही मिळतं)

४.पडतील चित्रा तर भात न खाई कुत्रा (बेभरवशाचा, अन्नाची नासाडी करतो)

५.आला अर्दोडा, झाला गर्दोडा (आर्द्रा चा पाऊस चिखल करतो)

६.पडल्या मिरगा तर टिरी कडे बघा ( मृग पडला तर शेतीची कामे खोळंबतात)

७.आली लहर, केला कहर, गेला सरसर(आश्र्लेशाचा पाऊस म्हणजे थोड्या थोड्या भागावर जोरदार सरी येऊन जातात. एकाठीकाणी मोठ्ठा पाऊस लागावा आणि थोड पुढं गेलं की सगळं कोरडं ठणठणीत)

८. पूर्वा फाल्गुन हा सुनेचा (चंचल, कामचुकार)

९.पुनर्वसु चा तरणा पाऊस( शक्तिशाली)

वर्षा ऋतू म्हणजे भक्तीचा पूर!आषाढीवारी, गुरूपौर्णिमा, नारळी पौर्णिमा(रक्षाबंधन), नागपंचमी, कृष्ण जन्म, गोपाळकाला, श्रावणातला प्रत्येक दिवस हा त्या त्या देवतेची पूजा करण्याचाच असतो. सणावारांची रेलचेल असणारा ऋतु!

क्रमशः…

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एथनिसीटीच्या पलिकडे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

एथनिसीटीच्या पलिकडे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

इंग्लंड मुक्कामात  मी एक दिवस  माझी पत्नी  आणि  मुलीबरोबर  लंडनमधील  महाराष्ट्र  मंडळाचा गणेशोत्सव  पहायला गेलो  होतो. दुपारचं  जेवण आटोपल्यावर हिचीनवरून  आम्ही ट्रेननं  लंडनला निघालो. हवेत  खूप गारठा  होता. पाऊस येण्याचीही  शक्यता होती. यादृष्टीने  छत्री, स्वेटर, जर्कीन  वगैरे 

अगदी  बंदोबस्तात  निघालो. ऑनलाईन तिकीट काढताना पाहिलं, एका कोपर्‍यात एक  मध्यमवयीन  बाई  एकटीच  मोठ्याने  बडबडत  होती. मला  ते विचित्र  वाटलं. मी प्रश्नार्थक  दृष्टीने मुलीकडे  पाहिलं. ” ती खूप  दारू  पिऊन बडबडत  असेल ” मुलगी  म्हणाली. तिकीट काढून पुढं जाताना पत्नी  म्हणाली, “काय  इथल्या  लोकांचं  जीवन!  एकाकी. कुणी बोलायला  नाही ते असंच  स्वतःशीच  बोलत  बसतात “. 

काहीही असो, इथल्या गो-या  लोकांच्या समाजजीवनातली  एक काळी  बाजू  मला समजली.

आठवत नाही, कोणत्यातरी स्टेशनवर  उतरून बसने  लंडनमधल्या महाराष्ट्र  मंडळाच्या हाॅलमध्ये  पोहोचलो. इंग्लंडमध्ये  रहाणारी शेकडो  मराठी माणसं  भेटली. काहीजण  इतर देशांतूनही आले होते. अनेक  पुरूष सलवार, कुर्ता तर महिला  साड्या  परिधान करून आल्या  होत्या . सगळ्यांच्या  चेहर्‍यावर आनंद, मनामनात उत्साह  आणि  सर्वत्र उत्सवाचे  वातावरण भरले होते. त्यात  काही जणांचे  इंग्लंडमध्ये मोठमोठे  उद्योग होते. कुणी  नोकरी  करत होते  तर  काही  विद्यार्थी होते. काही  मुलं  आपल्या आईवडीलांसोबत, तर काही  वयस्कर आईवडील  आपल्या  मुलांसोबत  आले  होते.

आपले  भौगोलिक, उत्पन्नाचे , वयाचे  आणि  इतर  भेद  विसरून ‘ मराठी माणूस ‘ या समान  मुद्द्यावर   या उत्सवात सारेजण  सहभागी  झाले होते. एंथ्रोपोलॉजी मध्ये याला एथनिसीटी  म्हणतात. 

आम्ही  पोहोचलो  तेव्हा सांस्कृतिक  कार्यक्रम सुरू  झाले  होते. अनेकांनी  विविध गीते, नृत्य, संगीत  सादर केले. त्यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त  प्रतिसादही  मिळत होते. ‘ सैराट ‘चित्रपटातील झिंग झिंग झिगाट  गाण्यावर सारे सभागृह बेभान  होऊन  नाचत राहिले. ज्यांना  नाचणं जमत  नव्हतं, ते  टाळ्या वाजवून  साथ  होते.

रात्री  दहाच्या  सुमारास आम्ही  परत  जायला निघालो. एखाददुसरा माणूस  सोडला  तर रस्त्यावर  कुणीच  नव्हतं. त्यात बोचरी थंडी. काही बसचा प्रवास करून आम्ही पॅडिंग्टन स्टेशनवर  पोहोचलो. एका प्लॅटफॉर्मवरून संगीताचे सुरेल सूर ऐकू येत होते. उत्सुकतेने  जवळ जाऊन  पाहिलं. रेल्वेचा तो  बॅन्ड  होता. रेल्वे स्टेशन  म्हणजे, गाड्यांचा धडधडाट, इतर  काही  कर्णकर्कश आवाज, पॅसेंजरांच्या गोंगाटात  मिसळलेल्या निवेदकांच्या  सूचना, यांची  सवय असलेल्या मला हा आश्चर्याचा धक्का होता.

रेल्वेने हिचीन स्टेशनवर पोहोचलो तेव्हा रात्र खूप झाली  होती. कधी एकदाचं घरी पोहोचतो, आणि अंथरूणात शिरून झोपी जातो असं झालं होतं. चालता चालता वर पाहिलं. विस्तीर्ण आकाशात  जिकडं पहावं तिकडं अगणित तारे आणि ग्रह. कल्पना चावलांच्या एका  वाक्याची समर्पकता जाणवली .. 

“आकाशात पाहिलं की,आपण एका भौगोलिक सीमेत बांधले जात नाही”.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संत माळेतील मणी शेवटचा – लेखक : सुमित्र माडगूळकर ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ संत माळेतील मणी शेवटचा – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री आशिष बिवलकर ☆

“संत माळेतील मणी शेवटला…

आज ओघळला एकाएकी … “

...सुमित्र माडगूळकर

रिक्षावाल्याने अंगात झटका आल्यासारखी एकदम रिक्षा बाजूला घेतली,आत बसलेल्या माय – लेकराकडे बघून म्हणाला, “तुम्ही इथेच उतरा,मी या पुढे जाऊ शकत नाही “.समोर खूप गर्दी जमलेली होती.

माय – लेकराच्या तोंडावर प्रश्नचिन्ह पाहताच तो उत्तरला ” समोर पहा, ती महाकवीची अंतिम महायात्रा चालू आहे, मला त्यात सामील व्हायचे आहे, तुम्हाला माहित नाही? गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांचे काल निधन झाले !”.

आत बसलेल्या माय – लेकराच्या चेहऱ्यावरील राग, प्रश्नचिन्ह क्षणार्धात दूर झाले व नकळत आई उत्तरली ” चल,आपणही पाच मिनिटे का होईना या अंतयात्रेत सामील होऊ, हीच या महाकवीला आपल्याकडून शेवटची श्रद्धांजली…. “.

—- 

१५ डिसेंबर १९७७ ची सकाळ. असे अनेक जण त्या अंतिम महायात्रेत सामील झाले होते… आपणहून…त्यांचे बालपण ‘नाच रे मोरा’,’झुक झुक अगीनगाडी’ म्हणत फुलले होते,तरुणपण ‘माझा होशील का?’,’हृदयी प्रीत जागते’ ने रंगविले होते,’देव देव्हाऱ्यात नाही,’इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ वर त्यांचे मन भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.आयुष्याच्या संध्याकाळी ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’ ने मनाला हुरहूर लावली होती,आयुष्यातील प्रत्येक दुःखाच्या क्षणी ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ सारख्या गीतरामायणातील गीतांनी आधार दिला होता.शाळेच्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात ‘मी सिंह पाहिला होता’,’औंधाचा राजा’,’आचंद्र सूर्य नांदो’,’शशांक मंजिरी’ सारख्या धडा-कविता मनाच्या कोपऱ्यात स्थान मिळवून होत्या ,नक्कीच वाचल्या होत्या.आज ते लाडके गदिमा शेवटच्या प्रवासाला निघाले होते … कोणाला दुःख झाले नसेल त्या दिवशी ?.

— डिसेंबर च्या एका पहाटे गदिमा दरदरून घाम फुटून जागे झाले,त्यांना विचित्र स्वप्न पडले होते “माडगूळच्या दारावरील गणपती” व “पंचवटीचे तुळशी वृदांवन व त्याचा कट्टा” दुभंगलेला दिसला होता. ते खूप अस्वस्थ झाले,विद्याताईंनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणाले “तुझ्या व मुलांच्या मनाची तयारी कर. मी आता अनंताच्या प्रवासाला निघालेला प्रवासी आहे. माझ्या दिव्यातील तेल आता संपत आले आहे “. एका पहाटे त्यांना खूप थंडी वाजून आली विद्याताईंनी घाईने नुकत्याच एका खेड्यातल्या समारंभात भेट मिळालेली उबदार घोंगडी त्यांच्या अंगावर घातली,गदिमा खिन्नपणे हसून म्हणाले “अग आता नको,काही दिवसांनी ती उपयोगी येईल”.

१४ डिसेंबर १९७७,गदिमांची आई ‘बनुताई दिगंबर माडगूळकर’ यांचा आदर्श माता म्हणून सत्कार होणार होता, माडगूळहून गदिमांचे धाकटे बंधू श्यामकाका आले होते. गदिमांना रात्रभर झोप नव्हती, विद्याताईंकडे बघून नुसते केविलवाणे हासत होते… डोळ्यात कारुण्य दाटले होते … ,काहीतरी सांगायचे होते पण …

गदिमा आईला म्हणाले, “आईसाहेब,आज तुमचा सत्कार आहे. विसरू नका. लवकर आवरून ठेवा. तुम्हाला न्यायला गाडी येईल.”

आई म्हणाली “तुम्ही नाही का येणार? “,आपल्या लाडक्या लेकाला बनुताई आदराने आहो जाहोच म्हणत असत. ‘येणार तर,पण आधी तुम्हाला गेले पाहिजे,आम्ही येतोच मागोमाग’. थोड्या वेळाने गदिमा व विद्याताई नातू सुमित्रला घेऊन बकुळीच्या पारावार जाऊन बसले. तितकेच गदिमा बाललीला पाहण्यात रमून गेले होते. तसा बराच वेळ गेला .. आत आल्यावर गदिमा विद्याताईंना म्हणाले “मंदे,तू आज मला तुझ्या हाताने आंघोळ घालशील का?” ,अंगात ताप होता विद्याताईंनी अंग गरम पाण्याने पुसून घेतले. कॉटवर स्वच्छ पांढरी चादर घातली.

”मंदे,आज मस्त वांगी भात आणि साजूक तुपातला शिरा कर,तोंडाची चवच गेली आहे… “,विद्याताईंनी त्यांच्या आवडीचे जेवण केले. गदिमा मनसोक्त जेवले त्या दिवशी. संध्याकाळी कार्यक्रमाला जाण्यासाठी विद्याताईंनी सर्व कपडे तयार करून ठेवले होते, रेशमी झब्बा,जाकीट,धोतर,सेंटवाला रुमाल. गदिमा म्हणाले ” मंदे,आता उशीर करू नकोस,लवकर आटप “. विद्याताई हसून म्हणाल्या “आत्ता आवरते बघा”. गदिमा बाहेरच्या निळ्या कोचावर जाऊन बसले.थोड्या वेळाने अचानक त्यांचा मोठा आवाज आला ” मंदे,अग लवकर इकडे ये, मला बघ कसं होतंय, खूप थंडी वाजते आहे बघ .. “. विद्याताई त्यांना लगबगीने आत खोलीत घेऊन आल्या .. अंगावर दोन तीन रग घातले पण त्यांची थंडी कमी होईना. दात एकमेकांवर आपटून जोरात आवाज येत होता.

विद्याताईंनी घाईघाईने मुलांना, सुनांना बोलवून घेतले, माळीबुवाला पाठवून डॉ.मेहतांना बोलवून घेतले. डॉ.मेहता म्हणाले ” कविराज,फटकन एक इंजेक्शन घेऊन येतो, ते घ्या व मस्त कार्यक्रमाला जा “. मेहता समोरच असलेल्या दवाखान्यात निघून गेले. गदिमांना दरदरून घाम फुटला होता. इकडे छोटा सुमित्र रडवेला चेहरा करून ” पपाआजोबा बोलत का नाहीत “  म्हणून एकटक बघत राहिला होता. त्याला कळत नव्हते “सर्वजण का जमलेत ?,ताईआजी का घाबरली आहे ? डॉक्टर काय करत आहेत ? “.

इकडे गदिमांचे पाय थंड पडले होते, विद्याताई व सुना त्यांच्या पायाला ब्रँडी चोळत होत्या. गदिमा म्हणाले “मला काही करू नका”. तितक्यात डॉ.मेहता परत आले त्यांनी इंजेक्शनची तयारी सुरु केली. तितक्यात गदिमांनी गजानन महाराजांना (शिवपुरी,अक्कलकोट) जोरात हाक मारली.  ” महाराज,मला आता सोडवा”. त्याचं बोलणं एकदम बंद पडले, जीभ तोंडात हलू लागली. डॉ. मेहतांनी इंजेक्शन दिले पण ते शिरेत न जाता तसेच बाहेर आले. अखेर संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास गदिमांची प्राणज्योत मालवली.

सकाळचाच प्रसंग..  बाथरूमला जाताना गदिमांनी विद्याताईंचा आधारासाठी दिलेला मदतीचा हात झिडकारून टाकला होता .. १९४२ साली प्रेमाने हातात घेतलेला त्यांचा हात आता कायमचाच सुटलेला होता … बुधवार १४ डिसेंबर १९७७ ची ती भीषण संध्याकाळ .. दोन सूर्य अस्ताला गेले. मृत्यूच्या पराभवाचा दिवस, कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह.

 फर्ग्युसन रस्त्यावरील उद्योगपती बाबुराव पारखे यांच्या विद्याविलास या बंगल्यात आदर्शमाता पुरस्कार सोहळा चालू होता. बनुताइंचा प.महादेवशास्त्री जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तेव्हड्यात गदिमांची बातमी येऊन पोहचली. बनुताईनसमोर ही बातमी सांगता येत नव्हती, पण त्या महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय परत पंचवटीत जाण्यास तयार नव्हत्या, त्यासाठी अडून बसल्या. शेवटी दर्शन घेऊन त्या निघाल्या, मग कार्यक्रमात प.महादेवशास्त्री जोशी यांनी गदिमांच्या निधनाची वार्ता सांगितली, सगळीकडे शोकछाया पसरली. इकडे पंचवटीत त्या सत्काराच्या हारतुऱ्यांसकट पोहोचल्या, आपल्या लाडक्या लेकाची अवस्था पाहून त्यांचे काय झाले असेल, एकीकडे आई आदर्श माता पुरस्कार स्वीकारीत होती व एकीकडे मुलगा अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता,सगळाच दैवदुर्विलास !.

पंचवटीच्या हॉलमध्ये पांढऱ्या चादरीखाली काहीतरी झाकलेले होते, माझे लाडके आजोबा कुठेच दिसत नव्हते, अगदी त्यांच्या निळ्या कोचावर सुद्धा. घरातले सगळे रडत होते, प्रचंड माणसे जमली होती,सगळे का रडत आहेत मला काहीच कळत नव्हते. त्यांना हसवावे म्हणून मी जास्तच चेकाळलो होतो, कधी नव्हे ते वेड्यासारखा इकडून तिकडून पळत होतो. शेवटी माझी रवानगी वरच्या मजल्यावर झाली.

— माझा बालहट्ट आता पुरविला जाणार नव्हता,एक महाकवी आपल्या शेवटच्या प्रवासाला निघालेला होता,माझ्या लाडक्या आजोबांचा हात माझ्या हातातून कायमचा सुटलेला होता.

१५ डिसेंबर १९७७. प्रचंड अंतयात्रा निघाली होती,पुणे मुंबई रस्त्याने जाणारी अंतयात्रा वाकडेवाडीच्या लोकांच्या हट्टाने वाकडेवाडीतून वळविण्यात आली. जेव्हा अंतयात्रा डेक्कनवर पोहोचली तेव्हा तिचे दुसरे टोक बालगंधर्व चौकात होते.इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल. संगीतकार राम कदम “अण्णा अण्णा” म्हणत आक्रोशाने धावत होते… ,महाराष्ट्र शासनाच्या वतीने शरद पवार सामील होते. स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते.

सगळ्यांच्या मुखात आज एकच ओळी होत्या ….

“विठ्ठलाच्या पायी थरारली वीट… “

“संत माळेतील मणी शेवटला… आज ओघळला एकाएकी… “

अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत, कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते. .गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून, साहित्यातून, चित्रपटातून, गीतरामायणातून मराठी रसिकांच्या हृदयात विराजमान आहेत.

चंदनी चितेत जळाला चंदन…

सुगंधे भरून मर्त्यलोक 

लेखक : सुमित्र माडगूळकर 

संग्राहक : श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विन्टेज – लेखक : श्री सौरभ साठे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ विन्टेज – लेखक : श्री सौरभ साठे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

माझ्या एकटेपणाच्या दुःखाने आता बाळसं धरायला सुरुवात केली आहे.

5 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावर खरं तर खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण आमची ही सहा महिन्यापूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेली. एकटीच.

आता मी माझं रुटीन सेट करुन घेतलंय. सकाळी जरा लवकरच उठतो. त्याचं काय आहे, मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात. यायला जरा उशीरच होतो त्यांना. म्हणून सकाळी चहाबरोबर जरा गप्पा पण होतील, असं मला वाटायचं. हो, मला वाटायचं. कारण त्यांना माझ्याशी बोलायला वेळच नाही मिळत. नाही, नाही. गैरसमज करुन घेऊ नका. सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवतात, तसे काही माझे मुलगा किंवा सून नाहियेत. वडिलांची आणि सासर्‍यांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नक्कीच घेतात. माझी तक्रार काही नाही. पण एकदा सकाळी इतरांपेक्षा लवकर जाग आली, म्हणून चहा करायला घेतला. पण नेमकं दूध उतू गेलं. सगळा ओटा खराब झाला. सून नाराज झाली. मला काही बोलली नाही, पण तिच्या हालचालीमधून ते स्पष्ट जाणवत होतं. त्या दिवशी मुलाने लगेच फर्मान काढलं,”बाबा, उद्यापासून आमचं आवरल्यावर मी तुम्हाला चहा आणून देईन रुममध्ये.”

असाच एकदा नातवाला म्हणालो, “चल तुला स्कूल बसपर्यंत येतो सोडायला.” तर म्हणतो कसा,”आबा, मी मोठा झालोय आता. मी एकटा जाऊ शकतो. तू आलास तर बाकीच्या मुलांना वाटेल, मी घाबरतो एकटा यायला. हसतील मला सगळे.”

म्हणून सध्या उठल्यावर मी माझ्या खोलीतच असतो. बाहेरचा अंदाज घेऊनच हॉल मध्ये येतो. मला कळून चुकलंय, की मी त्यांच्या आयुष्यातला फक्त्त एक भाग आहे, कदाचित थोडासा दुर्लक्षित.

आता मी संध्याकाळी फिरायला जातो. तेवढाच माझाही वेळ जातो. रोजचा मार्ग ठरलाय माझा. Agricultural College च्या चौकातून सरळ जाऊन विद्यापीठाच्या चौकातून परत घरी. त्या मार्गावर एक दोन शोरुम आहेत चार-चाकी गाड्यांच्या. पहिल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते. म्हणून मग येता जाता त्या शोरुममधल्या गाड्या बघत बघत जायचो. अर्थात बाहेरुनच.

पण एक दिवस त्या शोरुममध्ये एक वेगळीच गाडी दिसली.काहीशी जुनी होती, पण त्या गाडीला वेगळी जागा होती. तिला वेगळ्या पद्धतीने सजवलं होतं. कुतुहल वाटलं म्हणून आत गेलो. एक चकचकीत कपड्यातला सेल्समन आला. “Yes Sir, कुठली गाडी बघताय?”

“नाही. म्हणजे हो.बघतोय, पण विकत नाही घ्यायची मला. ही एव्हढी जुनी गाडी तुमच्या शोरुममधे कशी काय, हा विचार करतोय. “सर ही Vintage Car आहे. 1965 साली बडोद्याच्या महाराजांनी घेतली होती.”

“का हो? सगळ्या गाड्यांवर किमतीचा कागद लावला आहे. या गाडीवर मात्र तो नाही.”

“सर ही विंटेज कार आहे, हिची किंमत ठरवता येत नाही. ज्याला या गाडीचं मोल कळेल, तो कस्टमर ही गाडी घेईल. थोडक्यात ही गाडी महाग नाही तर मौल्यवान आहे.”

मी शोरुममधून बाहेर पडलो. कसला तरी विचार येत होता मनामध्ये , पण नक्की कळत नव्हतं काय ते.

असेच मध्ये काही दिवस गेले, रोज मी येता जाता ती गाडी कौतुकाने बघायचो.

गुढी पाडव्याच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळे घरीच होते. ही गेल्यानंतरचा पहिलाच गुढी पाडवा. जरा उदासच होतो मी, पण नातवाशी खेळण्यात वेळ जात होता.

“आबा तुला माहितीये का आमच्या शाळेच्या समोर ना 100 पेक्षा जास्त वर्षे जुने पिंपळाचे झाड होते. रोड वायडनिंगमध्ये ते पाडणार होते. मग कुठले तरी लोक आले मोर्चा घेऊन आणि ते झाड दुसरीकडे नेऊन पुन्हा लावलं. आमच्या टीचरनी सांगितलं, ते झाड जुनं असलं तरी 24 तास ऑक्सिजन देतं,म्हणून ते महत्त्वाचं आहे.”

त्या गाड्यांच्या शोरुम मधून बाहेर पडल्यावर जसं वाटलं होतं, तसंच काहीसं वाटून गेलं.

सुनबाई म्हणाली, “बाबा, तुम्ही पूजा कराल का गुढीची? इतकी वर्षे आई करायच्या. म्हणून वाटतं, आज तुम्ही करावी.” मी पण तयार झालो.

आम्ही सगळे जेवायला बसलो. सूनबाईने छान तयारी केली होती. जेवायला तांब्याची ताटं काढली. मुलगा म्हणाला, “अगं, आज तो काचेचा सेट काढायचा ना.”

“अरे, असू दे. आईने पहिल्या दिवाळसणाला दिला होता हा तांब्याच्या सेट. त्या सेटमधली आता फक्त्त ताटंच उरली आहेत. म्हणून मुद्दाम जपून ठेवली आहेत सणासुदीसाठी, आईची आठवण म्हणून.” आणि सूनबाईने नकळत हातातले फडके खाली ठेवले आणि ती ताटं स्वतःच्या पदराने पुसली.

अचानक मला त्या शोरुममधून बाहेर पडल्यावर मनात जो विचार आला होता, त्याचा अर्थ कळायला लागला. मौल्यवान या शब्दाचा. ती विंटेज गाडी, ते पिंपळाचे झाड, काही तरी इशारा करत होते.

आता माझे मला समजले होते, मी म्हातारा असलो तरी टाकाऊ नव्हतो.

आता मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या आयुष्याचा भाग होण्याचा अट्टाहास मी सोडून दिलाय स्वखुशीने. कारण मला माहितीये, त्यांच्या आयुष्यातील माझं स्थान त्या विंटेज कारसारखं आहे. एकदम स्पेशल.

लेखक : श्री सौरभ साठे

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आईपण… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आईपण? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आई जाउन आता ४ वर्षे होऊन गेली. पण आईची आठवण झाली नाही असा एकही दिवस जात नाही. कधी कधी भाउक होऊन आईच्या आठवणीने कासाविस झाले तर बाकीचे म्हणतात, काय लहान असल्यासारखे करतेस? तुला स्विाकारायला हवं ना? मग अशाने जास्तच व्यथित व्हायला होते.

अशी अवस्था कितीतरी जणांची होत असेल. पण मग विचार करताना आई भोवती मन पिंगा घालू लागले. आई विषयीचे कितीतरी विचार डोक्यात येऊन गेले.

प्रत्येक ठिकाणी देवाला जाता येणे शक्य नसल्याने देवाने आई निर्माण केली.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

आईची किंमत जो करत नाही त्याला जगाशी लढण्याची हिंमत होत नाही.

तसेच आईचा महिमा सांगणार्‍या कितीतरी कविता आठवल्या

गदिमा, मभाचव्हाण, यशवंत अशा कितीतरी कविंसोबत अलिकडेच कवि अनिल दिक्षीत, उद्धव कानडे आदि कविंच्या भावपूर्ण कविता मन हेलावून टाकतात.

मग वाटले खरच जगात कुठेही गेले तरी आईला किती महत्व आहे ना? मुलांना जन्म देण्याचे सामर्थ्य एका आईतच असते. तसेच त्यांना वाढवणे संस्कार करणे हे काम जबाबदारी न वाटता फूल उमलते तसं, सकाळी दव पडते तसं,सहज नकळत करण्याचे कसब हे एका आईठायीच असते.

वात्सल्य, प्रेम, ममता तिच्या अंगी ठासून भरलेली असते. आणि मग आई ही कोणी व्यक्ती नसून वृत्ती आहे असे वाचल्याचे आठवले. ती एक वृत्ती म्हणजे भावना असल्याने  ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राची तर विठ्ठल हे जगत माऊली झाले. अनेक पुरुष संत हे गुरूमाऊली बनले.

म्हणजेच आईपण ही वृत्ती खूप अवघड असूनही ती वृत्ती जो धारण करू शकतो तो आई होऊ शकतो.

सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळणे, सगळ्यांवर सारखे प्रेम करणे,चुका पोटात घेणे, शी-शू मनात कोणतीही घृणा न ठेवता आनंदाने काढणे, मुलांना हृदयाशी धरणे, चांगल्या-वाईट गोष्टिंचे ज्ञान देऊन चांगल्या गोष्टी मनावर बिंबवणे, सतत काहीतरी मुलांसाठी करत रहाणे, स्वत्व विसरून फक्त देत रहाणे,जिच्या सान्निध्यात आल्यावर सुरक्षित वाटते , लढण्याचे बळ येते असा भक्कम आधार होणे, अशी लाखो कारणे देता येतील जी वरवर अगदी सामान्य वाटतील पण करायला गेले तर किती अवघड आहे हे समजते.

मग ज्या लेकरांची आई लवकर देवाघरी गेली त्या लेकरांना आई बापाचे प्रेम एकट्या पुरुषाने दिले अशी कितीतरी उदाहरणेही पहातो म्हणजेच तो पुरूष त्याच्या अंगी असलेले आईपण जागृत करून मुले घडवतो. किंवा मुलांसाठी दुसरी आई आणतो . पण अशावेळी ती आई सावत्र बनते. का? तिच्या अंगी आईपण नसते का? असते तिच्या अंगीही आईपण असतेच पण मनात कुठेतरी दुजाभाव असतो म्हणून स्वत: जन्माला घातलेल्या मुलांवर ती मुद्दाम अधिक प्रेम आदर देते. मग अशावेळी ती नवर्‍याच्या मुलाची आई होऊच शकत नाही कारण आईपण असणार्‍या व्याख्येला ती कुठेतरी छेद देत असते.

फार कशाला कैकयीने सावत्र पणा जागृत ठेऊन रामाला वनवासात पाठवले हे उदाहरण सगळ्यांना माहित आहेच.

तसेच कृष्णाचा सांभाळ करणारी यशोदा, कर्णाला वाढवणारी राधा या खर्‍या अर्थाने आई झाल्या अशी उदाहरणे पण सर्वश्रृत आहेतच की!!

मग आई, आईपण याचे मोठेपण शब्दातीत असल्याची जाणिव होते. प्रत्येक घरात एक आई असते. तुमची आमची सेम असते पण आमच्या आईसारखी दुसरी कोणीच नाही असे सारखे वाटत रहाते.

तरी देखील दुसर्‍यांच्या आईत आपली आई म्हणजे त्या आईतील आईपण जाणून तिच्या चरणीही नतमस्तक होते.

ज्ञानेश्वर विठ्ठल इतर गुरू माऊली यांच्यातील आईपणा पाहून प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे त्यांनी किती प्रयत्नामधून हे आईपण आपल्या ठायी आणले असेल ते वाटून त्यांचा हेवा वाटतो .

स्वत: आई होऊनही काही गुण स्वभावत:च अंगी आले तरी आपल्या आईसारखे नाहीच जमत असे वाटून तिचे श्रेष्ठत्व मनातच जाणून तिच्यासारखे होण्याचा मन प्रयत्न करते.

असे मातृत्व अर्थात आईपण जर सगळ्यांच्या हृदयी आले तर?•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चालले कोण तिकडच्या घरी ?” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “चालले कोण तिकडच्या घरी…” ☆ श्री सुनील देशपांडे

‘निघाले आज तिकडच्या घरी ’ असे म्हणत शंभर वर्षांपूर्वी मुली स्वतःच्या वडिलांचे घर सोडून, सगळे नातेवाईक, आप्त, मित्र मैत्रिणी यांना सोडून स्वतःच्या सासरी जात असत. मग त्यांना एका बागेतले झाड उपटून दुसऱ्या बागेत पुन्हा लावण्याचा प्रयत्न होत आहे.. ..  अशा पद्धतीची उपमा देऊन आणि त्यांच्या त्यागाची परिसीमा वर्णन करत त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याची स्पर्धा सर्व कवी आणि साहित्यिकांमध्ये लागलेली असे. अगदी नाटक सिनेमासह सगळीकडे या पद्धतीने स्त्रीने स्वतःचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, शिक्षण, छंद, या सगळ्यांचा त्याग करून सासरची मंडळी ही 

देवासमान म्हणून त्यांचा छळ सहन करत आपले आयुष्य काढायचे. आपले जीवन सासरच्या घरास अर्पण करायचे. अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेला असेलही. अनेकांवर अन्याय झालाही असेल. नव्हे तो झाला आहेच. 

परंतु कालमान  परिस्थिती बदलत गेली. नोकरी व्यवसायानिमित्ताने गावाकडची माणसे शहरात येऊ लागली. लग्न झाल्यावर घरे अपुरी पडायला लागली.  पुरेशी घरे असूनसुद्धा योग्य ती प्रायव्हसी न मिळाल्याने होणारी कुचंबणा.  त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगळ्या ठिकाणी राजा- राणीचा नवा संसार थाटून नवरा बायको नव्या वाटेवरून मार्गक्रमण करू लागले.  तरीही जुन्या काळचे त्याग जुन्या काळच्या त्या रोपटे उपटलेल्या उपमा यातून साहित्यिक तर नाहीच, पण व्हाट्सअपचे पोस्ट टाकणारे ट्रॉलर्स सुद्धा बाहेर पडायला तयार नाहीत.  स्त्रीच्या त्या महान त्यागाची, व्हाट्सअपवर सुद्धा रकानेच्या रकाने भरून वर्णने अजून येत राहिली.

साधारणपणे आमच्या आधीच्या पिढीपासून नंतर आमची पिढी आणि पुढील पिढी तर नक्कीच लग्नानंतर स्वतःचे स्वतंत्र संसार थाटू लागले. त्यामुळे मुलीची परिस्थिती आणि मुलाची परिस्थिती काही वेगळी राहिली नाही.  मुलगासुद्धा स्वतःच्या संसारासाठी स्वतःचे नातेवाईक, स्वतःची मित्रमंडळी, स्वतःच्या संपूर्ण वातावरणाचा त्याग करून दोघेजण एकमेकांच्या परिस्थितीत समसमान त्याग करून आपापले सुखी संसार थाटू लागले. आमच्या पिढीतले अनेक आई-बाप सुद्धा शक्य होईल तसे मुलांच्या स्वतंत्र संसारासाठी तजवीजही करू लागले. मुलगा लग्न झाल्यावर वेगळा राहणार हे नक्की होऊन ते नवीन गृहीतक बनून गेले. तरीही अजून सर्व मुले त्याकाळच्या स्त्रीच्या त्यागापुढे फिकी पडत गेली.

कित्येक वर्षांपूर्वी याबाबतीत मी आमच्या आईशी वाद घातला होता. मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये काहीच फरक नाही. दोघेही आपापले वातावरण सोडून एकत्र येऊन तिसऱ्या वातावरणात एकत्र राहतात. त्यामुळे त्यापैकी कोणी एक त्याग मूर्ती म्हणून मिरवण्याचे काही कारण नाही.  हा विचार डोक्यात होताच, पण त्याबाबत काही लिहावं हे मात्र डोक्यात आलं नाही. परंतु कालच व्हाट्सअप वर एक कविता पाहिली आणि आपल्याच मनातले विचार कुणीतरी सांगतंय हे लक्षात आलं. खरं म्हणजे व्हाट्सअप वर कविता फॉरवर्ड करताना काही माणसे मूळ कवीचे नाव काढून का टाकतात हे मला अजून समजले नाही.  काव्य करणाऱ्या कवीला त्याच्या हुशारीचे श्रेय द्यायलाच पाहिजे. परंतु खालील कवीला ते श्रेय नाकारून कुणीतरी ती फक्त कविताच मला फॉरवर्ड केली. अर्थात कोणाला त्या कवीचे नाव माहित असल्यास कृपया मला कळवावे … त्या कवीला शाबासकी देण्यासाठी. 

ती कविता पुढे देत आहे.  त्याला दाद मिळावी ही मनापासून इच्छा आणि अपेक्षा …. 

— पण मुलंही जातात घर सोडून…!

मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून. 

आपलं घर, आपली खोली, गल्ली, मित्र अन गाव 

एका नेमणुकीच्या पत्रानंतर…….

 

रात्रभर कूस बदलत बिन झोपेचा, कण न् कण घराचा साठत राहतो उदास डोळ्यात….

 

आपलं जग मागे सोडताना, सर्टिफिकेट अन कपडे सुटकेसमध्ये भरताना……

भरलेल्या छातीत, मनाचं मेण होताना …….

आपली बाईक, बॅट, अन्  भिंतीवर लावलेले आवडत्या नायकांचे पोस्टर डोळे भरून पहात… 

ओलसर डोळ्यांनी कसंनुसं हसत मुलगा घराबाहेर पडतो. 

मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून…..

 

रेल्वेच्या दारात डोळ्यातलं पाणी लपवत, 

हसतो मित्रांचा निरोप घेत, दुरावण्याचं दुःख लपवत,

हळूहळू चालत्या रेल्वे सोबत नाहीसा होतो मुलगा …….

मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून ….

 

आता ऐकू येणार नाहीत मित्रांच्या बोलवण्याच्या हाका 

आणि वाजणार नाहीत दाराबाहेर खुणेचे हॉर्न …

घराच्या गेटवर आता जमणार नाही मित्रांच्या हास्यकल्लोळाचा मेळा…….

 

उंबरठा ओलांडतांना घराचा, त्यालाही रडावसं वाटतं.

आईच्या गळ्यात पडून पुन्हा मूल व्हावसं वाटतं.

पण जबाबदार्‍यांचा बंधारा

अश्रूंची वाट अडवतो, 

मुलगा मग सार्‍या भावना खोल छातीत दडवतो……

 

मुलीच्या पाठवणीच्या कौतुकात, माहेर तुटण्याच्या दुःखावर शेकडो गीतं लिहिली गेलीत. 

पण मूलं मात्र घराच्या अंगणातून सुटकेस घेऊन शांतपणे निघून जातात ….

 

एका अनोळखी शहरात,

जिथे कोणीही त्याची वाट पहात नाही 

अशा कुठल्यातरी एका घरात 

मुलं मुळातून दुरावण्याचं दुःख शांतपणे सहन  करतात ….

 

हो हे खरच आहे की मुलांची पाठवणी होत नाही घरातून,

पण मुलंही जातात घर सोडून …..

मुलंही जातात घर सोडून …….!

( कवी – अनामिक )

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ 20 मुलांची आई ! … सुश्री अंजली कुलथे – लेखक : धनंजय कुरणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ 20 मुलांची आई ! … सुश्री अंजली कुलथे – लेखक : श्री धनंजय कुरणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री अंजली कुलथे  

14 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला….26/11/2008 च्या रात्री नराधम अतिरेकी ‘अजमल कसाब ‘ त्याच्या एका सहकाऱ्यासोबत ‘कामा हॉस्पिटल’च्या आवारात शिरला आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला..

हॉस्पिटलचे दोन्ही सेक्युरिटी गार्ड्स जागीच ठार झाले.. ते दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.. जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती.. कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते…

‘अंजली कुलथे’ नावाची 50 वर्षांची नर्स, हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पहात होती… 26/11 ला ती ‘नाईट शिफ्ट’ला होती.. ती ‘प्रसूती कक्षाची इन-चार्ज’ होती.. तिच्या वॉर्डमध्ये 20 गर्भवती महिला होत्या….

… हातात बंदूका घेतलेले दोन अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येतायत हे पाहून अंजली जिवाच्या करारानिशी पुढे सरसावली.. आणि तिनं तिच्या वॉर्डाचे दोन जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले..

सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या ‘पॅन्ट्री’च्या खोलीत हलवलं.. वीस गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं ही किती नाजूक आणि जोखमीची गोष्ट होती…

कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळया झाडत होते.. ग्रेनेड टाकत होते… ते पाहून अंजलीनं, बाहेर येऊन, ‘जखमी होऊन पडलेल्या नर्सला’ कॅज्युअल्टी मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरु झाले..

इतक्यात वीस पैकी एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या.. अंजलीनं तिला हाताला धरून, भिंतीला चिकटून चालत चालत डिलिव्हरी रूम मध्ये नेलं आणि तिथल्या डॉक्टरच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली..

हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजली झोपेतून घाबरून उठत असे.. एका महिन्यानी तिला पोलिसांनी पाचारण केलं.. कसाबची ओळख पटवण्यासाठी… नंतर त्याच्या खटल्यात तिला साक्षीला बोलावण्यात आलं.. तिनं कोर्टाला एक विनंती केली… “माझा ‘युनिफॉर्म’ घालून येण्याची परवानगी 

मिळावी ! ‘कारण, त्या भीषण रात्री या युनिफॉर्मवर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले..” असं तिचं म्हणणं होतं…

अंजली कुलथे  यांनी त्या रात्री फक्त वीस महिलांचेच नव्हे तर, ‘ ही दुनिया पाहण्याआधीच मृत्युच्या जबड्यात पोहोचलेल्या ‘ वीस बालकांचेही प्राण वाचवले. आज ही मुलं चौदा वर्षांची असतील… त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या ‘ दोन जन्मदात्री ‘ आहेत… त्यांना नऊ महिने पोटात वाढवून  प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई …. आणि  अंजली कुलथे   … जन्माआधीच जीवदान देणारी दुसरी आई ! 

अंजलीताई तुमच्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधानाला सविनय प्रणाम !

लेखक : श्री धनंजय कुरणे

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुलगी” – लेखक :श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मुलगी” – लेखक :श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. होणारा नवरा मुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा, त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता.वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणा-या चांगल्या सासरवरुन त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झालं होतं.

एक दिवस लग्नाआधी मुलांकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जेवणाकरता बोलविण्यात आले होते.

वडिलांची तब्येत बरी नव्हती, तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलीच्या होणा-या सासरकडच्यांना देता आले नाही.

मुलांकडच्यांनी मोठ्या आदरसत्काराने त्यांचं स्वागत केलं. मग मुलीच्या वडिलांकरता चहा आणण्यात आला.

मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य करायला आधीच सांगण्यात आलं होतं. परंतु पहिल्यांदाच लग्नापूर्वी, मुलीच्या होणाऱ्या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांनी गपगुमान चहाचा कप हातात घेतला. चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले!

चहात साखर अजिबात नव्हती. शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता. त्यांनी विचार केला की, ही लोकंदेखील आपल्या घरच्यासारखाच चहा घेतात.

दुपारचं जेवण. तेसुद्धा घरच्या सारखंच होतं. जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा, म्हणून डोक्याखाली दोन उशा व पातळ पांघरूण देण्यात आलं. आरामपश्चात त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आलं.

मुलीच्या होणा-या सासरहून पाय काढताना वडिलांना त्यांच्या आदरतिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यांनी मुलांकडच्यांना याविषयी विचारले, “मला काय खायचं, प्यायचं, माझ्या तब्येतीला काय चांगलं हे आपल्याला एवढया उत्तमप्रकारे कसे काय माहिती ?”

यावर मुलीच्या होणा-या सासू म्हणाल्या, “काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली- माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत. त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी, ही विनंती.”

हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले होते.

वडील जेव्हा घरी पोहचले, तेव्हा घराच्या भिंतीवर समोर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तस्बीरीवरुन त्यांनी हार काढून टाकला. हे पाहून पत्नी म्हणाली, “हे आपण काय करता आहात ?”

यावर डोळ्यात अश्रू आणीत मुलीचे बाबा म्हणाले, “माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे. ती कुठेच गेलेली नाही. ती या लेकीच्या रुपात याच घरात आहे.

जगात सर्वच म्हणतात ना, मुलगी ही परक्याचे धन असते.एक दिवस ती सोडून जाईलच. पण मी जगातील सर्व आई-वडिलांना सांगू इच्छितो की,मुलगी कधीच तिच्या आई-बापाच्या घरातून जात नसते, तर ती त्यांच्या हृदयात राहते. आज मला अभिमान वाटतो आहे की, मी एका ‘मुलीचा बाप’ आहे!”

लेखक: अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मैत्री  चहाची…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मैत्री  चहाची…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

कधीकधी उगीचचं आपली नेहमीचीच आवडती काम करायला मूड लागत नाही, संगतवार अशी लिंक लागत नाही तेव्हा एरवी काय करावे असा प्रश्न पडायचा,काही सुचायचं नाही. विशेषत: पावसाळा आणि हिवाळा आपली संपूर्ण दिवसभराची कामे सुसंगत पार पाडावयाची असल्यास ह्याच्या शिवाय पर्याय नाही असा रामबाण उपाय. पण जेव्हापासून माझी मी मला नीट ओळखायला लागले तेव्हा हा मूड चुटकीसरशी बदलवण्याच कसब मला साधलयं.आणि ते ही एका सीप मध्येच.

हाँ,हाँ, असं दचकू नका.एक सीप म्हणजेच एक घुँट चाय का भाई.खरचं मस्त वाफाळलेला,आलं घातलेल्या,फेसाळ दुधाचा चहा म्हणजे अमृत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडीनुसार चहामध्ये वापरलेल्या साहित्याचं प्रमाण वेगवेगळं असतं.

आजकाल मधुमेही,अतिशय तब्येतीबाबतीत जागरूक मंडळी बिनसाखर,कमीसाखर,चहापत्तीचं अल्प प्रमाण, अगदी कमी उकळलेला चहा घेणा-या शहरी लोकांचं प्रमाण बरचं वाढलयं.चहाच्या परिवारात ग्रीन टी,लेमन टी ह्यासारखी भावंडही घुसलीयं.पण जो मजा कड्डक मिठ्ठी,आलं,गवतीचाय डालके जो चाय बनती है नं उसका जवाब नही. तबल्याचा गंध नसूनही हा चहा घेतल्यावर प्रत्येकाच्या तोंडून “वाह ताज”बाहेर हे पडतचं पडतं.

खरतरं चहाची आणि माझी ओळख तशी जरा उशीराच झाली. पण कसं असतं नं ओळख,नातं परिचय किती वेळ किंवा उशीरा झाला ह्याच्यापेक्षाही ते नातं,ती ओळख किती मनापासून घट्ट असते त्यावर त्याची खोली अवलंबून असते.त्याचं नात्याप्रमाणे माझी चहाशी ओळख जरी उशीरा झाली तरी ती मैत्री, ओळख खूप मनापासून, घट्ट, न शेवट असणारी झालीय हे ही खरे.

आज हे सगळं चहापुराण आठवायचं कारण म्हणजे गुगलबाबाच्या माहितीनुसार 15 डिसेंबर  हा “चहा दिवस”आहे.आम्ही लहान असतांना माझं माहेर गाईम्हशीवालं.दुधदुभतं माहेरी भरपूर त्यामुळे चहा तोंडी लागणं शक्यच नव्हतं.गाईम्हशींनी दुध दिलं नाही किंवा दुध नासलं तरचं चहा तोंडी लागायचा. पुढेपुढे दुधाचे दात पडल्यावर,जरा ब-यापैकी अक्कल फुटल्यावर मात्र जी चहाशी घट्ट मैत्री झाली ती आजतागायत वाढतेच पण कमी व्हायच नावचं नाही बघा.जशी चहा घ्यायची मजा ही फुल्ल कपभरुन चहामध्येअसते तशीच एक आगळीवेगळी लज्जत ही कटींग चहा मध्येही असते आणि तो अर्धा कटींग चहा आपल्या जिवाभावाच्या,आवडत्या व्यक्तीनं जर दिला असेलं नं तर क्या कहना. आजकाल अमृततुल्य वा प्रेमाचा चहा अशी बरीच तयार चहाची दुकान आहेत शिवाय वारेमाप चहा कॅन्टीन पण आहेत परंतु मला अगदी मोजून इन मिन तीन ठिकाणचा चहा आवडतो, एक म्हणजे माझ्या स्वतःच्या हातचा घरचा चहा, दुसरा आमच्या बँकेत बनणारा चहा आणि तिसरा अमरावतीच्या शाम चौकातील सुंदरम् कॅफे मधील चहा. आमच्या बँकेत तर दोन पुरुष कर्मचारी असा अफलातून साग्रसंगीत आल वैगेरे घालून दिलखेचक चहा करतात न की मस्त चहा ने कामाचा मुडच बनून जातो.

ह्या चहापुराणावरुनच आठवलं बघा.चहा आणि प्रेम किंवा मैत्री ह्यांच एक अनोखं असं नातं असतं.एक कुणी अनामिकानं लिहीलेली चहा आणि मैत्री वरील ही पोस्ट माझी खूप आवडती.ह्या पोस्टमध्ये मी थोडा बदल केलायं.पोस्ट खालीलप्रमाणे

चहाच्या कपासोबतच त्याने मैत्रीचा हात पुढे केला,तेव्हा ती भांबावली,लग्न झालयं,मुलं मोठी झालीयं,छान चाललयं सगळं असं म्हणाली.तो हासून म्हणला अगं मी मैत्री म्हणतोयं तुला.

ती पुढे म्हणाली मला हे आवडत नाही, मी बरी माझे काम बरे,ह्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही, तेव्हा हलकेच चहाचा कप पुढे करुन हसून परत बोलला तो, अग मी मैत्री म्हणतोयं तुला.

इथे मेली सगळ्या जगाची नजर,सगळ्यांना नसत्या उचापती,प्रमोशन्स तोंडावर, साध्या गोष्टीनेही काहूर माजतं,तो चहाचा कप तिच्या ओठी लावतं खळखळून हसतं म्हणाला अगं मी मैत्री म्हणतोयं तुला.

थंड होत असलेल्या चहात हिचे अश्रु पडताच डोळे पुसायला पेपरनँपकीन पुढे करतच तो परत बोलला अगं मी मैत्री म्हणतोय तुला.

चहा थंड झाल्यामुळे तो दणदणीत आवाजात परत तिच्या आवडीचा फुल्ल,कड्डक, मीठा चाय आँर्डर करतो तेव्हा ती खुदकन डोळे पुसत हसते.आणि जेव्हा तो फुल्ल चहा कटींग करून आळीपाळीने प्याल्यावर तीच आभाळं खरचं निरभ्र होतं,मनावरचं ओझं हलकं होतं म्हणून तो परत म्हणतो अगं वेडाबाई ह्याचसाठी मैत्री म्हणतोय तुला.

आणि मग ह्या चहाच्या साक्षीनचं परत दोघे शेवटच्या श्वासापर्यंत अंतापर्यंत मैत्रीसाठी बांधील राहण्याची जणू भीष्म प्रतिज्ञाच घेतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares