मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अवघ्या चाळीस दिवसांचा उशीर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ अवघ्या चाळीस दिवसांचा उशीर ☆ श्री संभाजी बबन गायके 

मी प्रथम. प्रेमाच्या माणसांसाठी मी यश. मी सुद्धा आपल्या भारताच्या तिन्ही सेनादलांच्या प्रमुख महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मोठ्या अभिमानाने कडक सल्यूट बजावला असता ३० नोव्हेंबरला सकाळी आमच्या पासिंग आऊट परेड मध्ये आणि अंतिम पग पार करून सैन्याधिकारी झालो असतो… पुढे आणखी प्रशिक्षणासाठी गेलो असतो, आणि काही वर्षांत देशाच्या सीमेवर जाऊन उभा राहिलो असतो… पण आता मी नाहीये त्या माझ्या बॅचमेटसच्या शिस्तबद्ध, रुबाबदार रांगेत. माझी जागा दुसरा कुणीतरी भरून काढेलच…. सैन्य थांबत नाही कुणासाठी.

बारा-पंधरा वर्षे हृदयात घट्ट रुतवून ठेवलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला केवळ चाळीसच दिवस उरलेले होते… आणि एवढ्यातच प्राणांचं पाखरू उडून गेलं..!

आईला मानलं पाहिजे माझ्या, आणि वडिलांनाही. दोघंही व्यवसायाने शिक्षक. मी एकुलता एक. पण मी लष्कराच्या वाटेने जायचं म्हणालो तेंव्हा त्यांनी नाही अडवलं मला. खेड्यात राहून शिकलो सुरुवातीला, आणि मग सैनिकी शाळेत जागा पटकावली. तसा मी काही फार बलदंड वगैरे नव्हतोच कधी, पण लढायला आणि सैनिकांचं नेतृत्व करायला आवश्यक असणारी मानसिक कणखरता, शास्त्र आणि शस्त्रांचं ज्ञान मात्र मी कष्टपूर्वक प्राप्त केलं होतं एन. डी. ए. मधल्या खडतर प्रशिक्षणात….. थोडीथोडकी नव्हेत तर तब्बल चार वर्षे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पासिंग आऊट परेड व्हायची बातमी आई-बाबांना कळाली तेंव्हापासून त्यांनी एन.डी.ए. मध्ये ही परेड पाहण्याची, माझ्या खांद्यावर, छातीवर ऑफिसरची पदकं पाहण्याची स्वप्नं रंगवायला आरंभ केला होता….. फक्त महिना-सव्वा महिन्यांची तर प्रतिक्षा होती. दोघांच्या पगारातून रक्कम शिल्लक ठेवत ठेवत त्यांनी माझा आतापर्यंतचा खर्च भागवला होता. मी अभ्यासात हुशार होतोच, सहज इंजिनियर, डॉक्टर झालो असतोच म्हणा. पण मला लष्करी वर्दीचं आकर्षण लहानपणापासून… नव्हे, तसा माझा हट्टच होता… आणि आई-बाबांनीही या एकुलत्या एका लेकाचं मन नाही मोडवलं.

माझी एन.डी.ए. मध्ये निवड होणं ही किती मोठी गोष्ट असेल हे ज्यांनी प्रवेश परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय चाचणी, ही दिव्यं पार पाडली असतील त्यांना जास्त चांगले समजू शकेल. आईबाबांना मात्र आपला मुलगा सैन्याधिकारी होणार याचीच मोठी अपूर्वाई होती. प्रशिक्षणास दाखल होताना बाबांनी फॉर्मवर सही करताना वाचलंही होतं…. ‘प्रशिक्षणादरम्यान काही झालं तर, अगदी मृत्यू झाला तरी ‘माजी लष्करी अधिकारी’ अशी ओळख आणि नुकसानभरपाई मिळणार नाही….’ तसा कायदाच आहे लष्कराचा. आता हा नियम मोठ्या लोकांनी तयार केला आहे आणि आजही हा नियम लागू आहे, म्हणजे त्यांनी काहीतरी विचार केला असेलच की!

त्या फॉर्मवर सही करताना बाबांनी आईकडे एकवार पाहिलंही होतं ओझरतं… पण असं काही आपल्या प्रथमबाबतीत होईल असा विचारही त्यांचं मन करू धजत नव्हतं. मूळात सैन्य म्हणजे मृत्यूची शक्यता हे समीकरण त्यांनाही माहीत होतंच… त्यांनी काळजावर दगड ठेवून मला एन.डी.ए. च्या पोलादी प्रवेशद्वारातून निरोप दिला…. “यश यशस्वी हो!” दिवस होता १८ एप्रिल,२०२१.

१९४९ मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इतिहासात प्रशिक्षणार्थी सैन्याधिकाऱ्यांचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू होण्याच्या तीन घटना घडून गेल्या होत्या…. २ जुलै, २००९ रोजी कॅडेट नितिश गौर, ६ जानेवारी,२०१२ रोजी कॅडेट के. विघ्नेश, ३ फेब्रुवारी,२०१३ रोजी कॅडेट अजितेश अतुल गोएल हे ते तिघे. आता मी चौथा १८ नोव्हेंबर,२०२३ ला या तिघांना जॉईन झालो! लक्ष्य गाठण्याच्या सर्वांत जवळ येणाऱ्यांत मात्र मी प्रथम आलो…

केवळ सव्वा महिना! लष्करात गेलो असतो, लढलो असतो आणि वीरगतीस प्राप्त झालो असतो तर देहाचं सोनं झालं असतं आणि मुख्य म्हणजे आई-बाबांना माझ्या जाण्यानं दु:ख झालं असतं तसा अत्यंत अभिमानही वाटला असता! अर्थात आताही त्यांना माझा अभिमानच वाटत असेल… मी पूर्ण प्रयत्न केले याबद्दल. बाकी एकुलता एक लेक गमावण्याचं त्यांचं दु:ख इतर कुणी समजूही शकणार नाही, हेही खरेच. असो. ईश्वरेच्छा बलियेसी!

असंच काहीसं बोलला असता ना प्रथम ऊर्फ यश महाले जर त्याला आपल्याशी तो आपल्यातून निघून गेल्यानंतरही बोलता आले असते तर?

आजवर एकट्या एन.डी.ए. मधून सुमारे ६००० हजार प्रशिक्षणार्थ्यांपैकी सुमारे २.०६% प्रशिक्षणार्थी विविध वैद्यकीय कारणांनी पुढे प्रशिक्षण सुरू ठेवण्यापासून आणि अर्थातच अधिकारी बनण्यापासून वंचित राहिलेले आहेत. आणि ही गोष्ट अपरिहार्य सुद्धा आहेच… देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे…. पण या मुलांचं पुढे काय होतं? हे फारसं कुणाला ठाऊक नाही असं दिसतं. ही मुलं साधी, सामान्य का असतात? लाखोंमधून शेलकी निवडून काढलेली असतात. त्यांचे पालक काळजावर दगड ठेवून त्यांना लष्करात धाडत असतात. लष्करात घेताना एकही व्यंग चालत नाही आणि तोच लेक आईला परत देताना धड दिला जाईल किंबहुना धडासह दिला जाईल, याची शाश्वती कुणासही देता येत नाही!

प्रशिक्षणादरम्यान उदभवलेल्या वैद्यकीय कारणांनी किंवा मृत्यू झाल्याने प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही, सबब त्यांना माजी लष्करी कर्मचाऱ्याचा दर्जा देता येणार नाही, आणि अर्थातच माजी लष्करी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पालकांना लागू होणारे आर्थिक लाभही देता येणार नाहीत… हे सकृतदर्शनी व्यावहारीकच वाटणे साहजिकच आहे…. पण थोडा अधिक विचार केला तर परिस्थिती भयावह आणि अत्यंत निराशाजनक आहे.. आणि मूळात समाजाला शोभणारी नाही.

ही तरणीताठी, बुद्धीमान, देशप्रेमी आणि धाडसी मुलं (आणि हल्ली मुलीही) देशासाठी मरणाच्या वाटेवर स्वत:हून चालायला निघतात…. ती काही स्वखुशीने जखमी होत नाहीत किंवा मरणही पावत नाहीत! जखमी होणाऱ्या या मुलांना देय असलेल्या रकमांचे आकडे पाहून काळजात कसंतरी होतं. विविध योजनांमधून रूपये साडे तीन हजार, रूपये सहा हजार नऊशे, सात लाख असे काहीसे आकडे आहेत हे… त्यात किती टक्के अपंगत्व हा भाग आहेच. शासकीय नोकऱ्यांमधील काही (विशेषत: निम्नस्तरावरील) पदांच्या भरतीत प्राधान्यही देतात! एवढं पुरेसं वाटतं आपल्या व्यवस्थेला. आणि ही व्यवस्था काही आजची नाही!

याच पार्श्वभूमीवर क्रिकेट खेळात बळी घेणाऱ्या आणि बळी जाणाऱ्या, धावा घेणाऱ्या क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या करमुक्त काहींना पाच लाख, काहींना सात-सात कोटी, मॅन ऑफ दी मॅचचे लाखभर रूपये, या रकमा नजरेत भरतात, यात नवल नाही. रणांगणावरील बळी आणि मैदानावरील बळी यात फरक असला पाहिजे.

शिवाय प्रशिक्षणात जखमी झालेल्यांना आयुष्यभर सोसावं लागणारं ‘दिव्यांगत्व’ हा तर निराळाच मुद्दा आहे. मृत प्रशिक्षणार्थ्यांच्या पालकांना काय देत असेल व्यवस्था हे ठाऊक नाही! असो.

गेल्या काही वर्षांत लोकसभेत आणि राज्यसभेत याबाबतीत तत्कालीन सरकारांना बिगरतारांकीत प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची उत्तरेही दिली गेलीत. काही उपाययोजनाही केल्या गेल्या आहेत, असे समजते. पण त्या पुरेशा नाहीत असं समजायला वाव आहे.

आपल्या यश साठी आपण काही करू शकतो का? ही आर्थिक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी व्यवस्थेला विनंतीपर पत्र, ईमेल, आवाहन करू शकतो. आपल्या प्रतिनिधींमार्फत आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकतो.

महाराष्ट्र राज्यशासनही आहेच.

रस्ते अपघातात मरण पावलेल्यांच्या जवळच्या नातलगांना त्वरीत लाखो रूपयांची नुकसानभरपाई जाहीर केली जाऊन दिलीही जाते. यश महालेंच्या बाबतीत राज्य सरकारला असे काही करण्याचे सुचवू शकतो.

एक नागरीक म्हणून काही निधी उभारून यश अर्थात प्रथमचे यथोचित स्मारक उभारून, त्याच्या नावाने अकॅडमी स्थापन करून, उदयोन्मुख तरूणांना प्रशिक्षणासाठी आर्थिक साहाय्यासाठी आर्थिक तरतूद करता येईल. किंवा यांसारख्या अन्य सकारात्मक बाबींचा विचार करता येईल.

प्रथमच्या आईबाबांचे नुकसान मात्र आपण काहीकेल्या भरून देऊ शकणार नाही आहोत…. हे मान्य करतानाच आपण काहीतरी केले पाहिजे हे मात्र तितकेच खरे आहे…. कारण देशाला अशा यश आणि प्रथमची गरज कायमच भासणार आहे. यात आपली मुलं कधीच कमी पडणार नाहीत हे खरं असलं तरी आपण काय करणार आहोत… हेही महत्त्वाचे आहे.

दिवंगत Squadron Cadet Captain Pratham Mahale यांना भावपूर्ण श्रद्धांजली… जयहिंद सर ! 

(मी अनाधिकाराने वरील विचार मांडले आहेत.. व्यवस्थेविरोधी लेखन नाही…. पण काही सुचवू पाहणारे मात्र निश्चित आहे. आणि असा विचार असणारे अनेक लोक आहेत. त्यांनी एकत्र आले पाहिजे. लेखाच्या आरंभीचे लेखन मी यशच्या भूमिकेत जाऊन केले आहे. बाकी आपण सूज्ञ आहातच.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकटेपण? नाही फक्त सुंदर एकांत… – लेखिका : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

एकटेपण? नाही फक्त सुंदर एकांत… – लेखिका : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

मी २०१३ पासून एकटी राहते. म्हणजे वयाच्या ७६व्या वर्षांपासून. आज माझे वय ८७+ आहे. हे एकटे राहणे मी मनापासून निवडले आणि त्याचा मला कधीच पश्चात्ताप करावा लागला नाही. कारणानिमित्ताने मी मुलाकडे जाते पण तेथे राहत नाही २ दिवसाच्या वर. मला तेथे करमतच नाही. ना काम ना धाम. वाचन आणि टीवी ह्यात वेळ घालवायचा. शिवाय प्रत्येकाची खोली वेगवेगळी. ते मला झेपतच नाही.

आत्ताच काही दिवसापूर्वी तब्येतीच्या कारणाने दीड महिना मुलाकडे राहिले..तर ढगांचे आकार बघण्याचा छंद  लागला… खिडकीतून फक्त तेच दिसतात ना? त्यातही मजा असते बरे का.  मुलगा आणि सून बाई कायम आग्रह करतात की आता येथेच राहा. मुलगा म्हणतो “आई फक्त बरे नसले तरच येतेस”..  मी त्यांना म्हणते, “अजून माझे हातपाय चालू आहेत. ते थकले की तुमच्याकडेच तर यायचे आहे.”

दिवसा गुड मॉर्निंगचा संदेश आणि रात्री गुड नाईटचा संदेश नेमाने पाठवते. विशेष काही घडले की फोन करतो एकमेकांना. शिवाय आजकाल विडिओ कॉलचीही सोय असतेच. म्हणजे तसे आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो. शिवाय माझ्या एक असे लक्षात आले आहे की मी समोर असले की दोघांना माझी जास्तच काळजी वाटायची. ते बाहेर जाताना हजार सूचना केल्या जायच्या. माझ्यात दोघे अडकून पडायचे. तेव्हाच ठरवले की आता घरी परतलेच पाहिजे. परंतु माझ्या अशा एकटे राहण्याचे अनेकांना आश्चर्य वाटते. प्रथम प्रथम बरे – वाईट तर्क – कुतर्क  आपापल्या मगदूराप्रमाणे लोकांनी केले. पण आता बहुतेक वृध्दांना माझी राहणी पटू लागलीये.

अनेकांना  जागेची दुसरी सोय नसल्याने जीव मारून एकत्र राहावे लागते. सर्वांचीच त्यामुळे मानसिक कोंडी होते आणि चिडचिड वाढते. कोणी आर्थिकदृष्टया मुलांवर अवलंबून असतात.  त्यामुळे एकत्र राहावेच लागते. काही वेळा तब्येत चांगली नसते आणि कोणाच्या तरी आधाराची सतत गरज भासते. देवदयेने अजूनपर्यंत मला ह्या परिस्थितीतून जावे लागले नाही. म्हणून उगीचच मुलाच्या संसारात गुंतून राहणे मला पटले नाही. तसे अडीअडचणीला सून आणि मुलगा फोन केल्याबरोबर धावून येतात.   हे पुरेसे नाही का? लांब राहून गोडी टिकवणे मी जास्त पसंत करते.

आता दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे एकटे राहिले की दुखणे येऊ नये म्हणून मी  माझ्या आरोग्याची नियमित काळजी घेते. व्यायाम/आहार / विश्रांती सर्व वेळच्यावेळी करते. दिनक्रम व्यवस्थित आखून घेतल्यामुळे उगीच आळसात वेळ घालवत नाही. कालपर्यंत घरातील सर्व कामे मीच करत होते. आता काही लोक ह्याला कंजुषी म्हणतील. पण ह्यात खूप फायदे आहेत. पैसे वाचवणे, हा हेतू नाहीच आहे. पण मन कामात व्यग्र राहते, वेळ चांगला जातो, आपोआप शरीराला व्यायाम होतो हे फायदे महत्त्वाचे आहेत. मला पहिल्यापासून व्यायामाची  आवड आहे. पहाटे  ४ वाजता उठून ६ पर्यंत त्यात वेळ जातो आणि मग घराकडे बघायचे. पूर्वी  मॉर्निंग वॉक घेत असे. आता घरातल्या घरात एकाच जागेवर तसेच अगदी थोड्या जागेत इंग्लिश 8 च्या आकड्याबरहुकूम चालून चांगला व्यायाम होतो, हे शिकले आहे. यु ट्युबवर पाहून.. शिवाय बाहेरची सर्व कामेही मी करते. (आता एक मदतनीस आहे. ) मुलाची शक्यतोवर मदत घ्यायची नाही, असा नियम केला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आपण पेलू शकतो, हा आत्मविश्वास मिळतो आणि त्यातून जगण्याची ऊर्जा मिळते. माझे छंद मला त्यामुळेच आजपर्यंत जोपासता आले.

आतापर्यंत व्यवस्थित चालले आहे. उद्याचा विचार मी करतच नाही. रोज देवाचे आभार मानते, ज्याने मला सुजाण आईवडील,प्रेमळ भाऊबहिणी,आनंदी लहानपण,उत्तम शिक्षण,चांगले नातेवाईक आणि  प्रेमळ कुटुंब दिले. आता एकटे राहण्यामुळे जुन्या आठवणी  मनात जागवताना मनाला निरलस शांतता मिळते. आज तरी एकटे राहणेच मला आवडते. ना कसली इच्छा ना कसली अपेक्षा.. उद्या काय होईल, त्याचा विचार मी करतच नाही. तब्येतीने साथ देणे सोडले की आहेतच मुलगा आणि सूनबाई..!

लेखिका : श्रीमती नीला शरद ठोसर

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “50-50 अर्थात थोड तुझं… थोड(स) माझं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “50-50 अर्थात थोड तुझं… थोड(स) माझं” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

आमचही घर इतर (सर्व) सामान्य घरांसारखच आहे. म्हणजे आमच्याही आपसातल्या काही गोष्टी फक्त स्वयंपाक घरापर्यंतच असतात. काही थोड्या घरंगळत बाहेर हाॅलमधे रेंगाळतात. तर काही मात्र हाॅलमधून बाल्कनीत फेरफटका मारायला येतायेता बाहेर केव्हा पडतात ते समजत नाही. पण आमच छान चालल आहे.

दोन किंवा जास्त पक्षाच सरकार आल्यावर जस त्यांचा आपसात वेळोवेळी वेळेवर समन्वय असतो, तसाच आमचा समन्वय आहे. त्यांची जशी आपसात हवी तशी खातेवाटप आहे असे दाखवतात तशीच आम्ही आम्हाला हवी तशी आमची खाती वाटून घेतली आहेत.

आता घर म्हणजे देणंघेणं, सणवार, खाणंपिणं, खरखोटं, कमीजास्त, उठणबसण यासारख्या बऱ्याच गोष्टी जोडीने येणारच. आणि याच जोड गोष्टी आम्ही गोडीने आमची खाती म्हणून वाटून घेतल्या आहेत. यातच आमची ख्याती आहे.

आता देणंघेणं, यात देण तिच्याकडे आणि घेणं माझ्याकडे ठेवलंय.उगाचच देतांना आपल्याकडून काही कमी गेल का?…. याची खंत वाटायला नको. आणि घेण यात माझ्या काहीच अपेक्षा नसतात. त्यामुळे तिथे खेद नसतो. मिळाल त्यात आनंद.

सणवार, यात सण कोणते, कुठल्या पध्दतीने साजरे करायचे हे ती ठरवते. आणि ते कोणत्या वारी आहेत, आणि त्या दिवशी मी नेमक्या गोष्टी टाळायच्या हे मला ठरवावच लागतं. त्यामुळे सण तिचे आणि वार माझ्याकडे येतात. पण अशा वारांची वारंवार आठवण ती करून देते.

खाणंपिणं यांचंही तसच. खाण्याच्या गोष्टी तिच्याकडे, आणि पिण्याच्या मात्र मी माझ्याकडे ठेवून घेतल्या आहेत. यात तिच्या खाण्याबद्दल मला काहीच म्हणायचे नसते. पण माझ्या (काही) पिण्याबद्दल तिला आक्षेप असतो. मी तिच्या खाण्याबद्दल बोलत नाही. पण माझ्या त्या पिण्याबद्दल निषेध हा पिण्याअगोदर आणि प्यायल्यानंतर दोन्ही वेळा नोंदवला जातो.

खरखोटं यात ती काही वेळा मला विचारते, खर सांगताय ना……. पण ती बोलते किंवा विचारते त्यात खोटं काहीच नसत. पण तरीही ते खरंच आहे असं खोटखोटच मी म्हणतो असं तिला वाटत. इतका माझ्या खरेपणा बद्दल तिला विश्वास आणि आदर आहे.

कमीजास्त बद्दल जास्त काय सांगणार. पण तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं वेळेवर, व्यवस्थित करून, कमी बोलून सुद्धा कमीपणा मात्र तिच्याच वाट्याला येतो. आणि याचा जास्त त्रास तिलाच होतो. यात सगळं, वेळेवर, व व्यवस्थित यावर विशेष जोर असतो. तरीही माझ्याकडून तिला जास्त अपेक्षा नसतातच. पण त्यातही मी कमी पडतो. यापेक्षा जास्त सांगण्यासारख काही नाही.

उठणबसण यात टी.व्ही. समोर बसून कार्यक्रम पाहताना थोड्या थोड्या वेळाने काम करण्यासाठी उठण तिच्याकडे, तर कार्यक्रम संपेपर्यंत (तंगड्या लांब करून) बसण मला भाग असत.

या प्रकारे आमचं सगळ व्यवस्थित चालल आहे. यात काही ठिकाणी आमचे मतभेद असतील. पण मनभेद मात्र कुठेच नाही. आणि यावर आमच एकमत आहे.

अरे हो… एकमतावरून आठवल. आमचे बरेचसे निर्णय हे एकमताने घेतलेले असतात. याबद्दल शंका नाही. पण हे एकमत म्हणजे एकच मत असतं, आणि अर्थातच ते कोणाच असेल……. यावर सगळ्यांचच एकमत असेल.

अस आमच थोड तुझं आणि थोड(स) माझं असलं तरीही 50/50 आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऑक्सफर्डवारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

ऑक्सफर्डवारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

गेल्या वर्षी आम्ही इंग्लंडमध्ये मुलीकडे दोन महिने होतो.यावर्षी सहा महिने होतो.पण यावर्षी घरातली अनेक कामं, मुलीची धावपळ यामुळे घर सोडून फारसं फिरायला गेलो नव्हतो.तसे आम्ही इंग्लंडला पर्यटन म्हणून न जाता मुलीला तिच्या कामात मदत करायलाच जातो. त्यामुळे त्याचं आम्हाला काहीच वाटलं नाही. तरीपण एक दिवस रात्रीची जेवणं आटोपून आम्ही निवांत बसलो होतो तर मुलगी तिथं आली, ” आईपप्पा, उद्या पाऊस नसला तर, आपण ऑक्सफर्डला फिरायला जाऊ”.

सकाळीच आटोपून दहाच्या सुमारास ट्रेनने फॅरिंग्टन, पॅडिंग्टनमार्गे आम्ही ऑक्सफर्डला पोहोचलो. स्टेशनवरून हाॅप ऑन हाॅप ऑफ .. या बसने शहराचा आधी फेरफटका घेतला.गेल्या वर्षी अशाच केंब्रिज या शहराला भेट दिल्याची आठवण जागी झाली. सुमारे तासभराच्या बस प्रवासात शहरातील जगप्रसिद्ध बागा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये आणि विख्यात महाविद्यालयांना धावती भेट दिली.

जगभरातील १४ वेगवेगळया भाषांतून माहीती दिली जात होती. इथे काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी मला जाणवल्या ;

– इथली अनेक महाविद्यालये कित्येक शतकांपासूनची आहेत. जगातील अनेक विख्यात व्यक्तींनी इथून शिक्षण घेतल्याचा इतिहास आहे.

– आजही ह्या महाविद्यालयांच्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.

– आपल्याकडे शिक्षण १९ व्या शतकापासून सुरू झाल्याचा उल्लेख आढळतो, मात्र स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा विकास अधिक गतीने झाला.

– मात्र आपल्याकडच्या इमारतींची आजची अवस्था, स्वच्छता आणि तिथले वातावरण यात खूप फरक जाणवला. आपल्याकडे विद्यार्थी निवडणूका, विविध युवक महोत्सव अशा बाबतीत झालेल्या अप्रिय घटनांमुळे शिक्षणाबरोबरच गलिच्छ राजकारण, पैसा आणि इतर साधनांचा गैरप्रकार यामुळे आपल्याकडच्या शिक्षणाला नकारात्मक प्रसिद्धी मिळाली आहे.

– इंग्लंडमधील विशेषत: ऑक्सफर्डमधील अनेक जुन्या, नव्या महाविद्यालयांतून दिले जाणारे शिक्षण आणि एकूणच वातावरण पहाता आपली स्थिती नक्कीच शोचनीय वाटते.

– महाविद्यालये, बागा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये पहाताना, स्वच्छ रस्ते, लोकांनी पाळलेली स्वयंशिस्त, वातावरणातील शांतता पाहून अशा बाबी आपल्यासाठी किती मार्गदर्शक आहेत ह्याची जाणीव झाली.

दिवसभरात जगातील एक सुंदर शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध शहराचा प्रवास संपल्यावर सायंकाळी हलकासा पाऊस पडून गेला होता, हवेत खूप गारठा जाणवत होता. म्हणून तिथल्या, डोसा पार्क नावाच्या दक्षिण भारतीय हाॅटेलात गेलो.तिथले सगळे वातावरण दक्षिण भारतीय होते. मोठ्या कागदी कपातून चहा पीत असताना भिंतीवर कृष्णाचे एक लहानसेच पण अतिशय सुंदर चित्र पहायला मिळाले.

लहानपणापासून मी कृष्णाची अनेक चित्रं पाहिली.पण ते चित्र मला खूपच भावले. आजवर कृष्ण म्हटला की, सोबतीला राधा असलेला बासरी वाजवणारा कृष्ण किंवा फार फार झालं तर, महाभारत युद्धात अर्जुनाच्या रथावर आरूढ किंवा अर्जुनाला उपदेश करणारा कृष्ण मी पाहिला होता. अनेक ठिकाणी कृष्णाची देव स्वरूपातली चित्रं पाहिली. मागे आपल्याकडचे एक अतिशय अभ्यासू, पुरोगामी विचारवंतांचे भाषण मी युट्यूबवर ऐकले होते.त्यांच्यामते कृष्ण हा भारतीय संस्कृतीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. त्याला बदनाम करण्यासाठी ‘पाण्यात कपडे काढून अंघोळ करणाऱ्या गोपींची वस्त्रं पळवून गंमत करणारा खोडकर ‘ अशी त्याची प्रतिमा निर्माण केली. खरंतर अगदी आपल्या देशात असं कोणतं गाव असेल जिथं सार्वजनिक जलाशयावर गावातील स्त्रिया कपडे काढून अंघोळ करतात? आणि क्षणभर ते गृहीत धरलं तरी त्यांची वस्त्रं पळवून नेणा-याला लोकांनी काय केलं असतं ? अशा माणसाला लोकप्रियता मिळाली असती का ? त्या विद्वानांच्या मते राधा हे पात्रही कवींची कल्पना आहे. इंद्राला नैवेद्य देण्याऐवजी तो नैवेद्य आपल्या सर्वसामान्य गुराखी मित्रांना देणारा कृष्ण ही घटना कृष्णाची सर्वसमावेशकता दाखवून देते.या दृष्टिकोनातून डोक्याला साधा फेटा बांधलेला कृष्ण मी या चित्रात पहात होतो. कृष्णाची एका बाजूला देव अशी प्रतिमा निर्माण करायची आणि दुसरीकडे काही कथा त्याच्या नावावर खपवायच्या (ज्यातून त्याचे नकारात्मक चित्र डोळ्यासमोर उभे रहाते) या दोन्हीपेक्षा सर्वसामान्यांचा लाडका आणि बलिष्ठांच्या मुजोरीला भीक न घालणारा कृष्ण मला जवळचा वाटतो.

येताना पॅडिंग्टन रेल्वेस्टेशनवर उतरलो तर काही सुंदर संगीताचे स्वर कानावर पडले.

एका प्लॅटफॉर्मवर काही वादकांच्या वाद्यांतून संगीत सुरेल संगीत ऐकू येत होते. रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजे येणा-या जाणा-या रेल्वेगाडयांचा धडधडाट, मधूनच येणारे अनेक कर्णकर्कश आवाज, त्यात मिसळलेल्या निवेदकांच्या सूचना, रेल्वेतून सांडणारी माणसं, लोकांची धावपळ अशा बाबींपेक्षा हे वेगळंच होतं. आमची परतीची ट्रेन येईपर्यंत मी हे पहात होतो.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जजमेंटल… असावं की नसावं ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ जजमेंटल… असावं की नसावं ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

माझी एक बहीण परवा मला फोनवर बोलता बोलता म्हणाली, “आजकाल आपलं वागणं जजमेंटल आणि भोचकपणाचं वाटू नये म्हणून लोकं एकमेकांच्या आयुष्यात दखलच देईनासे झालेत रे. तुझ्या आयुष्यात तु कसं वागायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे इतपत जजमेंटल नसणं ठीक आहे. पण तुझा निर्णय एका चुकीच्या दिशेने जातोय हे मला माझ्या अनुभवांती माहिती असूनही तुला न रोखणं हा अलिप्ततेचा मूर्खपणा झाला….काही वेळा समोरच्या माणसाच्या आयुष्यात इन्टरफेअर करायला हवाच यार… व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली तो स्वैराचार करत असेल तर तो रोखण्यासाठी किंवा त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचं किंवा अन्य कुणाचं नुकसान होणार असेल तर ते रोखायला हवंच रे”…..

मला हे थोडंफार पटलंही….

एका अट्टल बेवड्या क्लिनरच्या प्रेमात पडून घर सोडून पळून जाणाऱ्या पाटलांच्या अनूला भर चौकात थोबाडीत ठेवून तिच्या घरी घेऊन येणारे बंड्याकाका जोगळेकर आठवतात….नवाथ्यांच्या सुनीलला चोरुन बिड्या फुंकताना रेड हॅन्ड पकडल्यावर “मेल्या तुझा बाप तिथे पूजा सांगून दक्षिणेवर दिवस ढकलतोय आणि तुला ही थेरं कशी सुचतात?” असं म्हणून त्याची खेटराने पूजा बांधणारे अण्णा जाधव आठवतात…. परिक्षेत नापास झालेल्या कल्पनाला पारावर बसून रडताना बघितल्यावर तिला चॉकलेट देऊन घरी आणून सोडणारे अप्पा बेंद्रे आठवतात,”दहावीतली पोर रे. भितीने जीवाचं काही बरंवाईट करेल असं वाटलं मला “असं म्हणाले….नलू जोशीचा घटस्फोट होतोय हे कळल्यावर हक्काने घरी जाऊन ताई जोश्यांना धीर देणाऱ्या कमलाबाई जगताप आठवतात…. “इंजिनिअर होऊन बेकार घरी बसण्यापेक्षा उद्यापासून वर्कशॉपमधे येत जा” असं बापूला हक्काने सांगणारे नाना गुप्ते आठवतात….

या माणसांना जजमेंटल न होणं, इतरांच्या आयुष्यात दखल न देणं वगैरे सोशल एटिकेट्स मॅनर्स खरंच माहीत नव्हते. त्यांनी घराभोवती आणि मनाभोवती कुंपणच आखली नव्हती. शेजारी मयत झाल्यावर चार जणांचा डबा आणि चहा आपोआप शेजारहून जात असे कारण मधे लौकिकार्थाने भिंती असल्या मनाला भिंती नव्हत्या…. आज धेडगुजरी संस्कृती सांभाळता सांभाळत आपण अर्धे भारतीय आणि सोयिस्कर पाश्चात्य कधी झालो ते समजलंही नाही….

माझी एक बहीण परवा मला फोनवर बोलता बोलता म्हणाली, “आजकाल आपलं वागणं जजमेंटल आणि भोचकपणाचं वाटू नये म्हणून लोकं एकमेकांच्या आयुष्यात दखलच देईनासे झालेत रे. तुझ्या आयुष्यात तु कसं वागायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे इतपत जजमेंटल नसणं ठीक आहे. पण तुझा निर्णय एका चुकीच्या दिशेने जातोय हे मला माझ्या अनुभवांती माहिती असूनही तुला न रोखणं हा अलिप्ततेचा मूर्खपणा झाला….काही वेळा समोरच्या माणसाच्या आयुष्यात इन्टरफेअर करायला हवाच यार… व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली तो स्वैराचार करत असेल तर तो रोखण्यासाठी किंवा त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचं किंवा अन्य कुणाचं नुकसान होणार असेल तर ते रोखायला हवंच रे”…..

मला हे थोडंफार पटलंही….

एका अट्टल बेवड्या क्लिनरच्या प्रेमात पडून घर सोडून पळून जाणाऱ्या पाटलांच्या अनूला भर चौकात थोबाडीत ठेवून तिच्या घरी घेऊन येणारे बंड्याकाका जोगळेकर आठवतात….नवाथ्यांच्या सुनीलला चोरुन बिड्या फुंकताना रेड हॅन्ड पकडल्यावर “मेल्या तुझा बाप तिथे पूजा सांगून दक्षिणेवर दिवस ढकलतोय आणि तुला ही थेरं कशी सुचतात?” असं म्हणून त्याची खेटराने पूजा बांधणारे अण्णा जाधव आठवतात…. परिक्षेत नापास झालेल्या कल्पनाला पारावर बसून रडताना बघितल्यावर तिला चॉकलेट देऊन घरी आणून सोडणारे अप्पा बेंद्रे आठवतात,”दहावीतीली पोर रे. भितीने जीवाचं काही बरंवाईट करेल असं वाटलं मला “असं म्हणाले….नलू जोशीचा घटस्फोट होतोय हे कळल्यावर हक्काने घरी जाऊन ताई जोश्यांना धीर देणाऱ्या कमलाबाई जगताप आठवतात…. “इंजिनिअर होऊन बेकार घरी बसण्यापेक्षा उद्यापासून वर्कशॉपमधे येत जा” असं बापूला हक्काने सांगणारे नाना गुप्ते आठवतात….

या माणसांना जजमेंटल न होणं, इतरांच्या आयुष्यात दखल न देणं वगैरे सोशल एटिकेट्स मॅनर्स खरंच माहीत नव्हते. त्यांनी घराभोवती आणि मनाभोवती कुंपणच आखली नव्हती. शेजारी मयत झाल्यावर चार जणांचा डबा आणि चहा आपोआप शेजारहून जात असे कारण मधे लौकिकार्थाने भिंती असल्या मनाला भिंती नव्हत्या…. आज धेडगुजरी संस्कृती सांभाळता सांभाळत आपण अर्धे भारतीय आणि सोयिस्कर पाश्चात्य कधी झालो ते समजलंही नाही….

लेखक – अज्ञात 

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कुटुंबातील सुसंवाद… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कुटुंबातील सुसंवाद… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“माझं अडलंय खेटरं!…मीच का म्हणून सारखं सारखं करायचं ? दादाला का सांगत नाही !”इति घरातलं कन्यारत्न.

“कारट्या दिवस आसरात्र गावभर उंडगत असतोस! घरात इकडची काडी तिकडे करत नाहीस!अभ्यासाच्या नावांने कायमची बोंबाबोंब..”इति घरातले बाबा. 

“मी म्हणून या घरात टिकले ! आणखी कुणी असती तरी केव्हाच हे घर सोडून गेली असती!तेव्हा कुठे कळली असती बायकोची किंमत!…”इति घरातली आई.

“अगं सुनबाई!आज घरात चहा अजून झाला नाही काय? माझ्या बीपीच्या गोळ्या राहिल्यात अजून घ्यायच्या! चहा मागितल्याशिवाय आपणहून कधीच नाही द्यायची बापडी! आम्हा म्हातार्‍यानचं नशीबचं फुटकं हो..म्हणून असली सून मिळाली..”इती घरातले आजोबा आजी( विशेषकरून तोंडाळ आजी)

“सरोजा वहिनी!आमची किल्ली तुमच्याकडे ठेवून देते बरं.त्या कामवालील्या दुपारी एव्हढी द्याल तेव्हढी. आणि केर भांडी स्वछ करून जा म्हणावं..”इति सखी शेजारीण.

“ वसंता ! नुसता पेपर डोळ्यासमोर धरून लोळत काय पडलास  ? आज अजून आंघोळ वगेरे आटपून कचेरीला कधी निघणार?”इती नातसुनबाई आपल्या पतीदेवांना…

आणी आणि आणि …या सारखे विविध विषयावरचे अगणित संवाद घरा घरात आणि दारा दारात घडत असतात. नवीन त्यात काय! घरोघरी त्याच मातीच्या चुली हो की नाही?बरे हे संवाद आजकालचे वाटत असले तरी फार पूर्वापार चालत आलेले आहेत.. हो आमच्या वेळी असं नव्हतं हे पालुपद मात्र त्यावेळी नसावं एव्हढाच काय तो फरक… पण पण संवाद घडत होते, होत होते,चालत होते. त्याशिवाय का घरं चालणार होत! कुटुंबाची जडणघडण होत वंश परंपरा पुढे पुढे गेली असणार ? जिथं कुटुंब तिथे संवाद आणि जिथे संवाद तिथे किमान दोन व्यक्ति तरी असायलाच हव्या.अपवाद मात्र आपुलाची वादु,संवादु आपुल्याशी करणारा तुर्‍याव्यवस्थेतला विरळाच कोणी…पण तिथे देखील तो संवाद आत्माचा परत्म्याशी चालेला असतोच…असो आपला तो विषय नाही.

वसुधैव कुटुंबकम अशी श्री ज्ञानदेवांनी या अखंड विश्वगोलालाच संबोधले आणि जो जे वांच्छील तो ते लाहो असे पसायदानात मागणे केले तेव्हा देखील संवाद अपेक्षित होताच..आत्म्याचे परत्म्याशी संवादरूपी बोलणं मग ते प्रत्यक्ष असो वा मौनातलं..अगणित कुटुंबानी मिळून होणारा समाज,अनेक समाज मिळून होणारे राज्य,राष्ट्र..आणि अशी अनेक राष्ट्रमिळून बनलेलं ते वसुधैव कुटुंबकमात जेव्हा सौहार्दपूर्ण सुसंवाद घडतो तेव्हा स्वर्गीय आनंद या भूमंडलावर अवतरलेला असतो.प्रेम,माया,आपुलकी,वात्सल्य,ममता,मैत्री,नातं गोतं…सारं सारं काही तिथे उपजत असत…अर्थात संवादाशिवाय या गोष्टीना जाणवता आले असते काय ?

एकाच घराच्या छताखाली अनेक नात्यागोत्याची माणसं एकत्र राहत होती,राहत असतात आणि पुढेही राहत असणार..अविभक्त कुटुंब पद्धती अस  याला म्हणतात.. यात पणजोबा,आजोबा,आजी (हयात असे धरून बरं)आई बाबा,काका काकू,मुले सुना,नातवंड,पतवंड,चुलत,मावस,लांबच्या नात्यातले जवळीकतेने राहणारे,अशी रक्ताची आपली म्हणवणारी घरची दारची असा नात्यांचा सोहळा असणारं घर…पाळण्यातल्या नवजात शिशु पासून ते नाबाद शतकीचे ज्येष्ठ वयोवृद्धा पर्यन्तची वेगवेगळ्या वयाच्या लहानथोरांनी गजबजलेले घर…अनेक शारीरिक वैशिष्ट्याने परिलुप्त असलेले.विविध स्वभावाच्या कंगोर्‍याने बनलेले,रंग रूपाने वेगळेपण जपणारी,आणि आणि उपजत मनुष्य स्वभावाला साजेशी असणारी…घरातल्या प्रत्येकाशी कस बोलत असतील,वागत असतील,आणि याचा सर्वाचा परिपाक त्या अवाढाव्य घरातून कसा प्रत्ययाला येत असेल..संवाद आहे तिथे वाद असणारच…घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडे लागणारच..हे तर ओघानेच येणार आहे. अहो हाताची पाच बोट कुठे एक सारखी असतात…हे  विश्वमान्य सत्य आहे ते नाकारून कसे चालेल नाही का?..त्या त्या घरा घरातले पूर्वापार चालत आलेली संस्कृती,परंपरा,घराणे चालीरिती…सर्व मागुन पुढे नेण्याच काम दर पिढी करत जाते..आदरयुक्त बोलणं ही त्यातली पहिली पायरी.गोड मृदु बोलणं दुसरी पायरी.ह्या दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात तिथे वादाला वावं नसतोच मुळी..अरे ला का रे भाषा आली की संवाद संपुष्टात येऊन वादाची ठिणगी पेटू लागते.हसरं खेळत्या घरातली शांती बिघडायला वेळ लागत नाही. मग अवमान, अपमान,अपमर्द,सारखे अविवेकी चरे त्या घराच्या आजवरीच्या अभेध्य भिंतीला हळूहळू चरे पाडून,घराला उधवस्त करू पाहतात..घराची शकलं  शकल होण्यास वेळ लागत नाही. मग वादाचा विषय कुठला असो त्याचा परिणाम असाच होणार असतो.मग पश्चात बुध्दिने काय मिळवले आणि काय गमावल याचा लेखाजोखा करण्यात काही मतलबही नसतो.मतलबींचे मनसुबे साध्य झाल्या सारखे वाटतीलही पण त्यासाठी त्यांनी अनमोल नात्यांची किंमत मोजलेली असते हे उशिराने लक्षात येते.तोवर परतीचे मार्ग बंद करून बसलेले असतात..केवळ सुसंवाद घडला नाही म्हणून..वयाने ज्येष्ठ असणारे अनुभवाने समृद्ध असतात.चार पावसाळे,उन्हाळे त्यांनी पचवलेले,सोसलेले असतात त्यांचा सल्ला योग्यरीत्या विचारात घेऊन पुढील वाटचाल केली तर,पुढच्यास ठेच मागचा शहाणा चा फार तर फायदाच होणार असतो.पण हे केव्हा तर त्यांच्याशी सुसंवाद असेल तर.त्यांच्या या उतार वयात त्यांची ममतेने,आपुलिकेने केलेली विचारपूस,शुश्रूषेला थोडा दिलेला वेळ या सुसंवादातून त्यांनी मनापासून दिलेले आर्शिवाद पुढील वाटचालीत मोलाचे ठरतात. जसे पेरावे तसे उगवते या न्यायाने आपले हे वर्तन आपल्या भविष्यातही सुखाचेच अनुभवाला येते.जी गोष्ट ज्येष्टांबाबत तीच वडीलधारी करत्यांबाबत असणे तितकेच गरजेचे ठरते. त्यांचे कष्ट,श्रम,अनमोल असतात.कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना होणारी त्यांची न दिसणारी दमछाक नजरेआड करण्याचा करंटेपणा करू नये.शक्यतो होता होईल तो आपला भार आपणच उचलण्याची मदत केली तर त्यांना किती हुरूप येईल.सुसंवादाची गरज इथे फार असते.अत्यंत संवेदनशील विषय पैसा,मिळकत,खर्च,या केंद्राभोवती घर फिरत असते. घरातल्या प्रत्येकाची आवड निवड,मागणी इथ पुरविली जाते.अर्थात काहींची कारणपरत्वे मागे राहते..मग रूसवे फुगवे यांचे कोंब उगवतात..उणिदुणी काढली जातात..विसंगतीचा पंचनामा चव्हाट्यावर येतो…संवाद संपतो नि वाद सुरू होतो..वाटण्या कोर्टाचे दार ठोठावतात.. प्रेम आपुलकिचा गळा घोटला जातो.. स्वार्थापुढे नाती गोती ,मैत्री गाडली जाते.. विषय संवादाने सामोपचारने मिटवता आला असता पण मनातले कटुतेचे  भिनलेले विष तस करू देत नाही…

जी गोष्ट घरातली पुरुषवर्गाची ती तशीच घरातल्या स्त्री वर्गाची एक पायरीने वरचढ ठरणारी. नव्याने येणार्‍या सूनबाईला सासुरवासेचा छळवाद हाच पहिला विसंवादाचा पाया पक्का करतो.कितीही सुशिक्षित घर असो सासू सुनेतला विस्तव एनकेन प्रकारे पेटता राहतोच.धुसफूस,माजघरातले हुंदके,स्वैपाक घरातली आदळआपट बोलू लागतो तेव्हा सुसंवादाची ऐशी की तैशी होऊन जाते..घरभर फिरणारा गृहलक्ष्मीचा हात,तिचा हसतमुख असणारा वावर घराला घरपण देणारं तिचे कष्ट सुसंवादाने घरात आनंद,सुख,शांती ओतप्रोत भरून बाहात असते. पण जर का विसंवाद झालाच तर अख्या घराची उधवस्त धर्मशाळाच झाली म्हणून समजा.मग नात कुठलही असो,जाऊ,ननंद,आत्या,मावशी,काकी,आजी,सगळे एथून तिथून सारखेच..घरकामापेक्षा वाटणीचीच अपेक्षा जास्त..लेकी बोले सुने लागे असल्यावर संवादाचे धिरडे होईल नाही तर काय ?

घरातले शेतातले गडीमाणसं यांच्याशी घरातल्या सगळ्यांनी साधलेला संवाद तर खूप काही सांगुन जातो.नोकर चाकर म्हणून हीन दिन लेखून जर बोलणं केल तर त्याना तरी मालकाच्या बद्दल आणि त्याच्या घराबद्दल जिव्हाळा कोठून बरे येणार.त्यांची विचारपूस,हवं नको,वेळ प्रसंगी मदतीचा हात पुढे केला तरच जिवाला जीव देणारी आणि माया लावणारी माणस कामाची जोडली जातात..केवळ ओठावर गोड बोलण ठेवल्यान…अर्थात काही वेळा कडक परकड शब्दात बोलणं असण हेही तितकेच महत्वाचे नाही तर आपली मुखदुर्बलतेने आपलाच घात झाल्याशिवाय राहायचा नाही.

कालपरत्वे छोटे कुटुंबाची संख्या वाढीस लागली आहे. यास कारणे जरी अनेक असली तरी कुटुंब आणि संवादाचा ढाचा तसाच राहिला आहे. आजकाल शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने घरातील करत्या स्त्री पुरूषांना घडयाळ्याच्या गतीहून जास्त जोरात धावावे लागत असल्याने सूर्य उगल्याबरोबर बाहेर पडून चंद्र उगवल्यावरच घरी येण होत असल्याने घरातील स्ंवादच संकोचला गेला आहे. नेहमीचे ताण तणाव,शारीरिक दगदग,यात उत्साह गळपटून गेला आहे. मानसिक थकवा यातून चार शब्द बोलायला उसंत नसतो. तिथे संवाद कुठे घडावा. लहान मूल असतील तर त्यांची फारच कुचंबणा होते. आई जेउ घालीना बाप भीक मागू देना..मग कुठे तरी वडयाच तेल वांग्यावर निघत. अभ्यास,हट्ट हा सामायिक विषय असतो. तू तू मै मै घरात नवरा बायकोत सुरू होते आणि शेजारी पाजारी गेलाबाजार मित्र,नाते वाईक याना फुकाचा डेलीसोप बघयाला मिळतो.शेवट विसंवादाने घर मोडते…वेळीच प्रेमाने,आपुलिकेने,कळकळीने जर चार गोडीने शब्द पुसले गेले जाते तर ही वेळ टाळता का आली नसती…

देवकृपेने सर्व प्राणीमात्रा मध्ये फक्त माणसालाच देवाने तोंड दिले आहे.. भाषा माणसाने तयार केली.आणि त्या द्वारे तो दुसर्‍याशी बोलू लागला..ऐकण आणि बोलण हा संवादाचा पाया आहे. दुसर्‍याच नीट शांतपणे ऐकुन घेण हेही जास्त महत्वाच आहे. तरच आपल्या बोलण्याला काही अर्थ राहील.या दोन घटकात बोलणं कस असावं तर ऐकत राहावं अस गोड,मृदु नि हस्ता खेळता प्रवाही संवाद असावा.जेव्हढे शस्त्राने घाव घातलेले जातात ते कालांतराने भरून निघतात तरी पण शब्द असे अस्त्र आहे की याच्या घावाची जखम कधीही भरून निघत नाही.माणूस जोडणारा संवाद हवा  माणूस तोडणारा विसंवाद टाळावा. सगळ्या गोष्टीला पैशयाने विकत घेता येत नाही त्यातला सुसंवाद करायला,घडावयाला दाम मोजायची गरज नाही.

अलिकडे  रंगीत भित्तीपत्रके समुपदेशाचे डोस पाजताना मुरकत सांगतात की कुटुंब म्हणजे मायेची पाखर…कुटुंब म्हणजे विश्वासाची झालर..कुटुंब म्हणजे घर असतं… जिवाभावाच मोल असतं…तिथेच नातं समृध्द असतं…तेच खर घर असतं…कुटुंब म्हणजे आशा असते जीवनाची दिशा असते…घर जिथे एकमेंकांच्या भावभावनांचा आदर असतो..ते घर ते कुटुंब मंदिर असतं…आणि आणि या सर्वाला सुसंवादाची मात्र गरज लागते…तर  आणि तरच हे शक्य होतं…

आता वरचं दिलेलं चित्र पाहिलंत ना.. हि दगडाची केवळ एक रचना आहे.. भावनेने एकत्र आलो तर कुटुंब… नाहीतर सगळे दगडचं…

“अहो! किती वेळ अजून तो लेख लिहीत बसणार आहात ? जेवणासाठी आम्ही सगळेच खोळंबुन बसलो आहोत ना ?गारढोण जेवण झालं तर मला बोलायचं नाही ?” स्वयंपाक घरातून सौ. कडाडली आहे.. तेव्हा मंडळी आता इथेच आवरतं घेतो…पण तुम्ही तिकडे लक्षं देऊ नका…आमच्या घरी मात्र हे रोजजचं असतं…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जी सरकार ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

🔅 विविधा 🔅

जी सरकार ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

कधीकधी मला इतका राग येतो ना की मला क्रांती कराविशी वाटते. बंडाळी, क्रांती, उठाव हे शब्द वामपंथीयांचे साहित्य वाचल्यामुळे डोक्यात भिनलेले. आता त्याशिवाय म्हणजे क्रांति शिवाय पर्याय नाही. बंड करावेच लागेल. उठाव करावाच लागेल. जुलूम सहन करता कामा नये. किती सहन करावं. सारखं तेच तेच अन्यायच अन्याय. मग एक दिवस असा उगवतो की कडेलोट होतोय असं वाटताना उद्रेकच होईल असं ठाम मत होतं. असा एकच दिवस नव्हे तर महिन्यातून एक दिवस उगवण्याचे ठरलेलेच व बहुतेक तो रविवारचाच दिवस असतो, ज्यादिवशी हक्काची सुट्टी असते व त्याला कारण आमचं सरकार!!

तसं आमचं सरकार अजबच म्हणायचं. (तसं म्हणण्याची हिम्मत होत नाही ही गोष्ट वेगळी!)  तर आमचं सरकार, आलं देवाजीच्या मना या धर्तीवर, चला आपण ही खोली साफ करूयाचं फर्मान सोडून मोकळं होतं. सरळ सरळ ब्रह्मांडच आठवतं. निम्मा दिवस तरी वाया जाईल याची अक्षरशः मनाची खात्रीच पटते. रविवार म्हटला की कसं, सकाळीस उशिरा उठणं, सावकाश दाढी उरकणं मग मनसोक्त शॉवर खाली आंघोळ, मग गरम गरम नाश्ता व हातात वर्तमानपत्र, वा मोबाईल, त्यातील व्हॉट्स एप व फेसबुक फ्रेंड्स, इन्स्टा, स्नॅपचेट, वाटच पहात असतात की हा गडी कधी ऑनलाईन होतो. यापरतं परमसुख नाही. थोडं…. . फार इकडे तिकडे सर्फिंग केलं की रविवार मजेत जाणार याची ग्यारंटी! पण कधीकधी तसं घडायचं नसतं!

बायको एका हातात झाडू, दुसऱ्या हातात खराटा, काखेत वरची जळमटं काढायला लांब काठीला बांधलेला झाडू, तीन चार बादल्या पाण्याने भरलेल्या,  हिपोलीनच्या पुड्या, ओली फडकी, कोरडी फडकी, जय्यत तयारी करून समोर उभी ठाकलेली. मग मनातले मांडे बाजूस सारून आपसूकच उभं होणं आलं. हिचं आपलं ओठातल्या ओठात पण खरमरीत पुटपुटणं चालूच असतं, “ नाही तरी तुम्हाला कामाचा कंटाळाच तेवढा. हातातून मोबाईल खाली ठेवता ठेववत नाही.”   मी आपला तिच्या वाक् बाणांकडे कानाडोळा करत होतो. पण खरं सांगू का? ते क्रांती, बंड, उठाव यांचं अवसान गळूनच पडलं होतं. बघता बघता कपाटं रिकामी होत असलेली, खिडकीचे पडदे काढणं, भिंतींवरचे फोटोफ्रेम, काय काय ते खोलीच्या मधोमध माझ्या उंचीचे ढीगच ढीग. शिवाय शेजारी मोठालं स्टुल ठेवलेलं. त्यावर मलाच चढणं भाग होतं. पंखा, ट्युबलाईट पुसायला.  अडगळीची खोली, पोटमाळा असला की त्या स्टुलावरून एकदा चढणं झालं की मोहीम फत्ते झाल्याशिवाय उतरणं होत नसे.

“ एकेक वस्तु द्या बरं पुसून, अगोदर कोरड्या फडक्याने मग  ओल्याने. ” मी म्हटलं, “ हुकूम सरकार! ” हे झालं का? ते झालं का? हे इथे नका ठेवू, ते तिथे बरं दिसेल. पुढे सरकवाना पुढे. ते तेवढं बाजूला ठेवा. मग मोलकरीणला देऊ, भंगारात काढू, अहो हे माझ्या मावशीची चुलत भाची हे केव्हापासून मागत होती. तिच्यासाठी राखून ठेऊ. ती इतक्या वेगाने ती निर्णय घेत होती की मला काय मत द्यावं ते उमजत नव्हतं. मग तिने एकेक बॉक्स काढायला घेतले, तसं माझं पित्त खवळलं, “ अगं त्यात वर्तमानपत्रात व मासिकांत आलेले माझे लेख आहेत. ती अडगळ नाहीये, पाहिजे तर पुसून देतो पण ते बॉक्स जसेच्या तसे परत ठेव. ” यावर “कोण वाचतंय इतकं सगळं? नुसती जागा अडून राहिलीय.” कुणीतरी गरम शिसं कानात ओततंयची फिलींग आली बुवा. पण मग मी निक्षून सांगितलं. “त्याला हात लावू नको, पाहिजे तर दुसरं कपाट आणून देईन मी!” मग ते तेवढ्यावर निभावलं.

बारा वाजले तरी पसारा आ वासून डोळ्यापुढे! म्हटलं, “ ए बये, तू आणखी नको करू उचकपाचक, नाहीतर ह्यातच संध्याकाळ व्हायची. ”  तिनं उलट उत्तर दिलं, “ तुम्हीच पटापट हात चालवा बघू. आवराआवर करायला वेळ लागत नाही. ” मी कपाळाला हात लावला. हिच्या समोर कोणतीही संथा चालत नाही. आलिया भोगासी म्हणत(अर्थात मनातल्या मनात!) एकेक वस्तूंवरून हात फिरवू लागलो. तिचा चेहेरा सगळं मनासारखं होत असल्याचं सांगून जात होता.

झालं एकदाचं आवरून. माझं तर तसं कंबरडंच मोडलेलं. तरीही हुश्श, साहीसुट्ट्यो असं सवयीने मनातल्या मनात म्हणून घेतलं. तिचं बारीकसारीक सामान इथे तिथे लावणं चालूच होतं. तेही एकदाचं आटपलं, मग माझ्यासमोर जितंमयाच्या आवेशात पहात ती बोलली, “आता कसं दिसतंय सगळं?” अनाहूतपणे मी बोलून गेलो, “काही फरक पडलेला नाही, जसंच्या तसंच तर आहे सगळं!” हे ऐकल्या बरोबर तिचं मुसमुसणंच सुरू झालं. बाकी एकदम शांतता पसरली. मी किती घोर अपराध केलाय याची प्रचंड जणीव मला झाली. अचानक तिला वाचा फुटली, “ तुम्हाला तर माझी किंमतच नाही. कितीही कष्ट करा, मर मर मरा,  राब राब राबा, सगळं पालथ्या घड्यावर पाणीच. ” आता घड्याच्या जागी मीच मला दिसू लागलो व अंगावरून गार पाणी वाहत असल्याचा भास झाला. तेव्हा लक्षात आलं, दोघांच्या आंघोळी लटकलेल्या. तसं मी तिला जवळ घेत म्हटलं, “ नाही गं, तुला छानच जमतं सगळं यथास्थित लावणं. जशी तू देखणी तशी तुझी ही खोली.  चल, आज तसा उशीरच झालाय, तू सैंपाक करण्याच्या भानगडीत पडू नकोस, बाहेरच जेवू!!” मी अंदाज घेऊ लागलो. माझ्या शब्दांचा परिणाम होत असलेला. तिचं मुसमुसणं थांबलं. म्हणाली, “तसं आपण दोघेही दमलोय तेव्हा तू म्हणतोस तसंच करू. मी आंघोळ करून येते. तोपर्यंत….” तिने चक्क  मोबाईल माझ्या हाती दिला. अन् मी खरडू लागलो.   अजून लेख लिहून पूर्ण होत नाही तो बाथरूममधून हाक आली, हाक कसली दमदार आवाजातला आदेशच. “आंघोळ करून घ्या बघू! अन् तो मोबाईल ठेवा खाली!!” मी लगेच म्हटलं, “जी, सरकार….”

© डॉ. जयंत गुजराती

१०/१२/२०२३

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – मी गतीचे गीत गाई— ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

 

☆ – मी गतीचे गीत गाई— – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

श्रद्धेय बाबा आमटे आणि संपूर्ण परिवाराचं कार्य अतुलनीय आहे. जिद्दीचा अंगार पेटवलेल्या बाबांनी वंचितांच्या सुखदुःखाशी, आंतरिक वेदनेनं जोडलं जात असताना, खडकाळ, ओसाड, जमिनीतून आनंदवन नावाचं नंदनवन फुलवलं. यात तपस्वीनी साधना ताईंचे हात बळकट तर होतेच.त्यांची पुढली पिढीही… सर्व आदरणीय.. डॉ. विकासदादा, डॉ. भारतीताई तसंच, डॉ. प्रकाशदादा, डॉ. मंदाताई आणि त्यापुढील पिढीही आनंदाने या कार्यात सामील झाली, हे ईश्वराने मानवाला दिलेलं वरदानच आहे!

विकासदादा आणि या कुणाच्याही बाबतीत त्यांच्या कार्याचा गौरव करणं ,म्हणजे सूर्याला पणती दाखवणे होय! या गौरव ग्रंथात प्रत्येकाने त्याबद्दल लिहिले आहेच! त्यामुळे मी आज विकासदादांबद्दल  एक छोटीशी, पण अविस्मरणीय आठवण सांगणार आहे.

साधारण १५ एक वर्षांपूर्वी, ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात विकास दादांचा ‘स्वरानंदवन’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मी स्वतः गाडी चालवत दादरहून ठाण्याला  गेले होते.

कार्यक्रम अतिशय रंगला. विकासदादांसह सर्वच जण एकसे एक सुंदर गायले. आश्चर्याने तोंडात बोटे घालावी असे प्रत्येक जण सहजसुंदर गात होते. त्यांचं दैवी गाणं ऐकल्यावर त्यांना ‘differently abled’ कोण म्हणणार? विकासदादांनी संगीताच्या क्षेत्रातही, ही अजोड अशीच कामगिरी केलीय!

विकासदादा स्वतः ही खूप सुंदर गायले. सर्वांचंच मला खूप कौतुक वाटत होतं. ते पाहून  त्यांनी मला थोडं गायला आणि भाषण करायलाही सांगितलं.

कार्यक्रम संपल्यानंतर विकासदादांना माझ्या घरी शिवाजी पार्कला, नव्या घरी येऊन , पायधूळ झाडण्याची मी विनंती केली. सुनीलनेही फोन करून अगत्याने घरी यायचे निमंत्रण दिले. कुठेही आढेवेढे न घेता ते सहजतेनं ‘हो’ म्हणाले आणि माझ्या गाडीत बसले. त्या क्षणी मला काय धन्य धन्य वाटले म्हणून सांगू!

आधीच सर्वांच्या गाठीभेटी घेत उशीर झाला होता. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गाडी झूम झूम मजेत हाकली. विकासदादांनीही मोकळ्या रस्त्यावर “पद्मजा, काय सुसाट चालवतेस” म्हणून कौतुक केले. पण काय झाले कोण जाणे! गाडी सायनजवळ आली आणि अचानक बंद पडली! त्या मिट्ट अंधारात रस्त्यावर कोणीही मदतीसाठी दिसेना.मोठी पंचाईत झाली ! इतक्या महान व्यक्तीला मी आदराने गाडीत बसवले खरे, पण कधीही बंद न पडणारी गाडी बंद पडली…. आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधेरीच आली!

इतक्यात विकासदादा गाडीतून उतरले आणि, “पद्मजा, काही काळजी करू नकोस,” असं म्हणत त्यांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. मी गचके देत गाडी सुरू केली… परत गाडी बंद…

परत धक्का देणे…असे करत करत पाचव्या मिनिटाला गाडी सुरू झाली, आणि आम्ही सुखरुप घरी आलो.

सुनील वाट पाहतच होता. मी विकासदादांचं  औक्षण केलं. त्यांनी माझ्या घरी पायधूळ झाडल्याने, माझं घर आनंदाने न्हाऊन निघालं ! त्याआधी त्यांना गाडीसाठीही पायधूळ झाडावी लागली याची मला खंत आणि लाजही वाटत होती. परंतु त्रासाचा, कटकटीचा किंवा क्लेषाचा लवलेशही विकास दादांच्या चेहर्‍यावर नव्हता. कित्ती सहजपणाचे हे वागणे !

बाबांसारख्या महान योगी, तपस्व्याचे कार्य पुढे नेणाऱ्या, त्यांच्या आणि साधनाताईंच्या मुशीत घडलेल्या या अत्यंत साध्या, निगर्वी आणि कर्तृत्ववान अशा विकासदादांचे औक्षण करताना बाबांच्याच ओळी मला आठवत होत्या…

शृंखला पायी असू दे

मी गतीचे गीत गाई…

दुःख उधळायास आता

आसवांना वेळ नाही….

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फ्रान्सच्या भूमीवरच्या भारतीय पावलांचं मराठी नेतृत्व ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ फ्रान्सच्या भूमीवरच्या भारतीय पावलांचं मराठी नेतृत्व ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

भारतीय प्रमाणवेळ फ्रान्सपेक्षा साडेतीन तासांनी पुढे आहे. उद्या अर्थात शुक्रवार, दिनांक १४ जुलै, २०२३ रोजी फ्रान्समध्ये सकाळचे दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटे होतील, त्याच क्षणी एका मराठमोळ्या योद्ध्याचा भरभक्कम आवाज घुमेल आणि आसमंत थरारून उठेल! 

त्याच्या एका आज्ञेसरशी एकशे चोपन्न पावलं तिथल्या लष्करी संचलन पथावर आपल्या मजबूत पावलांचा पदरव करीत मोठ्या डौलाने चालू लागतील ! त्यांच्या पुढे असतील महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन अमन हनुमानराव जगताप…. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला वीर योद्धा ! 

फ्रान्समध्ये भारतीय सैनिकांची पडलेली ही काही पहिली पावलं नसतील. दोन्ही महायुद्धांमध्ये भारतीय सैनिक दोस्तसैन्याच्या बाजूने लढले आणि हजारोंच्या संख्येने धारातीर्थीही पडलेत! पहिल्या महायुद्धाने एक लाख तीस हजार भारतीय सैनिकांपैकी सुमारे चौऱ्याहत्तर वीरांचा बळी घेतला तर सदुसष्ट हजार योद्ध्यांना अपंगत्व पत्करावे लागले. दुसऱ्या महायुद्धातून तर तब्बल सत्त्याऐंशी हजार सैनिक माघारी परतले नाहीत! 

या युद्धांची कारणे, परिणाम काहीही असली, शत्रू-मित्र देश कोणतेही असले तरी, या युद्धयज्ञात एक लाख एक्केचाळीस हजार भारतीयांनी बलिदान दिले आहे, हा इतिहास आहे. यात पंजाबी वीरांची संख्या सर्वाधिक, अर्थात सुमारे त्र्याऐंशी हजार भरते. कणखर मनाच्या पंजाबी देहांतल्या रक्तात परंपरेने वहात असलेलं सैनिकी रक्त आज आपल्या स्वतंत्र भारताचे एक मोठे बलस्थान आहे!  

राष्ट्रगीताच्या पहिल्याच ओळीत आधी पंजाब आणि अखेरीस मराठा हे शब्द येतात, हा एक योगायोग खचितच नसावा! 

फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासात चौदा जुलै हा दिवस एक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि फ्रान्स देश या दिवसाच्या स्मृती तेथील जनमानसात कायम रहाव्यात म्हणून या दिवशी खास लष्करी पथसंचलनाचे आयोजन करतो.

आपला भारत आणि फ्रान्स यांचं लष्करी नातं तसं खूप जुनं असलं तरी गेल्या पंचवीस वर्षांत या संबंधांना उत्तम भक्कम परिमाण लाभले आहे. राफेल विमानांनी आपल्या वायूदलाला अधिक बळ प्राप्त झालेले आहे. जागतिक राजकारणातही फ्रान्स आपला मित्रदेश आहे. 

भारत-फ्रान्स लष्करी सहकार्याचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याचं निमित्त साधून फ्रान्सने भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. याच बरोबर भारताच्या तिन्ही सेनादलांची प्रत्येकी एक तुकडी या पथसंचलानात सहभागी होत आहे. राजपुताना रायफल्सचा वाद्यवृंदही आमंत्रित केला गेला आहे. 

भारताचे लष्करी सामर्थ्य, सैनिकांचा रुबाब जगाला दाखवण्याची ही संधी साधणं हेही खूप महत्त्वाचं आहे. या दृष्टीने हा समारंभ साऱ्या भारतासाठी महत्त्वाचा ठरावा! 

यातील वायूदलाच्या संचलनाचे नेतृत्व एक महिलेच्या हाती असणार आहे… स्क्वाड्रन लीडर सिंधु रेड्डी हे त्यांचं नाव. तर भारतीय आरमाराचं प्रतिनिधित्व कमांडर व्रत बघेल करणार आहेत. 

पंजाब रेजिमेंटचं राष्ट्रीय दिनांवेळचे राजपथावरील संचलन हे अतिशय नयनरम्य अभिमानास्पद वाटावे असेच असते. फ्रान्स मध्ये ‘बॅस्टील डे परेड’वेळी आपल्या भारतीय पायदळाचे प्रतिनिधित्व पंजाब रेजिमेंट करणार आहे. प्रजासत्ताक दिन संचलनात या रेजिमेंटने २०१८ मध्ये आणि २०२३ मध्ये उत्कृष्ट पथकाचं पारितोषिक पटकावले आहे. यातील २०२३ च्या संचलनाचे नेतृत्व केले होते कॅप्टन अमन हनुमानराव जगताप यांनी!

अर्थातच फ्रान्स मधली ही जबाबदारीही या आपल्या कॅप्टन साहेबांच्या खांद्यांवर आहे आणि ते ती उत्कृष्टपणे निभावतील यात शंकाच नाही.

फ्रान्स मधील संचलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर काही वृत्तपत्रांनी कॅप्टन साहेबांविषयी (विशेषत: दै.सकाळ, पुणे) माहिती प्रसिद्ध केली होतीच. पण त्याच्या आधी काही वर्षांपूर्वी स्वत: कॅप्टन अमन साहेबांनी स्वत:चा एक छोटा जीवनपट एका युट्यूब विडीओच्या माध्यमातून प्रसारीत केला आहे. हा विडीओ खूप प्रेरणादायी आहे. त्यात बालक अमन हे लष्करी गणवेशात सल्यूट करताना दिसतात एका छायाचित्रात. बालपणीचा त्यांचा देशसेवेचा ध्यास आज एका अभिमानास्पद वळणावर येऊन ठेपला आहे. 

पुण्यात जन्मलेल्या आणि नगरमध्ये शिक्षण घेतलेल्या कॅप्टन अमन हनुमानराव जगताप साहेबांनी अगदी ठरवून आपले लष्करी जीवन घडवले आहे. राजपथ संचलन हे एका अर्थाने त्यांच्या खूप आवडीचं आणि सवयीचं बनलं आहे, असेच आढळते.

एन.सी.सी. मध्ये विद्यार्थी कडेट असताना दिल्लीच्या राजपथावर एन.सी.सी. पथकाच्या पथसंचलनाचे नेतृत्व अमन साहेबांकडेच होते आणि त्यावर्षी त्याच पथकाला प्रथम क्रमांक मिळाला होता! पुढे सैन्यात भरती झाल्यावर त्यांची नेमणूक पंजाब रेजिमेंटमध्ये झाल्यावर त्यांनी संचलनाचे नेतृत्व करावे, हे जणू ओघाने आलेच! त्यांची शिस्त, पथसंचलनातील जोश, रूबाब, अचूकता, सहकाऱ्यांवर असलेला विश्वास आणि नियंत्रण, त्यात अत्यंत रुबाबदार पंजाबी सैनिक, या गोष्टींमुळे त्यांच्या पथकाला सर्वश्रेष्ठ स्थान न मिळते तरच नवल! 

चौदा जुलैच्या पथ संचलनात भारताच्या पायदळाच्या संचलन पथकाच्या अग्रभागी अत्यंत अभिमानाने आणि रुबाबाने चालत नेतृत्व करणाऱ्या या मराठमोळ्या मर्दाला पाहताना प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेलच! 

कॅप्टन साहेब, आपल्याला शुभेच्छा ! जयहिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझा संसार व मी …… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ माझा संसार व मी …… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

माझ्या लग्नानंतर मला कळलेल्या व पटलेल्या आणि मनाला भिडलेल्या, बऱ्याच गोष्टी या लेखात मला वाचण्यास मिळाल्या, पहा वाचा तुम्हालाही कदाचित पटतील व विचार करण्यास भाग पाडतील…

संसार काय असतो हे नेमक्या आणि मोजक्या शब्दात येथे मांडलंय

कागदावर जुळलेली पत्रिका

आणि

काळजावर जुळलेली पत्रिका 

यात नेहेमीच अंतर राहतं…

 

लाखो मनांच्या 

समुद्रातून योगायोगाने 

२ मनं अगदी एकमेकांसारखी 

समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, 

हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.

 

वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे 

असतीलच कसे?

 

सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं 

हीच तर नियतीची जुनी हौस आहे.

 

सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. 

या न देण्याचंच ‘देणं’ 

स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.

 

निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर 

तुला मिळणारा ‘जीवन साथीदार’ अगदी तुला हवा तसा 

असणार कसा?. 

त्याचे – आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. 

त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, 

त्याचं माणूस म्हणून 

वेगळेपण आहे, 

हे मान्य करणार असाल 

तरच संसारात पाऊल टाकावं.

 

अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.

 

कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. 

बघण्याच्या समारंभात 

गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, 

श्रद्धा-अंधश्रद्धा असे 

तेलकट प्रश्न विचारा..  

या प्रश्नांची उत्तरं ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या 

सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.

 

लग्नानंतर मग 

खरं काय ते एकमेकांना कळत जातं. 

 

तेव्हा म्हणाली होती …. ‘वाचनाचा छंद आहे’ 

पण नंतर साधं वर्तमानपत्र 

एकदाही उघडलं नाही बयेनं…

जाब विचारू शकतो आपण?

किंवा

 तो म्हणाला होता – ‘प्रवासाची आवड आहे; 

जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं – असं स्वप्न आहे!’

पण

प्रत्यक्षात कळतं; 

कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.

जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं…

 

प्रवासाची आवड कसली?

कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब… 

वर्षभर सांगतेय .. माथेरानला जाऊ 

तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतो…

 

कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे.

उरलेले न जुळलेले ४ कुठले 

ते कळले असते तर…

 

मनापासून सांगतो,

त्या न जुळलेल्या गुणांशीच 

खरं तर लग्न होत असतं आपलं.

 

तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, 

तीच व्यक्ती टिकली…

 नाही जमलं की विस्कटली.

 

अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला… 

पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन, 

नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता  दोघांमध्ये हवी.

 

पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना सांगितलंच जात नाहीये;

 

आपल्याला ‘हवी तशी’ व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; 

पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं 

हेच खरं वास्तव आहे.

 

धुमसत राहणाऱ्या राखेत

 कसली फुलं फुलणार ?..

 

एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, 

ते मी स्वीकारणार आहे का?-

या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी देऊन 

मगच संसार मांडायला हवा.

 

आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं 

… हे या वाटेवरच पाहिलं पाऊल…

 

ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की मग … 

इतर सहा पावलं सहज पडत जातात.. 

आणि मग ती “सप्तपदी” – “तप्तपदी” होत नाही..

हेच संसाराचं खरं मर्म आहे.

हरीॐ

“मेड फॉर इच अदर” आपोआप होत नाहीत…. 

… होत जातात…

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares