मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ते सतरा दिवस – भाग -2 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

? इंद्रधनुष्य ?

☆ ते सतरा दिवस… – भाग-2 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

(निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला, जय हो !!) — इथून पुढे 

आजचा तिसरा दिवस, बहात्तर तास उलटून गेलेले बाहेरचं जग पाहून. विजेची लाईन शाबूत असल्याने त्या उजेडात एकमेकांना पाहू तरी शकत होतो. पाण्याच्या बाटल्या, रेशनिंगचं धान्य संपत आलेले.  हेल्मेटमधे तांदूळ शिजवून गिळत असलेलो. काही ठिकाणी डोंगरातून पाणी ठिबकत असलेलं. तिथेही हेल्मेट उपडी ठेवलेली. ते काही वेळानं जुजबी भरत असे. सुकलेला गळा ओला करायला तेवढंसं पुरे. पण ..  पण हे असं किती दिवस? हा यक्षप्रश्न आ वासून उभा ठाकलेलाच. नुकतंच थोडंफार पोटात ढकलून आडवं पडणं झालं, डोळे पेंगुळत असलेले…. 

… तेवढ्यात सरसर आवाज आला. वाटलं जनावर वगैरे काही आलं की काय? आवाजाच्या रोखानं मोबाईलची बॅटरी रोखली तर काय सहा इंची पाईप बोगद्यात तोंड उघडत असलेला. त्यातून पाठोपाठ अनोळखी आवाज येत असलेला. ” कैसे हो सब लोग?” बोगद्यातील सर्वजण चित्कारलेच. “ ठीक है भैया, कैसे तो भी गुजारा कर रहै है. हमें यहां से निकालो जल्दी.”  आमचा आवाज ऐकून बाहेर एकच गलका झाला असावा. लगेच, “ डरो मत, हम कोशिश कर रहे हैं. जल्दही आप निकल पाओगे. धैर्य रखना, बौखनाग की कृपा से सब बाहर आओगे.” सर्वांना आठवलं, मागच्याच आठवड्यात तर बौखनागचं मंदिर पाडलं होतं. तोच कोपला असेल. सर्वांनी हात जोडून त्याचा धावा सुरू केला. त्या सहा इंची पाईपमधून पाण्याच्या बाटल्या यायला लागल्या. मग बिस्कीटांचे पुडे, ड्रायफ्रूटचे पॅकेट्स, फळं. चला, निदान शिदोरी वाढत असलेली पाहून सर्वांचे डोळे चमकले. त्या खाऊपेक्षाही बाहेरच्या जगाशी संपर्क होत असलेला पाहून हायसं वाटलं. त्यातून येणारा आवाज तर वॉकीटॉकीपेक्षाही स्पष्ट होता. 

नियमित खुराक मिळण्याची सोय तर झाली. गोळ्या औषधंही आली पाईपमधून. सगळ्यांचं मनोबल वाढावं म्हणून मनोचिकित्सक ही हजर पाईपच्या दुसऱ्या टोकाला. तितकंच बरं वाटलं. थोडंफार निर्धास्त होता आलं. कुणीतरी आपल्यासाठी धडपडतंय ही जाणीव सुखावहच. आणखीन दोन दिवसांनी तर घरच्यांचा आवाज पाईपमधून. कोळशाच्या खोलीत कोंडणारी आई  गलबलून हुंदका देत बोलत होती, 

“बबुआ कैसन बा?” कोळशाच्या खोलीत रमणारा बबुआ हमसून हमसून रडत बोलत होता, “ ठीक हूं मैय्या, फीकर मत करना, टेम से तू खाना खा लेना. ” सर्वांचेच डोळे पाणावले. 

दहाएक दिवसांनी गरम गरम जेवण मिळू लागले. छोले, पराठे अन् खिचडी.  शीख बांधवांनी लंगर चालू केलंय वाटतं. वाहे गुरू त्यांचं भलं करो. रोज चिणल्या गेलेल्या भिंतीतून मोठाले पाईप टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे हे बातम्यांसारखं सांगितलं जायचं. मधेच अडथळे यायचे. काम थांबवावं लागायचं. प्रगती खुंटायची. काहीच कळायचं नाही. बाहेर तरी निघू की नाही ही साशंकता. मग इतके दिवस नेहेमी सोबतीला असणारे, एकमेकांचेच चेहरे पाहून कंटाळलेलो, एकमेकांवरच चिडचिड करू लागलो. काहींनी तर त्रागाही केला. इंजिनीयर साहेबांनी मग वेगवेगळे खेळ खेळण्याची टूम काढली. काहींचे मोबाईल अजूनही चालू, त्यांनी मोबाईलवरच लुडो खेळायला सुरुवात केली. इंजिनीयर साहेबांनी मग मोजकेच चार्जर मागवून घेतले. चार्ज केल्यावर फोन तर लागत नव्हते, पण त्यातील खेळ व जुने मेसेजेस वाचून, दिवस वा रात्र ते काहीच कळत नव्हतं, तरीही पण ढकलत होतो.  सगळेच्या सगळे काही मोबाईल वेडे नव्हते.  मग काहींनी दगडावर रेघोट्या ओढून चल्लस खेळायला सुरुवात केली.  काही दगडी चेंडूने क्रिकेट खेळायला लागले, बोगद्याच्या भिंतीवरच स्टम्प्स उगवले. एकाने चार पाच गोल दगड  एका पाठोपाठ वर फेकत जगलर्स स्कील ही दाखवले. काहींनी गाणी म्हणायला सुरुवात केली. त्यात बंगाल्यांनी तर कहरच केला. अगोदर ऐकायला गोड वाटलं, पण किती गावं? सारखं तेच तेच कानी यायला लागलं, आमार शोनार बांग्ला आणि बाऊल गीति, काय काय ते. सगळ्यांचे कान किटले.  फिल्मी गाण्यांची अंताक्षरीही काही काळ चालली मग त्याचाही वीट आला.  

कितीही मन रमवण्याचा प्रयत्न करत असलो तरीही मोकळ्या वातावरणाची आस प्रत्येकाच्या मनात. जसजसा वेळ सरकत होता तसे बोगद्याच्या भिंती खायला उठतात की काय? वाटायचे. एकमेकांना धीर देणं तर चालूच होतं, पण बोगद्यामधला मुक्काम लांबतच चाललेला. घरच्या माणसांची ओढही बळावत चाललेली.  कधी त्यांची गळाभेट घेऊ असं होऊन गेलेलं. उद्या सकाळपर्यंत बाहेर निघणार, अगदी चार पाच तासच उरलेत म्हणता म्हणता विघ्न समोर ठाकल्याचंही कानी यायचं. मशिन बिघडलं, बंद पडलं. अडकून पडलं. दोन दिवस अधिक लागतील.  ऐकून ऐकून कान विटले. देवाचा धावा तर सारखा चालूच होता. नवसाचंही बोलून झालं होतं. मधेच दिवाळी होऊन गेल्याचं कळलं. बाहेरच्या जगात सगळ्यांसाठी दिवाळी होती. बोगद्यात व मनात तर अंधारच अंधार दाटलेला. 

थोडक्यावर अडून पडलंय. नवीन खुदाई सुरू झालीय. काही हाताचेच अंतर बाकी आता. इंजिनीयर साहेबही तांत्रिक भाषेत बोलत होते. बाकी सगळे कधी शिळा उघडते, सीम सीम खुलजाच्या धर्तीवर याची प्राण कंठाशी आणून वाट पहात होते. काहीही करत नसले तरी सगळे दमूनभागून पेंगुळलेल्या डोळ्यांनी निपचित पडले होते. तेवढ्यात धपकन् काही पडल्याचा आवाज आला, पाठोपाठ खणन् खणन्  व लगेच कटरचा चिरपरिचित आवाज येऊ लागला.  तो आवाज पहिल्यांदाच मंजुळ नादमय वाटला. सर्वांचे डोळे बंद झालेल्या बोगद्याच्या मुखावर. त्याला चिरे पडू लागले. मोठमोठाले घाव हातोड्याचे व मग भगदाडच पडले एकदम. सरसर पाईप सरकत आत आला.  त्यातून नवा चेहरा व नवा उजेडही आत आला. सगळ्यांनी आरोळी दिली, जय हो !! तो आवाज बोगदाभर घुमला. धुळीने माखलेल्या चेहेऱ्यांवर आनंद पसरला. कुणी नाचू लागले, कुणाला अश्रू आवरेना. बौखनाग बाबांचा जयघोष केला गेला. आता खरी दिवाळी साजरी होईल याची खात्री पटली.  शेवटी एकदाचे गिळू पाहणाऱ्या बोगद्याच्या कराल जबड्यातून बाहेर येत मोकळा श्वास घेतला. हुश्श ! एक दुःस्वप्न विरलं !! 

– समाप्त – 

© डॉ. जयंत गुजराती

२९/११/२०२३

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

हल्ली एक बदल अगदी ठळकपणे दिसून येतो. पूर्वी कुठल्याही सणा – समारंभाला माणसे जमली की एकमेकांना भेटत असत. गप्पा तर संपता संपत नसत. कार्यक्रमस्थळी म्हणजे घरामध्ये, मंडपामध्ये, कार्यालयामध्ये एखादे कुटुंब शिरले की त्याचे सहजपणे विभाजन होऊन पुरुष मंडळी पुरुष गटात, स्त्रिया त्यांच्या गटात तर लहान मुले इतर मुलांमध्ये झटकन मिसळून जात असत. पुरुष पानसुपारीच्या तबकाभोवती किंवा एखाद्याची चंची उघडून गप्पाष्टक सुरु होत.कुठलेही खेळणे उपलब्ध नसताना मुलांचा धुडगूस सुरु होत असे. तमाम स्त्रियांच्या वनितावृंदाचा खास एपिसोड सुरु होई. त्यावेळीही एकमेकांत मानापमान,हेवेदावे, रुसवेफुगवे,वितुष्ट,असूया, धुसफूस, अबोला असायचा,पण तो ठराविक मर्यादेपर्यंत. मुलांचे एकमेकांना चिडवणे, बोचकारणे असायचे. तरीदेखील यासर्व गोष्टींच्या अस्तित्वासह माणसं एकमेकांना भेटत होती, एकमेकांकडे जात होती, बोलत होती.हे सारे अगदी बळवंतराव, सदुकाका, दामुअण्णा, अनुसूयाकाकू, गंगामावशी, सिंधूआत्या, बंड्या, चिंगी, चंदू यांच्यापासून ते अगदी वसंतराव, विश्वासराव, मालती, उषा, मोहन, किशोर यांच्यापर्यंत व्यवस्थित चालू होतं !

आता मात्र बदल इतका झालाय की लोकांचा एकमेकांशी संवाद जवळजवळ बंदच झाला आहे. हल्ली घरांमध्ये होणारे छोटेखानी समारंभ बंद झाले आहेत. मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात. त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले. मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात मग लगेचच स्क्रीनमग्न होतात. समारंभ कसला आहे, कोण कोण आलंय, काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी माणसं मोबाईलमध्ये व्यस्त होतात. हा ‘ शब्देवीण संवादु ‘ संपला की थोडंसं जुजबी बोलायचे… ‘ अरे आहेस कुठे हल्ली तू ? काय नवीन विशेष? US ला गेला होतास ना तू? ‘ ‘ काय ग किती बारीक झालीस, ड्रेस काय मस्त आहे, तुझी मुलगी काय क्यूट दिसते, मुलगा काय ICSE ला ना,’ ..  असले औपचारिक संवाद घडतात. तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवादसुद्धा थांबतो. कुणी आपणहून कुणाशी बोलतच नाही. प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की ” तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो ” ! बरं, हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं ” हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक “!…… हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालय आपल्याला ? का आपण हल्ली इतके तुसडेपणाने वागतो ?

मला त्याची कांही कारणे अशी वाटतात. माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे. सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती, पैशांचे पाठबळ, मनुष्यबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असलात तर व्यवसायबंधूंचा आधार, अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत. आता एकत्र कुटुंब मोडून विभक्त कुटुंब झाली. माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली. बँकांमधून मिळणारी कर्ज, एटीएम इत्यादींमुळे पैशाची आकस्मिक गरज भागते. पैसे टाकले की मनुष्यबळ उभे करता येते हा आत्मविश्वास. घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील केटररच्या सेवेपर्यंत सर्व काही उभे करता येते. अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्युप्रसंगी सर्व काही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतात. ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे तर दुकानात जायची देखील आवश्यकता राहिली नाही.

समाजाऐवजी गटसमूह तयार होतायत. त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय. मानसिक – भावनिक आधार तुटत चाललाय. अपयश, दु;ख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंबच जेव्हा आत्महत्त्या करते तेव्हा असे वाटते की काय झालय आपल्याला ? वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसत असतांना अति ताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृद्रोग वेगाने वाढतोय. माणसा – माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण ( ventilation ) थांबलंय ! जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोषात जाऊन बसतात. लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली. आता तर अगदी सख्खी भावंडंसुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत….. मग पुन्हा माणूस ‘ एकला चालो रे ‘ कडे वळतो. तुडडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरु होते !

कळतच नाही आपण असे का वागतो?

पहा … तुम्हाला काही उत्तर सुचतंय का ?

काही सुचले तर अवश्य शेअर करा. 

आपल्यातील माणुसकी एकदमच संपायच्या आत आपणच काही करू शकलो तर परत एकदा आनंदी समूह म्हणून रहायला लागू.

लेखक : श्री दिलीप

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

इंग्रजी डिसेंबर महिन्याची सुरवात आणि मराठी मार्गशीर्ष नुकताच लागलेला, म्हणजे आनंददायी, उत्साहवर्धक वातावरण.मस्त हवीहवीशी गुलाबी थंडीची सुरवात असते.ह्या थंडीला गुलाबी विशेषण देणा-या रसिकाला सँल्युट. ह्या दिवसात हवामान एकदम मस्त, दुधदभतं, फळफळावळ,भाजीपाला ह्यांची रेलचेल. दिवसभर भरपूर उत्साहाने काम करायचं मग आपल्या सुखाच्या,हक्काच्या झोपडीत परतायचं,रात्री मस्त मऊमऊ ,उनउनं खिचडी, गरमागरम टोमॅटो चं सूप ओरपायचं आणि मग मस्त दिवसभराच्या दगदगीनं मस्त मऊमऊ गोधडीत अवघ्या काही मिनीटातच निद्रादेवीच्या अधीन व्हायचं, खरचं सुखं, सुखं म्हणतात ते हेच,आपल्यापाशीच असतं फक्त आपल्याला हुडकून त्याच्या आस्वाद घेता यायला हवा.

मार्गशीर्ष मास वा डिसेंबर महिना हे धार्मिक दृष्टीने पण खूप महत्त्वाचे, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार,चंपाषष्ठी,दत्तजयंती ह्याच काळातील.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे . मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात . मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना आळवण्याचा हा दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

लगेच येणारा उत्सव म्हणजे दत्तजयंती चा उत्सव.मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असतं. बडने-या जवळ “झिरी”येथे.दत्तमहाराजांचे जागृत देवस्थान आहे.

असा हा हवाहवासा मार्गशीर्ष व डिसेंबर महिन्याच्या शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले) इथून पुढे

एक दिवस ठरवून माझे चित्रकलेचे स्टॅन्ड ( ईझल ), बसण्याची फोल्डींगची छोटी खुर्ची, कोणी ओळखू नये म्हणून डोक्यावर मोठी क्रिकेटची टोपी, व रंगकामाचे इतर सर्व साहित्य सॅकमध्ये घेऊन मी रात्रीच्या ११ वाजता मेनरोडवर रस्त्याच्या बाजूला निवांत बसलो व रेखाटनास सुरुवात केली. माझ्या डोक्यात फक्त हा रात्रीचा लाईट चित्रात कसा आणता येईल ? हाच विचार चालला होता व वेगळ्या विचारात मी चित्रकामात पूर्ण गुंग झालो होतो.

पाचगणी हे मुख्य शहर आहे व त्याच्या आजूबाजूला दांडेघर, आंब्रळ, खिंगर,  भिलार, राजपूरी, तायघाट अशी छोटी मोठी खेडेगाव आहेत. त्याठिकाणावरून दिवसभर दुकानात, हॉटेलात कामे करून परत त्यांच्या गावाला परतणारा मोठा कामगार व व्यापारीवर्ग आहे. आजही काही कामगार दांडेघर गावाकडे उशीरा निघाले होते. त्यातले काही कामगार थोडी फार नशापाणी करून जाणारेही असतात.

इकडे माझे  ११ वाजता सुरु झालेले चित्रकाम १२ वाजेपर्यंत रंगात आले होते. मी पूर्ण स्वतःचे  देहभान विसरून चित्रात मग्न झालो होतो.आणि अचानक समोरून येणाऱ्या दांडेघरच्या दोन माणसांचा मोठा आरडाओरडा ऐकू आला. 

“ भूत, भूत,चित्रकाराचे भूत……… चित्रकाराचे भूत…….पळा पळा “

असे घाबरून ओरडत ते माघारी पळू लागले हातातल्या पिशव्या सांभाळण्याचेही त्यानां भान राहिले नाही आणि ते वेगाने परत आल्या दिशेने पळू लागले, म्हणून त्यांच्या पाठीमागे येणारे आणखी दोनचार जण घाबरून तेही पळू लागले.

त्यांना असे पळताना पाहून मीही घाबरलो. कारण मला ओळखले तर शाळेत बोंबाबोंब होईल व मला जाब विचारला, तर रात्रीची चित्रे काढतो म्हणून कदाचित नोकरी देखील जाईल या विचाराने  पटापट सामान आवरून मी रस्त्याच्याजवळ एका मोठ्या वडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसलो.

दांडेघरची ही माणसे आता  राम राम राम राम राम राम राम असे मोठ्यानेच म्हणत  म्हणत दबकत दबकत हळूहळू, दमादमाने सावधपणे येत होती. आणि बघतात तर तेथे कोणीच दिसेना. त्यातला एक प्यायलेलाच होता. तो छाती ठोकून आत्मविश्वासाने सर्वांना सांगत होता….. 

“ म्या इथंच बघितला ते भूत, मोठ्ठी टोपी घातली होती.”

दुसरा त्यात भर घालून म्हणाला.. 

“ अरं इंग्रजाचे होतं ते भूत “

“नाय,अरं बाबा ही पारशांची शाळा होती, म्हंजी भूत पारशीच असणार नव्ह.”

“अरं पारशी चित्रकाराचे भूत म्हंजी जालीम लेका, लई डेंजर असणार ‘

“लई कटकटी असत्यात पारशी लोकं, म्हंजी भूत भी कटकटी आन जालीम असलं तर सोडणार नाय, आपल्या मागंसुद्धा लई कटकट  लागलं. “ एकाने असा अनुभव सांगितला. 

“अरं तुला सांगतो एकदा का धरलं ना, तर आजिबात सोडत नाहीती ही भूत. मानगुटीवर बसत्यात, नाचत्यात, लई हाल हाल करत्यात.” 

मग एका सुरात सर्वजण राम राम राम राम राम राम राम राम राम असं मोठ्याने ओरडत एकमेकांचा हात पकडत त्यांनी जकात नाका पार केला. मी देखील झाडामागे अंधारात रोखून धरलेला श्वास सोडला. रात्रीचे चित्र काढणं एवढ काही सोप्प काम नाही हे माझ्या लक्षात आले व नंतर काही माझी चित्र पूर्ण करण्याची मानसिकता राहीली नाही. सगळा मूडच गेला आणि मी चित्राचे सामान घेऊन गूपचूप पणे परत शाळेत परतलो. 

दुसऱ्या दिवशी शाळेतला दांडेघरचा एक कामगार सर्व स्टाफला सांगू लागला, की रात्री शाळेच्या रस्त्यावर चित्रकाराचे भूत गावातल्या लोकांनी पाहिले….. 

…  भूत असा छोट्या खूर्चीवर बसला होता, लई मोठी हातभर लांब टोपी घातली होती. त्याचे पाय व हात खूप लाबंच्या लांब होते. ते पारशी भूत होते. लई जालीम, लई डेंजर. थोडक्यात वाचली मंडळी, नाहीतर मानगुटीवर बसला असता. 

लई डेंजर भूत होते. यापुढे रात्रीचे सावध रहा,असा सल्ला देखील त्याने दिला. मी देखील हो हो म्हणत  त्याच्याकडे दुर्लक्ष केले. भारी गंमत वाटली. माणसे एखादी घटना अव्वाच्या सव्वा करून कसे सांगतात ते मी अनुभवले.

त्यादिवसापासून आता मी रात्रीची चित्रे काढतो पण घरात बसूनच. रात्री चित्र काढायला कधी बाहेर ऑन दी स्पॉट जात नाही. पण एक नाईटस्केपचा चांगला विषय चित्रित करायचा राहिला याचे शल्य मनात मात्र राहूनच गेले.

आज मागचा विचार करताना जाणवते हे चित्रकाराचे भूत अजब असते. त्याने एकदा पकडले की ते कधीही आपल्याला सोडत नाही. आजही डोंगररांगा, शेतीची हिरवळ, समुद्र, बोटी, झाडे, इमारती, टेबललॅन्डची पठारे, वाईची मंदीरे, घाट, महाबळेश्वरचे  सृष्टीसौंदर्य पाहिले की  मनात परत परत चित्रे काढण्याची उर्मी नव्याने दाटून येते व आपण चित्रवेडाने पछाडलेलो आहोत याची पुन्हा खात्री होते. या  चित्रकाराच्या भूताने आपल्याला पछाडल्यामूळे, झपाटल्यामूळे कितीतरी असामान्य कलाकृती आपल्या हातून घडून गेल्या. 

कितीतरी मोठी माणसे अनपेक्षितपणे आपल्या जीवनात आली. आपली आर्थिक परिस्थिती पार बदलून गेली. चित्रकाराच्या भूतामूळे आपले जीवनच पालटले. हे भूत तुमची ध्येये सतत आठवण करून देते व कामाला जुंपते. नवनव्या गोष्टी, संशोधन, साधना करण्यास भाग पाडते. त्यामुळे माणूस सतत उत्साही व कार्यमग्न राहतो.

आपण आपल्या कलेने वेडे झाल्याशिवाय जग आपल्याला शहाणे म्हणत नाही हेच खरे. 

आपण कोणत्याही क्षेत्रात असलो उदा.  लेखन, चित्रकला, शिल्पकला, खेळ, गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य,चित्रपट, शिक्षण, वकील, इंजिनियर्स, पत्रकारिता, डॉक्टर,सरकारी किंवा खाजगी नोकरीत असो किंवा स्वत:च्या उद्योग व्यापारक्षेत्रात असो.आपण कार्य करत असलेल्या त्या त्या क्षेत्रात स्वतःला झोकून पूर्णपणे आंतरबाह्य झपाटलो, पछाडलो तर काम उत्तम होते. 

हाती घेतलेले कार्य मनापासून,आनंदाने उत्साहाने पूर्ण करण्याची प्रक्रिया एन्जॉय करायला शिकलो,त्यातून सर्वांना आनंद घ्यायला व द्यायला शिकलो तर कार्यात सर्वांना यश हे १००% नक्की मिळणारच. 

म्हणून सर्वानांच ज्या त्या आवडत्या विषयातील भूताने पछाडलेच पाहिजे असे मला मनापासून वाटते. ज्यावेळी हे भूत आपल्याला पछाडते त्यावेळी आपली सर्व शक्ती वापरून खरोखर उत्तम कार्य करण्याची असामान्य प्रेरणा मिळते. स्वत:ला विसरून दिवसरात्र आवडीच्या क्षेत्रात यश संपादनासाठी झोकून घ्यावेसे वाटते.

त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ते सतरा दिवस – भाग -1 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

? इंद्रधनुष्य ?

☆ ते सतरा दिवस… – भाग-1 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

“लहानपणी माझी आई मला असंच कोंडून ठेवायची. द्वाड होतो ना मी ! तासनतास खोलीचं दार उघडायची नाही. अगोदर बरं वाटायचं.. खोलीत मी एकटा व भवताली अंधार. कोळशाची खोली होती ना ती ! चार बाय दोनची. मी त्यातही खेळायचो. महिनाभराचा कोळसा त्या खोलीत ओतला जायचा. तीन चार गोण्या तर खास, आंघोळीला व सैंपाकासाठी चूल त्यावरच चालायची. गॅस तर आता कुठे चार वर्षांपूर्वी आला घरात उज्ज्वला योजनेतून. आई फुंकणीने चूल पेटवायची व दोन खोल्यांचे घर धुराने भरून जायचे. आता आताशा तर धूराने आईला धापही लागत होती. गॅस आल्याने तेवढं बरं वाटतं तिला ! खरंतर त्या कोळशाच्या खोलीत कोंडले गेल्यावर मला बरं वाटायचं. खोड्या काढणं, उनाडक्या करणं याने मी गल्ली, मोहल्ल्यात बदनाम. रोज कुणी ना कुणी तक्रार घेऊन यायचंच घरी, आई कावली जायची. व शिक्षा म्हणून मी कोळशात. पण खरं सांगू का त्या उनाडक्या व त्या खोड्या मला जाम आवडायच्या.  कोणीतरी रागावून घरी येतंय आपल्यामुळे याचं समाधानही वाटायचं, मला शिक्षा झाली की सूड उगवल्याचं समाधान आरोप करणाऱ्याला होणार नाही इतकं मला व्हायचं. मग कोळशाने मी काळा ठिक्कर झालो तरी त्याचं काही वाटायचं नाही. काही वेळाने आईच मला बाहेर काढायची. मग रगरग रगडून आंघोळ घालायची. मला घालून पाडून बोलायची. कशाला एवढी मस्ती करतोस? आपण गरीब माणसं, इतकं द्वाड असू नये, तुझ्यामुळे मलाही बोलणी खावी लागतात. अपमान गिळावा लागतो.  त्या गल्लीत आम्हीच तेवढे गरीब, मग माझ्याने आमच्या गरिबीबद्दल बोललेलं मला सहन व्हायचं नाही. मी उट्टं काढण्याच्या प्रयत्नात. बाबा पैका कमवायला बंबईला गेले आणि आम्ही बिहारला पोरकेच. ” त्याने एक दीर्घ सुस्कारा टाकला. 

सगळे त्याचं म्हणणं कान टवकारून ऐकत होते. तेवढंच तर करता येत होतं. एकमेकांशी बोलत राहण्यावाचून पर्याय नव्हता. काहीच कळत नव्हतं, दिवस आहे की रात्र. नेमका काळ ओढवल्यासारखं वाटायचं. जीवाची घालमेल सारखी. सगळे कोंडाळे करून बोलत रहायचे. आजचा तिसरा दिवस बहुतेक. परवाच तर घटना घडलेली. तेव्हा उठलेले अंगावरचे शहारे अजूनही तसेच. कितीतरी वेळा जे घडलं तेच डोळ्यासमोर येत असलेलं सारखं. 

धडामधाडधाड करत दगड माती खाली आली. वाटलं डोंगरच कोसळला. डोक्यावर पडू नये तसे सगळे सावध होऊन पुढे पळाले तसा परतीचा मार्गच बंद झाल्याचे लक्षात आले. अरे देवा !! जो तो हळहळायला लागला. अगोदर तर धुरळाच उठलेला. सगळं अंधूक अंधूक दिसत असलेलं. नुसता आरडाओरडा बोगद्यात. अजूनही दगड खाली येत असलेले. पुढे धावताना कुणी ठेचकाळलं, पडलेही, मग एकमेकांचा आधार घेत हाताला हात धरून उभं राहणं झालं. नेमकं काय घडलंय याचा अंदाज यायलाच अर्धा तास लागला. ज्युनियर इंजिनिअरसाहेब बरोबर होते  ते ओरडले, “ लॅण्ड स्लाईड झालीय बोगद्यात. आपापल्या डोक्यावर हेल्मेट आहे ना ते पाहून घ्या, अजून डोंगर खाली येऊ शकतो. आपण चाळीसच्या वर होतो चमूत. तितकी डोकी आहेत ना शाबूत मोजून घ्या, कुणाला खरचटलं, लागलं तर नाही ना? हाडं वगैरे मोडली नाहीत ना? बांका प्रसंग आलाय. धीर धरा, बघू काय करता येतंय ते. ” धूरळा बसायला लागला तसं सगळ्यांना धीर आला. सगळेच तसे धूळीने माखलेले. अगदी नाकातोंडातही धूळ. कुणी अंग झटकतंय, कुणी खोकतोय. चलबिचल प्रत्येकाची. काय घडलंय याची स्पष्ट जाणीव होत असलेली हळुहळू व पुढे काय वाढून ठेवलंय याची धाकधूक. जीव तसा अधांतरीच प्रत्येकाचा. 

अचानकच घडलं एकदम. बोगदा खोलवर खोदत असताना मागच्या मागे डोंगराने दगड माती लोटून भिंतच उभारली. वाटलं असेल दोन चार फूट लांब पण इंजिनिअर साहेब म्हणाले शंभर दोनशे तीनशे मीटर लांब असू शकते. पहिल्यांदा तर आवाजाबरोबर काळोखच पसरलेला. मग बोगद्याच्या कडेने टाकलेल्या लाईनीतील ब्रॅकेटमधले दिवे पुन्हा लुकलुकायला लागले. जसजसं दिसायला लागलं थोडंफार तसं  ‘आहे रे ‘चा पुकारा सर्वजण करू लागले. सर्व मिळून एक्केचाळीस डोकी गणली गेली. इंजिनीयरसाहेब एका दगडावर उभे राहिले. त्यांचेही हातपाय लटलटत असलेले. बाकीचे सगळे मटकन् खाली बसले धुळीतच. अंधुकशा उजेडात साहेब गंभीर दिसत होते. डोक्यावरचं पिवळं हेल्मेट सावरत, दगडावरचा तोल आवरत ते ठामपणे उभे राहिले. खोलवर गेलेल्या आवाजाने बोलू लागले. “ माझ्या बांधवांनो, माझ्या आयुष्यातील हा पहिलाच कटोकटीचा प्रसंग उभा ठाकलाय. आपणा सर्वांसमोरच मोठं आव्हान आहे. आपण ज्येठ, कनिष्ठ, लहानमोठं कुणीही नाही. सर्व भारत मातेची लेकरं आहोत. आपण आत अडकलोय हे बाहेरच्यांना एव्हाना कळलं असेल. ते आपल्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतील, पण आतमधे एकमेकांना सांभाळून राहायची जबाबदारी आपलीच आहे. तेव्हा एकमेकांना सहकार्य करत हा प्रसंगही निभावून नेऊ. देवाची प्रार्थना करूयात. तो जगन्नियंता आपल्याला तारून नेईल यावर विश्वास ठेवा. आपापल्या चीजवस्तू कमीत कमी वापरा. विशेषतः मोबाईल व त्याची बॅटरी जपली पाहिजे. एका दोघांचेच चालू ठेवा, बाकीचे स्वीचऑफ करा, किमान तीन चार दिवस तरी त्यावर काढता येईल. निदान  वेळ व तारीख तरी कळेल. पिशव्यांमधे जे काही हाताशी शिल्लक असलेले धान्य, खुराक याचं रेशनिंग करूयात. आपल्याकडे दोन किलोमीटरचा पट्टा आहे. त्यात हिंडू फिरू शकतो. कमीतकमी हालचाल करूयात , म्हणजे दमणं होणार नाही. आपली ताकद जपूयात.  विश्रांती जास्तीत जास्त घेऊयात. यातूनही मार्ग निघेल, आपले देशबांधव आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत याची खात्री आहे मला.  तेव्हा जय हो !! “

साहेबांच्या शब्दा शब्दागणिक जगण्याचा हुरूप वाढत गेला. निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला, जय हो!! 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – एक सुंदर पंचाक्षरी कविता… – कवि – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – एक सुंदर पंचाक्षरी कविता… – कवि – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

  पाय जपावा

   वळण्याआधी

   तोल जपावा 

   ढळण्याआधी !

  

 अन्न जपावे

   विटण्याआधी

   नाते जपावे

   तुटण्याआधी !

   

शब्द जपावा

   बोलण्याआधी

   अर्थ जपावा

   मांडण्याआधी !

   

रंग जपावे

   उडण्याआधी

   मन जपावे

   मोडण्याआधी !

  

 वार जपावा

   जखमेआधी

   अश्रू जपावे

   हसण्याआधी !

  

 श्वास जपावा

   पळण्याआधी

   वस्त्र जपावे

   मळण्याआधी !

   

द्रव्य जपावे

   सांडण्याआधी

   हात जपावे

   मागण्याआधी !

   

भेद जपावा

   खुलण्याआधी

   राग जपावा

   भांडणाआधी !

  

 मित्र जपावा

   रुसण्याआधी

   मैत्री जपावी 

   तुटण्याआधी !!!

कवी : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो. जेव्हा प्रमुख वक्त्यांचे भाषण सुरु झाले तेव्हा त्यांनी मर्यादा सोडून बोलणाऱ्या आजच्या राजकारण्यांवर टीका केली. खरोखरच राजकीय नेते म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. पण त्याचे भान काही अपवाद सोडले तर आज कुठेही दिसत नाही. ते उपरोधिकपणे म्हणाले ‘ विद्या विनयेन शोभते ‘ असे एक संस्कृत सुभाषित आहे. पण बोलणाऱ्यानी एवढी खालची पातळी गाठली आहे की ते म्हणतील, ‘ ही कोण आणि कुठली विद्या ? कुठला विनय ? ‘ रोजच्या बातम्या पाहिल्या आणि त्यात राजकारण्यांनी केलेली विधाने पाहिली की याचे प्रत्यंतर येते. बातम्या सुद्धा बघू नये असे सुजाण नागरिकांना वाटत असल्यास नवल नाही.

याच व्यासपीठावरून आणखी एक वक्त्या बोलल्या. त्यांनी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक विधान केले. त्या म्हणाल्या, ‘ सुरुवातीला मला सावरकरांबद्दल प्रचंड आदर होता पण आता तो कमी झाला आहे. ‘ त्याचे कारण त्यांनी सांगितले की राहुल गांधी जर सातत्याने सावरकरांवर टीका करत असतील, तर त्यांच्या हातात काहीतरी पुरावे असल्याखेरीज ते तसे बोलणार नाहीत.  आणखी एक वक्ते उभे राहिले ते म्हणाले की या बाई बोलल्या त्यात नक्कीच तथ्य आहे. आपल्याला सावरकरांच्या विरोधात कोणी बोललेलं आवडत नाही कारण तशा प्रकारची विधानं त्यांच्याबद्दल आपण ऐकलेली नसतात. पण म्हणून ते खोटं आहे असं मानायचं कारण नाही. महात्मा गांधींनी आपण केलेल्या चुकांची कबुली ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या पुस्तकात दिली आहे. अशी कबुली देण्यासाठी फार मोठे मन लागते. याच व्यासपीठावरून मग दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांनी विरोधाची भूमिका घेतली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? देश धार्मिक हुकूमशाहीकडे, फॅसिस्ट वादाकडे झुकतो आहे अशी विविध विधाने केली गेली.

दाभोळकर, पानसरे किंवा गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन कोणीच करणार नाही आणि करू नये. कोणी वेगळी भूमिका मांडली तर त्यांची हत्या करणे हे कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. ती निषेधार्हच गोष्ट आहे.

विशेष म्हणजे सावरकरांबद्दल वरीलप्रमाणे विधाने करणाऱ्या  व्यक्ती या जेष्ठ साहित्यिक किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या होत्या. त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने ऐकणे हे आश्चर्यचकित करणारे आणि धक्कादायक वाटले. उथळ विधाने करणारी आणि सावरकरांच्या जीवनकार्याचा फारसा अभ्यास न करणारी एखादी व्यक्ती सावरकरांच्या विरोधात बोलते म्हणून तिचे म्हणणे खरे मानून सावरकरांचा त्याग, देशभक्ती या सगळ्याच गोष्टींवर बोळा फिरवायचा का याचा बोलणाऱ्यांनी विचार करायला हवा. महात्मा गांधींनी आपल्या ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या आत्मचरित्रात आपण केलेल्या चुकांची कबुली दिली आहे म्हणून ते महान होत नाहीत किंवा सावरकरांनी स्वतःच्या चुकांबद्दल असे काही लिहिले नाही म्हणून ते लहान होत नाहीत. सावरकर,गांधी, नेहरू, सरदार पटेल, डॉ आंबेडकर, म. फुले  यांच्यासारख्या व्यक्ती मुळात महान आहेत. या सगळ्या महापुरुषांनी आपल्या जीवन कार्यातून काय संदेश दिला हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हल्ली कोणीही काहीही बोलावे असे झाले आहे. ज्यावेळी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा समारंभात आपण भाषण करतो, तेव्हा लोकांपुढे कोणता आदर्श ठेवायचा हा खरंतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्यावेळी आपण महापुरुषांबद्दल बोलतो, त्यावेळी त्यांचे दोषदिग्दर्शन न करता त्यांच्या गुणांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मला वाटते. गुणग्राहकता आपल्याजवळ असली पाहिजे. महापुरुष हे देखील शेवटी माणसेच असतात. त्या त्या परिस्थितीत निर्णय घेताना त्यांच्या हातून कदाचित काही चुका होऊ शकतात. पण म्हणून त्यांच्या महत्वाच्या कार्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे दोष किंवा चुकाच आपण दाखवत राहायच्या हे कितपत योग्य आहे ? अलीकडे महापुरुषांच्या कार्याचे, गुणांचे गुणगान करण्यापेक्षा त्यांच्यातील दोष दाखवण्याचा जो पायंडा पडत चालला आहे, तो भविष्यकाळाच्या दृष्टीने घातक आहे. पुढच्या पिढ्यांसमोर आपण आदर्श ठेवायचा की दोष दिग्दर्शन करायचे ? स्वा. सावरकर असोत, गांधी किंवा नेहरू असोत या सगळ्या महापुरुषांनी देशासाठी प्रचंड त्याग केला आहे, अपार कष्ट, तुरुंगवास सोसला आहे. अमुक एका महापुरुषावर टीका केली म्हणजे तो लहान होत नाही किंवा त्याच्या कार्याचे महत्व कमी होत नाही.

पुलं हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत विनोद कसा असतो हे दाखवून दिले. नाट्य, संगीत, अभिनय, दिग्दर्शन, लेखन इ कलेच्या विविध प्रांतात सहज संचार करणारा अवलिया म्हणजे पुलं. याच पुलंवर मध्यंतरी एक चित्रपट येऊन गेला. ‘ भाई -व्यक्ती आणि वल्ली ‘ या नावाचा. आपल्यापैकी बऱ्याच पुलं प्रेमींनी तो पाहिला असेल. पण या चित्रपटातून पुलंचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समोर येण्याऐवजी सतत धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे पुलं अशीच व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते. कदाचित वस्तुस्थिती तशी असेलही आणि दिग्दर्शकाला काय दाखवायचे याचे स्वातंत्र्यही नक्कीच आहे. पण इथे पुन्हा माझ्यातील शिक्षक जागृत होतो. समाजापुढे आपण काय ठेवतो आहोत याचा विचार नक्कीच करायला हवा असे मला तीव्रतेने वाटते. वाईट गोष्टी लगेच उचलल्या जातात. चांगल्या गोष्टी रुजवायला वेळ लागतो. उतारावरून गाडी वेगाने खाली येते. वर चढण्यासाठी कष्ट पडतात. आपल्याला समाजाची गाडी प्रगतीच्या दिशेने न्यायची असेल तर योग्यायोग्यतेचा विवेक ठेवायलाच हवा. अर्थात  माझे हे विचार आहेत. सगळ्यांनाच आवडतील असेही नाही याची जाणीव मला आहे. प्रत्येकाला  अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच !

पण जाता जाता आणखी एक सुदंर सुभाषित सांगून समारोप करू या. या सुभाषितात सुभाषितकार म्हणतो

 विद्या ददाति विनयं, विनयाद याति पात्रतां ।

 पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्मं तत: सुखम ।।

ज्या व्यक्तीला खरोखरीच ज्ञानप्राप्ती झाली आहे, अशी व्यक्ती विनयशील म्हणजे नम्र असते. कुठे कसे वागावे हे अशा व्यक्तीला सांगावे लागत नाही. विनम्रतेतून योग्यता किंवा पात्रता अंगी येते. त्यातूनच मग धनाची प्राप्ती करण्यायोग्य व्यक्ती होत असते. धनाचा उपयोग करून मनुष्य धार्मिक कार्य संपन्न करू शकतो आणि त्यातूनच त्याला आनंद प्राप्त असतो. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. यात अर्थातच ज्ञानप्राप्तीचे आणि त्या खऱ्या ज्ञानप्राप्तीतून अंगी येणाऱ्या गुणांचे महत्व अधोरेखित केले आहे.

© श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकाराचे भूत – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शैक्षणिक केन्द्र आहे. पण आज जी पाचगणीची खरी प्रगती  दिसत आहे ती खूप हळूहळू झाली आहे. उदा. पाण्याची सोय. ब्रिटीशांनी ज्यावेळी येथे शाळा बांधल्या, विद्यार्थी आणि पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढू लागले तसतसे पाण्याचे संकटदेखील मोठे होत गेले. चाळीस पन्नासवर्षांपूर्वी पाचगणीत पाण्यासाठी फक्त विहिरींचाच वापर व्हायचा. गावात आणि खाजगी बंगल्यामध्ये आजही काहीजण विहिरीचे पाणी वापरतात पण त्यावेळी विहिरीनां दुसरा पर्यायच नव्हता. लाल दगडांमध्ये बांधलेल्या या विहिरींचे पाणी आयर्नयुक्त आणि चवदार असल्याने सर्वानां ते आवडायचे. वाईला धोमधरणाची निर्मिती झाली आणि नंतर धरणाचे पाणी पाचगणीला येवू लागले. सिडने पाईंटच्या तळमाळ्याजवळ पंपींग स्टेशन बांधले होते. तेथून पाणी प्रथम गार्डनच्या शेजारी शुद्धीकरणासाठी येई व नंतर  टेबललॅन्डच्या पायऱ्याजवळच्या टाकीतून संपूर्ण गावाला नळाने पाणीपुरवठा होई. पण हे सगळे प्रकार विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून असायचे. कधी कधी वीजपुरवठा नसला की पाण्याचा तुटवठा व्हायचा व स्थानिक रहिवाशानां परत विहिरीवरुन पिण्याचे पाणी आणायला लागायचे व कपडे धुवायला टेबललॅन्डचे तळे किंवा गावविहीरीवर जावे लागत असे. (आता मात्र पाचगणीला महाबळेश्वरच्या वेण्णा लेक मधून पाणी पुरवठा होतो.)

माझ्या लहानपणी मोठे कुटूंब असल्याने कपडे धुण्यासाठी सगळे बहिणभाऊ गावविहिरीवर जायचो. तेथे भरपूर हुंदडायला मिळायचे म्हणून मदत करण्याचा, अभ्यास करण्याचा बहाणा करून कपड्यांच्या बादल्या घेऊन विहिरीवर जाणे हा माझा आवडता कार्यक्रम असायचा. एका रविवारी मी गावविहिरीच्या परिसरात दप्तर घेऊन मनसोक्त टाईमपास करत होतो.

गावविहारीचा पूर्वेकडेचा रस्ता चालत गेलो की रेशीम केन्द्र व ओक्स हायस्कूल लागायचे. या ओक्स हायस्कूलच्या बाजूचा उताराचा रस्ता जरा मस्त वाटला म्हणून मी सहज चालत गेलो तर तेथे एक पत्र्याचे शेड मारलेले होते. आणि त्यामध्ये लोखंडी बीडाच्या बारचे चौकोनी पिलर्स उभे केले होते.

त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच जात होतो. हे ठिकाण स्मशानभूमीचे आहे हे लहान असल्यामूळे मला माहीतच नव्हते. कारण लहान असल्यामूळे मला कोणी नेले नव्हते.मी तेथे गेल्यावर मंत्रमुग्धच झालो. कारण त्या ठिकाणावरून समोर कमळगड, मांढरदेवीचा डोंगर व अफलातून दिसणारे कृष्णा व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसत होते. त्या डोंगरावर नुकतीच पूर्वेकडचे सकाळची कोवळी उन्हे पडल्यामुळे डोंगराच्या रांगा व त्यावरील चढउतार, डोंगरांच्या सावल्या, घड्या,पाण्यात पडलेली प्रतिबिंबे. छोटी छोटी घरे, भाताची हिरवीगार शेती त्यातच चिखली व बारा वाड्यांचे खोरे, ती छोटी घरे पाहून मी परदेशातील स्वित्झर्लंडचा देखावा पाहतोय असे मला वाटू लागले व मी मनाने पूर्णपणे भारावूनच गेलो. हे दृश्य आपण कागदावर चित्तारायलाच पाहिजे असे मला खूप मनातूनच वाटू लागले. पाठीवरचे दफ्तर बाजूला ठेऊन त्यातील चित्रकलेची वही काढून त्या स्मशानभूमीच्या जाळण्याच्या लोखंडी चौकानावर बसून  पेन्सीलने चित्र काढण्याच्या कृतीत आणि त्या शांत वातावरणात मी इतका तल्लिन झालो की माझे दोन तास कसे गेले ते मला कळलेच नाहीत.

माझी चित्रसाधना अचानक झालेल्या नानांच्या आरडाओरड्यांमुळे भंग पावली. मी पाचगणीत एस.टी.स्टॅन्ड समोर जेथे राहायचो त्या इमारतीच्यावर लिंगाण्णा (नाना) पोतघंटे राहायचे, त्यांच्या एकत्र कुटुंबाचा शाळेचे कपडे धुण्याचा, इस्त्रीचा  ‘ दिपक ड्रायक्लिनर्स ‘ नावाचा व्यावसाय होता. पाण्याचा तुटवडा असल्याने ते स्मशानभूमीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका जिवंत झऱ्याच्या घाटावर नेहमी कपडे धुवायला यायचे.मला स्मशानभुमीत चित्र काढताना पाहून ते आश्चर्यचकीत झाले व घाबरले देखील  त्यांच्या आरडाओरड्यामूळे मी तेथून पळ काढला व उशीरा घरी पोहचलो.

नानांनी घरी आईला तुमचा मुलगा मसणवट्यात चित्र काढत बसला होता ही घटना सांगितली आणि त्यामूळे सगळे वातावरण तंग झाले. अशा या तंग वातावरणात मी घराच्या पाठीमागच्या दरवाजातून हळुवारपणे घुसत असतानाच माझे जंगी स्वागत झाले. माझी आई अशिक्षित व अडाणी होती. ती मनातून खूप घाबरली होती,तीला पक्की खात्री झाली होती की कोणत्या तरी चित्रकाराच्या भूताने मला धरले असणार. ते भूत माझ्या अंगात घुसल्यामूळेच मी सतत भटकत सारखी सारखी  चित्र काढत असतो. त्यामूळे आईने घरात दरवाजात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवले आणि मग माझ्या चेहर्‍यावरून भाकरीचा तुकडा,मीठ, मोहरी, मिरच्या ओवाळून ईश्वराला मोठ्याने साकडे घातले की इडापीडा टळो आणि चित्रकार भूताच्या तावडीतून माझ्या लेकाची सुटका होवो.

पण माझ्यावर काही फरक पडलाच नाही. या उलट दिवसेंदिवस वेळ मिळेल तसे कृष्णा व्हॅली, पांडवगड, कमळगड, नवरानवरीच्या डोंगरांच्या रांगा, चमकणारे धोम धरणाचे पाणी, यांची चित्रे काढण्याचे माझे प्रमाण वाढले. तासनतास त्या प्रदेशाची चित्रे काढणे त्या परिसरात फिरणे हा माझा आजही आवडीचा छंद आहे. एकंदर आईच्या दृष्टीने चित्रकाराच्या भूताने मला आंतरबाह्य पछाडलेले होते, झपाटले होते. मी एकदम वाया गेलो असे सर्वानां वाटायचे.

एकदा मात्र मोठ्ठीच गंमत झाली. ती कायम लक्षात राहण्याजोगी आहे म्हणून आज तुमच्याशी शेअर करतोय. पाचगणीत आर्ट गॅलरी करण्याचा माझा उद्देश होता,  त्या गॅलरीच्या दरवर्षी जागा बदलत असल्यामूळे  मी वेळोवेळी त्यात अपयशी ठरलो.सन २००० साली मी खूपच निराश झालो होतो कारण माझ्या  आयुष्याची वाताहात झाली होती. मोठी आर्थिक कुचंबणा झाली व नाईलाजाने मला पाचगणीच्या बिलिमोरीया  शाळेत कलाशिक्षकाची नोकरी पत्कारावी लागली. तेथे शाळेतच राहत होतो.

शाळेत शिकवत असलो तरी चित्रकाराचे भूत डोक्यातून जात नव्हतेच.बिलिमोरीया स्कूलचे लोकेशन  टेबललॅन्डच्या पायथ्याशी व सिडनेपॉईंटच्या (सध्याचे रविन हॉटेल )जवळ असल्याने मी जमेल तशी तेथून दिसणाऱ्या कृष्णा व्हॅलीची, शाळेच्या परिसराची, शाळेची मुख्य इमारत, डायनिंग हॉलची इमारत, प्राचार्यांचे, शाळेच्या मालकांचे निवासस्थान, रस्त्यांच्या वडांच्या झाडाची चित्रे रेखाटने सतत करत असायचो.

एकदा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाचा एक कॅटलॉग पोस्टाने आला होता. त्यात एका चित्राला जलरंगाचे पारितोषक मिळाले होते. त्या चित्रात रस्त्याच्या बाजूला एक खांबावरचा दिवा प्रकाशित होऊन छान पिवळा प्रकाश सर्वत्र पडला होता व त्या प्रकाशात इमारत, झाडे, माणसे खुपच छान दिसत होती.ते चित्र मला मनापासून खूपच आवडले. मग आपणही असे काही तरी रात्रीचा खांबावरून सुंदर पिवळा प्रकाश व सावल्या पडलेल्या आहेत, हा विषय घेऊन जबरदस्त ‘ नाईटस्केप ‘ करायचेच हा मी पक्का निर्धार केला व मग स्पॉटची पहाणी करत मी रात्रीचा फिरायला लागलो. त्यावेळी मी शाळेच्याच परिसरातच राहत होतो.अगदी कसून पहाणी केल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की बिलीमोरिया शाळेच्या प्रवेश करण्याच्या मुख्य रस्त्यालगत असा  म्युनिसिपालीटीचाच एक उंच खांब आहे. तेथुन झाडांच्या रस्त्यावर पडलेल्या पिवळ्या प्रकाशामुळे छान सावल्या पडतात व तो परिसर चित्रित करण्याजोगा आहे. म्हणून मी त्याचा अभ्यास सुरु केला. रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले.

– क्रमशः भाग पहिला

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची –  भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(मागील भागात आपण पाहिले- माहेरचे लोक त्यांना “आता इकडेच रहा ” म्हणत होते. तेव्हा सीताबाईंनी निक्षून सांगितलं , “मुंबईचं माझं घर हक्काचं होतं , ते काळानं हिरावून नेलं .आता मी कोल्हापूरच्या घरात राहिले तर, सासर आणि माहेर अशी मला दोन घर मिळतील. दोन्हीकडे मी राहू शकेन. पण माहेरीच राहिले तर सासर तुटेल “. एक बुद्धिमान स्त्रीच इतका विचार करू शकेल. आता इथून पुढे )            

मौजमजेच माहेरपण आठ-दहा दिवसाच छान असतं. पण अशा अवस्थेतलं माहेरपण त्यांना नकोसं वाटायला लागलं . सीताबाईंचे सासरे केशवराव, आपल्या सुनेच्या अंगातली हुशारी कर्तबगारी ओळखून होते. अंबू त्यांची लाडकी नात होती . एके दिवशी घरात तसे सांगून, सुनेला आणि नातींना  माहेरून आणायला  ते स्वतःच गेले. सीताबाईंना यावेळी सासरी आल्यावरच बरं वाटलं. सासूबाई सावत्र. त्यांना मनापासून ही जबाबदारी नको होती. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. सीताबाईंवर अनेक बंधन आली. काळच तसा होता तो. स्वयंपाक सोळ्यातला . तेथेही त्यांना मज्जव. पाणी हवं असलं तरी पाण्याला शिवायचं नाही. मुलींकडून मागून पाणी घ्यायचं. कोणी आलं तरी तिने पुढे जायचं नाही.  केर- वारे,  चूल ,पोतेरे, दळण, कांडण , निवडण हीच काम त्यांनी करायची. 19 –20 वर्षांची , ऐन तारुण्यातली विधवा असा डाग लागला होता तिला. कोणीही सीताबाईंना तिरकस बोललेलं सासऱ्यांना मात्र आवडायचं नाही.

मुली कधी मोठ्या होणार ? या सतत पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सीताबाईंना हळूहळू मिळायला लागलं. सगळेच दिवस सारखे नसतात. कोणी , कोणी मदतीसाठी, कोणाच्या बाळंतपणासाठी, कामासाठी सीताबाईंना बोलवायचे. पण सासरे स्पष्टपणे नकार द्यायचे. आता मुलीही थोड्या मोठ्या झाल्या. आजोबांच्या लाडक्या होत्या त्या. आता झोका हळूहळू दुरुस्त झाला. त्याला ऊर्जा मिळायला लागली . वेळ मिळेल त्यातून सीताबाई मुलींचा अभ्यास घ्यायला लागल्या. शिकविण्यातली आत्मीयता आणि मुलींची हुशारी सासऱ्यांच्या नजरेतून  सुटली नाही. एके दिवशी त्यांनी सीताबाईंना सांगितलं, ” फक्त काम काम आणि घर अशा कुंपणात राहून, तू तुझं आयुष्य खर्ची घालू नको. शेजारची आणखी चार-पाच मुलं आली तर त्यांनाही शिकव. आणि तसंच झालं. आणखी चार-पाच मुलांना शिकवणं सुरू झालं. आता झोक्याला आणखी ऊर्जा मिळायला लागली . सीताबाई मुलांना, अभ्यासाबरोबर स्तोत्रं, नैतिकतेचे धडे, सणांच महत्व, त्या सणांशी जोडल्या गेलेल्या आख्यायिका अगदी रंगवून रंगवून सांगायच्या. मुलांबरोबर पालकही खुश होते. त्यांच्या शिकवण्याची ख्याती सर्वत्र पसरायला लागली. मुलांची संख्या वाढायला लागली. सीताबाईंना शिकविताना हुरूप वाटायला लागला. शिकविताना त्या रंगून जायला लागल्या. दुःखातलं मन दुसरीकडे वळायला लागलं. सर्वजण त्यांना बाई ,बाई म्हणता म्हणता       ” शाळेच्या आई ” असंच म्हणायला लागले. आता त्या खऱ्या अर्थाने “शाळेच्या आई”, झाल्या. घरातल्या सोप्याचं  रुप पालटून त्याला शाळेत स्वरूप आलं. ” नूतन ज्ञानमंदिर “, अशी पाटी लागली. आता एक मदतनीसही त्यांनी घेतल्या. आता झोका उंच उंच जायला सुरुवात झाली . शिकवत असताना, सीताबाईंना नवनवीन कल्पना सुचायला लागल्या .संक्रांतीला मुलांना हातात तिळगुळ देण्यापेक्षा, अगदी दीड दोन इंचाच्या, वेगवेगळ्या आकाराच्या रंगीत रंगीत कापडी पिशव्या, कल्पकतेने शिवून, त्यातून मुलांना त्या पिशव्यातून तिळगुळ द्यावा, अशा कल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिलं. वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या बघून मुलं ही खुष व्हायची. शाळेचं  गॅदरिंग म्हणजे पर्वणी असायची. पालक, विद्यार्थी उत्साहाने, आनंदाने भारून गेलेले असायचे. शिवणकाम , विणकाम , संगीत, काव्य लेखन,  नाट्य लेखन या सर्वांबरोबर कार्यक्रमाचे नियोजन, यात सीताबाईंचा हातखंडा होता. सीताबाई –शाळेच्या आई, स्वतः गाणी तयार करून, मुलांकडून बसवून घेत. स्वतःच्या गोड गळ्यातून म्हणत असत. मुलांना स्वतः सजवत असत. कृष्णाचा एक पोषाख तर त्यांनी कायमचा  शिवून ठेवला होता . ध्रुव बाळ, भरतभेट,  राधाकृष्ण,  हनुमान, राम सीता यांच्या नाटिका स्वतः लिहून, मुलांकडून उत्तम अभिनयासहित करून घ्यायच्या. “कृष्णा sss मजशी बोलू नको रे, घागर गेली फुटून”,असा नाच करताना  छान ठेका  धरला जायचा. ” बांधा उखळाला हो, बांधा उखळाला, या नंदाच्या कान्ह्याला बांधा उखळाला.” गाणं चालू झालं की मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून पालक आणि प्रेक्षक यांनाही आनंद व्हायचा . सगळं झालं की मुलांना खाऊ दिला जायचा. छोटी छोटी बक्षीस दिली जायची. हसत हसत मुलं घरी जायची . गोड स्वप्न बघत झोपी जायची. दुसरे दिवशी पालक, शाळेच्या आईंचं कौतुक करून खूप छान छान अभिप्राय द्यायचे. ते ऐकून सीताबाईंना आनंद आणि स्वतः विषयी अभिमान वाटायचा. नवनवीन कल्पनांचा उदय व्हायला लागला. झोक्याला ऊर्जा मिळायला लागली .आणि झोका उंच उंच जायला लागला. सुट्टी सुरू झाली की  त्या माहेरी जात. तेथेही आलेल्या भाचरांचं नाटक, गाणी , नाच तयार करून ,अगदी पडदे लावून, शेजार  पाजार्‍यांना बोलावून गॅदरिंग घ्यायच्या. वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन बक्षीस द्यायच्या . भाचरं आनंदात असायची. त्यांना आत्या हवीहवीशी वाटायची . कोणावरही येऊ नये असा प्रसंग सीताबाईंवर आला. आईचीच दोन बाळंतपणं त्यांना करावी लागली. एका तरुण विधवा मुलीला आईचे बाळंतपण करताना आणि आईला करून घेताना मनाला काय यातना झाल्या असतील त्या शब्दात सांगणे कठीण आहे.

बघता बघता सीताबाईंनी समाजकार्यालाही सुरुवात केली. प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षणाची आता पहाट व्हायला लागली होती . अनेक स्त्रियांना साक्षरतेचा आनंद त्यांनी मिळवून दिला. स्वदेशीचा पुरस्कार आणि परकीय कपड्यांवर बहिष्कार म्हणून टकळीवर सुतकताई त्यांनी सुरू केली.

सासर्‍यांचा भक्कम आधार, धाकट्या जावेची मदत, शाळेतल्या गोड चिमुकल्यांच्या सहवासाचा विरंगुळा आणि आनंद, स्वतःची ध्येयनिष्ठा आणि कष्ट , श्री अंबाबाईचा वरदहस्त आणि अखेर नियती या सर्वांच्या एकत्रित ऊर्जेने  झोक्याचे आंदोलन उंच उंच होत गेले . त्या उंच गेलेल्या झोक्याकडे सगळेजण आश्चर्याने पाहत राहिले. अरे वा ss वा, वा ss वा खूपच कौतुकास्पद ! सीताबाईंना आनंदाची आणि उत्साहाची ऊर्जा मिळाली. आणि त्या, ” घरात हसरे तारे असता sas, ”  या गाण्याचा चालीवर स्वतःच्या शब्दात  गाणे गुणगुणायला लागल्या.

मी पाहू कशाला कुणाकडे, मी पाहू कशाला जगाकडे.

घरात ज्ञान मंदिर असता, मी पाहू कशाला कुणाकडे.

    गोड चिमुकली गोजिरवाणी.

    हसती खेळती गाती गाणी.

     मला बिलगती आई म्हणुनी.

उंच माझा झोका पाहता, आनंदाचे उडती सडे.

मी पाहू कशाला कुणाकडे , मी पाहू कशाला जगाकडे.

– समाप्त –

(सत्य घटनेवर आधारित कथा)

  ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆

लक्ष्मीपूजन करू घरोघर आम्ही जरी भावे

प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे

आणि इंग्रज पूजी जरि ना लक्ष्मीची मूर्ती

राबे रिद्धिसिद्धी त्याच्या दाराशी तरि ती

काय बंधुंनो, कारण? रुसली भारतलक्ष्मी कां?

लाथाडुनि दे पूजा अमुची शतकांची देखा

कारण आम्ही सुमें अर्चितो परि ना सुमनानें

विनवू परि ना, विष्णुसम तिला जिंकु विक्रमाने

लक्ष्मीपूजन करावया जैं करितो स्नानाला

परका साबू, परकी तेलें लावू अंगाला

परदेशीचे रेशीम त्याचा मुकटा नेसोनी

देवघरी परदेशी रंगे रंगीत बैसोनी

विदेशातली साखर घालुनि नैवेद्या दावू

अशा पूजनें प्रसन्न होईल लक्ष्मी हे भावू

साबू नेई कोटी, कोटी तेल रुपाया ने

नेई लुटोनी विदेश कोटी अन्य उपायाने

विलायती जी साखर नैवेद्यासी लक्ष्मीच्या

आणियली ती नेत विदेशी कोटी रुपयांच्या

अशा रीतीने लक्ष्मी दवडुनि दाराबाहेरी

लक्ष्मीपूजन करीत बसतो आम्ही देवघरी

आणि विदेशी नळे, फटाके, फुलबाजा अंती

उडवुनि डिंडिम पिटू आपल्या मौर्ख्याचा जगती

अहो हिंदुंनों, कोटी कोटी रुपयांची या दिवशी

लक्ष्मी पूजावयासि लक्ष्मी धाडू विदेशासी

म्हणुनि आम्ही जरी पुजू घरोघर ही लक्ष्मी भावें

प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे

तरी हिंदुंनों, घरात लक्ष्मी आधी आणावी

विदेशीसि ना शिवू शक्यतो वृत्ती बाणावी

देशी तेलें, देशी साबू, देशी वस्त्रानें

देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्रानें

स्वदेशलक्ष्मी पूजू साधुनि जरी मंगलवेळ

गजान्तलक्ष्मी हिंदुहिंदुच्या दारी डोलेल

 – वि दा सावरकर

रसग्रहण

परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातल्याशिवाय या देशाची भरभराट होणार नाही; ही वस्तुस्थिती सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी स्वा. सावरकरांनी ही कविता १९२५ साली रचली. दिवाळीसारख्या सणांच्या वेळी सावरकरांनीच स्थापन केलेल्या हिंदुसभेचे कार्यकर्ते, मेळावे घेऊन, अशा कविता गाऊन, समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करायचे. सर्वसामान्य जनतेला कळावी, पचावी, रुचावी म्हणून सावरकरांनी या कवितेत अगदी सोपी शब्दयोजना केलेली दिसते. तसेच लोकांना सहज पटतील असे दैनंदिन व्यवहारातील दाखले ते देतात. मात्र कितीही सोपी शब्दरचना केली तरी त्यांच्यातला शब्दप्रभू कुठेतरी डोकावतोच. उदा. ‘सुमनें’ वरचा श्लेष किंवा ‘मूर्खता’ साठी वापरलेला शब्द ‘मौर्ख्य’.

लक्ष्मीपूजनादिवशी घराचा दरवाजा उघडा ठेवला की लक्ष्मी घरात येते असा समज आहे. याचाच उपयोग करून कवी सांगतात की, परदेशी फटाके, तेल, साबण, साखर अशा वस्तू वापरून तुम्ही लक्ष्मीला केवळ दरवाजाबाहेरच नव्हे तर देशाबाहेर घालवीत आहात. आपलाच कच्चा माल कवडीमोलाने घेऊन, त्यांच्या देशात बनलेल्या वस्तू हे इंग्रज आपल्याला विकतात व कोट्यावधी रुपये भारतातून लुटून नेतात. अशा परिस्थितीत लक्ष्मी तुमच्या आमच्यावर कशी प्रसन्न होईल. ती रुसून परदेशीच निघून जाणार. याउप्पर आणि परदेशी फटाके वाजवून तुम्ही जणु आपल्या मूर्खतेचा डिंडोराच पिटता. म्हणून हे देशबंधूंनों, आधी देशाबाहेर  जाणाऱ्या लक्ष्मीला थांबवा म्हणजेच एका अर्थाने आधी लक्ष्मीला घरांत घेऊन या व मग तिची पूजा करा.

कविता संपता संपता का होईना पण ‘देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने’ या ओवीत त्यांच्यातला क्रांतिकारक डोकावतो. ते म्हणतात, देशी वस्त्रे नेसून, देशी साखरेने नैवेद्य बनवून, देशी अस्त्राशस्त्रांने आपण स्वदेशलक्ष्मीची पूजा करू. म्हणजेच स्वातंत्र्यलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सशस्त्र आंदोलन करू. देश स्वतंत्र झाल्यानंतरच हिंदुस्थानातील प्रत्येकाकडे गजान्तलक्ष्मी नांदेल, देशाची भरभराट होईल.

हे विचार जवळ जवळ १०० वर्षांनंतर, सद्यपरिस्थितीत देखिल अचूक लागू पडतात. आपण पहातो की दिवाळी आली की चिनी बनावटीच्या वस्तूंचा बहिष्कार  करण्याची टूम निघते पण विविध कारणांमुळे हे फारच कमी प्रमाणात  साधलं जातं. म्हणूनच महान, द्रष्ट्या कवींच्या कविता ह्या सार्वकालिक असतात असं म्हटलं जातं.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares