मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वेळेचा वेळ…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “वेळेचा वेळ…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नेहमीच माझ्या पुढे पळणाऱ्या वेळेला एकदा खूप खूऽऽप खूऽऽऽप वेगात जाऊन गाठलेच कसेबसे •••आणि काय सांगू तुम्हाला••• अहो हा पकडलेला वेळ, माझ्या मुठीत राहील तर शपथ! मला त्याच्या बद्दल खूप कुतूहल••• खूप कौतुक••• त्याच्या विविध कला पाहून तर मी वेळेच्या प्रेमातच पडले•••पण त्याला निरखे पारखेपर्यंत निघूनच गेला•••

वेळच तो••• कोणीतरी स्वत:हून आपल्या मागे पडतोय म्हणल्यावर; त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा स्वभावच त्याचा••• मला कसलेही महत्व न देता, माझ्या मुठीतून सुटलाच लेकाचा•••

अरे देवा••• काय करू? कसे करू? मला तर वेळ पाहिजेच आहे••• अरे वेळा, •••किती वेळा तुझी आर्जव करू? •••मला फक्त माझ्यासाठी म्हणून तू हवा आहेस••• तू माझ्या जवळ असला तरी, घरच्यांसाठी••• ऑफिस साठी••• इतर कामासाठी••• मी तुझी विभागणी करते •••आणि मग शेवटी, माझ्यासाठी तू राहातच नाहीस••• माझ्यासाठीही तू रहावस म्हणून, मी खूप आटापिटा करते••• काहीही करून माझ्यासाठी तुझा वेळ घ्यायचाच म्हणते••• पण खूप धावपळ, दमछाक करूनही, माझ्यासाठी म्हणून तू गवसतच नाहीस•••

अरे, बघ जरा इतर प्रियकराकडे••• आपल्या प्रेयसीचा शब्द कसे झेलतात••• त्यांच्यासाठी काय काय करतात••• आणि तू •••? मी तुझ्या प्रेमात ईतकी व्याकूळ होऊनही तुझ्यापर्यंत माझे प्रेम कसे पोहोचत नाही? मागून मागून काय मागते तुझ्याकडे? फक्त तुझा थोडा वेळ ना •••पण अरे वेळा, तुझ्याकडे मला वेळ भेट द्यायला वेळच नाही••• तुझे हेच वैशिष्ट्य आहे ना••• ते मला आकर्षित करते तुझ्याकडे •••आणि मग मी तुझ्याच प्रेमात अधिकाधिक पडते•••

तू माझ्यासाठी रहावास, •••मी तुझ्याबरोबर वेळ घालवावा••• म्हणून माझी सगळी कामे अगदी भराभर उरकते••• माझ्याकडे असलेला वेळ अपुरा पडू नये म्हणून, घरात इतर कामासाठी बाई लावून, तो वेळही वाचवण्याचा प्रयत्न करते •••पण काय जादू करतोस तू? कळतच नाही••• एक काम संपवावे, तर दुसरे काम दत्त म्हणून हजर असते •••मग त्यासाठी नाईलाज म्हणून वेळ द्यावाच लागतो••• तरी ते काम उरकून, मग मी तुझ्या सोबत राहीन••• असे वाटून ते काम उरकते••• तर मुलांना काहीतरी खायची हुक्की येते••• त्यांचा गृहपाठ •••कोणीतरी पाहुणे येण्याचा फोन •••किंवा इतर काहीतरी••• मग ती वेळ, साजरी करण्यासाठी, त्या वेळेत त्या वेळे प्रमाणे नाचणे •••माझे माझ्या प्रियकराला, वेळेला भेटायचे राहूनच जाते••• मग काहीही झाले तरी उद्या आपण आपल्या वेळेला भेटू••• अशी स्वतःची समजूत घालून, स्वप्नातच वेळेला भेटून घेते •••पण तेथेही माझी मुले शिकून मोठी होतील••• चांगली साहेब होतील•••त्यांचे सगळे खूप छान छान चालले आहे••• मला कसलीच काळजी नाही •••असलीच स्वप्ने दाखवून माझ्यासाठी वेळ मला मिळतच नाही•••

काय मी करू? कसा तुझ्याशी संवाद साधू? मला माझे काही छंद जोपासायचे आहेत••• त्यासाठी तुझी मदत मला पाहिजे आहे •••काय म्हणतोस? मग तू इतरांकडे माग वेळ••• तुला काय वाटतं? मी हे केलं नसेल? पण अरे, आजकालच्या जगात, दुसऱ्यांना देण्यासाठी म्हणून कोणाकडेच वेळ नाही रे••• म्हणून तर तुझ्याच मागे लागायचे••• तुझीच आर्जव करायची•••

हल्ली मोबाईल रुपी यंत्र, मंत्र, का मित्र आला आहे ना •••त्यामुळे खरंच लोकांचा खूप वेळ वाचत आहे••• त्यांची बरीच धावपळ कमी झाली आहे••• पण••• मग काय? त्यातच असणाऱ्या गेम्स मध्ये, वेगवेगळ्या ॲप्स मध्ये, ते इतके गुरफटून जातात••• का स्वतःला गुरफटून घेतात••• माहीत नाही •••पण त्यांच्याकडे दुसऱ्यांना द्यायला वेळ नाही••• स्वतःला साठी असलेला वेळ, मस्त टाईमपास करण्यात घालवतात •••पण दुसऱ्यासाठी त्याचा उपयोग करावा असा विचारही मनात येत नाही••• अशी वेळ ••• ••• तूचतर त्यांच्यावर आणली नाहीस ना?

प्रियकरावर नि:संशयपणे प्रेम करावे••• असे असताना सुद्धा, माझ्या वेळेच्या प्रियकरावर मला संशय येऊ लागलाय••• पण••• विश्वासाने सगळे काही मिळते••• यावरही माझा विश्वास असल्याने, मला माझा असा वेळ मिळेलच••• अशी खात्री करून घेते••• आणि तुझ्यावर प्रेम करणे, अखंड चालूच ठेवते•••

पण पुढे असणारा वेळ मी पकडू शकत नाही••• मागे पडलेला वेळ मला सोडावाच लागतो••• आताच्या परिस्थितीतच तू मला पाहिजे आहेस••• माझी व्याकुळता जाणून घेनारे जरा••• मी एवढी काकुळतीला आली आहे म्हटल्यावर, तुला माझी दया आली •••काल खरच माझ्या स्वप्नात, माझ्यासाठी असलेला वेळ होऊन आलास••• मला भेटलास ••• मला म्हणालास, मी तुझे दुःख जाणले••• मग माझे पण दुःख तुला सांगावेसे वाटते••• ऐकशील?

अहाहा••• माझा प्रियकर••• माझ्यासाठी आला आहे••• मग त्याच्यावर प्रेम करायचे तर, त्याच्या ही व्यथा जाणून घ्यायलाच हव्यात ना? •••मग मी अगदी कान टवकारून, जीव एकाग्र करून, त्याचा हात माझ्या हातात घेऊन, म्हटले••• सांग ना••• मला आवडेल ऐकायला•••

तसा वेळ सांगू लागला ••• देवाने जसे तुला जन्माला घातले ना••• तसेच मलाही जन्माला घातले••• तुला बुद्धी तरी दिली आहे••• एक अभिव्यक्ती दिली आहे •••वेगवेगळे अवयव दिले आहेत••• पण माझे काय? जगातील इतके चराचर आहेत••• त्या सगळ्यां साठी चोवीस तास! ••••••• त्यात मला ना आकार••• ना मला काही करण्याचे स्वातंत्र्य••• कोणासाठी काय करायचे •••काय नाही •••हे मी ठरवत नाही •••तरी माझ्याकडूनच सगळ्या अपेक्षा ठेवून अक्षरश: जो-तो माझे लचके तोडत आहे ••• माझे असे लचके तोडणे आता सहन होत नाही••• म्हणून सगळ्यांच्याच पुढे मी धावत राहतो••• मला धावावे लागते••• कारण कोणाच्या हाताला लागलो, की लगेच लचका तोडला जातो •••काय करू मी तरी? जाऊ दे मला••• नाही तर अजून किती जण एकदम तुटून पडतील माझ्यावर •••काही सांगता येत नाही•••

हांऽऽऽऽ पण तुझे माझ्यावरचे प्रेम पाहून, मी खूप सुखावलो आहे••• म्हणूनच माझा वेळ तुझ्यासाठी देण्यासाठी, मी तुला एक कानमंत्र देतो••• बघ तू••• तुलाही वेळ मिळेल••• बघ •••आपल्या वेळेचे नाही, तर कामाचे विभाजन योग्य पद्धतीने कर••• आणि आपली कामे, पूर्ण जबाबदारीने करताना, ठामपणे इतरांनाही सांग••• मी माझी जबाबदारी, माझे कर्तव्य, पूर्ण केले आहे •••आता चोवीस तासांपैकी काही वेळ तरी, मी माझा म्हणून व्यतीत करणार आहे •••एक स्त्री असलीस तरी••• तो तुझा अधिकार आहे••• हक्क आहे••• आणि तो प्रत्येकाने मिळवला पाहिजे••• बघ तू मग••• तुझ्या हातात हात घालून, तू ठरवलेल्या वेळेत, हा वेळ फक्त तुला वेळ देईल•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हलकं फुलकं काही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)  ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ हलकं फुलकं काही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

हलकं फुलकं काही….

निसर्ग आपल्याला मुक्त हस्ताने अनेक गोष्टी देत असतो…

शुद्ध हवा, पाणी, गारवा, फुलं, फळं आणि बरेच काही…..

देणं हा निसर्गाचा गुण आहे….

अनेक गुण अंगी यावेत म्हणून मनुष्य प्रयत्न करीत असतो….

देणाऱ्यांचा हात नेहमी वर असतो आणि घेणाऱ्याचा खाली…

आपला हात कायम वर रहावा असं वाटतं असेल तर आपण द्यायला सुरुवात केली पाहिजे…..

पटतंय ना?

आजचा दिवस आनंदाचा आहे…

© श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुमती देवस्थळे… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ सुमती देवस्थळे… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ही कहाणी आहे मागील पिढीतील एक अत्यंत अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणजे सुमती देवस्थळे यांची. जन्म २७ डिसेंबर १९२७ चा. शालेय शिक्षण पुण्यात. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी एस. पी कॉलेजला बी. ए. ला अँडमिशन घेतली. पहिल्या वर्षाचा रिजल्ट लागला आणि सुमती परांडे हे नाव कॉलेजमध्ये सर्वतोमुखी झाले. कॉलेज मध्ये असताना त्यांनी नाटकात कामे केली आणि अचानकच त्यांचे लग्न ठरले.

सोलापुरच्या देवस्थळे यांचा हा मुलगा. मुंबईत रेल्वेत होता. कायमस्वरूपी नोकरी. लग्न जमण्यासाठी एवढे पुरेसे होते.

पण..

जोडा शोभणारा नव्हता हेही तितकेच खरे. देवस्थळे तसे निरागस.. पापभिरू.. आणि थोडासा न्युनगंड देखील. जोडीला शारिरीक दुर्बलता (असावी).

त्याउलट सुमतीबाईंचे व्यक्तीमत्व आकर्षक.. हुशार.. आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या.

१९४७-४८ चा काळ. इंटरपर्यंत शिकलेली २० वर्षाची ब्राह्मण मुलगी. सर्वसामान्य पणे परीस्थितीला शरण गेली असती. संसारात रमुन गेली असती. पण इथेच सुमतीबाईंचा वेगळापणा जाणवतो.

त्यांनी नोकरी करायचं ठरवलं. जिथे रहात त्याच आवारात एक शाळा होती. समाजातील निम्न स्तरावरील मुलांची. त्या मुलांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली.

नोकरी सुरू झाली आणि त्यांना पुढची पायरी खुणावू लागली. आहे त्यात समाधान मानणे हा त्यांचा स्वभावच नव्हता. नवर्याला मिळणाऱ्या पैशात निगुतीने संसार करणे हा त्या काळातील रिवाज त्यांनी झुगारला. आपण पदवीधर व्हायला हवे असे त्यांना वाटु लागले. आणि त्यांनी रुईया कॉलेजला प्रवेश घेतला.

दोन वर्षे मन लावून अभ्यास केला आणि मराठी, संस्कृत हे विषय घेऊन त्या विद्यापीठात पहिल्या आल्या.

मग पुढची पायरी.. एम. ए. तिथेही दैदिप्यमान यश.

छोट्या छोट्या विषयांवर लेखन करताना ६०-६१ च्या दरम्यान त्या बी. एड. झाल्या. आणि साधना कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये प्राध्यापिका, शिक्षण तज्ञ म्हणून रुजु झाल्या.

आता घरी सतत विद्यार्थ्यांचा राबता. त्यांना मार्गदर्शन.. कॉलेजची नाटके बसवणं हेही सुरू. सुटीच्या दिवशी तासनतास वाचन.. लेखन.

प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी स्वतःची गुणवत्ता सिध्द केली. त्यांचं व्यक्तिमत्त्व आता झळाळून उठलं. मध्यम उंची.. सुदृढ बांधा.. करारी चेहरा. जे करायचं ते पुर्णत्वानंच.

एकिकडे स्फुट लेखन करताना त्यांनी वैश्विक प्रतिभावंतांची चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. अल्बर्ट श्वाईटझर, मँक्झिम गॉर्की यांची त्यांनी लिहिलेली चरित्रे गाजली. टॉलस्टॉयचं ‘वॉर अँड पीस’ वाचलं आणि त्या झपाटुन गेल्या. त्याची स्वभाव वैशिष्ट्ये.. तरल संवेदनक्षमता.. आणि शारीरिक बलदंडताही यामुळे त्या आकर्षिल्या गेल्या.

त्यांना आपल्या गुणांची जाणीव होती. बुद्धिमत्तेचं भान होतं. त्यांनी टॉलस्टॉयचं चरित्र लिहिण्यास घेतलं. खरंतर आताशा त्यांना तब्येत साथ देत नव्हती. वारंवार आजारपणाला तोंड देत होत्या त्या. मुलीनं एका दलिताशी लग्न केलंय हा सल मनाला होताच. हे पुस्तक लिहीताना कदाचित त्यांना जाणवलं असणार.. हे आपलं शेवटचं पुस्तक.

स्वाभाविकच आयुष्यभर कमावलेलं भाषावैभव, संवेदना, मानसिक ऊर्जा सगळं सगळं त्यांनी वापरलं.

कौटुंबिक पातळीवर अपयश आलेलं असताना त्यांनी एक गोष्ट ठरवली होती.. आपलं आयुष्य सर्वसामान्यां सारखं नसावं. पण ते नेमकं कसा असावं याचा शोध आयुष्यभर त्या घेत राहील्या.

‘स्वांत सुखाय’ लिहिलेलं ‘टॉलस्टॉय.. एक प्रवास’ हे पुस्तक मराठी साहित्यात एक मानदंड ठरलं. या पुस्तकाला इतके पुरस्कार मिळतील.. आपल्याला मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल याची त्यांना जाणीवही नसणार.

शालांत परीक्षेनंतर मुलीचे लग्न करुन देण्याचा तो काळ. अश्या काळात लग्नानंतर पतीची कोणतीही साथ नसताना आपली गुणवत्ता सिध्द करणाऱ्या सुमतीबाई देवस्थळी या कर्तबगार स्त्री-रत्नाला आजच्या महिला दिनी वाहिलेली ही एक आदरांजली..!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यमक…. – माहिती संग्राहक : नंदसुत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ यमक…. – माहिती संग्राहक : नंदसुत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

यमक… 

ज्योतीताईंनी एकदा विचारलं, “एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं होते, या काव्यप्रकाराला काय म्हणतात? ” माझा हक्काचा स्रोत म्हणजे आई-दादा!

दादांचा फोन बंद होता आठ दिवसांपासून! जाम बेचैन झाले. म्हणून आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करून ठेवलं. पाचव्या मिनिटाला दादांचा फोन!

“अगं, आत्ताच फोन सुरू झाला आणि तुझा मेसेज वाचला. ऐक, यमकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तू म्हणतेस ते दाम-यमकाच्या जवळपास जाणारं यमक असेल, असं आई म्हणत्ये. “

मागून मला आईच्या नाजूक गुणगुणण्याचा आवाज आला. आईची स्मरणशक्ती अफाट! कोणतीही कविता पाठ असते.

‘श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया ।

मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया ।

सारा या प्रभुची हे लीला गाती सदैवही सुकवी ।

सुकवी भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी ।’ 

(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा)

दादा म्हणाले, “हे बघ ऐक! ” त्यांनी तोवर, ते आठवीत असतानाचं (आईला ८४ वर्षे पूर्ण होतील आता, दादा ८६ वर्षांचे! ) मराठीचं पुस्तक आणलं होतं. पाय प्रचंड दुखतात त्यांचे! पण ब्रिज आणि भाषा हे विषय आले की त्यांना पंख लाभतात!

तर कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. थोडक्यात इथे मांडत आहे.

१) एकाक्षरी यमक:

एक्या पदे भूमि भरोनि थोडी

दुजा पदे अंडकटाह फोडी

(डी ला डी हे एकाक्षरी यमक)

२) द्व्यक्षरी

दे तिसरा पाद म्हणे बळीला

म्हणोनी पाशी दृढ आकळीला

(ळीला हे द्व्यक्षरी)

३) चतुराक्षरी

बाई म्यां उगवताच रवीला

दाट घालुनि दही चरवीला

त्यात गे फिरवितांच रवीला

सार काढुन हरी चरवीला

(काय अफाट आहे ना हे! प्रत्येक ‘चरवीला’ वेगळा आशय मांडतो!)

४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदिचरण सारखा.

सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात

तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात

५) दामयमकाचं उदाहरण वर दिलंच आहे.

६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक.

सुसंगती सदा घडो… पडो.. झडो… नावडो

७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक.

वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो

(वाजत गाजत साजत आजत याजत, अशी गंमत आहे.)

मज मागे मत्स्यांचा हा रिपु-शशि-राहु-बाहु राणा हो

८) युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे.

पायां नमी देइन वंश सारा

पा या न मी दे इनवंशसारा

(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम! )

९) समुद्रक यमक (पूर्ण यमक)

हेही अफाट प्रकरण आहे. – 

अनलस मी हित साधी राया, वारा महीवरा कामा ।

अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा ॥

(-मोरोपंत)

हे (पृथ्वीपते) धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, (बल)रामही हवे तर येतील… मग वराका (लक्ष्मी/संपत्ती) तुझ्या सहाय्यास का येणार नाही?

अशा यमकात चमत्कृती असते; पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!

आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल, माहिती व्हावी म्हणून पाठवत आहे. यमक याविषयी कोणास आणखी काही माहिती मिळाली, तर जरूर शेअर करा.

┉❀꧁꧂❀┉

माहिती संग्राहक : नंदसुत

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्णस्पर्श… – लेखक : श्री विवेक घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कृष्णस्पर्श… – लेखक : श्री विवेक घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

‘कुब्जा’ हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ती मथुरेतील कंसाची दासी. कुरुप, कुबड असलेली एक वृद्धा. कंसासाठी ती चंदन घेऊन जात असते. वाटेत कृष्ण भेटतो. म्हणतो, ‘सुंदरी, मला देशील चंदन?’ 

कुणी तरी तिला प्रथमच ‘सुंदरी’ म्हणाले होते. तिने कृष्णाला चंदनाचा लेप लावला. कृष्ण कुणाकडून तसेच काही कसे घेईल? त्याने कुब्जेच्या हनुवटीला धरून ती वर उचलली आणि कुब्जा खरेच सुंदर झाली.

भक्तांना हे सहजच पटते. चिकित्सकांना ही निव्वळ कल्पित कहाणी वाटते. मला या कथेतून वेगळाच आनंद मिळतो.

कुणी असुंदर असेल तर मान उंचावून कसे वावरेल? त्यात दासी असल्याने तिला ‘तोंड वर करायचा’ अधिकार तरी कसा असेल? कृष्णाने कुब्जेची हनुवटी उंचावली. तिला ताठ व्हायला शिकवले. कुरूप असो की दासी असो; मान वर करूनच जगले पाहिजे, हे भान कृष्णाने तिला दिले.

‘दिसण्या-असण्यातून’ न्यूनगंड निर्माण होऊ न देता आपणही दिमाखात जगू शकतो, हे दाखवण्याची संधी ईश्वराने किती विश्वासाने आपल्याला दिली आहे. कुब्जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही; पण मनातली असुंदरतेची जाणीव कृष्णाने दूर केली, असे मला वाटते.

इकडे आमच्या विठुरायानेही कंबरेवर हात ठेवून, थाटात उभे राहत हे दाखवून दिले की, सौंदर्य नाही तर औदार्य महत्त्वाचे. सौंदर्य येते आणि वयोमानाने ओसरतेही…. औदार्य अठ्ठावीस युगे टवटवीतच राहते.

खूपदा भक्ती करणारेही जेव्हा म्हणतात की, देवा-धर्माचे इतके आम्ही करतो; पण ईश्वराची कृपा काही होत नाही… पण, पारमार्थिक साधना म्हणजे जग बदलणे नाही, तर आपला दृष्टिकोन बदलणे हे समजले की आपल्या वृत्तीच्या कुब्जेला सुंदर व्हायला वेळच लागत नाही.

रखरखत्या उन्हात कुठून कोकीळ कुजन ऐकू आले की मनाला निवलेपण जाणवते ना?

पहिल्या पावसाने आसमंतभर दरवळणाऱ्या मातीच्या गंधाने चित्ताला हरखून जायला होते की नाही?

तान्हे मूल कुणाचेही असो; गर्दी-गोंधळातही आपल्याकडे बघून गोड हसते तेव्हा आपल्याही ओठांवर स्मितरेषा दरवळते की नाही?

…… आपल्याबाबत हे घडते तेव्हा निश्चित मानावे की आपल्याला कृष्णस्पर्श झाला आहे.

…… अंतरीची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच कृष्णाचा साक्षात्कार.

…… मनातली असुंदरतेची, अपूर्णतेची जाणीव संपली की सारे सुंदरच आहे. हे जाणवते.

……. माझ्या कृष्णाने निर्माण केलेले काहीही असुंदर असूच शकत नाही, ही श्रद्धा दृढ असली की झाले!

लेखक : श्री विवेक घळसासी

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाचक…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “वाचक…☆ श्री जगदीश काबरे ☆

वाचक तीन प्रकारचे असतात.

पहिल्या प्रकारचे वाचक हे एखादा विचार वाचला की तात्काळ व्यक्त होणारे म्हणजेच प्रतिक्रिया देणारे असतात.

दुसऱ्या प्रकारचे वाचक एखादा विचार वाचल्यावर त्यावर चिंतन मनन करून त्या विचाराला योग्य शब्दात प्रतिसाद देणारे असतात.

आणि तिसऱ्या प्रकारची माणसे विचार वाचल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत. पण स्वतः मात्र त्या विचारावर विचार करत असतातच. अशा वाचकांना ‘सायलेंट रीडर्स’ असे म्हणतात. कुठल्याही ग्रुपमध्ये अशा सायलेंट रीडर्सची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

तेव्हा आपण जे काही विचार मांडतो त्या विचारावर इतरांची व्यक्त व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा करणेच मुळात चूक आहे. त्यासाठी तो माणूस विवेकी नाही, त्याला बोलायची भीती वाटते, अशा पद्धतीचे आपले मत मांडणे हेच तर खरे अविवेकीपणाचे लक्षण म्हटले पाहिजे.

आपण जे विचार मांडतो ते दोन गोष्टींसाठी… एक तर आपल्याला आपले मन मोकळे करायचे असते म्हणून आणि दुसरं म्हणजे तो विचार मांडून इतरांकडून आपल्याला काही नवीन ज्ञान मिळवायचे असते म्हणून.

मग अशा वेळेला आपल्या विचारावर कोण किती प्रतिसाद देतोय हा मुद्दा अत्यंत गौण आहे. आपण आपले विचार मांडत राहावे, वाचणारे वाचत राहतील, प्रतिसाद देणारे प्रतिसाद देत राहतील, प्रतिक्रिया देणारे प्रतिक्रिया देतील आणि सायलेंट रीडर्स तो विचार वाचून त्यांना पटला असेल तर स्वतःमध्ये मुरवण्याचा प्रयत्न करत रहातील अन्यथा वाचून सोडून देतील. या पलीकडे आपला विचार मांडल्यानंतर त्यावर कोणी कसे व्यक्त व्हावे यावर आपला कुठलाही हक्क राहत नाही. म्हणून आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता कोणालाही दोष न देता शांतपणे आपले विचार मांडत राहावे हेच खरे.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गौरीताई…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गौरीताई…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझी नातं पहिलीत असतानाची गोष्ट. शाळा सुटल्यावर संध्याकाळी रोज मी तिला बाल रंजन केंद्रावर घेऊन जातं असे.

तिथे मुलांचे छोटे छोटे वयानुसार गट केले जातं असतं. अठरा एकोणीस वर्षाच्या मुली… म्हणजे

“ताई” या मुलांना खेळ शिकवतं असतं. प्रार्थना, श्लोक, गाणी, गोष्टी, व्यायाम, ग्राउंड ला चक्कर असे तिथे चालतं असे.

त्या दिवशी गेले तर तिथल्या प्रमुख बाईंनी आमच्या ग्रुपला सांगितले की..

“नेहमीची ताई एक महिना रजेवर आहे. तर ही नवीन गौरीताई मुलांना महिनाभर शिकवणार आहे. “.

पाच फुटाची, सावळी, एकदम हडकुळी पण तरतरीत अशी मुलगी समोर आली. तिने आम्हा सर्वांना नमस्कार केला. मुलांना म्हणाली,

“बच्चे कंपनी चलो”

मुलं तिच्यामागे गेली. आम्ही पालक नेहमीप्रमाणे कट्यावर जाऊन बसलो.

एक आजोबा म्हणाले,

“ही एवढीशी तर पोरगी आहे… ही काय शिकवणार मुलांना? “

“हो न… हिला पाहिल्यावर माझ्याही हेच मनात आलं” दुसरे एकजण म्हणाले.

झालं… लगेचच तिच्या दिसण्यावरून अजून एक दोघांनीही कुठल्या कुठल्या कॉमेंट्स केल्या….

एक जण तर स्पष्ट म्हणाली,

” आपण मॅडमना सांगु ही मुलगी आमच्या ग्रुपला ताई म्हणून नको “…

“लगेच आजचं सांगायच”

” कोणीतरी म्हटलं चार दिवस जाऊ दे मग बघू…. नंतर सांगू”

तिला बघितल्याबरोबर अशी सगळी चर्चा झाली.

जरा वेळाने बघितलं तर आज राऊंड घेताना मुलं वेगळीच पळत होती. हसण्याचा आवाज ऐकू येत होता.

मुलं आज नेहमीपेक्षा जास्त आनंदात होती.

गौरीताई काहीतरी सांगत होती मुलं शांतपणे ऐकत होती. मधेच मुलांचा एकदमच ओरडण्याचा आवाज ऐकू आला…. नंतर मात्र मुलं फार हसत होती. आम्ही लांब बसलो होतो त्यामुळे काय चाललं आहे हे समजत नव्हते.

घरी निघताना मुलं गौरी ताईला अच्छा, टाटा, बाय-बाय करत होती. माझी नातं तर फार खुश होती. घरी जाताना रस्ताभर गौरीताईच कौतुक सुरू होत..

” गौरीताईंनी आज आम्हाला तुरुतुरु चालायला शिकवलं. इतकी मज्जा आली…. “

” तुरुतुरु ” हा शब्द तर तिला फारच आवडला होता.

” आजी गौरीताईंनी वाघाची गोष्ट सांगितली तिने वाघाचा आवाज काढला. आम्हाला तर भीतीच वाटली होती”

” म्हणून तुम्ही मगाशी ओरडत होता का”

” अग हो… ती म्हणाली मागे बघा खरंच वाघोबा आलेला आहे. आम्ही सगळ्यांनी मागे बघितलं तेव्हा ताई हसत होती. “

दुसरे दिवशी ग्राउंड वर जाताना नातं भलतीच उत्साहात होती. दरवाजातच माझा हात सोडून ती गौरीताई कडे पळाली.

गौरी मजा… मजा करत मुलांना शिकवत होती. आज दोन्ही हातांच्या मुठी हनुवटी खाली धरून तिने मुलांना पळायला सांगितले. मुले मस्त हसत होती…. गंमत करत होती… त्यांना हे वेगळं खेळणं आवडलं होतं. एकदा तिने मुलांना लुटुलुटू चालायला सांगितलं. खरंतर चालणं नेहमीच होतं पण लुटुलुटु शब्दाची मुलांना फार गंमत वाटत होती.

सगळ्यांना गोल उभ करून तिने हात पकडायला लावले. एक-दोन-तीन म्हटलं की सगळ्यांनी मध्यभागी जवळ यायचं चार-पाच सहा म्हटलं की लांब जायचं अशी खेळण्यात तिनी गंमत आणली होती.

गौरीला रोज नवीन काहीतरी सुचायचे. गोष्ट अगदी छोटीशीच असायची… पण त्यातल्या वेगळे पणाने मुलं त्यात रंगून जायची.. गुंगून जायची…

काही दिवसातच गौरीताई सगळ्यांची लाडकी झाली होती. बघता बघता महिना संपला. आज तिचा शेवटचा दिवस होता.

मुलांना वाईट वाटत होतं. ताई आता येणार नाही, परत भेटणार नाही म्हणून मुलांना खरोखरं रडू येत होतं.

तिचेही डोळे भरून आले होते. ती छोटीशी हडकुळी सावळी गौरी समोर होती…..

मुलं म्हणत होती,

” गौरीताई तुच आम्हाला शिकव ना “

“ताई किती छान आहे”

” ताई तु मला फार आवडतेस”

“ताई तु जाऊ नको ना”

ताई तुच आम्हाला हवी आहेस”

” ताई किती छान शिकवते”

मुलं अक्षरशः तिच्या ड्रेसला पकडून गोल उभी होती….

ती दोन्ही हातांनी मुलांना जवळ घेत होती. त्यांच्या पाठीवरून डोक्यावरून, गालावरून… हात फिरवत होती…

सगळ्या मुलांचा निरोप घेऊन ती निघाली…

तिचेही डोळे वहात होते…

ती लांबवर जाईपर्यंत मुलं हात हलवत उभी होती…

मी बघत होते…

माझ्या मनात विचार आला..

या मुलीकडे बघून आम्ही कधी असं म्हणू का? तिला पहिल्यांदा बघितल्यानंतर केलेल्या कॉमेंट्स मला आठवल्या.

या छोट्या मुलांना तिच्या रंग, रूपाचं, ऊंचीच काहीही देणघेणं नव्हतं…

ते तिच्या गुणाच्या प्रेमात पडले होते. तिच गुणगान करत होते… निखळं आणि निर्मळं मनाने… तिच्याकडे पाहत होते.

मुलं खरचं निरागस होती.. मनानी स्वच्छ होती..

त्या सात आठ वर्षाच्या मुलांकडे जे सात्विक निर्मळ मन होतं ते आमचा होतं का? तर खरचं नव्हते…

त्यांच वागणं बघुन मला आम्ही काय करायला हवे आहे हे समजले. त्यांच्याकडून काय शिकायला हवे हे पण समजले…

आम्ही अगदी वरवरचं बाह्यरूप बघतो आणि लगेच कोणालाही सहज प्रतिक्रिया देतो… ती ताना त्याला काय वाटेल किंवा तिला काय वाटेल याचा आम्ही कधी विचारही करत नाही.

” किती बारीक झाली आहे “

नाहीतर… ” किती जाड झाली आहे”

” केस किती गेले टक्कल पडायला लागले. “

“केस पांढरे झाले आहेत.. “

“डाय तरी करायचा “

“ही नीटच राहत नाही “

“कसले कपडे घातले आहेत”

” ईतक्यातच चष्मा लागला का? “

” पोट किती सुटलय… “

वगैरे वगैरे…..

तशी यादी खूपच मोठी आहे…

किती आणि काय लिहु… आणि तुम्हाला ती माहित आहे….

हे आठवले म्हणूनच आज आठवणींच्या पेटीतून गौरीताईला बाहेर काढलं…. त्या एक महिन्यात मी तिच्याकडूनही काही गोष्टी शिकले. म्हणूनच मी पण तिला गौरीताईच म्हणणार…

तिची गोष्ट तुम्हाला पण सांगावी म्हणून सांगितली…

नुसती गोष्टच तुम्हाला सांगायची होती का? ….

मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला आता कळलेलेच आहे…

तसे… तुम्ही सुज्ञ आहातच…. करा विचार…

सांगायला नकोच….

थांबते इथे….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

श्री. बजरंग निंबाळकर

भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!

मध्यरात्र उलटून गेली तरी आणखी बरंच रान भिजवायचं शिल्लक होतं. वीज जायच्या आधी सगळं वावर ओलं झालं तरच बरं. नाहीतर ह्या असल्या उन्हात ज्वारी काही तग धरणार नाही हे नक्की!

शिवारात स्मशान शांतता. माणूस नजरेस पडण्याची शक्यता नव्हतीच. झालंच तर भक्ष्य शोधायला बाहेर पडलेला एखादा सरपटणारा जीव जवळून जाईल तेव्हढाच. त्याच अंधारात काम करायचं.. पहाटेपर्यंत. गार हवा आणि डोईवर चांदण्याने भरलेलं आकाश. एरव्ही जमिनीकडे डोळे लावून बसणारे त्याचे डोळे मात्र आज वारंवार आभाळाकडे पहात होते. आज काही चतुर्थी नव्हती.. चंद्र पाहण्यासाठी! पण आकाश तसे निरभ्र होते. एखादा एकाकी, केस पांढरे झालेल्या म्हाता-यासारखा चुकार ढग चंद्रासमोरून जायचा, त्याच्याकडे एकदा बघून घ्यायचं.. त्याच्यात एखादा आकार शोधायचा! मोकळ्या रानात एकाकी असताना करायचं तरी काय? दूरवर कुणाच्या शेतातल्या विहिरीवरची मोटार तेव्हढी कानावर येत होती… ती बिचारी यांत्रिक. आपलं काम इमानेइतबारे करीत पाणी ओढत राहणे, हे तिला ठावे!

आधुनिक तंत्रज्ञानाची कृपा… मोबाईल नावाचं, तळहातावर मावेल एवढं यंत्र, जगाच्याच नव्हे तर विश्वाच्या गोष्टी याचि देही… आणि डोळा दाखवत राहते.. त्याचा मोठा आधार आहे आजकाल. नाही तर पूर्वी रेडीओवर काम भागवावे लागे… त्याचीही बिचा-याची प्रसारण वेळ ठरलेली असायची!

त्याला त्याचे सीमेवरचे दिवस आठवले. शत्रूकडे नजर ठेवत तासान तास उभे राहायचे… अंधार, बर्फ, थंडी, उष्णता यांपैकी काहीच कामाच्या मध्ये येत नसे… मात्र एकाकीपणा जीवघेणा असायचा. डोळ्यासमोर घर आलं की आपण आता जिथे उभे आहोत तिथून घरापर्यंतचं अंतर दिसायचं.. आता निघालं तर किती वेळात पोहचू? असाही विचार यायचा. इथून घरी जाता तरी येईल का असाही विचार येऊन जायचाच… नोकरीच अशी की कशाचा भरवंसा देता येणार नाही.

त्याने मोबाईल मध्ये वेळ पाहिली. सुदैवाने इंटरनेट जिवंत होते… बाकी गाव झोपी गेल्याने रेंजवर ताण कमी असावा…. अजून तसा अवकाश होता थेट प्रक्षेपण सुरु व्हायला… पण आपलं आधीच सुरु केलेलं बरं म्हणून त्याने चिखल माखल्या हातानेच मोबाईलवर गुगल सुरु केलं! ती तिथून निघाली आहे… सतरा तासांनी पोहोचेल… एक दीड तास शिल्लक होता ते सतरा तास खतम व्हायला! इंग्रजीत काहीबाही सांगत होते ते लोक… त्यात त्याला हवं ते नाव उच्चारलं गेलं की बरं वाटत होतं. त्या नावाच्या उच्चाराबरोबर त्याला आणखी एक नाव सारखं सारखं आठवत होतं…. ती अशीच परत येताना जमिनीपर्यंत सदेह पोहचू शकली नव्हती… आज असं नाही ना होणार? शेवटी यंत्र आहे हे… दगा देऊ शकतंच!

शेतातल्या त्या अंधारात त्याच्या चेह-यावर मोबाईलचा उजेड जास्तच स्पष्ट होता आज. पण अधून मधून त्याची नजर आभाळाकडे जाई! सा-या जगाचं आभाळ एकच असलं तर इथून सगळं आभाळ काही नजरेस पडणार नव्हतं.. पण तरीही वाटेकडे डोळे लावणे म्हणतात ते असं प्रत्यक्षात होत होतं..!

थेट प्रक्षेपणात थोडा आवाज वाढला म्हणून त्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर वरून अत्यंत वेगाने काहीतरी खाली येताना दिसू लागले… ताशी सत्तर हजार किलोमीटर्स एवढा वेग आहे, असं ऐकू आलं. पाहता पाहता ती वस्तू खाली आली आणि तिला दोन पंख फुटले… वेग कमालीचा कमी झाला.. थोड्यावेळाने आणखी दोन पंख उमलले!

अथांग, स्थिर निळा समुद्र. लाटा सुद्धा श्वास रोखून होत्या… आणि ती पाण्याला स्पर्श करती झाली… जमिनीला नाही पण जमिनीवरच्या पाण्याला तरी तिचा स्पर्श झाला होता! पहाटेची ४ वाजून २३ मिनिटे झाली होती…. ती सुखरूप बाहेर आल्याची वेळ त्याने आवर्जून पाहून ठेवली…. आपलं कुणीतरी खूप दिवसांनी, जीवावरच्या संकटातून वाचून परतल्याचा आनंद त्याच्या चेह-यावर झळकत होता… शिवारातल्या वाफ्याताल्या पाण्यामध्ये चंद्रही चमकत होता आणि याचा चेहराही!

खूप दिवसांपूर्वी त्याने ऐकले, वाचले आणि पाहिले होते…. आपली एक महिला दूर अंतराळात अडकून पडली आहे. आपली म्हणजे भारतीय वंशाची.. आणि आता अमेरिकी झालेली अंतराळवीरांगना… सुनीता विल्यम्स. आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेली ही शूर महिला आज परतणार, उद्या परतणार म्हणून नऊ महिने तिथंच स्थानबद्ध झाल्यासारखी झालेली. तिला परत आणण्याचे प्रयत्न झाले पण त्यातले काही अयशस्वी ठरले. तिच्या परतण्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यापासून हा गडी त्या बातमीकडे लक्ष ठेवून होता…. ती परत सुखरूप माघारी आल्यावर जणू तिच्याएवढाच आनंद त्यालाही झाला!

त्या रात्री त्या शिवारात ती बातमी कुणाला सांगावी तर तिथे कुणी नव्हतं.. त्याने आपल्या उजव्या हाताची मूठ बंद केली… तो हात उंचावला आणि कोपरापासून खाली खेचला… बहोत अच्छे… तो उद्गारला! आणि दुस-याच क्षणी त्याच्या मनात कल्पना चावलाची छबी तरळून गेली… ती सुद्धा अशीच परत यायला पाहिजे होती!

(भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या गेली नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडल्याच्या बातम्या सर्वच देशप्रेमी आणि सहृदय माणसांना तशा अस्वस्थच करत होत्या. त्या परत येण्याच्या प्रक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. आमचे स्नेही आणि भारतीय सैन्यात मोलाची कामगिरी बजावून निवृत्त झाल्यानंतर लेखक, पत्रकार, प्राणिसेवक, समाजसेवक म्हणून कार्यरत असणारे, सेनादलाची प्रतिमा उंचावल्याबद्दल सन्मानित झालेले श्री. बजरंग तुकाराम निंबाळकर अजूनही शेतात राबतात. त्यांनी शेतीला पाणी पाजता पाजता सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास मोबाईलवर थेट अनुभवला. त्यावेळी त्यांच्या झालेली त्यांच्या मनाची अवस्था बरेच काही सांगून जाते… त्यात देशाबद्दलचे प्रेम तर प्रकर्षाने दिसते.. शेवटी एकदा सैनिक बनलेला माणूस अखेरपर्यंत सैनिकच असतो, हे खरे. जय हिंद, निंबाळकर साहेब!)

(फेसबुकवर आलेल्या पोस्टवर आधारित)

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “१८ मार्च : जागतिक चष्मा दिवस” – संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “१८ मार्च : जागतिक चष्मा दिवस” – संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

दृष्टिदोष सुधारावयाचे किंवा हानिकारक किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे ‘चष्मा’ एक साधन. वर्तुळाकृती, अंडाकृती अथवा इतर विविध आकार असलेल्या तारेच्या किंवा प्लॅस्टिकच्या व भिंग बसविण्यासाठी मधे भोक असलेल्या दोन चकत्या डोळ्या समोर ठेवून त्यांना नाकाजवळच्या बाजूस जोडून तो जोड नाकावर नीट बसेल असे करतात. चकत्यांच्या कानाकडील बाजूंना काड्या जोडून त्या कानावर घट्ट बसवितात. चकत्यांत योग्य प्रकारची भिंगे बसविली म्हणजे नेहमी पाहण्यात येत असलेला चष्मा तयार होतो.

इतिहास

काचेच्या गोल भांड्यात पाणी भरून त्याचा उपयोग वस्तू मोठी दिसण्यासाठी पूर्वीचे लोक करीत असत असा उल्लेख ग्रीक व रोमन लेखक करतात, असे इ. स. १५० मध्ये क्लॉडियस टॉलेमस यांनी वर्णन केले आहे. जुनी हस्तलिखिते वाचताना आणि त्याच्या प्रती तयार करताना पूर्वीचे धर्मगुरू जाड भिंगे वापरीत. १२८२ साली निकोलस बुलेट या धर्मगुरूंनी एका करारावर स्वाक्षरी करताना चष्मा वापरला होता. रॉजर बेकन यांनी पारदर्शक स्फटिक किंवा काच यांचा उपयोग अधू दृष्टी असणाऱ्यांना होईल असे म्हटले असल्यामुळे चष्म्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. पण सु. १२७० मध्ये मार्को पोलो यांनी चीन देशाच्या सफरीत येथील लोक दृष्टी सुधारण्यासाठी भिंगे वापरतात, असा उल्लेख केलेला आढळतो. पंधराव्या शतकात अंतर्गोल भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यावर लघुदृष्टिदोष असणाऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ लागला. काचेची भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यापासून विसाव्या शतकातील भिंगाची व चष्म्याची प्रगती अनेक टप्प्यांनी झालेली आहे. चकत्यांत बसविलेल्या भिंगांना दांडी बसविली गेली. चष्म्याच्या शोधानंतर तीन साडेतीन शतकांनी तो कानावर घट्ट बसेल अशा तऱ्हेने काड्या जोडण्याची कल्पना १८२७-३० च्या सुमारास एडवर्ड स्कार्लेट यांनी काढली. त्यानंतर सु. १७४९ मध्ये दुर्बिणी सारखे चष्मे प्रचारात आले. एकच भिंग वापरण्याची प्रथा १८०६ पासून सुरू झाली आणि स्प्रिंगच्या साहाय्याने फक्त नाकावरच घट्ट बसून राहील असा दोन भिंगांचा चष्मा १८४० पासून प्रचारात आला. प्रत्यक्ष डोळ्यावरच चिकटून राहतील अशा स्पर्श भिंगांची कल्पना १८४५ साली सर जॉन हर्शेल यांनी पुढे मांडली. कर्करोगाने बुबुळ दूषित झाले असताना स्पर्श भिंगाचा संरक्षक व चष्म्या सारखा उपयोग होतो हे म्यूलर या जर्मन गृहस्थांनी यशस्वीपणे दाखवून दिले. या भिंगाचे कॉन्टॅक्ट लेन्स (स्पर्श-भिंग) हे नाव यूजीन फिक या स्विस वैद्यांनी सुचविले.

दृष्टिदोष

विविध कारणांमुळे डोळ्यांत अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात व त्यांचा दृष्टीवर परिणाम होतो. चाळीस वर्षाच्या वयानंतर जवळचे दिसण्यास किंवा वाचण्यास त्रास होतो याला दीर्घदृष्टी म्हणतात. जवळचे दिसण्यास त्रास पडणे हे लक्षण सर्वसाधारणपणे वृद्धपणात आढळते. डोळ्यातील भिंगाचा लवचिकपणा कमी झाल्यामुळे, अन्य रोगामुळे, विशिष्ट जीवनसत्त्वाच्या उणेपणामुळे डोळ्यांच्या रचनेशी संबंधित असलेल्या स्नायूंच्या हालचाली सुसंगत होत नसल्याने अनेक दृष्टिदोष निर्माण होतात. ज्या प्रकारचा दृष्टिदोष झालेला असेल तो दूर करणारा चष्मा तयार करता येतो.

गोलीय भिंगे

नेत्र अनुकूलन सवयीने व सहकार्याने होते याचा उपयोग जवळची वस्तू पाहताना होतो. अनुकूलन कमी झाले म्हणजे वाचताना किंवा बारीक कामावर दृष्टी लावताना त्रास होऊ लागतो. योग्य अशी बहिर्गोल भिंगे वापरली म्हणजे नेत्रपटलावर प्रकाशकिरण केंद्रीभूत होऊन दोष दूर होतात. अनुकूलन सुधारले म्हणजे हा दोष जाऊन दूरच्या वस्तू स्पष्ट दिसू लागतात. एरवी त्या अस्पष्ट दिसतात. लघुदृष्टिदोषात नेत्रगोलाची लांबी वाढल्यामुळे लांबच्या वस्तूवरून येणारे समांतर किरण नेत्रपटलावर न पडता त्याच्या पुढे केंद्रित होत असल्यामुळे ती वस्तू अस्पष्ट दिसते. योग्य अंतर्गोल भिंग (ऋण शक्तीचे) वापरले म्हणजे किरणांचे अपसरण वाढून हे किरण नेत्रपटलावरच केंद्रित होतात.

चित्याकृती भिंगे

दृष्टिवैषम्य हा दोष मोठ्या प्रमाणात आढळतो. या दृष्टिदोषात नेत्रपटलावर केंद्रीकरण होत नसल्यामुळे सर्व अंतरांवरील वस्तू अस्पष्ट दिसतात. दरम्यानच्या कोनात दृष्टी काम करू शकत असली, तरी डोकेदुखी व डोळ्यावरचा ताण या तक्रारी राहतात. दृष्टिवैषम्य चित्याकृती (दंडगोलाकार) भिंग वापरून दूर करता येते.

लोलक बहुकोनी भिंगे

कमी शक्तीचे लोलक वापरून आपाती किरणांची दिशा बदलता येते. यांचा उपयोग काणे डोळे सुधारण्यासाठी करतात. दोन्ही डोळे एकमेकांना सोईस्कर रीतीने राहतील अशा दिशेला वळविले म्हणजे प्राकृत (नेहमीची) दृष्टी कायम राहते. लोलकाचा उपयोग नेत्रगोलाच्या बाहेरील स्नायूंच्या पक्षाघातावर करतात.

द्विकेंद्री भिंगे

लघु आणि दीर्घदृष्टिदोष असणारांना वारंवार चष्म्याची आलटापालट करावी लागते. हा त्रास द्विकेंद्री भिंगे एकत्र बसवून घालवितात. १९०४ साली दोन भिंगांचा पूर्ण मिलाफ करून किंवा अखंड काचेत द्विकेंद्री भिंगे तयार करण्यात येऊ लागली. दोन्ही भिंगांचा बाहेरील पृष्ठभाग एकसारखा असतो. पण लहान भिंगाच्या आतल्या पृष्ठभागाला जास्त वक्रता असते. त्याने वाचता येते किंवा जवळचे पाहता येते.

त्रिकेंद्री भिंगे

यात लांबचा, मध्यावरचा आणि जवळचा असे तीन वेगवेगळ्या शक्तीचे विभाग असतात. मध्य विभागाच्या खालचा आणि वरचा विभाग सारख्याच शक्तीचा असला, तरी त्यांची प्रकाशीय केंद्रे मात्र वेगवेगळी असतात. ही भिंगे दोन डोळ्यांतील विषम प्रणमन दोष दूर करण्यासाठी वापरतात.

विशेष प्रकार

उष्ण भट्ट्यांजवळ काम करणाऱ्यांच्या, काचेचे फुंककाम करणाऱ्यांच्या, धातूंचे रस गाळणाऱ्यांच्या व इतर तत्सम कामे करणाऱ्यांच्या डोळ्यांना अवरक्त प्रारणा पासून इजा होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरतात. जंबुपार प्रारणा पासून वितळजोडाची (वेल्डिंगची) कामे करणाऱ्यांना, या प्रारणाचा उपयोग करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व रुग्णांच्या डोळ्यांना, विशिष्ट परिस्थितीनुसार डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून विविध प्रकारचे चष्मे तयार करतात. क्ष-किरणांपासून अपाय होऊ नये म्हणूनही चष्मे वापरतात.

प्रायोगिक अवस्थेतील चष्मे

१) अंधांसाठी चष्मा

विशिष्ट रंगाशी विशिष्ट स्वराची सांगड घालणे, दुय्यम रंगांच्या स्वरांचे मिश्रण होणे आणि यांचा संबंध सवयीने लावता येणे या तत्त्वावर डी. बी. फॉस्टर या शास्त्रज्ञांनी अंधांसाठी एक चष्मा तयार केला आहे. या चष्म्यात नेहमीच्या भिंगा ऐवजी प्रकाशीय गाळण्या बसविलेल्या असतात. त्यांवर पडणाऱ्या प्रकाशाचे तीन प्राथमिक रंगांत पृथक्करण होते. या प्रकाशाचे प्रकाशविद्युत घटकाच्या साहाय्याने ध्वनीत रूपांतर होऊन कानाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाने त्याची संवेदना मेंदू पर्यंत पोहोचते. अंधांना अशा चष्म्याच्या साहाय्याने संचार करणे सुलभ होईल.

२) अंतरानुसार बदलणारा चष्मा

द्विकेंद्री भिंगांच्या साहाय्याने जवळच्या व लांबच्या वस्तू एकाच चष्म्याच्या साहाय्याने पाहता येणे शक्य असते. तथापि या चष्म्यापेक्षाही अधिक सुधारलेला चष्मा ब्रिटन मधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेतील मार्टिन राइट या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. ज्या अंतरावरील वस्तू पहावयाची असेल, त्या अंतराला योग्य प्रकारे जमवून घेणारी भिंगे या चष्म्यात बसविण्यात आलेली आहेत.

संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण

(संदर्भ : मराठी विश्वकोश/गोखले, श्री. पु. टोळे )

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ याला म्हणतात ‘Positive Thinking…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ याला म्हणतात ‘Positive Thinking…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

“याला म्हणतात” – Positive Thinking 🤣 🤣

— जराशी गंमत

शाळेत असताना टीचर कडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे…. मी हातावरील छडीची घाण पुसत असे.

मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो. 😎  

माझ्या शालेय दिवसांमध्ये, माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत असत, कारण ते काहीही direct मला सांगायला घाबरत असत… 🤣 🤣 🤣

मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे. माझं हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे त्याच कारणास्तव बराचवेळी ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत… 😅

कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती खडू माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत…

उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावा. 😮

परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक Z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंच च्या आजुबाजूला पूर्ण exam. संपेपर्यंत उभे राहत असत. 😟 🤣

कितीतरी वेळा मला बेंच वर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,

कारण बाकी मुलांना मी व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी आणि मला वर्गातले सर्व विद्यार्थी व्यवस्थित दिसायला हवेत हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.🤣

शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती 

माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली मोकळी हवा मिळवी ह्यासाठी मला बर्‍याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात उभा करत असत व मैदानाला 5 फेर्‍या मारायला सांगितल्या जात असत.

त्यावेळी बाकी मुलं मात्र वर्गात घाम पुसत असत व कोंडलेल्या वर्गात गुदमरून शिकत असत. 🤣

मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत….

तू शाळेत का येतोस? … तुला ह्याची गरज नाहिये… 🤣

वाह!! काय ते सोनेरी दिवस होते! 😟

अजूनही आठवतात मला!! 😜

‌………. याला म्हणतात “positive thinking.” 😃😃

सरले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी……. 😇

लेखक : अज्ञात (म्हणजे …. एक अतिशय अभ्यासू, झुंजार, कर्मठ, विश्वासू आणि जागरूक विद्यार्थी) 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares