मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री लेखन स्वातंत्र्य ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ स्त्री लेखन स्वातंत्र्य ☆ सौ राधिका भांडारकर

स्त्रियांना लेखन स्वातंत्र्य आहे का?

ती बोल्ड लिहू शकते का?

ती मनात येणाऱ्या सर्वच भावना सहजपणे लिहू शकते का?

या सर्व प्रश्नांना माझे एकच उत्तर आहे “हो”

“का नाही?”

पण ती लिहीत नाही हे सत्य आहे. चौकटी, मर्यादा, समाजाचे दडपण कोणत्याही प्रकारे तिच्या लेखनासाठी बंधनकारक आहेत असे मला वाटतच नाही.

स्त्रियांचे लेखन संकुचित असायला कारण स्त्री स्वतःच आहे. कारण बऱ्याच वेळा ती स्वतःच उंबरठे ओलांडायला, चौकटी मोडायला, व्यक्त व्हायला,

स्वतःच्या जीवनावर मोकळेपणाने भाष्य करायला तयारच नसते. परिणामी संसार, मुलंबाळं, कौटुंबिक नाती, सासु सुना, नातवंड, नवरा, जावई, सासरे, माहेर, अंगण याच्या पलीकडे स्त्री लेखन वाचायला मिळतच नाही. तिचं लेखन तिच्यापुरतं, तिच्या विश्वापुरतच मर्यादित असलेलं अनुभवायला येतं. फारफार तर नोकरी करणारी एखादी स्त्री लेखिका असेल तर थोडा वेगळा विषय ती हाताळताना जाणवतं परंतु तो विषय हाताळतानाही तिची मुळातली संसारिक सूत्रं वेगळी झालेली जाणवत नाहीत.

तिने लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, कविता, ललित यातही चौकटीतलंच स्त्री जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. काही प्रमाणात विनोदी लेखन करणाऱ्या स्त्रिया आहेत पण त्यातही वाढलेलं वजन, माझे डाएट, शेजारीण, नाचगाण्यासारखे छंद, फसलेली पाककला, अवास्तव खरेदी, दुकानातले सेल, नवऱ्याचं बिच्चारेपण, अचानक येणारे पाहुणे या घरगुती विषयांव्यतिरिक्त फारसं काही वाचायला मिळत नाही. अभिरुची संपन्न, समाजाभिमुख असे पुल, सुभाष भेंडे, द. मा. शंकर पाटील, चिं वि. जोशी, दिवाकर वगैरे पुरुष लेखकांसारखं विनोदी लेखन सामर्थ्य स्त्री लेखिकांमध्ये अभावानेच आढळते. साहित्य क्षेत्रात स्त्री लेखिका आणि पुरुष लेखक असे दोन वेगळे विभाग नकळतच होतात. त्याला एक प्रमुख कारण म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेतील भिन्नता, निरीक्षण शक्ती आणि अभ्यासही. एका ठराविक परिघातच जगत असताना तिचे जीवनातले अनुभवही मर्यादित, चौकटीतलेच असतात. त्या पलिकडच्या जीवनाचा ती विचारही करू शकत नाही. परिघापलीकडे खूप मोठे मानवी जीवन आहे आणि ते टिपण्याचा किंवा त्याही जीवन प्रवाहाचा दूरस्थपणे भाग होऊन निरीक्षणात्मक वैचारिकतेचा प्रभाव तिच्या लेखनावर पडलेला दिसत नाही. ही वास्तविकता असताना समाजाने तिच्या लेखनावर मर्यादा टाकल्या आहेत किंवा ती बोल्ड लिहूच शकत नाही या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. ठीक आहे! एक स्त्री. . “स्त्री विषयकच” लिहिणार परंतु त्यातही बहुतांशी स्त्री लेखिकांचे विचार, अनुभव, निरीक्षण, कल्पनांची व्याप्ती तोकडीच वाटते. तोच तोच पणा जाणवतो. याचं समर्थन “ती बंधनात असते म्हणून. . ” हे होऊच शकत नाही. माझ्या मते स्त्री जेव्हा एखादी कथा, कादंबरी किंवा लेख लिहिते तेव्हा त्यातूनही ती स्वतःला पाहत असते. स्वतःच्या प्रतिमेला जपत असते. “एक स्त्री असूनही तिने असं का लिहिलं?” या समाजाच्या टिकेचं भय तिनेच तिच्यावर पांघरलेलं असतं. आपल्या लेखनातून आपल्यावर “संस्कृती, नीती मूल्याचे पतन झाले” असे ओरखडे ओढले जाऊ नयेत हा प्रचंड मानसिक अडथळा तिच्या मनात तिनेच निर्माण केलेला असतो म्हणून ती मुक्त होऊ शकत नाही आणि मुक्तपणे लिहू शकत नाही.

अर्थात असेही अनुभव स्त्री लेखिकांना आलेले आहेत. कविता महाजन, मेघना पेठे, गौरी देशपांडे यांनी स्त्रियांचेच प्रश्न अतिशय धैर्याने आणि मुक्तपणे हाताळलेत. काही ना त्यांचे लेखन फार आवडलं तर काहींनी नाके मुरडली मात्र वेगवेगळ्या अभिरुचीचे, जडणघडणीचे वाचक हे असणारच पण लेखकाने (स्त्री अथवा पुरुष कुणीही) समाजाचा आरसा बनून वास्तवतेचे दर्शन(सुंदर ते ओंगळ) मुक्तपणे घडवून देऊ नये असा अर्थ होऊ शकत नाही. सखाराम बाईंडर, पुरुष, गिधाडे, बॅरिस्टर या गाजलेल्या नाटकांसारखी, ज्वलंत तडफडणारे विषय असलेली निर्मिती एखादी स्त्री लेखिका करू शकेल का? वास्तविक या टोकाच्या बोल्ड लेखनातही स्त्रियांच्या समस्या आहेत पण त्या पुरुष मनाच्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत म्हणजेच इथे महत्त्वाचा भाग येतो तो दृष्टिकोनाचा. स्त्री लेखिका स्वतःचे दृष्टिकोन विस्तारित का करू शकत नाही? तसलीमा नसरीन, इस्मत चुगताई, मन्नु भंडारी, कमला दास अरुंधती रॉय सारख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लेखिका. समाजाचा प्रचंड विरोध आणि मानहानीला सामोरे जाऊनही त्यांनी लिहिलं. ते चांगलं वाईट याची मीमांसा न करता मुक्तपणे त्यांनी लिहिलं आणि समाजाची एक बाजू उघडी करण्याचं धाडस दाखवलं यात गैर काय??

स्त्री लेखनात विषयाची व्यापकताही कमी दिसते. अश्लीलता टाळूनही शृंगारिक लेखन करता येतं. प्रेमकथा आणि प्रणय कथा यात फरक आहे पण भावनांचा अविष्कार उलगडणारं स्पष्ट लेखन स्त्री लेखिकांकडून होताना दिसत नाही हे सत्य आहे.

 “न राहवून त्याने तिचा पटकन् मुकाच घेतला” किंवा “तिच्या भरदार वक्षस्थळांवर त्याची नजर खिळून राहिली. ” अशा तर्‍हेची भाषा किंवा वाक्यरचना स्त्री लेखिका सहजपणे करू शकेल का? का करू नये? का हरकत असावी? शब्द खेचून धरावेत की मुक्तपणे त्यांची प्रासंगिक उधळण करावी हा चर्चेचा विषय आहे.

कवी कालीदासांच्या मेघदूतातलं यक्षाच्या प्रेयसीचं वर्णन जर सुंदरच वाटू शकतं तर एखाद्या स्त्रीलेखिकेने केलेलं, त्यातलं सौंदर्य जाणून केलेलं रसभरित वर्णन “बोल्ड” का ठरावं? तेव्हा सरळ, सात्विक, मसालेदार किंवा बोल्ड असं काही नसतंच. त्या प्रसंगाची तीच मागणी असते असा विचार का करू नये?

लेखक किंवा लेखिका जेव्हा काही लेखनकृती करते तेव्हा त्यात स्वत:ची गुंतवणूक आणि अलिप्तता दोन्हीची गरज असते. आपण निर्माण केलेल्या पात्रांशी बंध जुळणे आणि प्रत्यक्षात ती पात्रं अलिप्तपणे पाहणे या दोघांचा समतोल साधला गेला तरच उत्कृष्ट आणि मुक्त विचारांचे लेखन होऊ शकतं हे एक लेखनतत्व आहे. त्यात समाज, स्व प्रतिमा, बंधने, मर्यादा याचा प्रश्नच येत नाही. माझ्या मते लेखकाची जबाबदारी ही आहे की भोवतालच्या समाज जीवनाचा सखोल अभ्यास करून त्यावरचे वास्तविक दर्शन देणारे लेखन करतानाही समाजाला चांगला सकारात्मक संदेश देणं ही लेखकाची जबाबदारी आहे. स्त्री लेखकाची आणि पुरुष लेखकाची ही.

काळाबरोबर जीवन पद्धती बदलतात. संस्कृती, नीतीच्याही व्याख्या बदलतात आणि बदलत्या जीवनपद्धतीवर सहअनुभूतीने विचार करून लिहिण्याचे सामर्थ्य स्त्रीलेखिकेकडूनही नक्कीच अपेक्षित आहे. आणखी एक मुद्दाही मला महत्त्वाचा वाटतो “मी एक स्त्री लेखिका म्हणून जेव्हा विचार करते” तेव्हा मला एक जाणवतं की मी रत्नाकर मतकरीं सारखी सुसूत्र गूढकथा नाही लिहू शकत. किंवा आगाथा ख्रिस्ती सारख्या रहस्यकथा लिहितानाही मी कमी पडते. माझ्याच मनाला मी बजावते की हा माझा जॉनर नाही पण हे कितपत स्वीकारार्ह आहे? खरं म्हणजे याला एकच कारण गूढकथा, रहस्यकथा लिहिण्यासाठी लागणारी अफाट कल्पनाशक्ती याचा अभाव. बहुतेक स्त्री लेखिकांबाबत हेच घडत असावं. कल्पनाविश्व किंवा कल्पनाशक्तीचे अपुरेपण यामुळेही स्त्री लेखिका त्याच त्या लेखन वर्तुळात फिरत राहते म्हणून याही गुणांना जाणीवपूर्वक विकसित करण्याची स्त्री लेखिकांना फार गरज आहे असे म्हटले तर ते गैर ठरू नये. ”घरात असता तारे हसरे मी पाहू कशाला नभाकडे” असा वैचारिक कल नसावा. माथ्यावरच्या विशाल नभाकडे जाणीवपूर्वक पाहण्याची दृष्टी मिळवावी आणि मुक्त लेखन बिनधास्त करावे याच मताची मी आहे. मेलोड्रामा किंवा गिमीक्समध्ये अडकू नये. एखाद्या घटनेकडे ती जशी आहे तशी बघण्याची आणि शब्दातून व्यक्त करण्याची गरज ओळखावी. असे लेखन यापूर्वीही स्त्री लेखिकांकडून झालेले आहे. पद्मजा फाटकची हसरी किडनी सुनीता देशपांडे यांचं आहे मनोहर तरी माधवी देसाई यांचं नाच गं घुमा किंवा कांचन घाणेकर यांचे “नाथ हा माझा” स्नेहप्रभा प्रधान यांचं स्नेहांकिता अगदी लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे ही बोल्ड लेखन प्रकारातलीच नव्हे का? अगदी अलीकडेच मी मृदुला भाटकर यांचं “हे सांगायलाच हवं” हे आत्मवृत्त वाचलं. असं लिहायला स्वातंत्र्यापेक्षा धाडसाची गरज असते. म्हणजेच स्त्रिया बोल्ड लिहू शकत नाहीत या विचार प्रवाहाला का वाहू द्यायचे?

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “स्वामी निष्ठा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “स्वामी निष्ठा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… काय रे श्वाना तू इथं माणसांच्या गावात!… एव्हढ्या रात्रीत एकट्याने जोर जोराने भों भों करत भुंकत का म्हणून राहिलास?… आधी तुझं ते केकाटणं बंद कर पाहू… मी कोण आहे ओळखंलस का मला?… अरे शेजारच्या जंगल राज्यातील शेर सिंग प्रधानजी आहे मी नव्हे का? आपल्या सिंह महाराजांनी या गावातील माणसाची एक तरी शिकार घेऊन येण्याची आज्ञा केलीय… अरे तिकडं आपल्या जंगलात काही काहीही खायला मिळेनासं झालंय गड्या… जंगल खाद्या बरोबरच आपणच आपल्या दुर्बल रयतेची शिकार करत करत इतके दिवस तग धरला होता.. पण अलिकडे असं लक्षात आलयं कि हळूहळू आपलीच रयतेची संख्या खूपच कमी कमी होऊ लागलीय… रोडावलीय… म्हणून आपल्या महाराजांनी आता आपल्या रयतेची शिकार इथून पुढे बंद असा फतवा काढला आहे.. तुला काय हे ठाऊक कसे असणार म्हणा… तिथं जंगलातल्या आपल्या माणसांची भुके कंगाल झालेले हाल काय असतात ते… तू इथं या माणसांच्या घोळक्यात माणसळाला गेला आहेस ना त्याच्याच एक दुष्परिणाम असाही झालाय की हि निर्दयी माणसांची जात राजरोसपणे जंगलात घुसून दिसेल त्या प्राण्यांची शिकार करत सुटलेत.. जंगलतोड तर अहोरात्र करत असतातच शिवाय त्यात अशी सावज शिकार करत फिरतात.. आपली स्तिथी न घर का न घाट का करून टाकलीय… जरा कुठे बंदूकीच्या गोळ्यांचा ठो ठो आवाज जंगलात घुमतो न घुमतो तोच झाडावरचे पक्षीगण जसे पंख फडफडवीत नि भीतीच्या कलकलटाने अख्खं जंगल भिरभिरत राहतात नि सगळ्यांना धोक्याची सुचना देतात.. तेव्हा सिंह महाराजांसकट आमची सगळ्यांची कि रे चड्डी पिवळी पडते… थरथर अंग भीतीने कापत जाते आणि आधी स्वताचा बचाव करण्यासाठी संरक्षित जागा शोधत बसावी लागते.. मग उरलेल्या जनतेकडे लक्ष देण्याची बुद्धी येते… अरे जंगलातले हिंस्र प्राण्यांचा समुह कळीकाळालाही कधीही न भिणारा.. तर आपल्या भीतीने इतरांच्या जीवावर शक्तिशाली हल्ला करणारे आपण आता असे गलितगात्र होऊन गेलोय… आता आपण नाही तर हा माणूस नावाचा प्राणी आपल्या पेक्षाही दसपटीने हिंस्र झालाय… आपल्या अस्तित्वाचा प्रश्नच ऐरणीवर आलाय… त्यामुळे आर या पार मग जशाच तसं लढा करताना या गनिमी काव्याचा आधार घेऊन अश्या अंधारातून त्या माणसांच्या गावात शिरून एक तरी शिकार करायचीच आणि त्या भुकेलेली, दुर्बल झालेल्या जनतेच्या भुकेची व्यवस्था करायची… असा एव्हढा मोठा जीवावर उदार होऊन धोका स्वीकारायला माझ्या शिवाय दुसरं कोण तयार होणारं… म्हणून मीच तो विडा उचलला आणि आज पहिल्यांदा इकडच्या माणसांच्या गावाकडे वळलो.. काल परवा पर्यंत त्या पलिकडे च्या माणसांच्या गावाकडे आठवड्यातून दोन तीनदा जात होतो.. पण माझ्या येण्याने त्यांच्यातील दोनचार जणं नाहीशी झालेली त्यांना त्यांच्या कसल्याशा यंत्रात दिसलं आणि जी त्याच्यांत घबराट निर्माण झाली म्हणतोस… आता रात्र रात्रभर खडा पहारा ठेवून एक दोन बंदूकधारी त्यांनी तैनात ठेवले की… अशी ती डोकेबाज माणसांची जात… पण आपणही काही कमी नाही बरं.. तल्लख बुद्दीचं दान आपल्यालाही मिळालयं… मग दिला सोडून तो माणसांचा गाव नि आजपासून दूसरा नवा गावाकडे मोर्चा वळवला… माणसांना जसं जंगलाची कमतरता नाही तशी आपल्याला माणसांच्या गावाचीही कमतरता नाही बरं… अरे तु बघितंल नसशील पण आजही माणसांच्या मनात आपल्या बद्दल खूप खूप भीती आहे बरं… आता त्यांनी रात्री अपरात्री शिकारीसाठी जंगलाकडे येणं हळूहळू बंद केलयं पण आपण आता जंगल सोडून त्यांच्याच गावातच हल्ला करायला येत असतो.. करावं तसं भरावं असते रे… आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आम्हालाच सोडवायला लागणार नाही का… आता कशी नवी नवी युक्त्या काढून आम्हाला पकडून जेरबंद करायला धावू लागलेत… आम्ही असे तसे त्यांना सापडतोय होय वाट बघ… ते जाऊ दे… हे नंतरही तू जंगलात परत आलास की समजेलच.. या बोलण्यात आता जास्त वेळ नको घालवायला… हं तर तू मला मदत कर कुठल्या घरात माणसांची संख्या कमीत कमी आहे आणि डरपोक स्वभावाची आहेत. ती घरं ती माणसं मला दाखवशील.. मी मग दोन तीन दिवसाड येऊन एकेकाची शिकार करून घेऊन जाईन… या कामी तू मला मदत केल्याबद्दल आपले सिंह महाराज सैन्याचा सेनापती पद तुला बहाल करतील… आणि आपलं जंगल राज्य अधिक सुरक्षित राहील त्याचा विस्तार वाढत जाईल… हं मग श्वानमित्रा करतोस ना मदत मला.. म्हणजे माझं काम फारच सोयीचं होईल… चल चल बघू.. “

” हे पहा जंगलराज प्रधानजी महाशय तुम्ही आला तसे मुकाट्याने परत फिरा… तुम्हाला इथं माणसांची शिकार बिलकुल करता येणार नाही.. कारण मी इथला त्यांचा रखवालदार आहे… आमचा तुमच्या त्या जंगल राजशी सुतराम संबंध नाही.. आमच्या कैक पिढ्या इथं या माणसांच्या गावात राहून माणसाळाल्या आहेत.. आम्ही त्याचं मीठ खाल्लेल आहे.. तेव्हा इमानी पणाला जागणं हेच आमचं कर्तव्य ठरतं… सारं गावं माझ्यावर विश्वास ठेवून गाढ झोपेत असतं तेव्हा कोणी एक तस्कर किंवा तुमच्यासारखे जंगलातले हिंस्र प्राणी या गावात येण्याची हिंमत धरत नाहीत… आणि कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल मी असा तसा जंगली शिकारी कुत्र्या पैकी नसून जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या वंशातला आहे… मलाही गावात वट आहे.. मी पहाऱ्याला असताना इथं वाकड्या मार्गाने येण्याची कुणाची माय अजून तरी व्यालेली नाही… तेव्हा मला वाटतं तुम्ही आता फारवेळ हिथं न घालवता ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी निघून जावं हेच बरं.. यात तुमचेच हित आहे.. तेव्हा माझं ऐका… “

” अरे जर्मन शेफर्ड असलास तरी शेवटी तू एक य:कश्चित् श्वान आहेस.. आणि तुझ्या असल्या पोकळ धमकीला मला घाबरण्याचं काही एक कारण नाही… हे पहा तुला जर मला मदत करायची नसेल तर तु मुकाट्याने बाजूला हो.. मला माझ्या सावज टिपून शिकार करण्यास अटकाव करू नकोस.. आणि त्याहूनही जर तू माझ्या वाटेत अडथळा करणार असशीलच तर सगळ्यात आधी मला तुझीच शिकार करावी लागेल… एकदाचा तुझाच कायमचा बंदोबस्त केला म्हणजे माझा मला मार्ग निर्वेध होईल.. कसं.. त्या माणसांनी तुला पाळून तुझी खरी ओळख च विसरायला लावली आहे.. चारपायाचां पशू तू आणि दोन पायांच्या माणसांपुढे आपलं शेपुट हलवतं आपल्या एकनिष्ठेची टिमकी वाजवून दाखवतोस आणि ते ही का तर तुझ्या पुढे टाकलेल्या त्या चतकोर भाकर तुकड्या साठी.. का कशासाठी इतकी लाचारी… का तुझ्या अंगात धमक नाही का तुझ्या तंगड्यात चपळपणा नाही… स्वताची भुक स्वता भक्ष्य शोधून आणण्याची स्वावलंबी वृत्ती नाही.. परावलंबित्व स्विकारून इतकं भिंधेपण तुझ्या रोमारोमात भिनलयं पहा कसं.. आधी स्वताची नीट ओळख करून घे.. त्या मतलबी ढोंगी आणि दगाबाज माणसाच्या नादाला लागू नकोस.. माझं ऐक.. अरे शेवटी आपलं जंगल राज्य हेच सुखाचं आणि सुरक्षित असतयं बरं.. तेव्हा यावर मी शिकार करून येईपर्यंत गंभीरपणे विचार कर आणि मग आपण जंगलाकडे जाऊया… कसं… “

” नाही नाही ते कदापि शक्य होणार नाही.. आता आम्हा कुत्र्याचं जगणं हे जीना यहां मरना यहा इसके सिवा जाना कहा.. असं कायमस्वरूपी ठरलेलं आहे.. जिथलं मिठं खाल्लं तिथे एकनिष्ठ राहायचं हेच आमच्या वाडवडिलांच्या पासून शिकवण मिळाली आहे.. आणि घेतलेल्या वसा प्राणपणाने जतन करायचा.. मग भले त्यात आपल्या जीवनाची आहूती पडली तरी चालेल.. ते जीवन सार्थकी लागले म्हणून समजलं जाईल.. तेव्हा आपण इथं निष्कारण बडबड करण्यात वेळ न दवडता तुम्ही आलात तसे परत जा.. आणि या गावातली शांतता अढळ राहू द्या… “

” मी इतका वेळ तुला बऱ्याबोलानं समजावून सांगितलं तरी तुला आपल्या या प्रधानजीच ऐकायचं नाही ठरवलसं तर ठिक आहे आज तुझ्या शिकारी पासूनच शुभारंभ करतो… ” जबरदस्त ताकदीच्या वाघाने त्या जर्मन शेफर्ड कुत्र्याच्याअंगावर झेप घेतली दोघांनी झुंज देण्यास उलटं पालटं होत एकामेंकाच्या उरावर बसत हाताच्या पंजाने एकमेकाला ओरबाडत आणि तोंडाने मोठ मोठ्याने चित्कारत झटापट करत राहिले… त्यांच्या या गदारोळाने अख्खा गाव जागा झाला.. आ वासून जो तो समोरचं दृश्य पुतळ्या सारखा स्तब्ध होऊन बघत राहिला.. पण पुढे जाण्याची एकाचीही शामत नव्हती… त्या वाघाच्या आणि शेफर्ड कुत्र्याच्या झटापटीत शेफर्ड कुत्र्याने जीवाची बाजू लावून लढत दिली पण अखेर त्या वाघाच्या ताकदीपुढे त्याचा टिकाव लागला नाही.. त्याचे त्राण संपत आले तसे तो ढिला पडला… ते पाहताच वाघाने त्याला आता आपल्या कराल दाढेत धरून त्याचे तंगडे ओढत नेऊ लागला.. पण तिथं जमलेल्या माणसांची गजबज पाहून त्या वाघाने तिथून लवकर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.. शेफर्ड कुत्र्याच्ं तंगड तोंडात घट्ट धरून तो धावत सुटला… पण त्याच वेळी त्या शेफर्ड कुत्र्याच्या अंगात एक विज सळसळत गेली आणि त्यानं तेव्हढ्याच जोरजोराने आपल्या अंगाला असे काही हिसडे दिले कि त्या पळणाऱ्या वाघाला ने डरकाळी फोडताना त्या शेफर्डचं धरलेलं तंगड सोडून दिल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही.. तो तसाच आधी जंगलाकडे पळत सुटला… वाघ गेलेला पाहून सगळे गावकरी त्या शेफर्ड भोवती जमा झाले आणि मग जो तो त्याचं कोडकौतुक करू लागला… शेफर्ड च्या अंगावर काही जखमा झाल्या होत्या त्याच्या कडे त्याने लक्ष दिलं नाही.. त्याला ठाऊक होतं आता माझी काळजी घेणारी माझी माणसं ते सारं पाहतील असा विश्वास त्याला होताच… आज आपण स्वामीनिष्ठेला जपलो याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत राहिलं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

“गझलनवाज पंडित भीमरावजी पांचाळे यांना महाराष्ट्र शासनाचा गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर… “ 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा असा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ गझल गायक गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे उर्फ दादा यांना जाहीर झाला आहे. यानिमित्ताने दादांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… ! 

तसेच मा. महेश मांजरेकर, अनुपम खेर, मुक्ता बर्वे आणि काजोल या मान्यवरांचेही विविध पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… !

गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी गझल गायकी रुजवण्याचा प्रयत्न अखंडपणे केला व आजही तो सुरू आहे. केवळ गझल गायकीच नव्हे तर मराठी हात मराठी गझलेकडे वळविण्याचे मोठेच काम दादांनी केले आहे आणि आजही ते करीत आहेत.

गझल सागर प्रतिष्ठान याची स्थापना करून, त्या अंतर्गत अखिल भारतीय मराठी गझल संमेलने भीमरावदादानी सर्वप्रथम सुरू केली. नुकतेच १० वे अखील भारतीय गझल संमेलन अकोला येथे मोठ्या दिमाखात पार पडले. एखाद्या काव्यप्रकाराचे स्वतंत्र दोन-तीन दिवसीय संमेलन हा एक अनोखा प्रयोग आहे.

गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी घेतलेली गझल संमेलने, गझल लेखन कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने आणि इतर सर्वच काम फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा गझलसम्राट सुरेश भट यांनी रुजवलेल्या मराठी गझल लेखनाचा सर्वांगीण विस्तार करण्यामध्ये गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांचे योगदान अतिशय भरीव स्वरूपाचे आहे. ते गेल्या ३५ ते ४० वर्षांहून अधिक काळ माझे व्यक्तिगत जवळचे स्नेही आणि मोठ्या बंधूसम आहेत. हा माझ्या आनंदाचा व अभिमानाचा विषय आहे. शिवाय ते माझे भारतीय स्टेट बँकेचे सहकारी ही एक वेगळी ओळख आहे.

त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्यात मला नेहमीच आनंद वाटत आलेला आहे. मी गझल सागर प्रतिष्ठानच्या अनेक गझल संमेलनात सहभागी झाले आहे. त्यातला एक प्रसंग सांगते. वाई येथे ” कृष्णा काठावर गणेश घाट आहे. ” अशा ठिकाणी ५वे अखिल भारतीय गझल संमेलन होते. नागपूरहून तिथे जाणं तसं मला कठीणच होतं. बँकेच्या नोकरीत सुट्टीचा प्रश्न होता. तरीही शुक्रवारी रातोरात प्रवास करून मी वाईला सकाळी १० ला पोचले. गेल्यागेल्याच दादांना भेटले. दादांनी मला सांगितलं की, एका ‘मुशायऱ्याचं ‘ आणि गझल मैफिलीचं सूत्रसंचालन मला करायचंय. माझ्यावर एवढा विश्वास दादांनी टाकला होता. मात्र प्रसंग बाका होता.

मुशायरा तर सहज केला मी. रात्रीच्या जेवणानंतर गझलेची मैफिल सुरू झाली. समोर श्रोत्यांमध्ये दस्तुरखुद्द राजदत्त साहेब बसलेले. श्रीगणेशाचं नाव घेऊन मी सूत्रसंचालनाला सुरुवात केली. हातातल्या कागदावर फक्त गायकांची नावे / आणि कुणाची गझल गाणार तेवढे नाव होते.. मला नोट्स काढायलाही वेळ मिळाला नाही. बाहेर कार्तिक पौर्णिमेचं चांदणं पसरलं होतं. पुढे सर्व दिग्गज बसलेले. खच्चून गर्दी झालेली. कदाचित माझ्यातही मंच संचारलं असावं. संगीताचा कान आणि गझलेची जाण यामुळे मी त्यावेळी निभावून गेले. अर्थातच मैफिल सर्वोत्तम झाली… आणि अनपेक्षित पणे राजदत्त साहेबांच्या हस्ते माझा विशेष सत्कार करण्यात आला. हे केवळ दादांचा माझ्यावरचा विश्वास यामुळे घडले. असे क्षण विसरता येत नाहीत. दादांनी असंच आजवर अनेक लोकांना घडवलंय !!!

दुसरा प्रसंग ! लोकव्रत पुणे प्रकाशनाने माझा “सावली अंबराची” हा गझलसंग्रह प्रकाशित केला. त्याचे प्रकाशन व्हायचे होते. मा. शिरीष कुलकर्णी सरांशी माझे बोलणे झाले ! चर्चा झाली की, प्रकाशन कुणाच्या हस्ते व्हावे ? मी म्हटलं “माझ्या गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी दादांना विचारूया का? ” शिरीष सर म्हणाले, “पंडीतजी? ते येतील? ते खूप मोठे आहेत. व्यस्त असतात ते.” पण माझी खात्री होती. दादा हो म्हणतील याची. तसंच झालंही. दादांनी सहज होकार दिला प्रभाशनासाठी. भीमराव दादांच्या हस्ते माझ्या “सावली अंबराची” या गझलांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. शिवाय दादांनी त्याच पुस्तकातली एक गझलही म्हटली. अशा गोड आठवणी फक्त जपायच्या असतात. विशेष म्हणजे माझ्या “सावली अंबराची ” आणि “माझा विचार आहे ” या दोन्ही गझलसंग्रहांची पाठराखण – ब्लर्ब त्यांनीच केली आहे.

दादांनी गझल गायकीसाठी ऐन भरात असलेली भारतीय स्टेट बँकेची नोकरी सोडली. गझल गायकी त्यांना खुणावत होती. नोकरीमुळे “गाणं आणि नोकरी ” ही तारेवरची कसरत होती. कोणाला न्याय द्यायचा ? काय निवडायचं ? त्यांनी गझल गायन निवडलं ! कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होता. विशेष म्हणजे गीता वहिनी तुमचंही हार्दिक अभिनंदन. कारण तुम्ही दादांची सहधर्मचारिणी. खूप छान सांभाळलंत सगळं ! दादांची लेक डॉ. भाग्यश्री ! आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून, नवनवी आव्हाने स्वीकारत नव्या पिढीची दमदार मराठी गझल गायिका आहे. तुझंही अभिनंदन बाळा !

मराठी गझल कशी गावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे पंडीतजी. तीन तासांची बैठक / मैफल कशी संपते हे रसिकांना कळतच नाही. गझल ही शब्दप्रधान गायकी आहे. सुरांसोबत शब्दही तेवढेच महत्वाचे असतात. म्हणून गझलगायन वाटतं तेवढं सोपं नसतं. ते आव्हान दादांनी स्विकारलं. आज नव्या जुन्या अनेक गझलकारांचा गझल ते गातात. दादांनी गझल गायली की तो / ती गझलकारही प्रकाशात येतात.

गझले बरोबरच ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत अशा सर्व शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम संगीतामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठलीही बंधने कलेच्या आड येत नाहीत हेच खरे. मात्र त्यासाठी योगदानही तेवढेच असावे लागते. वेळ येताच शासन, समाज यांना त्याची दखल घ्यावीच लागते. त्यांचं गायन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या सीमा ओलांडून विदेशात गौरवलं गेलं आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी दादांना गौरवून स्वतः गौरवीत झाले आहेत.

हाही पुरस्कार त्याचं एक दृश्य रूप आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळालेला असताना ” मराठी गझल गायकीचा होणारा सन्मान म्हणजे ” दुधात साखरच नव्हे तर केशर वेलची सुद्धा आहे.

रुपये १० लाख रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल श्रीफळ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी एन. एस. सी. आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

मराठी गझल गायकी सातासमुद्रापार पोचवणाऱ्या दादांना मानाचा मुजरा!!

दादांनी अजून खूप खूप गावं, अनेक सन्मान त्यांना मिळावेत हीच शुभेच्छा !!! दादा तुम्हाला लवकरच ” पद्मपुरस्कारानेही सन्मानीत केलं जाईल हा विश्वास आहे. ! त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

© प्रा.सुनंदा पाटील (गझलनंदा)

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२४ – तुळस नसलेली तुळशीबाग… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२४ – तुळस नसलेली तुळशीबाग… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

तुळस नसलेली तुळशीबाग… 

अक्कानी म्हणजे माझ्या आत्त्याने तुळशीबागेत रात्रीच्या आरतीला जाण्याचा नेम कधी चुकवला नाही. अधून मधून ती आम्हांलाही घेऊन जायची. सुरुवातीला वाटायचं एवढं काय आहे त्या तुळशीबागेत? पण नंतर लक्षात आलं, काय मिळत नाही ते विचारा तुळशीबागेत?. अहो पूर्वी म्हणे इथे खूप तुळशी होत्या. म्हणून तर नांव पडलं तुळशीबाग. पण गंमत म्हणजे आता तिथे नावालाही तुळशीचं रोपटं सुद्धा नाही. एकदा संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचलो, आत्या म्हणाली, “मला माझा राम भेटलाय, तुम्हाला जायचं असेल तर जा भटकायला. आम्हाला काय तेच पाहिजे होतं, आम्हीं पूर्ण देऊळ परिसर पालथा घातला. अगदी अलीबाबाच्या गुहेत गेल्यासारखं वाटलं. कानातलं गळ्यातलं, नाकातलं बांगड्यांच्या मोहात आम्ही पडलो. गंमत म्हणून सांगते तुम्हाला, प्रेमाच्या राज्यातून बाहेर पडून लग्न झालेली जोडपी पण तिथे ‘हाजीर ‘होती. त्यातल्या काही नवऱ्याचं लग्ना आधी बायकोला गुलाबाचे फुल, गजरा, गुच्छ, सेंट, अत्तर बाटल्या देऊन झाल्या होत्या. पण हाय रे देवा! ते रोमँटिक क्षण मागे पडले. आणि ते मागे सारून नवरे आता पूर्णपणे संसाराच्या बेडीत अडकले होते. आणि केविलवाण्या चेहऱ्यांनी, ताट वाट्या तवा पोळपाट हा संसारातील पसारा घेण्यासाठी बायकोच्या मागे मागे अगदी धरून पकडून आणल्यासारखे चालले होते. आम्हाला तर बाई हंसूच झालं त्यांच्याकडे बघून. तुझ्यासाठी आकाशातील तारे तोडून आणीन असं म्हणणारे ते ‘हिरो’ उलथन, झारे, चिमटे असं काही बाही विकत घेत होते. कारण तुळशीबागेत मिळणाऱ्या चमचे, चहा गाळणी, कुंचे, पातेली, सतेली घेऊन त्यांना संसार चालवायचा होता आणि बायकोला खुश करायचं होतं. जुन्या पिढीचं लक्ष होतं रामाकडे, तर तरुणाईंचे डोळे हार, कानांतले, नाकांतले, गोंडे, रिबिनी इत्यादी नकली साज शृंगार वस्तूंकडे वळत होते. मारुतीच्या पायरीवर आत्याने आम्हाला जबरदस्तीने बसवलं आणि म्हणाली, ” पुरे झाले हं, आता भटकणं! मी सांगते ते ऐका! तुम्हालाही माहीत असायला पाहिजे. ” आम्हा भाचरांना खाली बसवत ती म्हणाली, ” ही जागा खाजगी वाल्यांची होती. मंदिराची बांधणी मजबूत असून शिखर 140 फूट उंच व कळसच मुळी चार फुटाचा आहे. श्रीराम लक्ष्मण सीतामाईच्या मूर्ती इतक्या देखण्या आहेत की डोळ्याचं पारणं फिटतं, उमाजी बाबा पंढरपूरकरांनी ह्या शुभ, सुंदर, रेखीव मूर्ती मजुरांकडून चाळीस रुपये म्हणजे त्या काळातली मोठी बिदागी देऊन तयार करून घेतल्या होत्या. आपले पूर्वज व्यवहार दक्ष होते नियमित आणि अचूक हिशोब नोंदणी असायची त्यांची. त्यांच्या नोंदणी वहीत ही नोंदआढळली. आमच्या मनात खूप खूप शंका होत्या मी विचारलं, “आत्या पुण्यात खूप रामाची देवळे आहेत का ग? आणि कुठे आहेत?कुणी आणि कधी बांधली गं ? आमच्या बाल सुलभ उत्सुकतेला आत्त्याने हंसून दाद दिली. राम म्हणजे तिचा अत्यंत प्राणप्रिय, आवडीचा विषय श्रोत्यांकडून दाद मिळाल्यावर ती सरसाऊन म्हणाली, “हो तर! ऐका हं!पुण्यात अनेक राम मंदिरे आहेत रास्ता पेठेतला रास्त्यांचा राम, सदाशिव पेठेतला गाय आळीचा राम, रहाळकरांचा राम, फुटक्या बुरुजाकडे जाताना जोशीराम. तर आपल्या आप्पा बळवन्त चौकाकडून केसरी वाड्यावरून लकडी पुलाकडे जातांना लागतो तो भाजीराम. 1762 मध्ये ते मंदिर बांधलं गेलं. “आत्याला मध्येच थांबवत आम्ही ओरडलो, “नक्कीच तिथे भाजीवाले बसत असतील म्हणून तो भाजीराम झाला असेल, बरोबर नागं आत्या? खळखळून हंसत आत्या म्हणाली, “अगदीबरोब्बर. शंभरापैकी शंभर मार्क तुम्हाला. पण अगं तुम्हीं मघाशी चोरखण आळी म्हणालात ना?ते मात्र चूक आहे हं! चोर नाही चोळखण आळीतला वैद्य राम तर टिळक स्मारक, मंदिरात पण बाबा महाराजांचे राम मंदिर आहे. लक्ष्मी रोडवरचं लिखिते मंदिर आणि शिवाजीनगरच्या रोकडोबा समोरचं राम मंदिर पण प्रसिद्ध होत. आत्याला थांबवत आमचे मोठे शिकलेले चुलत बंधुराज म्हणाले, “आत्या तू तर सगळ्या पुण्यातल्या राम मंदिरातून आम्हाला फिरवून आणलंस, हो नागं? आत्या म्हणाली, “मग आता दमलांत की काय? ऐकून दमलात आता चालून दमा. उठा बरं! रामाला प्रदक्षिणा घालायचीय बर का!मगाशी तुळशी बागेला काही बाही खरेदी करायला दुकानं धुंडाळत बाहेरून फेरा मारलात ना! पण आतल्या श्रीरामाला प्रदक्षिणा घालायला विसरलात. उठा बरं लवकर!आणि पळा आता. मला जप करायचाय जपमाळेकडे जाणारे तिचे हात पकडून आम्ही म्हणालो, “अगं आत्तू माळेशिवाय शंभर वेळा जप मगाशीच झालाय तुझा. “तो कसा काय? ह्या तिच्या प्रश्नाला बगल देऊन आम्ही ओरडलो, “आत्तापर्यंत हे राम मंदिर ते राम मंदिर अशी खूप साऱ्या राम मंदिराची ओळख करून देतांना तुझ्या तोंडून हजार वेळा रामाचं नाव निघालं. मग आता कसला वेगळा जप करतेस?” आत्याने पाठीवरून हात फिरवून किताब “दिला, हुशार आहात. ” पण काही म्हण हं आत्या! तुझ्याकडून खूप छान आणि नवीन माहिती आम्हाला मिळाली. आता रामायणातल्या रामाची छानशी गोष्ट सांग ना घरी जाताना. आणि बरं का मंडळी, गोष्टी वेल्हाळ आत्याची रामकथा ऐकता ऐकता आम्ही जोगेश्वरी जवळच्या आमच्या घरी केव्हां पोहोचलो हे आम्हा मुलांना कळलंच नाही..

– क्रमशः भाग २४  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/१  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/१  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

आधी याविषयी काही..….

महर्षी नारद… यांना देवर्षी नारद असेही संबोधले जाते. उत्तम भक्त, तसेच ऋषी वाल्मिकी, महर्षी व्यास, भक्त प्रल्हाद आदि महान ऋषींचे, भक्तांचे गुरू असलेले नारद आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. त्यांचा विशेष गुणांमुळे ते कळीचे नारद म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांची #कळ# ही कळकळींची (जनहितार्थ) होती असे आपल्या लक्षात येईल. त्यांचा #कळी# मुळे कोणाचाही बळी न जाता सर्वसामान्य मनुष्याला जगण्याचे बळ मिळत असे….. !

त्यांनी भक्तीमार्गाचे अनुसरण करून भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि अनेकांना भक्तिमार्गात आणले. “आपल्यासारखे करिती तात्काळ” असे संतांचे वर्णन केले जाते. नारदांसाठी हे वर्णन तंतोतंत लागू होते. पण त्यांची भक्ती सूत्रे सोडली तर महर्षी नारदांचे अन्य साहित्य उपलब्ध असल्याचे माझ्या माहितीत तरी नाही. त्यामुळे “ नारद भक्तिसूत्रे “ हीच त्यांची खरी ओळख आहे असे म्हणावेसे वाटते.

संत एकनाथ महाराज देवर्षी नारदांचा गौरव पुढील प्रमाणे करतात.

“धन्य धन्य तो नारदु, । ज्यासी सर्वा सर्वत्र गोविंदु ।

सर्वथा हरिनामाचा छंदु । तेणें परमानंदू सदोदित ॥

जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ।

ज्याचेनि संगे तत्त्वतां | नित्यमुक्ततां जडजीवा ॥

 – (संदर्भ: एकनाथी भागवत २-३७, ३८)

भक्ति हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. शास्त्र म्हटले की त्याचे नियम असणे स्वाभाविकच आहे. महर्षी नारद आपल्याला या ८४ श्लोकांमध्ये भक्तीचे समर्पक दर्शन घडवतात… या लेखमालेच्या माध्यमातून आपण त्यातील काही प्रमुख सूत्रं पाहणार आहोत. भक्तीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला भक्त, भगवंत आणि भगवंताला प्राप्त करून घेण्याचे साधन समजून घ्यायचे आहे. त्याआधी नारदमुनीचे संक्षिप्त चरित्र आपण पाहू.

भागवत प्रथम स्कंध अध्याय पाचमध्ये स्वतः नारदांनी आपले चरित्र व्यासांना सांगितले आहे. नारद म्हणतात, “ हे महामुने ! मी पूर्वकाली एक दासीपुत्र होतो. एक वेळी वर्षाऋतूत चातुर्मासाच्या निमित्ताने आमच्या गावी बरेच योगी संतमहात्मे आले. त्यावेळी मी लहान बालक होतो. माझ्या मातेने मला त्या महापुरुषांच्या सेवेकडे सोपवून दिले. मी जरी लहान होतो तरी मी जितेंद्रिय होतो. त्या महात्म्यांपुढे मी मुळीच खोडकरपणा करीत नव्हतो. शांतीने, संयमाने मी त्यांच्याजवळ बसून राही व ते सांगतील ते काम करीत असे. यामुळे ते समदृष्टी होते तरी माझेवर विशेष प्रसन्न राहात होते, व कृपा करीत होते. त्या मुनींच्या आज्ञेने मी त्यांच्या पात्रातील उच्छिष्ट खात असे. त्या प्रभावाने माझे सर्व किल्मिष दूर झाले. असे करीत असता काही काळाने माझे चित्त शुद्ध झाले. ज्यामुळे त्यांनी कथन केलेल्या भागवत धर्मात मला गोडी निर्माण झाली. ते लोक नित्य श्रीकृष्णकथा गात होते व मी त्या संतांच्या अनुग्रहाने त्या मनोहर कथांचे श्रद्धेने श्रवण करीत होतो. यामुळे भगवंताचे ठिकाणी माझी बुद्धी जडली. “

सांगणारा कोण आहे यावर त्या सांगण्याचे मूल्य ठरत असते. इथे भक्तिशास्त्र सांगणारे देवर्षी नारद आहेत, त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने आणि पूर्ण श्रद्धेने या सूत्रांकडे पाहाल असा मला विश्वास आहे.

सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचें। परंतु येथें भगवंताचें। अधिष्ठान पाहिजे।।

– समर्थ रामदास (दासबोध 20. 04. 26)

*****

सूत्र क्रमांक ०१ / १ 

अथातो भक्तिं व्याख्यास्यामः

अर्थ : अथ (आता) अत: (यापुढे) भक्ति (भक्तीचे) व्याख्यास्यामः (आम्ही व्याख्या करीत आहोत)

विवरण 

आपण भक्ति सूत्रे अभ्यासणार आहोत, अर्थात भक्ति शास्त्राचा अभ्यास करणार आहोत. शास्त्राचा अभ्यास करताना काही गृहितके पाळणे गरजेचे ठरते, त्यामुळे विषय समजायला मदत होऊ शकते.

१. मी आहे.

२. जगत् आहे

३. ईश्वर आहे

४. माझा व जगाचा संबंध आहे.

५. ईश्वराचा जगाशी संबंध आहे.

६. ईश्वराचा माझ्याशीही संबंध आहे.

७. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, तर मी अल्पशक्ती आहे.

८. ईश्वर ज्ञानी आहे तर मी अज्ञानी आहे.

९. ईश्वर सर्वशक्तिमान आहे तर मी अल्पकर्ता आहे.

१०. ईश्वराचा असलेला संबंध माझ्या बाजूने जिवंत ठेवण्यासाठी ईश्वराची इच्छा तीच माझी इच्छा झाली पाहिजे.

अथ म्हणजे आता… !

#आता# या शब्दात आधी काही तरी घडले आहे, काहीतरी कृती केली आहे असे भासते. आता या शब्दाचे अर्थ आपण अनेक प्रकारे लावू शकतो. “मागण्याचा अधिकार प्राप्त झाल्यावर”, “आता तू इतके कर* या अर्थाने, असे अनेक अर्थ काढता येतील, फक्त ते समष्टीच्या अर्थाने घ्यायला हवेत. पुढे अत: हा शब्द आहे. त्याचा अर्थ या पुढे असा आहे.

श्रीसमर्थांनी दासबोधात या नऊ भक्तींचे अत्यंत मार्मिकपणे वर्णन केलेले आढळते. भक्तिमार्गातील या नऊ वाटा आहेत असे म्हणता येईल. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील कोणतीही वाट शेवटी चंद्रभागेला जाऊन मिळते. तसे या मार्गांपैकी कोणत्याही वाटेने गेले तरी भगवंतांच्या चरणाशी पोहोचणार यात बिल्कुल संदेह नसावा.

भक्तीचे नऊ प्रकार सांगण्यात आले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. भक्तीच्या या प्रत्येक प्रकारामध्ये श्रेष्ठ भक्तही होऊन गेले आहेत. श्रवण-परीक्षित, कीर्तन-शुकाचार्य, स्मरण-प्रल्हाद, पादसेवन-लक्ष्मी, अर्चन-पृथू राजा, वंदन-अक्रूर, दास्य-हनुमान, सख्य-अर्जुन, आत्मनिवेदन-बली असे ते श्रेष्ठ भक्त होऊन गेले. या नऊ प्रकारांना नवविधा भक्ती म्हणतात. पहिले तीन प्रकार परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्यास सहाय्यक ठरतात. पुढचे तीन हे भगवंताच्या सगुण रुपांशी संबंधित आहेत आणि शेवटचे तीन हे आंतरिक भाव आहेत. पहिल्या तिन्हीत नामाला विशेष महत्त्व आहे. भगवंताच्या यश, गुण, महात्म्य इत्यादी गोष्टी सश्रद्ध मनाने ऐकणे ही श्रवणभक्ती होय. श्रवणानंतर स्मरण आणि कीर्तन संभवते. कीर्तनात नृत्य, गीत व वाद्य या तिहींचाही समावेश होतो. संगीताच्या साथीवर होणाऱ्या कीर्तनात जे वातावरण निर्माण होते, त्यात भावविवशता आणि आनंदमयता आपोआप प्राप्त होते. बरेचसे भक्ती साहित्य गेय पदांच्या रुपानेच निर्माण झाले आहे. यात मग्न राहणे म्हणजेच स्मरणभक्ती होय. पादसेवन भक्ती ही मूर्तिपूजा, गुरुपूजा, भगवत् भक्तांची पूजा यास्वरुपात होऊ शकते. श्रद्धा आणि आदर यांनी युक्त अशी पूजा करणे याला अर्चनभक्ती म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की, मूर्ती, सद्गुरू आणि भक्त यांच्या ठिकाणी भगवान वास करतो. भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्या अनंत महिम्याचे अंतरात ध्यान करीत, त्याची स्तुती करणे याला वंदनभक्ती म्हणतात. श्रीहरी हाच माझा मायबाप आहे, प्रभू सर्वकाही आहे आणि मी त्याचा सेवक आहे, अशा भावनेने भक्ती करणे हिला दास्यभक्ती म्हणतात. परमात्मा हा माझा मित्र आहे, साथी आहे, बंधू आहे, अशा भावनेने भक्ती करणे, याला सख्यभक्ती म्हणतात. आत्मनिवेदन ही भक्तीची सर्वोच्च पायरी आहे. यामध्ये सर्वस्वी शरण जाणे होय. आपला सर्व भार प्रभूवर टाकणे, याला आत्मनिवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदन भक्ताला अशा अवस्थेत घेऊन जाते, की तेथून त्याला सर्व विश्व ईश्वरमय दिसू लागते.

ईश्वराच्या ठिकाणी पराकाष्टेचा अनुराग म्हणजे भक्ती अशी भक्तीची सुलभ व्याख्या करता येईल.

भगवंताच्या ठिकाणी अत्यंत अनुरक्ती ठेवणे आणि त्या अवस्थेत आनंदानुभव घेणे, ही भक्तीची साध्यविषयक बाजू आहे. भक्ती केल्याने मनुष्याचे मन आनंदी राहते, शांत राहते आणि असे अनेक लौकिक आणि अलौकिक लाभ होत असतात. सात्विक, राजस आणि तामस असे भक्तीचे तीन भेदही सांगण्यात आले आहेत. ‘सगुण भक्ती’ आणि ‘निर्गुण भक्ती’ असेही भक्तीचे मार्ग आहेत.

सध्या समाज खूप बदलला आहे. प्रत्येक गोष्टीचा वेग वाढला आहे. समाजात असुरक्षितता वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. प्रत्येकाला कमी श्रमात मोठे यश मिळवावेसे वाटतं आहे. महागाई वाढत आहे. पैसा हेच सर्वस्व असल्याचे वाटू लागले आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनू पाहत आहे. अशा परिस्थितीत माणसाचा स्वत:च्या कर्तृत्वावरचा विश्वास कमी होऊ लागला आहे. शरीरसुखाच्या भौतिक साधनांत वाढ होत आहे. नवनवीन संशोधनामुळे निर्माण होणाऱ्या औषधांमुळे आयुर्मयादा वाढली आहे. असे असले तरी या विज्ञानयुगातही बरीच माणसे भगवंतांकडे /भक्तिमार्गाकडे झुकू लागली आहेत, स्वतःला समजेल तशी ईश्वरभक्ती करू लागली आहेत हे एक चांगले लक्षण आहे. परंतु मनुष्य करीत असलेली भक्ति ही शुद्ध असावी, यासाठी भक्तीमार्गांचा वस्तुनिष्ठ अभ्यास असणे अत्यावश्यक आहे. ‘भक्ती’ म्हणजे नेमके काय ? 

भक्तीची एक व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल….

‘दुसऱ्यावर अकारण, निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे भक्ति.’

संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात,

“तुका म्हणे धन्य संसार ती आलीं । हरीरंगीं रंगलीं सर्वभावें सर्वभावें ॥५॥”

(सार्थ तुकाराम गाथा अभंग क्रमांक १७५३, धार्मिक प्रकाशन संस्था)

मनात, अर्थात मनाच्या प्रत्येक भावात जर भगवंत सामावला गेला तर भगवंत दूर नाही असे सर्व संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत.

भक्ति सूत्रे अभ्यासण्यासाठी काहीतरी पात्रता असणे गरजेचे ठरते. (अर्थात कोणतेही शास्त्र/शस्त्र शिकण्यासाठी किमान अर्हता अपेक्षित असतेच)

इथे तर भक्ति शास्त्र शिकून मनुष्याला, साधकाला भगवतांची प्राप्ति करून घ्यायची आहे. त्यामुळे साधकाने साधन, आपण त्यास उपासना म्हणू शकतो, त्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत. त्यास साधन चातुष्ट्य असे म्हटले जाते. त्याचा विचार आपण पुढील लेखात करू.

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः सूत्र १ / १ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नोंदी…” भाग – १ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – १ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

वीस एक वर्ष झाली असतील.

तेव्हा माझी मैत्रीण एका एनजीओ साठी काम करत होती. प्रोजेक्टच्या अनुषंगाने रिमांड होम मधील मुलांना समुपदेशन हा तिच्या कामाचा भाग होता. माझ्या घराच्या जवळ ही शाळा असल्याने आठवड्यातून एक दिवस मुलांना गणित शिकवायला येशील का असे तिने विचारले. यातली तीन मुले अतिशय हुशार होती आणि स्कॉलरशिप परीक्षेला त्यांना बसवायचे ठरवले होते.

अर्थात हा सुद्धा एक प्रयोग होता. आठवड्यातून एकदाच असल्याने मी हो म्हटले.

मुलांशी बोलणे हा माझ्या कामाचा विषय नव्हता. त्यांना गणितातील काही विषय शिकवणे आणि पेपर सोडवून घेणे इथपर्यंत माझी सीमा होती.

इथल्या मुलांवर चोरीपासून खुनापर्यंत आरोप होते. बहुतेक मुलं अतिशय निम्नस्तरीय वर्गातून आलेली असल्याने घरातून प्रेम, संरक्षण हा मुद्दा गृहीत धरण्यासारखा नव्हता. अनेकजण त्यामुळे निर्ढावलेले असतात.

यातल्या एका मुलाने आपल्या वडिलांचे लिंग कापले होते. त्यांच्या रखेलीला (मला याच शब्दात त्याचा अपराध सांगितला होता) भाजून मारायचा प्रयत्न केला होता. आईला सतत मारहाण बघून आधीच डोके सरकलेले आणि त्यात एक दिवशी वडील या बाईला घरीच घेऊन आले म्हंटल्यावर त्याचा संयम संपला.

तेरा/ चौदा वर्षाचा होता तो. बऱ्यापैकी शार्प होता. समज होती आणि शिकण्याची आवड होती.

“त्याने जे काही केलेआणि का केले ते पाहता त्या बाबतीत वाईट वाटणे स्वाभाविक आहे पण ते तुझ्या वागण्यातून दिसता कामा नये. दोन गोष्टी आहेत. एक त्याचा चुकीचा भूतकाळ आणि एक त्याचा बरोबर होऊ शकेल असा भविष्यकाळ.

त्याने का केलं हे कितीही दुःखदायक असेल तरी ते चुकीचेच आहे आणि सहानुभूतीने तू त्याला वागवायला जाशील तर आपण केलं ते बरोबरच असे त्याच्या मनात राहील. हे नको व्हायला. आपण केलं ते चूक हे त्याला पटलच पाहिजे तर तो यातून काहीतरी शिकेल. महत्त्वाचे आहे ते मनावर संयम ठेवून, आपला भविष्यकाळ घडवणे. दुसऱ्यांना शिक्षा देणे, हा जगण्याचा हेतू नसावा. ”

ह्या सूचना मिळाल्याने असेल, आमचे संबंध शिक्षक आणि विद्यार्थी एवढेच मर्यादित असूनही, त्या मर्यादेत चांगले राहिले. त्याला स्कॉलरशिप मिळाली नाही पण बाहत्तर टक्के मिळून तो पास झाला. नंतर माझा संपर्क तुटला.

त्या मुलाची परिस्थिती आणि त्याचा सामाजिक वर्ग वेगळा होता तरीही “Adolescence” सिरीज बद्दल होणाऱ्या चर्चा आणि प्रतिक्रिया यामुळे हा मुलगा आठवला.

Adolescence सिरीज पाहिली. मुलगा आणि त्याच्याच वयाच्या काही मुलांबरोबर बसून पाहिली. सिरीज खूप आवडली. अभिनय उत्तम आणि जिथे पालक आणि मूल यात अंतर पडत जाणे हे अपरिहार्य होत जाणार आहे अशा काळात प्रत्येक पालकांनी पहावी.

पाहताना भीती वाटली, अस्वस्थ वाटले तर नाही…

हे प्रत्येक काळात घडत असते. मुलांचा अपमान करणे, चिडवणे, वाळीत टाकणं आणि त्या अनुषंगाने होणारे परिणाम सुद्धा प्रत्येक काळात तेवढेच वाईट असतात. मजा म्हणजे त्यांचे जे वर्तन असते ते आधीच्या पिढीसाठी आक्षेपार्ह, धक्काजनक असेच असते.

मुलगा तिशी ओलांडून गेला असल्याने, त्याला यातले काही शब्द माहिती आहेत, काही नाही पण त्याच्या काळात, ऑर्कुट हा प्लॅटफॉर्म होता. ओळखीची, अनोळखी सुद्धा मुले असायची आणि तेव्हा सुद्धा एक कोड language होती.

पुरुषार्थ काय याच्या चाचण्या होत्या, मुलींचे boobs कमी असतील तर मुलींना complex असायचा.. त्यावरून नावे ठेवली जायची आणि त्त्या वयात ते vicious असायचे/ वाटायचे.

मुलगा पाचवीत मी त्याची शाळा बदलली होती. नवीन शाळा, नवीन मुलं, त्यात हा स्कॉलरशिप मिळून गेलेला, शिवाय उत्तम तबला वाजवायचा, गायचा. दिसायला सुद्धा गोड. पटकन मित्र झाले.. आता हे खटकणारी मुले सुद्धा असतात. एक मुलगा त्याला सारखा कडकू, पडवळ.. आणि असलच काही, चिडवायचा. नेहेमी हसत जाणारा मुलगा गप्प गप्प असतो हे लक्षात लगेच आले पण हा काही सांगेना.

आता शाळेत जायचेच म्हणून मी ठरवले त्याच्याच आदल्या दिवशी घरी आला तर तोंड लाल, पायावर वळ.. रडून लाल झालेलं डोळे..

“अरे, काय झाले?” तर सांगेना.

शेवटी मित्राला फोन करते तर म्हणाला, “मी मारले त्याला. मला सारखा चिडवत होता म्हणून मी मारले. “

आता हा बेदम मार खाऊन आलाय ते कळत होते पण त्याचाही सेल्फ रिस्पेक्ट रहावा म्हणून म्हटले, “अरे, लागले नाही ना त्याला ? “ 

“He is thick skinned. He is hippo.. तुला त्याचीच दया.. वाईट आहेस.. (मुसमुसणे) 

त्याला काय लागणार. मी उद्या कंपास घेऊन हातात घुसवणार त्याच्या. (आता डोळे लाल आणि चमकायला लागले) 

पोटात धस झाले..

त्याला ओरडून उपयोग नव्हता. आई म्हणजे आधार असे त्या वयात वाटते त्याला तडा जायला नको म्हणून त्या मित्राच्या आईला फोन करून, मारामारी झाली त्याबद्दल विचारले. सॉरी म्हटले. त्या मुलाने आपले वर्जन दिलेले.. सुदैवाने ती सुद्धा मुलाला ओळखणारी आई होती.

दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत गेलो. दोघांना एकत्र बसून समजावले. माझ्या मुलाने वर्गातल्या वीस मुलांना वाढदिवसाला घरी बोलावून त्याला वगळले याचा राग होता, तो तुला मी आता बोलावेन पुढच्या वर्षी म्हणून काढून टाकला.

आता ही सिरीज पाहिल्यावर वाटले, एक पोटेन्शियल खून किंवा डोळे बिळे फुटणे टळले.

ही चेष्टा नाही.. it could have gone either way… खून वगैरे नाही पण काहीतरी भलत्या जागी लागणे सुद्धा ओरखडा उमटवून गेले असते. दोघांच्या आई सजग होत्या असे म्हणेन मी.

सिरीज मधले आईवडील सुद्धा अतिशय चांगले होते मग असे का घडले..

मुळात माझ्या मुलाला सुद्धा एकदम कंपास का आठवला.. आम्ही दोघेही हिंसक नाही..

तर मी आता डॉ स्वाती केळकर यांनी लिहिलेले “द ब्रेन” वाचते आहे. त्यात असे म्हटले आहे, मानवी मेंदू अनुभवांनी, परिस्थितीने बदलतो. तो अनुभव ग्रहण करतो आणि त्यानुसार स्वतःला adapt करतो.. आई वडील, शेजारचा भवताल, शाळेतील मित्र, बघितलेले सिनेमा, नाटक, कार्टून सगळ्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो आणि आताच्या जगात ही गोष्ट टाळता येत नाही. फार तर मी असे म्हणू शकते, मुलात घडलेला बदल टिपण्याची नजर, वेळ आणि जाणीव माझ्यात होती.

मुलगा तरी आताचा. माझ्या वेळेला, म्हणजे चाळीस एक वर्षापूर्वी एक जाड्या मुलाला आम्ही आमच्या भाषेत पी स्क्वेअर म्हणायचो. पर्मनंट प्रेग्नंट.

ए, पी स्क्वेअर आला बघ. बिचारा चुपचाप जायचो.. बरे त्याची गरज नव्हती पण मजा. एक मुलगी खूपच उफाड्याची होती. ती ताठ उभी राहिली ना आम्हा किरकोळ मुलींना ते कायतरीच वाटायचे. त्या वरून असल्या वाह्यात कोट्या केल्या होत्या कधीतरी. आता हे आठवले आणि मलाच काटा आला अंगावर. अत्यंत अभ्यासू आणि शांत म्हणून ओळखायचे पण तुमच्या ग्रुप मध्ये अशा आगावू गोष्टी होतात.

तिने मला तेव्हाच भोस्कायला पाहिजे होते का असेही एक क्षण मला ही सिरिज बघून वाटले. हादरलेल्या लोकांनी आपल्या भूतकाळात डोकावून पाहिले तर अनेकांना victim दिसतील. कधी आपण, कधी दुसरे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी नाईराजानं ते पैशाचं एन्व्हलप खिशात ठेवलं. पूर्वीपेक्षाही त्या पैशांचं ओझं मला आता जास्त जाणवू लागलं. ते ओझं हलकं केल्याशिवाय मलाच चैन पडणार नव्हती. मी सर्वांचा निरोप घेतला. जाताना केशवरावांना म्हणालो,

“माझ्याबरोबर कोपऱ्यावरच्या रिक्षा स्टॉपपर्यंत चला ना प्लीज”. ते तयार झाले. मी मनाशी निश्चय पक्का केला. अगदी मनाच्या तळ्यातलं जे जे ते सगळं त्यांच्याशी बोलायचं असं ठरवूनच टाकलं. पण ते माझं बोलणंच नंतर पुढचं सगळं अतर्क्य घडायला निमित्त ठरणार होतं याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती.)

केशवराव आणि मी घराबाहेर पडलो. चार पावलं चालून गेल्यावर वाटेतच एक सार्वजनिक बाग दिसली. मी घुटमळलो.

“काका, आपण इथं बागेत बसूया पाच मिनिटं? मला थोडं बोलायचंय. ” सगळा धीर एकवटून मी विचारलं. ते ‘बरं’ म्हणाले. आम्ही आत जाऊन बसलो. मला सुरुवात कशी करावी ते समजेचना.

“बोल. काय बोलणार आहेस.. ?”

‘तू लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस.. ‘ हे माझ्या मोठ्या बहिणीचे शब्द मला आठवले आणि आपलं कांही चुकत तर नाहीय ना असं वाटून माझं अवसानच गळून गेलं. मी मान खाली घातली. त्यांच्या नजरेला नजर मिळवण्याचं धाडस मला होईना.

“बोल ना अरे,.. तू गप्प कां? काय झालंय.. ?”

त्यांचे आपुलकीचे शब्द ऐकून मला थोडा धीर आला.

“घरी.. ताईपुढे.. हे सगळं बोलता आलं नसतं म्हणून तुम्हाला त्रास देतोय… ” मी कसंबसं बोलायला सुरूवात केली. आवाज भरून आला न् मी बोलायचं थांबलो. त्यांनी मला अलगद थोपटलं. त्या स्पर्शानेच माझे डोळे भरून आले. मी महत्प्रयासाने स्वतःला सावरलं.

“काका, थोडं स्पष्ट बोललो तर रागावणार नाही ना?”

“नाही रे बाबा,.. बोल तू. “

“काका, आमच्या ताईशी तुमचं लग्न झालं ती खूप नंतरची गोष्ट ना हो? त्याआधी ती आमचीच होती.. हो ना? आमच्या घरातली. आमच्याचसारखी. फक्त तिचं तुमच्याशी लग्न झालं म्हणून तिच्या सगळ्या सुखदुःखांवर फक्त तुमचाच अधिकार कसा?

त्यातला आमचा वाटा आम्हालाही द्या ना. तो तुम्ही दोघेही नाकारता कां आहात?.. ” माझा आवाज भरून आला. आवेग ओसरेनाच.

“अरे.. असं काय करतोयस वेड्यासारखं?” ते मला समजावू लागले.

“मग पुष्पाताई आणि काका दोघे इकडे आले, तेव्हा त्यांनी दिलेले पैसे घेतले कां नव्हते तुम्ही? ‘नको’ म्हणून नाकारलेत कां? आज माझी भाऊबीजही ताईने नाकारली. कां? मी फक्त वयानं लहान म्हणून कुणाला कांहीच विचारायचं नाही कां?… “

माझं बोलणं ऐकून ते मनातून थोडंसं हलले. निरूत्तर झाले. थोडावेळ शून्यांत पहात राहिले. आता स्पष्ट बोलायची हीच वेळ होती.

“काका, हे फक्त तुमच्यावर नाही, आपल्या सर्वांवर आलेलं संकट आहे हे लक्षात घ्या. तुम्ही एकटे नाही आहात. आपण आता मी सांगतो तशी कामं आपण वाटून घेऊया. नोकऱ्यांमधल्या दूरवरच्या पोस्टिंगमुळे मला न् दादाला इथे राहून ताईची काळजी घेता येत नाहीय याचं दोघांनाही वाईट वाटतंय. तेव्हा आईने ठरवलंय तसं ताई बरी होईपर्यंत आई इथे राहून सगळं घरकाम सांभाळू दे. तुम्ही आणि अजित-सुजित ताईच्या औषधांच्या वेळा, तिला हवं-नको सगळं बघताच आहात. अजितच्या काकूंची एरवीही सोबत असतेच शिवाय त्या

हॉस्पिटलायझेशन असते तेव्हा रात्रभर तिच्याजवळ थांबून तिला सांभाळतातही.. यातली कुठलीच जबाबदारी आम्हा भावंडांना मनात असूनही शेअर करता येत नाही. त्यामुळे आजपर्यंतचा आणि याच्या पुढचाही ताईच्या उपचारांचा सगळा खर्च आम्ही भावंडं एकत्रितपणे करणार आहोत. त्याला तुम्ही प्लीज नाही म्हणू नका.. “

मी बोलायचं थांबलो. माझ्या बोलण्यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. ऐकता ऐकता त्यांची नजर गढूळ झाली. नजरेतल्या ओलाव्याने त्यांचा आवाजही भिजून गेला.

“तुला माझ्या मनातलं, अगदी खरं सांगू कां?” ते म्हणाले, ” हे मी आत्तापर्यंत घरी कुणापाशीच बोलू शकलेलो नाहीये. कारण माझ्यासारखे घरातले आम्ही सगळेच तुझ्या ताईच्या विचारानेच अस्वस्थ आहोत. तुझ्या बोलण्यातली तळमळ मला समजतेय. तुम्हा सगळ्याच भावंडांच्या सदिच्छांचाच मला या अगतिकतेत खूप आधार वाटतोय. पण खरं सांगू? तुझी ताई आता थोड्याच दिवसांची सोबतीण आहे हे निदान मी तरी मनोमन स्वीकारलंय. पहिल्या दोन केमोजच्या रिअॅक्शन्स तिला खूप त्रासदायक ठरलेल्या आहेत. तिसरा डोस अजून साधारण महिन्यानंतर द्यायचाय. तो ती कसा सहन करेल याचंच मला दडपण वाटतंय. त्यानंतरच ऑपरेशनची गरज आहे कां नाही हे ठरेल. एखादा चमत्कार घडला तरच ऑपरेशन न करता ती बरी होईल हेच वास्तव आहे आणि मी ते स्वीकारलंय. म्हणूनच माझ्या मनातल्या या घालमेलीची तिला कल्पना येऊ न देता मी रोज हसतमुखाने तिला सामोरा जातोय. कसलेही अवास्तव हट्ट न करता अतिशय समाधानानं तिने मला आजवर साथ दिलेली आहे. मला तिचा उतराई व्हायचंय. म्हणूनच मी तिला समजावतो, धीर देतो, हेही दिवस जातील हा माझ्यापरीने तिला विश्वास देत रहातो. ‘तुला कांही हवंय कां?.. जे हवं असेल ते मोकळेपणाने सांग.. मी आणून देईन.. ‘ असं मी तिला नेहमी सांगत, विचारत रहातो. ती हसते. ‘काही नको.. मला सगळं मिळालंय’ म्हणते. खूप शांत आणि समजूतदार आहे ती. त्यामुळेच निदान बाकी कांही नाही तरी तिच्या औषधपाण्याचा खर्च माझ्या कष्टाच्या पैशातून झाल्याचं समाधान तरी मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. माझी ही भावना तू समजून घे. माझ्या नुकत्याच झालेल्या रिटायरमेंट नंतर हे संकट आलंय. यामागे ईश्वरी नियोजन असेलच ना कांहीतरी? म्हणून तर नेमक्या गरजेच्या वेळी माझ्या फंड ग्रॅच्युईटीचे आलेले साडेतीन लाख रुपये आज माझ्या हाताशी आहेत. माझ्या कष्टाच्या पैशातून तिच्या औषधपाण्याचा खर्च करायचं समाधान खूप महत्त्वाचं आहे रे माझ्यासाठी. असं असताना तुम्ही देताय म्हणून तुमच्याकडून पैसे घेणं योग्य आहे कां तूच सांग. तुम्ही सगळीच भावंडं मला कधीच परकी नाही आहात. माझ्याजवळचे हेही पैसे संपतील तेव्हा इतर कुणापुढेही हात न पसरता मी पहिला निरोप तुलाच पाठवीन. मग तर झालं?विश्वास ठेव माझ्यावर. “

मी भारावल्यासारखा त्यांचा प्रत्येक शब्द न् शब्द मनात साठवत होतो. ते बोलायचे थांबले तसा मी भानावर आलो.

“नक्की.. ?”

“हो.. नक्की. वयाने लहान असूनही तुम्ही प्रेमानं, आपुलकीनं, सगळं करू पहाताहात हे खरंच खूप आहे आमच्यासाठी.. ” ते मनापासून म्हणाले. मला खूप बरं वाटलं. मनातली रुखरूख विरुन तर गेलीच आणि केशवरावांबद्दलचा आदर अधिकच दुणावला. परतीच्या प्रवासात याच विचारांची मला सोबत होती. विचार करता करता खूप उशीरा माझ्या लक्षात आलं की वरवर ‘हो’ म्हणत केशवराव पैसे घ्यायला नाहीच म्हणाले होते! तरीही त्या मागचा त्यांचा विचार आणि भावना खूप प्रामाणिक आणि निखळ होत्या. ताईच्या घरातली ही ‘श्रीमंती’ हाच तिचा भक्कम आधार रहाणार होता!

ज्या क्षणी हे नेमकेपणानं जाणवलं आणि माझ्याकडून स्वीकारलं गेलं त्या क्षणीच ताईला मदतीच्या रूपात कांही द्यायचा माझ्या मनातला अट्टाहास संपला. आता एकच इच्छा मनात होती, या जीवघेण्या दुखण्यातून माझी ताई पूर्ण बरी होऊन पुन्हा ते घर पूर्वीसारखं हसतखेळत रहावं. त्या ‘आनंदाच्या झाडा’ची पानगळ संपून त्याला पुन्हा नवी पालवी फुटावी. ताईच्या मनात तरी यापेक्षा वेगळं काय असणार होतं? आणि शिवाय तिच्याही मनात वेगळ्या रूपातला कां असेना पण ‘तो’ आहेच की. तिची कसोटी पहाणारा आणि ताई कसोटीला खरी उतरेल तेव्हा तिला जे हवं ते भरभरून देणारा! ताई खरंतर प्राप्त परिस्थितीला तोंड देत, असह्य यातना सहन करीत, या कसोटीला उतरण्याचा जीवापाड प्रयत्न करते आहेच की. ते फलद्रूप होतील? व्हायलाच हवेत…. ‘ मी भानावर आलो. ताईच्या मनांत आत्ता याक्षणी असेच उलटसुलट विचार येत असतील? ती काय मागत असेल तिच्या मनातल्या

‘त्या’च्याकडे?… परतीच्या त्या संपूर्ण प्रवासात मनात असे भरून राहिले होते ते ताईचेच विचार…. !!

तो प्रवास संपला तरी तिची विवंचना आणि काळजी पुढे बरेच दिवस मनात ठाण मांडून माझं मन पोखरत राहिली होती…. ‘तुझी ताई आता थोड्या दिवसांचीच सोबतीण आहे हे मी मनोमन स्वीकारलंय’… हे केशवरावांचे शब्द पुढे कितीतरी दिवस मनात रुतून बसले होते. कितीही सकारात्मक विचार करायचा म्हटलं तरी त्यांचे ते शब्द मन बेचैन करत रहायचे.

ताईला केमोचा तिसरा डोस देऊन झाल्याचं समजलं तेव्हा वाटलं आता प्रतिक्षा संपली. आता कांही दिवसातच तिचा पुढचा चेकअप होईल आणि ऑपरेशन करावे लागेल की नाही याचा निर्णयही. आम्ही सर्वजण त्या निर्णयाचीच वाट पहात होतो. आॅपरेशन करायचं म्हटलं तरी ती ते सहन करू शकेल कां याबद्दलची साशंकता डाॅक्टरांनी पूर्वी व्यक्त केली होतीच.. आणि ती.. नाही सहन करू शकली तर.. ? केशवराव म्हणाले तसा खरोखरच एखादा चमत्कार घडून ऑपरेशनची गरज न भासताच ताई बरी होईल कां? असेच सगळे उलटसुलट विचार मनाला व्यापून रहायचे. थोडी जरी उसंत मिळाली तरी आम्ही भावंडं आपापल्या सवडीने ताईला भेटून येत असू. त्या भेटीत माझ्या आईच्या मनातली घालमेल, केशवरावांच्या बोलण्यातली अगतिकता, अजित-सुजित दोघांच्याही

नजरेमधे जाणवत रहाणारी व्याकुळता,.. हे सगळंच माझं मन अस्वस्थ करणारं होतं!

अखेर ताईच्या संपूर्ण चेकअपची तारीख ठरली… , ऑपरेशनची गरज निर्माण न होताच ती बरी व्हावी असं सर्वांनाच अगदी मनापासून वाटत होतं.. , याच अस्वस्थ अनिश्चिततेत चार दिवस

कापरासारखे उडून गेले.. !

आता प्रतिक्षा होती ती फक्त तिकडून येणाऱ्या फोनची… आणि त्यादिवशी फोनचा रिंगटोन वाजताच तिकडचाच फोन असणार ही खात्री असल्यासारखा मी फोनकडे धावलो…

फोन तिकडचाच होता…. !

“मामा… मी अजित बोलतोय…. “

त्याच्या उत्तेजित झालेल्या स्वरांनी माझा थरकाप उडाला… त्याच्या आवाजातली थरथर मला स्पष्ट जाणवली आणि मी थिजून गेलो… त्याला ‘बोल’ म्हणायचं भानही मी हरवून बसलो. थरथरत्या हातातला रिसिव्हर कसाबसा सावरत मी तसाच उभा होतो.. !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बंबईया… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ बंबईया ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

‘संपर्कासाठी भाषा’ हा उद्देश ठेऊन जर तिसरी भाषा शिकवायची असॆल तर २३ वी राज्यभाषा म्हणून तत्काळ ‘बंबईया’ हिंदी ला मान्यता देऊन तिचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा ही विनंती, अध्यक्ष महोदय !

शिकण्यास, आत्मसात करण्यास सोपी.

घरातून निघाल्या पासून रिक्षा, बस, रेल्वे स्टेशन, लोकल, मेट्रो मुंबईतील प्रेक्षणीय ठिकाण, शाळा, कार्यालये ते परतीचा प्रवास, सगळीकडे कायम बोलली जाणारी ही भाषा पहिली पासून मुलांना (किमान MMRDA क्षेत्रातील) शिकवली तर ते त्यांना पुढील आयुष्यात फायद्याचे ठरेल.

मातृभाषेची ‘मुळं’

बंबईया हिंदीची खोडं’

आणि awesome हिंग्लीश ने भरलेली ‘पानं फुलं ‘

– – – असा हा भाषेचा वटवृक्ष, त्री-भाषा सूत्राचा कल्पवृक्षच जणू

या भाषेतील परीक्षेतील काही sample प्रश्ण

१) वडा-पाव कसा मागाल?

उत्तर: भाऊ, दो- वडा पाव ‘पार्सल’,

‘चटणी’ मत लगाना

२) पब्लिक ट्राॅस्पोर्ट मधील संवादाची उदाहरणे द्या.

उत्तर: अ) कंडक्टर : सुट्टा देना, सुट्टा देना. मेरे पास मोड नही है!

          ब) गर्दीच्या लोकल मधे- ए भैया, सरक बाजूला, बिच मे काय को खडा है बे !

३) मित्र/ मैत्रीणींमधील संवाद

उत्तर : out of सिलॅबस, हे शिक्षण १ ते ४ थी अभ्यासक्रमात सध्या तरी नाही

आणि म्हणून

या भाषेची लागवड पहिली पासूनच करावी ही परत एकदा सभागृहाला विनंती

…. (बंबईका सब से बडा स्ट्रगलर) अमोल 

© श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आम्हां काय त्याचें” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “आम्हां काय त्याचें” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ 

पुण्यात पहलगाम हल्ल्याची बातमी समजली, तेव्हा मी एका मिटींगमध्ये होतो. आजूबाजूला बरीच माणसं होती. काम संपवून मी बाहेर पडलो आणि तशाच अस्वस्थ मनस्थितीत घरी आलो. येताना डोळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मस्त निवांत आणि आनंदाने मजा करणारे “भारतीय नागरिक” दिसत होते. कुठं कुणी गटागटाने सिगारेट्सचे झुरके घेत उभे होते, कुठे कुणी खाऊगल्लीत मस्त आस्वाद घेत होते, कुठे एखाद्या हॉटेल बाहेर लोक वेटींग मध्ये होते, मॉल खचाखच भरुन वाहत होते. काश्मीरमध्ये काहीतरी विपरीत घडवून आणलं गेलं आहे आणि हिंदू व्यक्तींना वेगळं काढून मारण्यात आलं आहे,हे लोकांच्या खिजगणतीतही नव्हतं.

‘जन्माला आलो हेच कर्तृत्व’ अशा अनेकांच्या वाढदिवसाची तयारी केकशॉप्स च्या बाहेर सुरु होती. आजही बारा वाजता सात-आठ ठिकाणी वाढदिवसाचे फटाके वाजलेच..!

आमच्या बाजूच्या वस्तीत कुठल्याशा कार्यक्रमाचा डॉल्बी चालू होता. काश्मिरबद्दल दुःख व्यक्त करायला सवड कुणाला आहे इथं ?

“भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.” हे शब्द शालेय वर्षं संपली की लोक विसरुन जातात. नंतर “भारत कधी कधी माझा देश आहे” अशी त्यांची धारणा होते. आणि आणखी काही वर्षांनी “भारत माझ्या फायद्यापुरताच माझा देश आहे” अशी मनस्थिती होते. हेच सत्य आहे.

आपल्याकडे सिनेमा थिएटर्स मधून प्रत्येक शो च्या आधी राष्ट्रगीत होतं. पण किती खाजगी कोचिंग क्लासेस मधून प्रत्येक बॅच च्या सुरुवातीला दररोज राष्ट्रगीत होतं? किती भाजी मंडयांमधून रोज राष्ट्रगीत होतं? किती स्पर्धापरीक्षा सेंटर्स मधून दररोज प्रत्येक बॅच च्या सुरुवातीला राष्ट्रगीत होतं? किती मॉल्स मधून दररोज राष्ट्रगीत होतं? हे शोधलं आहे का कुणी? शालेय वयात रोज म्हटलं जाणारं राष्ट्रगीत नेमकं कळत्या वयात आल्यानंतर ऐच्छिक कसं होतं? याच्या उत्तरावर कुणी शोधपत्रकारिता केली आहे का?

हिंदू सणांना अवाढव्य डॉल्बी लावणारे, फ्लेक्स लावणारे आता निषेधाचे फ्लेक्स लावणार का? निषेध आंदोलन करणार का? श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करणार का? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? पहलगाम मध्ये अगदी वेचून काढून २८ हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, याच्या निषेधार्थ या डॉल्बीजीवी लोकांनी काय केलं? क्रिकेट मॅच जिंकल्यावर रस्त्यांवर एकत्र येऊन जल्लोष करणारे भारतीय नागरिक अशा दुःखद प्रसंगी एकत्र का येत नाहीत ? गाड्यांच्या नंबरप्लेट्स वर ‘हिंदू ‘ असं केशरी अक्षरांत लिहून घेणारे आता पहलगाम मधल्या हिंदूंच्या संहाराबाबत काय भूमिका घेणार?

“काश्मीर मध्ये आत्ता काय घडलं, ते तुम्हाला माहिती आहे का?” यावर कुणी पत्रकार किंवा व्हिडिओ जर्नलिस्ट पुण्यातल्या मॉल्स मध्ये मुलाखती घेत फिरला का? त्यानं मजा मारणाऱ्या तरुणांना विचारलं का? एका तरी आंदोलक संघटनेला “आता तुम्ही याचा निषेध का केला नाही?”असं विचारलं का? आयपीएल च्या टीम्स काळ्या पट्ट्या लावून खेळणार का? कालपासून एक तरी माध्यम प्रतिनिधी स्वतःच्या दंडाला काळी फित लावून वृत्तांकन करताना दिसला का?

एकाही दुकानाबाहेरची विद्युत रोषणाई काल बंद करण्यात आली नाही. कुठल्याही घराची मंगल कार्यासाठी केलेली रोषणाई काल बंद करण्यात आली नाही. उलट मोठमोठ्याने डॉल्बी लावून लोक नाचत होते. एखाद्या महापुरुषाच्या बाबतीत काही घडलं की, देशभर दंगली उसळतात. त्याप्रसंगी जे हातात दगड घेतात, बसेस फोडतात, वाहने पेटवून देतात, ते आज हिंदूंच्या अशा प्रकारे कत्तली झाल्यावर व्यक्त का होत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. सामान्य माणसांच्या भावना जितक्या त्यांच्या आराध्य महापुरुषांशी जोडलेल्या असतात, तशाच त्या राष्ट्रभावना आणि देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हिताशी जोडलेल्या असतात का? ह्याचं उत्तर आजतागायत कुणी शोधून काढलंय का?

कुणी कुठं एखादं वाक्य आक्षेपार्ह बोललं की, त्यावर त्याच्या फोटोला जोडे करण्यापासून ते त्याच्या फोटोवर लघुशंका करेपर्यंत आंदोलक निरनिराळी कृत्ये करतात. इथं तर भारताच्या २८ हिंदू नागरिकांनी केवळ हिंदू असल्यामुळे जीव गमावला आहे, आता कुणाचा आणि कसा कसा निषेध करणार?

काल एकाही मराठी कार्यक्रमाच्या आधी श्रद्धांजली आणि निषेधाची स्लाईड दाखवण्यात आली नाही. पुण्यातल्या चौकाचौकात डिजिटल जाहिरातींचे बोर्ड लावले आहेत, त्यावर निषेधाच्या स्लाईड दाखवण्यात आल्या नाहीत. भर गर्दीच्या चौकात हातात कुठलेशे पाचकळ बोर्ड हातात घेऊन रिल्स बनवणाऱ्यांनी काल निषेधाचा बोर्ड हातात घेऊन रिल्स केली नाहीत. एकाही स्टँड अप कॉमेडियनने “मी ह्या कृत्याचा निषेध करतो” असा बाईट केला नाही.

आपण भारतीय नागरिक अशा घटना मनाला लावून घेतच नाही. कारण त्यात आपलं स्वतःचं व्यक्तिगत असं काहीच नुकसान झालेलं नसतं. “ज्यांचं नुकसान झालं आहे, ते बघून घेतील, मला काय त्याचं?” ही अंगात मुरलेली वृत्ती आपण कधी आणि कशी उपटून काढणार? हा प्रश्न आहे.

अशा घटना घडल्यानंतर समाज म्हणून आपण काय करतो, हे आता तरी देशाचा घटक म्हणून स्वतःच्या आतल्या आवाजाला आपण विचारणार आहोत का?

किती शाळांमधून आज सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मैदानात एकत्र उभे राहून या मृत हिंदूंना श्रद्धांजली अर्पण केली? किती परिवारांमधून पालकांनी आपल्या मुलांशी या घटनेबाबत बसून सविस्तर चर्चा केली? किती कोचिंग क्लासेस नी श्रद्धांजली आणि निषेधासाठी एक मिनिट वेळ दिला? किती स्पर्धा परीक्षा सेंटर्स आणि अभ्यासिकांमधून सनदी अधिकारी होण्यासाठी अभ्यास करणाऱ्या मुलामुलींनी काल आणि आज या घटनेवर निषेधात्मक भूमिका व्यक्त केली? आहे का ह्याचं उत्तर कुणाकडे? हे सगळे म्हणतील – “ते आमचं कामच नाही आणि असा काही निषेध करायला आम्ही बांधील नाही. आम्ही कशावर व्यक्त व्हायचं अन् कशावर नाही, हे तुम्ही आम्हाला शिकवू नका.”

मला कालपासून प्रश्न पडला आहे की, आता विद्यापीठातल्या ललित कला केंद्राच्या वार्षिक परीक्षा सुरु होतील, त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा होईलच. काही काळापूर्वी रामायणावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाखवणारे विद्यार्थी पहलगाम च्या घटनेवर आधारित नाटक करणार का? पुरुषोत्तम करंडक किंवा फिरोदिया मध्ये पहलगाम घटनेवर आधारित एक तरी स्क्रिप्ट दिसणार का? मराठी नाट्यसृष्टी किंवा चित्रपट सृष्टी मध्ये या घटनेवर एकतरी वास्तव आली सत्य कथानक पडद्यावर येणार का? आहे का ह्याचं उत्तर?

मातृभूमीला माता मानणाऱ्या परिवारांमधून “आम्हा काय त्याचे” ही वृत्ती आधी खोडून काढली पाहिजे. घराघरांतून मुलांना “आपण असल्या भानगडीत पडायचं नसतं. तू तुझा अभ्यास कर” असले डोस देणं आधी बंद केलं पाहिजे. हा आपल्या देशाचा प्रश्न आहे आणि तो अत्यंत गंभीर आहे, हे आपल्या देशातल्या प्रत्येक कुटुंबानं मान्य केलं पाहिजे. कुटुंबातून राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याचे संस्कार जोवर प्राधान्यक्रमाने होणार नाहीत, तोवर “मला काय त्याचे ” ही भारतीयांची वृत्तीच शत्रूचं बळ वाढवणारी ठरणार आहे. संपूर्ण देश केवळ सोशल मीडियावर नाही तर प्रत्यक्ष सक्रिय रुपात एकत्र उभा राहिला तरच जगाला योग्य संदेश जाणार आहे.

नागरिक म्हणून आमचं चारित्र्य जितकं प्रखर राष्ट्राभिमानी असायला हवं तितकं आहे का? सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्याव्यतिरिक्त आमची स्वतःची भारतीय नागरिक म्हणून काही भूमिका आहे का? आणि निरपराध व्यक्तींना केवळ धर्मांधतेमुळे मुद्दाम मारण्यात आलं, ह्याचं सुतक देशातला प्रत्येक हिंदू पाळणार का? ह्या प्रश्नांची खरी आणि प्रामाणिक उत्तरं मिळू शकणार नाहीत. कारण, “मला काय त्याचे” ही वृत्ती आमच्या रोमारोमांत भिनली आहे.

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुटका… लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सुटका… लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

भर समुद्रात एक बोट फुटली. एक माणूस वाचला आणि एका छोट्या बेटाच्या किनाऱ्याला लागला.

तो म्हणाला, देवा, तुझा चमत्कार अद्भुत आहे. तू माझा जीव वाचवलास.

त्याने त्या निर्जन बेटावर झावळ्यांची, पानांची एक झोपडी बांधली. तिच्यात तो राहू लागला. मासे मारून, फळं तोडून खाऊ लागला. कधीतरी एखादंजहाज जवळून जाईल आणि आपली सुटका होईल, अशी त्याला आशा होती.

तो सतत देवाची प्रार्थना करत असायचा.

एक दिवस तो फळं गोळा करून परत आला, तेव्हा त्याची झोपडी जळत होती, धुराचे लोट आकाशात उठत होते. ते दृश्य पाहून तो वेडापिसाच झाला. परमेश्वराला कोसू लागला. तू निर्दय आहेस, माझा आसरा हिरावून घेतलास. देव आहेस की सैतान, असं बोलू लागला. तेवढ्यात एक जहाज त्याच्या बेटाच्या दिशेने येताना दिसलं…

…बेटावरून सुटका होऊन जहाजावर आल्यावर त्याने कॅप्टनला विचारलं, पण, या बेटावर मी अडकलोय, हे तुम्हाला कसं समजलं?

कॅप्टन म्हणाला, तू धुराचा सिग्नल दिला होतास ना, त्यावरून.

लेखक: ओशाे

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares