मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (चौथा माळ) – जीवनाच्या रणात लढतांना… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (चौथी माळ) – जीवनाच्या रणात लढतांना… ☆ श्री संभाजी बबन गायके 

तिच्या चेह-यावर सदा हसू असतं याचं नवल वाटत राहतं. कुणी परस्पर कधी हिशेब मांडलाच तर सुखाच्या बाजूला तशी अगदी किरकोळ जमा दिसायची आणि दु:खानं तर सगळा ताळेबंदच व्यापून टाकलेला होता.

दोन जिवंत माणसं वावरू शकतील एवढ्या जागेत सहा माणसं रहात असलेल्या घरात जन्माला येणं काही तिनं ठरवलेलं नव्हतं. एकवेळ मरण हाती असतं पण जन्म हाती नसतो हे खरंच हे तिला फार लवकर पटलं होतं. नात्यातली माणसं तिच्याघरी यायला नाखुश असतात, त्यांना हिच्या आईला भेटायचं असेल तर ती माणसं हिच्या घरी येण्याऐवजी ‘ तुम्हीच या की घरी आमच्या ’ असं का म्हणायची, हे तिला समजायला वेळ लागला.

आपल्या घराच्या आसपासची सगळी वस्तीच इतरांपेक्षा निराळी आहे, हे ती शाळेत जायला लागली तेंव्हा तिच्या लक्षात आलं. आपल्या शेजारी राहणारी माणसं काही आनंदाने या वस्तीत रहात आहेत, असं नाही हेही तिने विचारांती ताडलं. तिला सख्खा मामा नव्हता. पण मानलेले मात्र मामा होते. तिच्या शेजारच्याच खोपटात राहणारे. त्यांच्या गावी एकदा तिच्या आईने त्यांच्याबरोबर यात्रेला पाठवलं होतं. मामाच्या गावात एका गल्लीत एकाच आडनावाची माणसं राहतात. आणि ही घरं स्वतंत्र भिंतीचीही असतात, स्वच्छतागृहं घरांपासून तशी लांब असतात, हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. नाहीतर तिचं घर वस्तीत सरकारनं बांधून दिलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहापासून अगदी काही फुटांच्या अंतरावर आहे. ही जागा सरकारने व्यापली नसती तर त्या जागेवर आणखी दहा-बारा झोपड्या सहज उभ्या करता आल्या असत्या. कारण वस्तीला लागूनच नदी किंवा नदीला लागूनच वस्ती होती. आणि आता आणखी लोकांना वस्तीत रहायला यायला वावच राहिला नव्हता. स्वतंत्र भिंती उभारण्याची चैन लोकांना परवडणारी नव्हती. आणि मुळात भिंती अशा नव्हत्याच. होत्या त्या पत्र्याच्या किंवा अशाच काही लाकडी फळ्यांच्या. लोकांनी वस्तीत जागा धरल्या होत्या, आपण पळत जाऊन,गर्दीत घुसून बसमध्ये जागा धरतो ना तशा ! चंदा याच वातावरणाला सरावलेली होती. तिथले आवाज, तिथला वास आणि गरीबीच्या सहवासाची तिला सवय झाली होती. आपल्या त्या एवढ्याशा घरात मागच्या बाजूला पडदा लावून एक आडोसा केलेला आहे, आणि त्यात एक आईस्क्रीमवाला मामा राहतो, त्याला त्याच्या जागेत जायला आपल्याच दारातून जावे-यावे लागते. आपले वडील त्या मामाशी आई सलगीने बोलली की भांडतात, काहीबाही बोलतात आणि बरेचदा तिला मारतात, असेही होई. पण अशा मारामा-या तर वस्तीतल्या ब-याच घरांत होतात, हे चंदाला ऐकून पाहून माहिती झाले होते. लग्न झाले की नवरा बायको असेच वागतात,ही तिची समजूत पक्की होत चाललेली होती. तिच्या शेजारी दोन बापे राहतात, मात्र ते रोज सकाळी बायकांसारखं नटून थटून बाहेर जातात. समोरच्याच झोपडीत एक बाई राहते. समोर म्हणजे हिच्या आणि त्या झोपडीत मुश्किलीने चार हातांचं अंतर असावं. त्या बाईच्या हाता,पायांची बोटं निम्मीच आहेत, ती सकाळी एका म्हाता-या माणसाबरोबर बाहेर पडते. त्या म्हाता-याच्याही हाता-पायांना नेहमी पांढ-या पट्ट्या बांधलेल्या असत आणि त्या पट्ट्यांवर रक्ताचे डाग असतात बहुतेकवेळा. डोळ्यांच्या पापण्याही झडून गेल्यात. रात्री वस्तीत अंधुक उजेड असतो, पण त्यामुळे आपल्याकडे नातेवाईक आलेच तर त्यांना अस्वस्थ का होतं, हे कोडं तिला काही केल्या उलगडत नव्हतं. तिला माहित नव्हतं की तिच्या आईच्या माहेरच्या लोकांना का चांगल्या घरची माणसं म्हणतात. त्यांची घरं आपल्यापेक्षा चांगली म्हणून त्यांना असं म्हणत असावेत, असं तिला वाटून जाई.

मुलीच्या जातीनं लवकर मोठं होणं किती वाईट असतं याची जाणीव तिला लवकरच व्हायला लागली. आई तिला सतत घरात थांब, पावडर लावू नकोस,कुणाशी जास्त बोलू नको असं म्हणायला लागली तेंव्हा तर चंदा खूपच गडबडून गेली. त्यात वस्तीच्या टोकावर रहायला असणा-या एका पोराने तिचा हात धरला आणि माझ्याशी दोस्ती करतेस का? असं विचारल्यापासून तिला भीतीच वाटू लागली होती. तशी तीही चार दोन वेळा त्या मुलाकडे पाहून ओळखीचं हसली होती, नाही असं नाही. पण ते सहजच. दिसायला बरा होता तो सिनेमातल्या हिरोसारखे केस ठेवणारा आणि वस्तीतल्या डबल बारवर व्यायाम करणारा. आईने यासाठी तिलाच का रागे भरले असावे, ह्या प्रश्नाचं उत्तर तिला आजवर नाही मिळालं. दोन्ही धाकटे भाऊ सातवी-आठवीतून शाळा सोडून गवंड्याच्या हाताखाली जाऊ लागले आणि घरात रोज रोख पैसे येऊ लागले होते.

एका दिवशी तिचं लग्नं ठरलं. पदरात निखारा ठेवून कसं जगणार आई? मुलगी मोठी झालीये आणि तिच्याकडे लक्ष द्यायला आपण दिवसा घरी थांबू शकत नाही. घरी थांबलं तर लोकलमध्ये भाजलेल्या, उकडलेल्या शेंगा विकायला कोण जाईल आणि घरात ज्वारीचं पीठ कसं येणार, हे तिचे प्रश्न इतर अनेक गोष्टींपेक्षा मोठे होते.

वस्तीतले लोक म्हणाले पोरगी बिघडली म्हणून तिच्या आईनं तिला उजवलं. चंदाचं लग्न मात्र तिच्या आईच्या सासरच्याकडच्या एका नातेवाईकाच्या मुलाशी झालं. पोरगा ड्रायव्हर, तीन भावांत मिळून तोकडी शेती आणि रूपानं चंदापेक्षा दहा आणे निराळा. आपली बायको आपल्यापेक्षा चांगली दिसते याचा त्या पोराला सुरुवातीला अभिमान आणि लग्नानंतर काहीच दिवसांत हेवा वाटायला लागला. दोन मुलं झाल्यावरही त्याचा जावईपणाचा तोरा काही कमी झालेला नव्हता. तरी बरं चंदाच्या आईनं पै पै साठवून त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी, मनगटात घड्याळ असे लाड केले होते. तुझी वस्ती तशी, तुझं खानदान तसं अशी कारणं भांडणाला पुरेशी ठरू लागली. तुझं आधी वस्तीतल्या एकाशी होतं हे तर त्याने खास शोधून काढलेलं कारण. चंदा कायमची वस्तीत आईकडे रहायला आली. दरम्यान दोन्ही भावांची अशीच लग्नं झाली होती, त्यांच्यापेक्षा गरीब असलेल्या लोकांच्या अल्पवयीन मुलींशी. आता घरात एक नाही तर तीन चंदा होत्या.

वस्तीत पुराचं पाणी शिरलं की वस्तीकरांना सरकारी शाळांच्या ऐसपैस खोल्यांमध्ये रहायला मिळायचं. दोन-तीन दिवसांत पुन्हा वस्ती गजबजून जायची. निवडणुका आल्या की प्रचाराला जायची कामं मिळायची सगळ्यांनाच आणि पैसेही.

वस्तीच्या टोकावर रहात होता, त्या मुलाचेही लग्न झाले होते आणि त्यालाही तीन मुलं होती. पण आताही तो चंदाकडे पहायचा संधी मिळेल तेव्हा. चंदाने सरळ राखी पौर्णिमेला त्याच्या घरी जाऊन राखी बांधून प्रश्न मिटवला.

नवरा परत नेण्याची शक्यता नव्हती आणि चंदाची इच्छाही नव्हती.  भावजया कुरकुरायला लागायच्या आत काहीतरी करायला पाहिजे होतं. थोरला भाऊ आता मंडईत गाळ्यावर कामाला लागला होता, पण हमालांच्या संगतीनं हातभट्टीत रमला आणि घरी पगार कमी आणि आजारपण जास्त यायला लागलं. त्यालाही मुलं झालीच होती जशी वस्तीतल्या इतरांना होत, पटापट. कार्यकर्त्यांच्या बळावर वस्तीत नळ चोवीस तास,लाईट आकडे टाकून सर्रास. वस्तीतल्या घरां-घरांत किरकोळ उत्पादनं होत होतीच, त्यात एका कोप-यात स्वच्छतागृहाच्या बाजूला भट्टी लागायची, तिथूनही भरपूर माल निघायचा. एकूण हाताला कामं होती आणि कामाला भरपूर हात तयार असायचेच.

चंदाची आई मरण्यासारखी नव्हती. पण आजाराच्या साथीत अगदी किरकोळीत गेली. खर्च असा लागलाच नाही तिच्या आजारपणात. माहेरी आलेल्या लेकीचा आधार हरपला. बाप काही लेकीला माहेरी राहू देईल असा नसतोच बहुदा. ज्याची अमानत त्याच्याघरी बरी असं मानणारा पुरूषच तो. झटकलेली जबाबदारी पुन्हा खांद्यावर घ्यायला तो तयार नव्हता. दुसरं लग्न केलं तिनं तरी त्याची ना नव्हती. पण चंदा एकदा हरलेल्या जुगारात पुन्हा पैसे लावायला तयार नव्हती.

तिने आईची शेंगांची टोपली उचलली आणि तडक रेल्वे स्टेशन गाठलं. दोन दिवसांनी भावजयही आली सोबतीला. माणसांच्या गर्दीत आता या दोन तरूण पोरी सराईतपणे आणि लाज घरी ठेवून स्थिरावल्या. चुकून धक्का लागलेल्या माणसांना मनानेच माफ करीत, मुद्दाम धक्के देणा-यांना भाऊ म्हणत त्या या ठेशन पासून त्या ठेशन पर्यंत फिरतात….भुनेला,वाफेला सेंग असा पुकारा करीत. रेल्वेतील टी.टी.,पोलिस, पाकीटमार,किरकोळ विक्रेते, आंधळे भिकारी, फरशीच्या तुकड्यांनी ताल धरीत अनाकलनीय गाणी गात पैसे गोळा करीत फिरणा-या भावांच्या जोड्या त्यांना तोंडपाठ झाल्यात. चंदाने मात्र आपली दोन्ही मुलं दूरवरच्या गावातल्या बोर्डिंग स्कूलमध्ये नेऊन ठेवलीत….त्यांना शिकवायचा तिचा इरादा आहे तिचा. आपल्या मुलांच्या नशिबात येऊ पाहणारी वस्ती तिला आता दूर सारायची आहे. फलाटावरील एखाद्या मोकळ्या बाकावर थकून भागून बसलेली चंदा तिच्या टोपलीतली एखादी जास्त भाजली गेल्यामुळे काळी ठिक्कर पडलेली शेंग सोलते…त्या शेंगेतील शाबूत भाग दातांनी कुरतडून खाते आणि लोकलची वाट पहात राहते. या महिन्यात पैसे साठले की पोरांना अभ्यासाची चांगली पुस्तकं नेऊन द्यायचीत तिला….त्यासाठी कितीही ओरडावं लागलं तरी चालेल….भुनेला, वाफेला सेंग…मूंगफल्ली का सेंग !

चंदासारख्या अशा अनेक अष्टभुजा जीवनाच्या रणात उभ्या असतात लढायला…. आई भवानी त्यांच्या हातांना आणखी बळ देवो.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटर्न गिफ्ट – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

?वाचताना वेचलेले ?

☆ रिटर्न गिफ्ट – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आताशा कनेक्ट होणं शिकलेय मी. नव्हे, फारच एन्जॉय करतेय म्हणा ना हवं तर.आणि हो. या कनेक्ट होण्याच्या खेळात सुरेख रिटर्न गिफ्ट पण मिळतं ते वेगळंच.

आता म्हणाल, हे काय नवीन? 

खूप सोप्पंय हो हे सगळं.

‘मॉर्निंग वॉक’ला जाताना प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेल्या फुलांच्या गालिच्यातील  नारंगी देठ असलेली दोन शुभ्र फुलं हलकेच हातावर घेऊन नाकाजवळ नेली.त्यांचा सुवास थेट मनाला भिडला आणि कनेक्ट झाले मी त्यांच्याशी!

माहीत नाही, कशा कोण जाणे,मस्तिष्कातून मनापर्यंत चेतातंतूनी संवेदना वाहिल्या आणि पुढचे चार पाच तास त्या परिमलाने दरवळून टाकले.

मिळाले नं मला रिटर्न गिफ्ट…!

अशा शेकडो गोष्टी होत असतात; चांगल्या वाईट.

आपल्या सभोवताली. फक्त आपल्याला कनेक्ट होता आलं पाहिजे. बस्स!

परवा कामवाली सुजलेले डोळे आणि रडलेला चेहरा करून आली कामाला. तिच्या डोळ्यात पाहिलं तर नजर चुकवली तिने. काहीच न बोलता वाफाळलेला चहाचा कप आणि दोन बिस्कीट ठेवली तिच्या समोर, तशी चहाचा घोट घेत मोकळी झाली. मनात साचलेली सल बाहेर निघाली.

तिच्याशी कनेक्ट होताना हलकेच माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण जातांना हसून “येती व्ह ताई,”म्हणून माझं रिटर्न गिफ्ट मला देऊन गेली.

बरं या कनेक्ट होण्याला जात, पात, धर्म, वर्ण, शिक्षण, सुबत्ता, सुंदरता या कशाचीही गरज नसते. फक्त लागते ती मनाची थोडी वेगळी मांडणी.

खेड्यातून शहरात आलेली मी, रमते थोडी गावाकडच्या वातावरणात. मग आठवडी बाजाराच्या दिवशी कधी मावशी, कधी मामा तर कधी दादा भेटतो त्या अनोळखी माणसांच्या गर्दीत. “कश्या आहात मावशी..?” एवढे दोनच शब्द पुरतात कनेक्ट व्हायला!

मग त्या गर्दीतून कुठूनतरी आवाज येतो, “ताई मेथीच्या ताज्या जुड्या ठेवल्यात गं.घेऊन जा.”

बळेच कडीपत्त्याच्या चार काड्या, भरलेल्या भाज्यांच्या पिशवीत खोचतात कोपऱ्यात बसलेले आजोबा, तर माप झाल्यावरही एक पेरू हलकेच सरकवत, “ठिवा ओ ताई लेकरांना.” म्हणणारा मामा सापडतो, घरी परतताना पिशवीसारखं मनही भरून जातं!

मुलांच्या क्लासबाहेर त्यांची वाट पाहत थांबलेले असतो आपण, मधूनच आठ दहा मुलांचा घोळका गोंधळ घालत येतो बाहेर. हसी मजाक, आरडाओरड, एकमेकांना चिडवत स्वतःतच रमलेली असतात ती.

हळूच आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो अन् मनाच्या कोपऱ्यातील आपला ब्लॅक अँड व्हाइट कॉलेज कट्टा समोर येतो, नकळत त्या कट्ट्यावर चहाचा ग्लास घेऊन आपण बसतो. मग आपोआपच हात मोबाईल कडे जातो.

जुन्या मैत्रिणीचा नंबर डायल केला जातो. मग तासभर झालेल्या गप्पांमध्ये आपणही वय विसरून त्या घोळक्यातील एक होऊन जातो. मग पुढचे कित्येक दिवस हे रिटर्न गिफ्ट सांभाळतो आपण.

आयुष्य तेवढं रटाळ नक्कीच नाही.थोडंसं हरवून बघा.काढून टाका हा ‘शहाणपणाचा मुखवटा’.थोडे वेडेच व्हा कधीतरी.

म्हणजे बघा.

ऑफिसमधून घरी परतताना पार्किंगमध्ये खेळणाऱ्या मुलांसोबत फुटबॉलला किक मारून बघा आणि उडवून टाका सगळ्या चिंतांना.

कधीतरी चाखून बघा थंडगार आईस-गोळा. लागू द्या तो नारंगी, लाल, पिवळा, हिरवा रंग ओठांना.

नकाच राहू एक दिवस टापटीप.होऊ द्या केसांना अस्ताव्यस्त, घाला तोच घळघळीत पण मनाला रिलॅक्स करणारा जुना ड्रेस.

वाचत पडा एखादं सुंदर पुस्तक आणि भिडू द्या मनाला बॅकग्राऊंडमधील लतादीदींच्या सुरेल सूर.

नाटक पाहताना आवडलेल्या एखाद्या डायलॉगला उठून दाद देऊन पाहा.

जगून पाहा एखादा उनाड दिवस आपल्या स्वतःसाठीच!

आवडली का कल्पना कनेक्ट होण्याची?

तर सुरू करा मनाचा योगा मग बघा किती सुंदर सुंदर रिटर्न गिफ्टस् मिळतात ते.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र विशेष लेख – नवरात्र महोत्सव… एक सृजन ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

?  विविधा ?

☆ नवरात्र विशेष लेख – नवरात्र महोत्सव… एक सृजन ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आज नवरात्र महोत्सवाचे निमित्ताने  एक सुंदर विषय चर्चेत  आला आहे.  आपण  सर्वजण  या  बदलत्या  काळाचे प्रतिनिधीत्व करतो  आहोत.  केवळ  उलट सुलट विचार,  विधाने करून आपण  श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील तफावत वाढवीत  आहोत.

नवरात्रीचे धार्मिक महत्त्व समजून घेताना  आपण स्वतः धार्मिक  आहोत का? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंदू धर्माव्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्मात सण,  उत्सव, परंपरा यांची टिंगल,  टिका केली जात नाही.  आज केवळ आपले नाव चर्चेत यावे म्हणून  धार्मिक कर्मकांडावर टिका करणारे लेखक  घरात मात्र नाना देव पूजताना दिसतात. 

नवरात्र उत्सव हा भक्ती, शक्ती आणि  आराध्याविषयी स्नेहभाव व्यक्त करण्याचा  उत्सव  आहे.  असुर, समाज विघातक मनोवृत्तीचा विनाश,  विवेकाचा  अंकुश, आणि  सद्सद विवेक बुद्धीने षडरिपूंना दिलेला शह म्हणजे नवरात्र उत्सव.

धार्मिकता  आणि  कार्यप्रवणता यामध्ये  श्रद्धा ,  भक्ती  आणि निस्वार्थी सेवाभाव  यांचा समावेश झाला कि आपण  हा उत्सव  ख-या अर्थाने आनंदोत्सव म्हणून साजरा करू शकतो.

नारीशक्ती ही सृजनशीलता  आणि लक्ष्मी प्राप्तीचे प्रतिक मानली गेली आहे.  नर  आणि  नारी  यांच्यातील  एक काना आणि  एक वेलांटीचा फरक  फार मोठे समाज प्रबोधन घडवणारा आहे.  वास्तविक पहाता  नर,  नारी यांची कार्यशक्ती समान  असली तरी समाजमन त्यात पुरूष प्रधान संस्कृती  अबाधित रहावी म्हणून  काही बंधने  स्त्रियांवर युगानुयुगे लादत आले आहे.  तू माझी, मी  तुझा  हे  मानव्याचे बोधवाक्य  स्त्री पुरूष  एकत्र वावरताना संशयाच्या भोव-यात सापडते.  आपण  आपल्या  अंतर्मनातील काही सुप्त कलागुण  जागृत ठेवण्यासाठी देवापुढे  अखंड नंदादीप,  धान्य पेरणी,  आणि सुमनांची माला  अर्पण करीत आहोत.

विविधतेतून एकता हे  ब्रीदवाक्य जोपासणारे -या आपल्या  भारत देशात प्रादेशिक स्तरावर विविधता येणारच.  उत्सव साजरा करताना  चालिरिती भिन्न  असल्या तरी,  कौटुंबिक सलोखा,  सामंजस्य,  सुख, शांती, समाधान,  आणि सेवा भावी मानव धर्म जोपासणारी शिकवण  सर्वत्र एकच  आहे.  नवरात्र  उत्सवात देवीने परीधान केलेल्या  साड्या,  तिचे वाहन, परीधान केलेले अलंकार,  अर्पण केलेले नैवेद्य, हातातील शस्त्रे  आपणास  अंधश्रद्धेपासून परावृत्त करून समस्त मानव जातीच्या कल्याण्यासाठी आदिमाया आदिशक्ती  कशी  जागृत  आहे याचीच प्रचिती देते.

सारे माझे पण मी सर्वांची  ही शिकवण देणारा  हा  आनंदोत्सव  आहे. यामध्ये  जरूर  काही समाजात अंधश्रद्धा जोपासल्या जात आहेत.  काही  धार्मिक बाबींचे अवडंबर माजवले जात आहे.  एक फुल  श्रद्धेने अर्पण  केले काय  अन लाखभर फुले अर्पण केली काय? शेवटी भाव अत्यंत महत्त्वाचा आहे.  तीच गोष्ट खण,नारळ,  ओटी,  नैवेद्य यांच्या बाबतीत लागू होते. म्हणून  धार्मिक विधी करताना  आलेला यथाशक्ती  हा  शब्द  अत्यंत महत्त्वाचा आहे. या पद्धतीने मातामयी देवतेची  आराधना या  उत्सवात  अपेक्षित आहे.

गरबा खेऴणे म्हणजे काय ? हे जर  आपण शोधले तर गरबा (आपल्या भाशेत मडके )हे ब्रम्हांडाचे प्रतिक आहे.गरब्याला ( मडक्याला ) २७ छिद्र असतात.९ छिद्रांचि १ अशा ३ लाईन असतात

९ गुणिले ३ = २७ नक्षत्रे होत. १  नक्षत्र म्हणजे ४ चरण होय.२७ गुणिले ४ = १०८.नवरात्रात गरबा ( मडके ) मध्यभागि ठेवुन त्या भोवति १०८ वेळा गोल फेरा धराय़चा असतो.त्यामुळे आपल्याला ब्रम्हांडाची प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य मिऴते अशा १०८ प्रदक्षिणा घातल्या जातात.

हेच खरे गरबा खेळण्याचे महात्म्य  होय. अशी पौराणिक माहिती संकलित आहे.

उत्पत्ती,  स्थिती,  आणि  लय.  हे  नितीतत्व जोपासणा-या देवता  म्हणजे  सरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या  आहेत. या  तिनही देवतेची भूत,  भविष्य  आणि वर्तमानातील  शक्तीरूपे आपण नवदुर्गा म्हणून  संबोधित करतो.  वर्तमानातील नारीशक्ती तिचा  आदर सन्मान  हा  दृष्टिकोन ठेवून नवरात्र उत्सव साजरा व्हावा  असे मला वाटते.

स्वतःचे महत्व प्रस्थापित करण्यासाठी समाजात   श्रद्धाळू लोकांना भय दाखवून  अंधश्रद्धा निर्माण केल्या जातात.  कौटुंबिक सौख्याचा विचार करून भोळी भाबडी जनता याला  बळी पडते.  वास्तविक पाहता देवीची जी वाहने  आहेत ती सर्व  वाहने  म्हणजे  हत्येपासून त्यांना देवीने , आदिशक्तीने दिलेले  अभय  आहे. तरीदेखील कोंबडी,  बकरू यांची निष्कारण कत्तल होत आहे.  भूतदया,परोपकार  आणि  अध्यात्मिक  उन्नती हा  या  नवरात्रीचा मुख्य  उद्देश आहे.

राजस,  तामस,  आणि  सात्विक  गुणांचा  समतोल आचारात ,  विचारात आणि  श्रद्धेत कसा जोपासायचा हे शिकवणारा हा  उत्सव  आहे. माणूस कितीही बदलला तरी माणसाला माणसाची गरज लागतेच. हा माणूस कसा ओळखायचा? कसा  टिकवून ठेवायचा?  आणि त्याच्या तील दुर्गुण कसा  नष्ट करायचा हे शिकवणारा हा  नवरात्र  उत्सव  आहे.

केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून जर नवरात्र महोत्सव साजरा केला जात  असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे.  माणूस  आपला  आहे.  आपण माणूस  आहोत. माणसात देव शोधायचा त्याची उपासना करायची  इतका  साधा सोपा संदेश नवरात्र महोत्सवाने दिला आहे.  आपण त्याचा कसा  उपयोग करतो हे  आपल्याच हातात आहे.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य आणि बासरी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य आणि बासरी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रत्येकाचं आयुष्य, हे बासरी सारखं पोकळच असतं अनेक ठिकाणी अनेक छिद्र असतात…! 

कोणतं छिद्र कधी झाकायचं ? कधी उघडायचं ? 

श्वास कधी घ्यायचा ? आणि फुंकर कधी मारायची ? 

— एकदा याचं गणित समजलं, की मग आयुष्य सुरेल होतं…!!! 

आयुष्यात दुःख कुणाला नाही ?

आता हेच पहा ना…. कुणी लिहितंय तर कुणी वाचतंय…. !!! 

गुरुस्थानी असलेले श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर, मागच्या वेळी बोलताना मला म्हणाले, दुःख कमी करण्याचा एकच उपाय, तो म्हणजे ..  ” देके जावो, या फिर छोडके जावो…!”

सोबत घेऊन जायचा कोणताही पर्याय नसेल, जे आज ” माझं ” आहे ते मला इथेच जर सोडून जायचं असेल … तर मी उद्या ते दुसऱ्याला द्यायला काय हरकत आहे… ? ज्याचा आज मी उपभोग घेत आहे, ते माझं नाहीच… उद्या ते दुसऱ्याच्या पदरात असणार आहे, मी ज्याला माझं म्हणतोय ती फिरती ढाल आहे, आज माझ्याकडं आहे, उद्या दुसरीकडे ही ढाल जाणार, हे एकदा समजलं, तर जातांना ही ढाल दुसऱ्याला खुल्या दिलानं द्यायला काय हरकत आहे ? 

— लेके तो जा नही सकते….. तेव्हा ” देके जावो, या फिर छोडके जावो…!”

Give it… or leave it !!! 

वरील तत्व तंतोतंत अंमलात आणत, आपण तळागाळातल्या समाजाला आपल्या घासातला घास द्यायला अगोदरच सुरुवात केली आहे. 

आपल्या देण्याच्या या वृत्तीला मनापासून नमस्कार. 

भिक्षेकरी ते कष्टकरी …. 

१ . परिस्थितीने पिचलेले एक तरुण कुटुंब ! नाही म्हणायला एक झोपडं होतं, बाजूला शिवाजीनगर कोर्ट परिसरात “तो” छोटा विक्रीचा व्यवसाय करून बायको आणि दोन पोरांना जगवायचा. याचं झोपडं जिथं होतं, बरोब्बर तिथूनच मेट्रोला जायचं होतं… तिचा तसा हट्टच होता…. मग सर्व झोपड्या जमीनदोस्त झाल्या… याची कशी शिल्लक राहील ? अनेक कुटुंबं उध्वस्त झाली… मग आता नक्कीच विकास होणार याची खात्री पटली… ! 

ज्या रस्त्यावर अनेक लोक छोटे विक्री व्यवसाय करत होते, त्यांचे सर्व सामान उचलून त्यांना तिथे विक्रीस बंदी आणली… उदरनिर्वाह थांबला… लहान लेकरं भुकेने इकडे तडफडत होती, आणि चकाचक होण्याच्या नादात शहर मात्र तिकडं “स्मार्ट” होत होतं…! 

याचाही व्यवसाय थांबला, जगण्याचे आणि जगवण्याचे सर्व रस्ते बंद झाले. याने मग झाडाला लटकून फास घेण्याचा प्रयत्न केला… ऐनवेळी कुणीतरी बघितले आणि थोडक्यात वाचला ! 

याला मी आधीपासून ओळखत होतो. याला बोलावून घेतलं…. सातारी शिव्या आणि पुणेरी टोमण्यांनी याला आधी चांगला बुकलून काढला…. इतका, की यापेक्षा फास परवडला असता, असं त्याला वाटलं असेल. 

इलाज नव्हता… गोळ्या औषधांनी बरं होत नसेल, तर सुई टोचावीच लागते…! 

यानंतर मात्र त्याला प्रेमानं जवळ बसवून, तू गेल्यानंतर, बायको आणि लहान पोरांचे हाल कसे झाले असते… हे त्याला समजावून सांगितले. तो रडायला लागला. त्याला समजेल अशा भाषेत मग सांगितलं, ‘आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळत नसेल, तर वाट बदलून बघायची असते मित्रा… चालणं थांबवायचं नसतं…!.. ‘पानगळीत झाडं आपली पिकलेली पानं फक्त बदलतात येड्या … आपलं मूळ नव्हे !’ 

सोमवारी २५ सप्टेंबरला विक्रीसाठी याला लागतील त्या सर्व गोष्टी घेऊन दिल्या आहेत. विक्रीची जागा बदलली आहे… एक कुटुंब सावरलं आहे. बायकोच्या ज्या ओढणीने तो गळफास घेणार होता, तीच ओढणी, आता तो गळ्याभोवती गुंडाळून काम करतो…!  त्याच्या गळ्या भोवती पडलेले काळे निळे व्रण आणि झालेल्या जखमा आता हीच ओढणी झाकते… ! 

२ .  परिस्थितीच्या चटक्यांनी पोळलेले… पत्नीवर निस्सिम प्रेम करणारे… पण तिच्याकडूनच फसवले गेलेले… भ्रमिष्ट होऊन, रस्त्यात एक्सीडेंट होऊन पडलेले एक बाबा…!  २३ तारखेला शनिवारी रस्त्यावरच यांची दाढी कटिंग करून, आंघोळ घालून यांना उपचारासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. पूर्ण बरे झाल्यानंतर, यांचे पुढे काय करायचे… याची दिशा भविष्यात समजेल… ! 

बाबांनी आतापर्यंत जगलेलं आयुष्य… त्यांचे झालेले विश्वासघात, हे सर्व ऐकून मी सुद्धा अंतर्बाह्य हलून गेलो होतो. 

शेवटी एकच समजलं ..  ” विश्वास किंमती असतो पण धोका खूप महाग… !!!” 

याच बाबांचा संपूर्ण आयुष्यपट “कुणी जीव घेता का जीव ?” या दीर्घ लेखात स्वतंत्रपणे मांडला आहे. 

वैद्यकीय

१.  एक वेळ अशी येते.. आई बाप थकून आणि सुकून जातात… गळून पडतात…. तेवढ्यात सुना, किंवा मुलं येतात, माने खाली हात घालून उठवतात… सुकलेल्या निर्जीव डोळ्यात तेवढ्यापुरती जान येते …चकाकी येते… सुकलेली ती पानं मग हरखून भावुक होवून विचारतात, ‘ मला कुठे नेत आहात ?’ 

समोरचा निर्विकारपणे सांगतो, ‘ जाळायला नेतोय… हल्ली सुकलेलं सरपण मिळतंय कुठं…??? ‘

अशी अनेक सुकलेली लाकडं आम्हाला रस्त्यावर ठिकठिकाणी मिळतात…. आम्ही आधी या लाकडांना शुचिर्भूत करतो, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो… झालेल्या सर्व जखमांवर फुंकर मारून, पुन्हा या जुन्या खोडातून पालवी फुटावी यासाठी प्रयत्न करतो. ! 

या महिन्यात अशा तीन अतिगंभीर रुग्णांना ऍडमिट केले आपल्या आशीर्वादाने ते जगले आहेत. 

त्यांची कर्मकहाणी इथे किंवा स्वतंत्र लेखात मांडावीशी वाटते, परंतु साहित्यातला बीभत्स रस सुद्धा इथे ओशाळेल, म्हणून संयमाने आणि नाईलाजाने थांबतो … !!! 

२. याव्यतिरिक्त रस्त्यावरील खरोखरचे गरजू ओळखून त्यांना कुबड्या, वॉकर, काठ्या, व्हील चेअर, मानेचे तथा कमरेचे पट्टे अशी वैद्यकीय साधने दिली आहेत.  त्याचप्रमाणे त्यांच्या रक्त लघवीच्या सर्व तपासण्या करून रस्त्यावरच त्यांना वैद्यकीय उपचार केले आहेत…. हेतू एकच …. बरं झाल्यानंतर स्वाभिमानानं यांनी काहीतरी काम करावं आणि सन्मानानं माणूस म्हणून जगावं…!

अन्नपूर्णा प्रकल्प

खिशाला छिद्र पडलं की पैशाच्या आधी नाती गळून पडतात ही आजची वस्तुस्थिती आहे ! 

बापाच्या शर्टाला पदर नसतो आणि आईच्या पदराला खिसा नसतो… तरीही आईबाप आपल्या मुलाबाळांना झाकायला…  त्यांना काही द्यायला… कधीही कमी पडत नाहीत…! 

पण जेव्हा बापाच्या खिशाला छिद्र पडतं किंवा आईचा पदर फाटतो , त्यावेळी मात्र त्यांची किंमत तुटलेल्या आणि झिजलेल्या पायताणासारखी होते…

वापरून फेकलेली अशी बरीच पायताणं आम्हाला रस्त्यावर जागोजागी उकिरड्यावर भेटतात…! आमच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही अशा उकिरड्यावर पडलेल्या किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गोरगरीबांना, रोज…. हो दररोज…. जेवणाचे डबे हातात देत आहोत. 

कोविडच्या पहिल्या लॉकडाऊन पासून सुरू केलेला आमचा हा प्रकल्प,  आजतागायत आपल्या आशीर्वादाने दररोज सुरू आहे…. ! 

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा त्यांना सन्मानानं “मजुरी” द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

आमच्या या सर्व महिला पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छता अभियान च्या ब्रँड अँबेसिडर” म्हणून सध्या चमकत आहेत. 

भीक नको बाई शिक

आपल्या माध्यमातून भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांना दत्तक घेतलं आहे, आणि त्यांच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या आहेत. 

माझ्या पूर्व आयुष्यावर मी जे पुस्तक लिहिलं आहे, त्याची विक्री करतो आहे. या विक्रीतून येणारा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरत आहे. 

आमचा हा संपूर्ण प्रवास आहे… भिक्षेकऱ्यांना  कष्टकरी बनवण्याचा… माणूस म्हणून त्यांना जगणं शिकवण्याचा…. !!! कोणत्याही प्रवासात, महत्वाचं काय असतं ? प्रवास सुखकर झाला …? नाही, हे फारसं महत्वाचं नाही…!  प्रवासात खूप अडचणी आल्या …? नाही, हेही फारसं महत्वाचं नाही, त्या तर येणारच …! 

मग ? इच्छित स्थळी पोचला नाहीत अजून ??? …. यालाही फारसं महत्व नाही, रोज थोडं थोडं चालतोय, इच्छित स्थळ येईलच कधीतरी …! 

अरे…. मग महत्त्वाचं काय…. ??? .. महत्त्व असतं, प्रवासात दिलेल्या सोबतीला….! 

चालताना दम लागला तर, पाठीवरून मायेनं फिरवलेल्या हाताला…!! 

धावताना तहानेनं जीव व्याकुळ झाला असता, ओंजळभर पाणी पाजणाऱ्या त्या ओंजळीला….!!! 

खाच खळगे पार करताना, कधी ठेच लागते, अंगठा रक्ताळतो… वेदना आपल्याला होते…. आणि अश्रू समोरच्याच्या डोळयात असतात… महत्त्व असतं त्या समोरच्या थेंबभर अश्रूला….! 

तुम्ही सर्वजण हेच तर करताय…. माझ्या या प्रवासात “सोबत” राहून….! 

आणि म्हणून “आपल्या सोबतीने” झालेल्या या प्रवासाचा लेखाजोखा आपणास सविनय सादर….!

सफर अहम नही…. मंजिल भी अहम नही…

अहम है…. सफर मे मिली हुई साथ….!!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (तिसरा माळ) – जीवनसंघर्षरत एक दुर्गा ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (तिसरी माळ) – जीवनसंघर्षरत एक दुर्गा ☆ श्री संभाजी बबन गायके 

नव-याला सोडलं असलं तरी कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातला काळा मणी यांपासून वत्सलामावशींनी फारकत म्हणून घेतली नाही. पदरात एक ना अर्धे…तीन मुलं. त्यात पहिल्या दोन मुली आणि तिसरा कुळाचा कुलदीपक. सासरचं घर सोडताना वत्सलामावशींनी नव-याचा प्रचंड विरोध डावलून मुलाला सोबत आणलं होतं. “ मला तुमचं काही नको…आणि माझ्या मुलांनाही तुमच्या या पापाच्या दौलतीमधला छदामही नको ” असं म्हणून मावशींनी कर्नाटकामधलं ते कुठलंसं गाव सोडलं आणि महामार्गावरून जाणा-या एका मालवाहू वाहनाला हात केला.

“ कित्थे जाणा है, भेन? ” त्या मालट्रकच्या सरदारजी चालकाने वत्सलामावशींना प्रश्न केला. “ दादा,ही गाडी जिथवर जाईल तिथवर ने ! ” असं म्हणून मावशींनी ट्रकच्या क्लिनरच्या हातावर दोन रुपयांची मळकी नोट ठेवली. “ ये नोट नहीं चलेगी ! ” त्याने कुरकुर केली. त्यावर चालकाने “ओय..छोटे. रख्ख !” असा खास पंजाबी ठेवणीतला आवाज दिल्यावर क्लिनरने मावशीची तिन्ही मुलं आणि मावशींना हात देऊन केबिनमध्ये ओढून घेतलं आणि स्वत: काचेजवळच्या फळीवर तिरका बसला. आरशातून तो मावशींना न्याहाळत होता जणू. सरदारजींनी त्याला सरळ बसायला सांगितले आणि ट्रक पुढे दामटला.

वत्सला जेमतेम विवाहायोग्य वयाची होते न होते तोच तिच्या वडिलांनी तिला दूर खेड्यात देऊन टाकली होती. त्यांना नव्या बायकोसोबत संसार थाटायचा होता आणि त्यात वत्सला बहुदा अडसर झाली असती. तरी बरं त्या स्वयंपाकपाण्यात, धुण्याधाण्यात पारंगत झाल्या होत्या, त्यांची आई देवाघरी गेल्यापासूनच्या काही वर्षातच. वत्सलाबाई तशा रंगा-रुपानं अगदी सामान्य म्हणाव्यात अशा. बेताची उंची,खेड्यात रापलेली त्वचा आणि काहीसा आडवा-तिडवा बांधा. पण रहायच्या मात्र अगदी स्वच्छ,नीटस आणि स्वत:चा आब राखून. वत्सलेचे यजमान तिच्यापेक्षा डावे. सर्वच बाबतीत. उंची,रंग आणि मुख्य म्हणजे स्वभाव. त्यांची पहिली पत्नी निवर्तली होती. पण मूलबाळ नव्हतं. कसलासा व्यापार होता त्यांचा. बाकी नावालाच मोठं घर आणि घराणं….संस्कारांची एकही खूण त्या घरात दिसत नव्हती. घरात दिवंगत तरुण माणसांच्या काही कृष्णधवल तसबीरी टांगलेल्या होत्या. पण ती माणसं कशामुळे गेली हे विचारायची सोय नव्हती. एकतर कानडी भाषेचा अडसर होता आरंभी. नंतर सरावाने समजायला लागले…सर्वच. गावातल्या जमीनदाराचा उजवा हात म्हणून दबदबा असलेला नवरा….जमीनदाराच्या सावकारकीचा हिशेब याच्याच चोपडीत लिहिलेला. कर्जाचे डोंगर डोक्यावरून उतरवू न शकणा-या गोरगरीबांच्या जमिनी सावकाराच्या नावे करून घेण्यात सरावाने वाकबगार झालेला माणूस. एखाद्याला बरणीतलं तूप काढून देताना आपल्या हाताला माखलेलं तूप माणूस पोत्याला थोडंच न पुसतो….ते तुपाचे स्निग्ध कण जिभेवर नेण्याची सवय मग अधिकाधिक वाढत गेली आणि कधीही वाल्मिकी होऊ न शकणारा वाल्या उत्पन्न झाला. स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून त्यात सर्वमार्गे धनसंपदा घरात येत गेली. घरात माणसांची वानवा नव्हती आणि कामाचीही. वत्सलाबाईंचा ऐहिक संसार इतरांसारखा ठरलेल्या मार्गावरून वाटचाल करू लागला आणि वत्त्सलाबाई घरात प्रश्न विचारण्याएवढ्या मोठ्या आणि धीट झाल्या. तोवर तीन मुलं घातली होती पदरात नियतीने. वत्सलेचे प्रश्न टोकदार आणि थेट होते. यजमानांच्या खात्यावर आता धन आणि काळ्या धनासवे येणारे यच्चयावत अवगुणही जमा होत होते. नव-याने,सासु-सास-यांनी छळ आरंभला आणि त्याची परिणती म्हणून आज तीन मुलांना घेऊन वत्सलाबाई अनोळखी दिशेला निघाल्या होत्या.

कर्नाटकाच्या सीमा ओलांडून ट्र्क मराठी मुलखात शिरला. दुकानांच्या मराठी पाट्या वाचत वाचत मुलं सावरून बसली होती. आपण कुठे निघालो आहोत याची त्यांनाही कल्पना नव्हती. वाटेत सरदारजी काहीबाही विचारत राहिले आणि वत्सलाबाईंनी पंजाबी-मिश्रीत हिंदी अजिबात समजत नसली तरी कर्मकहाणी सांगितली आणि त्या दणकट शरीराच्या पण मऊ काळजाच्या शीखाला समजली…. “ तो ये गल है? वाहेगुरू सब चंगा कर देंगे ! “ त्याने अ‍ॅल्युमिनियमचे चंदेरी कडे घातलेला हात आकाशाकडे नेत म्हटलं.

रात्रीचे आठ वाजत आलेले होते. जकात नाक्याच्या पुढच्या वळणावर सरदारजींनी ट्र्क उभा केला आणि म्हणाले, “ भेनजी…उतर जावो. मैं तो अभी सड्डे ट्रांसपोर्ट ऑफिस जाऊंगा !

वत्सलेने या नव्या भावाकडे असे काही पाहिले की त्याने ट्रकचं इंजिन बंद केलं. सरदारजीचा स्वत:चा ट्र्क होता तो. पंजाबमधून महाराष्ट्रात येऊन स्वत:ची ट्रांसपोर्ट कंपनी काढायची होती त्यांना. औद्योगिक परिसराच्या जवळच एक ट्रक टर्मिनल उभं रहात होतं. त्यातलीच एक मोकळी जागा विकत घेऊन त्यांनी पत्र्याचं शेड ठोकून तात्पुरतं कार्यालय थाटलं होतं. आणि त्याला तो नसताना ते सांभाळणारं कुणीतरी पाहिजे होतं. राहण्याचा जागेचा प्रश्न मिटत होता. मराठी मुलूख होता. वत्सलाबाईंनी होकार दिला.

झाडलोट करणं, ट्रांसपोर्टसाठी आलेल्या मालावर लक्ष ठेवणं आणि बारीक सारीक कामं सुरू झाली. तिस-याच महिन्यात सरदारजींनी दोन नवे ट्रक घेतले. कार्यालय मोठे झाले. त्यांनी वत्सलाबाईंची पत्र्याची खोली आता पक्की बांधून दिली. परिसरात आणखी बरीच ट्रांसपोर्टची कार्यालये, गोदामं उभी रहात होती. चालक,मेकॅनिक,क्लिनर इत्यादी मंडळींचा राबता वाढू लागला. त्या परिसरात राहणारी एकमेव बाई म्हणजे वत्सलाबाई. तिथून जवळची मानवी वस्ती हाकेच्या अंतरावर नव्हती. चहापाण्याला,जेवणाला चालक-क्लिनर लोकांना थेट हायवेवरच्या ढाब्यांवर जावे लागे. सरदारजींना विचारून वत्सलामावशींनी आपल्या खोलीतच चहा आणि अल्पाहाराचे पदार्थ बनवून विकायला आरंभ केला. चव आणि मावशींचे हात यांचं सख्य तर होतंच आधीपासूनचं. माणसं येत गेली, ओळखीची होत गेली.

घरादारांपासून दूर असलेली ती कष्टकरी चालक मंडळी. त्यात त्यांच्या आयुष्यात आलेल्या अपरिहार्य पण अस्विकारार्ह गोष्टी. एकटी बाई पाहून त्यांच्या नजरांत होत जाणं नैसर्गिक असलं तरी वत्सलाबाईंचा अंगभर पदर, कपाळावरचं ठसठशीत कुंकू,गळ्यातला काळा मणी आणि जीभेवरचं आई-बहिणीसदृश मार्दव. वत्सलाबाई आता सगळ्यांच्याच मावशी झाल्या. आणि काहींच्या बहेनजी ! त्या ड्रायव्हर, क्लिनर मंडळींच्या घरची,मुलाबाळांची आवर्जून चौकशी करायच्या. कधी नसले कुणापाशी पैसे तर राहू दे…दे सवडीनं म्हणायच्या. आणि लोकही मावशींचे पैसे कधी बुडवत नसत.

दरम्यान मुली मोठ्या होऊ लागल्या होत्या. त्यांना मात्र मावशींनी सर्वांच्या नजरांपासून कसोशीने दूर ठेवलं. त्याही बिचा-या मुकाट्यानं रहात होत्या. लहानपणी जे काही लिहायला-वाचायला शिकल्या होत्या तेवढ्यावरच त्यांना थांबायला लागले. पण वागण्या-बोलण्यात अगदी वत्सलामावशी. काहीच वर्षांत मावशीच्या दूरच्या नातलगांना मावशींचा ठावठिकाणा लागला. अधूनमधून कुणी भेटायला यायचं.

सरदारजींनी जवळच शहरात प्लॉट घेऊन बंगला बांधला. आपले कुटुंब तिथे आणले. आऊटहाऊस मध्ये मावशींचे घरटे स्थलांतरीत झाले. आता पोरींची शाळा सुरू झाली जवळच्याच नगरपालिकेच्या विद्यामंदिरात. धाकटा लेकही आता हाताशी आला. पण त्या पठ्ठ्याला ड्रायव्हरकीचा नाद लागला आणि त्याने मावशींच्याही नकळत लायसेंस मिळवलं आणि ते सुद्धा अवजड वाहनांचं. मावशींनी मात्र चहा-नाश्त्याचा व्यवसाय सुरूच ठेवला…शरीर साथ देईनासं झालं तरीही.

सरदारजी पंजाबातल्या आपल्या मूळगावी गेले तेंव्हा सारा बंगला मावशींच्या जीवावर टाकून गेले होते…गेल्या कित्येक वर्षांत त्यांनी विश्वास कमावला होताच तेवढा. घर सोडून आल्यानंतर उभं आयुष्य मावशींनी एकटीच्या बळावर रेटलं होतं. स्वाभिमानने जगल्या होत्या. पै न पै गाठीला बांधून ठेवली…लेकी उजवताना लागणार होता पैसा..थोडा का होईना.

दोन्ही मुलींना स्थळं सांगून आली. दोघींची लग्नं एकाच दिवशी होणार होती. मावशींचा इतिहास आडवा नाही आला. इतक्या वर्षांच्या अस्तित्वात मावशींनी चारित्र्यवान वर्तनाची,प्रामाणिकपणाच्या खुणा वाटेवर कोरून ठेवल्या होत्या. विपरीत परिस्थितीत संस्कार सोडले नाहीत,मुलांनाही देण्यात कमी पडल्या नाहीत.

कसे कुणास ठाऊक, पण लग्नाच्या आदल्या रात्री मावशींचे यजमान येऊन थडकले. वाल्याचे पाप कुणीही स्विकारले नव्हते..अगदी जवळच्यांनीही. पैसे,जमीन होती शिल्लक काही, पण कुणाच्या डोळ्यांत डोळे घालून बोलण्याइतपत पत नव्हती राहिली. मावशी काहीही बोलल्या नाहीत.

दिवसभर ट्रांसपोर्ट कंपनीच्या आवारातच कार्य पार पडलं. पंजाब,हरियाणा,केरळ,बंगाल….भारतातल्या प्रत्येक राज्यातील एक न एक तरी व-हाडी हजर होता लग्नाला…अर्थात पुरूषांच्या त्या मेळ्यात एकही स्त्री मात्र नव्हती. मराठी लग्नसोहळा पाहून ती परप्रांतीय माणसं कौतुकानं हसत होती. सरदारजी मालक सहकुटुंब आले होते. त्यांनाही ट्रकच्या रस्त्यात उभं राहून हात करणा-या वत्सलामावशी आठवत होत्या…आणि त्यांच्या सोबतची लहानगी मुलं.

सायंकाळी पाठवणीची वेळ आली. मावशींनी व्यवस्थित पाठवणी केली. एका ट्रकवाल्यानं सजवलेल्या मिनीट्रक मधून दोन्ही नव-या सासरी घेऊन जाण्याची तयारी केली होती…..गाडीभाडं आहेर म्हणून वळतं करण्याच्या बोलीवर ! एकंदरीतच चाकांच्या त्या दुनियेत दोन संसारांची चाकं अग्रेसर होत होती.

मुली निघून गेल्या चिमण्यांसारख्या…भुर्र्कन उडून. त्यांना आता नवी घरटी मिळाली होती हक्काची. व-हाडी आणि इतर मंडळी निघून गेली. मंडप तसा रिकामा झाला. वत्सलाबाईंनी लाडू-चिवड्याच्या पुड्या बाहेर खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या नव-याच्या हातावर ठेवल्या आणि त्याला वाकून नमस्कार केला. आणि पलीकडे काथ्याच्या बाजांवर बसलेल्या ड्रायवर मंडळींकडे पाहून म्हणाल्या…’ कर्नाटका कोई जा रहा है अभी?’

एक चालक उठून उभा राहिला. मैं निकल रहा हूं मौसी थोडी देर में. त्यावर वत्सला मावशी नव-याकडे हात दाखवून म्हणाल्या…’ इनको लेके जाना1 और हाँ….भाडा नहीं लेना. तुमसे अगली बार चाय-नास्ते का पैसा नहीं लूंगी !’ 

असं म्हणत वत्सलामावशी लग्नात झालेल्या खर्चाच्या नोंदी असलेल्या वहीत पाहण्यात गर्क झाल्या….त्यांच्या यजमानाला घेऊन निघालेल्या ट्र्ककडे त्यांनी साधं मान वळवूनही पाहिलं नाही ! धुळीचा एक हलका लोट उठवून ट्रक निघून गेला…वत्सलाबाईंच्या डोळ्यांत त्यांच्या नकळत पाणी उभं राहिलं….पण आत मनात स्वाभिमानाच्या भावनेनं रिंगण धरलं होतं…एका बाईनं एक लढाई जिंकली होती…एकटीनं !

….. नवरात्रीनिमित्त ही दुर्गा मांडली. चारित्र्य, सचोटी, प्रामाणिकपणा, जिद्द, मार्दव, कर्तृत्व, करारीपणा आणि धाडस ह्या अष्टभुजा उभारून जीवनसंघर्षरत असलेली दुर्गा. संदर्भांपेक्षा संघर्ष केंद्रस्थानी ठेवून लिहिले. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पडघवली” मधील अंबावहिनी ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

“पडघवली” मधील अंबावहिनी ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

मला आवडलेली गोनीदांच्या “पडघवली” मधील व्यक्तिरेखा – कादंबरी होती गो. नी. दांडेकर लिखित “पडघवली.” हे अप्रतिम पुस्तक आणि आणि मनाली भिडली ती  कादंबरीची नायिका “अंबावहिनी.”…ती एकदम मनात ठसली “पडघवली”  वाचली तेव्हा आवडलं होतं गोनीदांनी केलेलं “पडघवली”चं .. कधीही न पाहिलेल्या कोकणाचं वर्णन.. त्यांची ओघवती भाषा.  

१९५०चं दशक… कोकणपट्टीतील एक गाव. निसर्गाने आपलं वैभव अनंत हस्ते जिच्यावर उधळलंय अशी पडघवली.. घनदाट जंगल झाडी… त्याला नारळी पोफळीची डौलदार झालर. ..अशा या सुंदर गावी आली एक देखणी, गोरीपान आठ वर्षाची पोर.. लग्न म्हणजे काय हे न कळायच्या वयातच लग्न होऊन तिने पडघवलीतील आपल्या घराचा ऊंबरठा ओलांडला. तीच ही अंबा किंवा अंबूवहिनी… तिचं माहेरघर दाभोळ खाडीपासून दहा कोस आत.. पाण्याचं सततचं दुर्भिक्ष. अशा रुक्ष गावातून अंबा आली ते हिरव्यागार पडघवलीमधे. ..अष्टौप्रहर वाहणारा थंड पाण्याचा पन्हाळ बघून ती हरखली. घरी बरोबरीचे नणंद आणि दीर, गणुभावजी… हे तिचे खेळ सवंगडी. सासुबाई आणि मामंजी. अगदी प्रेमळ. वयाच्या दहाव्या वर्षी विधवा होऊन माघारी आलेल्या आतेसासुबाईंची आईविना वाढलेल्या अंबेवर अपार माया होती. अंबेचं घर हे गावकीतलं मुख्य घर. तिचे मामंजी खोत होते या गावचे! घरासमोर अंगण, मागं परसू, भोवताली नारळी-

पोफळीच्या बागा… पावसाळ्याचे चार महिने सोडले तर एरवी सात आठ महिने अंगणात मांडव.. खाली सावली आणि वर वाळवणं. पोफळं, आमसुलं,  कडवे वाल, गरे, आंबोशी, केळ्याचे काप, कडधान्य अन् काय काय… 

पडघवलीतलं प्रत्येक घर असंच खपत असे. अशा या कामसू गावाला त्यांच्या नव्या खोतीणीचा फार आदर होता. अंबावहिनी होतीही तशीच..! मनमिळावू, प्रेमळ, गावाविषयी आत्मीयता असणारी… 

आतेसासूबाईंकडुन शिकलेल्या, झाडपाल्याच्या औषधांनी, तिनं  कितीतरी गाववाल्यांना बरं केलं होतं आणि अनेक बाळंतिणींना सोडवलं होतं. ..

अंबेचा नवरा महादेव, तिची खूप काळजी घ्यायचा. बोलून दाखवलं नाही तरी त्याला अंबेचं कौतुक असावं. मात्र अंबेला जशी गावासाठी कळकळ होती तशी काही त्याला नव्हती. तो स्वार्थी नव्हता पण जरा आपल्या पुरतं पहाणारा होता..अंबेला याचं आश्चर्य वाटे. गावच्या खोताचा मुलगा ना हा ? असा कसा ?

गावकर्‍यांमधे अंबूवहिनीचा आणखी एक भरभक्कम आधार होता. तो म्हणजे गुजाभावजी. गुजा हा अंबूचा नवरा महादेव याचा अगदी जवळचा मित्र… महादेवाबरोबरच अंबूचीही गुजाशी छान मैत्री झाली. गावावरची अपार माया आणि कळकळ हा यांच्या मैत्रीतला दुवा… जिथे नवर्‍याबरोबर चारचौघात दोन शब्द बोलणं म्हणजे अगोचरपणा मानला जाई असा काळ तो. अशा काळी नवर्‍याच्या मित्राशी मैत्री ? अशक्यच..! 

पण “पडघवली” वेगळी होती. गुजाभावजी आणि अंबूवहिनी यांची निर्मळ आणि नितळ मैत्री पडघवलीच्या गावकर्‍यांनाच काय पण खुद्द महादेवाला देखील मान्य होती. त्यांच्या ह्या विश्वासाला तडा जाईल असं वर्तन गुजा आणि अंबू कडून कधी घडलं नाही.

दृष्ट लागावी असं सगळं …. पण.. ती लागलीच, अंबेचा चुलतदीर, व्यंकुभावजीच्या रूपाने… अंबेला माणसांची उत्तम पारख होती. तिला पहिल्यापासूनच व्यंकुच्या कारनाम्यांची शंका यायची. तिचा संशय दरवेळी खरा ठरे पण तिच्या नवर्‍याचं, भावावरील आंधळं प्रेम हेच अंबेचं मोठं दु:ख होतं.  बाहेरख्यालीपणा, गावातील लोकांच्या पैशांच्या अफरातफरी करणं, बेकायदेशीर जंगलतोड करणं.. अशा सगळ्या व्यंकूच्या कारवाया बघूनही आपला नवरा काही करत नाही म्हणून अंबू व्यथित होत असे. नवर्‍याचं नाकर्तेपण तिला असह्य होत असे पण ही व्यथाच तिला दिवसेंदिवस खंबीर बनवत होती… या सगळ्या कोंडमार्‍याचा स्फोट व्हायचा तो झालाच एके दिवशी…

व्यंकूनी सिमेंटचा बांध घालून महादेवाच्या आणि गावातील इतरांच्या बागेचं पाणी अडवलं. .तो बांध फोडायला अंबा स्वतः हातात कुदळ घेवून निघाली. अंबेचा तो अवतार बघून नवरा चरकला पण स्वतः गेला नाही. मात्र तिलाही अडवलं नाही. इतर काही गावकरी मदतीला आले आणि बांध फोडला गेला. अंबेनी सार्‍या गावासाठी पाणी वाहातं केलं. .व्यंकूनी गावकर्‍यांचा वानवळा मुंबईला नेऊन विकला. गावकर्‍यांना बोटी बुडाल्या असं सांगून त्यांचे पैसे हडप केले. हे प्रकरण मात्र महादेवाला खूप लागलं. स्वतःच्या खोत असण्याची त्याला जाणीव झाली. त्यानी जमीनीचा तुकडा विकून गाववाल्यांना नुकसान भरपाई दिली… कोण अभिमान वाटला अंबूला नवर्‍याचा. मनातून ती फार फार सुखावली. महादेवानी मात्र ह्या प्रकरणाचा धसका घेतला आणि त्यातून तो सावरलाच नाही.

महादेवानंतर अंबेनी गुजाभावजीच्या मदतीनी मुलाच शिक्षण केलं… गुजाला अंबेच्या कर्तृत्वाची जाण होती आणि आदरही. त्याच्यासारखा ताकदवान गडी. त्याने कोणा गुरूची दीक्षा घेतली मग तो गावातील चांगल्या कामासाठी देखील त्याच्या ताकदीचा वापर करेनासा झाला. यासाठी अंबा त्याची वेळोवेळी निर्भत्सना करे. 

तिची पडघवलीची ओढ व कळकळ समजून गुजा शेवटी ती सांगेल ते काम करायला तयार होई. अगदी गुरुवचनभंगाचा प्रमाद पत्करुन सुद्धा…

व्यंकूच्या कारवायांनी पडघवलीला उतरती कळा लागलीच होती. तरूणाई नोकरी धंद्याच्या नावाखाली गाव सोडून जात होती. त्यात भर म्हणून की काय महाभयंकर असं वादळ आलं आणि त्या वादळाने पडघवलीची उरली सुरली रया पण घालवली. या वादळात या खोतांच्या दारचं सर्वात जुनं आंब्याचं झाड जमीनदोस्त झालं…हे पाहून तिचा दिर हळहळला.. एरव्ही एवढ्या तेव्हढ्यासाठी जीव पाखडणारी अंबा वहिनी पण तिनी त्याची   समजूत घातली, “काय राह्यलंय त्या जुन्या झाडात ? आंब्यासाठी रडायचं ? सगळं जातंय. जाऊ दे..!” अंबेच्या तोंडचे हे पहिलेच निराशाचे उद्गार..! याच वादळात शेजार्‍यानी मदत न केल्यामुळे गावातल्या वृध्द यादोकाकी आणि त्यांची वासरी यांचा झालेला अंत .. अंबेला गावानी तिच्यावर केलेला हा शेवटचा घावच वाटला आणि तिनं हा गाव सोडायचा ठरवलं.? पण पडघवली सोडून जाणार कुठे ? मुंबईला मुलाकडे ? नाही नाही… अंबेची पराकोटीची घालमेल सुरू झाली.. 

मामंजी- आते सासुबाई- महादेव- यांची पडघवली ? साक्षात पडघवली ? वाडवडीलांनी वसवलेली पडघवली ? माडापोफळांनी झाकलेली पडघवली ? सोडायची ? नाही.. नाही..! अंबेला हे सहन झालं नाही. आणि  पडघवलीला कधीही अंतर द्यायचं नाही हे ठरवून ती माघारी फिरली…

अशी ही गावकर्‍यांशी आणि त्याहूनही जास्त गावाशी एकनिष्ठ असलेली अंबा… ज्या मातीत वाढली त्या मातीशी बेईमानी न करणारी अंबा… परपुरुषाशी निखळ व निर्मळ मैत्री कशी असावी हे दाखवून देणारी अंबा… खेडयातल्या आपल्या जीर्णशीर्ण, कोसळू पहाणार्‍या घरकुलांकडे लक्ष पुरवा हा संदेश देणारी अंबा… 

मला भावली..!!

© सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवरात्री जागर… — लेखिका : सुश्री मीनल सरदेशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ नवरात्री जागर… — लेखिका : सुश्री मीनल सरदेशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

मैत्रिणींनो नवरात्रोत्सव सुरू होतोय.  घरोघरी घटस्थापना होईल. अनेक मैत्रिणी आटापिटा करून कुलाचार जपण्याचा प्रयत्न करतील. हे करताना एक लक्षात ठेवा: मैत्रिणींनो, तुम्ही आनंदी तर घर आनंदी. त्यामुळे तेवढंच करा, जेवढं तुम्हाला मनापासून करावंसं वाटतंय, शारीरिक दृष्ट्या झेपतंय!

एखादीची भक्ती तिच्या सुंदर रांगोळीत दिसेल तर एखादीची भक्ती देवीची स्तोत्र पठण करण्यात असेल. एखादीला मनापासून रांधून देवीला तृप्त करण्यात समाधान मिळेल. एखादीला माणसाच्या सेवेत आपली देवी भेटल्याचा आनंद मिळेल. दिवसरात्र माळ हातात घेऊन, एका डोळ्याने सुनेने सगळं केलं ना इकडे लक्ष असेल, तर ती जपमाळ काय कामाची?

जे कराल ते मनापासून पटतंय, म्हणून करा. मनावर ओझं देवी देत नाही. तिला तुम्हाला आनंदी बघायलाच आवडतं. पिढी दर पिढी चालत आलंय ते करावंच लागतं, म्हणून ओझं घेऊन करू नका. प्रेमाने सुंदर सजवलेली चार फुलं सुध्दा देवीच्या दरबारी नक्की रुजू होतात.

एक गोष्ट सांगते. कोणतीही गोष्ट करताना पुढच्या पिढीने तस्संच केलं पाहिजे, अशी अपेक्षा ठेवू नका.कदाचित त्या पिढीच्या भक्तीच्या संकल्पना वेगळ्या असतील.

बकरीच्या गोष्टीसारखं एकीने उडी मारली म्हणून दुसरीने मारली असं नको. सजगतेने सण  उत्सव साजरे करा.

माझे बाबा मला सांगत असत. दोन हस्तक आणि तिसरं मस्तक एकत्र आलं की मनोभावे नमस्कार कर. फक्त ते मनापासून वाटू दे. एक मात्र कर. अडल्या नडल्याला मदत करताना हात आखडता घेऊ नकोस. माणसातल्या देवाला शोध. त्याची आरास कर, पूजा मांड. तिथे देवी नक्की येईल खात्री बाळग!

पूजा मीही करणार आहे. पण माझ्या मनातल्या देवीची. छान ताज्या फुलांची आरास करून.प्रसन्न देवघरात. मला जमेल तशी. कदाचित श्रीसूक्त तोंडपाठ नसेलही पण तरीही घरची गृहलक्ष्मी प्रसन्न असली की तिने घातलेली साद ऐकून माझ्याकडे आनंदाने वास करील माझी अंबाबाई, हो ना!

सूचना: नऊ  दिवस मिळालेच पाहिजेत म्हणून पाळी मागे पुढे करायला गोळ्या खाऊ नका.देवी घरातल्या सगळ्यांची आहे आणि आता बाजारात  सहज सर्व उपलब्ध असल्याने नैवेद्य करणं फार अवघड नाही.

लेखिका :मीनल सरदेशपांडे,रत्नागिरी.

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

पूर्वपिठीका –

इंग्रज सरकारला विनंती करून, त्यांच्या अटी मान्य करून अंदमानातून मुख्य हिंदुस्थानात येण्यामागचा सावरकरांचा मुख्य उद्देश राष्ट्रसेवा हाच होता. त्यांना माहित होतं की अंदमानात जेलमधून राहून आपण देशासाठी कांहीच करू शकणार नाही. तेच हिंदुस्थानच्या मुख्य भूमीवरून आपण अप्रत्यक्षरित्या का होईना स्वातंत्र्यचळवळीचा भाग होऊ शकू. निदान या कार्यासाठी लोकांना प्रेरित  करू शकू. त्यासाठी अखिलहिंदू एकतेचं महत्व लोकांच्या गळी उतरवून जातीपातीमुळे विखुरलेला हिंदुसमाज एकसंध व्हावा यासाठी प्रयत्न  करू. परकियांच्या ‘divide and rule’ या धोरणाला त्यावाचून खीळ बसणार नाही.

अखेर अंदमानातून आणून रत्नागिरी इथे सरकारने त्यांना स्थानबद्धतेत ठेवल्यानंतर चार महिन्यातच त्यांनी हिंदूसभेची स्थापना केली व आपले स्थानबद्धतेतील पहिले भाषण दिले, अस्पृश्यता निर्मूलन कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सकलहिंदुएकतेचं आपलं ध्येय त्यानी सात वर्षांतच गाठलं व रत्नागिरी इथं श्रीपतीतपावन मंदीर  उभारलं, जिथं सर्व जातींच्या हिंदूंना मुक्त प्रवेश होता; इतकंच नव्हे तर गाभाऱ्यात जाऊन पूजापाठ करण्याची, वेदमंत्रोच्चाराची मुभा होती. हिंदुएकता व अस्पृशता निर्मूलनावर त्यांनी अनेक कविता रचल्या व त्या विविध संघटनांद्वारे, विविध ठिकाणी, विविध समारंभातून जाहीर रित्या गायल्या गेल्या अशा प्रकारे समाज प्रबोधन करून त्यांनी ही सामाजिक  चळवळ पुढे नेली. थोर समाजसुधारक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, आपल्या एका भाषणात म्हणाले होते, “मी आयुष्यभर अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम केलं पण अवघ्या सात वर्षांतच  या निधड्या छातीच्या वीराने जी सामाजिक क्रांती घडवली आहे ती पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की देवाने माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच द्यावं.”

सावरकरांच्या प्रेरणेतूनच शेठ भागोजी कीर यांनी रत्नागिरी येथे साकारलेल्या पतितपावन मंदिरात देव प्रतिष्ठेचा अभूतपूर्व  समारंभ २२ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला तेंव्हा सर्व  जाती, उपजातीचे पाच हजारांहून अधिक हिंदू जमले होते. अनेक सामाजिक व राजकीय नेते, संतमहंत तसेच वेदान्ताचे गाढे अभ्यासक, ‘महाभागवत’ डाॅ शंकराचार्य  कुर्तकोटी हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्याप्रसंगी सर्व जाती, उपजातीच्या वीस हिंदु युवतींनी सावरकरांचे हे गीत एक कंठाने गायले.

हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा... स्व. वि. दा. सावरकर ☆

उद्धरिसी गा हिंदुजातिसी केंव्हा

हे हिंदुजातिच्या देवा ॥ धृ. ॥

आब्राम्हण चंडाल पतितची आम्ही

तुम्ही पतितपावन  स्वामी

निजशीर्ष विटाळेल म्हणुनि कापाया

चुकलो न आपुल्या पाया

आणि पायांनी राखु शुद्धता साची

छाटिले पावलांनाची

ऐकू न पडो आपुलिया कानाते

मुख कथी न म्हणुनि ज्ञानाते

निज सव्यकरे वामकरा जिंकाया

विक्रियली शत्रुला काया

करु, बंधूसी बंद करु दारा, जे

चोर ते घराचे राजे

हे पाप भयंकर  झाले । रे

पेरिले फळाला आले। रे

हृदि असह सलते ते भाले । रे

उद्धार अता! मृत्युदंड की दे वा

हे हिंदुजातिच्या देवा! ॥१॥

 

अनुताप परी जाळितसे या पापा

दे तरि आजि उःशापा

निर्दाळुनि त्या आजि भेद – दैत्यासी

ये हिंदुजाति तुजपाशी

ते अवयव विच्छिन्न सांधिले आजि

तू फुंकी जीव त्यामाजी

देऊनि बळा वामनासि ह्या काळी

तो घाल बळी पाताळी

जरि शस्त्र खुळा कर न आमुचा कवळी

परि तुझी गदा तुजजवळी

जरि करिसी म्हणू जे आता। रे

म्हणशील करू ते नाथा । रे

उठू आम्ही परि दे हाता। रे

दिधलासि जसा कंस मारिला तेंव्हा

हे हिंदु जातीच्या देवा ॥२॥

     कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

सावरकरांच्या सर्वच कविता गेय आहेत कारण त्या वृत्तबद्ध  आहेत. बहुतांश कविता जरी विविध मात्रावृत्तात बांधलेल्या असल्या तरी त्यांनी इतर वृत्तांचा वापर देखिल केलेला आहे.

या कवितेत ते पतितपावनाचा धावा करीत आहेत. अस्पृश्यता पालनामुळे हिंदु धर्माचे नुकसान कसे झाले व आता आम्ही ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना आम्हाला तुमच्या सहाय्याची कशी आवश्यकता आहे, हे या कवितेत कवी पटवून देतात. आम्ही पापी आहोत, संपूर्ण हिंदु समाजच पतीत आहे, पण तुम्ही पतितपावन आहात तर तुम्ही आमचा हा हिंदु समाजपुरूष एकसंध करून आमचा उद्धार करा.

वेदांनी ब्राम्हणांना समाजपुरूषाचे मस्तक मानले आहे तर शूद्रांना पाय. कवी म्हणतात आमच्या मस्तकाला विटाळ होऊ नये म्हणून आम्ही आमचे पाय तोडले, इतकच नव्हे तर पायांनी देखिल आपली शुद्धता राखण्यासाठी पावलं तोडली. म्हणजे जसे सवर्णांनी दलितांना दूर लोटले तसेच शूद्रांनी पण अतिशूद्रांना दूर केले, सामावून घेतले नाही.

कानांनी ज्ञान ग्रहण करू नये म्हणून मुखाने त्याचा उच्चार केला नाही. म्हणजे ब्राम्हणांनी शूद्रांना वेदाध्ययनापासून म्हणजेच ज्ञानार्जनापासून वंचित  ठेवलं.

क्षत्रियांनी देखिल अशाच चुका केल्या. डाव्या हाताला जिंकण्यासाठी उजव्या हाताने आपलं पूर्ण शरीरच शत्रूला  विकलं. जसे जयचंदाने पृथ्वीराजास जिंकण्यासाठी महंमद घोरीला आपलं स्वातंत्र्य विकलं. सख्ख्या भावाला घरात कोंडून चोराच्या हातात आम्ही जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्या. असं करून आपण आपलच नुकसान करून घेत आहोत हे आम्हाला कळलं नाही.

आता आम्हाला आमच्या चुका समजल्या आहेत. आम्ही पश्चातापदग्ध आहोत. आमच्या चुकांमुळेच हिंदु समाजपुरूष पंगु झाला आहे. आता याची जाणीव आम्हाला झाली आहे.

हा सल भाल्याप्रमाणे आम्हास  टोचतो आहे. आता आम्ही हे तोडलेले अवयव जोडले आहेत पण त्यात जीव येण्यासाठी, एकसंधता येण्यासाठी तुझ्या कृपेची आवश्यकता आहे.

तेंव्हा हे हिंदूंच्या देवा, तूच आम्हाला सहाय्य करून आमचा उद्धार तरी कर नाहीतर मृत्युदंड तरी दे. भेदाभेद राक्षसाचे निर्दालन करून आम्ही तुला शरण आलो आहोत, तरी आम्हाला उःशाप दे.

कंसासारख्या दुष्ट प्रवृतींचे उच्चाटन करण्यासाठी जसा तू आम्हाला मदतीचा हात दिलास तसाच आताही दे जेणेकरून अशा समाजविघातक कुप्रथांचे उच्चाटन करून हा हिंदुसमाजपुरुष एकसंध व बलशाली होईल. एवढीच विनंती मी तुला करतो आहे.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शाश्वत की अशाश्वत!!! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

शाश्वत की अशाश्वत!!! ☆ सौ.मंजिरी येडूरकर

पहाटेच्या हळूवार स्पर्शानं सकाळ जागी झाली होती. सूर्य किरणांची लगबग संपून ते स्थिरावले होते. कुठं धुणं धुतल्याचे आवाज तर कुठे भांडयांचा खणखणाट ऐकू येत होता. कुठे ‘‘ दिपे, पाणी काढलंय आंघोळीला जा,’’ अशा हाका, कुणी दोन्ही खांद्यावर पदर घेऊन हातात किटली घेऊन दूध आणायला चाललं होतं. कुणी लगबगीनं नोकरीचं ठिकाण गाठायला निघालं होतं.

सगळं कसं रोजच्या सारखं चाललं होतं. कुठे कुणी अडखळत नव्हतं कि चाचरत नव्हतं. जणू काल काही घडलचं नव्हतं. कालचा दिवस यांच्या आयुष्यात उगवलाच नव्हता. सगळे जगतायत. कां? प्रत्येकाकडं कारण आहे,  जगण्याचं! स्वतःसाठी, स्वतः निर्माण केलेलं! कुणाला खूप मोठं व्हायचयं, कुणाला खूप पैसा मिळवायचाय, कुणाला छान संसार थाटायचाय, कुणाला मुलांना मोठ्ठ करायचंय, कुणाला मुलांची लग्न करायचीत, कुणाला नातवंडं पहायचीत, तर कुणाला त्यांची लग्नं….सारं न संपणारं! सा-या मनाच्या समजुती. अन् असं मनाला पटण्याजोगं कारण नसेल ना तर “आत्महत्या करणं म्हणजे भ्याडपणा आहे. संकटांना निधडया छातीनं सामोरं जायला हवं, जीवनाचा क्षण न् क्षण वेचला पाहिजे. त्यातून आनंद मिळवला पाहिजे.” असं अगदी राणी लक्ष्मीचा आव आणून सांगतील. पुळचट! स्वतः पुळचट  असतात. आत्महत्या करण्याचं धाडस नसतं आणि ते दाखविणा-याला भ्याड म्हणतात.

 पण खरंच! आयुष्यात कांहीतरी करून दाखविण्याची धमक असणारे किती निघणार? हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगे! बाकी सगळे सामान्य अतिसामान्य! संसाराच्या चौकटीत रमणारे. मग सगळेच जर तसे धाडसी असते तर काय झालं असतं? सगळा समाज विस्कळीत झाला असता. त्यांना एकत्र बांधणारा कांही दुवाच राहीला नसता. कुठे कांही लागेबांधेच राहिले नसते. कुठं कुणासाठी अश्रुच वाहिले नसते. सगळं कसं अशाश्वत झालं असतं.

अशाश्वत? अशाश्वत झालं असतं, म्हणजे आता सगळं शाश्वत आहे? आहे तर काय! सगळं शाश्वत आहे. म्हणून तर कुणी उद्यासाठी घर बांधतय, कुणी पैसा साठवतंय, कुणी दागिने करतंय. प्रत्येकजण उद्यासाठी जगतोय. उद्याच्या स्वप्नांसाठी! स्वप्नांच्या पूर्ततेचा आनंद लुटण्यासाठी! पण खरंच जर सगळं अगदी अशाश्वत असतं नां, तर एक मात्र चांगलं झालं असतं. प्रत्येकजण वर्तमानातला प्रत्येक क्षण न् क्षण जगला असता अगदी अधाशासारखा! स्वच्छ, पारदर्शक, निर्भेळ, निरपेक्ष जगला असता. या शाश्वतामुळं जगण्यावरच मळभ साठलंय. कुणी जगत नाहीय, आपोआप जगले जातायत. कुजणारं स्वत्व आणि त्यावर वाढणा-या स्वार्थाच्या आळयांच्या बुजबुजाटात !

अशाश्वताने आपलं अस्तित्व दाखविण्यासाठीच  कालचा  नंगा नाच केला असावा. शाळेला म्हणून घराबाहेर पडलेली मुलं परतलीच नाहीत. त्यांचे आई बाप हा नियतीचा क्रूर खेळ पहात बसलेत. अशाश्वताच्या विळख्यानं गुदमरत! आपल्या आसपास मात्र सगळं शाश्वत आहे. जणू, काल टी.व्ही. वर दाखवलेला मुलांच्या पालकांचा आक्रोश यांच्या कानापर्यंत पोचलाच नाही. सगळयांची उद्याची आखणी, उद्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

मगं खरं काय आहे? शाश्वत की अशाश्वत? कां अशाश्वताच्या धुक्यातून चाचपडत वाट काढू पहाणारं, पैलतीराचं मृगजळ दाखवणारं शाश्वत! कि शाश्वतावर आरूढ होवून त्याला हवं तसं दौडू देणारं पण लगाम मात्र आपल्या हातात ठेवणारं अशाश्वत!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वेल… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वेल… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मैत्रीण म्हणाली गोकर्णीच्या बिया आहेत लाव तुझ्या कुंडीत…

पावसाळ्याचे दिवस आहेत रुजतील बघ…

कुंडी रिकामी नव्हती .तुळशीच्या कुंडीतच  तीनी खड्डा केला …आणि त्यात बिया पेरल्या. पाणी घातलं .

दर दोन दिवसांनी ती बघायची अजून अंकुर वर आला नव्हता.

काही दिवस तिचे तिकडे लक्षच गेले नाही .आणि त्या दिवशी अचानक दोन पानं दिसली …

तिला विलक्षण आनंद झाला.. वेल भराभर वाढायला लागली..

ती प्रचंड खुश…

तुळशीच्या फांद्यांचा आधार घेऊन वेल वर चढायला लागली..

भरपूर हिरवीगार पानं दिसत होती.

ती रोज परत परत बघायची वेल ऊंच ऊंच गेली  होती ….

त्या दिवशी सुनबाई जवळच उभी होती म्हणाली..

“ आई इतकं काय निरखून बघताय?”

“ अगं वेल वाढली आहे पण अजून फुलं काही लागली नाहीत “

सून जरा शांत बसली.. नंतर हळूच म्हणाली..

“आई इतकी घाई नका करू.. वेलीला वाढू दे …सशक्त होऊ दे.. तिला योग्य वाटेल तेव्हा येतील फुलं…

तिचा तिला वेळ द्या….  कदाचित तिची अजून तयारी झाली नसेल…”

तिने सुनेकडे बघितलं … म्हणाली, “  अग फुलांची वेल आहे मग फुलं आलीच पाहिजेत …फुलं येत नाहीत म्हणजे काय…. “

सून काही बोलली नाही. शांतपणे बाजूला झाली .

‘फुल कशी येत नाही बघतेच आता…..’ असं म्हणत  तिने त्यावर उपाय करायला सुरुवात केली .

अनेक जण सांगणारे भेटले.  माहितीचे नवेनवे स्तोत्र हाताशी होतेच .जे जे जमेल ते ते ती करत होती .

एकदा सुन म्हणाली …. 

“आई या सगळ्याचा वेलीला त्रास होत असेल …हिरवीगार वेल पण छान दिसते आहे….”

तिने सुनेच्या  बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तिचा फुलासाठी आटापिटा सुरू होता.

यश मात्र येत नव्हते .काही दिवसांनी ती निराश झाली…आणि मग तो खटाटोपही  कमी झाला .

मध्ये काही दिवस असेच गेले………… एक दिवस ती उठली सहज वेलीकडे लक्ष गेले …

ती चमकली.  फुलासारखं तिला काहीतरी दिसलं… जवळ गेली तर लक्षात आलं ते प्राजक्ताचे फुल होतं…. 

वाऱ्यावर वेल डोलली …तसे ते फुल अजूनच तिला छान वाटलं…

ती बघत बसली….आज वेल जास्त सुरेख दिसते आहे असं तिला वाटलं.

मनोमन तिला सगळं काही उमगलं…

अचानक तिने हळूच सुनेला जवळ घेतलं. पाठीवर थोपटलं …तिचे हात हातात घेतले.. तो आश्वासक हात बरंच काही सांगून गेला…

… आई स्टूलावर  चढली होती. ती पडेल अशी लेकीला भीती वाटत होती …” आई मी स्टूल  घट्ट धरून ठेवते म्हणजे तू पडणार नाहीस….” आपल्या छोट्याशा हाताने तिने स्टूल  पकडले…

आईला आधार देण्यासाठी…आईची काळजी लेकीच्या इवल्याशा  डोळ्यात दिसत होती….

दोघी  कौतुकाने   छोटुकल्या प्राजक्ताकडे बघत होत्या…

सासू सुनेचे डोळे गच्च भरून वाहत होते……

कुठलाही गाजावाजा न होता एका वेलीनी अवघड प्रश्न सहजपणे सोडवला होता…….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares