मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सेवाव्रती हळबे मावशी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ सेवाव्रती हळबे मावशी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

सन १९८९.  ‘बजाज फाउंडेशन पुरस्कार’ सोहळ्यासाठी बंगलोर (आता बंगलुरू)इथला सुंदर सजवलेला भव्य हॉल , हळुवार सुरांची वातावरण प्रसन्न करणारी मंद धून, फुलांची आकर्षक सजावट केलेले भले मोठे स्टेज, उंची वस्त्रांची सळसळ आणि अनेक भाषांमधील संमिश्र स्वर! अशा अनोख्या वातावरणात देश विदेशातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या बरोबरीने,  पांढऱ्यास्वच्छ सुती नऊवारी साडीतील मावशी म्हणजे इंदिराबाई हळबे स्टेजवर अवघडून बसल्या होत्या. थोड्यावेळाने घोषणा झाली.’आता महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील देवरुख या अत्यंत दुर्गम खेडेगावात महिला आणि बाल कल्याणाच्या कार्यातील प्रशंसनीय योगदानाबद्दल श्रीमती इंदिराबाई हळबे यांना जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात  येत आहे.’ सभागृहातील टाळ्यांचा कडकडाट  मावशींच्या कानावर पडत होता. पण डोळे भरून आल्याने सारे अस्पष्ट दिसत होते. मावशी जुन्या आठवणींमध्ये  हरवून गेल्या.

चंपावती खरे ही रत्नागिरी जिल्ह्यात एका  लहानशा खेड्यात १९१३ साली जन्मलेली मुलगी. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे चौथीत असताना लग्न झाले. लग्नानंतर इंदिराबाई हळबे होऊन त्या मुंबईला आल्या.

१९२८ते१९३९ असा अकरा वर्षांचा संसार मावशींच्या वाट्याला आला. त्यातच त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला.नंतर थोड्याशा आजाराने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. वेळेवर आणि योग्य औषधोपचार न मिळाल्याने हे मृत्यू झाले होते. या दुःखातून बाहेर येण्यासाठी मावशी देवरुख इथे त्यांच्या बहिणीकडे, त्यांची सर्वात धाकटी मुलगी मीनाक्षी हिला घेऊन काही महिने राहिल्या.

राजा राममोहन राय यांच्या प्रखर लढ्यामुळे ब्रिटिशांनी सतीची परंपरा रद्द केली होती. तरीही विधवांच्या शापित जीवनाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला नव्हता.

देवरुख येथील शांत, निसर्गरम्य वातावरणात मावशींना थोडे मानसिक स्वास्थ्य मिळाले. शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देवरुख संपन्न होते. देवरुखला मावशींना अनेक विचारवंतांचे सहाय्य आणि मार्गदर्शन लाभले. पूज्य साने गुरुजींची भगवत गीतेवरील मार्गदर्शक व्याख्याने ऐकून त्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेत व्यतीत करण्याचा संकल्प केला.

त्यांच्या सर्व आशा आता मीनाक्षीवर केंद्रित झाल्या होत्या. मीनाक्षीच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने  मावशी  मुंबईला परतल्या. डॉक्टर काशीबाई साठे यांच्याशी त्यांची कौटुंबिक मैत्री होती. मीनाक्षीलाही त्यांच्यासारखे डॉक्टर व्हायचे होते. दुर्दैवाने एका छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन वयाच्या १३ व्या वर्षी मीनाक्षीचे अकस्मात निधन झाले.

या अंध:कारमय आयुष्याचा सामना करण्यासाठी मावशींनी नर्सिंगचा कोर्स करण्याचे ठरविले. त्यासाठी कमलाबाई होस्पेट यांच्या मातृसेवा संघ, नागपूर इथे प्रवेश मिळवून खूप मेहनतीने त्यांनी नर्सिंग कोर्स पूर्ण केला. तथाकथित समाज नियमांना न मानता मावशींनी हे धाडस केले होते. या वेगळ्या वाटेवरून चालण्याचा खंबीर निर्णय मावशींनी निश्चयाने अमलात आणला. देवरुख हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले. समाजाच्या जहरी टीकेला आपल्या कृतीतून उत्तर दिले.

मावशींनी जातपात, स्पृश्य- अस्पृश्य, धर्म असली कुठचीही बंधने मानली नाहीत .प्रसूतीमध्ये अडलेल्या बाईसाठी त्या उन्हापावसात, रात्री अपरात्री डोंगरवाटा तुडवीत मदतीला गेल्या. अनेक बालकांना सुखरूपपणे या जगात त्यांनी आणले. एवढेच नाही तर फसलेल्या कुमारीका, बाल विधवा यांनाही आपल्या छत्रछायेखाली घेतले.  त्यांच्या मुलांचे पालकत्वही पत्करले. आजारी, अशक्त, अपंग, अनाथ मुलांच्या त्या आई झाल्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख इथे त्यांनी उभारलेली ‘मातृमंदिर’ ही संस्था म्हणजे त्यांच्या कार्याची चालती बोलती ओळख आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना मावशींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देवरुखला एका गोठ्यात, दोन खाटांच्या सहाय्याने प्रसूती केंद्राची सुरुवात केली. आज त्यांचे कार्य  एक सुसज्ज हॉस्पिटल, फिरता दवाखाना, रूग्ण वाहिका, निराधार बालकांसाठी गोकुळ अनाथालय, कृषी केंद्र, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, बचत गट, महिला सक्षमीकरण उपक्रम, आरोग्य केंद्र, बालवाड्या, पाळणाघरे असे वटवृक्षासारखे विस्तारले आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, शिस्त आणि शुद्ध आचरण यांच्या बळावर समाजाला सावली आणि आधार देणारे अगणित उपक्रम त्यांनी राबविले.  त्याचबरोबर अशा सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या तरुणाईच्या पिढ्या घडविल्या. या तरुणाईला त्यांनी पुरोगामी विचारांचे, विज्ञान निष्ठेचे आणि श्रमप्रतिष्ठेचे  शिक्षण स्वकृतीतून दिले. अनेक सामाजिक चळवळींना हक्काचा निवारा दिला. खेड्यापाड्यातून आलेल्या, देवरुख महाविद्यालयात शिकणाऱ्या अनेक गरीब मुलांसाठी मावशींनी शेतावर मोफत होस्टेलची व्यवस्था केली. यातील अनेक मुलांना शेतावर, रुग्णालयात, मेडिकल स्टोअर, आयटीआय, पाणलोट प्रकल्प, कृषी प्रकल्प आदी विविध कार्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या मनावर मूल्याधिष्ठित संस्कार केले.

१९९८ मध्ये मावशी गेल्यानंतर काही काळाने संस्थेच्या कार्याला विस्कळीतपणा आला होता .आज श्री अभिजीत हेगशेट्ये  आणि त्यांचे अनेक तडफदार सहकारी यांच्यामुळे मातृमंदिर  पुन्हा जोमाने कार्यरत झालेआहे. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा जिवंत आहे. याचे  आत्ताचे उदाहरण म्हणजे कोविड काळात मातृमंदिरने शेकडो  कोविडग्रस्तांसाठी ‘ऑक्सिजन आधार प्रकल्प’ उभारला आणि अनेक रूग्णांचे प्राण वाचविले.२०२१ च्या पुरामध्ये उध्वस्त झालेल्या कोकणवासियांना मातृमंदिरने पुढाकार घेऊन  अनेक प्रकारची मदत केली. स्वच्छता अभियान राबविले.

देवरुख परिसरातील ६०-७० गावातील जनतेसाठी आता मातृमंदिर संस्थेतर्फे अद्ययावत सुविधा देणारे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. अनेक दानशूर लोकांनी मातृमंदिर संस्थेला  आर्थिक मदत केली आहे.

समाजाचा पाया सुदृढ व्हावा म्हणून अनेक स्त्रियांनी तत्कालीन सामाजिक रुढी, जाचक निर्बंध दूर सारून स्वतःचे आयुष्य पणाला लावले. साहजिकच त्यांची वाट काट्याकुट्याची होती. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात या स्त्रियांनी भरीव योगदान दिले. त्या पायाचा दगड बनल्या म्हणून आजची स्त्री अनेक क्षेत्रात ताठ मानेने उभी राहू शकत आहे. अशा अनेक तेजस्वी तारकांमधील सन्माननीय हळबे मावशींना  सहस्र प्रणाम 👏

–++++–

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –1 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –1 ☆ श्री सदानंद आंबेकर

भारत – अध्यात्माची मायभूमी – जिथे सजीव आणि निर्जीव दोन्हींमधे देव बघितला जातो। श्रध्दा हा जीवनाचा आधार – त्या पार्श्वभूमीवर अनेक देवस्थानं आणि त्यांच्या विविध परंपरा। अशीच एक सुमारे ७०० वर्षांपासून चालत आलेली उच्चस्तरीय परंपरा आहे —’आषाढ आणि कार्तिक महिन्यात होणारी पंढरीची वारी।’

विठ्ठल-रखुमाईचा जागृत वास असलेली पुण्यनगरी पंढरपूर… येथे फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर प्रांतातून आणि परदेशातूनसुध्दा भाविकगण वारी करायला मुख्यतः आषाढ महिन्यात येतात। ईश्वर कृपेने ही पायी वारी करण्याची संधी यंदा मला मिळाली।

सुरुवातीला या यात्रेबद्दल काहीच माहित नसल्यामुळे मनात अनेक प्रश्न काहूर माजले होते। बरेच प्रश्न – कुठं जाऊ, किती अंतर असणार, रस्ता कसा असेल, लोकं कोण नि कसे असतील, जेवणाचं, थांबायचं कसं नि कुठे, इत्यादि होते. पण यांची माहिती मिळवली नि माझ्या गृहनगर भोपाळ येथून देवाचं नाव घेऊन घराबाहेर पाऊल  टाकलं।

पुण्यात माझी आतेबहिण नि भाची यांची भेट आमच्या दिंडीने ठरविलेल्या ठिकाणी – ‘गुप्ते मंगल कार्यालय, शनिवार पेठ पुणे‘ येथे झाली। खरं तर माझी यात्रा ताईंच्यामुळे शक्य झाली कारण त्यांनी कार्यक्रमाची महिती मला दिली नि मी त्यांच्यासोबत यात्रेची तयारी केली।

आमची यात्रा ‘संत विचार प्रबोधिनी’ या दिंडीसोबत होणार होती। त्याच्या संचालिका हभप सौ माईसाहेब गटणे यांनी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आधीच सर्वांना व्हाटस्एपच्या माध्यमातून दिली होती। त्या सूचनापत्रकाप्रमाणे पायी वारीसोहळा हा ११ जून ते ३० जून २०२३ पर्यंत चालणार होता।

११ जून :: पहिले पाऊल

गुप्ते मंगल कार्यालयात आमचे आवश्यक सामान, जे पुढे यात्रेत लागणार होते ते ठेवून, एका लहान बॅगमधे रस्त्यात लागणारे लहान-सहान सामान घेऊन आम्ही श्रीक्षेत्र आळंदीला निघालो। अद्याप आपल्या सह-वारकरी मंडळीशी आपसांत ओळखी झाल्या नव्हत्या।

माझी आळंदीला ही दुसरी यात्रा होती, पण या वेळेस उद्देश् वेगळा होता, त्यामुळे मनात एक वेगळा उत्साह आणि उत्सुकता होती। पुणे नगरात चहूकडे वारकरी दिसत होते. त्यात शहरापेक्षा गावची मंडळी जास्त आहेत असे वाटले, पण नंतर हे दृश्य बदललं। पायी चालत तिथे ठरलेल्या ठिकाणी- विठ्ठल कृपा मंगल कार्यालयात आम्ही सुमारे चार वाजता पोहोचलो। त्याच वास्तूत अजून एक दिंडी आली असल्यामुळे थोडा गोंधळ झाला, पण लगेच आपले ठिकाण पहिल्या माळयावर आहे हे कळले।

त्या रात्री तिथेच मुक्काम असल्यामुळे बऱ्याच लोकांनी आपली जागा ठरवून सामान लावून घेतले होते। येथे जुने वारकरी पूर्वओळख असल्याने एकत्र आले नि नवे पण हळूहळू त्यांच्यात मिसळू लागले। आमची एकूण संख्या १५० आहे हे कळविण्यात आले।

उन्हाळा खूप असल्याने पाण्याची गरज खूप जास्त भासत होती. तेव्हा वारंवार बाहेर जाऊन पाणी आणावे लागत होते। थोडयाच वेळात दिंडीच्या संचालिका सौ माईसाहेब आल्या नि मंचावर त्यांनी स्थान ग्रहण केले। सुरुवातीला वारीच्या फीचा हिशेब, पावती देणे ही किरकोळ कामं आटोपून नंतर संपूर्ण यात्रेची माहिती आणि वारीचे अनुशासन सांगितले। या मधेच सर्वांना या दिंडीचा १९८६ पासूनचा पूर्व इतिहास नि पूर्व वारीप्रमुख वै.ह.भ.प.डॉ रामचंद्र देखणे यांचा जीवन परिचय देण्यात आला। हे पूर्ण झाल्यावर त्यांची प्रवचन सेवा झाली जी सर्वांनी मनापासून ऐकली।

आजच्या दिवशी म्हणजे ११ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून संध्याकाळी निघणार होती अन् त्या दिवशी परंपरेप्रमाणे तिचा मुकाम तिथेच असल्यामुळे दिंडीच्या व्यवस्थे- -प्रमाणे पुण्यात स्वतःची सोय असणारे वारकरी पुण्याला परत जाऊ शकत होते। रात्री सुमारे आठ वाजता वाजत-गाजत भक्तजनांच्या गजरासोबत पालखीची यात्रा सुरू झाली। गर्दी खूप जास्त असल्याने मला दर्शन काही होऊ शकले नाही। पोलिसांना गर्दी सांभाळायला खूप मेहनत करावी लागत होती। नंतर रात्री नगर बस सेवेत बसून पुण्याला परत आलो।

१२ जून :: माऊली आलेत पुण्याला .. 

दुसरे दिवशी १२ जूनला पालखीचे पुण्यात आगमन झाले अन् तिथे पालखीचा एक दिवस मुक्काम होता. त्यामुळे दिंडी पण १३ जूनला पुण्याला गुप्ते मंगल कार्यालयात थांबली। पुण्यातील स्थानीय वारकरी यांना आज इथे हजर होण्याबद्दल सूचना होती।

१४ जून :: वारी निघाली पंढरपुराला : पुणे – सासवड अंतर ३८.३४ कि.मी. 

शेवटी १४ जूनला तो सूर्यादय झाला ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती। सकाळी पाच वाजल्या- -पासून सर्व वारकरी पूर्ण उत्साहात तयार झाले। तेव्हाच सूचना झाली की सर्वांनी आपले सामान लगेजच्या ट्रकवर ठेवावे। पहिला दिवस असल्यामुळे थोडी घाई गर्दी होत होती पण अखेरीस सर्वांचे सामान चढले। इथे सांगण्यात आले की जवळच एका ठिकाणी सर्वांचा चहा इत्यादि होईल नि मग पुढे वाटचाल होईल। त्या प्रमाण तिथे चहा-नाश्ता नि दिवसाकरिता खाण्याचे पैकेट वाटप सुरू झाले। चहा-कॉफी, नाश्ता घेऊन आता पाठीवर आवश्यक तेवढे सामान, मनांत प्रचंड उत्साह, उत्सुकता घेऊन आणि मुखाने जय हरि विठ्ठल घोष करीत सर्व ओळीत लागले नि ‘ ज्ञानोबा-तुकाराम माउली ‘ असा नाद करीत आमची ‘ संत विचार प्रबोधिनी ‘ची दिंडी वारीच्या मार्गाला निघाली। येथेच ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महारांजाच्या पालख्या एकत्र येतात नि नंतर वेगळया मार्गावर चालू लागतात।

– क्रमशः भाग पहिला…

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुःखाना जबाबदार कोण?… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ दुःखाना जबाबदार कोण? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

एक महिला दररोज मंदिरात जायची.  एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले, की आता मी मंदिरात येणार नाही.

यावर पुजाऱ्याने  विचारले – का?

मग ती बाई म्हणाली – मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते. काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे.  काही लोक पूजा, होम हवन प्रामाणिक  पणे कमी करतात, आणि देखावा अधिक!

यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला – ते बरोबर आहे!  पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, मी जे सांगतो त्यासह तुम्ही काही करू शकता का!

बाई म्हणाल्या – तुम्ही मला सांगा. काय करावे?

पुजारी म्हणाले – एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदक्षिणा करा.  अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एकपण थेंब खाली पडता कामा नये.

बाई म्हणाल्या – मी हे करू शकते.

मग थोड्याच वेळात त्या बाईने तेच केले.  त्यानंतर मंदिराच्या पुजारीने महिलेला 3 प्रश्न विचारले –

  1. तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का?

   2. तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना  दिसले का?

  1. तुम्हाला कोणी देखावा करताना दिसले का?

बाई म्हणाली – नाही मी काही पाहिले नाही!

मग पुजारी म्हणाले – जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता, तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते, जेणेकरून त्यातून पाणी पडू नये.म्हणून तुम्हाला काहीही दिसले नाही.

आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल, तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमपिता परमात्म्याकडे केंद्रित करा, मग तुम्हाला काहीही दिसणार नाही.  सर्वत्र फक्त देवच दिसेल.

आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे? देव आहे? कुंडली आहे ? की तुम्ही स्वतः आहात ?

अरे! देव नाही ,

  गृहनक्षत्र किंवा कुंडली नाही,

  नशीब नाही,

  नातेवाईक नाहीत,

  शेजारी नाहीत,

  सरकार नाही,

तुम्ही स्वतः जबाबदार आहात.

 1) तुमची डोकेदुखी फालतू विचारांचा परिणाम आहे.

 2) तुमची  पोटदुखी , तुमच्याच चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे.

 3) तुमचे कर्ज तुमच्या हावरटपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे.

 4) तुमचे कमकुवत शरीर/वाढलेली  चरबी / आणि आजारी शरीर, तुमच्याच चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे.

 5) तुमच्या कोर्ट केसेस, तुमच्या असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे.

 6) तुमच्यातील अनावश्यक वाद, तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे.

वरील कारणांखेरीज शेकडो कारणे आहेत , ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता. दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता. 

यामध्ये कोठेही देव दोषी असत  नाही.

जर आपण या दुःखांच्या कारणांचा बारकाईने विचार केला तर आपल्याला आढळेल की कुठेतरी आपला मूर्खपणा त्यांच्यामागे आहे.

म्हणून योग्य निर्णय घ्या आणि त्यानुसार तुमचे आयुष्य निरोगी  आणि सुखी समृद्धी होवो!

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊस आणि आठवणी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ पाऊस आणि आठवणी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पाऊस आणि आठवणींचे काय नाते आहे देव जाणे! पण पाऊस आला की आठवणी येतात आणि आठवणींचा पाऊस मनात कोसळू लागतो! पावसासारख्याच आठवणींच्याही त-हा अनेक आहेत. कधी आठवणी इतक्या येऊन कोसळतात की त्यांची तुलना फक्त कोसळणाऱ्या पावसाशीच होते. कधी कधी त्या त्रासदायक असतात तर कधी आठवणी रिपरिप पडणाऱ्या पावसासारख्या असतात!आठवणी हळूहळू पण सतत येत राहतात, आणि मनाला बेचैन करतात! रिप रिप पडणारा पाऊस जसा सावकाश पण सतत राहतो, तशा या आठवणी सतत येतात आणि मनाच्या चिखलात रुतून बसतात. काही वेळा या आठवणी पावसासारख्याच लहरी असतात! कधी मुसळधार तर कधी तरल, विरळ अशा! कधीतरी अशा आठवणी वळवाच्या पावसासारख्या मृदगंध देणाऱ्या असतात! तापलेल्या मनाला शांत करतात. या आठवणींच्या गारा टप् टप् मोठ्या पडणाऱ्या असतात पण जितक्या वेगाने पडतात तितक्याच लवकर विरघळून जातात! रिमझिम पडणारा पाऊस हा प्रेमाच्या आठवणी जागवतो.त्यांची रिमझिम  माणसाला हवीशी वाटते! त्या आठवणींच्या रिमझिम पावसात माणुस चिंब भिजून जातो. पाऊस आणि आठवणींचा अन्योन्य संबंध आहे असं मला वाटतं! पाऊस येत नाही तेव्हा सारं कसं उजाड, रखरखीत होतं! तसेच आठवणी किंवा भूतकाळ नसेल तर जीवन बेचव होईल. आठवणी या मनाला ओलावा देतात.पण हो, कधी कधी पावसासारख्याच या आठवणी बेताल बनतात. पाऊस कुठेही कोसळतो, पूर येतात तशाच त्रासदायक आठवणी काही वेळा माणसाचा तोल घालवतात .त्याला त्रासदायक ठरतात. अतिरिक्त पावसासारख्या च त्याही नाश करतात.

पाऊस आणि आठवणी दोन्हीही प्रमाणात पाहिजेत, तरच त्याची मजा! कधीकधी ऊन पावसाचा खेळ होतो आणि इंद्रधनुष्य निर्माण होते! तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण अगदी आनंदून  जातो.

मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी इंद्रधनुष्यासारख्या सप्तरंगात उजळतात. आठवणींच्या थेंबावर आपल्या मनाचे सूर्यकिरण पडले की त्यावर दिसणारे इंद्रधनुष्य मनाला लोभवते आणि आनंद देते. अशावेळी आपलं मन इतके आनंदित बनते  जसे की पावसाची चाहूल लागली की मोराला आनंद होऊन तो जसा नाचू लागतो! मन मोर नाचू लागतो तेव्हा सुंदर आठवणींचा पाऊस आपल्या मनात भिजवत राहतो. सृष्टीला जशी पावसाची गरज आहे तशीच आपल्यालाही छान आठवणींची गरज असते. कधी मंद बरसत, कधी रिपरिप  तर कधी कोसळत हा आठवणींचा पाऊस आपण झेलतच राहतो…झेलतच रहातो!…….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता)…   इथून पुढे. 

मी सुसाईड करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माझे प्रथम खूप मनापासून अभिनंदन केले… आणि मला म्हणाला, “ इतक्या प्रचंड संघर्षाने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेस, पाचगणी परिसरातील असंख्य चित्रे रेखाटलीस, चित्रप्रदर्शने केलीस, पण जागेअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्रे पावसात भिजली, तुझे खूप नुकसान झाले याचीही मला जाणीव आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, तुला यश का मिळाले नाही ? हे मी सांगू शकत नाही. तू खूप कष्ट घेतले आहेस त्यामुळे तू आत्महत्या करू नकोस असेही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार… 

…. तर काही दिवस तू बिलिमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव, तेथे कोणीही कलाशिक्षक नाही.  त्या मुलांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत, आणि त्यांना गुरुची (कलाशिक्षकाची ) फार आवश्यकता आहे.  जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर मरणार… जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्चमधला येशु तुला कधीही माफ करणार नाही … फक्त एक महिना तू या मुलांना शिकव व नंतर निवांतपणे आत्महत्या कर. तुला मी अडवणार नाही …. “ 

“पण मी चित्रकला कधी शिकवली नाही, ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे.  माझे अे. टी. डी किंवा ए .एम झालेले नाही. ते शाळेतील लोक मला कसे स्वीकारतील ? हे मला जमणार नाही …. मी कमर्शियल आर्ट शिकलेलो आहे..  शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नाही,”  अशी विनंती मी त्याला केली.

आयझॅक जिद्दी होता. त्याने त्याच्या गळ्यातील ग्रीन रंगाची टाय काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि म्हणाला, “ मिस्टर आर्टीस्ट सुनील काळे.. नाऊ यु आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्टटीचर… तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही, कसलाही इंटरव्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत.  सकाळचा नाष्टा , दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक  खोली मिळेल. माणसाला जगायला आणखी काय लागते ? अन्न ,वस्त्र निवारा व जॉब …

तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तू का स्वीकारू नये ? एक महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे . शिवाय तू जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधही करत नाही. मग प्रश्न येतो कुठे ? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेले, शिकलेले सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे एवढीच माझी मागणी आहे .” 

थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचे म्हणणे पटले. आपले सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचे मगच मरायचे…असे मी ठरवले.

दुसऱ्या दिवशी बिलिमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो .

प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिले आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवले. वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुले फार आनंदित झाली. त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळे उत्साह आला होता. ती सगळी मुले आणि मुली माझ्याभोवती जमा झाली. त्यांची स्वतःची चित्रे, चित्रकलेच्या वह्या, क्रेयॉन कलरचे बॉक्स दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुष झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो, जणू मी माझ्या स्वतःच्या छोट्या मुलीला शिकवत आहे असा भास मला होत होता…

शिकवता शिकवता दोन तास कसे संपले हे मलाही कळले नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल, ताहीर अली, अशी अनेक  नावे आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग ,नवीन तास, नव्या ओळखी, नवी उत्सुकता असलेली मुले, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्याने ओळखीची होत असलेली छोटी मुले व मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोलीभोवती घिरट्या घालत राहिली त्यांना त्यांची नवीन चित्रे दाखवायचा खूप उत्साह असायचा. मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी. चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहाने शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्रे, स्केचिंग करु लागलो. शशी सारस्वत, संजय अपार सर, दुबे मॅडम, छाया व संजय उपाध्याय, मोहीते सर, नॅथलीन मिस, सुनील जोशी सर, असे नवीन मित्रही या बिलिमोरिया शाळेत भेटले. अशा रीतीने एक महिना, दुसरा महिना, तिसरा महिना कसा संपला हे कळलेच नाही…

शाळेचे एक नवे वेगळे विश्व मी अनुभवत होतो …

हे माझ्यासाठी फार वेगळे जगणे होते. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझी टाय मात्र एकच होती… 

…. आयझॅकने दिलेली ग्रीन टाय. 

अशा रीतीने एक वर्ष संपले आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिलिमोरिया स्कूलमध्ये जॉईंट झाली.

सेंट पीटर्स मध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होते. मुलं देखील नवनवीन गोष्टी शिकत होती त्याचबरोबर माझी चित्रकला ही नव्याने बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील अनेक निसर्ग चित्रे मी नव्याने रेखाटू लागलो. त्या काळात माझे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर, नंतर ओबेराय टॉवर हॉटेल व 2002 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. याठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला .

माझी आर्थिक स्थितीही सुधारली 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतले. नवा स्टुडिओ बांधला .

सेंट पीटर्स येथे ड्रेस कोड असल्यामुळे भरपूर कपडे घेतले. त्यावेळी माझ्याकडे रंगीबेरंगी ८० टाय झाल्या होत्या. आजही त्या आठवण म्हणून माझ्याकडे आहेत . पण एक टाय मात्र मी प्रेमाने जिव्हाळ्याने कायमची जपून ठेवलेली आहे ….. 

…. ती म्हणजे आयझॅक सरांची ग्रीन टाय. 

मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तेमध्ये असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो. त्याने आता लग्नही केलेले आहे .फेसबुकवर अधून मधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली ,बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही ती म्हणजे ग्रीन  टाय …. कारण ती टाय मला स्वतःला कधीकधी आयझॅक बनवते. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात . काही नवीन शिकणारी असतात, काही निराश झालेले असतात , काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात, अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात, त्यांना मार्ग सापडत नसतो …  अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो ..  नव्हे आयझॅक सर संचारतो माझ्यात…

ज्या ज्या वेळी अशी निराशेने ग्रासलेली , व्यथित, दुःखी माणसे मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकाने आयझॅक झाले पाहीजे असे माझे आंतरमन मला नेहमी सांगत असते, कारण त्याची ग्रीन टाय सतत मला आठवण करून देते.

जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसते तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी ,सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी , सर्वोत्तम ऐकण्यासाठी असते.

….. असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले. आणि माझे आयुष्य समृद्ध करत गेले. एकवीस वर्ष झाली आता या घटनेला, आत्महत्या करायचे तर मी कधीच विसरून गेलो आहे. असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रुपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा व एक ग्रीन टाय मिळावी किंवा…

…. तुम्हीच कोणाचे तरी आयझॅक व्हावे आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी म्हणजे निराशेचा अंधार कायमचा दूर व्हावा….

म्हणून खूप खूप शुभेच्छा !

तर अशी आहे माझी ‘ग्रीन टाय’ ची आठवण…..  मला सतत प्रेरणा देणारी……..

– समाप्त – 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘काळा ठिपका…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘काळा ठिपका…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

कॉलेजमधील एका  प्राध्यापकांनी एके दिवशी वर्गावर आल्यावर अचानक जाहीर केले-

“आज मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे.”

असे म्हणून प्राध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. काहीजण तर पूर्ण बावचळून गेले. कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती.

कसलेच प्रश्न त्यावर नव्हते. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता.

प्राध्यापक म्हणाले,

“आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत.”

मुलांनी मग जमेल तसे उत्तर लिहिले. सगळ्यांचे लिहून झाल्यावर प्राध्यापकांनी पेपर गोळा केले आणि एकेकाची उत्तरपत्रिका मोठ्याने वाचायला सुरुवात केली.

कुणी लिहिले होते, तो ठिपका म्हणजे मी आहे, माझे जीवन आहे, तर कुणी भौमितीकरीत्या लिहिले होते की, पेपरच्या मध्यभागी एक काळा ठिपका आहे. त्याचा व्यास अमुक तमुक मिलीमीटर असावा वगैरे वगैरे !

सगळे झाल्यावर प्राध्यापक म्हणाले,

“दुर्दैवाने तुम्ही सर्वजण नापास झालेले आहात.”

सर्वजण दचकले.

मग प्राध्यापक सांगू लागले,

“सर्वांनी एकाच दिशेने विचार केला आहे. सर्वांचा फोकस त्या काळ्या ठिपक्यावरच होता. ठिपक्याभोवती खूप मोठा ‘पांढरा’ पेपर आहे, हे मात्र कुणीच लिहिले नाही.”

आपल्या जीवनात देखील असेच होते. आपल्याला खरेतर जीवनरुपी खूप मोठा पांढरा पेपर मिळालेला असतो. ज्यात आनंदाचे रंग किंवा शब्द भरायचे असतात. पण आपण ते न करता केवळ काळ्या ठिपक्याकडे पाहतो.

जीवनातल्या अडचणी, मित्र मैत्रिणी सोबतचे वाद गैरसमज, घरातील विसंवाद हे सगळे ते काळे ठिपके असतात.

आपण त्यावर फोकस करतो आणि ‘खूप मोठा पांढरा’ पेपर हातात आहे याकडे दुर्लक्ष करतो.

खरेतर एकूण पांढऱ्या पेपरच्या आकारापेक्षा तो काळा ठिपका तुलनेने खूप लहान असतो. पण तरी आपण त्यातच गुंतून पडतो. आणि मोठा पांढरा भाग दुर्लक्षित राहतो.

म्हणून यापुढे काळा ठिपका न पाहता पांढरा पेपर पाहायला शिका!

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माणूस…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “माणूस…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

खायला, रहायला, आणि अंगावर घालायला मिळालं की माणसाच्या गरजा संपत नाहीत. वरच्या गोष्टी मिळाल्यावर किंवा मिळवताना माणसाला माणूसच लागतो. माणसाला महत्वाची गरज असते ती माणसाचीच. आणि हा त्याला सतत हवा असतो.

वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, इतकंच काय पैशाने देखील माणूस मोठा होतो. पण माणसाला मोठं करण्यात सहभाग असतो तो माणसाचाच. कोणताही माणूस एकटाच, आणि आपला आपलाच मोठा होत नाही.

बरेच कार्यक्रम हे कोणाच्या तरी नावाने होतात. अशा कार्यक्रमात साधारण तीन माणसं मोठी होतात. एक ज्याच्या नावाने कार्यक्रम आहे तो. या कार्यक्रमाला ज्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आहे तो दुसरा. आणि अशा कार्यक्रमात ज्यांच कौतुक होणार आहे तो तिसरा.

यातले तिघंही आधीच मोठे असू शकतात. पण अशा कार्यक्रमामुळे त्यांचा मोठेपणा वाढतो आणि अशा प्रत्येक कार्यक्रमानंतर तो वाढत जातो. पण कार्यक्रम यशस्वी करायला गरज असते ती माणसांची.

मनातलं दुःख सांगायला माणूस नसला तरी चालतो. पण आनंद व्यक्त करायला मात्र साथ लागते ती माणसाचीच. दु:ख वाटल्याने कमी होत, आणि आनंद वाटल्याने वाढतो अस म्हणतात. पण हे कमी करणारा आणि वाढवणारा फक्त आणि फक्त माणूसच असतो‌.

करमणूक म्हणून माणूस रेडिओ, टि.व्ही. यांचा आधार घेत असेल. यावर सुरू असणारे कार्यक्रम तो ऐकतो, बघतो. पण मनातलं तो यांना सांगू शकत नाही. आणि मग आपलं ऐकायला लागतो तो माणूस.

एखादी आनंदाची गोष्ट घडल्यावर ती कधी आणि कशी सांगू अशी घाई माणसाला  होते. पण अशी गोष्ट वस्तूंना सांगून समाधान होत नाही. ते समाधान मिळवून देणारा असतो तो माणूस.

प्रवासातल्या काही वेळात सुध्दा माणूस सहप्रवाशाशी बोलत असतो. यात बऱ्याचदा प्रवास केव्हा संपतो ते कळत सुद्धा नाही.

स्पर्धेत सुध्दा कोणीतरी हरल्यामुळे जिंकणारा मोठा होतो. जिंकण्यासाठी सुध्दा हरवावं लागतं ते माणसालाच.

अनेक जण सकाळ, संध्याकाळ ठराविक वेळी, ठराविक रस्त्याने फिरायला जातात. यावेळी काही चेहरे नियमित दिसतात. पण आपसात ओळख मात्र नसते. असा ओळख नसलेला पण नेहमीचा चेहरा दिसला नाही तर थोड वेगळ वाटतंच. कारण… नेहमी दिसणारा माणूस आज दिसत नाही. यावेळी सुध्दा नजर  शोधत असते ती त्या माणसाला.

माणसाला मोठं करण्यात माणसाचाच हात असतो. यातही सगळ्यात महत्वाचा हात असतो तो शिक्षक या माणसाचा. एक शिक्षक एकावेळी अनेकांना मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतो. तो सुद्धा  माणूसच घडवत असतो.

माणूस, भांडला तरी भांडतो माणसाशीच. यात चुकणारा, त्याला समजवणारा, आणि समेट घडवणारा असतो तो माणूसच.

आनंदाच्या वेळी मिठी मारत पाठीवर ठेवलेला, आणि संकटात खांद्यावर ठेवलेला एक हात बरंच काही सांगून जातो. तो हात असतो माणसाचा.

फक्त आपण माणूस आहे याची जाणीव ठेवायला हवी. कारण सोबत हवा असतो तो माणूस…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

स्वपरिचय 

जन्मगाव पाचगणी असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात राहून वाई पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील निसर्गरम्य जागेवर जावून अनेक जलरंगातील चित्रे रेखाटनाचा नाद लहानपणापासून आहे. या परिसरातील पाच हजारांपेक्षा जास्त चित्रे रेखाटलेली आहेत. त्यांचे प्रदर्शन मुंबईच्या सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर मुंबई, ऑबेरॉय टॉवर्स, म्युझियम आर्ट गॅलरी येथे व पुण्यात बालगंधर्व येथे प्रदर्शने केलेली आहेत. अनेक प्रसिद्ध कलारसिक लोकांनी चित्रे विकत घेतलेली आहेत. लेखन, वाचन, चित्रकला, बागकाम, कॅलिग्राफी, फिरणे, रेखाटने करणे, गाणी ऐकणे, निसर्गात रममान होणे व शांत राहणे हे आवडीचे छंद आहेत.

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

आयुष्य मोठे गमतीशीर असते, किती तरी अकल्पित, नावीन्यपूर्ण, रोमांचक , सुखाच्या, दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात… आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे रोजचे जगणेही वेगवेगळे असते… एकासारखे दुसऱ्याचे जगणे साचेबंद नसते.

अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि चांगला कणखर दिसणारा माणूसही निराशेच्या गर्तेत खोलवर रुतत जातो . काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात… असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झाले जगून, आता नको जगायला यापुढे…. माणसं कबूल करत नाहीत पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण- धगधग मनात साठलेली असते .

1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केले होते आणि ते सर्व प्रकारे विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाले . त्या काळात मी नालासोपारा येथे राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्याने कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी येथे मला रोज जायला लागायचे .सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचं रुटीन झालं होते. त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात….

मला वाई, पाचगणी , महाबळेश्वरचा निसर्ग खूप आवडायचा म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणीमध्ये मला चित्र विक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती.  या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो, मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्याजवळ मला एक जुना बंगला भाड्याने मिळाला.  त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरीचे स्वरूप देताना माझे सर्व पैसे कसे संपले हे मलाही कळले नाही.  तरीही जिद्दीने आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली.  अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून व स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु एका वर्षाच्या आत घरमालकाने फसवले आणि त्याची जागा परत मागितली.  मी त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने नकार दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यावसायिकरित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. त्यानंतर उतरती कळा लागली …

मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला.  पुढे पाचगणी क्लब, टेबल लँडवरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो . प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग, नवे इंटेरियर करावे लागायचे. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. त्याकाळात मॅप्रो गार्डन येथे उघड्यावर प्लाझा सारखे प्रदर्शन लावले होते. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सर्व चित्रे, ग्रीटिंग कार्डस, कॅलेंडर, पोस्टर्स, सर्व काही धो धो पावसात भिजून गेले. मॅप्रोचे कोणीही कामगार मदतीस आले नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली जवळपास 200 ओरिजिनल जलरंगातील निसर्गचित्रे पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजनल चित्रे पावसामुळे पूर्णपणे धूवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही.  उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली…  आणि पूर्ण देखील केली… आणि जी अवहेलना  केली ती मनाच्या पटलावर एखाद्याने चाकुचे अनेक वार करावे तशी जखम करुन गेली .

अतिशय कष्टाने काढलेली मूळ चित्रे धुळीस मिळाल्यामुळे जगण्याचा आधारच संपला. राहायला घर नाही, जगण्यासाठी पैसे नाहीत, घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही, अशा परिस्थितीत सगळीकडे निराशेच्या अंधाराने मनाला ग्रासून टाकले, मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो.  तिथे नालासोपारा येथे माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमूळे मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे धुळीस मिळालो, पूर्णपणे खचलो.

आणि मग जगण्यात राम नाही, मजा नाही.. सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळे मग जगायच तरी कसे ? कशासाठी ? असे संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचे ? सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचे नक्की केले.

पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावर सेंट पीटरचे चर्च आहे त्या चर्चच्या पाठीमागे अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे . येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे. पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी येथे आहे. माहीत नाही पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचे दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचे मी नक्की केले होते.  दुपारी दोनच्या सुमारास मी तेथे पोचलो.  ज्या माणसाने पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची ,सिल्वर वृक्षांची झाडे लावली ,कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला, या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सर्व सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिले , ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या, त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊनपावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवताच्या व काट्याकुट्यांच्या मध्ये कधीही साफसफाई नसल्याने नीट दिसतही नव्हती .

मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली व डोळे मिटून जॉन चेसन बरोबर बोलत राहिलो . त्याची व माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जनस्‍थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो. मला कशाचेही भान राहिले नव्हते.  कितीतरी वेळ मी तसाच सुन्न बसून होतो….  आणि… अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली. डोळे उघडले आणि पाठीमागे पाहिले तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला. आयझॅकने मला कडकडून मिठी मारली. माझे डोळे पुसले, माझे सांत्वन केले, आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली.

आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा. संगणक व त्याचे शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमाने तो शिकवायचा . मी चित्रकार असल्याने कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा. फुकट शिकवायचा आणि एखादे सुंदर स्केच झाले की खूप कौतुक करायचा. सर्वांना अतिप्रेमाने शिकवत असल्यामुळे अनेक देशी, परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा. चालताना देखील धावत धावत चालायचा… आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता.

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

?विविधा ?

☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आजपासून अधिक महिन्याची सुरूवात! गेला आठवडाभर वाॅटसपवर याविषयी वेगवेगळे लेख आणि माहिती वाचतेय. अधिक महिन्यात काय काय करावं, म्हणजे कोणती व्रतवैकल्ये करावी, पोथ्या-पुराण वाचावी, जावयाला ३३ जाळीदार वस्तूंचं वाण द्यावं इ.इ. त्याचबरोबर फक्त अधिक महिन्यात लेकीनं आईची ओटी भरावी, आईला साडी घ्यावी, असंही वाचलं. अन् मन विचाराच्या भोवऱ्यात गरगरायला लागलं.

अशी साडी वगैरे देऊन अधिक महिन्यात तुझीओटी भरण्याचा एखादाच प्रसंग मी अनुभवला असणार. कारण ठळकपणे असं फारसं आठवत नाहीये.  माझ्या लग्नानंतर जेमतेम ६ वर्षांनीच तू देवाघरी गेलीस.

माझा याप्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याला अजिबात आक्षेप नाही. पण खरंच का अश्या ओटी भरण्यानेच फक्त आईबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. आणि माझ्या मनाने ठामपणे याचं उत्तर *नाही * असं दिलं.

लग्नापूर्वी तर तुझ्यासोबतच राहात होते. पण संसारात पडल्यावर क्षणोक्षणी तुझी आठवण येतच राहिली. *लेकरासंगे वागताना थोडी थोडी समजत जातेस * असं सहजपणे लिहून गेले माझ्या कवितेत ते उगाच नाही. तू आपल्या वागण्यातून रूजवलेले संस्कार, नक्कीच माझं आयुष्य सुंदर करत गेले आणि आजही करत आहेत.

अगदी लहान वयात तू लावलेली वाचनाची सवय, आयुष्यातील अनेक अवघड परीक्षा यशस्वीपणे पास होण्यासाठी नकळत कारणीभूत ठरली. कारण आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्यासाठी विचार करण्याची कुवत आणि वैचारिक बैठक त्यातूनच तयार झाली. तुझं स्वतःचं उदाहरण तर नेहमीच माझ्या डोळ्यांसमोर असतं.

मराठी आणि हिंदी भाषांवरील तुझं प्रभुत्व, शुद्धलेखनाचा आग्रह, यामुळेच माझ्या लेखनात सहसा शुद्धलेखनाची चूक आढळत नाही. याआणि जी काही कमतरता राहते, तो नक्कीच माझा आळशीपणा किंवा अज्ञान. पण या  गोष्टींसाठी प्रशंसा होते तेव्हा तेव्हा तुझ्या आठवणीने नेहमीच डोळे भरून येतात. 🥲😢

परिस्थितीनं नववीतच शिक्षण सोडायला लागलं तरी आपल्या अखंड आणि अफाट वाचनामुळे तू मिळवलेलं ज्ञान आणि वैचारिक समृद्धी, ही अनेक शैक्षणिक पदव्या मिळवलेल्या व्यक्तींपेक्षाही कितीतरी उच्च दर्जाची होती, हे मला पदोपदी जाणवतं. म्हणूनच अगदी लहान वयात आमच्या हाती श्रीमान योगी, स्वामी, झेप, मृत्युंजय यासारखी पुस्तकं होती.  चौथीला स्काॅलरशिप मिळाल्यावर तू घेऊन दिलेलं साने गुरुजींचं, चित्रा आणि चारू, हे पुस्तक उदात्त प्रेम आणि मैत्री कशी असते, असावी हे नकळत शिकवणारं!

स्वतःसाठी पुरेसं नसतानाही, त्यातलंच दुसऱ्याला देऊन मदत करण्याची तुझी सह्रदयता, माणुसकी या गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. मग ती साधी वाटीभर आमटी, कामवाल्या राधाबाईंसाठी मुद्दाम काढून ठेवण्याची गोष्ट असो की आणखी काही!

आम्हां पाचही मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देऊन ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगायला शिकवताना, बाबा आणि तू, दोघांनी  सोसलेल्या अडचणी आणि केलेल्या त्यागाला तोडच नाही. त्या ऋणातून उतराई होणं या जन्मी तरी जमेल असं वाटत नाही ग! 🙏

असे संस्कार घडवणारी आई लाभणं हे आमचं महद्भाग्य! असे कितीतरी प्रसंग आणि आठवणी! कोणीतरी म्हटल्याप्रमाणे *आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई, तरी लिहून होणार नाही,आई तुझी थोरवी!  पण  माझी ही शब्दरूपी ओटी तुला समाधान देईल, असा मला विश्वास आहे.

आणि हो हे वाचून, सगळ्या मुलामुलींना शब्दांत व्यक्त करता आलं नाही तरी, आपापल्या आईची  आठवण काढून ते तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील याची मला खात्री वाटते. ज्यांच्या नशिबी अजून मातृसौख्य आहे, ते भाग्यवान या निमित्ताने पुन्हा एकदा आईच्या कुशीत शिरण्याचा सुखद अनुभव घेतील. तिची प्रेमानं, आपुलकीनं चौकशी करतील आणि काळजीही घेतील. बाकीचे तिचे स्मरण करून, तिच्या संस्कारांचा वसा चालू ठेवतील, तर ही ओटी सुफळ संपूर्ण होईल.

© सुश्री प्रणिता खंडकर

दि. १८/०७/२०२३

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्थूलपणाची ऐशी की तैशी… ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ स्थूलपणाची ऐशी की तैशी… ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे

एक काळ होता जेव्हा म्हणत असत की ‘पैसा गेला – काही नाही गेलं, तब्बेत गेली – काही तरी गेलं, चारित्र्य गेलं – सर्व काही गेलं’ (money lost- nothing lost, health lost- something lost, charector lost – everything lost).

आता परिस्थिती बदलली आहे. कोरोना नंतरच्या काळात तर ती प्रकर्षाने जाणवू लागली आहे व वरील सुभाषितामध्ये ही बदल झाला असून ‘वर्तणूक गेली- काही तरी गेलं, तब्बेत गेली तर सर्व काही गेलं’ अशी आता परिस्थिती आहे.

तुमच्याकडे पैसा असेल, वर्तणूक ही चांगली असेल पण तुमची प्रकृती (तब्बेत/हेल्थ) चांगली नसेल तर त्या पैशाचा, वर्तणूकीचा तुम्हाला काहीच फायदा नाही. तुमची प्रकृती खराब झाली तर तुमच्या चांगल्या वर्तणुकीमुळे तुमचा वशिला लागेल, चांगल्या दवाखान्यात तुम्हाला दाखल ही करता येईल, तेथील महागडा खर्च ही तुम्ही पेलू शकाल, पण तुमच्या शरीरावर होणाऱ्या औषधांच्या माऱ्याचे दुष्परिणाम ही तुम्हाला भोगावे लागतील. कोरोना काळात रेमिडीसीयर सारख्या औषधांनी अनेकांचा जीव वाचला पण त्यांच्या दुष्परिणामांनी त्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली‌ हे सर्वश्रुत आहेच. 

आजकाल आपलं खाणंपिणं ही असुरक्षित झालं आहे. उत्पन्न जास्त व्हावे यासाठी औषधांच्या फवारणी व रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतात उत्पादन होणारे धान्य हे सदृढ शरीरासाठी पोषक राहीले नाही व त्याने वेगवेगळ्या आजारांना निमंत्रणच दिले जात आहे. विशेष म्हणजे ते उत्पादन करणारे शेतकरी ही हेच अन्न खातात व त्यांच्यावर ही विपरीत परिणाम होतातच. खाद्यतेलांमधील भेसळ, फळे लवकर पिकावीत म्हणून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमुळे फळे ही स्वस्थ शरीरासाठी सुरक्षित राहीले नाहीत. दूध वगैरे इतर पेय, बहुतेकांच्या आवडीची आईस्क्रीम, चॉकलेट्स ही यापासून सुटलेले नाहीत, त्यामुळे आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच घटकांपासून आपल्या शरीरस्वास्थ्याला हानी पोहोचत आहे. त्यात जनसामान्यांप्रति असलेल्या नैतिकतेचा अभाव सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत होत आहे. 

जगण्यासाठी अन्नधान्य आवश्यक आहे म्हणून ते टाळता तर येणार नाही. सतत बाहेरचे, भोजनालयांतील अन्न, फास्ट फूड, पिझ्झा बर्गर सारखे स्वस्थ शरीरासाठी तेवढे आवश्यक नसलेले अन्न/पदार्थ खाऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंतची शरीरे कमकुवत व जाड, बेढब होत आहेत. अकाली मृत्यू चे प्रमाणही वाढत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने कर्करोग व इतर साथीच्या रोग व विविध व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. परवा सामायिक केलेल्या लेखाप्रमाणे डॉ. नितू मांडके, डॉ. गौरव गांधींसारखे कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने दगावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परिस्थिती व भविष्य अंधारात आहे. घरातील सदस्य व वयस्कांच्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे घरातील आर्थिक स्थिती ही बिघडत आहे.      माणूस पैसा कमावण्यासाठी आयुष्यभर धावतो व तब्बेत खराब करून घेतो आणि मग मेहनतीने कमावलेला पैसा तब्बेत ठिक करण्यावर घालवतो. 

या सर्वांवर मात करण्यासाठी आपण आपल्या प्रकृतीची शक्यतो काळजी घेणे, तब्येत सांभाळणे, शरीर सुदृढ व रोगमुक्त कसे राहील याविषयी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी सतत प्रयत्नशील राहणे एवढेच आपल्या हाती आहे.

व्याधींचे अस्तित्व नाही असे घर शोधून ही सापडणार नाही. माझे ही खानपानावर नियंत्रण नसल्याने माझे ही वजन वाढत होते. आनुवंशिकतेमुळे उंची कमी व वजन ९६ किलो झाल्यामुळे माझे दोन्ही पायांचे गुडघे खराब झाले होते. चालणे अशक्य व खूपच त्रासदायक झाल्याने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करून गुडघेबदल (जॉइंट रिप्लेस) करुन स्टील चे पार्ट बसवण्यात आले. एका पायाला पंचवीस व दुसऱ्या पायाला सत्तावीस टाके घालण्यात आले होते. त्यांचे एक्स रे चे फोटो व गुडघ्यांवर झालेल्या शस्त्रक्रियेचे वण माझ्या स्टेटस ला ठेवलेल्या फोटोत दिसतात. 

माझेही वय आता साठ आहे. उंची १५५ से. मी. त्यानूसार माझे वजन ५५ ते ६० किलो असायला हवे पण ते वाढत ९६ चे ९८ झाले. मी दररोज सकाळी सहा व सायंकाळी सहा कि. मी. असे बारा किलोमीटर चालत होतो. यामुळे वजन वाढत नव्हते, पण कमी ही होत नव्हते. पाऊस, थंडी व कंटाळा ने यात खंड पडत असे. वजन कमी करण्यासाठी मी मध-निंबू, उपाशी राहणे, पंधरा दिवस अन्न न घेता फक्त रस (ज्यूस) पिऊन राहणे, असे इतरही बरेच प्रयत्न करून पाहिले पण वजन काही कमी होत नव्हते. कंटाळून चालणे ही बंद झाले होते. शेवटी मी दैवावर हवाला ठेवून दिवस कंठत होतो. शरीर अजुन स्थूल झाले होते. (स्टेटस ला ठेवलेल्या फोटोत बघून कल्पना करू शकता). चालतांना मला धाप लागत होती व जीना चढाउतरायला त्रास होत होता. पोटाचा घेर वाढल्याने मला उभे राहिले तर माझे पाय दिसत नव्हते‌.  मोजे- बुट (सॉक्स- शूज) घालायला खूपच त्रास होई. मोजे घालतांना पोट दाबले जावून गळ्यापर्यंत येत असे‌.  सर्वच कपडे मला घट्ट होत असत. स्थूलपणा ची लाज वाटून कामाव्यतिरिक्त मी बाहेर जाणे टाळत होतो. घरातच राहिल्याने हळूहळू नैराश्य मला घेरायला लागले होते. दररोज सकारात्मक कथा लोकांना पाठवायचो पण मन निराश व्हायला लागले होते. 

आधी आमच्या शेजारी राहणाऱ्या एका मित्राची पत्नी, वय वर्षे तीस, पण ती ही स्थूल होती. माझे बघून तिने ही वजन करायचे सर्व प्रयत्न करून झाले होते पण त्यांनाही फरक पडला नव्हता. नंतर ते दूर रहायला गेले. त्यांनंतर त्यांना वजन कमी करण्याच्या खात्रीलायक प्रकाराविषयी माहीत झाले व त्यांनी ते अंमलात आणले. स्वतः अनुभवून मित्राचे दोन महिन्यांत दहा व पत्नी चे सहा महिन्यांत पंचवीस किलो वजन कमी झाल्यावर ती दोघे आमच्याकडे आली. मी त्यांना बघून आश्चर्यचकित झालो. 

जेवण बंद न करता, आहार नियंत्रण करून सकस आहाराच्या मदतीने व घरातल्या घरात नियमित व्यायाम करुन कमी दिवसांत वजन घटवण्याच्या या पद्धतीविषयी त्यांनी मला माहिती दिली. भविष्यात आजारी पडून त्रास, मनःस्ताप भोगण्यापेक्षा शरीर स्वस्थ, निरोगी करून व्याधीमुक्त जीवन जगण्याचा आनंद देणारा हा सहज साध्य असलेला व्यायाम प्रकार मला उत्तम वाटला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही पद्धत अवलंबली.

आहार नियंत्रण, सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा व्यायाम व दोन वेळा सकस संतुलित आहाराच्या मदतीने सुरुवातीच्या काही दिवसांतच मला खूप हलके वाटू लागले व उत्साह वाढून पहिल्या महिन्यात माझे आठ किलो वजन कमी झाले. दूसऱ्या महिन्यात सात, तिसऱ्या महिन्यात पाच व पुढील पंधरा दिवसांत तीन असे साडेतीन महिन्यांत एकूण तेवीस किलो वजन कमी झाले. पोटाचा घेर अगदीच कमी झाला (स्टेटस ला असलेल्या फोटोत बघू शकता) व स्वतःला खूप उत्साही, स्वस्थ व हलकं वाटू लागले. माझे सर्वच कपडे आता ढिले होऊ लागले. माझ्यातील झालेला हा बदल बघून माझे इतर मित्रही अचंबित झाले व त्यांनीही ही पद्धत अवलंबली आणि घरातल्या घरात राहून वजन घटवायला त्यांनी सुरुवात केली आहे.

हे फक्त वजन घटवण्यास उपयोगी नसून ज्यांचे वजन कमी आहे व त्यामुळे त्यांना त्रास किंवा चेष्टा, उपेक्षेला सामोरं जावं लागतं, त्यांना ही यातून फरक पडतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सकारात्मक भावना वाढीस लागते.

या सोप्या व्यायामांमुळे थायराईड, ॲसिडिटी, अपचन, मायग्रेन, महिलांमधील पी. सी ओ. डी. चा त्रास ही कमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याच स्त्रियांना स्थूलपणामुळे संतती होण्यास अडचण  येते. त्यांचे वजन कमी झाल्यामुळे हा अडसर निघून संतती झाल्याचीही उदाहरणे आहेत. 

बरेचसे आजार हे वाढलेल्या पोटामुळे होतात. अपचन, वात, गॅस, ॲसिडिटी, मायग्रेन, बद्धकोष्ठता, हातापायाला मुंग्या येणे, अंग दुखी, वाढत्या वजनामुळे कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी हे आजार ‘एकावर एक फ्री’ सारखे आपल्या जीवनात प्रवेशात. स्थूलपणामुळे हृदयावरही ताण येतो. रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. मांडी वाळून बसणे शक्य होत नाही. प्रवास ही नकोसा होतो. 

आपल्या नेहमीच्या दिनचर्येला बाधा न येता दिवसातला आपला एखादा तास घेणाऱ्या या व्यायामाने येणाऱ्या घामामुळे त्वचा निरोगी होते व त्वचेला तजेला येतो तसेच शरीरातील टाकाऊ, विषारी द्रव्ये घामाद्वारे मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने किडनी वरील ताण ही कमी होतो व एकप्रकारे अनायासेच डायलेसिस ची प्रक्रिया पार पडत असल्याने भविष्यात किडनीचे विकार होणे ही टळते.

आपले शरीर असंख्य कोषिका (सेल्स) नी बनलेले असल्याने या विविध व्यायामांमुळे मेटॅबोलिजम वाढल्याने हे सेल्स मजबूत होतात, शरीराचे स्नायूही मजबूत होतात, परिणामी शरीर सुदृढ व निरोगी बनते. 

आपल्यापैकी प्रत्येकाला आज ना उद्या या समस्या व सत्याला सामोरे जावे लागणार आहेच. वजन कमी करणे वाटते तितके सोपे नाहीच पण दृढ निश्चय, मनापासून प्रयत्न, या विषयावरील तज्ञांचे नियमित योग्य मार्गदर्शन व सातत्य ठेवल्याने हे वाटते तितके अवघड ही नाही हे मला उमजले व मी ते करुन दाखवले आणि अजूनही करीत आहे. 

व्यायाम शाळेत ही जाऊन व्यायाम करणे हे ॲलोपॅथी सारखे आहे. कदाचित तुम्ही वजन कमी करू शकता पण व्यायाम बंद केल्यावर साईड इफेक्ट सारखं पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढू लागते. 

योग करून शरीर स्वस्थ ठेवू शकता पण ते होमिओपॅथी सारखे आहे. फरक पडण्यास खूप कालावधी लागतो. त्यापेक्षा हजारो इच्छुक लोकांप्रमाणे मी अवलंबीत असलेल्या या पद्धतीमुळे लवकर व दीर्घकाळ फरक पडणार असेल तर ते चांगले नाही का? 

आपल्याला जे काही फुकट मिळते त्याचा फक्त आनंद असतो पण त्याची कदर मात्र रहात नाही. लाखमोलाचं हे शरीर ही आपणास फुकट मिळालं आहे. त्यांची काळजी घेण्याऐवजी वाटेल ते खाऊन, पिऊन त्याच्यावर अत्याचार करतो व मग त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात पैसे घालवतो. दरमहा असे गोळ्या औषधांवर किती खर्च होतात त्याचा हिशोब केला तर हळूहळू जाणारा हा आकडा मोठा होतो. 

तुमची जर खरंच मनापासून वजन कमी किंवा जास्त करायची व कोणत्याही स्वास्थ्यविपरित परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असे आपले शरीर स्वस्थ, सुदृढ व निरोगी असावे अशी तीव्र आंतरिक इच्छा असेल तर आणि तरच या विषयावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आपले वजन खात्रीने कमी होईल याची ‘ आधी केले, मग सांगितले ‘ या उक्तीप्रमाणे मी ग्वाही देतो.

आपणास स्वास्थ्यपुर्ण सुखी समाधानी आयुष्य लाभो यासाठी भरभरून शुभेच्छा. चला तर मग या सुंदर जीवनाला ‘फॅट टू फिट’ असे वळण देऊन अजून सुंदर बनवूया.

© श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares