मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सौ.राधिका भांडारकर– अभिनंदन आणि आलेख – मानसुमने…☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

‘सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ राधिका भांडारकर

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित ‘ भाऊबीज विशेष लेख स्पर्धा ’ या राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या “मानसुमने“ या लेखाला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

लेखाचा विषय होता… “लाडक्या बहिणीला भेट हवी : दानाची नाही मानाची“ 

या पुरस्काराबद्दल राधिकाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि यापुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

आजच्या अंकात वाचूया हा प्रथम पुरस्कारप्राप्त लेख.

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

? मनमंजुषेतून ?

☆ मानसुमने☆ सौ राधिका भांडारकर

सोनियाच्या ताटी । उजळल्या ज्योती ।

ओवाळीते भाऊराया । वेड्या बहिणीची वेडी ही माया ।।

या ओळी वातावरणातून कधीही लहरत आल्या की कान आणि मन तृप्त होतं. बहीण हा शब्द कधी एकट्याने येतच नसावा. अदृश्यपणे बहीण या शब्दाबरोबर भाऊ हा शब्द असतो आणि ज्या ज्या वेळी बहीणभाऊ असा जोडशब्द उच्चारला जातो तेव्हा नकळत त्या भोवती मायेची, प्रेमाची, भावबंधनाची झालर सहजपणे विणली जाते.

हिंदू संस्कृतीत बहीणभावाच्या या नात्याला अपरंपार महत्त्व आहे आणि हा ममतेचा रेशीमबंध सदैव जपला जावा म्हणूनच *रक्षाबंधन*, *भाऊबीज* यासारखे सण बहीणभावामधली प्रेमाची गाठ अतूट राहण्यासाठी साजरे केले जातात. परंपरा आणि संकेतात गुंतलेला हा भावनिक धागा अशा रीतीने जपला जातो.

अर्थात बहीणभावाचं सांस्कृतिक पातळीवरचं नातं असं असावं अशी सामाजिक अपेक्षा असते. प्रत्यक्षातले अनुभव कदाचित निराळे असू शकतात. मुळातच नाती टिकवणं, नाती जपणं, नात्यातला बंध पाळणं, नात्याला अधिक सुंदर करणं या गोष्टी आजच्या यंत्रयुगात मात्र काहीशा धूसर झालेल्या जाणवतात.

जगण्याच्या कल्पनाच बदलल्या आहेत का? की यांत्रिकतेत, कमालीच्या गतिमानतेत, स्पर्धेच्या युगात, स्वातंत्र्याच्या अफाट कल्पनेत, स्थळ काळानुसार कुठेतरी या संकेतांनाच नकळत पायदळी चिरडले जात आहे का?

एक हजारो मे मेरी बहना है

सारी उमर हमे संग रहना है।।

 हे फक्त गाण्यापुरतंच उरलं आहे का?

पण या साऱ्या सांस्कृतिक पारंपरिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी एक गमतीदार विचार मनात येतो तो सध्या राजकीय क्षेत्रात गाजत असलेल्या *लाडकी बहीण* या शब्द समूहामुळे. वास्तविक या लेखाला मला कुठलंही राजकारणी स्वरूप नक्कीच द्यायचं नाही अथवा राजकारणावर टीका करण्याचा माझा हेतूही नाही पण समाजात जगत असताना “जगणं आणि राजकारण” याची फारकत कशी करणार? शिवाय एका राजकीय पक्षाकडून लाडक्या बहिणीला मिळणारं हे अनुदान नक्की कशासाठी? हा प्रश्न दुर्लक्षित कसा काय करणार? “आवळा देऊन कोहळा” काढण्यासारखं नाही का वाटत हे? *घ्या अनुदान करा मतदान* अशी एक अंतस्थ घोषणा नाही का ऐकू येत? भेटीत दानाची भूमिका असेल पण या दानात बहिणीचा मान, सन्मान खरोखरच राखला आहे का आणि तसं असेलच तर मग पुढचा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न निर्माण होतो तो महिलांच्या सुरक्षिततेविषयी.

प्रत्येक मिनिटाला तीन ते पाच बलात्कार होत असलेल्या आपल्या देशात *लाडकी बहीण* या शब्दरचनेला कुठला अर्थ प्राप्त होतो? पंधराशे रुपयाची भेट तिच्या खात्यात जमा करा आणि तिच्या स्त्रीत्वाचे, स्वाभिमानाचे, अस्तित्वाचे धिंडवडे पहात रहा.

परवाच मी माझी मदतनीस कविता हिला सहज विचारलं, “ का गं ! तू *लाडकी बहीण* योजनेत तुझं नाव नोंदवलंस की नाही?” तेव्हा तिने ताठ मानेने डोळे रोखून माझ्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, ” ताई मला दान नको मला मान हवा. “

घरोघरी ती काम करते, चार पैसे कमावते. मुलाच्या शिक्षणाचे स्वप्न पाहते आणि दारुड्या नवऱ्याचा रोज मार खाते. रस्त्यातून चालत येताना तिला असंख्य विकारी नजरा झेलाव्या लागतात तेव्हा कुठे जातो हा लाडक्या बहिणीचा भाऊ आणि त्याच्या मनगटावर असंख्य भगिनींनी रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेले ते धागे?

ओवाळणीच्या ताटात दिलेल्या भाऊबीजेतून बहिणीला हवा असतो विश्वास. भेटीत केवळ काहीतरी दिल्याचा भाव नको. राखला जावा तिचा मान, जपली जावी तिची सक्षमता, तिचा जगण्याचा अधिकार, तिची आत्मनिर्भरता.

महिला सक्षमतेच्या विविध कायद्यांची अंमलबजावणी आणि कायद्याचे ज्ञानदान तिला मिळावे. वडिलोपार्जित मालमत्तेतला तिचा हक्क तिला सन्मानाने मिळावा. तिच्या स्त्रीधनाची बूज राखली जावी. एका ओवाळणीने तिला लाचार किंवा उपकृत करुन एक प्रकारच्या अदृश्य दास्यात बांधण्यापेक्षा तिच्यासाठी सन्मानाची दालनं खुली करून द्या.. जिथे नसतील हिंसा, मानहानी, निर्भत्सना, अत्याचार, तिच्या देहाची केलेली लक्तरे, तिच्या जन्माची झालेली हेळसांड. तिथे फक्त असावी मानाच्या सुमनांची शुद्ध मोकळी उधळण.

.. अपेक्षा ही आहे.. नुसत्या दानाची नव्हे.. तर सन्मानाची.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिरसाष्टांग प्रणिपात… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

शिरसाष्टांग प्रणिपात… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

प. पू. सद्गुरू श्रीमहाराज,

शिरसाष्टांग प्रणिपात.

मार्गशीर्ष कृ. ९, शके १९४६ …. आपली पुण्यतिथी. त्यानिमित्ताने मनात आलेले विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. सामान्य मनुष्य मरतो आणि संत मात्र आपले जीवीत कार्य पूर्ण करतात आणि आपली अवतार समाप्ती करतात. त्यांचे जीवन कृतार्थ असते तर सामान्य मनुष्याला मतितार्थ कळतोच असे नाही. अनेक संत आपली मृत्यू तिथी आधीच सांगतात आणि मग आपला देह ठेवतात. सामान्य मनुष्याचे मात्र या उलट असते…. !

प्रत्येक मनुष्याला कसल्या ना कसल्या आधाराची गरज असते. अनेक वेळा मनुष्य नश्वर गोष्टींचा आधार शोधतो. त्याला कधी तो मिळतो अथवा मिळत नाही, पण नश्वर आधार शाश्वत समाधान देऊ शकेल असे मानणे हीच मोठी चूक ठरते आणि सामान्य मनुष्य मात्र कायम असमाधानी रहातो असे आपल्या लक्षात येईल. संताचा आधार, संतांच्या ग्रंथाचा आधार आणि संतांनी दिलेल्या नामाचा आधार हाच खरा आधार. हे लक्षात येण्यासाठी मात्र पूर्वसुकृत असावे लागते, याबद्दल वाचकांचे एकमत होऊ शकेल.

श्रीमहाराज, आपण स्वतः नाम घेतले आणि सर्वांना नाम घेण्यास सांगितले. नुसते (?) नाम घेऊन काय होते ? अनेक शिष्य नामाने गुरू पदाला नेऊन, असे मानणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य जनांना, नामाने (नामस्मरणाने) काय होऊ शकते, याचे प्रत्यंतर आणून दिलेत.

जयांचा जनी जन्म नामांत झाला

जयाने सदा वास नामात केला

जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती ….

आपण नामाच्या प्रसारासाठी जन्म घेतला, आयुष्यभर अखंड नाम घेतले आणि सर्वांना नाम घेण्यास प्रवृत्त केले. सामान्य मनुष्याला नामाचा आधार दिला आणि आज आपले निर्वाण होऊन सुमारे १११ वर्षे झाली तरी नाम प्रसाराचे कार्य अव्याहत चालू आहे, ही आपल्या कार्याची महती म्हणता येईल. मनुष्य देहात असताना काम केले तर आपण समजू शकतो, पण देह सोडल्यावर देखील एखादे कार्य अव्याहत चालू रहाणे यात त्या कर्त्याची महानता दिसून येते. मी भाग्यवान आहे की मला आपण आपले शिष्यत्व दिलेत. आदरणीय भाऊसाहेब केतकर म्हणायचे की श्रीमहाराज भेटले आता काही मिळायचे बाकी राहिलें नाही. माझी सध्याची मनःस्थिती, वृत्ती अगदी तशीच आहे. फक्त ती कायम राहील असा आशीर्वाद आपण मला द्यावा.

आपलं एक वचन अतिशय प्रसिद्ध आहे. ” जेथें नाम, तेथें माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।” हे वचन माझं तोंडपाठ आहे, परंतु माझी तितकी साधना नसल्याने, मी देहबुद्धीच्या आधीन असल्याने मला या वचनाची अल्पशी अनुभूती देखील नाही. मला गोंदवल्यात यायला आवडते, आपल्या घरचे अन्न (भोजनप्रसाद ) खायला आवडते. आपल्या सहवासात राहायला आवडते. पण तो योग अनेक दिवसांत आला नाही. आज आपली आठवण अनावर झाली, म्हणून हे पत्र लिहीत आहे. हे पत्र प्रातिनिधिक आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात कमीअधिक प्रमाणात माझ्या सारखीच भावना असेल… !

रोज पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आमच्या फाटक्या प्रपंचाला ठिगळं लावण्यासाठी आमचा जास्तीतजास्त वेळ खर्च होत असतो, त्यामुळे नामस्मरण करणे आम्ही लांबणीवर टाकत असतो.

आपण म्हणता की बाळ, अनुसंधान ठेवत जा, पण खरं सांगू महाराज, नेमके तेच मला जमतं नाही. सुखाचा प्रसंग आला की मी किती आणि कसा मोठा झालो आहे असे वाटते आणि दुःखाचा प्रसंग आला की मला आपली आठवण येते. आपण मला अनुग्रह देऊन कृपांकित केले आहे, परंतु मला तसे कायम वाटत नाही. माझी देहबुद्धि मला फसवते आणि ती माझ्यावर स्वार होते. सर्व कळलं असं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच येत नाही. मी नामस्मरण या विषयावर खूप छान चर्चा करतो, चांगलं व्याख्यानही देतो, परंतु माझं नामस्मरण किती होतं, हे आपल्याला माहीत आहेच. जो सर्वज्ञानी आहे, त्यापासून काय लपुन राहणार… ?

मी या पत्रात काय लिहिणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याशी बोलून माझं मन हलकं होतं, म्हणून हा प्रयत्न….. ! आई पुढे चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली की आई जवळ घेते, मायेने कुरवाळते आणि आपलं बाळ ‘द्वाड’ आहे हे माहीत असूनही म्हणते, बाळ माझं गुणांचं!!! हे मायेचे बोल ऐकण्यासाठी माझे कान व्याकुळ झालेत हो महाराज!! आपण अखिल ब्रह्मांडाच्या माऊली आहात. आपल्या मुलाला जवळ घ्या. मी अनेक वेळा चुकतो, करू नको ते करतो, अनेकांची मने दुखावतो, आपल्याला भूषण होईल असे वागत माही. हे सर्व अगदीच खरं आहे. पण काय करू महाराज, मला सर्व कळतं पण काहीही वळत नाही…… आणि जेव्हां कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते….

0श्रीमहाराज, एक करा…. तुम्हीच काहीतरी करा, जेणेकरून मला यातून बाहेर पडता येईल…. प्रपंचाच्या मोहात पडून अधिकाधिक बुडणारा मी, मला फक्त आपला आधार आहे. ज्याला जगाने दूर लोटलं, त्याला आपण मात्र स्विकारले…. आता आपणच माझे मायबाप !! 

प. पू. श्रीसद्गुरुंच्या समोर कसं बोलावं, कोणता विधिनिषेध पाळावा याचं ज्ञान आणि भान मला नाही. आपण माझ्या माऊली आहात आणि आईशी कसेही बोललं तरी ती माऊली लेकराला समजून घेत असते, साऱ्या जगाने अंतर दिलं, तरी आई कधीच लेकराला अंतर देत नाही. आणि याच भावनेने हे पत्र लिहिण्याचे धाडस मी केलं आहे….! 

या पत्रामागील माझा भाव आपण शुद्ध करून समजून घ्यावा आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे ही प्रार्थना!!!

…. प्रत्येकाला आपल्या जीवनाचे विहीत कर्तव्य आकळावे आणि नामस्मरण करण्याची आणि पर्यायाने स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा असा आशीर्वाद आपण द्यावा.

जानकी जीवन स्मरण जय जय राम !!

आपला,

संदीप

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ““नीलवर्ण मृत्यू… कृष्णवर्ण देवदूत !! ” ☆ श्री संभाजी बबन गायके ” ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

नीलवर्ण मृत्यू… कृष्णवर्ण देवदूत ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

आपले भगवान श्रीकृष्ण नीलवर्ण, आपले प्रभू श्री रामचंद्र नीलवर्ण…. आपले भगवान श्री शिवशंकर नीलकंठ ! निळा रंग विशाल, अथांग अवकाशाचे प्रतिक. पण सामान्य मानवाच्या देहावर, त्यातल्या त्यात तान्ह्या बाळांच्या नाजूक कांतीवर नखं, ओठ इत्यादी ठिकाणच्या नाजूक त्वचेवर निळ्या रंगाची छटा… म्हणजे साक्षात मृत्यूची पदचिन्हे ! वैद्यकीय भाषेत या अवस्थेला ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ असे नाव आहे.

सुमारे ८० वर्षांपूर्वीची गोष्ट. अमेरिकेत एका वैद्यकीय महाविद्यालयात एक हृदयशस्त्रक्रिया सुरु होती. ती पहायला तेथील तज्ज्ञ डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक, डॉक्टर हेलन ताऊसीग हे दोन तज्ज्ञ शल्यविशारद. या दोघांनी या रुग्णाचे हृदय उघडले होते…. रुग्णाचे वय होते पंधरा महिने… मुलगी होती… तिचे नाव होते Eileen Saxon. पण या दोन्ही डॉक्टरांच्या मागे उभे राहून 

ही शस्त्रक्रिया नेमकी कशी करायची याचे मार्गदर्शन करत होती एक वैद्यकीय डॉक्टर नसलेली व्यक्ती… त्या वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून नेमणूक असलेला एक कृष्णवर्णीय माणूस !

शस्त्रक्रिया अयशस्वी झाली असती तर त्या दोन्ही डॉक्टरांचे संपूर्ण वैद्यकीय आयुष्य उध्वस्त झाले असते. शस्त्रक्रिया करताना तसा प्रसंग उद्भवला सुद्धा होता…. पण वैद्यकीय पदवी नसलेल्या त्या कृष्णवर्णीय माणसाने वेळीच मार्ग दाखवला आणि ते मूल पुन्हा श्वास घेऊ लागले… बाळाच्या शरीरावरील निळे डाग गेले… आणि बाळाची कांती गुलाबी झाली… !

जगातली अशा स्वरूपाची ती पहिली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली होती… जगभरात डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक, डॉक्टर हेलन ताऊसीग यांचे नाव झाले…. लाखो बालके त्या विशिष्ट विकारातून मुक्त झाली. काय होता तो विकार?…..

… नायट्रेट नावाचा पदार्थ रक्तात गेला की त्याचे नायट्राईट मध्ये रूपांतर होते. आणि यामुळे रक्ताची प्राणवायू वहन करण्याची क्षमता अत्यंत कमी होते… त्यामुळे हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते. यावर १९४४ पर्यंत काही उपाय सापडत नव्हता. विशेषत: अमेरिकेत या आजाराने खूप लोकांचा, विशेषत: बालकांचा बळी घेतला होता. नायट्रेट असलेले विहिरीचे पाणी पोटात जाणे, ते पाणी वापरून तयार केलेले द्रवपदार्थ, खाद्यपदार्थ पोटात जाणे अशी काही कारणे यामागे होती. शिवाय हा विकार अनुवांशिक सुद्धा आहेच.

सुतारकामाचे धडे आपल्या वडिलांच्या हाताखाली राबून गिरवणारा एक तरुण. त्याला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी त्याने सात वर्षे अधिकचे काम करून काही रक्कम बँकेत जमा करून ठेवली होती. पण त्यावेळी आलेल्या जागतिक मंदीमुळे बँक बुडाली आणि याचे स्वप्नसुद्धा. पण पठ्ठा धैर्यवान होता. पुन्हा पैसे जमा करण्याच्या उद्योगाला लागला. जादाची कमाई करावी म्हणून एका वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून त्याने चाकरी स्वीकारली.. तुटपुंज्या वेतनावर. रंगाने काळ्या असणा-या कर्मचा-यांना तेथे प्रवेश करण्यासाठी मागील दाराने यावे-जावे लागे… त्या इमारतीत प्रवेश करणारे ते एकमेव कृष्णवर्णीय असत… इतर काळ्या लोकांना तिथे प्रवेश नव्हता…. इतका वर्णद्वेष त्या काळी अमेरिकेतही होता.

डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक हे जॉन्स हाफ्कीन्स वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते. तर डॉक्टर हेलन ताऊसिग या लहान मुलांच्या डॉक्टर होत्या. या आजारावर उपाय शोधण्याचा आग्रह डॉक्टर हेलन यांनी धरला आणि डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक यांनी तसा प्रयत्नही सुरु केला. कुत्र्यांच्या हृदयात असा विकार निर्माण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून, रक्तवाहिन्यांची वेगळी जोडणी करून काही करता येते का, हे त्यांनी आजमावयाला सुरुवात केली. त्या सफाई कर्मचाऱ्याने त्या कामात मदत करणे स्वत:हून स्वीकारले. सुतार काम सफाईने करण्याची सवय असलेल्या या तरुणाने कित्येक कुत्र्यांची हृदये उघडून त्यात तो विकार निर्माण करण्याचा यत्न कित्येक दिवस सुरूच ठेवला. त्यात त्याचा इतका हातखंडा झाला की, इतर प्रशिक्षित सहाय्यकाना जे काम शिकायला सहा महिने लागत होते, ते काम हा माणूस चार दिवसांत शिकला… आणि एके दिवशी त्याने त्यात यशही मिळवले… त्याने रक्तवाहिन्या अशा काही जोडल्या होत्या की जणू त्या तशा जन्मत:च, नैसर्गिकरीत्या तशाच असाव्यात…. देवाने बनवलेल्या असतात तशा !

अक्षरश: डोळे बंद करून तो रक्तवाहिन्या ओळखू, जोडू, कापू शकायचा. हे पाहून डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक यांनी त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून बढती दिली… मात्र पगार स्वच्छता कर्मचाऱ्याएवढाच. फक्त एक झाले की… त्या वैद्यकीय महाविद्यालयात पुढील दाराने प्रवेश करणारा तो पहिला काळा माणूस ठरला !

तो विकार मुद्दामहून निर्माण केल्यानंतर तो विकार बराही करण्याचे तंत्र डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक आणि या काळ्या माणसाने विकसित केले. त्यासाठी लागणारी हत्यारे याच काळ्या माणसाने स्वत: तयार केली ! दरम्यानच्या काळात या काळ्या माणसाने अनेक वेळा अनेक प्रकारचे अपमान सहन केले. बायको, दोन मुली यांचा खर्च भागवण्यासाठी हा माणूस मोकळ्या वेळात सुतार कामही करू लागला. एवढेच नव्हे तर त्याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या लोकांनी दिलेल्या पार्टीत तो चक्क वेटरचे कामही करत होता.. पैशांसाठी. खरे तर आता तो वैद्यकीय प्रयोगशाळा सहाय्यक होता… पण त्याला तसा मान आणि वेतन देणे मात्र तेथील गोऱ्या कातडीच्या व्यवस्थेने नाकारले. यामुळे एकदा तर तो माणूस नोकरी सोडून निघालाही होता… पण जगभरातील लहानग्या लेकरांचे नशीब थोर… तो कामावर परतला. आणि मग तो पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेचा इतिहास घडला.

डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक यांच्या कामाची दखल साऱ्या वैद्यकीय विश्वाने घेतली.. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला… पण खुद्द डॉक्टर आल्फ्रेडसुद्धा या काळ्या माणसाच्या अतुलनीय योगदानाचा साधा उल्लेखही करण्यास धजावले नाहीत. आपण शोध लावलेल्या कृतीचे जग कौतुक करत असताना हा मात्र दूर उभा राहून हे सारे ऐकत होता ! साहजिकच त्याने गावी परत जाण्याचा निर्णय घेतला.. जाताना मात्र तो व्यवस्थेविरुद्ध बोलून गेला… पण अशक्त लोकांचे बोल सशक्त व्यवस्थेच्या कानांवर काहीही प्रभाव टाकत नाहीत !

पण त्याच्या पत्नीने त्याला त्या कामावर परत जाण्यास प्रोत्साहित केले… कारण त्याला त्याच्या आयुष्यात तेच करायचे होते… लेकरांचे जीव वाचवायचे होते… नव्या तरुण डॉक्टरांना प्रशिक्षित करायचे होते. तो प्रयोगशाळेत परतून आला… पुढे शेकडो प्रशिक्षणार्थी तरुण डॉक्टरांना शिकवले. डॉक्टर आल्फ्रेड दुस-या विद्यापीठात नोकरीस निघाले होते… त्यांनी यालाही सोबत चल म्हणून गळ घातली… पगार चांगला मिळेल असेही सांगितले.. पण हा गेला नाही ! सुमारे ४५ वर्षे शिकवत राहिला. मध्ये एकदा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो का ते पहायला गेला होता… पण अपुरे शिक्षण पाहून त्याला कुणी प्रवेश दिला नाही… अनुभव तर प्रचंड होता… एखाद्या निष्णात डॉक्टरएवढा. आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करणे त्याला अशक्य होते…. मग तो शिकवण्यात रमला ! एका निष्णात डॉक्टरला हे जग मुकले !

डॉक्टर अल्फ्रेड कालवश झाले. त्यांचे तैलचित्र त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या दर्शनी भागात लावले गेले…. हा माणूस आता वैद्यकीय प्रयोगशाळा प्रमुख म्हणून कार्यरत होता… पगारात फारसा फरक पडलेला नव्हता… पण त्याच्या प्रेरणेने जगात कित्येक बाळांचे जीव वाचू शकतील असे शिक्षण लोक घेत होते.

त्याच्या जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर मात्र व्यवस्थेला त्याची दखल घ्यावी लागली… त्याला “ मानद डॉक्टर “ ही उपाधी सन्मानपूर्वक देण्यात आली. त्याचे तैलचित्र डॉक्टर अल्फ्रेड यांच्याशेजारी लावण्यात आले. त्याने शोधण्यात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या शस्त्रक्रिया-पद्धतीच्या नावात त्याच्याही नावाचा समावेश करण्यात आला ! “ Blalock-Thomas-Taussig shunt ! “ होय, त्यांचे नाव होते विवियन Thomas…. डॉक्टर विवीयन Thomas ! पण दुर्दैवाने त्यांना कधीही प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाऊ शकली नाही…. ! कारण ते औपचारिकरित्या प्रशिक्षित डॉक्टर नव्हते !

या विषयावर एक अत्यंत सुंदर चित्रपट, एक माहितीपट बनवला गेला. त्यामुळे Thomas यांचे कार्य जगाला माहित झाले. त्यांचे आत्मचरित्रही गाजले. मात्र चित्रपट अधिक प्रभावशाली आहे. ‘ Something the Lord made ! ‘ हे या चित्रपटाचे नाव. सुमारे दोन तासांचा हा चित्रपट इंग्लिश भाषेत असून इंग्लिश सब-टायटल्स उपलब्ध असल्याने संवाद समजायला सोपे जाते. अभिनयाबाबत बोलायचे झाले तर शब्द नाहीत…. विवियन यांची भूमिका जगला आहे अभिनेता मॉस डेफ. डॉक्टर आल्फ्रेड उभे केले आहेत अभिनेते अलन रिकमन यांनी. चित्रपटातील एकही दृश्य अर्थहीन नाही !

…. निळ्या मरणाला गुलाबी श्वासांचे कोंदण देणारा हा कृष्णवर्णीय मनुष्य वर्णद्वेषाच्या गालावर एक चपराक लगावून गेला…. !

(अमेरिका, भारत आदी देशांत आजही हा विकार आढळतो. पण यावर आता उपाय आहेत. हा वैद्यकीय विषय मला समजला तसा मांडला आहे. तांत्रिक बाबी तपासून पहाव्यात. मात्र चित्रपट जरूर पहावा ज्यांना जमेल त्यांनी. एच. बी. ओ. वर आणि युट्यूब वर उपलब्ध आहे. पुस्तकेही आहेतच. पहिले छायाचित्र अभिनेत्यांचे आहे. दुस-या छायाचित्रात पांढरा कोट घातलेले आहेत ते मानद डॉक्टर विवियन थॉमस!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निर्जीवातील जिवंतपणा… – लेखिका: श्रीमती मानसी चापेकर ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ निर्जीवातील जिवंतपणा… – लेखिका: श्रीमती मानसी चापेकर ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

“अगं, किती जुनी  झाली आहे ही मीठ ठेवायची बरणी! टाकून दे की आता. छान, नवीन, सुबक अशा कितीतरी काचेच्या  बरण्या आहेत आपल्याकडे. वापर की त्यातली एखादी.”

त्या दिवशी सकाळी-सकाळी ऑफिसला जायच्या आधी मी सगळी कामं पटापट आवरत असताना भाजीत मीठ टाकताना साठवणीची मिठाची बरणी काढली आणि नवरोबांचे नेमके लक्ष त्या मिठाच्या बरणीकडे गेले . खरंतर ती तुटली किंवा रंगही पांढऱ्याचा काळा-बिळा झालाच नव्हता मुळी.पण काय आहे ना, त्याची सवय झाली होती. उगाच काय टाकून द्यायच्या ना वस्तू? नवीन आणलं की जुनं टाकून द्यायचं, हा काय न्याय झाला का?

ह्या पुरुषांना कुठे कळते आमच्या स्त्रियांचे असे वस्तूंमध्ये गुंतणे!

“अरे खराब कुठे झाली आहे, फक्त जुनीच तर झाली आहे, आणि मला हिचा आकार खूप आवडतो.असा कुठे हल्ली मिळतो?”

“अगं, पण आईने जवळजवळ पंचवीस- तीस वर्षं वापरली आणि आता तू वीस एक.बास झालं की. मी आत्ताच काढतो बघ, काचेच्या कपाटातील ती तुझ्या रुखवतातील चिनी मातीची बरणी,” असे म्हणून तो ती काढायला गेलासुद्धा.

ही एक अजून चांगली सवय आम्हा स्त्रियांची(सगळ्याच नाही बरं का !).  मिळालेल्या वस्तू जपून ठेवणं आणि वापरात असेलल्या वस्तूंची काळजी घेणं. म्हणजे हे माणसांसारखेच असते नाही का? म्हणजे आपण माणसं जपतो, त्यांच्या मनाची काळजी घेतो, कधीकधी अगदी भावनाशील होतो, तसंच असतं नाही का वस्तूंबाबतसुद्धा?

सहवासाने प्रेम वाढते म्हणतात, तर वस्तूंवर, जरी त्या सजीव नसल्या तरी जीव जडतोच हो !

आता लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही रुखवतातील कितीतरी काचेच्या वस्तू कपाटात दिसतील. काढल्याच गेल्या नाहीत. कितीतरी काचेचे सेट असतील, जे फक्त पाहुणे आले की वापरायचे ह्या सदरात मोडतात.

त्या दिवशी नवरा म्हणालाच, “वस्तू आपल्यासाठी असतात, आपण वस्तूंसाठी नाही.ते सगळे काचेचे सेट वापरले आपण, तर काय बिघडणार आहे? पाहुणे येणार महिन्यातून एकदा. आणि काय होईल जास्तीतजास्त? तुटतीलच ना? आणू की परत नवीन, फक्त ‘पाहुणे आल्यावर वापरायचे’ हे काय लॉजिक असतं तुम्हा बायकांचे कळतंच नाही.”

आता त्याला काय सांगणार की रोज ह्या वस्तू वापरायच्या म्हणजे आलं त्यांना जीवापाड जपणं. कामवाल्या मावशी रोजची भांडीच आपटून आपटून घासतात.त्यात ही काचेची भांडी रोज एक फोडतील. म्हणजे काळजीपोटी ही भांडी मी घासणं आलं.म्हणजे वेळ हवा त्याला.त्यात आपल्याच हातून फुटलं की जीव हळहळणार ते वेगळंच.

वस्तू काय, कपडे काय, अगदी घरातील कोपरासुद्धा आपण जपतो मनाच्या कोपऱ्यासारखा. जुने झालेले कितीतरी ड्रेस होत नाहीत,तरीही आठवण म्हणून कपाटात अगदी खालच्या कप्प्यात ठेवले आहेत मी जपून. प्रत्येक ड्रेसची आठवण वेगळी. हा तुला पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा घातलेला, हा इंटरव्हूला जाताना,  हा नवीन जॉबला पहिल्या दिवशी घातलेला, अशा अनेक आठवणींचा वस्तूंचा खजिना आपण कुठे कुठे जपून ठेवलेला असतो नाही का बायकांनी?

अगदी परवा ओटा पुसायचं फडकंसुद्धा विरल्यावर टाकून देताना वाईट वाटलं, की किती छान टिपला जायचा ओटा ह्याने. आता नवीन फडकं घेणार आपण , आणि ते सवयीचे होईपर्यंत जुन्याची आठवण येणारच . काय आणि कुठे कुठे जीव आणि मन गुंतवून ठेवतो आपण !

त्यात अजून एक चांगलं असतं, वस्तू आपल्याला दगा देत नाहीत माणसांसारखा. काहीवेळा आपण ना वेड्यासारखा जीव लावतो माणसांना आणि अचानक काहीही कारण नसताना ती माणसं आपल्या आयुष्यातून निघून जातात. पण वस्तूंचं तसं मुळीच नसतं. त्या आपल्या असतात , आपल्यापाशीच राहतात , जोवर आपण त्यांना जपत असतो.   

वस्तूची होणारी सवय आणि त्यात गुंतलेल्या भावना ह्यावरून माहेरची एक आठवण सांगते. मी अगदी नववी दहावीत असल्यापासून पोळ्या करायला शिकले. म्हणजे आईने जबरदस्ती वगैरे नाही केली, पण मलाच आवड होती. शेवटच्या दोन पोळ्या लाटता लाटता आईच्या हाताच्या प्रॉब्लेममुळे मी सगळ्याच पोळ्या लाटायला लागले. मी केलेल्या पातळ पोळ्या सगळ्यांनाच आवडायच्या. त्यामुळे कौतुकही व्हायचे.आई सगळी कामे करायची, पण पोळ्या मात्र मीच करायचे , तर ते लाटणं माझ्या इतकं सवयीचं झालं की मी गमतीने म्हणायचे आईला, “आई, मी लग्न झाल्यावर हे लाटणं सोबत घेऊन जाणार.” आई हसूनच म्हणायची, “तुझ्या दोन्ही मोठ्या बहिणी पण हेच म्हणायच्या, पण होते, बाळा, सवय सासरच्या गोष्टींचीसुद्धा”.

खरंच, आपण लग्न झाल्यावर आपला नवीन संसार आहे, नवीन सुरुवात आहे म्हणून अनेक जुन्या गोष्टी केवळ जुन्या झाल्या म्हणून नाही टाकून देत, त्यात आपल्या सासूचे प्रेम, त्यांच्या आठवणी आणि नंतर आपण त्या वस्तूंच्या करून घेतलेल्या सवयीमुळे आपल्याला त्याच गोष्टी वापरायला मनापासून आवडते.

मला वाटतं, हे असं जीव गुंतणं जिवंतपणाचं लक्षण असतं, आणि नुसतं श्वास चालू आहेत म्हणजे आपण जिवंत, हे समीकरण जोडण्यापेक्षा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्याशी निगडित असणं आणि त्याला आपण आपलेपणाची जोड देणं म्हणजे जगणं माझ्या मते तरी.

माणसं काय नी वस्तू काय एकदा जीव गुंतला की दुरावा सहन होतच नाही…..

लेखिका: श्रीमती मानसी चापेकर

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “डोंगराला आग लागली पळा रे पळा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “डोंगराला आग लागली पळा रे पळा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“रे बाबल्या खयं असा तू?… रे मेल्या घरात असा कि खयं बाहेरच खपलसं!… आणि मंदा वहिनी घरात असात का रे. ?.. “

” व्हयं ता आम्ही दोघेवं बी या टायमाक घरात असा नाय तर काय शांता दुर्गेच्या राउळात झांज वाजवूक बसतत!… काय तरी इचारतस!… ता जाऊ दे.. तू फोन कित्येक केलसं ता सांग आधी?… एकाच वाडीतले शेजारी असां तरी तुका घराक येऊन बोलू झाला असताना… घराक आग लागल्याची वार्ता अर्जंट देयाला फोन केलसं काय मरे!… वश्या !काय झाला ता आधी इस्कटून सांग?… शिरा पडली तुझ्या तोंडावर ती!… “

” रे बाबल्या आग माझ्या घराक नाय तर तुझ्या घराक लवकरच लागतली समजला!… मी तुका आधीच सावध करान राहिलो… तू येळेलाच शाना झालसं तर तुझो घरदार आबाद रव्हता… मंगे तू आनी तुझा नशीब!… “

“वश्या! आज जरा जादाच घेतलसं काय?… अजून बी तू कोड्यात बोलून रव्हलसं!… रे मी मंत्रालयातला पट्टेवालो असा तुझ्या सारखो पिऊन नाही.. तेवा माझ्या खोबडीला समजेल असा बोल ना रे… काय तुका बोनस मिळालो!, का महागाईभत्याचा डिफरन्स गावलो!.. का तुका चायपानीची लाटरी लागली!… काय असेल ते सांगून टाक ना लवकर…”

“रे बाबल्या!… काय सांगू तुका? अरे तू म्हणतसं ता सगळा माका कालच हाती मिळाला… अरे ता हिन्दी पिक्चर मधे नाय का बोलत भगवान जब भी देता है तो छप्पर फाडके देता है… साला माझा नशिब बघ तसाच फळफळला… घरी बाईल एव्हढी खूश झाली म्हनुन सांगू… तिने माका तसाच बाजारात घेवोन गेला… आनि बाबल्या तुका सांगतय तिने डझनावारी साड्या, ड्रेसेस, बेडशीटा, चादरी.. काय नि काय इतकी खरेदी केलीन कि सगळो भरलेलो खिसो सुफडा साफ झाल्यावरच घराकडे परत इली… एक तांबडो पैसौ देखील त्यातला तिने शिल्लक तर ठेवलो नाय.. ना माका एक चड्डी बनियन घेतल्यान… वर माका नाकाचा मुरका मारून बोलला लगीन झाल्या पासून आज माझी होसमौज काय ता पुरी झाली… जल्माचा दळिंदर ता गेला… आता ह्या घेतलेल्या सगळ्या साड्या, ड्रेसेस, समंधा आधी त्या मंदेक दाऊन आल्याशिवाय माझो जीव शांत व्हायचो नाय… नाकझाडी मेली.. दर महिन्याला साडी ड्रेस आणल्यावर मला दाखवायला घेऊन येऊन मला जळवायची… आमच्या ह्यांका पट्टेवाले असले तरी रोजचो खुर्द्याने खिसो भरान घरी येततं… भावजी पिऊन असतले तरी त्यांका एक दमडीची चायपानी कसा मिळना नाय… असा महणून माका चिडवून जाता काय… आता तिका इतकी गाडाभर खरेदी घरी जाऊन दावतयं नि तिची अशी जिरवतयं कि त्येचा नावं ते… पुन्हा म्हणून या विमलाच्या नादी लागू नको असा तिका धडा शिकवूनच येतेयं… बघाच तुम्ही… असा माका टेचात बोलून सगळी खरेदी कमरेला धरून तुझ्या घरा कडे निघाली असा… माका इचारशील तर तू आनि मंदा वहिनी जसे असाल तसे घराबाहेर पडान खरा खराच शांता दुर्गाच्या राउळात जा… तुम्ही घरी नाय बघून विमला घरी रागे रागे परत येतली.. नि मगे तिचो राग शांत झाल्यावर मीच तुमका घरी बोलवेन… तसा तुका जमना नसेल तर माका माफ कर… नि घे मंगे घराक आग लावून… एक इमानदार दोस्ताचो सल्लो असा… बघ तुका किती पटता ता…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वा द ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

☆ 🤣😲वा द !😢😂 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“सुईच्या अग्रावर राहील इतकीसुद्धा जमीन मिळणार नाही तुम्हांला !”

बघा, म्हणजे जमिनीच्या मालकीवरून आजच्या कलियुगीच वाद होतात असं नाही, तर महाभारत काळापासून हा रोग तमाम मानवजातीला जडला आहे असं म्हटलं तर यात वाद व्हायचं कारणच नाही. पण सुईच्या अग्रापेक्षासुद्धा या पृथ्वीतलावर आणखी कमी क्षेत्रफळाची जागा असते, हे तेव्हाच्या लोकांना माहित नव्हतं. त्यामुळे तेंव्हाच विज्ञान आजच्या इतकं खाचितच प्रगत नव्हतं हेच यातून सिद्ध होतं. मंडळी थांबा थांबा, हे काही माझं मत नाही बरं, नाहीतर तुम्ही माझ्याशी या विषयावर उगाचच वाद घालायला लागाल, काय सांगावं ! तर ते एखाद्या जन्माने मुळच्या “पेठेत” राहणाऱ्या पण सध्या सिलिकॉन व्हॅलीमधे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेल्या भारतीयाच मत असू शकतं, हे मात्र माझं मत.

महाभारतकाळी इतक्या कौरवांचे आणि पांडवांचे जन्म झाले त्यावरून चांगल्या “सुईणी” तेंव्हा होत्या का नव्हत्या हा वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही मंडळी, पण महाभारतकाळात “सुई” अस्तित्वात होती का नव्हती, असा वादाचा मुद्दा कोणी उपस्थित केला तर ? त्यामुळे तिच्या अग्रावर राहील इतकी जमीन हे परिमाण, महाभारताचे नाटकीकरण करतांना त्या पात्राच्या तोंडी घालण्याची त्याच्या लेखकांने त्याकाळी घेतलेली ती रायटर्स लिबर्टी म्हणायची का ? आणि ती तशी घेतली असेल तर त्याला तो अधिकार कोणी, कधी दिला ? लेखी दिला का तोंडी दिला ? आणि जे असे परिमाण अस्तित्वातच नाही त्याला जन्माला घालून लेखकांने काय साधले ? दुसरं असं की त्यामुळे रायटर्स लिबर्टीचा जन्म महाभारत कालीन मानायचा का ? असे नानाविध वादाचे मुद्दे या अनुषंगाने उभे राहतात. त्याची उत्तरे कोण देणार आणि तशी उत्तरे देण्याइतका त्याचा किंवा तिचा या बाबतीत अधिकार आहे का ? आणि तो तसा असेल, तर तो त्याला किंवा तिला कोणी बहाल केला ? असे अनेक वादाचे पोट-मुद्दे सुद्धा सुज्ञ वाचकांच्या पोटात खड्डा पाडू शकतात मंडळी !

तर थोडक्यात काय, तर कुठल्याही गोष्टीतून कोणाला वादच उकरून काढायचा असेल, तर तो त्याला कसाही उकरून काढता येतो, इतकंच मला वाचकांच्या मनावर ठसवायचं होतं ! आता ते तसं ठसवण्यात मी यशस्वी झालोय का नाही, हा पुन्हा वादाचा मुद्दा ! पण बहुतेक सु्बुद्ध वाचकांना माझं म्हणणं पटावं आणि ज्यांना ते पटणार नाही त्यांनी नवीन मुद्दे मांडून नवीन वाद, मी सोडून, कुणाशीही घालायला माझी काहीच हरकत नाही, या बद्दल मात्र नक्की वादच नाही !

वाद ! ह्याच खतपाणी मुलांच्या मनांत बहुतेक त्यांच्या वयात यायच्या वयात, म्हणजे साधारण आठवी नववीमधे शाळेतूनच घातलं जात. मी असं म्हणतोय म्हणून तुम्ही या विषयावर माझ्याशी वाद घालायच्या आधीच, मी असं का म्हणतोय ते सांगतो. आठवा ती शाळेत होणारी “वाद विवाद स्पर्धा. ” ज्यात भाग घेण्यासाठी (भांडखोर ?) शिक्षक आपापल्या वर्गातून मुलं तयार करायचे. नंतर नंतर तर “आंतर शालेय वाद विवाद स्पर्धेत” एखाद्या शाळेला ढाल मिळाल्यावर, (तेंव्हा चषकाची आयडिया रूढ व्हायची होती) तर काय विचारूच नका. ज्या मुलांनी शाळेला “ढाल” मिळवून दिली त्यांचा सत्कार शाळेतर्फे केला जायचा ! वाचकांपैकी माझ्या पिढीतील काही लोकांनी अशी “ढाल” आपल्या शाळेला मिळवून देण्यात, स्वतःच्या “जिभेची तलवार” तेंव्हा चालवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही मंडळी. मी मुळातच मवाळ स्वभावाचा असल्यामुळे अशा स्पर्धेपासून कायम चार हात दूरच रहायचो. त्यामुळे मला काही मुलं तेंव्हा, माझ्या अपरोक्ष मुखदुर्बळ म्हणायचे, असं मला नंतर समजलं. पण अशा वाद विवादस्पर्धा फक्त ऐकून त्यातून आपल्या ज्ञानात काही भर पडत्ये का बघावं ह्या एकाच विचाराने मी अशा स्पर्धेत भाग घेण्यापासून दूर राहिलो ते आज पर्यंत ! असो !

पुढे कॉलेजमधेसुद्धा “आंतर महाविद्यालयीन वाद विवाद” स्पर्धेतून, आता चारबुक जास्त शिकलेल्या आणि मिसरूड फुटलेल्या तरुणांना, तेंव्हा नाकातोंडातून निकोटीनचा धूर काढायचं प्रमाण फारस वाढलं नव्हतं म्हणून असेल, पण आपल्या डोक्यातली गरम विचारांची वाफ, अशा स्पर्धेतून आपल्या तोंडातून काढायची संधी मिळत असे. आणि त्याचा पुरेपूर उपयोग काही तरुण त्याकाळी करत असतं. त्यातील काही जणांचा यामागे आपल्या आवडत्या कॉलेज क्वीनवर इंप्रेशन मारायचा छुपा अजेंडा असायचा. अशापैकी काही तरुण आपल्या छुप्या अजेंड्यात नंतर यशस्वी होऊन आपल्या क्वीनबरोबर यथावकाश लग्न करून मोकळे सुद्धा झाले ! पण आपल्या क्वीन बरोबरच्या लग्नानंतर आता झालेल्या बायकोबरोबर अगदी कुठल्याही क्षुल्लक विषयावरचा झडलेला वाद सुद्धा, त्यांना आजतागायत कधीच जिंकता आलेला नाही, हे मला नंतर कळलं ! आता त्या दोघांच्या वाद विवादात जास्त खोलात न शिरता पुढे सरकतो, नाहीतर असा एखादा स्वतःच्या बायकोबरोबर घरच्या वादात कायम हरलेला नवरा, त्या रागापोटी माझ्याशी उगाचच नवीन वाद उकरून काढायचा !

“वादे वादे जायते तत्वबोध:” हे आपल्या देशात अर्वाचिन काळापासून चालत आलेले तत्व होते. पण आजकाल कुठल्याही वादाचे स्वरूप निकोप न राहिल्यामुळे त्याचे वितंड वादात रूपांतर व्हायला लागले आहे. जगात असा कुठलाही वाद नाही की ज्याचे उत्तर सुसंवादातून मिळणार नाही. पण मी म्हणतो तेच खरे असा आग्रह धरून कोणी वाद विवाद करत असेल तर त्यातून कुठलाही वाद हा विकोपालाच जाणार आणि त्याच पर्यवसान कधी कधी दोघांच्याही अंताला सुद्धा कारणीभूत ठरू शकत. याची काही उदाहरणं आपण इतिहासात वाचली असतीलच. पण त्यातून धडा घेण्याऐवजी लोकं आपला हेका न सोडता वाद विकोपाला जाईपर्यंत ताणतात हे ही तितकंच खरं.

शेवटी इतकंच म्हणावंस वाटत की, कुठल्याही वादावर पडदा पाडायची “दवा” “वाद” हा शब्द आपण उलटा वाचलात तर त्या उलट्या शब्दातच आहे, हे आपल्या लक्षात येईल ! पण त्यासाठी वाद विवाद करणाऱ्या लोकांनी आपापलं डोकं शांत ठेवून, समोपचाराने कुठलाही वाद, प्रसंगी दोघांनी दोन दोन पावलं मागे जाऊन, तो वाद सोडवायचा प्रयत्न मनापासून करणं गरजेचे आहे, हे लक्षात ठेवायला हवे !

आपल्या सर्वांचा माझ्या सकट दुसऱ्याशी, कायम सुसंवादच घडो हीच सदिच्छा !

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “No” म्हणजे… भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “No” म्हणजे… भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(आणि म्हणून मी लोकांच्या अंगात असलेले अंगभूत कौशल्य, समाजातल्या रूढी – परंपरा, पारंपारिक सण आणि श्रद्धा यांचा वापर चांगल्या कामासाठी करून व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !) इथून पुढे —– 

 

दिवाळी आली, पणत्या विकायला द्या…

दसरा आला, झेंडूची फुल विकायला द्या…

गुढीपाडवा आला, साखरेच्या गाठी विकायला द्या…

संक्रांत आली, तिळगुळ विकायला द्या…

रंगपंचमी आली, रंग किंवा पिचकारी विकायला द्या…

आता नवीन वर्ष येईल, कॅलेंडर आणि छोट्या डायऱ्या विकायला द्या…

– – – असे काहीतरी मार्ग शोधतो आहे; अर्थात तुम्हा सर्वांच्या साथीने…. !!! 

असो…

तर असं काम दिलेल्या या मुलाचा मला एका अनोळखी नंबर वरून कॉल आला… तो म्हणाला, ‘सर तुम्ही उद्या कुठे आहात ?’ 

‘मी उद्या अमुक अमुक ठिकाणी आहे… का रे… ?’

‘सर माझी जी पहिली कमाई झाली; त्यातून मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे… ‘ 

मला थोडा राग आला…

“ दोन पैसे मिळाले, त्यात लगेच गिफ्ट वाटायला लागलास…? मूर्खा, तुला काय सांगितलं होतं ? दिवसभरात जे पैसे मिळतील त्यातले 40 टक्के खर्च करायचे; पण 60 टक्के वाचवायचे… काय सांगितलं होतं तुला ? 40:60 गणित लगेच विसरलास का… ? एक तर आपले खायचे वांदे… त्यातून, जरा पैसे मिळाले की लगेच कुणालातरी गिफ्ट द्यायचं… ! मला तुझं कोणतंही गिफ्ट नको आहे… पैसे वाचवायची अक्कल येत नाही, तोपर्यंत मला भेटू नकोस “… मी तूसड्यागत बोललो…

“ ऐका ना सर…” तो बोलतच होता 

“ तू जरा बावळट आहेस का रे… ? ठेव फोन आणि काम कर…. मला उद्या भेटायची काही गरज नाही… !” 

मी रागाने बोलून गेलो…

एकदा व्यवसाय टाकून दिला की, माझे याचक लोक पैसे कसेही वापर करतात, उडवून टाकतात… बचत करा म्हणून सांगूनही बचत करत नाहीत आणि या गोष्टीचा मला राग आहे, आणि म्हणून बापाच्या भूमिकेतून मी त्याला रागावलो… ! 

मी फोन ठेवणार एवढ्यात तो म्हणाला, “ उगीच कोणालातरी नाही गिफ्ट देत सर, मला वडील नाहीत… वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा ते मला म्हणायचे; तू जेव्हा कमावशील तेव्हा मला काहीतरी छोटसं गिफ्ट दे….. आज ते नाहीत, म्हणून वडील समजून तुम्हालाच देतो आहे सर, प्लीज घ्या ना…. ! “ 

आता या वाक्यावर कोणीही विरघळून जाईल…

पण तरीही कोरडेपणाने मी त्याला म्हणालो, “ ठीक आहे, ये उद्या…” कारण कष्टाने मिळालेले पैसे फालतू गिफ्टवर खर्च करणे मला मान्य नव्हते… ! 

तो दुसऱ्या दिवशी दबकत दबकत आला… ! खिशातून एक पुरचुंडी काढून मला म्हणाला, “ सर हेच माझं गिफ्ट आहे… “ 

मी खोलून पाहिलं…. ती शेंगदाण्याची पुडी होती… आत खारे शेंगदाणे होते… मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं… “ काय आहे हे ? “ 

“सर माझ्या वडिलांना भाजलेले, खारे शेंगदाणे खूप आवडायचे… मी असा वाया गेलेला… बाबांच्या कोणत्याही अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही… बाबा म्हणायचे, ‘ तुझ्याकडून फार काही अपेक्षाच नाहीत रे नालायका…. स्वतःच्या कमाईतून चार शेंगदाणे जरी मला तू खाऊ घातलेस, तरी मी शांततेत मरेन… !

एके दिवशी बाबा गेले… ! बाबांच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही सर.. मी मागे नालायक उरलो सर…

जातांना ते चार शेंगदाणे माझ्यावर उधार ठेवून गेले… !.. स्वतःच्या कमाईतून, आज तेच शेंगदाणे घेऊन आलो आहे… सर तुम्ही खा ना… “ तो काकुळतीने बोलला…

काय बोलू मी यावर ? मला सुचेना…. ! पुडी उघडून मी हे शेंगदाणे तोंडात टाकले…

तो गळ्यात पडून हमसून हमसून रडला…

आज “पिंडाला कावळा” शिवला होता… !!! जिवंत असतानाही आज मी त्याचा मेलेला बाप झालो… !!! 

 

सांगण्यासारखं आणखी खूप आहे….

पण लांबलेला लेख आणखी लांबेल, या भीतीने मी बऱ्याच गोष्टी लिहीत नाही…

माहेरी आलेल्या लेकीला; आई बापाला काय सांगू आणि काय नको असं होतं… तसंच माझं सुद्धा होतं… म्हणून लेख लांबतो…. आईबाप आहातच… आता लेक समजून पदरात घ्या.. ! 

 

80 वर्षाची एक आजी…. तिचा मुलगा आणि सून काम मिळत नाही म्हणून घरात आहेत…. दिवसभरात आजीला जी भिक मिळते त्यात घर चालतं…. मी या सून आणि मुलाला भेटलो…

सुनेला शिवणकाम येतं.. सुनेला म्हटलं, “ तुला जर शिलाई मशीन दिलं तर काम करशील का ? आणि काम केलं तर म्हातारीला घरात आणशील का ? “

… आजीला भीक मागू द्यायची नाही, या अटीवर सुनेला शिलाई मशीन दिलं आहे…

आज सून काम करत आहे आणि आजी घरात आहे…. ! येत्या काही दिवसात तिच्या मुलाला सुद्धा काम देणार आहोत…. !

 

अजुनही खूप काही सांगायचं आहे… मी तरी किती लिहू आणि तुम्ही तरी किती वाचणार ? 

थोडक्यात सांगायचं, तर नवीन वर्ष आता येईल, याचक मंडळींना आता कॅलेंडर विकायला देणार आहे…

 

आज्या आणि मावश्या यांची खराटा पलटण नावाची टीम तयार करून त्यांच्याकडून स्वच्छता करून घेऊन त्यांना गरम कपडे, स्वेटर, सत्कारात मला मिळालेल्या शाली, ब्लॅंकेट दिल्या आहेत… स्वच्छता झाल्यानंतर पंधरा दिवस पुरेल इतका किराणा दिला आहे…

 

अन्नपूर्णा या प्रकल्पाच्या माध्यमातून, भीक मागणाऱ्या कुटुंबांकडूनच जेवण तयार करून घेऊन ते आम्ही विकत घेत आहोत आणि रस्त्यावर किंवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरीब रुग्णांना जेवणाचे डबे देत आहोत.

 

रस्त्यावर असहायपणे पडलेल्या लोकांवर रस्त्यावरच उपचार करत आहोत… काहींना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत आहोत… जगण्या आणि जगवण्याचा खेळ मांडत आहोत…

 

जे दुसऱ्याच्या आधाराशिवाय उभे राहू शकत नाहीत अशांना काठ्या कुबड्या Walker देऊन त्यांचा आधार बनण्याचा प्रयत्न करत आहोत…

 

अनेक लोक अनवाणी आहेत, त्यांना या महिन्यापासून चप्पल देणार आहोत…

 

सध्याच्या थंडीच्या काळात उघड्या नागड्या पोरांच्या अंगावर चादर चढवत आहोत… आणि म्हणून दर्गाहवर चादर चढवायला आमच्याकडे चादर उरतच नाही…

 

आम्ही अशिक्षित आहोत, परंतु सुशिक्षित लोकांना या महिन्यात मतदान करा म्हणून आम्ही सांगितलं…

 

मंदिरातून बाहेर येऊन, रस्त्यावर देवी आमची परीक्षा घेते… आपण केलेल्या मदतीमधून आम्ही रस्त्यावरच्या माऊलींना साड्या अर्पण करत आहोत…

…… खुद्द देवीच रस्त्यावर दर्शन देऊन आशीर्वाद देते आणि म्हणून मग कोणत्याही मंदिरात जायची गरज उरत नाही… !!! 

 

या महिन्यात अजून सुद्धा खूप काही झालं आहे…. सांगेन पुढे कधीतरी…

– समाप्त – 

डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

 बोळातला लपंडाव–

‘बाळ’ प्रकरण झालं आता आल ‘बोळ’ प्रकरण ‘ डोंगरे बालामृत ‘ घेऊन त्या काळातली पुण्यातली बाळं बाssळसेदार झाली होती. त्या बाळांची कहाणी झाली, आता आले पुणेरी बोळ, ते बोळ बाळसेदार नव्हते. तर अगदीच रोडावलेले, अरुंद होते. हे बोळांच ‘जाळ’ सर्व दूर पसरलेल होत. बुधवार चौकात माझी प्रिय मैत्रीण उषा भिडे राहयची. तिच्या घरावरून त्या चौकातून निवडुंग्या विठोबा वरून, सरळ जाऊन डावीकडे फडके हौदाकडे, रस्ता जातो ना, तिथे आतल्या बोळात भारत हायस्कूलला लागून एकांत एक असे पांच बोळ होते. ते बोळ थेट एकनाथ मंगल कार्यालयापाशी पोहोचायचे. रविवार पेठेत माझी बाल मैत्रीण कुंदा राहत होती, तिथून निघाल्यावर, खरं म्हणजे जोगेश्वरी कडे जायला एकनाथ कार्यालयावरून, तपकीर गल्लीतून वसंत टॉकीज पाशी पोहोचलेला, अहो! अगदी नाका समोरून जाणारा, चांगला सरळ रस्ता सोडून आम्ही एकदा वाकडी वाट करायची ठरवून, शिरलो कीं हो पहिल्या बोळात. एकच माणूस मावेल इतका तो बोळ अरुंद होता. कम्मालीची सामसूम होती तिथे. ब्रम्हांडच आठवल होत आम्हाला. बरं! कुणी पाहयल म्हणण्यापेक्षा कुणी धरलं तर– या विचारांनी, गर्भगळीत होऊन थरथरणारी आमची पावलं जागच्या जागीच थबकली, कसंबसं अवसान आणून पळायची ॲक्शन घेऊन उसन चंद्रबळ आणल तर, ढोपरचं ( त्या काळचा पेटंट शब्द) खरचटली. धड मागे जाता येईना की पुढे सरकता येईना. मोठ्यांदी ओरडाव तर ऐकायला भिंतीशिवाय तिथ होतच कोण! ‘ राम राम ‘ म्हणत “तु चाल पुढं मी आहे मागं” असं बडबडत पाचावर धारण बसलेल्या आम्ही, त्या पंचबोळातून पंचप्राण मुठीत घेऊन एकदाचे, ‘भारत माता की जय ‘ म्हणत भारत हायस्कूल पाशी पोहोचलो. कसंबस घरी आलो. प्रकरण सांगावं तर चोरीचा मामला, तंगडं मोडून हातात दील असत घरच्यांनी आमच्या. तरीपण खरचटलेली, ढोपरं बोलायचे ते बोललीच. पण बरं का! मंडळी सगळेच बोळ काही, असे घाबरवणारे नव्हते. पण त्यांची नाव मात्र मजेशीर होती हं! हल्लीच्या शगुन चौकातून (म्हणजे पूर्वीचा उंबऱ्या गणपती चौक) पुढे गेल की यायचा, मुंजाबाचा बोळ, त्याच्या समोरचा म्हणजे, तिथे भट कुटुंब राहयचे म्हणून तो भटांचा बोळ, शनिवारात सरदार नातूंच्या वाड्यांचा हा पसारा म्हणून तो नातूंचा, तर ओंकारेश्वर रस्त्यावर लागायचा तो तांबे बोळ, तुळशीबागेच्या दरवाजा समोरचा तो म्हणजे भाऊ महाराज बोळ, आमच्या जोगेश्वरी जवळचा पॅरेमाउंट टॉकीजच्या पुढचा म्हणजे तसल्या वस्तीतला बोळ. “तिथे गेलात तर तंगड मोडून हातात देईन” असा घरच्यांकडून सणसणीत दम भरलेला होता, शालूकरांचा वेश्या वस्तीतला बोळ. हं! तो मात्र ‘असं का बरं’? हा मनांत येणारा प्रश्न विचारण्याची प्राज्ञा नसलेला रहस्यमयीबोळ म्हणून लक्षात राहयला होता. जssरासं मोठ झाल्यावर कुणीतरी दिवे पाजळले, अगं शालूची दुकानं तिथे खूप होती म्हणे, शालू खरेदीला म्हणून त्या ‘तसल्या बायका’ तिथे आल्या असतील आणि शालू बघून तिथेच राहयल्या असतील. ” बायका शालू साठी वेड्या होतात हे ऐकलं होतं म्हणून, आम्ही पण नंदीबैला सारखी “हो रे असंच असेल रे” असं म्हणून मान डोलावली होती. एकंदरीत त्या बायका तिथे कशा?आणि कधी? आल्या असतील? हे तो शालूकर बोळच सांगू शकेल हो ना? जबडे वाड्यांचा जबडे बोळ पण होता. कंटाळलात नां बोळ प्रकरण वाचून! पण खरं सांगू या बोळीतून सुळकांडी मारायला आम्हाला फार आवडायच. आत्ता इथं तर लगेच तिथं, असा शॉर्टकट मारायला मज्जा यायची. “चल ग लवकर पोहोचू आपण” असं म्हणून सगळे पुण्याचे गल्ली बोळ आम्ही पालथे घातले होते. आता मात्र सिमेंटच्या जंगलांनी जबडा पसरून ह्या छोट्या बोळांना गिळंकृत केलय. सुसाट वाहणाऱ्या वाहनांची, माणसांची गर्दी, प्रदूषण मुक्त नव्हे प्रदूषण युक्त लहान मोठ्या रोड वरून जाताना तो रोड आता अंगावर आल्या सारखा वाटतोय, आणि जीव गुदमरतोय. पटकन एखाद्या बोळात आता शिरावस वाटत. पण पुढे रस्ता बंद ही पाटी वाचून आमचा ‘स्टॅच्यू’ होतो. पावसात दुकानांच्या गर्दीमुळे आडोसाच काय उन्हाचा कवडसा पण अंगावर घेता येत नाही. ते अंगण गेलं, ओसरी गेली, वाडे गेले, तो शांततेचा काळ गेला. रस्ता वाहतोच आहे वाहतोच आहे. पुला खालून बरंचस पाणी गेल आहे. जुनं कसबे पुणं आता नवं झाल, कुठेतरी जुन्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. त्या बघितल्या की मन मागे मागे भूतकाळात शिरत, आणि त्या आठवणीत रमत. आणि मग पुण्यनगरीला म्हणावसं वाटतं ‘कालाय तस्मै नमः’

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नायक… –  लेखक : श्री राजेश्वर पारखे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ नायक… –  लेखक : श्री राजेश्वर पारखे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

भल्या पहाटे माझ्या मुलीला, डॉ. प्राप्तीला व माझ्या आईला शिर्डीला सहा वाजताच्या भुसावळ एस. टी. बसने जळगावला जाण्यासाठी सोडवून परत माघारी श्रीरामपूरला निघालो.

पहाटेची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एकदम मस्त आल्हाददायक वातावरण होते. आदल्या तीन दिवस आधीच जवळ जवळ एक हजार किलोमीटरच्या आसपास एस. टी. प्रवास झालेला होता. प्रवासात नेहमी मला कोणी न कोणी असामान्य व्यक्तिमत्त्व नक्कीच भेटते… परंतु पूर्ण प्रवासात असा कोणीच भेटलेला नव्हता.

आपली २००६ सालची मारुती व्हॅन घेऊन राहताच्या चौफुलीवर गाडीचा वेग कमी केला आणि तिथेच एका १९ ते २० वर्षाच्या तरुणाने मला थांबण्यासाठी हात केला. त्याला पाहून आपसूक माझा पाय ब्रेक वर अलगद गेला.

रस्ता पूर्णपणे मोकळा होता तिथेच हा मुलगा उभा होता. उंचापुरा, सडपातळ शरीरयष्टी, निमगोरा, उभट चेहरा असलेला, हलकीशी कोवळी दाढी चेहऱ्यावर असलेला, हॅवरसॅक पाठीमागे लटकावलेली, कानात अगदी साध्या पद्धतीच्या हेड फोन चे बोळे अडकवलेले, चेहरा मात्र प्रचंड आकर्षक असलेल्या या तरुणाला बघून त्याच्या जवळच मी गाडी थांबवली.

त्याने एक स्मित हास्य दिले. माहीत नाही तो किती वेळेपासून इथं असा एकटाच उभा राहिला असेल, ही जाणीव ठेवूनच थांबलो आणि त्याला पुढील सीट वर बसायला सांगितले. विनम्रपणे तो ‘थँक्यू’ म्हणायला विसरला नाही…

श्रीरामपूरच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. सकाळच्या मस्त वातावरणात त्या गार हवेचा आनंद घेत सहज मी त्याच्याकडे बघितले. तसा तो हळुवार हसला. मी त्याला विचारले “कुठे जायचे आहे?”

तो म्हणाला “बाभळेश्वर. “

मी म्हटलं, “तिथेच की अजून कुठे, “

तो म्हणाला “मला ममदापूरला जायचे आहे. “

मी म्हटलं, “अरे वा! रस्त्यातच आहे. सोडतो मी तुला. ” पुढे अजून विचारले, “तिथं कुठं राहतो?”

तो म्हणाला “माझे वडील येतील मला घ्यायला. “

मी म्हटलं “कुठून… ” उत्तर आले “वाकडी तुन”

मी त्याला म्हटलं “मग आपण अस्तगाव मधून जाऊ. तिथे वाकडी चौफुलीलाच तुला सोडतो. ” त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

गाडीने मस्त वेग घेतला होता, मी मध्येच विचारले, “आता कुठून आलास?”

तो म्हणाला “लातूर हून… ” असे म्हणताच “लातूर हून का बरं?”

तो म्हणाला, “माझा सत्कार होता लातूरला. मोटेगावकर सरांनी सत्कार केला. “

माझ्या कपाळावर विस्मयकारी आठ्या आल्या आणि पुन्हा उत्सुकता ताणून राहिली म्हणून विचारले, “कसला सत्कार?”

तो म्हणाला “ते नीट परीक्षेत मला ५९२ मार्क्स पडले म्हणून!”

मला तर आश्चर्याचा धक्काच बसला… भले भले कितीतरी मुलं कष्ट, पैसा खर्च करून या ‘नीट’ च्या अति अवघड परीक्षेत यशस्वी होत नाही अन् या बहाद्दराने तर कमालच केली होती. मी अक्षरशः वेग कमी करून गाडी साईडला थांबवली आणि पुन्हा त्याला विचारले, “किती मार्क्स?”

तो उत्तरला “५९२ मार्क्स. “

मी आश्चर्याचा सुखद धक्का पोहचल्यागतच त्याच्याशी मनोभावे हस्तांदोलन केले व त्याचे अभिनंदन केलें. मनात म्हटलं ‘अरे! हा तर टॉपच्या गव्हर्मेंट कॉलेजला डॉक्टर डिग्री घेणारा भावी विद्यार्थी आहे… माझ्या व्हॅन मध्ये पहिल्यांदाच ‘नीट’ मध्ये इतके मार्क्स पडलेला भावी डॉक्टर विद्यार्थी बसलेला होता.

आता मी त्याची विचारपूस करायला सुरुवात केली. त्याने त्याचे नाव विनायक विठ्ठलराव एलम असे सांगितले. वडील विहीर खोदकामाच्या ट्रॅक्टर वर ब्लास्टींग चे अतिशय जोखमीचे काम करतात असे तो म्हणाला. त्याची मोठी बहीण, तिलाही दहावीला ९७. ७०% मार्क्स मिळाल्याचे त्याने सांगितले, तीने ही Msc (maths) केले आहे आणि दोन नंबर ची बहीण इंजिनिअरिंग करून MPSC ची पहिली परीक्षा पास झाल्याचे सांगितले.

तो सांगत होता आणि मी फक्त आणि फक्त ऐकतच होतो… एका मागून एक शैक्षणिक धक्के मला बसत होते… मी विचारले “तुझ्या वडिलांचे शिक्षण ते किती ?”

तो म्हणाला “पाचवी. आई दुसरी झालेली. हातावरचे मिळेल ते काम करून या आई वडिलांनी पोटाला चिमटा देऊन आम्हाला शिकवले” असे तो भावुक होऊन सांगू लागला… हे सांगताना त्याचे डोळे पाणावलेले मला जाणवले.

मी म्हटले “तुमच्या वडिलांचीही आता माझी भेट होईल. खूप समाधान व आनंद वाटेल मला !

तो गालात हसला, म्हणाला, “माझ्या वडिलांनी दिवसा ट्रॅक्टर वर व रात्री मिळेल ते काम करून आम्हां तिघाही भावंडाना शिकविले. त्यांच्या कष्टाचे चीज झाले. ” तेव्हढ्यात वाकडी गावाची चौफुली आली. मी गाडी थांबवली. त्याने वडिलांना फोन करून तशी कल्पना दिली होतीच.

मी व भावी डॉक्टर खाली उतरलो. तेव्हढ्यात जुनाट होंडा गाडीवर त्याचे वडील विठ्ठलराव आले. उंचेपुरे, रापलेला चेहरा, अंगावर कामावरचे अक्षरशः मळके कपडे, वरची गुंडी उघडी पण अतिशय लोभस व कष्टाळू व्यक्तिमत्त्व मी जवळून पहात होतो.

मी अदबीने हस्तांदोलनासाठी हाथ पुढे केला… त्यांनीही लाजत आपला हाथ पुढे केला. एका प्रचंड कष्टकऱ्याचा कडक व यशस्वी हाथ मी पहिल्यांदाच अनुभवत होतो… त्यांचे मनःपुर्वक खूप खूप अभिनंदन केले.

मी म्हणालो, “विठ्ठलराव, मानलं राव तुम्हांला. पोरांनी तुम्हां आई बापाचं नाव कमावलं. “

त्यांचं उत्तर आलं, “आपण काढलेले वाईट दिस लेकरांना येऊ नये बस एव्हढंच मनासनी ठेवलं… बाकी भगवंताची क्रिपा.. ” हे वाक्य म्हणतांना डोक्यापासून ते पाया पर्यंत नागमोडी वेव्हज घेत ते ओशाळून अगदी अदबीने सांगत होते… “मी तुम्हाला पण ओळखतो. मी अन् सचिन एलम लई वर्षांपूर्वी एकदा ट्रॅक्टर चा पंप तुमच्याकडे घेऊन आलो होतो… “

बराच वेळ विचार करीत असतानाचे उत्तर मला मिळाले. यांची स्मरणशक्ती दांडगी आहे आणि तीच या मुलात आल्यामुळे त्याची हुशारी उदयास आली…

मी म्हणालो, “आता जग तुम्हांला ओळखील… “

मनाला खूप समाधान वाटले, “एक फोटो होऊन जाऊ द्या डॉक्टर” असे त्या मुलाला म्हणताच तो लाजला. आपल्या वडिलांना इशारा करून वरची गुंडी लावायला त्याने आवर्जून सांगितली.

या वयात परिपक्वतेचा अनुभव घेणारा हा ‘विनायक’ आता आमच्या पंचक्रोशीतच नव्हे तर जवळपासच्या सगळ्या तालुक्यामधील शिक्षणातला ‘ नायक झाला होता*…

मोटारसायकल लिलया वळवत विठ्ठलराव यांनी विनायकला पाठीमागे बसवून मला टाटा करीत आपल्या घराकडे निघाले. काळ्या मातीत राब राब राबून एक ‘नायक’ या बापाने या समाजाला दिला होता, कारण त्याची पै न पै कष्टाची होती आणि सृष्टी निर्मात्याला ती मान्य होती… ते दिसेनासे होइपर्यंत मी फक्त एकटक त्यांच्या कडे बघतच होतो…

अनुभवातील शब्द….

लेखक : राजेश्वर पारखे, श्रीरामपूर

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ☆ “बोलताना थोडं सांभाळून बोला…” – लेखिका: श्रीमती संध्या घोलप ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “बोलताना थोडं सांभाळून बोला…” – लेखिका: श्रीमती संध्या घोलप ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

१) “हॅलो, अगं निशू, काय मेलीस की काय? मी एवढी आजारी होते तर साधा फोनही नाही केलास? “

“हॅलो काकू, मी जाई बोलतेय. निशा ताईंची सून. आई थोड्या आजारी होत्या. पण अचानक गेल्या हो. तीन आठवडे झाले. “

“काय?”

“हो, मला म्हणाल्या की नलूचा फोन येईल आणि ती विचारेल नेहमीप्रमाणे ‘मेलीस का?’ तर सांग तिला की खरंच मेली!”

 

२) अजयला promotion मिळाल्याचं समजलं आणि ऑफिस मध्ये सगळे पार्टी मागायला लागले.

“Done. येत्या रविवारी सगळे घरी या जेवायला. “

“अरे अजय, जरा वहिनींना विचार ना आधी. एवढ्या सगळ्यांना एकदम जेवायला बोलावतो आहेस!”

“त्यात काय विचारायचं? लग्नाची बायको आहे माझी! आमच्याकडे पद्धत नाहीये बायकांना विचारायची. ‘नाही ‘ म्हणायची हिंमत नाही तिची. “

“Very good, Mr Ajay. बरं झालं. मला तुमचा खरा चेहरा आज कळला. मी तुमचं promotion cancel करतोय. तुम्ही घरी जसं वागता, तसंच ऑफिस मधल्या महिलांशी वागलात, तर चालणारच नाही आम्हाला. “

 

३) ” मूर्ख, बावळट, बेअक्कल!” तात्या ओरडले.

” बाबा, तुम्हाला आमची खरी नावं आठवतात तरी का हो? आम्ही लहान असल्यापासून तुम्ही मला, ताईला आणि अगदी आईलाही हेच बोलायचात. कधी प्रेमाने काही हाक मारल्याचं आठवतंय? आई तर बिचारी एका शब्दाने तुम्हाला उलट बोलली नाही. ताई लग्न करून गेली आणि सुटली. माझी पन्नाशी उलटली तरी मी तेच ऐकतोय. आणि आता तुम्ही माझ्या बायको मुलांनाही असच बोलताय? ” सुजय शांत स्वरात बोलला.

तात्या विचारात पडले.

खरंच, बोलताना जपून बोलणं आवश्यक आहे!

लेखिका: श्रीमती संध्या घोलप

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares