मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्त्री वैज्ञानिक- डॉक्टर कमलाबाई सोहोनी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ स्त्री वैज्ञानिक- डॉक्टर कमलाबाई सोहोनी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

इसवी सन १९३३. बंगलुरू (बंगलोर ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही शास्त्रीय संशोधनाला वाहून घेतलेली नावाजलेली संस्था. द्रष्टे उद्योगपती श्री यश यांनी १९११ साली स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये फक्त निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे.

इन्स्टिट्यूटच्या खूप मोठ्या आवारामध्ये घनदाट झाडीने वेढलेली दगडी इमारत शोभून दिसत होती. तिथल्या प्रशस्त ऑफिसमध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी व्ही रामन हे  संस्थेचे डायरेक्टर राखाडी रंगाचा सूट टाय आणि डोक्याला फेटा बांधून रुबाबदारपणे बसले होते. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज झळकत होते. नारायणराव भागवत  आपली लेक कमला हिला घेऊन सर रामन यांना भेटायला आले होते.  स्वतः नारायणराव व त्यांचे बंधू माधवराव हे दोघेही इथेच संशोधन करून एम. एससी झाले होते. संस्थेच्या स्थापनेपासून त्या दिवसापर्यंत एकही विद्यार्थ्यांनी तिथे आली नव्हती.

सर सी. व्ही. रामन यांनी स्पष्टपणे त्या दोघांना सांगितले की, ‘शास्त्रीय संशोधन हे स्त्रियांचे क्षेत्र नाही. म्हणून कमलाला प्रवेश नाकारण्यात आला आहे.’

लहानसर चणीची, नाजूक, गोरी, व्यवस्थित नऊवारी साडी  नेसलेली, केसांची घट्ट वेणी घातलेली कमला धीटपणे ,शांत पण ठाम  स्वरात म्हणाली,

‘सर, मी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये बी. एससी फर्स्ट क्लास फर्स्ट आले आहे. इथल्या प्रवेशाचा निकष पूर्ण केला आहे. मला पुढील शिक्षणाची संधी नाकारून तुम्ही माझ्यावर आणि माझ्यानंतर इथे शिकू इच्छिणाऱ्या इतर मुलींवर अन्याय करीत आहात. मी मुंबईला परत जाणार नाही. इथेच राहणार. तुमच्या दारापुढे सत्याग्रह करीन.’

सर रामन यांनी या मुलीतले वेगळेपण ओळखले. कमलाला इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्षासाठी प्रोबेशनरी स्टुडन्ट म्हणून प्रवेश मिळाला. साधीसुधी दिसणारी ही मराठी मुलगी, श्रीनिवासय्या या तिच्या गुरूंनी घेतलेल्या अनेक कठोर परीक्षांमध्ये  उत्तम पद्धतीने उत्तीर्ण झाली. दिवसाकाठी १८ तास बौद्धिक व शारीरिक काम त्यांना करावे लागे. संध्याकाळचे दोन तास  कमलाबाईंना त्यांचे आवडते टेनिस खेळण्यासाठी मिळत.  पार्टनर म्हणून  त्या तिथल्या मदतनीसाबरोबरच खेळत असत .

नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांचे प्रबंध वाचून त्या टिपणे काढीत.  शंका निरसनासाठी त्या परदेशी  शास्त्रज्ञांना पत्र लिहून प्रश्न विचारत. एखाद्या मित्राला समजवावे अशा पद्धतीने या शास्त्रज्ञांनी त्यांचे शंकानिरसन केले.  कमलाच्या अभ्यासातली तळमळ त्यांना जाणवली होती. शंभराहून अधिक सायन्स रिसर्च पेपर्स कमलाबाई यांच्या नावावर आहेत.

कमलाबाईंचे कर्तृत्व पाहून सर रामन यांनी कमलाबाईंजवळ मोकळेपणाने कबूल केले की,’आता मी माझी चूक सुधारणार आहे. यापुढे इन्स्टिट्यूटचे दरवाजे लायक विद्यार्थीनींसाठी नेहमी खुले राहतील.’ शिवाय ते स्वतः कमलाबाईंबरोबर टेनिसचे दोन- चार सेट्स खेळू लागले.

पुढे केंब्रिजमध्ये अध्ययन करून कमलाबाईंनी पीएच. डी मिळविली. तिथेच राहून काम करण्याची संधी  नाकारून त्या भारतात परतल्या.

बंगलोरला असताना त्यांनी, ज्या बालकांना मातेचे स्तन्य मिळत नाही त्यांच्यासाठी गाढवीणीच्या दुधाचा विशिष्ट घटक विशिष्ट प्रमाणात मिळवून पोषणमूल्य असलेल्या  दुधाचा शोध लावला . कडधान्य व त्यातील प्रथिने यावर संशोधन केले. कुन्नूर येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन’ मध्ये त्यांनी ब समूहातील जीवनसत्वावर काम केले. नीरा या नैसर्गिक रुचकर पेयातील तसेच ताडगूळातील पोषक घटक शोधला. १९६७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संशोधनाचे राष्ट्रपती पदक मिळाले .महाराष्ट्र सरकारच्या आरे मिल्क डेअरी प्रकल्पासाठी त्यांनी एकही पैसा मानधन न घेता संपूर्ण मार्गदर्शन केले. दुधाची प्रत व गुरांचे आरोग्य सांभाळण्याचे मार्गदर्शन केले.

कमलाबाईंनी मुंबईला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये जीव रसायनशास्त्र विभाग नव्याने उघडला तिथे १९४९ ते १९६९ अशी वीस वर्षे संशोधन व अध्यापन केले. एमएससी पीएच.डीच्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कमलाबाई व दुर्गाबाई या सख्या बहिणी. लहानपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या दोघींच्यातला जिव्हाळा मैत्रिणीसारखा होता. आणि बुद्धी तेजस्वी होती.

दिल्ली येथील ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या सुवर्ण महोत्सवात त्यांचा सत्कार करून  मानपत्र व पारितोषिक देण्यात आले. सत्काराला उत्तर देताना,  ‘शास्त्रीय संशोधनाचा देशासाठी पूर्ण उपयोग करा. ते लोकांच्या व्यवहारात आणा’ असे त्यांनी तळमळीने सांगितले. नंतर तिथल्या चहापानापूर्वीच कमलाबाई अकस्मात कोसळल्या आणि तिथेच वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू पावल्या . कमला नावाच्या ज्ञानदेवीला सरस्वतीच्या दरबारात भाग्याचे मरण आले.

भारतात कमलाबाईंमुळे शास्त्रीय संशोधन क्षेत्राचे दरवाजे स्त्रियांसाठी उघडले गेले. जगभर अनेक  स्त्रिया शास्त्रीय संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे काम  करीत आहेत. परंतु या क्षेत्रात महिलांना कमी महत्त्व मिळते. त्यांनी सिद्ध केलेले स्थानसुद्धा त्यांना नाकारले जाते ही वस्तुस्थिती आहे.

१९३३ साली आपल्या बुद्धिमान लेकीच्या, शास्त्रीय संशोधन करण्याच्या इच्छाशक्तीला सक्रिय पाठिंबा देणारे, विश्वासाने तिला एकटीला  इन्स्टिट्यूटच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या हवाली करून रातोरात मुंबईला परतणारे नारायणराव भागवत, पिता म्हणून नक्कीच आदरास पात्र आहेत.

चित्र साभार विकिपीडिया 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाशाशी जडले नाते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ आकाशाशी जडले नाते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

शब्दाची अंगभूत वैशिष्ट्येच त्या शब्दाला अर्थपूर्ण बनवतात. घन हा अगदी छोटा, अल्पाक्षरी शब्द याचं अतिशय समर्पक उदाहरण म्हणता येईल.

या शब्दाच्या एका रुढ अशा आणि अनेक प्रतिभासंपन्न कवींनी रसिकमनांत अधिकच दृढ केलेल्या एका अर्थाने  तर या शब्दाचे थेट आकाशाशीच अतूट नाते निर्माण निर्माण केलेले आहे आणि याच शब्दाच्या दुसऱ्या अर्थाने हे नाते अधिकच घट्ट झालेले आहे. घन या शब्दाचे हे दोन्ही अर्थ परस्परवेगळे असूनही परस्परपूरकही ठरलेले आहेत हेच या शब्दाचं अंगभूत असं वेगळं वैशिष्ट्य आहे.

          घन म्हणजे मेघ आणि घन म्हणजे घट्ट.म्हणजेच अप्रवाही.या दुसऱ्या अर्थाचं अप्रवाहीपण हे पहिल्या अर्थाच्या मेघाचं,ढगाचंही अंगभूत वैशिष्ट्य असावं हा निव्वळ योगायोग असेल तर तोही किती अर्थपूर्ण आहे याचे नवल वाटते!

           मेघ हा या शब्दाचा रसिकमनांत रुजलेला काव्यमय अर्थ थेट माणसाच्या जगण्याशी,सुखदु:खाशी जोडलेला आहे हे खरेच.तथापी ‘घट्ट’ या दुसऱ्या अर्थाची व्याप्ती आणि घनताही घन या शब्दाचे मोल अधिकच वृध्दिंगत करते असे मला वाटते.गंभीर शब्दातील गांभीर्य अधिक गडद करायला ‘घनगंभीर’ या शब्दाला ‘घन’च सहाय्यभूत ठरतो.घनघोर हा शब्द  युध्दाचे विशेषण म्हणून येतो आणि युध्दाची भयावहता अधिकच वाढवतो, तर जंगलाची व्याप्ती आणि नेमकं चित्र उभं करायला घनदाट शब्दाला पर्यायच नसतो. झांजा, टाळ,चिपळ्या, टिपऱ्या…. यासारख्या अनेक वाद्यांना सामावून घेणारा ‘घनवाद्य’ हा शब्दही फारसा प्रचारात नसला तरी आवर्जून दखल घ्यावी असाच.घन या शब्दाच्या सहाय्याने आकाराला आलेल्या अशा इतरही अनेक अर्थपूर्ण शब्दांनीच शब्दाशब्दांमधील परस्परसंबंध अधिकच दृढ केलेले आहेत एवढे खरे!

           घन या शब्दांचे वर उल्लेख केलेले मेघ आणि घट्ट हे दोन्ही अर्थ या शब्दाला एक वेगळंच रुप बहाल करतात.घन हा एकच शब्द ‘मेघ’ या अर्थाने नाम तर दुसऱ्या अर्थाने विशेषणाचे भरजरी वस्र परिधान केलेला असा बहुगुणी शब्द बनतो!

          घन हा शब्द नाम आणि विशेषण म्हणूनच नाही तर प्रत्यय म्हणूनही वापरला जातो.प्रत्यय म्हणून येताना तर तो स्वतःचं अनोखं वैशिष्ट्यही अधोरेखित करतो.प्रत्ययरुपात एखाद्या शब्दाच्या आधी जागा पटकावून घननीळ,घनदाट,घनघोर,अशा विविध विशेषणांना जन्म देणारा हा, प्रत्यय रुपात एखाद्या शब्दानंतर येत जेव्हा त्या शब्दाशी एकरुप होतो, तेव्हा आकाराला आलेली ‘आशयघन’,’दयाघन’ यासारखी विशेषणे त्या शब्दांमधील मूळ नामांचे (आशय,दया इ.)अर्थ अधिकच सघन करतात.

          घन हा असा विविध वैशिष्ट्यांनी अर्थपूर्ण ठरणारा शब्द म्हणूनच मराठी भाषेच्या विस्तृत,व्यापक आकाशाशी दृढ नाते जडलेला एक चमचमता ताराच आहे असे मला वाटते.

©️ अरविंद लिमये,सांगली

(९८२३७३८२८८)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी आई… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझी आई☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आई !  तुझ्यावर काहीतरी लिहावं असे भाचीने सांगितल्यावर तुझ्याविषयी काय काय लिहू असा प्रश्न मनाला पडला ! कळायला लागल्यापासून तू डोळ्यासमोर येतेस ती अशीच कर्तृत्ववान, सतत कामात असणारी आणि स्वाभिमानाने जगणारी, कष्ट करणारी आई ! संसारासाठी सतत दादांच्या पगारात आपला तिखट मिठाचा आणि भाजीपाल्याचा खर्च निघावा म्हणून धडपड करणारी आई ! 

तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल सांगण्यापूर्वी तिचे लग्न कसे ठरले हे सांगणे मला महत्त्वाचे वाटते. कारण पेंडसे कुटुंब कराचीला राहत होते तर आईचं माहेर बेळगावला घाणेकरांच्याकडचे ! इतक्या लांबच्या ठिकाणी राहणारी ही दोन्ही कुटुंबे एकत्र कशी आली हा प्रश्न मला पडत असे. नंतर कळले की आमचे आजोबा शिकायला असताना घाणेकरांच्या घरी राहत होते. नंतर नोकरी निमित्ताने ते कराचीला गेले. व त्यांचा संसार तिथे सुरू झाला.. वडिलांच्या वयाच्या 22व्या वर्षी आजोबा काही कारणानिमित्ताने बेळगावला आले होते, त्यावेळी माझ्या आईचे पण लग्नाचे बघतच होते. त्यामुळे मोठ्यांच्यात बोलणी झाली आणि त्यांचे लग्न ठरवले गेले. आईने दादांना तर पाहिलेच नव्हते. पण त्याकाळी मोठ्यांनी लग्न ठरवले की मुलगा -मुलगी यांच्या पसंतीचा प्रश्न गौण ठरवला जाई. १९४५ साली लग्न झाल्यानंतर माझी आई बेळगावहून कराचीला आली.  त्याकाळी बेळगाव ते कराची या प्रवासाला एकूण पाच दिवस लागत ! माहेर सोडून आई एवढ्या लांब प्रथमच जात होती आणि तेही इतक्या दूरदेशी परक्या राज्यात ! त्या काळात आईने कसे निभावले असेल असे आता वाटते ! अचानकपणे लग्न ठरवण्याचा परिणाम तिच्या शिक्षणावर झाला. केवळ एका विषयात मार्क कमी मिळाल्यामुळे आई मॅट्रिकला फेल झाली. आजोबांना शिक्षणाचा प्रचंड ध्यास.. त्यांनी आईला पुन्हा बेळगावला पाठवले आणि मॅट्रिकचे वर्ष चांगल्या तऱ्हेने पूर्ण करून आई कराचीला परत आली ! पुढे फाळणीनंतर भारतात येऊन त्यांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला.

तिला शिवणकामाची आवड होती. त्यामुळे वडिलांनी तिला शिवणकामाचा कोर्स  करायला प्रोत्साहन दिले. त्यानंतर तिने शिवण शिवायला सुरुवात केली.  शिवणकामाचा वर्ग सुरू केला. विशेष करून ती फ्रॉक, स्कर्ट- ब्लाऊज, परकर यासारख्या लेडीज शिवणकामात पारंगत झाली. रत्नागिरीत ती रमली होती. पण मग ती. दादांची बदली प्रमोशन वर मराठवाड्यातील नांदेडजवळील खेड्यात झाली. ती. दादांच्या तब्येतीमुळे त्यांना एकटे राहणे अवघड होते. त्यांना खोकला, दम्याचा त्रास होता, तरीही ते सतत काम करत असत. त्या दरम्यान आम्ही तिन्ही मुले कॉलेज शिक्षण करत होतो. तेव्हा आईने मन घट्ट करून आम्हाला सांगलीला शिकायला ठेवले. पैशाच्या दृष्टीनेही सर्व अवघडच होते, पण मुलांचे शिक्षण करणे हे आई दादांचे ध्येय होते. 

नांदेडजवळ बेटमोगरा या लहान ठिकाणी वडिलांची सरकारी शाळेवर मुख्याध्यापक म्हणून बदली झाली होती. तेथील वातावरण वेगळेच होते. पण तिथे गेल्यावर आईने तेथील परिस्थितीशी जुळवून घेतले .पाणी लांबून आणावे लागत असे.त्यामुळे पाणी आणण्यासाठी पैसे देऊन माणूस ठेवावा लागत असे. मोजक्या पाण्यामध्ये सर्व कामे करावी लागत असत. आईने तिथे राहून तेथील बायकांशी ओळखी करून त्यांच्याकडून काही शिकून घेतले, तसेच त्यांनाही नवीन गोष्टी शिकवल्या. तेव्हा रेडिओ हाच विरंगुळा होता. रेडिओवरील कार्यक्रम ऐकणे, त्यावर प्रतिक्रिया पाठवणे,  वाचन करणे, शिवणकाम करणे आणि दादांच्या वेळा सांभाळणे यात तिचा दिवस जाई.

मी आणि माझा भाऊ तेव्हा सांगलीला होतो. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही मराठवाड्यात गेलो की आमचे सगळे विश्वच बदलत असे. आई मला सुट्टीच्या पूर्वीच पत्र लिहून सांगत असे की, ‘काहीतरी भरत काम, विणकाम करायला घेऊन ये’. शाळेची लायब्ररी होती त्यामुळे वाचायला पुस्तकं मात्र भरपूर मिळत असत. सुट्टीत गेले की अधूनमधून आवड म्हणून स्वयंपाक करणे यात माझा वेळ जाई.आई-दादानाही खूप छान वाटत असे. सुट्टीचे दिवस संपत आले की आईची माझ्याबरोबर द्यायच्या पदार्थांची तयारी सुरू होई. नकळत ती थोडी अबोल होत असे आम्ही जाणार या कल्पनेने !

कालक्रमानुसार आम्हा तिघांची शिक्षणं झाली. आणि नंतर भावांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. आईने स्वतःच्या हिमतीवर आमच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. नुसती लग्न केली म्हणजे संपत नाही, त्यानंतर सणवार, बाळंतपण, नातवंडांबरोबर संवाद ठेवणे या सर्व गोष्टी ती जाणीवपूर्वक उत्साहाने आणि जबाबदारीने करीत होती. तीर्थरूप दादांचे तिला प्रोत्साहन असे. पण तब्येतीमुळे ते जास्त काही करू शकत नव्हते. आकुर्डी येथे भावाने घर बांधले आणि आईची ‘घरघर’ थांबवली. तिला आपल्याला घर नाही ही गोष्ट फार जाणवत असे. भावाच्या घराने -विश्वास च्या ‘पारंबी’ ने सर्वांनाच आधार दिला. तिथे तिचे स्वास्थ्यपूर्ण जीवन चालू झाले. गरजेनुसार ती आमच्याकडे येई. पण आकुर्डीला सरोज वहिनीची नोकरी व नातवंडे यामध्ये तिने राहण्याचे ठरवले. आकुर्डीत भजनी मंडळात तिचा सक्रिय सहभाग होता. भजन- भोजन यात तिचा वेळ छान जात असे.आकुर्डीच्या नातवंडांसाठी तिने इतके केले की मी तिला म्हणायची, “तुझी आणखी दोन मुले वाढवायची हौस राहिली बहुतेक !”

 ती. दादांच्या निधनानंतर ती आकुर्डीतच रमून राहिली. पुढे नातवंडांचे लग्न, बाळंतपण यात तिने जमेल तेवढी मदत केली. आज तीन मुले, सात नातवंडे आणि अकरा पंतवंडे असा तिचा वंश विस्तार आहे !

आताआतापर्यंत ती स्वयंपाकघरात भरपूर लुडबुड करत असे. आपलं वय झालंय हेच तिला पटत नाही. मला आता काही काम होत नाही असं म्हणत तिचं काम चालू असे. वयाच्या साठीच्या दरम्यान तिने उत्तर भारत, दक्षिण भारत या यात्रा केल्या. त्यानंतर नेपाळ ट्रिप करून आपण परदेश प्रवासही करू शकतो असा तिला कॉन्फिडन्स आला. वयाच्या ७३ व्या वर्षी तिने दुबई ,अमेरिका या ट्रिप केल्या. नायगारा फॉल्स, न्यूयॉर्क सगळे बघून ती खुश झाली. तिचा स्वभाव अतिशय उत्साही,! नवीन गोष्टी शिकण्याची, पाहण्याची आवड असल्यामुळे ती सतत कार्यरत असे. विणकाम हे तर तिचे फार आवडते ! सगळ्या नातवंडांना,पंतवंडांना  स्वतःच्या हाताने विणून स्वेटर, टोपी ती बनवत असे. रोजचे वर्तमानपत्र पूर्ण वाचायची. चांगल्या पुस्तकाचे वाचनही तिचे बरेच होते. टीव्ही जागरुकतेने बघत असे. तिला काळाबरोबर सर्व गोष्टी माहीत असत. तिचे डोळे अजून चांगले होते. जगण्याची उमेद होती. वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत ती चांगले आयुष्य जगली. आम्ही तर तिची शंभरी साजरी करू अशी  आशा करत होतो. परंतु ईश्वरी इच्छेपुढे  इलाज नसतो. तिला फारसा कोणताही  मोठा आजार नव्हता. तिचे खाणे पिणे अतिशय मोजके होते. त्यामुळे तिची तब्येतही ती राखून असे. आईच्या सहवासात चार दिवस राहावे या हेतूने मी आकुर्डीला गेले होते. भाऊ-वहिनींचाही मला राहण्यासाठी आग्रह होता. फारसे काहीही निमित्त न होता एके दिवशी

सकाळी माझ्याकडून तिने नाश्ता घेतला आणि गरम चहा पिण्यासाठी मागितला. तेच तिचे शेवटचे खाणे माझ्या हातून दिले गेले. दोन-तीन तासानंतर सहज म्हणून तिच्याजवळ गेले तेव्हा ती शांत झोपल्याप्रमाणे

दिसली, पण नुकताच तिचा देहांत झाला होता ! इतकं शांत मरण तिला आले ! आजही तिची आठवण आली की डोळे पाणावतात आणि आईची तीव्रतेने आठवण येते. ती उणीव भरून येत नाही 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संतोषचं नेमकं काय चुकलं…” ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? विविधा ?

☆ “संतोषचं नेमकं काय चुकलं…” ☆ श्री संदीप काळे ☆

पुण्यात माझ्या मित्राची, समीरची एक छोटी कंपनी आहे. परवा सकाळी मी समीरकडे जाऊन चहा घेत गप्पा मारत होतो, तेवढ्यात ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा आला. तो समीरला सांगत होता, ‘‘आजही तो मुलगा परत आला आहे. तो म्हणतोय, मला काहीतरी काम द्या.’’

समीर हळू आवाजात म्हणाला, ‘‘त्या मुलाला प्यायला पाणी द्या, चहा पाजा आणि सांगा, जेव्हा आमच्याकडे काम असेल, तेव्हा तुला कळवू.’’

मी काचेमधून बघत होतो. एक पंचविशीमधला तरुण हाताने घाम पुसत होता. समीरला मी विचारलं, ‘‘कोण आहे हा मुलगा?’’

समीर म्हणाला, ‘‘सहा महिन्यांपासून नेहमी येतो आणि मला काम द्या, असं म्हणतो.’’

मी म्हणालो, ‘‘हल्ली बेरोजगारी खूप वाढली आहे. बिचारा शिक्षण नसल्यामुळे कदाचित असं म्हणत दारोदारी फिरत असेल.’’

समीर म्हणाला, ‘‘तसं नाहीये, तो उच्चशिक्षित आहे, तीन डिग्री आहेत त्याच्याकडे. गेल्या चार वर्षांपासून पुण्यामध्ये तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. आता त्याच्या सहनशीलतेचा अंत झालाय. स्पर्धा परीक्षांचा नाद त्याने सोडून दिलाय. दोन वेळच्या खायची व्यवस्था व्हावी, असं त्याला वाटतंय. म्हणून तो कामाच्या शोधात आहे.”

समीरने सांगितलेलं ऐकून मला फार वाईट वाटलं. मी फोन आल्याचं निमित्त करून तिथून बाहेर पडलो व पाणी पीत असलेल्या त्या मुलापाशी येऊन बसलो. त्याची विचारपूस केली, चौकशी केली. त्याच्याशी बोलण्यातून अनेक विषय पुढे आले. मी ज्या मुलाशी बोलत होतो त्याचं नाव संतोष जाधव.

संतोष हा वाशीमचा. डिग्री मिळवल्यावर मित्राच्या सोबतीने स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात आला. केवळ एवढ्यावरच थांबला नाही, तर आपल्या आसपास असणारी अनेक मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात घेऊन आला. संतोषला एकच आवड होती, स्पर्धा परीक्षेतून मोठं नाव असणाऱ्या व्यक्तीचं मोटिव्हेशन असणारे व्हिडीओ पाहत बसायचं. त्या व्हिडीओच्या मोहातूनच आपणही लाल दिव्याच्या गाडीत बसावं, असं स्वप्न संतोषचं होतं.

एक बहीण होती, त्या बहिणीला घेऊन संतोषने आपलं पूर्ण बिऱ्हाड पुण्याला थाटलं. बहीणही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागली. एका वर्षानंतरच बहिणीने निर्णय घेतला की, आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा नाही, कुठंतरी नोकरी करून आयुष्याला सुरुवात करायची.

एका खासगी शिकवणीमध्ये बहीण शिकवायला लागली. दोन वर्षांनंतर तिने संतोषच्या मित्रासोबतच लग्न केलं. तो मित्रही स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा; पण आता पुण्यातच एका किराणा दुकानामध्ये काम करतो.

समीरही बाहेर येऊन आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाला. समीर संतोषला म्हणाला, ‘‘आज जरा गडबड आहे, तू उद्या ये आणि आपण सगळं ठरवून टाकू.’’ समीर त्याच्या कामाला लागला. मी माझ्या कामाच्या दिशेने निघालो. संतोषचा काळजीने व्यापलेला चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता.

माझ्या ड्रायव्हरने गाडी काढली. आम्ही रस्त्याने निघालो. थोडं पुढे गेलो. संतोष रस्त्याच्या कडेने जात होता. त्याच्या अंगावरला जर्जर झालेला शर्ट पाहून मला तो लगेचंच

ओळखता आला. मी त्याला आवाज दिला, ‘‘अरे, कुठं निघालास?’’

तो म्हणाला, ‘‘बुधवार पेठेमध्ये बहीण राहते, तिच्याकडे निघालो.’’

मी म्हणालो, ‘‘चल, मीही त्याच भागात चाललोय, तुला सोडतो.’’ गाडीमध्ये परत आमच्या गप्पा सुरू झाल्या. शनिवारवाड्याजवळची रहदारी एकदम कंटाळवाणी, तिथं आम्ही थोडा वेळ अडकलो. माझं ‘सकाळ’चं कार्यालय आलं.

संतोष खाली उतरून निघणार, इतक्यात मी त्याचा हात धरला आणि त्याला म्हणालो, ‘‘चल, आपण दोन घास काहीतरी खाऊ या.’’ आमच्या ‘सकाळ’च्या ऑफिसमधल्या कॅन्टीनमध्ये जेवताना आमच्या अजून गप्पा सुरू होत्या.

संतोष म्हणाला, ‘‘लहानपणी कळायला लागलं, तेव्हा आजारामध्ये आई गेली. आई दहा दिवस तापाने फणफणत होती; पण एक गोळी आणायला बापाकडे पैसे नव्हते. आई गेल्यावर आयुष्याचा बराचसा काळ माझ्या लहान बहिणीचा सांभाळ करण्यासाठी गेला. बाबा वारल्यावर गावाकडे जे जे होतं, ते वडिलांचं कर्ज फेडण्यात संपलं. गावाला अखेरचा रामराम ठोकला.’’

घरचा विषय काढता काढता आम्ही स्पर्धा परीक्षा या विषयावर येऊन थांबलो. स्पर्धा परीक्षेबाबत संतोषने मला जे काही सांगितलं, ते अतिशय धक्कादायक होतं.
मराठवाडा आणि विदर्भातून रोज कित्येक मुलं पुण्यात येतात आणि स्वतःच्या आयुष्याला साखळदंड घालून घेतात. स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी करणाऱ्या त्या मुलांच्या समस्यांनी मोठा कळस गाठल्याचं मला पाहायला मिळालं.

मी आणि संतोष तिथल्या अनेक पेठांमध्ये गेलो. तिथं अनेक मुलांना भेटलो. प्रत्येक मुलाचं म्हणणं एकच होतं, ‘माझ्या हाताला काम मिळेल का? आता बस झालं, नको स्पर्धा परीक्षा.’

मी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होईन, या विचारानं संतोषसारख्या हजारो जणांनी आपलं गाव सोडलं खरं; पण अधिकारी होणं सोडा, साधी गाडी पुसण्याचीही नोकरी द्यायला कोणी तयार नव्हतं.

संतोषचा मित्र सिद्धार्थ कांबळे, राजन गायकवाड, समीर धायगुडे या सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी झालेली मुलं व्यसनाच्या आहारी कशी गेलेली आहेत, हे सांगितलं. किती मुलं वाममार्गाला लागलेली आहेत, याचे अनेक किस्से सांगितले.

आम्ही सगळे जण पेठेमधल्या संतोषच्या दहा बाय दहाच्या रूमवर बसलो होतो. ती रूम कसली, जनावराचा खुराडा जसा असतो ना, तसं होतं ते. त्या भिंतीमध्ये हात घातला, तर पलीकडे हात निघेल, अशा त्या घराच्या भिंती होत्या. एवढ्या छोट्या जागेत पाच जण कसं काय राहत असतील देवाला माहीत!

आमच्या आवाजाचा गलबला ऐकून खाली असलेला घराचा मालक वर आला. संतोषला म्हणाला, ‘‘दोन दिवसांत जर तू रूमचं भाडं दिलं नाहीस, तर तुझ्या शर्टला धरून बाहेर काढीन, तुझं सामान रस्त्यावर फेकून देईन.’’

संतोष बिचारा शांतपणे ते ऐकून घेत होता. संतोष मला म्हणाला, ‘‘गेल्या सहा महिन्यांपासून ताईने पैसे देणं बंद केलं. मला पैसे देण्यावरून तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण व्हायचं. हे मला जेव्हा कळालं, तेव्हा मी तिच्याकडे पैसे मागणं, तिच्याकडे फारसं जाणं सोडून दिलं.’’

मी म्हणालो, ‘‘अरे पण रोजचे खर्च भागवायचे कसे?’’

संतोष म्हणाला, ‘‘काही नाही, आता मी आणि माझे हे दोन मित्र सकाळी दोन-तीन सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांच्या गाड्या धुतो. त्यातून जे पैसे मिळतात, त्या पैशांमध्ये आता एक-एक दिवस काढतोय.’’

संतोषच्या नजरेतून मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा सुरू असलेला बाजार पाहिला, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. किती भयानक ते चित्र होतं.

अनेक मुलांना भेटत असताना नांदेडचे प्रोफेसर समीर जाधव भेटले. जाधव आता सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ एका क्लासेसमध्ये शिकवणीचं काम करतात. मी त्यांना म्हणालो,

‘‘हा बाजार दिवसेंदिवस अजून वाढतोय, गंभीर होतोय, त्याला जबाबदार कोण आहे?’’

जाधव म्हणाले, ‘‘पालक आणि विद्यार्थी दोघेही आहेत.’’

मी म्हणालो, ‘‘कसं काय?’’

ते म्हणाले, ‘‘पालकांनी त्यांच्या फारशी समज नसणाऱ्या मुलांना समजावून सांगायला पाहिजे. जर विद्यार्थ्याला सुरुवातीपासून ६० आणि ७० टक्केच्या आतमध्ये मार्क असतील, तर त्याने स्पर्धा परीक्षांकडे न गेलेलं बरं. पालकही मुलांना स्पर्धा परीक्षेचा आग्रह धरतात. तुम्हाला सेवाच करायची, तुम्हाला कामच करायचं, तर कुठलंही काम आनंदाने करा ना! सन्मानाने जगण्यासाठी पैसा लागतो किती? जिथं तुमचं कधीही समाधान होत नाही, तिथं जायचा विचार का करायचा?’’

जाधव सर जे बोलत होते, ते अगदी खरं होतं. जाधव सर म्हणाले, ‘‘संतोषचं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या त्या हजारो मुलांचं काम सगळीकडे शेतात एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसारखं झालं आहे. पीक येतच नाही. आलं तरी सगळीकडे एकच पीक असल्यामुळे कवडीचा भाव असतो. मुलांना आणि त्यांच्या पालकांना हे पटलं तर नवलच.”

पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरलेल्या मुली वाममार्गाला कशा लागतात, याची अनेक उदाहरणं संतोष आणि त्यांचे मित्र मला देत होते. ते सगळं ऐकून माझ्या अंगावर काटा येत होता. संतोषचा मित्र सिद्धार्थ याला मी म्हणालो, ‘‘ज्या दिवशी तुमच्याकडे पैसे नसतात, त्या दिवशी तुम्ही जेवण कसं करता?’’

सिद्धार्थ म्हणाला, ‘‘पुण्यामध्ये काही ठरलेली ठिकाणं आहेत, तिथं अनेक मुलं जेवण्यासाठी जात असतात. अनेक मंदिरांच्या समोर प्रसाद म्हणून अन्नदान होतं, तिथं आम्ही जातो. पोटाची भूक इतकी भयंकर आहे की, लाज नावाचा प्रकार काही केल्या शिल्लकच राहत नाही. गावाकडे काम करायला मन तयार होईना.”

संतोषचं काय चुकलं आणि संतोषसारख्या हजारो मुलांचं रोज काय चुकतंय, याकडे आता सगळ्यांनीच डोळसपणे पाहण्याची वेळ आली होती. अवघ्या राज्यातली तरुणाई पुण्यात येत आहे. पुण्यामध्ये या सगळ्यांच्या स्वप्नांना सोनेरी झालर मिळते, असं अजिबात नाही. किंबहुना नव्वद टक्केपेक्षा अधिक जणांच्या वाट्याला अपयश येतं. हे अपयश का येतं, याचा शोध जर वेळीच घेतला नाही, तर मोठा अनर्थ घडणार आहे, हे मात्र नक्की..!

(आजचा हा लघुलेख स्वतः लेखक श्री. संदीप काळे, संपादक, मुंबई सकाळ, यांच्या सौजन्याने.)

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाॅपकाॅर्न…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “पाॅपकाॅर्न…” ☆ सौ राधिका भांडारकर 

पॉपकॉर्न या शब्दाशी तशी आयुष्यात जरा उशीरच ओळख झाली.  पण पाहता क्षणीच मी त्या शब्दाच्या आणि चवीच्याही प्रेमात पडले.  “ती पाहताच बाला कलीजा खलास झाला”  अशीच काहीतरी अवस्था मनाची झाली.  “अगदी सुंदरा मनामध्ये भरली”.

इतक्या दिवसांच्या जीवन प्रवासात वेगवेगळ्या चवींचे अनुभव काय थोडे असतात का? आता बघा पॉपकॉर्न मधला पॉप थोडावेळ बाजूला ठेवूया आणि  उरलेल्या त्या काॅर्नशी आपला  संबंध होताच की? काॅर्न  हा शब्द असेल परदेशी थाटाचा, काहीसा नखरेल, आधुनिक संस्कृतीशी चटकन शेक हँड  करणारा पण आपल्यासाठी त्याचा एकच अर्थ मका.  आणि मका म्हटलं की एकावर एक मस्त मखमली धाग्यांचं, मऊ वस्त्र लपेटलेलं एक सुंदर दाणेदार कणीस!  दाणे कधी पांढरे कधी पिवळसर पण रूप अतिशय देखणं,  आणि या मक्याचे आणि पावसाचे एक घट्ट नाते आहे.  छान पावसाच्या सरी कोसळत असाव्यात, वातावरणात ओला गारवा, असावा कुठेतरी झाडाच्या खाली अथवा रस्त्याच्या  कडेला पावसापासून सुरक्षित निवारा शोधून मक्याच्या कणसांची रास गाडीवर ठेवून, कोळशाची शेगडी पेटवून , त्या तप्त निखाऱ्यांवर कणसे भाजणारा “तो” किंवा “ती” दिसावी आणि तिथे टुणकन् उडी मारून आपण जावं. त्या उडणार्‍या ठिणग्या आणि तडतडणारे दाणे आणि नंतर त्या शेगडीवर भाजलेल्या, वरून तिखट, मीठ, लिंबू पिळलेल्या खमंग, गरम कणसांचा आस्वाद घ्यावा.  ते खरपूस, रसदार दाणे चावून खाताना रसनेची होणारी तृप्ती…क्या बात है!.. अलौकिकच! ज्या कोणी याचा आनंद घेतला नसेल तर तो जीवनातल्या महान आनंदला कायमचा मुकला आहे असेच मी म्हणेन.

तर अशा या मक्याशी— काॅर्नशी  असलेलं, आपलं नातं तसं जुनच.  पिढ्यानु पिढ्या चालत आलेलं.  पण या मक्याचे “पॉपकॉर्न” असं नामकरण झालं आणि आपण एका वेगळ्याच संस्कृतीत पाऊल टाकलं.जसं निवडुंगाचं कॅक्टस झालं,तसंच काहीसं.पण  ही संस्कृती आहे. हलकीफुलकी, नाचणारी, बागडणारी, उडणारी पॉप संस्कृती. रेडीमेड पण चविष्ट, खमंग आणि सहज नेत्रांना सुखावणारी,  रसनेलाही भावणारी.   म्हणजे पॉपकॉर्न या उच्चाराबरोबर काॅर्न  किंवा मका खाण्याचे वैज्ञानिक, आरोग्य विषयक नियमांचे विचार वगैरे येत नाहीत  बरं का? म्हणजे त्याचे अँटिऑक्सिडंट घटक, हृदयाला ऊर्जा देणारी गुणवत्ता वगैरे असं काहीही गंभीर, अभ्यासात्मक मनाला त्यावेळी स्पर्शूनही जात नाही. ते सारं ज्ञान एकीकडे आणि कागदाच्या उभट  द्रोणातून भरभरून वाहणारे वेगवेगळ्या फ्लेवरचे (चवीचे न म्हणता) पॉपकॉर्न खाण्याची  मजा काही औरच. 

पण क्षणभर थांबा.  आता या खाद्याच्या मजेच्या, आनंदाच्याही पातळ्या वेगवेगळ्या आहेत.  म्हणजे हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.  त्यातही पुन्हा ऑप्शन्स आहेत. “ए वन  पॉपकॉर्न” या ब्रँडचे छोटे, कागदी पुडीतले, इन्स्टंट म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये दोन मिनिटात तडतड उडणारे पॉपकॉर्न खाऊ शकता किंवा चक्क सुकलेले मक्याचे दाणे किंचित तेलावर, शिट्टी न लावलेल्या कुकरमध्ये गरम केले की  तुम्हाला या मक्याच्या सुंदर, नक्षीदार, हलक्या लाह्या घरबसल्या  मिळतील.    मग त्यावर तुमच्या आवडीचं, कुठलंही मसालेदार, चटकदार मिश्रण भुरभुरा. पॉपकॉर्न तयार.  आता मात्र त्यास मक्याच्या लाह्या हे पारंपारिक विशेषनाम न देता काय म्हणाल? 

 “पॉपकॉर्न”

“. बरोब्बर”

मस्त . टीव्हीवरच्या अथवा ओटीटी वरच्या एखादा अत्यंत कंटाळवाण्या सिनेमाचीही  रंगत हे पॉपकॉर्न वाढवतात. जोडीला बाहेर पाऊस पडत असेल तर मग अगदीच दुग्ध शर्करा  योग. यातही भरपूर मजा आहे.

पण मंडळींनो! पॉपकॉर्न आणि मजा याची ही अगदीच मर्यादित, सामान्य पातळी  आहे. अगदी उपहासाने, काहीसं तिरसटपणे, तुच्छतेने उच्चभ्रुंच्या ठेवणीतलं म्हटलेलं  वाक्य म्हणजे “मिडल क्लास मेंटॅलिटी”  “मध्यमवर्गीय मानसिकता” घरीच बनवा,घरीच खा हा ट्रेंड. कारण पॉपकॉर्नचं खरं नातं आहे ते आजच्या नवयुगातल्या मॉल संस्कृतीशी.  पीव्हीआर, आयनॉक्स,  सिने संस्कृतीशी.  थिएटर मधल्या गोल्ड, प्लॅटिनम, रेक्लायनर या बैठक संस्कृतीशी.  त्या मस्त थंड काळोखात घमघममणारा तो पॉपकॉर्नचा विशीष्ट, नमकीन सुगंध तुम्हाला कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. 

बाहेरच्या काउंटरवर काचेच्या मागे त्या आनंदाने टप टप उडणाऱ्या, गरमागरम लाह्या , (लाह्या नाही हो…पाॅपकाॅर्न) न खाता किंवा खिशात हात न घालता तुम्ही पुढे गेलात तर हाय कंबख्त!  एक तर तुम्ही अत्यंत कंजूष  किंवा “इतके पैसे कशाला मोजायचे?””दोन रुपयाच्या ठिकाणी दोनशे का द्यायचे?” या काटकसरी, कर्तव्यनिष्ठ, समंजस,धोरणी,संयमी  वयस्कर समूहातले असाल. फार तर लार्ज कप नका घेऊ. थोडेसे तरी पैसे वाचवून स्मॉल कप घ्या, पण घ्या.  त्याशिवाय पीव्हीआर मध्ये जाऊन सिनेमा पाहण्याच्या  निखळ आनंदाची पूर्तता होणारच नाही.सिनेमा भिक्कार कां असेना पण पॉप काॅर्न हवेतच.  वाटल्यास चित्रपटगृहात बालदीभरून पॉपकॉर्न खाणाऱ्यांबद्दल, “काय ही आजची युवापीढी, बापाच्या जीवावर मजा करते किंवा आयटीत जॉब असेल. लहान वयात भरपूर पैसा मग काय मजा..  किंवा आजकाल काय खिशात क्रेडिट कार्ड असतेच ना..” असे शेरे तुम्ही या खर्च करणाऱ्या, उधळपट्टी करणाऱ्या पिढीवर मनातल्या मनात मारू शकता.  पण घरी आल्यावर हिशोबाच्या डायरीत सिनेमाची— मी आणि सौ— दोन तिकिटे..रु. साडेसातशे प्लस पॉपकॉर्न रु.साडेतीनशे अशी नोंद करताना मुळीच हळहळू नका.

या वयातही “थोडीसी रुमानी हो जाये”  हाच अटीट्यूड ठेवा की !  नाही तर भूतकाळात रमाल.  आम्ही दोन रुपये देऊन पिटात पिक्चर पाह्यचो. फार तर मध्यंतरी पुडीतले  चणे किंवा थोडे पैसे असतील तर मटका कुल्फी.  काय कमी मजा होती  का यात?  अगदी गेला बाजार नाट्यप्रेमींचा आनंद काय होता?  खरं म्हणजे आजही आहेच  तो. मध्यंतरात मस्त जायफळ, वेलची घातलेली मधुर कॉफी आणि गरम बटाटेवडे.  पण हे दृष्य गडकरी रंगायतन  किंवा बालगंधर्व मध्ये.  पीव्हीआर मध्ये नक्कीच नाही. तिथे मात्र हेच अहंकारी, शिष्ट, तडतड उडणारे तरीही तुम्हाला खुलवणारे, बोलवणारे, तुमच्या “पैसे बचाव” घट्ट संस्कृतीच्या रेषा ओलांडायला लावणारे, हलकेफुलके पॉपकॉर्नच. 

तर मंडळी पॉपकॉर्न ही एक संस्कृती आहे.  त्या पलीकडे जाऊन मी म्हणेन ती एक मानसिकता आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी भाषा विषयक अभिमानाला आणि मराठी माणसाने मराठीतच बोलावे या संदेशाला सादर प्रणाम करून आणि नंतर त्यांची मनस्वी क्षमा मागून विनम्रपणे मी म्हणेन की “पॉपकॉर्न” या धबधब्यासारख्या, एका विशिष्ट लय असलेल्या, उच्चारवातच आनंदाची कारंजी उडवणाऱ्या, हलक्या फुलक्या शब्दाशीही नाते आणि खाद्य संस्कृती जुळवण्याचा एक प्रयत्न तरी करून बघूया.   बदलत्या काळाबरोबर जरा जगायला शिकूया की.

आनंददायी खवय्येगिरी .

जाता जाता आणखी एक…..   पॉप काॅर्न या शब्दातही एक संदेश दडलेला आहे. नाचा, उडा, मुक्त व्हा आणि मूळचा कडक,कठीण, सुका भाव उधळून पिसासारखे हलके व्हा.”

“मन उडू उडू झाले” याचा हा  वेगळाच अर्थही जाणून घेऊया.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “यमक…” ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ “यमक…” ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

ज्योतिताईंनी एकदा विचारलं, “एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं होते, या काव्यप्रकाराला काय म्हणतात?”  माझा हक्काचा स्रोत  म्हणजे आई-दादा!

दादांचा फोन बंद होता आठ दिवसांपासून! जाम बेचैन झाले. म्हणून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करून ठेवलं. पाचव्या मिनिटाला दादांचा फोन! 

“अगं, आत्ताच फोन सुरू झाला आणि तुझा मेसेज वाचला. ऐक, यमकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तू म्हणतेस ते दाम-यमकाच्या जवळपास जाणारं यमक असेल, असं आई म्हणत्ये.”

मागून मला आईच्या नाजूक गुणगुणण्याचा आवाज आला. आईची स्मरणशक्ती अफाट! कोणतीही कविता पाठ असते. 

‘श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया|

मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया|

सारा या प्रभुची हे 

लीला गाती सदैवही सुकवी|

सुकवी भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी|’ 

(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा.) 

दादा म्हणाले, “हे बघ ऐक!” त्यांनी तोवर, ते आठवीत असतानाचं (आईला ८४ वर्षे पूर्ण होतील आता. दादा ८६ वर्षांचे!) मराठीचं पुस्तक आणलं होतं.  पाय प्रचंड दुखतात त्यांचे! पण ब्रिज आणि भाषा हे विषय आले की, त्यांना पंख लाभतात! 

तर कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. ते थोडक्यात इथे मांडत आहे. 

१) एकाक्षरी यमक:  

एक्या पदे भूमि भरोनि थोडी

दुजा पदे अंडकटाह फोडी

(डी ला डी हे एकाक्षरी यमक) 

२) द्व्यक्षरी

 दे तीसरा पाद म्हणे बळीला

म्हणोनी पाशी दृढ आकळीला

(ळीला हे द्व्यक्षरी) 

३)चतुराक्षरी

बाई म्यां उगवताच रवीला

दाट घालुनि दही चरवीला

त्यात गे फिरवितांच रवीला

सार काढुन हरी चरवीला

(काय अफाट आहे ना हे!  प्रत्येक ‘चरवीला’ वेगळा आशय मांडतो.) 

४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदि चरण सारखा. 

सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात

तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात

५) दामयमकाचं उदाहरण वर दिलंच आहे. 

६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक. 

सुसंगति सदा घडो… पडो.. झडो… नावडो

 ७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक. 

वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो

(वाजत गाजत साजत आजत याजत, अशी गंमत आहे.) 

मज मागे मत्स्यांचा हा रिपु-शशि-राहु-बाहु राणा हो

८) युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे. 

पायां नमी देइन वंश सारा

पा या न मी दे इनवंशसारा

(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम!)

९) समुद्रक यमक

हेही अफाट प्रकरण आहे. – 

अनलसमीहित साधी राया, वारा महीवरा कामा

अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा

(हे पृथ्वीपते धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला  साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, बलरामही हवे तर येतील. मग वराका (बिचारी) मा (रुक्मिणी) तुझ्या साह्यास का येणार नाही?)

अशा यमकांत चमत्कृती असते. पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!

मी हे सगळं प्रथमच वाचलं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहीत असेल. पण नसेल तर माहिती व्हावी म्हणून पाठवत आहे.  यमक याविषयी आणखी माहिती मिळाली तर जरूर शेअर करा.

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “म्हातारपणचा आधार कोण ? ” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “म्हातारपणचा आधार कोण ? ” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

म्हातारपणाचा आधार कोण??? —- मुलगा की मुलगी??

आम्ही सर्वजण मुख्य सभागृहात बसून चर्चा करत होतो, तेव्हा माझ्या बहिणीने मला प्रश्न विचारला, “भाऊ! मला सांगा, माणसाची मुलगी आहे की त्याचा मुलगा त्याच्या म्हातारपणाचा आधार आहे?”

मी म्हणालो- “बहिणी ! हा प्रश्न न विचारलेलेच बरे. कारण काही सुखी होतील, तर काही दुःखी.

म्हणून इतर सर्व लोक आग्रह करू लागले की नाही, ही गोष्ट सविस्तर सांगावी लागेल…

मी म्हणालो तर ऐका… म्हातारपणाचा आधार मुलगा किंवा मुलगी नसून “सून” असते.

मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असे आपण अनेकदा लोकांकडून ऐकले आहे, म्हणूनच लोक आपल्या आयुष्यात “मुलगा आणि मुलगी” हवेत, जेणेकरून म्हातारपण चांगले पार पडावे.

ही गोष्ट सुद्धा खरी आहे कारण घरात फक्त मुलगाच सून आणतो. सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर जवळजवळ सर्व जबाबदारी टाकतो.

आणि मग सून ही सासरच्या म्हातारपणाची काठी बनते.

होय! माझा विश्वास आहे की ती सून आहे जिच्या पाठिंब्याने वृद्ध सासू आणि सासरे आपले आयुष्य चांगले घालवतात.

सुनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांची संपूर्ण दिनचर्या माहीत असते.

कोण कधी आणि कोणता चहा प्यायचा, काय शिजवायचा, संध्याकाळी नाश्त्याला काय द्यायचे, कोणत्याही परिस्थितीत जेवण रात्री नऊच्या आधी शिजवावे लागते.

सासू-सासरे आजारी पडले, तर सून मनापासून किंवा अनिच्छेने त्यांची काळजी घेते.

सून एक दिवस आजारी पडली किंवा निघून गेली तर सगळं घर हादरून जातं. पण मुलगा पंधरा दिवसांच्या प्रवासाला गेला तरी सुनेच्या भरवशावर घर सुरळीत चालते.

सून नसताना सासू-सासरे यांना कोणीतरी आपली काठी हिसकावून घेतल्यासारखे वाटते. त्याला दुसरे कोणी विचारायचे नव्हते.

कारण मुलाकडे वेळ नाही आणि मुलाला वेळ मिळाला तरी तो काहीच करू शकणार नाही कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आई बाबांना काय द्यावे हेच कळत नाही? कारण मुलाचे काही प्रश्न आहेत आणि त्याची जबाबदारी  संपली.

जसे “आई बाबांनी जेवण केले आहे का?” “चहा प्यायला?” “नाश्ता केला?” पण ते काय खातात? कोणता चहा पितात हे शोधण्याचा प्रयत्न कधीच केला नाही? ही जवळपास सगळ्या घरांची गोष्ट आहे.

सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सून मी बहुतेक पाहिल्या आहेत.. म्हणूनच सून हीच म्हातारपणाची खरी काठी आहे असे मी मानतो.

पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला सुद्धा बुद्धी असायला हवी की सदैव “माझ्या राजा बेटा!” “माझी राणी मुलगी!”  चा जप सोडा. “माझी चांगली सून!” सुद्धा अंतर्भूत केले पाहिजे.

म्हणून, आपल्या सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका, तिच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा.

“दिवसाचा संदेश”

सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा

मुलगा आणि मुलीच्या आधी सुनेला स्वतःचे समजा

आणि “माझी मुलगी – माझा अभिमान” “माझा मुलगा – माझा अभिमान” म्हणणे थांबवा…

अभिमानाने म्हणा माझी सून, माझा अभिमान…… 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ आयुष्याचं झाडं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ आयुष्याचं झाडं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

या आयुष्याच्या झाडाला बालपणीची पहिली डहाळी सर्वात उंच उंच असते .माय पित्याच्या मायेच्या ढोलीत सख्या सोबत्यांच्या संगतीत किलबिल किलबिल गुजगोष्टीने, प्रत्येकाला रंगीबेरंगी फुलाप्रमाणे स्वप्नं पाहात, पंखातले बळ अजमावत गगनाला गवसणी घालण्याची इच्छा मनात येते. वेळ येते तेव्हा काहींचे मनसुबे पूर्ण होतात तर काहींचे मृगजळाचे रूप घेऊन हुलकावणी देत राहतात.. देव भेटत नाही आणि आशा सुटत नाही याचा प्रत्यय ठायी ठायी येतो. दमछाक होते. नाद सोडून दिला जातो.. आता एकटेपणाचा उबग येतो नि जीवन साथीची गरज भासते.. शांत, सरळ, एकमार्गी धोपट जीवन जगावेसे वाटणे स्वाभाविक असते.. ती आयुष्यातली गोड गुलाबी सल्लज कुजबूज, हितगुज आपल्या प्रियतमांच्या कानात सांगाविशी वाटते. मानवी जीवनातला हा सर्वात सुंदर सुवर्णकाळ असतो.. स्वप्नांच्या पूर्ततेचा हा टप्पा असतो..या संसाराच्या फांद्यावर आता आपलचं स्वतंत्र घरटं असतं.. आणि बालपणीचे सखेसोबतीत अंतर दुरावलेलं असतं.. इथं संबंध झाड हिरवेगार तजेलदार, पानाफुलाने नि फळांनी बहरून आलेलं असतं. मग हळूहळू तो बहर ओसरू लागतो, पानं पिवळी पडत जीर्ण शीर्ण होऊन गळू पाहतात, फुलं कोमेजू लागतात, फळ झाडापासून तुटून खाली पडू पाहतात… ही वार्धक्याची डहाळी झाडाच्या बुंध्याला येऊन टेकलेली असते.. बरेच उन्हाळे पावसाळे झेलून झालेले असल्याने आता कशाचीच असोशी उरलेली नसते.. अगदी जीवन साथीची जवळिकतेची सुद्धा.. केवळ अस्तित्वाने जवळ असणं पुरेसे वाटतं. संवादाला नाहीतरी विवादाला तरी सोबत असावी असचं वाटू लागतं ,मनाप्रमाणे शारिरीक अंतर पडू पाहतं..मावळतीचे काळे करडे राखाडी रंग तनामनावर उमटले जातात.. बालपणीचा किलबिलाट, तरूपणीची गुंजन हवेत कधीच विरून गेलेली असते, आणि आता वृद्धपणी ची कलकल हुंकारत असते.. गुणापेक्षा अवगुणाची एकमेंकाची उजळणी करत करत, एक दिवस विलयाचा येतो नि जगलेल्या जीवनातील आठवणींचा सुंगध मागे दरवळत राहतो.. अशी पाखरे येती नि स्मृती ठेवूनी जाती हेच खरे असते नव्हे काय? 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 97 ⇒ प्याऊ और …… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “प्याऊ और … ।)  

? अभी अभी # 97 ⇒ प्याऊ और… ? श्री प्रदीप शर्मा  ? 

यह तब की बात है, जब मिल्टन के वॉटर कंटेनर और बिसलेरी की बॉटल का आविष्कार नहीं हुआ था, क्योंकि हमारे प्रदेश में कुएं, बावड़ी, नदी तालाब, ताल तलैया और सार्वजनिक प्याऊ की कोई कमी नहीं थी। शायद आपने भी सुना हो ;

मालव धरती गहन गंभीर,

डग डग रोटी, पग पग नीर

हम बचपन में, सरकारी स्कूल में कभी टिफिन बॉक्स और वॉटर बॉटल नहीं ले गए। कोई मध्यान्ह भोजन नहीं, बस बीच में पानी पेशाब की छुट्टी मिलती थी, जिसे बाद में इंटरवल कहा जाने लगा।

इतने बच्चे, कहां का पब्लिक टॉयलेट, मैदान की हरी घास में, किसी छायादार पेड़ की आड़ में, तो कहीं आसपास की किसी दीवार को ही निशाना बनाया जाता था। हर क्लास के बाहर, एक पानी का मटका भरा रहता था, तो कहीं कहीं, पीने के पानी की टंकी की भी व्यवस्था रहती थी। कुछ पैसे जेब खर्च के मिलते थे, चना चबैना, गोली बिस्किट से काम चल जाता था।

शहर में दानवीर सेठ साहूकारों ने कई धर्मशालाएं बनवाई और सार्वजनिक प्याऊ खुलवाई। हो सकता है, कई ने कुएं बावड़ी भी खुदवाए हों, लेकिन सार्वजनिक पेशाबघर की ओर कभी किसी का ध्यान नहीं गया। क्योंकि यह जिम्मेदारी स्थानीय प्रशासन अथवा नगर पालिका की ही रहती थी। हो सकता है, नगरपाल से ही नगर पालिका शब्द अस्तित्व में आया हो। ।

आज भी शहर में आपको कई ऐसी धर्मशालाएं और सार्वजनिक प्याऊ नजर आ जाएंगी, जिनके साथ दानवीर सेठ साहूकार का नाम जुड़ा हो, लेकिन इनमें से किसी के भी नाम पर, शहर में कोई सार्वजनिक पेशाब घर अथवा शौचालय नजर नहीं आता। इतिहास गवाह है, केवल एक व्यक्ति की इन पर निगाह गई, और परिणाम स्वच्छ भारत अभियान के तहत खुले में शौच से मुक्ति, घर घर शौचालय, और सार्वजनिक शौचालय और पेशाबघर के निर्माण ने देश का कायाकल्प ही कर दिया।

इसके पूर्व सुलभ इंटरनेशनल ने पूरे देश में सुलभ शौचालयों का जाल जरूर बिछाया, लेकिन उसमें जन चेतना का अभाव ही नज़र आया।

पानी तो एक आम आदमी कहीं भी पी लेगा, लेकिन पेशाब या तो घर में ही की जा सकती है अथवा किसी पेशाब घर में। भाषा की अपनी एक सीमा होती है, और शर्म और हया की अपनी अपनी परिभाषा होती है। कुछ लोग इसे लघुशंका कहते हैं तो कुछ को टॉयलेट लग जाती है।

मौन की भाषा सर्वश्रेष्ठ है, बस हमारी छोटी उंगली कनिष्ठा का संकेत ही काफी होता है, अभिव्यक्ति के लिए। जिन्हें अधिक अंग्रेजी आती है वे इस हेतु पी (pee) शब्द का प्रयोग करते हैं। बच्चे तो आज भी सु सु ही करते हैं। खग ही जाने खग की भाषा। ।

एक समग्र शब्द प्रसाधन सभी को अपने आपमें समेट लेता है। बोलचाल की भाषा में आज भी इन्हें पब्लिक टॉयलेट कहा जाता है, पुरुष और महिला के भेद के साथ। प्रशासन ऐप द्वारा भी आजकल आपको सूचित करने लगा है, यह सुविधा आपसे कितनी दूरी पर है।

हर समस्या का हल सुविधा से ही होता है, लेकिन कुछ आदिम प्रवृत्ति आज भी पुरुष को स्वेच्छाचारी, उन्मुक्त और उच्छृंखल बनाए रखती है। सार्वजनिक स्थान पर धूम्रपान और मल मूत्र का विसर्जन वर्जित और दंडनीय अपराध है लेकिन उद्दंडता सदैव कानून कायदे और अनुशासन का उल्लंघन ही करती आ रही है। हद तो तब होती है, जब इनके कुछ शर्मनाक कृत्य लोक लाज और मान मर्यादा की सभी हदें पार कर जाते हैं, और कुछ ऐसा कर जाते हैं, जो आम भाषा में कांड की श्रेणी में शामिल हो जाता है, कभी तेजाब कांड तो कभी पेशाब कांड ! एक जानवर कभी अपनी कौम को शर्मिंदा नहीं करता, लेकिन एक इंसान ही अक्सर इंसानियत को शर्मिंदा करते देखा गया है। हम कब सुधरेंगे। 

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

? विविधा ?

☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

इतकं पण धावू नका…

आणि अकालीच वरती जाऊ नका !

अनेकदा आपण आपल्या कामाला झोकून देऊन इतका वेळ देत असतो की, आपल्याजवळ ‘आपल्यासाठीच’ वेळ उरत नाही. आणि मग एक दिवस असा येतो की, धाव धाव धावून आपण जे काही कमवलं, बँक बॅलन्स, फ्लॅट, गाडी…. ऐश्वर्य.. जे जे काही कमवलं ते पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आपणच जिवंत नसतो.

मित्रानो…. ही कहाणी आहे जामनगर (गुजरात) च्या अत्यंत यशस्वी अशा डॉक्टरची अचानक थांबलेली जीवनयात्रा !

आजवर १६ हजार हृदयविकार रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान मिळवून दिले होते असे हे डॉ. गौरव गांधी स्वतः प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट (हृदयविकार तज्ज्ञ) होते. इतकंच नव्हे तर कमी वयात हल्ली अटॅक येत आहेत हे पाहून त्यांनी स्वतः एक मिशन सुरु करून त्याद्वारे सर्वाना जागे करत होते.

इतक्या लहान वयात १६ हजार ऑपरेशन्स त्यांनी केले म्हणजे ते रोज सुमारे सतरा ते अठरा तास काम करत असणार. तेही हृदयाचे ऑपरेशन्स म्हणजे अत्यंत नाजूक व तितकंच स्ट्रेसफुल्ल काम !

असेच एके दिवशी ते दवाखान्यात जायला निघाले अन रस्त्यातच त्यांना छातीत कळ आली आणि दवाखाण्यात पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं. हजारोंचे जीव वाचवणाऱ्याचा जीव मात्र कुणालाच वाचवता आला नाही, इतका त्यांना आलेला तो अटॅक तीव्र होता.

दोन तीन कारणांसाठी मनात हळहळ दाटून येते. एक तर ४१ हे काही जायचे वयच नाही, आणि त्यातही अशा बुद्धिमान डॉक्टरचे, ज्याची समाजाला प्रचंड गरज होती. शिवाय इतरांनी गाफील राहू नये म्हणून जागे करणारे डॉ गांधी स्वतःच कसे स्वतःबद्दल गाफील राहिले ?

मला एकदम आपल्या डॉ. नितु मांडके यांची आठवण आली. तेही असेच झोकून देऊन काम करणारे हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर ! ते तर म्हणायचे की, “मला आजारी पडायला देखील वेळ नाही, इतकी ऑपरेशन्स पेंडिंग आहेत. वेटिंग लिस्ट मोठी आहे”

मात्र तेच अटॅकने तडकाफडकी गेले !

कामाचा प्रचंड ताण आणि त्यातून होणारा मानसिक ताण, आणि त्यातून मग ओघानेच येणारा अटॅक !!

खूप वाईट वाटतं अशावेळी !

अर्थात एकेकाळी ऐन चाळीशीतच असताना मलाही अटॅक आलेला. पूना हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये मी ऍडमिट ! मात्र डॉ. जगदीश हिरेमठ सारखा देवदूत तिथं मला लाभला अन त्यांनी मला त्या आजारातून बाहेर तर काढलेच पण त्यांनी कान टोचून जे काही सांगितलं ते मी आजवर पाळलं, त्यामुळे थेट ट्रेकिंग करू शकतोय, गडकिल्ले चढून जातोय ! नाहीतर ”चार जिने सुद्धा यापुढं चढता येणार नाहीत’ असं त्यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात सांगतो, ‘वेळेत जेवण, पुरेसा आहार आणि नो जागरण’ हि त्रिसूत्री त्यांनी दिलेली. जी आजवर काटेकोर पाळतोय. कितीही अर्जंट काम असलं तरी जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही, आणि झोपेचीही ! झोपताना कपभर गार दूध, सकाळी अर्धा तास चालणे, अर्धा तास योगासने किंवा व्यायाम, बास ! इतकंच पुरते !!

मनात आलं की सरळ गाडी काढून गोवा, महाबळेश्वर फिरून येतो. मनाला मस्त ठेवलं की जिंदगी पण मस्तमौला होते. चार लोक काय म्हणतील याला फाट्यावर मारा. ते मनावर घेत बसून ताण घेतला तर तुम्ही फोटोत जाऊन बसाल आणि तेच ‘चार’ लोक तुमच्या फोटोला हार घालायला येतील. त्यामुळे फोटोत जायचं नसेल तर ताण घेणे सोडा.

डॉ. डी डी क्लास : मंडळी… स्वतःला कामात इतकं पण झोकून देऊ नका, की तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही. किंवा मग ‘राहणारच’ नाही. स्वतःच स्वतःवर इतका अन्याय करू नका. स्वतः स्वतःला थोडासा वेळ जरूर द्या. स्वतःची काळजी घ्या ! तुम्ही फक्त तुमचे नाहीत तर समाजाचे देखील आहात. त्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊन कसे चालेल ?

बिझिनेसमध्ये अप डाऊन सुरु आहे ? असू द्या. काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !

नोकरीच्या जागी…. बॉसिंगचा त्रास आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !  

घरात नातेवाईकांत वादविवाद, भांडण सुरु आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !

विचार करा मंडळी…. वेळ अजून गेलेली नाही. सावध व्हा. काम तर केलंच पाहिजे, पण त्यात ताण निर्माण होऊ देऊ नका. कुत्रा मागे लागल्यासारखे धावू नका. शांतपणे पण दमदारपणे वाटचाल करा. मग अटॅक येणार नाही. हे नक्की ! त्यासाठी शुभेच्छा !

© डाॅ. धनंजय देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares