मराठी साहित्य – विविधा ☆ दुरंगी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ दुरंगी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

माणूस सहज दिसतो, जाणवतो तसाच असतो असं नाही.तो खऱ्या अर्थाने समजतो ते दीर्घ सहवासानंतरच.माणसाचं हे वैशिष्ट्य कांही अपवादात्मक शब्दांमधेही जाणवतं.दाद हा असाच एक शब्द.हा शब्द ऐकताच त्याचा ‘उत्स्फुर्त प्रतिक्रिया ‘ हा आपल्या मनाला भावलेला अर्थच चटकन् जाणवतो.पण ‘दाद’ या शब्दाचा पैस असा एका अर्थाच्या मर्यादेत मावणारा नाहीय.

एखादी चांगली गोष्ट मनाला स्पर्शून गेली की त्या स्पर्शाची नकळत उमटणारी प्रतिक्रिया म्हणजे ‘दाद’ ! ही उस्फुर्त प्रतिक्रिया व्यक्त करणे म्हणजे ‘दाद’ देणे.ही दाद म्हणजे ‘ग्रेट’,’मस्तच’,’वाह..क्या बात है..’ यासारखे मनाच्या तळातून उमटलेले तत्पर उद्गार असतील,किंवा नकळत वाजलेल्या टाळ्याही असतील.

क्वचित कधी एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दलची आपली सकारात्मक प्रतिक्रिया उघडपणे सहज व्यक्त न करणारेच बरेच जण असतात.त्यांची अंत:प्रेरणा तेवढी सशक्त नसल्यामुळेही असेल कदाचित,पण त्यांना व्यक्त होण्यासाठी बाह्यप्रेरणेची गरज लागते.एखादं भाषण ऐकताना किंवा नाटक बघताना मनाला स्पर्शून गेलेल्या एखाद्या वाक्यानंतर किंवा उत्कट प्रसंगादरम्यान क्षणिक कां होईना शांतता पसरते.लगेच टाळ्यांचा आवाज येत नाही.मग क्षणार्धात कुणी दोन चार जणांनी टाळ्या वाजवल्याचा आवाज येताक्षणी त्याने प्रेरित झालेल्या असंख्य प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट सुरु होतो.’ दाद ‘ या शब्दाला ती देण्यासाठी अशी ‘प्रतिक्षा’ अपेक्षित नाहीय. ‘उत्फुर्तपणा’ हा या शब्दात मुरलेला अविभाज्य घटकच आहे.

‘दाद’ हा कांही कौतुक किंवा शाबासकी या शब्दांचा समानार्थी, पर्यायी शब्द नाहीय.तरीही कौतुकाने पाठीवर दिलेली शाबासकी जसा ती  मिळवणाऱ्याला आनंद, प्रोत्साहन,समाधान देते तसाच आनंद,समाधान न् प्रोत्साहन उत्फुर्तपणे दिली गेलेली दादही देते.आणि देणारा आणि घेणारा दोघांनाही सकारात्मक उर्जा देणारी दादतर दाद या शब्दाला अधिकच अर्थपूर्ण बनवते. ‘कौतुक’ आणि ‘दाद’ या दोन्ही शब्दा़ंत आणखी एक साम्य आहे. सतत होणाऱ्या कौतुकाची जशी चटक लागते,तशीच एखाद्या कलाकाराला ठराविक वेळी मिळणारी ‘दाद’ इतकी सवयीची होऊन गेलेली असते की एखाद्या प्रयोगांत ‘त्या’ क्षणी, त्या ठराविक प्रसंगात किंवा त्या ठराविक वाक्याला टाळ्या मिळाल्या नाहीत तर कांहीतरी हरवल्यासारखा तो कलाकार अस्वस्थ होऊन त्या भूमिकेतला ताल न् तोल हरवून बसल्याची उदाहरणेही आहेत.

मोकळेपणाने एखाद्याचे कौतुक करण्यासाठी मन मोठे असावे लागते हे खरे,पण दाद देण्यासाठी फक्त त्या क्षणकाळापुरता स्वत:चाच विसर पडणे हेच अपेक्षित असते.आपलं ‘मी’पण त्या क्षणापुरतं कां होईना गळून जातं तेव्हाच आपल्याकडून उमटणारी प्रतिक्रिया ‘उत्स्फुर्त’ असू शकते. आणि हेच ‘दाद’ या शब्दाला अपेक्षित असते.

‘दाद’ या शब्दाला मी ‘दुरंगी’ म्हणतो ते एका वेगळ्याच कारणाने.या शब्दाचं परस्पर विरुद्ध असं दुसरंही एक रुप आहे.आत्तापर्यंत वर उल्लेखित विवेचन वाचले की ‘दाद’ ही द्यायची असते असेच वाटेल.पण कांहीबाबतीत ‘दाद’ ही मागावीही लागते.स्वत:वर अन्याय होतो तेव्हा त्याविरुध्द तक्रार केली जाते ते एक प्रकारचे ‘दाद’ मागणेच असते.दाद मागितली तरी न्याय मिळतोच असे नाही पण न्याय मिळण्यासाठी दाद मागावीच लागते असं विरोधाभासी वास्तव ‘दाद’ या शब्दांत सामावलेलं आहे.

दाद’ या शब्दाचे हे पूर्णत: वेगळे दोन्ही अर्थरंग मात्र अर्थपूर्ण आहेत एवढे खरे.अशा विविधरंगी अर्थपूर्ण शब्दांमुळे अधिकच खुलणाऱ्या भाषासौंदर्याला म्हणूनच मनापासून दाद द्यावीशी वाटते.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ अगा वैकुंठीच्या राया॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ अगा वैकुंठीच्या राया॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

(॥ विठ्ठल नामाचा रे टाहो ॥)

‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले मजलागी जाहले तैसे देवा ‘ म्हणणारी कान्होपात्रा !

समस्त संतजन माथ्यावर काही ना काही दुःखभार घेऊनच चालत होते .पण कान्होपात्रेची व्यथा आपण कधी समजू तरी शकू का , असं वाटतं .गणिकेच्या पोटी जन्माला आल्यानं कुणाचं तरी प्रियपात्र होऊन रहाणं हा भोग तिला अटळ होता .पण मंगळवेढ्याच्या पवित्र भूमीत तिला जन्माला घालून परमेश्वरानं तिला जणू उःशापच दिला .ती वारकर्‍यांसमवेत पंढरपूरला आली नि तिला तिचा अलौकिक प्रियतम गवसला .

पण तिची वाट तर पतित म्हणवल्या गेलेल्या हीन जातीच्या भक्तांपेक्षा दुष्कर होती .कारण तिच्या देहावरचा तिचा अधिकारही मुळी समाजाला मान्य नव्हता .जर तिनं बिदरच्या बादशहाची आज्ञा मानली असती ,तर तिच्या पायाशी सारी सुखं आली असती .पण तिच्या मनात त्या सावळ्याच्या अलौकिक प्रेमाचा दीप उजळला होता .त्यापुढं तिला आता देहभाव, देहलावण्य ,देहसज्जा काहीच नको होतं .पण तिचा हा आकांत ऐकणारं तरी कोण होतं ? एका त्या पतितपावनाचाच काय तो तिला भरवसा वाटत होता .पण त्याच्याकडे जाण्याची वाट तरी सोपी कुठं होती ? एक विठ्ठलाशिवाय कुणाचाही अधिकार न मानणारं तिचं मन व तिचं शरीर जेव्हा वासनेची शिकार बनायची वेळ आली तेव्हा तिला सुटकेचा कोणताही मार्ग उरला नाही .आता देहत्याग करुन त्याच्या रुपात विलीन होऊन जाणं हेच तिच्या हातात होतं .तिथवरचा प्रवास धैर्यानं तिलाच करायचा होता… एकटीला. पण तेही सर्वस्वी आपल्या हातात कुठं असतं ? त्यानं बोलवावंच लागतं .मग त्याला हाक घालायची .

कान्होपात्रेचा अवघ्या आठ ओळींचा अभंग.. .संगीत संत कान्होपात्रा या नाटकाकरता मा.कृष्णराव व विनायकबुवा पटवर्धन यांनी भैरवीत बांधलेली अप्रतिम चाल. बालगंधर्वांनी गाऊन अजरामर केलेलं हे पद म्हणजे मूर्तीमंत आर्तता आहे .पूर्ण होऊन पूर्णात विलीन होण्याचा हा भाव ……  अशावेळी त्याला बाकीचं काहीच सांगावं लागत नाही … काही मागणं, काही मनीषा उरलेलीच नाही ….. फक्त त्याला हाक मारायची आणि त्यानं ये म्हणायचं …..

अगा वैकुंठीच्या राया

अगा विठ्ठल सखया

अगा नारायणा

अगा वसुदेवनंदना

अगा पुंडलिक वरदा

अगा विष्णू तू गोविंदा

अगा रखुमाईच्या कांता

कान्होपात्रा राखी आता ॥

लौकिक जगापेक्षा मौल्यवान असं वैकुंठाचं सुख मला भोगायचंय .तुझं सख्यत्व अनुभवायचंय .नरदेह सोडून नारायणत्वात मिसळून जायचंय .वसुदेवनंदनाला भेटायचं आहे . पुंडलीकासारखा वरप्रसाद हवा आहे .तूच सर्वपालक श्रीविष्णू आहेस.  तूच गोविंद आहेस .रखुमाईकरता सारं सोडून आलास तसं मलाही तुजकडे बोलाव ! —-

— त्याच्या सगळ्या नावांनी त्याला हाक मारुन शेवटी फक्त एका ओळीत मागणं मागितलंय की बाकी काही तुला सांगायला नकोच .माझं सत्व राख !

तिला समाजानं पतितेचं स्थान दिलं होतं , तिचं कर्म न पहाता .जन्मानं असो वा कर्मानं , पतिताला जेव्हा स्वतःला त्यातून बाहेर पडायची इच्छा होते, तेव्हा तो हात पुढे करतोच. कोणत्याही संकटात त्याला आर्ततेनं केलेला धावा ऐकू जातोच .

आपणही तेवढंच करायचं .त्याला मनापासून हाक मारायची …

अगा वैकुंठीच्या राया !……

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ छत्रपती शिवाजी महाराज — एक उत्तम “व्यवस्थापन गुरू” ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ छत्रपती शिवाजी महाराज — एक उत्तम “व्यवस्थापन गुरू” ☆ श्री राजीव गजानन पुजारी

“छत्रपती शिवाजी महाराज” हे नुसतं नाव जरी वाचलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते फक्त जाणते राजे नव्हते तर, मराठी माणसासाठी ते दैवत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक शासक नव्हते तर तर ते उत्तम ‘ मॅनेजमेंट गुरु ‘ देखील होते. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. त्यांना प्रचंड दूरदृष्टी होती आणि त्या काळात त्यांनी दूरदृष्टीने भविष्याचा विचार करून विविध योजना आखल्या. त्यांनी दिलेल्या व्यवस्थापन तंत्रातील मुद्दे खालील प्रमाणे आहेत :

१)कुशल कार्यबळ तयार करणे 

चांगले काम करणारे आणि कामासाठी कायम उत्सुक असणारे कर्मचारी तयार करणे हे कुठल्याही टीम लीडरसाठी एक कसब असते. त्याला स्वतःच्या कामातून स्वतःच्या सहकाऱ्यांसाठी आदर्श घालून द्यावा लागतो. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांमध्ये स्वराज्य स्थापनेची तीव्र इच्छा निर्माण केली. त्यांच्या मनात मातृभूमीविषयी आदर आणि प्रेम जागृत केले.

२) पायाभूत सुविधा उभारणे

कुठलाही उद्योग उभा करताना मूलभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक असते. महाराजांनी त्या काळी सुद्धा पायाभूत सुविधा उभारण्याला खूप महत्व दिले.— स्वराज्यात अनेक ठिकाणी नद्या व कालवे अडवून धरणे बांधली, वाहतुकीसाठी घाटरस्ते बांधले, शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण करवले, शेतीमधून रोजगारनिर्मिती केली.

३) अर्थव्यवस्थापन

कुठल्याही व्यवसायासाठी आर्थिक भांडवल अतिशय आवश्यक असते. महाराजांनी त्यांच्या काळात उत्तम आर्थिक व्यवस्थापन करत मोठमोठ्या मोहीम यशस्वी केल्या. एखाद्या मोहिमेतून आर्थिक फायदा झाला की ते लगेच गुंतवणूक करत असत. नवीन किल्ला बांधणे व तिथल्या आसपासच्या परिसराचा विकास करणे, मुलुखाचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून तिथे पायाभूत सुविधा उभारणे, शेतीला उत्तेजन देणे तसेच इतर पूरक व्यवसायांना चालना देणे ह्यात ते गुंतवणूक करत असत. आपल्या स्वराज्यातील मुलुख विकसित झाला की स्वराज्याच्या महसुलात आपसूकच वाढ होणार आहे हे सूत्र त्यांना माहिती होते, आणि म्हणून ते योग्य ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करत असत.

४) सतत नव्या गोष्टी शिकण्याची तयारी

कुठल्याही माणसाला जर प्रगती करायची असेल तर त्याने सतत जगाबरोबर चालणे आवश्यक असते. त्यामुळे सतत नवे काहीतरी शिकण्याची इच्छा असणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे ह्यामुळे माणूस प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतो. शिवाजी महाराज सुद्धा सतत नव्या युद्धनीतींबद्दल जाणून घेत असत आणि त्या अमलात आणण्याचा प्रयत्न करत असत. ते वेळोवेळी विविध प्रकारच्या शस्त्रांबद्दल जाणून घेत असत आणि त्यांच्या सैनिकांकडे चांगली व योग्य शस्त्रे असावीत ह्यावर त्यांचा कटाक्ष होता.

५)दूरदृष्टी

जवळजवळ संपूर्ण भारत मुघल आणि इतर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेला असताना महाराजांनी भविष्याचा विचार करून स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि अखंड कष्ट करून ते स्वप्न पूर्ण केले. स्वतंत्र भारताचे स्वप्न बघून ते स्वप्न त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील रुजवले. तसेच त्यांच्या शासनकाळात मोक्याच्या ठिकाणी गड किल्ले बांधणे, परकीय शत्रूवर बारीक नजर ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग ह्यासारखे गड बांधणे, आरमार उभारणे, परकीय लोकांशी डोळ्यात तेल घालून चर्चा आणि व्यवहार करणे ह्यासारखी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती.

६) जल व्यवस्थापन

स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यात पाण्याचा साठा असणे महत्वाचे होते. त्यामुळे पाण्याचे संधारण आणि साठा साधारण वर्षभर पुरेल अशी उपाययोजना महाराजांनी केली होती… म्हणजे चुकून गडावर हल्ला झाला तरी आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा गडावर आवश्यक तेवढा पाणीसाठा कसा राहील ह्याची काळजी घेतली गेली होती.

७) पर्यावरण व्यवस्थापन

पर्यावरण आणि माणूस ह्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व महाराजांनी ओळखले होते आणि म्हणूनच स्वराज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास त्यांनी होऊ दिला नाही. त्यांच्या मुलुखात असलेल्या वनराईची कायम काळजी घेतली गेली. तसेच गडकोटांच्या परिसरात वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा ह्या वृक्षांची लागवड केली होती. आरमार बांधण्यासाठी साग आणि शिसवीचा वापर केला जात असे.

८) रायगड एक सुनियोजित गांव 

रायगड ही नुसतीच स्वराज्याची राजधानी नव्हती. तर ते त्या काळात योजनाबद्ध रीतीने बांधण्यात आलेले सुनियोजित गांव होते. तसेच त्या ठिकाणचा बाजार म्हणजेच मार्केट देखील खूप मोठे होते व योग्य नियोजन करून बांधण्यात आले होते.

९)प्रशासकीय कौशल्ये

महाराजांच्या शासनकाळात करवसुली होत असे आणि कर गोळा करण्यासाठी त्यांनी माणसे नियुक्त केली होती. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज मिळत असे. त्यांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळ असे, जे राज्यकारभार चालवत असे. शिवाय त्यांच्या दरबारात परराष्ट्र धोरण सांभाळण्यासाठी ‘ डबीर ‘ हे स्वतंत्र मंत्रिपद होते. तसेच त्यांचे स्वतःचे सक्षम गुप्तहेर खाते होते. ह्यातून महाराजांच्या प्रशासकीय व्यवस्थापनाची झलक बघायला मिळते.

१०) लोकशाही

महाराजांच्या काळात हुकूमशाहीची चलती होती. लोकशाहीचा विचार देखील कुणाच्या डोक्यात आला नव्हता. पण महाराजांनी त्यांचे सरकार जनतेच्या कल्याणासाठी चालवले. त्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली.

११)आरमार

शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते ज्यांनी नौदल किंवा आरमार उभारले. त्यांच्याकडे ३०० शिपयार्ड (जहाजे बांधणे व दुरुस्त करणे यासाठी असलेला कारखाना), अनेक जलदुर्ग, शेकडो लढाऊ नौका (गलबत) होत्या. जवळजवळ ३०० मैल सागरकिनाऱ्यावर त्यांचे बारीक लक्ष होते. म्हणूनच महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे म्हटले जाते.

१२)गनिमी कावा

शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याला हरवण्यासाठी महाराजांनी गनिमी कावा शोधून काढला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही उक्ती त्यांनी वारंवार खरी करून दाखवली आणि बेसावध शत्रूला गनिमी काव्याने वारंवार धूळ चाटवली. त्यांच्या ह्या गनिमी काव्याचा ‘ युद्धनीती ‘ म्हणून आजही जगभरातील सैन्यांद्वारे अभ्यास केला जातो.

१३) बदलीचे धोरण

महाराजांच्या शासनकाळात किल्लेदार किंवा हवालदार ह्यांची दर तीन वर्षांनी, सरनौबत ह्यांची चार

वर्षांनी, कारखानीस ह्यांची पाच वर्षांनी, तसेच सबनीस ह्यांची चार वर्षांनी बदली होत असे. ह्यामुळे भ्रष्टाचार आणि इतर गैर कृत्यांना आळा बसत असे. तसेच देशमुख, पाटील , देशपांडे, कुलकर्णी, चौघुले ह्यांना जवळच्या किल्ल्यावर न ठेवता लांबच्या गावची वतनदारी दिली जात असे. हा सुद्धा त्यांच्या मॅनेजमेंटचाच एक भाग आहे.

१४) कामाचा मोबदला देण्याची पद्धत

मॅनेजमेंटमध्ये कामाचा मोबदला ही खूप महत्वाची गोष्ट आहे. महाराजांची कामाचा मोबदला देण्याची पद्धत सुद्धा विशिष्ट होती. सेवकांची वेतने ठरवल्याप्रमाणे होत असत. पण एखाद्याने बक्षीस मिळवण्यालायक काही महत्त्वाचे किंवा चांगले काम केले तर त्याला वेतनवाढ  दिली न जाता, काही रक्कम बक्षीस म्हणून दिली जात असे.

१५) स्वच्छता व्यवस्थापन

महाराजांनी किल्ले बांधताना त्या काळात शौचकुपांची व्यवस्था केली होती. त्या काळी बांधलेली ड्रेनेज सिस्टीम बघून आश्चर्य वाटते. पहाऱ्यावर असणाऱ्या सैनिकांना नैसर्गिक विधींसाठी लांब जायला लागू

नये ,त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी चोख व्यवथा करून घेतली होती.

— वरील सर्व बाबींकडे बघून असे वाटते की महाराजांनी दिलेल्या व्यवस्थापन तंत्राचे जर आपण काटेकोरपणे पालन केले तर नक्कीच आपला देश सुजलाम् सुफलाम् होईल.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सी.सी.टि.व्ही. आणि बुट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “सी.सी.टि.व्ही. आणि बुट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

तो भुंकण्याचा आवाज आला, आणि घरातली सोडून सगळ्या मोकाट कुत्र्यांना समजलं की आपल्याला एकत्र बोलवलं आहे.

गल्लीत घरांच्या, झाडांच्या आडोश्याला असलेली, कडक उन्हापासून गारवा मिळावा म्हणून गटारीच्या पाण्यात बसलेली, किंवा चारचाकी गाडीच्या सावलीत विसावलेली सगळी कुत्री अंग झटकत, शेपटी, मान, कान हलवून, पुढचे पाय शक्य तेवढे पुढे, आणि मागचे पाय शक्य तितके मागे घेत आळस झटकून तयार झाली.

अस काय झालं? की सगळ्यांना बोलवावं  लागतंय याच विचारात ती सगळी आवाजाच्या दिशेने निघाली.

कोणत्याही वेळी सगळ्यांना सहज पळता यावं म्हणून मुद्दामच मोकळ्या पटांगणात झाडाखाली सगळे जमले होते. वेळ सुद्धा भर दुपारची निवडली होती. कारण उन्हामुळे शक्यतो कोणी माणसं बाहेर पडत नाहीत.

जवळपास सगळे आले आहेत याची खात्री झाल्यावर त्यातील वयस्कर कुत्र्याने बोलायला सुरुवात केली.

काल एका कुत्र्याने एका गावात बंगल्यातून बुट पळवल्याच सी.सी.टि.व्ही. मुळे सगळ्यांना समजलं. आणि त्याची बातमी झाली.

एक तरूण कुत्रा – वा मस्त……. त्यामुळे आपली वेगळी बातमी आली…… नाहीतर आजपर्यंतच्या सगळ्या बातम्यांमध्ये आपल्याला मोकाट, भटकी असं म्हणत फक्त भटकतांनाच दाखवलं आहे.

वयस्कर कुत्रा – प्रश्न तो नाहीच. आता आपण बंगल्यातले बुट पळवायला लागलो म्हणून आपलं जगणं अजून कठीण होणार आहे.

आता हि बातमी आणि ते सी.सी.टि.व्ही. मधे झालेलं शुटिंग मोबाईल मुळे गावागावात, गल्ली गल्लीत पसरेल. ज्याने बुट पळवला त्याला तर मारतीलच, पण नाहक इतर कुत्र्यांना सुध्दा मार पडेल.

अरे……. एखादा माणूस चोरी करतांना सापडला तर त्याला लोक बेदम मारतात. वर म्हणतात कुत्र्यासारखं मारलं म्हणून.

आता आपल्याला तसंच मारल्यावर काय म्हणतील ते……… आहे काही बोलायला जागा…….

अरे हि माणसं सुद्धा चोरी करतांना चेहरा दिसू नये म्हणून तोंड झाकून घेतात. आपलं काय?……. आपलं सगळं उघडंच असतं, आणि आपणही उघड्यावर असतो.

मी म्हणतो आपण बंगल्यात जायचंच कशाला? तिथे त्यांची पाळलेली कुत्री असतातच. अजून आपली भर कशाला?… बऱ्याच बंगल्यावर कुत्र्यापासून सावध रहा अशी पाटी असते. जास्त चांगलं समजावं म्हणून कुत्र्याच्या तोंडाच चित्र सुध्दा असतं. मग आपण समजायला पाहिजे नां…………

बरं बुट पळवायचा तर एखादं साधं घर बघितलं असतं. कुत्रा बुट पळवतोय म्हटल्यावर घरातल्या किंवा आजुबाजूच्या कोणी बघितलं असतं तर कदाचित दुसरा बुट अंगावर भिरकावला असता. आता बंगल्यातूनच बुट पळवला म्हटल्यावर आपल्याला दिसतील तिथून दिसतील तसे पकडण्याचा बुट निघाला तर…… मग काय करणार…

आधीच आपलं जगणं कुत्र्याचं त्यात ही जास्तीची धावपळ कशी करणार……. लोकं उरलं सुरलं आपल्याला खायला टाकतातच. किंवा त्यांनी टाकल्यावर आपण ते खायला जातो. मग बुटाचा हव्यास कशासाठी? एक बुट पळवल्यामुळे लोक आता आपल्याला जोड्याने मारतील.

एरवी आपल्या भागात कोणी अनोळखी आल्यावर आपण भूंकतो, त्यामुळे लोकं सावध होतात. आता आपल्या भूंकण्याने लोक सावध होतील, पण अगोदर काठी हातात घेऊन त्यांचे बुट जागेवर आहेत ना हे बघतील.

आधीच माणसांमध्येच माणसं पळवापळवीच्या बातम्या येत आहेत. त्यात आपण हे बुट पळवापळवीचे उद्योग करायचेच कशाला? आता कोणी इतरांनी बुट पळवला तरी आपलंच नांव येईल. त्यामुळे आता पुढील काही दिवस काळजी घ्या. असे म्हणत सगळे परत आपापल्या आडोशाला जायला निघाले.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ आता जाग बा विठ्ठला॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ आता जाग बा विठ्ठला॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

(॥ विठ्ठल नामाचा रे टाहो ॥)

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ! 

संत जनाबाई या चित्रपटातली ही भूपाळी रचली ‘आधुनिक संत ‘ ग.दि .माडगूळकर म्हणजे गदिमांनी .सुधीर फडके म्हणजे बाबूजींचं संगीत आणि स्वरही त्यांचाच. विठ्ठल, चित्रपट ,गदिमा ,बाबूजी अशी मराठी माणसाची सगळी प्रेमं एकाठायी एकवटलेल्या गीताची माधुरी अवीट असणारच ! 

१९४९ साली हा चित्रपट आला .१ जून १९२९ ला स्थापन झालेल्या प्रभात कंपनीची तुतारी चांगलीच दुमदुमू लागली होती .गदिमा व बाबूजी ही जोडीही गीत संगीतामुळं लोकप्रिय होत होती .पण दुसर्‍या महायुद्धाच्या काळात कच्च्या फिल्मच्या तुटवड्यामुळे चित्रपटनिर्मितीला परत उतरती कळा लागली .त्यातच हिंदी चित्रपटांची स्पर्धा सुरु झालेली .त्यात टिकून रहाण्याकरता प्रभातनंही अनेक हिंदी चित्रपट काढले .प्रभातचा शेवटचा चाललेला मराठी चित्रपट म्हणजे ‘ संत जनाबाई .’ 

गदिमांनी चित्रपटांकरता अनेक अभंग लिहिले .अनेकदा ज्या संतावरचा तो चित्रपट आहे त्याच्या रचनांव्यतिरिक्तही काही रचना चित्रपटाची गरज म्हणून हव्या असत . गदिमांच्या या रचना पाहिल्या तर ते त्या संतांचेच अभंग वाटावेत इतक्या त्या शब्द व भाव यांनी संतरचनांच्या जवळ जातात .

प्रभातसमयो पातला ,आता जाग बा विठ्ठला ! 

विठ्ठलाच्याच निद्रिस्त रूपासारखी भासणारी निशा सरते आहे .. आकाशाचा निळसर काळा पडदा हळूहळू उतरतोय नि तिथं उगवतीचा लालिमा फुटायच्या बेतात आहे .. चंद्रभागेच्या काठची वाळू ओलसर झाली आहे नि तिचं पाणी सुटलेल्या पहाटवार्‍यांनी हळूहळू हेलकावे घेतं आहे ..वाळवंटात देवळाच्या प्रांगणात विठ्ठलाचे भक्तगण जमलेत. आत तो त्रिभुवनाचा स्वामी निद्रेत आहे .खरंतर तो अहर्निश जागृत आहे म्हणूनच तर हे विश्व चालतंय ..आपण त्याला आपल्या त्रासापासून थोडा काळ मुक्ती देतो ! मग आता परत आपली गार्‍हाणी ऐकवण्याकरता त्याला सामोरं जायचं तर त्याला आधी हळुवारपणे विनंती करायला हवी ! मग त्याच्या अंगणात दाटी करायची .टाळ मृदंगाचा दंगा न करता हलकेच वीणेच्या एकतारीच्या साथीनं ,हलक्या, मऊ आवाजात भूपाळ्या गायच्या ..जणू देव-देवांगना  अन् नारदादि दिग्गज आपल्यासाठी गाताहेत असं ते गायन त्याला कर्णसुखद वाटायला हवं ! डोळे उघडताच त्याला दिंड्या पताकांचे धुमारे दृष्टीस पडायला हवेत ..

…. आणि मग त्याला हलकेच सादावायचं , जाग बा जगजेठी …जाग रे भक्तश्रेष्ठी ..तुझे कमलनयन कधी उघडतात अन तुझ्या  कृपादृष्टीचं चांदणं कधी बरसतं याकरता आमची दिठी तहानली आहे ..हजारो नेत्र टक लावून वाट पहात आहेत तुझ्या दर्शनाची ! आमच्या वाणीतून येणारं तुझं नाम ऐकून आमचेच कान धन्य होत आहेत ..आम्ही दीन दुबळे भक्त , तुला अर्पण तरी करणार ! तुझ्या तेजाला ओवाळता येईल अशा ज्योतीतरी कुठून आणणार ! घे ,आमच्या प्राणांनीच आरती करतोय आणि आमच्या नेत्रज्योतींचाच  काकडा शिलगावलाय ….स्वीकार ही आरती आणि लवकर आम्हाला तुझं श्रीमुखकमल दिसूदे !  कृपा कर ,दर्शन 

दे , जाग पांडुरंगा ,जाग बा विठ्ठला !!

 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इस्रोची तिसरी चंद्रमोहीम – चंद्रयान ३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

इस्रोची तिसरी चंद्रमोहीम – चंद्रयान ३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे. १५ ऑगस्ट १९६९ रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची कार्ये देशभरातील विविध केंद्रांमधून संचलीत होत असतात.

प्रत्येक मिशनला लागणाऱ्या संवेदकांचा विकास हा स्पेस एप्लीकेशन सेंटर अहमदाबाद येथे होत असतो तर  सॅटेलाईटची रचना, विकास, जुळणी आणि चाचण्या बंगलोर  येथील यु.आर. राव  उपग्रह केंद्रात केल्या जातात. प्रक्षेपकांचा विकास हा  विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुअनंतपुरम् येथे केला जातो तसेच उपग्रहांचे प्रक्षेपण  श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रातून केले जाते. बरीचशी महत्त्वाची प्रशासकीय कामे  व विदा व्यवस्थापनेची कामे  हसन, भोपाळ आणि हैदराबाद येथून केली जातात.

इस्रोने आजपर्यंत बऱ्याच अंतराळ यंत्रणा विकसीत केल्या असून, सर्वात महत्त्वाच्या INSAT प्रणालीचा (भारतीय राष्ट्रीय उपग्रह यंत्रणा) उपयोग मुख्यतः दूरसंचार, दूरदर्शन  प्रसारण, हवामानशास्त्र व नैसर्गिक आपत्ती बाबत पूर्व सूचना देण्यासाठी होतो.

  • 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या सहकार्य ने आपला‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.
  • 1980 साली पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानावर आधारितSLV-3 प्रक्षेपकाद्वारे‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. 
  • 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वीरित्या पार पडली
  • ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि खूप कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
  • २२जुलै २०१९ रोजी इस्रोने चंद्रयान-२ द्वारे चंद्राच्या उत्तर ध्रुवाजवळ अवतरणाचा प्रयत्न केला, पण कांही तांत्रिक अडचणींमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही.—

— आता याच मोहिमेची अनुसरण मोहीम म्हणून इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वकाही व्यवस्थित पार पडले तर जुलै २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात LVM-3 या प्रक्षेपकाद्वारा सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-३ चे प्रक्षेपण केले जाईल. ऑगस्ट २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात यान चंद्राच्या उत्तर ध्रुवानजीक उतरेल.

चंद्रयान-३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्युल (LM), प्रॉपल्शन मॉड्युल (PM) आणि रोव्हर यांचा समावेश आहे. प्रॉपल्शन मॉड्युलचे मुख्य काम म्हणजे लँडर मॉड्युलला अगदी प्रक्षेपकापासून विलग झाल्यापासून ते चंद्राभोवतीच्या १०० कि. मी. वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेपर्यंत नेणे हे आहे. त्यानंतर प्रॉपल्शन मॉड्युल लँडर मॉड्युलला स्वतःपासून विलग करेल. नंतर लँडर मॉड्युल थ्रस्टर्सच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. त्यानंतर रोव्हर लँडर मॉड्युलपासून विलग होऊन १४ पृथ्वी दिवसांपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर विहार करून महत्वाची वैज्ञानिक माहिती गोळा करून ती पृथ्वीकडे पाठवेल. प्रॉपल्शन मॉड्युलमध्ये मूल्यवर्धनासाठी चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय(spectral) आणि ध्रुवमितीय (polarimeyric) मोजमापांचा अभ्यास करण्यासाठी स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) हा वैज्ञानिक अभिभार आहे, जो लँडर मॉड्युल विलग झाल्यावर कार्यान्वित केला जाईल. या मोहिमेचा उद्देश अंतर्ग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे व त्याचे प्रात्यक्षिक करणे हे आहे. लँडरमध्ये चंद्राच्या विशिष्ठ जागेवर हळुवार उतरण्याची (soft landing) व रोव्हरला चंद्रभूमीवर तैनात करण्याची क्षमता आहे. त्यानंतर रोव्हर त्याच्या वाटचालीदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाचे जागेवरच रासायनिक विश्लेषण करेल. 

लँडर व रोव्हरवर चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक अभिभार आहेत. ते पुढील प्रमाणे :

अ) लँडर वरील अभिभार –

१) चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE)- हा अभिभार औष्मिक प्रवाहकता (thermal coductivity) व तापमान यांची मोजणी करेल.

२) इन्स्ट्रुमेंट फॉर ल्यूनार सेईस्मिक ऍक्टिविटी (ILSA)- हा अभिभार अवतरणाच्या जागेभोवतालची भूकंपशिलता (seismicity) मोजेल.

३)लँगमुईर प्रोब (LP)- हा प्लाविकाची (plasma) घनता व त्याच्यातील फेरफार यांचा अंदाज लावेल.

४)नासाकडून प्राप्त पॅसीव लेसर रेट्रोरिफ्लेक्टर ऍरे – हा अभिभार चंद्राचे लेसर श्रेणीय अध्ययन करेल.

ब ) रोव्हर वरील अभिभार – रोव्हर उतरलेल्या जागेची मुलद्रैविक संरचना प्राप्त करण्यासाठी रोव्हरवर अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आणि लेसर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रॉस्कोप हे दोन अभिभार आहेत.

चंद्रयान ३ मोहिमेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत :

१)चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि हळुवार उतरण्याचे प्रात्यक्षिक करणे.

२)चंद्रावर रोव्हरच्या वाटचालीचे प्रात्यक्षिक करणे.

३)चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करणे.

ही उद्दिष्टे गाठण्यासाठी लँडरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जसे की… 

१)उर्ध्वतामापक (Altimeters)- लँडरवर लेसर व रेडिओवारंवारीता आधारीत उर्ध्वतामापक आहेत.

२)वेगमापक (velicitymeters)- लँडरवर लेसर डॉप्लर वेगमापक व लँडर क्षैतिज (horizontal) वेग छायाचित्रक (camera) आहेत.

३)जडत्व मापन (inertial measurement)- लँडरवर एकात्मिक लेसर घुर्णदर्शी आधारित (gyrobased) जडत्व संदर्भयन् आणि प्रवेगमापक (accelerometer) आहेत.

४)प्रणोदन प्रणाली (propulsion system)- लँडरवर ८०० N थ्रोटलेबल द्रव इंजिन, ५८ N ऍटीट्युड थ्रूस्टर्स आणि थ्रोटलेबल इंजिन कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स आहेत.

५)दिक् चलन, मार्गदर्शन व नियंत्रण (navigation, guidance and control)- लँडरवर समर्थित अवतरण विक्षेपमार्ग (powered descent trajectory) आराखडा आणि संबंधित सॉफ्टवेअर घटक आहेत.

६)धोका शोधणे आणि टाळणे (Hazard detection and avoidance)- लँडरवर धोका शोधक आणि वर्जक छायाचित्रक आणि प्रक्रिया अज्ञावली (processing algorithm) आहेत.

७)अवतरण पाद यंत्रणा (Landing leg mechanism) यामुळे हळुवार अवतरणाला मदत होते.

पृथ्वीच्या परिस्थितीत वर सांगितलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी लँडरच्या अनेक विशेष चाचण्या नियोजित करून यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्या म्हणजे …. 

१)एकात्मिक थंड परीक्षण (Integrated cold test)- एकात्मिक संवेदक आणि दिक् चलन कार्यक्षमता परीक्षणासाठी परीक्षण मंच म्हणून हेलिकॉप्टर वापरून ही चाचणी केली गेली.

२)एकात्मिक उष्ण परीक्षण (Integrated hot test)- संवेदक(sensors), प्रवर्तक (actuators) व NGC (navigation, guidance and control) यांसह बंद वळसा कार्यक्षमतेच्या परीक्षणासाठी (closed loop performance test) परीक्षण मंच म्हणून टॉवर क्रेनचा वापर करून ही चाचणी केली गेली.

३)अवतरण पाद यंत्रणा परीक्षण (landing leg mechanism test)- चंद्र सदृष्य पृष्ठभाग तयार करून विविध अवतरण परिस्थितीत ही परीक्षणे केली गेली.

चंद्रयानाचे वजन पुढीलप्रमाणे असणार आहे:…. 

१)प्रणोदन कक्ष (propulsion module)-२१४८ कि.ग्रॅ.

२)अवतरण कक्ष (lander module)-१७२६ कि.ग्रॅ.

३) बग्गी (rover)- २६ कि.ग्रॅ.

    लँडर व रोव्हरचे अपेक्षित आयुष्य १४ पृथ्वी दिवस असणार आहे.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कळावे… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ कळावे… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

 

पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो  “कळावे”

“कळावे” याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही.

खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा उदाहरणार्थ:

 

१) प्रिय, 

तू ज्या रस्त्याने जात आहेस

 तो खूप डेंजर आहे. 

वळावे…….. 

 

२) मित्रा, 

तुझ्या प्रेयसीचा भाऊ

तुला फटकवायला येत आहे. 

पळावे…… 

 

३) प्रिय, 

तुझ्या आवडीच्या कांदा भज्यासाठी

अडीच किलो कांदे पाठवित आहे. 

तळावे…… 

 

४) प्रिय मित्रा, 

मी फोर व्हीलर घेतली

जळावे…… 

 

५) प्रिय, 

तुझ्यासाठी स्पेशल गहू पाठवित आहे. 

दळावे…… 

 

६) प्रिय आई, 

तुला नको असलेली मुलगी घरात सून म्हणून आणणार आहे. 

छळावे…… 

 

७) मित्रांनो, 

इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला 

कळावे…… 

आणि तुम्ही हसुन हसून 

लोळावे….. 

मेसेज आवडला तर इतरांच्या नंबर वर

वळवावे…. 

रिपीट झाला असेल तर 

वगळावे…. 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डॉक्टर काका सांभाळा !” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

 🌸 विविधा 🌸

☆ “डॉक्टर काका सांभाळा !” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याही दुखण्या खुपण्यावर तेच उपचार करायचे.  फारसे स्पेश्यालिस्ट त्यावेळी नसायचे अन त्याची फार मोठी गरज भासल्याच कांही आठवत नाही. ऑपरेशन वगैरे साठी साधारणपणे जिल्ह्याच्या गावी जावे लागत असे. तरीही फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते चालत असे. फॅमिली डॉक्टर म्हणजे काका मामाच !  आम्ही त्यांना डॉक्टरकाकाच म्हणायचो. डॉक्टरना मारणे तर दूरच पण सगळे डॉक्टरकाकांच्या नजरेच्या धाकात असायचे. डॉक्टरांचा सूरही नेहमी आश्वासक, चेहरा हसरा, वाणी मधुर, कधी कधी आम्हा मुलांना दटावणारी सुद्धा !  पण हे खूपच छान कौटुंबिक संबंधांचं नातं असायचं. अगदी आम्हाला मुलं होई पर्यंतच्या वेळेपर्यंत हे असं चांगल्या कौटुंबिक संबंधांचं वर्तुळ होतं. डॉक्टरांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नव्हता. कांही वाईट घडल्यास डॉक्टरांना नव्हे दैवाला दोष दिला जायचा.

असे छान दिवस चालले होते. आम्ही मोठे झालो आमचे मित्रही डॉक्टर झाले. आणि एके दिवशी आमच्या डॉक्टर मित्राकडून ती बातमी समजली. कोर्टाच्या एका निकालाने वैद्यकीय सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याखाली आणली.  खरं म्हणजे तिथंच या सर्व संबंधाची फाटाफूट झाली असावी.  कौटुंबिक नाती कायदेशीर झाली. विश्वास जाऊन कायदा आला.. समजुतदारपणा जाऊन कोर्ट कचे-या आल्या. आपली ट्रीटमेंट बरोबर होती हे कायद्याने सिद्ध करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आली. त्यासाठी कायदेशीर रेकॉर्ड्स आली. मग ऑपरेशन पूर्व तपासणी ऑपरेशन नंतर  तपासणी, ट्रीटमेंट रेकॉर्ड वगैरे सर्व सर्व आवश्यक ठरू लागलं. त्यासाठी स्टाफ, रुग्णालयांची अद्ययावत कार्यालये,, असिस्टंट्स, लॅबोरेटरीज वेगवेगळ्या टेस्ट्स, अद्यायावत यंत्रसामुग्री, मल्टीस्पेशालिटी  हॉस्पिटल्स, कोट्यावधीची यंत्रसामुग्री आणि उपकरणांसाठी आवश्यक म्हणून वातानुकूलन यंत्रणा, या सर्वांचा देखभाल खर्च आणि त्या साऱ्यांसाठी लागणारा प्रचंड पैसा. वाढती महागाई व वाढलेले स्टॅंडर्ड ऑफ लिविंग  या सर्वाना आवश्यक असणाऱ्या प्रचंड पगार व मानधनाच्या रकमा. एक एक वाढतच गेले. आणि शेवटी या सर्व रकमांची भरपाई करण्याची जबाबदारी पेशंटवर !

एवढ्या प्रचंड रकमा भरताना पेशंट सुद्धा मग त्या पैशातून पंचतारांकित सुविधा मागू लागले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून यांना आकर्षित करण्यासाठी मार्केटींग यंत्रणा, कमिशन्स. एवढ्या मोठ्या रकमा भरताना घडून येणारे कटू प्रसंग. मग आधी पैसे भरा, डिपॉझिट भरा, मगच ऍडमिट असा ट्रेंड सुरु झाला.  पेशंट साठी वापरल्या गेलेल्या मटेरियलच्या  हिशोबात सुरुवातीला योग्य वाटणाऱ्या हॉस्पिटलना सुद्धा आकार वाढल्यावर स्टाफवर  कंट्रोल ठेवता येईनासा झाला. मग स्टाफ कडून होणारे गैर प्रकार, कधी कधी डॉक्टर सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करू लागले कारण प्रशिक्षित स्टाफ दुर्मिळ काय करणार ?  त्यातूनच नव्या नव्या प्रकारचे रोग आणि लोकसंख्या वाढीच्या विस्फोटामुळे वाढणारी पेशंटची संख्या. हा वाढीचा फुगा फुगतोच आहे. या सर्वात डॉक्टरांचा दोष कुठे ?  पण जबाबदारी मात्र डॉक्टरांवर !  व्यवसाय वाढला कि गैरप्रकार वाढतात.  जसं सरकारचा व्यवसाय सर्वात मोठा म्हणून त्यात गैरप्रकार सर्वात जास्त कारण कंट्रोल ठेवणे अवघड.  नंतर काही खासगी हॉस्पिटलची अवस्थाही सरकारी हॉस्पिटलसारखी झाली पण पैसे मात्र सरकारी हॉस्पिटल पेक्षा प्रचंड जास्त. या दुष्टचक्राची व्याप्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें आरोग्यमंडळा अशी होत गेली.

आता या सर्वांचेच दुष्परिणाम दिसू लागलेत. व्यापारी आणि ग्राहक हा नाते संबंध सतत लुटणारा आणि लुटला जाणारा असेच समीकरण फार पूर्वीपासून मनावर ठसवले गेले आहेच, त्यात डॉक्टर व पेशंट या नातेसंबंधांची भर  पडली. डॉक्टरांचे अनुभव जसे खरे तसेच पेशन्टचेही अनुभव खोटे नव्हते. यातूनच वाढती आहे दरी.

डॉ अरुण लिमयेचें  ‘क्लोरोफॉर्म ‘ वाचले आणि आम्हीच तोंडात बोटे घातली  हे असं असतं ?  खरं  तर त्याच वेळेला सरकार व डॉक्टर्स यांनी अशा गैरप्रकारांना कसा आळा घालता येईल ? याचा विचार केला असता तर आज चाळीस वर्षानंतर वेगळेच चित्र दिसले असते. दुर्दैवाने तसे घडले नाही.  त्यातून डॉक्टर हॉस्पिटल्स यांचे गैरप्रकार कमी न होता वाढतच गेले.  समाजातील दोन घटकांमधील दरी वाढतच गेली.

समाज मनातील संशयाच्या भुताने आज उग्र रूप धारण केले आहे. कायदा व कोर्ट हे कोणत्याही गोष्टीचं समाधानकारक उत्तर असू शकत नाही. कायद्याला भावना नसतात पण माणसांना असतात. कोर्टामध्ये  निर्णय मिळतो न्यायाबद्दल खात्री देता येत नाही. समोर आलेले पुरावे व त्याचा अन्वयार्थ लावण्यामागची तार्किकता यात माणसामाणसात फरक असतो. एका कोर्टाने फाशी दिलेला माणूस दुसंं-या कोर्टात निर्दोष सुटू शकतो. खरं काय ? न्याय कोणता ?  आपण सर्वसामान्य  माणसं ! आपण नातेसंबंध सुधारू शकलो तरच यातून उत्तर मिळू शकेल.  आमच्या लहानपणीची डॉक्टरशी असलेल्या नातेसंबंधांची व कौटुंबिक संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकेल का ? आमची नातवंडे नव्या डॉक्टरांच्या अंगाखांद्यावर डॉक्टरकाका म्हणून खेळू शकतील का ?  आज तरी भविष्य धूसर दिसतंय !

डॉक्टर काका सांभाळा  स्वतःला !!!

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ दळिता कांडिता॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ दळिता कांडिता॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

(॥ विठ्ठलनामाचा रे टाहो ॥)

‘विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो ‘ असं म्हणणार्‍या नामदेवांनी आणि त्यांच्या बरोबर सर्वच संतांनी विठुरायाला अभंग ,भारुडं ,विरहिणी, गवळणी आरत्या ,भूपाळ्या असे अनेक शब्दालंकार घातले .. पण पहाटेच्या अंधारात विठुरायाच्या अंगावर आपल्या जीवनानुभवांची रंगीबेरंगी ठिगळं लावलेली मायेची वाकळ पांघरली, ती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या घरोघरच्या मालनींनी ! 

त्यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्यांतून त्यांच्या साध्यासुध्या जगण्याचे सारे रंग दिसून येतात .

लग्न होऊन अजाणत्या वयात आईचा पदर नि बापाची मायेची पाखर याला अंतरलेली ही सासुरवाशीण .पहाट फुटायच्या आधी ही उठायची .कुटुंबाच्या मुखात घास घालणारं जातं हा तिचा देवच ! त्या देवापुढं मिणमिणता दिवा लावून हिची श्रमसाधना सुरु व्हायची .घासामागून घास जात्याच्या मुखात सारल्यावर जात्यातून पीठ झरावं तशा तिच्या मुखातून ओव्या झरु लागायच्या.

तिच्या मनाच्या बारीक सारीक दुखापती ,तिला असलेली माहेराची ओढ ,कंथाचं (पतीचं),दिराचं, लेकरांचं कवतिक ,तिच्या गावचं निसर्गवैभव, सूर्य चंद्र नदी पाखरं अशा तिच्या सार्‍या निसर्गदेवतांचं वर्णन ,असं सारं त्या ओव्यांमधे ती सहज गुंफायची .अंगावर लपेटलेला पदर कमरेशी घट्ट खोचून, ओचा आवरून ,एक पाय लांब पसरून ती  जात्याशी बसायची ..जात्याचा नि त्या बरोबर फिरणार्‍या  हातातल्या काकणांचा नाद आणि तिचं पुढं झुकून त्या लयीशी एकरूप होणं ..तीच लय पकडून दळदार शब्दफुलं तिच्या मुखी यायची . एकामागून एक तिच्या सहजसुंदर स्वरात त्यांना ओवताना तयार व्हायच्या त्या ओव्या ! महदंबा, जनाबाई यांच्या आोव्यांवर श्रेयाचा टिळा लागला .पण महाराष्ट्रातल्या आदिमायांनी पिढ्यानपिढ्या जे ओव्यांचं पीक काढलं ते अनामच राहिलं .त्या काळातल्या स्त्रीजीवनाचं प्रातिनिधिक रूप ओव्यांमधे बंद झालं .कुरुंदाच्या दगडाचं जातं हा त्यांच्या भावविश्वाचा,त्यांच्या साहित्यिक जाणिवांचा साक्षीदार .प्रगती गिरण्या घेऊन आली तसा तो साक्षीदारही मूक झाला .पण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातल्या घराघरांमधे पिढ्यानपिढ्या ज्याच्या नावाची आळवणी झाली तो मालनींचा पिता- भ्राता- सखा विठुराया मात्र अजूनही त्या मायेच्या गोधडीची ऊब विसरला नसेल ! 

ओव्यांमधे विठ्ठल ,पंढरी ,वारी याला फार जिव्हाळ्याचं स्थान आहे .इंदिरा संतांनी दीर्घकाळ, परिश्रमपूर्वक  ओव्या गोळा केल्या व त्याच्या भावानुसार गाथाही बांधल्या. महाराष्ट्राचा एक अमूल्य ठेवा त्यांच्यामुळं जिवंत राहिला .मालनींच्या नि विठ्ठलाच्या अनेकपदरी नात्याचं सुरेख वर्णन इंदिराबाई करतात ..

“भाऊ ,बाप, दैवत ,प्रियकर अशा सर्व नात्यांच्या पाकळ्या नि त्याच्या गाभ्यात मैतरभाव असलेल्या फुलाचे , अशा स्नेहाच्या अविष्काराचे नाव ‘सखा ‘ . पांडुरंगाला वाहिलेले हे फूल मालनींच्या हृदयात परिमळत असते .याच्या परिमळात सर्व जिव्हाळे एकवटून दरवळत असतात !” 

पंढरी हे मालनींचं माहेर .बाप विठ्ठल ,आई रखुमाई , पुंडलीक भाऊ नि चंद्रभागा भावजय ! 

जीवाला वाटईतंऽ   

पंढरीला जावं ऽ जावं ऽ ऽ

आईबापा भेटू यावं 

कुंडलिकालाऽ लूटावं ऽ ऽ

त्यांना जशी माहेराची ओढ तशी तिकडं विठुरायालाही यांच्या भेटीची आस .मग तो पुंडलीकाला मुराळी पाठवतो ..

पांडुरंगऽ पीता ऽ    

रुकमीन माझी बया ऽ ऽ 

आखाडवारीला गऽ  

कुंडलीक ऽ आला ऽ नेया ऽ ऽ

तो तिची येण्याची सोय करतो .रोज घरी कष्टणार्‍या मालनीला दिंडीत आयतं खायला मिळेल असं पहातो .

पंढरीला जाते ऽ             

कशाचं ऽ पीठऽ कूऽटऽऽ

न्याहारी काल्याला गं ऽ      

देव खजिन्याचा ऊठं ऽ ऽ 

पण कुणी एक मालन अगदी अंथरुणाला खिळलीय .ती मुळीही हलू शकत नाहीय , पण त्याच्या भेटीची तळमळ काही कमी होत नाहीये ! तिला कोण नेणार ? मग ती त्यालाच हक्कानं साकडं घालते.

“ बाबारे, मला काही येववत नाही पण तुला पाहिल्याबिगर मी डोळे मिटायची नाही .मग तूच ये कसा !” आणि तो तिचा भावसखा तिच्याकरता गरुडावरुन येतो .तिच्या मनात चांदणं पसरतं .आणि विठूच्या अंगच्या कस्तुरीगंधानं या भाबड्या मालनीचं जिणं गंधाळून जातं ! 

माझ्या जीवाला जडभारी ऽ  

कूनाला घालू वझ्झ्ं ऽ ऽ

इट्टला देवा माझ्या ऽ            

तातडीनं ऽ येनं ऽ तूझं ऽ ऽ

जीवाला जडभारी ऽ           

उभी मीऽ खांबाआड ऽ ऽ 

इटूबा ऽ देवाजीऽलाऽ         

विनवीते अवघऽडऽ

जीवाला माझ्या जड ऽ     

न्हायी कूनाला माया येतऽ ऽ

सावळ्या पांडुरंगाऽ         

यावं गरुडासहीतऽऽ

आला गंऽ धावतऽ     

माझा पंढरीचा हरीऽ ऽ

चंद्रावाचून ऽ गऽ       

उजेड पडला माझ्या घरीऽ ऽ

कस्तूरीचा ऽ वासऽ    

माझ्या अंगाला ऽ कूठूला ऽ ऽ

इट्टल सावळा गऽ      

मला भेटूईनऽ गेला ऽ ऽ 

या मालनीचा हेवा वाटतो .तिच्या अंगाच्या तुळशी कस्तुरीच्या दरवळात मन गुरफटून रहातं .वाटतं पळभर तरी तिचा निर्मळ ,निर्हेतुक, निर्व्याज भाव आपल्या व्यवहारी मनात उजळावा .ते सख्यत्वाचं फूल आपल्याही मनात कधीतरी उमलावं ! 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चक्रीवादळे आणि भाषा – लेखक – श्री प्रदीप देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ चक्रीवादळे आणि भाषा – लेखक – श्री प्रदीप देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

गेली काही वर्षे आपल्याकडेही वादळांना नावे देण्याचा आणि त्यांच्या ‘प्रवासा’चे निरीक्षण करण्याचा प्रघात पडला आहे. 

सध्या ‘बिपरजॉय’ या नावाचे वादळ अरबी समुद्रात तयार होऊन पश्चिम किनाऱ्यापाशी कच्छच्या दिशेने कूच करीत आहे.

याच्या ‘प्रवासा’चे वार्तांकन टेलिव्हिजनवरील वृत्तांमध्ये लक्षणीय मात्रेत होत आहे.

त्यामुळे  ‘बिपरजॉय’ हा शब्द वारंवार कानी पडला.

वृत्तनिवेदकांसाठी हा शब्द नेहमीचा नसल्याने प्रत्येकाने / प्रत्येकीने आपापल्या पद्धतीने त्याचे उच्चारण केले – 

काहींनी त्याचा उच्चार ‘बीपर जॉय’ असा केला. त्यामुळेच की काय त्या नावाकडे लक्ष वेधले गेले.

चक्रीवादळाच्या नावात ‘जाॅय’ कसा काय? असा प्रश्नही पडला.

जरा लक्ष देऊन चक्रीवादळाचे वृत्त ऐकले, तेव्हा समजले की या नावाचे मूळ ‘बंगाली’ आहे. 

मग मात्र ‘ट्यूबलाईट’ पेटली आणि उलगडा झाला !  नाव समर्पक कसे तेही पटले !

तेच तुम्हांलाही सांगण्यासाठी हा प्रपंच.

या शब्दाचा प्रवास ‘संस्कृत –> बंगाली –> रोमन लिपी –> ‘बीपर जॉय असा झाला आहे.

या प्रवासात, मूळ शब्दातून जो अर्थ सहज समजू शकतो तो झाकला गेला, आणि ‘जॉय’ अवतरला ! 

मूळ संस्कृत शब्द आहे – विपर्यय !

बंगालीत ‘वि’चा ‘बि’ झाला.  

‘पाणिनि’ने म्हटलेच आहे – 

‘बवयोः अभेदः । 

(ब आणि व यांत भेद नाही. )

आणि शब्दाच्या शेवटी असलेल्या दोन ‘य’ पैकी पहिल्या ‘य’चा ‘ज’ आणि बंगाली धाटणीप्रमाणे ‘जॉ’ झाला.

अशा तऱ्हेने ‘विपर्यय’चा उच्चार ‘बीपर जॉय’ होऊन त्याचा अर्थविपर्यासही झाला !

‘विपर्यय’ शब्दाचे गीर्वाणलघुकोशात (रचयिते कै. ज.वि.ओक) जे अर्थ दिले आहेत, त्यांतील बरेच ‘चक्रीवादळास’ लागू पडणारे आहेत – जसे 

विरुद्ध, अडथळा, आपत्ती,प्रलयंकाळ…

हा विपर्यय शब्द किती प्राचीन आहे ? 

हा शब्द पतंजलिच्या ‘योगसूत्रां’तही येतो. 

विपर्ययोमिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठितम् । (१-८)

म्हणजे हा अडीच हजार वर्षे तरी जुना आहे ! 

 

लेखक –  श्री प्रदीप देशपांडे

नाशिक

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares