मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘श्रीसमर्थ रामदास पुण्यतिथी…. अर्थात दासनवमी’…भाग -१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘श्रीसमर्थ रामदास पुण्यतिथी…. अर्थात दासनवमी’…भाग -१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

इसवी सनाचे सतरावे शतक. तो काळ ‘मोगलाई’चा. ‘दहशतवाद’, ‘असहिष्णुता’ हे शब्द एखादवेळेस त्या काळातील शब्दकोषात देखिल नसतील, पण सामान्य मनुष्य ‘याचि देही याचि डोळा’ ते अनुभवत होता. सुलतानी आणि अस्मानी संकट एकाच वेळेला महाराष्ट्रावर आणि एकूणच भारतावर घिरट्या घालीत होते. ‘स्वधर्म’ नावाचा काही धर्म असतो आणि तो प्राणपणाने जगायचा, जपायचा असतो हे सांगण्याचे धाडस करण्याची तयारी देखील त्या काळात फार कमी लोकांची होती. एखादया भरलेल्या शेतात टोळधाड यावी आणि काही क्षणांत ते शेत फस्त करून टाकावे, अगदी अशाच पद्धतीने मोगल आणि इतर आक्रमक गावावर हल्ला करायचे आणि सोन नाणं लुटून न्यायाचेच, पण गावातील लेकीबाळी एकतर पळवून न्यायचे किंवा ‘नासवून’ टाकायचे. जनतेनं दाद मागायची कोणाकडे? कारण हिंदूंना राजा नव्हताच. काही सरदार होते, पण तेही बादशहाचे मांडलिक. त्यामुळे तेही वतने टिकविण्यासाठी आपल्याच लोकांशी भांडत होते. ब्राह्मण आपल्या कर्मकांडात गुंतले होते, क्षत्रिय तत्कालीन राज्य व्यवस्थेचे मांडलिक झाले होते. वैश्य जीव मुठीत धरून व्यापार करीत होते आणि तथाकथित शूद्र आपापले जीवन कसेतरी जगत होते. काहीही करून फक्त जीव वाचविणे हाच हाच त्याकाळातील जगण्याचा मूलमंत्र झाला होता. या सगळ्याचे वर्णन करण्यासाठी एकच सुयोग्य शब्द आहे ‘मोगलाई’

इसवीसनाच्या तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून सामान्य मनुष्यात प्राण ओतण्याचे, त्याच्यातील ‘स्व’त्व जागृत करण्याचे कार्य चालू केले. त्या काळात समाजातील सात्विकता जवळ जवळ नष्ट होत चालली होती. चांगुल्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उरला नव्हता. त्याकाळात मनुष्याचा चांगुलपणा वरील विश्वास निर्माण करणे आणि तो टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे होते. सर्व संतांनी अगदी तेच केले. दुष्काळ पडला तर शेतकरी सर्वप्रथम आपले बियाणे सुरक्षित ठेवतो याच सुत्राप्रमाणे माऊलींनी आणि नंतर तत्कालीन संतांनी समाजातील सात्विकतेच्या बीजाचे संरक्षण आणि संवर्धन केले. माऊलींचा हरिपाठ, संत एकनाथांचे भारूड आणि इतर संताचे अभंग यामुळे समाजमन भक्तिरसात न्हाऊन निघत होते आणि ईश्वराच्या, नामाच्या सान्निध्याने मनुष्यातील सत्वगुण वृद्धीगंत व्हायला बळ मिळत होते. मनुष्याच मन विकसित करणे, हे फार अवघड काम. त्याहून अवघड म्हणजे निद्रिस्त समाजाला जागृत करून त्यास विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत करून राष्ट्रकार्य, समाजकार्य करण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे काम हृदयाच्या शस्त्रक्रियेसारखे. माणूस जिवंत ठेऊन जुनं म्हणजे सडलेले हृदय बदलून तिथे नवीन हृदयाचे रोपण करायचे. खरे हृदय बदलणे त्यामानाने एकवेळ सोपे म्हणता येईल, पण मनुष्याचे विचार समूळ बदलणे हे गोवर्धन पर्वत उचलण्यापेक्षा महाकठीण. पण आपल्याकडील संत मंडळी हे उत्तम मानसशास्त्रज्ञ, त्यामुळे त्यांनी ही सर्व शस्त्रक्रिया बेमालुमपणे आणि निष्णात तंत्रज्ञाप्रमाणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया झाल्याचे सामान्य मनुष्याला कळलेदेखील नाही, पण त्याचा ‘रोग’ मात्र बरा होण्यास निश्चित मदत झाली असे खात्रीने म्हणता येईल.

“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥” (संदर्भ:- अभंग क्रमांक १०१४ सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था) म्हणतात ते उगीच नव्हे!

मराठवाड्यातील जांब गावातील एका घरात एका मुलाचा जन्म झाला. अर्थात मुलाचा जन्म होणे ही तशी सामान्य घटना. पण त्याच मुलाने पुढील काळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपले आपल्या गावाचे, प्रांताचे नव्हे तर देशाचे नाव जगप्रसिद्ध केले, इतकेच नव्हे तर आज चारशे वर्षांनंतरही ते नाव एक दीपस्तंभ बनून आजच्या पिढीला मार्गदर्शन करीत आहे. माझ्यासारख्या एका अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास त्यांच्या चरित्राचे स्मरण करावेसे वाटते, त्याचे कर्तृत्व पुन्हा एकदा समाजाला सांगावेसे वाटते, यातच त्यांच्या अलौकिक आणि अपौरुषेय कार्याचे महात्म्य दडले आहे.

घरात अनेक पिढ्या चालत आलेली रामभक्ती !! मोठे बंधु त्यामानाने ज्येष्ठच. त्यामुळे हा बाळ आपल्या बालमित्रमंडळीत जास्त रमायचा. सुरपारंब्या आणि इतर तत्कालीन खेळ हे वेळ घालविण्याचे साधन. थोडा मोठा झाल्यानंतर मात्र सूर्यनमस्कार, पोहणे अशा गोष्टीत त्यास रस वाटू लागला. एकीकडे रामभक्ती चालू होतीच. आठव्या वर्षी मुंज झाली आणि अचानक वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनाचा बाळाच्या मनावर खोल परिणाम झाला. बाळ अंतर्मुख झाला. त्याचवेळेस गावात टोळधाड आली, समाजाची विदारक परिस्थिती त्याच्या लक्षात आली आणि या अंतर्मुखतेस एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले.

“धर्माच्या करिता आम्हांस जगती रामाने धाडियले।” 

रामकार्य करण्याचे ठरले आणि हनुमंत त्यांचा आदर्श, मार्गदर्शक आणि मित्र झाला. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हनुमंताला आपल्या सोबत ठेवले. प्रत्येक गोष्ट हनुमंताला साक्षी ठेऊन आणि समर्पण करून केली. आयुष्यात परमेश्वरावरील अतूट श्रद्धा आणि शुद्ध साक्षीभाव किती काम करतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण !! आयुष्याचे ध्येय ठरले, निश्चय दृढ झाला, आता कृती !! सामान्य मनुष्याचे असामान्य संकल्प आईच्या अश्रूत वाहून जातात असा आपल्याकडील अनेक लोकांचा अनुभव आहे. ‘हुंडा मला नकोय पण आईसाठी घेतोय’, मला काही नकोय मात्र आईची इच्छा मोडवत नाही’, आई हो म्हणाली असती तर मी सैन्यात भरती झालो असतो, अशी ‘कारणे’ देणारी मंडळी आज देखील आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. पण याचे ध्येय पक्के होते, विशाल होते. ध्येय ‘रामराज्य’ प्रत्यक्षात आणण्याचे होते. हिंदूंना स्वतःचे सार्वभौम सिंहासन मिळावे, हिंदूसमाज जिंकू शकतो, हिंदू मनुष्य सार्वभौम राजा होऊ शकतो, इतकेच नव्हे हिंदू राजे जिंकलेल्या राज्याचा विस्तार करु शकतात, हिंदू ‘राज्य’ करु शकतात, हिंदू कारखाने चालवू शकतात, व्यापार करू शकतात, समुद्रावर सत्ता गाजवू शकतात, गडकिल्ले बांधू शकतात, शेती विकसित करू शकतात, हे दाखवून देण्याचा निश्चय झाला होता, आता हा संकल्प फक्त प्रत्यक्षात आणायचा होता. एका वाक्यात सांगायचे तर *सामान्य मनुष्यात ‘राष्ट्रभक्ती’, ‘राष्ट्रीय दृष्टीकोन’ राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे काम करायचे होते.

जगात कोणतीही गोष्ट दोनदा घडते. एकदा कोणाच्या तरी मनात आणि नंतर प्रत्यक्षात! हा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने संसारात रमणे सोयीचे नव्हते, म्हणून आईच्या शब्दांसाठी बोहल्यावर चढलेला हा मुलगा, “शुभमंगल सावधान…. ” ऐकताच ‘सावधान’ झाला आणि गोरजमुहूर्ताचा फायदा घेऊन बोहल्यावरून पळून गेला. त्याला पारंपरिक संसारात न अडकता विश्वाचा संसार करायचा होता. “चिंता करतो विश्वाची”, असा विचार करणाऱ्या मुलाला ‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रेमाची ताकद… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ प्रेमाची ताकद – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले.

गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते.

अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला ,पण राधा शांतचित्त होती.

गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली…..

“कसे आहात द्वारकाधीश ?”

जी राधा त्याला ‘कान्हा’ ‘कान्हा’ म्हणायची तिने ‘द्वारकाधीश’ असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला, “राधे, मी आजही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस …! खूप दिवसांनी भेटतो आहोत, एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती.”

राधा म्हणाली, “खरं सांगू ? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही.”

“कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तूच होतास. त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जाऊ नयेस, म्हणून मी कधी रडलेच नाही.

प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू?”

श्रीकृष्ण ऐकतच राहिला…

राधा म्हणाली, “तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे, गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस.तू खूप मोठा झालास, तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली.

पण ह्या प्रगतीमध्ये तुझी किती अधोगती झाली? यमुनेच्या पवित्र, गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरु झाले.त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जाऊन पोहोचलास ( द्वारका समुद्रकिनारी होती/आहे).

एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास, पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास!

कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास, तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस!

कान्हा आणि द्वारकाधीश ह्यांत काय फरक आहे सांगू ….?

तू कान्हा असतास, तर तू सुदामाच्या घरी गेला असतास. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं!

प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे … ‘युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो’. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो, पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही !

तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस.महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास?

तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देऊन टाकलेस?

तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास, त्याचा मार्गदर्शक बनलास,ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्यासमोर मारून टाकले?

तुझे सैन्य तुझी प्रजा होती ना? आणि प्रजा ही स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ना? तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास !

इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा? मग जा, पृथ्वीवर जाऊन बघ. …. तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध.

नाही सापडणार तुला शोधूनही !

जिथे जाशील तिथे घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन.

होय. कान्हा मला गीतेचे महत्त्व माहीत आहे. आजही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. माणसं ही गीतेला पूज्य मानतात .पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकानरेश श्रीकृष्णावर नाही, तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात.

गीतेमध्ये माझा – राधेचा – तर दुरूनही उल्लेख नाहीये.पण आजही लोकं गीतेचा- तुझ्या महान भगवद्गीतेचा- समारोप करताना ‘राधेकृष्ण राधेकृष्ण’ असाच जप करतात!”   

हीच ती प्रेमाची खरी ताकद…!

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ.प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विवाह समुपदेशन — काळाची गरज ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

? विविधा ?

☆ विवाह समुपदेशन — काळाची गरज… ☆ श्री उद्धव भयवाळ  

आपल्या भारतीय विवाह संस्थेला जागतिक पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त आहे. भारतीयांमधील विवाहबंधनाला एक पवित्र नाते मानले जाते. भारतात वैवाहिक संबंध हे केवळ दोन व्यक्तीमधील न मानता दोन कुटुंबातील संबंध असे मानले जातात. पाश्‍चिमात्य देशासारखे विवाह म्हणजे एक करार ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये नाही. मात्र तंत्रज्ञान आणि आधुनिक समाज व्यवस्था यामुळे नातेसंबंधाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे.

आज इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकवरूनही विवाह जमवला जात आहे. तसेच मॅरेज ब्युरोमार्फत ऑनलाईन स्थळे सुचवण्याचा जमाना आहे; परंतु त्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत, हे वधू-वरांच्या पालकांनी लक्षात घ्यायला हवे. सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढत आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून, पती-पत्नीतील किरकोळ मतभेदांमुळेदेखील जोडपी न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेताना दिसतात. या पार्श्‍वभूमीवर विवाह समुपदेशन ही काळाची गरज झालेली आहे.

एखादा कौटुंबिक अगर वैवाहिक वाद जेव्हा कोर्टात जातो, तेव्हा त्याला वेगळेच स्वरूप प्राप्त होते, तो वाद खासगी राहात नाही. कोर्टासमोर पती-पत्नी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत राहतात. कोर्टात त्याची नोंद होत राहते. आणि नाती इतकी दुभंगतात की, कधीही न जुळणारी बनतात.

घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यास सामाजिक समस्येचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वैवाहिक संबंध दृढ, आपुलकीचे आणि प्रेमाचे ठेवण्यासाठी लग्नापूर्वी विवाहपूर्व समुपदेशन आणि लग्नानंतर पुन्हा समुपदेशन याची गरज भासत आहे. लग्नाआधी एकमेकांतील न दिसलेले गुण-दोष जोडप्यांना लग्न होऊन मधुचंद्रानंतर स्पष्ट दिसू लागतात व जोडीदारास दोषांसोबत स्वीकारण्याची मनाची तयारी नसल्याने संबंध टोकास जातात, कधीही न जुळणारे बनतात. त्यामुळे जोडीदार निवडताना आणि निवडल्यानंतर विवाहपूर्व समुपदेशनसुद्धा आजच्या काळात आवश्यक झाले आहे.

विवाहपूर्व समुपदेशनामुळे जोडीदारांना विवाहापूर्वीच एकमेकांना समजून घेण्यास मदत होते व भविष्यातील गुंतागूंत अथवा मतभेदांना अगोदरच फाटा देता येतो. संस्कारातील अंतर व मतभेद यांचे प्रमाण खालच्या पातळीवर आणण्यात मदत होते. तसेच विवाहापूर्वी वधू-वर आपल्या अपेक्षा एकमेकांसमोर उघड न करता एकमेकांपासून काही अपेक्षा ठेवून असतात व त्या अपेक्षा विवाहानंतर पूर्ण झाल्या नाहीत की नात्यामधील गोडवा संपून वाद-विवाद वाढतात. विवाहपूर्व समुपदेशनामुळे जोडीदारांना एकमेकांकडून विवाहानंतरच्या अपेक्षा, आवड-निवड याबाबत उघडपणे बोलण्यास व्यासपीठ प्राप्त होते.

विवाहानंतरचे समुपदेशन तर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. नवरा-बायकोमधील तुटू पाहणारे नाते योग्य वेळी समुपदेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकजीव होते. फॅमिली कोर्टामध्ये धाव घेण्यापूर्वीही जोडप्यांना काऊन्सेलिंगद्वारे समजवण्याचा प्रयत्न केला जातो. विवाह समुपदेशनाच्या माध्यमातून

पती-पत्नीच्या दरम्यानच्या समस्यांचा अभ्यास केला जाऊन त्याबाबत योग्य तो आणि परिणामकारक सल्ला दिला जाऊ शकतो. विवाह समुपदेशनाच्याद्वारे पती-पत्नीमधील भांडणाचे मूळ शोधून तसे प्रसंग टाळण्याबाबत मार्गदर्शन मिळू शकते. मुलांचे संगोपन आणि त्यांच्या भविष्याच्या जबाबदारीची जाणीव जोडप्यांना करून दिली जाते. त्यामुळेही जोडप्यांना घटस्फोट घेण्यापासून परावृत्त करता येणे शक्‍य होते. विवाहपूर्व समुपदेशनाद्वारे योग्य मार्गदर्शनामुळे मानसिक स्थिती, स्वभाव लक्षात घेऊन योग्य सल्ला दिला जाऊ शकतो. तसेच लग्नानंतरच्या समुपदेशनाने दोन कुटुंबांतील तुटणारे रेशीमबंध पुन्हा साधण्याचे पवित्र कार्य होते.

त्यामुळेच विवाह समुपदेशन ही काळाची गरज आहे, यात शंका नाही.

****

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, छत्रपती संभाजीनगर -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “खुश रहे तू सदा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “खुश रहे तू सदा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… आज अचानक सुमीची गाठ पडली. काॅलेज रोड वरून चालत निघालेली… सोबत तिचा कुंकवाचा टिळा नामक टिक्कोजी राव होता तिच्या संरक्षणाची ढाल बनून असल्यासारखा… दोन वर्षापूर्वी सुमी नि मी एकाच आर्टस काॅलेजातले, मराठी विषय एम. ए. च्या वर्गातले… हाताच्या बोटावर मोजता येणारी वर्गातली ती एकूणच पटसंख्या असलेला तो वर्ग त्यात आम्ही मुलं जेमतेम दोन तीन आणि मुलींचाच भरणा जास्त… अर्थात आम्हा मुलांना चाॅईस भरपूर होता… आमचे मुलांचे आप आपल्या परीने गनिमी काव्याने किल्ले लढवणे सुरू होतेच.. शेवटचे सत्र संपायच्या आत बात पक्की करने के आरमान काफ़ी बुलंद थे.. पण आमच्या तिघां पैकी एकच लकी बाॅय ठरला आणि आम्ही रडवैय्या भारतभूषण चे वारसदार झालो.. प्रियाराधन मनापासून करूनही सुमीने मला नाक मुरडले… आता दैवजात मिळालेली काटकुळी, गहूवर्णीय शरीरसंपदा नि बावळट चेहरा याने माझ्या भावी सुख स्वप्नांचा चुराडा केला होता… एकटी सुमीच काय पण तिच्या अवतीभवती असणाऱ्या साळकाया माळकाया, स्वतःला सो कॉल्ड रुप सुंदरीचं आभासी नि अहंकारी कवचाचे लेपन केलंल असल्याने त्यांनी देखील मला डावललं.. मलाही त्यांच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हताच म्हणा… पण सुमी नाहीच म्हणाली तर तिच्या नाकावर टिच्चून तीचीच मैत्रीण गटवली तर बरी हा सर्व सामान्य विचार मनात केला.. पण तिथेही माशी शिंकलीच… या अक्करमाशी माझ्याच नशीबाला होत्या… तर एकूणातच काय गळाला एकही मासोळी त्यावेळी लागली नाही ती नाहीच… पण मला फक्त सुमीचं त्यातल्या त्यात बरी वाटायची, आवडली होती.. एक कदम तुम भी चलो एक कदम हम भी चलो या बोधवचनाच्या आधारे मीच पुढाकार घेण्याचे ठरवले… तो दिवस मी या आयुष्यात कधीच विसरणार नाही… त्या काळ्यादिवशी सगळे निचीचे ग्रह, व्यतिपात, आणि अनिष्ट फल देणारा माझ्या भाग्यात न भुतो न भविष्यती आला असल्याने.. माझ्या पहिल्या प्रेम व्यक्त करण्याच्या प्रयत्नाला सुमीने अणूबाॅम्म लावून उध्वस्त करून टाकला.. मला चक्क ‘ एकदा आरशात स्वताचं थोबाड बघून ये ‘ असं ती म्हणाली.. ‘आणि पुन्हा जर मागे लागलास तर हेच तुझं थोबाड असं रंगवीन कि कायमची सुमीची आठवण राहील तुझ्या आयुष्यात.. ‘ माझा कोणी कडलोट करेल किंवा हत्तीच्या पायी देईल, फासावर लटकवेल, चालत्या वाहनाखाली,.. निदान बाजारात मिळाणारी जहरची बाटलीने वा या सगळ्या प्रयत्नांपैकी कशाची एकाने मदत केली असती तर बरं झालं असतं.. हा सुमीच्या जीवनातील काटा आपोआप दूर करायला हातभार लागला असता.. या विचारचक्रात माझा कालपव्यय मात्र झाला पण अमंलबजावणी झालीच नाही… सुमीला हत्येचं पाप लागलं नाही… सुमी पुण्यवान, नशीबवान असल्यामुळे लवकरच तिचं पाणीग्रहण कोणी गबाळग्रंथी आयुर्वेदाचार्यशी झालेलं मला उडत उडत समजले… अर्थात मला काही तिने लग्नाला येण्याचं निमंत्रणही हेतूपुरस्सर टाळले होतेच… पण अश्या बातम्या कुठे लपून राहतात.. माझ्या मित्रांची चांडाळचौकडीने तर या संधीचा फायदा साधून माझ्या घायाळ हृदयाची दुखरी जखम जास्त चिघळत ठेवायला आपल्या मैत्रीला जागले… दोस्त दोस्त न रहे प्यार, प्यार न रहा… सुमीच्या त्या साळकाया माळकाया मैत्रीणी पण हुळहुळणाऱ्या जखमेवर मीठ चोळायचा आसुरी आनंदच घेत राहिल्या… आणि मी माझ्या दुभंगलेल्या मनाची नि टुटा फुटा दिल की तू नही तो और सही या समजूतीची मलमपट्टी करत राहीलो… आणि ती और सही च्या शोधात फिरत असताना अचानक सुमी नि तिचा नवरा माझ्या समोरच आलेले दिसले… माझी नि सुमीची नजरानजर झाली… तिचे ते पाण्याने तरारले बोलके डोळे… तीच्या मनातली मला अव्हेरून काय पदरात पडले, या पश्चातापाची अबोल भावना प्रकट करून दाखवत असलेले मला दिसले.. तिची ती केविलवाणी चर्या मला खुप काही सांगून गेली. माझ्या मनात आनंदाची लहर उमटून गेली… मला आरश्यात थोबाड पाहायला लावणारीने असा कोणता जगावेगळा झेंडा लावलाय हे त्या तिच्या सोबत असलेल्या ढेरपोट्या, बेढब आणि डोळ्यावर निळा चष्मा लावून सुमी सोबत निघालेला मला दिसत होता.. सुमीशी केलेलं लग्न हि त्याला लागलेली लाॅटरीच होती… मला त्याच्या भाग्याचा हेवा आणि सुमीच्या नशीबाची किव वाटली… काय पाहिलत त्याच्यात तिने कि जे माझ्याकडं नव्हतं… पण अनहोनी कौन टाल सकता है… चिडीया खेत चुग गई थी… मग मीच मोठं मन करून स्वताशीच गुणगुणत राहिलो.. खुश रहे तू सदा.. ये दुवा है मेरी… सुमीचा तो ढेरपोट्या गबाळग्रंथी नवरा सुमीच्या कानात काहीतरी बोलला.. मला ते ऐकू आलं नाही… पण त्याच्या एकूणच चर्चेवरून मी ताडलं कि.. ‘ तो समोरचा लफंगा बघ कसा प्रेमभंग झाल्यासारखा उध्वस्त झालेला दिसतोय आणि रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या बायका मुलींकडे हसत हसत बघतोय… तो तुझ्याकडे ही तसंच बघतोय… जशी काही तू त्याची पहिली प्रेयसीच असावी.. बघ बघ त्याचं ते केविलवाणं हसणं बघ.. ‘

त्याचं तसलं बोलणं ऐकून सुमी चमकली… आणि नरमाईच्या सुरात… ‘ एकदा अपयश आलं म्हणून थांबत का कोणी!… लवकरच लग्न का करू नये. ?’.. असं मला ऐकू जाईल अश्या आवाजात जाता जाता बोलून गेली. समझनेवाले को इशारा काफ़ी है… सुमी पुढे निघून गेली… कुठूनशी यहूदी सिनेमातले गाण्याची लकेर…. ‘. दिलको तेरी हि तमन्ना… दिलको है तुझसेही प्यार…. ‘ माझ्या कानावर आली… आणि मी तसाच तिथे रेंगाळत राहिलो… सुमीच्या ढेरपोट्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले हासू नि सुमीच्या डोळ्यात लपलेले आसू माझ्या मनाला दंश करत राहीले.

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बाळसेदार पुणे..

रोज सकाळी सुस्नात होऊन, तुळशीपुढे दिवा लावून, सुबकशी रांगोळी काढून, हातात हळदी कुंकवाची कुयरी सांवरत सुवासिनी, श्री जोगेश्वरी दर्शन घेऊन मगच स्वयंपाकाला पदर बांधायच्या. वारांप्रमाणे वेळ काढून एखादी उत्साही गृहिणी समोरच्या बोळातून बेलबागेकडे प्रस्थान ठेवायची. आमच्या हातात आईच्या पदराचे टोक असायचं. आई भगवान विष्णूच दर्शन घ्यायला सभा मंडपात शिरली की आईच्या पदराचं टोक सोडून आमचा मोर्चा मोराकडे कडे वळायचा. खिडकी वजा जागेत दोन मोर पिसारा फुलवित दिमाखात फिरायचे.

आम्ही मोरपिसांचे मोहक रंग आणि पिसाऱ्यावरची पिसं मोजत असतांना मोर आपला पिसांचा पसारा आवरता घ्यायचा. आणि मग मनांत खट्टू होऊन आम्ही मागे वळायचो, तर काय! आनंदाने आणि सुगंधान वेडच लागायचं. पानोपान फुलांनी डंवरलेल्या झाडांनी, बकुळीचा सडा शिंपलेला असायचा. अगदी ‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशिल दोहो कराने, ‘अशी स्थिती व्हायची आमची. इवल्याश्या सुवासिक, मोहक बकुळ फुलांचा गजरा मग लांब सडक वेणीवर रुळायचा. अलगद पावलं टाकली तरी नाजूक फुलं पायाखाली चिरडली जायचीचं. अग बाई! नाजूक फुलांना आपण दुखावलं तर नाही ना?असं बाल मनात यायचं. बिच्चारी फुलं ! रडता रडता हसून म्हणायची, “अगं चुकून तू आमच्यावर पाय दिलास, तरी मी तुझ्या पायांना सुगंधचं देईन हो! देवळाच्या पायरीवर बसलेल्या आईला आम्ही विचारलं, ” आई इथे मोर आहेत म्हणून या देवळाला मोरबाग का नाही गं म्हणत? बेलबाग काय नाव दिलंय.? आई बेल बागेचं गुपित सांगायची, ” हे भगवान श्री विष्णूंचं मंदिर आहे. इथे पूर्वी बेलाचं बन होत. फडणवीसांचं आहे हे मंदिर. इथे शंकराची पिंड असून खंडोबाचे नवरात्र पेशवे काळातही साजरं व्हायचं. तुळशीबागेत पूर्वी खूप तुळशी म्हणून ती तुळशीबाग. हल्लीचं एरंडवणा पार्क आहे ना! तिथे खूप म्हणजे खूपच एरंडाची झाड होती अगदी सूर्यकिरणांनाही जमिनीवर प्रवेश नव्हता. एरंडबन म्हणून त्याचं नाव अपभ्रंश होऊन पडलं एरंडवणा पार्क. रस्त्यानें येताना ही नावांची गंमत सांगून आई आम्हांला हंसवायची. प्रवचन कीर्तन असेल तर ते ऐकायला ति. नानांबरोबर ( माझेवडील )आम्ही पंत सचिव पिछाडीने रामेश्वर चौकातून, बाहुलीच्या हौदा कडून, भाऊ महाराज बोळ ओलांडून, गणपती चौकातून नू. म. वि. हायस्कूल वरून श्री जोगेश्वरी कडे यायचो. ऐकून दमलात ना पण चालतांना आम्ही मुळीचं दमत नव्हतो बरं का!गुरुवारी प्रसादा साठी हमखास, घोडक्यांची सातारी कंदी पेढ्याची पुडी घेतली जायची. तिथल्याच ‘काका कुवा’ मेन्शन ह्या विचित्र नावांनी आम्ही बुचकळ्यात पडायचो. वाटेत गणपती चौकाकडून घरी येताना सितळा देवीचा छोटासा पार लागायचा. कधीकधी बाळाला देवीपुढे ठेवून एखादी बाळंतीण बारावीची पूजा करताना दिसायची. तेला तुपानी मॉलिश केलेल्या न्हांहूनमाखून सतेज झालेल्या बाळंतपणाला माहेरी आलेल्या माझ्या बहिणी, बाळांना, माझ्या भाच्यांना देवीच्या ओटीत घालून बाराविची पूजा करायच्या, तेव्हां त्या अगदी तुकतुकीत, छान दिसायच्या. नवलाईची गोष्ट म्हणजे घरी मऊशार गुबगुबित गादीवर दुपट्यात गुंडाळलेली, पाळण्यात घातल्यावर किंचाळून किंचाळून रडणारी आमची ‘भाचरं ‘सितळा देवीच्या पायाशी, नुसत्या पातळ दुपट्यावर इतकी शांत कशी काय झोपतात? हा प्रश्न आम्हाला पडायचा. अगदी नवलच होतं बाई ते एक ! कदाचित सितळा आईचा आशीर्वादाचा हात, बाळांच्या अंगावरून फिरत असावा. गोवर कांजीण्यांची साथ आली की नंतर उतारा म्हणून दही भाताच्या, सितळा देवी पुढे मुदी वर मुदी पडायचा. तिथली व्यवस्था बघणाऱ्या आजी अगदी गोल गरगरीत होत्या. इतक्या की त्यांना उठता बसता मुश्किल व्हायचं, एकीनी आगाऊपणा करून त्यांना विचारलं होतं “आजी हा सगळा दहीभात तुम्ही खाता का? आयांनी हाताला काढलेला चिमटा आणि वटारलेले डोळे पाहून आम्ही तिथून पळ काढायचो ‘आगाऊ ते बालपण ‘ दुसरं काय! पाराच्या शेजारी वि. वि. बोकील प्रसिद्ध लेखक राह्यचे. त्यांच्याकडे बघतांना आमच्या डोळ्यात कमालीचा आदर आणि कुतूहल असायचं. त्यांच्या मुलीला चंचलाला आम्ही पुन्हां पुन्हां नवलाईने विचारत होतो”, ए तुझे बाबा ग्रेट आहेत गं, एवढं सगळं कधी लिहितात ? दिवसा की रात्री? शाई पेननी, की बोरुनी? ( बांबू पासून टोकदार केलेल लाकडी पेनच म्हणावं लागेल त्याला) एवढं सगळं कसं बाई सुचतं तुझ्या बाबांना? साधा पेपर लिहीतांना मानपाठ एक होते आमची. शेवटी शेवटी तर कोंबडीचे पाय बदकाला आणि बदकाचे पाय कोंबडीला असे अक्षर वाचताना सर चरफडत गोल गोल भोपळा देतात. कारण पेपर लिहितानाअक्षरांचा कशाचा कशाला मेळच नसायचा, त्यामुळे सतत लिहीणारे वि. वि. बोकील आम्हाला जगातले एकमेव महान लेखक वाटायचे. आमची भाचे कंपनी, मोठी होत होती. विश्रामबाग वाड्या जवळच्या सेवा सदनच्या भिंतीवर( हल्लीच चितळे बंधू दुकान, )सध्या इथली मिठाई, करंजी, समोसे, वडा खाऊन गिऱ्हाईक गोलमटोल होतात, पण तेव्हां त्या भिंतीवर किती तरी दिवस डोंगरे बालामृतची गुटगुटीत बाळाची जाहिरात झळकली होती. ती जाहिरात बघून प्रत्येक आईला वाटायच माझं बाळ अगदी अस्स अस्सच बाळसेदार व्हायला हवं ग बाई, ‘ मग काय मोहिमेवर निघाल्या सारखी डोंगरे बालामृतची बघता बघता भरपूर खरेदी व्हायची. सगळी बाळ गोंडस, गोपाळकृष्णचं दिसायची. आणि मग काय!सगळं पुणचं बाळसेदार व्हायचं. बरं का मंडळी म्हणूनच त्यावेळची पिढी अजूनही भक्कम आहे. आणि हो हेच आहे त्या पिढीच्या आरोग्याचे गमक. जोडीला गाईच्या दुधातून पाजलेली जायफळ मायफळ मुरडशिंग हळकुंड इत्यादी नैसर्गिक संपत्तीची अगदी मोजून वेढे दिलेली बाळगुटी असायचीच. मग ते गोजिरवाणं गोंडस पुणं आणखीनच बाळसेदार दिसायचं.

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कविराज भूषण…’  (उत्तरार्ध) – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कविराज भूषण…’  – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

(उत्तरार्ध)

नमस्कार मैत्रांनो, 

कविराज भूषण यांच्या जाज्वल्य देशप्रेमाने आणि शिवरायांविषयी असलेल्या अतीव आदराने रचलेल्या काव्याचे शिवराय आणि त्यांच्या समस्त दरबारी मंडळींना खूपच कौतुक होते. छत्रपतींनी या अभूतपूर्व काव्यरचना निव्वळ ऐकल्याच नाही तर या राजकवीचा वेळोवेळी उचित बिदागी सहित मानमरातब केला. बघू या त्यातीलच कांही निवडक काव्य रचना     

शिवरायांच्या युद्धांचे सजीव चित्रण: 

गनीमाशी शिवरायांच्या सेनेने केलेल्या घनघोर युद्धाचे सजीव वर्णन करतांना भूषण यांच्या लेखणीचे जणू टोकदार भाले होतात. शब्दांकन असे आहे जणू तोफेचे गोळे आग ओकताहेत. हे वीररसपूर्ण, जोमदार काव्य वाचतांना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. युद्धाच्या उत्साहाने मुसमुसलेल्या सैन्याचे कूच, रणांगणात रणभेरीचा शंखनाद, शस्त्रांची चकमक, शूरवीरांचे मर्दानी शौर्य आणि भ्याडांची भयावह अवस्था इत्यादी दृश्यांचे चित्रण कवीने अतिशय प्रभावीपणे केले आहे. खालील काव्यांशात शिवाजी राजांच्या चतुरंगिणी सेनेच्या प्रस्थानाचे अत्यंत मनोहर चित्रण आहे. कविराज म्हणतात:

साजि चतुरंग बीररंग में तुरंग चढ़ि। सरजा सिवाजी जंग जीतन चलत है,

भूषन भनत नाद विहद नगारन के। नदी नद मद गैबरन के रलत हैं|

ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल, गाजन की ठेल-पेल सैल उसलत है,

तारा सों तरनि घूरि धरा में लगत जिमि, थारा पर पारा पारावार यों हलत है॥ 

अर्थ: ‘सर्जा’ या उपाधीने सुशोभित झालेले अत्यंत श्रेष्ठ आणि वीरवर शिवाजी राजे आपली चतुरंगिणी सेना (हत्ती, रथ, घोडदळ आणि पायदळ हे सैन्याचे चार विभाग असलेली सेना) सज्ज करून आणि शरीराच्या प्रत्येक अंगात उत्साह निर्माण करून युद्ध जिंकण्याची ईर्षा बाळगून होते. त्यावेळी ढोल-ताशे आणि नगारे गर्जत होते. शिवरायांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मदमस्त हत्ती होते आणि युद्धासाठी उत्तेजित झाल्यामुळे हत्तींच्या कर्णरंध्रातून अत्यधिक मद नदी-नाल्यांप्रमाणे वाहत होता.जगाच्या कानाकोपऱ्यात दहशत पसरली होती, कारण शिवाजीचे प्रचंड सैन्य सर्वत्र पसरले होते. हत्तींच्या धक्क्याने डोंगरही उन्मळून पडत होते. प्रचंड सैन्याच्या हालचालीमुळे बरीच धूळ उडत होती. अति धूळ उडल्यामुळे आकाशात चमकणारा सूर्य ताऱ्यासारखा दिसत होता आणि समुद्र ताटात ठेवलेल्या पाऱ्यासारखा थरथरत होता.

शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा अन भूषण यांची काव्यप्रतिभा:

आता वळू या कविराज भूषण यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध अशा काव्य रचनेकडे! दिनांक ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड येथे भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या एकमेवाद्वितीय राजसी सोहळ्याचे साद्यन्त आणि बारीक सारीक तपशिलांसह वर्णन अनेकानेक तऱ्हेने करण्यात आले आहे. या लेखाच्या विषयाला अनुषंगून आपण बघू या की कवी भूषण सिंहासनाधीश शिवरायांचे कसे ओजस्वी वर्णन करतात. हे हुबेहूब वर्णन वाचतांना कवीची सौंदर्यदृष्टी, उत्तुंग साहित्यिक आणि बौद्धिक भरारी बघून केवळ त्यांच्या काव्यप्रतिभेला त्रिवार मुजरा करावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हां सिंहासनावर आरूढ झाले, त्या प्रसंगी त्यांची स्तुती करताना कविराज भूषण यांनी पुढील छंदकाव्य राजदरबारात सादर केले होते. शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वीररसाने भारलेले, उत्कट आणि मार्मिक वर्णन केवळ थोर कवी भूषण यांच्यासारखे त्यांचे मनस्वी प्रशंसकच करू शकत होते. एकापेक्षा वरचढ एक अशा सुंदर उपमालंकारांनी सजलेल्या आणि हिंदू संस्कृतीशी संबंधित प्राचीन संदर्भ देत, कवी रसमय वर्णन करतात की छत्रपती म्लेंच्छांवर कसे भारी पडले!  

इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है |

पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर राम द्विजराज है |

दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर जैसे मृगराज है |

तेज तम अंस पर कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर सेर सिवराज है ||

अर्थ: ज्याप्रमाणे जंभासुरावर इंद्र, समुद्रावर वडवानल, रावणाच्या अहंकारावर रघुकुल राजा (श्रीराम), मेघांवर पवन, रतीचा पती म्हणजे कामदेवावर शंभू, सहस्त्रबाहू (कार्तवीर्य) वर ब्राह्मण राम अर्थात परशुराम, वृक्षांच्या खोडांवर दावानल, हरिणांच्या कळपावर चित्ता, हत्तीवर मृगराज (सिंह), तिमिरावर प्रकाशकिरण आणि कंसावर कृष्ण भारी पडतात आणि त्यांच्यावर आरूढ होतात, तसेच म्लेच्छ वंशावर शिवाजी व्याघ्रासमान भारी पडतात आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करतात.    

छंदबद्ध आणि अलंकारिक काव्य

रसाळ परिपोषक असे अर्थपूर्ण छंदबद्ध काव्य रचतांना ते बहारदार तर होतेच, पण अतिरम्य गेय असे काव्य निर्माण झालेले दिसून येते. त्यांच्या काव्यात दोहा, कवित्त, सवैया, छप्पय इत्यादी तत्कालीन छंदांचा प्रामुख्याने उपयोग केल्या गेला आहे. रीतिकालीन कवींचे प्रमुख बलस्थान म्हणजे अलंकारिक भाषा! भूषण यांची काव्यसुंदरी एका पेक्षा एक आकर्षक अलंकारांनी सजलेली आहे. ते अपरिमित सौंदर्य बघतांना रसिक मुग्ध होतात. त्यांच्या काव्यात सर्वच अलंकारांची रेलचेल आहे. अर्थालंकारांपेक्षा शब्दालंकारांना प्राधान्य आहे. त्यांचे अतिशय प्रसिद्ध असे यमक अलंकारांनी नटलेले हे एक उदाहरण बघा!

ऊंचे घोर मंदर के अंदर रहन वारी, ऊंचे घोर मंदर के अंदर रहाती हैं।

कंद मूल भोग करैं कंद मूल भोग करैं, तीन बेर खातीं, ते वै तीन बेर खाती हैं। 

भूषन सिथिल अंग भूषन सिथिल अंग, बिजन डुलातीं ते वै बिजन डुलाती हैं।

‘भूषन’ भनत सिवराज बीर तेरे त्रास, नगन जड़ातीं ते वै नगन जड़ाती हैं॥

महत्वाचे शब्दार्थ 

(१) ऊंचे घोर मंदर – उंच विशाल महाल/उंच विशाल पर्वत 

(२) कंद मूल – राजघराण्यात खाल्ले जाणारे चविष्ट कंद-मूळ / जंगलातील कंद मुळे 

(३) तीन बेर खातीं – तीन वेळा खात होत्या/ तीन बोरे खातात 

(४) बिजन – पंखे/ एकाकी 

(५) नगन – नग – हिरे मोती इत्यादी रत्ने/ नग्न

कवीराज भूषण म्हणतात: “ज्या शत्रूंच्या स्त्रिया ज्या पूर्वी उंच-उंच-विशाल राजमंदिरांत राहत होत्या त्या आता शिवरायांच्या भीतीमुळे आणि आपला जीव वाचवण्यासाठी भयंकर पर्वतांच्या गुहेत लपून राहतात. ज्या महालातील स्वादिष्ट पदार्थ खात होत्या, त्या आता जंगलात भटकत जंगली कंद, मुळे आणि फळे खाऊन जगतात. जडजवाहिराने जड झालेल्या दागिन्यांच्या वजनामुळे ज्यांचे अंगप्रत्यंग शिथिल असायचे, त्यांचेच अंगांग आता भुकेने कासावीस होत आलेल्या अशक्तपणामुळे शिथिल झाले आहे. ज्या राजस्त्रियांवर शीतल पंखे डुलत असत, त्या आता निर्जन जंगलात एकट्या फिरतात. भूषण म्हणतात, एकेकाळी ज्या मुघल स्त्रिया अभिमानाने हिरे मोती अन विविध रत्न यांनी जडवलेले दागिने घालून मिरवीत असत, त्या आता वस्त्रहीन अवस्थेत हिवाळ्याच्या भीषण शीतकालात थर थर कापत असतात.

स्वाभिमानी महाकवि भूषण

शिवरायांच्या दरबारी रुजू असलेले महाकवि भूषण अत्यंत स्वाभिमानी होते. त्याचेच एक उदाहरण! एकदा दुसऱ्या राज्याचा एक राजा शिवरायांच्या दरबारी आला. कवींचे शिवराय आख्यान ऐकून तो खूपच प्रभावित झाला. तो भूषणला आग्रह करीत म्हणाला, ‘तुम्ही माझ्या दरबारात येऊन माझ्यावर प्रशंसात्मक काव्य करा.” कांही दिवसांनी भूषण त्या राजाच्या दरबारी गेले आणि त्या राजाच्या प्रशंसात्मक काव्यग्रंथातील कांही अंश त्यांनी वाचून दाखवले. सर्वांनी त्यांची स्तुती केली. तेव्हां तो अहंकारी राजा म्हणाला,”या तीन लाख सुवर्ण मुद्रा घ्या, इतके अधिक मानधन देणारा राजा या देशात तुम्हाला कुठेही भेटणार नाही.” भूषण त्याच्या अहंकाराने व्यथित होऊन गप्पच होते. राजा त्यांना म्हणाला, “याहून अधिक सुवर्णमुद्रा हव्या असतील तर तसे सांगा, मी देईन.” कविराजांनी ती सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली राजाला परत केली आणि त्या गर्विष्ठ राजाला म्हणाले, “तुम्ही माझ्या काव्याची कदर केली नाही. तुम्हाला आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायचे होते. तुम्ही माझा आणि माझ्या कवितेचा घोर अपमान केला आहे.” राजाला तेव्हां आपली चूक कळली व त्यांने कवींची क्षमा मागितली अन आपल्या दरबारी रुजू होण्याची विनंती केली. पण स्वाभिमानी कवी भूषण तडक त्या राजाच्या दरबारातून थेट शिवछत्रपतींच्या दरबारी परतले!   

भूषण यांच्या अद्वितीय कवितेमध्ये राष्ट्रीय चेतना ओसंडून वाहत असते. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय भावनेने भारलेले कवी आहेत.महाकवी भूषण यांचे हिंदी साहित्यात अनोखे स्थान आहे. रत्नांचा खच पडलेला असतांनाही जसा कोहिनूर आपल्या लखलखणाऱ्या तेजाने उठून दिसतो, तद्वतच रीतिकालात शृंगार आणि हास्यरसाची प्रचुर साहित्य निर्मिती करणाऱ्या कवींच्या गराड्यात कविराज भूषण आपल्या आगळ्यावेगळ्या वीररसाने ओतप्रोत कवितेमुळे अजरामर झालेले आहेत. आपल्या जाज्वल्य लेखनातून त्यांनी तत्कालीन असहाय्य हिंदू समाजाला शौर्याचे धडे शिकवले आणि हिंदू संस्कृतीच्या ऐश्वर्याची नव्याने ओळख पटवून दिली. त्यांचे काव्य निःसंशयपणे राष्ट्राचा अमर वारसा आहे आणि तो जपून ठेवणे आपले परम कर्तव्य आहे. 

– समाप्त –

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ? लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ? लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ?

जवळपास सर्वांच्याच घरी आजकाल वायफाय हा असतोच. मग ते वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा मग सोशल नेटवर्किंग असो घरात वायफाय असणं आत फार महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे वायफाय राउटर हा आता जवळजवळ सगळ्याच घरात असतोच. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीड मध्ये इंटरनेटचा वापर होतो. एकदा का हा राउटर घरी घेतला आणि त्याचे महिन्याचे पैसे भरले की तुम्ही त्याला ५-६ डिव्हाइस आरामत जोडू शकता. काही वाय-फाय राउटरला तर त्याहून जास्त डिवाइस जोडले जाऊ शकतात. तुम्ही कसा प्लान घेताय त्यावर ते अवलंबून असतं.

मुख्य म्हणजे वायफाय वापराला जातो तो रात्री. कारण चित्रपटांपासून ते सीरिजपर्यंत सगळेजण टिव्हीवर किंवा मोबाईलवर पाहायला तोच निवांत वेळ असतो. त्यामुळे बहुतेक घरात रात्रंदिवस वायफाय राउटर सुरु असतो. त्यामुळे जवळपास सगळेच जण वायफाय सुरुच ठेवून झोपतात. पण हे अत्यंत चुकीचं असून, यामुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रात्री वायफाय राउटर बंद करणं गरजेचं आहे.

रात्री वायफाय बंद का केला पाहिजे?

१) जर घरातील वायफाय राउटर रात्रभर चालू राहिल्यास त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे काही वेळाने शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. हे राउटर मधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होतं.

२) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे, शरीरात रोग उद्भवू शकतात जे धोकादायक आहेत आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

४) वाय-फाय रेडिएशनच्या सततच्या संपर्कामुळे पुरुषांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. जे लोक वारंवार वायरलेस इंटरनेट वापरतात त्यांच्यात वायर्ड इंटरनेट वापरकर्त्यांच्या तुलनेत शुक्राणूंची गती कमी होतेय.

४) २०१५ च्या अभ्यासात वाय-फायच्या संपर्कात असलेल्या सशांमध्ये हृदयाच्या लय आणि रक्तदाबातील बदल आढळून आले आहेत. हृदय व रक्तवाहिन्यांवरही या रेडिएशनचा प्रभाव पडतो जो हानिकारक आहे.

५) रात्री वायफाय बंद केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.

६) रात्री वायफाय बंद केल्याने विजेची बचत होते.

७) रात्री वायफाय बंद केल्याने कनेक्शन सुरक्षित राहते आणि हॅकिंगचा धोका कमी होतो.

अशा पद्धतीने रात्रभर वायफाय सुरु ठेवून तुम्ही त्याच्या संपर्कात झोपत असाल तर नक्कीच गंभीर समस्यांना सामोर जाव लागू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीरात होणाऱ्या रोगांपासून स्वतःचे संरक्षण करायचं असेल, तर वायफाय राउटर वापरल्यानंतर तो बंद करण्याचा प्रयत्न करा. किंवा झोपताना तरी वायफाय बंद करण्याचा प्रयत्न करा.

माहिती संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण. 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- हॉस्पिटल येताच मी पटकन् उतरून निघालो. सोबत घोरपडेसाहेबही होतेच. आम्ही आत गेलो तेव्हा आरती, माझी आई आणि भाऊ केबिनच्या बाहेर बसलेले दिसले. मी आरती जवळ गेलो. मला पहाताच तिचे डोळे भरून आले.

“समीर सिरीयस आहे. डॉक्टर तुझीच वाट बघतायत. जा लगेच. बोल त्यांच्याशी. ” आईचाही आवाज बोलताना भरून येत होताच.

आज माझ्यापुढे काय वाढून ठेवलं असेल या आशंकेनेच मी कसंबसं स्वतःला सावरत डॉक्टरांच्या केबिनकडे धाव घेतली… !!)

पाठोपाठ घोरपडे साहेब होतेच.

भूतकाळातला चटका लावून गेलेला इथवरचा प्रसंग आरतीला सांगण्याची आवश्यकता नव्हती आणि पुढचं सगळं सांगायचं मला धाडस होत नव्हतं.

” मी शांतपणे ऐकून घेईन.. त्रास करुन घेणार नाही.. पण सांगा लवकर.. काय सांगणार होतात?… “

” त्यादिवशी डॉक्टरांच्या केबिनमधून आम्ही बाहेर आलो तेव्हाच डॉक्टर काय म्हणाले ते तुला जाणून घ्यायचं होतं. पण मोघम कांहीतरी तुला दिलासा देणारं सांगून मी वेळ मारून नेली होती. खरी परिस्थिती वेगळीच होती….. “

“वेगळीच म्हणजे.. ?”

” ऍलोपॅथिक औषधांच्या सततच्या टाळता न येणाऱ्या उपचारांमुळेच त्यादिवशी त्याला मॅनेन्जायटीसचा अॅटॅक आला होता. म्हणूनच त्याची घुसमट होऊन त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या तोंडाला फेस आला होता आणि तो काळा निळा पडत चालला होता. मला हे सगळं सांगून शांतपणे डॉक्टरांनी मला समजावलं होतं आणि मी कधी कल्पनाही केली नव्हती असा एक प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता… “

” कसला प्रस्ताव.. ?”

मी धीर गोळा करून तिच्या नजरेला नजर देत अंदाज घेत असतानाच माझ्याही नकळत माझ्याच तोंडून स्वतःशीच बोलावं तसे शब्द निसटलेच…..

“समीरला या यातनांतून सोडवण्याचा… “

ती अविश्वासाने माझ्याकडे पहात राहिली. आता सगळं सांगण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता.

” डाॅक्टर म्हणाले होते,

‘मॅनेन्जायटीसच्या अटॅकमुळे तो यापुढचं त्याचं संपूर्ण आयुष्य अंथरुणाला खिळून रहात मतिमंद म्हणूनच जगणार आहे. ते आयुष्य त्याच्यासाठी फक्त यातनामय असं असह्य दु:खच असेल. या अवस्थेतून त्याच्या अशा दयनीय अवस्थेमुळे तो कधीच बाहेर पडू शकणार नाही. जितकी वर्षं तो जगेल तोपर्यंत अंथरुणावर पडल्या अवस्थेत पूर्णत: परावलंबी आयुष्य ओढत राहील. किती दिवस, किती वर्षं हे सांगता येणार नाही. आणि तोवर त्याची देखभाल आणि सर्व प्रकारची सेवा त्याच्या आयुष्यभर तुम्हाला करावी लागेल. त्याला या सगळ्या यातनांमधून मुक्त करायची हीच वेळ आहे. पण त्यासाठी जन्मदाते पालक म्हणून तुमची संमती गरजेची असणार आहे. “

असं म्हणून त्यांनी माझ्यापुढे सहीसाठी एक फाॅर्म ठेवला. त्याकडे नजर जाण्यापूर्वीच हे सगळं ऐकून मी गोठून गेलो होतो. शून्यात पहात क्षणभरच तसाच उभा असेन तेवढ्यात घोरपडे साहेबांनी मला थोपटलं.. आणि मी भानावर आलो…

“आजपर्यंत खूप सोसलंय बाळानं आणि तुम्ही सगळ्यांनीही. जे जे करायचंय ते ते सगळं केलंयत. आता जे करायचं ते त्या बाळाच्या हितासाठी, डाॅक्टर म्हणाले तसं करणं गरजेचं आणि योग्यही आहे. ऐक माझं… ” असं म्हणून घोरपडे साहेबांनी स्वतःच्या खिशातलं पेन माझ्या हातात दिलं. त्यांचे सगळे शब्द माझ्या कानाला स्पर्शून विरून गेले. कारण मी काय करायला हवं ते मी डॉक्टरांचं बोलणं ऐकलं तेव्हाच मनोमन ठरवलंच होतं जसंकांही. मी ते पेन घेतलं. शांतपणे डॉक्टरांकडे पाहिलं. त्यांनी जे सुचवलं होतं त्यात त्यांचा कणभरही स्वार्थ नाहीय हे मला समजत होतं, पण तरीही.. ?

“डॉक्टर, तुम्ही म्हणताय त्यातलं तथ्य मी नाकारत नाही. पण निर्णय घेण्यापूर्वी एकच प्रश्न विचारायचाय. “

“कोणता प्रश्न?”

“विज्ञानाने लावलेल्या शोधांमुळे हे आपण सहज सुलभ पद्धतीने करू शकतो हे खरं आहे, पण समजा आत्ता मी बाळाला या पद्धतीने यातनामुक्त करायला परवानगी दिली, तर आमच्या संसारात पुढे येणारं आमचं अपत्य त्याच्या आयुष्यभर पूर्णतः निरोगी राहील याची खात्री हेच विज्ञान देऊ शकणाराय कां?”

डॉक्टर माझ्याकडे थक्क होऊन पहात राहीले.

“हे कसं शक्य आहे?अशी खात्री कुणीच देऊ शकणार नाही. ” ते म्हणाले.

“असं असेल तर बाळाचे जे कांही भोग असतील ते तो पूर्णपणे भोगूनच संपवू दे. मी अखेरच्या क्षणापर्यंत त्याची सोबत करेन. जन्म आणि मृत्यू हे देवाचे अधिकार आपण आपल्या हातात नको घ्यायला. तो जिवंत असेल तितके दिवस त्याची सगळी सेवा मनापासून करणं हेच माझं सुख समजेन मी. आपण शक्य असेल ते सगळे उपचार सुरू ठेवूया डॉक्टर… “

माझं बोलणं संपलं तरी आरती त्यातच हरवल्यासारखी क्षणभर गप्प बसलीय असं वाटलं पण ते तसं नव्हतं. आतून येणारे दु:खाचे कढ ती महत्प्रयासाने थोपवू पहातेय हे मला जाणवलं तोवर तिनं स्वतःला कसंबसं सावरलं. आपले भरून येणारे डोळे पुसून कोरडे केले पण ते आतून ओलावतच राहिले.

“आणि.. हे.. हे सगळं आज सांगताय तुम्ही? इतके दिवस स्वतः एकटेच सहन करत राहिलात? मला विश्वासात घेऊन कां नाही सांगितलंत सगळं.. ?”

दोघांनीही दडपणात राहून काय केलं असतं आम्ही? कुणातरी एकाच्या मनातला आशेचा किरण तरी विझून चालणार नव्हता ना? आणि ती हे सगळं सहन नाही करु शकणार असंही वाटत होतं हेही खरं.

“तुला मुद्दाम सांगावं अशी ती वेळ नव्हती. आणि ते तुला सांगायलाच हवं अशी हीच वेळ आहे म्हणून आत्ता सांगितलं. आता मी बोलतो ते नीट समजून घे. माझ्या मनात अनेक प्रश्न गर्दी करतायत. लिलाताईच्या पत्रानं मला सावरलंय, दिलासा दिलाय, म्हणूनच या परिस्थितीतही मी सर्व बाजूंनी या घटनेचा शांतपणे विचार करु शकतोय. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधांनी बरा होण्याच्या पलीकडे गेलाय ही आपल्यापैकी डॉक्टर, मी आणि घोरपडे साहेब याखेरीज बाकी कुणालाच माहित नसलेली गोष्ट लिलाताईपर्यंत पोचणं शक्य तरी आहे कां?आणि तरीही… ? तरीही ते तसं ती तिच्या पत्रात अगदी सहजपणे लिहितेय. हो ना? शिवाय समीर बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि पूर्ण बरा होऊन तो परत येणार आहे हेही आपल्याला सांगतेय. यावर आपला विश्वास बसावा, आपण सावरावं म्हणूनच जणू मला आज तिच्या आईना भेटायला जायची बुद्धी होते, तिथे जाण्यापूर्वीचं तुझ्या अस्वस्थतेमुळं मनात निर्माण झालेलं त्यांच्याबद्दलचं अनाठायी किल्मिष त्यांना अंतर्ज्ञानाने समजले असावे इतक्या सहजपणे त्या आपुलकीच्या शब्दांनी अलगद दूर करतात काय आणि आपल्याला निश्चिंत केल्यासाठीच बोलल्यासारखं लिलाताईच्या वाचासिध्दिबद्दल उत्स्फूर्तपणे सांगतात काय… सगळंच अतर्क्य आहे असं नाही तुला वाटत?”

सगळं ऐकलं आणि खऱ्याखोट्याच्या सीमारेषेवर घुटमळत असावी तशी ती विचारात पडली. पण क्षणार्धात तिने स्वत:ला सावरलं आणि ठामपणे म्हणाली, ” तुम्ही समजता आहात तसं सगळं घडलं तरी तेवढ्याने माझं समाधान होणार नाहीs….. “

“म्हणजे.. ?”

“म्हणजे आपल्याला पुन्हा मुलगाच झाला तर आपला समीरच परत आलाय असं तुम्ही म्हणालही, पण मी…. ? तुम्हाला कसं सांगू… ? रात्री अंथरुणाला पाठ टेकली, अलगद डोळे मिटले की केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात दोन्ही हात पुढे पसरत झेपावत असतो हो तो मी जवळ घ्यावं म्हणून, आहे माहित?आणि मग मनात रुतून बसलेल्या त्याच्या सगळ्या आठवणी खूप त्रास देत रहातात मलाs… तो गेल्यापासून रात्रभर डोळ्याला डोळा लागलेला नाहीय हो माझ्याs. त्याचे टपोरे डोळे,.. गोरा रंग,.. लांबसडक बोटं,.. दाट जावळ.. सगळं सगळं मनात अलगद जपून ठेवलंय मी. मुलगा झालाच तर तो आपला ‘समीर’च आहे की नाही हे फक्त मीच सांगू शकेन… बाकी कुणीही नाहीss.. ” भावनावेगाने स्वतःलाच बजावावं तसं ती बोलली न् उठून आत निघून गेली… !

तिच्या बोलण्यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. माझ्यासाठी हा प्रश्न तिच्या भावना आणि माझी श्रद्धा अशा दोन टोकांमधे तरंगत राहिला… ! यातून बाहेर पडायला ‘लिलाताई’ हे एकच उत्तर होतं आणि या महिन्यातली पौर्णिमाही लगेचच तर होती. जावं कां तिच्याकडे?भेटावं तिला?बोलावं तिच्याशी? हो. जायला हवंच. या विचाराच्या स्पर्शाने दडपण निघूनच गेलं सगळं. मन शांत झालं.. !

मी पौर्णिमेची आतुरतेने वाट पहात राहिलो खरा पण? गूढ.. उकलणार.. नव्हतंच. ते अधिकच गहिरं होत जाणार होतं.. !!

त्याक्षणी मला त्याची कल्पना नव्हती एवढंच!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनसुमने – नृत्यांगना शिल्पाची -> मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

🪷 मनमंजुषेतून 🪷 

☆ मनसुमने – नृत्यांगना शिल्पाची ☆ मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

साल 2025 सुरू झाले आणि माझ्या आयुष्यातील सुवर्णकाल सुरू झाला आहे याची अनुभूती मला यायला लागली. समाजरूपी देवतेने माझ्या कर्तृत्वाचे स्मरण ठेवून मानाचा शिरपेच माझ्या मस्तकात खोवला. आपल्याच सांगली मिरज या भागातील लोकमत सखी मंच या अतिशय प्रतिष्ठित असणाऱ्या सामाजिक संस्थेने लोकमत सखी हा सन्मान देऊन मला पुरस्कृत केलं.

सुश्री शिल्पा मैंदर्गी

माझा स्वयं चा प्रवास – 

स्वयम टॉक्स म्हणजे मोबाईल वरील एक लोकप्रिय ॲप ज्याच्याबद्दल मला फारसे माहीत नव्हते. मिरज मधील प्रतिष्ठित व्यक्ती महेश जी आपटे यांच्यामार्फत माझा स्वयं टॉक या संस्थेशी संपर्क झाला. स्वयं टॉक या संस्थेचे सर्वेसर्वा श्री नवीन काळे सर यांचा मला फोन आला आणि त्यांनी माझा व माझ्या गुरु सौ धनश्री ताई आपटे यांचा 25 वर्षांचा नृत्य प्रवास त्यांना स्वयं टॉक्सच्या मंचावर आणायचा आहे यासाठी तुम्ही तयार आहात का याची विचारणा केली.

अशाप्रकारे आयुष्य समृद्ध करणाऱ्या आणि एक आनंददायी अनुभव देणाऱ्या स्वयं टॉक्स या संस्थेशी मी जोडले गेले.

स्वयं टॉक्स च्या मंचावर माझी व माझ्या नृत्य गुरु सौ. धनश्रीताई आपटे यांची मुलाखत व माझ्या नृत्याचे प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले आणि याची पूर्वतयारी जवळ जवळ वर्षभर सुरू होती.

आता आपल्याला स्वयं टॉक्स च्या मंचावर आपल्या नृत्याचे सादरीकरण करायचे आहे म्हटल्यावर माझा नृत्याचा सराव सुरू झाला. नृत्यासाठी कोणती रचना निवडावी त्या गीतास कशा प्रकारचे संगीत असावे याबाबत आम्हा दोघींची चर्चा सुरू झाली. 64 कलांचा अधिपती असणारा श्री गणेश याचे स्तवन आपल्या नृत्यातून सादर करावे यावर शिक्कामोर्तब झाले. दररोज दोन ते तीन तास ताई माझ्याकडून नृत्याचा सराव करून घेत होत्या. हा सराव सुरू असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या परंतु त्यावरही मात करून आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले.

12 जानेवारी हा दिवस सगळीकडे युवा दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी स्वयं टॉक्स च्या मंचावर आमचा कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. आम्ही 11 जानेवारीलाच मुंबईमध्ये दाखल झालो आमची राहण्याची व्यवस्था स्वयं टीमने केलेलीच होती. मुंबईत गेल्यापासून आमच्याशी वेळोवेळी फोनवरून संपर्क करून स्वयं टीमने आम्हाला खूप सहकार्य केले. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा मुंबई येथे होता. या कार्यक्रमासाठी आमच्या व्यतिरिक्त अजूनही सहा वक्त्यांच्या मुलाखती होत्या. आमची सर्वांशी एकमेकांशी ओळख व्हावी आणि मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम व्हावी या दृष्टीने कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हा सर्वांना एकत्र बोलवले होते. मी प्रत्यक्ष पाहू शकत नसल्यामुळे मला जिथे नृत्य करायचे होते त्या रंगमंचाचा अंदाज येण्यासाठी प्रत्यक्ष रंगमंचावर नेऊन तेथील लांबी रुंदीची कल्पना मला देण्यात आली. तिथे आलेल्या सर्वच वक्त्यानी एकमेकांशी ओळख करून घेतली एकमेकांची मनापासून चौकशी केली आणि असे करता करता जणू त्या रंगमंचाशी आमचे एक मैत्रीचा नातं जुळून आले.

१२ जानेवारी हा मुख्य कार्यक्रमाचा दिवस उजाडला आम्ही सकाळी साडेआठ वाजताच बालगंधर्व रंगमंदिर वांद्रे येथे उपस्थित झालो.

स्वयंंच्या सर्व टीमने आमचे सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आमची मुलाखत घेणारे सुप्रसिद्ध सुसंवादक डॉक्टर उदय जी निरगुडकर आमच्या आधीच तिथे उपस्थित होते. रंगमंचाचा पडदा उघडण्यापूर्वी उदयजींनी आम्हा सर्वांची अगदी प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी केली आणि ओळख करून घेतली. आणि रंगमंचावरती एक खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आमची मुलाखतीची भीती त्याचवेळी निघून गेली.

बरोबर दहा वाजता पहिले वक्ते श्री. हेरंब कुलकर्णी यांच्या मुलाखतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यांच्यानंतर श्री. गणेश कुलकर्णी, धनश्री करमरकर, कियारा, सौरभ तापकीर, आनंदसागर शिराळकर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती झाल्या. या सर्वांचेच अनुभव त्यांना असणारे ज्ञान ऐकून सर्वच प्रेक्षक अगदी भारावून गेले.

संध्याकाळी बरोबर पाच वाजता माझी आणि धनश्रीताईंची मुलाखत सुरू झाली. दृष्टीहीन नृत्यांगना शिल्पा मैंदर्गी आणि तिला स्पर्शाच्या सहाय्याने भरतनाट्यम नृत्य शिकवणाऱ्या तिच्या गुरु सौ. धनश्रीताई आपटे या दोघींची मुलाखत ऐकण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर झाले होते. एखादी दृष्टीहीन मुलगी भरतनाट्यम विशारद कशी होऊ शकते याबाबत सर्वांच्याच मनामध्ये प्रचंड कुतूहल होते आणि हा गुरु शिष्याचा 25 वर्षांचा प्रवास जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

डॉक्टर उदय निरगुडकर आम्हा दोघींना कोणते प्रश्न विचारणार आहेत याची आम्हाला तसूभर ही कल्पना नव्हती. उदय जी यांनी आमची मुलाखत इतक्या कौशल्यपूर्ण रीतीने घेतली की त्यामधून आमचे गुरु शिष्याचे नाते अगदी अलगदपणे उलगडत गेले. आणि आणि गेले 25 वर्षाची आमची तपश्चर्या फळाला आली.

मुलाखतीच्या शेवटी माझ्या नृत्याचे सादरीकरण होते. श्री गणेशाचे स्मरण करून मी ही रचना सादर करायला सुरुवात केली. प्रेक्षक अगदी तन्मयतेने माझी ही रचना पहात होते. त्यांना एक दृष्टीहीन मुलगी भरतनाट्यम सादर करते आहे ही गोष्टच अद्भुत वाटत होती. आणि it’s a miracle, कमाल कमाल कमाल, अद्भुत, it’s impossible, unbeliveable अशा प्रकारच्या उद्गारांनी रसिक प्रेक्षकांनी माझ्या नृत्याला दाद दिली. माझे नृत्य संपल्यानंतर प्रेक्षक जवळजवळ पाच मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवत होते रंगमंदिर टाळ्यांच्या कडकडाटाने भारून गेले होते. मला टाळ्या ऐकू येत होत्या प्रेक्षक उभे राहून माझ्या नृत्याला ताईंच्या अथक परिश्रमाला दात देत होते हे माझ्या बहिणीने सांगितल्यावर मला समजले त्यावेळी मला माझ्या आई बाबांची खूप आठवण आली. त्यांच्याही जीवनाचे सार्थक झाले अशी भावना मनात निर्माण झाली. माझे आई बाबा, माझ्या दोन बहिणी, एक भाऊ यांनी मी दृष्टिहीन असूनही लहानपणापासूनच माझ्या प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन दिले त्यांचेही सहकार्य मला आज मनापासून आठवते. तसेच माझ्या आयुष्यात आजपर्यंत आलेल्या माझ्या अनेक मैत्रिणी यामध्ये विशेष उल्लेख करावा वाटतो त्या म्हणजे गोखले काकू, अनिता खाडिलकर, कानिटकर मॅडम यांचाही मला सतत आधार वाटत आला आहे. या नृत्यकलेमुळेच माझा हा सन्मान आहे.

अशाप्रकारे माझी आणि ताईंची मुलाखत show stopper ठरली. प्रत्येक जण आम्हा दोघींना भेटण्यास उत्सुक झाला होता. प्रत्येकाने आमच्या जवळ येऊन हातात हातात हात घेऊन आमचे अभिनंदन करून शुभेच्छा देऊन आमच्या दोघींच्या प्रयत्नांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भारतीय संस्कृती आणि भरतनाट्यम नृत्य कलेची जोपासना करणाऱ्या आमच्यासारख्या गुरु शिष्यांच्या मुलाखतीच्या गोड आठवणी मनामध्ये साठवून ठेवून प्रेक्षक रंग मंदिरातून बाहेर पडले.

आपली ही भारतीय संस्कृती भरतनाट्यम कला अशीच उत्तुंग नेण्याची माझी इच्छा आहे हे बळ माझ्या मध्ये देण्याची मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आहे.

पुन्हा एक वार स्वयं टॉक्स च्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद ! 

मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी

मिरज

दूरभाष ०२३३ २२२५२७५

शब्दांकन : सौ. अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

(🙏🙏 शिल्पाने दिलेले हे मनोगत खूप बोलके आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कविराज भूषण…’  (पूर्वार्ध) – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कविराज भूषण…’  – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(पूर्वार्ध)

महाकवी भूषण (१६१३ – १७१५) हे ‘रीतिकाल’ मधील प्रमुख हिंदी कवी गणले जातात. जेव्हा इतर कवी शृंगाररसपूर्ण काव्य रचत होते, तेव्हा भूषण यांनी वीररसाने ओतप्रोत रचना करून स्वतःला सर्वांपेक्षा वेगळे सिद्ध केले. कवी भूषण मोरंग, कुमाऊं, श्रीनगर, जयपूर, जोधपूर, रेवा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल इत्यादींच्या आश्रयाखाली राहिले, परंतु त्याचे आवडते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजा छत्रसाल हेच होते.

महाकवी भूषण मूळचे टिकवापूर या गावाचे रहिवासी होते असे मानल्या जाते. हे गाव आजच्या उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातल्या घाटमपूर तालुक्यात स्थित आहे. त्यांचे दोन भाऊ व्यापमणी आणि मतिराम हे देखील कवी होते. त्यांचे मूळ नाव ज्ञात नाही, मात्र ‘शिवराज भूषण’ या ग्रंथाच्या खाली दिलेल्या दोह्याचा संदर्भ जोडला तर, चित्रकूटचे राजे हृदय राम यांचा मुलगा रुद्र शाह याने त्यांना मानाने ‘भूषण’ ही उपाधी दिलेली होती. त्यांच्या उत्तुंग साहित्याला शोभेल अशीच ही पदवी आहे असे वाटते.  

कुल सुलंकि चित्रकूट-पति साहस सील-समुद्र।

कवि भूषण पदवी दई, हृदय राम सुत रुद्र॥ 

भूषण हे आपल्या भावांसोबत राहत असत. एकदा त्यांनी जेवतांना आपल्या भावजयीला मीठ मागितले. भावजयीने हे मीठ विकत घेण्यापुरते पैसे कमावून आणा, अशी त्यांची निर्भत्सना केली. ती जिव्हारी लागल्याने हा स्वाभिमानी कवी घर सोडून निघून गेला. (पुढे राजकवी झाल्यावर त्यांनी आपल्या भावजयीला १ लाख रुपयांचे मीठ पाठवून दिले असे म्हटल्या जाते.) कित्येक राजांच्या दरबारी राहिल्यानंतर ते पन्नानरेश राजा छत्रसाल यांच्याकडे राजकवी म्हणून रुजू झाले, तेथून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयास गेले. कांही वर्षानंतर छत्रसाल महाराजांकडे ते परत गेले. परंतु त्यांचे मन तिथे लागेना अन ते शिवरायांच्या दरबारात परतले ते कायम त्यांच्याच सेवेशी एकनिष्ठ राहण्यासाठी! खरे तर इतक्या राजांच्या दरबारी चाकरी करूनही ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल या दोनच राजांचे खरे प्रशंसक होते. त्यांनी स्वतःच आपल्या काव्यात याची कबुली दिली आहे, ती अशी-

और राव राजा एक मन में न ल्याऊं अब।

साहू को सराहों कै सराहौं छत्रसाल को॥

इसवी १७१५ मध्ये कवी भूषण मृत्यू पावले.  

कवी भूषण यांची साहित्य संपदा: 

विद्वान मंडळी मानतात की शिवराजभूषण, शिवाबावनी, छत्रसालदशक, भूषण उल्लास, भूषण हजारा आणि दूषनोल्लासा असे सहा ग्रंथांचे लेखन कवी भूषण यांनी केले आहे. परंतु यांच्यापैकी फक्त शिवराज भूषण, छत्रसाल दशक आणि शिवाबावनी हेच काव्य ग्रंथ आज उपलब्ध आहेत. कविराज यांनी शिवराजभूषणमध्ये प्रचुर अलंकारिक काव्य, छत्रसाल दशकमध्ये छत्रसाल बुंदेलाचे पराक्रम, दानशीलता आणि शिवाबावनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणवर्णन केले आहेत.

‘शिवराज भूषण’ हा एक विशाल काव्यग्रंथ असून त्यात ३८५ पद्य (काव्ये) आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याचे आणि पराक्रमाचे ओजस्वी वर्णन करणाऱ्या शिवाबावनीमध्ये ५२ कविता आहेत. बुंदेला शूर छत्रसालच्या शौर्याचे वर्णन ‘छत्रसाल दशक’ मधील दहा कवितांमध्ये केले आहे. त्यांचे संपूर्ण काव्य वीररसाने, चैतन्य तेजोमय गुणांनी आणि जोमाने भारलेले आणि रसरसलेले आहे. या काव्यांत महानायक आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि खलनायक आहे मुघल बादशहा औरंगजेब. औरंगजेबाप्रती त्यांचा हा तीव्र विरोध जातीच्या वैमनस्यावर आधारित नाही तर एका जुलमी आणि नृशंस शासकाच्या दुष्कृत्यांविरुद्ध आहे.

रीतिकाव्याची सर्वात महान उपलब्धी होती हिंदीच्या एका सुसंस्कृत आणि सहृदय समाजाची निर्मिती. या काळात सांस्कृतिक आणि कलात्मक वैभवाने चरम सीमा गाठली होती. कलात्मक काव्य या काळात प्रचुर मात्रेत रचल्या गेले.वाकपटू कवींच्या माध्यमातून मुळातच गोड अशी ब्रज भाषा आणखीच रमणीय झाली. लवचिक, भावपूर्ण आणि लालित्यपूर्ण शब्दार्थांच्या अभिव्यक्तीमुळे ही राजस भाषा त्या काळातल्या कवी मंडळींची लाडकी ‘काव्य भाषा’ बनली. त्या काळात शृंगार रसाने परिष्कृत काव्य हे सर्वाधिक परिचित आणि रसिकमान्य होते.

भूषण यांच्या काव्यातील वैशिष्ट्ये:

मात्र या शृंगारिक वातावरणात भूषण यांचे मन रमेना. मुघलांचे हिंदूंवर होत असलेले निर्घृण अत्याचार ते सतत बघत होते. आपला समाज लाचार, बलहीन आणि चैतन्यशून्य झाला होता. म्हणूनच देशभक्तीची ज्योत जगवणे हेच आपले इतिकर्तव्य समजून कवी भूषण यांनी रीतिकालाच्या मळलेल्या वाटेवर चालण्याचे नाकारले. प्रवाहाविरुद्ध पोहत त्यांनी वीररसाने परिपूर्ण अशा काव्य रचना केल्या आणि अखिल आयुष्याचे तेच उद्दिष्ट ठेवले. त्यांच्या प्रत्येक कवितेची मूळ भावना शौर्याचे गुणगान करते. हिंदुत्वाचा सार्थ अभिमान आणि त्यांच्या नायकांच्या अद्वितीय शौर्याचे वर्णन हेच त्यांच्या कवितेचं गमक आहे. भूषण यांची काव्य शैली त्यांच्या विषयास अत्यंत अनुकूल आहे, तसेच ओजपूर्ण आणि वीररसपूर्ण आख्यान मांडायला सर्वथा उपयुक्त आहे. प्रभावोत्पादक, प्रसंगात्मक चित्रमयता आणि सरस शब्दालंकार योजना भूषण यांच्या काव्यशैलीची मुख्य वैशिष्ठे आहेत. या महान देशभक्त कवीने मुघलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आणि निराश झालेल्या हिंदू समाजात आशा निर्माण करून त्यांना संघर्ष करण्यास प्रोत्साहित केले. हा विषय मांडतांना त्यांनी छत्रपती शिवाजी आणि राजा छत्रसाल हे काव्य नायक निवडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल लिहितांना भूषण यांच्या लेखणीला हजारो धुमारे फुटलेले बघायला मिळतात. ‘शिवभूषण’ या काव्यग्रंथातील एक काव्य स्फुल्लिंग बघा. 

सबन के ऊपर ही ठाढ़ो रहिबे के जोग, ताहि खरो कियो जाय जारन के नियरे,

जानि गैर मिसिल गुसीले गुसा धारि उर, कीन्हों न सलाम, न बचन बोलर सियरे।

भूषण भनत महाबीर बलकन लाग्यौ, सारी पात साही के उड़ाय गए जियरे,

तमक तें लाल मुख सिवा को निरखि भयो, स्याम मुख नौरंग, सिपाह मुख पियरे॥’

औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांना जेव्हां सहा हजारी मनसबदारांच्या ओळीत स्थान देण्यात आले, तेव्हां या अपमानाने ते पेटून उठले. भर दरबारात ते क्रोधावेशाने औरंगजेबास दरबारात तक्रार करू लागले, त्या दृश्याचे चित्रण या रौद्ररसाने भरलेल्या काव्यांशात केले गेले आहे. 

अर्थ: मुघल दरबारात सर्वोच्च स्थानी उभे राहण्यास सक्षम असलेल्या सर्जा शिवाजीचा अपमान करण्याच्या उद्देशानेच त्यांना ते आसन दिलेले होते. औरंगजेबाच्या या अपमानजनक वागणुकीमुळे शिवाजी संतप्त झाले, त्या वेळी त्यांनी औरंगजेबाला सलाम केला नाही आणि दरबाराच्या शिष्ठतेनुसार विनम्र शब्द देखील उच्चारले नाहीत. महाबली शिवाजी रागाने गर्जना करू लागले आणि त्याचे हे क्रोधायमान वर्तन पाहून मुघल दरबारातील सर्वांच्या मनात चलबिचल होऊन ते घाबरून किंकर्तव्यमूढ झाले. रागाने लाल झालेला शिवरायांचा चेहरा पाहून औरंगजेबाचा चेहरा काळवंडला आणि सैनिकांची तोंडे कमालीच्या भीतीग्रस्ततेने पिवळी पडली.

धर्मरक्षक शिवाजी महाराजांचे कवी भूषण यांनी केलेले काव्य वर्णन:

हिंदू धर्माच्या अतिरेकी द्वेषाने पछाडलेला मुघल बादशहा औरंगजेब जेव्हां हिंदू समाजावर, त्यांच्या धर्मावर आणि संस्कृतीवर घाला घालत होता, तसेच मुस्लिम धर्माची पाळेमुळे हिंदुस्तानात रुजवण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हां गो ब्राम्हण प्रतिपालक, हिंदू धर्माचे रक्षणकर्ते म्हणून छत्रपती शिवराय अखंड प्रयत्नशील होते.  त्याच संदर्भातील हे वर्णन बघा!

देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डूबे राव राने सबी गये लबकी,

गौरागनपति आप औरन को देत ताप आप के मकान सब मारि गये दबकी।

पीरा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत सिद्ध की सिधाई गई रही बात रबकी,

कासिहू ते कला जाती मथुरा मसीद होती सिवाजी न होतो तौ सुनति होत सबकी॥

अर्थ: संपूर्ण हिंदुस्थानात हिरवी फडकी ज्यावर चंद तारे कोरले आहेत अशी फडकी फडकताना दिसत होती. मोठमोठाले राजे मात्तब्बर राजे मुसलमानांचे मांडलिक झाले होते. साधू संतांची सिद्धी फळाला येत नव्हती तसेच तपश्चर्या कामाला येत नव्हती. अशावेळी कविराज भूषण गणरायाला लटक्या रागाने विचारतात: अहो गणराय आणि श्री गौरी तुम्ही खरे असुर संहारक परंतु तुम्ही देखील तुमच्या देवळात दडी मारून बसलात. अहो छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्याचे काम हाती घेतले नसते तर काशीची कला लयाला गेली असती, मथुरेत मशीद वसली असती आणि आम्हा सर्व हिंदूंना सुंता करून घ्यावी लागली असती!

भारतीय संस्कृतीचे जाणकार कविराज भूषण:  

हिंदूंना त्यांची हरवलेल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी कविराजांनी संस्कृतीचा उचित वापर केला. त्यांनी अनेक देवी-देवतांच्या कार्यांचा उल्लेख केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांची गणना त्या महान देवी देवतांच्या कार्यांच्या श्रेणीत केली. शिवाजी महाराजांना धर्म आणि संस्कृतीचे प्रणेते म्हणून त्यांनी आपल्या काव्यात चित्रित केले. खालील ओळी त्याच्याच परिचयक आहेत.  

बेद राखे बिदित पुरान परसिद्ध राखे राम-नाम राख्यो अति रसना सुघर में। 

हिंदुन की चोटी रोटी राखि है सिपाहिन की काँधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में। 

मीड़ि राखे मुग़ल मरोड़ि राखे पातसाह बैरी पीसि राखे बरदान राख्यो कर में। 

राजन की हद्द राखी तेग-बल सिवराज देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में॥ 

अर्थ: भूषण म्हणतात की महाराज शिवाजींनी आपल्या अफाट सामर्थ्याच्या जोरावर हिंदू धर्माचे रक्षण केले. औरंगजेबाला परास्त करून त्याने वेदांसारख्या हिंदू धर्मग्रंथांना नष्ट होण्यापासून वाचवले आणि दुसरीकडे वेदांमध्ये असलेल्या ज्ञानाचा प्रसार केला. याशिवाय त्यांनी हिंदू धर्माचे सार असलेल्या पुराणांचे रक्षण केले आणि रामनामाचे महत्त्वही अबाधित ठेवले. त्यावेळी हिंदूंची धार्मिक प्रतीके मुस्लिमांकडून नष्ट केली जात होती. त्यांनी हिंदूंना डोक्यावरील केसांच्या शेंड्या (शिखासूत्र) कापण्यापासून वाचवले आणि त्यांना उदरनिर्वाह देऊ केला. त्यांनी हिंदूंना त्यांच्या गळ्यात पवित्र जानवे (यज्ञोपवीत) आणि तुळशीमाळ घालण्याचे संरक्षण दिले. त्यांनी दिल्लीच्या पातशहाचे कंबरडे मोडले आणि त्याच्या सर्व शत्रूंचा नाश केला. राजांच्या हातात देवतुल्य वरदहस्ताची शक्ती होती, अर्थात जो कोणी त्यांच्या आश्रयास गेला, त्याला त्यांनी आपल्या पंखांखाली घेतले. या महान राजाने हिंदू राजांच्या राज्याच्या सीमांचे रक्षण केले आणि आपल्या तळपत्या तलवारीच्या बळावर देवस्थानांचे रक्षण केले. इतकेच नव्हे तर शूरवीर शिवाजी राजाने प्रत्येक घराघरात स्वधर्म (हिंदू धर्म) अबाधित राखला. 

उत्तरार्धात कविराज भूषण यांच्या अशाच काही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत अशा काव्य रचना बघू या.  

– क्रमशः भाग पहिला (पूर्वार्ध)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares