मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ।। एक होती राणी।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

??

।। एक होती राणी ।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले

मला  माणसांशी बोलायला, त्यांच्याशी संवाद साधायला फार आवडतं आणि खरं सांगायचं तर ते जमतंही पटकन ! माणसं मनातल्या गाठी माझ्याजवळ उकलतात हे मात्र खरं. त्यादिवशी दवाखान्यात नुसतीच बसले होते. मनात दुसरेच विचार घोळत होते. इतक्यात एक बाई दवाखान्यात शिरली. मी नीट बघितलं तर ती एक तृतीयपंथी व्यक्ती होती.

“ दीदी,आप मुझे दवाई दोगी क्या? पेटमें बहुत दर्द हो रहा है “. ती कळवळून सांगत होती. मी तिला टेबलवर घेतले आणि नेहमीप्रमाणे तपासले. ‘ माझ्याजवळच्या गोळ्या लगेच घ्या ‘असं सांगितलं आणि घरी घ्यायला दोन दिवसाचं औषधही दिलं. पाण्याचा ग्लास पुढं केला आणि ‘ गोळ्या घ्या ‘ असं म्हटलं. तिने त्या गोळ्या घेतल्या आणि मी म्हटलं,” थोडा वेळ बसा इथं खुर्चीवर.अर्ध्या तासानंतर जा.बघूया किती कमी होतं ते हं.” मी तिला बसवलं आणि वाचनात गुंगून गेले.अर्धा तास सहज झाला. ती संकोचून म्हणाली, “दीदी मला  खूप बरं वाटायला लागलंय. खूप थांबलंय पोट दुखायचं. थँक्स दीदी “.ती स्वच्छ मराठीत माझ्याशी बोलत होती. “अहो,तुमचं नाव काय? कुठं रहाता? ” – “ दीदी, इथंच तर रहाते मी ! तुम्ही रोज स्कूटरवरून त्या शॉर्टकटने येता ना, मी रोज बघते तुम्हाला. आज खूप त्रास व्हायला लागला ना, म्हणून तुमची आठवण आली. नाहीतर कोणी डॉक्टर आम्हाला तपासायला तयार होत नाहीत. तुमचे खूप आभार ! “

मी म्हटले “ नाव काय म्हणालात तुमचं? ”  

“ राणी “ किती सुंदर होती राणी . नीट बघितल्याशिवाय समजणारही नाही हिच्यात असं काही कमी आहे.

 “ दीदी,किती पैसे झाले? “ 

 मी म्हटलं “ राहू द्या हो !मग बघू.”

” असं नको !आहेत माझ्याकडे.” ती संकोचून म्हणाली. 

मी म्हटलं, “ पुढच्या वेळी द्या नक्की. आज राहू दे. “ 

राणी खुशीनं हसली .तिचे अगदी एक ओळीत असलेले पांढरेशुभ्र दात चमकले.  हळूहळू राणी माझी नेहमीची पेशन्ट झाली. माझ्या दवाखान्यात बाकावर बसलेल्या इतर पेशन्टनाही  तिची सवय झाली होती.  किती अदबशीर वागणं होतं तिचं ! आपला नंबर येईपर्यंत ती टेबलावर ठेवलेली मासिकं वाचायची. माझ्या चौकस स्वभावानुसार मी हळूहळू तिची माहिती विचारायला लागले. 

राणीचं कुटुंब पुण्यातलंच ! मी जिथून शॉर्टकटने येते त्या वस्तीत तिची आई भाऊ त्याची बायका मुले सगळे एकत्रच रहातात. राणीचा भाऊ सिक्युरिटी गार्ड आहे. भावजय एका मॉलमध्ये नोकरी करते. राणी खरं तर एस.एस.सी.झालीय,  पण आपल्या इथले दुर्दैव ! तिला कुठेही नोकरी मिळाली नाही. पण राणी फार उत्तम शिवण शिवते. तिच्याकडे वस्तीतल्या सगळ्या बायका कपडे शिवायला टाकतात. निरनिराळे फॅशनेबल  ब्लाउज राणी इतके सुंदर शिवते की बस. वस्तीतल्या बायका तिच्याशी अगदी मैत्रिणीसारख्या वागतात. 

सहज एकदा तिला विचारलं, “ किती ग मिळतात महिन्याला पैसे?” 

” मिळतात की सहज दहा हजार रुपये ! “ ती म्हणाली. मी हे ऐकून गारच पडले. तशी राणी हसून म्हणाली, “ दीदी,तसं नाही. माझं शिवण बघून कॅम्पमधला एक माणूस मला शोधत आला. मला बघून म्हणाला, ‘अरे बापरे, तूच का ती राणी ?”  मी म्हणाले, “ हो मीच ! नेमकं काय काम आहे तुमचं माझ्याकडे ? “  तो म्हणाला, “ तुमचं शिवण फार छान आहे. मी तुम्ही शिवलेले ब्लाउज बघितले आहेत, माझ्या एका गिऱ्हाईकाने घातलेले ! तिने तुमचा पत्ता दिला ! पण ….” आणि तो माणूस क्षणभर काहीच बोलला नाही.  मग अवघडत म्हणाला .. “ पण तुम्हाला माझ्या दुकानात नोकरी नाही देऊ शकणार मी ! “ मग मीच आपणहून त्यांना म्हटलं ..  “भय्या, तुम्ही मला कटिंग करून आणून द्या, मी तुम्ही सांगाल तसे देईन शिवून. माझी ऍक्टिवा गाडी आहे. मी आणून पोचवीन की दुकानावर.” मी त्यांना नमुन्याचे ब्लाउज आणि ड्रेस शिवून दिले. तो इतका खूष झाला. आता माझ्याकडे त्याचे खूप काम असते. मला सहज दहा हजार रुपये मिळतात त्याच्याकडून. दीदी, मी आता फॅशन डिझाइन मशीनही  घेतली आहे मागच्या वर्षी ! “ किती अभिमानाने राणी सांगत होती. 

मला राणीचं अतिशय कौतुक वाटलं. मी दवाखान्यात जातायेता राणी दिसायची. रस्त्यावरच घर होतं त्यांचं ! राणी भांडी घासताना, केर काढताना दिसायची. तिची आई, शेजारणी, गप्पा मारताना दिसायच्या. राणी बाहेर टाकलेल्या खाटेवर बसून तिच्या भाचरांचा अभ्यास घेतानाही दिसायची कधीकधी. मला मोठं कुतूहल आणि कौतुक वाटायचं या कुटुंबाचं. मी राणीच्या आईला हळूहळू बोलतं केलं. राणीच्या आई फार साध्या, अगदी गरीब स्वभावाच्या होत्या. मी बिचकतच विचारलं, “ राणीच्या आई, असं मूल झाल्यावर तुम्हाला काय वाटलं हो? राग  नाही ना आला माझा? नाहीतर नका देऊ उत्तर.” — “ नाही हो बाय ! कसला राग आणि काय ! पहिला मुलगा माझा एकदम छान हो. त्याच्या पाठीवर  हे बाळ झालं. आम्ही घाबरूनच गेलो असलं मूल बघून. तो डॉक्टर म्हणाला, “ देऊन टाका याला कोणत्यातरी आश्रमात. तुमचं आणि त्याचं जिणं हराम होईल बघा.”  पण माझा जीव नाही झाला हो असं करायला. म्हटलं मी वाढवीन याला. कसाही असला तरी माझ्या पोटचा आहे ना हा. चार वर्षे होईपर्यंत मी मुलगा म्हणूनच वाढवला याला. पण मग मोठं झाल्यावर तो मुलाचे कपडे घालीचना. बहिणींचे फ्रॉक, स्कर्ट घालायचा. दिसायलाही किती सुंदर आहे तुम्ही बघताच की ! मग मी त्याला मुलींसारखा वाढवला. लै हाल काढलं लेकरानं शाळेत. पण झाला बघा एसएससी. पण नोकरी कोण देणार हो याला… पण देवानं बघा कशी कला ठेवली हातात. मस्त पैसे मिळवते राणी. आम्ही मोठ्या भावाचं लग्न करताना हेही सगळं आपणहूनच सांगितलं. त्या मुलीला याला भेटायला पण सांगितलं. तीही पोरगी इतकी गुणांची बघा, म्हणाली, ‘ मला आवडल्या राणीताई. मी एकत्र राहीन तुमच्या सगळ्यांबरोबरच. आणि बघा आता, आज किती वर्षे झाली, मोठ्या भावाला दोन लेकरं झाली. अजूनही आम्ही सगळे गुण्या गोविंदानं राहतोय बघा. तेवढं व्यंग सोडलं तर काय कमी आहे हो माझ्या राणीत? बायकांना मागं सारील अशी कामं करती माझी राणी. वस्तीत पण सर्वांना आवडती बघा. धावून जाती मदतीला लोकांच्या. तिचा मोठा भाऊ म्हणायचा, ‘राणीला सिग्नलला टाळ्या  वाजवून पैसे  मागताना नाही बघायची आपल्याला. तिला पायावर उभी करू आपण.’  कोणी चेष्टा केली तर हा धावून जायचा अंगावर. खूप केलं त्यानं राणीसाठी ! आता वस्ती धड वागती…  पण आधी? जिणं हराम केलं व्हतं आम्हाला याच लोकांनी. पण राणीनं सगळं निमूट सोसलं. आपल्या गोड स्वभावानं जिंकून घेतलं लोकांना. म्हणून आज उभी आहे मानानं. भाऊ भावजयीचा भक्कम आधार आहे तिला.” राणीच्या आई सांगत होत्या. क्षणभर थांबल्या आणि आवंढा गिळत म्हणाल्या, “ काय सांगू डाक्टरबाई, पन्नासवेळा आले हिजडे, आमचं आहे हे मूल, आम्हाला देऊन टाक. तिच्या भावाने मग पोलीस  कम्प्लेन्ट केल्यावर गेले बघा. खूप दिलाय त्रास त्यांनी पण हो. पण आता सगळं छान आहे. काळजी वाटतं हो की हिचं पुढचं आयुष्य कसं जाईल. पण भाऊ भावजय सांभाळतील नीट. खूप चांगले आहेत दोघे.”  राणीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाल्या,” असतात तुमच्यासारखी देवमाणसं पण जगात. तुम्ही नाही का, कोणत्याही चौकश्या न करता औषध दिलं त्या दिवशी ! राणी लै नाव काढती बघा तुमचं.” 

त्या दिवाळीला मी माझ्या मुलींचे दोन ड्रेस  राणीकडे शिवायला टाकले. राणी दवाखान्यात आली. म्हणाली, “ ताई,दोघींचे ड्रेस शिवून तयार आहेत. पण एक विचारू? मला तुमच्या घरी बोलवाल का? मला खूप आवडेल तुमच्या मुली, घर हॉस्पिटल बघायला. बोलवाल का?’ माझ्या पोटातच तुटलं. किती साधी अपेक्षा यामुलीची ! मी म्हटलं, “ अग त्यात काय ! ये की या रविवारी. मला सुट्टी असते ना तेव्हा.”  

ठरल्या दिवशी राणी आपल्या आईला घेऊन ऍक्टिव्हावरून ऐटीत आली. छान साडी, माफक मेकअप. माझ्या सगळ्या नर्सेस,आया बघतच राहिल्या. मी राणीला हॉस्पिटल दाखवलं, सगळ्या स्टाफशी ओळख करून दिली. राणी वर घरात आली. माझ्या देवघरात तिने डोक्यावर पदर घेऊन देवांना नमस्कार केला. माझ्या मुलींना जवळ बोलावलं आणि म्हणाली, ‘ बघा ग पोरीनो… आवडले का मावशीनं शिवलेले ड्रेस?”  त्यांनी तिला ते लगेच घालून दाखवले. काय सुरेख शिवले होते आणि किती सुंदर एम्ब्रॉयडरी केली होती राणीनं ! केवळ अप्रतिम ! माझ्या मुलींची अलाबला घेऊन म्हणाली, “ सुखात रहा ग पोरीनो. आई कसली, देवी आहे देवी तुमची आई ! माझी पण आईच आहे हो ही.” माझ्या बाईने केलेले पोहे ,लाडू आनंदानं खाल्लं दोघीनी. मी राणीला सुंदर भारी साडी आणि तिच्या आईलाही साडी दिली. डोळ्यात पाणीच आलं दोघींच्या. “ कशाला हो बाई? आमच्याशी इतकं चांगलं कुणीपन वागलं नाही हो आजपर्यंत ! तुम्ही खूप वेगळ्या आहात बाई ! देव तुम्हाला काही काही कमी नाही पडू देणार ! “ राणीच्या आईनी म्हटलं. “ अहो त्यात काय एवढं? माझ्या मैत्रिणींना नाही का मी देत? तुम्हीही नाही का माझ्या मैत्रिणी? आणि राणी लहान मैत्रीण !”  राणीनं माझं हॉस्पिटल हिंडून नीट बघितलं. पाळण्यातली लहान बाळं बघितली. आमच्या नर्सेस, आयांशी गप्पा मारल्या  आणि हसतमुखाने गेली सुद्धा.

सगळा स्टाफ हळहळला तिच्यासाठी ! “ बया,द्येव तरी कसा बाई अन्याय करतो हो एखाद्यावर ! किती हो गुणांची आहे तुमची राणी !”  आमची सिस्टर मनापासून कळवळून म्हणाली. 

याही गोष्टीला खूप वर्षे लोटली. नंतर राणीच्या भावाने ती जागा सोडली आणि ते मुंबईला गेले असं ऐकलं मी. अजूनही मला राणीची आठवण येते. कोणी तृतीयपंथी सिग्नलवर पैसे मागताना दिसला तर सांगावेसे वाटते…… 

…… “ अरे,त्या राणीचं उदाहरण घ्या रे ! बघा किती सन्मानाने जगतेय ती आयुष्य. देवानं एवढा अन्याय करूनही कधी तिने त्याला दोष नाही दिला.” …… अजूनही वाटतं कधीतरी …..  राणी अशीच समोर येऊन उभी राहील आणि विचारील, “ बाई, बऱ्या आहात ना? राणीला विसरला नाहीत ना?” आणि माझे डोळे माझ्याही नकळत पाणावतात राणीसाठी !

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भांडणाचे नियम…” – लेखिका :सौ. मुक्ता पुणतांबेकर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “भांडणाचे नियम…” – लेखिका :सौ. मुक्ता पुणतांबेकर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

‘घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागायचंच,’ हे वाक्य आपण नेहमी ऐकतो.

आमच्याकडे व्यसनाधीनतेच्या काउंसेलिंगसाठी मुख्यतः फोन येतात. पण काही वेगळ्या कारणांसाठीही येत आहेत. ‘घरातली भांडणं’ हा देखील महत्वाचा विषय झाला आहे.

परवाच पत्नीबरोबरच्या सततच्या  भांडणाला वैतागलेल्या एका गृहस्थांचा फोन आला. ते म्हणाले “तुम्ही काउंसेलर आहात तर ही भांडणं थांबवण्याचा उपाय सांगा”.

मी त्यांना म्हटलं, “भांडणं पूर्ण थांबवता तर येणार नाहीत. पण तुम्ही भांडणाचे नियम पाळले, तर त्यांची तीव्रता नक्कीच कमी होईल”.

‘भांडणाचे नियम’ हे माझे शब्द ऐकताच त्यांना आश्चर्य वाटलं. पण हे नियम समजून घेण्याची त्यांना उत्सुकता होती.

म्हणून मी त्यांना विचारलं, “नुकत्याच झालेल्या भांडणाविषयी सांगा”.

ते म्हणाले, “कालच हिने मला अजिबात न आवडणारी भाजी केली. माझी चिडचिड झाली. मी तिला बोललो. ती ही बोलली आणि आमचं मोठं भांडण झालं.”

हे ऐकताच मी त्यांना म्हटलं, “भांडणाचा पहिला नियम आहे भांडणाचा विषय बदलायचा नाही. ज्या विषयावर भांडण सुरू होतं, त्याच विषयावर भांडायचं. म्हणजे भांडण पराकोटीला जात नाही.”

त्यांना हे फारच पटलं. ते म्हणाले, ” भाजी वरून भांडण सुरू झालं. मग ती चिडली. माझ्या घरचे लोक, आईने मला कसं लाडावून ठेवलं वगैरे बोलायला लागली. मग मीही तिच्या घरच्या पद्धतींवर बोलायला लागलो. लग्नात जेवायचा मेनू त्यांनी चांगला ठरवला नव्हता. ती आठवण करून दिली. मूळ विषयापासून आम्ही फारच भरकटलो. पण आता मात्र आम्ही तुमचा हा भांडणाचा नियम पाळणार”.

त्या गृहस्थांची बोलल्यावर मला हे नियम सगळ्यांनाच सांगावेसे वाटायला लागले. आपण सगळ्यांनी हे नियम पाळले तर भांडणं झाली तरी नातेसंबंध बिघडणार नाहीत.

१) भांडणाचा विषय बदलू नका. ज्या विषयावर भांडण सुरू झाले, त्याच विषयावर भांडा. विशेषतः पती-पत्नींनी भांडतांना ‘सासर- माहेर’ मुळीच मध्ये आणू नका.

२) भांडणाला टाईम लिमिट ठेवा. काही घरांमध्ये भांडण झालं की  २-३ दिवस ते सुरू रहातं. नंतर अबोला असतोच. सर्वांनी मिळून एक वेळेची मर्यादा ठरवता येईल. अर्धा तासाची ठरवली तर अर्धा तास झाल्यावर स्टॉप म्हणून लगेच सर्वांनी गप्प बसायचं. (खरंतर पहिला नियम पाळून विषय बदलला नाही. तर जास्त वेळ भांडता येतच नाही. एकाच विषयावर काय काय बोलणार !)

३) तिसऱ्या व्यक्तीसमोर भांडू नका. दोघंच असताना भांडा. तिसरी व्यक्ती समोर असेल तर अपमान वाटतो. मनं दुखावतात. मुलांसमोर तर भांडण अजिबात नको. त्यांना असुरक्षित वाटतं.

४) एक व्यक्ती चिडली असेल तर दुसऱ्याने गप्प बसा. दोघंही एकदम चिडले तर भांडण विकोपाला जाऊ शकतं. त्यामुळे आपली जवळची व्यक्ती चिडली असेल तर तिला समजून घ्यायला हरकत नाही.

५) स्वतःच्या भावना ओळखा. शांतपणे व्यक्त करा. थकवा, भूक, टेन्शन अशी रागाची वेगवेगळी कारणं असतात. चिडचिड होत असेल तर ती कशामुळे हे शोधून काढून, लोकांवर चिडण्यापेक्षा त्यांना आपण कारण सांगू शकतो. आमच्या घरात ज्याची चिडचिड होत असेल,तो सांगतो की मला थोडा वेळ माझी स्पेस हवी आहे आणि आतल्या खोलीत जाऊन बसतो. अशावेळी त्याच्या मागे लागण्यापेक्षा आम्ही त्याच्या स्पेसचा आदर राखतो.

६) टोमणे मारु नका. टोमणे मारणे, उपहासात्मक बोलणे हे नातेसंबंधावर वाईट परिणाम करतात. त्यामुळे या गोष्टी संवादातून काढून टाकलेल्याच बर्‍या.

७) भडकू नका. काही वेळा मुद्दाम आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण चिडावं, असा त्या व्यक्तीचा उद्देश असतो. तो सफल होऊ देऊ नका. शांत रहा. आपल्या परवानगीशिवाय कोणीच आपल्याला भडकवू शकत नाही. सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असेल तर हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. आपण बिचारे म्हणून गप्प बसणार नाही. तर आपण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहोत म्हणून गप्प बसणार आहोत. कारण बोलण्यापेक्षा गप्प बसायला जास्त शक्ती लागते.

८) मध्यस्थाची मदत घ्या. भांडणं कमी होतच नसतील तर जवळच्या मित्र-मैत्रिणी किंवा काउंसेलरची मदत घेता येईल.

मला आठवतील तेवढे नियम मी लिहिले. तुम्ही यात भर घालू शकता.

चला तर मग…

भांडा सौख्यभरे!

लेखिका :सौ.मुक्ता पुणतांबेकर

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : आईस्फ्रूट… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : आईस्फ्रूट… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“ ए आये घी ना त्यो आईसफ्रुटचा लाल लाल गोळा… मला पाहिजी म्हंजं पाहिजीच.. लै दात शिवशिवालया लागल्यात बघ…गाडी सुटायच्या आदुगर मपल्याला हानून दी.. ती बाकिची पोरास्नी त्याचं आई बा कसं घेऊन देत्यात बघं तिकडं.. ती पोरं माझ्याकडं बघून तोंड वाकडं करूनदावत खिदळतात बघं.. तुला न्हाई तुला न्हाई म्हनून चिडीवित्यात… आये  तू बापसा संग भांडान काढूनशान निघालीस माहेराला… मला अंगावरच्या फाटक्या बंडीवर तसच उचलून.. खाली चड्डी तरी हाय काय नाय ते बी तूझ्या ध्यानात नाही… तापलेल्या इंजिनावनी डोस्कं तुझं संतापलेलं.. उन्हानं कावलेली एस.टी. पकडली…तापलेली सीट,झळा मारणारा वारा जीवाची लाही लाही करत,फारफुर फारफुर करत उर धपापत वेगानं धावणारी ती एस. टी…आतल्या माणसांना बेजार करत रस्ता कापत निघालेली.. सोताच्या इचाराच्या गुंतवळयात आडकलेली .माझी बी खबर घेईनास तू.. बा पोरं भुकेज्याल़ं असलं.. तहान लागली असलं काय बी कळंना तूला… म्या सारखं आये आये म्हनून कवाधरनं मागं लागलूया परं.. तू गप. बैस किरं मुडद्द्या.. बापावानीच छळतूया मेला म्हनून माझयावरच ढाफरतीस… मी तुझ्याच पोटचा गोळा हायं नव्हं मगं मला दि की  त्यो गोळा …न्हाईतर हि खिडकीची दांडीच कडाकडा मोडून खातो बघ… मगं दात तुटलं तरं बेहत्तर…  नि बा ला माघारी बोलवायला  आल्यावर तुला लै रागवायला सांगतो का न्हाई बघ !..” . 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ मन… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

… दोनच अक्षरी साधा शब्द ‘ मन ‘ ! पण या शब्दाची व्याप्ती मात्र अमर्याद. त्याचा आकार तरी कसा वर्णावा बरे? तेही अवघड काम —- कधी मन खसखशीएवढंं, तर कधी त्याहून सूक्ष्म अणुरेणूएवढं सुद्धा बनतं. तर कधी अगदी त्या विशालकाय आकाशातही मावणार नाही इतकं प्रचंड रुप धारण करु शकतं.

मन इतकं लहरी असतं की कोणी त्याचा हातच धरु शकणार नाही. कधी मन स्वच्छंदीपणे विहरतं,  तर कधी हळवं होतं, कधी विचारी बनतं. कधी हेच मन घमेंडखोर बनतं नि बढायांना गोंजारु लागतं. कधी-कधी हेच मन उत्साही बनतं नि नवनिर्मिती करु पाहतं. कधी ते लाडीक बनतं, प्रेयसीला, सवंगड्यांना हाकारु पाहतं, तर काही वेळा तुसडं बनून सर्वांनाच दूर-दूर लोटू पाहतं. मन स्वप्नाळु बनतं नि दिवास्वप्न रेखाटू पाहतं. तर कधी दु:खी बनून अश्रू साठवीत राहतं.—- .असं हे बहुरंगी भावार्थ साठविणारं मन  त्याविषयी बोलावं तेवढं थोडंच. .म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामीसुद्धा करुणाष्टकात म्हणतात _

अचपळ मन माझे नावरे आवरिता

तुजविण शीण होतो,धाव‌ रे धाव आता ||

खरच हे अचपळ मन ताब्यात ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत, कारण असं म्हणतात की ” मन जिंकी तो जग जिंकी |”

मनावर चांगले संस्कार होण्यासाठी आपण लहानपणापासून घरात शुभंकरोती, देवाची स्तोत्रे,परवचा म्हणत असतो. कुठलीही गोष्ट प्रथम मनात आली तरच तिचा  विचार होऊन कृती घडते. म्हणूनच आपण जर मनावर सुसंस्कारांचे धडे बिंबवले तरच या समाजात सहृदय, संवेदनशील व्यक्ती निर्माण होतील. 

एकनाथ महाराजांची एक गोष्ट सांगितली जाते—गंगेच्या पाण्याने भरुन आणलेली कावड  त्यांनी तहानलेल्या गाढवाच्या मुखी सोडली नि त्याला तृप्त केले. अशा गोष्टी जर बालपणी मुलांना सांगितल्या तर भूतदया कशी दाखवावी हे या उदाहरणावरून चांगल्या प्रकारे लक्षात येतं. त्यामुळे मन चांगल्या संस्कारानी लहानपणीच समृद्ध केलं तर भावी पिढी सुशील,सदवर्तनी नि सेवाभावी बनेल. श्री समर्थ रामदास स्वामींनी 

‘मनाचे श्लोक‘ रचले आहेत, त्यामागे मन भक्कम बनविणे हाच मुख्य हेतू आहे. म्हणूनच आपलं मन स्वच्छ,शुद्ध, पारदर्शक ठेवून योग्य विचार मनात आणले  तर आपली प्रगती योग्य  दिशेने, योग्य प्रकारे होईल यात शंकाच नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी कोणत्याही वयात मनावर योग्य नियंत्रण ठेवलं पाहिजे. सकारात्मक विचारातूनच मनाची उत्तम मशागत होते‌ नि योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो.

चला तर, प्रत्येक गोष्ट मनापासून करु या. मग ते चित्र रेखाटन असो, रांगोळी असो की परीक्षेसाठी उत्तम तयारी करणे असो. कोणतही  मोठ्ठं अवघड काम सुद्धा आपण मनावर घेतलं तर आपण निश्चितच पुरं करु शकतो.

मनमें है विश्वास, पूरा है विश्वास |

हम होंगे कामयाब एक दिन —

मनात आहे विश्वास … पूर्ण आहे विश्वास 

एक दिवस होऊ यशस्वी … आहे पूर्ण विश्वास ||

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रीमंत पदर… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? मनमंजुषेतून ?

☆ श्रीमंत  पदर… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आपल्या संस्कृतीत सोळा श्रृंगार सांगितले आहेत, त्यातील एक साडी परिधान करणे हा आहे. मग साडी म्हटलं की ओघाने पदर येणारच•••

पण राज्य बदलले की साडी तीच रहाते पण पदर घ्यायची पद्धत बदलते. कोणी डाव्या खांद्यावर घेतो कोणी उजव्या खांद्यावरून पुढे घेतो, कोणी त्याला चावीचा गुच्छा बांधून दुसर्‍या खांद्याच्या मागे सोडतो कोणी डोक्यावर घेतो कोणी दोन खांद्यावर कोणी डोक्याच्याही पुढे चेहर्‍यापर्यंत ओढतात तर कोकणी स्त्रिया चक्क कमरेला गुंडाळतात. कसेही कोणत्याही प्रकारचे पदर घेतलेले हे स्त्रीचे रूप नेहमीच मनाला मोहवित आले आहे. 

पण या पदराची किमया त्याच्यापुढे लावलेल्या क्रियापदामुळे कृष्णलीला वाटतात. या पदराच्या लीला काही पाहिलेल्या काही अनुभवलेल्या काही ऐकलेल्या एकत्र वाचायला नक्कीच मजा येईल.

दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेली उषा आईला म्हणाली आई हीच साडी तू घे. अगं पदर बघ किती छान आहे . युनिक आहे युनिक. 

नुकताच पदर आलेल्या म्हणजे पदरेकरीण झालेल्या आपल्या लेकीचं ज्ञान पदरात पडलं आणि तीच साडी आईने घेतली. 

जरी पदरेकरीण झाली असली तरी आईचा पदर धरून चालणे तिची सवयच होती. आईने पदर खोचून दिवाळीची सफाई केली.

दिवाळीच्या वेळेस आईने लक्ष्मी पुढे पदर पसरला म्हटली सगळ्या चुका पदरात घे आणि सगळ्यांचे सुख आरोग्य पदरात टाक गं आई. माझ्या पदरी निराशा नको येऊ देऊ.

आईचा जरतारी पदर भरून पावला होता जणू. पदरात मावेल एवढे दान मिळाल्याचा भास तिला झाला होता पण पदरात न मावेल एवढा आनंद उत्साह चेहर्‍यावरून ओसंडत होता.

त्याच उत्साहात दिवाळी संपली आणि आई उषाला म्हणाली आता पोरी तू मोठी झालीस. आता आईच्या पदरामागे लपणे, आईच्या पदराला तोंड पुसणे, शेंबुड पुसणे असे करायचे नाही. आता आपल्या पदराला आपणच जपायचे . पदर ढळू देऊ नकोस. पण जर कोणी पदराला हात घालू पाहील त्याला पदर झटकून वठणीवर आणायचे आणि मानानं पदर डोईवर घ्यायचा .  

हे काही पदरचं सांगत नाही. अगं समाजाची रीत आहे ही. 

आईच्या संस्कारामुळे उषाच्या जीवनाला पदर लाभत होते.एक एक पदर छान सुटून येत होते. दोघींचाही पदर फाटका नाहीये हे समजत होते.

स्वाभिमानाची शिकवण देताना आई म्हटली अंगी असेल ते काम अन् पदरी पडेल तो दाम करण्याची तयारी हवी. अगं पोरी पदरचे खावे पण नजरचे खाऊ नये.  नेहमी पदरचे खावे अन चौघात जावे उषा अजून मोठी झाली. तिच्यावर प्रेम करणारा तिच्या आयुष्यात आला आणि ती नकळत पदराशी चाळे करू लागली.आईच्या नजरेतून हे सुटले नाही. आई म्हटली आता त्याची तुझ्या पदराशी गाठ बांधली की होईल बाई जबाबदारीतून सुटका. जरा पदर फडकायला मोकळा होईल. 

तू तुझ्या मनाने त्याला निवडलं आहेस तर छान पदर अंथरून स्वागत कर त्याचं. त्याचे काही चुकले तरी शक्य तेवढे सावरून घेत ‘ पदरी पडलं अन पवित्र झालं ‘ म्हणायचं . एकमेकांचे होऊन रहाताना पदरी पडली झोड हसून केली गोड  म्हणत गुण्यागोविंदाने रहायचे.

आईचे  पाठ , शिकवण यातुन सुसंस्काराने न्हाऊन उषाच्या पदराशी त्याची गाठ पडली एकदाची. आयुष्याचा हा पदरही चांगला असल्याने ती कधी पदराची चवरी करून त्याची रिद्धी तर कधी पदराने वारा घालून त्याची सिद्धी होत होती. जरी सुखवस्तु कुटुंबात पडली असली तरी पदरपेशी होऊन जगणं तिला जमतच नव्हते तिला समजून घेणारा तिच्या पदरचा माणूस ; तिचा नवरा तिला काही कमी पडू देत नव्हता म्हणून गरजूंना ती पदरमोड करून मदत करत होती. चांगल्या मनाने केले तर पदरास खार पडणार नाही हे तिला माहित होते. पदर खर्च करून जणू स्वत:च्याच पदरात पुण्याचे माप घालत होती. 

त्यामुळे पदर गमावण्याचा प्रश्न नव्हताच. ती क्षम्य चुकांवर हसत पदर घालत होती. आईने सांगितल्या प्रमाणे पदर सावरत “ पदरचे द्यावे मग सांगावे “ या धोरणाने मदत करत जीवन जगत होती. सासरच्या कुत्र्याला सुद्धा अहो म्हणायचे या संस्कारातून ती कधीच एक पदरावर येत नव्हती. शिवाय आपला पदरही पाडत नव्हती. त्यामुळे नियतीच  पदरचं घालायला तिच्यापुढे ठेपली तेव्हा दैव आले द्यायला अन पदर नाही घ्यायला अशी तिची गत झाली नाही.  तोंडाला पदर आणि गावाला गजर तिच्या बाबतीत घडले नाही. कायम पदराची शुद्ध जपत पदरास खाच न पाडता ती समाधानाने रहात होती. म्हणूनच उषाच्या जीवनात सुवर्णपहाट येण्याची चाहूल तिला लागली होती. ती आई होणार होती. सातव्या महिन्यात ओटी पदरात भरून ती आईकडे बाळंतपणासाठी आली होती.  

आता ती सुखरूप प्रसूत झाली होती आणि चिमुकले बाळ तिचा पदर ओढत होते आणि त्या कान्ह्याला पदराखाली घेताना तिला पदराची महती समजली होती आणि असा श्रीमंत पदर लाभण्याचे भाग्य आपल्या पदरी आहे या जणिवेने तिच्या डोळ्याचे पदर ओलावले. 

जीवनाच्या चिरोट्याचा एक नाजूक पदर खुलला होता तो हृदयाच्या एका पदरात तिने लपेटून घेतला होता.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “घोडं दिसलं की पायी चालू वाटत नाही—” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “घोडं दिसलं की पायी चालू वाटत नाही—” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

” फ्लाईटनेच जायचं गं आई , ट्रेन मधे बोअर होतं मला “

आता सुट्टीत काकाकडे दिल्लीला जायचं अन् सिमला मनाली ट्रिप करून यायचं , असं ठरवत असताना , दुसरीतल्या सईने ठणकावून आपलं मत सांगितलं. “ अगं आज्जी आजोबांना ट्रेन बरी वाटते अन् राजधानी आहे ती चांगली .. एका रात्रीत पोचूही ..”  चारूता सारं सांगत राहिली तरी काही पटले नाही सईला .. 

“ मागे केरळला मग फ्लाईटने का गेलो ? ते  रेल्वे स्टेशन किती घाण असतं .. नाही म्हणजे नाहीच , फ्लाईटनेच जायचय मला .. “

“ओरडायला हवं होतं मी तेंव्हाच खरं .. ” रात्री चैतन्यला चारू सांगत होती.  “ ओरडायला हवं होतं का रे ? पण खरं सांगू , कळतच नाहीये , चूक तिची कि आपली ? मागण्या आता वाढतच चालल्या आहेत तिच्या ..  फ्लाईटने जाणं किती सहज साध्य वाटतय तिला .. बोर्नव्हिटा नसेल तर दूध नको , गाडी नसेल तर प्रवास नको , हाँटेलात गेलो तर चायनिजच हवं अन् माँलमधलं सारं काही घरी यायलाच हवं.. एक ना दोन .. जास्तच लाड करतोय का आपण ?” चारूताच्या विचारांनी परत एकदा उचल खाल्ली. 

“ हमम .. खरंय तुझं  ..” नेहमीप्रमाणे  कुस बदलत एवढच म्हणत चैतन्य झोपून गेला. 

पन्नास पैशाच्या लिमलेटच्या गोळीचं आकर्षण असायचं आपल्याला .. कोणी कधी शाळेत वाढदिवसाचं वगैरे म्हणून चाँकलेट दिलंच तर घरी येऊन अर्ध अर्ध करून खायचो .. गरीब वगैरे काही कधी नव्हती परिस्थिती, पण पैसा असा इतका सहज संपवत नव्हतो  , आता मध्यमवर्ग असा काही राहिलाच नाही की काय ..?. .. मुबलकता आली .. पगार वाढले .. जाहिरात क्षेत्राने व्यापूनच टाकलंय आयुष्य अवघं .. जाहिरातींचा मारा होत राहतोय .. पगार त्याकडे वळत राहतोय .. 

आधी दिवाळीलाच कपडे घ्यायचो नवे .. आणि एखादा वाढदिवसाला .. जुने झालेले ड्रेस आधी घरात वापरले जायचे अन् मग पायपुसणं बनून पायाखाली यायचे..

— आणि परवा साडेसातशे रूपयांचा नाईट ड्रेस घेतला आपण .. सहज ..  आवडला म्हणून ..  आणि मग.. सईला काय म्हणा .. आपणच बदललो नाहीयोत का ? 

संध्याकाळी  खेळून आल्यावर भूक लागली तर केळं, दूध पोहे, गेला बाजार पोळीचा लाडू, असंच काहीसं हातावर ठेवायची आई .. सई पाहतही नाही अशा खाण्याकडे आता .. ह्या सवयी तिला कुणी लावल्या ? बिस्किटं , वेफर्स नी तत्सम खाण्याने भरून वाहतायत डबे आता .. 

आत्ता आठवतय की …आत्याचं घर किती लांबं होतं..  पण चालतच न्यायचे आजोबा .. त्यांचं काय नातीवर प्रेम का नव्हतं ? पण चालणं हेच फार स्वाभाविक होतं…..पुढे सायकल हातात आल्यावर चालत जायला कंटाळायला लागले मी तेव्हा आजी म्हणत असे ..”  घोडं दिसलं कि पायी चालू वाटत नाही !!!”

— पण सुरवात सारी इथुनच झाली का ? पुढे शिक्षण झालं ,  नोकरी लागली तशा मागण्या वाढल्या  माझ्या .. ड्रेसचा कप्पा वाढला ..चपलेचे जोड वाढले .. “ अगं राखून ठेव पैसा हाताशी,आहे म्हणून संपवू नये ..” आई म्हणायची तेंव्हा ‘ हो गं ‘ …म्हणत फणकाऱ्याणे  निघून जायचे मीही .. यथावकाश लग्न झालं , नवरा IT तला .. सहा आकडी पगार त्याचा .. मोठ्ठं घर हवं म्हणून कर्ज काढलं, तेंव्हाही आजोबा म्हणाले होते ..” अगं प्रायव्हेट नोकऱ्या तुमच्या, एवढालं ते लोन काढताय .. अंथरूण पाहून पाय पसरावेत बयो ! “

पण कुठेसं ऐकलेला डायलाँग घोळवायचे मी तेंव्हा .. “ तोकडं पडलं तर अंथरूण वाढवा ना .. सदा पायच का आखडून घ्यायचे आपण ? “

स्टीलची ताटं नको म्हणून डिनर सेट आणले ..एकेक करत नॉनस्टिकच्या भांड्यांचे सेट झाले ..  फ्रिज , टिव्ही लहान वाटायला लागला .. सोफ्यावाचून हाँल सुनासुना भासायला लागला … दिरानं अन् ताईने घेतली गाडी तशी मग आपणही घेतलीच .. बसचा प्रवास अगदीच दुर्मिळ झाला मग .. उपभोगत आलो सारं .. आमचा स्तर आम्हीच वाढवला …. आणि मागची पिढी  खर्चिकच  म्हणत आली आम्हांला ..

कोकणातल्या मूळ गावी जायला लाल डब्ब्याखेरीज दुसरी सोय नव्हती .. गाडी अजून घेतलेली नव्हती .. तेंव्हा जाणारच नाही म्हंटलं नाही, पण तरी नाकं मुरडायचेच मी जाताना .. सासरे म्हणतच मग .. “ तुम्हांला थेट गाडी आहे आता. किती बरय .. आम्ही  ST , बोट , पायी असं करीत करीत पोहोचत असू  कित्येक तासांनी ..”– मला एशियाड हवीशी वाटे .. तसंचं लेकीला विमान हवं आहे आता …. आपल्याच विचारांची धारा पुढे चालवतेय लेक .. काय ओरडणार आहोत आपण तिला ..

असेच विचार करता करता कधीतरी झोप लागली .. दुसऱ्या दिवशी रविवार .. जरासं आळसावतच चारू बसली तोवर कामवाल्या मावशी आल्या .. चांगल्या कपबशा नि चांगल्या चांगल्या बेडशिट्सनी भरलेली पिशवी त्यांच्या हातात .. म्हंटलं “ काय हो हे .. आत्ता कसली केलीत खरेदी ? “.. तर म्हणाल्या .. “ अहो खालच्या मजल्यावरच्या ताईंनी दिलं .. जास्तीचं सामान सगळं काढून टाकून गरजेपूरतच ठेवायचं ठरवलंय त्यांनी म्हणे  ..”  

— खालच्या ताई म्हणजे चारूची मैत्रीणच –  मेधा .. चारूला हे समजेना तेंव्हा तिने मेधाला फोन लावला .. 

“अगं मिनिमलीझमच्या मुव्हमेंटबद्दल वाचलं मधे नेटवर .. म्हणजे आवश्यक त्या वस्तूंचाच फक्त संचय करायचा .. अनावश्यक फाफटपसारा टाळायचा .. काय काय उगाचच जमवत राहतो आपण .. मला फारच पटलं ते .. म्हणून ठरवलय जमेल तितकं करूया .. त्याची ही सुरवात .. “

कुठेतरी उत्तर मिळाल्यासारखं वाटलं चारूला .. ‘ आज रविवार आहेच तर आपणही आज हे निवांत वाचूया .. आणि बघुया आपल्याला पटतय अन् जमतय  किती नि कसं ..’  असं ठरवत ती स्वयंपाकघराकडे वळली .. तशी मावशी म्हणाल्या ..” बरं झालं की हो , खालच्या ताईंनी कपबश्या दिल्या ते .. पोरांना आता स्टीलचं  भांडं चालत नाही .. रंगीत डिझाईनचा कपच लागतो .. आम्ही तर करवंटीतून प्यायचो चहा  .. पण तक्रार नाही केली बघा कधी .. काय करावं .. जनरीतच आहे झालं  …… 

“ घोडं दिसलं की चालू वाटत न्हाई माणसाला .. !!! ” 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पर्यटन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

पर्यटन हा बहुतेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मात्र पर्यटन ह्या विषयाकडे वळतांना प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगलने विचार करुन त्याची दिशा ठरवितात. काही व्यक्ती निसर्गसौंदर्याचा विचार करुन तशी स्थळं निवडतात.  तर काही द-याख़ो-या,गड किल्ले ह्यामध्ये रमतात. काही देवदर्शनासाठी नवसाला पावणा-या सुप्रसिद्ध देवस्थानांची निवड करतात, तर काही आपापल्या गावी असलेल्या कुलदेवतांकडे आपला मोर्चा वळवितात.

पर्यटनाला कुठेही जावं पण जेथे जाऊ तिथली इत्यंभूत माहिती, तिथला इतिहास, हवामान, भौगोलिक परिस्थिती, त्या स्थानाचे वैशिष्ट्य हे सगळं माहितीपूर्ण अभ्यासून घ्यावं… खेदाची बाब अशी की हल्ली त्या फ़ोटो व सेल्फी ह्यांच्या अतिरेकी आवडीने आपण त्या निसर्गसौंदर्याचे, त्या स्थानाचे महत्त्व ना धड डोळ्याने टिपत, ना मनावर बिंबवत, ना मेंदूत ठसवत…  आपल्या इंद्रियांना निकामी करुन फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून असण्याची ही सवय तशी घातकच.

ह्या बाबतीत आम्ही उभयता दोघेही आणि आमचा लेक आधी सगळे डोळ्या़ंनी बघणार, हिंडून सगळं अभ्यासणार, संपूर्ण माहिती गोळा करणार आणि मग जसा वेळ उरेल तसे फोटो काढणार. आजकाल सर्रास एखाद्या स्थळी लोक पोहोचल्या पोहोचल्या आधी सेल्फी व फोटोसेशन नी मग लगेच त्या फोटोंचे सोशल मिडियावर अपलोडींग. आजकाल सोशल मीडियावर कुटुंबाचे वा मित्रमैत्रीणींचे फोटो टाकले तरच प्रेम वा मैत्री असं नसतं, कारण सोशल मीडियावरील फेसबुक, व्हाँटसअप हे सगळं आभासी जग असतं. असो

पण एक नक्की ..  अभ्यासपूर्ण पर्यटन करायचे असेल तर त्यासाठी आपलं जाणतं वयं, आधी करुन ठेवलेला माहितीपूर्ण अभ्यास, एक व्यवस्थित खरीखुरी माहिती देणारा गाईड, ह्या बाबी अत्यावश्यक. मला आठवतं माझी शाळेत असतांना ट्रीप गेलेली. शैक्षणिक सहल नाव तिचं. अजिंठा, वेरूळ. पण ना त्या ट्रीप बरोबर त्याचा अभ्यास ,आवड असलेले शिक्षक ना कुणी चांगले गाईड. ह्यामुळे अशा सहलींना शैक्षणिक सहल नाव जरी असलं तरी त्यापासून कुठलेही आऊटपुट मिळत नाही हे नक्की.

खूप व्यक्तींमध्ये खूप सारे सद्गुण एकवटलेले असतात. त्यापैकी काही सुप्त रुपात तर काही प्रकट रुपात दिसतात. शनिवारी चतुरंगच्या पुरवणीत सुप्रिया सुळे यांनी कलावंतांचे आनंद पर्यटन ह्या सदरात लिहिलेला ” दगडांच्या आणि फुलांच्याही देशा ” हा एक छान लेख वाचनात आला. सुप्रिया सुळे ह्यांना राजकारणात सक्रिय असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखत असलो तरी एक अभ्यासपूर्ण लेखन करणारी त्यांच्यातील व्यक्ती मला प्रथमच दिसली. ह्या लेखातील अंजिठा, वेरूळ येथील लेण्यांची माहिती, देवगिरी किल्ला, ताडोबा अभयारण्य वाचल्यानंतर एकदा ह्या स्थळांना आवर्जून भेट देण्याचा मोह हा होतोच.

असेच काहीसे माहितीपूर्ण लेख वाचनात आल्यानंतर काहीसं आगळंवेगळं समाधान हे मिळतंच.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती ‘गुलाबी’ नोट !… लेखक – श्री रवी वालेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ ती ‘गुलाबी’ नोट !… लेखक – श्री रवी वालेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

काल ICICI मध्ये पैसे काढायला गेले होतो. फार नाही पण बऱ्यापैकी गर्दी होती. पैसे जमा करायला आणि  काढायला अशा दोन वेगवेगळ्या रांगा होत्या. सगळ्यांनाच लगीनघाई ! २०-२२ वर्षांच्या दोन-तीन चुणचुणीत मुली हा सगळा पसारा हसतमुखाने सांभाळत होत्या. रांगेत मोदी हा एक आणि मागच्या आठवड्यात पैसे नसल्याने झालेली तारांबळ हा दुसरा, हेच विषय सगळे चघळत होते. गुलाबी नोटेवरून हमखास होणारे विनोद होतेच. एकंदरीत झकास चालले होते.

सत्तरीच्या आत बाहेर असणारे ५-६ जण घाबरतच आत आले. बँकांमध्ये असणाऱ्या गर्दीविषयी टीव्हीवर येणाऱ्या बातम्या बघून धास्तावलेले असावेत (बहुतेक NDTV जास्तच बघतं असावेत !).

ह्या नव्या बँका त्यांच्या त्या भव्यतेने, इंटिरियरने अगोदरच कोणालाही बिचकाउन सोडतात. त्यात ते मधाळ इंग्रजीतले अगत्य ! जुन्या बँका कशा ‘आपल्या’ वाटायच्या ! टेबलाटेबलांच्या गर्दीतुन आपला-आपला ‘साहेब’ हुडकायचा आणि डायरेक्ट काम सांगायचं ! नमस्कार करायचीही गरज नसायची. एकदम घरगुती वातावरण अन् रोखठोक बोलणे !

‘ ऊद्या या ‘ 

‘ ह्याच नोटा मिळतील ‘

‘आम्ही काय गोट्या खेळतोय का? ‘

‘ घरी नाही छापत आम्ही ‘

‘ जा,हो, कमिशनरला जाऊन सांगा, असले छप्पन पायलेत ‘

— असा कसा स्वच्छ, आरस्पानी कारभार ! या नव्या बँका एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखेच नव्या पिढीलाही दबकुन वागायला लावतात, तिथे जुन्या पिढीचं काय !

मी लांबून त्या सगळ्या ग्रुपकडे बघत होतो. एकमेकांत चर्चा करून त्यांच्यातल्या एकाने धीर करून फॉर्म भरत असलेल्या एकाला काही विचारले, त्यानेही त्याचे हातातले काम थांबवून त्यांना एक फॉर्म आणून दिला. त्या फॉर्मचे सामुदायिक वाचन झाल्यावर ग्रूपमध्ये पुन्हा चर्चा झडली. मी अंदाज बांधला की या प्रत्येकाचे काम वेगवेगळे असावे. कोणाला पैसे भरायचे होते, कोणास नोटा बदलून हव्या होत्या, तर कोणाला पैसे काढायचे असावे. त्यांच्यातला जीन्स- टी शर्ट घातलेला एकजण धीटपणे सर्वांना सांभाळत होता. ( हे काका बहुधा बँकेतूनच रिटायर झालेले असावे ) तरीपण त्यांच्याही चेह-यावरचा गोंधळ काही लपत नव्हता ! सिनीयर सिटिझन्ससाठी वेगळी रांग असावी, अशा अंदाजाने आलेले ते, रंगीबेरंगी हाफपँटी न घालणाऱ्यांची तिसरी रांग चष्म्याआडून शोधत होते आणि ती काही सापडत नव्हती !

लोक येतच होते, रांग वाढतच होती. त्याचवेळी अजून  २-३ वरिष्ठ नागरीक बँकेत आले ! पहिल्या ग्रूपमधल्या दोन चतुर काकांनी लगेच एका रांगेत उभे राहून घेतले ! (फॉर्मचं काय ते नंतर बघू, नंबर तर लाऊन ठेऊ !)

गर्दी वाढलेली बघून, काचेच्या केबिनमधून ब्रँच मॅनजेर बाहेर आल्या. त्या सुद्धा पंचविशीच्या आत बाहेर ! (या नव्या बँका तिशीतच VRS  देतात का?) त्या गेल्या त्या डायरेक्ट या ग्रुपकडे ! २ मिनीटे बोलल्या असतील नसतील, सारी सिनीयर मंडळी निवांत सोफ्यावर बसली ! त्या ब्रँच मँनेजरने हाक मारून स्टाफमधल्या एका मुलीला बोलावले. ती आली. एकदम उत्साही आणि तरतरीत ! (या नव्या बँका बायोडेटात ‘चुणचुणीत’ आणि ‘तरतरीत’ हे शब्द असतील, तरच नोकऱ्या देत असावेत !)

त्या विशीतल्या पोरीने तिथेच त्यांच्या बरोेबर सोफ्यावरच  बसुन कोणाला फॉर्म देे, कोणाला चेक लिहून दे, कोणाची आयडी प्रूफवर सही घे, पेईंग स्लिप चेक कर असा झपाटा लावला ! एवढच नाही, मध्ये उठून ती खुद्द ‘रोकड’ सुद्धा या काका लोकांना सोफ्यावरच हातात आणून देत होती, कोणाच्या नोटा बदलून आणत होती !

१५ ते वीस मिनीटात तिने सगळ्या कामाचा फडशा पाडला ! सारे अवाक होऊन बघत राहिले !

१५-२० मिनीटात सगळ्या वरिष्ठांना वाटी लाऊन,जवळ जवळ २-४ लाखांची ऊलाढाल करून, २-४ कोटींचे पुण्य कमवून, ती कन्यका आपल्या स्वत:च्या जागेवर जाऊन कामाला भिडलीसुद्धा !.. रांगेतल्या कनिष्ठांचे माहित नाही, पण आम्ही (ना कनिष्ठ ना वरिष्ठ असे मधल्यामधले ) आदराने तिच्याकडे आणि असूयेने वरिष्ठांकडे बघतच राहिलो!

माझा नंबर आला, नोटा मिळाल्या. नवी दोन हजाराची नोट पहिल्यांदाच हातात आली होती ! नोट अपेक्षेपेक्षा छोटी होती, आणि खरं सांगू? खोटी वाटतं होती !  पण काहीही असो, पाकिटात व्यवस्थित बसली. छान वाटले ! पूर्वीची हजाराची नोट उनाडपणे पाकिटाबाहेर डोकवायची. ही नवी नोट निव्वळ दिसायलाच देखणी नव्हती, तर घरंदाज- शालिनही होती, तरतरीतही होती !

मला एकदमं त्या ओरीजनल ‘तरतरीत’ मुलीला भेटावसं वाटलं.

‘स्सर?’ मोठ्ठे डोळे माझ्यावर रोखत तिने प्रश्नार्थक चेहरा केला. तिटकारा किंवा तुसडेपणाचा भावही त्या निर्मळ चेहऱ्यावर नव्हता ! मी तिला वरिष्ठांसाठी तिने जे केलं आणि जी धावपळ केली, ते सगळ्यांना कसे आवडले, ते सांगितले. (आणि हो, थोडेसे  अस्पष्ट असे आभार ही मानले !)

‘अरे स्सरं! सालभर थोडी ऐसा करना पडता है? ये तो बस, हप्ता दस दिन की बात है ! और ऐसे समय पर सबको मदद करना अच्छा लगता है !’

घरी येईपर्यंत तिचे ते ‘अच्छा लगता है ‘ कानात, मनात घुमत होतं !

मोदीजींनी भारताची सर्वात जास्त किंमतीची नोट ‘गुलाबी’ का बनवली, याचा लख्ख उलगडा झाला !

या नव्या पिढीने आणि या असल्या ‘अच्छा लगता है!’ म्हणण्याऱ्या मुलीनेच त्यांना २०००ची नोट ‘Pink’ बनवायला भाग पाडले असणार !

जगलो-वाचलो तर एक दिवस मी पण ‘सिनीयर सिटिझन’ होईन, पण तेव्हा सुद्धा जेव्हा-जेव्हा दोन हजाराची नोट बघेन  तेव्हा-तेव्हा हे ‘अच्छा लगता है’ आठवेल आणि मी माझ्या नातवांना विचारेन, ‘ ही नोट ‘गुलाबी’च का आहे, माहितीये?

लेखक : रवि वाळेकर             

(ही नोट कधीकाळी रद्द होईल, असे हा लेख लिहिताना वाटलेही नव्हते!)

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मंदिरांचं विज्ञान — जगन्नाथ मंदिर, पुरी…” ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ “मंदिरांचं विज्ञान — जगन्नाथ मंदिर, पुरी…” ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

भारतातील अनेक मंदिरांना खूप मोठा इतिहास आहे. काही मंदिरांचा इतिहास तर त्यांच्या निर्मितीच्याही आधीचा आहे. मंदिर कुठे उभारायचं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक बाबींचा सखोल विचार आणि अभ्यास केला गेला. ज्या ठिकाणी मंदिर बांधायचं तिथलं वातावरण, तिथल्या नैसर्गिक गोष्टी तसेच पुढे येणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात गोष्टींचा अभ्यास केला गेल्यावर ज्या ठिकाणी ह्या गोष्टी जुळून येतील अशा ठिकाणी भव्य दिव्य मंदिरांची निर्मिती केली गेली. ही निर्मिती करताना कळलेल्या तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड देऊन अशा ठिकाणांचं महत्त्व धार्मिक दृष्टीने वाढवलं गेलं. खंत एकच की ह्यातलं तंत्रज्ञान ह्या श्रद्धेमुळे येणाऱ्या पुढच्या काळात लुप्त झालं आणि परकीय आक्रमणांनी भारताच्या अनेक पिढ्यांच्या तंत्रज्ञानातील समृद्धीची वाट लावली. 

श्रीकृष्णाला आणि त्याच्या भावंडांना वाहिलेलं एक मंदिर भारतात गेल्या ९०० वर्षांहून जास्ती काळ उभं आहे. जगन्नाथ, बलराम, सुभद्रा ह्या तीन देवतांना समर्पित असलेलं पुरी, ओरिसा इथलं जगन्नाथ मंदिर ! 

आपल्या रथयात्रेसाठी जगभर प्रसिद्ध असणारं हे मंदिर अनेक रहस्यमय गोष्टींनी वेढलेलं आहे. आत्ता जे मंदिर उभं आहे त्याची निर्मिती साधारण १२ व्या शतकात इ.स. १११२ च्या आसपास झाली असावी असा अंदाज आहे. हे मंदिर आत्तापर्यंत १८ वेळा लुटलं गेलं आहे. इतकं लुटूनसुद्धा आजही ह्याच्या खजिन्यामध्ये जवळपास १२० किलोग्राम सोनं तर २२० किलोग्रॅमपेक्षा जास्त चांदी आहे. ज्याची किंमत कित्येक कोटी रुपयांमध्ये आहे. ह्याशिवाय अनेक अमूल्य रत्नेही त्याच्या खजिन्याचा भाग आहेत. 

ह्या पूर्ण मंदिराचं क्षेत्र जवळपास ४००,००० चौरस फूटात सामावलेलं आहे. मुख्य मंदिर हे कर्व्हीलिनियर आकारात असून त्याची उंची जवळपास २१४ फूट (६५ मीटर ) आहे. ह्याच्या शिखरावर एक चक्र ज्याला नील चक्र असंही बोललं जाते, ते बसवलेलं आहे. हे नील चक्र अष्टधातूंनी बनवलेलं आहे. ११ मीटर चा घेर आणि ३.५ मीटरची उंची असलेलं हे चक्र जवळपास वजनाने १००० किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. हे चक्र ९०० वर्षांपूर्वी ६५ मीटर उंचीवर कसं नेलं गेलं असेल हे अजूनही एक रहस्य आहे. 

आधी म्हटलं त्याप्रमाणे मंदिराची जागा निवडताना अनेक गोष्टींचा अभ्यास त्या काळी केला गेला होता. भारताच्या ज्या भागात पुरी मधलं जगन्नाथ मंदिर आहे तो भाग शंखाच्या आकाराचा आहे. शंख आणि चक्र ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी विष्णूच्या मूर्तीत आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. म्हणूनच ह्या भागाला शंख क्षेत्र म्हटलं जातं. ह्याशिवाय ह्या जागेची निवड करताना इथल्या काही नैसर्गिक गोष्टींवर खूप अभ्यास केला गेला आहे. जगात कुठेही दिवसा हवा समुद्रावरून जमिनीच्या दिशेने वाहते तर रात्री ह्याविरुद्ध म्हणजे जमिनीवरून समुद्राकडे वहाते. पण ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिकडे नेमकं उलट घडतं. जगन्नाथ मंदिराच्या इथे दिवसा हवा जमिनीवरून समुद्राकडे वाहते तर रात्री उलट्या दिशेने म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वाहते. 

जगन्नाथ मंदिराच्या भोवती अनेक रहस्यं गुंफली आहेत. त्यातली काही महत्त्वाची आहेत ती म्हणजे इकडे देवळाचा फडकणारा झेंडा हा वाऱ्याच्या उलट्या दिशेला फडकतो. ज्या दिशेला वारा वाहतो त्या दिशेला झेंडा फडकायला हवा पण इकडे नेमका तो उलट दिशेला फडकतो. तसेच ह्या मंदिरावरून काहीच उडत नाही. ह्या मंदिरावरून कोणतेच पक्षी उडत नाहीत किंवा मंदिराच्या शिखराचा आसरा घेत नाहीत. तसेच ह्या मंदिराची सावली कधीच जमिनीवर पडत नाही. दिवसाची कोणतीही वेळ घेतली तरी ह्याच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. ह्यामागे श्रद्धा आणि चमत्कार लोकांनी म्हटलं असलं तरी मंदिराच्या जागेची निवड आणि मंदिर बांधण्यामागील तंत्रज्ञान ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. 

भारतातल्या मंदिरांची शिखरं ही वर निमुळती होतं जाणारी आणि साधारण चपटी असलेली बांधली जातात. पण जगन्नाथ मंदिर ह्याला अपवाद आहे. हे मंदिराचं शिखर थोडफार गोलाकार स्वरूपात बनवलं गेलं आहे. देवळाच्या शिखरावर फडकणारा झेंडा उलट दिशेला फडकण्यामागे ह्या मंदिराचा आकार कारणीभूत आहे. ह्या मंदिराच्या आकारामुळे इथे ‘कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट’ बघायला मिळतो. एकसंध वाहणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या प्रवाहात जर आपण टोकेरी नसलेली साधारण गोलाकार एखादी गोष्ट आणली तर त्याच्या प्रवाहात त्या वस्तूमुळे बदल होतो आणि हा बदल अगदी विरुद्ध दिशेने असतो. त्यामुळे हवा वाहताना मंदिराच्या साधारण गोलाकार असणाऱ्या शिखराला आदळून ‘कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्ट’ तयार करते. ज्यामुळे काही भागात हवा उलट्या दिशेचा प्रवाह निर्माण करते. हाच विरुद्ध दिशेचा प्रवाह झेंड्याला हवेच्या अगदी विरुद्ध दिशेला फडकवतो. 

a Kármán vortex street (or a vonKármán vortex street) is a repeating pattern of swirling vortices, caused by a process known as vortex shedding, which is responsible for the unsteady separation of flow of a fluid around blunt bodies. Vortex shedding happens when wind hits a structure, causing alternating vorticies to form at a certain frequency. This in turn causes the system to excite and produce a vibrational load.

ह्या मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्टमुळे कदाचित पक्षी सुद्धा उडण्यास कचरत असावेत असा एक अंदाज आहे. कारण प्रत्येक पक्षी हा हवेच्या प्रवाहाच्या बदलांबाबत अतिशय ज्ञानी असतो. कदाचित ह्या शिखराच्या आजूबाजूला हवेत होणाऱ्या बदलांमुळे उडण्याची क्रिया करण्यासाठी त्यांना अडचण येत असावी. त्यामुळेच ह्या शिखराच्या आसपास पक्षी उडताना दिसत नाहीत. ह्या मंदिराच्या शिखरावर जे नील चक्र आहे ते पूर्ण पुरी मधून बघताना कुठूनही तुम्हाला ते समोरून बघत आहात असेच दिसून येते. ह्या मागे कारण आहे ते पुरी शहराची रचना आणि त्याला अनुसरून मंदिराचं केलेलं बांधकाम. ज्या भागातून ह्या चक्राचा बाजूचा भाग दिसण्याची शक्यता आहे. त्या सर्व भागात एकतर तुरळक वस्ती आहे किंवा मंदिराच्या आसपास असणाऱ्या इतर इमारतींमुळे मंदिराचं शिखर दिसत नाही. त्यामुळेच जिथे लोकवस्ती अथवा जिथून मंदिराच्या शिखराचं दर्शन होतं त्या सर्व भागातून चक्र आपण समोर बघत आहोत असा भास होतो. 

नील चक्र जे मंदिराच्या शिखरावर बसवलं गेलं आहे, ते अष्टधातूंच्या संयुगातून बनवलं गेलं आहे. त्यामुळे आज ९०० वर्षांनंतरही समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या हवेला मात देत टिकून आहे. मंदिराच्या सिंघ दारातून प्रवेश करताच कानावर आदळणारा लाटांचा आवाज अचानक नाहीसा होतो. जेव्हा आपण पुन्हा बाहेर पडू तेव्हा लाटांचा आवाज आपल्या कानावर पडतो. असं होण्यामागे मंदिराच्या निर्माणात वापर केलेल्या दगडी तंत्रज्ञानांचा समावेश आहे. इकडे दगड असे वापरले गेले आहेत की ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या ध्वनीलहरी आतमध्ये शिरत नाहीत. त्यामुळे मंदिराच्या आत शिरताच आपल्याला अचानक आवाज नाहीसा झाल्याचा अनुभव येतो. 

कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट असो वा पुरीच्या कोणत्याही भागातून दर्शनी दिसणारं नील चक्र असो. ह्या मंदिराची निर्मिती करताना त्याच्या बांधकामाची सावली ही त्याच्या बांधकामावर पडते. त्यामुळे जमिनीवर सावली  दिसणार नाही अश्या पद्धतीने केलेलं बांधकाम. प्रत्येक गोष्टीची निवड ही पूर्ण विचारांती मंदिर निर्माण करताना केली गेली आहे. ह्या गोष्टींना जगन्नाथाच्या शक्तीचं रूप दिलं असलं तरी मंदिर उभारताना वापरल्या गेलेल्या उच्च तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालेलं आहे. जागेची निवड ते मंदिराचा आकार आणि ते उभारताना वापरल्या गेलेल्या विज्ञानामुळे आजही इतके वर्षांनंतर हे मंदिर आपल्या सोबत अनेक रहस्यं घेऊन दिमाखात उभं आहे. रथयात्रेसारखी जवळपास १८०० वर्षांची परंपरा असलेली यात्रा जितकी जगभरात ‘जगन्नाथ पुरी’ ची शान आहे, तितकंच ह्या मंदिराच्या निर्मितीमागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान !!! 

शब्दांकन : विनीत वर्तक 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आयुष्यातील प्रत्येक स्टेजचा आपण आनंद घ्यायला हवा. आयुष्य तसं म्हटलं तर खूप सोपं आहे, आपणच विनाकारण किचकट करून ठेवतो. लोक काय म्हणतील या विचाराने आपणच आपल्या मार्गात आपणच स्पीड ब्रेकर घालून घेतो.

कोणाला भेटावेसे वाटले तर भेटा, बोलावेसे वाटले तर बोला. एखाद्या विषयी काही आवडले तर स्तुती करा, नाही आवडले तर स्पष्टपणे पण न दुखावता सांगा. हेच दिसण्याच्याही बाबतीत लागू होते.

पिकले केस आवडत नाहीत, कलर करावेसे वाटतात?

– तर करा. वाढलेली ढेरी कमी करायची आहे?

– जिम सुरू करा, नसेल जमत तर रोज किमान तासभर चाला.

नव्या पिढी सोबत स्वतःला अपग्रेड करायचंय?

– तर लोकांचा विचार न करता खुश्शाल नव्या स्टाईलचे कपडे घाला.

लहान मुलांमध्ये मूल होऊन आपले शैषव पुन्हा जगावेसे वाटतंय?

-तर जागा ना ! कुणी अडवलंय?

सर्वात आधी आरश्यात दिसणाऱ्या स्वतःला आहे तसे स्वीकारायला शिका…

वय वाढत चाललंय, हे स्वीकारलं तरच आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो. वाढत्या वयासोबत येणारी वेगवेगळी फेज स्वतःसोबत नवनवीन क्षण घेऊन येते त्या त्या फेजचा मनसोक्त आनंद घेता आला पाहिजे. कुमार वयातील आठवणीत हरवून बसलात तर प्रौढ वयात येणाऱ्या क्षणांना आणि आनंदाला मुकाल,

  • कोणतही क्रिम किंवा फेसपॅक तुम्हाला गोरं करणार नाही
  • कोणताही शॅम्पू तुमची केस गळती रोखू ० शकणार नाही
  • कोणतेही तेल टकलावर केस उगवु शकणार नाही
  • कोणताही साबण बच्चों जैसी कोमल स्कीन देणार नाही.
  • लक्षात ठेवा, कोणत्याही टुथ पेस्टमध्ये नमक नसतं, व कोणत्याही साबणामध्ये निम नसतो.

सगळेच जण आपआपली दुकानं थाटुन तुम्हाला मूर्ख बनवायला बसलेत. तेव्हा दिखावे पर न जाओ, अपनी अक्ल लगाओ.

तुम्ही विसाव्या वर्षी जसे दिसत होतात तसेच चाळीशीत आणि साठीत दिसाल अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे. कोणत्याही वयात फिट राहणे मात्र महत्वाचे आहे.

पोट सुटलंय तर सुटू दे, त्यासाठी लाज वाटून घेऊ नका, आपलं शरीर वयोमानानुसार बदलत राहातं. वजन पण त्याप्रमाणे कमी जास्त होत राहतं. हे सगळे नैसर्गिक आहे.

आलेली परिस्थिती सर्वप्रथम स्विकारा आणि ती बदलण्यासाठी स्वतःला तयार करा.

जन्म, बालपण, तारुण्य, म्हातारपण आणि मृत्यू हा तर निसर्गाचा नियमच आहे. आजपर्यंत कोणीही हे टाळू शकले नाही, हे स्वतःला आधी पटवून द्या.

जुन्या मशीनचा मेन्टेनन्स करून अपटुडेट करता येते, पण नवीन नाही करता येत. आपल्या शरीराचेही तसेच आहे. ऑरगॅनिक धान्य, एलोविरा, कारले, मेथी, जिरे,ओवा वगैरेचे घरगुती उपाय यावरील व्हिडीओ यु ट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. इंटरनेट, सोशल मीडियावर वेगवेगळ्या उपदेशांनी नुसता उच्छाद मांडलाय….. 

… “अमुक खा, तमुक खा, हे खाऊ नका, ते खाऊ नका, गरम खा. थंड पिऊ नका, कपाल भारती करा, सकाळी निंबुपाणी, दुपारी ताक आणि रात्री गाईचं दुध घ्या. दिर्घ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा, ऊजव्या कुशीवरून ऊठा, हिरव्या पालेभाज्या खा, डाळीत प्रोटीन असतात. ज्वारी खा, नाचणी खा, वगैरे वगैरे…”

वरील सारे उपदेश वाचले की, डोके गरगरू लागते, काय योग्य काय अयोग्य तेच कळत नाही. डिप्रेशनची भर पडते ती वेगळी….

पतंजली, प्रॉक्टर अँड गॅम्बल, आशीर्वाद, नेस्ले, हिंदुस्तान लिव्हर, आई.टी.सी. अशा अनेक देशी विदेशी कंपन्या जाहिरातींचा भडिमार करून डोक्याचा नुसता भुगा करतात. कोणते उत्पादन चांगले हेच कळत नाही.

आपण सर्वचजण कधीतरी मरणार आहोत.  पण मरण्याआधी खऱ्या अर्थाने जगणंच विसरून चाललो आहोत असं तुम्हाला नाही वाटत का? खरं सांगा..

सर्वात महत्वाचे म्हणजे मजेत रहा. कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप करू नका. चुका सर्वांकडून होतात, तुम्ही काही देव नाही. स्वतःवर प्रेम करा. दोष देण्याचे काम करण्यासाठी आसपास भरपूर लोक आहेत. नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा. सकारात्मक विचारसरणीची लोकं जोडा, त्रासदायक लोकांपासून दूर राहा. आवडेल ते खा, पण प्रमाणात.  थोडा का होईना पण रोज नियमित व्यायाम करा. आनंदात रहा. शरीराला त्याचं कार्य करू द्या…

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares