मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सावित्री… लेखिका : सुश्री मानसी काणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ सावित्री… लेखिका : सुश्री मानसी काणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

यंदाची वटपौर्णिमा आता जवळ आलीय. यादिवशी प्रथेप्रमाणे वटसावित्रीची कथा वाचताना, दरवर्षी सावित्री मला नव्याने समजत जाते. खरं तर ही एक पुराण कथा! भोळ्या भाबड्या पतीभक्तीपरायण बायकांनी ती ऐकायची आणि श्रद्धेने माथा टेकवायचा.पतीचे प्राण यमाकडून परत आणणं म्हणजे का सोपी गोष्ट आहे? याबरोबरच सासऱ्यांचं अंधत्व दूर करणं, त्यांचं गेलेलं राज्य परत मिळवणं, आपल्या निपुत्रिक पित्यासाठी पुत्र लाभाचा वर मिळवणं…. हे सगळं त्या सावित्रीने केलं. आज तर्काच्या कसोटीवर घासून पाहिली तर यातली एकही गोष्ट आपल्याला पटणार नाही कदाचित.पण तरीही मी या कथेतले नवे नवे अर्थ शोधत राहते…आणि एका क्षणी मला समजतं ,की कोणतीही गोष्ट विपरीत परिस्थितीशी झगडून, आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा उपयोग करून, विनम्र भावाने, कधी विनवणी करून मिळवणं आणि मिळवलेल्या गोष्टीचा उपयोग संपूर्ण कुटुंबासाठी होईल, हे पाहणं म्हणजेच सावित्री असणं, सावित्री होणं !

सावित्री म्हणजे कोणी राजकन्या, राणी किंवा वनवासिनी नाही,तर प्रत्येक स्त्री म्हणजे सावित्री ! स्त्रीत्वाचं प्रखर तेज म्हणजे सावित्री! सत्यवान, वटवृक्ष किंवा यमधर्म ….हे सगळं निमित्तमात्र. अविरत प्रयत्न, आणि यशाचा ध्यास म्हणजे सावित्री !

सावित्री बुद्धिमान होती. पतिनिष्ठा, पातिव्रत्य, कर्तव्य, धर्म या बाबतीतली आपली मतं तिनं यमाला सांगितली. वेळप्रसंगी त्याची स्तुती केली आणि त्यामुळे प्रसन्न झालेल्या यमा कडून वेगवेगळे वर मिळवले. तिला केवळ आपल्या पतीचे प्राण नको होते ,तर त्यानं उत्तम प्रतीचं आयुष्य जगावं,असं वाटत होतं .मग आधी तिनं आपलं राज्य परत मिळवलं .मग सासऱ्यांची दृष्टी परत मिळवून राज्यकारभाराची व्यवस्था नीट राहील असं पाहिलं.पित्यासाठी पुत्र मागून त्याच्या राज्याचा भविष्यकाळ सुरक्षित केला. सत्यवानाचे प्राण परत नाही मिळाले तर पतीशिवाय आपणही जिवंत राहणार नाही म्हणून, आपल्याशिवाय जगणाऱ्या आपल्या लोकांसाठी तिनं हे वर मिळवले. मग यमाने सत्यवानाच्या प्राणाखेरीज कोणताही वर मागण्यास सांगितल्यावर मोठ्या चतुराईनं सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत, असा वर मागितला.आणि हा वर खरा होण्यासाठी यमाला सत्यवानाचे प्राण परत द्यावेच लागले.हा एक प्रकारचा गनिमी कावाच होता आणि या युद्धात ती जिंकली.

माझ्या आजूबाजूला असंख्य स्त्रिया वावरत असतात. आपल्या मनाला मुरड घालून मुलाबाळांच्या भवितव्यासाठी अनेक घरी उजाडल्यापासून मावळेपर्यंत धुणीभांडी, केरफरशी करणारी माझी कामवाली,जीवनाशी तिची  सुरू असलेली लढाई, मुलींना चांगलं सासर मिळवून देणं, त्यांची बाळंतपण करणं, मुलानं शिकावं म्हणून तिचा चाललेला अट्टाहास,हे सगळं मी रोज पाहते.तीस वर्षे नवऱ्याच्या दुर्धर आजारासह सर्व संसारिक जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणाऱ्या माझ्या जिवलग मैत्रिणीचा संघर्ष मी पाहिला आहे. त्यासाठी अनेक सुखाच्या क्षणांचा तिने केलेला त्याग माझ्या डोळ्यासमोर आहे. अकाली गेलेल्या नवऱ्याच्या माघारी त्याची उरलेली जबाबदारी रात्रंदिवस कष्ट करून पार पडणारी माझी वहिनी तर माझ्यासमोरच आहे. या सर्वजणींना मी पाहते ,तेव्हा या  त्या सावित्रीपेक्षा कणभर ही कमी नाहीत, याबद्दल माझी खात्री पटते. आज नवऱ्याच्या बरोबरीने कष्ट करणाऱ्या मुली त्यांच्या ताणतणावाचा अर्धा भाग आपल्या खांद्यावर पेलतात, म्हणजेच त्या त्यांचं आयुष्य वाढवितात. मतिमंद, अपंग मुलांना मोठं करणाऱ्या मातांच्या कौतुकासाठी तर शब्दच अपुरे पडावेत.ज्या चिकाटीनं सत्यवानाचे प्राण परत मिळेपर्यंत सावित्री यमाच्या मागोमाग चालत राहिली, त्याच चिकाटीनं त्या इच्छित साध्य गाठण्यासाठी मुलांबरोबर रोज अग्निदिव्य करीत असतात.

सध्या सगळ्याच पुराणकथांना भाकडकथा समजण्याचा काळ आहे. त्यातले दृष्टांत काल्पनिक समजले जातात. पण, थोड्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना  आधुनिक काळाशी जोडलं तर सत्ययुग,  द्वापारयुगातल्या या गोष्टी आजही लागू पडताना आपल्याला दिसतात. पुराणकालीन स्त्री सत्वाच्या, तपाच्या बळावर उभी असेल, तर आजची स्त्रीसुद्धा बुद्धी सामर्थ्याच्या आणि परिश्रमांच्या जोरावर आकाशाला गवसणी घालते आहे. आपल्याला जे हवे ते अविरत प्रयत्नांनी मिळवते आहे. आपल्या यशाने कुळाचे नाव वाढवते आहे. कोणतीही जबाबदारी स्वबळावर पार पाडण्याची ही कुवत म्हणजेच तर हे सावित्रीपण आहे.  आणि त्यासाठीचे प्रयत्न म्हणजेच वटसावित्रीचं व्रत आहे !

लेखिका : सुश्री मानसी काणे

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रामशास्त्री वेळापुरे”  — संस्कृत दासबोध–कर्ता ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

 

☆ “रामशास्त्री वेळापुरे”  — संस्कृत दासबोध–कर्ता ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी  

मागे असेच एकदा सज्जनगडावरील ग्रंथ चाळत होतो ! अचानक एका पुस्तकाने लक्ष वेधून घेतले ! 

“ संस्कृत दासबोध ! “ अरे बापरे ! प्राकृत दासबोधाचा संस्कृत अनुवाद ! कसं शक्य आहे?

हातात घेऊन पुस्तक चाळलं तर खरेच तो एक अति उत्कृष्ट संस्कृत अनुवाद होता ग्रंथराजाचा ! त्वरीत गडावरून आज्ञा मिळवून घेऊन ग्रंथ खाली आणला व स्कॅन करविला ! लेखकांचा क्रमांक दिलेला होता पण संपर्क नाही होऊ शकला !

आता आली का पंचाईत ! त्यांच्या अनुज्ञेशिवाय ग्रंथ साईटवर टाकावा तरी कसा? समर्थांची प्रार्थना केली मनोमन…अणि दिवस पुढे सरले… पण नाव पक्के लक्षात होते लेखकांचे, “राम वेळापुरे “ .. …रामशास्त्री…असो. समर्थेच्छा !

वर्षभराने असाच एक दिवस शिवथर घळीत गेलो असताना एक विक्षिप्त वाटावा असा म्हातारा मनुष्य भेटला. विस्कटलेले मळकट पांढरे केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, बेरकी डोळे, पाय गोल झालेले त्यामुळॆ वजनकाट्यासारखी डौलदार चाल ! त्यात संघाची चड्डी घातलेली, त्यामुळॆ काड्यामोड्या झालेले पाय अधिकच नजरेत भरणारे…

म्हातारा घळ झाडीत होता. उत्कंठेने त्यांचेकडॆ पहात पहात जवळ जाताच डोके खाजवीत उभा राहिला !

एक डोळा जवळपास मिटलेला व एक डोळा भिवई वर ताणून उघडा धरलेला अशा अवस्थेत खेकसला ! “कोण रे तू? इथं कुठं वाट चुकलास?”

मी माझा लौकिक परिचय दिला. चांगलंय म्हणाला…” जा पळ घरी…इथं काय मिळणार तुला?

जा लग्न कर, संसार कर, पोरंबाळं होऊ देत, गाडी बंगला घे, आईबापाला सुख दे. इथं काय ठेवलंय..  दगडं आणि माती ! “ 

मी म्हणालो, “ इथंच तर खर सुख आहे बाबा ! हे सर्व असूनही इथं का यावसं वाटतं मग?” 

बेरकी नजर टाकीत म्हातारा उभा राहिला ! आता मात्र हातातला झाडू टाकून देत माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, “ अस्सं !!! बर मग जा आत ! “

मी दर्शन घेऊन परत आलो ! म्हाता-याबद्दल माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती !

मी परतून विचारलं, “बाबा आपलं नाव काय?”

“या शेणाला राम वेळापुरे म्हणतात !” 

“वेळापुरे? श्याम?” .. “अरे श्याम नाही राम !”

आणि अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली ! अरे बापरे ! रामशास्त्री वेळापुरे? संस्कृत दासबोधाचे कर्ते? मी चटकन विचारले, “ ते संस्कृत दासबोध कर्ते? “ 

“तिथं तिथं…” समर्थांकडे हात करीत ते म्हणाले, ” तिथंच बसलेत त्या दासबोधाचे कर्ते ! मी साधा मास्तरडा रे ! मला काय दगड कळतंय संस्कृतातलं? यांची प्रेरणा होती, होऊन गेलं ते पुस्तक…त्यात या शेणाचं काहीही कर्तृत्व नाही !”

मती सुन्न झाली ! इतकं जबरदस्त पुस्तक लिहून हा मनुष्य इतका अलिप्त? इतका निगर्वी? इतका अनासक्त?

नंतर त्यांनी सांगितले की येणा-या काळात संस्कृत ही जगाची ज्ञानभाषा होणार आहे ! तेंव्हा जगभरातील लोकांना दासबोध कळावा म्हणून यांनी आत्ताच तो अनुवादून ठेवलाय ! आणि हे खरे आहे बरे! संस्कृतचे खरे जाणकार आज भारताहून अधिक जर्मनीत आहेत, हे अनुभवणारे मित्र आहेत माझे तिथे !

बाबा बेलसरेंकडे जाऊन ही इच्छा रामशास्त्रींनी बोलून दाखविताच त्यांनी सांगितले– “ घळीत जाऊन समर्थांना आत्मनिवेदन करा ! तरच कार्य सिद्धीस जाईल ! आणि खरोखरीच पुढची पाच वर्षे रामशास्त्री घळीत बसून राहिले व त्यांनी हा अवघा ग्रंथ एकटाक लिहून काढला ! कल्याण स्वामींनी लिहिला त्याच जागी बसून ! कठीण शब्दांचे अर्थ त्यांना समर्थ आपोआप स्फ़ुरून देत असत ! काय चमत्कार आहे हा ! वाचून पहा ग्रंथ ! खरोखरीच अप्रतिम झाला आहे !

मग त्यांची आयतीच परवानगीही मिळाली आणी ग्रंथ दासबोध.कॉम वर आला !

ते म्हणाले, “अरे माझी मूर्खाची परवानगी कसली मागतोस? हे सर्व ज्ञान समर्थांचे ! त्यांना विचार आणि दे टाकून ! माझे काय आहे त्यात !”…. 

डोळ्यात पाणी आले…पायावर डोके ठेवायला गेलो तर जोरात ओरडले– “अरे अरे अरे ! सांभाळ ! डोक्याला शेण लागेल तुझ्या !”

मला काही कळॆना, बुचकळ्यात पडून उभा राहिलो, तर म्हणाले, ” मघाशी म्हणालो नाही मी? या शेणाला राम वेळापुरे म्हणतात? मग माझ्या पायावर डोके ठेवलेस तर शेण लागेल ना कपाळकरंट्या  आणि खो खो खो हसू लागले !

— त्यांची समर्थांप्रती दृढ निष्ठा, श्रद्धा, आत्मनिवेदनभक्ती, आणि टोकाची अनासक्ती, विरक्ती, निरीच्छा पाहून पुन्हा १००० वेळा मनोमन दंडवत घातले !

अशी माणसे आजही निर्माण होताहेत यातच समर्थांच्या लोकोत्तर कार्याचे यश सामावलेले आहे !

हा संस्कृत दासबोध dasbodh.com वर नक्की वाचा ! आवडॆल तुम्हाला !

॥ www.dasbodh.com ॥

लेखक : अज्ञात. 

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एका वडीलांचे त्यांच्या मुलाच्या विवाहाबद्दल मनोगत…” ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “एका वडीलांचे त्यांच्या मुलाच्या विवाहाबद्दल मनोगत….”  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

नुकतेच – दि ३१ मार्च २०२३ ला माझ्या ज्येष्ठ मुलाचे लग्न झाले .

सोहळा खूप मोठा भव्य करण्याचा मनोदय नव्हता त्यामुळे आपल्या सर्वांना बोलावू शकलो नाही म्हणून क्षमस्व !

परंतु या निमित्ताने आम्ही – (मी – माझी पत्नी आणि मुले आणि वधू आणि त्यांचे वडिलधारे लोक अशा सगळ्यांनी ) मिळून काही गोष्टी लक्षपूर्वक आणि ठरवून करण्याचा प्रयत्न केला आणि तो देवाच्या आणि कुलस्वामिनीच्या कृपेने उत्तम रीत्या सफल झाला तो तुमच्या सगळ्यांशी समभागी (share ) करतो .

आम्ही असे लक्षात घेतले की – विवाह हा एक अत्यंत प्रमुख असा संस्कार आहे .

त्यामुळे हा संपूर्ण विवाह विधी हाच लग्नाचा मुख्य भाग असावा . 

 त्यात – सिनेमा – TV सीरियल – आणि आपले अज्ञान यांमुळे पुष्कळ गैर आणि रसभंग करणाऱ्या गोष्टी घुसल्या आहेत त्या टाळूया .

म्हणून – काही गोष्टी विचारपूर्वक केल्या आणि काही कटाक्षाने टाळल्या .

बँड – म्हणजे रणवाद्ये नकोत . मंगल आणि सुमधुर  वाद्याचे संगीत असावे . म्हणून सनई, सतार, बासरी यांचे आनंद उत्साह वाढवणारे संगीत पार्श्वभूमीवर ठेवले .

या विवाह संस्काराचे विधि अतिशय सुंदर आणि हृदयंगम आहेत .

त्यात सौंदर्य – मांगल्य – पावित्र्य – दूरदृष्टी – सगळं काही आहे .

परंतु आपणच ते विसरून गेलो आहोत .

म्हणून मी स्वतःच चार पाच महिने – विवाह विधींचा अभ्यास केला

त्याचे संकल्प – कृती – मंत्र यांचे अर्थ अभ्यासले – त्याला प्रमाण आणि आधार ग्रंथ वाचले .

ते वाचून मन भरून आले आणि असे प्रकर्षाने वाटले की सर्वांना हे विधी समजले पाहिजेत . 

म्हणून असे ठरवले की हा संपूर्ण विधी समजावणारे एखादे छोटेसे पुस्तक तयार करावे आणि प्रत्येकाला द्यावे . लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाचे आपण स्वागत करतो त्यावेळी हे पुस्तक स्वागताची भेट म्हणून प्रत्येकाला दिले .

आणि सांगितले की आपण इथे लग्नासाठीच वेळ काढून आला आहांत तेव्हा इथे बसल्या बसल्या – हे पुस्तक चाळा – त्यातलाच विधी आपल्या समोर चालू आहे तो बघा . त्याचा अर्थ इथे दिला आहे आणि समोर प्रत्यक्ष कृती होत आहे.

ही कल्पना आलेल्या सगळ्यांनाच आवडली आणि कित्येकांनी त्याच्या अधिक प्रती मागूनही घेतल्या .

प्रत्यक्ष वधू – वर एकमेकांना पुष्पमाला घालताना ऐन वेळी वधूला किंवा वराला उचलून घेऊन एक अनैसर्गिक मजा घेण्याची वाईट कृती लग्नात घुसली आहे . ही कृती करण्यासाठी काही उत्साही तरुण आणि मित्र वाटच पाहात असतात .

त्यांना आधीच फोनवर बोलून विधी किती सुंदर आहे हे समजावले आणि त्यांनाच विचारले की – इतक्या छान भावनांचा संगम होताना – त्या भावनांना विस्कटून टाकणारी – ऐन वेळी पुष्पमाला घालूच न देणारी – उचलून घेण्याची – कृती करायची का?  तेव्हा त्यांनी स्वतःहूनच सांगितले की आम्ही हे करणार नाही .

आपण जेव्हा मंगलाष्टके म्हणतो त्यावेळी अक्षता वाहातो . त्या अक्षता येणार्‍या आप्त स्वकीय – मित्र यांच्या शुभ ईच्छा आणि आशिर्वाद म्हणून – वधू वरांच्या डोक्यावर वाहायच्या असतात . पण ही गोष्ट माहीती असूनही आपण ती त्यासाठी काही आयोजन नसल्यामुळे करू शकत नाही – भावना मनात ठेवून आपण आहे तिथून अक्षता वाहाव्या लागतात आणि त्यामुळे वाहाणे बाजूला राहते आणि जोर लावून फेकाव्या लागतात . मनातील भावना कृतीत व्यक्त करु शकत नाही .

म्हणून आम्ही आणि विधी सांगणार्‍या गुरुजींनी पुढाकार घेऊन एक वेगळी संकल्पना प्रत्यक्षात केली – ती अशी :

मंगलाष्टकांच्या वेळी आलेत्या प्रत्येकाच्या हातात अक्षता असतील पण त्या त्यांनी प्रत्येक वेळी टाकायच्या नाहीत तर हातातच ठेवायच्या .

तसेच आलेल्या सगळ्यांनाच खुर्च्यांवर बसायला सांगितले – वधू वरांच्या बाजूला फक्त उपाध्याय – अंतर्पाट धरणारे आणि करवल्या एवढेच असतील .

त्यामुळे पुढे गर्दी झाली नाही .

बसल्या जागेवरून प्रत्येकाला पाहाता आले.

मंगलाष्टके झाल्यावर वधू – वरांचे पुष्पहार घालून झाले की – ते दोघे गुरुजींसह विधी मंडपातून  उतरून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या जवळ जातील त्यांना नमस्कार करतील . त्या त्यावेळी समोरच्या चार – पाच जणांनी त्यांच्या मस्तकावर त्या अक्षता सोडाव्या . यामुळे लग्नासाठी येणाऱ्या प्रत्येकालाच त्याच्या सदिच्छा आणि आशिर्वादरूप अक्षता वधू – वरांच्या प्रत्यक्ष डोक्यावर वाहाता येतील .

असे करत अगदी सगळ्यांना सुरुवातीच्या ओळीपासून शेवटी पर्यंत आणि पुन्हा परत शेवटच्या ओळीपासून पुढच्या ओळी पर्यंत येणारे आप्त स्वकीय  जिथे बसले आहेत तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांचा वधू-वरांनीच सन्मान केला . आणि भरभरून आशिर्वाद प्राप्त केले .

या सगळ्या कौतुक कृतीला सुमारे २०० जणांच्या जवळ जाण्यासाठी – त्यांना नमस्कार करून शांतपणे पूर्ण करण्यासाठी केवळ पंधरा  मिनिटे पुरली .

यामुळे – वृद्धांना त्यांच्या बसल्या जागी जाऊन नमस्कार करून त्यांचा मान राखता आला आणि नंतर वृद्धांना – रांगेत तिष्ठत उभे राहून वधू वरांना स्टेजवर भेटावेच लागले नाही .

प्रत्येकाला वधू वर जवळून बघताही आले .

आलेल्या प्रत्येकाच्या भावनांना प्रत्यक्ष कृतीची पूर्णता आली – तसे समाधान प्रत्येकाने बोलूनही दाखवले .

गुरुजींनीही विधीतील प्रत्येक कृती – त्याचा अर्थ त्या त्या वेळी थोडक्यात सांगितला .

पाणिग्रहण – कन्यादान – सप्तपदी या मागच्या भव्य आणि उदात्त कल्पना लक्षात आल्या .

त्यानंतर पंगतीमध्ये सर्वांनी सहभोजन घेतले . पंगतीला वाढणाऱ्यांना सुद्धा ही कल्पना आवडली आणि त्यांनीही अगत्याने आणि आग्रहाने वाढले .

आपण सर्व हे विसरून गेलो आहोत की विवाह हा एक उत्साह – चैतन्य – आणणारा समाजाला स्वस्थता देणारा मंगल असा संस्कार आहे . हे विसरण्याचा अजून एक दुष्परीणाम आपणच आणला आहे – तो म्हणजे प्रत्येक विधीमधे फोटोग्राफर आणि व्हिडिओवाले – त्यांना जसे हवे तसे फोटो काढण्यासाठी विधिंच्या मधे घुसून तेच जणू पुरातन कालापासून लग्न लावत आले आहेत अशा थाटात वधू वरांना वेगवेगळ्या पोज घ्यायला लावतात आणि खरे म्हणजे विधी आणि संस्कार यांचा विचका करतात .

अशावेळी यजमान काहीच बोलत नाही त्यामुळे गुरुजी सुद्धा काही करू शकत नाहीत . 

खरे म्हणजे यजमानाने पुढाकार घेऊन या गोष्टी न कळत – शिताफीने टाळता येतात .

आम्ही फोटोग्राफी केलीच पण आधीच ही संकल्पना फोटोग्राफरला समजावून सांगितली आणि त्यांना सांगितले की तुमच्यासाठी म्हणून कोणतीही पोज संपूर्ण विधीत होणार नाही . तुम्ही सर्व बाजूनी फोटो काढा पण विधी तुमच्या साठी थांबणार नाही .

सुंपूर्ण समारंभच – 

“candid photography ” करा .

सगळे विधी झाल्यावर ज्याला जसे हवे तसे एकत्र – ग्रुप फोटो काढून घ्या .

आश्चर्य म्हणजे ही कल्पना फोटोग्राफरला सुद्धा आवडली आणि त्यांनी ही खूप सुंदर आणि भरपूर फोटो काढले .

इतकेच नव्हे तर फोटोग्राफर ने दोनच दिवसांत सर्व फोटोंची एक लिंक तयार करून दिली . आम्ही ती लिंक प्रत्येक कुटुंबाला व्हॉटस्अप वर पाठवली आणि ज्याला जे फोटो हवे आहेत ते डाऊनलोड करून घेतले .

प्रत्येकाला आपले स्वतःचेही – छान फोटो मिळाले .

संपूर्ण समारंभात शांत संयमित आवाजात सनईचे सूर सरु ठेवले होते त्यामुळे वातावरण प्रसन्न तर झालेच पण आवाजही मर्यादित ठेवण्यामुळे प्रत्येकाला एकमेकाशी नीट बोलता आले . 

खूप दिवसांनी भेटणाऱ्या नातेवाईकांना गप्पा मारता आल्या . 

हल्ली संगीताचा आवाज अतिशय मोठा ठेवतात त्याने काय साध्य होते हेच समजत नाही . 

एवढेच नव्हे तर एकमेकांशी धड बोलताही येत नाही .

कानांवर ध्वनीचे अत्याचार सहन करावे लागतात ते वेगळेच . बरे कोणी सांगतही नाही की आवाज मर्यादित ठेवा म्हणून .

आम्ही आधीच ठरवून हे सर्व टाळले . 

त्यामुळे ढणढणाटा ऐवजी उलट प्रसन्नता – उत्साह – गप्पा – हास्यकल्लोळ यांनी समारंभाला जास्त शोभा आली .

तसे लोकांनी बोलूनही दाखवले .

अशा काही गोष्टी सहज साध्य आहेत – करता येतात – अवघड नाहीत .

उगीच प्रवाह पतित होऊन भलत्याच गोष्टी करणे आपण टाळू शकतो .

यात कुठेही कर्मठपणा _ कठोरपणा आणण्याची किंवा आपल्या परंपरांचा वृथा अभिनिवेश दाखवण्याची बिल्कुल आवश्यकता नाही .

योग्य वेळी प्रत्येकाला आपलेसे करून – समजावून सांगितले की छान करता येते – उलट प्रत्येकाचा सहभागही वाढतो .

लग्नाला जाणाऱ्या प्रत्येकाला हे मनातून हवे आहे हे ही प्रकर्षाने लक्षात आले .

मग आपणच आपला अप्रतीम वारसा सांभाळायचा – वाढवायचा आणि भरभरून पुढच्या पिढीला द्यायचा हे आपण निश्चित पणे करु शकतो .

हे सर्व मी लिहीले आहे – ते आधी केले मग सांगितले – या वचनाला जागून आहे.

आपला : नरेंद्र आपटे (ठाणे)

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “फोन स्टोरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “फोन स्टोरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

फोनवर बोलणाऱ्यांचे किती प्रकार सांगता येतील. काहींना निरोप सांगितला, किंवा मिळाला, की फोन ठेवण्याची घाई असते. काही फक्त हं……. बरे……. ठिक आहे……. बघतो……. चालेल….. नक्की असे म्हणत फोन ठेवतात. आपल्याला अजूनही काही सांगायचे असते‌…… पण त्याने फोन ठेवल्याने आपण फक्त फोनकडे बघतो…. कारण फोन ठेवणारा आपल्या समोर नसतो. (मग आपण सवडीने त्याला बघतो.)

पण बायकांचे फोनचे तंत्र वेगळेच असते. ज्या कारणासाठी फोन केला आहे तो विषय सोडून इतर विषयांवर देखील थोडक्यात विस्तृत चर्चा करण्याचे कसब यांच्याकडे असते.

हे समजण्याचे कारण आज सकाळी झालेले फोन. विषय साधाच होता. केरला स्टोरी सिनेमा बघायला जायचे का? किती वाजता? सह जायचे की आपले आपण…..

पहिला फोन झाला….. जायचे की नाही या चर्चेत काय सुरू आहे?….. अशी सुरुवात झाली……स्वयंपाक…….  पलीकडून उत्तर……. मग आज काय करते आहेस? यावर भाजी पोळी पासून आमरसापर्यंत सगळा स्वयंपाक फोनवर सांगून झाला…… आता त्यांच्याकडची भाजी आम्हाला नवीन होती…… झालं….. केरला स्टोरी थोडी बाजूला राहिली, आणि भाजीची स्टोरी (डायरेक्शन सह) अगोदर संपली…….

मग दुसरा फोन…… (पहिला फोन संपेपर्यंत माझा चहा गरम करून, पिऊन देखील संपला होता.) परत सुरुवात काय करतेस? केरला स्टोरी ला जायचे का?….. हो जाऊ……. पण आत्ता साडी खरेदी करायला जाणार आहे……. मग काय? कुठे? कोण? काय विशेष? यावर माहिती असणाऱ्या सगळ्या साड्यांच्या प्रकाराची आणि काय घ्यायचे यांची स्टोरी फोनवरच सुरू झाली……. (तो पर्यंत दुध वर येते आहे का ते बघणे, आणि कुकरच्या तीन शिट्या झाल्या की गॅस बंद करायची जबाबदारी माझ्यावर होती ती देखील संपली. कदाचित प्रेशर देखील उतरले असावे…….. यांच्या लांबलेल्या फोनमुळे कुकरने देखील रागारागातच शिट्या दिल्या असाव्यात असे वाटले.) पण फोन सुरुच……. केरला स्टोरी अगोदर साडी स्टोरी झाली…..

कपड्यांच्या बाबतीत मला यांचे कळत नाही……. (हे त्यांनी पदोपदी खरेतर पदरोपदरी मला ऐकवले आहे……) म्हणजे यांनी नवीन कपडे घेतल्यामुळे यांचे आधीचे कपडे जुने होतात. का कपडे जुने झाल्यामुळे हे नवीन कपडे घेतात. (आधी कोंबडी की आधी अंड इतकाच हा कठीण प्रश्न आहे.)

अजुनही फोन करायचे होतेच. मग तिसरा फोन…….. तो पर्यंत माझे मोबाईलवर कोणत्या ठिकाणी किती वाजता

शो आहेत याचा अभ्यास सुरू झाला होता. यांची परत फोन लाऊन विचारणा सुरू झाली. केरला स्टोरी…….. बास येवढेच म्हटले असेल…….. तो पर्यंत पलिकडून हो…. नक्की……. मी पण तेच विचारणार होते……… मागचा एक कार्यक्रम माझा मिस झाला…….. मग तो मिस झालेला कार्यक्रम कोणता होता……. तो कसा मिस झाला……. यावर त्यांची (मिसींग) स्टोरी….. आणि त्याच कार्यक्रमात किती मजा आली……. कोण कोण आले होते…….. यावर यांची स्टोरी…….. असा स्टोरी टेलींगचा कार्यक्रम सुरू झाला…… यांच्या स्टोरी संपेपर्यंत माझा जवळपास सगळा पेपर वाचून झाला होता…….

शेवटी एकदाचे किती जणांनी आणि कोणत्या शो ला जायचे हे ठरले आणि मी तिकिटे बुक करायला फोन हातात घेतला.

आता जेवणानंतर कोण कसे येणार…. आपण कोणाला कुठून बरोबर घ्यायचे की आपण कोणाबरोबर जायचे यासाठी परत फोन होतीलच. तेव्हा अजुनही काही वेगळ्या स्टोरी ऐकायला येतीलच……

अशी ही केरला स्टोरी ची तिकीटे काढायची स्टोरी……

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भगवंताची मिठी… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ भगवंताची मिठी… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

सोप्प नसतं हो, भगवंताचं होणं. प्रचंड निरागसता लागते, स्वच्छ मन लागतं. तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना…. कधी सहज म्हणून कुणाला निरपेक्ष मदत केली आहे  का? करून बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. अतीव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या उत्कर्षाचं कारण व्हा, कुणाच्या यशात भक्कम साथ द्या, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणी कुणाचं नसतं हो.. तरीही कुणाचं तरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा, कुणाची ताई व्हा, तर कुणाचा भाऊ.. मग बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या चेह-यावरचं हास्य बना, कुणाचे अश्रूंनी तुडुंब भरलेले डोळे पुसा, मग बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या, थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील.. मग भगवंताने स्वतःहून मिठी मारल्यासारखं वाटेल. आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय. स्वतःचं स्टेटस वाढवायचय् प्रत्येकाला.. कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा.. खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खूप उंचावर असेल, अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहूल लागेल. व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या, अन्न द्या, ते आमरस नाही हो मागत.. तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खूष असतात.. कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. आपल्याकडे आपलं असं काय आहे? भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो. मग त्यानी दिलेलं कघी कुणाला मनापासून द्या.. मग बघा … भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही.

कवयित्री- अज्ञात

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “राष्ट्रीय कर्क रोग संस्था, नागपूर”… लेखक – श्री सूरज पाल ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “राष्ट्रीय कर्क रोग संस्था, नागपूर”… लेखक – श्री सूरज पाल ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

नमस्कार ! दिनांक ८/ ०५/२०२३ ला राष्ट्रीय कर्करोग संस्था, नागपूर येथे गेलो होतो.

एखाद्या पंचतारांकित हॉटेलात जातोय की काय असाच भास आला ! 

दवाखान्याची इतकी भव्यता, अत्याधुनिक यंत्रणा आणि सुंदरता बघून खूप अभिमानस्पद वाटलं , की माझ्या देशात सुद्धा अश्याप्रकारचे दवाखाने तयार होत आहेत. 

आम्हा सगळ्यांना खूप सुरक्षित आणि आरामदायक वाटले !  रुग्णालय अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित आहे! संपूर्ण कर्मचारी अतिशय ज्ञानी आणि मैत्रीपूर्ण आहेत ! खोली अतिशय स्वच्छ आणि आरामदायक आहे! दिलेले अन्न अतिशय पौष्टिक आणि चविष्ट होते ! एकूणच, मला खूप सकारात्मक अनुभव आला !

कर्करोग या संकटाशी लढण्यासाठी इथे ‘कर्कयोद्धा’ ची फौज तयार करत आहेत. दवाखान्याच्या मिशनमधील प्रत्येक भागधारक, मग तो रुग्ण, काळजीवाहू, नातेवाईक किंवा इथले सेवा सहयोगी–  हा सुद्धा कर्कयोद्धा आहे.

कार्यक्षमता, टिकाऊपणा, ऊर्जा कार्यक्षमता, सुरक्षा आणि सौंदर्यशास्त्र या मूल्यांवर राष्ट्रीय कर्करोग संस्थेची योजना आखली आहे.—- कर्क योद्धा, परिवार शक्ती, कर्क सेवक, आंतरिक संगत, सबकी लडाई ह्या तत्वांवर चालणारी ही संस्था आहे.

आज तुम्हा सगळ्यांना ऊर्जा कार्यक्षमता या तत्त्वावर कश्या प्रकारे ही संस्था आधारित आहे? हे सांगण्याचा प्रयत्न करतो – हा प्रकल्प पूर्णपणे सौर उर्जेवर आहे. सौर ऊर्जेच्या प्लेट्स च्या खालच्या सावलीचा उपयोग काय करायचं?, तर तिथे गाड्या पार्क करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तसेच त्या भागात फुलबाग सुद्धा फुलविली आहे. अश्या प्रकारे आम्ही ऊर्जा सुद्धा तयार करू – जागेचा पुनर्वापर करू – फुलबाग सुद्धा फुलवू, हेच तत्व अश्या प्रकारच्या कृतीतून दाखवून आपल्या सगळ्यांसमोर उत्तम उदाहरण ठेवलेलं आहे. 

लेखक : श्री सूरज पाल

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चित्रपटनगरीची जादू…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “चित्रपटनगरीची जादू…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

चित्रपटनगरी तशी अफलातून नगरी.  हे तसं म्हंटलं तर वादळी क्षेत्र.ह्याची दुनियाच वेगळी. ह्या क्षेत्रात सगळंच मुळी बेभरवशाचं बघा.काहींना अल्पावधीतच यश मिळतं तर काहींची हे यश मिळविण्यासाठी संपूर्ण कारकिर्दच पणाला लागते.कुणाला हे यश स्वतःच्या रुपावर मिळतं तर काहींच यश हे त्यांचा उच्चप्रतीचा अभिनय ओढून आणतो. काहींना पचवता येणार नाही इतकी अलोट संपत्ती येथून मिळते तर काहींना ही मायानगरी अक्षरशः कंगाल बनविते. पण तरीही बहुतेकांच्या मनात ह्या चित्रपटसृष्टीविषयी आवड,उत्सुकता, कुतूहल हे असतं, अगदीच खासकरून अभिनेते वा अभिनेत्रींबाबत.

ह्या नगरीत अनेक आवडते कलाकार आपली कला फुलवित भरघोस योगदान देतात  तर काही व्यक्तींनी ह्या क्षेत्रात भरघोस योगदान देण्याआधीच एक्झीट घेतलीयं.

ही मायानगरी म्हणजे एक अख्ख भलमोठं कुटूंबच असत जणू. कुटूंबाप्रमाणेच सगळी कामं ही वेगवेगळ्या लोकांनी वाटून घेतलेली असतात. ह्या क्षेत्राचे कायम आपल्या सामान्य जनतेला आकर्षण, उत्सुकता वाटत असते.काळ खरच खूप बदललायं. आता ह्या मध्ये चांगले वाईट हा वादग्रस्त मुद्दा विचारात न घेता फक्त एक गोष्ट नक्कीच मान्य करुया ,की ह्मा बदलत्या काळामुळे स्थित्यंतरे आलीत, गोष्टी मुळासकट खूप बदलत गेल्यात.काही चांगल्या गोष्टी काळाच्या उदरात गडप झाल्यात तर काही चांगल्या गोष्टींचा उदय पण झाला. असो शेवटी कालाय तस्मै नमः हेच खर.

बदलत्या काळानुसार, वयानुसार आवडीनिवडी ह्या खूप बदलतात. प्रत्येक वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आपल्या आवडी वा गरजा ह्यामध्ये आमुलाग्र बदल होतो.खरतरं आपण व्यक्ती त्याच असतो पण आपलाच आपल्या बदलत्या आवडी बघितल्यावर प्रश्न पडतो खरचं आपण त्याच व्यक्त आहोत?

अगदी उदाहरणादाखल बघितले तर आपली स्वतःची चित्रपटांची आवड,चित्रपट बघण्याची क्रेझ, त्यासाठी करावी लागणारी खटपट, ह्या विषयातील चोखंदळपणा ह्यात जमीनआसमान चा फरक पडलाय, किंबहुना अजूनही पडतोय.

लहानपणी वा तरुणवयात आठवड्यातून एकदाच टीव्हीवर बघायला मिळणारा चित्रपट हे एक खूप मोठे आकर्षण होते.त्यासाठी त्या दिवसात घरच्यांनी सांगितलेली कामे,अभ्यास ह्या गोष्टी नियमानुसार कटाक्षाने पाळाव्याच लागतं.तेव्हा सर्रास थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायची पद्धत. नव्हती.आधी पालक त्या चित्रपटविषयी जाणून घेऊन मगच सठीसहामाशी आपल्या मुलांना एखादा चित्रपट बघण्यासाठी परवानगी देत असतं. फक्त शाळे कडून दाखविल्या जाणारे इतिहास वा सामाजिक विषयक चित्रपट बघायला मिळायचे.असो तो काळच वेगळा होता.

तरुण वयात फारसा कथानकाचा विचार न करता गाणी,हाणामारी ह्यांनी भरलेले चित्रपट हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचे. नंतर जस वय वाढत गेलं,जरा प्रगल्भता आली तेव्हा कथा

दिग्दर्शक  कलावंत ह्याकडे काळजीपूर्वक चोखंदळपणे अभ्यासपूर्ण बघून मग चित्रपट बघण्याची जाण आली.आणि आता तर अजून थोड वय पुढ गेल्यावर फारशी चित्रपट बघण्याची ईच्छा वा इतका वेळ देण्याचा स्टँमिना पण नाही राहीला.

पूर्वी चित्रपट कमी बघायला मिळायचे म्हणूनही कदाचित त्याची जास्त ओढ होती. अति मिळालं की नाविन्य,गोडी संपुष्टात येते त्यानुसार टीव्ही, वाहिन्या, थिएटर ह्यांच्या मुबलकतेमुळे चित्रपट बघण्यातील गोडवाच कुठेतरी हरवून गेला असं वाटतं.पण त्या चंदेरी आठवणी मात्र  कायम  असतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी आजी… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझी आजी… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

माझी आजी डोळ्यासमोर येते तेव्हा तिच्या आयुष्याच्या दोन चित्रमालाच डोळ्यासमोर येतात. एक तिचे स्वातंत्र्यपूर्व आयुष्य आणि दुसरं स्वातंत्र्यानंतरचे!

राधाबाई कृष्णाजी पेंडसे, आजोबांची दुसरी बायको ! पहिली फारच लवकर गेली आणि त्यानंतर आजोबांनी दुसरे लग्न केले. कोकणातली आई – बापा विना आजोळी वाढलेली दहा-बारा वर्षाची ती मुलगी आजोबांबरोबर लग्न करून थेट लांब कराची ला गेली ! नव्हता शिक्षणाचा गंध, नव्हता श्रीमंतीचा साज ! केवळ घराला जड होऊ नये म्हणून कोणीतरी लग्नाचा विचार केला आणि ती बोहल्यावर चढली. अशी ही साधीसुधी मुलगी कोकण सोडून दूरवर गेली एका मोठ्या बंगल्याची मालकीण म्हणून ! आजोबांची सरकारी नोकरी होती. ते ऑब्झर्वेटरीत नोकरीला असल्याने कराची जवळील मनोरा बेटावर त्यांचे वास्तव्य होते. दूरवरून येणाऱ्या बोटी, मचवे ह्यांना हवामानासंबंधीचे मार्गदर्शन करण्याचे काम असे. मॅट्रिक झाल्यानंतर नोकरी करणे गरजेचे होते त्यामुळे इतक्या लांब ठिकाणी ते नोकरीसाठी गेले. आजी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी कराचीला गेली. घरी नोकर चाकर होते. दहा-बारा खोल्यांचे घर होते, पण संसार मांडायला लागणारा आधार कुणाचा नव्हता ! आपल्या आपण सर्व शिकायचे. नवऱ्याच्या कडक शिस्तीत राहायचे आणि आज्ञा पालन करायचे एवढेच तिला माहिती ! कधीतरी कोकणात जायला मिळे, पण प्रेमाची माणसे कमीच होती. माहेरची चितळे.. परशुरामाच्या घाटीत राहणारी.. भाऊ वहिनी होते, पण परिस्थिती 

बेताचीच ! दारिद्र्य सगळीकडेच होते, पण भात आणि कुळीथाच्या पिठल्याला कमी नव्हतं ! घाटी उतरायची, चिपळूणला जायचं, काय असेल ते आंबे, फणस, रातांबे विकायचे. चार पैसे मिळत त्यातच बाजार करायचा ! अशा पद्धतीने कोकणातल्या कुटुंबांचा व्यवहार चालत असे.

लग्नानंतर आजी कराचीला गेली. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे दर दोन वर्षांनी एक बाळंतपण होत होतं. सहा मुलं झाली. तीन मुली, तीन मुलगे. सर्वांना एका ठिकाणी राहणं परवडणारे नव्हते ! मग दोन मुलं सातारला काकांकडे वाढली तर  चार मुले कराचीला वाढली. माझे वडील सर्वात मोठे! त्यांचे बालपण  ऐषारामात गेले. कारण आजोबांची नोकरी मानाची होती. मोठ्या मोठ्या इंग्रज साहेबांचा वावर भोवती असे.

राहणीमान चांगले ठेवता येई. कपातून चहा प्यायला मिळे. साहेब लोकांशी संपर्क असल्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. आजोबांना पुस्तकांची प्रचंड आवड होती. विशेष करून इंग्रजीची आवड होती. घरामध्ये पुस्तकांचे शेल्फ भरलेले असे. कराचीजवळचे मनोऱ्याचे घर म्हणजे लौकिक अर्थाने चांगले, सुसंपन्न स्थितीतील घर होते. शिक्षणाची मनापासून आवड असल्यामुळे आजोबांनी आजीलाही लिहा वाचायला शिकवले होते. घट्ट नऊवारी नेसणारी आमची आजी नाकी डोळी नीटस,  उंच, शिडशिडीत बांध्याची होती. मनोऱ्याला काही मराठी कुटुंबही होती. मोजकीच ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे ही मंडळी एकमेकांना धरून असत. वडिलांचे बीएससी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. युद्धाचा काळ असल्याने सेन्साॅर ऑफिसला नोकरी मिळाली होती. लवकरच लग्न होऊन त्यांचे बिऱ्हाड कराचीमध्ये झाले. त्यांच्याबरोबर माझे काका, आत्या ही मंडळी कराचीत घर करून राहिली. आजी मनोरा ते कराची अशा फेऱ्या मारत संसार करत होती.

याच दरम्यान भारताच्या फाळणीच्या गोष्टी सुरू होत्या. आजोबांची रिटायरमेंट झाली,  त्यांना कराचीमध्ये राहण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी कराचीला मोठे घर घेतले. आणि सर्व मंडळी त्या घरात राहू लागली पण १९४७ च्या सप्टेंबर मध्ये फाळणीनंतर अवघ्या एका महिन्यातच सर्व पेंडसे कुटुंबाला पाकिस्तान सोडावे लागले आणि भारतात आपल्या मूळ गावी आयनी मेटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथे निर्वासित म्हणून यावे लागले. इथून आजीच्या आयुष्याचा दुसरा कालखंड सुरू झाला ! कराचीचे, मनोऱा बेटावरचे साहेबी जीवन संपले आणि कोकणात आयनी- मेट्याजवळील पाटील वाडी या ठिकाणी आजोबांनी जागा घेतली.  त्या जंगलात झोपडीवजा घर बांधून आजी- आजोबा राहू लागले .मोठ्या बंगल्यात राहणारी आजी आता आजोबांबरोबर झोपडीत राहू लागली. मुलांच्या शिक्षणासाठी चिपळूणला बिऱ्हाड केले होते. पाटील वाडी आणि चिपळूण अशा फेऱ्या करत पुन्हा एकदा आजीच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आजोबांना डायबिटीस होता. कोकणातील कष्टकरी जीवनात आणि निर्मळ वातावरणात त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहिला होता. माझी आजी या सगळ्याला तोंड देत मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी झटत होती. कष्टाची तर तिला कायमच सवय होती. डोक्यावर आंब्याच्या, फणसाच्या पाट्या घेऊन आजी खेडला विक्रीसाठी येत असे. ती दिवसाकाठी आठ दहा मैल सहज चालत असे. आसपासच्या लोकांना ‘निर्वासित म्हणून आलेले पेंडसे’ परिचयाचे होते. काही जण आपुलकीने त्यांना मदत करत असत.

अशीच जीवनाच्या खाचखळग्यातून आजीची वाटचाल ७० सालापर्यंत चालू होती. १९७० साली आजोबा गेले आणि पुन्हा एकदा आजी एकटी पडली.. ती अधूनमधून आमच्याकडे, काकांकडे, आत्याकडे येत जात असे, पण तिला तिथे जास्त काळ करमत नसे. स्वतंत्र विचाराची, कणखर स्वभावाची अशी आजी कोकणात एकटी घरी राही. एकदा ती घरात एकटी आहे असे पाहून चोरांनी कडी काढायचा प्रयत्न केला पण आजी इतकी धीट की तिला जाग आल्याने हातात काठी घेऊन ती दाराजवळ आली आणि चोराच्या हातावर  काठीने मारले. चोर पळून गेले. पण त्यानंतर मात्र तिच्या भाच्याने  तिला आपल्या घरी रोज रात्री झोपण्यासाठी नेण्याचे ठरवले. काही काळ असा गेला. पुढे माझ्या भावाला मुलगा झाला आणि आजीला पंतवंड झाले. त्यानिमित्ताने तिला पुण्यामध्ये आणले आणि परत कोकणात तिला जाऊ दिले  नाही.

आयुष्याचे असे दोन  कालखंड… एक कराचीचा आणि एक कोकणातला – दोन परस्पर विरुद्ध

तिने अनुभवले. नकळत या सर्व गोष्टींचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. कधीतरी ती मनाने मनोऱ्याच्या घरी असे तर कधी कोकणात असे ! आयुष्यात घडलेल्या घडामोडींमुळे तिचे मन अस्वस्थ झाले होते. संकटांना तोंड देऊन ती थकली होती. तिच्याआधी माझे वडील गेले, त्यामुळे मुलगा गेल्याचे दुःख ती विसरू शकत नव्हती. आठवड्यातील सात दिवसातले चार-पाच दिवस तरी तिचा उपासच असे. पण  कष्ट केलेले तिचे शरीर या सगळ्याला तोंड देत होते. शरीर झिजले होते पण तिला कोणताही आजार नव्हता त्यामुळे थकत गेलेली आजी हळूहळू या सगळ्या मोहमायेतून  बाहेर पडली. झाडाचे जीर्ण पान जसे अलगदपणे गळून पडते, तशी माझी आजी म्हातारपणामुळे अनंतात विलीन झाली. माझ्या आत्त्याने पेंडसे कुटुंबाच्या आठवणींचे एक पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाच्या आधारे मला माझ्या आजीचे हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते !

तिच्या स्मृतीला माझा शतशः प्रणाम !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संत एकनाथ  महाराज… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ संत एकनाथ महाराज… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते… त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत…..

एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते… हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या…..

नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला… एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत…..

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला… ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे…..

’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे… ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले…..

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला… फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Be a CEO of your own life. ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ Be a CEO of your own life. लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

मी आणि ताई आम्ही दोघी बहिणी. मी पुण्यात तर ताई नाशिकला स्थाईक. आज आम्ही दोघी सिनियर सिटीझन आहोत. मी पासष्ट तर ताई सत्तरीला पोचली.

आयुष्याचा आतापर्यंतचा काळ कसा गेला? कळलंच नाही. घर परिवार आमच्या नोकऱ्या, मुलांची शिक्षणं, त्यांच्या नोकऱ्या, त्यांची लग्नं, नातवंडं, मुलांचे अमेरिकेत स्थायिक होणे, आमच्या अमेरिकेच्या फेऱ्या. म्हणजे आमच्या पारिवारिक सिनेमाच्या सोळा रिळापैकी चौदा रीळं तर जवळपास संपली, म्हटलं तरी चालेल.

आता आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरता आली आहे. वय बोलू लागलं आहे. अमेरिकेचे ग्रीन कार्ड आम्ही घ्यावं, याबद्दल बऱ्याच चर्चेनंतर आता मुलांनी म्हणणं सोडून दिले आहे.

आम्ही अमेरिकेला येऊ, पण राहू आम्ही भारतातच. हे नक्की ठरलंय.

 ताई म्हणजे सौ. अनिता अजय देशपांडे यांचा नाशिकला मोठा बंगला आहे. रिटायरमेंट नंतर मागची पंधरा वर्षं त्यांनी बंगल्याचा पूर्ण उपभोग/ आनंद घेतला. त्यांच्या शेजारीच ताईचे मोठे दीर श्री अनिल देशपांडे यांचा बंगला. दोघी जावांचं छान पटतं. दोघांना एकमेकांच्या आधार आहे. बरोबर मोकळेपणाही आहेच. आता मात्र वयाप्रमाणे बंगल्याचे मेंटेनन्स करणं कठीण होतं आहे. त्यानंतर सेफ्टी, security चा प्रश्नही आहेच.

आतापर्यंतच्या सर्व पारिवारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण झाल्या.

आता पुढे काय ? पुढे काय ?

आता स्वतः ची जबाबदारी स्वतःच घ्यायची वेळ आली आहे.

तरुणपणी बघितलेली स्वप्नं – ‘उच्चशिक्षित मुलांनी उंच भरारी घ्यावी’. ती पूर्ण झाली. आता त्या स्वप्नांचे साईड इफेक्ट दिसतायेत. मुलं जवळ नाहीत. तसं बघितलं तर पुण्यासारख्या शहरात प्रत्येक चौथ्या घरी हाच सीन आहे.

स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आपणच घेतलाय/ भोगलाय. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्वप्नांचे साइड इफेक्ट पण gracefully handle करावेच लागतील.

वयाच्या या नाजूक वळणावर, ‘पुढे काय ?’

या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. आता प्रत्येक दिवस वेगळा निघतो, शरीराचा प्रत्येक अवयव वेगळा रंग दाखवतोय. वेळेवर सावध होणे गरजेचे आहे.

आज ताईचा फोन आला. म्हणाली,

“अग! पुण्यातील जरा चांगल्या old Age Homes बद्दल विचारपूस करून माहिती पाठव. “

मी म्हटलं, “अग ताई !! हे काय आता, नवीन खूळ तुझ्या डोक्यात आलंय ? चांगला बंगला सोडून Old Age Home वगैरे काय ?”

ताई म्हणाली, “अग! का नाही ? आपले final destination old Age Home ठरविण्यात काय हरकत आहे ?

Safety, Security, medical help, डॉक्टरची सुविधा Dining Mess facility, same age group चे आपल्या सारखेच आपल्याला भेटणार, मग काय हरकत आहे ?

अग !!जसं जसं वय वाढत जाणार तसतसे अनेक प्रश्न समोर येऊ शकतात. आयुष्याचा हाही फेज आरामात पार पडावा, ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते. पण तसे होईलच याची काही गॅरंटी आहे का ?

खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा, वास्तविकता लक्षात ठेवून आपली सोय करून ठेवावी. काही बदल, Planned Change ठरवून करायचे असतात.

हिवाळ्यात हीटर, उन्हाळ्यात कुलर / AC ची सोय करतो ना, तसंच काहीसं हे पण.

ही म्हातारपणाची सोय आहे, ” ताई म्हणाली,

Be a CEO of your own life. •••

Be your own BOSS. •••

माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतची जबाबदारी माझीच आहे ना!

अग !मुलांना आपली काळजी असतेच. पण ते आता आपली मदत कशी करू शकतील ? आपण आपली व्यवस्थित सोय केली तर त्यांना पण काळजी राहणार नाही.

बरं ! जेथे आपलीच मुले आपल्या जवळ नाहीत, तेंव्हा दुसऱ्यांवर भार टाकणंही बरोबर नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणाजवळच एवढा वेळ नाही/नसतो ग. अपेक्षा करणंच चूक आहे.

तेव्हा एखाद्या छान म्हणजे व्यवस्थित सर्व सोई जेथे उपलब्ध असतील, तेथे आपण रहायला जायचं, हे आम्ही ठरवलंय.

भविष्याची सोय करून, आपल्या मनाला जर आपण शाश्वत केलं. तर मन खंबीर राहतं. वर्तमान ही मजेत जगता येतं. मनाला खचू द्यायचं नाही.

‘Life is very unpredictable, ‘ हे लक्षात ठेवून हा निर्णय घेतलाय.

आयुष्यातील कोडी आपल्यालाच सोडवायची असतात.

लाइफचं हे प्रोजेक्ट आपल्यालाच successfully complete करायचं आहे. “

ताई एक वाक्य नेहमी म्हणते,

“कोणाच्या आयुष्यात Option म्हणून नाही जगायचं. नेहमी Perfect And Special जगायचं. “

प्रत्येक वळणावर जरा थांबून आपल्या आयुष्याचे Alignment करावं.

ताई म्हणाली,

“अग !!!

आता वृद्धाश्रम किंवा Old Age Home बद्दल विचार बदलले आहेत. ज्यांना त्यांची मुलं सांभाळत नाही, ते अशा जागी राहतात, हे असं कोणी आता समजत नाही. “

ताईचा हा निर्णय विचारात घेण्यासारखा आहे.

म्हणतात ना,

प्रार्थना ऐसे करें जैसे सब कुछ भगवान पर निर्भर करता है ।

परंतु प्रयास ऐसे करें जैसे सब कुछ आपपर निर्भर करता है।

लेखिका :सुश्री संध्या बेडेकर.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares