मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक  परिचर्या दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “जागतिक परिचर्या दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात अशी एक म्हण आहे.त्यानुसार आपल्या आवडीनिवडी, कल हा बालपणी पासून लक्षात येतो.अर्थातच ह्यात काही अंशी बदलही होतोच. माझ्या लहान बहिणीचा सेवाभावी कल ओळखून ही वैद्यकीय पेशा स्विकारुन रुग्णसेवा उत्तम करेल हे लहानपणीच लक्षात आलं.ती ह्या शिक्षणाच्या मार्गाने गेली नाही परंतु तिची रुग्णांची सेवा मनापासून करण्याची सवय मात्र अजूनही तशीच आहे. तसचं आमच्या व्हाट्सएप समुहामधील  एक सदस्या श्रुती आंबेकर ह्या तर विदेशात राहून आवडीने मनापासून रुग्णसेवा करतात ह्याच खूप कौतुक वाटतं. आज ही आठवण यायला आजचा दिवस खूप खास.

एखादी आपत्ती, संकट ह्यांचा अनुभव आल्यानंतर त्यातील गांभीर्य हे कळायला लागतं

तमाम जगाला हा अनुभव कोविड च्या येऊन गेलेल्या जीवघेण्या लाटेने दिला . ह्या अनुभवा नंतर मात्र जवळपास प्रत्येकाला “सर सलामत तो पगडी पचास”ह्या म्हणीवर विश्वास बसायला भाग पाडले. ह्या आणिबाणीच्या काळात महत्त्वाचे, विश्वासाचे जिव्हाळ्याचे तसेच  आजार,दवाखाने, रुग्ण ह्यांच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार.

12 मे .   “जागतिक परिचर्या दिन”. आज आपण ह्या दिनाच्या निमीत्ताने “जगाची सुश्रुषा”हे घोषवाक्य सत्यात उतरविणा-या सर्व परिचारीकांचे मनापासून धन्यवाद. खरतरं त्या करीत असलेल्या सेवेसाठी धन्यवाद हा शब्दच मुळी खूप तोकडा आहे.

असं म्हंटलं जातं सेवा करणं ह्या मागे बरेच वेळा स्वार्थ दडलेला असतो परंतू सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की कोरोना काळात सुद्धा अमरावती ला सरकारी दवाखान्यात आणि अनेक कोवीड आयसोलेशन सेंटर मध्ये ह्या परिचारीकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक वृद्धांची, रुग्णांची निस्वार्थ भावनेने मनापासून सेवा केली. नुसतेच औषधोपचार न करता रुग्णांना तुम्ही नक्की बरे होऊन घरी जाणार हे मनावर ठसवितं भक्कम मानसिक आधार पण दिला. विशेष म्हणजे हा चांगुलपणाचा परिचारीकांचा अनुभव एकट्यादुकट्याचा नसून अनेकांनी अनुभवला आहे. खरोखरच आपले ब्रीदवाक्य आचरणात आणून जगणाऱ्या ह्या परिचारीकांना मानाचा मुजरा.

नाइटिंगेल ह्यांचे नाव माहिती नसलेली एकही व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात आढळणार नाही. ह्या परिचारिका, लेखिका,संख्याशास्त्रज्ञ होत्या. 1853 मध्ये त्यांनी जखमी सैनिकांवर उपचार केला.त्यांनी शरीरासोबतच त्यांच्या मनावरील जखमा भरून काढल्या.त्यांना लेडी विथ दी लँप ही उपाधी मिळाली.त्यांचा जन्मदिवस 12 मे हा त्यांच्या सन्मानार्थ जागतिक परिचर्या दिन म्हणून साजरा केल्या जातो.

आजच्या दिनी कौशल्यवान,सेवाव्रती, प्रेमळ, सामाजिक कार्यात भाग घेणारी,आणि रुग्णसेवा हीच ईशसेवा मानणारी परिचारिका अरुणा शानबाग हीचेही हटकून स्मरण होतचं.

आजच्या ह्या दिनी परिचारिका नाइटिंगेल व अरुणा शानबाग ह्यांना अभिवादन करुन आजच्या पोस्टची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ लेखाजोखा… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ लेखाजोखा… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जिंकणं हे मोरपिसासारखं हलकं असतं… कुणीही ते हसत हसत झेलू शकतं….

आणि हरण्याइतकं दुसरं ओझं या जगात कशाचंही नसतं….!  

हे ओझं पेलता पेलता, जो हसत जगतो तो खरा बलवान…. ! 

सर्व काही जिंकूनही, जगत जगत मरणारी माणसं रोज भेटतात…. 

आणि सर्वस्व हरूनही मरता मरता जगणारी माणसंही रोजच भेटतात…!

दोघांकडूनही बरंच शिकायला मिळतं…! 

हे शिकत, शिकवत… लाचारीने जगणाऱ्या लोकांना आपल्या साथीने एक हात देत आहे, त्याचाच हा एप्रिल महिन्याचा लेखाजोखा… !!!

वैद्यकीय

वैद्यकीय शिक्षण घेत असताना पुस्तकात अतिशय दुर्धर अगम्य अशा अनेक केसेस वाचलेल्या असतात… परंतु डॉक्टर झाल्यानंतर प्रत्येकाला अशा केसेस आयुष्यात कधीतरी पहायला मिळतीलच याची गॅरंटी नसते.  

रस्त्यावर काम करताना, मला मात्र महिन्याभरात किमान एकतरी अशी केस पाहायला मिळते. 

अशा केसेस मग हॉस्पिटलमध्ये नेऊन सुपर स्पेशालिस्टना दाखवाव्या लागतात, ऍडमिट करावे लागते. 

या महिन्यात असे सहा पेशंट मिळाले. इतर अनेकांबरोबर त्यांनाही ऍडमिट केले आहे. 

यातील एकाला अंतिम टप्प्यात असलेला कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणाले, ‘याला आधी आणलं असतं, तर आपण काहीतरी केलं असतं, आता फक्त याला वेदनामुक्त मरण देणं, इतकंच आपल्या हातात आहे….!’ 

हा मुलगा खरंतर नेपाळचा. मोठी स्वप्नं घेऊन नोकरीसाठी पुण्यात आला. गावी गरीब, वृद्ध आई-वडील आहेत, लग्न झालेलं नाही. नोकरी मिळाली, गावी पैसे पाठवू लागला, परंतु परिस्थितीच्या विळख्याने सगळंच पालटलं. आजारपण सुरू झालं, नोकरी गेली … होते नव्हते ते पैसे उपचारासाठी गेले. आई-वडिलांना पैसे पाठविणे सोडा, स्वतःच्या जगण्यासाठी सुद्धा याला भीक मागावी लागली. वेळ होती, त्यावेळी कोणीही हात दिला नाही…. आता माझ्या माध्यमातून, “तुमचा हात” त्याच्यापर्यंत पोहोचवायचा म्हटलं, तर वेळ निघून गेलेली आहे… मिनिटा मिनिटाने आयुष्य डोळ्यादेखत संपत चाललंय… मृत्यु 

उंबऱ्याबाहेर ताटकळत उभा आहे…!  समोर आपल्याशी बोलत असणारा माणूस पंधरा-वीस दिवसानंतर, “तो” आपल्यात नसणार आहे… हे आपल्याला माहित आहे…. परंतु त्याला माहीत नाही…

— हे पाहणं, अनुभवणं आणि पचवणं… वाटतं तितकं सोपं नाही, खूप वेदनादायी आहे हे ! 

समोरच्या कॉटवर असलेलं, चालतं बोलतं “शरीर”, काही दिवसानंतर “बॉडी” म्हणून पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं जाणार आहे…

श्वास असतात तेव्हा “शरीर”… श्वास थांबले की “बॉडी”, शरीर आणि बॉडी मध्ये अंतर फक्त एका श्वासाचं ! 

आज पन्नास किलो वजनाचं हे शरीर …काही दिवसानंतर मुठभर राख म्हणून तांब्यात विसावणार आहे… 

जिवंत असताना कोणी साथ नाही दिली, सोबत नाही केली, कुणीही पाठीशी नाही… पण, हा गेल्यावर मात्र याच्यामागे चालत पन्नासजण याच्या पाठीशी राहुन याला “पोचवायला” येतील…! 

जिवंत असताना याला कोणी घास भरवला नाही…. पण गेल्यावर मात्र दरवर्षी याला “घास” ठेवले जातील, न चुकता…! 

“या घासापासून” ते “त्या घासापर्यंत”, मध्ये जे काही असतं, ते आयुष्य !!!

आणि,…. आयुष्यभर तुझं – माझं करत आपण जगत राहतो, झुंजत राहतो….फक्त मुठभर राख होण्यासाठी ! 

मुठभर राख हेच अंतिम सत्य !!! 

असो. 

… दरवेळी भेटला की विचारतो, ‘डॉक्टर मैं बचुंगा ना ? बाकी कुछ नही, लेकिन मेरे मा बाप उधर है, उनके लिये मुझे जिंदा रहना पडेगा ‘, हात जोडून तो केविलवाणे जेव्हा बोलू लागतो…. तेव्हा आपल्याच आतड्याला पीळ पडतो. 

‘अरे हो रे… तुला काय झालंय मरायला ? अजून खूप काही करायचं आहे तुला… चल, असा विचार करू नकोस…’ अशी खोटी खोटी वाक्यं बोलत, त्याला उरलेले दिवस हिमतीने जगण्याची आशा दाखवत आहे. 

सर्वात जास्त वेदनादायी आहे ते हे… खोटं बोलणं…! 

कधी वाटतं, खरं खरं सांगून मोकळं व्हावं… पण नकोच, प्रत्येक जण जगतो तो आशेवर…

आपल्यालाही आपल्या मृत्यूची तारीख समजली, तर आपण आज, आत्ता या क्षणापासूनच जगणं सोडून देऊ….!…. असू दे, रोज बोलत राहीन मी खोटं ….रोज वाढवत राहीन मी त्याची आशा…एक जीव वाचला… तर रोज खोटं बोलल्याबद्दल मला मिळतील त्या शंभर शिक्षा घ्यायला मी तयार आहे… तयार आहे… !!! 

अन्नपूर्णा प्रकल्प

रस्त्यावर असहायपणे पडून असणारे आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे असे दयनीय अवस्थेत जगणाऱ्या लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रोज अन्नदान केले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या घरी काहीतरी गोड असतं….. याच धर्तीवर, सणावाराला त्यांना गोडाचे जेवण दिले आहे. 

… तुम्हा सर्वांचे माध्यमातून अक्षय्य तृतीयेनिमित्त किमान १००० लोकांना जेवू घातले. 

हा यज्ञ आपणा सर्वांच्या साथीने रोजच सुरू आहे. 

खराटा पलटण

जी मंडळी भीक मागणे सोडून काम करायला लागली आहेत त्यांना वेळोवेळी कोरडा शिधा / किराणा दिला आहे. ४० आज्यांची स्वच्छता टीम तयार केली आहे.  पुण्यातील विविध भाग त्यांच्याकडून स्वच्छ करून घेऊन त्यांनाही शिधा दिला आहे. आमची ही टीम पुण्याच्या स्वच्छता अभियानाची ब्रँड अँबेसिडर आहे. 

भीक नको बाई…. शिक

एप्रिल महिना म्हटलं, की परीक्षांचा आणि परीक्षांचे निकाल लागण्याचा महिना….! 

पूर्वी भीक मागणाऱ्या ५२ मुलांना शैक्षणिक मदत करत आहोत. आणि ही सर्व मुलं यावर्षी पास झाली आहेत. कुणी दुसरीतून तिसरीत गेलं…. कुणी तिसरीतून चौथीत गेलं… कोणी चौथीतून पाचवीत गेलं… 

त्यापैकी असाच एक यावर्षी इन्स्पेक्टर होणार आहे, आणि येत्या काही वर्षात कुणी सीए, कुणी बीबीए तर कुणी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर होणार आहे…! 

एका बापाला अजून काय हवं…??? 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंतरराष्ट्रीय मातृदिन – एक बाजू अशीही… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आंतरराष्ट्रीय मातृदिन – एक बाजू अशीही…  ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

Anna Reeves Jarvis

नमस्कार मित्रांनो,  

आंतरराष्ट्रीय मदर्स डे (मे महिन्याचा दुसरा रविवार) अर्थात मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

हा मातृदिन आजच्याच दिवशी का साजरा करतात, या प्रश्नाचा मी मागोवा घेत असता काही मनोरंजक तसेच विचारणीय माहिती हाती लागली. मदर्स डेचा सर्वात जुना इतिहास ग्रीसशी जोडल्या जातो. तिथे ग्रीक देवी देवतांच्या आईची आदराने पूजा केल्या जात होती. हे मिथक असल्याचे देखील बोलल्या जाते. मात्र आज अस्तित्वात असलेल्या मदर्स डे ची सुरुवात करण्याचे श्रेय बहुतेक जण अॅना रीव्ह्ज जार्विस (Anna Reeves Jarvis) हिलाच देतात. तिचे आपल्या आईवर (अॅन मारिया रीव्ह्ज- Ann Maria Reeves) नितांत प्रेम होते. जेव्हां तिच्या आईचे ९ मे १९०५ ला निधन झाले, तेव्हा स्वतःच्या आईबद्दल आणि सर्वच मातांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस असावा असे तिला प्रकर्षाने वाटायला लागले. यासाठी तिने खूप पाठपुरावा करून वेस्ट व्हर्जिनियामध्ये चळवळ सुरू केली. तीन वर्षांनी (१९०८) अँड्र्यूज मेथोडिस्ट एपिस्कोपल चर्चमध्ये प्रथम अधिकृत मदर्स डे सेलिब्रेशन आयोजित केल्या गेला. १९१४ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अॅना जार्विसच्या कल्पनेला मान्यता देत मे महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या रविवारी राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता देणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली. हा दिवस मग हळू हळू अमेरिकेतून युरोपीय आणि इतर देशात आणि नंतर जगभर आंतरराष्ट्रीय मदर्स डे म्हणून मान्यता पावला.

कवी आणि लेखिका ज्युलिया वॉर्ड होवे (Julia Ward Howe) हिने या आधुनिक मातृदिनाच्या काही दशके आधी वेगळ्या कारणासाठी ‘मातृशांती दिन’ साजरा करण्याचा प्रचार केला. अमेरिका आणि युरोप मध्ये युद्ध सुरु असतांना हजारों सैनिक मारले गेले, अनेक प्रकाराने नागरिक पोळले गेले आणि आर्थिक हानी झाली ती वेगळीच. या पार्श्वभूमीवर एखादा दिवस युद्धविरोधी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मातृदिन साजरा करण्याची कल्पना जगभरात पसरली पाहिजे असे ज्युलियाला वाटत होते. तिची कल्पना होती की महिलांना वर्षातून एकदा चर्च किंवा सोशल हॉलमध्ये एकत्र येण्यासाठी, प्रवचने ऐकण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी, ईश्वरभक्तीची गीते सादर करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करावे व त्यांच्यासाठी असा एखादा दिवस नेमून द्यावा. या कृतीमुळे शांतता वाढेल आणि युद्धाचे संकट टळेल असे तिला वाटत होते.

मात्र ‘एकसंध शांतता-केंद्रित मदर्स डे’ साजरा करण्याचे हे सुरुवातीचे प्रयत्न मागे पडले, कारण तोंवर व्यक्तिगतरित्या मातृदिन साजरा करण्याची दुसरी संकल्पना रुजली. याला कारण होते व्यापारीकरण! नॅशनल रिटेल फेडरेशनच्या २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार, आजकाल मदर्स डे हा अमेरिकेत $२५ अब्ज इतका महागडा सुट्टीचा दिवस बनला आहे. तिथे लोक या दिवशी आईवर सर्वात जास्त खर्च करतात. ख्रिसमस आणि हनुक्का सीझन (ज्यू लोकांचा ‘सिझन ऑफ जॉय’) वगळता मदर्स डेसाठी सर्वात जास्त फुले खरेदी करण्यात येतात. या व्यतिरिक्त गिफ्ट कार्ड, भेटवस्तू, दागिने यांवर $५ अब्ज पेक्षाही अधिक खर्च केल्या जातो. या शिवाय विविध स्कीमच्या अंतर्गत स्पेशल आउटिंग सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे.

अॅना रीव्ह्ज जार्विसला याच कारणास्तव तिच्या मातृप्रेमावर आधारित कल्पनेबद्दल खेद वाटत होता. तिच्या हयातीत, ती फ्लोरिस्ट्स (फुले विकणारी इंडस्ट्री) यांच्या आक्रमक व्यापारीकरणाविरुद्ध एकाकी लढली. मात्र दुर्दैवाने त्यासाठी तिलाच तुरुंगवास घडला. या निमित्ताने मातेप्रती असलेल्या भावभावनांचा राजनैतिक गैरवापर करणे, धर्मादाय संस्थांच्या नांवाखाली निधी गोळा करणे, हे प्रकार सुद्धा तिच्या डोळ्यादेखत घडत होते. जार्विसने १९२० साली एक अत्यंत महत्वपूर्ण विचार मांडला. ती म्हणाली, ‘हा विशेष दिवस आता बोजड आणि फालतू झालाय. आईला महागडे गिफ्ट देणे, हा मदर्स डे साजरा करण्याचा योग्य मार्ग नाही.’  १९४८ साली, वयाच्या ८४ व्या वर्षी, जार्विस एका सॅनेटोरियम मध्ये एकाकी रित्या मरण पावली. तोवर तिने आपला सर्व पैसा मदर्स डे च्या सुट्टीच्या व्यापारीकरणाविरुद्ध लढण्यासाठी वापरून खर्च केला होता. मातृदिनानिमित्त मी या धाडसी आणि प्रगत विचारांनी समृद्ध अशा वीरांगना स्त्रीला नमन करते. तिचे छायाचित्र लेखाच्या सोबत जोडले आहे.

मैत्रांनो, मी ही माहिती वाचली तेव्हां माझ्या मनांत विचार आला की, खरंच या दिवशी आईची ही अपेक्षा असते कां? खरे पाहिले तर निरपेक्ष प्रेम करणे हाच स्थायी मातृभाव असतांना ते व्यक्त करण्यासाठी या तद्दन व्यापारी मनोवृत्तीला खत पाणी घालणे योग्य आहे कां? बहुतेक मातांना वाटत असते की, या दिवशी त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी फक्त वेळ काढावा, त्यांच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलावे, आईबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणींना उजाळा द्यावा, गप्पा गोष्टी कराव्या अन सोबत असावे, बस! यात काडीचाही खर्च नाही.  माझ्या मते हेच सर्वात बहुमूल्य गिफ्ट असावे मदर्स डे चे अर्थात मातृदिनाचे !  

धन्यवाद !   

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झुळूक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ झुळूक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे,घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे’माझ्या बाल्कनीतल्या झोक्यावर संध्याकाळी बसलं की मन असे स्वैर पणे फिरत असते! सध्या बाहेर फिरणे कमी झाले आहे,पण या बाल्कनीतल्या झोक्यावर बसून मन मात्र भरपूर फिरून येते! दिवसभराच्या उन्हाच्या काहिलीनंतर येणारी संध्याकाळची वार्याची झुळुक तन आणि मन दोन्ही शांतवून टाकते!थंडी किंवा पावसाळ्यात या झुळुकेचे तितके महत्त्व नाही,

पण उन्हाळ्यात ही झुळुक खूपच छान वाटते. दु:खानंतर येणारं सुख जसं जास्त आनंद देते तसेच आहे हे!सतत सुखाच्या झुल्यावर झुलणार्याला ती झुळूक कशी आहे हे फारसे जाणवणार नाही, पण खूप काही कष्ट सोसल्या नंतर येणारे सुखाचे क्षण मात्र मनाला आनंद देतात आणि गार वार्याच्या झुळुकीचा आनंद देतात!

हीच झुळुक कधी मायेची असते. एखाद्याला घरात जे प्रेम मिळत नाही, पण दुसऱ्या कुणाकडून तरी,अगदी जवळच्या नात्यातून, शेजारातून किंवा मित्र मैत्रिणींकडून मिळते.

तो प्रेमाचा सुखद ओलावा त्याच्या मनाला मिळालेली आनंदाची झुळुक असते.

कधीं कधीं साध्या साध्या गोष्टीतून ही आपण आनंद घेतो.

गर्दीने भरलेल्या बसमध्ये कशीबशी जागा मिळून बस जेव्हा सुटते तेव्हा खिडकीतून येणारी वार्याची झुळुक आपल्याला ‘हुश्श् ‘ करायला लावते! कधीं अशी झुळुक एखाद्या बातमी तून मिळते! अपेक्षा नसताना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती सुखद झुळूक च असते. माणसाचे आयुष्य सतत बदलते असते. कधी एका पाठोपाठ एक इतकी संकटे येतात की या सर्वाला कसे तोंड द्यावे कळत नाही, पण अशावेळी अचानक पणे एखादी चांगली गोष्ट घडते की त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते.

माझ्या परिचित एका मैत्रिणीची गोष्ट. तिच्या नवर्या चा अॅक्सिडेंट झाला. जीव बचावला, पण हाॅस्पिटलमध्ये दोन महिने पडून रहावे लागले. दोन लहान मुलं होती तिला, नवर्याचा व्यवसाय बंद पडलेला,रहायला घर होते, पण बाकी उत्पन्नाचे साधन नव्हते. पण अचानकपणे तिने अर्ज केलेल्या नोकरी चा काॅल आला,ट्रेनिंगसाठी एक महिना जावं लागणार होतं,मुलांना कुणाजवळ तरी सोपवून ती ट्रेनिंग पूर्ण करून आली. नोकरी कायम स्वरुपी झाली. आणि आयुष्यात सुखाची झुळूक आली.

वादळवार्यात झाडं, घरं, माणसं सारीच कोलमडतात. वादळ अंगावर घेण्याची कुवत प्रत्येकात

असतेच असे नाही, पण झुळुक ही सौम्य असते. ती मनाला शांति देते.

लहानपणी अशी झुळुक परीक्षेनंतर मिळायची. भरपूर जागरणे, कष्ट करून अभ्यास करायचा,आणि मग पेपर्स चांगले गेले की मिळणारा आनंद असाच झुळुकीसारखा वाटायचा. रिझल्ट ऐकला की मन अगदी हलकंफुलकं पीस व्हायचं आणि वार्यावर तरंगायला लागायचं! अशावेळी कृतकृत्यतेची झुळुक अनुभवायला मिळायची!

वेगवेगळ्या काळात,वेगवेगळ्या रूपात ही ‘झुळुक’ आपल्या ला साथ देते. कधी कधी

आपण संकटाच्या कल्पनेनेही टेंशन घेतो. प्रत्यक्ष संकट रहातं दूर, पण आपलं मन मात्र जड झालेले असते. अचानक कुणीतरी सहाय्य करतं,संकट जाते आणि एका आगळ्या झुळुकेचा अनुभव मनाला येतो.

मध्यंतरी कोरोनाच्या काळात आपण कठीण काळातून जात होतो. मन साशंक झाले होते., अस्थिर होते.

जीविताची काळजी तर होतीच, पण भविष्याची होती. अचानकपणे आलेल्या कोरोनाच्या संकटाला तोंड देताना लोक अगदी हवालदिल झाले होते. प्रकृती आणि नियती दोन्ही आपल्या हातात नाहीत! रोजच्या बातम्या आपल्या ला आशा – निराशेवर झुलवत होत्या. लवकरच हे ‘कोरोना’ चे संकट दूर होईल असं ऐकलं की समाधानाची झुळुक येत होती तर पुढील दहा दिवस धोकादायक आहेत ऐकलं की मनात ्वादळ उठतं होतं!आता हे रोगाचं उच्चाटन हळूहळू होत जाईल ही आशा आपल्या मनी होती. निसर्गाने हिरावून घेतलेलं आपलं स्वातंत्र्य परत मिळवून आपण जर जाणीवपूर्वक वापरले तरंच आपल्याला ही सुखाची झुळूक मिळणार! याची जाणीव माणसाला होत होती.

संध्याकाळी येणारी वाऱ्याची झुळूक ही अशीच सौम्य,आनंद देणारी आहे. तिच्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि त्यांचे थैमान नसते. ती हळूहळू अंगात भिनते. तिचा आस्वाद घेता आला पाहिजे.

कोरोनाचे वादळ घोंघावत होतं ते हळूहळू शांत होत गेले. लोकांनी संयमाने आणि धीराने तोंड दिले.

अशावेळी कुठून तरी आशादायी स्वर येतात, ‘दिस येतील, दिस जातील. . . गाण्याचे! हे संकटाचे वादळ जाऊन झुळुक येईल आशेची, आनंदाची!

वादळ जेव्हा परमोच्च क्षमतेवर असतं तेव्हा कधी तरी ते लयाला जाणारच असते!

ते वादळ जाऊन शांत झुळूक येईल या आशेवर प्रत्येक भारतीय आलेल्या वादळाला धीराने,संयमाने तोंड देऊन त्या शीतल झुळुकीचे सर्वांत करण्यास तयार होता! सुदैवाने त्या कोरोनाच्या वादळाला आपण धैर्याने तोंड दिले आणि ती जीवनातील शीतल झुळूक अनुभवता आली हे आपले भाग्यच!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी फजिती !… लेखक – श्री सुहास  टिल्लू ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ माझी फजिती !… लेखक – श्री सुहास  टिल्लू ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

माझी फजिती !

सन 1969 मधे 1 मे रोजी अस्मादिक विवाहबद्ध झाले. जागतिक कामगार दिनाचा मुहूर्त साधून, जन्मभरासाठी स्वतःला वेठीला धरून ठेवले.मी एक वेठबिगार झालो. एक आझाद पँछी पिंजडेमें बंद हो गया !

आमचे लग्न म्हणजे, पूरब पश्चिम असा प्रकार होते, कारण मी राजस्थानात कोट्याला नोकरी करत होतो. तर ही छत्तीसगड मधील रायपूरची !

‘नेमेची येतो मग पावसाळा ‘… प्रमाणेच नेमेची येणारा चातुर्मास फार लवकर आला. हिला माहेरी घेऊन जाण्यासाठी सासू- सासरे आले होते.

‘अभी अभी तो आयीं हो

अभी अभी जाना है ।’

असे सगळे होते.

मग विरह म्हणजे काय असतो, ते कळले. कारण बाईसाहेब गणपतीपर्यंत नसणार होत्या.  घरच्या गणपती करता म्हणून ही मुंबईला येणार होती. व मीसुद्धा मुंबईला जाणार होतो. तोपर्यंत हा विरह सहन करावा लागणार होता…. ज्यावर्षी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, त्याचवर्षी एक व्याकूळ चकोर, चंद्रमेच्या अमृतकणांकरता प्यासा झाला होता !

थोडेसे विषयांतर ! विरहव्यथेचे व लेखणीचे काय साटेलोटे आहे, देवजाणे ! लेखणी हाती घेतली की ती लगेच झरझरा कागदांवर शब्दांचा पाऊस पाडते.

त्या काळात पत्र लिहिणे हा संपर्कात रहाण्याचा एकमेव पर्याय होता. विरहव्यथा इतकी जबरदस्त होती की, बायकोला पत्र लिहायला सुरुवात केली की दहाबारा पाने कधी लिहून संपत ते कळत नसे. एका मोठ्या लिफाफ्यात ते पत्र घालावे लागत असे व वजन जास्त झाल्याने जास्तीची टपाल तिकीटे लावावी लागत. ते पत्र रायपूरला जेव्हा डिलिव्हर होई, तेव्हा ते उघडून पुन्हा बंद केले आहे हे लक्षात येत असे. त्याबाबत फिर्याद केली तेव्हा पोस्ट ऑफिसकडून एक विलक्षण कारण सांगण्यात आले…’ राजस्थानातून अफूची तस्करी करण्यासाठी असे जाडजूड लिफाफे वापरले जातात म्हणून आम्ही ते उघडून पहातो.’   त्या भागात मराठी माणसांची संख्या बरीच जास्त आहे. कुणी मराठी कर्मचारी जर आतला मजकूरही वाचत असेल तर त्याला चंद्रकांत काकोडकरांचे लिखाण वाचण्याचा आनंद मिळाला असेल.

माझे एक चुलत सासरे पोस्टातच नोकरीला होते. त्यांनी ह्याला पुष्टी दिली होती. हे काका मुंबईतच रहात होते. व लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचा योग आला नसल्याने, त्यांनी अगदी आग्रहपूर्वक जावयाला व पुतणीला भोजनाचे निमंत्रण दिले होते. चुलत सासूबाई आमच्या चौल अलिबागकडल्या होत्या. त्यामुळे त्यांना जावयाचे जरा जास्त कौतुक होते. त्यांनी जेवणाचा बेत खास ‘अष्टाघरी ‘ केला होता…. जावयास जेवणात ब-याच खोड्या आहेत हे माहीत नसणे स्वाभाविक होते.

भरपूर ओला नारळ वापरून सगळे पदार्थ केले होते. पानगी, खांडवी, व डाळिब्यांची उसळ असा मेनू होता. ह्या डाळिंब्यांना बिरडे असेही म्हणतात. मी आजवरच्या आयुष्यात डाळिंब्या किंवा वाल पानावर घेतले नव्हते. चाखून पहाण्याचा तर प्रश्नच नव्हता ! तर सासूबाईंना शंभर टक्के खात्री होती की, जावयाला त्या डाळिंब्या नक्कीच आवडत असणार !!  खरेतर डाळिंब्या खूपच चविष्ट झाल्या होत्या. किंचित गोडसर, गुळचट व भरपूर ओला नारळ घातला होता. भिडस्तपणामुळे आज मला त्या खाणे भाग होते. ‘ पानावर वाढलेले सगळे संपवलेच पाहिजेत ‘ ही घरची शिस्त असल्याने, मी पहिल्या घासातच वाढलेल्या डाळिंब्या खाऊन टाकल्या व इतर आवडीच्या पदार्थांचा समाचार घेऊ लागलो. आणि तिथेच ब्रह्म घोटाळा झाला होता….. 

…. सासूबाई माझ्या पानावर लक्ष ठेवून होत्या. त्या डाळिंब्यांचा वाडगा घेऊन पुढे सरसावल्या व ” मला खात्री होती की डाळिंब्या तुम्हाला खूप आवडत  असतील,” असे म्हणत त्यांनी संपूर्ण वाडगा माझ्या पानात रिकामा केला. … ‘ पानात काहीही टाकायचे नाही. शेवटी पान चाटून स्वच्छ करायचे ‘ अशा शिस्तीचे पालन करणे आवश्यक होते. काय करणार ! आलिया भोगासी सादर होण्यावाचून गत्यंतरच नव्हते.! आयुष्यात मी डाळिंब्या खायला सुरवात अशा जम्बो क्वांटिटीने केली होती.

मंडळी, नंतरच्या आयुष्यात मात्र जे पदार्थ ह्या ‘ आझाद पंछीने ‘ चाखलेही नव्हते ते, पिंजडेके पंछीला न कटकट करता खाण्याची सवय लावली गेली, हे वेगळे सांगायला नकोच !

ह्या आझाद पंछीला जिने  पिंज-यात बंद केले, ती काय म्हणते पहा !

(तिचे शिक्षण हिंदीत झाल्याने तिची भाषा अशी झाली आहे)…. 

“ शादीके लिये श्रमिक दिन फायनल केला

मैने एक लडका हेरून ठेवला

उडता पंछी पिंजडेमे बंद केला

आयुष्यभरच्या आरामाचा मुहूर्त साधला “ …. 

– इति मंगल टिल्लू

लेखक : श्री सुहास टिल्लू

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रवास… साैजन्य : सुश्री जयंती यशवंत देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रवास… साैजन्य : सुश्री जयंती यशवंत देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

बस सुटणार, एवढ्यात एक तरूण घाईघाईने बसमध्ये शिरला. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती.   हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपवताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले. त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृध्दाला अडचण होतेय का,याचा जराही विचार न करता, स्वतःच्या बाजूला आणि त्या वृध्दाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या. तो वृध्द अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला. इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पहात होते.

साधारण तासाभराच्या प्रवासानंतर तो तरुण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला. तो वृध्द आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेह-यावर दिसत नव्हता.

न राहवून मी त्या वृध्दाशेजारी जाऊन बसले आणि म्हणाले, ” आजोबा, तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले. . ?”

चालत्या बसमधून खिडकीबाहेर पहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेह-यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले,

” आपला प्रवास किती घडीचा असतो?

निर्धारित थांबा आला, की तो किंवा मी उतरून जाणारच होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला. ? जमेल तेवढा सहप्रवास सुखाने, सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. !”

आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न् शब्द मनात साठवत राहिले. . .

” बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतेच दो घडीचे. !

जन्माच्या वेळी वाटल्या जाणा-या मिठाईपासून या प्रवासाची सुरूवात होते आणि श्राध्दाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस,हाच जीवनाचा गोडवा. . !

त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण. . !

बाळ,या दोन्ही वेळी आपण स्वतः त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे  कडू-गोड क्षण. . त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे. !

अनेक माणसं भेटतात या प्रवासात. . त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात. . त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत, नातलग आले. . काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात. कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात. . त्यासाठी कारणच हवं, असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी. . त्यांचा पिंड निराळाच असतो. आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी कधी साथ देत नाहीत. . !

जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं. . ते जेवढं वाट्याला येईल, तेवढं आनंदानं जगून घ्यावं; म्हणजे कोणी सामानाचे असो, की विचारांचे. . ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही. या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते. “

रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत,तर कधी खिडकीतून मागे पळणा-या झाडांकडे. . खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते.

थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्यातरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे, म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.

त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,

” बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा. . पुढे वय वाढत गेलं, की सुखाच्या बाबतीतही तेच होतं. . वास्तविक दोन्ही तिथंच असतात. फक्त आपण धावत असतो. !

धावण्याची शर्यत जणू. त्यात कधी कधी धरून ठेवावे, असे हात निसटून जातात. लक्षात येतं, तेव्हा उशीर झालेला  असतो. . पण एक मात्र खरं. व पु एके ठिकाणी लिहितात,

 ” जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून      चालत नाही. ती दोघांनाही असावी लागते. कारण  ‘भाळणं ‘ संपल्यावर उरतं ते ‘सांभाळणं. . ‘ हे सांभाळणं ज्याला जमलं, त्यालाच ‘जीवन जगणं’ कळलं. . !”

असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं, काय माहीत. .

बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले. . सावरले. दाटल्या स्वरांत म्हणाले, “पोरी, अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत गं. . !”

मीही उत्तरादाखल पुटपुटले, ” आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, असे पाय देखील दुर्लभ झालेत हो. . !”

 दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणा-या. .

आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुनः पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो.

” दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. . . “

साैजन्य  :सुश्री  जयंती यशवंत देशमुख

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ – “स्त्रीचा पदर…”– अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ 🌹 “स्त्रीचा पदर…” – अज्ञात 🌹 ☆ प्र्स्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर  ☆

पदर काय जादुई शब्द आहे !! हो मराठीतला !!

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द.

पण केवढं विश्व सामावलेलं आहे त्यात….!!

किती अर्थ, किती महत्त्व…

काय आहे हा पदर……!?

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा भाग..!

तो स्त्रीच्या ” लज्जेचं रक्षण” तर करतोच. सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं..!

पण,आणखी ही बरीच “कर्तव्यं” पार पाडत असतो..!

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल ते सांगताच येत नाही..!?

सौंदर्य खुलवण्यासाठी “सुंदरसा” पदर असलेली ” साडी” निवडते..! सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते.

सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. …..!!

लहान मूल आणि

“आईचा पदर “

हे अजब नातं आहे.!

मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन ” अमृत प्राशन” करण्याचा हक्क बजावतं……!!

जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा ” पदर ” पुढे करते..!

मूल अजून मोठं झालं., शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चालताना आईच्या ” पदराचाच आधार ” लागतो..!

एवढंच काय…! जेवण झाल्यावर हात धुतला, की टाॅवेल ऐवजी “आईचा पदरच” शोधतं आणी आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात मुलानं पदराला नाक जरी पुसलं तरी ती रागावत नाही..!

त्याला बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला ” आईचा पदरच ” सापडतो…..!!

महाराष्ट्रात तो ” डाव्या खांद्या वरून ” मागे सोडला जातो…..!!

तर गुजराथ, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो..!

कांही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात..!

तर काही जणी आपला लटका राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं ” पदरच ” झटकतात..!

सौभाग्यवतीची “ओटी “भरायची ती पदरातच अन्‌ “संक्रांतीचं वाण “लुटायचं ते ” पदर ” लावूनच..!

बाहेर जाताना ” उन्हाची दाहकता ” थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर ओढला जातो.!

तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच ” छान ऊब ” मिळते….!!

काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच ” गाठ ” बांधली जाते..

अन्‌ नव्या नवरीच्या

“जन्माची गाठ ” ही नवरीच्या पदरालाच.

नवरदेवाच्या उपरण्यासोबतच बांधली जाते…..!!

पदर हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना…!?

नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते..!

पण संसाराचा राडा दिसला..! की पदर कमरेला खोचून कामाला लागते..!

देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना …..?

माझ्या चुका ” पदरात ” घे..!

मुलगी मोठी झाली, की “आई ” तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन्‌ काय म्हणते अगं.! चालताना तू पडलीस तरी चालेल..! पण, ” पदर ” पडू देऊ नकोस !

अशी आपली भारतीय संस्कृती…!

अहो अशा सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा ” विनयभंग ” तर दूरच ती रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे वर नजर करून साधे पाहणार ही नाहीत..!

ऊलटे तिला वाट देण्यासाठी बाजुला सरकतील एवढी ताकत असते त्या पदरात..

ही आहे आपली भारतीय संस्कृती…

संग्राहिका – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पांढरा प्रकाश/white light… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ पांढरा प्रकाश/white light… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

विश्वातील असा स्रोत आहे ज्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. सहाय्य, उपचार आणि नकारात्मक ऊर्जा किंवा अस्पष्ट कंपनांपासून संरक्षणासाठी पांढर्‍या प्रकाशाला कोणीही (बरे करणारे, सहानुभूती देणारे कोणीही!) आवाहन करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे पांढर्‍या प्रकाशाचा वापर कोणालाही किंवा कशालाही इजा करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. तसेच त्याने कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ शकत नाही.

 व्हाईट लाइट बोलावणे पांढऱ्या प्रकाशासाठी ओरडणे किंवा गुडघे टेकून प्रार्थना करण्याची विनंती करण्यासारखे नाही. आपण धार्मिक असणे आवश्यक नाही, फक्त तो प्राप्त करण्यासाठी खुले असावे. प्रकाश सर्वांसाठी उपलब्ध आहे… जर तुम्ही त्याच्या उपचार आणि कंपनांना स्वीकारत असाल तर तो अधिक सहज उपलब्ध आहे.

शुद्धीकरण आणि परिवर्तनासाठी नकारात्मक किंवा  गलिच्छ  ऊर्जा पांढर्‍या प्रकाशाकडे पाठविली जाऊ शकते किंवा निर्देशित केली जाऊ शकते. उदाहरणार्थ तुम्ही विनंती करू शकता की तुम्ही तुमच्या मधून बाहेर काढलेल्या अशुद्धता शुद्धीकरणासाठी पांढर्‍या प्रकाशाकडे पाठवत आहे.

पांढर्‍या प्रकाशाच्या परिवर्तनाची संकल्पना अगदी सोपी आहे.जसे तुमचे सर्व घाणेरडे कपडे पॅक करण्याचा आणि ड्राय क्लीनला टाकण्याचा विचार करा. तुमचे कपडे जसे एका बॅग मध्ये भरून लॉंड्रीत देता आणि  काही दिवसांनी  ते स्वच्छ  होऊन परत येतात तसेच हे आहे.

पांढर्‍या प्रकाशाच्या क्षेत्रात जे काही प्रवेश करते किंवा ज्यावर पांढरा प्रकाश पडतो ते स्वच्छ आणि शुद्ध होऊन बाहेर येते.

पांढरा प्रकाश देवदूत,चांगल्या शक्ती घेऊन येतात.

विश्वास ठेवा की जेव्हा तुम्हाला पांढर्‍या प्रकाशाच्या संरक्षणाची इच्छा असेल तेव्हा तो तुम्हाला मिळेल. जसे की रिक्षा ला कॉल करणे. तुम्हाला फक्त दरवाजा उघडण्याची आणि प्रकाशाचे स्वागत करण्याची आवश्यकता आहे.

आपल्याला जीवनात मिळालेले धडे,वाईट अनुभव,नकळत केलेली चुकीची कर्म इत्यादी सर्व गोंधळातून बाहेर पडण्याचे ठिकाण आहे.तसेच अत्यंत विश्रांतीची जागा आहे.

पांढर्‍या प्रकाशाचे व्हिज्युअलायझेशन व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. काहींना पांढर्‍या रंगात लहान धूमकेतूसारखे चमकणारे चमक दिसू शकतात, तर इतरांना चमकणारे मोठे पांढरे गोळे दिसू शकतात.काहींना पांढरे सोनेरी किरण दिसतात.काहींना प्रकाशाचा शॉवर दिसतो.काहींना उजेड दिसत नाही पण जाणवतो.काहीतरी आपल्या कडे येत आहे असे वाटते.अशा कोणत्याही स्वरूपात ही अनुभूती येते.

दिवसातून 10 मिनिटांनी सुरुवात करा, हळूहळू कालावधी 30 मिनिटांपर्यंत वाढवा.

श्वेत प्रकाश/white light ध्यान काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. त्यापैकी काही येथे आहेत:

🪷 तुमची प्रेरणा सुधारते आणि वाढवते .

🪷 दृढनिश्चय आणि सहनशक्ती सामर्थ्य देते.

🪷 तुम्हाला तुमच्या ध्येयांवर अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.

🪷 तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करते .

🪷 आत्मविश्वास सुधारतो.

🪷 यशाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करते.

🪷 स्पष्ट विचार प्रक्रिया करण्यास मदत करते.

🪷 अडकलेला गाभा स्वच्छ आणि साफ करतो आणि अशा प्रकारे तुम्हाला आजारापासून दूर ठेवतो.

पांढऱ्या प्रकाशाच्या ध्यानाचा सराव करण्यासाठी तुम्हाला दिवसातून फक्त 10 मिनिटे लागतात. जेव्हा तुम्ही मनाच्या निवांत अवस्थेत याचा सराव करता तेव्हा परिणाम चांगले मिळतात, तुम्ही जागे होताच हे करणे सुरू करण्याचा सल्ला दिला जातो.

सर्वोत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही काही गोष्टी तुमच्या मनात ठेवल्याचे सुनिश्चित करा.

🪷 धीर धरा.

🪷 प्रामाणिक रहा.

🪷 परिणामांची अपेक्षा ठेवून कधीही ध्यान करू नका.

🪷 नकारात्मक विचार नेहमी तुमच्या फोकसपासून दूर ठेवा.

🪷 नेहमी सकारात्मक उर्जेने वावरत रहा.

🪷 पूर्णपणे दयाळूपणे ध्यान करा.

श्वेत प्रकाश ध्यान हे शुद्धीकरण आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हे तुमचे शरीर आणि मन पुन्हा टवटवीत करण्यास मदत करते. आणि राग, चिंता आणि तणाव यासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते . यात प्रत्येक अवयवांना व मन त्यातील विचारांना स्थिर,शुद्ध करणे हे होत असते. त्यामुळे आपल्यातील प्रेरणा आणि सहनशक्ती वाढते, चांगले विचार करण्याचे प्रमाण वाढते, उद्दिष्टांकडे लक्ष  केंद्रित करणे जमू लागते, दृष्टीकोन बदलतो, आत्मविश्वास वाढतो,आपण स्पष्ट आणि तर्कशुद्ध विचार करू लागतो. आणि शरीर शुद्ध होते. हे या ध्यान तंत्राचे काही प्रमुख फायदे आहेत. हे ध्यान दिवसातून किमान 10 मिनिटे आरामशीर मनःस्थितीसह स्वतःमध्ये हळूहळू परिवर्तन करण्यासाठी करा.

पांढरा प्रकाश ध्यान तुमची नैसर्गिक उपचार क्षमता वाढवते असे मानले जाते.

हे तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करते आणि तुमचा आत्मविश्वास आणि प्रेरणा सुधारते.

हे मन स्वच्छ करते आणि तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी दयाळू, प्रामाणिक आणि संयमाने ध्यान करा.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.) इथून पुढे — 

त्याच्या पुतणीचं अ‍ॅडमिशन इथं पुण्यातच झालं होतं इंजिनियरींगचं. कॉलेजच्या होस्टेलवर राहणं जवळपास निश्चितच झालेलं असताना यानं तिचा बाडबिस्तरा घरात आणून ठेवला. आणि तिच्यासोबत तो ही इंजिनियर झाला…तिस-यांदा..एकदा तो स्वत:,नंतर चिरंजीव आणि आता ही! कारण तिच्या सर्व अभ्यासात हा पूर्णपणे सहभागी झाला होता. गणित विषय पक्का असल्याने आणि शिकवण्याची प्रचंड हौस आणि आवाका असल्याने नोकरीच्या कामांतून हा नेमका वेळ काढायचाच. थोडक्यात एक मुलगी नसल्याचे शल्य याने भाची,पुतणी आणि सून यांच्यामार्फत सुसह्य करून घेतले होते.

आपला वाढदिवस या ही वेळेस नेहमीसारखा साजरा होणार एवढंच त्याला वाटलं. सोन्याची चेन करून घेतली बळेबळेच. कशाला? हा त्याचा सततचा प्रश्न मी न सोडवताच पुढच्या प्रश्नाला सुरुवात करायचे….असू दे रे….हे उत्तर तर जणू कॉपी पेस्ट करून ठेवले होते मनात. सोनं म्हणजे गुंतवणूक असं सांगितलं त्याला.  त्याला शोभेल असा पोशाखही तयार करून घेतला. मुलगा परदेशी…सूनबाईही त्याच्यासोबत…मग कशाला करायचा एवढा थाटमाट? हा त्याचा प्रश्न योग्यच होता. पण मी तो ऑप्शनला टाकला.

मुळात तो एकसष्ट वर्षांचा दिसत नाही…..तो मूळातच उत्तम चालीचा असल्याने वजन नेहमीच आटोक्यात. पण सरकारी खात्याच्या चाकोरीबद्ध कामाच्या पलीकडे जाऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे समाजात वजन भरपूर. पण हे वजन कुणावरही टाकण्याची त्याच्यावर वेळ येत नाही आणि त्याची इच्छाही नसते. त्यामुळे त्याची एकसष्टी होते आहे, हे अनेकांना आश्चर्याचे होते. शिवाय तो हा सोपस्कार करून घ्यायला तयार झालाच कसा? हाही प्रश्न अनेकांना पडला. मग त्यांना सांगावे लागले..यातलं त्याला काहीही माहित नाही…त्याला थेट कार्यक्रम स्थळी आणणार आहे….मंदिरात जायचंय असं खोटं सांगून!

मी सकाळपासून तयारीत. तर साहेब निवांतपणे त्यांच्या लेखनाच्या,संशोधनाच्या कामांत व्यग्र. दुपारचे जेवणही बेताचेच घेतले. रात्री बाहेरच जेवायचं आहे म्हणून दुपारी कमी जेवावे…हा त्याचा विचार. कार्यक्रमात मला त्याच्याविषयी बोलायचंच होतं…पण काय काय सांगणार? ‘तु योग्य तेच करशील याची मला खात्री आहे’ असं तो लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला सांगत आलाय. त्यामुळे मी तसा प्रयत्नही केला. आणि त्यानेही तो गोड मानून घेतला. तु माझ्या या मोठ्या परिवाराचा एक भाग झाली आहेस… या परिवाराची सर्व सुख-दु:खे,अडचणी आता तुझ्याही आहेत’ असं म्हणून त्याने संसार सुरू केला. आपलं एक स्वत:चं घर असावं असं त्यालाही वाटत होतं. पण पगारात भागवा या तत्वावर निष्ठा असल्याने त्याच्या आणि माझ्या पगारात घर नजरेच्या टप्प्यात लवकर आलेच नाही. पण देवाच्या कृपेने डोईवर छप्पर आलं. आणि मग आम्ही ते निगुतीनं सजवलं. एक मुलगा..तो ही बाप से सवाई. वडील एवढे अधिकारी असूनही त्याने कधीही कुठल्या नियमांचा भंग केला नाही…अगदी कुणी पहात नसताना सुद्धा!

संसार सुरू असताना त्याने माझा नवरा,माझ्या आणि त्याच्याही पालकांचा मुलगा, भावाचा आणि बहिणीचा भाऊ, भाच्यांचा मामा, पुतण्यांचा काका, सहका-यांचा मार्गदर्शक, नवोदितांचा प्रशिक्षक, वाचकांचा लेखक, श्रोत्यांचा व्याख्याता, शाळकरी विद्यार्थ्यांचा शिक्षक अशा अनेक भूमिका त्याने लीलया पार पाड्ल्या.

नोकरीत,त्यातून शासकीय नोकरीत अनेक आव्हाने असतातच…व्यवस्था बदलण्याच्या वेळखाऊ कामात वेळ घालवण्यापेक्षा व्यवस्थेत राहून शास्त्रीय, संशोधनाच्या, जनसंपर्काच्या माध्यामातून शक्य ते करीत राहणे त्याने शिकून घेतले होते. त्याच्या कुण्या साहेबांनी दिलेला Love all, Trust a few but do wrong to none  अर्थात प्रेम सर्वांवर करा,त्यातला काहींच्यावर विश्वास ठेवा मात्र वाईट कुणाचंच करू नका! हा कानमंत्र त्याने प्रत्यक्ष आचरणात आणला. त्यामुळे निवृत्तीनंतर आजही त्याला देशभरात लोक बोलावतात आणि तो ही न कंटाळता जातो. अर्थात आता मी ही सोबत जातेच. त्याच्या व्याख्यानांना मिळणारा प्रतिसाद पाहते, तेंव्हा मलाही छान वाटतं!

कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून मी फोन सायलेंटवर ठेवला होता….चोरून बोलायचं कार्यक्रमाची तयारी करणा-या लोकांशी!  चार वाजताच घराबाहेर पडले…म्हटलं जरा मैत्रिणीच्या घरी जाऊन येते…तिच्या घरी पुजेचा कार्यक्रम आहे. मी साडेपाच वाजता तयार रहा…आपण मंदिरात जाऊ आणि मग नंतर जेवायला. मी आलेच..असं म्हणून मी सटकले आणि थेट कार्यालयात गेले. तयारी अंतिम टप्प्यात होती. बोलावलेले सर्वच आलेले होते…तयारीत. घटिका जवळ आली….कार्यालयात शांतता ठेवली होतीच. दिवेही मंद केले होते. फुलांची पायघडी तयार होती. रेडी? मी सर्वांना म्हटले…आणि रिक्षा करून घरी गेले. त्याला नवा ड्रेस, सोन्याची चेन घालायला लावली. ती चेन त्याने लगबगीने शर्टच्या आत घालायचा प्रयत्न सुरू केला. मी म्हटलं ‘असू दे थोडा वेळ! छान दिसतीये! रिक्षा कार्यालयाच्या आत जाऊ लागली तेंव्हा तो चमकला. अगं इथं कुठलं हॉटेल? हे तर कार्यालय दिसतंय! मी त्याला हाताला धरून हॉल मध्ये नेलं. सनईच्या सुरांनी त्याचं स्वागत झालं. त्याच्या गळ्यातली चेन चमकत होती. एवढ्या लोकांना पाहून त्याने ती चेन लगेच शर्टमध्ये लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दिवे प्रखर लागले आणि त्याची अत्यंत प्रेमची माणसं उठून उभी राहिली…टाळ्यांचा गजर झाला. त्याला कुणाकुणाला भेटावं,काय बोलावं हे सुचेना. बालपणीचे मित्र, शाळा-कॉलेजातले मित्र,खात्यातली जुनी जाणती माणसं…..सर्व अगदी जवळचे नातलग…! फुलपाखराला मधाने शिगोशीग भरलेल्या फुलांच्या मोठ्या बगिच्यात सोडून द्यावं तसं झालं… एखाद्या लहान मुलासारखा भांबावून गेला बिचारा.

त्याला हाताला धरून मी मंचावर घेऊन जाऊ लागले…फुलांच्या पायघड्यांवर पाऊल टाकले तर ती कुस्करून जातील म्हणून तो आधी तयारच होईना…पण मग पायांतल्या चपला काढून अलगद चालत गेला…त्यानं त्याच्या सहवासातल्यांना आतापर्यंत या फुलांसारखंच जपलंय.

मग एकसष्ट दिव्यांनी ओवाळणं,केक कापणं,त्याला गोडाची आवड..त्यातल्या त्यात सातारी कंदी पेढ्यांचं जास्त कौतुक म्हणून मित्रांनी आणलेला पेढे-हार….सर्व सर्व मनासारखं झालं..!

मग मी बोलायला उभी राहिले तर मनात असलेलं सर्वच उंचबळून आलं….जमेल तेव्हढं सांगून टाकलं….आणि इतक्या वर्षांत पहिल्यांदाच त्याला सर्वांदेखत,सार्वजनिकरित्या आय लव यू! म्हटलं! त्याच्या चेहरा त्या कंदी पेढ्यांपेक्षाही गोड दिसत होता यावेळी !

– समाप्त –

— एका पत्नीचे मनोगत

(नुकताच हा सोहळा पाहिला आणि प्रत्यक्ष अनुभवला. एका सुशील माणसाच्या पत्नीच्या भूमिकेत जाऊन लिहिलेला हा लेख. व्यक्तींची नावे,पदे आणि इतर तपशील महत्त्वाचा नाही म्हणून तो लिहिला नाही. कारण प्रेम एकाच वेळेस वैय्यक्तिकही असते आणि वैश्विकही. आपल्या आसपास अशी माणसं असणं हे आपलं आणि समाजाचं सुदैवच की ! एक नातं असं रूपाला येऊ शकतं, बहरू शकतं हे केवळ गोड… )

शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य – भाग – ३… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

सौ. यशश्री वि. तावसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – ३ … ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

(त्यामुळे काम या पुरुषार्थाशी माझा दूरान्वयानेही संबंध आला नाही.  मला सहा महिन्यांचा कालावधी द्या. मी सहा महिन्यांचे आत कधीही येईन.) – इथून पुढे —

भारती-माता, यांचे दुसरे नाव सरस्वती होते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे सरस्वती देवींना भूलोकी जन्म घ्यावा लागला होता.  भगवान शिव जेव्हा भूलोकी जन्म घेतील,  तेव्हा त्यांच्या दर्शनाने या सरस्वती देवी मुक्त होतील,  असा श्री विष्णूंनी भारती देवींच्या वडिलांना दृष्टांत दिला होता.  आचार्य दुसऱ्या दिवशी महिष्मती सोडून निघणार होते.  त्या रात्री मंडन अत्यंत शांत व मूक होते.  त्यांच्या मनात कोणतीच शंका उरली नव्हती. कोणत्याच कामाची आसक्ती उरली नव्हती. त्यांनी मनाने केव्हाच संन्यास स्वीकारला होता.  त्या रात्री भारतीने आपल्या मुलाची करावी तशी आचार्यांची सेवा केली.  ती मनोमन समजली होती की आता आपले जीवन संपले आहे.  आचार्यांना निरोप देण्यासाठी रस्ते सजवले होते. सारे याज्ञिक, वेदज्ञ, प्रतिष्ठित नागरिक, ईश्वर भक्त मंडन मिश्रांच्या निवासाकडे आले होते.

आचार्य पुढे जात असता, अमृतपूरच्या राजाचे निधन झालेले दिसले. पर्वतावरील एका गुहेत आचार्यांनी , मी, देह ठेवणार असल्याचे व त्या राजाच्या शरीरात मी प्रवेश करणार असल्याचे सुखाचार्य, पद्मपादाचार्य व हस्तामलकाचार्य या तीनच शिष्यांना सांगितले.  त्या गुहेत त्यांच्या शरीराचे रक्षण करण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवली.  कोणत्याही संकटाची चाहूल लागली तरी मला म्हणजे राजाला येऊन एक श्लोक सांगितला तो म्हणा.  त्याक्षणी मी माझ्या शरीरात प्रवेश करेन.

तिकडे राजाचे अंत्यदर्शनासाठी राजाला फुलांचे गादीवर ठेवले. इतक्यातच राजाने हालचाल केल्याचा भास झाला.  झोपेतून उठावे तसे राजा उठून बसला अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांनी प्रसंगावधान दाखवून कणकेची प्रतिमा करून तिचे दहन केले.  सर्व राज्यात आनंद झाला. दुसऱ्या दिवशी राजपुरोहिताने योग्य तो अभिषेक केल्यावर, राज्यकारभार सुरू झाला.  वेळच्यावेळी राज्यसभा सुरू व्हायची. पटापट निर्णय दिले जायचे.  राज दरबारात नवचैतन्य निर्माण झाले होते.  राज्यातील प्रजेत अपूर्व आत्मविश्वास निर्माण झाला.  सर्वजण चांगले वागू लागले. मंदिरांचे पुनरुज्जीवन झाले.  हरिभक्ति फुलून जाऊ लागली.

राणी पहिल्याच भेटीत मोहरून गेली.  राजा प्रेमाने वागतो, पण तो अलिप्त असल्याचे तिला जाणवत होते.  राजा पूर्वीप्रमाणे दासींकडे  पहात नसे.  त्यामुळे राणी स्वतः सर्व सेवा करू लागली.  

हळुहळू मंत्रिमंडळाला संशय येऊ लागला की आपला राजा इतका कसा बदलला?  वीस दिवसांनी मंत्रिमंडळाने गुप्त बैठक घेतली. त्यांना जाणवले की कोणीतरी योग्याने राजाच्या शरीरात प्रवेश केला असावा.  मच्छिंद्रनाथांनी जसे आपले शरीर लपवून ठेवले होते,  तसे काही घडले का?  असे त्यांना वाटू लागले.  त्यामुळे गुप्तपणे शोध घेण्याचे व अशा योग्याचे ते शरीर शोधून अग्नी दिला पाहिजे,  म्हणजे हा योगी राजाचे शरीर सोडून कुठेही जाणार नाही व आपला राजा चक्रवर्ती होईल असे त्यांनी ठरवले.

ही बातमी चित्सुखानंदांनी राजवाड्यात येऊन,  ठरल्याप्रमाणे खुणेचा श्लोक म्हणून,  राजाला सांगितली.  आचार्य काय समजायचे ते समजले व परत गुहेत ठेवलेल्या शरीरात प्रवेश करून त्या स्थानापासून दूरवर निघून गेले.

हे शरीर ठेवले होते, ती जागा, नर्मदेकाठी, मंडलेश्वर या गावी, गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे आहे. 

दीड-दोन महिन्यातच ते परत महिष्मतीला आले. चर्चेमध्ये आचार्यांनी भारती देवींचे पूर्ण समाधान केले.  त्या म्हणाल्या,  आपण साक्षात सदाशिव आहात.  आपणास माझा नमस्कार. आपण साक्षात जगद्गुरुच आहात.  मी माझ्या पतीला संन्यास दीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.  आचार्यांनी मंडन मिश्रांना संन्यास दिला.

त्या काळात काश्मीर म्हणजे पंडितांचे आगर होते.  श्रीनगर मध्ये फार पूर्वी सर्वज्ञ पीठ स्थापन झाले होते.  त्या पीठाचे, तीन दिशांचे दरवाजे उघडलेले होते.  पंडितांनी तो मान मिळवला होता.  पण दक्षिणेकडचा दरवाजा बंद होता.  आचार्य दक्षिणेकडून आले होते. तेथील विद्वानांमध्ये चर्चा होऊन,  आचार्यांसाठी दक्षिणेकडील दार उघडले गेले व त्या सर्वज्ञ पिठावर बसण्याचा त्यांना मान मिळाला.  

बौद्ध व जैन पंथीय आचार्यांनी शंकराचार्यांना मनोमन मान्यता दिली.  पण सभा सोडून चालते झाले.  

नंतर त्यांनी द्वारकेमध्ये पहिल्या  धर्मपीठाची स्थापना केली. द्वारकेमध्ये श्रीकृष्णांचे दर्शन घेतले.  तेव्हा अच्युताष्टकाची रचना केली.  नंतर प्रभास व उज्जैनीस भेट दिली. नेपाळला दर्शनासाठी गेले.  वैदिक सनातन धर्माच्या पताका, नेपाळच्या सर्व मंदिरांवर उभारल्या.  आचार्य यांना कैलास पर्वतावर जाऊन शिवदर्शनाची ओढ लागली होती. त्यांनी केलेल्या प्रार्थनेवर प्रसन्न झालेल्या दत्तगुरूंनी, आचार्य यांचा उजवा हात धरला व आपल्या योगसामर्थ्याने एका क्षणात त्यांना भगवान शिवांच्या समीप कैलासावर आणले.  तिथे शतश्लोकी शिवानंद लहरींची रचना झाली.  आचार्यांनी केलेल्या, या भक्तीमय स्तोत्राने प्रसन्न झालेल्या भगवान शिवांनी आचार्यांना पाच स्फटिकलिंगे दिली व सांगितले,  यांच्या पूजनाने तुला अमोघ ज्ञान प्राप्त होईल.

आचार्यांनी जगन्नाथ पुरी येथे मठ स्थापन केला. 

नंतर आचार्य,  महाराष्ट्रातल्या वैकुंठाकडे म्हणजेच पंढरपूरला आले. पांडुरंगाचे दर्शन होताच पांडुरंगाष्टक म्हणून प्रार्थना करू लागले.

आचार्यांनी चौथ्या 

धर्मपीठाची स्थापना शृंगेरी येथे केली. 

शेवटी, कांची येथे 

धर्मपीठाची स्थापना केली. 

अशा प्रकारे चार दिशांना चार धर्मपीठांची स्थापना केली. 

कांचीमध्ये कोण,  कोणत्या धर्मापीठावर राहील,  ते सांगितले.

त्यांनी धारण केलेला दंड,  नर्मदा मातेने पावन केलेला कमंडलू,  त्यांच्या पादुका…. यांच्यावर कोणाचा हक्क राहील,  हे सांगितले.

ते म्हणाले माझा बहिश्चर प्राण, म्हणजे कैलासावर भगवान शिवांकडून प्राप्त झालेल्या त्या सौंदर्य लहरी,

माझ्या शिवानंद लहरींसह,  प्राणरूपाने आपणा सर्वांसाठी ठेवून जात आहे. व आपल्या मधुर वाणीने 

भज गोविंदम् 

भज गोविंदम।।

हे आपल्या गुरूंचा उल्लेख असलेले व गुरुगोविंदयतींना प्रिय असलेले भजन म्हणायला सुरुवात केली. 

सर्व शिष्यांच्या एका सुराने कांची मठाचा आसमंत भरून गेला. एका क्षणी धून थांबली; व सर्वत्र, नीरव शांतता पसरली. कारण आचार्य आसनावर नव्हते.

दंड तेजाळला होता. कमांडलू प्रभावी दिसत होता.

पादुका तेजःपुंज दिसत होत्या. 

आणि सौंदर्य लहरीच्या पोथीतून व त्याखाली असलेल्या शिवानंद लहरींच्या पोथीतून, दिव्य असा,  शीतल प्रकाश बाहेर पसरत होता. 

आचार्यांचे आसन रिकामे होते. 

चित्सुखाचार्य कातर स्वरात म्हणत होते….

चिदानंद रूप, शिवोsहम्  शिवोsहम।।

— समाप्त —

(संदर्भ ग्रंथ…. “जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य “ – लेखक… श्री.अविनाश महादेव नगरकर.)

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares