मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागतिक मातृदिन —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “जागतिक मातृदिन —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

दयादातृत्वाला जिथं सीमा नसते तिथे मातृत्व जन्माला येते….. 

 महिन्याचा दुसरा रविवार जागतिक स्तरावर मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. आईसाठी एक दिवस या संकल्पनेतून अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी १९१४ पासून मातृदिनाची सुरुवात केली.त्यापूर्वी ॲना ही सामाजिक कार्यकर्ती आपल्या आईच्या ऋणाचा उतराई होण्याचा भाग म्हणून मातृदिन साजरा करत होती.पुढे हीच संकल्पना रूजली व जगभर पसरली.

आपल्या देशात ‘आई ‘ या भावनेला भावनिक व सांस्कृतिक असे द्विमितिय महत्व असले तरी प्रत्यक्षात आईपण चौफेर व्यापलेलं आहे.  शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळीवर आईचे महत्व आहेच. निसर्गानं सजीवाला स्व-वंश चालविण्यासाठी व टिकविण्यासाठी मातृत्व ही देणगी दिलेली आहे. इतर सजीवांमध्ये फक्त जीव जन्माला घालणं व प्राथमिक स्वरूपाचं संगोपन करणं इथपर्यंतच मातृत्व मर्यादित आहे. याउलट मानवी समूहात जीवाचा जन्म व जन्माला आलेल्या जीवाचं संगोपन अन् सरतेशेवटपर्यंत संगोपन केलेल्या जीवाची काळजी वाहणं हा मातृत्वाचा तहहयात प्रवास आहे. म्हणून मानवी कुळात आई हे नारीचे शरीर नसून ,ती जन्मदात्रीप्रती आजन्म ऋण भावना आहे. कोणत्याही वयात असताना ,ठेचाळलं वा वेदनेने विव्हळणं आलं की मुखातून फक्त आई नामाचाच जयघोष होतो. कारण ‘ आई गं ‘ चा उच्चार हा वेदनेवरचं सर्वात शेवटचं औषध आहे.

बदलत्या काळात आईच्या पदरात बदल झाला असेल, आईच्या राहणीत बदल झाला असेल, काळजीही थोडी डिजिटल झाली असेल, पण आईचं काळीज आजही तेच परंपरागत मायेचं आहे. माता ही कधीच कुमाता नसते या आचंद्रसूर्य कालीन सुभाषिताला तडा देणा-या माता कधीच उदयाला येणार नाहीत .असं सुभाषितकाराचं स्वप्न होतं, पण अगदीच थोड्याफार मातांनी या सुभाषिताला छेद दिला आहे. अशा कुकर्मी मातांचं प्रमाण सागरातलं पसाभर पाणी  सडलेलं निघावं ,इतकं अल्प आहे.

सिंधुताई सपकाळ, संध्याताई /दत्ता बारगजे, दीपक नागरगोजे ,संतोष गर्जे असे कितीतरी समाजसेवक आहेत ,जे भावनिक मातृत्वाचे धनी आहेत. जन्म दिलेल्या बाळाचे संगोपन करणं हे नैसर्गिक मातृत्व आहे पण बहिष्कृत  व वंचित ,अनाथ बालकांचे मातृत्व निभावणं हे  दैवी भावनेतलं मातृत्व आहे. असं मातृत्व निभावण्याचं धाडस फारच कमी लोकांमध्ये असते. मातृ दिनी अशा नरदेही दैवी मानवांना शतदा वंदन करावे.

मातृत्व म्हणजे निर्मळ व निस्वार्थ माया. दया दातृत्वाचा किनारा नसलेला सागर म्हणजे वात्सल्य सिंधू सागर आई. अपार मायेचे दृश्य स्वरूप म्हणजे आई. लाभाच्या अंशाचा लवलेशही मनी न ठेवता,डोळ्यात वात्सल्य व उरात काळजीच्या लाटा पेलाव्यात ;त्या फक्त आईनेच. आई ही शिल्पकार म्हणून श्रेष्ठ आहेच, पण त्याहीपेक्षा ती उत्कृष्ट व्यवस्थापक व नियंत्रक सुद्धा असते. गर्भारपणात जपलेल्या जीवाशी तिची नाळ कधीच तुटत नाही. आईला आई हेच उपमान आहे. तिच्यासारखी तीच – अन्य नाही कोणी.

माझ्या आयुष्याची जडणघडण होताना आईच्या ममतेने मायाममता ,वात्सल्य ,प्रेम ,सहकार्य देणा-या माझ्या रक्तबंधनातील सर्व आप्तांचा ,आई, चुलती ,आत्या, इतर आप्तगण ,संसार रथाची भागीदार पत्नी,  मुली,समाजसेवी आदर्श कृपाछत्री गण, सुखदुःखातले वाटेकरी मित्र-मैत्रिणी, व्यावसायिक सहकारी, गुरूजन ,विद्यार्थी, सेवाभावी क्लबचा परिवार ,पाहिलेले न पाहिलेले असे  सकल मानवजन या सर्वांप्रती आजच्या या दिवशी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

आपणा सर्वांस जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “’एक्स्पायर’ व्हायच्या अगोदरच् ‘आऊटडेटेड’…” लेखक – श्री सचिन  लांडगे ☆ श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “’एक्स्पायर’ व्हायच्या अगोदरच् ‘आऊटडेटेड’…” लेखक – श्री सचिन  लांडगे ☆ श्री सुनीत मुळे ☆

हळूहळू किती खर्च आपण वाढवून घेतलेत काही कल्पना आहे का? सकाळी उठल्यापासून.. “टूथपेस्ट में नमक” असायला पाहिजे, चारकोल असायला पाहिजे.. लवंग दालचिनी विलायची अजून काय काय टाकतील..! दात घासायचेत, का दातांना फोडणी द्यायचीय, काय माहिती !

आणि सगळ्याच टूथपेस्ट “डेंटिस्ट का सुझाया नंबर वन ब्रँड” असतात.. रातभर ढिशूंम ढिशूंम..

टूथब्रशच्या ब्रिसल्सवर जितके संशोधन झालेय तितके संशोधन ‘नासा’त तरी होतेय का नाही कुणास ठाऊक ! कोनेंकोनें तक पहुँचने चाहिए म्हणून मग आडवे तिडवे उभे सगळे प्रकार आहेत.. असोत बापडे.. पण त्या डेंटिस्टच्या गळ्यात स्टेथो का असतो, हे मला अजून समजलं नाही..!

आंघोळीचा साबण वेगळा, चेहरा धुवायचा वेगळा.. जेल वेगळं.. फेसवॉश वेगळं.. दूध, हल्दी, चंदन आणि बादामने अंघोळ तर क्लिओपत्राने पण केली नसेल, पण आता गरिबातली गरीब मुलगी पण सहज करतेय..

आधी शिकेकाईने पण काम भागायचं, मग शॅम्पू आला.. मग समजलं की, शॅम्पू के बाद कंडिशनर लगाना भी जरुरी हैं..

भिंतीला प्लास्टर करणं स्वस्त आहे, पण चेहऱ्याचा मेकअप फार महागात पडतो.. पण तो केलाच पाहिजे.. नाहीतर कॉन्फिडन्स लूज होतो म्हणे.. “दाग अच्छे हैं” हे इथं का नाही लागू होत काय माहिती.?!

मी “गॅस, नो गॅस” करत सगळे डिओ वापरून बघितले.. पण “टेढ़ा हैं, पर मेरा हैं” म्हणत एक पण पोरगी कधी जवळ आली नाही.. खरंच.. सीधी बात, नो बकवास..

केस सिल्की हवेत, चेहरा तजेलदार हवा, त्वचा मुलायम हवी, रंग गोरा हवा, आणि परफ्यूमचा सुगंधी दरवळ हवा बस्स.. बाकी शिक्षण, संस्कार, बॉडी लँग्वेज, हुशारी हे गेलं चुलीत..!

मला तर वाटतं, काही दिवसांतच सगळीकडे संतूर गर्ल, कॉम्प्लॅन बॉय, रॉकस्टार मॉम, आणि फेअर अँड हॅन्डसम डॅड दिसतील..

साबुनसे पण किटाणू ट्रान्सफर होतें हैं म्हणे..!!

(हे म्हणजे, कीटकनाशकालाच् कीड़े लागण्यासारखं आहे!)

आता, तुमचा साबण पण स्लो असतो.. मग काय.. धुवत रहा, धुवत रहा, धुवत रहा..

टॉयलेट धुवायचा हार्पिक वेगळा, बाथरूमसाठीचा वेगळा..! मग त्यात खुशबुदार वाटावं म्हणून ओडोनिल बसवणं आलंच.. जसं काय मुक्कामच करायचाय तिथे..

हाताने कपडे धुणार असाल तर वॉशिंग पावडर वेगळी, मशीनने धुणार असाल तर वेगळी.. नाहीतर, तुम्हारी महँगी वॉशिंग मशीन भी बकेट से ज्यादा कुछ नहीं, वगैरे…

आणि हो, कॉलर स्वच्छ करण्यासाठी वॅनिश तर पाहिजेच, आणि कपडे चमकविण्यासाठी “आया नया उजाला, चार बुंदोवाला”.. विसरून कसं चालेल..?

“अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का?” हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे..

म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे वेडे.. आणि त्यात हॉर्लिक्स मिसळणारेच तेवढे हुशार !! ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं..

… आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग…

“इसको लगा डाला, तो लाईफ़ झिंगालाला” म्हणून मी टाटा स्काय लावलं खरं.. पण ते एचडी नाहीये.. म्हणून मग मी घरात टिव्ही बघत असलो, की लगेच दार लावून घेतो.. न जाणो, कुठूनतरी पाच-सात पोरं नाचत येतील आणि “अंकल का टिव्ही डब्बा, अंकल का टिव्ही डब्बा”.. म्हणून माझ्या ४००००च्या टिव्हीला चक्क डब्बा करतील.. याची धास्तीच वाटते..

“पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो”च्या जमान्यात आपणच खरे इस्तेमाल होतोय..  काल घेतलेल्या वस्तू, ‘एक्स्पायर’ व्हायच्या अगोदरच् ‘आऊटडेटेड’ होताहेत.. 

माणसांचंही तसंच आहे म्हणा…. असो..

लेखक : – डॉ सचिन लांडगे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बंकिमचंद्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “बंकिमचंद्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काही गीतांच्या रचना ह्या जणू आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंगच बनल्यात. ह्या ऐकल्यावर स्फूर्ती, स्वाभिमान, देशप्रेम, निष्ठा, जागृत होऊन ताजतवानं झाल्यासारखं वाटतं. ह्या रचनांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रगीत, वंदेमातरम, ए मेरे वतन के लोगो, रंग दे बसंती, महाराष्ट्र गीत,मेरे देश की धरती आणि अशी कित्येक स्फुरणगीतं.

“वंदेमातरम” ह्या आपल्याला अतिशय पूज्य असणा-या गीताचे रचयीते बंकीमचंद्र ह्यांची जयंती नुकतीच  आठ मे ला झाली.त्यांना विनम्र अभिवादन.काही बाबी,काही घटना, काही प्रसंग तर काही गीतं ह्यांना आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान असतं.

आज अशी काही गीतं आठवलीत की आपण चटकन आदराने स्तब्ध उभे राहतो , काही गीतं ऐकली की स्फुरण चढतं. आजही “जन गण मन ” व “वंदेमातरम”गीत कानी पडले की आपली मान गर्वाने उंच होते.

१८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं ” वंदेमातरम” हे गीत त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.

मुळात वंदे मातरम् हे गीत बंगाली व संस्कृत ह्या दोन भाषांच्या मदतीने फुललयं,तयार झालयं. ह्या दोन्ही भाषांचा सरसकट अभ्यास नसल्याने वा त्या नीट अवगत नसल्याने  काहींना याचा अर्थ समजून घेणं कठीण जातं.

वंदेमातरम गीताचा विषय निघाल्यावर एका छोट्या मुलाने त्यातील काही शब्दांचा अर्थ विचारल्याने मला स्वतःला देखील त्याचा नीट, अभ्यासपूर्ण अर्थ जाणून घेण्याची अनिवार ईच्छा झाली.

पहिल्यांदा ह्यातील सुरवातीच्या तीन चार ओळी म्हणजेच ध्रुवपद आणि नित्य गायल्या जणारे कडवे ,त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे,

वंदे मातरम्, वंदे मातरम्!

सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,

शस्यश्यामलाम्, मातरम्!

वंदे मातरम्!

शुभ्रज्योत्सनाम् पुलकितयामिनीम्,

फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,

सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्,

सुखदाम् वरदाम्, मातरम्!

वंदे मातरम्, वंदे मातरम्॥

 ह्या गीताचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे,

हे माते मी तुला मनोमन वंदन करते, पाणी म्हणजेच आपले जीवन,ह्या पाण्याने भरभरून ओसंडून वाहणारी, परिपूर्ण, फळांनी लदलदलेली,बहरलेली, पण त्याच बरोबर दक्षिणेकडील वा-याच्या झुळकांनी,लाटांनी शांत असणाऱ्या निरनिराळ्या पिकांनी समृद्ध  असलेल्या अश्या माझ्या मातेला,माझ्या भारतभू ला  मी प्रणाम करते.

शुभ्र धवल चमकत्या चांदण्यांमुळे बहरलेल्या ह्या पवित्र भूमीवरील रात्र ही  आल्हाददायक असते. फुलांच्या मदतीने फुललेली, वृक्षांच्या साथीने मढलेली, येथील ही आमची भूमाता ही खरोखरीच विलक्षण शोभून दिसते. म्हणूनच येथील पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी ची अनूभुती देणा-या ह्या  भूमातेला माझे वंदन, माझा  प्रणाम !

ह्या गीताचे रचयिते मा.बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि काही दिवसातच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.

बंकीमचंद्र ह्यांच्या जयंतीनिमित्त त्याचे स्मरण करून वंदेमातरम ह्या गीताने दिवसाची चांगली सुरवात करत जाऊया.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आईचा व्हॉट्सॲप… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

आईचा व्हॉट्सॲप… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

चार दिवस झाले होते, मी आईला फोनच केला नव्हता. हिंमतच होत नव्हती माझी, पण कधीतरी कळवावं लागणारच होतं. कारण त्याआधीच बाबांचा फोन आला, तर ते फारच भयंकर होणार होतं. 

आज कळवू, उद्या कळवू म्हणत म्हणत इतके दिवस गेले, आजचाही दिवस गेला होता. अंथरुणावर पडून मी निद्रादेवीची आराधना करत होतो आणि तेवढ्यात व्हॉट्सॲप मेसेज आल्याची वर्दी देणारं पिंग वाजलं. गेले चार दिवस येणाऱ्या प्रत्येक फोनची रिंग आणि प्रत्येक मेसेजचं पिंग माझ्या काळजाचा ठोका चुकवत होतं – न जाणो बाबांचा फोन / मेसेज असला तर ?

पण आत्ता आईचा मेसेज होता.

“झोपला होतास का रे बाळा ?”— या परिस्थितीतही मी स्वतःशीच  खुदकन हसलो. कॉलेजला जाणाऱ्या – हॉस्टेलला रहाणाऱ्या घोड्याला “बाळा” असं फक्त आईच म्हणू शकते. 

“नाही ग, नुकताच पडत होतो.”

“चार दिवस झाले, फोन नाही तुझा, मेसेजही नाही. सगळं ठीक आहे ना रे ?”

” … “

“वाटलंच मला. काय झालं रे ? कुठं प्रेमाबिमात पडलास की काय ?”

“काहीतरी काय, आई ? तुझं आपलं काहीतरीच.”

“मग काय झालंय ? तू मेसेज टाकतोस का मी डायरेक्ट फोन करू ?”

“नाही, नाही. फोन नको करुस.” 

— सगळं आटोपून बाबाही आता झोपायला येत असतील, किंवा already शेजारी झोपलेही असतील. आई माझ्याशी फोनवर बोलत आहे, म्हटल्यावर तेही बोलायला येणार आणि मग नको तो विषय निघणार …नकोच ते. 

“आई, चार दिवसांपूर्वी पहिल्या सेमीस्टरचा रिझल्ट लागला.”

“हं, हं. आणि मग ?”

“आई, मला एका विषयात KT लागली आहे.”

“KT म्हणजे ?”

“KT म्हणजे मी त्या विषयात पास नाही झालो, आई. मी पुढच्या वर्गात जाईन, पण त्या विषयाची पुन्हा परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावं लागेल.”

— ‘पास नाही झालो’ हे ऐकल्यावर निशब्द होण्याची पाळी आता आईची होती. एका मोठ्ठ्या pause नंतर आईचा मेसेज आला —– 

“काय झालं रे ? विषय अवघड जातोय का ? शिकवलेलं कळत नाहीये का लक्षात रहात नाहीये ?”

“तसं काहीच नाहीये, आई. उगाच मी काहीतरी खोटंनाटं सांगणार नाही की बहाणेबाजी करणार नाही. थोडा अभ्यास कमी पडला आणि मी ओव्हरकॉन्फिडन्समध्ये गेलो हीच खरी कारणं आहेत. पण तू काळजी नको करुस, बघ पुढच्या परीक्षेत याच विषयात अव्वल गुण आणतो की नाही ते ! अगदी तुझी शप्पथ. पण …”

“तू खरं सांगितलंस ते आवडलं मला. उगाच रूममेटला करोना झाला होता, किंवा तुलाच बरं नव्हतं असली सहज पचून जाईल अशी थाप नाही मारलीस तू. तुझी चूक तुला कळली आहे. ती परत करू नकोस. आणि काळजी घेत जा रे स्वतःची. .. आणि तू ‘पण …’ म्हणून वाक्य अर्धवट सोडलंस ते काय ?”

“आई, मी नक्की छान मार्कस् आणेन पुढच्या वेळी, पण, पण तू बाबांना सांभाळून घे. त्यांना काय सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं ? मला तर काही सुचतच नाही बघ.”

आईने कसा लगेच विश्वास ठेवला (आता त्याला सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझी होती म्हणा). बाबा असते तर केवढं लेक्चर झाडलं असतं – परीक्षेचे गुण भविष्यासाठी कसे महत्त्वाचे आहेत, करिअर – वाढती महागाई – खर्च अशी त्यांची प्रवचनाची गाडी पटापटा पुढे सरकत गेली असती. 

पण एक मात्र होतं बाबांचं, कधी – आम्ही किती खस्ता काढला तुमच्यासाठी, कसं पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला मोठं केलं – वगैरे कॅसेट नाही वाजवायचे ते. बोलायचे ते माझ्यापायीच्या चिंतेनेच बोलायचे, पण त्रास खूप करून घ्यायचे स्वतःलाच. 

आईचं तसं नव्हतं. ती समजून घ्यायची मला. आता कसं तिला सांगितलं होतं, ती घेईल सांभाळून. मी निर्धास्त झालो होतो….. 

“हां, बाबांना मी सांगते, समजावते. ती काळजी नको करुस तू. पण तू काळजी घेत जा. हे असं चार चार दिवस फोन केल्याशिवाय रहात जाऊ नकोस. चल, झोप आता.”

मी फोन ठेवला, आणि पटकन झोपी गेलो.

— —

“काय हो, झोप येत नाहीये का ? आणि माझ्या फोनशी काय करताय ?” आई बाबांना विचारत होती. 

“अरे तू जागी झालीस वाटतं ? कुठं काय, गजर लावत होतो.” 

— बाबा खोटं बोलले. लेकाचा चार दिवस फोन नाही आला तर केवढी कावरीबावरी झाली होती ती, नाही नाही ते विचार येत होते तिच्या मनात. पण फोन लावायला घाबरत होती. 

बरं, हे महाशय बापाशी स्वतःहून बोलतील तर शपथ. बाप म्हणजे कर्दनकाळ अशीच त्यांची समजूत. 

हे मेसेजचं बरं असतं. कोण टाईप करतंय कळत नाही. 

बाबा स्वतःशीच हसले, लेकाच्या रिझल्टबद्दल उद्या आईची समजूत काढावी लागणार होती, त्याचं प्लॅनिंग करत तेही निद्रादेवीच्या अधीन झाले….. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नाच रे मित्रा नाच —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ “नाच रे मित्रा नाच —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

जगण्याचा पायाच नाच आहे. नृत्य हा शब्द कानावर पडताच नृत्याचे अनेक दृश्य लगेच डोळ्यासमोर येतात. आपल्या संस्कृतीत नृत्याला खूप महत्व आहे. नाच रे मोरा आंब्याच्या बनात हे गाणं ऐकूनच आपण वयाने मोठे झालो आहोत. आज नृत्य पुराण आठवण्याचे कारण म्हणजे आज 29 एप्रिल आहे. हा दिवस जागतिक स्तरावर नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बॕले नृत्याचे आद्य संस्थापक जीन जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युनेस्कोच्या भागीदार असलेल्या  आंतरराष्ट्रीय नृत्य संस्था या स्वायत्त संस्थेकडून आजचा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

नृत्य कलेला आणि नृत्य कलावंतांना जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि प्रसार व्हावा हा उद्देश या दिनामागे आहे.

हर्ष, भीती, नाच या मानवाच्या मूलभूत भावना आहेत. वर्ण, प्रांत, देश, भाषा, वंश इत्यादी अनेक प्रकाराने मानव परस्परांपासून भेदित झाला असला तरी आनंद, भीती, हातवा-यांच्या खुणेची भाषा भूतलावरच्या समस्त मानवजातीसाठी एकच आहे. उदा. भूक लागली, तहान लागली, इकडे ये, तिकडे, जा, नको अशा अनेक क्रिया आपण खाणाखुणांनी दाखवू शकतो. नृत्य ही पण अशीच एक सर्वव्यापी नैसर्गिक भावना आहे. मनासारखं घडलं की माणुस मनातून डोलतो.

आपल्या भारतात दहा नृत्य शैली प्रसिध्द आहेत. भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा नृत्याशी संंबंधित अति प्राचिन ग्रंथ मानला जातो. कुचिपुडी, भरतनाट्यम, मणिपुरी, ओडिशी, कथकली, मोहिनीअट्टम या भारतातील अतिप्राचिन नाट्यपद्धती आहेत. भगवान शंकराचे तांडव नृत्य हा ही एक नृत्य प्रकारच. लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्राच्या लोककलेचे अविभाज्य अंग आहे. पंजाबच्या भांगड्यावर व गुजरातच्या गरब्यावर ठेका धरणारेही खूपजन आहेतच.

नृत्य व नाचणे हे जरी समान अर्थाचे शब्द असले तरी आपल्याकडे नृत्य शब्द प्रतिष्ठेचा आब राखून आहे. नाचण्याच्या वाट्याला ती प्रतिष्ठा नाही. नृत्य हा प्रकार कला म्हणून मानला जाऊ लागला तेव्हापासून नृत्याची प्रकारानुसार नियमावली तयार झाली व त्यातली नैसर्गिक भावना लोप पावली. नाचता येईना अंगण वाकडे हे तेव्हापासून सुरु झाले. खरं म्हणजे नाचण्याचा व अंगणाचा काही संबंधच नाही. नाचणे ही पूर्णतः मानसिक क्रिया आहे. मनातारखा ताल मिळताच आपोआपच शरीर त्या तालाला प्रतिसाद देते हा नाच कलेचा अभिजात नैसर्गिक पुरावा आहे.

दुःख विसरुन पूर्णपणे वर्तमान आयुष्य जगायला शिकवणारी नृत्य ही सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. आंतरिक सुख भावनेशी शरीराचे पूर्ण मिलन हे नृत्याविष्कारतच घडते. आपली भारतीय सिनेसृष्टी तर नृत्यावरच उभी आहे. ताल, दिल तो पागल है, एबीसीडी, तेजाब, हम आपके है कौन, रबने बना दी जोडी अशा कितीतरी चित्रपटांना लाजवाब नृत्याने घराघरात पोहोचवलं. माधुरी, ऐश्वर्या, हेमामालिनी यांच्या पदन्यासाला न भुरळणारा माणूस भेटेल का ? तेरी मेहरबानियाँ मधला प्रामाणिक कुत्रा व त्याच्यावरचं टायटल साँग डोळ्यात पाणी आणतं. जय हो, सैराटची गाणी लागताच संपूर्ण तरुणाई थिरकायला लागते. ते यामुळेच. शांताबाई व शांताराम, आईची शपथ, चिमणी उडाली भूर्र या गाण्यांना तर लग्नापूर्वीचा एक अत्यावश्यक विधी अशी मान्यताच मिळाली आहे.

नृत्य हा एक सर्वोत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. जगाची चिंता न करता, लाज या भावनेला मुरड घालून स्वतःसोबतच ताल धरणे हा आनंद निर्मितीचा सहजभाव आहे. संगिताचा कुठलाही अभ्यासक्रम माहीत नसताना लहान मूल स्वताःच्या तालातच नाचतं डुलतं ते सहजभावनेमुळेच. पण माणुस वयाने मोठा होत चालला की लाजेचा प्रभाव वाढत जातो व माणसं नाचणं सोडून देतात. जगातला एकच खुला रंगमंच असा आहे की जिथं माणूस नाचायला लाजत नाही, तो रंगमंच म्हणजे स्वतःचा पाळणा व लहाणपणीचं अंगण. अन् एकच मालिक आहे असा आहे की जो आपल्या नृत्याचं भरभरून कौतुक करतो तो म्हणजे आपली आई. एकदा हा काळ संपला की वरातीतलं मुक्त नाचणं सोडलं तर सगळेच नृत्यप्रकार नियमाधिन झालेले, त्यामुळे बंधनं येतात. शोलेमधला धर्मेंद्र (वीरू) बसंतीला (हेमा)  इन कुत्तोंके सामने मत नाच असं ओरडून ओरडून सांगतो. त्याच्या उलट गंगा जमुना सरस्वतीमधली सरस्वती आपल्या गंगासाठी(अमिताभ बच्चन) चालत्या ट्रकवरच नृत्य करते. गाण्यांच्या मैफलीत खलनायकांना रंगवून नायकाची सुटका करणं वा इप्सित साध्य, साध्य करणं हे प्रकार आपण सिनेमात पाहिलेले आहेतच. म्हणजेच नृत्य ही दिल लुभानेकी बात है, तशी ती शस्त्र म्हणूनही वापरता येणारी बाब आहे.

शास्त्रीय नियमावलीत नृत्याला अडकवून तालासुरात जगण्याचा एक सोपा मार्ग आपण ठराविक लोकांच्या हाती दिला आहे. नृत्याची सोपी व्याख्या म्हणजे मनात उठलेल्या तरंगांना लयबद्ध अंगविक्षेपाची जोड देणे होय. नृत्य कलेची प्रतिष्ठा जपून तिचा प्रसार करणाऱ्या सर्व नृत्य शिक्षकांना सलामच. दीर्घ, निरोगी व सहज सुंदर आयुष्यासाठी नाच मित्रा नाच.

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चरित्रकार वीणा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “चरित्रकार वीणा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काही व्यक्तींची ओळख त्यांनी केलेल्या कार्यावरुन होते.बरेचदा त्या व्यक्ती आणि त्यांनी केलेले कार्य हे जणू समीकरणच बनतं.असच एक समीकरण म्हणजे वीणा गवाणकर आणि “एक होता कार्व्हर”.

हे जग खूप म़ोठ आहे. ह्या जगाच्या कानाकोपऱ्यात सुध्दा कर्तृत्ववान,हुशार मंडळी वास करीत असतात. त्यांच्या कर्तृत्वाची महती संपूर्ण जगासमोर आणण्याचे काम काही व्यक्ती आपल्या लिखाणातून करीत असतात. कोणाचेही सद्गुण हेरून ते मनोमन कबूल करून ,जाहीररीत्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हे तसे कठीण काम. कारण मानवी वृत्तीने आधी दुसऱ्या चे सद्गुण हेरून त्याची महती मान्य करणं हे खरंच एक अफलातून कामं.पण अशाही काही व्यक्ती असतात त्या हा घेतलेला वसा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्या चरित्रासम लिखाणातून पार पाडीत असतात ,ते ही निःस्पृह भावनेने.

अशाच काही लेखनकार्यात भरीव कामगिरी करून ते आपल्या लेखनाद्वारे लोकांपर्यंत सातत्याने पोह़चविणा-या लेखकांपैकी प्रामुख्याने वीणा गवाणकर ह्यांचे नाव चटकन नजरेसमोर येतं. वीणा गवाणकर ह्यांनी लिहीलेली खूप सारी चरित्रे प्रसिद्ध आहेत . पण कसं असतं नं आपली एखादी कलाकृतीच खूप स्पेशल ठरुन जणू तीच आपली ओळख बनून जाते.वीणा गवाणकर म्हंटलं की चटकन आठवतं “एक होता कार्व्हर”.

त्यांचा जन्म 6 मे 1943 चा. स्वतः ग्रंथपाल, उत्तम चरित्रकार असलेल्या वीणाताईंनी लिहीलेली अनेक नावाजलेल्या व्यक्तींची चरित्र लोकप्रिय आहेत.”एक होता कार्व्हर”ह्या अफाट गाजलेल्या चरित्राने त्यांना घराघरांत पोहोचविले.ह्या पुस्तकाची मोहिनीच तशी विलक्षण आहे.

“एक होता कार्व्हर”,”आयुष्याचा सांगाती”,  “डॉ. आयडा स्कडर”,सर्पतज्ञ डॉ रिमांड डिटमार्स,शाश्वती भगिरथाचे वारस,डॉ खानखोजे,नाही चिरा नाही पणती,डॉ सलीम अली,लीझ माईटनर,राँबी डिसील्व्हा,रोझलिंड फ्रँक्वीन,इ.अनेक उत्तमोत्तम चरित्रपर लेखन प्रसिद्ध आहे.

ह्यांचा जन्म लोणी काळभोरचा व पुढील शिक्षण चौल,मनमाड, इंदापूर येथील मराठी शाळेतून झाले. थोडक्यात काय तर माणसाला सुसंस्कृत, उच्चशिक्षित व्हायचं असेल तर लहान गावातून,मराठी शाळांतूनही होता येत हे ह्यांनी सिद्ध केलयं.पुढे फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी, पुणे विद्यापीठातून ग्रंथपाल ही पदवी घेतली.1964 पासून औरंगाबादच्या महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्याची सुरवात केली.

…वाचनाची आवड, शिक्षकांचे प्रोत्साहन ह्याने अनेक उत्तमोत्तम साहित्य त्यांच्या वाचनात आले, फूटपाथवर अर्ध्या किमतीत मिळणाऱ्या पुतकामध्ये त्यांना कार्व्हर चे पुस्तक हाती लागले.त्यांनी ते झपाटल्यागत वाचून त्यांचे हे चरित्र खास मराठी लोकांसाठी “एक होता कार्व्हर” ह्या पुस्तकाच्या रुपात आणले आणि ह्या पुस्तकाने एक इतिहासाच घडविला.

जन्माने गुलाम असलेल्या अनाथ, कृष्णवर्णीय,अमेरिकन कृषीशास्त्राच्या धडपडीची, मानवी जीवनाचे मोल वाढविणा-या प्रयत्नांनी वेध घेणारी,चरित्र कहाणी”एक होता कार्व्हर”,मानवी जीवनाची सेवा करण्यासाठी, भारतातील ग्रामीण आरोग्याच्या स्तर उंचावण्यासाठी आपले ज्ञान वापरणा-या कर्तव्यनिष्ठ अमेरिकन महिला डॉक्टर ची जीवनकथा “डॉ आयडा स्कडर”,सर्पतज्ञ डॉ रेमंड डिटमार्स ह्यांची साप पाळण्याच्या छंदातून जागतिक किर्तीचे सर्पतज्ञ होण्यापर्यंत चा प्रवास, डॉ सलीम अली ह्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या पक्षीतज्ञाच्या जीवनकार्याचा वेध, महान क्रांतिकारक ते श्रेष्ठ कृषीतज्ञ हा प्रवास, आँस्ट्रीयन अणूशास्त्रज्ञ स्त्री “लीझ मायटनर”, भडीरथाचे वारस विलास साळुंखे हा पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे ठणकावून सांगणारा अभियंता, इ.वीणाताईंनी ह्यांची चरित्रे आपल्या प्रभावी लेखणीद्वारे लोकांसमोर आणलीयं. त्यांनी जवळपास 30 चरित्रंलेखन दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध केलयं. तरी  “एक होता कार्व्हर” हे पुस्तक म्हणजे जणू त्यांची ओळखच बनली.

नुकत्याच  झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप सा-या शुभेच्छा देऊन आजच्या पोस्टची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुखावणारी माणसं ! – सुश्री यशश्री भिडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

??

☆  दुखावणारी माणसं ! – सुश्री यशश्री भिडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

काल एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडताना थोडा अंधार होता. प्रत्येकजण आपापलं जेवण आटपून बाहेर पडत होता. तेवढ्यात एका व्यक्तीला एका प्रथितयश डॉक्टरांनी हाक मारून म्हटलं “अरे बाहेर अंधार आहे रे, सांभाळून ! बाहेरच्या काळोखासारखा असलेला तुझा चेहरा कुणाला दिसला नाही, तर आपटेल कुणीतरी तुझ्यावर !”

त्या व्यक्तीचा चेहरा एकदम पडला. चारचौघात त्याच्या रंगावरून बोलल्यामुळे मनातून खूप दुखावला गेला असावा ! काय मिळतं अशा कॉमेंट्स करून लोकांना काय माहित!!

एखाद्याच्या व्यंगावर हसणारे लोक पहिले की कीव येते अगदी त्यांची ! बरं, ही माणसे स्वतः अगदी सर्वगुणसंपन्न असतात असंही नाही. पण ते ज्या पद्धतीने दुसऱ्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतात ना ते पाहिलं कि चिडचिड होते अगदी !!

ही अश्या प्रकारची माणसं. समोरच्याच्या मनाचा कधीही विचार करत नाहीत, आणि बोलून झालं की आपण काहीतरी फारच भारी काम केल्यासारखं स्वतःवर खुश होऊन हसत असतात, आणि ज्याला ऐकावं लागतं तो मात्र बिचारा खजील होतोच आणि स्वतःचा आत्मविश्वासही गमावून बसतो.

लहान मुलांना पटकन त्यांच्यातला दोष दाखवण्यात ह्या प्रकारची माणसं अगदी पटाईत असतात. एकदा मी आणि माझी लेक एका ठिकाणी गेले होते. एक ओळखीच्या बाई आपल्या नातीला घेऊन आलेल्या तिथे…. ‘कुठे असतेस, काय करतेस’ अशा जुजबी चौकश्या झाल्यावर माझ्या लेकीकडे बघून म्हणाल्या “अगंबाई, दातांची वेडीवाकडी ठेवण अगदी आईची घेतलेली दिसत्ये !” 

त्या बाई सावळ्या होत्या तशीच त्यांची नातही सावळी दिसत होती. म्हणून मी लगेच म्हटलं “होय, खरंय तुमचं, काही मुलं आईची वाकड्या दातांची ठेवण घेतात आणि काही मुलं थेट आजीचाच रंग घेतात हो !” माझ्या बोलण्याचा रोख कळला त्या बाईंना ! राग येऊन निघून गेल्या तिथून!! बहुतेक परत कुणाला बोलणार नाहीत!!

ह्या वृत्तीची माणसं फक्त दुसऱ्याच्या व्यंगावरच बोट ठेवतात असं नाही, तर त्याची एखादी दुखरी नस माहित असेल तर अगदी आठवणीने तो विषय काढून बोलणारच. माहित असतं बरं का ह्या लोकांना कि, समोरच्या माणसाचा मुलगा काहीही न करता घरी बसलेला आहे, तरी विचारणार, “असतो कुठे हल्ली ? दिसला नाही बरेच दिवसात ! म्हटलं मोठ्ठी नोकरी लागलेली दिसत्ये !” हे ऐकून आधीच काळजीत असलेली ती माउली अजूनच दुःखी होते.

लग्न लवकर न ठरलेल्या, मूल लवकर न होणाऱ्या, परीक्षेत, व्यवसायात सतत अपयश येणाऱ्यांना तर ह्या विशिष्ट प्रकारची माणसं अगदी नको करून सोडतात !

रस्त्यात, समारंभात अगदी भाजी घेताना भेटलो आणि वेळ मिळाला तर तिथेसुद्धा तुम्हाला दुखावल्याशिवाय  ही माणसं सोडत नाहीत !! आणि सगळ्यात जास्त वेळा टोमण्यांचा, चेष्टेचा सामना करावा लागतो तो माझ्यासारख्या जाडजूड माणसांना !!

फिट असावं आणि दिसावं असं कुणाला वाटत नाही? कुणालाही आपण बेगडी, कुरूप दिसावं असं वाटत नसतंच मुळी ! प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. पण शेवटी सगळंच काही आपल्या हातात नसतं ना! 

माझ्यासारख्या जाड व्यक्तींना ऐकवले जाणारे कॉमन डायलॉग कोणते माहित्ये ? “हळू, हळू, खुर्ची मोडेल, बापरे भूकंप झाला कि काय, समोर बघून चाल, तुला काही नाही होणार ती गाडी मोडेल, घसरू नको, रस्त्यात खड्डा पडेल मोठा, जरा कमी जेव किंवा खा एखादी पुरी, काही नाही होणार १०० ग्रॅम वाढून सागराला काय फरक पडेल ?…” इ.इ.

कुणी अति बारीक असेल तर “फु केलं तरी उडशील, नुसती काठी असून काय उपयोग ! ताकद नको ?” इ इ. 

हे सगळं जे बोलत असतात त्यांच्या आरोग्याची खरं तर बोंब असते. फिगर छान असते, पण गुढघे दुखत असतात, मणके दुखत असतात, जराशा कामाने दमायला होत असतं, पण हे सगळं दिसत नसतं. 

दुसऱ्याला मूल होत नाही म्हणून त्यांना बोलणाऱ्यांची मुले जे दिवे लावत असतात, त्याचा प्रकाश त्यांना नंतर दिसणार असतो. परीक्षेत अपयश मिळणाऱ्या मुलांना बोलणाऱ्यांची स्वतः कधी शाळेत सुद्धा विशेष प्राविण्य मिळवलेलं नसतं. पण… बोलायचं… टोचायचं काम ही माणसं मनापासून करत असतात आणि त्यात त्यांना आनंद मिळत असतो हे विशेष !!

माझी चिपळूणची आजी (आईची आई ) नेहमी दासबोधातले दाखले द्यायची. तिचं वाचन आणि अभ्यास प्रचंड होता ह्या विषयावरचा. आमच्या एकदा गप्पा चालू होत्या तेव्हा ती म्हणाली “समर्थानी सांगितलेलं आहे, तसं वागावं म्हणजे काय तर ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ स्वतःहून कुणाला व्यंग दाखवून दुखावू नये, पण आपलं व्यंग काढून आपल्याला कुणी दुखावलं तर त्याचं व्यंग दाखवल्याशिवाय त्याला सोडू नये. ज्याचं त्याचं माप त्याच्या पदरात घालायचं. आपलं व्यंग दाखवलं म्हणून दुःखी व्हायचं नाही, उलट समोरच्याची कीव करून त्याला देव सद्बुद्धी देवो म्हणायचं…!

लेखिका : सुश्री यशश्री भिडे

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ६ ते १० ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ६ ते १० ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ (अनेक देवतासूक्त)

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : ऋचा ६-१०  : देवता वरुण 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चोविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले  असल्याने हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा प्रजापतीला, दुसरी ऋचा अग्नीला, तीन ते पाच या ऋचा सवितृ देवतेला आणि सहा ते पंधरा या ऋचा वरुण देवतेला  आवाहन करतात. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या सहा ते दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद : 

न॒हि ते॑ क्ष॒त्रं न सहो॒ न म॒न्युं वय॑श्च॒नामी प॒तय॑न्त आ॒पुः ।

नेमा आपो॑ अनिमि॒षं चर॑न्ती॒र्न ये वात॑स्य प्रमि॒नन्त्यभ्व॑म् ॥ ६ ॥

अविरत वाहत स्रोत जलाचा पक्षीराज  व्योमीचे

देवांनी जे दूर सारले कुदर्प वायूंचे

पासंगा तुमच्या ना कोणी तुम्ही बहुथोर

शौर्य तुमचे सामर्थ्य तसे कोप तुझा अति घोर ||६||

अ॒बु॒ध्ने राजा॒ वरु॑णो॒ वन॑स्यो॒र्ध्वं स्तूपं॑ ददते पू॒तद॑क्षः ।

नी॒चीनाः॑ स्थुरु॒परि॑ बु॒ध्न ए॑षाम॒स्मे अ॒न्तर्निहि॑ताः के॒तवः॑ स्युः ॥ ७ ॥

अमर्याद विस्तीर्ण व्योमा नाही आधार

पराक्रमी वरुणाने दिधला तरुस्तंभ आधार

विचित्र त्याचे रूप आगळे बुंधा त्याचा वर

अंतर्यामी त्याच्या आहे वसले अमुचे घर ||७||

उ॒रुं हि राजा॒ वरु॑णश्च॒कार॒ सूर्या॑य॒ पन्था॒मन्वे॑त॒वा उ॑ ।

अ॒पदे॒ पादा॒ प्रति॑धातवेऽकरु॒ताप॑व॒क्ता हृ॑दया॒विध॑श्चित् ॥ ८ ॥

सूर्याच्या मार्गक्रमणास्तव वरूणे विस्तृत केला 

अतिचिंचोळ्या वाटेचा तो राजमार्ग  बनविला 

क्लेशकारी जे असते अप्रिय दुसऱ्यासी बोला ना 

वरुणदेव करी अति आवेगे त्याची निर्भत्सना ||८ ||

श॒तं ते॑ राजन्भि॒षजः॑ स॒हस्र॑मु॒र्वी ग॑भी॒रा सु॑म॒तिष्टे॑ अस्तु ।

बाध॑स्व दू॒रे निर्‍ऋ॑तिं परा॒चैः कृ॒तं चि॒देन॒ः प्र मु॑मुग्ध्य॒स्मत् ॥ ९ ॥

वरूण राजा तुमच्या जवळी ओखदे अनंत

अखंड दैवी तुझ्या कृपेने व्याधींचा हो अंत

गृहपीडेचे अमुच्या, देवा  निर्मूलन हो करा

हातून घडल्या पापांपासून आम्हा मुक्त करा ||९||

अ॒मीय ऋक्षा॒ निहि॑तास उ॒च्चा नक्तं॒ ददृ॑श्रे॒ कुह॑ चि॒द्दिवे॑युः ।

अद॑ब्धानि॒ वरु॑णस्य व्र॒तानि॑ वि॒चाक॑शच्च॒न्द्रमा॒ नक्त॑मेति ॥ १० ॥

उंच नभांगणी ही नक्षत्रे चमचमती रात्री

तारकाधिपती चंद्रही उजळुन झळकतसे रात्री

अहोसमयी ना दर्शन त्यांचे कुठे लुप्त होती

आज्ञा या तर वरुणाच्या ना उल्लंघुन जाती ||१०|| 

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/j3hYU5Nri74

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 6 – 10

Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 6 – 10

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विठूमाऊलीचा प्रसाद ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

विठूमाऊलीचा प्रसाद ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

आर्मी सर्व्हिसेस कोरचे कॅप्टन प्रकाश कदम पंढरपूरला विठूमाऊलीच्या दर्शनाला आले होते. आज त्यांची सुट्टी संपत होती. दर्शन झालं की इथून मुंबई आणि मग तिथून पोस्टिंगवर – ड्युटीवर रुजू व्हायचं म्हणून कॅप्टनसाहेब लष्करी गणवेषातच दर्शनाला आले होते.

दर्शन झालं, आता बाहेर पडणार एवढ्यात एका छोट्या मुलीनं त्यांना हटकलं – काका, तुम्हीपण सैन्यात आहात ना ? इथून आता शत्रूशी ढिशूम ढिशूम करायला तुम्ही काश्मीरला जाणार ना ? माझे बाबाही तिथेच आहेत. त्यांच्यासाठी हा विठोबाचा प्रसाद घेऊन जाल ? आई म्हणते बाबा आता कधीच परत येणार नाहीत, त्यांना एवढा प्रसाद तर द्या.

आणि कदमांचा पंढरपूरचा मित्र त्यांच्या कानात कुजबुजत सांगत होता – ही उमंग. शहीद मेजर कुणाल गोसावींची मुलगी. मेजरसाहेब २०१६ साली काश्मीरमध्ये नग्रोटा इथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले, तेव्हा ही फक्त ४ वर्षांची होती….

कदमांच्या डोळ्यात पाणी तरारलं आणि त्यांना पुढचं काही ऐकूच आलं नाही.

लेखक : मकरंद पिंपुटकर 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दूर राहूनी पाहू नको रे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ दूर राहूनी पाहू नको रे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. दूर राहूनी पाहू नको रे, प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे ,प्रिया जाऊ नको रे!..आकाशीच्या चांदण्या वसुंधेरवर उतरल्या आणि आपल्या प्रियतमाला साद देऊ लागल्या. आकाशी चंद्र आता एकाकी पडला.चांदण्याच्या विरहाची काळी चंद्रकला उदासीचे अस्तर लेवून आभाळभर पसरली.चंद्र अचंबित झाला. त्याला कळेना आज अशा अचानक मला सोडून वसुंधेरवर कुणाच्या मोहात या चांदण्या पडल्या!माझ्याहून सुंदर प्रेमाचा कारक असा वसुंधेरवर कोण भेटला?कालपर्यंत तर माझ्या अवतीभवती राहून आपल्या प्रेमाने रुंजी घालत असणाऱ्यांना, प्रत्येकीला मनातून आपला स्व:ताचाच चंद्र मालकीचा हवा असा वाटत होते.. मी त्यांचे मन केव्हाच ओळखले होते. प्रेमाच्या चंदेरी रूपेरी प्रकाशी त्या सगळयांना मी सामावून घेतलेही होते. कुठेही राग रुसवा, तक्रारीला जागा नव्हती. अगदी दृष्ट लागण्यासारखीच आमची अशी अक्षर प्रीती होती कालपर्यंत. पण आज पाहतो त्या प्रेमाचा माझ्या नकळत त्यांनी ब्रेक अप करावा.. ना भांडण, ना धुसफूस ना शिकवा ना गिलवा. हम से क्या भुल हुई जो हम को ये सजा मिली…एक, दोन गेल्या असत्या तर समजून गेलो असतो.. पण इथं तर एकजात सगळ्याच मला सोडून गेल्या .आपापल्या मालकीचा स्वतंत्र चंद्राबरोबर बसून मलाही त्या दूर राहूनी पाहू नको रे, प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे.. करून साद देत सांगू लागल्या ये रे ये रे तू देखिल इथं खाली वसुंधेरवर ये आणि तुला आवडणारी एखादी चांदणीशी सुत जुळव . आणि आता आपण सगळेच या वसुंधेरवर प्रीतीचं नंदंनवन करुया… म्हणजे पुन्हा गोकुळात रासलिला.. छे छे किती अनर्थ माजेल… नको नकोच ते. 

.. मी त्यांना म्हटलं हा काय वेडेपणा मांडलाय तुम्ही.. त्या वसुंधेरवरची लबाड प्रेमी जन मंडळी आप आपल्या प्रियतमेला हवा तर तुला आकाशीचा चंद्र, चांदण्या आणून देतो असं आभासमय ,फसवं आश्वासन देऊन आपल्या प्रीतीची याचना करतात.. ते आपण इथून दररोज वरून पाहात आलोय कि.. कुणाचं सच्च प्रेम आहे आणि कोण भुलवतयं हे आपल्याला इथं बसून बघताना आपलं किती मनोरंजन व्हायचं.. आणि आणि ते सगळं पाहता पाहता आपण सगळे मात्र नकळत मिठीत बांधले जात असताना, त्या प्रेमाचे टिपूर चांदणे वसुंधेरवर सांडले जात असे… मग असं असताना आज अचानक तुमची मिठी रेशमाची सैल होऊन गळून का जावी.. अगं वेड्या बायांनो दूरून डोंगर.. आपलं वसुंधरा.. साजरे दिसतात हे काय वेगळं सांगायला हवं का मी तुम्हांला… आज तुम्ही ज्याला भुलालय तो जरी तुम्हाला मालकीचा स्वतःचा चंद्र गवसला असलाना तर तो तुमचा भ्रम आहे बरं.. अगं ते चंद्र नाहीत तर चमचमणारा काचेचा चंद्र आहेत.. तुमच्या सौंदर्यावर भाळलेला..भ्रमरालाही लाज वाटेल अशी चंचल वृत्तीची प्रिती असते त्यांची.. मग तुम्हाला ही आकाशीचा तो चंद्र आणून देतो हया फसव्या थापा मारतील.. आणि आणि त्यानंतर हळूहळू जसं जसं तुमचं सौंदर्य अस्तंगत होत जाईल ना तसा तसा तुमच्यातला त्याचा इंटरेस्ट कमी कमी होत जाऊन तो नव्या सौंदर्यवतीच्या शोधात राहिल.. मग तुमची काय गत होईल?..इथं निदान कालगती ने तुम्हाला उल्का होउन खाली तरी जाता येत होतं पण तिथं वसुंधेरवर तुम्हाला उल्का सुद्धा होता येणार नाही… 

तेव्हा सख्यांनो हा वेडेपणा सोडा या बरं परत आपल्या ठिकाणी . दिल पुकारे आरे आरे… सुलगते साइनेसे धुवाॅं सा उठता है लो अब चले आओ के दम घुटता है…. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares