…नव्याची नवलाई खरच आगळीवेगळीच असते हे काही खोट नव्हे. सगळं कसं अप्रुप, कौतुकाचं. माझं जरा बरं नसणं पण मी नवलाईने एन्जॉय करतेयं. हा आता मोबाईल, वाचन ह्या आवडत्या गोष्टींवर आलाय खरा थोडा अंकुश पण त्याजागी मस्त आराम,लाड कौतुक हे मिळतयं हे पण विसरून चालणार नाही. त्यामुळे कधी नवीन पोस्ट लिहीणं तर कधी जुन्या पोस्ट मध्ये अजून भर टाकून वरणात पाणी घालून वरण वाढवण्यासारखे सुरू आहे. अर्थात नवीन आजाराचं कौतुक पण खूप वाटतयं, त्या औषधांच्या,उपचारांच्या वेळा पाळणे, आज नवीन जागी कुठं दुखतयं कां ह्याचा शोध घेणे,आणि नोकरी वगळून उर्वरित वेळात मस्त आवडता आराम, ताणून देणं छान उपभोगतेयं. डॉ. म्हणलेत एवढी आजाराबाबत सकारात्मकता असल्यामुळे आजार चुटकीसरशी पळतोय,थोडक्यात काय तर हे आरामाचे दिवसही उरकत येताहेत.असो.
…नुकताच वाचनदिन झाला. त्या निमीत्ताने एक लता मंगशकरांवरील द्वारकानाथ सांझगिरी लिखित एक मस्त पुस्तक वाचायला हाती घेतलयं.आता हे पुस्तक हळूहळू सावकाश वाचावे लागणार, पुर्वीसारखे फडशापाडल्यागत वाचन आता करता येणार नाही.
वाचनाचं आणि माझं एक अलवार,सुंदर पण घट्ट जुळलेलं नातं. ना ह्या नात्यात कोणता स्वार्थ ना कुठलाही वेळेचा दुरूपयोग,असलीच तर ती फक्त चांगल्या गोष्टींची वैचारिक देवाणघेवाण. पुस्तक दिनाच्या निमित्ताने ह्या आमच्या अऩोख्या बंधांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
प्रत्येक पुस्तकाची वेगवेगळीच खासियत असते बघा. काही पुस्तकात समाविष्ट असलेलं कथानक, विषय हा बाजी मारून जातो तर कधी त्या पुस्तकाच्या लेखकाची लेखनशैली भाव खाऊन जाते. कधीकधी हे कथानक पटणारं असतं म्हणून आवडून जातं तर कधीतरी न पटणारं कथानक पण आपण ह्या अँगलने कधी विचारच केला नाही हे शिकवून जातं. काही पुस्तकांतील अलंकारिक,नटवलेली भाषा मेंदूत ठसते तर कधीकधी अगदी सहज साध्या सोप्या भाषेत मांडलेले विचार अगदी आपल्या मनात घर करून राहतात.काही वेळा पुस्तकात ह्या दोन्ही भट्टी एकदम जमून येतात मग तर ते पुस्तक म्हणजे क्या कहना. अगदी हातातून सोडवत नाहीत अशी पुस्तकं.
वाचनासारखी मनं रमवणारी, चांगल्या गोष्टी शिकवणारी,नवनवीन माहितीचे भांडार खुली करून देणारी दुसरी कुठलिही गोष्ट नाही. अर्थातच मी हे म्हणायचं, लिहायचं म्हणून नाही तर स्वानुभवाने मनापासून सांगतेयं.
वाचनाइतका दुसरा चांगला मित्र नाही. फक्त हवा मात्र ह्या मैत्रीचा मनापासून स्विकार, आवडीने जवळीक. फक्त एक नक्की ह्या मित्राची निवड जरा दर्जेदार आणि चोखंदळपणे करावी लागते. आपण जे मनापासून वाचतो नं ते आपल्या मनातून मेंदूपर्यंत थेट झिरपत जाऊन वसतं. ह्या वाचनवेडा वरुन मला वपुंच एक वाक्य आठवलं,”प्रत्येकाला कसलतरी वेड हे हवचं,वेड असल्याशिवाय शहाणी व्यक्ती होऊच शकत नाही”.
संध्याकाळी पाच साडेपाचची वेळ. मुंबईहून नाशिकला येतांना जो टोलनाका आहे त्यावर गाड्यांची गर्दी होती. या टोलनाक्यावर काही तृतीयपंथी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांपाशी थांबून पैसे मागत असतात. गाडीच्या काचा बंदच असतात बहुतेकांच्या. ज्यांच्या उघड्या असतात त्यांच्याकडे ही मंडळी थांबतात.
त्या दिवशी टोलनाक्यावर गर्दी आणि हे पैसे मागणारे तृतीयपंथी. मी बघत होते..शेजारीच असणाऱ्या गाडीच्या मागच्या सीटवर एक सुंदर तरुण मुलगी एकटीच बसली होती..काहीतरी वाचत असावी. तिचं लक्ष बाहेर नव्हतं, म्हणून इतर लोकं ज्यावेळी त्यांना बघून पटापट आपल्या गाडीच्या काचा बंद करत होते पण ती मात्र या सगळ्यापासून आपल्याच विश्वात गुंग होती..
एक हिरवी साडी नेसलेला तृतीयपंथी त्या गाडीच्या जवळ गेला..तिथेच एक गजरेवाला होता..त्याच्यापाशी थांबून त्याने टपोऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा भरगच्च गजरा घेतला..खरंतर गजरा घ्यावा असे मलाही वाटले होते. पण ‘त्याच्या’ समोर पूर्ण काच खाली करायला नको म्हणून जराशी काच खाली करून निदान फुलांचा वास तरी आपल्यापर्यंत पोहोचतोय का ते बघत होते.
गजरा घेऊन तो त्या मुलीच्या दिशेने वळला आणि तितक्यात त्या मुलीचे त्याच्याकडे लक्ष गेले..
तिचं देखणं रूप आणि अचानक झालेली नजरानजर…. त्याने एकदम तिला विचारले..” हे अनारकली…, किधर चली..?”
एक सेकंदही वेळ न लावता ती मुलगी तितक्याच मिश्किलपणे पटकन त्याला म्हणाली..” डिस्को चली..!!!”
त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एकदम हसू..अचानक आलेल्या या उत्तराने तो क्षणभर चपापला..त्याला अनपेक्षितच होते तिचे उत्तर..त्यालाच काय मलाही हसू आले ऐकून..खूप मनापासून..एकदम गंमत वाटली तिच्या या उत्तराची.
तो इतका इतका खुश झाला की त्याने सेकंदाचाही वेळ न लावता आपल्या हातातला मोगऱ्याच्या फुलांचा ओंजळभर गजरा तिला देण्यासाठी हात पुढे केला..एक क्षणभर तिच्या चेहऱ्यावर तो घेऊ की नको असे भाव आले..पण क्षणभरच… तिनेही तो गजरा दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला..तिची गाडी पुढे सरकली..
त्याने दुरूनच तिला म्हटले “ऐसेही खुश रहो बेटा..!” आणि तो दुसऱ्या गाडीकडे वळला..
माझ्या समोर नुकत्याच आणि अचानक घडलेल्या त्या घटनेचा अनुभव माझ्यासाठी इतका सुंदर होता की मी नखशिखांत थरथरून गेले !
एका हजरजबाबी उत्तराला इतकी दिलखुलास दाद मनापासून देणारा ‘तो’ आणि त्याला एक ‘माणूस’ म्हणून समजून घेणारी ‘ती’… मला त्या वेळेला जगातली अत्यंत सुंदर माणसं वाटली..
आपले किती गैरसमज आणि पूर्वग्रह असतात तृतीयपंथीय लोकांसाठी..पण माणसाची वृत्ती काही लिंगभेदावर अवलंबून नसते. मन सुंदर हवं..जे त्या हिरव्या साडीतल्या व्यक्तीचं होतं..नुसतं सुंदरच नाही तर दिलदार आणि रसिक सुद्धा ! — आणि त्या सुंदर मुलीचे मनदेखील अत्यंत सुंदर आणि पूर्वग्रह विरहित स्वच्छ होते..
छोट्याशा क्षणात घडलेल्या त्या माणुसकीच्या आणि कलात्म रसिकतेच्या मनोज्ञ दर्शनाने माझ्या मनातली जळमटं कायमसाठी स्वच्छ पुसली गेली आणि आजही माझ्यासाठी ती आठवण एक सगळ्यात सुंदर आठवण आहे !
लेखिका : डॉ. अंजली औटी.
(#कॅलिडोस्कोप )
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ इस्रोचे आणखी एक दमदार पाऊल ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
स्रोचे आणखी एक दमदार पाऊल :::
इस्रोचे पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यान बनविण्याच्या दिशेने दमदार पाऊल
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) २ एप्रिल २०२३ रोजी पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भू अवतरण मोहिमेची यशस्वी चाचणी घेतली. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील हवाई परीक्षण केंद्रात (aeronautical test range-ATR) ही चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आता प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भू अवतरणाची क्षमता इस्त्रोने प्राप्त केली असून पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यान मोहिमेची ही सुरुवात आहे असे म्हणायला हरकत नाही.
भारतीय हवाई दलाच्या चीनुक हेलिकॉप्टरचा एक अधिभार म्हणून RLV (reusable launch vehicle) ने सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी उड्डाण भरले आणि समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटरची उंची प्राप्त केली. RLV च्या मोहीम व्यवस्थापन संगणक आज्ञेनुसार (mission management computer command) ठरविलेले अवतरणाचे मापदंड (landing parameters) प्राप्त झाल्यावर RLV ला मध्यआकाशात चीनुक पासून वेगळे करण्यात आले. RLV ला वेगळे करण्याच्या दहा मापदंडमध्ये स्थिती, वेग,उंची आदि गोष्टींचा समावेश होतो. RLV ला वेगळे करणे स्वायत्त (autonomous) होते. एकात्मिक दिक् चलन, मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणालीचा (integrated navigation, guidance and control) वापर करून RLV ने उपगम (approach) आणि अवतरण (landing) प्रयुक्त्या (maneuvers) केल्या आणि भारतीय वेळेनुसार सात वाजून चाळीस मिनिटांनी ATR च्या धावपट्टीवर यशस्वीरीत्या स्वायत्त अवतरण केले.
अंतराळ वाहन पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना जी परिस्थिती असते अगदी तशाच परिस्थितीत म्हणजे उच्च वेग, विनाचालक आणि परतीच्या मार्गावरून अचूक अवतरण अशा परिस्थितीत -जणूकाही अंतराळ वाहन अंतराळातून परतत आहे- स्वायत्त अवतरण पार पाडण्यात आले.
कक्षीय पुनर्प्रवेश अंतराळ वाहनास त्याच्या परती च्या मार्गावर जमीन सापेक्ष गती (ground relative velocity), अवतरण प्रणालीच्या ऋण प्रवेगाचा दर (sink rate of landing gears- हा साधारण तीन फूट प्रतिसेकंद असतो ) आणि विमान क्षितिज समांतर असतांना त्याच्या दिशा बदलाचा अचूक दर (precise body rate – हा सर्वसाधारण तीन डिग्री प्रती सेकंद असतो ) वगैरे जे अवतरण मापदंड (landing parameters) असायला हवेत त्या सर्वांची या प्रयोगात पूर्तता झाली. RLV LEX (Reusable Launch Vehicle Landing Experiment) साठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. त्यामध्ये अचूक दिक् चलन हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्युडोलाईट1 प्रणाली, का बँड रडार अल्टीमिटर, NavIC रिसिव्हर, स्वदेशी अवतरण प्रणाली, एरोफॉइल हनिकोंब फिन आणि ब्रेक पॅरेशूट प्रणाली वगैरे गोष्टींचा समावेश होतो. या प्रयोगामुळे वरील सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सिद्धता आपण करू शकलो.
जगात पहिल्यांदाच एखादे विमान हेलिकॉप्टरद्वारा ४.५ कि. मी. उंचीवर नेऊन धावपट्टीवर स्वायत्त अवरोहण करण्यासाठी सोडण्यात आले. RLV हे एक अंतरीक्ष विमान असून त्याचे उच्चालन व अवरोध यांचे गुणोत्तर (lift to drag ratio) कमी असते. त्यासाठी उपगम (approach) समयी सर्पण कोन (glide angle) मोठा असणे आवश्यक असते. हे साध्य करण्यासाठी अतीवेगाने म्हणजे साधारण ताशी ३५० कि.मी. ने अवतरण करावे लागते.
LEX मध्ये विविध स्वदेशी प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. स्युडोलाईट प्रणालीवर आधारित स्थानिक दिक् चलन(navigation) प्रणाली, उपकरणयोजना (instrumentation) आणि संवेदक (sensors) प्रणाली वगैरे अनेक गोष्टी इस्रोने विकसित केल्या आहेत. का बँड रडार अल्टीमीटर सहित असणाऱ्या अवतरणाच्या जागेच्या अंकीय उत्थान प्रारूपामुळे (Digital Elevation Model-DEM) उंचीसंबंधीची अचूक माहिती मिळते. विस्तृत पवन बोगदा चाचण्या (Extensive wind tunnel tests) आणि CFD प्रतिरूपविधानांद्वारा (Simulations) उड्डाणाआगोदरच RLV चे वायुगतिकी वैशिष्ट्यचित्रण (Aerodynamic Characterization) करता आले. RLV LEX साठी विकसित केलेल्या समकालीन (Contemporary) तंत्रज्ञानामुळे इस्रोच्या इतर वापरत असलेल्या प्रक्षेपकांच्या प्रक्षेपणाच्या खर्चात बचत होणार आहे.
ISRO ने मे २०१६ मध्ये HEX (Hypersonic Flight Experiment) मिशनमध्ये RLV-TD (Reusable Launch Vehicle-Technology Demonstrator) या विमानाच्या पुन: प्रवेशाचे प्रात्यक्षिक दाखवले होते. हायपरसॉनिक सब-ऑर्बिटल वाहनाच्या पुन:प्रवेशाने पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन विकसित करून इस्रोने एक मोठी उपलब्धी प्राप्त केली होती. HEX मध्ये, वाहन बंगालच्या उपसागरावर एका काल्पनिक धावपट्टीवर उतरले. धावपट्टीवर अचूक लँडिंग हा एक पैलू होता जो HEX मिशनमध्ये समाविष्ट नव्हता. LEX मोहिमेमध्ये अंतिम उपगम टप्पा (Final approach phase) गाठता आला त्या बरोबरच परतीच्या उड्डाणमार्गाने पुनःप्रवेशासाठीचे स्वायत्त, उच्चगतीच्या (३५०कि.मी.प्रती तास) अवतरणाचे प्रात्यक्षिक पण पार पाडण्यात आले. LEX ची सुरुवात २०१९ मध्ये एकात्मिक दिक् चलन चाचणीने झाली. त्यानंतरच्या वर्षांत अनेक अभियांत्रिकी प्रारूप चाचण्या व बंधनस्त टप्पा चाचण्या (Captive Phase Tests)पार पाडण्यात आल्या.
ISRO सोबत IAF, CEMILAC, ADE, ADRDE यांनी या चाचणीसाठी हातभार लावला. IAF टीमने प्रोजेक्ट टीमसोबत हातात हात घालून काम केले. डॉ.एस उन्नीकृष्णन नायर, संचालक, व्हीएसएससी, आणि श्री श्याम मोहन एन, कार्यक्रम संचालक, एटीएसपी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जयकुमार एम, प्रकल्प संचालक, RLV हे मोहिमेचे संचालक होते आणि श्री मुथुपांडियन जे, सहयोगी प्रकल्प संचालक, RLV हे मोहिमेचे वाहन संचालक होते. यावेळी ISTRAC चे संचालक श्री रामकृष्ण उपस्थित होते. अध्यक्ष, ISRO/सचिव, DOS श्री एस. सोमनाथ यांनी चाचणी पाहिली आणि सर्वांचे अभिनंदन केले.
LEX मुळे भारताचे पुन: वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाचे स्वप्न वास्तवतेकडे जाण्यास सुरुवात झाली आहे.
टीप :
1.स्युडोलाईट – हे स्युडो सॅटेलाईट शब्दाचे संक्षिप्त रुप आहे. हा खरा उपग्रह नसतो पण सर्वसाधारणपणे उपग्रहाच्या कार्यक्षेत्रात असणारी कामे करतो. बहुतेकदा स्युडोलाईट्स हे लहान पारेषकग्राही-transceivers- असतात व त्यांचा उपयोग GPS प्रणालिला पर्यायी प्रणाली स्थानिक पातळीवर निर्माण करण्यासाठी केला जातो.
☆ ध चा मा ?… लेखक श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
आमच्याकडे एअरपोर्टला (इंडियन एयरलाईन्स) कधी कोणती घटना अचानकपणे वावटळीसारखी अंगावर येईल, याबद्दल भविष्य वर्तवणे मोठ्या मोठ्या ख्यातनाम ज्योतिषाचार्यांनाही शक्य होणार नाही.
त्या दिवशी पण तेच झाले. दुपारच्या (आफ्टरनून) शिफ्टला मी ड्युटी मॅनेजर होतो. आमची सर्व डिपार्चर फ्लाईटस व्यवस्थित वेळच्या वेळी निघाली होती. येणारी फ्लाईटस पण वेळेवर होती. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय उत्साही, आनंदी मूडमध्ये होते. संध्याकाळच्या पांच वाजताच्या हैद्राबाद फ्लाईटची “प्रवाश्यांनी विमानाकडे प्रस्थान करावे” ही अनाऊन्समेंट झाली होती. तेवढ्यात वॉकीटॉकीवर बोर्डिंग पॉईंट स्टाफचा आवाज आला. “Coordination Cell, Base Coordination, Duty Manager all to note, a lady passenger wants to cancel her journey to HYD on flight IC117 on health ground.”
हा मेसेज ऐकताच मी कपाळाला हात लावला. या क्षणाला प्रवास रद्द करणे म्हणजे त्या महिलेचे बॅगेज विमानातल्या बॅगेज होल्डमधून असंख्य बॅगमधून शोधून खाली उतरवायचे. मग बोर्डिंग लिस्टमध्ये फेरफार करायचे. म्हणजे एकूणच फ्लाईटला उशीर होणार.
पांचच मिनिटांत पुन्हा वॉकीटॉकीवर त्याच स्टाफचा आवाज घुमला. “Duty Manager please rush to Boarding gate area. It’s an emergency situation. The lady passenger is having heated arguments with Tarmac Officer Bannerjee.”
आता काय नवीन प्रॉब्लेम आला? मी बोर्डिंग गेटच्या दिशेने धांव घेतली. आमचा बॅनर्जी नांवाचा ऑफिसर त्या महिला प्रवाशाशी कांहीतरी बोलत होता. ती महिला प्रचंड भडकलेली होती. मला कांहीच कळेना की तिची सफर रद्द करण्यामध्ये एवढं भडकण्यासारखं काय झालं असेल. मी त्या महिलेला कांही विचारणार तोच बॅनर्जी तिला म्हणाला “ ऑप इतना गडम क्यूँ होता हाई म्हातारीअम्मा ? हाम आप को सिर्फ टांग उपर करने को बोला.”
यावर ती महिला उसळली. “बेशरम आदमी हम को टांग उपर करने को बोलता है ? मै तुम को जमीन मे जिंदा दफना देगी. एयरलाईन्स का ड्रेस पेहना तो खुद को बादशहा समझाने लगा क्या ? और मै तुम को बुढ्ढी लगती हूँ ?”
मी त्या महिलेला हाताच्या इशाऱ्याने शांत व्हायला सांगितले. “क्या हुवा बेहन जी ? आप मुझे बताइये . मै आप की मदद करुंगा . प्लीज आप गुस्सा मत होईये. इन्हे हिंदी मे ठीक तरह से बातचीत करने नही आती. इसलिये ‘मोहतरमा’ के बदले ये ‘म्हातारी अम्मा’ कह गये. मै उन की तरफ से माफी मांगता हूं . ”
माझ्या या सांगण्यावर ती महिला थोडी शांत झाली पण चढ्या आवाजांत म्हणाली “मेरे दांत मे बहोत दर्द है . मै सफर नही कर सकुंगी. बस इतना मैने इन जनाब से कहा, तो उन्होने मुझे टांग उपर करने को कहा. क्या ऐसे बेहुदा बाते करनेवाले अफसर आपने तैनात किये है ? मै उपरतक इनकी कम्प्लेंट करूंगी.”
मला आश्चर्याचा धक्का बसला. बॅनर्जी म्हणजे देवमाणूस. त्याच्या तोंडात कधी शिवीसुद्धा नसायची. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्याच्या बोलण्यात सदैव असायची. हा माणूस असं कांहीतरी अभद्र बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.
मी बॅनर्जीला म्हणालो, “यार पहलेही सिच्युएशन खराब है. और क्यूँ इसे बिगाड रहे हो ? इस लेडी को टांग उपर करने को क्यूँ कहा आप ने ?”
यावर बनर्जीने जे उत्तर दिले ते ऐकून मला हंसावे की रडावे ते कळेना.
तो म्हणाला “ मुझे डेंटल प्रॉब्लेम की एक आयुर्वेदिक दवा मालूम है. मुझे भी कभी कभी ये प्रॉब्लेम होती है. इसलिये मै वो दवा हमेशा मेरे पास रखता हूं. मैने लेडी को बोला टांग उपर करो. असं म्हणून बनर्जीने आपली अख्खी जीभ बाहेर काढली. ये … ये … इस को बोलते है ‘टांग’ रेगे साब. वो ‘टांग’ उपर करेगी तो मुझे मालूम पडेगा स्वेलिंग किधर है. फिर उधर ये गोली रख के मूंह बंद रखनेका. बस्स दस मिनिटमे दोर्द गायब होता है.”
अरे देवा !! म्हणजे हा सद्गृहस्थ जीभेला ‘टांग’ म्हणत होता, टंगच्या ऐवजी. आणि ती महिला हिंदी ‘टांग’ समजली होती. आता चारचौघात “टांग उपर करो” म्हटल्यावर कोणीही भडकेल. पण ‘टंग’चा बंगाली उच्चार “टांग” होऊ शकतो, ‘वडा’चा उच्चार ‘बोडा’ होऊ शकतो, अनिलचा उच्चार ‘ओनील’ होतो, ‘चाय पिओगे’चं ‘चाय खाबे’ होऊ शकतं, ‘कवी’चा ‘कोबी’ होऊ शकतो हे मला ठाऊक होते. मी त्या महिलेला हळू आवाजांत हा सर्व भाषिक घोटाळा नीट समजावून सांगितला. बॅनर्जीने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या आणि त्या दुखऱ्या जागी ठेवून द्यायला सांगितल्या. ती महिला हे ऐकल्यावर खूप ओशाळली. शाब्दिक गैरसमजातून एका सज्जन माणसाला आपण नको नको ते बोललो, याचा खेद तिला होत होता. पुन्हा पुन्हा बॅनर्जीला सॉरी … सॉरी … म्हणत, ती विमानाच्या दिशेने चालू लागली. बॅनर्जीच्या ‘टांग’ने आमच्या फ्लाईटच्या उड्डाणात अडवली जाणारी कॅन्सलेशनची ‘टांग’ नाहीशी केली. पण यानंतर आमच्या ऑफिसांत ‘टांग उपर करो’ हा परवलीचा शब्द झाला. कोणी साधं ‘डोकं दुखतं आहे’ असं म्हणाला, तरी समोरचा त्याला म्हणायचा ‘टांग उपर करो’ आणि पाठोपाठ सर्वांच्या हास्याचा धबधबा कोसळायचा.
लेखक : श्री अनिल रेगे
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जय जय महाराष्ट्र माझा!… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!
एक मे, महाराष्ट्र दिन! माझ्या लाडक्या महाराष्ट्राचे पोवाडे मुक्तपणे गायचा दिवस! ज्या पवित्र भूमीत मी जन्म घेतला, त्या भूमीचे स्तवन, कीर्तन, पूजन, अर्चन इत्यादी कसे करावे? त्यापेक्षा या मंगलमय दिनी शब्दपुष्पांची सुंदर माळच तिच्या कंठात घालते!
महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्म घेतला ही माझी पूर्वजन्मीची पुण्याईच! या महान महाराष्ट्र देशाची महती अन श्रीमंती मी एका मुखाने काय आणि कशी वर्णावी? त्यासाठी प्रतिभावंत शब्दप्रभू गोविंदाग्रज यांनी रचलेले मनमोहक महाराष्ट्राचे महिमा-गीत “मंगल देशा” ऐकायला हवे. महाराष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र, हा कोता विचार मनात आणणे, म्हणजे प्रत्यक्ष महाराजांचा अपमान करणे होय. त्यांच्या संघटन शक्तीचे उदाहरण जरी घेतले तरी त्यांची दूरदृष्टी आपल्याला स्तिमित केल्याशिवाय राहत नाही. त्यांचे शौर्य, रणकौशल्य, पराक्रम, बुद्धिमत्ता, इत्यादी इत्यादी विषयी मी पामराने काय लिहावे, केवळ नतमस्तक व्हावे अन “शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप”! आपल्या मूठभर फौजेला हाताशी धरून “गनिमी कावा” अंमलात आणीत या “दक्खन के चूहे” ने औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले. त्याचे वर्चस्व झुगारून “स्वराज्याचे तोरण” बांधणारे आपले खरे हृदयसम्राट गो-ब्राम्हण प्रतिपालक असे शिवाजी महाराज!
आमची लाडकी दैवते म्हणजे, विठू माऊली, साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा इत्यादी इत्यादी! माझा महाराष्ट्र देश हा संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेला देश आहे. “पाऊले चालती पंढरीची वाट” या हाकेनिशी संतांच्या मागे हजारोंनी दिंडीत सामील होत “राम कृष्ण हरी” चा टाळ मृदुंगासहित गजर करणारे वारकरी आजही त्याच भक्तीने वारी करीत हा अनमोल भक्तीचा नजराणा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करीत आहेत. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय आणि समाज प्रबोधनाची श्रीमंती काय वर्णावी? फक्त नाव जरी उच्चारले तरी आपोआपच “तेथे कर माझे जुळती”! आपण ज्या स्वातंत्र्याचा मनमुराद उपभोग घेतोय, ते मिळवून देण्यात येथील अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. किती म्हणून नावे घ्यावीत! आज त्यांच्या स्मृती-चरणी नतमस्तक होऊ या!
अभिजात भाषा आणखी किती समृद्ध असू शकते? सरकारदरबारी “मराठी” या माझ्या मायबोलीला हा दर्जा केव्हा मिळेल? या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य म्हणजे साक्षात अमृत ठेवाच! तिची थोरवी गातांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “माझ्या मराठीचे बोल कवतुके। परी अमृतातेंही पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें। मेळवीन॥“ ज्या महाराष्ट्रात गर्भश्रीमंत सुविचारांची अन अभिजात संस्कारांची स्वर्णकमळे प्रफुल्लित आहेत, जिथे भक्तिरसाने ओतप्रोत अभंग अन शृंगाररसाने मुसमुसलेली लावण्यखणी लावणी ही बहुमोल रत्ने एकाच इतिहासाच्या पेटिकेत सुखाने नांदतात, तिथेच रसिकतेच्या संपन्नतेचे नित्य नूतन अध्याय लिहिले जातात.
हे अभिजात साहित्य रचणारे हरी नारायण आपटे, आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, किती म्हणून नावे घ्यावीत! या साहित्याचे सोने जितके लुटावे तितके वृद्धिंगत होणारे! महाराष्ट्राची संगीत परंपरा अतिशय जुनी अन समृध्द आहे. संगीत नाटकांची परंपरा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खासियत आणि मक्तेदारीच समजा ना! स्त्रीसौंदर्याचे नवथर निकष निर्माण करणारे बालगंधर्व, त्यांचे आम्हा रसिकांना कोण अप्रूप. ज्यांच्या स्त्रीसुलभ विभ्रमांचे इथल्या स्त्रियांनीच अनुकरण करावे असा रसिकांना वेड लावणारा हा एकमेवाद्वितीय कलाकार!
मुंबापुरी अन कोल्हापूर म्हणजे सिनेसृष्टीची खाणच! रजतपटाचा “प्रथम पटल” निर्माण करणारे दादासाहेब फाळकेच! इतर प्रांतातून मुंबईच्या मायानगरीत स्थायिक झालेले अन कर्माने मराठीची बिरुदे अभिमानाने मिरवणारे संगीतकार, गायक, गीतकार अन कलाकारांची तर यादी संपता संपत नाही. अश्या या महाराष्ट्राला १ मे १९६० रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री होते, यशवंतराव चव्हाण!
आता आपण महाराष्ट्र दिनाचा इतिहास जाणून घेऊ या. त्याला काळी चौकट आहे हुतात्म्यांच्या रक्तलांछित बलिदानाची! २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या आसपास तणाव जाणवत होता. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या अन्यायकारक निर्णयामुळे मराठी माणसाचा संताप शिगेला पोचला होता. सर्वदूर होणाऱ्या सभांमधून या निर्णयाचा जाहीर निषेध होत होता. याचा परिणाम म्हणजे मराठी अस्मिता जागी झाली. सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर मोठा जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून अत्यंत त्वेषाने घोषणा देत, फ्लोराफाउंटनच्या ठिकाणी गोळा झाला. तो पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र मोर्चेकरी बधले नाहीत. मग मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले आणि शेवटी १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. या १०६ हुतात्म्यांनी जिथे बलिदान केले त्या फ्लोरा फाउंटनच्या चौकात १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. आता तो ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखला जातो.
१ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही ओळखला जातो. ४ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील कामगारांनी आठ तास काम करण्यास नकार दिला आणि आपल्या न्यायहक्कासाठी संप केला, शिकागोत अनेक कामगार ठार झाले. त्यानंतर १८८९ मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली. म्हणूनच दरवर्षी जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
मी जन्मले आणि वाढले या पुण्य-पावन मातीत, जिथे सुवर्णालंकार अन रत्ने तितकी नव्हती, मात्र होते सुवर्णकांचनासम झळाळणारे अस्सल संस्काराचे तेज! पुस्तके वाचता-वाचता, नाटके बघता-बघता अन वय वाढता- वाढता ओळख पटली इथल्या साहित्यिक वैभवाची! मन मोहोरून विचारायचे; आचार्य अत्रे लिखित ‘कऱ्हेचे पाणी’ चाखू, की, गडकऱ्यांच्या सुधाकर अन सिंधूच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या ‘एकच प्याल्याचे’ रंग रंगमंचावर बघू, की पु ल देशपांडेंच्या त्या अवखळ फुलराणीचे “तुला शिकवीन चांगलाच धडा!” हे प्रसिद्ध स्वगत आत्मसात करू, की ‘मृत्युंजयाच्या’ उत्तुंग विविधरंगी व्यक्तिमत्वाने स्तिमित होऊ! “घेता किती घेशील दो कराने” अशी तेव्हा माझी अवस्था व्हायची! नागपूरच्या नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकलचे शिक्षण घेतले अन चाकरी केली तिथेच, भरून पावले अन आयुष्य सार्थकी लागले. इथल्या मातीचे ऋण चुकवण्याचा विचार पण मनात येत नाही, कसा येणार? इतके विशाल आहे ते! ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना करते की, वारंवार याच पवित्र मातीत जन्मावे अन तिच्याच कुशीत शेवटी विश्रांती घ्यावी, यापरीस सौभाग्य ते कोणते!
कुणीतरी म्हटले आहे की ठेच लागल्यावर “आई ग!” म्हणून कळवळतो तो खरा मराठी माणूस, पण आता इंग्रजाळलेले ओरिजिनल मराठी बॉय आणि गर्ल म्हणतात “ओह मम्मा!” ते बी मराठीच हायेत की! परप्रांतातून आलेले, येथील मातीशी नाते जोडून आता महाराष्ट्रीयन झालेल्यांचे काय? (याचे उत्तर जाणून घ्यायला अवधूत गुप्ते यांचे गाणे अवश्य ऐका अन पहा, ते देखील मनोभावे गाताहेत “जय जय महाराष्ट्र मेरा!”) शेवटी मने जुळली की मातीशी नाते जुळणारच की भावा! बंबैय्या मराठीची सवय झाली की, सारे सारे कसे सोपे होते!
मंडळी, हा दिवस केवळ सार्वजनिक सुट्टी म्हणून उपभोगण्याचा नसून मराठी माणसाची अस्मिता जागवण्याचा आणि ती जपण्याचा आहे. मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतांना धोतर, फेटे, नऊवार साडी, नथ इत्यादी पारंपरिक वेषभूषांपुरतेच आणि मराठी पाट्यांपुरतेच मराठीपण जपायचे की त्यापलीकडील आपला जाज्वल्य इतिहास देखील आठवायचा हे आपले आपणच ठरवणे योग्य!!!
चार दिवसांपूर्वी झाडांची माती बदलण्यासाठी वेळ काढला. सगळी झाडं झाली, एक वेल राहिला- गोकर्णचा. त्याला फुलं कमी यायला लागलेली, पण वेल काढायचा म्हणजे रिस्कच. त्यात एकाच कुंडीत पाच बिया लावून त्या एकाच दोऱ्याने वर गेलेल्या. एकात एक गुंतलेल्या पाच वेलींना बाहेर काढून परत मातीत रुजवायचं म्हणजे दिव्यच वाटलं. फुलं नाही दिली तरी जिव्हाळा जमला होता त्यांच्यासोबत. काढून परत लावल्याने त्या वेली जगतील की नाही समजत नव्हतं. रिस्क घेतली आणि बदलली माती.
संध्याकाळपर्यंत वेल सुकल्यासारखी झाली. जीव झुरझुरला. सकाळी उठल्या उठल्या वेलीकडे गेले. बघितलं तर वेल पूर्ण सुकला, जीव गेल्यासारखा वाकला होता. खूप वाईट वाटलं.पण पाणी घालत राहिले, आणि आज चार दिवसांनी त्याच्यात हिरवेपण दिसू लागलं.
त्यावरून असं वाटलं की आपण बायका पण त्या झाडासारख्याच असतो .काही वेलीसारख्या नाजूक, तर काही डेरेदार – काही रुक्ष, तर काही अल्लड, सुबक, सुंदर – काही नुसताच दिखावा, तर काही दिसायला बेढब पण उपयुक्त – काही लाजऱ्या -बुजऱ्या, तर काही स्वतःच्या अस्तित्वाने आकर्षित करणाऱ्या – काही बोचऱ्या तर काही मुलायम.
आपणही लहानपणी माहेरी रुजतो, फुलतो, बहरतो. लग्नानंतर आपली पाळेमुळे उखडून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला रुजवलं जातं. आपणही या वेलीसारखं थोडं सुकतो, बिचकतो ,नवीन बदल पचवतो आणि आपली मुळे रोवायला सुरुवात करतो, बहरायला लागतो. तिथं आपल्याला खत,पाणी, वातावरण कसं मिळतं त्यावर प्रत्येकीचं बहरणं वेगवेगळे होतं. काहींना खूप खत, पाणी, काळजी मिळते, त्या खूप बहरतात, फुलतात. काहींना मिळतं पाणी खत, पण त्या दुर्लक्षित असतात. अशावेळी त्या फक्त वाढतात. पण फुलण्याची, बहरण्याची उमेद नसते. त्या स्वतःला हरवून बसतात. काहींना काहीच मिळत नाही. त्या हळूहळू एक एक पान गळून गळून जातात.
असे हे झाडांशी बाईपण जुळतं-
लेखक : सुश्री प्रिया कोल्हापुरे
मो. -9762154497
संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, “येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा”.. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं !
मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!
दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात … पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते… सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो …भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं… आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!
रुसलेल्या रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते.. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!
घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात !! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घराच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!
तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”…!
शेवटी “बाई” घराचीही “आई”च असते..!! हो नं!
लेखक : अज्ञात
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक मे. हा दिवस प्रत्येक कामगारासाठी आणि प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती साठी खास आनंदाचा,सोनियाचा दिवस. कामगार दिनाबद्दल बोलायचं तर ह्या दिवशी कामगारांसाठी फायद्याची आणि फायदा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्याची रुपरेषा आखली गेली. आधी कामगार वर्गावर जी आपबिती होती नं ती नुसती कळूनही किंवा वाचूनही हळहळ वाटत होती.कामगारांचा आधी अक्षरशः कोणीही वाली नव्हता. पिळवणूक म्हणजे कशी असेल हे जेव्हा आम्ही लोकं आठ तास काम करुन माना टाकतो नं तेव्हा पूर्वी हा कामगार वर्ग पंधरा पंधरा तास नाँनस्टाँप काम करीत होता नं तेव्हा खरी जाणीव होते. आजच्या सुधारणांमुळे आम्ही काम करु त्या प्रमाणात, वाढत्या महागाई नुसार आम्हाला त्या कामाचा मोबदला मिळतोयं पण खरचं पूर्वी जी वेठबिगारी होती नं ती फार भयानक होती हे आधीच्या कामगार मंडळींकडूनच समजतं आणि त्यांनी सहन केलेल्या आणि जिद्दीने तोंड दिलेल्या संकटाची कल्पना येते आणि तशी जाणीवही होते. बरं ह्या रुपरेषेत अनेक नानाविध मुद्द्यांमध्ये बदल फायदेशीर बदल करण्यात आले. ह्या मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने बालकामगारांवर बंदी, महिला कामगारांच्या कामावर मर्यादा, तसेच रात्रीच्या व धोक्याच्या कामासाठी वेगळे नियम, कायद्याने साप्ताहिक सुट्टी, कामाचा मोबदला वस्तू रुपात न मिळता तो नगदी स्वरूपात मिळणे, समान काम तर समान वेतनं इत्यादी नियम अंतर्भूत केल्या गेलेत.भारतात कामगार दिनाची सुरवात 1 मे 1923 पासून झाली.
महाराष्ट्र दिन म्हंटला की ह्या बद्दलच्या आठवणींची सुरुवात शालेय जीवनापासून होते.
ह्या दिवशी शाळेत सकाळी झेंडावंदन व्हायचे. एक मे नंतर मग दोन तीन तारखेकडे निकाल लागून मग उन्हाळी सुट्ट्यांची सुरूवात व्हायची
1 मे ह्या दिवशी खास ऐकू येणारी गीतं म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं”बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा”, आणि दुसरं गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी ह्यांच “प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा”.
अन्याय, पिळवणूक ह्यांची सुट्टी होऊन कामगारांना स्वावलंबनाने रोजीरोटी मिळवून देणारा हा कामगार दिवस व महाराष्ट्रातील जनतेला आपलं असं वेगळं अस्तित्व, जागा मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र दिन चिरायू होवो.