मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय अर्वाचीन गणिती : भास्कराचार्य आणि रामानुजन” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय अर्वाचीन गणिती : भास्कराचार्य आणि रामानुजन☆ श्री जगदीश काबरे ☆

गणिताच्या क्षेत्रातील भारतीय गणितज्ञांचा इतिहास मागे वळून पाहिला तर थोर भारतीय गणिततज्ञांची मालिकाच डोळ्यांसमोर येते. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, माधवाचार्य, नीलकंठ सोमया, इ. या मालिकेत आपला ठसा जगावर उमटवणारे जेष्ठ व श्रेष्ठ गणितज्ञ ‘भास्कराचार्य द्वितीय’ यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. 

भास्काराचार्यांचा जन्म इ.स. १११४ मध्ये उज्जैन जवळील ‘विज्जलविड’ येथे झाला. भास्कराचार्यांचे ज्योतिषशास्त्रातील (त्या काळात खगोलशास्त्र ही संज्ञा अस्तित्वात नव्हती. म्हणून आकाशातल्या ज्योतींचा अभ्यास करणारे ते ज्योतिषी, असे सगळ्या खगोलशास्त्रींना म्हटले जायचे.) त्यांच्या घराण्यात पूर्वीच्या सहा पिढ्या गणिताच्या अभ्यास करणाऱ्या होत्या. त्यापैकीच ‘ब्रम्हगुप्त’ हे एक होते. भास्कराचार्य हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. त्याचे शिक्षण त्याच्या वडिलांजवळ झाले असे त्यांनी खालील बीजगणितांतल्या श्लोकात गुंफले आहे.

आसीत् महेश्वर इति प्रथितः पृथिव्याम् । 

आचार्यवर्यपदवीं विदुषां प्रपन्नः ।। 

लब्धावबोधकलिकां तत एव चक्रे । 

तज्जेन बीजगणितं लघु भास्करेण ।।

या श्लोकावरून त्यांचे वडील महेश्वर हे त्यांचे गुरु होत. त्यांच्यापाशीच भास्कराचार्यांनी बीजगणिताचे पाठ घेतल्याचे ते सांगतात. 

त्यांचा काव्य, व्याकरण, गणित, ज्योतिष वगैरे विषयांचा व्यासंग सर्वांग परिपूर्ण होता. पूर्वकाळी आचार्य पदवी मिळविण्यास किती ग्रंथांचे अध्ययन करावे लागत असे हे २६१ व्या श्लोकावरून समजून येते. गणेश दैवज्ञाने आपल्या टीकेत त्यांना ‘गणकचक्रचूडामणि’ ही पदवी अर्पण केली आहे. गणित व ज्योतिष हे विषय शिकविण्यांत ते निष्णात होते. त्याकाळची विद्वान मंडळी भास्कराचार्याच्या शिष्यांशीं वादविवाद करण्यास कचरत असत हे ताम्रपटांतील श्लोकांवरून दिसून येतें. भास्कराचार्याचा ‘सिद्धांत शिरोमणी’ हा गणितावरील प्रमुख ग्रंथ आहे. हा ग्रंथ त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी लिहून पुरा केला. या ग्रंथाचे लिलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय, गोलाध्याय असे चार खंड आहेत. 

ज्याप्रमाणें ‘लीलावती’ हा अंकगणितावरील उत्कृष्ट ग्रंथ आहे, त्याचप्रमाणें ‘बीजगणित’ हे अव्यक्त गणितावरचे उत्कृष्ट पुस्तक आहे. या पुस्तकावरही अनेक टीकाग्रंथ झाले. जगांतील प्रमुख भाषांतून लीलावती व बीजगणित यांची भाषांतरे झालेलीं आढळतात. बीजगणिताचे फारसी भाषांतर शहाजहानच्या कारकीर्दीत अताउल्ला रसीदी या ज्योतिषाने इ. स. १६३४ मध्ये केले. स्ट्राची या इंग्रज लेखकाने १८१३ साली इंग्रजी भाषांतर केले. ग्रहगणिताध्यायांत चंद्रसूर्यांच्या गति, भ्रमणें, ग्रहणें वगैरे गहन व क्लिष्ट विषय आलेले आहेत. याशिवाय भास्कराचार्याचे अनेक ग्रंथ आहेत. ते म्हणजे ‘करणकुतूहल’, ‘सर्वतोभद्रयंत्र’ ‘वसिष्ठतुल्य’ व ‘विवाहपटल’ हे होत. या सर्व ग्रंथाच्या मूळ हस्तलिखित प्रती आज आपल्याच अनास्थेमुळे कुठेच उपलब्ध नाहीत. प्राचीन वस्तूंचे जतन कसे करावे ही कला आम्हा महाराष्ट्रीयांना ठाऊक नाही. तथापि लीलावतीची सटीक हस्तलिखिते अजून उपलब्ध आहेत हेही नसे थोडके.

पायथागोरसच्या प्रमेयाची काटकोन त्रिकोणासंबंधीची एक सिद्धताही त्यांनी मांडली होती. ही सिद्धता कांही गणित तज्ञांच्या मते पायथागोरसच्या मूळ सिद्धतेशी वरीच मिळती जुळती आहे. गणितातील अनंत या संकल्पनेचा सर्वात पहिला सदर्भ त्यांच्या ‘सिद्धांत शिरोमणी’ या ग्रंथातील बीजगणित ह्या खंडात आलेला आहे. पुढे सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाची फार्सी, इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, तामीळ भाषांत भाषांतरे झाली आहेत.

लीलावतीतील श्लोकांतून भास्कराचार्यांनी अनेक प्रकारचे कौशल्य दाखविले आहे. धर्म, वेद, पुराणे, महाकाव्ये यांची जाताजाता विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश असल्यामुळे त्यांनी गणिताच्या प्रश्नात या सर्व गोष्टींचा वापर केलेला आहे. ‘पार्थकर्णवधाय’ हा श्लोक रथासंबंधीं सर्व माहिती देण्यास उपयुक्त आहे. अर्जुनाचा कर्ण हा भाऊ असला तरी प्रामुख्यानें वैरी होता, ही गोष्ट विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणली गेली आहे. पण याहीपेक्षा ह्या श्लोकांत प्रत्यक्ष लढाईचा देखावा वाचकांपुढे ठेवला आहे. कालिदासाच्या शाकुंतलांतील ‘ग्रीवाभंगाभिरामम्’ या श्लोकाशी वरील श्लोकाची तुलना होऊ शकेल. हंसांच्या समूहाचे वर्णन किंवा हत्तींच्या कळपाचे वर्णन, भुंग्यांच्या कळपाची संख्या, पाळलेल्या मोराचे सापावर तुटून पडणे, कमळ वाऱ्याच्या झोताने पाण्यात बुडणे इत्यादि सर्व गोष्टी विद्यार्थ्यांस निसर्ग सान्निध्यांत घेऊन जातात व विषय कंटाळवाणा होत नाही. 

भास्कराचार्यांनी कोठेच सूत्रसिद्धि दिलेली नाही, याचे कारण काय असेल? अर्थात् पूर्वीचे आचार्य सूत्रसिद्धि देत नव्हते. कारण ते सूत्रे काव्यामध्ये गुंफत होते. म्हणून त्यांना सूत्रसिद्धि आवश्यक वाटत नव्हती. भास्कराचार्यांनी पूर्वसूरींच्या पावलावर पाऊल ठेवून सूत्रसिद्धि दिली नाहीं, पण उदाहरणे मात्र भरपूर दिलेली आहेत. आर्यभट्ट ते भास्कराचार्य या ७०० वर्षाच्या काळात शास्त्रीय ग्रंथ कविता रूपात लिहिले जात व सिद्धांताचे स्पष्टीकरण किंवा सिद्धता देण्याच्या खटाटोपात कोणीच पडत नसे, याला भास्कराचार्यही अपवाद नव्हता. पण त्यामुळे भारतीय गणितशास्त्राचे केवढे नुकसान झाले आहे हे आता आपल्या लक्षात येत आहे. कारण सैद्धांतिक उपपत्ती लिहून तिचे दस्तऐवजीकरण करण्याची कमतरता पाश्चात्य शास्त्रज्ञांनी भरून काढल्यामुळे ते आज विज्ञानात अग्रेसर ठरले आहेत.

भास्कराचार्य हे दृकप्रत्ययवादी ज्योतिषी होते. ग्रहणे, युत्या, वगैरे अंतरिक्ष चमत्कार पंचांगांत दिलेल्या वेळेवर होत नसतील तर पंचांगे सुधारली पाहिजेत असे त्याचे मत होते. सनातनी लोक पुष्कळदा काही चुकीच्या कल्पना उराशी बाळगीत. त्यात राहू व केतु हे चंद्र व सूर्य यांना ग्रहणकाली गिळतात अशी एक खुळी कल्पना लोकांत दीर्घकाल रूढ होती. वास्तविक चंद्रग्रहणसमयी चंद्र पृथ्वीच्या छायेत गेल्यामुळे अदृश्य होतो. भास्कराचार्याला ही गोष्ट ठाऊक असूनही लोकांना ती पटविणे कठीण होते. ते लोकांना सांगत की, ‘ मंडळींनो, राहू-केतू नावाचे राक्षस नाहीत. पृथ्वीची छायाच चंद्राचा ग्रास करते. पण तुम्हांला राहू हवाच असेल तर असे म्हणा की, राहूने पृथ्वीच्या छायेत शिरून चंद्राचा ग्रास केला.’ अशा रीतीने जुन्या-नव्याचा समन्वय ते करीत असत. ते सुधारणावादी व्यवहारी शास्त्री होते. असे असले तरी तत्त्वाला मुरड घालण्यास ते तयार नसत. गणितासारख्या अमूर्त आणि गहन विषय मनोरंजनात्मक व काव्यामय पद्धतीने शिकविणारे ते आद्य पंडित होते. अशा या थोर गणितीने जे संशोधन केले त्याला इतिहासात तोड नाही. 

भास्कराचार्यानंतर महाराष्ट्रांत तरी विद्वान व प्रसिद्ध असे गणिती फारसे झालेच नाहीत. त्यांच्याच ग्रंथाची घोकंपट्टी करणारे बरेच होते, पण नवीन संशोधन करणारे असे विद्वान १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत थोडेच झाले. त्यांत नाव घेण्यासारखे दोन-चारच असतील. त्यातील एकोणिसाव्या शतकातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे रामानुजन.

रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ ला त्यावेळच्या मद्रास प्रांतातील तंजावर येथे झाला. रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. 

१९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजननी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत. त्यांच्या गणितातील भरीव कार्याचा गौरव म्हणून भारतात २२ डिसेंबर हा दिवस “गणित दिन” म्हणून पाळण्यात येतो.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आनंदाचा निर्देशांक !” – लेखक : श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आनंदाचा निर्देशांक !” – लेखक : श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आनंदाचा निर्देशांक ! अर्थात् “ Happiness Index.” 

       ….. हा नेमका काय प्रकार आहे ?

सकाळी कितीही लवकर उठून मुलाला/मुलीला कामासाठी बाहेर जायचं असेल, तर त्याचे प्रातर्विधी,स्नान होवून तो तयार होईपर्यंत आई त्याला गरम गरम स्वादिष्ट पोहे करून देते, त्याला तो नको म्हणत असताना बसून खायला लावते, शिवाय थोडे एका डब्यात भरून त्याच्या हातात ठेवते.तुला जेवायला उशीर झाला, तर हे पोहे खा,पोटाला थोडा आधार होईल.

 

असं म्हणणा-या आईच्या या प्रेमळपणाचं आयुष्यात कितीतरी वर्षांनी स्मरण होतं, डोळे आणि हृदय दोन्हीही तिच्या आठवणीने भरून येतात.या आठवणीने मनात आनंदाचे तरंग उठतात,या प्रत्यक्ष अनुभवाला येणा-या आनंदाचा निर्देशांक कसा मोजायचा ?

 

हिवाळ्यात कडक थंडीतल्या सकाळी वडिलांना त्यांच्या कंपनीच्या बस स्टॉपपर्यंत स्कूटरने रोज सोडायला जाणा-या प्रेमळ मुलाच्या कपाळावर ओठ टेकवून ,त्याच्या डोक्यावर कृतज्ञतेने, प्रेमाने हात फिरवून नंतर बसमध्ये बसल्यावरही खिडकीतून बराच वेळ हात हालवत भरलेल्या डोळ्यांनी त्याचा निरोप घेणा-या वडिलांनी आणि त्या मुलाने जो प्रेमाचा स्पर्श अनुभवला,तो पुढेही कित्येक वर्षे स्मृतींच्या रुपात पुनः पुन्हा साथ संगत करतो.हा निर्मळ आनंद कसा मोजता येईल ?

 

खिशात पैसे नसलेल्या एका जीवलग मित्राच्या हातावर त्याची मैत्रीण थोडे पैसे ठेवताना तिला त्याच्या डोळ्यात दिसणारी अगतिकता पहात त्याचा हात प्रेमाने हातात घेऊन नुसत्या डोळ्यांनी,त्या हळव्या स्पर्शाने एक शब्दही न बोलता ” हे ही दिवस निघून जातील रे ! चांगला काळ येईल अशी सांत्वना देते त्या क्षणी आणि नंतर कित्येक वर्षे तो क्षण कृतज्ञतेने आठवताना मनात ज्या आनंदाच्या लहरी उसळतात,त्या आनंदाचे मोजमाप कसे करायचे ?

 

इंटरव्ह्यूला जाणा-या भावाला धीर देणारी, त्याच्या कपड्यांना चांगली इस्त्री करून, ‘ तू आज हा ड्रेस घालून जा, आणि छान आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दे, तुझा जॉब पक्का ! ‘ असं म्हणणा-या, लहान असूनही पोक्तपणाने वागणा-या बहिणीच्या आठवणीने ती तिच्या सासरी अगदी सुखी आहे,रमली आहे हे माहित असूनही जेव्हा पुनः पुन्हा ते जुने क्षण, तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारे प्रेम आपण अनुभवतो, तेव्हा या अश्रू भरल्या आनंदाची मात्रा कशी मोजायची ?

 

वृद्धापकाळी रात्री तीन चार वेळा उठाव्या लागणा-या आजोबांची चाहूल लागताच ताडकन् उठून बसत त्यांचा हात धरून त्यांना टॉयलेटपर्यंत नेणारा लाडका नातू नोकरीसाठी दूर जाताना त्यांचा निरोप घेतो, तेव्हा त्याच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून आपले थरथरते हात फिरवत नंतर त्याचे हात घट्ट धरून ठेवत, हा वियोग त्यांच्यासाठी किती अवघड आहे,याची न बोलता जाणीव करून देतात, हे मनात दाटून येणारे भावनांचे कढ कोणत्या परिमाणात मोजता येतील ?

 

आनंद आहेच ! तो क्षणाक्षणाला अनुभवाला येतो.

.. तो स्पर्शाने अनुभवता येतो… शब्दांनी अनुभवता येतो… नि:शब्द शांततेत शब्दाविना होणाऱ्या मूक संवादातून अनुभवता येतो… प्रेमळ माणसांच्या सहवासात अनुभवता येतो… या सहवासाच्या स्मृतींनीही जन्मभर अनुभवता येतो.

 

सत् चित् आनंद याचा अर्थ आनंदच सत्य आहे, आणि त्याचं वास्तव्य सतत तुमच्या चित्तातच असतं !

तुम्ही आनंदी असता किंवा नसता ! आनंदाचं मोजमाप करता येईल, असं उपकरण खरोखरच विज्ञानाला कधी शोधता येईल ?

… अमर्याद जिज्ञासा आणि शोधक बुध्दी ज्यांच्याकडे आहे, त्यांना खुशाल शोध घेऊ द्या … आनंदाच्या नेमक्या निर्देशांकाचा. …. आपण निरंतर आनंदात डुंबत राहू या.

 

आनंद आहेच ! दुःखाला कारण लागतं !! ती कशाला शोधायची ? 

आनंदाचे डोही आनंद तरंग !!!! 

 

लेखक : श्री अभय भंडारी

 पुणे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ एक नवा अंकुर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

क्षण सृजनाचा – एक नवा अंकुर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

 

 कविता — एक नवा अंकूर

उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर

 *

नसेल तेथे हिरवी भूमी

नसेल जिरले कधीही पाणी

घाम गाळिता पिकतील मोती

ध्यास हाच मनी, लाभ यशाचा असो कितीही दूर

उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर १

 *

रखरखणा-या उन्हात न्हाऊ

श्रमदेवीची गीते गाऊ

भाग्य आपुले आपण उजळू

भीति कशाला मग कष्टाची घामाचा वाहो पूर २

 *

भगीरथाचे वंशज आपण

गगनालाही घालू गवसण

अशक्य ते ही करुया आपण

चैतन्याने उजळून जाता, अंधाराचा फाटे ऊर ३

 *

स्फुरोत आता बाहू तुमचे

तुम्हीच त्राते नव्या जगाचे

भविष्य भीषण पहा हासते

वेध घेऊया त्याचा आपण गतकालाला सारून दूर

उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर ४

एका बॅन्केच्या ग्रामीण शाखेत नुकतीच नोकरी लागलेली. नामांकित बॅन्केत नोकरी मिळाल्यामुळे मनापासून आनंद झालेला. त्यामुळे नवीन शिकावे, यश मिळवावे ही इच्छा आपोआपच मनात जागृत झालेली. अशातच त्या ग्रामीण शाखेतून दुस-या एका ग्रामीण शाखेत काही महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती झालेली. तिथे जाणे येणे सुरु झाले. या संपूर्ण प्रवासात शहरी भाग फारच थोडा होता. बराचसा भाग हा कोरडवाहू किंवा दुष्काळी म्हणावा असाच होता. जाताना खूप लहान लहान खेडी लागत होती. अशा खेड्यातही आमच्या बॅन्केची शाखा दिसत होती. हा सगळा अनुभव नवीन होता. प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाशी सामना करुन उभा असणारा शेतकरी, शेतमजूर आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असणारी आपली बॅन्क पाहून उर अभिमानाने भरुन यायचा. स्वतःचे भविष्य स्वतःच घडवायचे असते या विचाराचे स्मरण व्हायचे. कष्टातून नंदनवन उभे राहते. घाम गाळणा-याला यश मिळणारच. अशा सकारात्मक विचारांनी मन भरुन गेले आणि शब्द सुचत गेले… ‘ उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर ‘….

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जा दू ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

☆ 👀👁️🤣 जा दू ! 💩🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

 “जादू ssss तेरी नजर, खुशबू तेरा ssss बदन, तूं हां….. “

सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला ! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ? सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे, मला खरं तर “जादू तेरी नजर” या, मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची “जादू” आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे असं काही गारुड करून बसली आहे, की त्याची पुढची ओळ माझ्या हातून आपोआपच लिहिली गेली हे मी मान्य करतो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागितली मंडळी ! चला, म्हणजे एका अर्थाने लेखाच्या सुरवातीलाच, एखाद्या गाण्याची अनेक तपानंतर सुद्धा आपल्यावर कशी “जादू” शिल्लक असते, हा एक मुद्दा निकालात निघाला ! अर्थात ते गाणं त्यातील शब्दांमुळे, संगीतामुळे, का ते ज्या कलाकारांवर चित्रित झालं आहे त्यांच्यामुळे, कां अजून कोणत्या गोष्टींमुळे रसिकांच्या मनावर आज तागायत जादू करून आहे हा वादाचा विषय होऊ शकतो, यात वादच नाही मंडळी. असं जरी असलं, तरी त्या गाण्याच्या जादूची मोहिनी आजच्या घडीपर्यंत टिकून आहे, हे आपण या लेखाद्वारे मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची शब्दांची जादू न करता सुद्धा मान्य कराल ! असो !

मंडळी, आपली माफी मागितल्या मागितल्या, मला एका गोष्टीची मनांत मात्र नक्की खात्री वाटत्ये आणि ती म्हणजे, आपण सुद्धा वरील गाण्याची पाहिली ओळ वाचताच, लगेच दुसरी ओळ मनांत नक्कीच गुणगुणली असेल, हॊ का नाही ? खरं सांगा ! बघा, मी जादूगार नसलो तरी “माझ्या” वाचकांच्या मनांत नक्की काय चाललं असेल ते ओळखण्या इतका मनकवडा जादूगार नक्कीच झालोय, असं लगेच माझं मीच म्हणून घेतो. दुसरं असं, की माझ्या मनावर अजून जरी जुन्या अनेकानेक अजरामर हिंदी गाण्यांची कितीही जादू असली आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा असली तरी, राष्ट्रभाषेत लेख लिहिण्याइतकी काही त्या भाषेची माझ्यावर जादू झालेली नाही, हे मी मान्य करतो ! त्यामुळे आता या वयात अंगात नसलेली एखादी कला, कोणा जादूगाराच्या जादूने अंगी बाणेल, मग मी आपल्या राष्ट्र भाषेत एखादा लेख लिहीन यावर माझा 101% विश्वास नाही ! पण हां, स्टेजवरचे जादूचे प्रयोग पहात असतांना, हे सगळं खोटं आहे हे मनांला ठामपणे माहित असतांना देखील, माझे डोळे (चष्मा लावून सुद्धा) मात्र त्यावर विश्वास ठेवतात हे मात्र तितकंच खरं. म्हणजे असं बघा, रिकाम्या नळकांड्यातून फुलांचा गुच्छ काढणे, तर कधी पांढरे धोप कबुतर ! तर कधी टेबलावर झोपलेल्या माणसाच्या शरीरारचे तीन तुकडे करणे, ते परत जोडणे, असे नाना खेळ करून तो जादूगार लोकांचे मनोरंजन करत असतो. मला असं वाटतं की “जादू” या शब्दातच एक प्रकारची अशी “जादू” आहे जी सानथोरांना तो खेळ बघताना, अक्षरशः देहभान विसरायला लावून खिळवून ठेवते. एवढच नाही, तर ज्या व्यक्तीला जादूगाराने एखाद्या खेळात आपल्या इंद्रजालाने वश केले आहे, त्या व्यक्तीला तर ती इतकी कह्यात ठेवते, की त्या जादूगाराने “आज्ञा” करताच, ती व्यक्ती सफरचंद समजून, कच्चा बटाटा पण साऱ्या प्रेक्षकांसमोर मिटक्या मारीत आनंदाने खाते, हे आपण सुद्धा कधीतरी बघितलं असेल !

या दुनियेत जादूचा उगम कधी झाला, जगात पाहिली जादू कोणी, कोणाला आणि कोठे दाखवली असे साधे सोपे प्रश्न घेवून, त्या प्रश्नांची मी उत्तर देईन अशी अपेक्षा हा लेख वाचतांना कोणा वाचकाने कृपया ठेवू नये. कारण त्याची उत्तर द्यायला सध्याच्या विज्ञानयुगातला जागतिक कीर्तीचा “गुगल” नामक विश्व विख्यात जादूगार आपल्या खिशातच तर आहे मंडळी ! पण हां, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या पाहिल्या दोन जादू कोणत्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मी तुम्हांला नक्कीच सांगू शकतो. किंबहुना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या दोन जादू, आपल्या पैकी माझ्या पिढीतील लोकांनी पाहिलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या सुद्धा त्यांनी पाहिलेल्या पहिल्या दोन जादू असू शकतात, (आधीच वाक्य वाचून तुम्हांला थोडं गोंधळायला झालं असेल, तर बहुतेक तो माझ्या लिखाणावर झालेला आजच्या विषयाचा परिणाम असू शकतो) यावर माझा ठाम विश्वास आहे !

मंडळी, त्यातील पाहिली जादू म्हणजे, आपल्या दादाने किंवा ताईने मुठीत राहणारी लहान वस्तू उजव्या हाताने दूर फेकल्याचा अभिनय करून, ती वस्तू आपण सांगताच आपल्याला लगेच दाखवणे आणि दुसरी जादू म्हणजे डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने कापणे ! काय, बरोबर नां मंडळी ?

लहानपणी डेव्हिड कॉपरफिल्ड नामक एका विदेशी जादूगाराचे एका पेक्षा एक विलक्षण जादूच्या प्रयोगाचे विडिओ बघून डोळे आणि डोकं अक्षरशः गरगरायला लागायचं! त्याच पाण्यावर चालणं काय, हवेत उडणं काय किंवा नायगाऱ्याच्या प्रचंड धबधब्यात पिंपात बसून उडी मारून परत काठावर प्रकट होणं काय ! बापरे, ते त्याचे सारे जादूचे खेळ आज नुसते आठवले तरी अंगावर काटा येतो मंडळी !

आपल्या देशातसुद्धा तसे अनेक छोटे मोठे जादूगार होऊन गेले, पण डेव्हिडशी तुलना करायची झाल्यास, पी सी सरकार, सिनियर आणि पी सी सरकार, ज्युनियर ही कलकत्याच्या पिता पुत्रांची नांव या संदर्भात प्रकर्षाने लगेच आठवतात.

माझे जन्मापासूनचे आजतागायतचे आयुष्य शहरात गेल्यामुळे, “काळी जादू” किंवा “चेटुक” या विषयात एखाद्या “गाववाल्याचे” जेवढे “ज्ञान” (का अज्ञान ?) आहे, त्याच्या ते 0. 001% सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे अथवा लिहिणे, हा या विषयात स्वतःला तज्ञ समजणाऱ्या एखाद्या “गाववाल्याचा” अपमान होऊ शकतो. म्हणून उगाच त्या तथाकथीत जादूच्या उप शाखेला कोणत्याही तऱ्हेनं स्पर्श नं केलेलाच बरा. शिवाय माझा हा लेख अशा एखाद्या तज्ञ गाववाल्याने “चुकून” वाचलाच, तर त्याला आलेल्या रागापोटी तो माझ्यावर एखादं “लिंबू” फिरवायचा ! उगाच नको ती रिस्क आता या वयात कशाला घ्या ?

मंडळी, शेवटी एकच सांगतो, माझा सुद्धा जादूवर विश्वास आहे. पण ती जादू करणारा सर्वशक्तिमान जादूगार हा वर बसलेला आहे, असं माझं मत आहे ! आपल्या आयुष्यात वेळोवेळी निरनिराळे खेळ करून “तो” आपल्याला दाखवत असतो ! त्यातील त्याच्या कुठल्या खेळाला आपण टाळी वाजवायची, कुठला खेळ दाखवल्या बद्दल त्याचे मनापासून आभार मानायचे किंवा कुठल्या खेळातून काय बोध घेवून पुढे जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचे !

तर अशा त्या सर्व शक्तिमान जादूगाराने आपल्याला दाखवलेल्या नानाविध खेळांचे वेळोवेळी अन्वयार्थ लावायची शक्ती, तो जादूगारच आपल्या सगळ्यांना देवो हीच सदिच्छा !

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ गेल्यानंतरचा सोहळा… !!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ गेल्यानंतरचा सोहळा… !!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे

जगण्या आणि जगवण्याच्या लढाईमध्ये आजपर्यंत माझे सहा एक्सीडेंट झाले आहेत…

जीव वाचला; परंतु कमरेच्या मणक्यात आणि मानेच्या मणक्यात सहा गॅप आहेत… ! 

मध्ये मध्ये ही दुखणी लहान बाळासारखी रडायला लागतात, परंतु जो जो रे बाळा जो म्हणत, मी त्यांना मनातल्या मनात बऱ्याच वेळा झोपवतो… ! 

परंतु थंडीच्या दिवसांमध्ये हाडांची हि काही दुखणी स्वतःही झोपत नाहीत आणि मलाही झोपू देत नाहीत…

डाव्या हातात मुंग्या येतात…. मानेपासून डावा हात इतका दुखतो; की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही…. ! या त्रासामुळे मोटरसायकल चालवताच येत नाही…. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा फिल्डवर, भिक्षेकर्‍यांमध्ये जाणे मनाविरुद्ध रद्द करावे लागते…. ! 

मागील महिन्यात दोन-तीन सुट्ट्या अशाच मनाविरुद्ध पडल्या… तिथल्या आज्यांना औषधे देता आली नाहीत हि एक तळमळ… आणि जीव घेण्या पद्धतीने डावा हात दुखतोय ही दुसरी तळमळ… दुहेरी कात्रीत मी सापडलो होतो.

आज मात्र गेलो… मला काय त्रास होतो आहे, याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती…. ! खूप दिवसातून मी त्यांना भेटत होतो…. मला बघितल्यावर मग, हातवारे करून माझ्याशी त्या हक्काने कचकचून भांडायला लागल्या… ! 

‘ आमी काय मरायचं का ? तू काय सोताच्या मनाचा मालक हाय का ? तुला काय लाज हाय का ? ‘ वगैरे वगैरे… शंभर गोष्टी त्यांनी मला सुनावल्या… ! 

माझा डावा हात अजूनही नीट उचलत नाही…. तरीही मी मोटरसायकल चालवत गेलो होतो…. ! 

उजवा हात माझ्या डाव्या छातीवर ठेवून, अभिवादन करून, मी त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं … ‘माज्या मानंच्या मणक्यामदल्या शिरा चिमटल्या हायेत… माजा डावा हात नीट काम करत न्हायी… तरीबी तुमच्यासाठी गाडी चालवून हितपर्यंत आलो… फकस्त तुमच्यासाटी… ! आणि तुमि माज्याशी भांडायला लागला… ‘ मी काकुळतीने बोललो… ! 

ही वस्तुस्थिती ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा मात्र लगेच बदलला…

श्रावणात उन्हं असताना पाऊस पडतो आणि पाऊस पडताना लगेच उन्हं पडतात…

…. माझ्या बोलण्यानंतर, रागे भरलेल्या डोळ्यांमध्ये आता पाऊस साठला होता…

क्षणात मोसम बदलला होता… ! 

श्रावणाचा महिना नसताना सुद्धा, भर थंडीतही, मावश्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा पाऊस माझ्या खांद्यावर पडला… ! 

…. मग लगेच एकीने खांदा चोळला… एकीने डावा हात हातात घेऊन त्याला मालिश केले… एकीने डोक्यावर हात ठेवून आला-बला काढली… ! 

…. साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर मी… पण माझ्या लोकांनी आज मला एखादा राजकुमार असल्याचा फील दिला…. ! 

मी आपला सहज बोलून गेलो, “ एक महिना नाही आलो तर इतकं बोलता… मी जर मेलो बिलो आणि कधी आलोच नाही तर काय कराल ? “

…. या वाक्याने त्यांचा बांध फुटला…

श्रावणाने पुन्हा मौसम बदलला… !

… एक रडायला लागली, डॉक्टरला मरू नको देऊ म्हणून तिने मंदिरापुढे अश्रूंचा अभिषेक केला…

… एकीने रडत देवाला कौल लावला…

… एक आजी रडत देवाशी चक्क भांडायला लागली, “डाक्टरच्या” मणक्यात गॅप दिल्याबद्दल ती त्याला दोष देत होती…. ! 

…… मी भारावून गेलो… माझ्या डोळ्यात पाणी आलं… ! 

मला खूप पूर्वी वाटायचं, आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी मनापासुन रडेल का ? 

आपण मेल्यावर आपल्यासाठी कोण कोण रडतं ? हे पाहायची काही सोय आहे का ? 

…. आता, हा प्रसंग पाहिल्यानंतर, माझ्या मृत्यू मागे कोण कोण रडणार याची नोंद माझ्या मनात झाली होती… !

मेल्यावर माझ्या माघारी रडणारी माणसं, आज मी माझ्या जिवंतपणे पाहिली…. ! 

…. पण जाणीव झाली, आपण मेल्यावर आपल्या मागं ज्यांनं रडावं, असं आपल्याला वाटत असेल, त्याला आपल्या जिवंतपणी हसवावं लागतं… ! 

It’s a damn reality…. !!!

असो…

मी माझ्या व्याख्यानात नेहमी म्हणतो…. आपल्याला जेव्हा काहीतरी दुखतं खुपतं त्यावेळी आपल्याला वेदना होतात आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं….

…. परंतु जेव्हा दुसऱ्याला वेदना होतात आणि तरीही आपल्या डोळ्यात पाणी येतं… त्याला संवेदना म्हणतात… समवेदना म्हणतात…. ! 

या माझ्या आज्या – मावश्या आज माझ्यासाठी रडल्या… यात मला आनंद नाही…

माझी वेदना; त्यांनी संवेदना आणि समवेदना म्हणून स्वीकारली… यात आनंद आहे ! 

वेदनेपासून संवेदनेकडचा आणि समवेदनेकडचा प्रवास त्यांचा सुरु झाला आहे यात मी सुखी आहे…. ! 

… आता मी कधीही गेलो तरी सुद्धा, आज्यांच्या प्रार्थनेच्या हातात मी जिवंत असेन; याची मला जाणीव आहे….

…. आता माझ्या मागे कोण कोण रडेल याची मला फिकीर नाही…. !

माझ्या जाण्यानंतरचा सोहळा आज मी जिवंतपणे पाहिला… !!! 

डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ““सांज संभ्रम !” ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

सांज संभ्रम ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

 रोज गंभीर लिहितो… म्हणून आता हे थोडे हलके फुलके !

रात्र दिवसाच्या हातावर टाळी देऊन अंधाराच्या आणखीन नजीक येत असते. तसेच काहीसे पहाटे सुद्धा होत असते. रात्र निवृत्ती घेऊन निजावयास निघायच्या तयारीत असते जणू!

दिवसा झोपी जाण्याचा अपराध आणि तो सुद्धा दिवस सायंकाळशी मैत्र साधत असल्याच्या वेळी, जो करील तो आयुष्यात एकदा तरी ह्या चकव्यात सपडतोच.

आपल्याला आज अगदी पहाटे उजडण्याच्या वेळी कशी जाग आली याच्या विचारात माणूस पडतो… आणि दिवस उगवायचा जागी रात्र आणखीन गडद होत जाते! मग लोकांनी सांगितल्यावर समजते… तुम्ही दुपारी उशिरा झोपी गेला होतात… आणि सायंकाळी अंधार पडण्याच्या सुमारास जागे झाला आहात!

असा अनुभव किती तरी जणांना आलेला असेल ना?

त्यादिवशी शनिवार होता. अर्धा दिवस शाळा. साडेतीन चारच्या सुमारास घरी आलो, थोडे खाल्ले आणि बिछान्यावर सहज अंग टाकले… डोळा लागला!

रविवारी सकाळी साडे सहा वाजता वर्गशिक्षक आणि क्रीडा शिक्षकही असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या घराजवळ असलेल्या छोट्या मैदानावर शारीरिक शिक्षणाच्या परीक्षेस बोलावले होते! ते शिक्षक अगदी एकवचनी. जे म्हणतील ते करून दाखवायचे म्हणजे दाखवायचे! गैर हजर राहाल तर सहामाहीत नापास.. असे त्यांनी सांगून ठेवले होते! (त्यावेळी काही पोरं गैरहजर ऐवजी गयहजर म्हणत…. त्यांची तर हे शिक्षक अजिबात गय करीत नसत!)

आणि नापास म्हणजे चक्क नापास.. आणि असे अपराध पुन्हा केले की एक वर्ष पुन्हा त्याच तुकडीत दिवस काढावे लागणार याची निश्चिती!

त्यामुळे मुलं नापास होत नाहीत तर शिक्षक त्यांना नापास करतात… असा (गैर) समज मनात पक्का झाला होता!

बरं… ते शिकवीत असलेल्या विषयाचा तसा पास नापासशी अजिबात संबंध नव्हता हो! पण त्यांच्या विषयात नापास होणे सोडा, पण एखादी कविता पाठ न करण्याचा अपराधही कधी कुणी केलेला… मेरे स्मरण में नहीं!

कल यह कविता मुखोदगत कर के आना! असा शुद्ध हिंदीत त्यांनी दिलेला आदेश सर्वच विद्यार्थी पाळत ! अन्यथा विद्यार्थ्याच्या मुखाची गत काही धड रहात नसे! याला मराठीत पाठ करणे असे म्हणतात. म्हणून आमच्या पाठी सुद्धा हे शिक्षक हिशेबात धरायचे! त्यांच्या हिंदी विषयाने आमची पाठ सोडली नाही. पण आमच्या त्या तुकडीतील विद्यार्थी राष्ट्रभाषेत उत्तम बोलत.

तसेच…. हमारे जमाने में अध्यापक वर्ग से कोई बहस करते नहीं थे… उलट शिक्षकांनी शिक्षा केली असे घरी समजल्यास घरी पुन्हा त्याची पुनरावृत्ती होई! 

तर त्या दिवशी मी सायंकाळी सहा वीस वाजता जागा झालो… दहा मिनिटांत सरांच्या घरी पोहोचणे केवळ अशक्य होते… वर्ष वाया जाणार हे निश्चित! त्यावेळेस रडणे एवढं एकच जमणार होतं. मग.. आईने ‘आपल्याला वेळेत जागे केले नाही’ असा आरोप करायला सुद्धा धजावलो… ! त्यावर आई स्मित हास्य करत राहिली!

घराबाहेर आलो… अंधार होता. पण लोक घराकडे परतत होते… पिंपळाच्या झाडावर कावळे जमा झाले होते… आणि शांत होते!

सहा वीस नंतर उजेड वाढायला पाहिजे होता… पण अंधार वाढू लागला. आणि मग खात्री पटली… रात तो अभी बाकी है मेरे दोस्त !

रविवारी सकाळी पावणे सहा वाजता मी शारीरिक शिक्षणाच्या परीक्षेस तयारीनिशी उपस्थित होतो !

कृपया उपरोक्त विषय पर आधारित दस से पंधरह वाक्यों में निबंध लिख कर लायें ! 

आपके भी कुछ ऐसे अनुभव होंगे तो जरूर लिखियेगा !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तीन म्हणजे एक नव्हे …’ लेखक : प्रा. हरी नरके  ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘तीन म्हणजे एक नव्हे …’ लेखक : प्रा. हरी नरके  ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

स्व विंदा करंदीकर

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

श्रेष्ठ कविवर्य स्व गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’

(जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०)

मुंबईतील एक नामवंत संस्था. साहित्यिकांना मोठमोठे पुरस्कार देऊन त्या अकादमीतर्फे सन्मानित केले जाई. एक श्रीमंत सिंधी गृहस्थ त्या अकादमीचे प्रमुख होते. ते विविध वाङ्मयीन उपक्रमही चालवीत असत. त्याकाळात अकादमीचा मोठाच बोलबाला होता.

श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांना घरातले आणि जवळचे लोक भाऊ म्हणत. भाऊ कडवे कोकणी होते. प्रतिभावंत, प्रखर तत्वनिष्ठ आणि स्पष्टवक्ता.

एकदा भाऊंचा फोन आला. म्हणाले, ” हरी, एक कार्यक्रम आलाय. त्यांना आपण तिघे हवे आहोत. दयाशी (पवार) मी बोललोय तो येतो म्हणालाय. तूही वेळ काढ. प्रत्येकी एक हजार रूपये आणि एकेक नारळ असं मानधन देणार आहेत. जाण्यायेण्याचं भाडं आणि चहा देणार आहेत. ठीकाय ना? “

मी ताबडतोब होकार दिला. भाऊ आणि दयाकाका या दिग्गजांच्यासोबत कार्यक्रम म्हणजे धमाल.

कार्यक्रम एका मोठ्या हॉटेलमध्ये होता. कार्यक्रम झकास झाला. खूप रंगला. भाऊ दिलेला नारळसुद्धा वाजवून बघायचे. पाणी कमी असेल तर दुसरा आणा असं स्पष्ट सांगायचे. कोकणी बाणा.

भाऊंनी संयोजकांना स्टेजवर बोलावले, म्हणाले, ” चला, व्यवहाराचे उरकून टाका. “

संयोजक आत गेले आणि त्यांनी तीन बंद पाकीटे आणून आम्हा तिघांना दिली. भाऊंनी पाकीट उघडून तिथेच पैसे मोजले. पाकीटात ७०० रूपये होते. भाऊंनी संयोजकांना बोलावले, ” मालक, अहो, यात तीनशे रूपये कमी आहेत. आपले प्रत्येकी एक हजार ठरले होते. “

आम्हा दोघांना भाऊ म्हणाले, “अरे, तुमचीही पाकीटे उघडून बघा. व्यवहार म्हणजे व्यवहार, त्यात संकोच कसला?”

पण दयाकाका म्हणाले, “भाऊंचं ठिकय. मोठा माणूसय. आपण असं स्टेजवर कसं पाकीट उघडून बघायचं ना?”

संयोजकांनी भाऊंना तीनशे रूपये आणून दिले. म्हणाले, ” माफ करा, कार्यालयातील मंडळींनी पाकीटं भरताना चुकून कमी रक्कम भरली. “

आम्ही निघालो. टॅक्सीत बसल्यावर आम्ही दोघांनी आमची मानधनाची पाकिटं उघडून बघितली.

दयाकाकांच्या पाकीटात २०० रूपये होते आणि माझ्या पाकिटात शंभर. म्हणजे तिघांना प्रत्येकी एक हजार देण्याऐवजी तिघांना मिळून एक हजार दिलेले. भाऊ तडकले. भाऊंनी टॅक्सी थांबवली. संयोजकांना बोलावलं आणि त्यांना झापलं. ठरल्याप्रमाणं मानधन दिलेलं नाही. दिलेला शब्द तुम्ही पाळलेला नाही. तत्व म्हणजे तत्व, काय समजले? तिघांना प्रत्येकी एक हजार ठरले होते. तुम्ही तिघांना मिळून एक हजार दिलेत. तीन म्हणजे एक नव्हे. आत्ताच्या आत्ता पूर्तता करा… आणि हो, दरम्यान तुमच्या चुकीमुळे टॅक्सीचा खोळंबा झाल्याने तिच्या भाड्यापोटी पंचवीस रूपये अधिकचे द्या टॅक्सीवाल्याला. काय समजले? “

भाऊंचा सात्विक संताप उफाळून आला होता. संयोजकांनी उरलेले पैसे आणून दिले, परत ते कार्यालयातील लोकांनी पाकीटं भरताना घोळ केला वगैरे सांगायला लागले. भाऊ म्हणाले, ” तसं असेल तर कार्यालयातील लोकं बदला किंवा किमान तीन वेगवेगळ्या नविन सबबी शोधून ठेवा. “

एके दिवशी भाऊंचा फोन आला. त्यांना मंत्रालयात यायचे होते. किल्लारीच्या भूकंपग्रस्तांच्या निधीला मुख्यमंत्री फंडाला त्यांना छोटीशी देणगी द्यायची होती. त्यांच्या दोन अटी होत्या. ही देणगी गुप्त राहायला हवी. तिचा गवगवा व्हायला नको. बातमीदारांना कळता कामा नये.

त्यांना सी. एम. ना किंवा अन्य कुणालाही भेटायचे नव्हते, फक्त देणगीचा चेक देऊन ते परत जाणार होते.

मी भाऊंच्या मंत्रालय प्रवेशिकेची व्यवस्था केली. भाऊ बांद्र्यावरून बसने आले. आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयात गेलो. भाऊंनी चेक दिला. पावती घेतली. भाऊंचे नाव ऎकून तो अधिकारी चमकला. त्याने भाऊंना खुर्ची दिली. चहा मागवतो म्हणाला. भाऊ म्हणाले, ” धन्यवाद. पण मला जरा घाई आहे. तुम्ही मुद्दाम बोलावलंत तर चहाला मी परत कधी तरी नक्की येईन. आत्ता नको. एकतर ही माझी चहाची वेळ नाही आणि मी हरीकडून असं ऎकलंय की मंत्रालयातला चहा अत्यंत मचूळ असतो. मला आज माझ्या जिभेची चव बिघडवून घ्यायची नाही. पण विचारल्याबद्दल धन्यवाद. आज मी माझ्या कामासाठी आलोय. चहाला नाही. जत्रेत पाहुणा ओढून काढू नका.”

अधिकार्‍याने भाऊंना दिलेली पावती पंख्याच्या वार्‍याने उडाली. मी ती उचलून भाऊंना दिली, तेव्हा माझी नजर रकमेच्या आकड्यावर पडली. भाऊंनी पाच लाख रूपयांची देणगी दिलेली होती. ही म्हणे छोटीशी देणगी. जे भाऊ नारळसुद्धा वाजवून घ्यायचे ते पाच लाखाची देणगी भूकंपग्रस्तांना मदत म्हणून कोणताही गाजावाजा न करता देऊन गेले.

आम्ही मंत्रालयाबाहेर आलो. भाऊ बसला उभे राहिले. बसला वेळ होता. मी म्हटलं, ” भाऊ, इथल्या टपरीवरील चहा फक्कड असतो. घेऊया का एकेक कटींग?”

भाऊ म्हणाले, “असं म्हणतोस? ही माझ्या चहाची वेळ नाही. पण चल घेऊया. मात्र एका अटीवर, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्यानं पैसे मात्र मी देणार हो. “

भाऊंकडे किश्यांचा अफलातून खजिना असायचा. ते आपल्या तिरकस शैलीत तो सांगताना अगदी हरवून जायचे. अनेकांची फिरकी घेण्यात ते पटाईत होते. त्यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत. मजा म्हणजे ते आपले किस्से सांगताना आपण कसे गंडलो, आपली कशी फजिती झाली किंवा आपल्याला शेरास सव्वाशेर कसे भेटले हेही सांगायचे. ते त्यात आरपार हरवून जायचे. त्यांनी सांगितलेला हा त्यांच्याच फजितीचा एक प्रसंग…..

विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट तिघा कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम त्या काळात फार गाजत होता. कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी फिरती असायची. एकदा अकलुजच्या साखर कारखान्याचे निमंत्रण आले. चेअरमन शंकरराव मोहिते पाटील तमाशाचे शौकीन. कुणीतरी म्हणाले, ‘काव्यवाचन ठेवू या’. ते लगेच तयार झाले.

स्वत: एम. डी. आले होते निमंत्रण घेऊन मुंबईला. त्यांना दारातच थांबवून व्यवस्थापक कविवर्य वसंत बापटांनी त्यांच्या हातात २७ अटींचा कागद सोपवला.

पुढच्या वेळी येताना फोन करून, वेळ घेऊनच यायला बजावले.

लेखी नियमांप्रमाणे अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला फोन करून, वेळ घेऊन एम. डी. भेटायला आले.

परत कविवर्य बापटांनी त्यांना दारातूनच कटवले. तसे बापट अतिशय सोशल होते. पण दोन वेळा एम. डी. शी ते कळत नकळत असं वागून गेले. कदाचित त्यांच्या मनात काही नसेलही. पण एमडी रागावले. बापट स्वभावाने ओलावा असलेले. पण….

एम. डीं. नी हा अनुभव चेअरमनना सांगितला. चेअरमन मोहिते पाटील म्हणजे नामांकित पण बेरकी राजकारणी होते. त्यांनी २७ नियमांचा कसून अभ्यास केला. नियमाप्रमाणे कवींना रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं पाठविण्यात आली. कवींना कुर्डुवाडी स्टेशनवर घ्यायला मर्सिडीज गाडी पाठविण्यात आली.

राहण्या-जेवणाची व्यवस्था ठरल्याप्रमाणे उत्तम करण्यात आली होती. प्रत्येक अटीचे काटेकोर पालन केलेले.

कार्यक्रमाला तिन्ही कविवर्य सभागृहात पोचले तर तिकडे सभागृह संपूर्ण मोकळे. स्टेजवर फक्त एम. डी. आणि चेयरमन दोघेच.

कवीवर्यांनी श्रोत्यांची चौकशी केली. तेव्हा चेअरमन म्हणाले, ” तुमच्या २७ अटींमध्ये कार्यक्रमाला श्रोते हवेत अशी अटच नाही. आता तुम्हाला या रिकाम्या सभागृहापुढेच कविता वाचाव्या लागतील. “

…… स्वत:ची चूक बापटांच्या लक्षात आली. पण ती कबूल करायला तेव्हा ते तयार नव्हते. भाऊ पुढे झाले. ते चेअरमनना म्हणाले, ” मुदलात आमच्या माणसाकडून काहीतरी आगळीक झाली असणार. आम्ही कवी जरा विक्षिप्त असतो. मी स्वत: तुमची क्षमा मागतो. “

चेअरमन म्हणाले, “अहो, आमचा माणूस ४०० किलोमीटरवरून तुम्हाला फोन करून तुमची वेळ घेऊन अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला येतो. तुम्ही त्याला साधं घरातही घेत नाही. पाणीही विचारीत नाही. एव्हढा माणूसघाणेपणा ?”

….. व्यवस्थापकांच्या वतीने भाऊंनी चूक झाल्याचे मान्य केले. सपशेल माफी मागितली.

चेअरमननी एमडींना शेजारच्या सभागृहात पिटाळले. तिकडे लावण्यांचा फड रंगलेला होता. एमडींनी स्टेजवर जाऊन घोषणा केली, ” मंडळी, शेजारच्या सभागृहात एक सांस्कृतिक प्रोग्रॅम होणार आहे. आपण सर्वांनी तिकडे जायचेय. चेअरमनसाहेबांचा तसा निरोप आहे. तो कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू होईल. तर आता जरा सांस्कृतिक चेंज. “

५ मिनिटात सभागृह खचाखच भरले. तीन कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम इतका रंगला की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले.

त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मात्र बापट यांच्याकडून भाऊंनी स्वत:कडे घेतली. भाऊ म्हणायचे, “ हरी, राजकारणी लोक महाहुषार असतात. शहाण्याने त्यांच्याशी पंगा घेऊ नये. कसा धडा शिकवतील सांगता येणार नाही !” 

लेखक : प्रा. हरी नरके

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग २ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

 ***** पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन *****

☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग २ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

उस्ताद झाकीरजींची आणखी एक छान गोष्ट आहे. जगभर भ्रमंती करणारा हा महान कलावंत जवळचं अंतर लोकल ट्रेनने किंवा रेल्वेने कापतो. कल्याण, डोंबिवलीला जर कार्यक्रम असेल तर त्याचा रवीकाकाला फोन येतो व त्याला तो सांगतो, अमक्या दिवशी कार्यक्रम आहे, मला तू रेल्वेने घेऊन जा. मग रवीकाकाचा एक रेल्वेतला मित्र, व रवीकाकाचं शेपूट असल्यासारखा मी त्याला घ्यायला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जातो आणि ट्रेनने घेऊन गंतव्य स्थळी पोहोचवतो. त्याला स्टेशनवर बघून अनेकांचा विश्वास बसत नाही. पण, तो अगदी सहजपणे स्टेशनवर असणारे हमाल, तिकिट कलेक्टर, प्रवाशांच्यात मिसळतो, प्रत्येकाला हवे तितके फोटो काढू देतो. आता तो एक काळजी घेतो, बाहेर कुठेही काहीही खात नाही. त्याचा पिण्याच्या पाण्याचा एक ठराविक ब्रँड आहे, तेच पाणी तो पितो, ते मिळालं नाही तर तो पाणी पिणार नाही.

त्याची आणखी एक सवय आहे, त्याचा कार्यक्रम जिथं असेल तिथं, तो कार्यक्रमाच्या काही तास आधी जातो. मला आठवतंय, माझ्या मावसभावानं संतोष जोशी, त्याचे पार्टनर्स प्रियांका साठे आणि अभिजित सावंत यांनी झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांचा ठाण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता. मी सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर होतो. शंकर महादेवनने झाकीरजी कधी येणार आहेत, याची विचारणा केली आणि त्याप्रमाणे तो झाकीरकाका त्या कार्यक्रमाला पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी तिथं पोहोचला.

डोंबिवलीला एम्. आय्. डी. सी. मैदानात झाकीरकाकाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आम्ही त्याला ट्रेनने घेऊन आलो. कल्याण स्टेशनवर उतरल्यावर आयोजकांनी मोटारीनं डोंबिवलीला नेलं. कार्यक्रम रात्री साडे-सात आठच्या दरम्यान सुरू होणार होता. आम्ही मैदानात साडेपाचच्या सुमारास पोहोचलो. तिथं गेल्या गेल्या झाकीरकाकानं तबल्याचं व विविध तालवाद्यांचं त्याच्याकडचं भांडार उघडलं. मोटारीतून स्वत:च्या तबल्याचं कीट त्यानं स्वत: उचललं आणि थेट स्टेजवर गेला. ध्वनिव्यवस्था ज्यांच्याकडे होती, त्यांनी त्याच्याबरोबर अनेक कार्यक्रम केलेले असल्याने त्यांनी सर्व तयारी ठेवलेली होती. नंतर दीड तासभर झाकीरकाका स्वत:ची वाद्ये लावत होता, ती आधी स्वत:ला कशी ऐकू येत आहेत ते तपासून घेत होता. स्पीकरवरून मैदानाच्या सर्व कोपर्‍यांत त्यांचा आवाज कसा पोहोचतो आहे याची चाचपणी करत होता. मध्येच मला म्हणाला, “बॉबी, उस कोने में जाकर सुन ले कैसे सुनाई देता है. ” नंतर दुसर्‍या कोपर्‍यात त्यानं मला पाठवलं. मला त्यातलं काय कपाळ कळणार होतं? पण त्याची परफेक्शनची धडपड केवढी होती!!

आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गौरव दिवस हा एक कार्यक्रम सुरू केला. पहिल्या वर्षी आम्ही रवींद्र जैन यांना बोलावलं. दुसर्‍या वर्षी बावीस जानेवारी २००२ रोजी ते व मी बोलत होतो, तेव्हा त्यांना मी विचारलं की, ‘आपण यावर्षीचा गौरव पुरस्कार उस्ताद झाकीर हुसेन यांना देऊ या का?’ सरांनी माझ्याकडे आश्चर्यानं बघितलं व विचारलं, “तू जानता है उनको? एवढ्या थोड्या अवधीत ते येतील का?” मी आत्मविश्वासानं, “हो, मी ओळखतो आणि तो येईल. ” सर थोडे वैतागले, “अरे, इतने बडे आदमी को तू अरे तुरे क्या करता है? अकल नहीं है. ” मी सरांना म्हणालो, “तो माझ्या काकाचा मित्र आहे. ” सुदैवानं झाकीरकाकानं गौरव पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं. पण तो म्हणाला, “२६ जानेवारीला मी परदेशात आहे. २ फेब्रुवारी चालेल का ते बघ. ” तो रविवार होता. सरांना विचारलं, “सर उत्तेजित झाले. म्हणाले, बिल्कूल चालेल. मध्ये पाचसहा दिवस होते आम्ही झाकीरजींच्या आगमनानिमित्त एक सुंदरसा कार्यक्रम आखला. बदलापूरच्या अंध मुलांच्या शाळेचा एक छोटेखानी कार्यक्रम आणि आमच्या मुलांचा शास्त्रीय गायन-वादनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला. आमच्या विवेक भागवतने छान तबला वाजवला. तो जेमतेम सेकंड ईयरचा विद्यार्थी. कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा मी या सगळ्या पोरांना घेऊन प्राचार्यांच्या कार्यालयात गेलो, तेव्हा हा जागतिक कीर्तिचा पद्मभूषण तबलानवाज विवेकला बघून म्हणाला, “अरे, आओ उस्ताद आओ. ” विवेकला त्यांनी प्रेमानं जवळ घेतलं, पाठीवर थाप मारली, “कोणाकडे शिकतोस” असं विचारल्यावर त्यानं पैठणकरांकडे शिकतो असं म्हटल्यावर त्यानं पटकन विचारलं, “त्यांच्याकडे थेट तिरखवांसाहेबांचा तबला आहे, ते त्यांचे डायरेक्ट शिष्य आहेत. ” पैठणकरबुवांची व त्याची मी गाठ घालून दिली, तेव्हा त्यानं त्यांचे हात जवळ घेऊन कपाळावर लावले. आमच्या सचिन मुळ्येची आई कांचन मुळ्ये, ह्या पं. गजाननबुवा जोशी यांची कन्या. मी त्यांची ओळख करून दिल्यावर झाकीरकाकानं त्यांना खाली वाकून नमस्कार केला. पं. गजाननबुवांनी अब्बाजींना म्हणजे उस्ताद अल्लारखांसाहेबांना त्यांच्या मुंबईतील प्रारंभीच्या काळात जी मदत केली होती, ती जाणून घेऊन त्याने तो नमस्कार केला. हे सर्व मला माहिती असण्याचं काही कारण नव्हतं, झाकीरकाकानं सर्वांसमोर ही वस्तुस्थिती सांगितली तेव्हा ते कळलं. याच कार्यक्रमाच्या वेळी एक अविस्मरणीय घटना घडली. झाकीरकाकाचा सत्कार झाला, त्या सत्काराला उत्तर द्यायला तो जेव्हा उभा राहिला तेव्हा समोर असलेले तीन साडेतीन हजार विद्यार्थी अगदी शांत बसले होते. आमचं कॉलेज उल्हासनगर स्टेशनच्या अगदी समोर आहे. कॉलेजच्या पुढच्या मैदानात कार्यक्रम सुरू होता. झाकीरकाका बोलायला जेव्हा उठला, तेव्हा अशी शांतता पसरली की आम्हाला रेल्वे स्टेशनवरची उद्घोषणा ऐकू यायला लागली. तो बोलायला प्रारंभ करणार तोच दूरवरच्या मशिदीतून अज़ान ऐकू येऊ लागला. झाकीरकाका स्टेजवर शांत उभा राहिला. स्टेज शांत, श्रोते शांत, आसमंत शांत आणि दूरवर ईश्वराची केली जाणारी आर्त आळवणी. सार्‍यांचा श्वास एक झाला होता. अजान संपला आणि झाकीरकाकानं बोलण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला, तो श्वास संवेदनशील माईकनं पकडला, त्याचा आवाज सर्वदूर पसरला. समोरून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हे लिहितानाही माझ्या अंगावर काटा फुलतो आहे. साडे तीन हजार तरुण मनं आणि त्या मनांवर नकळत अधिराज्य करणारा एक महान कलावंत यांच्यातलं ते अद्वैत अद्भूत असंच होतं.

मी रवीकाकाबरोबर झाकीरकाकाच्या घरी अधून मधून जात असे. अम्मीच्या निधनानंतर आमचं जाणं येणं जरासं कमी झालं. एकदा अब्बाजींच्या बरसीच्या पूर्वी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही नेपीअन सी रोडवर त्याच्या घरी गेलो होतो. झाकीरकाका जेवायला ज्या टेबलावर बसायचा त्याच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लता मंगेशकरांनी सही करून दिलेला फोटो लावलेला होता. (आता घराचं रिनोव्हेशन झालंय) त्याखाली अब्बाजी, अम्मी आणि तरुण हसर्‍या चेहर्‍याचा झाकीर असा एक छान फोटो होता, त्याच्या खाली झाकीरकाकाच्या खांद्यावर हात टाकलेला पु. ल. देशपांडे यांचा फोटो होता. मी त्याला प्रश्न विचारला, “अब्बाजी आणि अम्मीबरोबरचा फोटो लावलाय हे कळलं. पण लता मंगेशकरांचा आणि पु. लं. बरोबरचा फोटो का?” तो उत्तरला, “लताजी तर साक्षात सरस्वतीचं रूप आहेत आणि पु. लं. सारखा रसिक आणि कलाकार कुठेही सापडणार नाही. ” मला अचानक आठवण झाली, आमच्या कर्जत गावात वनश्री ज्ञानदीप मंडळ होतं. त्यांनी पु. ल. देशपांडे व सुनीता देशपांडे यांच्या आरती प्रभूंची कविता या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आरती प्रभू त्यांच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या काळात कर्जतला कावसजीशेट काटपटपिटीया यांच्या चाळीत अक्षरश: आठ बाय दहाच्या खोलीत राहात होते. कार्यक्रम झाला व नंतर दुसर्‍या दिवशी पु. ल. व सुनीताबाई आमच्या घरी जेवायला आले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांचं माझ्या काकांना- मनोहर आरेकर यांना एक पत्र आलं. त्यात त्यांनी कर्जतच्या एकूण संयोजनाबद्दल आभार मानले आणि नंतर त्यात लिहिलं की, ‘कालच बालगंधर्वला झाकीरचा तबला ऐकला आणि त्यानंतर असं वाटलं की झाकीर जे वाद्य वाजवतो तो तबला. ‘ मी ती आठवण झाकीरकाकाला सांगितली. त्यानं मला पु. लं. चं वाक्य इंग्रजीत भाषांतरित करायला सांगितलं. मी म्हणालो, “P. L. says Zakir is the definition of Tabla. ” त्यानं पुन्हा एकदा ते वाक्य माझ्याकडून म्हणून घेतलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. तो कधीही त्याच्या भावनांचं प्रदर्शन करत नाही. त्या क्षणी तसं घडलं खरं.

कित्येकदा मला असं वाटतं, उद्या म्हातारा झाल्यावर माझ्या नातवंडांना या गोष्टी सांगत असेन, नातवंडं तोंडात बोटं घालून त्या गोष्टी ऐकत असतील. नंतर म्हणतील, “आजोबा. किती थापा मारता. ” मग मी हसेन, आणि मनातल्या मनात म्हणेन, “बाळांनो, खरं आहे. पृथ्वीवर गंधर्व येऊन गेले यावर सामान्यांचा विश्वास बसत नाही. ज्यांचं भाग्य होतं त्यांना ते गंधर्व पाहता आले. मी भाग्यवान आहे, मी या गंधर्वाला पाहिलं. “

समाप्त

लेखक : डॉ. नितीन आरेकर

nitinarekar@gmail. com

Tel:+91 880 555 0088

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… भाग – १ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

स्वपरिचय  

शिक्षण- M Sc. (Mathematics)

कार्यक्षेत्र – गृहिणी

परिचय – संत साहित्य-भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा, आत्माराम, अमृतानुभव, एकनाथी भागवत इ. अभ्यास सुरू आहे. त्यासंबंधी लिखाण  सुरू आहे. स्त्री संतांविषयी लिहिले आहे. काही कविता व ललित लेख लिहिले आहेत.

☆ गीता आणि मोह ☆ सौ शालिनी जोशी ☆

मोह ही एक मानसिक अवस्था आहे. ते एक आवरण आहे. ज्यामुळे खऱ्या ज्ञानाला माणूस दुरावतो. हा मोह माणसाच्या विकासाच्या आड येतो. त्याचा परिणाम माणसाच्या ज्ञान, विचार आणि आचरणावर होतो. सारासार विवेक दूर होतो. मन भ्रमित होते. योग्य-अयोग्य कळत नाही.

हा मोह तीन प्रकारच्या असू शकतो. १) वस्तूचा २) सत्ता संपत्तीचा किंवा ३) व्यक्तीचा. कारणे कोणतीही असली तरी माणूस कर्तव्यमूठ होतो. आणि परिणाम त्याला स्वतःला व इतरांनाही त्रासदायक होतो. गीतेचा जन्म ही मोहातूनच झाला आहे. मोह निवारण हा गीतेचा हेतू आहे. ते गुरुच करू शकतो.

धृतराष्ट्राला झालेला पुत्र मोह. जो गीतेच्या पहिल्या श्लोकातूनच व्यक्त होतो. ‘मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय।’ माझी मुले आणि पांडूची मुले काय करीत आहेत? माझी मुले आणि पांडव असा भेद त्याच्या ठिकाणी स्पष्ट दिसतो. बाह्यदृष्टीने अंध असणारा धृतराष्ट्र पुत्र प्रेमामुळे अंतःचक्षुनेही अंध झाला आहे. सारासार विचार विसरला आहे. योग्यता नसतानाही आपल्या पुत्राला राज्य मिळावे अशी त्याची इच्छा आहे. या पुत्रमोहाने आपल्या पुत्रांच्या यशासाठी कोणताही भलाबुरा मार्ग आचारण्याला त्याची ना नव्हती. म्हणून पांडवाना त्यांचे हक्काचे राज्य न देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही. पण हा पुत्र मोहच पुढे कौरवांच्या नाशाला कारण झाला.

दुर्योधनाला झालेला सत्तेचा मोह. सत्तेसाठी दुर्योधन कायमच पांडवाना पाण्यात पाहत आला. त्याच्या या अहंकाराचे पोषण शकुनी मामा कडून कायमच झाले. पांडवाना वनवास, विजनवास, द्रौपदी वस्त्रहरण अशी संकटांची मालिकाच भोगावी लागली. सत्तेच्या मोहापायी पांडवांना त्यांच्या वाट्याचे राज्य द्यायला दुर्योधनाने नकार दिला. उलट ‘सुईच्या अग्रावर राहील एवढीही जमीन देणार नाही’ असे उर्मटपणे सांगितले. विदूर व श्रीकृष्ण यांच्या सांगण्याचा उपयोग झाला नाही. धर्माधर्माचा त्याला विसर पडला होता. ‘जानामि धर्मं न मे प्रवृत्तिः। जानामि अधर्मं न मे निवृत्तिः।’ असे तो कबूल करतो. असा हा मोहाचा परिणाम माणसाला विचारहीन बनवितो. आपलेच करणे बरोबर असेच त्याला वाटते. कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत माणूस नसतो. दुर्योधनाचा मोह हा अहंकारातून, सत्तालालसेतून, पांडवांच्या द्वेषातून निर्माण झाला होता. म्हणून आपले हक्काचे राज्य मिळवण्यासाठी पांडवाना कौरवांबरोबर युद्ध करावे लागले. ते धर्मयुद्ध होते. अधर्माविरुद्धचे होते.

महापराक्रमी अर्जुन सुद्धा मोहात अडकला. ‘सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेsअच्युत’ असे भगवंतांना सांगणारा अर्जुन समोर युद्धभूमीवर आप्तस्वकियांना व गुरुजनांना पाहून धर्मसंमुढ झाला. त्यांच्या विषयी करुणा निर्माण झाली. ‘ भ्रमतीव च मे मनः’ (१/३०) तो भ्रमित झाला. गांडीव गळून पडले. शरीराला कापरे भरले. क्षत्रिय धर्माचे आचरण कठीण झाले. या मोहाचे सामर्थ्य इतके जबरदस्त होते की, तो संन्यासाच्या गोष्टी करू लागला. स्वजनांना मारण्याचे पाप करण्यापेक्षा युद्ध न करण्याचा पळपुटेपणा त्याला योग्य वाटू लागला. युद्धाचा परिणाम कुलक्षयापर्यंत पोहोचला. ज्ञानेश्वर अर्जुनाच्या या स्वजनासक्तीचे वर्णन महामोह असे करतात. ‘तैसा तो धनुर्धर महामोहे। आकळीला। ।'(ज्ञा१/१९०) अर्जुनाचा पराक्रम, स्वधर्मनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा सर्व स्वजन मोहाने झाकले गेले. उलट तो श्रीकृष्णाला आपण कसे योग्य आहोत ते ऐकवू लागला. शेवटी धर्मसंमूढ झालेल्या त्याने श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. त्याला शरण गेला. ‘शिष्यस्तेsहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।’ (गी२/७). मोह दूर करण्याचे काम गुरुच करू शकतो. तेव्हा कृष्णाने गीतोपदेश केला. उपदेश करताना ते म्हणतात,

यदा ते मोहकलिलं बुध्दिर्व्यतितरिष्यति।

सदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च।

(गी२/५२)

जेव्हा तुझी बुद्धी हे मोहरूपी मालीन्य पार करून जाईल तेव्हाच या सर्व विचारातून तू विरक्त होशील. म्हणून मोह दूर करणे हे गीतेचे प्रयोजन ठरते. सगळी गीता सांगून झाल्यावर अठराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला विचारतात, ‘अर्जुना, तुझा मोह गेला की नाही?’ यावर अर्जुनाचे उत्तर फार सुरेख आहे. 

नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत।

स्थितोsस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव।।

(गी. १८/७३)

भगवंतांनी अर्जुनाचा मोह दूर केला. तो संशय मुक्त झाला. श्रीकृष्णाच्या बोलण्याप्रमाणे करायला तयार झाल्या. तशी कबुली त्याने दिली. मोहनिरसन हे गीतेचे फलित प्राप्त झाले. नातेवाईकांच्या विषयीच्या ममतेतून, करुणेतून अचानक निर्माण झालेल्या मोहाचे निरसन झाले. तो युद्धाला तयार झाला. अज्ञानाने नाही तर पूर्ण ज्ञान होऊन, स्वतःच्या इच्छेने. येथे कोणतीही बळजबरी नाही. अंधश्रद्धा नाही.

अर्जुनाला मोहाचे दुष्परिणाम सांगणारे पंधरा-वीस श्लोक तरी गीतेत आहेत. वेळोवेळी प्रसंगानुरुप ते सांगून अर्जुनाला मोह किती हानी कारक आहे आणि मोहातून बाहेर पडणे कसे श्रेयस्कर आहे हे भगवंतांनी अर्जुनाला पटवून दिले. आणि शेवटी अर्जुन जेव्हा युद्ध करायला तयार झाला तेव्हा भगवंतांची खात्री झाली की गीतोपदेशाचे सार्थक झाले.

अशाप्रकारे जग हे मोहाने बाधित झालेले आहे. रामायणात अगदी सीतेलाही कांचनमृगाचा मोह आवरला नाही. हा व्यक्तिगत पातळीवरचा आणि शुल्लक गोष्टीसाठी, तरीही तो तिला टाळता आला नाही. म्हणून राम रावण युद्ध झाले. तर अर्जुनाला स्वजनासक्ती रूप मोह झाला पण तो भगवंतांना टाळता आला. दूर करता आला. म्हणून महाभारताचे युद्ध झाले. दोन्हीत दुष्ट शक्तींचा पराभव आहे. पण दोघांच्या मुळाशी मोहच आहे.

 आपण तर सामान्य माणसं आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धा आहे, संघर्ष आहे, हेवेदावे मत्सर आहे. त्यातून अनेक मोहाचे प्रसंग येत असतात. त्यातूनच आपण आपल्याला सांभाळले पाहिजे. अर्जुनाला सावरणारा तो भगवंत आपल्याही हृदयात आहे याची जाण ठेवून त्याचे स्मरण करून विवेकाने अविवेकावर मात करावी. स्वतःचा तोल धळू देऊ नये. नेहमी सावध असावे. हेच अर्जुनाच्या उदाहरणांनी सर्व समाजाला भगवंतांना सांगायचे आहे. शेवटी आपण सारे अर्जुन आहोत.

मोहाविषयी सांगणारे गीतेतील श्लोक क्रमांक

२/६३, ४/३५, ५/२०, ६/३८, ७/१३, ७/२०, ७/२५, १५/५, १५/१९, १६/१६, १७/१३, १८/७, १८/२५, १४/२२……

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तिची अबोल शिकवण… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

??

तिची अबोल शिकवण ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

मुलगी सासरी येते तेव्हा एका डोळ्यांत आसूं व दुसर्‍या डोळ्यांत हासूं घेऊनच येते. एका डोळ्यांत माहेर दूर करावे लागल्याचे दुःख तर दुसर्‍या डोळ्यांत नवीन स्वप्न असतात. वियोगाचेच दुःख असले तरी आपण सासरी येतांनाच्या भावना वेगळ्या व मुलगी सासरी पाठवतांनाच्या भावना वेगळ्या असतात.

माझी लेक सासरी गेली व थोड्याच दिवसात मुलगा परदेशात शिकायला गेला त्यावेळी आमचं घरटं खर्‍या अर्थाने रिकाम झालं. मला तर काहीही करण्याचा उत्साह वाटेनासा झाला होता. जगणं जणू काही थांबलं आहे असंच वाटायला लागलं होतं. अगदी अंथरूणच धरलं होत मी.

असं असलं तरी कामं तर करावीच लागत होती. एकदा मला माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून बुलबुल पक्षाचं घरटं दिसलं. पक्षाचं इवलंस पिल्लू सतत चोच उघडं ठेवून होतं. पक्षीण दिवसभर त्याला भरवायची. हळूहळू ते मोठं झालं. मला रोजच ते बघायचा नादच लागला होता.

त्या पिल्लाला पंख फुटले आणि पक्षिणीने त्या पिल्लाला उडायला शिकवलं व ते घरट्याबाहेर निघालं. ती स्वतः उंच उडवून दाखवून पिल्लाला आणखी उंच उडायला शिकवत होती. ही प्रक्रिया बघतांना मला एक लक्षात आलं; ते पिल्लू अगदी छोटं होतं तरी एकदा घरट्यातून निघाल्यावर परत घरट्यात गेलं नाही. पक्षिणीचं भक्ष्य शोधायला व उडायला शिकवणं अव्याहत चालू होतं. मांजरापासून व इतरांपासून ती रक्षणही व्यवस्थित करत होती.

थोड्या दिवसांनी पंखात पुरेसं बळ आल्यावर पिल्लाचं रक्षण करण्याची तिची जबाबदारी संपली. पिल्लूही स्वतंत्रपणे उडून गेलं व पक्षीणही स्वतःचं नवीन जीवन जगायला स्वतंत्र झाली. दोघांनीही आपलं स्वतंत्र विश्व उभारलेलं असणार होतं.

माझ्याही डोक्यात एकदम उजेड पडला. त्या पाखरांची अबोल शिकवण मला खूप काही शिकवून गेली. मलाही उमगलं; पंख फुटलेल्या आपल्या पाखरांना झेप घेऊ देणच योग्य आहे. आपल्यालाही आपले पुन्हा नवीन विश्व उभारता येते. समाजात; समाजकार्य करण्यासाठी अथवा मन रमवण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत.

खरंच ते छोटसं पाखरूं मला खूप मोठी जीवनदृष्टी देऊन गेलं. त्यानी मला नव्यानी जगायला शिकवलं. मग माझ्याही जीवनात मी नव्यानी रंग भरायला सुरवात केली.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares