मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 60 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान – लेखांक एक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 60 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान – लेखांक एक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर,  “आपल्याला सार्‍या मानवजातीला आध्यात्मिक प्रेरणा द्यायची आहे, तेंव्हा आपला भर तत्वांचा, मूल्यांचा, आणि विचारांचा प्रसार करण्यावर हवा. संन्यास घेतलेल्यांनी किरकोळ कर्मकांडात गुंतू  नये”. असे मत नरेंद्रनाथांचे होते. या मठातलं जीवन, साधनेला वाहिलेलं होतं. अभ्यासाबरोबर ते सर्व गुरुबंधुना पण ते प्रोत्साहित करू लागले की, भारत देश बघावा लागेल, समजून घ्यावा लागेल. लक्षावधी माणसांच्या जीवनातील विभिन्न थरांमध्ये काय वेदना आहेत, त्यांच्या आकांक्षा पूर्ण न होण्याची कारणे काय आहेत ते शोधावे लागेल. हे ध्येय समोर ठेऊन ,भारतीय मनुष्याच्या कल्याणाचे व्रत घेऊन स्वामी विवेकानंद यांचे हिंदुस्थानात भ्रमण सुरू झाले.

परिव्राजक स्वामीजी सगळीकडे फिरून आता धारवाड, बंगलोर करत करत म्हैसूरला आले. म्हैसूर संस्थांचे दिवाण सर के. शेषाद्री अय्यर यांच्याकडे स्वामीजी राहिले होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे महाराज चामराजेंद्र वडियार यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी स्वामीजींना संस्थानचे खास अतिथि म्हणून राजवाड्यावर ठेऊन घेतले. एव्हढी सत्ता आणि वैभव असलेल्या या तरुण महाराजांना धर्म व तत्वज्ञान याविषयी आस्था होती. म्हैसूर हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थांनांपैकी एक होते. इथे अनेक विषयांवर स्वामीजी बरोबर चर्चा आणि संवाद घडून येत.

महाराजांशी स्वामीजींचे चांगले निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यांनी एकदा स्वामीजींना विचारलं स्वामीजी मी आपल्यासाठी काय करावं ? त्यावर तासभर झालेल्या चर्चेत स्वामीजी म्हणाले, “भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान घेतले पाहिजे. आपल्या समजतील सर्वात खालच्या थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे आणि धर्माची खरी तत्वे सामान्य माणसाला समजून सांगितली पाहिजेत. शिकागोला जाण्याचा विचार ही त्यांनी बोलून दाखवला होता, त्यांना स्वामीजींनी शिकागोहून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे “हे उदार महाराजा, मानवाचे जीवन फार अल्पकालीन आहे आणि या जगात हव्याशा वाटणार्‍या सुखाच्या गोष्टी केवळ क्षणभंगुर आहेत. पण जे इतरांसाठी जगतात तेच खर्‍या अर्थाने जगतात. भारतातील तुमच्यासारखा एखादा सत्ताधीश जर मनात आणेल, तर तो या देशाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी महान कार्य करू शकेल. त्याचे नाव पुढच्या पिढ्यांत पोहोचेल आणि जनता अशा राजाबद्दल पूज्यभाव धरण करेल”. यावरून स्वामीजीं स्वत:साठी काहीही मागत नसत. इथून महाराजांचा निरोप घेऊन स्वामीजी केरळ प्रदेशात गेले.

त्रिचुर, कोडंगल्लूर,एर्नाकुलम, कोचीन इथे फिरले. केरळ, मलबार या भागातल्या जुनाट चालीरीती आणि ख्रिस्त धर्मी मिशनर्‍यांचा तिथे चाललेला धर्मप्रचार या गोष्टी स्वामीजींच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं की हिंदू धर्माच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही. स्वामीजींना उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आलेले अनुभव वेगळे होते. त्यांच्या लक्षात आले की, दक्षिणेत पाद्री लोक खालच्या वर्गातील लाखो हिंदूंना ख्रिस्त धर्मात घेत आहेत. जवळ जवळ एक चतुर्थांश लोक ख्रिस्त धर्मात गेले आहेत.

कोचीनहून स्वामीजी त्रिवेंद्रमला आले. एर्नाकुलम पासून त्रिवेंद्रम सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर, बैलगाडी आणि पायी प्रवास करताना केरळचं निसर्ग वैभव त्यांना साथ करत होतं. आंबा, फणस, नारळ यांची घनदाट झाडी, लहान मोठ्या खाड्या, पक्षांचे मधुर आवाज असा रमणीय रस्ता स्वामीजी चालत होते.

कन्याकुमारी भारत वर्षाच्या दक्षिणेचे शेवटचे टोक. त्रिवेंद्रम हून नव्वद किलोमीटर. २४ डिसेंबरला त्रिवेंद्रमहून स्वामीजी निघाले आणि कन्याकुमारीला पोहोचले. संपूर्ण वंदेमातरम  या गीतातलं मातृभूमीचं वर्णन स्वामीजींनी ऐन तारुण्यात ऐकलं होतं. याच वर्णनाचा भारत देश स्वामीजींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे हजारो किलोमीटर प्रवास करून पालथा घातला होता. डोळ्यात साठवून ठेवला होता.वर्तमानकालीन भारताचं विराट दर्शन त्यांना घडलं होतं. शतकानुशतके आपला समाज निद्रितवस्थेत आहे आणि तो आपला वारसा विसरला आहे,रूढी परंपरा यांचा दास झाला आहे असं भीषण चित्र त्यांना दिसत होतं. अशी ही स्वदेशाची आगळीवेगळी यात्रा  करायला त्यांना अडीच वर्ष लागली होती. कन्याकुमारीच्या आपल्या मातृभूमीच्या दक्षिण टोकावरच्या खळाळत्या लाटांच्या हिंदुमहासागराला ते भेटणार होते आणि या अथांग सागराला वंदन करून आपल्या विराट भ्रमणाची पूर्तता करणार होते. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्यूज उडालेले बल्ब… लेखक – जोशी काका☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ फ्यूज उडालेले बल्ब… लेखक – जोशी काका ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

सर्व फ्यूज उडालेले बल्ब एक सारखेच असतात !…… 

एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महालासारखे सरकारी घर सोडून एका हाउसिंग सोसायटीत, त्यांच्या स्वत:च्या फ्लॅट मध्ये राहायला गेले. ते सेवा निवृत्त असले तरी, अजूनही स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं. ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्क मध्ये फिरत असतांनासुद्धा, दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहात असत.

एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा-गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत.  

प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत. 

ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, “सेवानिवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो, की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही, केवळ नाइलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे.” आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे  त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत.

बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली, तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली.

ते म्हणाले, “सेवानिवृत्त झाल्यावर, आपण सगळेच फ्यूज उडालेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची वॅट क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला.”

पुढे ते म्हणाले, “मागील 5 वर्षांपासून मी ह्या सोसायटीत रहात आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो. तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत, जे भारतीय रेल्वेत महाप्रबन्धक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तिकडे सिंग साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते.  तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रो (ISRO) च्या प्रमुख पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत.

— आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, अगदी मलासुद्धा, पण मला  माहीत आहे—- 

“सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता  एक समानच आहेत – त्यांची वॅट क्षमता काहीही असो  – 0, 10, 40, 60, 100 वॅट – आता त्याने काहीही फरक पडत नाही. आणि यामुळेसुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज  उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता – एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा.

— आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते— 

ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल.

उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात.

परंतु, खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते. इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही. ही गोष्ट जितक्या लवकर  समजेल तितके चांगले आहे.”

आपलं वर्तमान पद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात. 

या गोष्टींबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता, आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो. 

— लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात. 

— आज, आपल्या जवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा .

लेखक : जोशी काका

प्रस्तुती : सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी… लेखक – श्री अजित दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी… लेखक – श्री अजित दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हैदराबाद येथे  एका मंदिराचे उदघाटन केले आणि ही बातमी स्मृती पटलाच्या एका उंच जागेवर कुठेतरी जाऊन पडून राहिली होती … 

मागील एका शनिवारी हैदराबाद येथे अचानक जाण्याचा योग आला आणि वरील बातमीची आठवण झाली व लगेच गूगल काकांची मदत घेण्यात आली .. त्यांनी असे सांगितले की ‘ स्टॅच्यु ऑफ इक्वालिटी ‘ असे त्याचे नाव असून ते हैदराबाद पासून फक्त  ३७ कि मी अंतरावर आहे. 

स्टॅच्यु  ऑफ इक्वालिटी असे वाचल्यावर प्रथम वाटले की हे सर्व धर्म सद्भावना वगैरे पैकी ठिकाण असावे … पण मला चांगलीच उत्सुकता होती बघायची कारण श्री नरेंद्र मोदी यांनी त्याचे उदघाटन केले होते… 

तर कामात वेळ काढून मी रविवार दिनांक १२ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा: एकदा गूगल काकांना विचारून येथे जायला निघालो . यावेळी मॅप वर अंतर दाखवले गेले ३७ किमी, आणि अंतर कापण्यास लागणार वेळ ३४ मिनिटे .. हे कसे शक्य आहे अशा  विचारात असतानाच लक्षात आले की मार्ग हा आऊटर रिंग एक्सप्रेस रोड येथून पोहोचतो पुढे …  आणि खरोखरीच हा एक्सप्रेस हायवे प्रत्येक बाजूने सहा लेनमध्ये 

विभागलेला असून त्यातील दोन लेन या अनुक्रमे ८० व १०० एव्हढ्या किमान वेगासाठी राखीव आहेत.  अशी मोकळीक मिळाल्यावर काय मग गाडी आपोआपच सुस्साट निघाली. आणि ठरलेल्या वेळात पोचलो देखील ..

मुख्य गेट समोरचे गणवेशातील सुरक्षा अधिकारी तत्परटेने पुढे आले आणि बाजूतील रस्त्याने मार्गक्रमण करण्यास सांगितले . मी थोडा साशंक झालो, कारण हा रस्ता मागील बाजूला जात असून गाडी लावून खूप अंतर चालले जाऊ शकले असते.. इतक्यात अजून एक चेक पोस्ट व अधिकारी समोर आला आणि सांगितले की पार्किंग चे ३० रु द्यावे लागून ते मी कुठल्या प्रकारे भरणार आहे अथवा फास्ट टॅग असल्यास मी त्यातून घेऊ शकतो असे तो म्हणाला. आता मला फास्ट टॅग फक्त रस्त्यावर चालतो एव्हढेच माहित होते तरी पण मी त्याला हो म्हटले… त्याने लगेचच एक छोटे गॅजेट काढून फास्ट टॅग ट्रॅन्झॅक्शन पूर्ण केले देखील. 

पुढे साधारण अर्धा किलोमीटरवर गाडीतळ असून एका दर्शिकेवर स्वागत करून येथे थांबण्यास सांगितले गेले. काही मिनिटातच दोन इलेक्ट्रिक व एक डिझेल बस या गाड्या हजर झाल्या आणि त्यांनी तत्पर मुख्य दरवाज्याकडे सोडले. येथे असे कळले की आत जाण्यासाठी तिकीट काढावे लागेल २०० रुपयांचे … 

तिकीट काढताच सांगण्यात आले की मोबाइल फोन हे जमा करावे लागतील व त्याची व्यवस्था लगेच करण्यात आली… 

पुढे अतिशय शिस्तबद्ध अशी रांग असून आत जाणाऱ्यांना हातावर टॅटू काढण्यात आला … फरक एवढाच की टॅटू हा ओम ह्या चिन्हाचा असून प्रत्येक व्यक्तीच्या हातावर ऐच्छिक स्वरूपात फुकट नोंदवला जातो. पुढे अश्याच प्रकारे कपाळावर पण गंध लावण्यात आले …. आणि येथूनच सुरु झाली १०८ मंदिरांची परिक्रमा . ही मंदिरे भगवान विष्णू यांचे  १०८  अवतार असून यापुढील प्रत्येक मंदिरामध्ये एक पुजारी आणि एक स्वयंसेवक / सेविका आपल्यासाठी त्या मंदिराचे महत्व आणि त्या अवतारासंबंधी मंत्र घोष आपल्याकडून म्हणून घेतात … प्रत्येक मंदिर हे विशिष्ठ आकारात असून त्या त्या अवतारासंबंधित बांधणी ह्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. उदाहरणार्थ वन अवतार दाखविताना मंदिर हे एका झाडातून कोरण्यात आले आहे असे वाटते. अतिशय अद्भुत अशी ही योजना वाटते … 

पुढे सर्व १०८ मंदिरांचे दर्शन संपल्यावर वेळ येते ती रामानुजाचार्य यांची भव्य प्रतिमा जवळून पाहण्याची … अनेक पायऱ्या चढून गेल्यावर एक मजला हा त्यांच्या सुवर्ण प्रतिमेसाठी  राखण्यात आलेला आहे… ही प्रतिमा जवळपास सहा फूट इतकी मोठी असून संपूर्ण सोन्याची आहे…  या पुतळ्यासाठी 120 किलो सोनं वापरण्यात आलं असून त्याची निर्मिती भद्रपीठम इथे झाली. रामानुजाचार्य 120 वर्षं जगले, त्यामुळे 120 किलो सोनं या पुतळ्यासाठी वापरण्यात आलं असे सांगितले जाते ….  अर्थातच येथे सुरक्षा कडक असून उगाचच जास्त वेळ थांबू दिले जात नाही.. पण दर्शन व्यवस्थित करू दिले गेले आणि प्रत्येकाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट हा आशीर्वादाच्या स्वरूपात पुजारी ठेवतात …  

दर्शन झाल्यावर पुढील मजला हा भव्य पुतळ्यास्वरूपात आहे, याची उंची २१६ फूट असून हा सुवर्ण रंगात ल्यालेला आहे. येथूनच आजूबाजूला सुंदर परिसर दृश्य होतो … अतिशय सुंदर रस्ते, आजूबाजूला उभारू पाहिलेल्या अनेक मजली इमारती, हवा थंड ठेवणारी झाडे असा हा परिसर आहे… 

खाली उतरल्यावर लगेचच एग्झिट गेट असून मोबाइल फोन परत मिळण्याचे ठिकाण होते.. हाताळण्याची अतिशय शिस्तबद्ध पद्धत आणि वागणूकही विनयशील असे हे सर्व कर्मचारी निमूटपणे आपले काम करीत होते. 

योगायोग असा होता की रविवारचा तो दिवस ब्रम्होत्सव सुरु होता आणि एक मोठा यज्ञ श्री चिन्न जियरस्वामी ह्यांच्या हस्ते सुरु होता …. मंत्र घोषांनी भारावलेला तो परिसर एका वेगळ्या सृष्टीत घेऊन गेला … 

विविध वनस्पतींच्या त्या समिधा, शुद्ध तुपातील अर्घ्य, मंत्रांचा जयघोष एखाद्या पौराणिक कथेप्रमाणे वाटत होते …   स्वतः स्वामीजी अनेक मंत्र घोष करीत असून माईकवर त्या संबंधी विवरण हे स्थानिक भाषा आणि इंग्रजीमधेही सांगत होते… 

येथे हे नक्की सांगावे लागेल की श्री रामानुजाचार्य हे आद्य संत होते, ज्यांनी सर्व जाती समावेशक मंदिर प्रवेशाची द्वारे उघडली होती, आणि ती ही तब्बल एक हजार वर्षांपूर्वी … 

पुढे बाहेर  आल्यावर अतिशय निगुतीने तेथील स्वयंसेवक पुढे आला आणि म्हणाला की त्वरित प्रसाद-लाभ घ्यावा कारण तो संपण्याच्या मार्गावर आहे… मग काय पाय लगेच तिथे वळले, कारण या सर्व उलाढालीत भूक लागलेली कळलीच नव्हती, दुपारचे चार वाजूनही प्रसाद अजूनही दिला जात होता  … 

पोटभर भात, भाजी, रसम, ताक आणि लोणचे ह्याच्यावर  चांगलाच ताव मारून तृप्त मनाने बाहेर पडलो ते पार्किंगला जाईपर्यंत …. पुनः इलेक्ट्रिक गाडीत बसण्यासाठी … 

लेखक : श्री अजित दांडेकर

पुणे

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त – दुसरी बाजू ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त  – “दुसरी बाजू…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आठ मार्च,महिलादिन. आजकाल बरेच ठिकाणी महिलादिन वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरे केले जातात.खरंतरं महिलादिनी सरसकट महिलांची अपेक्षा असते की हार,बुके सत्कार समारंभा ऐवजी तिला आधी एक स्वतंत्र विचार, स्वतंत्र भावना,स्वतंत्र आवड आणि स्वतंत्र मत असलेली व्यक्ती म्हणून आधी समजून घेतल्या जावं, तिच्या कष्टांची दखल घेतल्या जावी.

आपण सगळ्याजणी तशा नशीबवान. आपण अशा घरात जन्म घेतला जेथे कदाचित महिलादिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नव्हता पण संपूर्ण वर्षभरच जणू महिलादिन असल्यासारखी मोकळी हवा,मोकळा श्वास, मुलगी म्हणून कुठलिही दुय्यम दर्जाची वागणूक आपल्याला कधीच मिळाली नाही त्यामुळे माहेरी महिलादिन हा काही वेगळा साजरा करावा असे प्रकर्षाने कधीच वाटले नाही.

पुढे लग्न झालं. ति.आईंनी एका महिलेचं दुसऱ्या महिलेशी कसं सख्य असू शकतं हे आम्ही एकाच छताखाली तीस वर्षे म्हणजे मी त्यांच्याजवळ राहून शिकायला मिळालं,त्यामुळे वेगळा महिला दिन साजरा करायचा विचार खरतर मनात आलाच नाही.

“अहो”नी संसाराच्या वाटचालीत तो सुरळीत आणि व्यवस्थित चालविण्याचा कासरा मोठ्या विश्वासाने हाती निश्चींतपणे सोपविला. अर्थातच आपले स्वतः चे बाबा सोडून , मग अहोंपासून नंतरची पिढी “मेन वील बी मेन “असल्यासारखी तोंडाने कौतुक कधीच करणार नाही पण नजरेतील विश्वास कधीकधी त्याहीपेक्षा जास्त सांगून जातो. त्यामुळे ही नजरेतील पसंतीची पावती हाच माझा महिलादिन.

पुढे लेक मात्र नवीन पिढीप्रमाणे महिलादिन स्पेशल म्हणून फेसबुक वर पोस्ट टाकू लागला,पिझ्झा पार्टी घडवू लागला.आणि असं करतांना आईमुलातं मित्रमैत्रीणीचा मोकळेपणा कधी आणि कसा येतं गेला तेच कळलं नाही.पण जेव्हा व्यंकटेश अगदी लहानातल्या लहान गोष्टीपासून ते महत्वाच्या मोठ्या गोष्टींपर्यंत सगळ्यात आधी.,बेझिझक मला सांगू लागला तोच माझा महिलादिन ठरला.

पुढे नोकरीच्या ठिकाणी जेव्हा सहकारी वर्ग आपल्यावर कामाची जबाबदारी सोपवून ते काम निटनेटकं होऊनच पुर्णत्वाला मी नेणारच ही खात्री, विश्वास बाळगून निश्चींत होऊ लागला नं तोच माझा महिलादिन ठरला.

तसेच मित्रमैत्रीणी, जवळील लोकं, माझा रोजचा वाचक वर्ग हा माझ्यातील लेखणीला, माझ्या भावनांना, विचारांना, माझ्या सवयींना हा माझा पेक्षाही जास्त ओळखू लागला आणि माझ्यावर भरभरून प्रेम करु लागला तोच माझा महिलादिन ठरला.

असो बरेच वेळा सत्कारसमारंभ, बुके,फुलं आणि गिफ्ट ह्यांच्यापेक्षाही ही भावनांनी जोडलेली नाती बाजी मारुन जातात नं तेव्हाच खरा महिलादिन धुमधडाक्यात साजरा झाल्याचा फील येतो हे मात्र खरं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

(धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते. … आता पुढे)

त्याचदिवशी आमच्या गिरगावातल्या ठाकूरद्वार नाक्यावरचे  इराणी हॉटेल ” सनशाईन ” चा शेवटचा दिवस होता. त्यानंतर ते हॉटेल कायमचे बंद होणार होते. आमच्या लहानपणीच्या कडक ब्रून मस्का पाव आणि मावा सामोसाच्या आठवणी त्या हॉटेलशी निगडित होत्या त्यामुळे माझ्या मित्रांबरोबर मॅरेथॉन मेडल मिळाल्याचे सेलिब्रेशन हे ठाकूरद्वारच्या सनशाइन इराण्याकडेच झाले.

४८ व्या मेडल साठी  १० डिसेंबर २०२२ अभिजित भोसले, निखिल पोवार आणि मी असे आम्ही तिघे जण गोव्याला गेलो. ज्या ठिकाणी मी माझे पहिले मॅरेथॉन मेडल कमविले होते तेथे मधली कोरोनाची २ वर्षे सोडली तर दरवर्षी मी धावायला जात आलो आहे. अभिजित आणि निखिल पोवार  ह्यांनी १० कि मी मध्ये भाग घेतला होता तर. मी २१ कि मी मॅरेथॉन धावलो. गोव्याचा धावण्याचा मार्ग हा चढ उताराचा असल्याने आणि तेथील हवेतली आद्रता जास्त असल्याने, तेथे धावताना चांगली वेळ देणं खूप कठीण असते तरीही मी ती  मॅरेथॉन २ तास ५२ मिनिटात धाऊन पुरी करून माझे ४८ वे मॅरेथॉन मेडल मिळविले.

आता पुढची मॅरेथॉन १५ जानेवारी २०२३ ला होती ती, आपल्या भारतातली १ नंबरची मॅरेथॉन म्हणजेच टाटा मुंबई मॅरेथॉन. त्या मॅरेथॉनसाठी धावायला खूप जण उत्सुक असतात पण सगळ्यांनाच धावायला मिळतेच असे नसते. त्याचे रजिस्ट्रेशन खूप आधी करायला लागते. ह्या नावाजलेल्या मॅरेथॉनसाठी ह्यावर्षी जवळ जवळ ५५००० जणांनी भाग घेतला होता. ह्या मॅरेथॉन मार्गात एक केम्प्स कॉर्नरचा ब्रिज काय तो चढ लागतो बाकी सरळ रस्ता, समुद्र किनारा, वांद्रे सी लिंक आणि हवेतील गारठा ह्यामुळे ह्या मॅरेथॉनला धावायला खूप मजा येते. धावण्याच्या मार्गात आम्हा रनर्सना चिअर अप करायला दुतर्फा खूप माणसे उभी असतात त्यामुळे धावायला जोर ही येतो. ह्यावर्षी वातावरणात अती थंडावा असल्याने आम्हां सगळ्या रनर्सना ह्या मॅरेथॉनचा चांगल्या तऱ्हेने आनंद घेता आला त्यामुळे हे माझे २१ कि मी धाऊन ४९ वे मॅरेथॉन मेडल मी २ तास ३२ मिनटात मिळविले. तेथेच गिरगांव  चौपाटीच्या आयडियल हॉटेल मध्ये नेहमी प्रमाणेच माझ्या काही गिरगावातल्या मित्रांबरोबर सेलिब्रेशन करून माझ्या ५० व्या मॅरेथॉन मेडल साठी सगळ्या मित्रांच्या शुभेच्छा घेतल्या.

आता वेध लागले ते माझ्या ५० व्या मॅरेथॉनचे. १२ फेब्रुवारी २०२३ ला हिरानंदानी ठाणे हाल्फ मॅरेथॉन होती. माझे होम पीच. ह्यावेळेला गेल्या महिन्यांत माझ्याबरोबर गोव्याला धावलेला माझा मित्र निखिल पोवार हा ही धावणार होता. गोव्याला त्याची पहिलीच मॅरेथॉन तो दहा कि मी धावला होता पण हिरानंदानी मॅरेथॉनसाठी त्यांनी माझ्या आग्रहात्सव २१ कि. मी.मध्ये सहभाग घेतला होता. ही मॅरेथॉन हिरानंदानी इस्टेट पासून चालू होऊन ब्रह्माण्ड वरून हायवे क्रॉस करून खेवरा सर्कल, उपवन ते थेट येऊर डोंगरच्या पायथ्याशी जाऊन परत फिरते. तसे  बघायला गेलो तर ह्या मॅरेथॉनचा मार्ग चढणीचा असल्याने मॅरेथॉनची चांगली वेळ नोंदवणे कठीण असते. पहाटे ५.३० ला मिलिंद सोमण ह्याने मॅरेथॉनला फ्लॅग दाखवून धावायला सुरवात झाली. निखिल आणि मी बरोबरीने धावत होतो. दोघेही एकमेकांना साथ देत होतो. काही वेळेला मी पुढे गेलो तर निखिल मागून त्याचा वेग वाढवून माझ्या बरोबर धावत होता. आम्ही दोघेही १६ कि मी पर्यंत पुरते दमलो होतो. निखिल तरुण वयाचा तिशीतला जरी असला तरी त्याच्याकडे धावण्याचा अनुभव कमी होता तर माझ्याकडे धावण्याचा दांडगा अनुभव जरी असला तरी वाढीव वयाचा अडसर होत होता. शेवटचे दोन किमी खूप थकायला झाले होते तरीही ही माझी ५० वी मॅरेथॉन मी २ तास २९ मिनिटांत पूर्ण केली आणि माझे ५० वे मेडल माझ्या गळ्यात पडले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिला आला तरच जिंकला असे नसते तर स्वतःचा चांगला परफॉर्मन्स देणे म्हणजे जिंकल्यासारखेच असते आणि तो मी माझ्या ५० व्या मॅरेथॉनला दिला होता.

हे ५० वे मेडल म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातली मोठी कमाई आहे. माझी ही सगळी ५० मेडल म्हणजे माझ्या तिजोरीतली नाही तर भिंतीवर प्रदर्शित केलेली माझी अनमोल संपत्ती आहे, जिची कधीही, कोणीही किंमत करू शकत नाही तसेच ती कोणीही माझ्यापासून चोरून किंवा हिरावून घेऊ शकत नाही. मॅरेथॉनचा ५० मेडलचा एक टप्पा मी पार केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच  १३ फेब्रुवारील मला ६२ वर्षे पूर्ण होणार होती त्याच्या एक दिवस आधी देवानेच मला मोठे बक्षीस मिळवून दिले होते, अर्थात ह्या मध्ये माझे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी आणि रेषा चा हातभार खूप आहे. तुमचे माझ्यावरचे प्रेम आणि तुम्ही मला देत असलेले प्रोत्साहन, ह्यामुळेच मला धावायला अजून ऊर्जा मिळते.

… असेच माझ्यावरचे प्रेम तुमचे द्विगुणित होऊ दे आणि माझ्या धावण्यासाठी तुम्ही देत असलेले प्रोत्साहन मला मिळत राहिले  तर पुढच्या पाच वर्षात माझे १०० वे मॅरेथॉन मेडल नक्की माझ्या गळ्यात असेल ह्याची मला खात्री आहे.

— समाप्त — 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शेक्सपिअरचं स्ट्रॅटफोर्ड” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “शेक्सपिअरचं स्ट्रॅटफोर्ड” ☆ श्री मोहन निमोणकर ☆

प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते हेच खरं ! २०१४ ते २०१९ या पाच वर्षात आमची चार वेळा इंग्लंड भेट झाली; पण शेक्सपिअरच्या गावाला भेट द्यायचा योग आला तो २०१९ सालीच ! प्रत्येक भेटीत माझ्या मुलाला, आशिषला स्ट्रॅटफोर्ड अपऑन ॲव्हॉनला नेण्याविषयी सांगायचो; पण काही ना काही कारणानं जमत नव्हतं. मात्र, या वर्षी त्या दोघांनी तिथं जाण्याचा चंगच बांधला आणि योग आणलाच.

ॲव्हॉन नावाच्या नदीवरील स्ट्रॅटफोर्ड हे शेक्सपिअरचं जन्मगाव…साउथ वार्विक शायरमधील हे गाव. इथं ज्या इमारतीत शेक्सपिअरचा जन्म झाला त्या वाड्यावजा इमारतीत ‘शेक्सपिअर जन्मस्थान ट्रस्ट’ नं उत्तमरित्या त्यांच्या जन्माच्या वेळच्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. मुळात इंग्रज हा परंपरावादी, त्यामुळेच त्यांनी या जगप्रसिध्द नट, लेखक आणि थिएटर मॅनेजरची १६/१७ व्या शतकातली, त्यानं आणि त्याच्या कुटुंबानं अनुभवलेली जीवनविषयक माहिती जतन करून, प्रदर्शनाव्दारे त्याची आजच्या पिढीला ओळख करून दिली आहे. या संग्रहालयाने शेक्सपिअर आणि त्यांच्या कुटुंबानं अनुभवलेल्या प्रसंगावंर टाकलेल्या प्रकाशामुळे, हा एक मोठा माणूस आणि लेखक, म्हणून आपणास जास्त समजू शकतो.

शेक्सपिअरच्या वयाच्या ३७ व्या वर्षी, म्हणजे १६०१ मध्ये ही जन्मस्थानची जागा त्याला वडिलांकडून मिळाली. मुळात शेक्सपिसरला राहायला भरपूर जागा असल्यानं त्यानं वडिलांकडून मिळालेल्या जागेतून काही पैसे कमवावेत असा विचार केला आणि त्यानं ती जागा एलिझाबेथ फोर्ट नावाच्या बाईला हॉटेलसाठी भाड्यानं दिली. एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर १८४६ मध्ये इमारत विक्रीला काढली गेली. तेव्हा ‘शेक्सपिअर जन्मस्थळ ट्रस्ट’ नं ती विकत घेऊन हे संग्रहालय उभं केलं. आजही त्या जन्मस्थळाची देखभाल ते करत आहेत. हे संग्रहालय उभं करण्यात आणि असे राष्ट्रीय स्मारकामध्ये अंतर्भूत करण्यासाठी जी चळवळ उभारली गेली, त्यात डिकन्सचा सहभाग महत्त्वाचा होता. त्यानं १८३८ मध्ये या जन्मस्थळास भेट दिली होती आणि त्यापासूनच त्याला स्फूर्ती मिळाली. शेक्सपिअरच्या जन्माच्या खोलीत एका खिडकीच्या काचेवर प्रेक्षक आपली आठवण म्हणून नावं लिहून ठेवत. त्यात प्रसिध्द स्कॉटिश लेखक वॉल्टर स्कोंट, तत्त्ववेत्ता थॉमसर कार्लाईल, चार्ल्स डिकन्स, शेक्सपिअरच्या काळातील दोन महान नट एलन टेटी आणि हेन्नी आयर्विंग यांचा समावेश आहे. या संग्रहालयातील वस्तूंवर म्हणजे कपडे, बिछाने आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरून शेक्सपिअरची माहिती मिळते.

शेक्सपिअर ३७ नाटके, १५४ सुनीते (sonnets), ५ पदविधारी काव्यं (titled) लिहू शकला आणि आपल्यासाठी अक्षरशः लाखो शब्दांमधून विचारांचा अमूर्त ठेवा ठेवून गेला. त्याची नाटकं शाळा, विद्यापीठे, नाट्यगृहे, बागा आणि तुरुंगातही सादर केली जातात. शेक्सपिअरचा हा अमूल्य साहित्यिक ठेवा जतन करण्याचं कार्य ट्रस्टनं केलं असलं, तरी इंग्लंडमधील एका दैनिकात आलेली बातमी वाचून मन विषण्ण होतं. ती बातमी म्हणते, की ‘ विद्यार्थ्यांसाठी शेक्सपिअर खूप कठीण आहे! ‘डिजिटल टेक्नॉलॉजी ॲडॉब’ ने २००० साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, २९ टक्के विद्यार्थ्यांना असं वाटतं, की शेक्सपिअरची नाटकं आधुनिक तंत्रात बसवली, तर ती चटकन समजतील. शेक्सपिअर चांगला समजायचा असेल, तर व्हिडिओ आणि ॲनिमेशनचा उपयोग करायला हवा असेही काहीजण म्हणतात.’  असो. मी मात्र माझं १९७० सालापासूनचं स्वप्नं पूर्ण झाल्यानं आनंदात होतो.

©️ श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भारतात होळी साजरी करण्याच्या विविध परंपरा…” लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “भारतात होळी साजरी करण्याच्या विविध परंपरा…” लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

होळी हा रंगांचा सण आहे. रंगांशी खेळण्यासाठी आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो. होळी हा भारतातील महत्त्वाचा सण असल्याने तो उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळी हा सण एकच असला तरी तो सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दक्षिण भारतातील लोक उत्तर भारतातील लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. एकूणच, एकच सण साजरे करण्याची ही मनोरंजक विविधता भारताला विविधतेचे प्रतीक बनवते.  भारतातील होळी साजरी करण्याच्या विविध विचित्र आणि परंपरां.ज्या जाणून आपण  देखील आश्चर्यचकित व्हाल.

लाठमार होळी, बरसाना

बरसाणे यांची लाठमार होळी खूप प्रसिद्ध आहे. या निमित्ताने लोकांनी इथे यावे आणि लोक या परंपरेचे पालन कसे करतात ते पहावे. हे ठिकाण मथुरेपासून २७ किमी अंतरावर आहे. येथे होळी केवळ रंगांनीच नाही तर काठ्यांनीही खेळली जाते. असे म्हटले जाते की बरसाना येथे भगवान कृष्णाने राधाचा पाठलाग केला, त्यानंतर तिच्या मित्रांनी भगवान कृष्णाचा काठीने पाठलाग केला. तेव्हापासून येथे महिला पुरुषांचा काठीने पाठलाग करतात

योसांग, मणिपूर

मणिपूरमध्ये होळीचा सण पाच दिवस साजरा केला जातो. जो यावल शुंग या नावाने ओळखला जातो. या दिवशी लोक भगवान पखंगबाला वंदन करतात. सूर्यास्तानंतर, लोक यासोंग मैथबा नावाची झोपडी जाळण्याच्या विधीसह या उत्सवाची सुरुवात करतात. हे नाकथेंग परंपरेचे पालन करते, जिथे मुले घरोघरी देणगी गोळा करतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मुली दान मागतात. तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी एकमेकांना रंग लावून अनोख्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो.

होला मोहल्ला, पंजाब

पंजाबमध्ये होळीनंतर एक दिवस शीख धर्मीयांकडून होला मोहल्ला साजरा केला जातो. दहावे शीख गुरु गुरू गोविंद सिंग यांनी समुदायातील युद्ध कौशल्य विकसित करण्यासाठी होला मोहल्ला उत्सव सुरू केला. ती येथे योद्धा होळी म्हणून ओळखली जाते. येथे योद्धे आपले पराक्रम दाखवण्यासाठी स्टंट करतात.

मंजुल कुली, केरळ

दक्षिण भारतात होळी हा सण उत्तर भारतात तितक्या धूमधडाक्यात साजरा केला जात नसला तरी काही समुदाय हा सण साजरा करतात. केरळमध्ये होळीला मंजुळ कुली म्हणून ओळखले जाते. येथील गोसारीपुरम तिरुमाच्या कोकणी मंदिरात रंगांचा हा सण साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी लोक मंदिरात जातात आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण एकमेकांवर हळदीचे पाणी शिंपडतात आणि लोकगीतांवर नाचतात.

शिग्मो, गोवा

गोवा हे खुद्द मौजमजेचे शहर आहे. होळीचा सणही येथील लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. येथील लोक पारंपारिक लोकनृत्य आणि पथनाट्य सादर करून या उत्सवाचा आनंद घेतात. शिग्मो उत्सवाचे दोन प्रकार आहेत. धतोक शिग्मो आणि वडलो शिग्मो. ग्रामीण लोक धतोक शिग्मो साजरे करतात तर सर्व वर्गातील लोक वडलो शिग्मो साजरा करतात.

रंगपंचमी, महाराष्ट्र

महाराष्ट्रात रंगपंचमीची धूम असते. महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते. खासकरुन मासेमारी करणाऱ्यांच्या वस्तीत या दिवशी होळी साजरी केली जाते. नाचणे-गाणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी माठ फोडण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. मासेमारी करणारा समाजात हा दिवस लग्न ठरवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

महाराष्ट्रात होळी खूप वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने साजरी केली जाते. होलिका दहनानंतरच्या दुसऱ्या दिवशी या उत्सवाला रंगपंचमी म्हणतात. या दिवशी लोक एकत्र येतात आणि एकमेकांना गुलाल लावतात. या दिवशी इथल्या प्रत्येक घरात पुरणपोळी खास बनवली जाते. या काळात तुम्ही इथे असाल तर नक्कीच त्याचा आस्वाद घ्यावा.

लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल      

मो ९५६१५९४३०६

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पळसफुलांचा शृंगार…” ☆ श्री हेमंत देशपांडे ☆

? विविधा ?

☆ “पळसफुलांचा शृंगार…”  ☆ श्री हेमंत देशपांडे ☆

संक्रांत संपून गेलेली असते.

दिवस तिळातिळाने वाढत असतो.  सबंध वातावरणात भरुन असलेली गोड-गोड गुलाबी थंडी आता विरळ होऊ लागलेली असते.  हिवाळाभर पसरुन राहिलेल्या शिशिर ऋतूचा सोहळा आणिक काही कालावधीनंतर संपून जाणार असतो.  आभाळभर पसरलेली शुभ्र धुक्याची वेल सूर्याच्या प्रखर दाहाने वितळायला लागलेली असते.  एखाद्या लोखंडी गोळ्याला उष्णता दिल्यावर तो जसा खदिरांगारासारखा दिसतो तशी अवस्था भास्कराच्या उष्णतेने येणार असते.  पण तशाही अवस्थेत तो आभाळगोल आपला उष्ण प्रवास निरंतर सुरु ठेवत असतो.

होळीचा सण हा शिशिरातला सण!  शिशिरात कसं मस्त-मस्त वातावरण असतं!  जंगलांनी पळसाचे लालसर केशरी रंग आपल्या अंगाला माखून घेतले असतात.  एखाद्या लावण्यवती प्रमदेनं मत्त शृंगार करुन आपल्या प्रियकराशी भेटायला आतुर व्हावं, तशी ती पळस झाडं आपल्याच फुलांचा शृंगार करुन हजार रंगांनी रंगोत्सुक होणाऱ्या होळीच्या सणाला भेटायला आतुर झालेली असतात, उत्सुक झालेली असतात.  रंगात रंग नि भांगेत भांग मिसळवून टाकण्याचा हा क्षण नि सण असतो.  आणिक सोबतीला शिशिरातलं हवंहवंसं, मिश्किलसं वातावरण खुलत असतं.

पळसफुलांचा रंग एकमेकांच्या अंगावर बरसवून आपण प्रेमाची देवाणघेवाण करत असतो.  आणिक जंगलात पळसाची झाडं आपल्या फुलांचा रंगमय शृंगार पाहून कृतकृत्य झालेली असतात.  झाडांच्या मनी दुःख असतं ते केवळ आपली फुलं खुडली गेली याचं.  फुलांना जन्म देणाऱ्या सर्वच झाडांचं तसं असतं.  एखाद्या नवसौभाग्यवतीच्या अंगावरचा दागिना हरविल्यावर तिनं व्याकुळ नजरेनं तो दागिना इतस्ततः शोधण्याचा प्रयत्न करावा, तशी ती फुलं खुडलेली झाडं करत असतात.  आपल्याच खुडल्या गेलेल्या फुलांना पुन्हा-पुन्हा शोधत असतात.  मला याचंच सगळ्यात जास्त दुःख होतं.  झाडांचं आणिक फुलांचं दुःख मी नाही पाहू शकत.  त्यापेक्षा हजार फुलांचे घाव आपल्यावर व्हावेत असं वाटू लागतं नि नेमकं तसं घडत नसतं.

आपली फुलं माणसांच्या हवाली करुन अश्रू ढाळणारं जंगल पाहायला एकदा मी धावतच जंगलात गेलो होतो.  आताशा नुकतीच कुठं शेंदरी रंगाची फुलं पळस झाडाला लागली असतील नसतील, पण ती लागतात नं लागतात तोच त्या फुलांवर ‘मानवी गिधाडं’ तुटून पडलीत, असा आर्त दुःखाचा भाव जंगलाच्या चेहऱ्यावर मी स्पष्टपणे वाचला.  आपल्या सभोवार फुललेल्या पळसफुलांची आरास माणसांनी विस्कटून टाकली म्हणून जंगल जणू रडत होतं नि जंगलाचं रडू पाहून मलाही रडू येत होतं.

माथ्यावरचा मार्तंड खूप तापला.  सर्वांगाला खूप चटके बसले.  मी भानावर आलो नि माझं रडू थांबलं.  मग मला सूर्याचा मनस्वी संताप आला.  वाटलं, हा आभाळगोल स्वतःला देव म्हणवतो ना!  पौषातल्या रविवारी आईच्या पूजेच्या ताटात हा सूर्य येऊन बसतो ना!  मग तरीही हा देव खोटा का?  खरा देव तर कृपाळू असतो.  साऱ्या पृथ्वीवर वैशाखवणवा पेटवून देणारा हा सूर्य म्हणजे एक महाराक्षस आहे.  जंगलातील फुलं माणसांनी तोडून नेल्याचं दुःख नि माझ्या प्रियतम जंगलावर आग ओकणाऱ्या सूर्याचा राग मनात मावेनासा झाला तेव्हा प्रेयसीच्या रसिल्या ओठांवर प्रियकरानं ओठ टेकावेत तसे आभाळाच्या ओठांवर सूर्याने आपले ओठ टेकवले नि हळूहळू सूर्य आकाशाच्या मिठीत विलीन झाला.

© श्री हेमंत देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

२०२२ च्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीलाच लिखाण बंद करून मॅरेथॉनसाठी धावायचा सराव चालू केला. एक महिन्यापूर्वीच डेंगू आजारातून बाहेर आल्याने धावतांना जरा अशक्तपणा जाणवत होता. सुरवातीला खूपच कठीण वाटत होते. लिखाणासाठी रात्रीचे जागरण करायची सवय झाल्याने पहाटे पाच वाजता उठून धावायला जाणे जरा कठीणच जात होते, धावायला सुरवात केल्यावर जरा २०० मिटर ते ३०० मिटर धावल्यावर दमायला होत होते. पहिला आठवडा जरा तणावातच गेला. १६ फेब्रुवारी २०२० ला ठाण्यामध्ये ठाणे हिरानंदानी ही शेवटची २१.०२ किलोमीटर ची मॅरेथॉन धावलो होतो, त्यांनतर मार्चपासून लॉकडाऊन चालू झाले आणि आणि पुढची अडीच वर्षे म्हणजेच नोव्हेंबर २०२२ पर्यंत एकही मॅरेथॉन झाली नाही आणि मॅरेथॉन नसल्याने धावायची सवयही गेली होती. ह्या लॉकडाऊन काळात खूप लिखाणआणि चालणे झाले, तरी धावणे मात्र बंद झाले होते.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला, २० नोव्हेंबर २०२२ ला नेव्ही मॅरेथॉन मुंबईचा मेसेज आला आणि डोक्यात परत मॅरेथॉन धावायचे चक्र चालू झाले. मनात मॅरेथॉन धावायचे येणे आणि प्रत्यक्षात मॅरेथॉन धावणे ह्यातले अंतर कितीतरी कोसाचे आहे.  तरीही दुसऱ्याच दिवशी पहाटे ५ वाजता उठून साडेपाचला धावण्याच्या सरावाला सुरवात केली. वाटले होते तेवढे सोप्पे नव्हते. जरा धावलो तरी थकायला होत होते. धावायचा सराव नसल्याने सगळेच अवघड वाटत होते. सुरवातीचा आठवडा असाच, नुसते सकाळच्या चालण्यातच गेला.

रोज डोळ्यासमोर आधी मिळालेली मॅरेथॉन मेडल्स दिसत होती. वयाच्या ५४  व्या वर्षी धावायला सुरवात करून डिसेंबर २०१४ ला गोव्याला १० किलोमीटर धाऊन मिळालेले माझे पहिले मॅरेथॉन मेडल मला खुणावत होते. त्याच्या बाजूला असलेले जानेवारी २०१५ ला स्टॅंडर्ड चार्टर्ड २१ किलोमीटर धावलेले मेडल मला स्फूर्ती देत होते. गेली दोन वर्षे मॅरेथॉन स्पर्धा झाल्या नसल्यातरी ऑक्टोबर २०२२ पर्यंत मिळालेली सगळी मिळून ४६ मेडल्स आणि दोन ट्रॉफी ह्यांचे प्रत्येकाचे एक स्वतःचे वजन होते, स्वतःचा संघर्ष होता, स्वतःची अशी एक गोष्ट होती. त्या प्रत्येक मेडल्सनी त्यांच्यासाठी मी घेतलेली मेहनत जवळून नुसती बघितली नव्हती तर त्यांनी माझ्या बरोबर ती अनुभवली होती आणि माझ्या प्रत्येक सेलिब्रेशनला माझ्या गळ्यात राहून मला साथ दिली होती. ती मेडल्स मला जोशात सांगत होती, “थांबू नकोस, हार मानू नकोस अजून ४ मेडल्ससाठी मेहनत घे म्हणजे आमचा ५० चा अर्ध शतकाचा टप्पा गाठल्याचे आम्हांला समाधान मिळेल.”

मोठ्या उत्साहाने दुसऱ्या दिवशी धावायला निघालो पण गती काही मिळत नव्हती. एखादे किलोमीटर धावलो तरी थकायला होत होते. ऑक्टोबर २०२२ महिन्याच्या मध्यावर आलो तरी मनासारखे धावणे होत नव्हते. २० नोव्हेंबरला आता एकच महिना उरला होता. २१ किलोमीटर मॅरेथॉन न करता १० किलोमीटर धावावे आणि एक मेडल घेऊन यावे असे मनात आले होते पण त्याच वेळी एकदा का १० किलोमीटर धाऊन  खालच्या पायरीवर आलो तर परत २१ किलोमीटर धावणे कधीच जमणार नाही ह्याची भीती होती आणि… आणि शक्य होईल का नाही ह्याचा काहीही विचार न करता, जो वेड्यासारखा विचार, वयाच्या ५४ व्या वर्षी २०१४ ला केला होता त्याचेच पुन्हा अनुकरण करून नेव्ही मॅरेथॉन २१ किमी धावण्यासाठी रजिस्ट्रेशन केले. आता काहीही झाले तरी २१ किलोमीटर धावयाचेच असे मनाशी पक्के केले आणि दुसऱ्या दिवशीपासून जोमाने सरावाला सुरवात केली. 

२०१४ ला धावणे जसे चालू केले होते तसेच म्हणजे हळूहळू दर दोन दिवसांनी, एक तर किलोमीटरमध्ये एक एक किलोमीटरची वाढ करायची किंवा किलोमीटर सारखे ठेवून,  कमी वेळेत ते पार करायचे. असे करत पुढच्या १५ दिवसांत मी १० किलोमीटर पर्यंत पोचलो आणि माझा २१ कि मी धावण्याचा हरवलेला आत्मविश्वास मला परत मिळाला. पहिल्यासारखे जलद धावणे जमत नसले तरी २१ कि मी मॅरेथॉन मी पुरी करू शकतो ह्याची मला खात्री आली. 

२० नोव्हेंबरला २०२२ नेव्ही मॅरेथॉन मुंबई, मी २१ कि मी धावायला सुरवात केली. सुरुवातीचे काही कि.मी. मी जोरात न पळता मध्यम गतीने धावत होतो. शक्तीचा जोर लाऊन धावायचे मी टाळत होतो. १५ किलोमीटर पर्यंत मला कसलाही त्रास नव्हता. थकायला झाले होते पण जिद्दीने मी स्वतःला पुढे नेत होतो पण १६ व्या कि मी नंतर अंगातली शक्ती गेली आणि पुढचा ५ कि मी चा रस्ता मला खुप कठीण गेला. कसे बसे मी २१ किलोमीटरची अंतिम रेषा गाठली तेव्हा वेळ नोंदवली गेली,  २ तास ५५ मिनिट्स. आत्तापर्यंतच्या माझ्या मॅरेथॉन धाऊन नोंदविलेल्या वेळेचा तो नीचांक होता. माझे ४७ वे मॅरेथॉन मेडल माझ्या गळ्यात घातले गेले. ह्या ४७ व्या मेडलचे महत्व माझ्यासाठी, माझ्या २०१४ च्या पहिल्या मेडल सारखेच होते, फरक फक्त वयाचा होता आणि वयानुसार मिळालेल्या टायमिंगचा होता. माझे पहिले २१ कि मी मॅरेथॉन मी २ तास १४ मिनिटात पुरे केले होते. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण कसे धावतो ह्याला महत्व नसते तर तेथे जायचे, धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्नाटकी कशिदा… डाॅ.निधी पटवर्धन ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्नाटकी कशिदा… डाॅ.निधी पटवर्धन ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पुण्याहून आलेल्या माझ्या एका मैत्रिणीला मुद्दामून कारवारी जेवण खाऊ घालावे म्हणून कानडी मैत्रिणीकडे गेले. चित्रान्न (विशिष्ट प्रकारचा कानडी तिखट भात), केळय़ाच्या गोड पोळय़ा, तमळी (बेलाची कढी), कच्च्या पपईची मूगडाळ घातलेली कोशिंबीर, एकही थेंब तेल नसलेलं लोणचं असं बरंच काही तिने खाऊ घातलं आणि आपली व्यथा व्यक्त केली, ‘‘ मला स्वच्छ मराठी बोलता येत नाही याचं वाईट वाटतं ! मला लोक अजूनही मी ‘कानडी’ आहे म्हणून पाहतात. माझे मराठी हेल कानडी येतात. त्यांनी मला ओळखता कामा नये, मी मराठीच वाटले पाहिजे ’’.

आश्चर्याने केळय़ाच्या पोळीचा घास माझ्या हातातच राहिला. तुम्ही जन्माने कानडी आहात तर तसंच ओळखलं गेलात तर वैषम्य कसलं? तुमचे कानडी हेल ही तर श्रीमंती आहे. तसं तर संवादाच्या गरजेतून अनेकदा इतर भाषकांनी केलेले मराठी बोलण्याचे प्रयत्न हा मराठी भाषेचा एक आगळावेगळा साज आहे. त्या त्या भाषिकांच्या मातृभाषांचा गंध त्या त्या प्रदेशाचे हेल आणि उच्चार घेऊन आलेली मराठीची ही रूपं मला तरी श्रीमंत वाटतात!

कानडी घरात लग्न होऊन गेल्यावर मराठी स्त्रिया किती काळात कानडी शिकतील याचा अंदाज घेतला तर दोन-चार वर्षांत माझी बहीण, मैत्रीण शिकलेय असं पाच-सहा जणांनी सांगितले. महाराष्ट्रात लग्न होऊन आलेल्या, खेडय़ापाडय़ातल्या कानडी स्त्रिया मराठी हळूहळू शिकतात आणि सहज बोलू लागतात हा मात्र सर्वाचा अनुभव आहे. भाषेचा जन्म संवादाच्या गरजेतून झाला आहे. अशा इथं आलेल्या, या मातीशी एकरूप झालेल्या स्त्रिया हळूहळू का होईना मराठी शिकतात, हे किती अनमोल आहे. त्यांची मुलं दोन भाषा शिकतात, ही आणखी जमेची बाजू !

भले तुकाराम महाराजांनी ‘कानडीने केला मराठी भ्रतार एकाचे उत्तर एका न ये’ असा अभंग रचला असला तरी सुरुवातीचा हा काळ सरल्यावर ही कानडी स्त्री कर्माने मराठी होतेच की! गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमांचा सहवास मराठी भाषेला आहे. स्वाभाविकपणे त्या त्या सीमावर्ती महाराष्ट्रात जी मराठी बोलली जाते त्यात या भाषाभगिनींचा प्रभाव जाणवणारच.

जी. ए. कुलकर्णीच्या साहित्यातून कानडी शेजार डोकावतो. तसेच प्रकाश नारायण संत यांचा लंपन या भाषेतील अनेक शब्दांची ओळख आपल्याला करून देतो. ‘तो मी नव्हेच’मधील निपाणीचा व्यापारी लखोबा लोखंडे त्याच्या कानडी-मराठीने आपल्या लक्षात राहिलेला आहे. कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ येथील शिलालेखात ‘श्री चावुण्डराये करवियलें..’ हे वाक्य आढळलेले आहे.

मराठी भाषेला किमान सात-आठ शतकं झपाटून टाकणारी व्यक्तिरेखा कानडी आहे असं सांगितलं तर काय वाटेल? पण तसं खरंच आहे. मराठी संतकाव्याची सत्त्वधारा ज्या भक्तीपात्रातून वाहते तिच्या उगमस्थानी तर एक थेट ‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु’ असा कानडी माणूस निघाला ! नुसता माणूस नव्हे तर थेट राजाच ! तोही पंढरीचा ! ‘भाषा ही माणसाचं जीवन सहज, सुलभ आणि सजग करण्याचे साधन आहे. जीवन असह्य करून मिळवणारे साध्य नाही. तुमच्या कानडी जेवणाइतकीच मधुरता तुमच्या बोलण्यात आहे.’ असे त्या कारवारी मैत्रिणीला सांगितल्यावर ‘मुद्दुली चिन्ना’ म्हणून तिने माझ्यावर जे प्रेम केले ते मला मराठीइतकेच गोड भासले.

लेखिका : डॉ. निधी पटवर्धन 

[email protected]

संकलक :  नितीन खंडाळे, चाळीसगाव

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares