मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नातं रिचार्ज करू… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ नातं रिचार्ज करू… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

मोबाईलचा बॅलन्स संपायच्या आधीच त्याची किती काळजी घेतो आपणं. बॅटरी लो झाली की चार्जर शोधतो.  पण तेवढीच काळजी नात्यांच्या बॅलन्सला जपण्यासाठी, नात्यांची बॅटरी लो होण्याआधी जर आपण घेतली तर किती सुखद होईल हे जीवन…

आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर 

पुन्हा एकदा टॉक टाईम भरु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

 

मनामध्ये काही अडलं असेल तर

त्या वाईट गोष्टींना फॉरमॅट मारु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

 

नवा घेवुन पुन्हा कॅनव्हास

नव्या चित्रात नवे रंग भरु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

 

प्रेमाचा नेट पॅक, समजुतीचा बॅलन्स

हृदयाच्या व्हाउचरवर पुन्हा स्क्रॅच करु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

 

उतार-चढाव ते विसरुन सारे

उद्यासाठी नात्यांवर पुन्हा टॉर्च मारु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

 

माणूस म्हंटलं तर चुकणारच ना

चुका तेव्हढ्या बाजूला सारु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

 

आयुष्याची बॅटरी रोज लो होते ग

जवळचे नाते तेवढे आवळून धरु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

 

व्यक्ती तितक्या प्रकृतीचा नियम

पटलं तेवढे ठेवुन बाकी इग्नोर मारु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

 

कांद्याचे कापसुद्धा डोळे भिजवतात

नात्यांचेही खाचे तसेच स्विकारु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

 

नव्या ताकदीने नव्या उमेदीने

निसटणारे हात पुन्हा घट्ट धरु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…

 

सुसंवादाची सेल्फी आठवत

रिलेशनमध्ये अंडरस्टँडिंग भरु…

चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…   

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वीर मारुती… – श्री मंदार लवाटे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ वीर मारुती… – श्री मंदार लवाटे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

‘बुद्धिमताम् वरिष्ठम्’ अशा देवता म्हणविल्या जाणाऱ्या शनिवार पेठेतल्या वीर मारुतीचा गेली दोनशे वर्षे अखंड उत्सव सुरू आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मूर्तीचे शेंदूराचे कवच निसटले आणि मारुतीरायाची विलोभनीय मूर्ती समोर आली. विशेष म्हणजे, चैत्र पौर्णिमा म्हणजेच, हनुमान जयंती ते अक्षयतृतीया असा इथे चालणारा उत्सव पानिपतच्या युद्धात बळी पडलेल्या वीरांच्या स्मृतिनिमित्त होतो, याची आजही अनेकांना कल्पना नाही. 

अशी होती परंपरा…

परंपरेनुसार, जी घराणी पानिपतच्या युद्धात लढली त्या घराण्यातला ज्येष्ठ पुत्र वीराची वेशभूषा करून मारुतीरायाच्या भेटीला येतो. ही भेट होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, धूलिवंदनाला होते. देवाला भेटण्यासाठीची जय्यत तयारी करून पूजेचे तबक हाती घेऊन तो मारुतीच्या भेटीला येतो. इथे येऊन देवाला मिठी मारली, की त्या घराण्यातला वीर देवापर्यंत पोहोचतो, अशी त्यामागची श्रद्धा आहे. पूर्वी या ठिकाणी बारा गाडे असत आणि ते गाडे ओढण्याचा मानही वीराला मिळत असे. ही परंपरा होती तेव्हा जोरदार यात्राही व्हायची. काळानुरूप यातल्या अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत. ‘हे स्थान पुरातन असल्याचा उल्लेख पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये आढळतो. या ठिकाणी युद्धापूर्वी नवस बोलला जायचा. युद्धातून माणूस परतल्यास त्याला तुझ्या दर्शनाला आणू. जो युद्धावरून येतो तो वीर. दास, प्रताप आणि वीर अशी मारुती दैवताची तीन रूपे आहेत. धूलिवंदनाला अजूनही अनेक घराण्यांतले लोक इथे येतात. मारुतीरायाच्या भेटीला येताना घरातले टाक घेऊन येण्याची परंपरा आहे. काहीजण शस्त्रही आणतात. जुना मारुती आहे, एवढाच उल्लेख आढळतो. त्यामुळे पुण्यातल्या जुन्या देवस्थानांपैकी तो एक आहे. हा मारुती पिंपळाच्या वृक्षाखाली आहे.’

पूर्वी गांगल कुटुंबीय अनेक वर्षे उत्सव पाहायचे. आता त्या घराण्यातले कुणी नसल्याने उत्सवाची परंपरा पुढे राम दहाड, सचिन दाते, महेश पानसे, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी ही कार्यकर्ते मंडळी चालवत आहेत. ही परंपरा अखंड सुरू ठेवण्याची परंपरा कार्यकर्ते सांभाळत असून, लोकवर्गणीतूनच हा उत्सव चालतो. आपापल्या इच्छेनुसार त्यासाठी मंडळी योगदान देतात.

वीर मारुतीच्या भेटीसाठी वाजतगाजत येण्याची परंपरा आजही सुरू आहे. त्या निमित्ताने वीरांचे हार घालून; तसेच प्रसाद देऊन स्वागत केले जाते. वर्षानुवर्षे हनुमान जयंती ते अक्षयतृतीया असा १८ दिवसांचा कीर्तन महोत्सव इथे होतो. अनेक कीर्तनकार आपली सेवा रुजू करतात. 

वीर मारुतीबाबत पेशवे दफ्तरात अनेक कागदपत्रे धुंडाळली; मात्र मारुतीची स्थापना कशी आणि केव्हा झाली, याचा उल्लेख मिळत नाही. मारुतीरायाच्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला मिशा आहेत. आवेशपूर्ण अशी ही मूर्ती वीर मारुती या प्रकारातली आहे.

लेखक : श्री मंदार लवाटे

इतिहास संशोधक

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मंत्रजागर… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ मंत्रजागर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

केळीचे लोंगर बागेत दिसायला लागल्यावर वानरांनी बागेत येऊन धुडगूस घालायला सुरुवात केली. केळी, पपई …..  एकही फळ हाताशी लागेना. आमच्या जमिनीत वडाच्या झाडाखाली अक्कलकोट स्वामींचे मंदिर बांधलेय. देवळात वीज आल्यावर एक दिवस जपयंत्र आणलं. सूर्यास्ताला जपयंत्रावर गायत्री मंत्राचा जप सुरू करायचा, तो चांगलं उजाडल्यावर बंद करायचा. आठ पंधरा दिवसातच एक गोष्ट अनुभवाला आली. जपयंत्र जरी रात्री सुरू असलं तरी दिवसभर बागेत होणारा वानरांचा धुडगूस आपोआप बंद झाला. वानर बागेच्या कुंपणापर्यंत यायचे. पण बागेत यायचे नाहीत. नुकसान करायचे नाहीत. रात्रीच्या वेळी मात्र तोच कळप तळ्याकाठच्या त्याच झाडावर वस्तीला असायचा. आज घराभोवती पाच फळबागा उभ्या राहिल्या असून वानरांमुळे होणारं नुकसान पूर्णपणे थांबलं. गायत्री मंत्र आणि वानर यांचा नेमका काय संबंध –  हे मात्र अनाकलनीय आहे. आज अनेक शेतकरी हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहेत.

‘रानगोष्टी’  या डॉ. राजा दांडेकर यांच्या पुस्तकातील हा उतारा. गायत्री मंत्राचा महिमा सांगणारा. आजच त्याची आठवण होण्याचे कारण काय ? कारण कोकणातील एक फेसबुक मित्र श्री.अविनाश काळे यांची पोस्ट. ‘कोकणचे दुःख कोणी दूर करेल ?’  ह्या मथळ्याच्या पोस्टचा मथितार्थ असा की कोकणातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान माकडे आणि वानरे यांच्यामुळे होत आहे. त्यांचा बंदोबस्त न झाल्यास कोकणातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वानर आणि माकड यांना उपद्रवी पशू जाहीर करून मारायला सुरुवात केली. महाराष्ट्रातसुद्धा असे करण्याची गरज आहे.

हे वाचताना गायत्री मंत्राचा प्रभाव आठवला. वानरे, माकडे यांना जीवनिशी मारण्यापेक्षा शेतकरी मित्रांनी हा साधा, निरुपद्रवी उपाय करून पहायला काय हरकत आहे ?

‘एखाद्या मंत्राचा प्रभाव मान्य करणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा?’ चा वाद जुनाच आहे. अशीही शक्यता आहे की एखादी विज्ञानाधिष्ठीत गोष्ट देवाधर्माच्या नावे सांगितली की लोकांना पटते, ते ऐकतात हे लक्षात आल्याने आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी हुशारीने लोकांच्या गळी उतरवल्या असतील. आपल्याला त्यामागचे विज्ञान माहित नसल्याने आपण त्याला अंधश्रद्धेचे लेबल लावून मोकळे होतो !

भारतीय मानसिकतेला मंत्राचा प्रभाव, त्यामुळे होणारे चमत्कार हा मुद्दा नवीन नाही. मूल अक्षरओळख शिकण्याच्या आधीपासून घरच्यांकडून रामायण, महाभारतातील गोष्टी ऐकू लागते. अक्षरे ओळखता येऊ लागली की पौराणिक कथा वाचू लागते. (आताच्या नवीन पिढीत बहुधा हे होत नसावे.) बालवयातच ‘कुमारी माता’ कुंतीची कथा सामोरी येते. कुंतीने मनापासून दुर्वास ऋषींची सेवा केल्याने त्यांनी संतुष्ट होऊन अपत्यप्राप्तीसाठी देवांना वश करण्याचा मंत्र तिला दिला. तिने कुतूहलापोटी मंत्रजप करून सूर्याला आवाहन केले. सूर्य प्रगट होताच भयभीत होऊन त्याला परत जाण्यास सांगितले. मात्र ‘मंत्र व्यर्थ होऊ शकत नाही,’ असे सूर्य म्हणाला आणि सूर्यपुत्र कर्णाचा जन्म झाला.

भयकथा, गूढकथा यातही अघोरी विद्यांमध्ये विशिष्ट मंत्रांचे सामर्थ्य किती अचाट आहे हे वाचायला मिळते. ‘वशीकरण मंत्र साक्षात मनुष्यरुपात प्रगट झाला,’  वगैरे वाचताना मला भयंकर कुतूहल वाटत असे. जर खरेच असे काही प्रत्यक्षात घडत असेल तर ते आपल्याला निदान एकदा तरी बघायला मिळावे, असेही वाटून जाई.

विशिष्ट शब्द विशिष्ट पद्धतीने उच्चारणे म्हणजे मंत्र. या मंत्रोच्चारणाचा विधायक वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात करू शकलो तर आपले कितीतरी प्रॉब्लेम्स सुटतील!  खरंच मंत्रात शक्ती असते का ?  अलीकडेच व्हाॅट्स अप वर एक पोस्ट वाचायला मिळाली. त्यात या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पोस्टचा मथितार्थ असा की एखाद्या माणसाने आपल्याला उद्देशून अपशब्द उच्चारले, शिव्या दिल्या तर आपल्याला संताप येतो. म्हणजेच त्या शब्दांमध्ये ताकद आहे. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तयार होते. ह्याउलट कुणी आपले कौतुक केले, प्रेमाने बोलले तर आपल्याला प्रसन्न, आनंदी वाटतं. म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते अगदी ह्याच प्रकारे मंत्रातील शब्दांतदेखील ऊर्जा, सामर्थ्य असते. हे मंत्र आपल्या ऋषीमुनींनी, जे वैज्ञानिक होते, संशोधनातून सिद्ध केले आहेत.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड,विश्वविख्यात नेमबाज अंजली भागवत यांच्यासारखे अनेक खेळाडू ज्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात होते ते क्रीडामानसशास्त्रज्ञ व माजी इंटेलिजन्स ऑफिसर भीष्मराज बाम यांनी हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. ते म्हणतात,’ मंत्र म्हणजे काही शब्दांच्या किंवा वाक्यांच्या आधारे प्रगट होणारा एखादा प्रभावी विचार असतो. काही वेळा एखादा शब्द किंवा ओंकारासारखे अक्षर मंत्रजपासाठी वापरले जाते. तर कधी कधी काही ओळींचाही मंत्र असू शकतो. मंत्रजप हा एकाग्रतेसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्या विचारांवर आपला ताबा नसेल तर विचार भरकटतातच. पण त्यासोबत आपलीसुद्धा अत्यंत त्रासदायक अशी फरफट होते. विचारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्र उपयुक्त ! मंत्रातले शब्द ज्या अर्थाने वापरले असतील त्यावर तुमची पक्की श्रद्धा असायला हवी. म्हणून तर मंत्र हा तुमची ज्या गुरुवर श्रद्धा असेल, त्याच्याकडून मिळवायचा असतो. किंवा तो मंत्र तुमच्या स्वतःच्या अनुभवातून सिद्ध झालेला हवा. मग आपोआप तुमची त्याच्यावर श्रद्धा बसते.’

प्रभावी स्वसंवाद ( स्वतःसाठी सूचना)  लिहून काढून त्याचा मंत्रासारखा वापर करण्याबाबतही बाम सरांनी लिहिले आहे. Winning Habits या त्यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा ‘विजयाचे मानसशास्त्र’ या नावाने वंदना अत्रे यांच्या सहाय्याने मराठी अनुवाद केला आहे.

दैनंदिन जीवनात मारुती स्तोत्र, रामरक्षा (किंवा आपले आवडते स्तोत्र / मंत्र) म्हटले की प्रसन्न वाटतं, नकारात्मक विचार पळून जातात हा अनुभव तर सर्वांनीच घेतला असेल. ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’  अशीच रामरक्षेची सुरुवात आहे. बुधकौशिक ऋषींना स्वप्नात रामरक्षा स्फुरली. कुरवपूर (कर्नाटक) येथे श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’  या अठरा अक्षरी प्रभावी मंत्राचा साक्षात्कार झाला.

अखंड नामस्मरण, मंत्रजप यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता येत असेल, फायदा होत असेल तर ‘श्रद्धा – अंधश्रद्धा’ चा काथ्याकूट कशाला ? नियमितपणे, श्रद्धेने मंत्र जपावा हे उत्तम.

संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी-नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भेटवस्तू… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ भेटवस्तू… ☆ श्री उमेश सूर्यवंशी 

भेटवस्तू… किती गोड आणि आनंददायक शब्द आहे. कुणालाही भेटवस्तू हा शब्द नक्कीच आवडणार. मानवी मनांत चांगल्या कामाकरता शाबासकी म्हणून आणि प्रोत्साहन म्हणून भेटवस्तू देण्याची स्तुत्य परंपरा आहे. लहान मुलामुलीना जितका आनंद या भेटवस्तूने होतो तितकाच आनंद तरुणाला आणि वृध्दांना देखील होतो हे सत्य आहे. भेटवस्तू या शब्दाचा अर्थच मुळी एक विशिष्ट जाणीव मनामध्ये पेरत असतो.

भेटवस्तू…,आनंदाचा ठेवा आहे, समाधानी तृप्ती आहे, प्रोत्साहनाची  शाबासकी आहे. भेटवस्तू   घेताना फारशी नियमावली नसतेच मुळी. कारण भेटवस्तू नाकारण्याची अपवादात्मक उदाहरणे वगळता सर्वत्र भेटवस्तू स्विकारण्याचा पायंडा असतो. याचकरीता मग भेटवस्तू म्हणून काय दिले पाहिजे याची योग्य जाणीव झाली पाहिजे.बरेचदा अनेक स्पर्धात भेटवस्तू म्हणून लहान मुलांना विशिष्ट खेळणी, स्त्रीयांना गृहोपयोगी वस्तू, तरुणाईला फॕशनेबल वस्तू आणि वृध्दांना उपयोगी पडणारी वस्तू निवडतात. एका अर्थाने यामध्ये गैर काहीच नाही. या प्रत्येक वस्तुमागे आनंद हा नक्कीच मिळतो. परंतु या भेटवस्तू मनुष्याला कितपत प्रोत्साहन देतात याविषयी वाजवी शंका उपस्थित केली पाहिजे. शाबासकी याचा अर्थ केवळ पाठीवर थाप अशी नसावी तर मेंदूला चालना अशी असली पाहिजे. मतभेदाला वाव ठेवून इथे एक विचार प्रसूत करतोय. तो असा की, कोणत्याही वयोगटाला त्याच्या पुढील आयुष्यात आनंद, गृहोपयोगी, फॕशनेबल आणि उपयोगी अशा भेटवस्तू देताना…एक चांगले पुस्तक हाच पर्याय उपलब्ध असावा. पुस्तक मनुष्याचे मस्तक घडवते. अनेकजण आजकाल हा पायंडा जपताय हे स्तुत्य आहे.लहानांसाठी बालकथेची आणि थोरामोठ्यांची चरित्रे, स्त्रीकरता गृहोपयोगी आणि स्त्रीवादी साहित्य, तरुणाईकरता वैचारिक व ललित साहित्य, वृध्दाःकरता करमणूक करणारे व इतर साहित्य दिले तर आनंद व प्रोत्साहन याचबरोबर मेंदूचा योग्य व्यायाम घडू शकतो. पुस्तके ही भेटवस्तू कोणत्याही कार्यक्रमाचा पहिला योग्य पर्याय असतो याची जाणीव व्हावी.

आजकाल कोण वाचतय ? हे नकारात्मक पालूपद आळवण्यात अर्थ नाही. पुस्तकासारखी भेटवस्तू केवळ त्याच व्यक्तीला नव्हे तर त्याच्या सानिध्यातील अनेकांच्या हिताची कृती घडवण्यात एक योग्य भुमिका बजावत असते. याचा अर्थ पुस्तकाची भेटवस्तू केवळ वैयक्तिक आनंदाचा, समाधानाचा, तृप्तीचा व प्रोत्साहनाचा भाग होणार नसून तो काही सार्वत्रिक पातळीवर आनंद, समाधान, तृप्ती व प्रोत्साहन पेरत असतो. मानवी जीवनात सामुदायिक हिताची ही कल्पना कृतीत येणे हीच… मनुष्याने मनुष्याला द्यावयाची खरी भेटवस्तू आहे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -4 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -4 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पहिले,- आता आजीही नाहीत आणि त्यांचा वसा चालवणार्‍या जाऊबाईही नाहीत. मात्र त्यांनी आणि मी आजींचा वसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आमच्या परीने केला आहे.- आता इथून पुढे)

आजींच्या व्यक्तिमत्वाच्या आणखी एका पैलूबद्दल लिहायला हवं. भावनिक जीवनात त्या अतिशय श्रद्धाळू होत्या. अंध:श्रद्ध म्हणता येईल इतक्या. करणी, भुतं- खेतं या सगळ्या गोष्टींवर पराकोटीचा विश्वास होता. कुणाला ताप आला, दोन –तीन दिवसात नाही उतरला, तर निघाल्याच त्या त्यांच्या  क्षेत्रातील डॉक्टरकडे, म्हणजे कुणी चिप्रिकर आजी होत्या, किंवा ताई कोल्हटकर यांच्याकडे. काय झालं, कुणी करणी केली का? काही बाहेरची बाधा आहे का? वगैरे विचारून त्यांनी सांगितलेले उपचार सुरू होत. मात्र ते सारे उपचार त्या स्वत: करत. इतरांना त्याची तोशीस नसे. त्याचप्रमाणे त्यांचेच उपचार करायचे, डॉक्टरकडे जायला नको, असाही आग्रह नसे. तुम्ही डॉक्टरकडे जा. मला हवे ते उपचार मी करीन, हे धोरण. त्यामुळे त्यांच्या श्रद्धेमुळे नि अंध:श्रद्धेमुळे घरात वादावादी, भांडण असे काही झाले नाही. त्यांच्या श्रद्धा आणि अंध:श्रद्धा त्यांच्यापुरत्या होत्या. त्यासाठी जे काही करायचं, ते त्या स्वत:च करत. त्यासाठी त्यांनी कधी इतरांना वेठीला धरले नाही. तू मंगळवारचे उपास कर, किंवा शंकराला प्रदक्षिणा घाल, असे काही त्यांनी कुणाला संगितले नाही. आपल्याला मात्र जे वाटते ते त्यांनी बदलत्या काळातही केले आणि आपले व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखले.                      

त्यांच्या विचारातला आधुनिकपणा घरात घडलेल्या एका घटनेमुळे सगळ्यांच्या पुढे आला. आमचे एक जवळचे नातेवाईक होते. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आणि वर्षभराच्या आत तिचे यजमान पोटात अ‍ॅपेंडिक्स बर्स्ट होऊन गेले. बावीस-तेवीस वय असेल तिचं. पुढे वर्षभराने कुणी तरी तिच्यासाठी एक स्थळ सुचवले. तेही विधुर होते. पसंती, बोलणी सगळं झालं, पण तिचे वडील मोठे कर्मठ. ते काही या गोष्टीला तयार होईनात. ते म्हणायचे, ‘मी समर्थ आहे तिच्याकडे पहायला .’ शेवटी आजींनी जाऊन त्यांची समजूत घातली. त्या म्हणाल्या, ‘काळाप्रमाणे आपण बदलायला हवं. तुम्ही तिला आयुष्यभर पुरणार आहात का? ‘असं खूप काही बोलल्यानंतर, नकाराची त्यांची भूमिका, ‘काय हवं ते करा!’ यावर येऊन ठेपली. त्यांचं हे वाक्य म्हणजेच त्यांचा होकार असं गृहीत धरून बाकीच्यांनी पुढाकार घेऊन तिचे लग्न लावून दिले. आज ती मुले-नातवंडे अशा परिवारात सुखाने नांदते आहे. या सगळ्या घडामोडीत मला सगळ्यात विशेष वाटतं, ते सोवळ्या असलेल्या आजींनी, त्या आपल्या कर्मठ, जुन्या विचारसरणीच्या नातेवाईकाची समजूत घातली होती.

आजी सोवळ्या होत्या. त्यांचं सोवळं- ओवळंदेखील होतं. पण त्याचं अवडंबर त्यांनी कधी माजवलं नाही. त्यांचं सोवळं त्यांच्यापुरतं असे. त्याचा व्याप-ताप कधी दुसर्‍याला झाला नाही.

१९६५ मध्ये माझं लग्नं झालं. तेव्हा घरात इतकी माणसं होती की सगळी नाती लक्षात यायला मला महिनाभर लागला. लग्नानंतर १५-२० दिवसात एक नणंद बाळंत झाली. त्यानंतर दोन महिन्यांनी दुसरी. घरात डोहाळजेवण, बाळंतपण, बारशी, पुढे माझे सणवार असे कार्यक्रमावर कार्यक्रम. त्या काळात आजींच्या दोन चुलत, मावस जावा इंदिराकाकू आणि ताई सोमण जवळ जवळ वर्षभर आमच्याकडे रहात होत्या. एकदा सहज बोलता बोलता त्या मला  म्हणाल्या,’ तुझे दीर आणि सासू नंबर एकची माणसे आहेत. शंभर नंबरी सोनं. ‘ आज मागे वळून बघताना माझ्या लक्षात येते, त्या बोलल्या, त्याची मला प्रचिती आलीच, पण अनेकदा असंही वाटतं की , कुणाला ठेवून घेण्याचे, मदत करण्याचे, त्यांची गरज भागवण्याचे         निर्णय माझ्या दिरांचे आणि सासुबाईंचे असले, तरी त्यांना तेवढीच समर्थ साथ वहिंनींची ( माझ्या जाऊबाईंची) होती. म्हणून सगळ्या गोष्टी सहजतेने होऊ शकल्या. कुणीही राहिले, तरी प्रत्यक्ष परिश्रम, कष्ट वहिनींनाच करावे लागायचे. एका दृष्टीने आजी, दादा, वाहिनी हा त्रिवेणी संगम होता. आमचं घर म्हणजे, ‘तीर्थ’ हा शब्द वापरत नाही मी, पण अनेकांच्या आधाराचं, आणि विसाव्याचं ठिकाण होतं. कुणी तिथे क्षणभर पहुडलं, कुणी दीर्घकाळ स्थिरावलं.

एकदा बोलता बोलता, मोठ्या वन्संची  नात मेधा म्हणाली, ‘कॉलेजमध्ये गेल्यावर मदर टेरेसांचा फोटो मी प्रथम पाहिला आणि मनात आलं ’अरे, ही ‘मदर’ तर आपल्या घरी आहेच. माधवनगरची आजी. (म्हणजे प्रत्यक्षात तिची पणजी.) तशीच पांढरी साडी, डोक्यावरून पदर, चेहर्‍या-मोहर्‍यातही खूप साम्य आणि दुसर्‍याला मदत करायची, दुसर्‍याचं दु:ख दूर करण्यासाठी तन-मन-धनाने झटण्याची तीव्र इच्छा, आंतरिक ऊर्मीही दोघींची सारखीच. मदर टेरेसांच्या कामाचा परीघ मोठा असेल, माझ्या आजीचे, नव्हे पणजीचे , कामाचे क्षेत्र, नातेवाईक, गाववाले, परिचित लोक एवढ्यापुरतंच मर्यादित असेल, पण कामना, ‘दुरितांचे तिमीर जावो, हीच!’

आजींनी जे जे दुसर्‍यांसाठी केलं, कधी सहानुभूती, कधी मदत, कधी योग्य सल्ला, त्यात त्यांचा इवलाही स्वार्थ नसे. त्या अर्थाने त्या खरोखरच संसारात राहूनही संत झाल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाच्या किती किती गोष्टी आठवताहेत. सगळं सांगायला गेलं, तर पुस्तकच होईल. आता त्या प्रत्यक्षात नाहीत, पण माझ्या मनात मात्र त्या रुजून राहिल्या आहेत.

                      त्या नसतात, तरीही स्मृतीमध्ये त्या टकटक करत रहातात. 

                      थंडीत उबेसारख्या, जाणिवेत स्पर्शासारख्या

                      प्रत्येक क्षण त्या असतात… 

                      आपल्या नसण्यातही आपल्या असण्याचं

                      भान जागवत त्या असतात… 

                      त्या असतात…

— समाप्त —

©  सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

श्वानांच्या  गुणांच्या बाबतीत महाभारतातली एक गोष्ट सांगितली जाते. पांडव स्वर्गात जाताना ,’ सरमा ‘ ही कुत्री त्यांच्याबरोबर होती. जो खोटे बोलला नाही ,खोटे वागला नाही, निस्वार्थ सेवा, आज्ञाधारकता, आणि  निष्ठावंत सेवक असा राहिला, त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार होता .या अटींमध्ये  ‘सरमा ‘ पास झाली . तिच्या गुणवैशिष्ट्यांमुळे तिला स्वर्गाचे दार सहजगत्या खुले झाले.

आपण इतिहासात वाचतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर , त्यांचा लाडका कुत्रा  ‘ वाघ्या ‘ महाराजांच्या चितेवर धन्यासाठी झेपावला होता. या निष्ठेचे वर्णन करायला शब्दही तोकडे आहेत खरोखर.

गुजरातमधील पालमपुर तालुक्यात काही कुत्रे इतके श्रीमंत आहेत की, ते पाच कोटींचे मालक आहेत. काही वर्षांपूर्वी नवाबाने गावकऱ्यांच्या नावावर केलेली जमीन, त्यांनी आपल्या कुत्र्यांच्या नावाने केली. त्या कुत्र्यांची जमीन वीस  बिघा, म्हणजे त्याची किंमत जवळजवळ पाच-सहा कोटीहून जास्त आहे.  पहा ही कुत्र्याची श्रीमंती !

 एखाद्याचं नशीब पहा कसं असतं ते. अंतराळयानातून सजीव म्हणून ‘ लायका ‘ या कुत्रीलाच पाठवले होते. अंतराळात जाणाऱ्या पहिल्या सजीवाचा मान या कुत्रीला मिळाला. काय म्हणावं तिचं नशीब !

आत्तापर्यंत श्वानांवर सर्वात जास्त पुस्तके लिहिली गेली आहेत. श्वानांचा एक विश्वकोशही आहे .जी व्यक्ती प्राण्यांना प्रेमाने सांभाळते, तिच्यापेक्षा पाळीव प्राणी त्या व्यक्तीवर अधिक प्रेम करतात. त्या प्रेमाला माणूसच कमी पडतो, असं म्हणायला हरकत नाही .काही श्वान आपलं सुंदर रूप आणि आज्ञाधारकपणा या गुणांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही  गाजतात.  थायलंडमधील बँकॉक येथे डॉग शो मध्ये आशिष लिमये यांची ‘ माया ”  ‘ (दोन वर्षे वयाची, बेल्जियम मेनोलीज जातीची ) हिने “सेव्हन बेस्ट ऑफ ब्रीड “, आणि ” सेव्हर चॅलेंज सर्टिफिकेट”  अशी दोन मानाची पदके मिळविली.  कॅनल क्लब ऑफ इंडियाच्या स्पर्धेतही ती चॅम्पियन ठरलेली आहे. खरंच किती कौतुक करावे?

ऑलिंपिक सारख्या सामन्याच्या वेळी ,काही मोजकेच श्वान, प्रेक्षकांमध्ये दंगा होऊ न देण्याचे काम 

करतात . लोक पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतात. व्यवस्थापनात पोलिसांपेक्षा कुत्र्यांची संख्या कमी चालते.

श्री. गिरीश कुबेर यांनी ” पंचकन्या  स्मरे नित्यम “, या लेखामध्ये, घरातल्या पंचकन्यांचे (कुत्र्यांचे ) व्यक्तिमत्व इतके छान अधोरेखित केले आहे की, ते पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. ते लिहितात की या पंचकन्यांनी हेच शिकवलेलं की — “चांगला माणूस होण्याचा मार्ग प्राण्यांच्या अंगणातून जातो”. पहा बरं काय वाटतं त्यांना ते.  

” मी आणि माझी ३१ बाळं “, हा ममता रिसबूड यांनी लिहिलेला लेख वाचताना त्यांनी त्या बाळांसाठी (प्राण्यांसाठी ) घेतलेले कष्ट आणि त्याग खरोखरच वाखाणण्याजोगा आहे असे वाटते.

चित्रपटांबद्दल तर काय सांगावे? ” हम आपके है कौन” मधला ‘टफी ‘, “सच्चा झूठा” मधला ‘ मोती’, 

“माँ “मधील ‘डॉगी’, “बेताब “मधला ‘बोझो’, ” वॉटर” मधला ‘ काळू’ —  किती नाव सांगावीत तितकी 

कमीच !  या श्वानांचा अभिनय आपण हौसेने आणि आवडीने पाहतो ना!

पूर्वीचे मुंबई येथील श्वान शिक्षक श्री. शां ना दाते यांचा २५ वर्षे, चार श्वानांबरोबर सहवास होता. त्यांनी मुंबई दूरदर्शनवर त्यांच्या ‘ प्रिन्स ‘ या कुत्र्यासह, मुलाखती आणि मार्गदर्शन केले होते. ‘ प्रिन्स ‘ चे अत्युत्तम काम असलेल्या  ” फुल और कलियाँ”” ( १९६० साली) या बोलपटाला पंतप्रधान पुरस्कार मिळाला. ते अभिमानाने सांगत असत की, “मी मोठा झालो नाही. ‘प्रिन्सने ‘, मला मोठं केलं.” तो स्वर्गवासी झाल्यानंतर त्याचा स्मरणविधीही ते करत असत.

पोलीस खात्यातील श्वान निवृत्तीनंतर कोणीही दत्तक घेऊ शकतात .गुन्हेशोधक ,बॉम्बशोधक ,नारकोटिक्स शोधक ,रेस्क्यू टीम, फॉरेस्ट, असे वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे श्वान पूर्ण प्रशिक्षित आणि लसीकरण केलेले असतात .रात्री गस्त घालणे, गुन्हेगारांना पकडणे, विमानतळ, गोद्या या ठिकाणी पहारा आणि तपासणी ,लपवून आणलेले मादक पदार्थ शोधणे, अशी कामे पोलीस दलातील श्वानांना करावी लागतात. काही वेळा पोलीस शोध घेऊ शकत नाहीत, अशावेळी श्वान ते काम बिनचूक करतो. परदेशात काही ठिकाणी प्रेमापोटी कुत्र्याची स्मारकंही उभी केली गेली आहेत.

आमच्याच घरातल्या कुत्र्यांच्या इमानदारीचे किती कौतुक आणि अनुभव सांगावे तितके कमीच ! ओसाड रानात केवळ कुत्र्यांच्या जीवावर आम्ही निर्धास्तपणे राहत होतो. वेगवेगळ्या टोनमध्ये आवाज काढून कितीतरी साप, विंचू, अगदी चोरही त्यांनी पकडून दिले आहेत. न फिटणारे आणि अनंत उपकार आहेत त्यांचे आमच्यावर ! कर्मयोग , ज्ञानयोग आणि भक्ती योगाच्या मार्गातून मी त्यांच्यातल्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते.

ही श्वानांची गौरव गाथा वाचताना काही जणांचे आक्षेपही असणार. निरपराध्यांना भटकी कुत्री चावतात, त्याचे काय? पण एक कुत्रा चावला तर उरलेल्या पंचवीस कुत्र्यांना मारून टाकायचे का? मारून टाकणे, हा त्यावरचा उपाय नव्हे. पोटाची भूक भागत नसेल तर ते आक्रमक होतात. कित्येक ग्रुप सध्या वेगवेगळ्या ठिकाणी भटक्या जनावरांना खाद्य देण्याचे पवित्र कार्य करत आहेत. केवळ त्यांची संख्या वाढू नये म्हणून, आकडा न सांगता प्रामाणिकपणे त्यांचे निर्बिजीकरण व्हायला हवे .कुत्रा पाळायचा असेल तर भटक्यातला पाळला ,तर एक जीव जगेल. आणि तुमच्यावर अनंत उपकार करेल.  श्वानांची ही गाथा कितीही लिहिली तरी न संपणारी आहे. ती अशीच कौतुकाची गाथा चालतच राहणार.

— समाप्त —

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लिसनर… सुश्री राधा पै ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ लिसनर… सुश्री राधा पै ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

खरे तर त्याच मेन्यू कार्डची त्याला उत्सुकता, प्रतीक्षा असते. दोन्ही कार्डांवर बारकाईने नजर टाकून तो वेटरला ऑर्डर देतो. थोड्या वेळाने तो वेटर खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि सोबत एका सुंदर तरुणीला घेऊन येतो. समोरच्या खुर्चीवर ती तरुणी विराजमान होते. ‘हॅव ए गुड टाइम.. एन्जॉय !’ अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो.

 टेबलावर ते दोघेच. अनोळखी. अपरिचित. काही क्षण नि:शब्द जातात. मग दोघेही एकमेकांचा परिचय करून देतात. या जुजबी ओळखीपाळखीनंतर ‘ति’च्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली जाते. दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला संवाद हळुवारपणे रंगत जातो. उभयतांच्या गप्पांचा फड चांगलाच रंगलेला असतानाच वेटर बिल घेऊन येतो. दोघांचाही हिरमोड होते. ‘पुन्हा भेटू’, म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन तो हॉटेलबाहेर पडतो!

‘लिसनर’ नावाच्या शॉर्टफिल्मचे हे संक्षिप्त कथानक. जगभर ही फिल्म दाखविली गेली आणि तितकीच नावाजलीही गेली. ही शाॅर्टफिल्म बनविण्यामागे संदर्भ होता-अमेरिकेतील वॉल्डेन युनिव्हर्सिटीच्या ‘ॲन्युयल रिविव्ह ऑफ सायकॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख. ‘संवाद हरवलेली कुटुंबं’ हा त्या लेखाचा विषय. अर्थात, तो अमेरिकेतील एकल कुटुंब व्यवस्थेवर आणि त्यातही ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, आयबीएमसारख्या आयटी कंपन्यात काम करणाऱ्या कपल्सवर आधारित. ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं (सोशल मीडिया) जन्माला आली तीच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती नि:शब्द, निरस आणि एकलकोंडी असतात, हा त्या लेखाचा निष्कर्ष. या ‘लिसनर’ शॉर्टफिल्मची प्रेरणा घेऊन कॅलिफोर्नियात, सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत, जिथे तुम्हाला, तुमचं मन मोकळं करता येतं! मात्र, त्यासाठी पैसे मोजावे लागतात! ते तुमच्यात गुंतत नाहीत; पण तुम्हाला गुंतवून ठेवतात. भावनिकदृष्ट्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पैसे मोजून तासभर संवाद साधायला ‘गिऱ्हायकं’ येतील की नाही, याबाबत हाॅटेलमालक थोडे साशंक होते. पण त्यांची शंका क्षणभंगुर ठरली. बघता-बघता अशा प्रकारची ‘टॉक-टाइम’ हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली!

संवाद हरवलेली कुटुंबं, ही आता जागतिक समस्या बनली आहे. जागतिकीकरणानंतर आर्थिक सुबत्ता आली, राहणीमान उंचावले, पण कामाचा ताण, नोकरीची धास्ती आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे मनस्वास्थ्य हरवून बसलेली माणसं आपल्या घरात आहेत. ही केवळ नोकरदार वर्गाची समस्या नाही.

विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध असे सगळे संवाद हरवून बसलेल्या एक प्रकारच्या मानसिक आजाराचे शिकार आहेत. मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे नुकत्याच झालेल्या जागतिक मनोविकार तज्ज्ञांच्या परिषदेत या विषयावर अतिशय गांभीर्याने चर्चा झाली. विशेषत: कोरोना महामारीनंतर आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीमागे संवादाचा अभाव हे कारण असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरची गर्दी आणि त्यावर खर्ची पडणाऱ्या वेळेत झालेली वाढ हे त्याचे एक प्रमुख लक्षण. प्रत्येकाला काही तरी सांगायचे आहे, पण ऐकणारेच कुणी नाही, अशा एका विलक्षण कोंडीत जग अडकले आहे. हा कोंडमारा जीवघेणा ठरतो आहे. परवा नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी वाचून आई-वडिलांना धक्काच बसला. त्याने लिहिले, ‘मी गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय; पण तुम्ही ऐकूनच घेत नाही. माझ्याच घरात जर कुणी ऐकणारं, समजून घेणारं नसेल तर मी कोणाजवळ मन मोकळं करू?’ या मुलाने लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुराने आपले डोळे आणि कान उघडले तरी पुरे! अन्यथा, पैसे देऊन संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून देणारी हॉटेल्स आपल्याकडेही येऊ घातली आहेच!

सारांश : बोला, व्यक्त व्हा, संवाद साधा, कुठेतरी मन मोकळे करा. मित्र, मैत्रिणी असो की नातलग

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सरप्राईज ट्रीप…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “सरप्राईज ट्रीप…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा का आपल्या मनाने आस्तिकता स्विकारली की आपली प्रत्येक देवदेवतांवर श्रद्धा ही बसतेच. कुठलीही मुर्ती, फोटो दिसला की आपण आपोआपच नमस्कार करतो. कुठलाही प्रसाद मिळाला की तो लगेच डोळे मिटून भक्तीभावाने ग्रहण करतो. कुठल्याही देवाचा अंगारा कपाळाला लावतो,पण जेव्हा कधी आणीबाणीची परिस्थिती येते, संकटाचा सामना करायचा असत़ो, काही निर्णायक प्रसंग समोर उभे ठाकले असतात, किंवा अतीव सुखाची अचानक अनुभूती झालेली असते तेव्हा मात्र हटकून आपल्या डोळ्यासमोर आपलं परम दैवतच येतं,कठीण प्रसंगी आपण जास्तीत जास्त त्याचाच धावा करतो वा अतीव सुखाचे क्षण उपभोगतांना क्षणोक्षणी त्या परम दैवताचीच आठवण करतो.

अर्थातच आपली प्रत्येकाची श्रद्धास्थान ही वेगवेगळी असू शकतात. कारण ह्या श्रद्धेचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडल्या गेलेला असतो. आपलं परम दैवतं हे आपण अनुभवांनी घरात नित्य बघितल्याने, मनापासून निवडलेलं असतं. काल महाशिवरात्र झाली. माझंही परम दैवत शिवशंभो महादेव. त्यावरून ब-याच आठवणी जाग्या झाल्यात, गाठीशी आलेल्या अनुभवांच्या पुरचुंडीची गाठ जरा सैलसर झाली

महाशिवरात्री ला बँकेला सुट्टी असते त्यामुळे जरा निवांतपणा. ह्या दिवशी दोन्ही वेळी उपास असतो. त्यामुळे फराळाला लागणारी निम्मी तयारी ही अधल्या दिवशी करता येते, नव्हे ती तशी करुन ठेवणचं जास्त सोयीचं पडतं.

तसं तर नेहमीच देवळात वा मंदिरात सकारात्मक उर्जा तेवत असते. शांत व पवित्र वातावरणामुळे मन पण प्रसन्न राहातं. काही विशिष्ट दिवस हे त्या दैवताच्या पूजेसाठी खास असतात अशी आपल्या मनाची धारणा असते. हे दिवस सुखद भावनिकदृष्ट्या आपल्याला पाठबळं देतात. आपल्याला ज्या देवाची ओढ असते,ज्याच्यावर आपली मनापासून भक्ती असते,ज्याचा दर्शनासाठी आपल्याला नित्य जावसं वाटतं तेच आपलं परमं दैवतं असतं.

मागील महाशिवरात्रीला लिहीलेल्या पोस्ट मध्ये मी यवतमाळ व अमरावती मधील प्राचीन जागृत शिवमंदारांबद्दल लिहीले होते. माझे स्वतःचे परमदैवत शिवशंभू महादेव तर आमच्या “अहों”चे परमदैवत प्रभू श्रीरामचंद्र. ज्या नवराबायकोंच्या आवडीनिवडी ह्या विरुद्ध असतात ते “काँमन नवराबायको”. आणि विरुद्ध आवडीनिवडी असून सुद्धा जे परस्परांच्या आवडींचा मान ठेवतात, आदर करतात ते “स्पेशल नवराबायको”. त्यामुळे माझ्या शिवभक्तीचा आदर करीत आठ दहा वर्षांपूर्वी “अहोंनी” मला सरप्राईज ट्रीप म्हणून सोरटीसोमनाथ येथील महादेवाचे दर्शन घडविले तो क्षण माझ्यासाठी अमुल्य क्षणांपैकी एक होता. गुजरात मध्ये एका कौटुंबिक कार्यक्रम साठी जायचे असल्याने त्यांनी ह्या ट्रीप चे नियोजन केले होते.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे सोरटीसोमनाथ. पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

समुद्रकिनारी वसलेल्या ह्या मंदिरामध्ये खूप प्रमाणात सकारात्मक ऊर्जा, प्रसन्न वातावरण ,अद्भुत शांती आपल्याला अनुभवायला मिळते हा माझा स्वानुभव. तेथे देवळाच्या कंपाऊंड वाँलपर समुद्राच्या महाकाय लाटा आदळतात आणि जणू ह्या लाटांचे रुप बघून मनात,संसारात असलेल्या छोट्या छोट्या लाटा अवघ्या काही मिनिटात विरुनच जातात जणू.खूप जास्त माझ्या आवडीच्या ठिकाणां पैकी हे एक ठिकाण. तेथेच अहिल्याबाई होळकर ह्यांनी जिर्णोध्दार केलेलं अजून एक शिवमंदिराच्या दर्शनाचा अभूतपूर्व योग आला.

ह्या महाशिवरात्रीच्या पर्वावर जुनी आठवण परत एकदा जागी झाली. ह्यासाठीच कदाचित सणसमारंभ, उत्सव असावेत असं वाटतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -3 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -3 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पहिले, मुली आणि सुना यात त्यांनी कधी फरक केला नाही. मुलीही माहेरी आल्या आणि हात-पाय पसरून गप्पा मारत बसल्या असं कधी झालं नाही. आजी म्हणत, ‘कामावे ते सामावे.’ आता इथून पुढे)

आजी नि नातवंडे यांचे भावबंध मायेने थबथबलेले, सायीसारखे स्निग्ध, साखरेसारखे गोड, हे तर शाश्वत सत्य. माझ्या सासुबाईंचेही आपल्या नातवंडांवर- पतवंडांवर खूप प्रेम होते. त्यांना पतवंडेही होती. चांगली मोठी, जाणती होती. ही पतवंडे म्हणजे माझ्या पुतणीची, दादांची मुलगी माधुरी हिची दोन मुले. ती त्यांना पणजीबाईच म्हणत. खेळताना मुले पडली की त्या म्हणत, ‘पडो, झडो माल वाढो.’  आमच्या सुशीताईंची मुलगी सुनंदा भारी हळवी, म्हणून आजींचे तिच्या भावांना सांगणे असे, ‘उगीच तिला चिडवू नका. ती हरीण काळजाची आहे.’ त्यांच्या बोलण्यात अशा म्हणी, वाक्प्रचार नेहमी असायचे.

आजींना नातवंडांचं कौतुक होतंच. नातवंडांनाही या आपल्या आजीचं तितकंच अप्रूप होतं. नातवंडांना आजीचं कोणतं रूप भावलं? यमुताई ही त्यांची पहिली नात. धाकट्या मुलाच्या बरोबरीची. मोठी मुलगी आक्का, हिची मोठी मुलगी. तिचं आमच्याकडे येणं आणि रहाणं सर्व नातवंडात जास्त झालेलं. तिला आजीच्या गृहव्यवस्थापनातले कायदे आठवतात.  सकाळी उठल्यावर प्रत्येकाने पाच घागरी पाणी ओढायचे. त्यावेळी सगळंच काम घरात असे. स्वयंपाक चुलीवर. जेवणं झालं की प्रत्येकाने आपापलं ताट, वाटी, भांडं याबरोबरच चुलीवरचं एक जळकं भांडं घासायचं. पुरुषांनीसुद्धा. शिळं काही उरलेलं असेल, तर सगळ्यांनी वाटून खायचं. पुरूषांना तेवढं ताजं आणि बायकांना शिळं, असा भेदभाव नव्हता. शिळं टाकायचं नाही, हे मात्र नक्की होतं. ‘अन्न हे पूर्णब्रम्ह.‘ त्या म्हणायच्या. आजीच्या व्यवस्थापनाबद्दल तिची धाकटी बहीण कमल सांगते, ‘ सुट्टी असली की आम्ही माधवनगरला जायचो. सांगलीहून माधवनगर फक्त दोन –तीन मैलांवर. त्या काळात शेंगा फोडून शेंगदाणे वापरायची पद्धत होती. मग आजी मुलांपुढे शेंगांची रास ओतायची आणि म्हणायची भांडंभर दाणे काढले की मी एक रुपया देईन. मग जत्रेतून काय हवं ते तुम्ही घ्या. जो जास्त दाणे काढेल, त्याला जास्त पैसे. ‘ दाणे काढल्यावर पैसे मिळणार, म्हटल्यावर आम्ही इरीशिरीनं दाणे काढायचो. मुलांना जत्रेसाठी पैसे मिळायचे. आजीचे काम व्हायचे.’  त्या काळात धुणं- भांडी याव्यतिरिक्त सगळी कामे घरात असत. शेंगदाणे नव्हे, वर्षाची शेंगांची पोती घेतली जात. त्या काळात माधवनगरला विठोबाची, हरीपूरला शंकराची जत्रा भरे. आजी हौसेने नातवंडांना घेऊन जत्रेला जात. टांग्याने हरिपूरला जाण्याचेही आकर्षण असे. मीदेखील तीन-चार वेळा त्यांच्याबरोबर जत्रेला गेले होते.

माझ्या लग्नाच्या वेळी घरी संपन्नता आली होती, पण सासूबाई कधी आपले जुने दिवस विसरल्या नाहीत आणि गरजावंताला मदत केल्याशिवाय कधी राहिल्या नाहीत. त्या काळात आणि एकूणच आयुष्यात ‘जिथे कमी, तिथे मी’ या वृत्तीने त्या जगल्या आणि हाच वसा त्यांनी आपल्या मुली – सुनांनाही दिला. नातेवाईकांमध्ये कुणाची अडचण आहे असं कळलं की त्या निघाल्याच आपली पिशवी घेऊन त्यांच्या मदतीला. गावात कुणाला गरज असेल, तर त्या धावायच्या. गरजवंताची गरज भागवणे, हीच त्यांची दान-धर्माची कल्पना होती. कुणासाठी काही केलं, मग ते नातेवाईक असोत वा परिचित वा आणि कुणी, ते बोलून दाखवायचा त्यांचा स्वभाव नव्हता.

माझ्या जाऊबाईंची बाळंतपणे सांगलीत झाली. डॉक्टर सहजपणे उपलब्ध होणं, हे त्याचं कारण. माझ्या जाऊबाईंची म्हणजे आमच्या वहिनींची माहेरची स्थिती त्या काळात हलाखीची होती. वडील गेलेले. चार भावंडे शिकणारी. आजींना परिस्थितीची कल्पना होती. त्या नातवंडांना बघायला गेल्या की सुनेच्या हातात पैसे ठेवून येत. त्यातही विहीणबाई जवळ नाहीत, असं बघून त्या पैसे देत. त्यांच्या सन्मानाला ठेच लागू न देता मदत करायची, असं धोरण. मला दहा वर्षांनी मुलगा झाला म्हणून त्याचं नाव अमोल ठेवलं. त्या काळात माझं माहेरी करण्यासारखं कुणीच नसल्यामुळे माझं बाळंतपण सासरीच झालं. माझ्या मुलाची मुंज आम्ही त्यांच्यासाठी आठव्या वर्षी केली. मुंज झाल्यावर त्या म्हणाल्या, ‘आता मी मरायला मोकळी झाले.’ अर्थात त्यानंतर, त्या नऊ वर्षे जगल्या. वयाच्या ९२ वर्षापर्यंत त्या जगल्या. शेवटची दोन वर्षे त्यांना भ्रम झाला होता. सारखं पोटात दुखतय म्हणायच्या. औषध म्हणून श्रीखंडाची गोळीही दिलेली चालायची. अगदी आजारी, हांतरूणावर पडून अशा त्या फक्त चार-सहा महिनेच होत्या. बाकी त्यांनी आपलं जीवन आनंदात, सुखा – समाधानात, तृप्तीत, इतरांच्या आनंदात आनंद  मानत घालवलं.

आमच्या वहिनींच्या मावशी माधवनगरलाच रहात. त्यांच्या यजमानांना फारसं बरं नसे. त्या स्वत: फारशा शिकलेल्या नव्हत्या. शाळेत जाणार्‍या चार मुली आणि एक मुलगा. घराची शेती भाऊबंदांच्या वादात. त्यांना आजींनी मसाले, पापड, शेवया, तिखट , पुरणपोळ्या इ. करून विकायचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, ‘लोक काय म्हणतील, याचा विचार करू नकोस. लोक जेवायला घालणार आहेत का?’ मावशींचे पहिले ग्राहक आम्ही असू. आजी म्हणायच्या, ‘आपले चार पैसे जास्त गेले, तरी चालतील, पण ती आणि तिच्या घराचे अन्नाला लागले पाहिजेत. आजी त्यांना पोथी वाचून दाखवायला सांगत. त्यासाठी त्यांना पैसे देत. आजींचं हे रूप माझ्या डोळ्यापुढचं. इचलकरंजीला माझ्या दोन नंबरच्या वन्स सुशीताई रहात. त्यांच्यासमोर सौंदत्तीकर म्हणून जावा-जावा रहात. त्यांच्यापैकी धाकटीची स्थिती फारच हलाखीची होती. आजी एकदा त्यांना म्हणाल्या, ‘तुझ्या हातात कला आहे. लोकांचं शिवणकाम, भरतकाम करून दे. हलव्याचे दागिने कर आणि वीक. चार पैसे मिळतील. संसारात ते उपयोगी पडतील.’ त्यांनीही आजींचा सल्ला मानला. चार पैसे मिळू लागले. संसाराला मदत झाली.

सल्ले केवळ दुसर्‍यांनाच असत असं नाही. आम्हालाही असत. संक्रांतीच्या वेळी बायकांना हळदी-कुंकवाला बोलावून काही ना काही लुटायची पद्धत होती. त्या म्हणत,  ‘रुपया – दोन रुपयाची वस्तू तुम्ही लुटणार. त्याचा घेणाराला फार काही फायदा असतो, असं नाही. त्यापेक्षा यासाठी जेवढे पैसे तुम्ही खर्च करणार, तेवढ्या पैशाची एखादी वस्तू, एखाद्या गरजावंताला द्या. साडी म्हणा, एखादा मोठं भांडं म्हणा, चादर वगैर म्हणा, किंवा आणखी काही…. तिला गरज असेल ते.’ गरजू स्त्री ब्राह्मणाचीच असावी, असा त्यांचा हट्ट नसे. दान-धर्म, त्यातून मिळणारं पुण्य यावर त्यांचा विश्वास होता, पण दान-धर्माच्या त्यांच्या कल्पना मात्र आधुनिक होत्या.

शिक्षणाचं महत्व त्यांना होतंच. लग्न झालं, तेव्हा मी फक्त पदवीधर होते. लग्नानंतर बी. एड., एम. ए., एम. एड. हे सारं शिक्षण आजींच्या मान्यतेनं आणि प्रोत्साहनानं झालं. घरचा राबता मोठा. मला नोकरी. त्यातही एम. ए., करायचं ठरवलं. याला होकार देताना आजींनी आणखी एक गोष्ट व्यवहाराच्या दृष्टीने केली. ‘तुझी नोकरी आणि अभ्यास, त्यामुळे तिच्यावर ( माझ्या जाऊबाईंवर ) कामाचा जास्त बोजा नको. तुम्ही वेगळे रहा. मी माझ्या डोळ्यांदेखत तुम्हाला घर मांडून देते. वेगळे रहा. गोडीत रहा. गरजेप्रमाणे एकमेकींना मदत करा.’ या व्यवस्थेमुळे, मला माझ्या सोयीप्रमाणे काम करता आलं आणि अभ्यासाठी वेळ काढता आला. आम्ही दोघांनीही त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागायचा, आमच्याकडून शेवटपर्यंत प्रयत्न केला. आता आजीही नाहीत आणि त्यांचा वसा चालवणार्‍या जाऊबाईही नाहीत. मात्र त्यांनी आणि मी आजींचा वसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आमच्या परीने केला आहे.

क्रमश: – भाग ३

©  सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

मिरज तालुक्यातील गवळेवाडी गावातील घटना. शाळेच्या मैदानात खेळताना, मुलांना पाच फूट लांब आणि दोन इंच जाडीचा भला मोठा नाग दिसला. सदैव संरक्षणात तत्पर असलेल्या ‘ भालू ‘ या कुत्र्याला आणले गेले. नागाला पाहताच ‘भालू ‘ ने नागावर झडप घातली. आणि ‘ भालू ‘ आणि नागाची झुंज सुरू झाली . ‘भालूने ‘ नागाला आपल्या तोंडात धरून फेकून दिले .नागानेही आक्रमक होऊन ,भला मोठा फणा काढून, ‘ ‘भालू ‘ वर हल्ला करून त्याला दंश करण्यास सुरुवात केली. नाग फुसफुस आवाज करू लागला. दोन तासांच्या झुंजीनंतर ‘ भालू ‘ने नागाला जेरीस आणून ठार मारले. ‘भालू ‘ कोणालाही जवळ येऊ देईना. नाग मेल्याची खात्री झाली. आणि मगच तो घरी परतला. नागाच्या दंशाने ‘भालूच्या ‘ तोंडाचा  चेंदामेंदा झाला होता. काही तासातच त्याचे अंग सुजायला लागले. तोंडाला फेस यायला लागला. तो बेचैन होऊन लोळायला लागला .काही वेळाने आपल्या मालकाकडे पहात एका जागी झोपून राहिला. कर्तव्यपूर्ती करून चिरनिद्रेत विलीन झाला. डफळ्या रंगाच्या ,उंच ,सडपातळ, मोठ्या दमाच्या, शिकारी आणि पराक्रमी भालूला आजही गावकरी विसरले नाहीत.

एखादा कुत्रा पराक्रमी असेलच असे नाही.  पण दैवी म्हणावे असे सुंदर रूप आणि उत्तम अभिनय परमेश्वराने त्याला बहाल केलेले असते. त्यावर तो अलोट पैसा आणि जागतिक कीर्ती मिळवू शकतो आणि आपल्या मालकालाही मिळवून देतो १९४२ ते ४४ सालची गोष्ट. कॉलेजातीचा ‘कॉल ‘ त्याचे नाव. अत्यंत हूड असा कुत्रा. त्याच्या हूडपणाला कंटाळल्यामुळे मालकाला नकोसा झाला म्हणून त्याला त्यांनी विदर्भातल्या  डॉक्टरला देऊन टाकला. खरंतर ही जात थोडी अर्धांग आणि भोजरी असून सुद्धा पाच-सहा महिन्यात तो अवघड कामही उत्तमरीत्या करू शकला.  एके दिवशी पेपरमध्ये केली जातीचा कुत्रा पाहिजे अशी हॉलीवुडची जाहिरात आली.  ३०० कुत्र्यांचा इंटरव्यू झाला आणि त्यामध्ये कॉल ची निवड झाली.  ट्रेनरना खूप आनंद झाला.  लसीकरण होम या चित्रपटासाठी त्याची निवड झाली चित्रपटाचा नायक एक कुत्रा असूनही तो चित्रपट खूपच गाजला.  कितीतरी देशात तो चित्रपट दाखवला गेला आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. आणखी चित्रपटांसाठी अनेक देशातून पत्रे आली.  अनेक करारही झाले.  आता त्या 

कॉल ची कमाई वार्षिक ५० हजार डॉलर झाली.  लागोपाठ आणखी पाच सहा चित्रपट निघाले. काही वेळा तो प्रेक्षकात हास्याचे फवारे उडवायचा, तर कधी डोळ्यात अश्रूही उभे करायचा.  लसीकरण होम चित्रपटानंतर तो लसी म्हणूनच प्रचलित झाला.  लोकांनी त्याला डोक्यावर घेतले.  त्याच्या रेखाचित्रांची मासिके निघाली.  शाळेत शिक्षक त्याच्या निष्ठेच्या गोष्टी मुलांना सांगायला लागले.  धर्मोपदेशक त्याच्या निष्ठेवर प्रवचने देऊ लागले.  तो हॉलीवुडचा एक अमोल कुत्रा झाला.  श्वान प्रदर्शनात फक्त उपस्थित राहण्यासाठी एक दिवसाचे एक हजार डॉलर्स मिळत असत.  त्याचे सहा चित्रपट होईपर्यंत त्याने शूटिंग साठी वीस हजार मैलांचा प्रवास केला होता– कधी रेल्वेच्या वातानुकूलित खास डब्यातून, कधी खास बांधणीच्या स्टेशन वॅगनमधून, इतकच काय पण स्वतःच्या विमानातूनही तो प्रवास करीत असे.  एकदा कॅनडामध्ये शूटिंगला गेलेला असताना सैनिकांच्या हॉस्पिटलमधून त्याला पाहण्यासाठी निमंत्रण आले.  त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सैनिकांचे चेहरे एकदम खुलले.  त्याला प्रत्यक्ष पाहून सैनिकांना खूप आनंद झाला, कारण त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्याला पाहिलेले होते.  एक आश्चर्य म्हणजे एक दीर्घकाळ पडून असलेला सैनिक लसी ला पाहून ताडकन उठून बसला.  त्याचा हात चाटून त्याला शेकहॅण्ड  केले.  डॉक्टरांनी आणि औषधांनी जे काम झाले नव्हते ते लसीने केले.  किती कौतुक करावे त्याचे बरं.

आजकाल मेडिकल क्षेत्रात डॉग थेरपी म्हणून कुत्र्याचा वापर केला जातो. परदेशात ज्येष्ठ नागरिकांसाठी कंप्यानियन म्हणून कुत्रा पाळतात. आणि त्याला शिकवतात. ते   ज्येष्ठांचे चोरापासून ,धोक्यापासून रक्षण करतात. एखाद्याला एपिलेप्सीचा त्रास असेल, आणि कुत्रा बरोबर असेल ,तर त्या व्यक्तीला चक्कर येण्यापूर्वी काही क्षण कुत्र्याला अगोदर जाणीव होते. आणि तो त्या व्यक्तीला त्याचे कपडे पकडून खाली बसवतो, आणि सावध करतो… जर्मनीतील म्युनिच शहरातील घटना.  ‘आर्को ‘ हा एक म्हातारा कुत्रा. ५६ वर्षाच्या एकट्याच राहणाऱ्या वालडरमनने  त्याला ठेवून घेतले .एके दिवशी  वालडरमनला रस्त्यातच हार्ट अटॅक येऊन तो खाली पडला. ‘आर्को ‘ ५०  मीटरवर पळत जाऊन पादचाऱ्यांवर भुंकायला लागला. आणि त्यांना घेऊन  मालकाजवळ आला. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले .बरे वाटून परत घरी आल्यानंतर मालकाची सेवा करण्यासाठी आणखी काही वर्षे  तो जगला .” मी म्हातारा झालो तरी काय करू शकतो ” हे त्यांनी दाखवून दिले. मालकावरच्या निष्ठेला शब्दच अपुरे आहेत.

 कधी कधी एखाद्याचे दैव कधी उजळेल सांगता येत नाही. आमच्या  घरापासून ,रस्त्याच्या कडेला  झुडुपात एका कुत्रीने चार पिल्लांना जन्म दिला. आठ दहा दिवसांनी पिलांची आई कुठे गायब झाली समजले नाही. पिले रात्रंदिवस आईसाठी भुकेने ओरडत होती. त्यांची आई आली तर चावेल, म्हणून कोणी पिलांना उचलण्याचे धाडस करत नव्हते. अखेर माझ्या मैत्रिणीने त्याना उचलून घरी आणले. दूध-खाणे सुरू केले. त्यांच्या बाललीलांनी सगळ्यांना लळा लावला. दोन पिलांना कोणीतरी सांभाळायला घेऊन गेले. उरलेल्या दोघांची नावे ‘ बंड्या’  आणि  ‘ गुंडी ‘ अशी ठेवली गेली. काही  कौटुंबिक अडचण आल्याने ‘ बंड्या ‘ आणि ‘ गुंडीला’  ” पीपल फॉर ॲनिमल” च्या संस्थेत पाठवले गेले. इतर प्राण्यांबरोबर दोघेही छान रुळले. संस्थेतील काही गाढवांना उटीला पाठवायचे होते. उटी , (मसिन गुडी)  या ठिकाणी डॉक्टर मिसेस एलिना वोटर आणि डॉक्टर नायजेल वोटर (नॉर्वेचे भारतात स्थायिक झालेले व्हेटर्नरी डॉक्टर ) यांनी २० एकर जागेत “इंडिया प्रोजेक्ट फॉर नेचर” ही संस्था  स्थापन केली आहे. तेथे गाढवांबरोबर गुंड्या आणि बंडी यांनाही पाठवले गेले. परदेशस्थ काही संस्था आणि व्यक्ती अशा प्राण्यांना दत्तक घेतात. बंड्या आणि गुंडीच्या फोटोची जाहिरात झाली. यु .के. मधील एका प्रसिद्ध बँड ग्रुपचे गायक  पाँल प्राणीप्रेमी होते .त्यांनी फोटो, कागदपत्रे यांची पूर्तता केली .त्यांची नावे बदलून त्यांचे ‘ पॉल ‘म्हणजे (स्वतःचे) आणि  नँन्सी (बायकोचे) असे नामकरण केले. दत्तक विधान झाले . ‘बंड्या’ आणि ‘गुंडी’  मराठी जोडी  पाँल आणि नॅन्सी अशी इंग्लिश झाली. रस्त्याच्या कडेला झुडुपात जन्माला आलेली, रात्रंदिवस आईविना भुकेने व्याकुळ होऊन ओरडत राहिलेली ,’बंड्या ‘ आणि ‘ गुंडी ‘  म्हणजेच  पाँल आणि नॅन्सी उटीला आनंदी आणि मुक्त जीवन जगायला लागले. कसं नशीब असतं ना एकेकाचं !

 — क्रमशः भाग तिसरा . 

 ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares