मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

मुलांना जबाबदार  बनवायचं असेल, तर अर्थातच त्यांना काही गोष्टीचं स्वातंत्र्य द्यायला हवं. याचाच अर्थ, त्यांच्याकडं जसं लक्ष द्यायला हवं, तसंच थोडं दुर्लक्षही करायला हवं. रेणू दांडेकर यांनी यासाठी ‘हेल्दी निग्लिजन्स’हा शब्द सुचवला आहे. त्या म्हणतात, ‘आजकाल घरात एकच मूल असतं. फार फार तर दोन.या ‘दोन बाय दोन’च्या रचनेत मुलंच केंद्रस्थानी असतात.लक्ष्य असतात. त्यामुळंच कधी कधी आपलं,नको इतकं लक्ष मुलांकडे असतं.

त्यांनी असं एक उदाहरणही दिलंआहे: माझी एक मैत्रीण मुलांच्या बाबतीत अत्यंत जागृत होती. तिनंच तिच्या मनानं मुलांच्या अभ्यासाच्या वेळा…जेवायच्या वेळा… आहार… कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास ,या सगळ्याचंच वेळापत्रक बनवलं होतं. सतत त्यानुसार ती आपल्या मुलांवर देखरेख ठेवायची.मुलं अगदी जखडून गेली ,कंटाळली, हळूहळू ऐकेनाशी झाली.

आईची प्रतिक्रिया, “मी मुलांचं इतकं करते,तरी मुलं अशी वागतात. यापेक्षा अजून किती लक्ष द्यायचं?”

“तू जरा जास्तच लक्ष देते आहेस,” रेणूताईंनी म्हटलं,”थोडं दुर्लक्ष कर .मुलांना त्यांचं स्वतःचं जगणं आहे.जर त्यांच्या प्रत्येक क्षणावर तू ताबा ठेवलास, तर कसं चालेल?जरा ‘हेल्दी निग्लिजन्स’ करायला शिक.”

मुलांना मोकळेपणा, स्वातंत्र्य दिल्याशिवाय ती जबाबदार कशी होतील? फक्त एवढंच, की ती स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करत आहेत ना ,हे त्यांच्या नकळत पहायला हवं. लक्ष हवंच,पण न जाचणारं! मूल पोहायला लागलं तरी आईनं त्याच्या पाठीवर डबा बांधला, त्याचा हात धरला तर ते तरंगणार कसं?हात पाय हलवणार कसं? ते आता पोहू शकतंय, यावर विश्वास ठेवायला हवा. आपण, ते बुडेल, ही भीती सोडायला हवी. थोडं काठावर उभं राहता आलं पाहिजे ,थोडं पाण्यातही भिजता आलं पाहिजे. पालक प्रशिक्षणातला हा एक धडा फार महत्त्वाचा आहे. शोभा भागवत म्हणतात, त्याप्रमाणे ,’ ‘मूल मोठं व्हावं, शहाणं व्हावं,’ असं तोंडानी बोलत ,मनात ठेवत, प्रत्यक्षात आपण त्याला ‘लहान’च ठेवत असतो. तोंडी बोलण्यापलीकडं मूल आरपार आपल्याला पहात असतं .आपण ‘मूल’ राहण्यातच पालकांना समाधान आहे, हेही ते जाणतं आणि तसं वागत राहतं.’

ते विश्वासानं शहाणं व्हायला हवं असेल, तर पालकांनी सतत पालक म्हणून वागायचं सोडून द्यायला हवं. पालकपणाचा अधून मधून राजीनामा द्यायला हवा.

लेखक –  श्री शिवराज गोर्ले

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५६ – आपलेच झाले परके ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५६ – आपलेच झाले परके डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

अमेरिकेत मत्सराचा अग्नी कसा भडकला होता ते आपण पाहिले. जे लोक जागतिक स्तरावर सर्व धर्म भेद ओलांडण्याचा विचार मांडत होते ते यात सहभागी होते हे दुर्दैवच म्हणायचे. भारतात सुद्धा त्याची री…ओढत हिंदू धर्म कसा संकुचित व बुरसटलेला आहे, हे ओरडून सांगितले जात होते. पण स्वामी विवेकानंद मात्र हिंदू धर्मातील प्राचीन ऋषींचे उदात्त विचार परदेशात समजावून देत होते. त्यात कुठल्या धर्माची सीमा आडवी येत नव्हती. वा देशाची नाही. हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आज पण आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे.

भारतात प्रसिद्ध झालेले विवेकानंद यांच्या विरोधातले लेख अमेरिकेत पुन्हा प्रसिद्ध केले जात. हे लेख तिथल्या ‘लॉरेन्स अमेरिकन’, ‘आऊटलुक’ आणि ‘डेट्रॉईट फ्री प्रेस’ मध्ये छापून आल्याने सगळ्या लोकांना वाचायला मिळत असत. या विषारी प्रचारामुळे लोक दुरावत चालले होते. परिषदेवेळी मित्र झालेले डॉ.बॅरोज बोलेनसे झाले. एव्हढा सतत प्रचार वाचून प्रा. राईट सुद्धा थोडे साशंक झाले. हे बघून विवेकानंद अस्वस्थ झाले. होणारच ना. कलकत्त्यात इंडियन मिरर या वृत्तपत्रात याचा प्रतिवाद होत असायचा. यात विवेकानंद यांच्या कार्याचे वर्णन, परिषदेची माहिती, चर्चा, त्यांनी मिळवलेले यश हे सर्व छापून येत होतं. माध्यमे कसं जनमत घडवतात याचं हे उत्तम ऊदाहरण आहे. म्हटलं तर चांगल्या कामासाठी माध्यमांचा खूप चांगला उपयोग आहे पण वाईट कामांना किंवा विघातक कामाला प्रसिद्धी देऊन खतपाणी घालणे हे समाजाला अत्यंत घातक आहे. पण भारतात. जगातल्या प्रसिद्धी माध्यमांची ओळख भारतीय लोकांना नव्हती. त्यामुळे इथे आलेली वृत्त अमेरिकेतल्या लोकांनाही  अधिकृतरीत्या कळावित असे कोणाच्या लक्षात आले नाही. कलकत्त्यात ‘इंडियन मिरर’ मध्ये १० एप्रिल १८९४ या दिवशीच्या अग्रलेखात विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले होते.ते असे होते, “अमेरिकेला जाऊन हिंदू धर्माचा एक प्रवक्ता म्हणून विवेकानंदांनी जे नेत्रदीपक यश मिळवले आहे, त्याबद्दल त्यांना एक सन्मानपत्र लिहून आपली कृतज्ञता व्यक्त करणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. ज्यांनी सर्वधर्म परिषदेचे आयोजन केले त्या अमेरिकन लोकांचेही आपण कृतज्ञ असावयास हवे. कारण त्यांनी त्या परिषदेच्या निमित्ताने विवेकानंदांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्यामुळे, त्यांना आपले पुढील कार्य करण्यासाठी पाया भरता आला”. विवेकानंद यांना जे अपेक्षित होते तेचं यात म्हटले होते, पण हा मजकूर त्यांच्या हातात नव्हता. तसाच मधेच बोस्टन मध्ये भारतातील आलेला मजकूर छापला होता ते कात्रण मिसेस बॅगले यांनी विवेकानंद यांना पाठवले. त्याबरोबर बोटभर चिठ्ठी सुद्धा नव्हती यावरून त्यांची गंभीरता लक्षात आली. उत्तम परीचय झालेली ही मोठ्या मनाची लोकं, त्या क्षणी अशी वागली याचे स्वामीजींना किती दु:ख झाले असेल.

आता हे सारं त्यांना असह्य होत होतं. शेवटी त्यांनी एक मार्ग निवडला आणि त्याबद्दल मद्रासला आलसिंगा आणि कलकत्त्याला गुरुबंधूंना पत्र पाठवले. त्यात लिहिले होते,  मद्रास व कलकत्त्यात दोन सार्वजनिक सभा घ्याव्यात, त्यात नामवंतांचा सहभाग असावा. त्यांनी विवेकानंद यांच्या कार्याची पावती देणारी प्रतींनिधिक भाषणे व्हावीत, अभिनंदन करणारा ठराव संमत करावा, आणि अमेरिकेतील लोकांना धन्यवाद देणारा दूसरा ठराव असावा. या सभांचे वृत्त भारतीय वृत्त पत्रात प्रसिद्ध व्हावे. आणि त्यांच्या प्रती इथे अमेरिकेत डॉ बॅरोज आणि प्रमुख वृत्तपत्रांचे  संपादक यांना पाठवावीत अशी विनंतीपर पत्र पाठवली.

स्वत:ची प्रसिद्धी हा भाग यात नव्हता. पण हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून जी लोकं त्यांच्या बरोबर आदराने उभी होती, मदत करत होती त्यांच्या मनातून संदेह निर्माण झाला तर केलेल्या कामावर पाणी चं फिरणार ही भीती होती. कारण हिंदू धर्माची ध्वजा एका चारित्र्यहीन माणसाने हातात घेतली आहे असे चित्र तिथे रंगविले जात होते. हा ध्वजाचा अपमान होता. मिशनर्‍यांचा काही भरवसा राहिला नव्हता.  काय करतील ते सांगता येत नाही अशी परिस्थिति उद्भवली होती.

डेट्रॉईट मध्ये आयोजित एका भोजन समारंभात घडलेला प्रसंग यावेळी विवेकानंद यांनी कॉफीचा पेला उचलला तर त्यांना आपल्या शेजारी एकदम श्रीरामकृष्ण उभे असल्याचे दिसले, ते म्हणत होते, “ ती कॉफी घेऊ नकोस, त्यात विष आहे. विवेकानंदांनी एक शब्दही न बोलता तो कॉफीचा पेला खाली ठेवला. अशी आठवण गुरुबंधुनी सांगितली आहे. यावरून केव्हढी गंभीर परिस्थिति तिथे झाली होती याची कल्पना येते. एका सर्वसंग परित्यागी  संन्याशाला स्वत:च्या अभिनंदनाचे ठराव करून अमेरिकेत पाठवावेत असे स्वत:च लिहावे लागले होते. यामुळे त्यांच्या मनाची काय अवस्था व किती घालमेल झाली असेल ?

त्यांनी जुनागड चे दिवाण साहेब, खेतडी चे राजे, यांनाही पत्र लिहिली. मेरी हेल यांनाही पत्र लिहून आपल मन मोकळं केलं. सर्वधर्म परिषदेचं महाद्वार ज्यांनी आपल्यासाठी उघडलं होतं त्या प्रा. राईट यांच्या मनात तरी आपल्याबद्दल संशयाची सुई राहू नये असे विवेकानंद यांना वाटत होते. ती दूर करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे असेही त्यांना वाटले म्हणून त्यांनी तसे पत्र राईट यांनाही लिहिले. ते लिहितात, “ मी धर्माचा प्रचारक कधीही नव्हतो, आणि होऊ ही शकणार नाही. माझी जागा हिमालयात आहे, माझ्या मनाला एक समाधान आहे की, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मी परमेश्वराला म्हणू शकतो की, हे भगवन, माझ्या बांधवांची भयानक दैन्यवस्था मी पहिली, ती दूर करण्यासाठी मी मार्ग शोधला, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी पराकाष्ठेचा प्रयत्न केला. पण माला यश आले नाही. तेंव्हा तुझी इच्छा असेल तसे होवो”. तर मिसेस हेल यांना विवेकानंद लिहितात. “या सार्वजनिक जीवनाला आपण कंटाळून गेलो आहोत. माताजी तुमच्या सहानुभूतीचा मला लाभ होईल? शेकडो बंधनांच्या ओझ्याखाली माझे हृदय आक्रंदत आहे”.

दरम्यान विवेकानंद यांच्या हातात जुनागड चे हरिभाई देसाई आणि खेतडीचे अजित सिंग यांची पत्रे आली. लगेच ती प्रा. राईट यांना पाठवली.

अगदी एकाकी पडले होते ते. महिनाखेरीस विवेकानंद हेल यांच्या कडे आले. या सर्व घटनांनी ते अतिशय थकून गेले होते. शरीराने नाही तर मनाने.याचवेळी हेल यांना एक अनामिक पत्र आले की, विवेकानंद यांना तुमच्या घरी ठेऊन घेऊ नका म्हणून, हा एक खोटा आणि चारित्र्यहीन माणूस आहे. हेल यांनी हे पत्र घेतले आणि फाडून, तुकडे करून पेटत्या शेगडीत टाकले.

प्रतापचंद्र यांची मजल तर श्री रामकृष्ण यांच्यावरही प्रतिकूल शब्दात टीका करण्याचे सोडले नव्हते. वास्तविक त्यांनी नरेंद्रला या आधी पहिले होते रामकृष्ण यांच्यावर तर श्रेष्ठत्व सांगणारा सुंदर लेख लिहिला होता. एकदा संध्याकाळी मेळाव्यात प्रतापचंद्र बोलत असताना श्रीराम कृष्ण आणि विवेकानंद यांच्याबद्दल निंदा करणारे काही बोलले.

हे दीड दोन महीने जणू काळ रात्रच होती स्वामीजींसाठी. पण ती आता संपत आली होती. नवा सूर्य उगवणार होता आणि मनातल्या व्यथा नाहीशा होऊन क्षितिजावर प्रसन्नता प्रकाशमान होणार होती. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माती भिडली आभाळा… भाग-1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

परिचय

श्री विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव

  • सेवानिवृत्त मुख्याध्यापक .
  • सोशल मीडियावर गेली सहा वर्षे सातत्याने विविध विषयांवर लेखन.
  • वर्तमानपत्र, दैनिके इ तून विविध लेख प्रसिद्ध
  • औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक आधुनिक केसरी या ई वृत्तपत्रातून अनेक लेख ‘ उगवतीचे रंग ‘ या सदराखाली प्रकाशित
  • तरुण भारतच्या ‘ आसमंत ‘ पुरवणीत ‘ थोडं मनातलं ‘ हे साप्ताहिक सदर सुरू.
  • आदर्श शिक्षक पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार इ पुरस्कार…
  • सहसचिव, म सा परिषद, पुणे शाखा चाळीसगाव

प्रकाशित पुस्तके :

  1. कवडसे सोनेरी… अंतरीचे
  2. आकाशझुला
  3. अष्टदीप (आठ भारतरत्नांची प्रेरणादायी चरित्रे)
  4. आनंदाच्या गावा जावे. (आनंद, ज्ञान देत सकारात्मक दृष्टिकोन देणारे लेख)
  5. रंगसोहळा (ललित लेख)
  6. रामायण : महत्त्व व व्यक्तिविशेष (रामायणातील पात्रे आणि त्यांचा आजच्या संदर्भातील संदेश, रामायणकालीन शिक्षण, समाजरचना इ रसाळ भाषेत सांगणारे पुस्तक)
  7. महर्षी वाल्मिकी चरित्र (या पुस्तकावर आधारित महर्षी वाल्मिकीच्या जीवनावर एक लघु चित्रपट देखील येणार आहे.)

विशेष :

  • नाशिक येथील एफ एम रेडिओ विश्वासावर गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ दर मंगळवारी व शुक्रवारी सकाळी आठ वाजता ‘या सुखांनो या’ हा कार्यक्रम प्रसारित होतोय.
  • याच रेडिओवर आनंदघन लता हा कार्यक्रम अकरा महिन्यांपासून सुरू आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत 46 भाग सादर झाले आहेत.

?मनमंजुषेतून ?

☆ माती भिडली आभाळा… भाग-1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

गारंबीचा बापू ‘  या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे. ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा…’ रवींद्र साठे यांनी  असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की  मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे.  पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ? आपण कधी गेलो का तिथे ? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं. 

मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ‘ माऊली ? ‘ एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने लगेच मंदिराच्या दिशेकडे बोट दाखवलं. माऊली म्हटलं की झालं. कोण माऊली असा प्रश्न पडत नाही एवढी थोरवी त्या एकाच माऊलीची. मंदिराकडे जाताना सुंदर हिरवीगार शेतं मन आकर्षून घेत होती. माऊलींच्या मंदिरासमोरचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न भासत होता. मंदिरासमोर चिंचा लगडलेली छान चिंचेची झाडं. झाडाखालीच एक माऊली हार आणि प्रसाद विक्रीसाठी घेऊन बसलेली. तिच्याकडून दोन हार आणि प्रसाद घेतला. कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराचे आवार प्रशस्त, शांत, स्वच्छ अन प्रसन्न. 

थोड्याशा पायऱ्या चढून मंदिरात पोहोचलो तो भव्य सभामंडप दिसला. पाहतो तो त्यात पंचवीस तीस स्त्री पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचे सूर कानी आले. त्यामुळे मंदिराचं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटत होतं . ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओव्या कानावर पडत होत्या. 

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥ 

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।

हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ 

‘जे जे उपजते किंवा जन्म घेते ते ते नाश पावते. नाश पावलेले पुन्हा दुसऱ्या रूपाने प्रत्ययास येते. सूर्य आणि चंद्राचा उदय अस्त हे अखंडित सुरूच असतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे हे चक्र अविरत सुरू राहते. तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आसक्ती मनात धरणे आणि तिच्या नष्ट होण्याने शोक करणे व्यर्थ आहे. ‘ या अर्थाच्या या सुंदर ओव्या कानी पडल्या. ज्या ठिकाणी साक्षात माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ठिकाणी तिचे मनन, पठण किंवा पारायण करणारी ही मंडळी किती भाग्यवान आहेत असा विचार मनात आला. 

मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडते ते शिवलिंगाचे. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला ( पैस ) टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसाचा पवित्र खांब. आणि त्याच्या शेजारी असलेल्या भागात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी उतरवून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांच्या सुंदर मूर्ती आहेत. 

पूर्वी ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा या ठिकाणी करवीरेश्वराचे मंदिर होते. तेथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. 

शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे । 

सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥

— अशी ही तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी. 

काळाच्या ओघात ते करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले.  पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, तो खांब मात्र तसाच राहिला. त्या खांबानं जणू आभाळ पेललं. आभाळ पेलण्याइतका तो उंच झाला. माऊलींनी त्याला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर म्हणजे आभाळच. ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा आभाळ. इथला खांब हा पृथ्वीवरल्या मातीचेच प्रतीक. पण ही माती ज्ञानदेवांच्या पावन स्पर्शाने एवढी पुनीत, एवढी विशाल झाली की ती आभाळाला भिडली. म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या. 

–क्रमशः भाग पहिला 

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मिलेटस् / भरडधान्ये खालीलप्रमाणे :-

1) ज्वारी/ Sorghum millet                                                                           

 – प्रकृतीने थंड, उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी खावी. Glutein free भाकरी, लाह्या, पोहे बनवून खाऊ शकतो. 

2) बाजरी/ Pearl Millet                  

  – उष्ण प्रकृतीची, बाजरीची भाकरी हिवाळ्यात खावी. कॅल्शियम, आयर्न, मुबलक. गरोदर माता, स्तनदा माता यांनी जरूर बाजरी खावी. फायबर्स खूपच असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. 

3) नाचणी/ रागी / Finger Millets                                                      

 – नाचणीला Nutrients Powerhouse असे म्हणतात. नाचणीचे दूधही (Ragi milk) तयार करता येते आणि ते खूप पौष्टिक असते. 

4) राळे वा कांगराळे/ Foxtail millet                                    

 – राळ्याचा भात, खिचडी, पोहे असे पदार्थ बनतात. मेंदू आजार, विकार, गरोदर मातांच्यासाठी खूप चांगले. अस्थिरोग/हाडांचे रोग व विकार, स्पाईन/मज्जारज्जू संदर्भातील आजार, विकार यात फायदेशीर. 

5) वरी वा वरीचे तांदूळ वा भगर / Barnyard Millet                          

 – उपवासासाठी, अल्प उष्मांक अन्न / low calorie food, कॅल्शियम, आयर्न खूप जास्त प्रमाणात. फायबर्स खूप जास्त म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर. लिव्हर, किडनी, पित्ताशय/gall bladder आजारात फायदेशीर.  endocrine glands functioning मध्ये महत्त्वाचा रोल व शुद्धिकरणासाठी. 

6) कुटकी / Little millets                      

 – डायबिटीस, थायरॉईड, नपुंसकता ह्या विकारात फायदेशीर, कुटकीपासून भात, पोहे, पापड बनतात. 

7) हिरवी कांगणी / Browntop millets / Green millets                                       

– हिरव्या कांगणीत सर्वाधिक 12.5% फायबर्स असतात. मूळव्याध, पाईल्स, अल्सरमध्ये जादुई परिणाम, मज्जारज्जूचे विकार, आजार, ह्या ब्राऊन टॉप मिलेटची लापशी फारच छान बनते. spine disorders & diseases मध्ये फायदेशीर.

8) कोदरा / Kodo millets/ Himalayan millet                                                       

 – पंजाबमध्ये पूर्वी खूप खात होते. शीख धर्मगुरू गुरू नानकजी कोद्र्याचा भात, भाकरी, साग खात होते. आता बोटावर मोजण्याइतकी शेती केली जातेय कोद्र्याची पंजाबमध्ये. रक्त शुद्धीकरण, हाडीताप (fever), Bone marrow disorders मध्ये फायदेशीर. (अस्थिमज्जा, आजार, विकार). मंदाग्नी प्रदिप्त करतो, म्हणजे पोटात पाचकरस digestive enzymes वाढवतो. भूक वाढवतो. 

9) राजगिरा/ Sudo millets/ Amaranthus                                            

 – राजगि-याचे लाडू, वडी, राजगिरा दुधात टाकून खाल्ला जातो. लहान मुलांना फार पौष्टिक. 

गहू, तांदूळ (Paddy) आणि भरडधान्ये यांत मूलभूत फरक काय? 

– गहू, तांदूळ आणि भरडधान्ये यांत पिष्टमय पदार्थ / स्टार्च, फॅटस्, काही अंशी प्रोटिन्स, सारखीच असतात. परंतु भरडधान्यांमध्ये फायबर्स/तंतुमय पदार्थ खूपच असतात, जे गव्हामध्ये फक्त 1.2% असतात, तर तांदूळ/paddy मध्ये 0.2% इतके असतात. खरी ग्यानबाची मेख येथेच आहे. तसेच भरडधान्यात विटामिन्स, खनिजे, फायटोकेमिकल्स प्रचंड प्रमाणात असतात – गव्हाच्या अन् तांदुळाच्या तुलनेने. मिलेटसमधील फायबर्स आणि पिष्टमय पदार्थाचे एक विशिष्ट linking असते, ज्यामुळे मिलेटस् खाल्ल्यावर हळूहळू रक्तात साखर सोडली जाते, म्हणजे रक्तात साखरेचा पूर येत नाही, अन् आरोग्यसंवर्धन होते. उलट गव्हाच्या अन् तांदळाच्या सेवनाने रक्तात साखरेचा पूर येतो, अन् चित्रविचित्र आरोग्यसमस्या, आजारांना, विकारांना सामोरे जायला लागते. आधुनिक वैद्यकीयशास्त्र त्याला जेनेटिक डिसऑर्डर म्हणते.

हे सर्व आपण टाळू शकतो फक्त मिलेटस् खाद्यसंस्कृतीकडे पुन्हा वळून. तसेच मिलेटस् हे ग्लुटेन फ्री अन्न असल्यामुळे स्वादुपिंडाला बळ मिळते. स्वादुपिंडाचे शुद्धीकरण होते. ग्लुटेन फ्री अन्न म्हणजे लिव्हर, किडनीचा विमा असेच समजा. 

मिलेटस् असे खा :-

मिलेटसपासून पीठ, पोहे, भाकरी, धपाटे, खिचडी, पुलाव, बिर्याणी, डोसे, बिस्कुट बनवता येतात. फक्त मिलेटस् खरेदी करताना एक काळजी घ्यावी. मिलेटस् पॉलिश (polished)  केलेले नसावेत. ते त्याच्या नैसर्गिक रंगात असावेत. 

मिलेटस् अशी वापरा :-              

सर्वप्रथम हलके, स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. म्हणजे त्यावरील माती, कचरा निघून जाईल. नंतर मिलेटस्/भरडधान्ये आठ ते दहा तास पाण्यात भिजवून घ्यावेत, नंतर सुकवून, वाळवून वापरावेत.

एक गोष्ट निश्चितपणे भरडधान्ये / तृणधान्ये / millets ला परत पुनर्वैभव प्राप्त करून देणे, हे मानव व मानवी आरोग्य व अखिल जीवसृष्टीसाठी क्रांतिकारी पाऊल आहे.

अन्नाची पुण्याई! 

जुनं ते सोनं!

“पेट सफा तर हर रोग दफा.”

सर्वात महत्वाची बाब म्हणजे फायबरयुक्त अन्नाची आज सर्वांना गरज भासत आहे!

— ते म्हणजे “भरडधान्य” होय!

– समाप्त –

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निदा फाजली ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

? विविधा ?

☆ निदा फाजली ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

(दि. नऊ फेब्रुवारी हा कवी निदा फाजली यांचा स्मृतिदिन. त्यानिमीत्त त्यांच्या विषयी रेखाचित्रकार श्री.मिलिंद रतकंठीवार यांनी लिहीलेला लेख: निदा फाजली)

निदा चा शाब्दिक अर्थ म्हणजे स्वर किंवा आवाज. खरे त्यांचे पाळण्यातील नाव हे मुक्तिदा (मुक्तीदाता तर नव्हे ?) हसन पण त्यांनी स्वीकारलेले टोपण नाव म्हणजे निदा… आणि फाजली हे काश्मीर मधील एका गावाचे नाव.. असे असले तरीही, त्यांची प्रतिभा ही सर्वांना कवेत घेणारी सार्वत्रिक होती, वैश्विक होती. त्यांच्या पत्नीचे नाव मालती जोशी. आणि गोड अश्या कन्येचे नाव तहरीर तहरिर चा अर्थ लिखित (प्रमाणपत्र).

त्यांच्या प्रागतिक धारणांमुळे पाकिस्तानात त्यांना गैरइस्लामिक मानत असत. त्यांच्या रचनांचा आशय, गर्भार्थ हा सर्वांच्या मानवी जीवनाला स्पर्श करणारा होता. मानवतेला साद घालणारा होता. दुनिया जिसे कहते हैं, जादू का खिलौना हैं, मिल जाए, तो मिट्टी हैं, खो जाये तो सोना हैं… धूप मे निकले हो तो, घटाओं मे नहा कर तो देखो, जिंदगी क्या हैं, किताबो को हटाकर देखो… कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता, कही जमी, तो कही आस्मा नही मिलता, होशवालो को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, इश्क कीजे फिर समझिये जिंदगी क्या चीज हैं.. एक आदर्श, वस्तुनिष्ठ, संयमी, विचारवंत पण खोडकर प्रियकर त्यांचे शायरीत, दिसायचा.. त्यांची शायरी, ही मला नेहेमीच भावायची त्यांचे रेखाचित्र काढावे असे माझ्या मनात होतेच, त्यांच्याशी संपर्क साधला असता, पुण्यात त्यांच्या आगमनानंतर त्यांचा निरोप आलाच…योगायोगाने प्रसिद्ध गझल गायक आल्हाद काशीकर यांचा देखील परिचय झाला. “मै बहुत खुश हूँ, कि आपने मुझे इस काबिल समझा” ” सर, मै होता कौन हूँ? आप की शायरी ही उतना हौदा रखती हैं..” मी शक्य तितका नम्र होत म्हणालो.. एका प्रथितयश शायर शी शक्य तेवढ्या मृदू भाषेत, शक्य तेवढ्या अदबीे ने बोलण्याचा मी प्रयत्न करत होतो.. पण गतिरोधका वर वाहन जसे डचमळते तसा मी अडखळत होतो.

त्यांना पोर्ट्रेट दाखवताच, त्यांनी मनमोकळे पणाने कौतुक केले, त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीला देखील बोलावून घेतले.. आणि स्वाक्षरी केली… “मै भी, मै भी” असे त्यांची छोटीशी गोड कन्या तहरीर, उडी मारत हट्ट करू लागली . मी म्हणताच तिने देखील स्वाक्षरी केली. नंतर खूप दिलखुलास गप्पा झाल्या.. अगदी मुस्लिम मन ते मोदी सरकार. धर्म ते राष्ट्र.. संस्कृती ते राष्ट्र.. अगदी पाकिस्तान सुद्धा.. “दुश्मनी लाख ही सही, खत्म ना किजे रिश्ता, दिल मिले या ना मिले, हाथ मिलाते रहीये”

असा संदेश सरते शेवटी त्यांनी दिला. आपल्या विशिष्ट शैलीत ते म्हणाले. “घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूँ कर लें, किसी रोते हुए बच्चे को, हंसाया जाये…”

त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच, त्यांच्या सारख्या विचारवंत कलाकाराला आम्ही ओळखू शकलो नाही, याची रुखरुख लागून राहिली.

नऊ फेब्रुवारी या निदा फाजली यांच्या स्मृतीदिनी त्यांचे स्मरण होणे, त्यांच्या विचारांचे स्मरण होणे.. हे नितांत गरजेचे आहे..

© श्री मिलिंद रतकंठीवार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी अर्धी हजामत (कटिंग) – लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ माझी अर्धी हजामत (कटिंग) – लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

एका सीमावासीय “आलूर” गावातील माझी स्वतःचीच कथा तुम्हाला सांगत आहे. आता सीमावासीय म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र सीमा ही झाली राज्याची , सोलापूर उस्मानाबाद – कलबुर्गी या झाल्या जिल्ह्याच्या सीमा. तर अक्कलकोट – तुळजापूर – आळंद या तालुक्याच्या सीमेवर वसलेले उमरगा तालुका,उस्मानाबाद जिल्ह्यातील आलूर माझं गाव .

आता एवढ्या सीमा म्हटल्यावर १९७५ सालच्या काळात विविध संस्कृती व जातीभेद होताच. आमचा पारंपरिक व्यवसाय कातडी कमावणे. परंतू आमचे आजोबा हे शेती व्यवसायिक होते, तर माझे वडील एकुलते एक होते. त्यांचे शिक्षण त्याकाळी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांना शिक्षकाची नोकरी आली होती म्हणे. पण ते नोकरी नाकारून   घरची शेती पाहात असत.  त्यामुळे आमचे कुटुंब शेतकरी म्हणूनच ओळखले जायचे.

वडीलांची उठक-बैठक गावातील पोलीस पाटील शंकरराव पाटील, मलप्पा व्हट्टे सावकार, भारसिंग दादा रजपूत, दत्तोपंत कुलकर्णी, स्वातंत्र सैनिक बोळदे काका, तुक्कण्णा वाकडे सावकार  यांच्याबरोबर असायची.

आमचे वडील एकुलते एक असले तरी आम्ही मात्र पाच भाऊ दोन बहीण असे सात जण होतो. मी सर्वात लहान.  मला कळायच्या आतच मोठे भाऊ सोलापूरला नोकरी निमित्ताने राहायला गेलेले व मोठ्या बहीणीचे लग्न झालेले. ते पण सोलापूरला स्थाईक झालेले. एक भाऊ वरच्या वर्गात शाळेत आणि दोन भाऊ समवयस्क असल्याने ते एकाच वर्गात शाळेत शिकत असत. आई व एक बहीण शेतावर कामाला जात असत. त्यामुळे माझ्याकडे लक्ष देण्यास घरी कुणी नसत. त्यावेळी आमच्या घरात गावातल्या शाळेतले कांबळे गुरुजी आमच्या दोन खोल्यात सहपरिवार रहात असत . मी एकटा घरात बसलेले पाहून न राहवून त्यांनी मला माझा जन्म १९६५ चा असताना १९६२ करून पहिलीमध्ये माझे नाव दाखल केले व त्यानीच माझ्या शाळेच्या जीवनाचा प्रवास सुरू केला. तेच मला शाळेत घेऊन जात व घरी घेऊन येत.

त्यावेळी पहिली ते  चौथीपर्यंतची शाळा गावाच्या मध्यभागी होती. एका बाजूला भीमराव कुलकर्णी(गुरुजी) व नारायणराव कुलकर्णी(गुरुजी) यांचे घर तर दुस-या बाजूला अल्लाउद्दीन यांचा भलामोठा दगडी वाडा व समोर कल्लय्या स्वामी (आमच्या घरचे ) गुरु यांचे घर. आमच्या घरचे गुरु म्हणजे त्या वेळी अशी पध्दत होती की घरी कुठलेही कार्यक्रम त्यांच्याशिवाय होत नसत व शेतामध्ये  मुगाच्या शेंगा, हरब-याचा ढाळा,  ज्वारीचा  हुरडा अथवा इतर कुठलेही पीक आल्यावर त्यांना दिल्याशिवाय वडील आम्हाला धाटालाही हात लाऊ देत नसत.

पुढे कांबळे गुरुजी यांची बदली आमच्या गावावरून दुसरीकडे झाली व आता मी ही चौथीतून पाचवीत आलो.  दिवस जात होते. चौथी इयत्तेपर्यंत शाळा गावातच होती. पुढे मात्र पाचवी ते दहावी गावापासून दीड दोन किलोमीटर लांब होती. 

तसा मी लहान असताना जरा बरा दिसायचो.  हळूहळू गावातील मुलांशी मैत्री जमू लागली . राजकुमार खद्दे, रघुनाथ भांडेकर, परशुराम धोत्रे , मुकुंद क्षिरसागर , सुहास पारडे, आप्पशा मलंग,  सारंग कुलकर्णी, विजय कुलकर्णी, अशोक पाटील, विठ्ल चौधरी, नेपालसिंग रजपूत, अशोक बब्बे,  गुंडू बि-हाडे, श्रिशैल गुंडगे, मल्लु जिरोळे, अशोक बोळदे, गुर्लींग पालापूरे, अशोक कुलकर्णी, मोतीराम राठोड, राम राठोड, एम. एच. शेख हे गावातील मित्र. तर दत्तु ,अंबादास , भीम, सुभाष, सुरेश ,राजू ,नवनाथ इंगळे हे भावकी (गल्लीतील) मित्र होते. तरी प्राथमिक शाळेच्या शेजारील घरातील प्रविण कुलकर्णी व माझी चांगलीच गट्टी जमली व मी आता शाळा नसतानाही त्यांच्याच घरी राहायला लागलो . त्या काळी ब्राम्हणाच्या घरी राहणे वगैरे शिवता शिवत मानली जात असे, पण मला कोणीही कधी काही म्हणालेले आठवत नाही. कधी कधी अभ्यासाच्या निमित्ताने मुक्कामही करत होतो.

त्या काळी गावात बाराबलुतेदारी होती. शेतीच्या अवजाराची कामे लोहार ,सुतार करत असत .हणमन्त काकाच्या दुकानात बसून आम्ही हक्काने चप्पल बनवून घेत असू .

गावामधे कटींग करणारे तर होते, पण आम्हाला मात्र त्यांच्याकडे घरचे जाऊ देत नसत. त्या वेळी आमची हजामत (कटींग ) घरीच व्हायची. त्यामुळे डोक्यावर केस असूनसुध्दा व्यवस्थित नाहीत असे नेहमी वाटायचे पण इलाज नव्हता. गावातील मुले छान कटींग करुन केस विंचरुन रुबाबात फिरत असत .मला नेहमी वाटायचे की आपणही गावात कटींग करुन घ्यावी. पण मनात असूनही शक्य होत नसे. त्या काळी घरी पाहुणे आले की जाताना ते काही पैसे लहान मुलाच्या हातावर ठेवत. असे काही पैसे मी जमवले होते. मग मी विचार केला की हे पैसे देऊन आपण कटींग करुन घ्यायची.

त्यादिवशी मी घरी न सांगताच मनाचा हिय्या करुन कटींग करणाऱ्या हडपे  काकाच्याकडे गेलो . त्यावेळी त्यांच्याकडे आधीपासूनच एक गिऱ्हाइकाचे काम चालू होते. त्यांनी मला बसायला सांगितले. त्याकाळी बसण्यासाठी सोय म्हणजे एखादा दगड शोधून बसायचे  व हजामत करणा-यांचा बसायचा दगड आपल्यापेक्षा थोडा उंच असायचा. एखादी कात्री , वस्तारा , व हातमशीन, आणि पाचशे एक बारचा साबण, तांब्यात पाणी एवढी सामग्री असे .

हातातले काम संपल्यावर तोंडातली तंबाखुची पिचकारी मारत हडपेकाकांनी मला हजामतीसाठी बोलावले.

मी मान खाली घालून त्यांच्यासमोर बसलो . आधी त्यानी माझ्या डोक्याला भरुन पाणी लावले व केसावर कात्री चालवायला सुरु केली. एका बाजूचे अर्धे केस कापायचे संपत आले असतील तोच माझ्या वर्गात शिकणारा हडपे काकाचा मुलगा तिथे आला व त्याने वडलांना कानडीत विचारले, ” इंवदू याक त्यली माडलूतीरी ” (याची का कटींग करत   आहात.) व त्याने त्यांच्या कानात माझी जात सांगितली. तसे त्यांनी माझ्या अंगावर खेकसत हातातली कात्री फेकून दिली व अर्धवट झालेल्या कटींगसह मला हाकलून दिले . भिजवलेले डोके व एकीकडचे कापलेले अर्धवट केस अशातच मी रडत रडत घर गाठले . माझा हा असा अवतार बघून वडीलानी विचारपूस करुन मला शांत बसवले व माझी राहलेली अर्धी कटींग केली व पुन्हा असे न करण्याची समज दिली. मी असे काय केले की त्यानी माझी कटींग अर्धवट सोडली असेल बरे? प्रश्नाचे उत्तर कळत असूनही  माझ्या बालमनाला पटत नव्हते.

पुढे गावामध्ये कुणीतरी गायकवाड नावाचे तलाठी यांची नेमणूक झाली होती . त्यांना हा विषय समजला. मग त्यांनी गावातील नाभिक समाजाला समज दिली, की त्यांनी जातीभेद न मानता सर्वांचीच दाढी हजामत करावी . अन्यथा शेतीचे सात बारे मिळणार नाहीत . तेंव्हा कुठे आमच्या गावात सर्व समाजाची कामे सुरळीत सुरु झाली.

पण मी अर्ध्या कटींगचा एवढा धसका घेतला होता, की पुढे कटींग करण्यासाठी आमच्या गावापासून तेरा किलोमीटर चालत मुरुम येथे जाउन कटींग करुन येत असे .

लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर.

 सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

मिलेटस्/Millets म्हणजे काय? भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets वा small seeded grass असे म्हणतात. Millets म्हणजे मोटा अनाज. या Millets ला Nutricereals वा Superfood असे म्हटले जाते.  

 मिलेटसचा इतिहास 5000 ते 6000 वर्षे पूर्वीपासूनचा आहे. आपल्याला भरडधान्ये म्हटले की, लगेचच फक्त दोन धान्ये डोळ्यासमोर येतात, ती म्हणजे गहू (wheat) आणि तांदूळ (paddy rice). त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज होती, त्याला अनुसरून पहिली हरितक्रांती घडविण्यात आली. गव्हाचे, तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले. वेगवेगळ्या जाती, वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात आली. परंतु परिणामी आपली आरोग्यदायी भरडधान्ये, तृणधान्ये या हरितक्रांतीच्या धबडग्यात वेगाने बाजूला फेकली गेली. तसेच ही भरडधान्ये म्हणजे डोंगर, कड्याकपारीत राहणाऱ्या गरीब लोकांचे अन्न म्हणून हिणवले गेले आणि आपल्यासारख्या लोकांच्या जेवणाच्या थाळीतील खाण्याची जागा घेतली गव्हाच्या चपाती, पोळीने, मैदा पाव, बिस्कुटाने, तांदळाच्या भाताने, अन् इथूनच आरोग्याच्या समस्यांचे दुष्टचक्र सुरू झाले. तत्कालीन सरकार व प्रशासन शास्त्रज्ञ यांच्यासमोर भल्यामोठ्या लोकसंख्येला पोटाला अन्न देणे हे महत्त्वाचे होते अन् ती तत्कालीन प्राथमिकता होती.

आता आपले डोळे उघडले आहेत. आता आपण परत आपल्या पन्नास वर्षापूर्वीच्या अन्नाकडे वळायचे आहे आणि परत आपल्याला पूर्वीप्रमाणे सुदृढ व्हायचे आहे , जैवसाखळी/ Biodiversity निर्माण करायची आहे.

मिलेटस् प्रोत्साहन, मानवी आरोग्य व्यवस्थापन अन्  जैवसाखळी/Biodiversity पुनर्स्थापना, पर्यावरण, अर्थकारण यामध्ये मिलेटसची भूमिका काय, हे समजून घेऊया.

–  संपूर्ण देशभर असणारी दुष्काळी परिस्थिती व शेतीच्या पाण्याची उपलब्धता पाहता हे भरडधान्ये पीक कुठेही येऊ शकते. अगदी एक-दोन पाण्यामध्ये, वा फक्त पावसाच्या पाण्यावरसुद्धा. खते, औषधे, कीटकनाशक रसायने लागत नाहीत, म्हणजे पर्यावरणप्रिय शेती असे समजूया. मिलेटस् /भरडधान्ये शेती म्हणजे जंगल फार्मिंग/naturally grown & minimum care crops अर्थात कसलीही इनपुटस न देता, अगदी तीनचार महिन्यात छान पीक काढणीस तयार होते. म्हणजे अल्प भांडवल, उत्तम आरोग्यदायी अन्न, जनावरांना चारा, असा चौफेर फायदा.

1 किलो गहू तयार करण्यासाठी 10.00 लिटर पाणी लागते. 1 किलो तांदूळ (paddy rice) तयार करण्यासाठी 8000 ते 9000 लिटर पाणी लागते. परंतु 1 किलो मिलेटस् /भरडधान्ये तयार करण्यासाठी फक्त 200 लिटर पाणी लागते. म्हणजे मिलेटसच्या तुलनेने गव्हाला तांदळाला जवळजवळ चाळीस ते पन्नास पट पाणी लागते. तसेच 1 किलो गहू, तांदुळामध्ये चार लोक पोट भरू शकतात. परंतु 1 किलो भरडधान्ये/मिलेट मध्ये बारा लोक पोट भरू शकतात. म्हणजे तुम्ही तुलना करा किती मोठी फूड सेक्युरीटी आपण निर्माण करू शकतो. 

आता या मागील अर्थकारण पाहूया. साधारणपणे 80 ते 150 रूपये किलो ह्या दराने बाजारात मिलेट/भरडधान्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे यातून शेतकऱ्यांचे फार मोठे अर्थकारण साधता येणार आहे.

वेगवेगळी मिलेटस्/भरडधान्ये अन् त्यांचे आरोग्यदायी फायदे :-

गहू आणि तांदूळ (paddy rice) यामध्ये ग्लुटेन नावाचे एक प्रोटिन असते, जे पचायला जड असते, ज्यामुळे डायबिटीस व लठ्ठपणा, वा इतर आजार बळावले जातात. 

आता मिलेटस् /भरडधान्येच का खायची? :- कारण त्यामध्ये ग्लुटेन नसते. हे गहू, तांदुळामध्ये असणारे ग्लुटेन निरनिराळ्या आजारांना, रोगांना आमंत्रण देते. भरडधान्यात असणारे मुबलक फायबर्स पोट साफ करण्यासाठी मदत करतात, जेणेकरून पोटाचे विकार दूर होतात, कारण बहुतेक आजारांचे मूळ कारण पोट साफ न होणे हे आहे. परिणामी डायबिटीस, लठ्ठपणा, रक्तदाब, कॅन्सर, सांधेदुखी, वा इतर विविध शारीरिक विकार!  हे आजार, विकार दूर करण्यासाठी मिलेटस् फारच हमखास गुणकारी आहेत.

 मिलेटस् ग्लुटेन फ्री फूड आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ना ते हेच! म्हणजेच भरडधान्ये आपण आहारात समाविष्ट केल्याने हे जीवनशैलीचे आजार, विकार, रोग आपण सहज टाळू शकतो. ‘Industrial food काय कामाचे?’ हे आपण स्वतःला विचारणार आहोत का नाही? 

— क्रमशः भाग पहिला 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुंदरता… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ सुंदरता… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

स्त्रियांना नेहमी असं वाटतं की, आपण हे नेसल्यावर सुंदर दिसू, ते घातल्यावर सुंदर दिसू… 

एक जाहिरात आहे, त्यात विनोदकन्या भारती म्हणते, ‘ मुझे कभी ब्यूटिफुल बनना ही नहीं था, क्योंकि मैं हमेशा से जानती थी की मैं ब्यूटिफुल हूँ. सिर्फ अपनी सुंदरता को मेन्टेन करती हूँ। ’

—- फार छान ओळी आहेत या की, ‘ मला नेहमीच माहीत होतं, मी सुंदर आहे.’ 

आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं?

आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. कारण सौंदर्य म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो. जाहिरातीतल्या बाईचा मेकअपने झाकलेला हजार वॅटमध्ये चमकणारा चेहरा म्हणजे आपण सौंदर्य समजतो. पाठ उघडी टाकणारं प्रचंड मोठ्या गळ्याचं ब्लाउज म्हणजे सौंदर्य समजतो.

पण तुम्ही कधी आपल्या बाळाला पाजताना स्वत:चा चेहरा पाहिलाय का? वात्सल्यानं चमकणाऱ्या त्या चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यासाठी कधीच हजार वॅटच्या फोकसची गरज लागत नाही. 

दिवसभर घरकाम करून थकल्यावर संध्याकाळी तोंडावर पाणी मारून साध्या टॉवेलने पुसलेला चेहरा पाहिलाय का? त्यावरचे स्वत:च्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे येणारे कर्तव्यपूर्तीचे भाव किती सुंदर दिसतात, ते कधी न्याहाळलेत का? 

— सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वत:च काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. 

— स्वच्छ-सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.

— तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे. 

— तुम्ही इंटिरिअर डेकोरेटर असाल तर तुम्ही सजावट केलेल्या जागेतून तुमचं सौंदर्य डोकावेल. 

— तुम्ही संपादक असाल तर तुम्ही निवडलेले लेख आणि त्यांची सुबक मांडणी तुमचं सौंदर्य आहे. 

— तुम्ही विणलेल्या भरघोस गजऱ्यात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही काढलेल्या अक्षरात तुमचं सौंदर्य आहे.

सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे.

सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. 

सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे.

सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे.

आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे….. 

— प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता, 

— आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता.

— नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. 

— दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता.

आपल्या हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. 

आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर येऊ द्या.

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत राहिलं आहे. 

आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की, आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास आला की, आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर दिसते. 

गौरवर्ण, सडपातळ बांधा, काळे-दाट केस या वर्णनातून आता बाहेर पडलं पाहिजे. त्याऐवजी असेल तो वर्ण, दणकट बांधा, सुदृढ मन आणि संतुलित विचार या मापदंडाचा विचार करून पाहूया. 

तुम्ही जशा जन्माला आल्या आहात तशाच सुंदर आहात, ही खूणगाठ मनाशी बांधून टाका. 

जशा आहात तशाच अगदी सुंदर आहात, याची खात्री बाळगा. 

आपल्यातील सुंदरता ओळखून स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. 

…… म्हणजे आपलं सौंदर्य अजूनच खुलेल.

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रोझ डे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ 🌹 रोझ डे 🌹 ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कोणत्याही दोन पिढ्यांमध्ये उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत फरक हा आपोआपच पडत जातो. त्यालाच आपण “जनरेशन गँप”असं म्हणतो. प्रत्येक पिढीतील लोकांना आपल्या पुढील पिढी जास्त सुखी, स्वतंत्र आहे असं वाटतं असतं.प्रत्येक व्यक्तीचे आपल्या स्वतःच्या पिढीला खूप सोसावं लागलं हे ठाम मतं असतं.आपल्याला पुढील पिढीपेक्षा खूप जास्त तडजोडी कराव्या लागतात असं प्रत्येकालाच वाटतं असतं हे विशेष.

ह्या निमीत्ताने तीन पिढ्यांमधील फरक मात्र स्पष्टपणे जाणवतो.आपल्या आधीची पिढी  स्पष्टवक्ती आणि जरा फटकळच. त्या पिढीतील लोकं तोंडावर सांगून मोकळे होतात त्यामुळे त्यांच्या पचनी हा “रोझडे”.वगैरे अजीबातच पडत नाही. आमची पिढी ही तळ्यातमळ्यात करणारी पिढी, ना घरका न घाटका म्हणू शकता. संपूर्णपणे विरोधही नाही ह्याला आणि सरसावून साजरा करण्याइतकं धैर्य, स्वतः चे भ मत झडझडून सांगण्याइतका मोकळेपणाही नाही. आणि ह्या उलट आत्ताची पिढी हा उत्सव साजरा करतांना आधीच्या दोन पिढ्यांच्या मतांशी काहीच देणंघेणं नसलेली पिढी.

फेब्रुवारी महिन्याची सुरवातच मुळी कडाक्याची थंडी संपलेली असते आणि उन्हाळ्याची काहीली अद्याप सुरवात झालेली नसते ,असा तो हा हवाहवासा, गुलाबी, प्लिझंट वाटणारा काळ.त्यातच फेब्रुवारी सात पासून ते चौदा फेब्रुवारी पर्यंत व्हँलेंटाईन वीक,प्रेमाचा साक्षात्कारी सप्ताह, व्हँलेंटाईन बाबाचा उत्सवच जणू.त्यामुळे हा आठवडा नव्या तरुणाई साठी वा कायम मनाने तरुणाई जपून असणाऱ्या व्यक्तींसाठी पर्वणीच.

अर्थातच हा आठवडा समारंभ म्हणून साजरा करण्याबाबत दुमत हे असतंच. काही मंडळी अगदी ह्याच्या विरुद्ध असतात तर काही मंडळी हा उत्सव  साजरा करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी. अर्थातच प्रेमाला कुणाचाच विरोध नसतो, विरोध असतो तो साजरा करण्याच्या पद्धतीबाबत.थोडक्यात हा उत्सव म्हणजे इंग्रजी वा विलायती वासंतिक उत्सव.

ह्या आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे “रोझ डे”. पिढीपिढीत खूप झपाट्याने फरक पडत चाललाय.आमच्या पिढीपर्यंत तरी काँलेजमधे वा तरुणपणात मुलंमुली एकमेकांशी बोलले तर नक्कीच काहीतरी शिजतयं हे समजण्याचा काळ.त्यामुळे हे व्हँलेंटाईन वगैरे तर आमच्या कल्पनेच्या पार पलीकडले.त्यामुळे ह्या रोझ डे ची संकल्पनाच मुळी प्रत्येक पिढीत वेगळी. देवपूजेसाठी का होईना पण आजोबा परडी भरून गुलाबाची फुलं तोडून आणतं हाच आजीचा रोजचा रोझ डे. एखादं झाडावरचं फूल हळूच बाबा फ्लावर पाँटमध्ये वा टेबलवर ठेवायचे,अर्थातच बाकी कुणाला नाही कळले तरी आईला फक्त कळायचे किंवा कुणी झाडावरचे फूल तोडून नेईल म्हणून वा गुलकंदासाठी आणलीयं फुलं असं दाखवायचे तोच आईचा रोझ डे. पुढे खूपच हिम्मत असली तरी काँलेजमध्ये ती यायच्या आत तिच्या बेंचवर गुलाबाचे फूल वा फुलाचे ग्रिटींग कार्ड लपून ठेवून जायचे हा आमच्या पिढीचा रोझ डे किंवा जास्तीत जास्त एखादा गुलाब हस्तेपरहस्ते तिच्यापर्यंत पोहोचविणारा आमच्या पिढीचा रोझ डे आणि गुलाबाचा वापर केवळ बुके आणि रोझ डे साठीच हा विचार मानणारी आणि तो बुके बेधडक देणारी आणि घेणारी सुद्धा हल्लीची ही बिनधास्त, धीट आजची पिढी.

ह्या आठवड्यातील सात फेब्रुवारी हा पहिला दिवस,” रोझ डे “.हा दिवस ह्या पिढीतील तरुणाईच्या जगतातील महत्त्वाचा दिवस तर आधीच्या पिढीच्या मते दिखाऊ प्रेम दर्शविणारी नसती थेऱ असल्याचा दिवस.

जर रोझ डे साजरा करण्याची संकल्पना सरसकट आपल्यात असती तर वेगवेगळ्या वयोगटातील, पिढीतील लोकांच्या मनात रोझ डे बद्दलचे निरनिराळे विचार काय असते वा आजच्या भाषेत हा “इव्हेंट”आपण कसा साजरा केला असता ह्या कल्पनाविलासाची एक झलक पुढीलप्रमाणे.

1…..शाळकरी रोझ डे

गुलाब दिला किंवा मिळाला तरच खूप प्रेम असतं हे मानण्याचं हे अल्लड वयं.

2…..महाविद्यालयीन रोझ डे

जगातील सगळ्यात चांगले आणि खरे प्रेम आपल्याच वाट्याला आले, त्याच्याकडूनच गुलाब मिळाला वा त्यालाच गुलाब दिला असं मानणारं हे वयं आणि प्रेम.

3…..नवविवाहितांचा रोझ डे

गुलाब आणला नाही तर फुरगटून बसायचे आणि आणला तर ह्याची चांगली प्रँक्टीस आहे वाटतं ,हे ओळखणारं प्रेम.

4…..चाळीशीतील रोझ डे

गुलाब आणल्यानंतर वरवर हे आपलं वय राहिलं का असे म्हणणारे पण मनातून,आतून मात्र खूप सुखावणारे प्रेम.

5…..पन्नाशीतील रोझ डे

आणलेला गुलाब बघून ,बरं झालं देवाला वहायला फूल झालं हे मानणारं वयं वा प्रेमं.

6…..साठीतील रोझ डे

त्या गुलाबाच्या थेरापेक्षा जर्रा बर वागायला लागा,मग रोझ डे पावेल हे मानणारं वयं वा प्रेम.

7…..सत्तरीतील रोझ डे

नुसत्या नजरेतूनच गुलाबजल छिडकून ख-या गुलाबाची गरजही न भासणारं हे वयं किंवा प्रेम.

8…..नंतरचा शेवटपर्यंतचा रोझ डे

आता च्यवनप्राश आणि त्याबरोबर ह्या गुलाबाचा गुलकंद करुन खायला घातला पाहिजे, जरातरी डोकं थंड राहायला मदतच होईल हे मानणारं वयं आणि प्रेम.

तर अशा ह्या व्हँलेंटाईन वीकमधील पहिल्या दिवसाच्या रोझ डे ला भरभरून शुभेच्छा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच”रोझ डे”फुलावा ही सदिच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चूक ते चूकच (क्वांटिफाय करू नका)…” – श्री श्री योगिया ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “चूक ते चूकच (क्वांटिफाय करू नका)…” – श्री श्री योगिया ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

आमच्या घराजवळ एक शाळा आहे. शाळेच्या बाहेर २-३ बाकं आहेत. परवा दुपारी एका मित्राची वाट बघत तिथे बसलो होतो. प्राथमिक शाळा सुटली. पालकांची, व्हॅन काकांची, रिक्षावाल्यांची, मुलांची गर्दी उसळली. निम्मे पालक पुढे ५० मीटरचा वळसा नको म्हणून माझ्या समोरून रॉंग साईडने गाड्या घालून मुलांना घेऊन गेले. झेब्रा क्रॉसिंगला कोणीच थांबत नव्हतं. ‘शाळेसमोर हॉर्न वाजवू नये’, या ऐवजी, ‘हॉर्न वाजवणं कंपल्सरी आहे’, असं वाटत होतं. १० मिनिटात परत शांतता झाली. मी बसलो होतो त्या बाकामागे ४-६ मुलं ज्यांच्या व्हॅन/पालक यायचे होते, ते शिल्लक होते. मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं.                                                  *                                               

एक म्हणाला, 

“आमचे व्हॅनकाका इतके भारी आहेत की, आज सकाळी उशीर होत होता, तर त्यांनी सरळ सिग्नल तोडला.”

दुसरा : “हे तर काहीच नाही.. आमचे व्हॅनकाका तर रोजच सगळे सिग्नल तोडतात.”

तिसरा : “आणि कसले भारी शिव्या देतात ना!”

चौथा : “अरे, माझे बाबा तर उशीर झाला ना, तर सरळ नो एन्ट्रीमधून बाईक घालतात.”

पहिला : ” माझ्या बाबांचं तर ठरलेलं आहे.. जर पोलिसांनी थांबवलं तर बाबा त्यांचं पाकीट गाडीतच ठेवतात. आईकडून एक ५०० ची नोट चुरगळून मुठीत कोंबतात आणि पाच मिनिटात पोलिसाला भेटून परत येतात.. कुठे पण पकडू देत आम्हाला.”

यापुढे मात्र मला राहवलं नाही. माझ्यातला सुज्ञ का कोण तो नागरिक जागा झाला. तसं हल्ली मी कोणालाच काही समजवायला जात नाही, तरी पण मुलांना समजवावं असं वाटतं, कारण तीच उद्याची पिढी असते… काही बदल घडवू शकणारी.                                                           

 मी मुलांकडे गेलो. आपण कुठल्यातरी चुकीच्या गोष्टी प्रमोट करत आहोत, याचा जरासुद्धा अपराधी भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. त्यांनी ‘आता कोण हे काका लेक्चर द्यायला आले?’ असा लूक दिला. 

मी त्यांना म्हणालो, 

“आता गव्हर्मेंट एक नवीन रूल आणणार आहे… व्हॅनचे नंबर्स आणि जे आई/बाबांबरोबर येणाऱ्यांसाठी त्यांच्या गाड्यांचे नंबर्स मुलांच्या रोल नंबर्स बरोबर लिहून घेणार आहेत. आता सगळीकडे चौकाचौकात CCTV आहेत. त्यात रूल मोडला तर गाडीचा नंबर कॅप्चर होतोच. त्यावरून कुठल्या मुलाच्या आई/बाबांनी किंवा व्हॅनकाकांनी रूल मोडला ते रेकॉर्ड होईल. एकदा रूल मोडला की ५ मार्क्स कमी. वर्षाच्या शेवटी तुम्हाला जितके मार्क्स मिळाले त्यातून जेवढ्या वेळा तुम्हाला शाळेत सोडताना/परत नेताना रूल मोडला ते इंटू  (*) ५ इतके मार्क्स कमी आणि ते तुमचे फायनल मार्क्स! “

भीषण शांतता पसरली. सगळी मुले विचारात पडली. मला माझेच कौतुक वाटले आणि स्वतःचीच आयडिया खूप आवडली (खरं तर मला हे पटत नाही.. सगळ्याच गोष्टी कशाला मोजायला पाहिजेत.. चांगुलपणा / नियम पाळणे / देशभक्ती या काय मोजायच्या गोष्टी आहेत. पण हल्ली डेटा आणि क्वांटिटेटिव्ह या शिवाय आपण जगूच शकत नाही.. असो तो एक वेगळ्या लेखाचा विषय आहे). मी परत येऊन बाकावर बसलो. दोन मिनिटेच गेली असतील आणि ती यंग ब्रिगेड माझ्याकडे आली…  

एक : “काका, याच्याकडे भन्नाट आयडिया आहे, तो म्हणतो मी बाबांना सांगीन की, काकांच्या गाडीवरून सोडत जा म्हणजे त्याच्या चुलत भावाचेच मार्क कमी होतील.. नाही तरी फार शायनींग खातो.” 

दुसरा : “येड्या, त्यापेक्षा डुप्लिकेट नंबर प्लेट लावायची.”

तिसरा : “काका.. त्या दुसऱ्या शाळेची आमच्या शाळेशी खूप खुन्नस आहे.. समजा, त्यांच्या प्रिन्सिपॉलनी आमच्या व्हॅनकाकांना पैसे दिले आणि मुद्दाम सिग्नल तोडायला सांगितले तर म्हणजे आमच्या शाळेतल्या मुलांना कमी मार्क्स पडतील आणि आमची बदनामी होईल… तर?”

माझ्या शेजारच्या बाकावर बसलेला बोलला, “आजकालची मुलं इतकी स्मार्ट आहेत ना..”

तेवढ्यात पी-पी करत रॉंग साईडने त्यांच्या व्हॅन आल्या आणि मुले गेली. मी वाचलो. कारण त्या मुलाच्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नव्हते. पण हा स्मार्टपणा नक्की नाही. ८-१० वर्षांच्या त्या मुलांमध्ये हे असले विचार येतात कुठून? सगळ्यात पळवाटा शोधायच्या, फाटे फोडायचे, सारखी कुरघोडी करायची, चूक मान्य करण्याऐवजी तिचे उदात्तीकरण करायचे, इतके नकारात्मक विचार एवढ्याश्या मेंदूत येतात कुठून? आणि तेही इतक्या लगेच? मुलांची काहीच चूक नाही. ते आजूबाजूला जे ऐकतात, बघतात, वाचतात, त्यातून तर शिकतात. का त्याही पलीकडे, ही अशी नकारात्मक वृत्ती हल्ली अनुवंशिकतेतूनच त्यांच्याकडे जाते की काय कोण जाणे?

एक वेळ मार्क्स कमी करून त्यांना नियम पाळायची जबरदस्ती करता येईलही. पण त्यांच्या मनातल्या नकारात्मक, फाटेफोडू विचारांचे ट्रॅफिक कसं रुळावर आणायचं? मुलांची ही मानसिकता, नकारात्मक वृत्ती, पळवाटा काढायची सवय हे जास्ती भीतिदायक आणि काळजी करायला लावणारं आहे…. 

बाकी काही नाही जमलं, तरी याला “स्मार्टनेस” म्हणू नका आणि त्याचं कौतुकही करू नका, उदात्तीकरण करू नका. (असले मेसेजेस, रील्स, स्टोऱ्या फॉरवर्ड आणि शेअर नाही केलं तरी खूप आहे).. “चूक हे चूकच आहे” हे मान्य करा, ठणकावून सांगा, परत परत सांगा आणि उगाच चूक क्वांटिफाय करत बसू नका. कदाचित हीच बदलाची सुरूवात असेल. प्रजासत्ताक दिन येतोय, चला आपापल्यापुरती तरी सुरूवात करूया.  

✍️

योगिया

ता.क :

हा लेख लिहिला. FB वरही टाकला. कौतुकाने माझ्या बाबांना वाचून दाखवला. हसले. मी विचारलं, “कसा झालाय?” म्हणाले “छान झालाय.” 

“मग हसलात का?”

“सहजच.”

आता मी त्यांना गेली ५० वर्षे ओळखतो…

ते सहज हसणं नव्हतं. त्याला खेदाची किनार नक्कीच होती.

मी परत विचारलं, “का, काय झालं?”

ते म्हणाले, “असंही लिहू शकला असतास की, ज्या मुलांचे आई /बाबा , व्हॅनकाका नियम पाळतील त्यांना २ टक्के जास्त मार्क्स देण्यात येतील, ते कटच कशाला करायला पाहिजेत?”

खजील व्हायला झालं…! 

खरंच आमच्याच पिढीपासून हा प्रॉब्लेम झालाय…! नकारात्मक वागण्याचा/लिहिण्याचा/विचार करण्याचा!

मुद्दाम लेख एडिट करत नाहीये.. राहूदे ही बोच मनाला…! 

पण तुम्ही जर पुढे शेअर कराल, कोणाला सांगाल तर मात्र हा बदल जरूर करा.

लेखक : श्री योगिया  

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares