मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बस, तुम कभी रुकना मत! ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बस, तुम कभी रुकना मत! ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आज आजी उदास आहेत, हे आजोबांच्या लक्षात आलं.”काय झालं ग?” आजोबांनी विचारलं. आजी म्हणाल्या, “अहो, आता थकवा येतो. आधीसारखं राहिलं नाही.आता गडबड,तडतड सहन होत नाही.कुठे जायचं  म्हटलं तर जास्त चालवत नाही.आॕटोमध्ये चढताना त्रास होतो . कधी भाजीत  मीठ टाकायला विसरते,तर कधी जास्त पडतं. कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने दिलं आहे, माहीत नाही.”

आजोबा म्हणाले, “देवाचा हिशोब मला माहीत नाही.आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. त्याच्या planning मध्ये  एक क्षणाचाही बदल करणे, आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, त्याचा विचार करावा. अग ,वयानुसार हे सर्व होणारच.  आधीचे दिवस आठव ना. किती काम करायचीस! पूर्ण घर तू खूप छान सांभाळलेस. मला कशाची काळजीच नव्हती कधी.आता  वयोमानाप्रमाणे हे सर्व होणारच.  पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो. आलेला दिवस आनंदात काढणे,आपल्या हातात आहे. जीवनाच्या प्रत्येक फेजमध्ये थोडे शारीरिक बदल होतातच.थोडे आपल्याला करायचे असतात.आपली  lifestyle reorganize करायची ,म्हणजे ,

आयुष्याची घडी, परिस्थिती प्रमाणे बदलायची असते.कळलं का ? “

आजोबा पूढे म्हणाले,

“चल, आज सायंकाळी बाहेर जाऊ  या  आपण.ती छान  नारंगी साडी नेस.  बाहेरच जेवू .  आजोबा संध्याकाळी आजींना घेऊन बाहेर पडले. जवळच असलेल्या  बसस्टाॕप वर जाऊन बसले. दोघे बराच  वेळ तेथेच  गप्पा मारत बसले . आजोबा आजींना म्हणाले,” अगं, पाय दुखत असतील  तर, मांडी घालून बस छान.”नंतर , ‘गणेश भेळ ‘खाऊनच दोघं घरी परतले. अगदी वयाला व तब्येतीला  शोभेसे  outing  होते आज दोघांचे . आजींची उदासी मात्र कुठे पळाली, हे त्यांना कळलेच नाही.अगदी ‘refresh’ झाल्या .

आज आजोबांनी आजीसाहेबांसाठी  on line ‘Mobile stand’ मागवला. मोबाईल पकडून आजींचा खांदा दुखतो ना म्हणून .

आज आजींनी तर आजोबांना सकाळीच  सांगून  टाकलं,” मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही. काही तरी चमचमीत खायला  घेऊन या”. आजोबांनी आनंदाने समोसे, ढोकळा, खरवस, दोन पुरण पोळ्या आणून आजींची इच्छा पूर्ण केली. ते बघून आजी म्हणाल्याच, “अहो, केवढं आणलंत?” “अग, आज आणि उद्या मिळून संपेल की.” आज आजी-आजोबांची पार्टी छान  झाली.

कोणी तरी खरंच  खूप छान म्हटलं आहे •••

 ” खुशियां बहुत सस्ती हैं इस दुनिया में ,

हम ही ढूंढते फिरते हैं, उसे महँगी दुकानों में”।”

आजोबा बऱ्याच वेळापासून एका बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ते पाहून अजय म्हणाला , “द्या, आजोबा. मी उघडून देतो”. तेव्हा आजोबा म्हणाले, “अरे, नको. मी उघडतो. आता आम्हाला प्रत्येक  कामात वेळ लागतोच . हे natural आहे . पण काही हरकत नाही. जोपर्यंत करू शकतो, तोपर्यंत काम करायचे, हे मी ठरवलं आहे.  रोज फिरायला जाणे, भाजी आणणे, dusting करणे, भाजी  चिरणे, washing machine मधे धुतलेले कपडे वाळत घालणे‌, कपड्यांच्या घड्या घालणे ,अशा बऱ्याच कामांची जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या आजीला मदत होते. व माझापण वेळ जातो. Something new and different. I am enjoying it. And I feel good.

तो तुमचा actor आहे ना, अक्षयकुमार? त्याने एका advertisement मध्ये म्हटले आहे,

“बस, तुम कभी  रुकना मत.”

अक्षय कुमारने  म्हटलेले हे वाक्य मला खूप आवडलं.

एक  छोटंसं वाक्य. मोजक्या शब्दात.

पण किती अर्थपूर्ण .जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच त्याचा अर्थ परत दर परत उघडत जातो .एक छोटासा उपदेश जीवनाला वेगळ्याच दिशेने वाटचाल करायची  स्फुर्ती  देतो. विचारांत परिवर्तन  आणतो .

तो म्हणतो, “कधीही थांबू नका,चालत रहा.

म्हणजेच  ‘active’ रहा.  ‘मनाने आणि शरीराने .’ 

वाहतं पाणी बघताना,  एक वेगळीच उर्जा  निर्माण होते.’ धारा ‘ म्हणजे पुढे पुढे जाणारी, वाहणारी .तेच  जमलेलं  पाणी म्हणजे अनेक रोगांचा उगम. म्हणून    पाण्याला जमू देत नाही आपण.  जमलेल्या पाण्यात मच्छर किडे पडतात .पाण्याला  वास येतो.डेंग्यू पसरतो.

आयुष्याचे पण तसेच आहे. शक्य तेवढं active राहणे ही प्रत्येकाचीच आवश्यकता असते.जसं जमेल ,जे जमेल, जे आवडेल ,जे झेपेल, ते करत रहाणे गरजेचे आहे.

चलती का नाम ही तो  जिंदगी है ।”

आपल्या पिढीने तरूणपणी एकमेकांचे हात हातात घेतले नाहीत /नसतील  .पण वयाच्या या टप्प्यावर, एकमेकांचा हात प्रेमाने, काळजीने, विश्वासाने , हातात घेणे  ही काळाची गरज आहे .

“कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हैं !

इसलिए नहीं की उनके जीवन में  सबकुछ ठीक होता  है!

बल्कि इसलिए की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है”!!!

“ना  थके  कभी  पैर

ना कभी हिम्मत हारी है।

जज्बा  है परिवर्तन का जिंदगी में,

इसलिये सफर जारी  है।”

“प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा.”

“बस , तुम कभी  रुकना मत

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घर दोघांचे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ घर दोघांचे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

‘परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह ‘ अशी कुटुंबाची व्याख्या केली जाते.माणसांमधली ही नाती जन्मावरून,विवाहावरून किंवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब ही समाजातील सार्वभौम संस्था असली तरी स्थळकाळसापेक्ष तिच्या स्वरूपात भिन्नता आढळून येते.

कुटुंबाचे प्रकार –

१. आप्तसंबंधावर आधारित कुटुंबप्रकार –

अ.केंद्रकुटुंब: अशा प्रकारची कुटुंबे बहुधा सर्वत्र आढळतात. यात पति, पत्नी आणि त्यांची अविवाहित किंवा दत्तक मुलांचा समावेश होतो.

ब. विस्तारित कुटुंब: यात कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असते.प्रामुख्याने शेती व्यवसायातील कुटुंबांचा यांत समावेश होतो.

२. विवाह प्रकारावर आधारित-

अ. एक विवाही कुटुंब- एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या वैवाहिक संबंधांद्वारा अशी कुटुंबे निर्माण होतात. पती आणि  पत्नी जीवंत असेपर्यंत दोघांपैकी कुणा एकाला दुसरा विवाह करता येत नाही.

ब. बहुपती कुटुंब- अनेक पुरुष एका स्त्रीबरोबर विवाह करून कुटुंब निर्माण करतात.

क. बहुपत्नी कुटुंब- यात एक पुरुष अनेक स्त्रियांसोबत विवाह करतात.

३. वंश आणि अधिसत्ता यावर आधारित-

अ. मातृसत्ताक कुटुंब: या प्रकारात कुटुंबात अधिसत्ता ही स्त्रीची असते .शिवाय कुटुंबाचा वंशही स्त्रीच्या नावाने चालला जातो.

ब.पीतृवंशीय कुटुंब: या प्रकारात कुटुंबात अधिसत्ता ही पुरुषाची असते.शिवाय कुटुंबाचा वंशही पुरुषाच्या नावाने चालतो.

४.काबीली कुटुंब: जनजातीमध्ये असलेली ही पध्दत सामाजिक विकासक्रमाच्या आदिम अवस्थेच्या जवळची आहे.

कुटुंब हा समाजशास्त्र आणि  मानसशास्त्राच्या दृष्टीने मूलभूत असा प्राथमिक गट आहे.

कुटुंबाची कार्ये-

१. प्रजनन करणे .

२. पालनपोषण करणे.

३.नव्या पिढीचे वेगवेगळ्या पध्दतींनी सामाजिकरण करणे.

४. व्यक्तीला निस्चित स्थान आणि दर्जा प्राप्त करून देणे.

वरील कार्यांपैकी प्रत्येक कार्य तत्वत:  दुसऱ्या संस्थांकडून होऊ शकते.पण आजवर तरी

कुटुंबाऐवजी दुसरी पर्यायी समाजसंस्था ही कार्ये तेवढया परिणामाने करू शकलेली नाही.

कुटुंबसंस्थेवर मुख्यत: पुढील शक्तींचे वेळोवेळी आघात होतात;

१.आर्थिक- औद्योगिकीकरण व शहरीकरण.

२.वैज्ञानिक यंत्रतंत्रशक्ति.

३.मूल्यात्मक व्यक्तिवाद किंवा समूहवाद.

४.विवाहनीतीत पूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह.

हे बदल मुख्यत: पाश्चात्य समाजात होतात तरी,आपल्या समाजातील कुटुंबावरही त्याचे आघात होत आहेत. कोणत्याही प्रकारच्या कुटुंबात प्रमुख घटक पती आणि पत्नी असतात. त्यांच्या संबंधाला तडा जातो घटस्फोटामुळे.

घटस्फोट: पती आणि पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररीत्या संपुष्टात येणे म्हणजे घटस्फोट होय. घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंधापासून फारकत घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले तरी त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात उदा.

– घटस्फोटित स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

– ती जर मिळवती किंवा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसेल तर हे प्रश्न अधिक जटील होतात.

– घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह सहसा होत नाही.

– तिच्याकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असतो.

-घटस्फोटित स्त्रीला मुले असतील तर तिचा पुनर्विवाह होणे अवघड असतो.

– झालाच तरी तिच्या लग्नापूर्वीच्या मुलांना सावत्रपणाचा जाच सोसावा लागतो,अनेकांच्या स्वभावात काही दोष आढळून येतात, अनेक जण एकाकी आणि पोरकी होतात.

घटस्फोटामुळे असे प्रश्न केवळ स्त्रियांतच दिसतात असे नाही तर पुरुषांमध्येही अनेक समस्या दिसून येतात. अनेक आर्थिक,मानसिक, सामाजिक आणि लैंगिक समस्या निर्माण होतात, घटस्फोटित व्यक्तिविषयी समाजाचा दृष्टिकोन चांगला नसतो.याशिवाय मुलांची कस्टडी आणि मालमत्तेचे प्रश्न निर्माण होतात.

घटस्फोटाची दिसून येणारी कारणे :

-पुरुष किंवा स्त्रीचे विवाहपूर्व संबंध नंतर उघडकीस येणे.

– विवाहानंतर विवाहबाह्य संबंध.

– परस्परांची होणारी भांडणे,उडणारे खटके.

-व्यसने, जुगार.

– भावनिक छळ,अत्याचार.

– दोघांतील पुढीलपैकी फरक ;

– वय, भाषा,चालीरिती, आवडीनिवडी, छंद, खाण्यापिण्याच्या सवयी,भौगोलिक बाबी,उत्पन्नाची साधने,दोघांतील विवाहापूर्वीची अनेक बाबतीतील तफावत इ.

अनेकदा विवाहापूर्वी हवाहवासा होणारा सहवास विवाहानंतर नकोसा वाटतो परस्परांबद्दलच्या प्रेमाची जागा घृणा, तिटकारा घेते.अनेकदा संयुक्त कुटुंबातील मतभेद याला कारणीभूत ठरतात. परस्परांमधील दरी दिवसेंदिवस  वाढतच जाते. एकमेकांतील दोष दिसू लागतात, आपण कसे डावललो जातो,आपल्याला कशी किंमत दिली जात नाही हे ते सतत बोलत जातात. समाजातील आपली प्रतिमा कशी असेल आणि आपले कुटुंब म्हणून ऐक्य याची तमा न बाळगता ते  एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानतात.

हे नक्कीच चिंतेचे असते.

याला जबाबदार कोण? या प्रश्नावर एकच एक उत्तर देता येणार नाही.कुटुंबनिहाय यात वेगवेगळेपणा असतो.

घटस्फोटाच्या वर दिलेल्या कारणांव्यतिरिक्त पुढील बाबींचाही गांभीर्याने विचार करावा लागेल;

– अनेक ठिकाणी कुणी एकजण याला जबाबदार नसतो.परिस्थिती त्यांना हे करण्याला भाग पाडते

– विवाह टिकवणे हे अनेकदा अशक्य बनते.पण कधी कधी परस्परांना समजून न घेणे किंवा गृहीत धरणे हेही एक कारण असते.

-अनेकदा एक घटक आपला कोणत्यातरी बाबतीतचा हेका  सोडत नाही.आणि ते घटस्फोटाचे कारण बनते.

-कुटुंबात व्यक्तिस्वातंत्र्याला  महत्त्व असलेच पाहिजे.मात्र त्यासोबतच कुटुंबसंस्थेच्या महत्त्वाचीही जाणीव असलीच पाहिजे.

जगात भारताची ओळख ही भक्कम कुटुंबसंस्था असणारी संस्कृती अशी आहे.कुटुंबात कुणा एकावर अन्याय न होताही सर्वांच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजस्वास्थाच्या साठीही कुटुंबातील पतीपत्नींनी व्यक्तिस्वातंत्र्य,

स्वाभिमान याचा विचार करतानाच परस्परांशी सतत संवाद साधत राहीले पाहिजे.परस्परांविषयी गैरसमज हे आपापसात बोलूनच नाहीसे केले पाहिजे.

पती आणि पत्नी ही संसाराच्या गाडीची दोन चाके असतात असे समजले जाते.ही दोन्ही चाके (सामाजिक दर्जा,व्यक्तिस्वातंत्र्य या अर्थाने) समान आकाराची असलीच पाहीजे.गाडी चालताना या दोहोंत ठराविक अंतर असावे.मात्र या त्यांना सतत  विश्वासाचे वंगण दिले पाहिजे.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वयाची सत्तरी पार करतांना !!… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ वयाची सत्तरी पार करतांना !!… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

वयाची सत्तरी पार करतांना !!

एकदा एका पासष्टी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले,   “मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?” त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकासाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित ! त्याने जे उत्तर दिले ते असे…

१. आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यावर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.*

२. मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.*

३. आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना ! *४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.*

५. आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.*

६. आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.*

७. आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.*

८. ज्यांना माझी किंमत नाही अशांकडे मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.*

९. आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.*

१०. आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.*

११. आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून ! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.*

१२. आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटतं ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो. 

१३. मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत… आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा…!!*

*आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.*  

*आता लक्षात आले आहे की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जावून रडतो. त्याचा तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असलेली भावनाही मनात येते.*

खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?

आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.

खूप खूप शुभेच्छा सत्तरीच्या.वाटेवर असणाऱ्या मित्रांना !!

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भूत आणि गाढव… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ भूत आणि गाढव… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

घटनाक्रम लक्षात घ्या…

एका कुंभाराने आपले गाढव दोरीने खुंट्याला बांधून ठेवले होते. रात्री एका भूताने दोरी कापून गाढवाला मोकळे केले.

त्या गाढवाने एका शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारीचे पीक नष्ट करून टाकले.

हे पाहून चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने भला मोठा दगड घालून गाढवाला ठार केले.

गाढव मेल्यामुळे कुंभार उध्वस्त झाला.

प्रत्युत्तरादाखल कुंभाराने त्याच दगडाने शेतकऱ्याच्या बायकोची हत्या केली.

बायकोच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे सपासप वार करून कुंभाराचं डोकं धडावेगळे केलं.

कुंभार मेल्याचे बघून कुंभाराच्या बायको व मुलाने शेतकऱ्याच्या घराला आग लावली.

हे पाहून क्रोधित झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे घाव घालून कुंभाराच्या बायको व मुलाला ठार केले…

शेवटी जेव्हा शेतकऱ्याला पश्चात्ताप झाला, तेव्हा तो त्या भूताला म्हणाला, “तुझ्यामुळे माझी पत्नी, कुंभार, कुंभाराची बायको व मुलगा मेले अन् माझ्या घराची राखरांगोळी झाली. तू असं का केलंस?”

त्यावर भूताने शांतपणे उत्तर दिले… “मी कुणालाही ठार केले नाही, मी फक्त ‘दोरीने बांधलेले गाढव’  सोडले !!”

– तात्पर्य – 

आज माध्यमं (WhatsApp, Facebook, Instagram, Twitter, Print Media, News Channel etc.) भूतासारखी झाली आहेत. ते रोज नवनवीन गाढवांच्या दोऱ्या सोडतात आणि लोकं कसलाही विचार न करता, सत्यासत्यता न पडताळता उलट – सुलट प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांची मने दुखावतात. माध्यमं मात्र तमाशा घडवून आणतात आणि बक्कळ पैसा कमावतात… आपले मित्र, नातेवाईक, हितचिंतक आणि सहकारी यांचेशी असलेले संबंध जपण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे.

सतर्क राहा… सुरक्षित राहा…

लेखक – अज्ञात 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की पहिला  येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. कुणाच्याही मनात घर करायचं असेल तर त्याचा रस्ता हा आपल्या वाणीमार्फत जातो.तुमच्या वाणीवरच तुमच्याशी जोडल्या गेलेली माणसं ही जुळून राहतात की दुरावतात हे संपूर्णपणे अवलंबून असतं.म्हणून ह्या सणाचा मूलमंत्रच मुळी “तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला”असा आहे. ह्या सणाद्वारे गैरसमजाने निर्माण झालेले मनमुटाव,नाराजी क्षणात दूर होऊन निरभ्र आकाशासारखं मनं स्वच्छ होतं. अर्थातच” गोड बोला” हे शब्द अगदी स्वच्छ पारदर्शी मनातून आणि मनापासून सुद्धा उमटले तरच त्याला अर्थ आहे.

पुराणात मकरसंक्रांतीची अशी कथा सांगतात की, संकरासूर नावाच्या राक्षसाला जगदंबेने या दिवशी मारले म्हणून तिला संक्रांतीदेवी असे म्हटले जाऊ लागले.

…हा सण साजरा करण्याच्या पद्धती ह्या प्रांतानुरूप थोड्या बदलतात.मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांना दोरा गुंडाळतात.. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते. नवविवाहित जोडप्याचा दोन्ही घरी संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करतात. एरवी आपण काळा रंग अशुभ मानतो परंतु ह्या संक्रांतीच्या सणाला काळ्या वस्त्रांच महत्त्व असतात त्यामुळे बाजारात ह्या दिवसात काळ्या साड्या व काळे पंजाबी ड्रेसेस खप असल्या कारणाने भरपूर बघायला मिळतात.

मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काल मानला जातो. याबद्दल अशी गोष्ट आहे की, महाभारतातील कौरव –  पांडवांचे युद्ध चालू होते. अर्जुन भीष्मांशी लढत होता पण ते त्याला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडी ला पुढे उभे केले आणि तो त्याच्याआडून लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्मांनी आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका व अंबालिका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या.

अंबेचे दुसर्‍या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मांनी तिला त्याच्याकडे पाठवले; पण पळवून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला. ज्या भीष्मांमुळे हे सारे झाले त्यांचा सूड घेण्याचे अंबेने ठरवले. ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्मांशी लढायला आली. पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळले. त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की, ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरायणाचा शुभ काल सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले.

अशा ह्या स्नेहबंधाचे धागे गुंफणा-या सणाची महती सांगणारी माझी एक रचना  पुढीलप्रमाणे

मकरसंक्रांतीची शिकवण

ह्या सणाला काय महत्त्व सांगतो काटेरी हलवा

तीळ गुळासंगे मुखी ठेऊनी राग मनीचा घालवा

ह्याला काय महत्त्व सांगतात ती आंबटगोड बोरं

मनातील किल्मिष पूर्ण घालवा मनं करा कोरं

ह्याला काय महत्त्व सांगतात गोड ऊसाचे कांडे

गोड बोलून टाळावे जरी लागले भांड्याला भांडे

ह्या सणाला काय महत्त्व सांगतो टप्पोरा तीळ

आढ्यता आता सोडा घालवा मनातील पीळ

ह्याला काय महत्त्व सांगतो पिवळाधम्म गूळ

स्वच्छ निरभ्र करा मनं सोडून गैरसमजाचे खूळ

ह्याला काय महत्त्व सांगते मिश्रडाळीची खिचडी

फटकळ तोंडाळपणा पेक्षा बरी ती लाडीगोडी

काय महत्त्व सांगतात ती लालचुटुक गाजरं,

मनात शिरूर राह्यलं की आयुष्य होतं साजरं

द्वेष आता सोडा माणसं आता  जोडा ,

तीळगूळ घेऊन गोड बोलून गाठ मनीची सोडा.,

गाठ मनीची सोडा…

परत एकदा तीळगूळ घ्या अन् गोडगोड बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, तिळगुळ आणि संक्रात…एक संवाद… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ मी, तिळगुळ आणि संक्रात…एक संवाद… ☆ सौ राधिका भांडारकर

मी—-अगबाई ! नवं वर्ष उगवलं.जानेवारी महिना सुरु झाला. आता संक्रातीचे वेध लागले.   .स्वच्छ तीळ चिकीचा गुळ आणायलाच हवा..शिवाय सुगडी..बोरं ऊस आवळे..कितीही ठरवलं ना या वेळेस चितळेकडूनच आणूया लाडू, आता नाही हो होत…पण मन नाही ना मानत..नाही म्हटलं तरी  संस्काराची मुळं नाही सुटत हो..

पण अधिक माहिती देण्यासाठी संक्रात आणि तिळगुळ माझ्या घरीच आले आहेत..अम्मळ बोलूच या का त्यांच्याशी..

“ काय म्हणताय् तिळगुळजी..? ”

*तिळगुळ..*— “ सर्वप्रथम मी तुझं कौतुकच करतो की या वयातही तू अजून तिळगुळ घरी बनवतेस…

संक्रात — “ अरे पण तुझं महत्व सांग ना..” 

तिळगुळ— “ हे बघ तीळ आणि गुळाचं बंधन म्हणजे मी..तिळगुळ. हेमंत ऋतुत येते संक्रांत..थंडीची शिरशिरी..तीळ हे उष्णवर्धक , स्निग्ध. शिवाय त्यातली अमीनो प्रथीने ,लोह शरीरास पोषक असतात. गुळातही सुक्रोज आणि ग्लुकोज  आणि लोह असते. ते शरीराचे तपमानही राखते अन् कांतीही सतेज राहते…म्हणून संक्रातीला माझे महत्व असते बरं का? शिवाय स्नेह आणि मैत्रीचे मी प्रतीक. राग हेवे दावे विसरून जायचे. नवे स्नेहसंबंध प्रस्थापित करायचे..तीळगुळ घ्या गोड बोला म्हणत आनंदाचे, प्रेमाचे बंध जोडायचे..”

मी— “ किती छान !!आपल्या भारतीय सणातली ही तत्वंच महत्वाची..”

*संक्रांत.*— “ अगदी बरोबर !”

मी— “ पण संक्रातबाई,,”काय बाई संक्रांत आली माझ्यावर..”असं लाक्षणिक अर्थानं ,थोडंसं कडवट का बरं 

बोलतात ?”

संक्रांत— “ कारण यावेळी एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करणं असतं ना..१४जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.आणि या भ्रमणास मकर संक्रांत असं म्हणतात. याचवेळी उत्तरायण सुरु होते. हा काळ धर्म परंपरेच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. अन्न ,वस्तु यांचं दान केलं जातं.. सूर्याची पूजा केली जाते. शुक्राचाही उदय होतो.. “

मी — “ भारतात संक्रातीला वेगवेगळी नावेही आहेत ना..?”

संक्रांत – “हो .तामीळनाडुत पोंगल असतो. बिहार मधे तर मला खिचडीही म्हणतात…”

मी — “ खिचडी?”

संक्रांत — “ हो. कारण या दिवशी तूर मसूर तांदळाची खिचडी बनवून खायचीही प्रथा आहे. तिळाचे लाडू, वड्या, रेवडी, गजक, गुळपोळी या खाद्य पदार्थांची तर रेलचेलच असते…”

मी— “ वा !! किती छान माहिती मिळाली. भारतीय सण म्हणजे नुसतीच संस्कृती किंवा परंपरा नव्हे, त्यामागे शास्त्रीय विचार आहे. बदलणार्‍या ऋतुमानाचा आणि मानवी जीवनाचा केलेला वैज्ञानिक अभ्यास आहे…मग स्त्रियांसाठी हळदीकुंकु, वाण वाटणे ,लहान मुलांचे बोर नहाण, पतंग उडवणे, या आनंदकृती असल्या तरी भारतीय कृषीपरंपरेला आणि निसर्गाला मानणार्‍या आहेत…आनंदाचे संकेत आहेत.”

खरोखरच आज मला मी, तिळगुळ आणि संक्रांत यातील परस्परसंबंध डोळसपणे जाणता आले…

चला तर मग—–

तिळगुळ घ्या अन् गोड बोला…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लामणदिवे: श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई – भाग – 1 – लेखक – श्री सदानंद कदम ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆  लामणदिवे: श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई – भाग – 1 – लेखक – श्री सदानंद कदम ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

सांगलीत अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार होतं. संमेलनाची स्मरणिका आणि त्या अनुषंगानं प्रकाशित करावयाच्या काही पुस्तिका यांचं संपादन करण्याच्या कामात मी सहभागी होतो. त्या पूर्वीची संमेलनं आणि त्यावेळच्या अध्यक्षांनी केलेल्या भाषणांमधील उताऱ्यांची एक पुस्तिका काढायची होती. त्यासाठी जुन्या कागदपत्रांचा पसारा मांडला होता. माध्यमांमधूनही तसं आवाहन करण्यात आलं होतं. ते वाचून एक आजी भेटायला आल्या होत्या.

श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई

ऐंशी ओलांडून गेलेल्या त्या आजी. किरकोळ देहयष्टीच्या. गोऱ्यापान. सुती पातळातल्या. हातात एक कापडी पिशवी. त्यात कोंबून भरलेली वृत्तपत्रांची कात्रणं. या आजींनी पिशवीतून काय आणलं असावं या विचारात पडलेला मी. 

आजींनी बैठक मारली आणि पोतडीतली कात्रणं बाहेर काढून माझ्यासमोर ठेवत त्या म्हणाल्या, “ही गेल्या पन्नास वर्षांतली कात्रणं. त्या त्या वेळच्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे वृत्तांत यात छापून आलेत. ही कात्रणं ताब्यात घ्या आणि मुख्य म्हणजे तुमचं काम झालं की मलाच परत द्या.”

मी ते घबाड लगेच ताब्यात घेतलं. आजींचा पत्ता लिहून घेतला आणि त्यांना निरोप दिला. ज्या वयात हरिकीर्तन करत किंवा दूरदर्शनवरच्या धार्मिक मालिका पाहत घरी बसायचं, त्या वयात आजी  कात्रणांचं हे बाड घेऊन दोन किलोमीटर चालत आल्या होत्या आणि त्या चालत गेल्याही. तेव्हाच ठरवलं आजींच्या घरी जायचंच. 

दोन दिवसांनी मी आजींच्या घरी. आजी बाहेरच्या खोलीत कातरी, पुठ्ठे घेऊन बसलेल्या. भोवती मराठी-इंग्रजीमधली अनेक दैनिकं. माझं कुतूहल वाढलेलं. 

“काय करताय?”

माझं स्वागत करून मला बसायला खुर्ची देत त्या म्हणाल्या, “अहो, वेगवेगळ्या विषयांवरची कात्रणं काढून ती पुठ्ठ्यावर डकवतेय. विषयवार गठ्ठे तयार करत बसलेय. गेल्या पन्नास वर्षांचा हा रोजचा उद्योग.”

“आणि अशा पुठ्ठ्यांचं काय करता? काय उपयोग?”

“मी शिक्षक होते. आता निवृत्त. सेवेत असताना या संग्रहाचा खूप उपयोग व्हायचा वर्गात शिकवताना. आता असे विषयवार गठ्ठे बांधून ठेवलेत. ज्यांना हवेत त्यांनी न्यावेत. काम झालं की परत आणून द्यावेत.”

मी गठ्ठे पाहूनच हबकलो. जवळपास वीस-पंचवीस विषयांवरची ती कात्रणं. हजारावर पुठ्ठे. त्यावर ती कात्रणं चिकटवलेली. लहान मुलांच्या चित्रांपासून, मोठमोठ्या इमारतींच्या चित्रांपर्यंत आणि भाषा-कला-साहित्य पर्यावरणापासून सर्व विषयांवरचे लेख. पुठ्ठेही एकाच प्रकारचे, नीट कापलेले. कपाटांतही असेच पुठ्ठे ठेवलेले. प्रत्येक कप्प्यावर आत कुठला विषय आहे त्याच्या नावाच्या चिठ्ठ्या लावलेल्या. स्टीलची सहा फूट उंचीची तीन कपाटं भरलेली. एरवी साड्यानं कपाटं भरतात बायकांची हे बघण्याची सवय. मला एखाद्या संदर्भ ग्रंथालयात गेल्यासारखंच वाटत होतं. 

“पुठ्ठे एकसारखे कसे? कुठून आणता?”

“प्रेसमधून विकत आणते.”

“हा खर्च कशासाठी?”

“अहो, मुलींच्या हातात हे पुठ्ठे पडले की त्यांच्या डोळ्यांतल्या बाहुल्या नाचू लागतात. त्यांचा अवघा देह शिकण्यातला आनंद घेताना दिसतो. जाणवतं आपल्याला ते. माझ्यादृष्टीनं तो आनंद महत्त्वाचा. माझी ऊर्जा वाढविणारा. मुली अशा बहरताना पाहणं यासारखं सुख नाही.”

कधीकाळी प्रबोधनाचं काम करणारी वृत्तपत्रं हल्ली ‘कूपन संकलन स्पर्धा’ घेतात. पोळपाट-लाटण्यापासून कुकर पर्यंतची बक्षीस जाहीर करतात. ती मिळवण्यासाठी अनेकांची धडपड. घरी वृत्तपत्र न घेता शाळेतल्या दैनिकांतली कूपनं कापून नेणाऱ्या माझ्या शिक्षक भगिनी माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागल्या. घरी एकही दैनिक न घेणारे शिक्षक बांधव माझ्याभोवती फेर धरून उभे राहिले. अशांना या बाई समजतील? त्यांच्या दृष्टीनं या वेड्याच की. पण या बाईंनी हा वेडेपणा सेवेत असतानाच केला नव्हता, तर निवृत्तीनंतर पंचवीस वर्षं होत आली तरी सुरू ठेवला होता. इतर शिक्षकांना मदत व्हावी म्हणून. पदरचा पैसा खर्च करत. घरी दैनिकांचा रतीब लावत. आजही त्यांचा हा वेडेपणा तसूभरही कमी झालेला नाही.  बाई दिवसभर हेच करत असतात. केवळ स्वानंदासाठी. हे कामच आज त्यांना जगवतं. 

बाई एकट्या. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यानं विजापूरपासून पुण्यापर्यंत शिक्षण घेतलेल्या. सर परशुरामभाऊ महाविद्यालयामधून सत्तेचाळीसला गणित विषय घेऊन बी. ए. झालेल्या. पण त्यांना शिकवावं लागलं ते इंग्रजी. ज्याला ज्या विषयाची आवड तो विषय त्याला न देण्याची शाळांची अशी परंपरा आजही अबाधित. पण बाईंनी न डगमगता ती परकी भाषा आत्मसात केली. तिच्यावर मातृभाषेइतकंच प्रभुत्व मिळवलं आणि आपल्या विद्यार्थिनींनाही ती भाषा त्यांच्या मातृभाषेइतकीच सोपी वाटावी असं अध्यापन केलं. त्यासाठी अपार मेहनत घेतली. 

“इंग्रजीवर इतकं कसं तुमचं प्रभुत्व?” असं विचारताच त्या म्हणाल्या, “अहो, प्रयत्न केला तर कुठलीच भाषा अवघड नाही. हाताशी उत्तम शब्दकोश आणि इनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाचे दहा खंड एवढ्या शिदोरीवर मला सगळं जमून गेलं.”

“शब्दकोशांचं मी समजू शकतो, पण ब्रिटानिकाचे खंड?”

हातात ‘मार्गदर्शक’  घेतल्याशिवाय इंग्रजीच्या तासाला वर्गात पाऊलही न टाकणारे माझे बांधव मला दिसू लागले. इंग्रजी शिकवणारे. ज्यांना मराठीही ‘नीट’ लिहिता येत नाही असे. बहुतेकांचे पदवीचे विषय इंग्रजी सोडून बाकीचे. यातले फार म्हणजे फारच थोडे इंग्रजी नीट बोलणारे. 

“पाठ नीट समजावून देण्यासाठी हे खंड खूप उपयुक्त. पाठात आलेल्या शब्द, कल्पना समजावून देताना यातली माहिती उपयोगाला येते. ती शोधून, त्या त्या पाठाच्या अनुषंगानं सांगितली तर मुलांना जादा माहितीही मिळते आणि त्यांची भाषाही सुधारते. विषयाची गोडी लागते त्यांना. त्यासाठी सोप्या इंग्रजी बोलीतून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो इतकंच.  तेवढं तर शिक्षकानं करायलाच हवं ना?”

– क्रमशः भाग पहिला. 

लेखक :  श्री सदानंद कदम 

मो. ९४२०७९१६८०

संग्रहिका : डॉ. भारती माटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्रिणी… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ मैत्रिणी… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

मैत्रिणी हा श्वास  असतो ,

मैत्रिणी हा ध्यास  असतो

 

 एखादी चंचल असते ,

तर एखादी शांत असते ,एखादी बोलकी तर एखादी अबोल

 

 एखादीचं हास्य  स्मित असतं तर एखादीचं हास्य  खळखळून असतं

 

 एखादीला साडीच आवडते तर कोणाला ड्रेस, तर कोणाला Western Outfit

 

 एकत्रित  जेवायला जातील ,पण घरातील  सगळ्यांचं खाण्याचं करून निघतील .

 सगळ्याच एकमेकीस  सांगतील, “आज मी निवांत  ताव मारणार  आहे” ,

पण गप्पाटप्पांच्या नादात  थोडेच  खातील

 

कोणी धैर्यवान  असतात तर कोणी भागूबाई असतात

 

 कोणी नोकरीत,कोणी  व्यावसायिक.

 

कोणी छान  गृहिणी ,

कोणी तानसेन

तर कोणी कानसेन.

 

 आवड प्रत्येकाची वेगवेगळी

 

आनंद घेतात क्षणभर

अन दुःख विसरतात मणभर

 

जीवन रुपी प्रवासात गरज असते मैत्रिणींच्या कळपाची

कारण त्यांच्या सहवासात ऊब मिळते माहेरच्या माणसांची

 

संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी-नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – शकुनी महिला मंडळ ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 🎲 शकुनी महिला मंडळ ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

चाळीतले “शकुनी” महिला मंडळ सकाळची काम आटपून, रोजच्या प्रमाणे दुपारी जिन्या जवळच्या मोकळ्या चौकात, चाळगोष्टी करायला जमले होते.  प्रत्येकीच्या हातात काही ना काही निवड, टिपण, शिवण (स्वतःच्या घरचे) होतेच ! आता तुम्ही म्हणाल “शकुनी” महिला मंडळ म्हणजे ? शकुनी तर कपटी पुरुष होता आणि महिला मंडळाला “शकुनी” महिला मंडळ हे नांव कसे काय पडले ? मी तुम्हाला शकुनीच्या फाशांची शपथ घेवून सांगतो, की महिला मंडळाला हे असे नांव ठेवण्यात माझा फाशां प्रमाणे त्याच्या पटाचाही संबंध नाही ! पण तुमचा प्रश्न रास्तच आहे आणि त्याचे उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसण्याचा पण संभव आहे !  त्या महिला मंडळाला असे नांव सर्वानुमते त्यांच्याच मुला मुलींनी दिले होते, आता बोला !  त्या सगळ्यांनीच सध्या टीव्ही वर चालू असलेले महाभारत बघून त्यात दाखवलेल्या शकुनीच्या द्यूतामुळे महाभारताचे रामायण घडले, अशी आपल्या बाल मनांची समजूत करून घेतली असावी ! त्यामुळे चाळीत आपापल्या आयांमुळं, अगदी महाभारत होत नसले,  तरी कायम शीतयुद्ध सुरूच असते,  या समजुतीतून त्यांनी हे नांव महिला मंडळाला दिल्याची शक्यता नाकारता येत नाही !

तशी “शकुनी” महिला मंडळाची सभासद संख्या जरी जास्त असली, तरी यंग टर्क्सच्या मते त्यांच्या पैकी शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकू, चाळीतल्या आतल्या बातम्या काढण्यात जेम्स बॉण्डवर मात करतील अशा ! त्यामुळे त्या तिघींच्या आडनावाचे आद्याक्षर वापरून “शकुनी” हे नांव त्यांनी मंडळाला बहाल केले होते असे पण काही लोक म्हणतात !

आज जरा बऱ्या पैकी ऑडियन्स जमलेला बघून जोशीणीने पहिला फासा टाकला !  “तळ मजल्यावरची चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली वाटत !” हे ऐकताच सगळ्या महिला मंडळाचे हात, जे काही निवड,  टिपण करत होते, ते एकदमच कोणीतरी स्टॅचू केल्यागत थिजल्या सारखे झाले ! पण स्वतः जोशीण मात्र काहीच झालं नाही अशा अविर्भावात पुन्हा तांदूळ निवडायला लागली.  हा धक्का पचवायला सकल महिला मंडळाला साधारण सारखाच वेळ लागला आणि सगळ्यांनी एकदमच बोलायला सुरवात केली.  “काय सांगतेस काय? कुणाबरोबर गं?” “माझा तर बाई विश्वासच बसत नाहीये” “नेहमी खाली मान घालून जाणारी, साधी राहणारी असं काही…. ” “हो ना, तिच्या वयाच्या मुली नको नको ती फॅशन करत असतांना, ही अजून साडीत…. ” “म्हणजे अगदी खाली मुंडी पातळ धुंडी निघाली…. ” तो गलका ऐकून जोशी काकू म्हणाल्या “माझं जरा ऐका, मी म्हटलं ‘चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली !’ अजून तशी खात्रीलाय बातमी यायची…. ” तिला मधेच तोडत साने काकू म्हणाल्या “म्हणजे अजून तुला नक्की माहित नाही, तर कशाला उगाच तीच नांव खराब करतेस ? अशांन तीच लग्नतरी होईल का ?” यावर साठे काकूंनी पण जोशी काकुंवरचा आपला राग व्यक्त केला आणि म्हणाल्या “तुला ना त्या टीव्ही वरच्या बातम्या देणाऱ्यांसारखी घाई असते, बघा आमच्याच चॅनेलने ही बातमी प्रथम तुमच्या पर्यंत आणली….”  तेवढ्याच ठसक्यात जोशीण म्हणाली “अग बरेच दिवसात दिसली नाही म्हणून म्हटलं पळून गेली की काय, कारण तीच्या प्रेम

प्रकरणाची बातमी तूच तर  आम्हाला दिली होतीस !” हे ऐकताच साठे काकू परत खाली मान घालून गहू निवडायला लागल्या. ते बघून जोशीणीला मनोमन आनंद झाला आणि तिने आपला मोर्चा साने काकूंकडे वळवला “आणि साने काकू लग्न न व्हायला काय झालंय नलूच,  हिरा कितीही लपवला तरी चमकायचा राहतो का ?” हे ऐकताच सावंत काकू म्हणाल्या “आता ही हिरा कोण ?” त्यांच हे बोलण ऐकून मंडळात एक हास्याची लहर उठली.  सावंत काकूना काही कळेना, पण आपल्या प्रश्नाचे कोणीच उत्तर देत नाहीत हे बघितल्यावर त्या पुन्हा हातातली गोधडी शिवायला लागल्या.

त्या हास्य लहरीत वातावरण थोडं निवळत असतानांच, हातात दोन मेथीच्या जुड्या घेवून स्वतः चितळे काकू हजर ! त्यांना पाहताच जणू काहीच झाले नाही, या थाटात साने काकू त्यांना म्हणाल्या “छान दिसत्ये मेथी, कुठून आणलीस गं ?” “अग यांच्या ओळखीचा एक भाजीवाला आहे नाशिकचा, त्याच्या कडून हे घेवून आले !” “पुढच्या वेळेस मला पण दोन जुड्या सांग हं, आमच्यकडे पण मेथी फार आवडते सगळ्यांना.” “हो सांगीन ना, त्यात काय एवढं आणि हो आणखी कोणाकोणाला हवी असेल तर आत्ताच सांगा म्हणजे एकदम आणायला बरी.” मग प्रत्येकीनं आपआपली ऑर्डर दिली पण जोशीण काही बोलायला तयार नव्हती.

ते बघून साठीणीला पण चेव आला आणि ती मुद्दामच तिला म्हणते कशी “काय गं, तुला नको का नाशिकची मेथी ?” “नको हो, आमच्याकडे माझ्याशिवाय कोणीच खात नाही.  पण तुम्ही एक कामं करा, तुम्ही भाजी केलीत की द्या वाटीभर पाठवून, कडू असली तरी गोड मानून खाईन हो !” हे ऐकताच साठीणीचा चेहरा पाहण्या सारखा झाला.  पण ती खमकी तशी जोशीणीची पाठ सोडायला तयार नव्हती. वरकरणी हसत म्हणाली “हो देईन की त्यात काय एवढं !” पण मनांतून जोशीणीच्या बातमीची खात्री करायला, स्वतः चितळे काकू हजर असल्याचा फायदा घेण्याचे ठरवून, तिने जोशीणीकडे पहात चितळे काकूंना डायरेक्ट सवाल केला, “काय हो काकू, हल्ली तुमची नलू दिसली नाही बरेच दिवसात. तब्बेत वगैरे बरी आहे ना तिची ?” “हो अगदी मजेत आहे, तिला काय होतंय !” “तसं नाही पण जोशी काकू म्हणत होत्या….. ” साठीणीला मधेच थांबवत जोशीण म्हणाली “हो बरेच दिवसात दिसली नाही ना,  म्हणून जरा काळजी पोटी विचारत होते की नलूला कुणी बघितलीत का !” जोशी काकूंच्या या बोलण्यावर साठे काकूंनी बोलायला तोंड उघडले, पण त्या आधीच चितळीण बोलती झाली, “नाही तुमच सगळ्यांचे म्हणणे बरोबरच आहे, पण तिची तब्येत अगदी ठणठणीत आहे, काळजी करायच काहीच कारण नाही.” “ते चांगलंच आहे, पण चाळीत कुठे दिसली नाही…. ” “अहो साठे काकू ती घरात असेल तर दिसेल ना?” “म्हणजे मग आम्ही जे ऐकलं ते खरच…” “हो खरच आहे ते,  ती सध्या ओबेरॉय मध्ये  राहते आहे !” “म्हणजे ?” “अहो ती गेल्याच महिन्यात US वरून आली आणि सेल्फ क्वारंटाईन साठी म्हणून एअरपोर्ट वरून डायरेक्ट ओबेरॉयला अठ्ठावीस दिवसासाठी !”  चितळे काकूंचे बोलणे ऐकून तमाम महिला मंडळ जोशीणीकडे खाऊ का गिळू नजरेने बघायला लागले आणि जोशीण खाली मान घालून परत तांदूळ निवडायला लागली.  आणि एकीकडे  मंडळाच्या तीन आधारस्तंभानी म्हणजे शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकूंनी सुटकेचा निश्वास टाकला !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-०१-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘व्हीलचेअर…’ – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘व्हीलचेअर…’ – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

विवियाना मॉलमध्ये रविवारी संध्याकाळची वेळ म्हणजे तरुणांची गर्दीची वेळ.. त्यांचा चिवचिवाट, भरलेले कॉफी हाऊसेस, सेल्फी टाईम.

अशा गर्दीच्या वातावरणात चटकन नजर गेली ती एका व्हीलचेअरवर एका आजीबाईंना प्रेमाने नेणारा एक माणूस आणि सोबत 12-13 वर्षाचा एक मुलगा.. मी आणि माझी मैत्रीण तिथे एका बाजूला बाकावर बसलो होतो. आम्ही बघत होतो.. व्हीलचेअर ढकलत तो माणूस त्या आजीबाईंना इकडून तिकडे नेत होता आणि त्याचा मुलगाही त्याच्या सोबत होता….  ५ मिनिटांतच तो माणूस त्या आजींची व्हीलचेअर आमच्या अगदी बाजूला आणून उभं करून त्या मुलाशी इंग्रजीत बोलत होता. ” मी ATM मधून पैसे काढून एकदोन कामे करून येतो, तू आजी जवळ थांब. ” असं सांगून निघून गेला.

त्या आजी आमच्याकडे बघून थोडं हसल्या.. दोन – तीन मिनिटं गेली आणि हिंदीत मला सांगू लागल्या.. ” हा माझा नातू. मुलाचा मुलगा. आणि तो गेला ना पैसे काढायला तो माझा मुलगा.. आम्ही ठाण्यातच राहतो.. आज ‘सुईधागा’ सिनेमा बघायला आम्ही आलो. सुनेला तिच्या कॉलेज ग्रुपबरोबर बाहेर जायचं होतं, मग माझ्या मुलांनी आमचा हा बेत जुळवून आणला..” नकळत माझ्या तोंडून “अरे वाह!”  निघून गेलं..

आजी पुढे सांगू लागल्या… “ माझं वय 73 आहे.. मला चालता येत नाही म्हणून ही खुर्ची आणि ही फोल्डिंग काठी.. सिनेमा, नाटक बघायला जायचं तर थिएटरमध्ये काळोख व्हायच्या आत आम्हाला आत शिरावं लागतं. म्हणून मी कुठे जायचं म्हणजे माझी वरातच असते.. पण मुलगा, सून ऐकत नाहीत.. अजून दोन मुलं आहेत मला.. पण ते मला सांभाळायला तयार नाहीत.. हा मुलगा सायकॉलॉजीचा प्राध्यापक आहे. तो मला आनंदाने सांभाळतो.. दुसरी भावंडे सांभाळत नाहीत, त्याबद्दल त्याचा आकस नाही. मला माझा मुलगा थिएटरमध्ये काळोख व्हायच्या आतच घेऊन येतो.

आज आम्ही बाहेर जेवून सिनेमाला गेलो.. आता मॉलमध्ये या खुर्चीतून मला फिरवतो.. मी नको म्हणत असताना त्याचं म्हणणं.. ‘बघ नं जग किती बदललंय. सुंदर गोष्टीही आहेतच. असं फिरलीस, चार माणसं बघितलीस की तुझं मन व शरीर ही फ्रेश होईल. मी मनाचा अभ्यास केलेला माणूस आहे म्हणूनच सांगतोय.'”

हे सांगत असताना त्यांचा मुलगा काम आटपून परत आला.. आजीबाई माझ्याशी बोलत असलेल्या बघून त्यांनी त्यांना हिंदीत मला निर्देश करून विचारलं, ” कौन है? किससे बात कर रही हो मम्मा..?”

आजीबाईंनी लगेच सांगितलं, ” यहीपे बैठी थी। ऐसे ही मैने बात की उससे।”

मला वाटलं, हा माणूस वैतागेल. कोण कुठली ही बाई ! पण त्यांनी चक्क हसून मला जे सांगितलं त्यावर मी थक्क झाले.

ते म्हणाले, “आम्ही आईला दर महिन्याला एकदा असं बाहेर फिरवून आणतो.. रोज आम्ही व्यस्त असतो. मग एक दिवस तिला असं बाहेर घेऊन येतो. माझे वडील असतांनाही आम्ही हेच करायचो. ते नाहीत आता.. आज माझी बायको नाही येऊ शकली, नाहीतर आम्ही तिघे येतो. एक दिवस तिला देतो. कधी सिनेमा, नाटक, ते नाही जमलं तर संध्याकाळी तरी काहीतरी प्लॅन करतो आणि तिला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यामुळे तिची तब्येत चांगली राहायला मदतच होते ना.”

आम्हाला त्यांनी धन्यवाद म्हटलं, ” माझ्या आईला तुमची सोबतच झाली ” म्हणून ते तिघेही निघून गेले नि मी आणि माझी मैत्रीण सुन्न झालो. अरे किती नशीबवान या आजी..

 — कुठे ही परिस्थिती नी कुठे ‘आईवडील नकोत’ ही भावना जोपासणारी काही मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात..  समाजात एकाच परिस्थितीबाबत दोन भिन्न बाजू दिसल्या.

वय झालं आहे.. चालता येत नाही.. गर्दीत कुठे न्यायचं.. असा विचार न करता हा आजींचा मुलगा, सून आणि नातू ही यांच्या लेखी ‘आई म्हातारी झाली पण मी नेईन, तिला आनंद मिळावा’ ही भावना..

अशीही माणसं समाजात आहेत हे बघून आम्हा दोघींना खरंच खूप बरं वाटलं. आणि कितीतरी वेळ आम्ही शांतपणे त्या तिघांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे शांतपणे बघत होतो आणि डोळे कधी पाणावले कळलंच नाही…

लेखका : अज्ञात. 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares