मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

दर पंधरा दिवसातल्या एका वारी मी इथं येत असतो… आंबा खाऊन  कोय फेकून द्यावी तशी कोयी सारखी पडलेली अनेक माणसं मला इथे दिसतात…

या कोयीचं भवितव्य काय ? … तरीही मी त्यांना स्वच्छ करून जमिनीत पुन्हा रुजवून झाड लावण्याचा  प्रयत्न करत आहे ! 

… या इथे हे मंदिर दिसतंय… त्या तिकडे मस्जिद आहे आणि पलीकडे चर्च आहे… या तीन कोनाच्या ” पायाशी ” बसलेला मी फक्त एक माणूस !

याचक मंडळींना गोळ्या औषधं देणं हा फक्त एक बहाणा असतो. मी त्यांच्याशी यानिमित्ताने चर्चा करून ते काही काम करतील का ? त्यांच्या अंगात काही स्किल आहे का  ? या गोष्टींची चाचपणी करून त्यांना व्यवसाय मांडून देत असतो. 

तर, या ठिकाणी मला ठरलेल्या वेळी एक आजोबा नक्की भेटतात. ते पूर्वी काम करायचे, घरातल्या लोकांना पैसे द्यायचे, त्यांना मदत करायचे… घरातले लोक सुद्धा त्यांच्यावर प्रेम करायचे…

एके दिवशी, त्यांना पॅरालिसिसचा झटका आला… नोकरी गेली… घरात पैसे द्यायचे बंद झालं आणि याचबरोबर मग घरातल्या लोकांनी प्रेम करणं सुद्धा बंद केल…. ! बाबांना वाटलं, माझ्याच तर घरचे लोक आहेत, मला सांभाळतीलच… परंतु त्यांचा हा विश्वास फोल ठरला…. घरातल्या प्रत्येकाने स्वतःच्या अडचणी सांगून, आम्ही तुम्हाला सांभाळण्यास असमर्थ आहोत, असं सांगितलं आणि तेव्हापासून बाबा रस्त्यावर आले …

बाबा फक्त सुशिक्षित नाहीत तर सुसंस्कारित सुद्धा आहेत….!  सुशिक्षित आणि सुसंस्कारित यामध्ये फरक असतो, सुशिक्षित असेल ती व्यक्ती सुसंस्कारित असेलच याची खात्री नसते ! 

बाबांना दम्याचा त्रास आहे, ते काहीतरी करून मी जिथे आहे तिथे येतात आणि मला म्हणतात, Hey Sir, give me pump….! दम्याचा अटॅक आल्यानंतर एका छोट्या पंपमधून श्वासाद्वारे औषध घेतलं की हा अटॅक कमी होतो… त्यांना दरवेळी तो पंप लागतो. मी नेहमी त्यांना पंप देतो… मला भेटल्यानंतर, दरवेळी माझ्या शेजारी बसून माझ्याशी ते वैचारिक चर्चा करायचे…. ! नीट बोलता येत नसतानाही बाबा बोलून व्यक्त व्हायचे, परंतु त्यांच्या मनात प्रचंड विचारांची खळबळ सुरू आहे हे मला नेहमी जाणवायचं…! 

खरंच आहे…. बोलून व्यक्त होतात ते शब्द….!

न बोलताही व्यक्त होते ती भावना….!!

आणि मनात नुसतेच रेंगाळतात ते विचार !!!

एके दिवशी अचानक बाबा यायचे बंद झाले, आज या गोष्टीला जवळपास आठ महिने लोटले….

बाबा का येत नाहीत ? याची चौकशी मी अनेकांकडे केली, परंतु कोणालाच काहीही माहित नव्हतं. मला वाटलं, कदाचित त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांचा स्वीकार केला असावा ! आणि या विचारांमुळे सुखावून मी त्यांची चौकशी करणे सोडून दिले….

यानंतर बरोबर आठ महिन्यानंतर म्हणजे  शनिवारी १७ डिसेंबर २०२२ रोजी, याचकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी मोटरसायकलवर सर्व साहित्य घेऊन मी निघालो असता, एका रस्त्यात ट्रॅफिक जाममुळे मी अडकलो…. मग वैतागून दुसरा रस्ता घेतला, हा सुद्धा रस्ता पुढे ब्लॉक होता, मला या ट्रॅफिक मध्ये सुद्धा अडकावं लागलं… मग गुपचूप थांबुन राहिलो…

मोटर सायकल बंद करून मी उगीच इकडे तिकडे निरीक्षण करत राहिलो… ट्रॅफिकमध्ये निर्जीव गाड्या अक्षरशः एकमेकांना चिकटून उभ्या होत्या… मला कळत नाही, मग सोबत जगताना  जिवंत माणसांत इतकं अंतर का पडतं ? 

हल्ली चार माणसं एकाच दिशेने, एकाच विचाराने, तेव्हाच चालतात, जेव्हा पाचव्याला खांद्यावरून पोचवायचं असतं…. ! No Entry मधून Right घेऊन चुकण्यापेक्षा, योग्य रस्त्याने Left घेवून बरोबर राहणं हे केव्हाही चांगलं…मात्र हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो ! …. 

डोक्यात हे असं काही चालू असताना, अचानक विचारांची मालिका खुंटली….

मी थांबलो होतो, त्याच्या बाजूच्या फुटपाथवरून एक दाढी वाढलेले आजोबा, सरपटत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते. अंगावर जे काही कळकट्ट होतं त्याला कपडे का म्हणायचं ? हा मोठा प्रश्न…! 

दोन-चार इंच पुढे सरकतानासुद्धा त्यांना वेदना होत असाव्यात, हे दाढी आडून चेहरा स्पष्ट सांगत होता. 

दोन-चार इंच पुढे सरकताना सुद्धा त्यांना भयानक दम लागत होता…. आकाशाकडे तोंड करून ते एक मोठा श्वास घ्यायचे आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते… सरपटत चालताना बऱ्याच वेळा त्यांचा तोल जात होता, ते पडत होते… पुन्हा उठून बसत होते आणि पुढे सरकत होते…. 

ट्रॅफिक मध्ये ताटकळत थांबलेले सर्वजण हा ” तमाशा ” बघत होते….. त्यांचा ” टाईमपास ” होत होता…! 

या आजोबांकडे पाहून मला पटलं… पडणं म्हणजे हरणं नव्हे…. पुन्हा उठून उभं न राहणं म्हणजे हरणं ! हरणं ही फक्त एक मानसिक अवस्था आहे…. जोपर्यंत आपली हार आपण मनाने कबूल करत नाही, तोपर्यंत आपण जिंकलेलोच असतो…! … यश म्हणजे हापूस आंबा असेल तर अपयश म्हणजे हापूस आंब्याची कैरी ! प्रत्येक आंबा कधीतरी कैरी असतोच…. कैरी असण्यात गैर काय… ? कैरी परिपक्व होते तेव्हाच तर ती आंबा होते… कैरीपासून आंबा होणे ही फक्त एक नैसर्गिक प्रक्रिया असते….! 

… अपयश जेव्हा परिपक्व होतं, प्रयत्न करून आपण या अपयशावर काहीतरी प्रक्रिया करतो, आणि यानंतर जे मिळतं, त्याला यश म्हणतात…! 

मी या बाबांकडे एकटक पाहत होतो…. डोक्यात वरील विचार सुरू होते आणि एका क्षणी, माझ्या या विचारांची शृंखला तुटली…. मला जाणवलं, ‘ अरेरे हेच ते बाबा…. जे माझ्याकडून पंप मागून घ्यायचे ! बापरे… यांची अशी कशी अवस्था झाली ? इतके दिवस मी समजत होतो त्यांच्या घरातल्यांनी यांचा स्वीकार केला आहे….’

मोटर सायकल स्टॅंडवर लावून, मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना नावाने हाक मारली… डोळे किलकिले करत त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मला ओळखलं…. मला ते हसत म्हणाले, ‘How are you doc?’

मी म्हणालो, “ मी बरा आहे बाबा, तुम्ही कसे आहात ?”

ते याही अवस्थेत, हसण्याचा प्रयत्न करत, दम लागलेल्या आवाजात म्हणाले, “I am perfectly fine sir, no problem… “ 

त्यांना दम लागला होता…. वरील चार शब्द बोलण्यासाठी त्यांना चार मिनिट लागले आणि तरीही ते म्हणत होते ‘ मी 

“परफेक्टली फाईन” आहे… No Problem!’

आपल्याकडे सगळं काही असून सुद्धा, आपण आयुष्यात कधीही I am perfectly fine असं म्हणत नाही…. मला कोणताही Problem नाही असं कधी म्हणत नाही…. आणि आज आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर रस्त्यावर उभे राहून हे बाबा म्हणत होते, I am perfectly fine! No problem…

… खरा सुखी कोण ? आपल्याकडे सगळं काही असणारे आपण ?? की सर्वस्व गमावलेले ते ???

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शहीद पांडुरंग साळुंखे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ शहीद पांडुरंग साळुंखे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

जय हिंद !!

पुण्यातील साळुंके विहार सर्वांना माहीतच असेल पण हे साळुंखे कोण आहेत ? हे कित्येकांना माहीत नाही.

पुण्यातीलच नाही तर साळुंखे विहारमधील देखील कित्येकांना याची माहिती नाही ही खरंतर दुर्दैवाची गोष्ट आहे.

तर चला जाणून घेऊया —

सांगलीमधील मणेराजुरीचा आणि पंधरा मराठा लाईट इन्फंट्रीचा महावीर चक्र विजेता पांडुरंग साळुंखे यांनी बुर्ज जिंकून दिले आणि पंधरा मराठा लाईट इन्फंट्रीला पंजाब थिएटर अवॉर्डसह बरेच काही मिळवून दिले.

सन १९७१ च्या युद्धामध्ये भारताच्या पश्चिमेकडील भागामध्ये, पंजाब सेक्टरच्या उत्तरेकडच्या भागू कमानपासून ते दक्षिणेकडील पुंगापर्यंतच्या महत्वाच्या पट्टयातील भिंडी, अवलक, बेहलाल, तेबूर, मेहरा, छागकला, गोगा, दुसीबंद, फतेहपूर या अत्यंत महत्वाच्या चौक्यांवर पाकिस्तानी फौजांनी अचानक हल्ला केला.

३ डिसेंबर १९७१ रात्री ११.०० वाजता पाकिस्तानी सेनेतील अत्यंत कडवी समजली जाणारी बलुची पठाण रेजिमेंटच्या ४३ व्या बटालियनने प्रचंड संख्याबळाच्या ताकतीने आणि अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, रॉकेट लॉंचर, मशीन गन्स, तोफांनी भारतीय चौक्यांवर बेछूट हल्ला चढविला. त्या तुफानी हल्ल्यासमोर चौक्यांवर तैनात असलेले एइ चे जवान टिकाव धरू शकले नाहीत. आणि पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय चौक्यांवर कब्जा मिळवला. पाकिस्तानी सैन्यांचा कब्जा असलेल्या उंचावरील चौक्या परत मिळविणे मोठे आव्हान होते. त्याठिकाणी डेरेदाखल असलेल्या पंधरा मराठा लाइट इन्फंट्री बटालियनने आव्हान स्वीकारले. चौक्या सोडून आलेल्या “एइ” जवानांच्या मदतीने पंधरा मराठा लाइट इन्फंट्री बटालियनच्या जांबाज सैनिकांनी क्षणाचाही विलंब न करता, कडव्या बलुच पठाणांच्या बलाढ्य सेनेवर मराठा सैनिक तुटून पडले. पंधरा मराठा बटालियनच्या वीरांनी केलेला प्रतिहल्ला (Counter Attack) यशस्वी करुन अनेक चौक्या परत मिळवल्या. आता दोन्हीकडील फौजा समोरासमोर होत्या दुसीबंद, बेहलोक, गोगा, उंचावरील चौक्यांवरून पकिस्तानी फौजांना खदेडणे कठीण काम होते. १५ मराठा खाली मैदानी भागात होती. मदतीला वैजंता  (विजयंता) रणगाड्यांचा ताफा होता. परंतु उपयोग नव्हता. कारण शत्रू उंचावर होता. त्यांचे रणगाडाभेदक रॉकेट लाँचर तैनात होते. भारतीय सेनेसाठी नैसर्गिक वरदान असलेल्या या चौक्या आता पाकी सैन्यांना वरदान ठरत होत्या.

१५ मराठा सैन्यांची नामुश्की पाहून पाकिस्तानी सैन्य जणू जशन साजरा करीत होते. हवेत गोळीबार करुन मराठा सैन्यांना हिणवत होते. आव्हान देत होते. नाचत होते. खाली तैनात असलेल्या १५ मराठा जवानांचे रक्त खवळत होते. पण आदेश मिळत नव्हता. माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. डिसेंबरची सहा तारीख उजाडली. मोहीम प्रमुख मेजर रणवीरसिंग यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. तेव्हा माघार घेण्याचे संकेत मिळाले. परंतु अंतिम निर्णय मेजरसाहेबांवर सोडण्यात आला. मैदानातून माघार घेतील ते मराठे कसले ? दुसीबंद चौकीवर तैनात असलेले पाकिस्तानचे रॉकेट लाँचरचा मोठा धोका होता. अखेर एकवीस वर्षाचा जवान पांडुरंग साळूंखे याने पुढकार घेतला. मेजर साहेबांना म्हणाला, ‘ सर शत्रूच्या रॉकेट लॉंचरचा मी बंदोबस्त करतो. तुम्ही रणगाडेसह चाल करुन दुसीबंदवर ताबा मिळवा.’ त्याचा हा आत्मघातकी निर्णय कोणालाच पटला नव्हता. माघारही घ्यायची नाही. दुसरा पर्याय नाही.

शेकडो तानाजी, संभाजी अंगात संचारलेला पांडुरंग क्रॉलिंग करत, सापासारखा सरपटत खाचखळग्यातून मार्ग काढत दुसीबुंदच्या दिशेने निघाला होता. शत्रूच्या रॉकेट लाँचरवर कब्जा करायचा एकच ध्यास होता. शत्रूची नजर चुकवत चुकवत पांडुरंग उंचावरील अंतर कापत होता. क्रॉलिंगमुळे पोटावर हातापायावर जखमा झालेल्या. भारतीय सेना एवढ्या उंचावर येऊ शकत नाही अशी खात्री असल्यामुळे बलोची गाफील होते. खाली मराठा सैनिक माघार घेण्याच्या हालचाली शत्रूला जाणवत होत्या. पांडुरंग सरपटत सरपटत वरती पोहोचला. संध्याकाळी पावणेसातची वेळ, थकव्यामुळे डोळ्यावर अंधारी येत होती. थंडीतही घशाला कोरड पडलेली. पाण्याचा घोट घ्यायला वेळ नव्हता. एक एक क्षण महत्वाचा होता. पांडुरंगने संध्याकाळच्या संधीप्रकाशातही शत्रूचे रॉकेट लॉंचरची पोस्ट हेरली. शत्रू काही प्रमाणात गाफील असला तरी रॉकेट लाँचरचा ऑपरेटर सावध होता. अंगात होते नव्हते तेवढे बळ एकवटून पांडुरंगने रॉकेट लाँचरधारी बलोची आडदांड पठाण सैनिकावर प्रहार केला. अचानक झालेल्या प्रहाराने बलोच कोसळला. एक क्षणही वाया न घालवता पांडूरंगने रॉकेट लाँचरचा ताबा घेतला. आणि शत्रुच्याच दिशेने बार उडवला. (धडाम धूम) खाली मेजर साहेबांना हा इशारा होता. वर दुसीबुँद चौकीवर एकच खळबळ माजली. दुसीबुद चौकीवर पाक सैन्यानी पांडुरंगला घेरला. जास्त लोकांनी चौकीवर चढाई केली असावी असा त्यांचा समज झाला. म्हणून बलोची पठाणांची धावपळ चालूच होती. याच संधीचा फायदा घेऊन विजयंता रणगाड्यांचा ताफा दुतर्फा धुरळा उडवत, आग ओकत आगेकुच करीत सुसाट निघाला. पांडुरंगने रॉकेट लाँचर खाली फेकले होते. दुसीबुंद चौकीवर पांडुरंगला पाकिस्तानी सैन्यांनी चारही बाजूने घेरले. एकटा पांडुरंग आणि अनेक पाकिस्तानी सैन्य तुंबळ युद्ध चालू होते. इतक्यात छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी दुसीबुद चौकी हादरुन गेली. १५ मराठा बटालियनचे मावळे दुसीबुंदच्या गडावर पोहोचले. दोन्ही सैन्य समोरासमोर, गुत्तम गुत्तीच्या या लढाईत मराठ्यांच्या प्रतिहल्ल्यासमोर कडव्या बलोची पठाणांनी नांगी टाकली. हत्यारे टाकून पाकिस्तानी सैनिक पळाले. कित्येकांना मराठ्यांनी ठार केले. कित्येक पळता पळता रावी नदीत बुडाले. तर सुमारे दोनशे बलोची पठाणांच्या प्रेतांना वीर मराठ्यांनी रावीच्या पात्रात जलसमाधी दिली. शिवाय दोन ट्रक पाकिस्तानी सैन्यांची हत्यारे, दोन RCL गन माऊंट असलेल्या जीप गाड्या ताब्यात घेऊन, पंधरा मराठा जवानांनी एक विक्रमच केला. इकडे पांडुरंग बाळकृष्ण साळुंखे या अवघ्या एकवीस वर्षीय योध्याच्या शरीराची चाळण झाली होती. अखेरची घटका मोजताना मोहिम फत्ते झाल्याच्या आनंदात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून पांडुरंग वीरगतीस प्राप्त झाला.

शहीद पांडुरंग साळूंखे यांच्या शौर्याला महावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सन्माननीय महामहिम राष्ट्रपती यांचे हस्ते हा शौर्य पुरस्कार वीरमाता श्रीमती सुंदराबाई बाळकृष्ण साळुंखे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

तत्कालिन प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी गांधी यांनी मणेराजुरी गावात महावीरचक्र विजेता शहिद पांडुरंग साळूंखे यांच्या घरी जाऊन वीरमाता सुंदराबाई यांच्या गळ्यात पडून त्यांचे सांत्वन केले. आज मणेराजुरीच्या चौकात शहीद पांडुरंग साळूंखे यांचा पुतळा बसविला असून दरवर्षी सहा डिसेंबरला मराठा रेजिमेंटचे अधिकारी मिलीटरी बँडसह संचलनाद्वारे शहीद पांडूरंग साळुंखे यांच्या पुतळ्याला महावीर चक्र घालून मानवंदना दिली जाते.

बेळगावला मराठा रेजिमेंटच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरसुद्धा त्यांचा पुतळा आहे. मणेराजुरी येथील शाळा कॉलेजला सुद्धा शहीद पांडुरंग साळूंखे यांचे नाव दिले आहे. या धनघोर युद्धात पंधरा मराठा बटालियनला बुर्ज बटालियन हा किताब मिळाला, तर बेस्ट बटालियन म्हणून सन्मान ट्रॉफीने पंधरा मराठा लाइट इंफन्ट्रीला गौरविण्यात आले. या लढाईत बटालियनचे अकरा जवान शहीद झाले. मेजर रणवीरसिंगसह पाच जवान जखमी झाले.

एक महावीर चक्र, चार वीरचक्र, तीन सेना मेडल, दोन मेशन इन डिस्पॅच, असा पंधरा मराठा बटालियनचा शौर्याचा इतिहास आहे. पाकिस्तानची सर्वात कडवी समजली जाणारी ४३ बलोच रेजिमेंटचा असा दारुण पराभव मराठ्यांनी केला. त्यामुळे पाकिस्तानने ४३ बलोच रेजिमेंट रद्द केली.

जय हिंद !

संग्रहिका : सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ग्रुपची गंमत… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ग्रुपची गंमत… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

कोणीतरी त्यादिवशी व्हॉट्सअप ग्रुपवर ‘हॅपी बर्थडे अनिल ‘ अशा शुभेच्छा दिल्या. तेव्हा ‘आज अनिल चा वाढदिवस आहे’ हे ग्रृपमधील इतरांना समजले. लगेचच ग्रृपवर शुभेच्छांचा पाऊस सुरू झाला.

प्रत्येकाने त्वरित आपापले कर्तव्य पूर्ण केले. काहींनी मराठीत, काहींनी हिंदीत, काहींनी इंग्रजीत, काहींनी संस्कृतमध्ये तर काहींनी स्टिकर, GIF इत्यादी टाकून शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. काही क्षणातच ग्रुप ला उत्सवाचे वातावरण आले. यापैकी अनेक जणांना तर अनिल तो काळा की गोरा हे ही माहीत नव्हते.

दुपारी त्याच ग्रुपवर बातमी आली की ‘सदानंदच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. लगेच ग्रुपवर दुःखाचा महापूर आला. ‘आर आय पी’ पासून ‘आम्ही सदानंदच्या  दुःखात कसे सहभागी आहोत’ याचे मेसेज येऊन आदळू लागले.

आता मध्येच अनिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात की नाही या संभ्रमात काही सदस्य पडले. पण यातूनही मार्ग निघाला.

जरा वेळाने वाढदिवस असलेल्या अनिलला शुभेच्छा आणि सदानंदच्या वडिलांना श्रद्धांजली असा ऊन – पावसाचा दुहेरी खेळ चालू झाला.

बघता बघता संध्याकाळ झाली आणि अनेकांच्या ‘दिवे लागणीची’ वेळ झाली.

त्यामुळे त्यातल्या एका दिवट्याने चुकून आज दुःखात असलेल्या सदानंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अनिलच्या (हयात असलेल्या) वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

पुढे ज्यांनी नुकताच ग्रुप उघडला होता त्यांनी (नेहमीप्रमाणे मागचे मेसेज न वाचता) आपापली अलौकिक प्रतिभा वापरून वाढदिवस असलेल्या अनिलचे (हयात असलेल्या) वडिलांच्या मृत्यूबद्दल मनापासून सांत्वन केले तर सदानंदला (आजच ज्याचे वडील मयत झाले होते त्याला) ‘हा अतीव आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यात अनेक वर्षे येवो’ असे म्हणत अभिष्टचिंतन आणि निरोगी दीर्घायुष्य चिंतिले.

भरीस भर म्हणून एका महाभागाने अनिलच्या वडिलांच्या मृत्यू करता दुखवट्याचे दोन मिनिटांचे शब्द रेकॉर्ड करून पाठवले, आणि सदस्यांना दोन मिनिटे मौन पाळायची विनंती ही केली.

काहींनी तर सदानंद कडून ‘भावा.. आज पार्टी पाहिजे’ अशी मागणी देखील केली.

सरतेशेवटी त्या संध्याकाळी ‘अनिल’ आणि ‘सदानंद’ दोघेही अचानक ग्रुपमधून लेफ्ट का झाले हे मात्र बऱ्याच जणांना आजतागायत समजलेले नाही. 😂

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 12 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 12 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

काळ अव्याहतपणे चालतच असतो. त्याची पाऊले वाजत नाहीत. पण चाल मात्र जाणवत असते. कालचा दिवस संपून आजचा दिवस उजाडला की काळ पुढे सरकल्याची जाणीव होते. या अक्राळविक्राळ काळाला कवेत घेण्यासाठी माणसाने कालगणना सुरू केली. बारा महिन्यांचे एक वर्ष बनवले आणि काळाची मोजदाद सुरू झाली. एक महिना म्हणजे काळाचे जणू एक पाऊलच. अशी अकरा पावले चालून झाली की काळ बारावे पाऊल टाकतो शेवटच्या महिन्यात आणि वर्ष संपत आल्याची जाणीव होते. हा शेवटचा महिना म्हणजे  डिसेंबर महिना, म्हणजेच  काही दिवस कार्तिकाचे आणि काही दिवस मार्गशीर्षाचे !

दसरा दिवाळी सारखे आनंददायी सण होऊन गेलेले असतात. एकंदरीतच सणांची गडबड संपत आलेली असते. पण सुगीचे दिवस मात्र सुरू झालेले असतात. साखर कारखान्यांसाठी ऊस वाहून नेणा- या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर यांनी रस्ते ताब्यात घेतलेले असतात. त्यातच ऊस पळवणा-या बाल गोपालांच्या टोळ्या आपल्याच नादात असतात. बाजारातही वेगवेगळ्या फळांची रेलचेल असते. हवेतला गारवा वाढू लागलेला असतो. मागच्या वर्षीची थंडी, यंदाची थंडी अशा थंडीच्या गप्पा मारण्यासाठी मात्र शेकोटीची आवश्यकता वाटत असते. हुरडा पार्टी  रंगात आलेल्या असतात.उबदार कपड्यांना आणि गोधडी, वाकळ यांना बरे दिवस आलेले असतात. झाडांची पाने गळून ती मात्र ओकीबोकी दिसू लागतात. अशा या गोठवणार-या थंडीत दूर कुठेतरी भजनाचे स्वर ऐकू येतात आणि लक्षात येते, अरे, दत्तजयंती आली वाटते. खेड्यापासून शहरापर्यंत श्रद्धेने साजरी होणारी दत्त जयंती एक नवा उत्साह निर्माण करते. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या नियमांची जाणीव करून देते. याच मार्गशिर्ष महिन्यात श्रीदत्तगुरूंचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचाही जन्मदिन असतो. शिवाय भगवान पार्श्वनाथ आणि गुरू गोविंदसिंह यांचा जन्मदिवसही याच महिन्यातील.

मार्गशिर्ष शुद्ध एकादशी या दिवशी  गीता जयंती असते.

त्या दरम्यानच येतो तो नाताळचा सण. येशू ख्रिस्ताचा प्रकटदिन. प्रार्थनामंदिरे आणि परिसर सुशोभित झालेला असतो. छोट्या छोट्या झोपड्या, येशूचा जन्म सोहळा हे सगळे देखावे  लक्ष वेधून घेत असतात. बच्चे मंडळीचे लक्ष असते ते मात्र सांताक्लाॅजकडून मिळणा-या गिफ्टवर.

असा हा डिसेंबर किंवा मार्गशिर्ष महिना विविध धर्मातील भक्तांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे.

याशिवाय थोर गणिती श्रीनिवास रामानुजन्, पू.साने गुरुजी आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणारे मोहम्मद रफ़ी यांचा जन्मही याच महिन्यात झाला आहे.

सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महपरिनिर्वाण दिन. कोल्हापूरच्या छत्रपती ताराराणी, भारतीय संस्कृत कोशाचे जनक पं. महादेवशास्त्री जोशी, क्रांतिसिंह नाना पाटील आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचा स्मृतिदिन याच महिन्यात असतो. याच मार्गशिर्ष महिन्यात मोरया गोसावी, श्री

गोंदवलेकर महाराज आणि संत गाडगेबाबा या संतांची अवतार समाप्ती झाली.

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी डिसेंबर महिन्यात घडल्या आहेत. त्यामुळे त्यांचेही स्मरण वेगवेगळ्या स्वरूपात केले जाते. एक डिसेंबर हा एडस् निर्मुलन दिन आणि तीन डिसेंबर हा अपंग दिन म्हणून जागतिक स्तरावर पाळला जातो. चार डिसेंबर हा भारतीय नौदल दिन आहे. पाच डिसेंबर जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. आठ डिसेंबर 1985ला सार्क परिषदेची स्थापना झाली. दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिन आहे. 1946 साली अकरा डिसेंबरला युनिसेफची स्थापना झाली. बारा डिसेंबर हा दिवस हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मरणार्थ स्वदेशी दिन म्हणून पाळला जातो. सतरा डिसेंबर पेन्शनर्स डे आहे. 1961 साली एकोणीस डिसेंबरला दीव,दमण आणि गोवा यांना स्वातंत्र्य मिळाले व हे प्रदेश भारताचा अविभाज्य भाग बनले. तेवीस डिसेंबर हा किसान दिन व चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन आहे. 1945 साली सत्तावीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना झाली. तीस डिसेंबर 1906 ला मुस्लिम लीग ची स्थापना झाली होती. एकतीस डिसेंबर हा दिवस परिवार एकता दिन म्हणून साजरा केला जातो.   

मार्गशिर्ष म्हणजे धनुर्मास. मार्गशिर्ष म्हणजे सूर्याच्या उत्तरायणाचा मास. याच मासात असते शाकंभरी नवरात्र. मार्गशिर्ष म्हणजे शिशिर ऋतूचे आगमन. काही वेळेला डिसेंबरच्या शेवटी शेवटी मार्गशिर्ष संपून पौषमासाची सुरुवातही झालेली असते.

अशा विविध घटनांची नोंद घेत सण, उत्सव साजरे होत असतानाच सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नव वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू होते. गत वर्षाचा हिशोब मनात मांडत असतानाच आपण सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. आंतरराष्ट्रीय नवे वर्ष सुरू होत असते. आपणही त्यात सामील होत असतो. नव्या वर्षाचे संकल्प मनात सुरू झालेले असतात. ते सिद्धीस नेणे आपल्याच हातात असते. जुन्या परंपरा आणि नव्या कल्पना यांचा सुंदर मेळ घालून आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी  सरत्या   गेल्या वर्षाला बाय बाय करत नव्या वर्षात पाऊल टाकायचे आणि नवी आव्हाने स्वीकारायची. काळाचा हात धरून त्याच्या पावलाबरोबर चालायचे हे तर ठरलेलंच. महिनाअखेरचं पान म्हणता म्हणता वर्षाअखेरच पान आलं. चला स्वागत करूया नव्या वर्षाचं. नव वर्षाच्या शुभेच्छा देत चला एक नवा प्रवास सुरू करूया  !

कॅलेंडरची बारा पाने

पाहता पाहता संपून गेली

किती कटू-गोड आठवणी

मनामध्ये  साठवून  गेली

नवे दिवस येत राहतील

नवे किरण घेऊन येतील

नवे क्षण फुलत राहतील

नवी स्वप्ने घेऊन येतील

नवे जुने सारे काही

बरोबर घेऊन जायचे आहे

फूल सहज फुलावे तसे

जीवन हे फुलवायचे आहे.

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मात… भाग – 5 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मात… भाग – 5 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वसूत्र: अक्षय शालिनीला शाळेची नोकरी सोडून पांड्याजींची सेक्रेटरी व्हायला सांगतो. गरजेच्या वेळी ते मदत करतील, असंही सांगतो…. आता पुढे….)

आणि मग पुन्हा मासा गळाला लागला. ती सेक्रेटरी झाली.

हेही सांगितलं पाहिजे की माझ्या आग्रहावरून तिने आधीच तिचे लांब केस कापले होते. खूप प्रयत्नांनंतर ती स्लीव्हलेस ब्लाऊझ आणि हाय हिल सॅन्डल्स घालायला लागली होती. शेवटी तिचं रूपयौवन कोणाच्या खुशीसाठी होतं? माझ्याच ना? आता सगळेच खूश राहतील. मीही आणि पांड्याजीही.

दोन-चार दिवस सगळं व्यवस्थित चाललं. मी श्वास रोखून ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो, तो आला एकदाचा.

माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शालिनी ओक्साबोक्सी रडू लागली. पांड्याच्या गलिच्छ वागण्याने ती एवढी वैतागली होती, की मरण्यामारण्याच्या गोष्टी करू लागली. कितीतरी वेळ ती बोलत होती आणि मी ऐकत होतो.

किती मागासलेले संस्कार! आजकालच्या मुली एवढ्या बोल्ड आणि बिनधास्त असतात आणि माझ्या नशिबात साली ही काकूबाई लिहिलीय. कोणी नुसता स्पर्श केला, तरी कलंकित होणारी. माय फूट!

किती वेळ मी तिचं पावित्र्यावरचं लेक्चर ऐकत बसणार? शेवटी बोललोच, ” जराशी तडजोड करून जर आपलं आयुष्य सुधारणार असेल, तर काय हरकत आहे? जरा थंड डोक्याने विचार कर, शीलू. आपल्याला पांड्याची गरज आहे. त्याला आपली गरज नाहीय. या बारीकसारीक गोष्टींनी असा काय फरक पडतोय? “

ती विदीर्ण नजरेने बराच वेळ माझ्याकडे बघत राहिली. मग दाटलेल्या कंठाने बोलली, ” हो. काय फरक पडतोय!”

तिची नजर, तिचा स्वर यामुळे मी अस्वस्थ झालो. तरीही हसून बोलणार, तेवढ्यात तीच म्हणाली, “तू चांगले दिवस यायची किती वाट बघितलीस! आता येतील ते. असंच ना?”

माझ्या मनातलं तिच्या तोंडून ऐकल्यावर मी झेलपाटलोच. तरी स्वतःला सावरत म्हटलं, ” मला असं नव्हतं म्हणायचं, शीलू. तुझं सुख….. “

मला अर्ध्यावरच तोडत ती म्हणाली, “काही गोष्टी न बोलताही समजतात, अक्षय. तर पैशासाठी मी एखाद्या म्हाताऱ्याला गटवायचं, हेच ना?”

आता तुम्हीच सांगा, इतक्या दिवसांच्या प्रेमाची हिने अशी परतफेड करावी? प्रेम असं निभावतात? स्वार्थी!विश्वासघातकी बाई! जीवनाच्या वाटेवर चालताचालता मध्येच माझा हात सोडून दिला. शेवटी मीही तिचाच होतो ना? काय म्हणालात? मीच हात दाखवून अवलक्षण…..

आता काय सांगू? तिने माझ्या बापाशी लग्न केलं. आज ती माझी आई आहे. आणि माझ्या बापाला बोटांवर नाचवतेय. आत्ताच्या माझ्या या दशेला तीच कारणीभूत आहे. विश्वास नाही बसत?

– समाप्त –

मूळ हिंदी  कथा – सुश्री भावना  

भावानुवाद –  सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उतारवय आनंदात घालवायचे असेल तर — … लेखक – श्री विश्वास नागरे पाटील ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ उतारवय आनंदात घालवायचे असेल तर — लेखक – श्री विश्वास नागरे पाटील ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

वयाच्या ४५/ ५५/ ६५नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर…. त्यासाठी १२ नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील.—- हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. 

१) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत, त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते. 

धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल प्रुफ’असो. त्यामुळे कदाचित तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामुळे या वयात गुंतवणूक करू नये.

२)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजिबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात. 

3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवढाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासारखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.

४) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तू व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एक जण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून एन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा एन्जॉय करणे कठीण असते. 

५) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणाऱ्या आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे भूतकाळातील वाईट आठवणींमुळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील.

६) तुमचे वय काहीही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य, यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो. 

७) स्वतःविषयी अभिमान बाळगा. तो अंतरबाह्य असू दे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, परफ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे नीटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.

 ८) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुशाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल. 

९) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्किंग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचित तुमचे जुने मित्र किंवा मैत्रिणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे. 

१0) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचित तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागितले तरच. उगीचच्या उगीच त्यांचेवर टीका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला. 

११) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजिबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामुळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा. 

१२) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्वीकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामुळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा, दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात..

लेखक –  श्री विश्वास नागरे पाटील

प्रस्तुती : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दत्त जन्माची कथा… लेखिका – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दत्त जन्माची कथा… लेखिका – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

राजा रविवर्मा प्रेसचे ‘श्री दत्त जन्मा’चे दुर्मिळ चित्र नजरेस पडले. एका चित्रात संपूर्ण दत्त जन्माची कथा सामावली आहे.  कशी ते बघा ! ——

अनसूयेच्या सत्त्वाची परीक्षा पाहायला त्रिदेवींनी आपले नवरे पाठवले. तिने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर तीनही देवांना बाळं करून इच्छाभोजन दिले. त्यामुळे अनसूयेचे सत्त्व राखले गेले, अतिथी धर्म पाळला गेला आणि मातृत्व लाभले. मात्र आपली खेळी आपल्यावर उलटल्याचे पाहून त्रिदेवी अनसूयेला शरण आल्या आणि ‘आमचे पती आम्हाला परत कर ‘ म्हणाल्या. तेव्हा, ‘ घेऊन जा तुम्ही तुमचा पती ‘, हे अनसूया माता सांगत असतानाचा हा चितारलेला क्षण !

असूया शून्य अनसूया, अशी सत्त्वशील अनसूयेचे देहबोली. ऋषीपत्नी म्हणून श्वेत वस्त्र नेसलेल्या अनसूयेच्या चेहऱ्यावर तीनही बाळांना जोजवून झाल्यानंतरचा मातृत्वाचा संतुष्ट भाव खुलून दिसतोय. जगाचा ताप हरण करणारे त्रिदेव बालरुपात आल्यावर निश्चिन्तपणे झोपी गेलेत. आई जवळ असताना कसली काळजी? बरीच वर्षं वाट पाहूनही जे सुख हुलकावणी देत होते, ते सुख तिपटीने पदरात पडल्याचा सोहळा अनसूयेने सुंदर पाळणा बांधून आणि सजावट करून साजरा केला आहे. अत्री ऋषींचा आश्रम असल्याने पायाशी व्याघ्रजीन अंथरले आहे आणि या तीन विश्वसुंदऱ्या आपल्या फजितीने खजील होऊन, आपला नवरा कोणता, हे ओळखण्यात मग्न आहेत. 

पाठमोरी उभी असलेली भरजरी वस्त्र परिधान केलेली अलंकारमंडित लक्ष्मी असावी. बाजूने डोकावणारी लाल साडीतली सावित्री आणि हात दुमडून कुतूहलाने पाहणारी पार्वती असावी. सुखी संसाराचे तेज, सौष्ठव तिघींच्या हातावरून आणि गौरवर्णावरून दिसतेय. एवढे सगळे सुख असूनही अनसूया मातेसमोर तिघी निस्तेज झाल्या आहेत.

तिघी आपापल्या जागी श्रेष्ठ, तरी त्यांना आपल्यापेक्षा कोणी वरचढ असेल ही कल्पना सहन न झाल्याने त्यांनी पतीला तिचे शीलहरण करण्यासाठी पाठवले. त्रिदेवांना अनुसूयेचे सामर्थ्य माहीत होते, पण या तिघींचे गर्वहरण करण्यासाठी तिघांनी जोखीम पत्करली आणि अत्री ऋषी स्नानाला गेल्याची वेळ साधून, वेषांतर करून, ‘आई, इच्छाभोजन  दे, पण विवस्त्र होऊन !  अशी मागणी केली. ‘आई’ अशी हाक ऐकल्याने अनुसूयेला वात्सल्याचा पान्हा फुटला. तिघांना बालरूप केले. भोजन दिले आणि पाळण्यात जोजवले. 

बाळं सगळीच गोड, गोंडस आणि एकसारखी. आपला पती नक्की कोणता, हे ओळखता न आल्याने तिघींनी शरणागती पत्करली आणि अनुसयामातेने तीनही देवांना पूर्ववत केले. तिचा पाळणा मात्र रिकामा झाला. अत्री ऋषी परत आल्यावर त्यांना हकीकत कळली. त्रिदेवांनी सपत्नीक उभयतांची क्षमा मागितली आणि आम्ही तुमच्याच पोटी जन्माला येऊ असे आश्वासन दिले. तो आशीर्वाद फळास आला आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे त्रिदेव दुर्वास ऋषी, दत्त गुरु आणि चंद्र अशा त्रिगुणात्मक रुपात प्रगट झाले. 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!

फोटो सौजन्य : श्री दीनानाथ दलाल

लेखिका  – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ (आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 2 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? विविधा ?

(आपण) लोक सिरियल्स का बघतात (बघतो)? – भाग 2 ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

(आणि हल्ली परत परत नव्याने त्यांच्या नवीन आवृत्त्या निघत असतात. पण त्या नव्या बघितल्यावर मात्र त्या जुन्या कितीतरी चांगल्या होत्या, असं म्हणायची वेळ येते!  पुढे चालू…)

आता आणखी नवीन प्रकार म्हणजे, वेब सिरियल्स आणि ओटीटी यांचीही भर पडलेली आहे, करमणूक क्षेत्रात. बहुतेक तरुण पिढीतले लोक यातल्या इंग्लिश, हिंदी सिरियल्स बघत असतात. या तरुण पिढीला रहस्यमय, थरारक काहीतरी बघायला आवडते. रोजच्या रुटीनमुळे वैतागून गेलेले असताना त्यांना या मालिका बघायला आवडणं स्वाभाविक आहे. आणि टी. व्ही. वरच्यासारखा जाहिरातींचा व्यत्यय पण नसतो ओटीटी वर. आम्ही पण मध्यंतरी ओटीटी वर ‘बंदिश बॅन्डीट’ ही सिरीयल पाहिली होती. खरोखरच सुरेख होती, आणि दहाच भागात संपवल्यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता टिकून होती. शास्त्रीय संगीताच्या एका घराण्याची कहाणी दाखवलेली होती यात. सध्या ‘God Freinded Me’ ही मालिका बघतोय. अर्थातच, अमेरिकेत घडणारी. त्यात एका तरुण आफ्रिकन अमेरिकन मुलाला फेसबुक वर देवाची फ्रेंड रिक्वेस्ट येते, हा मुलगा असतो नास्तिक, त्याचे वडील एका चर्चमधे रेव्हरंड असतात. तो ही रिक्वेस्ट बघून गडबडून जातो, ती स्वीकारावी की नाही, अशा गोंधळात पडतो. पण त्याचा मित्र असतो एक भारतीय मुलगा. तो त्याला ती स्विकारायला तयार करतो. आणि मग या ‘गॉड अकाउंट’ वरून त्याला एकेक फ्रेंड रिक्वेस्ट येत रहातात. आणि कर्म धर्म संयोगाने ते लोक याला भेटतात, आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्यातले काहीतरी प्रॉब्लेम सोडवायला हे दोघे मित्र त्यांना मदत करतात. याच प्रवासात त्याला एक मैत्रीण पण मिळते. प्रत्येक गोष्ट वेगळी. प्रत्येक एपिसोडमधे एकेक गोष्ट. प्रत्येकाचा वेगळा प्रॉब्लेम. बघताना आपण रंगून जातो अगदी! अजिबात कंटाळा येत नाही. अशा काही वेगळ्या थीमवर आपल्याकडच्या लोकांना का मालिका बनवता येऊ नयेत? आपले काही मराठी तरुण हल्ली खूप वेगळे विषय घेऊन चित्रपट काढतात. मग मालिका का नाही?

सध्या चालू असलेल्या काही मराठी मालिका, उदा. ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘सुंदरा मनामधे भरली’ यात थोडा वेगळा विषय जोडलेला आहे, नेहमीच्या कौटुंबिक मालिकेला, पण यातही नायक नायिकेची अती छळणूक चालूच आहे! काय होतं, एका ठराविक वेळेला ते बघायची आपल्याला सवय लागलेली असते, आणि मग, ‘धरलं तर चावतं, आणि सोडलं तर पळतं’ अशी गत झाल्यामुळे आपल्याला ते बघवतही नाही, आणि सोडवतही नाही! असे आपण त्या मालिकेच्या जाळ्यात अडकतो आणि त्यांना TRP मिळत राहिल्याने, तेही मालिका बंद न करता, कथानकात पाणी घालून वाढवत रहातात! असं हे एक दुष्टचक्र आहे!  अशीच एक हिंदी मालिका, ‘बॅरिस्टर बाबू’ नावाची. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातली. बंगालमधे घडणारी, त्यात इंग्लंड मधे शिकून, बॅरिस्टर बनून आलेला एक तरुण एका सात आठ वर्षाच्या मुलीला, म्हाताऱ्या माणसाशी होत असलेल्या लग्नातून वाचवायला जातो आणि त्याच्यावर नाईलाजाने तिच्याशी लग्न करायची वेळ येते. आणि मग त्याच्या जमीनदार कुटुंबातून त्या लग्नाला विरोध, त्या छोट्या मुलीला येणाऱ्या अडचणींमधून तिला वाचवण्याची त्याची धडपड अशी खूप छान सुरुवात केली होती. पण ही पण मालिका भरकटत जाऊन आजही तिचं दळण चालूच आहे!

या मालिकांशिवाय वेगवेगळ्या चॅनल्सवर ‘रिअॅलिटी शो’ पण चालू असतात अधून मधून. हे शो पण जेंव्हा चालू झाले, तेंव्हा खरे वाटायचे. गाण्याच्या कार्यक्रमात गाण्यालाच महत्व असायचं. परीक्षक नामवंत गायक, संगीतकार आणि स्पर्धकही चांगले गाणारे असायचे. खूप चांगली जुनी, क्लासिकल गाणी ऐकायला मिळायची. हे कार्यक्रम खूप आनंद द्यायचे. नृत्याचे असे स्पर्धात्मक कार्यक्रमही चांगले असायचे. पण आताशा गायनाच्या परिक्षकात सिनेमात कोरिओग्राफी करणारे, काव्य लिहिणारे, आणि नृत्याचे परीक्षक म्हणून लेखक असा सगळा विचित्र मामला सुरु झालेला आहे! आणि स्पर्धकांच्या गाण्यापेक्षा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर जास्त फोकस, स्पर्धकांच्या किंवा परीक्षकांच्या खोट्या नाट्या प्रेमकहाण्या रंगवणं यातच अधिक वेळ घालवणं, एखाद्या स्पर्धकाच्या गरिबीचा तमाशा मांडणं हेच सुरु झालेलं आहे. या मागे त्यांची काय कारणं असतात, ते त्याचं त्यांना माहीत! पण गाण्याची आवड असलेल्यांचा मात्र रसभंग होतो आणि त्या कार्यक्रमातला इंटरेस्ट कमी होतो, हे कळत नाही का या लोकांना? पूर्वी या कार्यक्रमात परीक्षकांकडून स्पर्धकांना त्यांच्या काय चुका होताहेत, काय सुधारणा करता येतील, हे सांगितलं जायचं. आणि काही परीक्षक तर त्या स्पर्धकांचा आत्मविश्वासच खच्ची होईल, इतकी नावं ठेवत असत त्यांच्या गाण्याला. हे अर्थात चुकीचंच होतं, पण हल्ली त्याच्या उलट, प्रत्येक स्पर्धकाची वारेमाप स्तुती करत असतात परीक्षक! आणि त्या स्पर्धकांपुढे काही आव्हानं ठेवण्याची पद्धतही बंदच केलेली आहे. प्रत्येक जण आपला जो ठराविक प्रकार किंवा शैली हातखंडा आहे, त्यातलीच गाणी प्रत्येक वेळी सदर करून वाहवा मिळवत असतो. सगळ्यांनी सगळे प्रकार सादर करावेत म्हणजे त्यांची खरी गुणवत्ता पारखली जाऊ शकते. या सगळ्या गोष्टींमुळे एखादा सवंग मनोरंजनाचा प्रकार असं स्वरुप आलेलं आहे या कार्यक्रमांना! 

त्याचमुळे हल्ली टी. व्ही. पेक्षा OTT वरचे कार्यक्रमच अधिक पहावेसे वाटतात. अजून तरी ते दर्जेदार असतात आणि भरकटण्याआधीच संपवले जातात. टी. व्ही. वाल्यांनी याची दखल घेतली नाही, तर त्यांची अधोगती आणि विनाश अटळ आहे!

– समाप्त –

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नात्यांचा प्राजक्त…” – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “नात्यांचा प्राजक्त…” – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

दिवसातून एकदा तरी आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत जा  .. माध्यम कोणतेही असो doesn’t matter..संवाद महत्वाचा जो तुमच्यातली ओढ कायम ठेवतो.. आपण नाकारले तरी fact ही आहे की आपण सतत कोणावर तरी विसंबून असतो, आपल्याही नकळत.

आम्ही खूप घरे बदलली. एका घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड होते..रात्री त्याची फुले ओघळायला सुरवात व्हायची ती अगदी पहाटेपर्यंत तो सोहळा चालायचा. परीक्षेचे दिवस असले की मी रात्री जागून अभ्यास करायचे..दिवसा कॉलेज आणि नोकरीमुळे अभ्यास करणे शक्य नव्हते.. रात्री मी अभ्यासाला बसले की खिडकीजवळ बसायचे. खिडकीतून तो प्राजक्त मला दिसायचा, त्याची एक फांदी त्या खिडकीजवळ आली होती. त्याच्या फुलांच्या मंद सुवासाने मन एकदम फ्रेश व्हायचे आणि अभ्यासाला मूड लागायचा. हळूहळू मला त्या झाडाची सोबत वाटायला लागली. कधीकधी ते माझ्याशी काही बोलू पाहते आहे असे मला वाटायचे.. मग मी खिडकीत आलेल्या त्याच्या फांदीवरून हात फिरवायचे तेव्हा तो सळसळायचा. मी त्याची फुले गोळा करायचे. देवातल्या कृष्णाला वाहायचे. कधी कानातल्यासारखे कानातही घालायचे. त्याची माझी छान दोस्ती जमली आणि हळूहळू आमच्या गप्पा सुरू झाल्या..मी रोज खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलायचे. त्याला किती कळत होते नाही माहीत, पण तो आपल्या फांद्या हलवून, कधी पाने नाचवून, तर कधी सतत फुले ओघळवून प्रतिसाद द्यायचा. एखाद्या दिवशी मला बोलायला नाही जमले तर त्या दिवशी त्याचा फुलांचा सडा कमी दिसायचा.. माझे डोळे भरून यायचे..शेवटी आम्ही भाडेकरू होतो..कधी न कधी आम्हाला तिथून दुसरीकडे राहायला जावे लागणार होते..तेव्हा काय होईल त्याचे आणि माझेही ? असा मला प्रश्न पडायचा. मलाही त्याची, त्याच्याशी बोलायची सवय झाली होती. …. 

काही दिवसानी आम्हाला ते घर सोडावे लागले. मी त्याला सांगितले त्यानंतरचे दोन दिवस तोही मलूल वाटत होता..ना त्याने मला पाहून फुले बरसवली..ना पानांची सळसळ केली .. काही दिवसानी अखेर तिथून दुसरीकडे जाण्याचा दिवस उजाडला.. मला तर त्याच्याकडे बघवेना.. तरी मनाचा हिय्या करून मी त्याच्याजवळ गेले, त्याच्या खोडाला मिठी मारली आणि ओक्साबोक्षी रडून घेतलं.. डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला फुलांचा सडा पडला होता..मी त्यातली काही फुलं ओंजळीत घेतली. त्यांचा हलका वास घेऊन माझ्या रुमालात ठेवली..आणि नकळत त्याला हात जोडून मी तिथून निघाले.. 

काही दिवसांनी कळले..तो प्राजक्त आहे.. पण ती खिडकीजवळची फांदी मात्र सुकून गेली.. 

आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत रहा.. माहिती नाही कधी नात्याचा प्राजक्त सुकेल..

काय ? पटतयं का ?

लेखिका : सुश्री सुधा मूर्ती  

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऐब —(षडरिपु)☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ऐब —(षडरिपु)☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष….. यांनाच षडरिपु म्हणतात. 

—-फार्सी भाषेत यांना ऐब म्हणतात.

 

हे सहा ऐब ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात, त्याला साहेब म्हणतात…..  

या सहा दोषांना सहज धारण करणाऱ्यास साधारण म्हणतात….  

या सहांना मान्य करणाऱ्यास सामान्य म्हणतात…..  

या सहांना आपल्या धाकात ठेवणाऱ्यास साधक म्हणतात….  

या सहांना अधू करणाऱ्यास साधू म्हणतात…..  

या सहांचा संपूर्ण अंत करणाऱ्यास संत म्हणतात…..  

आणि या सहांचा अर्थ नीट समजून घेऊन जो स्वतःची आत्मोन्नती करतो त्याला समर्थ म्हणतात….  

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares