मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆एका ‘निरा’ ची गोष्ट… शब्दांकन – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ एका ‘निरा’ ची गोष्ट… शब्दांकन – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास एका कुटुंबाच्या भोवती जाणूनबुजून केंद्रित केला गेला. भारताच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींना इतिहासाच्या पानात जाणूनबुजून लुप्त केलं गेलं. आज जेव्हा त्याच कुटुंबांची पुढची पिढी तो इतिहास न वाचता बेताल वक्तव्य करते तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते. ब्रिटिश काळात काळ्या पाण्याची शिक्षा काय असते हे माहित नसलेले अनेक जण त्याबद्दल आपल्या अकलेचे तारे तोडत असतात. त्याच अंदमान च्या काळोखी भिंतीत इतिहासाचं एक पान लुप्त केलं गेलं ज्याबद्दल आजही भारतीयांना काहीच माहित नाही. ही गोष्ट आहे एका निरा ची. जिने अपरिमित यातना भोगताना पण देशाशी गद्दारी केली नाही. ही गोष्ट आहे एका निराची जिने देशासाठी आपल्या पतीचे प्राण घ्यायला पण मागेपुढे बघितलं नाही. ही गोष्ट आहे एका निराची जिने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही पण स्वातंत्र्य भारतात तिच्यावर अक्षरशः झोपडीत राहण्याची वेळ आणली गेली. कारण इतिहासाची अशीच कित्येक सोनेरी पाने एका कुटुंबासाठी जाणून बुजून लुप्त करण्यात आली. 

गोष्ट सुरु होते ५ मार्च १९०२ साली जेव्हा उत्तर प्रदेशातील भागपत जिल्ह्यात निरा आर्या यांचा जन्म झाला. एका सुखवस्तू कुटुंबात जन्माला आलेल्या निरा यांच शिक्षण कोलकत्ता इकडे झालं. लहानपणापासून त्यांच्यात देशभक्ती भिनलेली होती. देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायलाही त्या तयार होत्या. शालेय शिक्षण झाल्यावर देशप्रेमाचे वेड त्यांना स्वस्थ बसू देईना. त्याच ओढीतून त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील झाशीच्या राणी  रेजिमेंट मधे प्रवेश केला. नेताजींनी त्यांच्यावर सरस्वती राजामणी यांच्या सोबत हेरगिरी करण्याची जबाबदारी दिली. त्या देशाच्या पहिल्या गुप्तहेर सैनिक बनल्या. मुलगी बनून तर कधी पुरुष बनून ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश मिलिट्री कॅम्प मधील गोष्टी त्या आझाद हिंद सेनेला पुरवत राहिल्या. घरच्यांना कळू न देता त्यांच देशकार्य सुरु होतं. 

त्यांच्या या गुप्तहेर कार्याची माहिती नसलेल्या घरच्यांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठित अश्या एका ब्रिटिश सेनेतील ऑफिसरशी त्यांचं लग्न जमवलं. त्या ऑफिसरचं नावं  होतं श्रीकांत जय राजन दास. लग्नाचे सोनेरी दिवस सरले तसे त्यांच्या आणि त्यांच्या नवऱ्याच्या विचारांमधील दरी वाढायला लागली. श्रीकांत दास यांना निराच्या वेगळ्या रूपाबद्दल कल्पना आली. निरा ब्रिटिश सत्तेविरुद्ध हेरगिरी करून आझाद हिंद सेनेची मदत करत आहे हे समजल्यावर त्यांनी तिला नेताजींबद्दल विचारण्यास सुरुवात केली. नेताजींचा ठावठिकाणा सांगण्यासाठी तिच्यावर प्रत्येक प्रकारे जबरदस्ती केली पण निरा कशाला दबली नाही. उलट तिने अजून वेगाने स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं. एके दिवशी महत्वाची माहिती नेताजींना कळवण्यासाठी एका गुप्त भेटीसाठी निरा निघाली असताना याची माहिती ब्रिटिश अधिकारी श्रीकांत यांना लागली. त्यांनी गुपचूप तिचा पाठलाग केला. नेताजींसोबत भेट होत असताना श्रीकांत यांनी नेताजींच्या दिशेने गोळी झाडली. पण ती गोळी नेताजींच्या ड्रायव्हरला लागली. पुढे काय होणार याचा अंदाज निराला आला. एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या जवळ असलेल्या चाकूने तिने आपल्या जोडीदाराचा म्हणजे श्रीकांत दास यांचा कोथळा बाहेर काढला. श्रीकांतचा जीव घेऊन तिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीव वाचवला. 

एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी ब्रिटिश सरकारने निरा आर्याला काळ्या पाण्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेसाठी सेल्युलर जेल,अंदमान इकडे पाठवलं. इकडे सुरु झाला एक अत्याचाराचा न संपणारा प्रवास. हाड गोठवणाऱ्या थंडीत छोट्याश्या कारागृहात त्यांच्यावर रोज अत्याचार करण्यात येत होते. साखळदंडात अडकवलेल्या हातापायांच्या बेड्यांनी चामडी सोलून हाड घासत होती. पण ब्रिटिशांचे अत्याचार संपत नव्हते. एक दिवस जेलरने त्यांच्याकडे ऑफर दिली की जर तुम्ही नेताजींचा ठावठिकाणा सांगितला तर तुला आम्ही या जाचातून मुक्त करू. पण यावर निराने एकही शब्द बोलण्यास नकार दिला. नेताजी कुठे असतील तर ते माझ्या हृदयात आहेत. या उत्तराने चवताळलेल्या त्या जेलरने तिचे कपडे फाडले. तिथल्या लोहाराला बोलावून चिमटीने निराचा उजवा स्तन कापायचा आदेश दिला. त्या लोहाराने क्षणाचा विलंब न करता निरा आर्या यांचा उजवा स्तन कापला. पुन्हा मला उलट बोललीस तर तुझा डावा स्तन ही धडावेगळा करेन.  पण त्यावरही निरा यांनी नेताजींचा ठावठिकाणा किंवा त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलण्यास नकार दिला. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंदमान कारागृहातून त्यांची मुक्तता करण्यात आली. चुकीचा इतिहास सांगणाऱ्या लोकांनी पद्धतशीरपणे निरा आर्या यांचं बलिदान इतिहासाच्या पानात लुप्त केलं. देशासाठी स्वतःच्या जोडीदाराचा खून करणारी आणि वेळप्रसंगी स्वतःच्या स्तनाचं बलिदान करणारी रणरागिणी भारतीयांच्या नजरेत पुन्हा कधीच आली नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत सरकारी जमिनीवर उभ्या केलेल्या एका अनधिकृत झोपडीत त्यांनी हैद्राबादच्या रस्त्यांवर फुलं विकत आपलं आयुष्य काढलं. देशासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देणारी निरा आर्या  २६ जुलै १९९८ रोजी अनंतात विलीन झाली. सरकारने त्यांची ती झोपडी पण बुलडोझर चालवून जमीनदोस्त केली. त्यांचा साधा सन्मान करण्याची मानसिकता गेल्या ७५ वर्षात भारत सरकार दाखवू शकलेलं नाही हा एक भारतीय म्हणून आपला पराजय आहे. इकडे टुकार चित्रपटात काम करणारे हिरो आणि तळवे चाटणारी लोकं जेव्हा पद्म पुरस्काराचे मानकरी ठरतात, तेव्हा इतिहासाच्या पानात लुप्त झालेल्या अश्या अनेक अनाम वीरांचा सन्मान करायला आपण आजही विसरतो आहोत याची जाणीव होते. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले काही वाचाळवीर राजकारणी जेव्हा अंदमानमधल्या सेल्युलर जेल, तिथल्या शिक्षेबद्दल बेताल वक्तव्य करतात, तेव्हा त्यांना सांगावसं वाटतं, ज्या स्तनातून दूध पिऊन तुम्ही या जगात आलात त्या स्तनाला स्त्रीच्या शरीरापासून वेगळं करताना काय यातना झाल्या असतील याचा थोडा विचार करा. 

धन्य तो भारत ज्यात निरा आर्यासारख्या स्त्रिया जन्माला आल्या. धन्य ते नेताजी ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणापलीकडे जीव देणारी अशी लोकं आणि आझाद हिंद सेना उभी केली. धन्य ती आझाद हिंद सेना ज्या सेनेत निरा आर्यासारख्या सैनिकांनी आपलं योगदान दिलं. फक्त करंटे आम्ही ज्यांना चुकीचा इतिहास शिकवला गेला. करंटे आम्ही, ज्यांनी ७५ वर्षात अश्या लोकांची कदर केली नाही. करंटे आम्ही ज्यांना भारताचा स्वातंत्र्य लढा कधी समजलाच नाही… 

निरा आर्या यांचा जीवनपट उलगडणारा एक चित्रपट येतो आहे. अर्थात त्यात कितपत खऱ्या गोष्टी दाखवल्या जातील याबद्दल शंका आहे. पण भारताच्या या पहिल्या गुप्तहेर निरा आर्या यांना माझा साष्टांग दंडवत. एक कडक सॅल्यूट…. 

जय हिंद!!!

शब्दांकन श्री विनीत वर्तक   

(फोटो शोध सौजन्य :- गुगल )

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अपघात आणि सुरक्षा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “अपघात आणि सुरक्षा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काही  दिवसांपूर्वी यवतमाळला मन सुन्न करणारी घटना घडली. यवतमाळातील सुप्रसिद्ध गायनिक डॉक्टर सुरेखा बरलोटा ह्यांच अतिशय दुर्दैवी अपघाती दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. सुरेखा ह्यांच्या निधनानं यवतमाळातील एक सुविद्य, निष्णात डॉ. तर आपण गमावलाच पण त्याचबरोबर निष्णात मऩोविकारतज्ञ डॉ. पियुष बरलोटा ह्यांना त्यांच्या सेवाभावी कार्यात भक्कम साथ देणारी सहधर्मचारिणी आणि दोन उमलत्या वयांतील मुलांची आई गमावल्या गेली.

सगळं गेलेलं परत पुन्हा मिळू शकतं परंतु आपली गमावलेली व्यक्ती मात्र परत कधीच हाती येत नाही.

आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचे घडलेले अपघात हे आपल्याला हादरवून तर सोडतातच परंतु खूप विचारात देखील पाडतात.

सगळ्यात पहिला मुद्दा स्वरक्षण,स्वतःची काळजी घेण्याचा. ह्या अपघाती घटनांवरुन एक लक्षात येतं सुविद्य, समजदार व्यक्ती सुद्धा प्रवास करतांना घ्याव्या लागणा-या आवश्यक खबरदा-यांमध्येही बेफिकीरी,लापरवाही करतात आणि हीच गोष्ट कदाचित आपल्या स्वतःच्या जीवावर बेतते. बरेचवेळा आपल्या कामाच्या घाईने म्हणा वा एक प्रकारच्या वेगाच्या धुंदीत वाहन बेसुमार वेगात चालवितात

कुठलही वाहन अपघात झाला असता जितक्या कमी वेगात असतं तितकी हानी कमी होते. त्यामुळे सिटबेल्ट न बांधण, वाहन अतिस्पीड मध्ये पळवणं ह्या गोष्टी सुद्धा “आ बैल मुझे मार”

सारखं अपघातांना आणि वेगवेगळ्या होणाऱ्या नुकसानींना आमंत्रण देत असतात हे विसरून चालणार नाही.

बरेचसे अपघात हे सहलीला जातांना, सहलीहून परततांना वा देवदर्शनासाठी जातांना वा येतांना घडतात. ह्या बाबीकडे लक्ष पुरविलं असता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. आजचं आपल जीवनमान हे अतिशय वेगवान झालयं. त्यात आपल्याला कमी कालावधीत, झटपट सगळ्याचं गोष्टी हव्या असतात,जणू कमी कालावधीत “कर लो दुनिया मुठ्ठीमे”सारखं. जरा काही दिवस गेले की आपल्याला “चेंज” हवा असतो.आणि हा चेंज बहुतेकांना त्यांच्या अल्प सुट्टीतच कसाबसा कोंबून भरल्यासारखा हवा असतो.

सहल ,पर्यटन तसं आवश्यकच. पण कुठलिही गोष्ट निवांतपणे आणि जरा वाटबघून अल्प प्रमाणात मिळाली की ती तब्येतीला मानवते,आनंद देते बघा. पण आजकाल अगदी दोन दिवसाच्या सुट्टी मध्येही स्वतःच्या घरात पाय टिकंत नाही, सतत कुठेतरी घाईबडीत का होईना बाहेर जायचंच ही प्रघात असल्यासारखी पद्धतच जणू पडतेयं.कदाचित आता नातेवाईक आणि पाहुणे जाणं ही संकल्पना हळूहळू -हास पावतेयं म्हणूनही असावं.असो

त्यामुळे शांतपणे, निवांतपणे भरपूर वेळेची स्पेस ठेवूनच पर्यटनाला जावं,वाहनं हळू आणि कमी वेगात हाकावी, सीटबेल्ट सारख्या सोयींचा वापर करावा  ह्या निदान आपल्या हातात असलेल्या गोष्टी तरी माणसांनी पाळाव्यात असं वाटतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सवाई नावाचे गारुड ! – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆

? मनमंजुषेतून ?

☆ सवाई नावाचे गारुड ! – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

वडिलांबरोबर पहिल्यांदा मी या महोत्सवाचा आनंद लुटला. त्यातला एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नाही.दोन्ही हातात दोन व्यक्तींचा हात धरुन पंडित भीमसेन जोशी रंगमंचावर अवतरले. मला गद्यात बोलता येत नाही मी गाण्यात बोलतो त्यामुळे आता काही बोलत नाही असं काहीतरी म्हणून ते आत गेले.आणि मग वसंतराव आणि पु. ल.या दोन देशपांडे कलावंतानी मैफिल ताब्यात घेतली. पेटीवर पु. ल. यांचा सफाईदार हात फिरत होता.तबल्याचा ‘ठेका नाना मुळे यांच्याकडे होता. स्वरांची आरास बांधत हजारो रसिकांना त्या हिंदोळ्यावर झुलवत वसंतराव आनंदाच्या क्षणाचे मुक्त हस्ते वाटप करत होते. कसे विसरु हे ? 

शास्त्रीय संगीत आणि पुणे यांचे नाते तसे खूप जुने.सरदार आबासाहेब मुजूमदार यांच्या कसब्यातल्या वाड्यात गणपतीत देशभरातील मोठे कलावंत येवून आपली कला पेश करत.केसरी वाड्याच्या गणपती उत्सवातही अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली,अजूनही लावतात.लक्ष्मी क्रिडा मंदिर या छोटेखानी व्यासपीठावर. नुमवि शाळेच्या पटांगणावर अनेक स्वर्गीय मैफिली रंगल्या. बी जे मेडिकल आर्ट सर्कलने ही अनेकवेळा कानसेनांना तृप्त केले.

पण या सर्वांमध्ये सवाई गंधर्व महोत्सव वेगळा ठरतो.याचे मुख्य कारण म्हणजे इथे उल्लेख केलेले संगीत महोत्सव;काही खासगी,काही सार्वजनिक, पण फार मोठ्या संख्येने रसिकांना सामावून घेणारे नव्हते. त्यामुळे शास्त्रीय संगीत ही मोजक्याच रसिकांची, अभिजनांचीच मिरासदारी राहिली. दिवाणखान्यात,खाजगी मैफिलीत  रमलेल्या शास्त्रीय संगीताला पंडित भीमसेनजीनी भल्या मोठ्या  मोकळ्या मैदानात आणलं.अभिजानांएवढेच सर्वसामान्य श्रोतेही रसिक आहेत,किंवा काकणभर जास्तच रसिक आहेत हे गुपित सवाईने उघड केले .शास्त्रीय संगीताचे केलेले हे लोकशाहीकरण  हे आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. 

वर्षातून किमान तीन वेळातरी महाराष्ट्रातून ,देशातून आणि परदेशातूनसुद्धा अनेक भाविकांचे पाय पुण्याकडे वळतात.जून महिन्यात आळंदी आणि देहूहून सुरु होणाऱ्या पंढरीच्या वारीसाठी,दुसऱ्यांदा आपल्या लाडक्या बाप्पाला भेटण्यासाठी गणपती उत्सवात.आणि तिसऱ्यांदा  ’सवाई गंधर्व महोत्सवात स्वराभिषेकात न्हाऊन  निघण्यासाठी. मिळेल ती एसटी ,रेल्वे पकडून या  गान पंढरीचा वारकरी आपल्या आयुष्यातल्या काही i रात्री स्वरांच्या संगतीत व्यतीत करतो. 

कॉलेज जीवनात; पुण्यात माझी राहण्याची दोन ठिकाणे झाली. एक ५७१ ,शनिवार पेठ ,होय प्रभा विश्रांती गृह ज्या जागेत आहे आणि जिथे सई परांजपे यांनी आपल्या ‘कथा’ चित्रपटाचे चित्रीकरण केले तो साळुंखे यांचा वाडा.दुसरी जागा ३५८ ,शनिवार पेठ. वीराची तालीम चौकात . दोन्ही जागा रमणबाग शाळेच्या परिघात .सवाई मधली ओळ न ओळ ,प्रत्येक तान,वाद्यांचा झंकार, पदन्यासाची    छमछम आपसुक  कानावर पडायची त्या दोन्ही जागेत.  

१९५२ साली पंडित भीमसेन जोशी यांनी आपली गुरुभगिनी गंगुबाई हनगळ,पंडित फिरोझ दस्तूर यांच्या सहकार्याने सुरु केलेली ही गानयात्रा,आपले गुरु सवाई गंधर्व यांना दिलेली एक अक्षय्य अशी गुरुदक्षिणाच आहे. इथे किती दिग्गज ऐकायला मिळाले, किती वादकांनी हृदयाच्या तारा छेडल्या,आठवले तरी अंगावर रोमांच उभे राहतात.  मुंबई दूरदर्शनच्या माझ्या ५ वर्षांच्या काळात अनेक नावाजलेले, बुजुर्ग कलावंत जवळून ऐकले.त्यांच्या ध्वनीचित्रमुद्रणाचाही अनुभव घेतला. पण सवाईची  मजा औरच.   

गुलाबी थंडीला अधिक देखणे करणाऱ्या शाली पांघरुन  हजारो प्रेक्षक तल्लीनतेने श्रवणानंद लुटताना पाहणे हाच मुळात एक सुंदर दृश्यानुभव ठरतो.या महोत्सवाने आणखी एक गोष्ट दिली ती म्हणजे युवा कलाकारांना व्यासपीठ .या महोत्सवात   सामील करून त्यांना कला प्रवासाच्या हमरस्त्यावर आणून सोडले. हवसे ,नवसे ,गवसे साऱ्याच उत्सवात असतात.याला सवाई सुद्धा अपवाद नाही . सवाई ला चाललो आहे असे म्हणून अनेक तरुण तरुणींनी या उत्सवाच्या पेंडॉलला आपले संकेतस्थळही केले. पण हे गोड अपवाद सोडले तर या मंतरलेल्या रात्री म्हणजे गायन ,वादन ,नृत्य यांची लयलूटच असते.

मल्लिकार्जून मन्सूर, गिरिजादेवी ,माणिक वर्मा, हरिप्रसाद चौरासिया ,किशोरी आमोणकर,जितेंद्र अभिषेकी, राजन साजन मिश्र,वीणा सहस्रबुद्धे ,उल्हास कशाळकर ,राशीद खान  या श्रेष्ठ कलावंतानी  सवाईचा मंडप आपल्या स्वराविष्कारानी अनेकवेळा उजळून टाकला  आहे.  आप्पासाहेब जळगावकर या ज्येष्ठ संवादिनी वादकांनी तर ५७ वर्षे या उत्सवात आपल्या बोटांची जादू पेश केली आहे . 

कुमार गंधर्व यांनी सादर केलेला राग भटियार,पंडित रवी शंकर यांनी झंकारलेला  ललत, प्रभाताई अत्रे यांची  ‘तन मन धन तोपे वारू’ ही कलावती रागातील बंदिश , जसराज जी यांचा दरबारी , आलापी आणि तानांनी नटलेली;अनेक नयनरम्य वळणे घेत परवीन सुलतानानी सादर केलेली  ‘गुजरी तोडी या रमलखुणा मनावर गोंदल्या गेल्या आहेत.

मालिनी राजूरकर यांचा बहारदार टप्पा,आपल्या प्रियकराची आतुरतेने वाट पाहणारी अभिसारिका साकार करणारा अश्विनी भिडे यांचा बागेश्री,कौशिकी चक्रवर्ती हिने सादर केलेली ‘याद पियाकी आये’ ही आर्त ठुमरी काय काय म्हणून आठवावे? 

शिवकुमार शर्मा यांनी  संतूरच्या सुरावटींनी काढलेली रागेश्रीची रांगोळी,’ ही सगळी मनात चिरंतन जाऊन बसलेली स्वरशिल्पं आहेत . कंठ संगीताचा अनुभव देणारे गाणारे व्हायोलीन वाजवणाऱ्या एन.राजम या विदुषीच्या बोटातली जादू याच सवाईनी आम्हाला दाखवली. वैजयंतीमाला या भरतनाट्यम नृत्यांगनेचे ‘संत सखू’  हे नृत्यनाट्य पाहणे म्हणजेच एक मनोहारी उत्सव..सवाई नसते तर कुठं पाहिलं असते हे आम्ही ?

गाणे हे आनंदाचे कारंजे असते, इंद्रधनुष्य असते हे भान माझ्या वडिलांच्या संगीत प्रेमाने मला दिलेली फार मोठी इस्टेट आहे .रेणुका स्वरुप शाळा आणि रमणबाग शाळा या दोन्ही ठिकाणी हा नेत्रदीपक सोहोळा, गानयज्ञ याची देही याची डोळा आणि श्रवण इंद्रीयांने अनुभवण्याचे भाग्य माझ्या भाळी लिहिणाऱ्या त्या अज्ञात शक्तीचे आभार मानावेत तितके कमी आहेत. 

डिसेंबर मधल्या त्या रविवारी पुण्यात येणाऱ्या सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणांना ‘जो भजे हरी को सदा’ या पंडितजी यांच्या भैरवीच्या आर्त स्वरांनी अनेकवेळा कृतकृत्य केले आहे. ‘जमुना के तीर’ या स्वतः सवाई गंधर्व यांनी गायलेल्या ठुमरीचे स्वर ध्वनिमुद्रिकेच्या माध्यमातून कानात आणि मनात साठवत रसिक या गान पंढरीला  निरोप देतात. माथी बुक्का ,गळ्यात तुळशी माळ नसलेले, पण विठ्ठलाचे स्पष्ट दर्शन झालेले हे हजारो  वारकरी; हीच आपल्या  शास्त्रीय संगीत विश्वाची खरी दौलत आहे…. कधीही न संपणारी . 

लेखक : डॉ केशव साठये 

[email protected]

प्रस्तुती : सुश्री शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ काश्मीर डायरी १९… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ काश्मीर डायरी १९… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

‘शहादत ही इबादत है’ किंवा ‘हौतात्म्य हीच पूजा’ असं अत्यंत भावस्पर्शी घोषवाक्य असलेलं, श्रीनगर आणि लडाखच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या,   श्रीनगरमधील, लष्कराच्या १५ कॉर्प्स रेजिमेंटने उभं केलेलं म्युझियम बघणं हा एकाच वेळी अभिमानाचा आणि कारुण्याचा विषय होता… आणि त्याचबरोबर तो अनोख्या ज्ञानाचा आणि संतापाचाही विषय होता. कारण तो एक कवडसा होता काश्मीरच्या जन्मापासून आजपर्यंत झालेल्या प्रवासाचा आणि त्याचबरोबर काश्मीरसाठी आणि काश्मीरच्या भूमीवर लढल्या गेलेल्या युद्धांचा… पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या राष्ट्रद्रोही कारवायांचा आणि त्याचबरोबर भव्योदात्त हौताम्याचाही…

२००४ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. पण आजही ते फारसं कुणाला माहीत नाही! 

श्रीनगरमध्ये जाणारे पर्यटक हे म्युझियम बघत नाहीत किंवा कोणत्याही पर्यटन एजन्सीच्या पर्यटन स्थळांच्या कार्यक्रम पत्रिकेत ते नसतं कारण ते लष्कराच्या बदामी बाग कँटोन्मेंट एरियात आहे. पण आम्ही व्यवस्थित परवानग्या काढून तिथे गेलो आणि वर लिहीलेल्या  सगळ्याच भावनांचा अनुभव आम्ही त्या भव्य म्युझियममध्ये दोन-तीन तास फिरताना घेतला.

या म्युझियममध्ये काश्मीर अस्तित्वात कसं आलं, ‘काश्मीर’ या नावामागची कथा, तिथे आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या राजवटी झाल्या, तिथे कसे कसे संघर्ष झाले, तिथले शूरवीर किंवा वीरांगना कोण, ज्याला ‘काश्मिरीयत’ म्हटलं जातं ती कशी अस्तित्वात आली, तिथली लोक संस्कृती, तिथले कपडे, तिथली भांडी, तिथली वाद्यं हे सगळं तर आहेच पण तिथे बघण्यासारखं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे काश्मीरचा रक्तरंजित इतिहास…. फार प्राचीन काळात जायचं नसलं…. अगदी स्वतंत्र भारताचा विचार केला तरीही १९४७-१९४८ पासून आजतागायत तिथे झालेली युद्धं, त्यात वापरली गेलेली शस्त्रं, रणगाडे, त्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांची माहिती, या रेजिमेंटमधील अशोक चक्र, परमवीर चक्र वगैरे सन्मान मिळवलेल्या योद्ध्यांची गाथा, त्यांचे अर्धाकृती पुतळे, त्या युद्धानंतर बदलत गेलेल्या सीमा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, ‘युद्धात कमावलं आणि तहात गमावलं’ असं ज्याबाबत म्हणता येतं अशा ‘हाजी पीर’ सारख्या किंवा पाकव्याप्त काश्मीरासारख्या कधीच न मिटणाऱ्या, कायम सलत राहणाऱ्या जखमांची  सर्वांगीण माहिती, हे  सगळं काही बघायला मिळतं.  

काश्मीरमध्ये दहशतवादाचा काळा कालखंड सुरू झाल्यानंतर आजतागायत त्या दहशतवादाची बदलत गेलेली रूपं, दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या एके ४७, एके ५६ रायफली, पिस्तुलं, ग्रेनेड्स, बॉम्ब्स सकट असंख्य शस्त्रांची माहिती, नकाशे, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली बोगस ‘करन्सी’, खंडणी  उकळण्यासाठी त्यांनी छापलेली व आपल्या सशस्त्र दलांनी जप्त केलेली पावती पुस्तकं असंही सगळं बघायला मिळतं. 

आजवर काश्मीरमध्ये चाळीस हजाराच्या वर ‘एके फोर्टी ४७’ आणि पंचवीस हजाराच्या वर ‘एके ५६’ जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवादी संघटना तिथे मृत्यूचे थैमान कसे माजवत होत्या त्यांची ही हादरवून टाकणारी माहिती अक्षरशः हलवून टाकते. 

हे म्युझियम आम्हाला ज्याने  फिरून दाखवलं तो हवालदार दिनेश याने तर आम्हाला ‘एके ४७’, ‘एके ५६ ‘वगैरे उघडूनही दाखवल्या आणि ‘एके ४७ ‘ दहशतवाद्यांमध्ये एवढी का लोकप्रिय आहे त्याचीही माहिती दिली.

 त्याने दिलेल्या माहितीनुसार एके ४७ गंजत नाही, बिघडत नाही, अगदी चिखलात किंवा पाण्यात पडली तरी तिची भेदक क्षमता कमी होत नाही. त्यामुळे ती दहशतवाद्यांची लाडकी आहे. 

मात्र या बंदुका नुसत्या प्रदर्शनात का मांडल्या आहेत, आपल्या सैनिकांना त्या दिल्या का जात नाहीत असा प्रश्न आमच्या मनात होता. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या ज्या गोळ्या आहेत त्या अर्थातच पाकिस्तानात बनतात आणि त्याच गोळ्या या रायफल्ससाठी लागतात. आपल्या देशात बनलेल्या गोळ्या त्यात चालत नाहीत. त्यामुळे त्या नुसत्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.    

या व्यतिरिक्त ग्रेनेडस, क्षेपणास्त्र, बॉम्ब्स यांचे अर्धाकृती छेद तिथे ठेवण्यात आलेले आहेत.

 तिथे मांडण्यात आलेला एक देखावा तर असा आहे की तो बघून भारतीय संस्कृतीचा आणि आपल्या सैन्याचा खूप अभिमान वाटतो.

तो देखावा म्हणजे, ते स्मारक आहे एका पाकिस्तानी सैनिकाचं ! कारगिलच्या युद्धात लढता लढता त्याने एकट्याने ज्या धैर्याने आणि शौर्याने भारतीय सैन्याचा मुकाबला केला ते बघून भारतीय सैन्यालाही त्याचं खूप कौतुक वाटलं. त्याच्या शरीराची भारतीय सैन्याच्या गोळ्यांनी चाळण झाली होती आणि तरीही तो एकटा लढत होता. शेवटी आपली एक गोळी त्याच्या डोक्यात लागली आणि तो मरून पडला. तो जी मशीनगन वापरत होता त्याच मशीनगनवर तो जसा पडला तसंच त्याचं स्मारक या म्युझियममध्ये आहे. त्याच्या बाजुलाच, त्याला कदाचित रसद वगैरे पोहोचवायला आलेल्या एका गावकऱ्याचंही शव दाखवण्यात आलेलं आहे. ही सगळी माहितीही तिथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे.

या सैनिकाचं शौर्य पाहून भारतीय सेना एवढी खुश झाली की भारताने पाकिस्तानला असं पत्र लिहिलं की त्यांच्या या सैनिकाला त्यांनी ‘निशान ए पाकिस्तान’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च किताब दिला पाहिजे. 

‘कारगिलमधले सैनिक आपले नाहीत’, ‘पाकिस्तानचा त्यांच्याशी काही संबंध नाही’ अशीच भूमिका पाकिस्तानने सातत्याने घेतली असल्याने पाकिस्तानने हे मानायला नकार दिला. शेवटी भारताने लष्करी इतमामात व इस्लाम धर्माच्या पद्धतीनुसार त्याचे अंतिम संस्कार तर केले. पण भारताने सातत्याने त्याला ‘निशान ए पाकिस्तान’ दिला जावा म्हणून पाकिस्तान सरकारकडे पाठपुरावा केला आणि अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आलं.  ‘तो आपला सैनिक आहे’ हे अखेर पाकिस्तानने कबूल केलं आणि त्याला मरणोत्तर ‘निशान ए पाकिस्तान’ हा सर्वोच्च किताबही दिला!

‘मरणांतराणी वैराणी’ ही भारतीय संस्कृतीची उदात्त परंपरा आणि शत्रू असला तरी त्याच्या शौर्याचं कौतुक करण्याची भारतीय सैन्याची दिलदारी, उदारता या दोन्हींचं दर्शन या देखाव्यातून घडतं. 

काश्मीरचे शेवटचे महाराजा, राजा हरिसिंग यांनी १९२४-१९२५  मध्ये बांधलेल्या दगडी इमारतीत हे म्युझियम आहे. हवालदार दिनेश कुमार म्हणून तेथे तैनात असलेल्या १५ कॉर्प्सच्या  एका सैनिकाने आम्हाला इथली पूर्ण माहिती अत्यंत आत्मीयतेने दिली. ते सगळं बघत असताना एकाच वेळी अभिमान आणि सैन्याविषयीची कृतज्ञता मनात दाटून येत होती. 

आपल्या सैनिकांच्या हौतात्म्याची ती गाथा लतादीदींनी अमर केलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्यातल्या

जब घायल हुआ हिमालय,

खतरे में पडी अजादी

सरहद पर मरने वाला 

हर वीर था भारतवासी ….

या ओळींची आठवण करून देत होती आणि हात आपोआपच कृतज्ञतेने जोडले जात होते!

हे म्युझियम बघायचे असेल तर [email protected] या मेल आयडीवर मेल टाकून प्रयत्न करू शकता. मात्र उत्तर लवकर मिळत नाही. कर्मचारी कमी आणि काम अफाट अशी तिथली स्थिती आहे!

लेखिका : सुश्री जयश्री देसाई 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऐका गोष्ट बाराची… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

ऐका गोष्ट बाराची… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

12/12/12/12/12

बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक…

— मोजण्यासाठी द्वादशमान पध्दती…१२ची

— फूट म्हणजे १२ इंच

— एक डझन म्हणजे १२ नग.

— वर्षाचे महिने १२,

— नवग्रहांच्या राशी १२

— गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात….१२ वे

— तप….१२ वर्षाचे,

— गुरुगृही अध्ययन….१२ वर्षे

— घड्याळात आकडे…..१२,

— दिवसाचे तास …..१२,

— रात्रीचे तास …..१२ ,

— मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२

— मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२

— एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले….१२

— सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..

— पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..

— इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग

— बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते

— मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..

— बलुतेदार,बारभाई,बारावाटा…सगळे १२,

— बेरकी माणूस म्हणजे १२ गावचं पाणी प्यायलेला

— तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.

— ज्योतिर्लिंग…..१२ आहेत,

— कृष्ण जन्म….रात्री १२

— राम जन्म दुपारी…१२ ,

— मराठी भाषेत स्वर…१२ —- त्याला म्हणतात…बाराखडी

— १२ गावचा मुखीया,

— जमिनीचा उतारा ७/१२चा

— इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश 

— खायापिया कुछ नही , गिलास फोडा बाराना

— बारडोलीचा सत्याग्रह 

— पळून गेला ——पो’बारा’

—- पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’

— एक गाव, भानगडी १२ 

— लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती

— काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण १२. 

आणि

— सर्वात महत्त्वाचे…

— MH12 अर्थात ……पुणे

———- अशी आहे ही १२ चीं किमया….

— असे भन्नाट शोध फक्त आणि फक्त पुणेकर लावू शकतात–

— कोणालाच दोष देऊन उपयोग नाही….. 

कारण — महिनाच  “बाराचा” आहे… 

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वयंपाक_बुद्धिमत्ता (उगीच विचारांची भेळ) – सुश्री केतकी ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ स्वयंपाक_बुद्धिमत्ता (उगीच विचारांची भेळ) – सुश्री केतकी ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी – भाजी – वरण – भात – कोशिंबीर – चटणी – उसळ वगैरे वगैरे, आणि लाडू – चिवडे – मिठाया – पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 

एकदा काही कारणाने माझ्यावर एका ३० वर्षाच्या हुषार, शिकलेल्या, स्मार्ट आणि चुणचुणीत बाईला स्वयंपाक शिकवायची वेळ आली. मीही हो म्हटलं पटकन. तिचं वय बघता तिला थोडं तरी काहीतरी येत असेल, थोडी काही समज असेल, असा एक सहज गैरसमज मी करून घेतला आणि धक्क्यावर धक्के बसायला लागले. 

स्वयंपाक = कागदावर लिहिलेली एक रेसिपी असा तिचा आणि (मी कितीतरी वर्षं स्वयंपाक करत असून) माझा पण समज होता. 

मग झाली मजा सुरू—- 

– फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?

– गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी – जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव,   का झारा? कढई का पातेलं? 

– पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?

– एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

– ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?

– प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा— आवरता कसा घ्यायचा?

– दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत, बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे)– हा वेळेचा हिशोब कसा करायचा?

– मीठ, तिखट, साखर किती घालायचं?

– पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी — याची सांगड कशी घालायची?

– उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

– वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही, तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकवायला लागणार आहे.  आणि ते काही दिवसांमध्ये शिकवणं जवळजवळ अशक्य आहे. आणि त्याला लागणारी बुद्धिमत्ता बहुतेक या हुशार आणि चुणचुणीत मुलीकडे नाहीच आहे. 

बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे—’ involvement’ . उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. 

तिला काही रेसिपी लिहून दिल्या, काही व्हिडिओ पाठवले, काही पुस्तकं सुचवली आणि विषय संपवला.

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं, पण प्रसंगी पूर्ण अशिक्षित असून स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायका पुरुषांच्या हुषारीला दाद किती वेळा देतो? निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे, असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. 

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. 

खाण्यापूर्वी एकदा रोज—  निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.

लेखिका :  सुश्री केतकी

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाची अफाट शक्ती ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाची अफाट शक्ती ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

‘लुईस हे ‘ या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या ५-१५ वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की, हे संपूर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच असतात व मी जगायला लायक नाही. 

ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचत. पुढे वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की, ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. 

त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्यांनी सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्या पूर्णपणे बऱ्या  झाल्या. पुढे ९० व्या वर्षापर्यंत जगभर लेक्चर देत फिरत होत्या.

त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे ‘ यू कॅन हील युवर लाईफ ’. त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पृष्ठांमध्ये तर त्यांनी एक तक्ता दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आजार, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यामागील नकारात्मक भावना व तिसऱ्या स्तंभामध्ये कशाप्रकारे सकारात्मक विचार करा म्हणजे तो आजार बरा होईल असे दिले आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सर्व आजारांच्या मागच्या नकारात्मक भावनांचा त्यामध्ये समावेश आहे. हा तक्ता आपल्या मनाची स्वच्छता करायला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

दुसरे उदाहरण ‘ ब्रँडन बेज ’ यांचे. त्यांना स्वत:ला फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर पोटामध्ये होता.  बऱ्याच दिवसांपासून पोट सुटल्यासारखं वाटतंय म्हणून रूटिन चेकअपसाठी सोनोग्राफी केली, तेव्हा एवढा मोठा ट्युमर डॉक्टरांना दिसला. त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) तर उडाल्याच. त्या म्हणाल्या, लगेच अ‍ॅडमिट होऊन उद्याच्या उद्या ऑपरेशन करून काढून टाकू. पण ब्रँडन बेज यांना मन, भावना व शरीराच्या संबंधांविषयी चांगली माहिती असल्याने त्या म्हणाल्या, ” मला एक महिन्याची मुदत द्या. समजा काही उपयोग नाही झाला तर ऑपरेशन करा.”

एक महिनाभर त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता केली व जुन्या अनावश्यक आठवणी खणून बाहेर काढल्या व टाकून दिल्या. त्याच्याशी निगडित लोकांना माफ केलं. महिनाभराने सोनोग्राफीत ट्युमरचा आकार निम्म्याने कमी झाला व पुढील तीन महिन्यांत सोनोग्राफी नॉर्मल आली. इतरांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी ‘ The Journey ‘ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच ही पद्धत शिकवणारा तीन दिवसांचा कोर्सही सुरू केला आहे. त्या कोर्सचा अनेकांना खूपच उपयोग झाला.

तसेच आपल्या देशातील डॉ. दीपक चोप्रा हे एक प्रख्यात एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत व अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये प्रमुख पदावर होते. ते म्हणायचे की, मी अगदी मनापासून कॅन्सरच्या गाठी मुळापासून कापतो, So ideally it should not recur. खरं म्हणजे ते पुन्हा होता कामा नये. पण तरीही recurrence का बरं होतो? 

जेव्हा त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की, जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा मलम लावलं तर ती जखम लवकर बरी होते. पण समजा नाही लावलं तरीही ती जखम बरी होतेच. कोण बरं ही जखम बरी करतं? तर आपलंच शरीर.—- जखमेच्या शेजारील mother cells पासून daughter cells तयार होतात व जखम भरून येते. सर्वसाधारणपणे आईचे जसे संस्कार, मानसिकता असेल तशीच मुलीची होते. आपल्या नकारात्मक भावना वेगवेगळ्या पेशींमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे ट्युमर कापला तरी तिथे जी जखम होते, ती बरी करण्याचं काम तिथल्या mother cells करतात. —- पण त्यामध्ये जर नकारात्मक भावना साठवल्या असतील तर नवीन पेशी परत तशाच तयार होणार. त्यामुळे वर-वर फांद्या छाटून उपयोग नाही, तर झाड मुळापासून काढायला हवं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी medical practice बंद केली व आता ते पूर्णपणे cellular healing वर काम करतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मनाची स्वच्छता करायला शिकवतात.

त्यामुळे जर आपण सर्वांनी स्वत:साठी रोजची १५ मिनिटे काढली व मनाची स्वच्छता केली, तर आपण कमीत कमी आजारी पडू. बरं मनाची स्वच्छता करताना एखाद्या दिवशी खूपच छान व हलके वाटते. पण दुसऱ्या दिवशी परत काहीतर घटना घडतात आणि ‘ ये रे माझ्या मागल्या ’ प्रमाणे मनात नकारात्मक विचार यायला लागतात. 

दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटते सुद्धा. पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की, फक्त सकारात्मकच विचार करायचे. पण एक ठिणगी पुरेशी होते की, लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. पण हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे.

प्रयोग म्हणून करून तर पहा. मी जोपर्यंत स्वत: कोणती गोष्ट करून अनुभवून पहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हीही ठेवू नका. पण एकदा तुम्हाला अनुभव आला की, मला खात्री आहे की, रोज ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात घासायला, अंघोळ करायला, हातपाय धुवायला विसरत नाही, त्याप्रमाणे एकदा तुम्हाला मनाची स्वच्छता करण्याची सवय लागली की, तुम्ही कधीच ही सवय सोडणार नाही.

सर्वांना निरामय आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

आपण सर्व आरोग्यदायी जीवन जगत इतरांना प्रेरित कराल ही अभिलाषा !

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  आयुष्य कुणी जास्त जाणलं?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्य कुणी जास्त जाणलं?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला….. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही.

तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.

एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला —- खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.

त्याची नजर त्या भिकाऱ्याकडे – आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिकाऱ्याच्या बाजूला एक पाटी, आणि दोन-तीन खडू पडलेले.

— हा लेखक त्या भिकाऱ्याकडे जातो आणि म्हणतो, ” मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील 

नाही. पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का? “

” साहेब” भिकारी म्हणतो, ” माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा.”

— तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघून जातो.

— त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणाऱ्या – येणाऱ्यापैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्या पुढ्यात पैसे टाकू लागलाय. 

— थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते. तो भिकारी बेचैन होतो. नाण्यांची रास वाढतच जाते. तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणाऱ्यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, ” साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो.”

— तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो—-

— “ वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी — आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी.”

— भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.

——– आयुष्य कुणी जास्त जाणलं?—–

या ओळी लिहिणाऱ्या लेखकानं?—- त्या ओळी वाचून पैसे टाकणाऱ्या लोकांनी?— की इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं?—–

 

तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल…

पण जर तुमची वाणी गोड असेल, तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल…

 

माणसाला बोलायला शिकण्यास (किमान) २ वर्ष लागतात…

पण ” काय बोलावे? ” हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते…

 

— ओढ म्हणजे काय? – हे जीव लावल्याशिवाय कळत नाही…

— प्रेम म्हणजे काय? – हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही…

— विरह म्हणजे काय? – हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही…

— जिंकण म्हणजे काय?–  हे हरल्याशिवाय कळत नाही…

— दुःख म्हणजे काय?– हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही…

— सुख म्हणजे काय?– हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही…

— समाधान म्हणजे काय? – हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही…

— मैत्री म्हणजे काय?– हे ती केल्याशिवाय कळत नाही…

—आपली माणस कोण? – हे संकटांशिवाय कळत नाही…

— सत्य म्हणजे काय? –  हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही…

— उत्तर म्हणजे काय?–  हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…

— जबाबदारी म्हणजे काय?– हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…

आणि…. 

— काळ म्हणजे काय? –हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही…

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बंध नात्यांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “बंध नात्यांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल सुट्टीचा दिवस. एक सुट्टी सुद्धा खूपसारा शीण घालवते. त्याच त्याच रुटीनला जरा मन कंटाळलं असतं त्यात ह्या बदलाने खूप सकारात्मक फरक पडतो.

काल रविवार. त्यामुळे घरी मस्त आरामात साग्रसंगीत स्वयंपाक,गप्पा गोष्टी करीत जेवणाचा घेतलेला आनंद काही ओरच असतो. खेळीमेळीच्या वातावरणात जेवणं सुरू असतांना “अहो आई” सहज बोलल्या आपण तीस वर्षे झालीत ,एकत्र,एकविचाराने,आनंदाने एकाच छताखाली राहातो आहे,भांडण तर सोडाच आपल्यात कधी साधी कुरबुर पण नाही, ह्याचं काय कारण असावं बरं? कारण सासूसुन हे नात जरा जास्तच नाजूक असतं म्हणून विचारलं.

त्यांच्या प्रश्नाने विचारात पडले आणि कारण शोधतांना दोन तीन प्रमुख कारणं सापडली,एक म्हणजे दोघीही ह्या सुमधुर संबंधाचं क्रेडीट हे एकमेकींना देतो, आपापली कर्तव्य दोघीही चोख बजावित असल्याने एकमेकींना स्वतः पेक्षाही काकणभर जास्त विश्वास दुसरीवर वाटतो,आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या नात्यात “ईगो”ला अजिबात स्थान देत नाही. अर्थातच ह्या वरील गोष्टींच दोघींकडूनही तंतोतंत पालन होतं.

आम्ही दोघीही एकमेकांनी वेळ हा देतोच, कितीही व्यस्त दिनचर्या असली तरी रात्री झोपायच्या आधी कमीत कमी दोघीही आजचा दिवस कसा गेला हे परस्परांना सांगतो.

कुठल्याही नात्यामध्ये परस्परांना दिलेला वेळ  हा नातं पक्क करायला काँक्रीट चे काम करतो. ह्यावरून गुलजारजींच्या मला आवडत असलेल्या ओळी आठवल्या त्या पुढीलप्रमाणे,

“मुझसे समय लेकर भी मत आना,हाँ अपना समय साथ लाना,फिर दोनो समय को जोड बनाएँगे एक झुला ।।। खरचं किती आशयपूर्ण आहेत नं ह्या ओळी,किती गहरा अर्थ दडलायं नं ह्यात. दोन व्यक्तींच्या नात्यात परस्परांना दिलेले सर्वोत्तम गिफ्ट म्हणजे परस्परांना दिलेला वेळ. मग ते नातं मुला-पालकांच असो, सासू सुनेचं असो,नवराबायकोचं असो वा प्रियकरप्रेयसीचं. भावंड,मैत्री ह्या नात्यांमध्ये तर खरी लज्जत वेळ देऊन संवाद, वादविवाद ह्यामध्ये असते.

जर परस्परांशी बोलायला वेगवेगळे विषय असतील, बोलतांना वेळेचं भान सुद्धा राहात नसेल,परस्परांशी शेअर केलेली लहानात लहान गोष्ट ही दोन्ही नात्यात खूप महत्त्वाची वाटत असेल,मनात आलेला विचार पटकन कोणाला सांगायचा तर परस्परांशी बेझिझक बोलावेसे वाटत असेल तर समजून जावं आपलं नातं मुरलेल्या मोरब्यांसारखे झालेयं.वर्षानुवर्षे. टिकणारं,तरीही अजिबात गोडी तसूभरही कमी न होऊ देणारं.परंतु जर कुठे तरी संवादच खुंटत असतील, बोलायला काही विषयच सुचत नसतील तर कुठेतरी, काहीतरी,कुणाचंतरी  हमखास चुकतयं हे समजावं.

व्यक्तींमधील दुरावा, बेबनावं ह्याचं खूप महत्त्वाचं एक कारणं म्हणजे  स्व मध्ये ठासून भरलेला “ईगो”. ह्या ईगोमुळेच “पहले आप, पहले आप “करीत सुखासामाधानाची स्टेशन्स भराभर निघून जातात. दुराव्याचं दुसरं कारण म्हणजे “कायम दुसऱ्या कडूनच अपेक्षा आणि कधीकधी तर त्या अवास्तव सुद्धा. आपण आपल्या व्यक्तीच्या बाबतीत खूप जास्त पझेसिव्ह असतो.एकच व्यक्ती ही विविध लोकांशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधल्या गेलेली असते.प्रत्येक व्यक्ती ही संपूर्णतः भिन्न मतांची, विचारांची,आवडींची असते तेव्हा समोरील व्यक्ती ही आपल्याच मतांनी,आवडींनी कशी बरे चालेल ?

असो हे सगळे विचार मला निरनिराळ्या नात्यांनी जोडल्या गेलेल्या माझ्याच व्यक्तींनी शिकविले. ही माझी सगळी जोडली गेलेली नाती , काही प्रत्यक्ष तर काही फोनने  संवाद साधून त्यासाठी आपला स्वतः चा बहुमोल वेळ खर्चून ह्या नात्यांमधील प्रेम,जिव्हाळा, गोडी अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी पुढाकार घेतात हे पण खरेच. ह्या संपर्काने,बहुमोल वेळ देउन साधलेल्या सुसंवादाने विचारांच्या आदानप्रदानातून कित्येक अडचणींमधून परस्परांना योग्य दिशा,वाट मिळवून देतो आणि मग हे नात्यांचे बंध अधिकच दृढ आपोआप होतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घाई करताना… –– सौ.विदुला जोगळेकर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ घाई करताना… – सौ.विदुला जोगळेकर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर  

फार घाई होते हल्ली… प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई… क्षण फुकट वाया गेला म्हणून… लगेच गळे काढायची पण घाई…माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…ते पटकन जगाला दाखवायची घाई….जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….

नजरेत दृश्य येताक्षणी कँमेऱ्यात बंद करायची घाई…विचाराचा कोंब फुटता क्षणी, कृतीत उतरायची घाई…

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

मे मधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई….बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई…!….  चिमखड्या आवाजांना लता/किशोर व्हायची घाई….. बालांना किशोर व्हायची घाई…किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई तर….. काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य/लावणीची घाई… दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई… प्रसंग टेकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई… श्वास थांबताक्षणी श्रद्धांजली वाहायची सुद्धा घाई…! …. मुक्कामाला पोहचायची घाई….कामावरुन निघायची घाई… सिग्नल संपायची घाई….पेट्रोल/डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…सगळंच पटकन उरकायची घाई…आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई… आठ दिवसांत वजन कमी करायची घाई… महिनाभरात वजन वाढवायची देखील घाई….! पाच मिनिटात गोरं व्हायची घाई… पंधरा मिनिटात केस लांब व्हायची घाई… एक मिनिटात वेदना शमवायची घाई… एनर्जी ड्रिंक पिऊन वडीलधाऱ्यांना दमवायची घाई……. 

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमून जाई… .. भवतालचा काळ/निसर्ग गालात हसत राही…. 

.. मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई…!!!

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धीपेक्षाही आहे काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares