मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हेमलकशाचे देव… लेखक – श्री विजय गावडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ हेमलकशाचे देव… श्री विजय गावडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

देवा, या हेमलकशाच्या देवाला, आदिवासींच्या आधारवडाला, उदंड आयुरारोग्य दे!

बाबांचे चिरंजीव,डॉक्टर प्रकाश आमटे दुर्धर आजारावर उपचार घेऊन परतलेत, हे ऐकून त्यांच्या कार्याविषयी केवळ जुजबी माहिती असलेल्या माझ्यासारख्या मराठी माणसाचा देवावरचा विश्वास दृढ झालाय.  हेमलकशाचा माडिया आदिवासी तर अत्यंत सुखावला असेल, यात शंकाच नाही.

डॉक्टर आणि मंदाताई यांचा पर्लकोटा नदीच्या पुलावर फिरायला गेल्याचा फोटो वायरल झालेला पाहिला आणि देवाचे आभार मानण्यासाठी हात आपोआप जोडले गेले.

मित्रांनो, माडिया आदिवासी,डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे या दाम्पत्याला देव मानतात आणि म्हणून देवाने या वंचित, गरीब आदिवासींच्या देवाचे आयुरारोग्य सांभाळावे, यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया.

बाबा आमटेंच्या या सुपुत्राने, अत्यंत हलाखीत जगणाऱ्या माडिया आदिवासींचे जीवन जगण्यायोग्य करण्यासाठी केलेली अतिशय खडतर आणि जीवन झोकून देणारी  धडपड ‘प्रकाशवाटा’  हे त्यांचं पुस्तक वाचून कळते.

धड कपडेही अंगावर न घालणाऱ्या या माडिया आदिवासींना कपडे घालायला, अन्न म्हणून फक्त आंबिलावर विसंबून जीवन कंठणाऱ्या वा केवळ जनावर मारून खाणाऱ्या आदिवासींना भाज्या कशा बनवतात, कशा खातात आणि कशासाठी खातात हे माहीत नसणाऱ्या माडियांना त्या    पिकवायला  व खायला त्यांनी शिकवलं.  माडिया भाषेशिवाय कोणत्याही भाषेचा गंध नसलेल्या या अतिमागास जमातीला शिक्षण, आरोग्य या सुविधा त्यांच्या हेमलकशात अहोरात्र उपलब्ध करून देणाऱ्या या सिद्धहस्त डॉक्टर, इंजिनियर, आणि इतर व्यावसायिक एकाच ठिकाणी एकवटलेल्या अवलियाला,देवा,उदंड आयुरारोग्य दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.

समाजसेवेचे भांडवल करून, छोट्या- मोठया कार्याचा सोस पुरा करतांना, सोशल मीडियामध्ये फोटो टाकून आपला उदोउदो करून घेणाऱ्या आजच्या तथाकथित समाजधुरीणांच्या डोळ्यात अंजन घालणारे त्यांचे छोटेखानी ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. डॉक्टर प्रकाश आमटे यांचे काम हे दीपस्तंभ बनून समाजाचे मार्गदर्शन करतेय याची त्यांना ना जाणीव असेल, ना खंत.

आपल्या जन्मदात्यांच्या पावलावर पाऊल टाकून, किंबहुना त्यांच्याही पुढे जाऊन, वंचित आदिवासींच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे त्यांचे आणि मंदाताईंचे हात असेच कार्यरत राहून, आपणा सर्वांना प्रेरणा देत राहोत ही श्रीचरणी प्रार्थना!

असंख्य पुरस्कारांनी गौरविलेले डॉक्टर प्रकाश आमटे आपल्या या पुस्तकात एका ठिकाणी लिहितात, “शाळेकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे.  इथे आदिवासींची होत असलेली फसवणूक थांबावी आणि आपल्या हक्कांबद्दल त्यांनी सजग व्हावं, हा शाळा सुरु करण्यामागचा आमचा हेतू होता.  आज जेव्हा तिकिटापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या कंडक्टरला माझी मुलं पकडतात आणि जाब विचारतात, तेव्हा माझ्या दृष्टीने इथे शाळा सुरु केल्याचा उद्देश सफल झाल्यासारखा वाटतो.”  केवढा मोठा पुरस्कार!इतर कोणत्याही पुरस्कारांच्या पेक्षा मोठा!

असो.  बाबा आमटेंच्या या सुपुत्राला उदंड आयुरारोग्य मिळो ही पुन्हा एकदा विधात्या चरणी प्रार्थना.

लेखक :श्री.विजय लक्ष्मण गावडे

संग्राहिका : सौ. शशी नाडकर्णी- नाईक.

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३९ – परिव्राजक १७. बेळगांव आणि हरिपद मित्र ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३९ – परिव्राजक १७. बेळगांव आणि हरिपद मित्र ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

बेळगाव मध्ये स्वामीजींचा सहवास लाभलेले आणखी एक कुटुंब म्हणजे, हरिपद मित्र आणि त्यांच्या पत्नी सौ इंदुमती मित्र. हरिपद मित्र वन खात्यात विभागीय अधिकारी होते. ते बंगाली असल्याने भाटे वकील ओळख करून द्यायला स्वामीजींना त्यांच्या घरी घेऊन गेले. दारात, शांत, सौम्य, तेजस्वी, दाढी केलेला तरुण संन्यासी, पायात मराठी वहाणा, अंगात भगवी कफनी, डोक्याला भगवा फेटा असं आकर्षक व्यक्तिमत्व पाहून, हरिपद यांना क्षणभर भुरळच पडली. पण पुढच्याच क्षणी तो आपल्याकडे काही मागण्यासच आला असावा, कारण संन्यासी म्हणजे लुच्चा लफंगा असे त्यांचे मत झाले. भाटे वकिलांनी परिचय करून दिल्यावर एका महाराष्ट्रियन ब्राम्हणाकडे बंगाल्याचे जमणे कठीणच म्हणून ते आपल्याकडे रहाण्यासाठीच आले असावेत अशीही भावना झाली. म्हणून हरिपदांनी स्वामीजींना विचारले तुमचं सामान इथेच आणून घेऊ का?

स्वामीजी म्हणाले, “मी वकील साहेबांकडे अगदी आरामात आहे. ते सारे आपल्याला फार प्रेमाने वागवतात. कोणीतरी बंगाली भेटल्यामुळे मी त्यांच्या घरातून हललो तर ते बरं दिसणार नाही. योग्य होणार नाही. त्यांना वाईट वाटेल, सध्या नको, पुढे पाहता येईल.” इथे स्वामी विवेकानंदांचा विवेक दिसतो. यानंतर झालेल्या गप्पांमधून हरिपद यांना स्वामीजींचे व्यक्तिमत्व उलगडत गेले. दुसर्‍या दिवशी स्वामींना त्यांनी फराळाला बोलावले, स्वामीजींनी होकार दिला. दुसर्‍या दिवशी हरिपद स्वामीजींची वाट पाहत होते. बराच वेळ झाला स्वामीजी आलेच नाहीत, म्हणून हरिपद त्यांना बघायला भाटे वकिलांकडे गेले. पाहतात तर काय, त्यांच्या भोवती गावातील अनेक वकील, पंडित आणि इतर प्रतिष्ठित यांचा मेळावा जमलेला. कोणी प्रश्न विचारात होते, कोणाचा मुक्त संवाद चालला होता. स्वामीजी चार भाषांतून सर्वांना कुशलतेने उत्तरे देत होते. या रंगलेल्या धर्मचर्चेत एकाने संस्कृतमध्ये विचारले, “धर्मासंबंधी म्लेंच्छ्  भाषेत चर्चा करणे निषिद्ध आहे. असे अमुक पुराणात संगितले आहे”. त्यावर स्वामीजी म्हणाले, “ भाषा कोणतीही असो, त्या भाषेतून चर्चा करायला काही हरकत नाही. हे सांगताना त्यांनी अनेक वेदादिकांमधील संदर्भासहित स्पष्टीकरण दिले आणि शेवटी सांगितले, हायकोर्टाचा निकाल खालची कोर्टे झिडकारू शकत नाहीत, पुराणापेक्षा वेदांचेच म्हणणे श्रेष्ठ”.

एका ब्राह्मण वकिलाने विचारले, स्वामीजी संध्या व इतरही आन्हिकांचे सारे मंत्र संस्कृत भाषेत आहेत. ते सारे आम्हाला कळत नाहीत. अशा स्थितीत ते म्हटल्याने आम्हाला काही फळ मिळेल की नाही”? स्वामीजी उत्तरले, “अलबत, तुम्ही ब्राह्मणा पोटी जन्म घेतलेला, थोडासा प्रयत्न केला तर त्या मंत्राचा अर्थ सहज समजून घेऊ शकाल. पण असा प्रयत्नच मुली तुम्ही लोक करत नाहीत. हा दोष सांगा पाहू कुणाचा?आणि अर्थ जरी कळत नसला तरी, संध्या करावयास बसता, तेंव्हा काहीतरी शुभ धर्मकर्म करीत आहोत असे तुम्हाला वाटत असते. धर्मकर्माच्या शुभ भावनेने जर ते आन्हिकं करीत असाल तर तेव्हढ्यानेच त्याचे शुभ फळ तुम्हाला खात्रीने मिळेल”.   

सर्वजण गेल्यावर स्वामीजींना हरिपद दिसताच त्यांच्या निमंत्रणची आठवण झाली. स्वामीजींनी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले, “एव्हढ्या मंडळींचा हिरमोड करून येणं मला प्रशस्त नाही वाटलं. गैर मानू नका”. यावेळी हरिपद यांनी पुन्हा घरी राहायला येण्याचा आग्रह केला. तर स्वामीजींनी सांगितलं, आधी भाटे वकिलांची परवानगी घ्या. ते हो म्हणाले तर माझी काही हरकत नाही. हरिपद यांनी महाप्रयत्नाने ही परवानगी मिळवली आणि ते स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेले. हरिपद मित्र यांच्या आयुष्यातला स्वामीजींचा हा सहवास क्रांतिकारक ठरला होता.

हरिपद मित्र अगदी मॅट्रिक होईपर्यंत इंग्रजी शाळेत शिकत असल्याने त्यांचा हिंदू धर्मावरील विश्वास उडत चालला होता. कॉलेजच्या विषयांबरोबर हक्स्ले, डार्विन, मिल.टिंडॉल, स्पेन्सर प्रभृती या पाश्चात्य पंडितांचा त्यांच्या ग्रंथावरून परिचय झाला होता. अती इंग्रजी शिक्षणामुळे ते नास्तिक बनले, कशावरही श्रद्धा नाही, भक्ति नाही. सर्वच धर्मात त्यांना दोष दिसे. याच वेळी मिशनर्यांचे त्यांच्याकडे येणे जाणे सुरू झाले. ख्रिस्ती धर्म स्वीकारावा म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले. इतर धर्माची निंदा करून वेगवेगळे डावपेच रचून, आधी ख्रिस्ती धर्मावर विश्वास ठेवा मग तो श्रेष्ठ वाटेल, मन लावून बायबल वाचा म्हणजे आपोआप श्रद्धा बसेल, असे त्यांच्या गळी ऊतरवू लागले होते मिशनरी. पण प्रमाणाखेरीज कशावरही विश्वास ठेऊ नये हे तत्व पाश्चात्य विद्येमुळेच त्यांना कळले होते आणि ते त्याच्यावर ठाम पण होते. परंतु मिशनरी आता नेमकं याच्या विरुद्धच सांगू लागले होते. शेवटी गोष्ट इतक्या ठरला गेली की, हरिपदांच्या शंका असलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत मग बाप्तिस्मा करून ते ख्रिस्ती धर्म स्वीकारतील. परंतु सुदैवाने हरिपद यांना तीन प्रश्नांची उत्तरे मिळण्यापूर्वीच कॉलेज सोडलं आणि संसार सुरू झाला त्यामुळे हे धर्मांतर वाचलं. पण यानंतर ही त्यांचा सर्व धर्माचा अभ्यास चालूच होता. चर्चमध्ये जाणं, देवळात जाणं, ब्राह्म समाजात जाणं हे चालू होतं. तरीही सत्य धर्म कोणता, असत्य कोणता, चांगला कोणता, वाईट कोणता हे हरिपद यांना ठरवता आले नव्हते. पण कोणत्यातरी धर्मावर दृढ श्रद्धा ठेवल्यास आयुष्य सुखासमाधानाने  घालवता येईल हे त्यांना पटलं होतं. तरीही चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम स्थिति असताना सुद्धा मन मात्र बेचैन होतं. शांत नव्हतं. सतत कसली तरी हुरहूर असे. स्वामीजींच्या संपर्कात आल्याने त्यांना धर्मासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळाले. धर्म वादावादीत नाही. धर्म म्हणजे प्रत्यक्षा अनुभूतीची बाब आहे. ही गोष्ट पटवून देण्यासाठी स्वामीजी म्हणत, ‘मिठाईची पारख होणार ती मिठाई खाऊनच, धर्माचा प्रत्यक्ष अनुभव घ्या, एरव्ही काहीही कळणे कधी शक्य नाही’.  

धर्मजीवनाविषयी अशा प्रकारे त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. अनेक संशय होते  त्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामीजींनी दिली होती. सत्य, धर्म आणि श्रद्धा या विषयावरच्या चर्चेतून आणखी गोष्टींचा खुलासा हरिपद यांना झाला होता. जेंव्हा जेंव्हा सवड मिळे संवाद होई तेंव्हा तेंव्हा हरिपद मित्र ही संधी घेत असत. याबरोबरच स्वामीजी त्यांना आलेले अनुभव पण सांगत.

हरिपद यांच्या पत्नी इंदुमती यांना बर्‍याच दिवसांपासून गुरुमंत्र घेण्याची इच्छा होती.पण हरिपद धर्माच्या बाबतीत साशंक होते आणि योग्य व्यक्ती भेटेपर्यंत वाट पाहूया असे त्यांनी पत्नीला सांगीतले होते.    स्वामीजींन कडून ती घेण्याचा योग आल्याने दोघं ही कृतकृत्य झाले. शिष्यत्व पत्करल्यावर स्वामीजी तीन वेळा फक्त भेटले . प्रथम बेळगावला. नंतर स्वामीजी अमेरिका प्रवासाला गेले त्या आधी आणि नंतर देहत्यागच्या सहा महीने आधी. स्वामीजींनी दीक्षा दिल्यानंतर दोघांचेही सतत स्मरण ठेवल्याचे दिसते.अमेरिकेत जाण्याआधी त्यांनी इंदुमतींच्या पत्रात लिहिले होते, “तुमचे उभयतांचे कल्याण असावे अशी प्रार्थना मी नित्या परमेश्वराला करत असतो. परमेश्वराची कृपा असेल तर मी अमेरिकेतून परत आल्यावर आपली भेट होईल. आपण परमेश्वराच्या हातातली केवळ बाहुली आहोत. याचे सदैव स्मरण ठेवा. मन सदैव शुद्ध असावे, विचार उच्चार वा आचार यापैकी कशातही अशुद्धतेचा स्पर्श होऊ देऊ नये. गीतेचे पठण करीत राहा”. अशा प्रकारे हरिपद यांना स्वामीजींचे वैयक्तिक सहवासातून दर्शन झाले होते. बोलता बोलताना स्वामीजींनी हरिपद बाबूंना आपला सर्वधर्म परिषदेला अमेरिकेला जाण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला होता.                                  

स्वामीजी आता इथला प्रवास संपवून निघाले. हरिपद यांनी त्यांना प्रेमपूर्वक निरोप दिला बेळगावमध्ये असताना शिरगावकर यांची ओळख झाल्याने जाताना त्यांनी मडगावच्या सुब्राय नायक यांच्या नावे  परिचय पत्र दिले होते. ते घेऊन स्वामीजी गोव्याकडे रेल्वेने रवाना झाले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग ४ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग ४ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

प्राणी मात्रांच्या सावधपणाची किती उदाहरणे द्यवी तितकी कमीच आहेत. त्सुनामी आली ,त्यावेळी प्राण्यांना त्सुनामीची आधी जाणीव  झाली होती. भूकंप होणार याची जाणीव  मानवाच्याही आधी जंगली प्राण्यांना, पशूपक्ष्यांना आगोदर होते. त्यांचे वर्तन बदलते. पाऊस येणार असल्याची जाणीव पतंग किड्यांना आगोदर होते. बर्याच संख्येने ते दिव्याजवळ येतात .निसर्गात प्राणी आणि पक्षी सावध असतातच.पण झाडांना देखील सावधपणा असतो. संवेदना असतात.हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

हे सगळं लिहीत असताना मला घरातलेच अनुभव आठवले. आमच घर शेतात एकाकी अस होत.टाँमी आणि बंड्या असे दोन कुत्रे, एक जयू गाय,टिट्या, गोट्या असे दोन  भाऊ भाऊ बोके,पोपट आणि आम्ही असे आमचे कुटुंब होते. बर्याच वेळा शेजारच्या पोल्ट्रीतील खाद्य खाण्यासाठी उंदीर यायचे.आणि उंदरांना धरण्यासाठी सापही यायचे. साप आला की, कोंबड्या सावध व्हायच्या.कोंबड्यांचा आरडाओरडा आणि फडफडाट  चालू व्हायचा. आणि आम्हाला सापाची जाणीव करून द्यायच्या.भोवती शेती असल्याने साप, विंचू, सरडे, मुंगूस ही असायचे. आमचे दोन्ही कुत्रे साप दिसला की वेगळा आवाज काढायचे. चोर दिसला की वेगळा आवाज काढायचे. त्यांच्या टोनिंग वरुन  आम्हाला सावध करायचे. दोन्ही बोके कुठेतरी दबा धरून बसलेले दिसले की, ओळखावे. इथे पाल, उंदीर काहीतरी नक्की आहे. कठून शिकले असतील हा सावधपणा?कित्येकदा घरात माझ बाळ रडत असलं तरी आमचा टाँमी मला कूं कूं करून सांगायचा .सावध करायचा.”लक्ष्य आहे की नाही, बाळ रडतय”.बाळाला तिर्हाइतानं कुणी घेतलेल  त्याला आजिबात आवडायचं नाही. परका कोणी घेतो की काय ,याबाबत तो फार सावध असायचा.त्याच्या सावधपणाचे किती कौतुक करावे, आणि किती अनुभव सांगावेत, तितके कमीच  आहेत. आयुष्यभर त्यांच्या उपकाराची फेड होणार नाही.

अनेक उपकरणे, अनुभव, प्रयोग यांच्या सहाय्याने प्राणी वर्तन, त्यांच्यातील सजगता, सावधानता यांचा अभ्यास करता येऊ लागला आहे. व प्राण्यांचे मानसशास्त्र ही एक नवीन शास्त्रशाखा उदयाला आली आहे. याचा प्रत्येकाने जरूर अभ्यास करावा,असे वाटते.

– समाप्त – 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माहेर म्हणजे काय?…..अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ माहेर म्हणजे काय?…..अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

१) माहेर म्हणजे…  – महिना दोन महिने आधीच कॅलेंडरवर लक्ष ठेवून माहेरी जाण्यासाठी प्रवासाची तिकिटं काढून ठेवणं.

२) माहेर म्हणजे… – ‘ या वेळी मी आईकडे जास्त दिवस राहणार ‘ असं नव-याला ठणकावून सांगणं.

३) माहेर म्हणजे… – माहेरी जाण्याच्या कल्पनेने चेहऱ्यावर तेज यायला सुरुवात होणं.

४) माहेर म्हणजे… – उत्साहाच्या भरात कपड्यांची बॅग भरायला घेणं.

 ५) माहेर म्हणजे… – ” पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊ या ” असं आपल्या लेकरांना आनंदाने ओरडून सांगणं.

६) माहेर म्हणजे… – बसस्टाॅपवर सोडायला आलेल्या नवऱ्याला हसऱ्या चेहऱ्याने टाटा करणं.

७) माहेर म्हणजे… – बसस्टाॅपवर उतरल्यावर रिक्षावाला म्हणेल त्या किंमतीत माहेरच्या रस्त्याला लागणं.

८) माहेर म्हणजे… – त्या घराच्या पन्नास- पंचावन्न पायऱ्या दहा-बारा ढांगात संपवणं.

९) माहेर म्हणजे… – कोणीतरी दार उघडेपर्यंत दरवाजावरची बेल दाबून ठेवणं.

१०) माहेर म्हणजे… – उंबरठ्याच्या बाहेर उभं राहून, भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणाऱ्या आईकडे प्रेमाने पाहाणं.

११) माहेर म्हणजे… – उंबरठ्याच्या आत पाय टाकायची घाई होणं.

१२) माहेर म्हणजे… – चपला काढण्याआधीच बाबांच्या गळ्यात पडणं. 

१३) माहेर म्हणजे… – वहिनीने प्रेमाने आपल्या बॅगा आत नेऊन ठेवणं.

१४) माहेर म्हणजे… – ” किती वाळली माझी लेक ” असं आईने केसांतुन हात फिरवत म्हणणं.

१५) माहेर म्हणजे.. – ” चला आजपासून काय धमाल करायची?” असं मामाने भाच्याला कौतुकाने विचारणं. 

१६) माहेर म्हणजे… – स्वयंपाकघरात डोकावून, “आज काय बेत?” असं नुसतं विचारणं.

१७) माहेर म्हणजे… – आवडीच्या पदार्थांची फर्माईश करणं.

१८) माहेर म्हणजे… – जेवणाची वेळ झाल्यावर पहिल्या पंगतीत बसून जेवायला सुरवात करणं.  

१९) माहेर म्हणजे… – सकाळी जाग येईल तेव्हा आरामात उठणं.

२०) माहेर म्हणजे… – सोफ्यावरून उठून खुर्चीवर बसणं. आणि हो खुर्चीवरून उठून बेडवर लोळत पडणं.

२१) माहेर म्हणजे… – गावातल्या मैत्रिणींना फोन करून सिनेमा-नाटकाचे प्लॅन आखणं.

२२) माहेर म्हणजे – बालपणीच्या जुन्या फोटोंचा पसारा काढून बसणं.  

२३) माहेर म्हणजे… – कोणत्याही पाचकळ विनोदावर खळखळून हसणं.

२४) माहेर म्हणजे… – अंगणातल्या झोपाळ्यावर बसून वेळी-अवेळी पुस्तक वाचणं.

२५) माहेर म्हणजे… – गच्च पोट भरल्यानंतर आईने दहीभात खाण्याचा आग्रह करणं.

२६) माहेर म्हणजे… – ८/१० दिवस पटकन् संपून गेल्यासारखे वाटणं.

२७) माहेर म्हणजे… – सासरी परत जातांना दोनाच्या चार बॅग झालेल्या असणं. 

२८) माहेर म्हणजे… – निघतेवेळी जड मनाने आईबाबांना वाकून नमस्कार करणं.

२९) माहेर म्हणजे… – YES!! ऐनवेळी सासरी जाणं २ दिवसाने पुढे ढकलणं.

३०) माहेर म्हणजे… – ” सासरच्यांना नीट जप हो ” असं आईने प्रेमाने पाठीवर हात फिरवत सांगणं. 

३१) माहेर म्हणजे… – बसमध्ये भावाने जड बॅगा ठेवायला मदत करणं.

३२) माहेर म्हणजे… – ” घरी पोहोचलीस की फोन कर ” असं माहेरच्यांनी चारवेळा ओरडून सांगणं.

३३) माहेर म्हणजे… – बस दिसेनाशी होईपर्यंत माहेरच्यांना हात हलवत निरोप देणं. 

३४) माहेर म्हणजे… – पुढच्या प्रवासासाठी प्राणवायू भरून घेणं.

३५) माहेर म्हणजे… – ” माझ्या माणसांना सुखात ठेव ” ही देवाकडे प्रार्थना करणं.

३६) माहेर म्हणजे… -“आम्ही खूप मजा केली मामाकडे” असं लेकरांनी खूप उत्साहाने त्यांच्या वडिलांना न थकता सांगणं. 

३७) माहेर म्हणजे… – फोन आला की खोलीचं दार लावत आईशी मनसोक्त गप्पा मारणं. ‘ काळजी करू नकोस गं आई ‘ असं दर चार वाक्यांनंतर तिला ठामपणे सांगत राहाणं.  

३८) माहेर म्हणजे… – वयाच्या सत्तराव्या वर्षीही माहेरच्या आठवणींनी व्याकूळ होणं.

  किती लिहावं माहेराविषयी?…

अहो शेवटी माहेर म्हणजे; ” माझ्या माहेरी असं, माझ्या माहेरी तसं ” हे नवऱ्याला सतत सांगून त्याला छळत राहाणं. हो किनई?…… 

लेखिका : अज्ञात 

संग्राहिका : बिल्वा अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग ३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग ३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

जमिनीवर रहाणार्या प्राण्यांचे कान हे ध्वनी ग्रहण करण्यास खूपच कार्यक्षम  असतात. हरणाच्या बाबतीत सांगायचे तरंतो प्रत्येक कान स्वतंत्रपणे हालवू  शकतो. स्थिर किंवा विश्रांतीत असताना देखील प्रत्येक कानाकडून मिळालेल्या ध्वनी लहरीची तुलना करून ते ध्वनीचा स्रोत निश्चित करु  शकतात. त्याच्या श्रवण शक्तीची तुलना उपग्रहाशी केली जाते. माकडे , जिराफ, झेब्रे, हे प्राणी समूहाने रहातात. त्यापैकी त्यांचा एक नेता किंवा प्रमुख असतो. तो शत्रूशी सामना करून इतरांचे रक्षण करतो.बाकी सारे त्यांच्या हुकमतीखाली रहातात. त्यांच्या तील सामाजिक वर्तनही उच्च दर्जाचे असते. जंगलात वाघ किंवा सिंह यांची चाहूल लागली की, झाडावरील माकडे विचित्र आवाज काढून त्याची पूर्वसूचना जमिनीवरील प्राण्यांना  देतात. बाकीचे  प्राणी सावध होऊन पळू लागतात. वाघ किंवा सिंह दुरुन एखादे सावज पक्के करतो. आणि त्याचाच पाठलाग करून ते सावज पकडतो.मग बाकीचे प्राणी पळायचे थांबतात. त्यांना समजत की,आपल्या वरच संकट टळल आहे. शिकार झाली की, तरस हा आयत्या  शिकारीवर जगणारा प्राणी सावधानपणे तयारच असतो. एकदा शिकार झाली की, पुन्हा भूक लागेपर्यंत समोरुन प्राणी गेला तरी मारला जात नाही. शिकार कशी करावी, कसे खावे,हे पिल्ले आईकडून शिकतात.

हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा व ताकदवान प्राणी. ते कळपाने रहातात. अन्नाच्या शोधात सतत स्थलांतर करीत असतात.आफ्रिकन हत्ती हे भडक डोक्याचे असतात. हत्तीना मुसळधार पावसाची चाहूल सर्वांच्या आधी लागते. दोनशे चाळीस  कि. मि.अंतरावरुनही हत्तीना  मुसळधार पावसाची चाहूल लागते. आणि ते अचानक आपली दिशा बदलतात.साधारणपणे हत्तीच्या दिशेने वादळी पाऊस येणार असल्याची माहिती वेधशाळेकडून संशोधकांना मिळाली., हे हत्तीचे एक आश्चर्यजनक सावधपणच नव्हे काय?

अस्वल हा प्राणी कधी एक एकटा किंवा दोघे असे रहातात. वेळोवळी ते एकमेकांची जागा व्यापतात. घाबरलेले अस्वल ओरडत नाही तर जमिनीवर आपटत राहून  फुत्कार टाकतात. जेव्हा ते रागावतात ,तेव्हा ते खालचा ओठ बाहेर काढून कान मागे सारतात.आणि रागाने एक प्रकारे धमकावतात. बर्याच वेळ मागील दोन पायावर उभे राहून सर्व दिशांना मान फिरवून हुंगत रहातात. संवेदनशील होऊन आपले भक्ष्य पकडतात. आणि संकटही ओळखतात.गेंडा हा प्राणीही जंगलात रहातो. त्याची द्रुष्टी तितकीशी ताकदवान नसते. गेंडा घुसखोरांना हाकलण्यासाठी त्यांच्यामागे पळत रहातो. कधीकधी झाडाझुडुपांवर आपटलाही जातो. ठराविक  ठिकाणी तो मूत्र व विष्ठा विसर्जन करून आपले क्षेत्र तो पक्के करतो.दूर  कोठे गेला तरी पुन्हा तेथेच येऊन त्याच ठिकाणी तो मूत्र व विष्ठा विसर्जन करतो. आपल्या स्थानाबाबत पक्का जागरुक असतो.कुत्रा हा प्राणी हजारो वर्षांपासून माणसाच्या संपर्कात आहे. तो इमानदार  राखणदार आणि शिकारी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पाळतात.त्याच्या घ्राणेंद्रियांची क्षमता माणसाच्या आठशेपट जास्त असते. त्यामुळे बाँब शोधक पथकातही तो काम करतो. रक्तदाब ,रूदयरोग , मानसिक ताणतणाव अशा व्याधींवर डाँग थेरपी म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो.त्यासाठी आता अभ्यासक्रम तयार केले आहेत.वैदिक वांग्मयात देखील कुत्र्याचे उल्लेख आहेत. कित्येकदा नको म्हणून दूरवर नेऊन सोडलेले  कुत्रे दोन–तीन दिवसांनी परत आपल्या दारी आल्याचे आपण पहातो. अशावेळी  त्या सोडणार्या निर्दय माणसाचा राग येतो.केवळ वासाच्या आधारे ते आपले ठिकाण  शोधून काढतात. मांजर या प्राण्याबद्दल सांगायचे तर ते इमानदार नसते.पण वासाने त्याला आपली शिकार समजते. आणि जाणीव झाली की , तासनतास ते सावजाची वाट पहात बसते.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

टपाल आणि माझं नातं कधी जुळलं ते आठवत नाही. पण गावात जुन्या ग्रामपंचायतीच्या बाहेर पोस्टाची लाल टपाल पेटी अडकवलेली होती.शाळेला जाता जाता आम्ही मारुतीच्या मंदिरात खेळायला थांबायचो. कुतुहल म्हणून शेजारच्या ग्रामपंचायतीच्या व्हरांड्यातील खिडकीला अडकवलेली टपाल पेटी न्याहाळायचो कुणीतरी खिडकीवर चढून पेटीचे झाकण उघडझाप करायचं.कुणीतरी आत हात घालून काय आहे का पहायचं.कधी हात पेटीत अडकवून घ्यायचो.कुणी ती पेटी वाजवायची.कुणीतरी ओरडलं तर धूम ठोकायची.असा खेळ सुट्टीत नेहमीच चालायचा.यात महत्वाची कागदं येतात जातात असं कुणीतरी सांगून जायचा. मग हळूहळू थोडी माहीती होत गेली.

…आमच्या वाड्यातला गोरापान आणि घाऱ्या डोळ्याचा बापू तात्या(बापू वाघमारे) सायकलीला पिशवी अडकवून दररोज सकाळी करगणीला जायचा आणि काही तासानं परत यायचा. असं नेमानं घडायचं. त्याची जायची आणि यायची वेळ एकच असायची. शाळेपुढून त्याचं जाणं येणं असायचं. त्यामुळं बापू तात्या करगणीतून रोज पिशवीतून काहीतरी आणतो आणि घेऊन जातो याचंही कुतुहल असायचं. बापू तात्या करगणीतून आलेला दिसला की पत्रं आली असं ऐकायला मिळायचं.

गावात पाटलाच्या वाड्याजवळ असणाऱ्या अत्ताराच्या घरात पोस्ट ऑफिस होतं. तिथं हुसेन अत्तार पोस्टमास्तर म्हणून असायचे. त्यांच्याच घरातल्या एका खोलीत पोस्ट असायचं. उंचपुरा,मोठ्या डोळ्यांचा,खड्या आवाजाचा आणि हसऱ्या चेहऱ्याचा हुसेनभई आजही डोळ्यापुढून हटता हटत नाही. हुसेनभई नेहमी पोस्टाची महत्वाची पत्रे न चुकता बापू तात्यांकडून गावातल्या वाड्यावस्त्यावर पोहचवायचे. कुणाला नोकरीचा कॉल आला,कुणाची मनीऑर्डर आली सगळी खबर पोस्ट मास्तर जवळ असायचीच. पोस्टानं आमचं महत्वाचं यायचं आहे,आलं म्हणजे सांगा -असं अवर्जून तरुण पोरं हुसेन मास्तरला आठवणीनं सांगत रहायची. रोज बापू तात्यालाही विचारत रहायची. पोस्ट असलेल्या या खोलीत आलेल्या पोस्टावर जाडजुड असा शिक्का काळ्या शाईत बुडवून मारलेला आवाज बाहेर ऐकू यायचा. त्यावेळी १५ पैशाचं जाड पोस्टकार्ड मिळायचं त्यावर रुबाबदार पट्टेरी वाघाचं चित्र असायचं.

चौथी पाचवीत होतो तेव्हा सावंताची बायना काकू तिच्या मुंबईतल्या पोरीकडं साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायला सांगायची. ती बरीच लांबड लावत लिहायला सांगायची पण पत्रावर थोडंच लिहायला जागा असायची. पत्ता लिहून पोस्टात टाकायला द्यायची. कधी मुंबईहून पोरीचं पत्र आलं की वाचून दाखवायला हाक मारून बोलवायची.

खरंतर इथूनच असं पोस्टाचं नातं जुळत गेलं.मी ही माझ्या मुंबईच्या मोठ्या आत्त्याबाईला पत्र पाठवायचो. गावाकडची ख्यालीखुशाली कळवायचो. तिचंही पत्र यायचं. पाचवीत असताना माझ्या मुंबईच्या याच इंदिरा आत्याने पोस्टाने जाड  आणि मजबूत असे पाठीवर अडकवायचे कापडी दफ्तर पाठविले होते. ते दफ्तर पाठीवर घेऊन किती मिरवलं होतं मी.

ती कधी कधी मनीऑर्डर करून पैसेही पाठवायची. पैशातून पाटी-पुस्तकं-कपडे घ्यायला सांगायची. खूप शिक म्हणायची. तिचा आणि माझा पोस्टामुळंच हा दुवा जुळत राहीलेला. ती आता नाही पण तिच्यामुळंच खरंतर शिक्षणाची गोडी लागली होती. तिनं रुजविलेल्या शिक्षणाच्या जिद्दीमुळंच मी शिक्षण घेत राहीलो. माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली. M.Ed., SET, झालो. आणि चार विद्यापिठाच्या Ph.D.साठी निवडलोही गेलो. माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणीत पोस्टाचा आणि मुंबईच्या आत्याबाईचा ठेवा चिरंतन आहे. माझ्या निंबवड्याच्या रेखा आत्यालाही मी साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायचो.

कधी लाल शाईनं लिहलेला कागद बापूतात्या घेऊन यायचा. ती तार असायची. लाल अक्षरातलं पत्र बघितलं की बायकांची रडारड सुरू व्हायची. गलका व्हायचा. कुणीतरी गेल्याची खबर असायची. कुणीतरी शिकलं सवरलेलं ती तार वाचून दाखवायचं. तार आलीय म्हंटलं की सगळे धसका घ्यायचे.

मी सातवीत असताना एकदा गावात येणाऱ्या पेपरमधले कोडे सोडवून पोस्टाने पाठवले होते. काही दिवसांनी बापूतात्याने पार्सल आले आहे,पोस्टातून सोडवून घ्या- म्हणून निरोप दिलेला. बक्षीसाचा रेडीओ पोस्टाने माझ्या नावे आला होता. त्याचं भारी कौतुक माझं मलाच वाटलं होतं. हुसेनभईने दीडशे का दोनशे रुपये भरून तो सोडवून घ्यायला सांगितले होते. पण तेवढे पैसे नव्हते. आमच्या आप्पाने कुणाकडून तरी पैसे गोळा करून दोन दिवसांनी तो रेडीओ सोडवून घेतला होता. ‘खोक्यात काहीही असेल,अगदी दगडंही,आमची जबाबदारी नाही’ असं हुसेनभईने अगोदरच सांगून बक्षीसाची हवाच काढून घेतली होती. पण खोक्यात चांगला मर्फी कंपनीचा रेडीओ आला होता. सेल घालून सुरुही झालेला. केवढा आनंद झाला होता. रेडीओ सुरु करून गावातनंही मिरवला होता. आप्पा सकाळ संध्याकाळ मोठ्या आवाजात तो रेडीओ लावून घराबाहेरच्या दिवळीत ठेवायचा. पुढं कितीतरी दिवस तो साग्रसंगीत सोबत वाजत राहीलेला.

पुढं हळू हळू काही पुस्तकं पोस्टानं मागवू लागलो. रंगपेटीही एकदा पोस्टाने आली होती. दिवाळीच्या वेळी पोस्टकार्डवर आकर्षक ग्रिटिंग कार्ड रंगवून ते मित्र व नातेवाईकांना पाठवलेली अजूनही आठवते. पुढं कॉलेजला असताना घरून मनीऑर्डर यायची. शिक्षणासाठी तोच आधार असायचा. आईआप्पाला पत्रातून ख्यालीखुशाली पाठवायचो. गावाकडून माझे दोस्त कधी गुंड्या,कधी रावसाहेब पत्र पाठवायचे. शाळेतला दोस्त मधू पुकळे काम शोधण्यासाठी मुंबईला गेला होता तेव्हा आठवणीनं पत्र मुंबईतनं पाठवायचा. पिक्चरमधल्या गोविंदाला भेटलेला किस्सा पत्रातून त्याने कळवला होता. रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवस आधी मुंबईच्या अंजूताईच्या राख्या न चुकता पोस्टाने येत रहायच्या.जवळच्या कितीतरी ज्ञात अज्ञातांनी पोस्टाने नोटस्,पुस्तके आणि मैत्रीची पत्रे पाठवलेली अजूनही आठवतात.नोकरीचा कॉलही पोस्टाने आलेला आजही मी जतन करून ठेवलाय. सिने अभिनेते स्व.दादा कोंडके यांना पाठवलेले पत्र अजूनही लक्षात आहे. ते पत्र त्यांना मिळालं का नाही काहीच कळलं नाही. कॉलेज जीवनात कॉलेजमधल्या एका मैत्रीणालाही पाठवलेले पत्रही तिला पोहचले का नाही काहीच कळलं नाही. ‘आमचा बाप आणि आम्ही ‘या पुस्तकाचे लेखक डॉ.नरेंद्र जाधव यांना माझे

‘काळजातला बाप ‘ पुस्तक दोनवेळा पाठवले होते. दोन्ही वेळा चुकीचा पत्ता म्हणून परत आलेले ते पार्सल मी अजूनही तसेच पॅकिंगमध्ये जपून ठेवलंय.

…अशा कितीतरी आठवणीं पोस्टाशी नाते घट्ट करणाऱ्या.. आजही त्या मनाच्या पोस्ट पाकीटात जतन करून ठेवल्यात पोस्टातल्या बचत खात्यासारख्या…!

आज पोस्ट खात्यात बरेच बदल झालेत पण पोस्टाशी असलेला आठवणींचा सिलसिला अजूनही माझ्या गावातल्या पोस्टमन बापू तात्या आणि हुसेन मास्तरच्या भोवती स्पीड पोस्ट सारखा पिंगा घालत राहतो…!

(आगामी संग्रहातून..)

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘रंग माझा वेगळा….’ – सुश्री सुलभा गुप्ते ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

रंगात रंग तो गुलाबी रंग

मला बाई आवडतो श्री रंग ॥

छेः छेः ! गैर समज करून घेऊ नका . माझे नाव गुलाबी नाही आणि मी हा नवऱ्याच्या नावाचा उखाणाही घेतलेला नाही, त्याचे नाव पण श्रीरंग नाही. कोणी म्हणेल लेखिकेच्या मनात आधीच होळीचे रंग भरलेत , तसे पण नाही.

इंद्रधनुष्याचे सात रंग सर्वज्ञात आहेत —- ” ता ना पि हि अ नि जा “

असे इंद्रधनूचे रंग लक्षात ठेवण्याचे सोपे सूत्र शाळेत आम्हाला शिकवले होते . तसेच हे सात रंग एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते , जे फक्त आकाशात दिसते, ही निसर्गाची किमया . आणि ते बघायला आबालवृद्ध सगळेच धावतात कारण हे अद्भुत बघून खूप आनंद होतो.

माणसाच्या आयुष्यात देखील हे सात रंग कधी ना कधी डोकावून जातात—-

केशरी रंग  त्यागाचा

पांढरा रंग शांतीचा

हिरवा भरभराटीचा

गुलाबी रंग प्रेमाचा

लाल रंग रक्ताचा

काळा म्हणजे निषेध !

—अशा सर्व संमत कल्पना आहेत.

माझ्या मनात मात्र प्रत्येक रंगाच्या वेगळ्या कल्पना आहेत. रंगांशी निगडित आपल्या भावना, अनुभव असतात. तो तो रंग बघून त्या भावना जागृत होतात.

केशरी म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो , डौलाने डुलणारा , शिवाजी महाराजांचा ” भगवा ” –मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक, महाराष्ट्र धर्माची, हिंदू धर्माची शान, देवळांच्या शिखरांवर शोभणारे केशरी ध्वज ! विजय पताका !

पांढरा रंग म्हणताच मला आठवतात  हिमालयाची उंच उंच बर्फाच्छादित शिखरे . त्यागाचे प्रतीक . उन्हातान्हाची पर्वा  न करता वर्षानुवर्षे उभे राहून सीमेचे रक्षण करणारा, आपल्या उंचीने भारताची शान उंचावणारा नगाधिराज हिमालय.  – मनात अभिमान उत्पन्न करणारा !

पांढरा रंग आणखी एक आठवण करून देतो — – सर्वसंग परित्याग करून पांढरी वस्त्रे  परिधान करणारे श्वेतांबर जैन साधू ! आपोआप आदराने आपण नतमस्तक होतो .

हिरवा रंग तर सृष्टीचा—

” हिरवे हिरवेगार गालिचे । हरित तृणांच्या मखमालीचे ” 

बारकाईने विचार केला तर निसर्गात हिरव्या रंगाची लयलूट आहे . गवत हिरवे , इवल्या रोपट्यांची पाने हिरवी, वृक्षलतांची पाने हिरवी . झाड लहान असो की मोठे, पाने मात्र हिरवीच !

मातृत्वाची चाहूल लागलेल्या तरुणीसारखी, हिरव्या रंगाने नटलेली सृष्टी ! काय विलोभनीय रूप तिचे !

लाल रंग आणि रक्ताचे जवळचे नाते . माझ्या डोळ्यांसमोर येथे युद्ध भूमीवर सांडलेले सैनिकांचे रक्त आणि जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान . रक्तच ! पण एक मातृभूमीसाठी सांडलेले आणि दुसरे कुणा अनोळखीचा जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान

काळा रंग निषेधाचा ! मोर्चामध्ये वापरतात काळे झेंडे. पण माझ्या मनात चित्र उभे रहाते – पावसाळ्यातले ते काळे ढग – पावसाच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येणारे दूतच ते ! बळीराजाला आनंद देणारे, ग्रीष्माच्या उन्हाने तापलेल्या तृषार्त भूमीला शांती संदेश घेऊन येणारे !

आता मुख्य माझा आवडता रंग – – अहो कोणता काय ? ?? –अर्थात गुलाबी .

नवजात बालकाच्या ओठांचा गुलाबी–प्रेयसीच्या ओठांचा गुलाबी–लज्जेने प्रियेच्या गालांवर फुलणारा गुलाबी–

मधुर , औषधी गुलकंद बनवावा असा गुलाबांचा गुलाबी–आपल्या उमलण्याने आसमंत दरवळून टाकणारा सुंदर गुलाब , रंग गुलाबी—- हे सर्व तर अर्थात मोह पाडतातच पण मुख्य म्हणजे —

लहानपणापासून ऐकलेले, वाचलेले, फोटोत पाहिलेले – सावळ्या घननीळाचे गुलाबी पदकमल —-

कमलपुष्प अधिक गुलाबी– की भगवान श्रीकृष्णाची सुकुमार पावले अधिक गुलाबी ? मनात नेहमीच संभ्रम निर्माण होतो . 

पण म्हणूनच माझा आवडता रंग  – श्रीरंग ! भक्ति- प्रेमाचा रंग श्री रंग .

आठवा रंग . श्री रंग. 

लेखिका : सुलभा गुप्ते, सिडनी .

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पालक स्वतःचीच… लेखिका :उषा फाटक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पालक स्वतःचीच… लेखिका :उषा फाटक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

मी. वय ७४ ….पालक स्वतःचीच !!

पंचवीस वर्षापूर्वी माझी दोन्ही मुलं घर सोडून बाहेर गेली.

प्रथम शिक्षणासाठी, मग नोकरी साठी.

आधी देशात, नंतर परदेशात.

त्याच वेळी मनाशी खूणगाठ बांधली की आता यापुढे आपणच आपल्या साठी. (खरंतर ही खूणगाठ मुलं जन्माला आली तेव्हाच बांधली होती, की वीस पंचवीस वर्षांनी पाखरं घरटं सोडून उडून जाणार).

एकदा मनाची तशी धारणा झाल्यावर पुढचं फार सोपं होतं. आपली सर्व कामे आपणच करायची.

शक्यतो कुणावर अवलंबून रहायचं नाही. एकदा करायला लागलं की सगळं जमतंच !!

त्या काळात हा शब्द नव्हता पण ‘आत्मनिर्भर’ झाले.

घरात कंप्यूटर असून कधी हात न लावणारी मी, पन्नासाव्या वर्षी क्लासला जाऊन कंप्यूटर शिकले. मुलांना मेल करु लागले. पुढे फेसबुक, व्हाट्सअँप, स्काईप, व्हिडिओ कॉल …टेक्नॉलॉजी बदलत गेली तसं मीही सगळं वापरायला शिकले. मुलं पुढे पुढे धावताहेत… आपण थोडं चालायला तरी हवं. नाहीतर आपल्यातलं अंतर वाढतच जाईल.

केल्याने होत आहे रे….. आधी केलेची पाहिजे !!

आत्मविश्वास वाढत गेला. आता कोविडच्या काळात ऑनलाईन व्यवहार सोपे झाले. खरेदी, बँकेचे व्यवहार ऑनलाईन करायला शिकले. काही अडले, तर विनासंकोच कुणाला विचारते.

आता मी एकटी रहाते. मुलांशी संपर्क असतोच. आपली आई चांगली खंबीर आहे, हा विश्वास मुलांनाही आहे.

सुदैवाने प्रकृती चांगली आहे. लहानपणापासून केलेला व्यायाम आणि संतुलित आहार-विहार यामुळे हे साध्य झाले आहे.

नातेवाईक, शेजारी यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. मित्रमंडळी आहेत, स्वतःचे छंद आहेत. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच कधी पडत नाही.

एक गोष्ट नक्की…. आपण दुसऱ्यासाठी होईल तेव्हढे करत रहावे… आपल्यावर वेळ आली तर कोणीतरी नक्की धावून येतील. आधी प्रेम द्यावे आणि मग प्रेम घ्यावे…

“एकमेका करू सहाय्य” हा आजच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.

आज तरुण असलेल्या पिढीलाही मी हेच सांगेन…  म्हातारपणासाठी जशी आर्थिक तरतूद करता, तशी शारीरिक आणि मानसिक तरतूदही करा. शारीरिक फिटनेससाठी व्यायाम  आणि मानसिक फिटनेससाठी आवडीचा छंद जोपासा… स्वतःचे विश्व निर्माण करा….आणि मुख्य म्हणजे झाल्यागेल्याची खंत करणे सोडून द्या. वृत्ती समाधानी ठेवा.

आणि हो, हे सर्व एका दिवसात निर्माण होत नाही. तरुण वयातच याची सुरुवात करावी लागते. तरच म्हातारपण सुखाचे होईल !

लेखिका :उषा फाटक

संग्राहिका: मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

जलचर  म्हणजे माशांचे प्रकार, कासव ,  मगरी यांचे सावधपण वेगळे असते. शार्क माशांच्या कातडीमधे विद्युत वहन होते. चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचे व्होल्टेज तयार होते.व त्यानुसार तो डाव्या उजव्या बाजूला जाऊन दिशा ठरवतो.तसेच व्हेल मासा जेव्हा शंभर – शंभर कि. मि. प्रवास करतो तो एक डिग्रीसुद्धा इकडे तिकडे न होता ,सरळ रेषेत प्रवास करतो. याबद्दलचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. सील सारखे सस्तन जलचरसुद्धा चुंबकीय  क्षेत्राचा वापर करतात. चुंबकीय क्षेत्रात थोडा जरी बदल झाला तरी तो त्यांच्या लक्षात येतो.आँक्टोपस आपले अवयव कसेही  वाढवतो आणि सावज पकडतो. तारा मासे विषारी द्रव सोडतात. समुद्री गाय म्हणजे अवाढव्य जलचर! सात सात तास अखंड समुद्रातील वनस्पती खात असतात.व ताशी पाच मैल वेगाने  फिरत असतात. मगरी आपली  अंडी मऊ भुसभुशीत संरक्षित जागेत व डोहाच्या ठिकाणी घालून ती मातीने गाडून त्याची राखण करतात. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की पोहायला सुरुवात करतात. बदके किंवा राजहंसही एखाद्या प्राण्यापासून धोका आहे असे कळताच त्यावर ते फुत्कारतात.आणि अत्यंत आक्रमक होतात.काही जीवांना उपजतच द्न्यान असते. बदकाची पिल्ले अंड्यातून बाहेर पडली की,लगेच दाणे टिपायला लागतात. आकाशात घार दिसली की कोंबडी वेगळा आवाज काढून आपल्या पिलांना जवळ बोलावते.आणि आपल्या पंखाखाली घेऊन त्यांचे रक्षण करते.या सावधपणाचे वर्णन कसे करावे?

पक्ष्यांच्या बाबतीत सांगायचे तर, पक्षी स्थलांतर ही अनाकलनीय आणि विस्मयकारक घटना आहे असे म्हणावे लागेल. उत्तर ध्रुवावरील (सैबेरिया)भागात थंडी सुरू झाली की, खाद्याच्या तटवड्यामुळे अनेक पक्ष्यांचे थवेच्या थवे स्थलांतर करू लागतात. एका वर्षात ३६०००कि.मि.प्रवास म्हणजे उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव आणि पुन्हा उत्तर ध्रुव असा न चुकता करतात आणि  रात्री दाट पानांंमधे विश्रांती घेऊन स्वसंरक्षण करतात.अनेक पक्षी आपली विष्ठा पातळ आवरणात ठेवून ,विसर्जन करुन ,घरटे साफ ठेवतात. पिलांना अन्न भरवून ती स्वावलंबी होईपर्यंत सावधपणे त्यांच्या पाठीशी रहातात.सुगरण पक्ष्याचे तर किती कौतुक करावे तितके कमीच.! हिवाळ्यात थंडीची पूर्वसूचना ते लोकांना देतात. कायम थव्याने राहून ,घरटीही मोठ्या संख्येने बांधून, नवीन वसाहतच स्थापन करतात. धोका उत्पन्न झाल्यास चिट् चिट् असा आवाज काढून संपूर्ण वसाहतीला धोक्याचा इशारा देतात. नरपक्षी घरट्याचा पाऊण भाग विणतो.मादीला घरटे पसंत पडले की, मग तो अस्तर लावून घरटे पूर्ण करतो.अशी चार पाच घरटी बांधून कुटुंब वाढवतो.

घरटी बांधताना जमिनीपासून तीस मिटर उंचीवर व घरट्याखाली पाणी असेल अशा  ठिकाणी  किंवा काट्याच्या बाभळीच्या झाडावर अशा निर्धोक जागी घरटे बांधणे पसंत करतो.घरटे बांधताना देखील सुरुवातीला नळीचा आकार ,आतमध्ये  कधी जोडघरेही असतात. जेणेकरुन मोठा पक्षी  आत जाणार नाही. ही सावधानताच नव्हे काय?

सुगरणीवर अनेकांनी कविताही केल्या आहेत. बहिणाबाई तर म्हणतात, “अरे खोप्यामधी खोपा , सुगरणीचा चांगला,एका पिलासाठी तिने जीव झाडाला टांगला. किती छान!

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ होतं असं कधीकधी…! ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ होतं असं कधीकधी…!  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

खूप महत्वाच्या मीटिंगमध्ये असतो आपण…

बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली….

इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण…

संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते…

परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे…

टाळतो आपण कॉल करायचा….

त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो…

‘तुझ्या ऑफिस बाहेर होतो…

भेटलो असतो…’

जुन्या आठवणी काढत बसतो आणि  मन रमवतो त्यातच..

स्वतःला खोटं खोटं समजावत…!

होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁

कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली…

रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना…

माया,कणव दाटून येते मनात आपल्या…

‘कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत?’

पाकिटात हात जातो…

शंभराची नोट लागते हाती…

व्यवहार जागा घेतो ममतेची…

समोरचा म्हातारा ओळखतो… बदलतो…

“दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा…”

तो सुटका करतो आपली पेचातून…

आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून…

होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁

दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले…

आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते…

तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा  वेळी…

दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात…

ती येते…

काम आटोपते…

तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना, कामवाली एक डबा देते हातात आपल्या…

चिवडा लाडू असतो त्यात…

“तुम्ही दर वेळा देता… आज माझ्याकडून तुम्हाला…”

‘कोण श्रीमंत कोण गरीब’, हा विचार सोडत नाही पिच्छा आपला…

होतं असं कधी कधी….!!!

🍁🍁🍁

ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर…

आई उठवते उन्हं अंगावर  आल्यावर…

अंगात ताप असतो तिच्या…

आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती…

मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत…

दिवस उलटतात…

वडिलांचा एके रात्री फोन येतो…

“काम झालं असेल तर आईला एक फोन कर… आज तिचा वाढदिवस होता…”

कोडगेपणा म्हणजे हाच तो काय…!

चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले  birthday विश आठवतात…..

लाजत तिला फोन करतो…

“आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा…”

ती बोलते…

कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो…

अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून…

काहीतरी खूप खूप दूर जातंय आपल्या पासून असं जाणवत राहतं…!!

खरंच, होतं असं कधी कधी…!!

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares