मराठी साहित्य – विविधा ☆ जमापूंजी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ जमापूंजी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

माणूस म्हंटला की त्याला “संचय करणं” ह्याची आवड असते,सवय असते आणि त्याचं खूप महत्वही असतं. थोड्याफार जबाबदा-या उरकल्या की आपणच आपला सगळा हिशोब घेऊन बसतो. ह्या सगळ्या उलाढालीतून आपल्या जवळ काय उरलयं ह्याकडे प्रामुख्याने आपण लक्ष देतो.

आपल्याजवळ किती उरलयं वा आपल्याजवळ  शिल्लक किती ह्याकडे वळून बघतांना प्रथम आर्थिक बाबीकडे लक्ष जातं, नव्हे जवळपास त्याच निकषावर आपलं लक्ष केंद्रीत असतं. पण आपण जमा किती केलयं हे माणसं जोडणं, माणसं जपणं ह्या बाबीशी सुद्धा पडताळणं तेवढचं महत्त्वाचं असतं पण दुर्दैवाने तरुणाईच्या, यशाच्या धुंदीत बरेचवेळा ह्याचा विचार देखील आपल्याकडून होत नाही ही खेदाचीच बाब आहे.

माणसं, जोडणं, जपणं  ह्याला पण आपण “जमापूँजी” म्हणूच शकतो. काल एक “जमापूँजी “नावाची खूप मस्त शाँर्टफिल्म बघण्यात आलीयं. अर्थातच ती प्रत्यक्ष बघण्यातच खरी मजा आहे.कथानक तसं नेहमीचचं.बापलेकाच्या जनरेशन गँप मुळे गमावलेल्या खूप काहीबद्दल ही शाँर्टफिल्म सांगून जाते.नेहमीप्रमाणे “आई” नावाचा  हा दोघांना जोडणारा दुवा आपल्या परीने शक्यतोवर समेटाचा प्रयत्न करीतच असतो.

ही शाँर्टफिल्म बघतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, संवाद न साधणं, आणि त्यामुळे निर्माण झालेले गैरसमज ह्यामुळे आपण खूप काही गमावून बसतो आणि हे कळतं ते ही वेळ निघून गेल्यावरच ही आणखीनच दुर्दैवाची बाब. परस्परांशी घडघड मनमोकळं न बोलण्याने खरोखरच न भरून निघणारं नुकसान होतं हे ही शाँर्टफिल्म बघून जाणवलं.

मनमोकळे संवाद साधणे ही बाब खास करून  पुरुषांनी आवर्जून शिकून अंमलात आणण्याची बाब आहे कारण घडाघडा न बोलणा-या स्त्रिया ह्या अभावानेच आढळतील.

ह्या शाँर्टफिल्म मध्ये वडिलांबद्दल ओलावा, प्रेम नसलेल्या मुलाच्या डोळ्यातून त्यांच्या बद्दल असलेल्या गैरसमजामुळे त्यांच्या मृत्यू नंतर एकही अश्रुचा टिपूसही येत नाही अर्थातच टाळी एका हाताने कधीच वाजत नसते म्हणा. ही परिस्थिती उद्भवायला वडिलांचे सारखे तुलना करणे, संवाद न साधणे, आतून खूप असलेलं प्रेम मुलासोर अजिबात प्रदर्शित न करणं ह्या बाबी सुद्धा तेवढ्याच कारणीभूत असतात. वडीलांच्या मृत्यूनंतर आई काही प्रमाणात मुलाला वास्तविकतेची जाण देऊन मनातील किल्मीष दूर करण्यास सांगते.परंतु मुलाला ही एक प्रकारची रदबदली वाटते.

परंतु सामान आवरतांना मुलाला जेव्हा वडीलांना त्याच्याबद्दल वाटणा-या प्रेमाचा दाखला जेव्हा नजरेस पडतो तेव्हा मात्र मुलाच्या मनातील कटूता गळून पडते.  मुलाने लहानपणी काढलेलं चित्र, मुलाने वडीलांना गिफ्ट म्हणून पाठवलेलं रिस्टवाँच वडीलांनी जपून ठेवलेलं असतं ही बाब मुलाला एखाद्या इस्टेटीपेक्षाही भारी आणि महत्वपूर्ण वाटते. आणि वर्षानुवर्षे न साधलेली किमया हे चित्र, ते घड्याळ करतं आणि मुलाच्या डोळ्यातून त्याच्याही नकळत टपटप अश्रू ओघळायला लागतात.

कदाचित ह्या गोष्टींचे महत्त्व तरुणाईच्या जोषात लक्षात येत नाही परंतु आपल्या सगळ्यांनाच उत्तरायणाच्या दिशेने केव्हा ना केव्हा वाटचाल ही करावीच लागते. तेव्हा ह्या “जमापूँजी”च्या संकल्पनेत आर्थिक या बाबी बरोबर माणसं जोडणं, ती कायम जपणं ह्या संकल्पनेचा पण  समावेश असतो हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे कारण  पुढे मिळणाऱ्या सुख, समाधान, संतोष ह्याची ती  जणू गुरुकिल्लीच आहे. सोबत शाँर्टफिल्म ची लिंक देते आहे.

👉 https://youtu.be/JgvrQCxGepU

©  सौ.कल्याणी केळकर बापट

06/09/2022

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कवी मंगेश पाडगावकरांच्या घरात चोरी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कवी मंगेश पाडगावकरांच्या घरात चोरी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कवी मंगेश पाडगावकरांच्या घरात चोरी

पाडगावकर त्या चोराचेच कौतुक करत होते ही हकीगत सांगताना.

इतक्या भर पावसात तो पाईपवरून चढला कसा असेल? दुसऱ्या मजल्यावरच्या आमच्या खोलीत शिरला कसा असेल? खरंच काही कल्पना करवत नाही !

तरी एकाने थट्टेने विचारले ,”कवितांचे हस्तलिखित त्याने नेले नाही ना?”

तेव्हा पाडगावकर म्हणाले, ” माझे दुःख त्यापेक्षा जास्त आहे. मी पोलिस स्टेशनवर गेलो .तक्रार केली. काही दागिने, वस्तू गेल्या होत्या, त्याची माहिती दिली व नंतर उत्सुकतेने त्या पोलिस अधिकाऱ्यास म्हटले,’मला साहित्य अकादमीने दिलेले एक मेडल त्यात होते, तेही चोराने नेले आहे’.

पोलिस अधिकाऱ्याने मान वर करून विचारले ,’ते कशाचे होते?’ ”

पाडगावकर म्हणाले ,”साधेच असते.काही खास मेटल त्यासाठी वापरले जाते असे नाही .”

“मग चिंता कशाला करता? घराजवळच शोधा.चोराने ते निश्चितच रस्त्यावर टाकले असेल”.

पाडगावकर घरी आले.आपल्या घराच्या जवळच्या रस्त्यावर पाहिलं मग गटारात पाहिलं .

साहित्य अकादमीने ‘सलाम’ कवितासंग्रहाला दिलेले ते पदक चोराने खरोखरच गटारात टाकले होते.त्याच्या लेखी त्या पदकाची किंमत शून्य होती.पाडगावकरांनी ते आनंदाने उचलले.

साहित्य अकादमीचे पदक फक्त मिळाले, बाकीचे सर्व गेले, कारण ते मौल्यवान होते!!!!

पाडगावकर म्हणाले, माझा चोराला सलाम

—तेच ते.

लेखक : अज्ञात.

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर.

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सस्पेन्शन” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ “सस्पेन्शन” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

नॉर्वे हा युरोपमधील एक देश आहे. तिथे कुठेही जाता हे दृश्य सहसा सापडेल… 

एक रेस्टॉरंट, एक महिला त्याच्या कॅश काउंटरवर येते आणि म्हणते — 

” ५ कॉफी, १ सस्पेंशन “…

मग ती पाच कॉफीचे पैसे देते आणि चार कप कॉफी घेऊन जाते. थोड्या वेळाने दुसरा माणूस येतो, म्हणतो —

” ४ लंच, 2 सस्पेंशन “!!! 

तो चार लंचसाठी पैसे देतो आणि दोन लंच पॅकेट घेऊन जातो. मग तिसरा येतो आणि ऑर्डर देतो — 

” १० कॉफी, ६ सस्पेंशन” !!! 

तो दहासाठी पैसे देतो, चार कॉफी घेतो. 

थोड्या वेळाने जर्जर कपडे घातलेला एक म्हातारा काउंटरवर येऊन विचारतो —

” एनी सस्पेंडेड कॉफी ??” 

उपस्थित काउंटर-गर्ल म्हणते -” येस !!”–आणि त्याला एक कप गरम कॉफी देते.

काही वेळाने दुसरा दाढीवाला माणूस आत येतो आणि विचारतो – ” एनी सस्पेंडेड लंच ??”

–काउंटरवरील व्यक्ती गरम अन्नाचे पार्सल देते आणि त्याला पाण्याची बाटली देते. 

आणि हा क्रम सुरू… एका गटाने जास्त पैसे मोजावेत, आणि दुसऱ्या गटाने पैसे न देता खाण्यापिण्याचे पदार्थ घ्यावेत,असा दिवस जातो. म्हणजेच, अज्ञात गरीब, गरजू लोकांना स्वतःची “ओळख” न देता मदत करणे ही नॉर्वेजियन नागरिकांची परंपरा आहे. ही “संस्कृती” आता युरोपातील इतर अनेक देशांमध्ये पसरत असल्याचे समजते.

आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना केळी किंवा संत्री वाटली, तर ते सर्व मिळून त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या संघटनेचा ग्रुप फोटो काढून वर्तमानपत्रात छापतो, हो की नाही ???

अशीच “सस्पेंशन” सारखी खाण्या-पिण्याची प्रथा भारतात सुरू करता येईल का किंवा दुसरं काही तरी ???

….. न गवगवा करता

प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुळस… लेखक : डाॅ. जयंत गुजराती ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ तुळस… लेखक : डाॅ. जयंत गुजराती ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

“मी वेडी नाहीय्ये हो डॉक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी चांगल्या घरची तरीही मला वेडी ठरवली गेलीय. विनाकारण डांबून ठेवलेय या वेड्यांच्या इस्पितळात. मला गोळ्या इंजेक्शनं याची काहीच गरज नाहीये. उगाचच माझे हाल करताहेत सगळे. नर्स, वॉर्डबॉय, इथले डॉक्टरही. सांगून सांगून थकले मी. परोपरीने मी विनवण्या केल्या, हातापाया पडले पण पालथ्या घड्यावर पाणी. म्हातारी झाले म्हणून काय झाले? मी हिंडू फिरू शकते. चांगलं बोलते तशी वागतेही. काय न्यून आहे माझ्यात की मला या छोट्याशा खोलीत जखडून ठेवलंय? सुरूवातीस सगळे सांगतील तसं केलं,तरीही छळ मांडला गेलाच माझा.”

मी फाईलवरनं हात फिरवत होतो. ऐंशीला टेकलेल्या बाईचं बोलणं मी शांतपणे ऐकत होतो. तिच्या बोलण्यात ओघ होता. रडकथाच. पण ती रडत नव्हती. हतबलता डोळ्यांतून पाझरत असलेली. व्हेरी डेंजरस, व्हायोलंट, पझेसिव्ह, फाईलमधले शेरे व तिचं म्हणणं मेळ खात नव्हते. काउन्सेलर म्हणून नेमणूक झाल्यापासून इस्पितळातील एकूणएक पेशंटसच्या फाईली बघून झाल्या होत्या. नेहेमीच्या डॉक्टरांच्या उपचारांमधे दखल न घेता प्रत्येक केसमधे काऊन्सेलिंगची गरज आहे का हे पाहून त्यानुसार पुढचे मानसोपचार  ठरवण्याची मुभा मात्र होती. तसं पाहिलं, तर वेड्यांच्या इस्पितळातील प्रत्येक केस ही आव्हानात्मक असते. तरीही बऱ्याचशा केसेस बरे होण्यापलीकडे गेलेल्या असतात. मग अशा केसेसना वगळून ज्यात काही करता येऊ शकेल अशा केसेस हाताळायच्या हेही ठरलेलं. मनोविकारतज्ञ व्हायचं हे एमबीबीएस झाल्यावर नक्की केलेलं. मनोविकार म्हणजे तमाने व्यापलेलं वेगळंच विश्व. प्रत्येक रुग्णाची कथा व्यथा निराळीच. मनोविकारांचे एकेक पदर उलगडले की माणसाच्या मनाची काळी, विकृत, दळभद्री, अनुचित, नैराश्याने ग्रासलेली, क्वचित शिसारी आणणारी,शेंडाबुडखा नसलेलीही बाजू समोर येत राहते.  हे सारं अभ्यासताना माणसाच्या मनाचे रूप,विद्रूप पाहून थक्क व्हायला होतं. साऱ्या केसेस हाताबाहेरच्या नसतात. अंधुकशी आशा कुठेतरी असते की संपेल हे नरकातलं जगणं. अशा केसेस निवडून पुढील उपचार करायचे हा प्रोटोकॉल. अशीच ही केस, फाईलवर नाव ठळकपणे लिहीलेलं होतं तरीही विचारून घेतलं,  “नाव काय आपलं? ” बऱ्याच वेळ त्या बोलल्याच नाही. शून्यमनस्कपणे खिडकीतून बाहेर बघत राहिल्या. खोलीतल्या झरोक्यातून उन्हाच्या तिरिपीमुळे त्यांचा सुरकुत्यांनी वेढलेला उदास चेहेरा भाजून निघत असलेला. तरीही मघा ज्या अजिजीनं म्हणणं मांडत होत्या, त्या आता थिजल्यासारख्या. मी उगाच फाईलशी चाळा करत बसलो. मात्र त्यांच्यावरची नजर ढळू दिली नाही. भरभरून बोलणं व मधूनच एकदम गप्प होऊन जाणं, हे मनाने आजारी असलेल्यांमध्ये तसं नेहेमीचंच. अशावेळेस वाट बघणं हे ओघानं आलंच. तीही बोलेना, मीही बोललो नाही. इतर रुग्णांनाही भेटायचं होतं. मी हलकेच उठलो. खोलीतून बाहेर पडत असताना दाराजवळ पोहोचताच मागून आवाज आला, “ मी वृंदा गोखले….” तरीही मी  “उद्या येतो”, म्हणत खोली सोडलीच.

गुंतागुंतीच्या अनेक केसेस सोडवताना एकेक विलक्षण कथा ऐकावयास, पाहावयास मिळतात. त्यातही काही तर चटका लावणाऱ्याच. त्यापैकीच ही एक असावी. अगदी घरी जाईपर्यंत व घरी गेल्यावरही वृंदा गोखले यांचा पीडेने करपलेला चेहेराच सारखा समोर येत असलेला. फाईलमधून फारसं काही हाती लागलं नव्हतं. अडीच तीन वर्षांपूर्वी त्या इस्पितळात आणल्या गेलेल्या.  कुणी आणून सोडलं याचा पत्ता नव्हता. त्यावेळचे डॉक्टरही बदलून गेलेले. अधूनमधून त्यांना वेडाचे झटके येतात. त्यावेळेस  सतत रडणं, किंचाळणं, कधीकधी दार खिडक्या आपटणं. हातात असेल ते फेकून मारणं व मग जोर ओसरला की उदासवाणे होऊन बसून राहणं काही खाता न पिता दिवसच्या दिवस. त्यातही ‘ मी वेडी नाही,’ हा हेका कायम. सीनिअर सिस्टर व सीनिअर वॉर्डबॉय यांनी ही वेगळी केस असल्याचे इस्पितळात ड्युटीवर रूजु झालो होतो, त्यादिवशीच सांगितलं होतं. दीड महिना झाला रुजू होऊन. या दिवसांत मोजून सहा केसेसच निवडल्या होत्या. त्यात ही गोखलेंची. पडलेल्या चेहेऱ्याने वावरणाऱ्या.

दुसऱ्या दिवशी  गोखले काकू जणू वाटच पहात असल्यासारख्या. अगोदर पहिल्या पाच केसेस पाहूनच काकूंना सर्वात शेवटी  भेटायचं हे ठरवलं होतं. जेणेकरून काकूंना जास्त वेळ देता यावा. नेहमी विमनस्क राहणाऱ्या गोखले काकूंच्या चेहेऱ्यावर आज ताजेपणा उमटलेला.  इस्पितळात वावरताना रोज नजरानजर व्हायची. डॉक्टर रुग्ण एवढीच ओळख एकमेकांची. गोळ्या औषधं घेतली का नाही, असे जुजबी बोलणं. कालपासून प्रत्येक केस वेगळी हाताळायची ठरवल्यावर प्रथमच बोलणं झालं होतं जवळून. आज खोलीत गेल्या गेल्या हात पकडून खाटेवर बसवून घेतलं. “ मी वृंदा गोखले, बोलू का? ” मी मानेने होकार भरताच त्या भडभडून बोलायला लागल्या. “ तीन वर्षं झाली त्या गोष्टीला. म्हणजे मला वेडं ठरवलं गेलं त्या गोष्टीला!!  सगळं लख्ख आठवतंय. का नाही आठवणार? सगळं घडलंच होतं विपरीत. कधीही विसरता न येण्याजोगं. साठ वर्षांचा सहवास सोडून हे गेले. दीर्घ आजाराने जर्जर होऊन गेले. सोन्यासारखे दोन मुलगे.ते परदेशात युएसला. मुलगी कॅनेडात. तिघांचाही सुखी संसार. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून हे गेले. सर्व मुलामुलींनी आपल्या बरोबर रहावं ही शेवटपर्यंतची त्यांची इच्छा. मुलं हुशार निघाली. मोठमोठाली पॅकेज घेऊन पंख पसरून उडून गेलीत. ह्यांनी तर शनिवारपेठेतली बखळवजा राहती जागा तशीच ठेऊन कोथरूडला दोन फ्लॅटही घेतले शेजारी शेजारी. अगोदर मुलीचं लग्न लावून दिलं श्रीमंत सासर पाहून, मग सुना आणल्या. मुलं, मुलगी, सुना सगळे हुशारच. सगळे कमवते.  काहीच ददात नाही. ” गोखले काकूंनी आवंढा गिळला. मधेच थबकल्यासारख्या, काहीच बोलल्या नाहीत बराच वेळ. मी पाण्याचा ग्लास दिल्यावर तो घटाघटा पिऊन टाकला.

“ह्यांच्या आजारपणातच दीड वर्षं  गेलं. इथे मी एकटीच. सर्व सेवा केली. पैसा अडका काही कमी पडू दिलं नाही. मुलांना, मुलीलाही परोपरीने विनवण्या केल्या की या भेटायला, बाबांना भेटायचंय. कुणीही फिरकलं नाही दीड वर्षात. मी माझ्यापरीने कुठेही कमी पडले नाही. शेवटपर्यंत आशा होती की हे हाताशी येतील, बरे होतील. आणखी काही दिवस असतील सोबत. पूर्वीही सुखासमाधानाने जगलो होतो. परत तसेच जगू!! मी तर साठ वर्षे अधिराज्यच गाजवलं होतं आयुष्यात. किती दागिने घातले होते, किती पैठण्या नेसल्या होत्या, किती मिरवून घेतलं होतं, मोजदादच नाही. वाटलं होतं असतील सोबत काही दिवस. होतील बरे, पण तसं व्हायचं नव्हतं.”

बराच वेळ पुन्हा त्या गप्पच. मग एकदम कडवटपणे म्हणाल्या, “ ते गेल्यावर सगळे आले. क्रियाकर्म पार पाडण्याचीही वाट काही पाहिली नाही पोटच्या गोळ्यांनी. शनवारातली बखळवजा जागा, कोथरूडमधले दोन फ्लॅट्स, शिवाय गावाकडची जमीन सगळ्यांचा सौदा करून टाकला. मुंबईतील कोणीतरी मोठी असामी होती त्याच्याबरोबर, बॅंकेतील लॉकरमधील कॅश व दागिनेही आपापसात वाटून घेतले. सहा महिन्यांपासून मुलांनी तयारी करून ठेवली होती सौद्यांची म्हणे!! नंतर कळलं मला ते! मी या सगळ्याला विरोध करेन हे गृहीत धरून मला वेडी ठरवण्याचेही ठरवून टाकलं होतं. तसं सर्टिफिकेटही मिळवलं कायदेशीर व मला वृद्धाश्रमात न धाडता पोहोचवलं या इस्पितळात वेडी म्हणून. एक लॉकर यांनी कुणालाही न सांगता वेगळं ठेवलं होतं तेवढं वाचलं गिधाडांपासून. तरीही मुलगी विचारत होती, तुला माहेराहून मिळालेली मोत्यांची नथ यात दिसत नाही ती!! मग मात्र मी वेडच पांघरलं. आतून तर कोसळूनच पडले. जे आपले आहेत ते आपले होऊ शकत नाही तर इतरांबद्दल काय बोलावं. दहा दिवसात सगळं होत्याचं नव्हतं झालं. पंधराव्या दिवशी सगळे पांगलेसुद्धा आणि नकोशा गोष्टीला उकिरड्यावर फेकून देतात तशी मी भिरकावली गेली इथे. ” कळवळून बोलत असलेल्या गोखले काकू खिन्नपणे शांत झाल्या निदान बाहेरून तरी.

माझी फाईलवरची पकड काहीशी सैल झाली. मी फाईलमधील पानं पुन्हा भरभर चाळायला लागलो. एके ठिकाणी थांबलो.  त्या पानावर लिहीलं होतं, सुनेच्या कपाळावर साणसी फेकून मारून भोक पाडलं होतं. मी नेमकं त्यावर बोट ठेऊन गोखलेकाकूंसमोर धरलं. तर त्या शांतपणे म्हणाल्या, “ सगळं खोटं आहे. मुलाला बोचकारल्याचं, भला मोठा आरसा फोडल्याचं, देवघरातले देवही नदीत फेकून दिल्याचंही त्यात लिहीलं असेल!!”

मी म्हटलं, “बरोबर आहे, पण तुम्ही हे सगळं कुणाला सांगितलं का नाही?” त्यावर त्या उदासपणे म्हणाल्या, “ इतकी वर्षं माझ्याशी कुणी जिव्हाळ्याने बोललंच नाही रे!! ” यावर काय बोलावं सुचेचना!! त्यांच्या शब्दाशब्दांतून अगतिकता पाझरत होती. मनाला सारखं मारावं लागलं असेल क्षणोक्षणी, अधिराज्य गाजवणारीला  पदोपदी अवहेलना सोसावी लागली असेल. किती भोगलं असेल वृंदाकाकूंनी. त्यापेक्षा वेड लागलेलं परवडलं!!

गोखले काकूंशी मग रोजच भेटणं व्हायला लागलं तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर उलगडत गेले. काय नव्हतं वृंदा गोखलेंकडे? अगदी पाळण्यातल्या मुलांसाठी बडबड गीते, मोठ्या मुलांसाठी गोष्टी, व्रतवैकल्ये करणाऱ्यांसाठी कहाण्या, कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींसाठी कथा, मोठ्यांसाठी अनुभवाचे बोल. गोखलेकाकू एकदा बोलायला लागल्या की ऐकत राहावंसं वाटत राहतं आणि दुर्दैव म्हणजे आतापर्यंत त्यांच्याशी बोलायला कुणी नव्हतं.  “मला झोपेच्या गोळ्या नकोत रे!!  मी तासनतास झोपून राहते. सारखी मरगळ मुरते मग अंगात!! मला जगायचंय अजून! मला माणसांत रहायचंय.” त्यांच्या काकूळतीने मलाही गलबलून यायचं. त्यांचा वनवास संपला पाहिजे असं मनापासून वाटायला लागलं. हळुहळू त्यांच्या गोळ्यांचा डोस टेपर करत आणला.

बरेच दिवस गेले. गोखले काकू कैदेत असल्याची जाणीव मनाला कोरून खात होती. त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल यावर विचार करत असताना एकदम सुचलं. इस्पितळातून त्यांना घेऊन मित्राचा एक छोटेखानी फोटो स्टुडिओ होता तेथे गेलो व त्यांचा एक विडीओ बनवला व युट्युबवर अपलोड केला. अगदी त्यांचं पर्सनल चॅनलच बनवून टाकलं. मग रोज एक विडीओ द्यायला लागलो. त्यांची बडबड गीते, गाणी,अनुभवाचे बोल, आजीबाईचा बटवा, गृहिणींसाठी नवनवीन रेसिपी,  त्यांच्याशी मनसोक्त गप्पा असं साधं सुटसुटीत स्वरूप ठेवलं. चॅनलचं नाव ठेवलं,  तुळस. आठवडाभरातच पाच हजार फॉलोअर्स मिळाले चॅनलला. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप.. जगभरातील मराठी बांधवांनी भरघोस प्रतिसाद दिला. आपापली मते, आपापल्या समस्या, आपले विचारही तुळस चॅनलवर यायला लागले. सुरूवातीला अवघडलेल्या वाटत असणाऱ्या गोखले काकू लवकरच रूळावल्या. काही दिवसात तर मित्राने तुळस पेड चेनल करून टाकलं. काकूंकडे तेवढीच गंगाजळी. चॅनल पेड केलं  तरीही काकू दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेल्या. ही तुळस आपल्याही अंगणात असावी अशी ओढ प्रत्येकाच्या मनात.

मी आपला बाजूस होऊन डवरणाऱ्या तुळशीला विस्मयाने पाहत राहिलो. थोड्याश्या पाण्यानेही कोमेजलेली तुळस पुन्हा टवटवीत होते हा अनुभव गाठीशी. तसं तर ओलावा थोडासाच तर हवा असतो!!

लेखक : डॉ. जयंत गुजराती नासिक

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर, मुंबई.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘या सम हा’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ ‘या सम हा’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

इतर कोणत्याही शब्दांसाठी त्यांच्या अर्थदृष्ट्या अनुरुप असे पर्यायी शब्द सहज सुचतात. सांगता येतात. चित्र हा शब्द मात्र याला अपवाद आहे. चित्र या शब्दाची असंख्य विविध आकर्षक रूपे सामावून घेणारा पर्यायी शब्द सहज सांगता येणार नाही.

चित्र या शब्दाची विविध रूपे आणि त्यात सामावलेल्या अर्थरंगांच्या वेगवेगळ्या छटा हेच या शब्दाचे सौंदर्य आहे.चित्रांचे जितके प्रकार तितकी त्याची रुपे.रेखाचित्र,रंगचित्र,तैलचित्र, जलरंगातलं चित्र, भित्तिचित्र, निसर्गचित्र, स्थिरचित्र, अर्कचित्र, व्यक्तिचित्र, छायाचित्र, त्रिमितिचित्र,हास्यचित्र,व्यंगचित्र असे असंख्य प्रकार.प्रत्येकाचं रुप, तंत्र, व्याकरण,निकष परस्पर भिन्न. तरीही ही सगळीच रुपं भावणारी ! हे सगळं सामावून घेणारा पर्यायी शब्द शोधून तरी सापडेल का?

चित्रकला ही निसर्गाने माणसाला दिलेली एक अद्भूत देणगी आहे.चित्र या शब्दाची व्याप्ती अधोरेखित करणारी जशी विविध रुपे आहेत,तशीच चित्रकलेद्वारे होणाऱ्या अविष्कारातही वैविध्य आहे.त्यातील प्रत्येक आविष्कारासाठी लागणाऱ्या कॅनव्हासचेही अनेक प्रकार.ड्राॅईंग पेपर,चित्रकलेच्या विविध आकाराच्या वह्या,अक्षरं गिरवण्यासाठी जशा सुलेखन वह्या तशीच रेखाटनांच्या सरावासाठीच्या सराव चित्रमाला!

हीच चित्रं जमिनीवर रेखाटली जातात ती रांगोळीच्या रुपात.या रांगोळ्यांच्याही कितीक त-हा.ठिपक्यांची रांगोळी,गालीचे, देवापुढे काढायची गोपद्म, शंख, स्वस्तिकांची रांगोळी,उंबऱ्यावरची रांगोळी,जेवणाच्या ताटाभोवतीची,औक्षण करण्यासाठीच्या पाटाखाली काढली जाणारी रांगोळी, आणि मग पाटाभोवती काढलेली सुबक महिरप, तसेच चैत्रागौर, ज्ञानकमळ  यासारखी वैशिष्ट्यपूर्ण रेखाटने ही सगळी चित्राचीच तर रुपे!

चित्रं मातीच्या झोपडीवजा घरांच्या भिंती सारवून त्या भिंतीवरही काढली जात.आदिवासी संस्कृतीतली वारली पेंटींगची कला ही तर आपला अमूल्य असा सांस्कृतिक ठेवाच आहेत!

चित्रं कागदावरच नाही तर कापडावरही काढली जातात.ती ‘फॅब्रिक पेंटींग’च्या विविध रुपात आविष्कृत होतात आणि वस्रप्रावरणांचं रुप खुलवतात.

चित्रकलेचं अनोखं असं एक वैशिष्ट्य म्हणजे ती एक स्वतंत्र कला जशी आहे तशीच इतर अनेक कलांचा अविभाज्य भागही बनलेली आहे. चलतचित्रांच्या सलग एकत्रीकरणातून निर्माण होणाऱ्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ही रंगसंगती जपलेली आणि क्षणकाळात विरुन जाणारी  चित्रचौकटच असते.पूर्वीच्या काळात रंगभूमीवर वापरले जाणारे प्रसंगानुरुप स्थळं सूचित करणारे रंगीत पडदे,आणि आधुनिक रंगभूमीवरील नेपथ्य,रंग-वेशभूषेमधेही चित्रसौंदर्य अभिप्रेत आहेच. भरतनाट्य, कथ्थक यासारख्या शास्त्रीय-नृत्यप्रकारातल्या रंग-वेशभूषेने अधिकच खुलवलेल्या प्रत्येक मुद्रा या जिवंत चित्रेच म्हणता येतील.नृत्य सादरीकरण करता करता  नृत्याविष्कार करीत असतानाच क्षणात कॅनव्हासवर कुंचल्याच्या अलगद फटकाऱ्याने चित्रं रेखाटण्याची अचंबित करणारी कला नृत्य-चित्रकलेचा अनोखा मिलाफच म्हणावी लागेल.

नुकतीच समज आलेले लहान मूल प्रत्येक गोष्ट हाताळून बघण्याच्या औत्सुक्यापोटी एखादं पेन किंवा पेन्सिल असं कांही हाती लागलं की दिसेल तिथं रेघोट्या मारुन गिरगटा करीत बसते.हे करत असतानाची त्याची तल्लीनता भान हरपून चित्रात दंग होणाऱ्या कसलेल्या चित्रकाराच्या तल्लीनतेपेक्षा कणभरही कमी नसते.लहान मुलांचं हे गिरगटणं नेहमीच वेळ जायचं साधन असतं  असं नाही.अनेकदा मनातल्या सुप्त भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यमही असतं.म्हणूनच  अजाण मुलांनी भिंतीवर किंवा कागदांवर रेखाटलेल्या वरवर निरर्थक वाटणाऱ्या चित्रातही त्यांच्या त्या त्या वेळच्या मनोवस्थांचे ठसे लपलेले असतात.ते शोधून काढण्याचे तंत्रही आता विकसित झालेले आहे जे वैद्यकीय क्षेत्रात मानसिक बालरुग्णांच्या बाबतीत योग्य निदान आणि उपचारांसाठी पूरक ठरते आहे.

व्यक्तिचित्र काढताना प्रत्यक्ष ती व्यक्ती किंवा  तिचं छायाचित्र पुढे ठेवून रेखाटन केलं जातं.अशी प्रत्यक्ष व्यक्तिप्रतिमा उपलब्ध नसेल तेव्हा त्या व्यक्तीचं वर्णन ऐकूनही त्याबरहुकूम हुबेहूब चित्र काढण्याची कलाही कांहीना अवगत असते.एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेगाराच्या वर्णनाबरहुकूम काढलेली अशी रेखाटने गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी नेहमीच सहाय्यभूत ठरतात.

चित्र हा शब्द चित्रकलेचा अविभाज्य भाग जसा आहे तसाच अनेक अर्थपूर्ण शब्दांचा जन्मदाताही. चित्रकार,चित्रपट, चित्रकाव्य, चित्रदर्शी, चित्रमय, चित्ररथ, चित्रविचित्र, चित्रशाळा, चित्रीकरण,चित्रमाला,चित्रतारका असे कितीतरी शब्द !प्रत्येकाचे अर्थ,भाव,रंग,संदर्भ वेगवेगळे तरीही त्यात चित्र या शब्दातली एक रंगछटा अंतर्भूत आहेच.

असा चित्र हा शब्द!अल्पाक्षरी तरीही बहुआयामी !अनेक कंगोरे असणारा.म्हणूनच सुरुवातीला मी म्हंटलं तसं चित्र या शब्दाचा हा एवढा पैस सामावून घेणारा पर्यायी शब्द शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच चित्र या शब्दाला या सम हा असेच म्हणणे उचित ठरेल !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्ट – DART (Double Asteroid Redirection Test) ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

डार्ट – DART (Double Asteroid Redirection Test) श्री राजीव ग पुजारी 

जर तुम्हाला हॉलिवूड सिनेमांची आवड असेल तर तुम्हाला नक्कीच अर्मागेडन हा ब्लॉकबस्टर सिनेमा आठवत असेल. या सिनेमात ब्रुस विलीस आणि बेन ऐक्लेफ एका लघुग्रहापासून पृथ्वीला वाचविण्याच्या मोहिमेवर निघतात. या सिनेमाच्या कहाणीला अमेरिकन अंतरीक्ष संस्था अर्थात नासा (NASA) मूर्त स्वरूप देत आहे.

दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी स्पेस एक्स (Space-X)च्या फाल्कन-९ (Falcan-9) या प्रक्षेपकाद्वारे नासाने DART (Double Asteroid Redirection Test) या अंतरिक्ष यानाचे प्रक्षेपण केले. या मोहिमेचा उद्देश डायमॉर्फस या लघुग्रहाला धडक देऊन त्याची कक्षा बदलणे हा होता. या लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही, पण भविष्यात एखाद्या लघुग्रहापासून पृथ्वीचे रक्षण करण्याची वेळ आलीच तर त्याची रंगीत तालीम म्हणून या मोहिमेकडे पाहता येईल. नासाने या मोहिमेला ग्रहीय संरक्षण मोहीम (Planetary Defence Mission) असे नाव दिले आहे.

२७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ४ वाजून ४४ मिनिटांनी या आंतरिक्ष यानाने एक कोटी सहा लाख किलोमीटर दूर असलेल्या डायमॉर्फस या लघुग्रहाला ताशी २४००० किलोमीटर या वेगाने धडक दिली आणि नासाच्या जोन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरीतील तंत्रज्ञ व वैज्ञानिक आनंदाने बेभान झाले. कारण मानवी इतिहासातील हा क्षण एकमेवाद्वितीय होता. 

संपूर्ण मोहिमेसाठी २५०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. नासाचे ग्रहीय संरक्षण अधिकारी लिंडले जॉन्सन म्हणतात, ” सध्याचा विचार केला तर, असा कोणताही लघुग्रह नाही, ज्याच्यापासून पृथ्वीला नजिकच्या भविष्यात धोका संभवू शकेल. परंतु अंतराळात पृथ्वीच्या जवळपास मोठ्या संख्येने लघुग्रह आहेत. नासाचा प्रयत्न असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा आहे, की ज्यामुळे भविष्यात प्रत्यक्षात जर एखाद्या लघुग्रहापासून पृथ्वीला धोका वाटला, तर वेळेअगोदर त्यावर उपाय करता येईल. आम्ही अशी वेळ येऊ देणार नाही की एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येईल व त्यावेळी आम्ही आमच्या क्षमतेचे परीक्षण करू.”

डायमॉर्फस हा १६० मिटर व्यासाचा लघुग्रह असून तो डिडीमॉस या ७६० मिटर व्यासाच्या दुसऱ्या लघुग्रहाभोवती फिरतो. डायमॉर्फस व डिडीमॉस ही जोडगोळी सूर्याभोवती ज्या वेगाने परिभ्रमण करते, त्यापेक्षा खूप कमी गतीने डायमॉर्फस डिडीमॉसभोवती फिरतो. त्यामुळे DART ने दिलेल्या धडकेचा परिणाम आपणास सहज मोजता येईल. या धडकेमुळे डायमॉर्फसच्या डिडीमॉसभोवती फिरण्याच्या कक्षेत १% पेक्षा कमी फरक पडेल पण पृथ्वीवरून दुर्बीणीच्या सहाय्याने तो मोजता येण्याजोगा असेल.

DART अंतराळयानाने लिसीयाक्यूब (LICIACube) नावाचा लहान उपग्रह सोबत नेला होता. हा उपग्रह इटालियन स्पेस एजन्सीने बनवला आहे. DART च्या धडकेअगोदर तो DART पासून अलग केला गेला व त्याने डायमॉर्फसवरील DART च्या धडकेचे तसेच त्यावेळी निर्माण झालेल्या धुळीच्या ढगाचे फोटो घेऊन नासाकडे पाठवले आहेत. पृथ्वीवरील व अंतराळातील दुर्बिणी, धडकेनंतर डायमॉर्फसच्या कक्षेचा वेध घेतील व त्याच्या कक्षेत किती फरक पडला आहे हे नजिकच्या भविष्यात आपणास कळू शकेल.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनायासेन मरणं… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अनायासेन मरणं… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।

माझे वडील रोज पूजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधी कधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.

त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुदा एकच असते. मला पण छान वाटतं, असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.

पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते. त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.

शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,

‘अनायासेन मरणं’: मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा, तर अनायासेन – सहज.

‘विनादैन्येन जीवनं’ : जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.

‘देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर’:  मृत्यू नंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा, तुझे’.

पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.

इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले

गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले

हेचि दान देगा देवा

 तुझा विसर न व्हावा

न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा

काय मागणे आहे ना!रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कार वर्गाची गरज भासेल का?

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते, दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड असते,तोच विषय आमचापण होता. हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, आता काय ग आपली मुलं मोठी झाली, संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे गेली. आता ती घडली, आता परिवर्तन होणार नाही. मला तेव्हा सांगावंसं वाटलं तिला, संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीसारखं  नाही ग, आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही. ती तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते.

माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे, पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तोपर्यंत तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील. आज कदाचित त्याच महत्त्व तिला कळणार नाही, पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.

देवासमोर हात जोडतांना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार मानणे’ ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती.  आपल्या जीवनाची जो पर्यंत ‘जबाबदारी’ आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध’ शक्ती सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण त्याची जबाबदारी घेतो त्या क्षणी आपले ‘मागणेच बदलते’.

‘अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्। देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।’

लेखिका : अज्ञात

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र उत्सव व त्याचे बदलते स्वरूप… ☆ सौ. अर्चना देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ नवरात्र उत्सव व त्याचे बदलते स्वरूप… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

भक्ती, शक्ती ,बुद्धी आणि माया यांचा अनोखा संगम असलेल्या आदिशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. भक्तिमय वातावरणात आणि तेवढ्याच उत्साहाने शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये साजरा केला जातो. रास, गरबा, श्री सूक्त, दांडिया बरोबरच इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल या दिवसात असते.

महिषासुरमर्दिनी, महिषासुर राक्षसाला मारणारी रणरागिनी! अनेक राक्षसांना मारणाऱ्या देवांची आपण पूजा करतो पण या राक्षसाला  मारण्यासाठी देव का पुढे आले नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण उत्तर अगदी सोपे आहे.

कोमल मनाच्या, नाजूक शरीराच्या आत केवढी प्रचंड शक्ती सामावलेली असते ही समाजाला दाखवून द्यायचे होते.

नवरात्र सोहळा म्हणजे स्त्री शक्तीची ,स्त्रीने स्वतःला व समाजाला करून दिलेली आठवण आहे. एक जन्मदायिनी प्राण हरणी सुद्धा होऊ शकते हे जगाला दाखवून देण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे.

आदिशक्तीचा जागर म्हणजे नवरात्रीचा सण रात्रीचाच साजरा करण्याची प्रथा आहे .याला धार्मिक व पौराणिक आधारही आहेत. या दिवसात देवीची भजने, गोंधळ, श्री सूक्त पठाण असे कार्यक्रम केले जातात . स्त्रियांचयासाठी तर मंतरलेले दिवस असतात.नवरात्रोत्सव आपला धार्मिक तसाच सांस्कृतिक ठेवा आहे

नवरात्र म्हणजे वास्तविक घरगुती धार्मिक सोहळा. देवीच्या मंदिरात पूजा, उपासना, भजन ,गोंधळ आधी माध्यमाद्वारे चालणारा सोहळा! देवतांची मनापासून उपासना हीच आपली खरी संस्कृती .आपल्या संतांनी विविध धार्मिक मार्गांनी आदिशक्तीचा जागर केलेली उदाहरणे आपल्या ऐकिवात आहेत. नवरात्राचे धार्मिक महत्त्व मोठे आहे.

अत्यंत पवित्र वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो. स्त्रिया घराची रंगरंगोटीकरून घरातली भांडी स्वच्छ घासून घेतात तसेच अंथरूण , पांघरूण  धुतलीजातात. स्त्रिया नऊ दिवस उपास करतात ,गादीवर झोपत नाही एवढेच काय पायात चप्पल न घालता नऊ दिवस देवीच्या दर्शनाला जातात. घटस्थापने दिवशी घट बसवूनअखंड नंदलाल नंदादीप तेवत ठेवतात. देवीच्या जागराचा म्हणजेच स्त्री सन्मानाचा हा उत्सव आहे. 

पण आता मात्र त्याचे स्वरूप बदलले आहे. गणेश मंडळाप्रमाणेच नवरात्रोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे., मंडळामध्ये स्पर्धा निर्माण  झाल्या आहेत, मोठमोठ्या वर्गण्या सक्तीने वसूल केल्या जातात. रस्त्यावर मोठमोठे मांडव घातले जातात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.  सगळीकडे झगमगाट करून कानठळ्या बसणारी गाणी लावली जातात एवढेच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत दांडिया खेळला जातो. त्यावेळी रुग्ण, विद्यार्थी ,वृद्ध व्यक्ती यांचा विचार केला जात नाही .तरुण मुले मुली न शोभणारी वेशभूषा करूनहुललडबाजी करतात. दहा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरावीत हा कायदा मोडून, पोलिसांना न जुमानता बेधुंदपणे गोंधळ सुरू असतो. हा प्रकार वाढत चालल्यामुळे उत्सव ही सामाजिक समस्या होत चालली आहे.

काही वेळा गणेशोत्सवाला घातलेला मंडप न काढता त्याच ठिकाणी दुर्गामातेचे प्रतिष्ठापना केली जाते. परंतु अनंत चतुर्दशीनंतर पितृपंधरवडा येतो व त्यानंतर नवरात्राला सुरुवात होते त्यामुळे जवळजवळ एक महिना रस्त्यावरील जागा अडवून ठेवली जाते ,वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे थकल्या भागलेल्यांना दूरच्या रस्त्याने घरी पोहोचावे लागते ..काही वेळा कार्यक्रम सुरू असेल तर आहे त्यावेळी तिकडची वाहतूक दुसरीकडून वळवली जाते त्यावेळी घरी परतणाऱ्या व्यक्तिंना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

काही मंडळे  तिसरी माळ पाचवी माळ सातवी माळ….. असा मुहूर्त पाहून तोरणाची मिरवणूक करतात .रस्त्याचा बराच भाग व्यापत ही मिरवणूक मंद गतीने पुढे सरकत राहते .त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो .नाचण्यात दंग असलेल्या कार्यकर्त्यांना याची जाणीव नसते .बँडचा ताफा, ध्वनिवर्धक भिंती ढोल ताशांचा मोठा आवाज यामुळे कोलाहल माजतो.त्यावेळीइमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होतो याचा विचार होत नाही तसेच अशा मिरवणूकीत दंगा होऊ नये म्हणून पोलिसांवर येणारा ताण वेगळा!

आपला समाज उत्सवप्रिय आहे मान्य पण नियमांचे पालन केले गेले तर विविध सणाद्वारे आणि उत्सवा द्वारे समाजात चैतन्य निर्माण होईल, आणि आनंद द्विगुणीत होईल असे मला वाटते.    

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नवरात्र… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ नवरात्र… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नवरात्र —  सगळीकडे चैतन्याची,उत्साहाची उधळण. देवीचं अस्तित्व हे मन प्रसन्न करणारं, शक्ती प्रदान करणारं. ह्या नवरात्रीतील नऊ दिवसांच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवींचे मुखवटे, त्या मुखवट्यांवरील तेज क्षणात नजरेसमोर झळकतं. निरनिराळी पीठं असणाऱ्या मखरातील देवींची रुपं आणि अगदी रोजच्या आयुष्यात सहवासात येणाऱ्या चालत्या बोलत्या हाडामासाच्या स्त्रीशक्तीची रुपं आठवायला लागतात. ह्या नवरात्रीच्या चैतन्यमय नऊ माळाआपल्याला चैतन्य, उत्साह ह्यांचं वाण देतांनाच खूप काही शिकवतात सुध्दा.

ह्या नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवी- म्हणजेच वेगवेगळ्या शक्तींची आठवण होते. ह्या शक्ती आत्मसात करण्यासाठी मनात नानाविध विचार, योजना आकार घ्यायला लागतात.

सगळ्यात पहिल्यांदा, ह्या शक्ती आपण आत्मसात करुच शकणार नाही असं वाटायला लागतं. पण लगेच     “ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ” ह्या म्हणीनुसार  ‘आपण करून तर बघू. पूर्ण अंगिकारता नाही आले तरी निदान काही तरी तर निश्चितच हाती लागेल ‘  हा सकारात्मक विचार मनात बाळसं धरु लागला.

पहिल्यांदा, आपण आपल्यात चांगले बदल हे कोणी मखरात बसविण्यासाठी वा आपला उदोउदो करण्यासाठी करावयाचे नसून ते फक्त आणि फक्त आपल्या सर्वांगीण विकासाकरीता,आपल्यात सकारात्मक जागृतता येण्याकरिता करावयाचे, हे आधी डोक्यात फिट केले. त्यामुळे आपल्यातील चांगले बदल हे कोणाच्या निदर्शनास नाही आले तरी चालतील पण आपलं स्वतःचं मन स्थिर झालं पाहिजे. फळाची अपेक्षा न करता फक्त सत्कर्म करणे ह्याकडे आपला कल झुकला पाहिजे, आणि  हा बदल औटघटकेचा न ठरता कायमस्वरूपी  झाला पाहिजे यावर कटाक्ष राहिला पाहिजे, हे मनाशी ठरविले.

सगळ्यात पहिल्यांदा अष्टभुजादेवी आठवली. सतत उन्नतीकरिता आठ हात वापरुन कामाचा उरका पाडणारी,अष्टावधानी होऊन बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष पुरविणारी–  ही अष्टभूजा तर आपण व्हायचं हे ठरवलं,  पण संसार,नोकरी ह्यावरची तारेवरची कसरत सांभाळतांना,आठ आठ हातांनी काम करतांना आपली दमणूक होऊ द्यायची नाही हे पण ठरविलं. ह्या सगळ्या जबाबदा-या हसतहसत आनंदाने पार तर पाडायच्या, पण त्या पार पाडतांना आपणच आपली स्वतःची काळजी घेऊन आपलं मनस्वास्थ्य आणि प्रकृतीस्वास्थ्य पण जपायचं, हा पण मनाशी निश्चय केला.

दुसरी देवी आठवली सरस्वती, म्हणजेच बुध्दीची देवता. ह्या देवीकडून चिकाटीने  ज्ञान  मिळवायचं. कारण दरवेळी ह्या देवीला नजरेसमोर ठेऊन उघड्या जगाकडे दृष्टी टाकली तर आपण जे शिकलो त्याच्या कित्येक पटीने जास्त शिकायचं अजून शिल्लकच आहे ह्याची जाणीव होते. सरस्वतीदेवीकडे बघून अजून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे आपल्याला आत्मसात झालेलं ज्ञान, कला, ही निस्वार्थ हेतूने सगळ्यांमध्ये वाटली तरच त्याचा चांगला विनियोग होईल. त्यामुळे ह्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतांना, म्हणजेच देतांना वा घेतांना हात आखडता राहणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची हे लक्षात आलं. 

मग आठवली देवी अन्नपूर्णा. खरचं सगळ्यांना तृप्त करणारी ही अन्नपूर्णा म्हणजे शक्तीचा एक अद्भुत चमत्कार. ही अन्नपूर्णा होतांना एक मात्र ठरविलं- आपल्या ह्या शक्तीचा वापर खरंच गरज असणाऱ्यासाठी आधी करायचा. ओ होईपर्यंत आकंठ खाऊन झालेल्यांवर आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा भुकेल्यावर,गरजूंवर ह्या  शक्तीचा वापर करण्याला प्राधान्य द्यायचं. आपली ही शक्ती आपल्या लोकांसाठी, घरच्यांसाठी कामी आणायची, विशेषतः लेकाला घरचंच अन्न गोड लागावं, बाहेरचे अन्न, हॉटेलच्या डिशेस ह्यांनी पैशाचा चुराडा करून प्रकृतीची हेळसांड करुन घेण्यापेक्षा घरच्या अन्नाला मुलांनी प्राधान्य द्यावं ह्याकडे मी कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे, तरच ह्या अन्नपूर्णेच्या शक्तीला पूर्णत्व येईल. नाईलाजास्तव बाहेरचं अन्न खावं लागणं आणि घरी असतांना चोचले पुरविण्यासाठी बाहेरचं अन्न मागवून खाणं ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो.

मग दुर्गा, महिषासुरमर्दिनी आठवली– सगळ्या संकटांना हिमतीने तोंड देणारी, संकटकाळी धावून जाणारी, तितक्याच तीव्रतेने आपल्यावर होणारा अन्याय सहन. न करणारी. 

आणि मी  मनापासून एक बँकर, एक शिक्षक असल्याकारणाने आठवली आर्थिक डोलारा सांभाळणारी लक्ष्मीदेवी. धनाचा संचय तर करणारी, पण त्याचबरोबर त्याचा अपव्यय न होऊ देणारी, काटकसरीत धन्यता मानणारी, पण खरोखरच्या गरजा भागवतांना मागे पुढे न पाहणारी, भवितव्यासाठी पैसा जमवितांना त्याची लालसा मात्र न करणारी.

नवरात्राची पहिली माळ जिच्यासाठी असते ती शैलपुत्री पार्वती.  यक्षपुत्री देवी सती आणि महादेव ह्यांच्या अपमानाने क्रोधीत आणि व्यथित झालेली देवी सती देहत्यागासाठी तयार होते. देह नश्वर असल्याने तो विलीन होतो, परंतू आत्मा मात्र हिमालपुत्री म्हणजेच शैलपुत्रीच्या रुपाने परत येतो. “ देह नश्वर आणि आत्मा अमर “  हे ज्ञान, ही शिकवण, दुर्गेच्या नऊ रूपांपैकी पहिलं रुप असणाऱ्या शैलपुत्री पार्वती हिच्याकडून शिकण्यासारखी.. दुर्गेच्या नऊ रूपांपैकी आणखी एक रुप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी. भगवान शिव ह्यांचा पतीरुपात सहवास घडावा ह्यासाठी देवी ब्रह्मचारिणी हिने वर्षानुवर्षे बिल्वपत्र वाहून, उपवास करून भगवान शिवाची आराधना केली आणि आपल्या निरंतर तपस्येने शिवाला प्रसन्न केले. म्हणूनच मनःपूर्वक तपस्येचा दाखला म्हणजे हे देवी ब्रह्मचारिणी, दुर्गेचे दुसरे रुप. देवीपुराणानुसार देवी ब्रम्हचारिणी नित्य तपस्येत आणि आराधनेत लीन असल्याने तिचे तेज उत्तरोत्तर वाढत गेले अशी आख्यायिका आहे. त्या तेजामुळे त्यांना गौरवर्ण व तेज प्राप्त झालं असं म्हणतात. ब्रम्हचारिणी हा शब्द संस्कृतच्या दोन शब्दांपासून बनला आहे.ब्रह्म  ह्याचा अर्थ ” घोर तपस्या ” आणि “चारिणी”चा अर्थ आचरण करणे,अनुकरण करणे. म्हणूनच देवी ब्रह्मचारिणी हिच्या एका हातात कायम उपासना करणारी ” जपमाळ ” , तर दुसऱ्या हातात कधीही कुठल्याही त्यागासाठी तयारीत असल्याचे प्रतीक म्हणून  कमंडलू  असतं. योग्य अशा एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावासा वाटला तर तो किती मनापासून घ्यायला हवा, त्यासाठी एखादी तपस्या करावी तसे किती प्रयत्न आणि कष्ट घ्यायची तयारी असायला हवी, आणि त्यासाठी कुठल्याही त्यागासाठी मन कसे तयार असायला हवे हेच शिकवणारी ही देवी ब्रह्मचारिणी. 

ह्या सगळ्यांमध्ये स्वतः ला विसरून वा वगळून चालणारच नाही. अशी सगळी देवींची अनेक रुपे डोळ्यासमोर फेर धरुन नाचू लागली आणि त्यांच्यातील सगळे सद्गुण हळूहळू का होईना अंगिकारायचे ठरविणारे हे माझे आजचे रुप मलाच खूप भावून गेलं, स्वतःवर पण प्रेम करायला शिकवून गेलं. 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वय होण्याचं वय… लेखिका :सुश्री सुजाता भडभडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ वय होण्याचं वय… लेखिका :सुश्री सुजाता भडभडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

ईशा :-  “आजी काय शिवतेयस? ” 

आजी :-  “अगं! विशेष काही नाही.  नेहमीचेच आपले! उसवलेले  शिवणे.  पण बरं झालं  आलीस.  जरा सुई ओवून दे ग राणी.  “

ईशा  :- “हो  , देते.  आण.  “

आजी :-  ” ईशा! खरंतर मला असे एवढ्या- तेवढ्यासाठी तुला कामाला लावायला आवडत नाही.  पण….. काय करणार! वय झाले की परावलंबन येतेच! “

ईशा :-  “ परावलंबन म्हणजे काय ग आजी? “

आजी  :- “अगं! म्हणजे  काही कामांसाठी दुसऱ्यावर अवलंबून  राहणे.  dependence  ग! “

ईशा  :- ” हं…. आजी तू  74 वर्षांची आहेस न? मग 74  व्या वर्षी म्हणतात का? वय झालंय असं?  मी आत्ता  आठव्या वर्षी  नाही म्हणू शकत का? माझं  वय झालंय म्हणून? 🤔 “

आजी :-  ” 😃! अगं  बाळा, असं नाही.   एका वया नंतर म्हाताऱ्या माणसांना सर्व कामे  पूर्वीसारखी  जमेनाशी होतात.  तेव्हा  वय झालंय म्हणतात.  तुझे वय तर आत्ता  नवनवीन कामे , कौशल्ये  म्हणजे  skills   शिकण्याचे वय आहे.  “

ईशा  : – ” अगं पण आजी तू मोदक , पुरणपोळ्या,  गुळाच्या  पोळ्या  वगैरे  करतेस की अजूनही  पहिल्यासारख्याच.  मग? “

आजी  :-  ” अगं सोने! त्यात डोळ्यांचे काम नसते न फारसे! “

ईशा :-  ” अच्छा! मग असे म्हण  ना की तुझ्या  डोळ्यांचे वय झालेय.  जसे  आजोबांच्या  गुडघ्यांचे  वय झालेय  तसे.  बरोबर ना?  “

बडबड अक्का  बडबड करून पळून गेली.  पण आजी मात्र विचारांच्या भोवऱ्यात जणू  फिरतच राहिली.  

ईशा पटकन बोलून गेली   ‘डोळ्यांचे  वय  ‘.  नकळत किती बरोबर बोलली होती ती.  

अलिकडे 2/3 वर्षे मंदाताईंनाही असे काहीसे जाणवत होते की काही गोष्टी  अगदी  पूर्वीसारख्या  पूर्ण  आत्मविश्वासाने आपण अजूनही करतो आणि काही बाबतीत मात्र वय झालेय असे  पुन्हा पुन्हा वाटते.  मालिकांची नावे आठवत नाहीत; पण शेजारची अनू  वीण विचारायला आली की अगदी सहज आठवून सांगते.  स्मार्ट फोन वापरताना बोटे भलतीचकडे पडतात पण वाती करताना ,  मोदक करताना हीच बोटे  किती शिताफीने  भराभर  फिरतात.  

याचा अर्थ असा की आपल्या वेगवेगळ्या अवयवांचे वय वेगवेगळ्या वयात होते.   मंदाताईंना आता नादच लागला , कोणती कामे  पूर्वीसारखी  होतात व कोणती  होत नाहीत हे पहाण्याचा.  

एक दिवस त्यांनी सरळ 50 कामांची यादीच  केली.  त्यातली काही कामे  दैनंदिन तर काही कामे  कौशल्याशी निगडीत.  यादी पूर्ण झाली आणि त्यावर टिकमार्कही झाले.  

मंदाताईंना खूप आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला  कारण त्यांना त्यातली  41 कामे अजूनही जशीच्या तशी करायला जमतात  हा शोध लागला.   म्हणजे 82% कामे जमतातच की! 👍👍

अरेच्चा! मग आपण दिवसाकाठी इतक्या वेळा  ‘ वय झालेय ‘ असे का बरे म्हणतो? 🤔🤔 खरंतर आपल्या एखाद्या अवयवाने असहकार पुकारणे म्हणजे वय होणे  नव्हे.   जी कामे माझ्या आवडीची आहेत ती मी अजूनही छान करू शकते कारण ती पुन्हा पुन्हा करते  म्हणून सराव आणि आत्मविश्वास दोन्ही खूप असतो.   म्हणजेच सरावाने  आत्मविश्वास टिकवता येतो.  

याच विचारातून  मंदाताईंना एक समाधानकारक शोध लागला.  तो म्हणजे…… वय होण्याचे वय थांबवणे  हे थोडेफार का होईना, आपल्या हातात आहे.  

त्या लगेच उठल्या  , खोलीत गेल्या  आणि पेटीतून जुनी , जपून ठेवलेली  लोकर आणि सुया काढल्या.  छान एकसारखे  टाके घालू लागल्या.  त्या स्वतःवरच खूप खूश होत्या. प्रत्येक टाका जणू  सांगत होता ‘मनाचे आणि मेंदूचे वय  अजून झालेले नाही  मंदाताई. ‘ 😊

लेखिका :सुश्री सुजाता भडभडे

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares