मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 11 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा… अंतिम भाग – 11 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

लक्ष्मणाची समजूत घालण्यासाठी तारा त्याच्यासमोर येऊन म्हणाली, “राजकुमार ! येवढे रागवण्याचे कारण काय? आपल्या आज्ञेचे कोणी उल्लंघन केले का? कोण आज्ञेच्या अधीन नाही? शुष्क वनात वणवा पेटला असतांना आत कोण बरं प्रवेश करेल ?” ताराचा संयमपूर्ण आवाज व स्वरांतील माधुर्य, सांत्वनपूर्ण वागणूक, आणि बोलणे ऐकून लक्ष्मणाचा अर्धा राग कमी झाला. स्वतःला सावरत, तो ताराला म्हणाला, ” देवी ! सुग्रीवाचे हित पाहतेस? तो फक्त उपभोगांत दंग झाला आहे. एकमेकांना सहाय्य करण्याची केलेली प्रतिज्ञा, रामकार्याची आठवण तो विसरला. त्याच्या धर्माचा असा लोप झालेला तुला दिसत नाही का? या कार्याचे तत्व, महत्त्व तू चांगल्याप्रकारे जाणतेस ! अशा परिस्थितीत आम्ही काय करावे? सांग ना !” 

तारा शांतपणे लक्ष्मणाची समजुत काढत म्हणाली, “कुमार ! ही वेळ क्रोध करण्याची नाही. सुग्रीवाच्या मनात श्रीरामाला मदत करण्याची तीव्र इच्छा आहेच. परंतु अनेक वर्षांपासून कौटुंबिक जीवनाला पारखे झाले असल्यामुळे त्यातच ते गुंग झाल्यामुळे थोडा विलंब झाला खरा ! धर्म व तपस्या यात पारंगत असणारे मोठमोठे ऋषीमुनी देखील मोहाच्या अधीन होतात. आम्ही तर शेवटी वानरच ना ! परंतू त्यांना त्यांची चूक कळली आहे . पश्चातापदग्ध झालेत ते . हनुमानाच्या सल्ल्याने त्यांनी सर्व वानरसेना एकत्रित करण्याची आज्ञा दिलेली आहे. रामकार्यासाठी लाखो वानरसैन्य एकत्र जमा होत आहेत.”

ताराच्या बोलण्याने लक्ष्मण थोडा शांत झाल्यावर दोघेही सुग्रीवाकडे गेले. सुग्रीवाला पाहून लक्ष्मणाचा संताप उसळून आला व तो म्हणाला, ” सुग्रीवा ! ज्या मार्गाने वाली गेला, तो मार्ग अजून बंद झालेला नाही. रामाचा बाण तयार आहे.” सुग्रीवाला लक्ष्मणाने असे अपमानकारक बोलणे, तारासारख्या मानी स्रीला सहन होणे शक्य नव्हते. कणखरपणे ती म्हणाली, ” कुमार लक्ष्मणा, सुग्रीव राजे आहेत, त्यांच्याशी अशा तर्‍हेने बोलणे योग्य नाही. सुग्रीवांचा स्वभाव दांभिक, क्रूर, असत्यवादी, कुटील, कृतघ्न नाही. जिथे विश्वामित्रासारखे समर्थ ऋषीसुध्दा मोहापासून दूर जाऊ शकले नाहीत, मग आम्ही तर साधारण वानर ! रघुनंदन कृपाळु आहेत. आपण सुध्दा सत्वगुणसंपन्न आहात. असं क्रोधाच्या अधीन होणं बरोबर नाही.”

ताराच्या बोलण्याने लक्ष्मण शांत झाला. सुग्रीव, हनुमानाच्या मदतीने आणि सर्वांच्या सहकार्याने राम-लक्ष्मणाने  मोठे सैन्य घेऊन लंकेवर स्वारी केली. रावणाशी मोठे युध्द होऊन रावणाचा वध झाला. प्रभू रामचंद्रांना सीता परत मिळाली. विमानातून सर्वजण जातांना सीतेला प्रत्येक स्थळांची श्रीराम माहिती देत होते. सीतेच्या इच्छेनुसार तारा व काही स्त्रियांना मोठ्या आदराने विमानात बसवून घेतले. अयोध्येमध्ये या सर्वांचे भव्य स्वागत झाले. रामाचा राज्याभिषेक झाला.

तारासारख्या वानर जातीतील स्त्रीचा सत्कार सीतेने मोठ्या  प्रेमाने केला. ताराचे सतीचं वाण काही वेगळंच होतं. ती एक थोर राजमाता, कुशल राजनीतिज्ञ, दूरदर्शी, समंजस व सर्वांना सोबत घेऊन चालणारी एक महान स्त्री होती. पतीच्या निधनानंतर खचून न  जाता मोठ्या धैर्याने  परत उभी राहून तिने राज्याची घडी नीट बसवली, स्थिर ठेवली.

अशा या ताराला कोटी कोटी प्रणाम…!!!

!! समाप्त !!!

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-1 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-1 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

गदिमांचे आपली आई बनुताई यांच्यावर विलक्षण प्रेम होते. आई बनुताई खूप छान ओव्या रचत असत. पपा आपल्या कवितेला आईच्या ओव्यांची दुहिता (लेक) म्हणायचे. ते म्हणत, “आईच्या गीतगंगेतली कळशी घेऊनच मी मराठी शारदेचे पदप्रक्षालन करीत असतो.” आईंना दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक तोंडपाठ होते. त्या सकाळी तुळशीकट्ट्यावर खूप सुंदर रांगोळी रेखाटत असत.

माझा मुलगा आणि त्यांचा पणतू सुमित्र याच्यावर आईंचे विलक्षण प्रेम होते. त्यांच्यातले अर्धे डाळिंब आवर्जून त्याच्यासाठी राखून ठेवलेले असे. त्याच्या जन्मामुळे त्यांना काशीयात्रेचे पुण्य मिळाले अशी त्यांची भावना होती. मला त्या म्हणायच्या, “किती गुणी पोर आहे ग! असे पोर दररोज एक घरात जन्मले तरी चालेल.” मला या त्यांच्या बोलण्याची खूप गंमत वाटायची.

दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या पंचवटीच्या मागच्या अंगणात काठी घेऊन फेऱ्या मारत. मग तुळशी कट्ट्यावर बसून आम्हाला पालेभाजी निवडून देत, किंवा ताक घुसळून छान ताजे लोणी काढून देत.

एके दिवशी त्या असच काठी हातात धरून मागच्या अंगणात फेऱ्या मारत होत्या. माझ्या सासूबाई विद्याताई तिथेच व्हरांड्यात चटईवर बसून भाजी चिरून देत होत्या. मी स्वयंपाकघरात सकाळचा नाश्ता बनवत होते.

तो सव्वा वर्षाचा होता त्यावेळी.. आपल्या दोन्ही आज्यांच्या संगतीत सुमित्र आपल्या लाल जीपगाडीत बसून, पायडल न मारता पायांनी ती छोटी जीप चालवत होता.

थोडा वेळ गेला आणि एकदम सुमित्रचे जोरात कळवळणे आणि मोठ्या आवाजात रडणे मला ऐकू आले. मी धावत मागच्या अंगणात गेले….. पपा खोलीत निघून गेले होते.. ताईंनी सुमित्रला जवळ घेतले होते आणि त्या त्याच्या लाल झालेल्या गोऱ्यापान, गोबऱ्या गालांवर हळुवार फुंकर घालत होत्या…. मला काहीच कळेना… नंतर कळले की आई अंगणात काठी घेऊन फेऱ्या मारत असताना सुमित्र त्याची जीप जोरात चालवत होता आणि अगदी त्यांच्या पायाजवळ नेऊन थांबवत होता… पपांनी त्याला दोनतीनदा सांगितले, “सोन्या, असे करू नकोस.” त्यांचे नेहमी सर्व ऐकणाऱ्या सुमित्रला त्या दिवशी कसला चेव चढला माहिती नाही, त्यांचे न ऐकता तो परत परत तसेच करत राहिला. मग मात्र पपांचा संताप अनावर झाला. अनवधानाने त्यांनी त्याच्या एक जोरात कानशिलात दिली. पपांचे हात जरी गाद्या बसवल्यासारखे मऊ होते तरी मुलांना मारताना मात्र त्यांना खूप लागत.

सुमित्रच्या गोऱ्या, गोबऱ्या गालावर चार बोटे उठली होती…. त्याला जवळ घेऊन मी शांत केले. इतक्या छोट्या नातवाला आपण मारले याचे पपांनाही खूप वाईट वाटले. ते बराच वेळ खोलीत झोपून राहिले. नीट जेवलेही नाहीत.

मी सुमित्रला नंतर समजावून सांगितले की, ‘पपा आजोबांना सांग की मी परत असे करणार नाही.’ त्याला हेही सांगितले की अशी पणजीआजीच्या अंगावर गाडी नेलीस तर चालताना घाबरून तिचा तोल जाऊन ती पडली असती आणि तिला खूप मोठा बाऊ झाला असता. मग मात्र तो घाबरला आणि मला ‘सॉरी’ म्हणाला. पण पपांच्या जवळ जाऊन माफी मागायला काही तयार होईना.

जवळजवळ दिवसभर तो त्यांच्या जवळपासही फिरकला नाही. आडून आडून हळूच पपांकडे बघत होता. संध्याकाळी पपा फिरून आले. आल्या आल्या सुमित्रला जोरात हाक मारली, 

“सोन्याss”, तो सगळं विसरून आपल्या लाडक्या आजोबांकडे पळत पळत गेला. त्याला कडेवर घेऊन त्याच्या अस्पष्ट झालेल्या गालांवरच्या वळाची पापी घेऊन पपांनी त्याला कुरवाळले… आणि त्याच्या आवडीचे एक मोठे जेमच्या गोळ्यांचे पाकीट त्याला दिले…

त्याने आपल्या बोबड्या स्वरात पपांना विचारले, “आता पलत मला नाही ना मालनाल? मी अशे कलनाल नाही पलत.” 

यावर पपा त्याचा पापा घेऊन मोठ्या प्रेमभराने म्हणाले, “नाही ले माझ्या लाज्या…” 

मला त्या दोघांचे प्रेम बघूनच डोळ्यांत अश्रू आले… पपांना कोणीतरी विख्यात ज्योतिषांनी सांगितले होते की, तुम्ही ज्या दिवशी गाडी घ्याल त्या दिवशी तुमच्या आईला गमवाल. खेळण्यातली जीपगाडी पण आपल्या आईला चुकून लागली तर..?  हा विचारही त्यांच्या हळव्या कविमनाला सहन झाला नव्हता…

क्रमशः…

  – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वामी विवेकानंदांची महासमाधि ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

स्वामी विवेकानंदांची महासमाधि ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

४ जुलै १९०२ या दिवशी स्वामीजींनी पार्थिव देहाचा त्याग करून स्वधामी प्रयाण केले.

त्यांनी त्या अखेरच्या दिवशीही शिष्यांना व्याकरण कौमुदी, वेदांत सूत्रे शिकवली होती.

त्यांनी बरेच दिवस अगोदर आपल्या शिष्याला दिनदर्शिका आणायला सांगितली. त्यातील शुभयोगांचा बारकाईने अभ्यास करून त्याच दिनदर्शिकेवरील ४ जुलै या दिवसावर खूण करून ठेवली.

त्यांच्या महाप्रयाणापूर्वी काही दिवस अगोदर त्यांनी आपल्या सर्व शिष्यांसाठी सहभोजन आयोजित केले होते. त्यांनी स्वतः स्वयंपाक करून या लाडक्या शिष्यांना आणि गुरूबंधूंना आग्रह करून जेवायला वाढले होते. सगळ्यांचे भोजन होत आल्यावर स्वामीजी बाहेर जाऊन या सर्वांच्या हातावर पाणी घालण्यासाठी हातात भांडे घेऊन उभे राहिले होते.

मार्गारेट नोबल अर्थात् स्वामीजींची मानसकन्या भगिनी निवेदिता स्वामीजींनी तिच्या हातावर पाणी ओतताना म्हणाली, ” स्वामीजी, येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अंतिम भोजनाचा जो प्रसंग आहे, तेव्हा स्वतः येशूने आपल्या भक्तांच्या हातावर भोजनानंतर पाणी घातले होते. मला त्याची आठवण आली. “

त्यावर स्वामीजी म्हणाले, ” होय मार्गारेट ,हा अगदी तसाच प्रसंग आहे. “

स्वामीजींनी देह ठेवल्याचे समजताच भगिनी निवेदितेला त्यांच्या या बोलण्याचा अर्थ उमगला, आणि तिच्या आक्रोशाला काही सीमाच राहिली नाही.

स्वामीजींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना तिच्या असे मनात आले, की स्वामीजींची अंतिम आठवण म्हणून त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या पवित्र वस्त्राचा एक तुकडा आपल्याला मिळेल का ? तिने तसे विचारल्यावर त्याला नकार मिळाला.

ती शोकाकूल वातावरणात स्वामीजींची आई भुवनेश्वरी देवी आणि सारदा माताजी यांच्या शेजारी बसून मंत्रोच्चारात केल्या जाणाऱ्या अंतिम संस्कारांचे निरीक्षण करीत होती. थोड्याच वेळात भडकलेल्या अग्नीने स्वामीजींचे पार्थिव आपल्या कवेत घेतले.जोराचा वारा आला, आणि त्या अग्निच्या ज्वालांमधून त्या वा-याने उडालेला स्वामीजींच्या काषाय वस्त्राचा एक तुकडा भगिनी निवेदितेसमोर येवून पडला. तिने अनावर झालेल्या अश्रुधारा आवरत तो पवित्र वस्त्राचा तुकडा स्वामीजींची अखेरची आठवण म्हणून उचलला आणि तो मरेपर्यंत प्राणपणाने सांभाळला.ती म्हणते,

“स्वामीजींनी माझ्या प्रत्येक धर्मजिज्ञासेचं समाधान केलं, माझ्यावर पूर्ण कृपा केली, आणि देह ठेवल्यावरही माझी अगदी क्षुल्लक इच्छाही तत्परतेने पूर्ण करीत त्यांच्या देहातीत अस्तित्वाचे प्रमाण दिले.”

मार्गारेट नोबल जन्मभर लिहिलेल्या प्रत्येक पत्राच्या अखेरीस स्वतःचे नाव लिहिताना Sri Ramkrushna Vivekananda’s Bhagini Nivedita असे मोठ्या प्रेमाने लिहित असे.

पुढे रामकृष्ण मठाने स्वामीजींचे समग्र वाङ्मय प्रकाशित केले, त्यावरील अभिप्राय देताना भगिनी निवेदिता लिहिते, 

“या भारतात जेव्हा एखादे निरागस बालक आपल्या आईला विचारेल” आई, हिंदू धर्म म्हणजे काय गं ? त्यावेळी ती अगदी नि:शंकपणे आपल्या अपत्याला सांगेल, की बाळा स्वामीजींचे जीवन म्हणजे मूर्तिमंत हिंदू धर्म आहे. तू स्वामीजींचे समग्र वाङ्मय वाच, तुला हिंदू धर्माचे आकलन होईल.”

आपण सारेच परम भाग्यवान आहोत, की स्वामीजी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी खूप मोठा वैचारिक वारसा मागे ठेवून गेले आहेत.स्वामीजी भारतीयांना म्हणतात, ” तुम्हाला किमान बाराशे वर्षे पुरेल इतके विचारधन मी तुमच्यासाठी मागे ठेवले आहे. उठा,जागे व्हा, आणि ध्येय प्राप्तीपर्यंत क्षणभरही विसावू नका.”

प्रत्यक्ष ईश्वरी साक्षात्कार होणं हेच जीवनाचे एकमेव ध्येय आहे.

स्वामीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कृतज्ञ प्रणाम. त्यांची दैवी तेजस्विता त्यांच्याच कृपेने आपणा सर्वांच्या जीवनातही प्रकाशित होवो, आणि तेजस्विता येवो, हीच प्रार्थना.

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वसा ई-साक्षरतेचा… सुश्री अनुज्ञा बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

 

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ वसा ई-साक्षरतेचा… सुश्री अनुज्ञा बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

श्रावण महिन्यातल्या कहाण्या ऐकणं ही पर्वणी असे माझ्या लहानपणी !

तशा ढंगात आधुनिक कथुली लिहिण्याचा हा एक प्रयत्न– यंदाच्या श्रावणमासारंभानिमित्ताने —-

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट !

(२१व्या शतकात आठेक  वर्षापूर्वीची म्हणजे फार फार्रच!  राईट?)

आटपाट सहनिवासात एक कुटुंब रहात असे. त्यातले राजा -राणी नि दोन राजपुत्र आधी अगदी आनंदाने रहात. जसजसे राजपुत्र राजाच्या पावलावर पाऊल टाकून  शिक्षणात यशस्वी होत गेले, तसतसे ते राजाच्या मर्जीत राहू लागले आणि…..

ई-युगात  राणी मात्र हळुहळु मागे पडत गेली (खरंतर मागासलेली ठरली), नि त्या त्रिकुटाची नावडती झाली.

यथावकाश, शिक्षणाच्या मोहिमेसाठी राजमान्यतेने दोन्ही राजपुत्रांनी देशांतर केलं.

राजा नि राजपुत्रांचं त्रिकुट ई-संवादा ने आणखी घट्ट जोडलं गेलं.

राणी मात्र नावडतेपणाने दुरावत गेली.

राजपुत्र मोहिमेवर गेल्यानंतरच्या पहिल्या श्रावणात तिनं पुत्रांच्या क्षेम-कल्याणासाठी व्रतवैकल्यं

करायचं योजलं. त्यातल्या देवांच्या कहाण्यां मधून राणीला प्रेरणा मिळाली नि तिनं वसा घेतला-

स्वत:साठीही !

सर्वप्रथम राणीने आपल्या खाजगी ठेवी तून वशासाठी लागणारं एकमेव साहित्य, (अगदी पारंपरिक कहाण्यातल्या एक मूठ साहित्यासारखं) म्हणजेच स्मार्टफोन खरेदी केला. देवांच्या कहाण्यांनी प्रेरित झालेल्या राणीला पतिदेव सहाय्य करतील असा भरवसा नव्हताच मुळी !

त्यामुळे—सहनिवासात राहणाऱ्या नि रोज सायंवॅाक घेणाऱ्या एका नवयौवना उमेशी जवळीक साधली.

उमेनंही, राणीला सखी म्हणून स्वीकारलं.

नंतर श्रावणातल्या दर सोमवारी सहनिवासाच्या कट्ट्यावर ह्या सखी-पार्वतीच्या जोडीनं चौसोम (४ सोमवारची) योजना आखली. राणीनं, ई-तंत्र-संथा घ्यायचं निश्चित केलं.

पहिल्या सोमवारी काय घ्यावं?—-

मुठीतल्या मोबाईलला मनोभावे नमस्कार करून राणीने संपूर्ण मोबाईल-कार्य नि ई-जोडणी आत्मसात करून घेतली ,— उमे कडून !

मग दुसऱ्या , तिसऱ्या , चौथ्या सोमवारी उमेच्या समक्ष सहाय्याने, ई-मेल, व्हाट्सअप, फेसबुकमध्ये लक्ष वाहिलं राणीने !!—’ उतणार नाही मातणार नाही । घेतला वसा टाकणार नाही ।। ’  हे ब्रीद वाक्य ठेवून राणीने उपासना सुरूच ठेवली.

राजपुत्रांना पहिल्यांदा ‘मेल’ करून ई-धक्का देत देत हळूहळू राणी ई-स्मार्ट तर झालीच, –

पण…

आत्तापर्यंत ‘राजपुत्र’ हीच दुनिया असलेल्या राणीच्या कक्षा रुंदावल्या नि ती संपूर्ण जगाशी जोडली गेली.

वसा फळाला आला . — * राजा आणि राजपुत्रांची* कमालीची आवडती झाली राणी !

(जसा जसा वसा परिपक्व होत गेला तसा तसा  राणीचा नेट पेमेंट शॅापिंगवरचा दहशतवादी  वरचष्मा राजाच्या नजरेत भरू लागला.)

नेटचे निर्मळ मळे, गुगलचे तळे,

फेसबुकचा वृक्ष, व्हाट्सअप-इन्स्टाग्रामची देवळे रावळे.

मुठीतला मोबाईल मनी वसावा. संपूर्ण ई-साक्षर व्हावं —

संपूर्णाला काय करावं? ॲानलाईन अल्पदान करावं.—

ही बोटाच्या टोकावर उत्तरं असणारी कहाणी सुफळ संपूर्ण

हा वसा कुणी घ्यावा ? –काळाबरोबर राहू इच्छिणाऱ्या कुणीही घ्यावा –नि घेतला वसा टाकू नये.

लेखिका : अनुजा बर्वे

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 27 – परिव्राजक – ५ . मातृभाषा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 27 – परिव्राजक – ५ . मातृभाषा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी आणि अखंडांनंद आता वैद्यनाथला पोहोचले होते. कारण ते एक धार्मिक क्षेत्र होत आणि ते अखंडानंदांनी पाहिलं नव्हतं. रस्त्यात लागणारी धार्मिक स्थळांना ते आवर्जून भेट देत असत. तिथे एक ब्राम्ह्समाजी नेते राजनारायण बोस यांची भेट घेतली. स्वामीजी त्यांना ओळखत होते. त्यांचं वय बरच म्हणजे चौसष्ट होतं. पाश्चात्य संस्कृतीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. महर्षि देवेन्द्रनाथ टागोर यांना ते गुरु मानत. मिशनर्‍यांच्या धर्मप्रसाराला पायबंदची चळवळ, विधवाविवाह सारखी सामाजिक सुधारणा चळवळ यात त्यांचा सहभाग होता. बंगाल मध्ये देशभक्तीची जाणीव उत्पन्न होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी एक संस्था पण काढली होती. इंग्रज आपल्या देशावर राज्य करतात ते आपल्या कल्याणसाठी नव्हे तर त्यांच्या देशाचे ऐश्वर्य वाढावे म्हणून, म्हणून त्यांना हुसकावून लावण्यासाठी बळाचा वापर करायला काय हरकत आहे असं त्यांचं मत होतं.

त्यांच्या कुटुंबातच राष्ट्रावादाची परंपरा होती. जगप्रसिद्ध, महायोगी श्री अरविंद घोष यांची आई म्हणजे राजनारायण यांची कन्या होती. क्रांतिकारक  कन्हैयालाल दत्त यांच्या बरोबर ऐन तारुण्यात हसत हसत फाशी गेलेला सत्येन्द्रनाथ बोस हा त्यांचा पुतण्या होता. देशभक्तीच्या या परंपरेमुळे त्यांची काही मते ठाम  होती. जसे की, आपण आपला पोशाख करावा. आपल्या भाषेतच बोलावे. आपले शिष्टाचार आपण सांभाळावेत. आपण आपले भारतीय खेळच खेळावेत. यावर त्यांचा बारीक कटाक्ष असे. त्यांच्या संस्थेत कोणी एखादा इंग्रजी शब्द वापरला तर त्याला एक पैसा दंड भरावा लागे. त्यांचा हा स्वाभिमान स्वामी विवेकानंदांना माहिती होता म्हणून, इथे त्यांची भेट घेताना स्वामीजींनी अखंडानंदांना आधीच सांगून ठेवले होते की, आपल्याला इंग्रजी येतं हे त्यांना अजिबात कळू द्यायचं नाही.

त्या काळात बंगालमधल्या सुशिक्षितांमध्ये इंग्रजी शब्द वापरण्याची खूप मोठी खोड लागली होती. इतकी की आपल्या मातृभाषेत त्यांना कोणत्याही विषयावर धड विचार प्रकट करता याचे नाहीत आणि धड इंग्रजीत सुद्धा नाहीत. भाषेची दैन्यावस्थाच होती.

त्यामुळे राजनारायण यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमध्ये स्वामीजींनी एकही इंग्रजी शब्द येऊ दिला नाही. राजनारायण यांना वाटले की ही संन्यासी मुलं, इंग्रजी कुठल येणार त्यांना? अशाच समजुतीत ते होते. या प्रसंगात अखंडानंद आणि स्वामीजींची मस्त करमणूक झाली होती. ही समजूत करून देण्यात आपण यशस्वी झालो असे दोघांनाही वाटले. पुढे स्वामीजींची किर्ति ऐकून राजनारायण यांना स्वामीजींची भेट आठवली आणि आश्चर्य वाटले की, “केव्हढा चमत्कार आहे हा, इतका वेळ ते माझ्याशी बोलले, पण त्यांना इंग्रजी येतं अशी शंका क्षणभर सुद्धा मला आली नाही. खरोखरच हा विलक्षण चतुर माणूस असला पाहिजे.” खरच  स्वामीजींचं केव्हढं प्रसंगावधान होतं.निश्चय होता. 

धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केली त्या राजनारायण यांना स्वामीजींना वैद्यनाथला भेटावसं वाटलं कारण, ब्राह्म समाजात देशभक्तीचे विशेष महत्व नसताना सुद्धा  ,राज नारायण ब्राह्म समझी असूनसुद्धा त्यांनी तरुणांमध्ये स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. हेच वेगळेपण स्वामीजींना भावलं होतं. आपल्या प्रवासात अशा व्यक्तींचीही आवर्जून भेट घेणं हा त्यांचा उद्देश असायचाच. प्रवासात अशी अनेक प्रकारची माणसे त्यांना भेटत. नव्हे स्वामीजीच त्यांना आवर्जून भेटत.

समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं किंवा त्यांना किमत देणं हा स्वामीजींचा गुण कसं वागायचं ते शिकवणारा आहे. राजनारायण यांची स्वदेशी बद्दलची आणि मातृभाषेबद्दलची भावना हे राष्ट्र प्रेमाचं उदाहरण आहे. देशाभिमानाचं उदाहरण आहे त्यामुळे स्वामीजींना ते मनापासून आवडलं होतं असं वाटतं.

मातृभाषेची दैन्यावस्था हा विषय तर आताही आहे. आपण रोजचं पाहतोय, ऐकतोय. पु.ल देशपांडे यांनी उपहासाने म्हटलं होतं, ‘आपल्या मदरटंग मध्ये आपल्या फिलिंग चांगल्या एक्स्प्रेस करू शकतो’. हा गमतीचा भाग सोडला, तर आज रोज अनेक वार्तापत्र झडताहेत वाहिन्यांवर. इतकी मोठी आपत्ती आणि इतकी घाई आहे की आंतर्राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेले शब्दच जसेच्या तसे वापरतोय. मराठी भाषा इंग्रजी शब्दांनी समृद्ध झाली आहे असेच म्हणावे लागेल. त्यात लॉक डाउन, हॉटस्पॉट, व्हायरस, सोशल डिस्टन्स या शब्दांनी तर सामान्य लोकांना काहीच कळत नाहीये असं वाटतं काही काही वेळा. ‘लॉकडाउन’ या शब्दाचा नेमका अर्थ समाजाला स्वत:च्या मातृभाषेत उमगत नाहीये. म्हणूनच याही परिस्थितीत ते कळत नसल्याने बाहेर नेहमीप्रमाणेच फिरत आहेत. जागतिक पातळीवरच्या अशा संसर्गजन्य साथीच्या सूचना, माहिती, आपल्या मातृभाषेत सोप्या शब्दात सांगितली, समजून सांगितली, तर निदान कळेल तरी. तरच ते गंभीरपणे या सगळ्याकडे बघतील. मातृभाषा हृदयाची भाषा.   

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 10 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 10 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

वालीच्या मरणाचे दुःखाने सुग्रीवाला, अंगद व ताराला शोकावेग आवरेनासा झाला. अखेर श्रीराम त्यांचे सांत्वन  करण्यास पुढे  आले. श्रीरामाची तेजस्वी मूर्ती पाहुन तारा हात जोडून म्हणाली, ” रघुनंदना ! आपण अप्रमेय जितेंद्र आहात. आपली किर्ती जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यत राहील. आपण क्षमाशील, पराक्रमी, बलवान, संयमी, सत्शील, दीनांचा कैवारी, ऐश्वर्यसंपन्न आहात, म्हणून माझी एक विनंती पूर्ण करावी ! ज्या बाणाने आपण वालीचा वध केला त्याच बाणाने मला मारुन मुक्ती द्यावी. स्रीहत्येचे पातक आपल्याला लागणार नाही, कारण मी व वाली एकच आहोत, आमचा आत्मा एकच आहे. वालीबरोबर मला समर्पण करुन त्याला माझं दान केल्यास मी माझ्या पतीजवळ जाऊन त्यांच्याबरोबर स्वर्गात सुखाने राहीन.”

ताराचा विलापयुक्त विचार ऐकून श्रीराम सद्गदित होऊन म्हणाले, “देवी ! तू वीरपत्नी, वीरमाता, महासती आहेस. तू एवढी विदूषी असूनसुध्दा मृत्युविषयी असे विपरीत विचार कसे करू शकतेस? विधात्याने या जगाचे काही नियम केलेले आहेत. तोच या जगाची रचना करतो. तोच पोषण करतो व संहारही तोच करतो. त्याच्या नियमांचे उल्लंघन कोणीही करु शकत नाही. वालीला वीरमरण, श्रेष्ठगती मिळाली आहे . त्याच्याबद्दल शोक न करता पुढील कर्तव्याची जाणीव ठेव ! अंगदसारख्या शूर, पराक्रमी, सद्गुणी पुत्राला राज्यावर बसवून राज्याची धुरा निष्कंटकपणे चालव. त्यातच तुझे कल्याण आणि मोक्ष आहे. विधात्याची ही आज्ञा समजून कार्य कर !”

“तू खर्‍या अर्थाने महासती आहेस. तू थोर पतिव्रता असल्याने  वालीनंतर राज्याचे शकट हाकण्याचे नवे सतीचे वाण घेऊन हे कार्य सिध्दीस नेणे तुझे परम कर्तव्य आहे.”

श्रीरामांच्या सांत्वनपर शब्दांनी व उपदेशाने ती शांत झाली. धीराने अश्रू आवरुन अंगदला व सुग्रीवला धीर दिला. वालीचा अंत्यसंस्कार सम्राटाच्या इतमाला अनुसरुन साजरा केला.

वालीनंतर सुग्रीवचा राज्याभिषेक करुन त्याला राज्यावर बसविले. त्याची पत्नी रुमा त्याला परत मिळाली. तारा खऱ्या अर्थाने “राजमाता” झाली. प्रजेचे हित व कल्याण कसे होईल याबद्दल ती सतत दक्ष असे.

सुग्रीवाच्या राज्यभिषेकानंतर चार महिने पावसाळा असल्यामुळे रामकार्यात मदत करणे अशक्यच होते. परंतु या दिवसांमध्ये सुग्रीव ऐषारामात तुडुंब डुबून गेला, रामकार्याचा त्याला संपूर्ण विसर पडला. सतत अंतःपुरात राहून मदिरा व मदिराक्षीच्या पूर्ण आहारी गेला. राम अत्यंत अस्वस्थ व अशांत झालेले  पाहून लक्ष्मणाचा संताप अनावर झाला. धनुष्याचा टणत्कार काढीतच तो सुग्रीवाकडे येऊन त्याला ललकारु लागला. लक्ष्मणाचा भयानक रोष पाहून सर्व वानरसैन्य व स्वतः सुग्रीवदेखील भयभीत होऊन घाबरले. लक्ष्मणाला शांत करण्यासाठी सुग्रीवाने ताराला पुढे पाठविले. तारा अतिशय सावध, धीरगंभीर होती. ती अत्यंत कर्तव्यदक्ष असून सगळीकडे बारीक लक्ष ठेवून होती.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 9 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 9 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

सती साध्वी ताराचा करुण विलाप ऐकुन आणि तिचा मरणांतीक उपोषणाचा निश्चय पाहून हनुमान पुढे आले. ताराची योग्यता हनुमान जाणून होते. ते ताराला समजावत म्हणाले, “देवी, जन्म मरण प्रत्येकालाच आहे. त्यासाठी शोक करणे कितपत योग्य आहे? आपण तर विदुषी आहात ! जन्म मृत्युची परंपरा जाणता ! वालीराजांचा जीवनाचा अवधी संपल्यामुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली. आपण महासती, महाविद्वान आहात, आपणाला मी काही सांगणे म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखे आहे. आपण ज्ञानसंपन्न विदुषी, विवेकी, विचारी, धीरगंभीर, शांत मनस्विनी आहात.”

” कुमार अंगदच्या भविष्याचा विचार करुन आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. अंगद आणि सुग्रीव दोघेही दुःखी आहेत. त्यांचे सांत्वन आपल्याशिवाय कोण करणार? कोण आधार देणार त्यांना? आता या राज्याची स्वामिनी आपणच आहात. कुमार अंगदची  आणि सर्व वानरांची माता होऊन, आपले दुःख, शोक, बाजूला ठेवून खंबीरपणे उभे राहून वानरांचे हे राज्य आपल्याला सांभाळायचे आहे , मार्गदर्शन करायचे आहे. वालीराजांच्या पारलौकिक कार्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते आटोपल्यावर  कुमार अंगदला राजसिंहासनावर बसवावे.”

त्यावर तारा म्हणाली, ” मला आता कशाचाही मोह नाही. या सर्व ऐहिक सुखाची विरक्ती आलेली आहे. अंगदसाठी काय करायचे ते, त्याचे काका सुग्रीव पाहण्यास समर्थ आहे. पुत्रमोहात अडकण्यापेक्षा पतीधर्मानुसार त्यांच्यासोबत सती जाणे हेच मी माझे कर्तव्य समजते.”

यावेळेपर्यंत वालीला किंचित शुध्द आली. ही शुध्द त्याची शेवटचीच शुध्द होती. श्वास घ्यायला त्रास होत असतांना खोल आवाजात मोठ्या प्रयत्नपूर्वक तो सुग्रीवशी बोलू लागला. ” माझ्या अंतिम समयी जेव्हा मी यमलोकी महानिर्वाणाला निघालो तेव्हा याक्षणी माझेकडून घडलेले पातक, अविचार, अत्याचार सर्व आठवून माझाच मला धिक्कार वाटत आहे. सुग्रीवा ! तुझे माझ्यावर असलेले अपार प्रेम मी कधी समजून घेतलेच नाही. तुझ्याबद्दल विनाकारण गैरसमजाने आकस ठेवून वैर केले. तुला देशोधडीला लावले. आपण प्रेमाने राहिलो असतो तर अश्या दुर्घट प्रसंगाला सामोरे जावे लागले नसते. परंतु आता तर पश्चातापालाही अवधी उरला  नाही.”

 “अंगदला स्वतःचा पुत्र समजून त्याचा सांभाळ कर ! तो तेजस्वी, पराक्रमी, शूर आहे. सुषेन वानरराजाची कन्या तारा, हिच्याजवळ अशी आंतरिक शक्ती आहे की, भविष्यात घडणार्‍या चांगल्या वाईट घटनांची सूचना तिला आधीच मिळते. निसर्गामधे व मानवी जीवनात अनेक उत्पात होतात. त्याबाबत तिने दिलेला कोणताही सल्ला हितकारक ठरतो, जो मी कधीच ऐकला नाही, त्याचे फळ माझ्या रुपाने तुझ्यासमोर आहे. ताराने दिलेला, केलेला उपदेश आणि सल्ला कोणताही किंतु, संशय मनांत न ठेवता ऐक आणि प्रत्येक कार्य तिच्या सम्मतीनेच कर !”

वालीचे बोलणे तारा ऐकत होती आणि ओक्साबोक्शी रडत होती. वालीने अंगदला जवळ घेतले.  त्याचा हात हातात घेऊन म्हणाला, ” श्रीरामाचे कार्य देवकार्य समजून त्यांना मदत कर…”

 ताराकडे पहातच वालीचे प्राणोत्क्रमण झाले. एक बलशाली तारा निखळला !

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गाद्या घालणे… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 गाद्या घालणे… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

पूर्वी रात्रीची जेवणं आठ साडेआठ च्या सुमारास होत असत.साडेनऊ पर्यंत दिवे मालवून रेडिओवरची श्रुतिका ऐकत किंवा कधी रात्री दहाची आकाशवाणी संगीतसभा ऐकत लोक झोपेच्या आधीन होत.तत्पूर्वी गाद्या घालणे हे नित्य काम करावे लागे.तेंव्हा घरात एक किंवा दोन पलंग असत.खर म्हणजे  लोखंडी ,उभ्या आडव्या पट्ट्या असलेलली एकच कॉट असे.२/३ खोल्यांच्या लहान घरात जागाही नसे आणि प्रत्येकाने कॉटवर झोपण्याची चैन करण्याची पद्धतही नव्हती.सिंगल बेड,डबल बेड,सोफा कम् बेड,बंक बेड चा तो जमाना नव्हता.त्यामुळे घरातील ती एक कॉट वडिलांसाठी राखीव असे.ते घरात नसतील तेंव्हा दुपारी पडायला वगैरे इतरांना ती मिळे.त्यामुळे रात्री घरातील इतर सर्वांनी खाली गाद्या घालून झोपायचं हे ओघानेच आले.

घरात भिंतीला टेकवून ३/४ गाद्यांच्या वळकट्या एकावर एक रचून ठेवलेल्या असत.त्यावर एखादी सतरंजी किंवा चादर घातलेली असे ज्यायोगे गादीतला क्वचित् उसवून बाहेर आलेला कापूस दिसू नये.गाद्या घालण्यापूर्वी पुन्हा एकदा झाडून घ्यायचे.पूर्वी दोन वेळा केर काढायची पद्धत होतीच. फक्त दिवेलागणीला केर काढायचा नाही असा नियम होता.कारण ती वेळ घरात लक्ष्मी येण्याची वेळ.केर काढल्यावर सतरंज्या अंथरायच्या आणि त्यावर गाद्या पसरायच्या.गाद्या घालायचं काम सामान्यपणे घरातली पुरुषमंडळी करत आणि लहान मुले त्यांना आवडीने मदत करत.गादीवरची चादर काढून त्या चादरीने गादी जोरजोरात झटकायची. ढेकणांचाही बंदोबस्त करावा लागे..मग त्यावर हळुवारपणे चादर पसरायची.चादरीची एका बाजुची दोन टोके एकाने पकडायची आणि दुसरी दोन टोके दुस-याने पकडून हळुहळु चादर खाली आणून गादीवर अंथरायची.त्यावेळी चादरीत हवा भरुन मोठा फुगा होत असे.मग गादीवर रांगत रांगत चादरीच्या चारही बाजू ताणून ,निगुतीने गादीखाली दुमडून टाकायच्या.एकही सुरकुती तिथे असता कामा नये यावर वडिलांचा कटाक्ष असे.हे सगळं करताना घरातलं लहान मूल वडिलांच्या पाठीवर घोडा घोडा खेळत असे.घोड्यावरुन गादीवर रपेट मारली जात असे.मुलं कोलांट्या उड्या मारत  .हा खेळ रोज चाले.म्हणून गादी घालणे हे मुलांनाही  काम वाटत नसे तर उलट त्यांच्या मौजेचा भाग वाटे.शेवटी डोक्यापाशी उशा आणि पायापाशी पांघरायची चादर ठेवली की हे काम पूर्ण होत असे.गादीवर अंथरायची ‘बेडशीट ‘च असे अस काही नाही.आईची किंवा आजीची जुनी मऊ नऊवार साडीसुद्धा पांघरायला असे.हे सगळं झालं की वडिलांच्या पाठीवर पाय देणे असा एक कार्यक्रम असे.भिंतीचा आधार घेऊन आम्ही वडिलांच्या पाठीवर पाय देऊन त्यांची पाठ रोज रगडून देत असू.आईच्या वाट्याला कधीच हे कौतुक आले नाही.पण तरी ती मात्र न चुकता रोज झोपायच्या वेळी आमच्या तळपायाला साजूक तूप लावून देत असे, थंडीत पायांच्या भेगा कोकम तेलाने बुजवत असे,उन्हाळ्यात वर्तमानपत्राच्या घडीने  झोप येईपर्यंत वारं घालत असे…सगळं निरपेक्ष …शेवटी आई ती आईच.

आपण सर्व ह्या अनुभवाचा  आनंद आज ही आठवणीत साठवलेला असेलच !!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इथे ओशाळला शेक्सपिअर… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर
? इंद्रधनुष्य ?

☆ इथे ओशाळला शेक्सपिअर…☆ श्री सुरेश नावडकर ☆

शेक्सपिअर म्हणतो, ‘ नावात काय आहे? ‘– तर नावातच खूप काही आहे.. कसं? ते बघाच… जगातील कोणत्याही देशांपेक्षा, आडनावांची विविधता फक्त भारतातच आहे.. त्यातूनही महाराष्ट्रात तर, या बाबतीत आडनावांनी कहरच केलेला आहे…

आडनावांची विविधता ही अनेक प्रकारांमध्ये विभागलेली आहे.

रंगावरुन प्रचलित असलेली आडनावं.. काळे, गोरे, पांढरे, सावळे, भुरे, हिरवे, तांबडे, पिवळे, करडे, जांभळे, तपकीरे, इत्यादी. यामध्ये अनेकदा आडनावाच्या विरुद्ध ती व्यक्ती असते.. उदा. काळे आडनावाच्या बाई, गोऱ्यापान असतात.. तर गोरे आडनावाचे सद्गृहस्थ, कोळशाशीही स्पर्धा करणारे दिसतात..

धातूंची आडनावंही, बरीच आहेत.. जसे तांबे, पितळे, लोखंडे, कासे, चांदेकर, पुणतांबेकर, इत्यादी. काही खनिजांवर आधारित असतात..  रत्नपारखी, हिरे, पोवळे, लसुणे, गारगोटे, इ.

काही आडनावे, चेहऱ्यावरील अवयवांशी जोडलेली असतात.. जसे डोळे, काने, दुतोंडे, केसकर, टकले, माने, दाते, बोबडे, तिरळे, डोळस, अंधे, डोईफोडे, इ. 

आडनावं, व्यवसायावरुनही चालत आलेली आहेत.. जसे सोनार, सराफ, चांदिवले, वकील, सुतार, पारधी, वैद्य, चिटणीस, दिवाण, भगत, गुरव, लोहार, इ. काही पिढ्यांसाठी त्यांचा तो व्यवसाय असेलही, नंतर मात्र सोनाराचं, कापडाचं दुकान असतं किंवा लोहाराचा टेलरींगचा व्यवसाय असतो..

भाजीपाल्यांवरुनची आडनावं फारच गंमतीशीर असतात.. जसे भोपळे, दुधे, कारले, पडवळ, भेंडे, गवारे, रताळे, मुळे, तोंडले, केळकर, आंबेकर, फणसे, गाजरे, ढोबळे, राजगिरे, अंबाडे, नारळे, काकडे, इ. यातील भोपळे हे सडपातळ असू शकतात.. व कार्लेकर, मिठ्ठास बोलणारे असतात..

प्राणीमात्रांवरुन पडलेली आडनावं मजेशीर असतात.. उदा. मांजरेकर, उंदरे, वाघ, चितळे, सांबारे, मोरे, बिबटे, कोल्हे, कावळे, घारे, वाघमारे, मुंगसे, लांडगे, गरुड, ससे, बकरे, म्हशीलकर, पोळ, इ. जशी आडनावं, तशी ही माणसं असतीलच याची खात्री नसते.. म्हणजे ससे हे धीट असू शकतात, तर वाघ, डरकाळी फोडणे विसरुन मितभाषी झालेले असतात..

काही गंमतीशीर, प्रकृती बिघडल्याची आडनावं पहायला मिळतात.. जसे पादरे, हगवणे, पोटफोडे, पोटे, उचके, लिडबिडे, काणे, शेंबडे, लाळे, खोकले, उकिडवे, हगे, चिपडे, ढोमे, फेंदरे, इ. यांना आपलं आडनाव सांगतानाही, संकोच वाटतो…

काही आडनावं ही, गावातील कार्यपद्धतीवर असतात.. जसे पाटील, नगरकर, कुलकर्णी, मास्तर, सरपंच, सरंजामे, इनामदार, सुभेदार, हवालदार, भालकर, मोहिते, पवार, ठाकूर, ठाकरे, देशपांडे, मेश्राम, इ.  अशा नावांना, मान असतो..

चलनावर देखील आडनावं असतात, जसे पगारे, रोकडे, सहस्त्रभोजने, लाखे, कोटस्थाने, तिजोरे, हजारे, फुकटे, पावले, सोळशे, तनखीवाले, इ. यांच्या नावातच ‘नगद नारायण’ असल्यामुळे, यांची ‘चलती’ असते..

आवाज दर्शवणारीही आडनावं असतात.. जसे बोंबले, कोकले, घुमे, बडबडे, बोबडे, मुके, हर्षे, खिंकाळे, गोंधळे, तावडे, आकांत, घोगरे, इ. 

गाव व शहरावरुन पडलेली आडनावं.. शेगांवकर, किर्लोस्कर, चिपळूणकर, कराडे, गोवेकर, सासवडकर, जिंतीकर, उसगांवकर, धारवाडकर, सोलापूरकर, मुरुडकर, पावसकर, नाशिककर, नागपुरे, मालवणकर, पुणेकर, दादरकर, वसईकर, इ. यांनी आपलं गाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी आडनावाची नाळ तुटलेली नसते..

काही आडनावं चवदार, टेस्टी असतात.. जसं गोडे, आंबट, कडू, दहिवळे, ताकवले, श्रीखंडे, चक्के, कडबोळे, करंजे, पुरी, हलवाई, झणकर, हिंगमिरे, आवळे, बोरे, चिंचोरे, डाळिंबे, इ. ही नावं घेतली तरी त्यांच्या अनुभवाची चव आठवते..

आडनावांचा हा धांडोळा, थोडक्यात आटोपता घेतो.. कारण याला अंत नाही.. एवढी विविधता असूनही, काही आडनावे ही अविस्मरणीय अशीच आहेत.. कारण त्या व्यक्तींचं योगदान मोलाचे आहे…

उदा. अत्रे, म्हटलं की प्रल्हाद केशव अत्रे, देशपांडे म्हटलं की, पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे, सावरकर म्हटलं की, विनायक दामोदर सावरकर, शेळके म्हटलं की, शांताबाई शेळके, घाणेकर म्हटलं की, काशिनाथ घाणेकर, दलाल म्हटलं की, दीनानाथ दलाल, पंडित म्हटलं की, एस. एम. पंडितच आठवतात… ही आडनावांतली जादू आहे.. त्या माणसांचं मोठेपण, त्या नावाला चिकटलेलं असतं… ते नाव तसंच तेजोमय राखण्यासाठी, त्याला जपावं लागतं.. नाहीतर ‘ नाव मोठं, लक्षण खोटं ‘ व्हायला वेळ लागत नाही…

हा लेख जर शेक्सपिअरने वाचला असता, तर नक्कीच तो ‘ ओशाळला ‘ असता… हे नक्की!!

© सुरेश नावडकर

११-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 8 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 8 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

वाली-सुग्रीवामधे भयंकर घनघोर युध्द सुरु झाले. वालीच्या पराक्रमापुढे सुग्रिवाचा टिकाव लागेनासा झाला. सर्व वानरसेना एका बाजुला उभे राहुन दोघांचे द्वंदयुध्द पाहत होती. वालीच्या आघाताने सुग्रीव असहाय्य होऊन खाली कोसळला. वाली आतां त्याच्यावर निर्णायक वार करणार एवढ्यात सालवृक्षाच्या बुंध्याआड लपलेल्या रामाने वालीवर बाण सोडला. काय घडले हे कळायच्या आतच वालीचा प्रचंड देह धरणीवर कोसळला. बाजुला अभं राहुन पाणावल्या डोळ्यांनी सुग्रीव हे दृष्य पाहत होता. वालीसारखा बलाढ्य, महापराक्रमी योध्दा कोसळल्याचे पाहतांच सर्व वानरसेना भयाने रणांगणातून पळून जाऊं लागली.

कांही वानरप्रमुख वाली पडल्याचा दुःखद समाचार सांगण्याकरितां धावत ताराकडे आले. हे वृत्त ऐकुन तारा दुःखाने अतिशय व्याकुळ झाली. अंगदसोबत धावत नगरीबाहेर युध्दस्थळी आली. पाहते तो काय… सर्व वानरसेना व मंत्रीगण, सेनापती मरणाच्या भीतीने पळून जातांना दिसले, एवढ्या दुःखातही ताराने सर्वांना थांबायला सांगून संतापाने विचारले, “तुम्ही वीर ना? वाली राज्यावर असतांना त्याच्या बाहुबलाच्या आश्रयाने निश्चिंतपणे सुखाने बिनधास्त राहत होतात! आता हा वीर मरणोन्मुख झाल्याचे पाहतांच भ्याडाप्रमाणे पळून जाताहात! सुग्रीवाकडुन तो पराजीत झाला म्हणुन प्राणभयाने पळ काढतां?”

भयभीत होऊन वानर ताराला म्हणाले, “देवी! प्रत्यक्ष यमधर्मच रामाच्या रुपाने आलेले आहेत, तुम्ही सुध्दा पुढे न जातां अंगदचे रक्षण करा.”

तारा एक श्रेष्ठ वीरपत्नी होती. धैर्यशील होती. ती म्हणाली, “वानरराज वाली गेले, माझे सर्वस्व गेलं. माझं सौभाग्य गेलं. आतां  पुत्रमोह, राज्य, जीवन कशाचेच प्रयोजन उरले नाही. मी फक्त माझे पती वालीराजांच्या चरणावर समर्पित होणार!”

राम लक्ष्मण आपली धनुष्ये जमीनीवर टेकवून हे दुःखद दृष्य बघत उभे होते. सुग्रीव अतीव दुःखाने मुर्च्छित होऊन वालीजवळ जमीनीवर पडला होता. तारा अत्यंत विकलावस्थेत धावत ओरडत वालीजवळ आली. वालीला पाहतांच त्याचे डोके मांडीवर घेऊन बसली व शोक करुं लागली. अंगदालाही शोक आवरेनासा झाला. सावध झालेल्या सुग्रिवाला तारा अंगदचा शोकविलाप पाहुन त्याचाही शोकपूर वाहु लागला.

तारा विलाप करत, रडत, अविचल वालीला म्हणाली, “वीरा! आपण बोलत कां नाही? आपण मिळवलेल्या सार्या  वैभवाचं काय करायचं? माझा सारा आनंद, सौख्य लुटला गेला. माझे हृदय फाटुन कां जात नाही? आपण रुमाचे अपहरण केलेत त्याचे तर हे फळ नसेल ना? मी आपणांस अनेक वेळा, अनेक हितकारी गोष्टी सांगतल्या, दुष्प्रवृत्तीपासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण आपण कधीच माझे ऐकले नाही. श्रीरामाच्या बाणाने मारले  गेलात. मला दीनता आली. असे वैफल्यपूर्ण, दयनीय, जीवन मी कधीही जगले नाही. एवढ्या मोठ्या दुःखाचा अनुभव नाही. वैधव्यजीवनच मला कंठावे लागणार ना?”

“बोला ना स्वामी! बोला ना माझ्याशी, आपल्या लाडका पुत्र अंगदशी बोला! सुग्रीव! आता निष्कंटक कर राज्य!”

एवढं बोलुन ती वालीजवळच आमरण ऊपोषणाला बसली.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares