मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३२ – परिव्राजक १० – लोकसंपर्क ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३२ – परिव्राजक १० – लोकसंपर्क  ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजींच्या लोक संपर्कात सुशिक्षित लोक जास्त असायचे पण त्याचा बरोबर ग्रामीण भागातले लोक सुद्धा असायचे. सुशिक्षित लोकांबरोबर त्यांचा सतत विविध संवाद,चर्चा होत असत. सुशिक्षित तरुणांकडून त्यांना ही अपेक्षा होती की, ‘त्यांनी आपल्या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. एव्हढंच नाही तर भारतीयांनीच भारताचा इतिहास लिहिला पाहिजे. नाहीतर परकीय लोक आपल्या देशाचा इतिहास लिहितात. त्यांना आपली संस्कृती आणि परंपरा यांची काहीही माहिती नसताना तो लिहीत असतात. त्यामुळे त्यांना भारताच्या इतिहासातले बारकावे समजत नाहीत. अशांनी इतिहास लिहिला आणि तो आपण वाचला तर आपली दिशाभूल होते असे त्यांना वाटायचे’.

स्वामीजी राजस्थान सारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या प्रदेशात आले होते, त्यामुळे त्यांना साहजिकच ही तुलना करता आली असणार. आज तर आपल्या राजकीय परिस्थितीमुळे आपल्या इतिहासकडेही राजकीय द्वेषातूनच पाहिलं जातय. ही परिस्थिति इतकी वाईट आहे ही राजकीय स्वार्थापोटी देशाचा इतिहास, देशाभिमान यांचं महत्व राहिलेलं दिसत नाही. त्याकाळात ही गुहेत राहणार्‍या आध्यात्मिक स्वामीजींनी सामाजिक भान सुद्धा जपलं होतं. त्यांचा मोलाचा सल्ला,उपदेश अशा समाजात जिथं अनुभव येईल, जिथं गरज आहे तिथं तो देत असत.

भारत कृषि प्रधान देश आहे त्यामुळे जास्त संख्या ग्रामीण भागात राहणारी आहे. पण ग्रामीण भागातले खेडूत जास्त शिकले की शहराकडे धाव घेतात. खर तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीकडे हा वर्ग नोकरीला भुलून पाठ फिरवतो. हे स्वामीजींच्या त्या काळात सुद्धा लक्षात आलं होतं. उलट शहरातल्या सुशिक्षित लोकांनी खेड्यात जाऊन तिथल्या शेतकर्‍यांशी संवाद साधला पाहिजे. उलटा प्रवास झाला पाहिजे. म्हणजे दोन्ही वर्गात आपुलकीचे नाते निर्माण होईल असे स्वामीजींचे मत होते. त्यानुसार ते सहवासात आलेल्या लोकांना मार्गदर्शन करत असत.

आज कोरोना साथीच्या परिस्थितून पुन्हा एकदा हीच गोष्ट सिद्ध झाली आहे. इतके कामगार आणि मजूर, कारागीर असेच खेड्याकडून शहराकडे नोकरीच्या आमिषानेच स्थलांतरित झाले आहेत. त्याचा अशा संकटाच्या वेळी केव्हढा परिणाम व्यवस्थेवर आणि त्यांच्याही जीवनावर पडलेला दिसतोय. आता तर शहराकडून खेड्यात जाऊन तिथली अर्थव्यवस्था भक्कम करण्याची वेळ आली आहे.

स्वामीजींनी अशा खेडूत लोकांबरोबर तरुण लोकांना पण दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तरुणांना संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्याचे काही प्राथमिक धडेही त्यांनी तरुणांना दिले कारण, संस्कृत शिकलं तरच भारताची परंपरा खर्‍या अर्थाने समजू शकेल असं त्यांना वाटत होतं. शिवाय पाश्चात्य देशात जे जे काही नवे ज्ञान असेल, नवे विचार असतील, त्याचाही परिचय भारतीयांनी करून घेतला पाहिजे. सर्व अभ्यासला शिस्त हवी, माहितीमध्ये रेखीवपणा हवा,नेमकेपणा  हवा. कोणत्याही विषयाच्या ज्ञांनाच्या बाबतीत परिपूर्णतेची आस हवी या गोष्टींवर स्वामीजींचा भर होता. हे गुण आपण भारतीयांनी पाश्चात्यांकडून घेतले पाहिजेत असे त्यांना वाटे.

त्यांचे नुसते तात्विक गोष्टींकडे च लक्ष होते असे नाही .इतके लोक भेटायला येत, त्यांना कोणाला कशाची गरज आहे या व्यावहारिक गोष्टींकडेही त्यांचे लक्ष असे. अलवर मुक्कामात एका गरीब ब्राम्हणाला आपल्या मुलाची मौंज करण्याची इच्छा होती पण त्याची तेव्हढी आर्थिक परिस्थिति नव्हती. तेंव्हा स्वामीजींनी लोकांना विनंती केली की सर्वांनी वर्गणी गोळा करून, त्या मुलाची मौंज करावी. सर्वांनी संमती दिली. पण पुढे स्वामीजी जेंव्हा अबुला गेले तेंव्हा त्यांनी तिथल्या अनुयायला पत्र लिहून विचारले की, सांगितलेल्या सर्व गोष्टी चालू आहेत ना आणि त्या ब्राम्हणाच्या मुलाची मौंज झाली का हे ही विचारले.

अशा प्रकारे स्वामीजींनी पुढच्या प्रवासाला गेल्यावर आधीच्या मुक्कामातल्या लोकांशी पत्र संवाद चालू केला. संपर्क ठेवला आणि उपदेश पण करत राहिले. परिव्राजक म्हणून फिरताना ते कुठेही गुंतून पडत नव्हते पण  पत्र लिहिणे, संबंधित लोकांचे पत्ते लक्षात ठेवणे, जपून ठेवणे या नव्या व पूरक गोष्टी अनुभावातून त्यांनी स्वीकारल्या होत्या आणि यातूनच मग स्वामीजींनी आपल्या वराहनगरच्या मठातील गुरुबंधूंना संपर्कात राहण्यासाठी पत्र लिहिणे सुरू केले.

अलवरचा निरोप घ्यावा असं त्यांना वाटलं, सात आठवडे झाले होते इथे येऊन. त्यात अनेकांनी अनुयायित्व पत्करल होतं. खूप हितचिंतक जमवले होते. प्रवास पुढे सरकत होता तसे त्यांच्या अडचणी कमी होत होत्या. मोठ्या संख्येने लोक ओळखू लागले होते. पुढे पुढे तर, पुढच्या मुक्कामाला कोणीतरी परिचय पत्र द्यायचे ते बर्‍याच वेळा आधीच्या मुक्कामातील प्रभावित झालेली व्यक्तीच असायची. सहज ही सोय व्हायची, पण त्यांनी स्वत: कधी अशा सोयीसाठी प्रयत्न केला नव्हता.

अलवर सोडून स्वामीजी आता जयपूरला पोहोचले. यावेळी अलवरचे त्यांचे खूप हितचिंतक लोक त्यांना सोडायला त्यांच्या बरोबर पन्नास साठ किलोमीटर पर्यन्त आले होते. यावरून स्वामीजींच्या सहवासाचा परिणाम कसा होत होता याची कल्पना येते.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द व्हावे सारथी… भाग-3 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

📓 शब्द व्हावे सारथी… भाग-3 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

(अन् इतके दिवस लेखिका, मुख्याध्यापिका, मानव संसाधन विभागाची अध्यक्षा म्हणून मिळालेल्या लौकिकावर टीकास्त्राने काळा बोळा फिरला.) इथून पुढे —-

माझे मन घायाळ झाले. ‘मी सुखी आहे शिक्षण क्षेत्रात. नको मला हे पद. ‘आपणाला लोक दूषणे देत आहेत.’ मी फॅक्स पाठवला; पण मला उत्तर आले, तात्काळ. ‘धीराने घ्या. तुमची निवड ‘मी’ केली आहे. चटकन् उठा नि झटकन् कामाला लागा. सिद्ध करा आपली योग्यता.’

विश्वकोशाचे सचिव मला न्यायला ‘पोदार’मध्ये आले. मी निघाले तर महानगरपालिकेच्या समोर कॅमेरे रोखलेले. ‘‘बाई आली? टीकेला न घाबरता?’’ हे अध्यक्षपद इतके ग्लॅमरस असेल याची मला सुतराम कल्पना नव्हती; पण सुरू केले नेटाने काम. भारतीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. गोविंद फडके आणि डॉ. सु.र. देशपांडे यांची विज्ञान आणि मानव्य विभागासाठी मी मागणी केली नि त्याच दिवशी मुख्यमंत्री विलासरावांनी ती पूर्ण केली.

पण वेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले. वाईला मी केक कापला.. झाली बातमी! विजूताईंनी केक कापला! कार्यालयात गणपतीची तसबीर लावली! विजूताई दैववादास शरण! अहो, देवाला नाही तर कोणाला माणसे शरण जातात? गणपती ही बुद्धीची देवता ना!  पण मी चार मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली विश्वकोशाची परिपूर्ती केली. खंड १७ विलासराव देशमुखांच्या काळात, खंड १८ अशोकराव चव्हाणांच्या काळात, खंड १९ पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात तर २० पूर्वार्ध, उत्तरार्ध देवेंद्र फडणवीसांच्या काळात प्रकाशित झाले.

महाजालकावर तो सीडॅकच्या मदतीने टाकला. त्याला जगातून १५ लाख वाचक १०५ देशांतून मिळवून दिले. विसाव्या खंडाचा पूर्वार्ध झाल्यावर हे आमचे मंडळ बरखास्त करण्यात आले. आता फक्त ४०० नोंदी शिल्लक राहिल्या होत्या. मला अतीव दु:ख झाले; पण तर्कतीर्थाचे पुत्र वासुदेवशास्त्री जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजींना पत्र लिहिले. ‘माझ्या वडिलांचा रखडलेला प्रकल्प विजयाबाईंनी अतीव मेहनतीने पूर्ण करीत आणलाय. त्यांनी घेतलेल्या मेहनतीस न्याय द्यावा. परिपूर्ती बाईंनी करावी, अशी तर्कतीर्थाचा पुत्र म्हणून इच्छा व्यक्त करतो.’ नि ती संधी देवेंद्रजींनी मला दिली. मंडळ पुनरुज्जीवित झाले. सारे विश्वकोश कार्यालय, माझे तरुण सहकारी, जाणते संपादक कामाला लागले. मी वाईतच तळ ठोकला. गोविंदरावांचे निधन झाले होते नि आठ विज्ञान नोंदी तपासणे गरजेचे होते. हात जोडून

डॉ. विजय भटकरांसमोर उभी राहिले. ते ‘हो’ म्हणाले अन् मोहीम फत्ते! २० व्या खंडाचा उतरार्ध पूर्ण झाला. याच कालखंडात कुमारांसाठी दोन कुमारकोश जीवसृष्टी आणि पर्यावरणावर काढले आणि सात नामवंत शास्त्रज्ञांनी ते बोलके केले अंधांसाठी. कन्याकोशाची २७५ स्त्रियांचा चरित्रगौरव सांगणारी २२ तासांची ध्वनिफीत महाराष्ट्र शासनाने दुर्गम भागातही पोहोचविली.

२४ जून २०१५ ला विश्वकोशाची परिपूर्ती देवेंद्रजींनी केली नि मला कृतकृत्य वाटले. ‘विश्वकोशा’ची गाडी सचिवांकडे देऊन माझ्या वाहनाने मी परतले..

‘‘मास्तरीण मी!’ नावाने महाराष्ट्रात १८० ठिकाणी ग्रंथवाचन स्पर्धा घेतल्या. ५००० वस्तींचे शेणगाव ते मुंबई, १८० गावं. विश्वकोशाच्या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम, कॉम्प्युटर सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि ‘मंथन’चे आशीर्वाद मानांकन मिळाले. विश्वकोश घराघरांत पोहोचला. इतकी माणसे जोडली गेली ना! मी फार ‘श्रीमंत’ झाले..

माझ्या घराकडे मात्र पती बघत होते. प्राजक्ता-निशिगंधाची अतूट साथ होती. ‘आमचे राजकुमार आम्ही शोधू’ म्हणणाऱ्या या दोन्ही सोनपाकळ्या स्वयंसिद्ध कधी झाल्या? निशिगंधाने दोन पीएच.डी. नि प्राजक्ताने मेडिकल क्षेत्रातल्या तीन पदव्युत्तर पदव्या कधी संपादन केल्या? दोघींनी मला तीन गोडुली नातवंडे पन्नाशीत दिलीसुद्धा. त्यासाठीसुद्धा ही ‘नानी’ राबलीय हो; पण मायेचे अतूट धागे ना, श्रमांच्या मोलापेक्षा फार मोठे, फार चिवट नि पुष्ट असतात. आम्हाला पेन्शन देणाऱ्या दोघी मुली आमचे वज्रकवच नि सुखाचा मूलाचार आहेत.

सध्या २०१५ ते २०१८ मध्ये मी बारा बालकोशांचे संपादन करीत आहे. अहो, केवढे अपार सुख आहे त्यात. ‘नवचैतन्य’, ‘पाणिनी’, ‘डिंपल’ माझी पुस्तके काढतायत. आनंद आनंद आहे. दु:ख दात काढते ना. तो लहानपणी बुटात जखडलेला पाय दुखतो, ठणकतो; पण मी चालत राहाते. पवन पोदार म्हणत असत, ‘‘हाऊ डु यू वॉक विथ धिस लेग? आय गेट वरिड.’’

मी म्हणे, ‘‘सर, विथ धिस ब्रोकन लेग आय हॅव ट्रॅव्हल्ड इन फोर्टीन डिफ्रंट कंट्रीज.’’

माझी तीन भावंडे, जी कधीच हे जग सोडणार नाहीत असे मला वाटत होते.. आक्का, नाना, निरू.. निघून गेली. माय तर रोज उठता-बसता आठवते. मग मी ओजू, अर्जू, इशूत मन रमवते आणि मग नेटाने उभी राहाते. मी किती विद्यार्थ्यांची आई आहे. वाचकांची माय आहे. छोटय़ांची नानी आहे. माझा परिवार घनदाट आहे. माझ्या मुली हेच माझं कनक. सूर्यनारायणास मी रोज सांगते..

‘दे तेज तू मजला तुझे, 

दे तुझी समता मला

श्रेयसाची, प्रेयसाची, 

नाही इच्छा रे मला—-

ना क्षणहि जावो व्यर्थ माझा,

शब्द व्हावे सारथी

त्यांच्याच रे साथीत व्हावी, 

शेवटाची आरती’ —-

— समाप्त —

लेखिका – डॉ. विजया वाड 

संग्राहिका –  सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-4 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-4 ☆ श्री राजीव ग पुजारी 

(नंतर ओरियन यान अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतेल.) इथून पुढे —

नासाने ह्यूमन लँडिंग सिस्टीमसाठी आलेल्या तीन आराखड्यांमधून स्पेस एक्स चा आराखडा निवडला आहे. ती पूर्णतः पुनर्वापर होऊ शकणारी उड्डाण भरणारी व अवतरण करणारी प्रणाली आहे. त्याची रचना चंद्र, मंगळ व अंतराळातील अनेक खगोलीय पिंडांकडच्या प्रवासासाठी बनविण्यात आली आहे. ही HLS स्पेस एक्स च्या सुपर हेवी प्रक्षेपकाद्वारे उड्डाण भरेल. पृथ्वीच्या निम्न कक्षेत (low earth orbit अर्थात LEO)  इंधन भरून ती चंद्राकडे प्रयाण करेल.

आर्टिमिस-३ मोहिमेमध्ये यान चंद्रावर कोठे उतरवायचे हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. त्यात मोहिमेची उद्दिष्टे  आणि उड्डाणाची तारीख महत्वाची आहेत. नासाच्या सध्या चंद्रकक्षेत असलेल्या ल्यूनार रिकनायसन्स ऑर्बिटर कडून आलेली चंद्रभूमीची सुस्पष्ट अशी अनेक छायाचित्रे नासाकडे उपलब्ध आहेत. त्यात वर्षातील कोणत्या काळात कोणत्या भागात किती सूर्यप्रकाश असतो हे दिसते. यान उतरविण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे, त्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश हवा (कारण सूर्यप्रकाश हा एकमेव ऊर्जास्रोत असणार आहे), तपमानातील चढउतार कमीतकमी हवेत, पृथ्वीशी संवाद साधण्यासाठी उतरण्याची जागा व पृथ्वी एका रेषेत हवेत (म्हणजे मध्ये डोंगर वगैरे नकोत), जागेचा उतार कमीतकमी हवा, जागेवर जास्त माती व दगडधोंडे नकोत नाहीतर यान उतरताना धूळ उडेल तसेच चालताना किंवा रोव्हर चालवताना अडथळा येईल. ही जागा चंद्राच्या कायम अंधाऱ्या जागेजवळ असावी कारण तेथे कांही ठिकाणी बर्फ स्वरूपात पाणी असण्याची शक्यता आहे.

नासाने पृथ्वीवरून चंद्रावर व चंद्रावरून पृथ्वीवर सामानाची ने आण करण्यासाठी चौदा कंपन्या निवडल्या आहेत. त्यांना कमर्शिअल ल्यूनार पे लोड सर्व्हिसेस (CLPS) म्हटले आहे. आर्टिमिस-३ मोहिमेतील अंतराळवीर चंद्रावर उतरण्यापूर्वीच त्यांना लागणारे सामान, वैज्ञानिक उपकरणे व VIPER (Volatiles investigating polar exploration rover) ही बग्गी (rover) हे सर्व या CLPS द्वारा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाठविण्यात येईल. हा VIPER सुद्धा अंतराळवीरांनी कोठे उतरायचे हे सुचवू शकेल. चंद्रावर दोन अंतराळवीर शंभर किलो सामानासह उतरतील. परततांना ते चंद्रावरील दगडमातीचे पस्तीस किलो वजनाचे नमुने घेऊन येतील.

एक आठवड्याच्या चंद्रावरील मुक्कामात अंतराळवीर त्या प्रदेशातील भू रचनेचा अभ्यास करून त्याची नोंद ठेवतील, त्यात एखादा कायम अंधारात असणारा पट्टा आढळतो का हे ही पाहतील. पृथ्वीवर आणण्यासाठी ते विविध नमुने गोळा करतील, त्यांचा पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये अभ्यास केला जाईल. दगडांच्या नमुन्यांवरून चंद्रावर मोठी उल्का किंवा अशनी कधी आदळला तो कालखंड ठरविला जाईल. खडक पोखरून घेतलेल्या नमुन्यांवरून त्या खडकांच्या थरात प्राचीन सौरवादळांचे अवशेष आहेत का हे पाहण्यात येईल. एक नमुना कायम अंधार असलेल्या भागातून व एक नमुना कायम उजेडात असणाऱ्या भागातून घेतला जाईल व त्यांमध्ये भूगर्भीयदृष्ट्या कांही फरक आहे का, तसेच अंधारातील नमुन्यामध्ये वायुरूप मूलद्रव्ये आहेत का हे तपासले जाईल.

चंद्रावर असतांना अंतराळवीर HLS च्या एका कक्षात राहतील. HLS चा वरचा भाग पुनः चंद्रकक्षेत परतण्यासाठी वापरला जाईल. अंतराळवीर चंद्रावर कमीतकमी दोनवेळा उतरून काम करतील. अंतराळवीरांनी घातलेल्या अंतराळपोषाखात असणाऱ्या जीवनरक्षक प्रणालीत सुधारणा करून चार वेळा चंद्रावर उतरून काम करता येईल का, तसेच आणखी एखादे अवतरण अनपेक्षित आले तर करता येईल का याचा नासा विचार करत आहे. त्यासाठी HLS च्या वजनात वाढ करावी लागल्यास ती किती करता येईल याचा अभ्यास सुरु आहे. तसे झाल्यास दिवस क्रमांक १,२,४,५ हे चंद्रावर काम करण्याचे दिवस पैकी शेवटच्या दिवसाचा अर्धा भाग त्या परिसराची स्वच्छता, हत्यारे गोळा करून व्यवस्थित ठेवणे-जेणेकरून ती पुढील मोहिमांमध्ये वापरता येतील- वगैरेसाठी असेल तर दिवस क्रमांक ३ हा विश्रांतीचा असेल. त्यावेळी अंतराळवीर HLS च्या आत वैज्ञानिक प्रयोग व पृथ्वीवरील लोकांशी संभाषण वगैरे करतील. जर ल्यूनार टेरिन व्हेईकल(LTV) हा रोव्हर अंतराळवीर उतरण्याआधी उपस्थित असेल तर, अंतराळवीर चंद्रभूमीवर जास्त दूर प्रवास करू शकतील.

चंद्रावरचा मुक्काम संपल्यावर अंतराळवीर HLS द्वारे चंद्रभूमीवरून उड्डाण करून ओरियनशी जोडले जातील व तीन दिवसांचा प्रवास करून पृथ्वीवर परततील.

आर्टिमिस-३ नंतर….

आर्टिमिस-३ नंतर अनेक चंद्र मोहिमा केल्या जातील. पुढील मोहिमांच्यावेळी गेट-वे अर्थात चांद्र अंतराळ स्थानकाचा वापर केला जाईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आर्टिमिस कॅम्प उभारण्यात येईल. पृथ्वीवरील इंटरनेट प्रमाणे LunaNet चालू करण्यात येईल. रोव्हर्स सॅम्पल्सचे पृथ:करण करतील व तो विदा पृथ्वीकडे पाठविण्यात येईल. चंद्रभूमीवरील अंतराळवीरांना सौरज्वाळांची आगाऊ सूचना मिळून ते आडोशाला जाऊ शकतील. ल्यूनानेट पोझिशनिंग, नेव्हीगेशन आणि टाईमिंग (PNT) सेवा देईल, त्यामुळे चंद्रपृष्ठावरील कामे पूर्वीपेक्षा सुरळीतपणे पार पडतील.

    या सर्व चंद्रमोहिमा नासा, त्याचे आंतरराष्ट्रीय सहकारी आणि व्यावसायिक सहकारी यांच्याद्वारे केल्या जातील. त्यामुळे नासाला सौरमालिकेचा धांढोळा घ्यायला वेळ मिळेल. नासाचे हे सहकारी रोव्हर्स, चंद्रनिवास आणि ISRU- इन सी टू रिसोर्स युटिलायझेशन अर्थात चंद्रभूमीवरील संसाधनांचा उपयोग करणारी साधने पुरवू शकतात. त्यामुळे आर्टिमिस कॅम्प हा अमेरिका व तिच्या सहकाऱ्यांसाठी दुसरे घरच बनेल. 

चंद्रमोहिमांच्या या बहुमोल अनुभवाचा वापर करून नासा आर्टिमिस योजनेअंतर्गत समानव मंगळ मोहीम आखणार आहे.

—  समाप्त  —

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणेशोत्सव काल आणि आज … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ गणेशोत्सव काल आणि आज… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणजे गणेशोत्सव ! तो कधीपासून सुरु झाला याची नोंद इतिहासात असणार, पण गणपती मळाचा की चिखलाचा ? आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत. कुणी पुराणात जाऊन पाहिलंय ? नाही, तेही कल्पनेनेच लिहिले. त्यामागे तत्कालीन परीस्थिती, भौगोलिक, आर्थिक सामाजिक वैज्ञानिक ही असेल कदाचीत पण ते प्रमाण मानत आपण पाळत आलो, कदाचित त्या काळी काळाशी सुसंगत असेल ही ! 

ब्रिटिशांविरुद्ध समाजात एकी निर्माण करण्यासाठी टिळकांनी घरातला गणपती चौकात ठेवला की जेणेकरून लोक एकत्र येतील मग त्यांना समजावणे, सांगणे सोपे जाईल आणि नंतरच्या काळात त्याला सार्वजनिक रूप आले. टिळकांचा मूळ उद्देश जनजागृती व लोकांना एकत्र येणे हे सफल झाले असतीलच, पण पुढे ही प्रथा तशीच राहिली अन मंडळे वेगवेगळ्या कल्पना लढवून कल्पकता अन सामाजिक प्रबोधन करू लागली. मनोरंजनाच्या विविधरंगी कार्यक्रमानी उत्सव बहरू आणि भारु लागले. एक चैतन्य संचारले या उत्सवात नियमितच्या रुटीनमधून लोकांचे मनोरंजन होऊ लागले, विरंगुळा मिळू लागला. लोक शिकले, शिक्षित झाले, उत्सवात बदल झाले, लोकसंख्या वाढली, आता खरे तर काळानुसार बदल व्हायला हवे होते पण उलटेच घडले. भरमसाठ मंडळे एकमेकांवर ईर्षा, भांडणे अन जबरदस्तीच्या देणग्या, उंचच उंच मुर्त्या, डॉल्बी, बीभत्स गाणी यांनी उत्सवाचे सात्विक रूप जाऊन हिडीस रूप आले. प्रसादाच्या नावाखाली जेवणावेळी अन अन्नाचा अपव्यय होऊ लागला. रस्त्यावरची गर्दी, डॉल्बीचे शरीरावरील घातक परिणाम, पाणी प्रदूषण, ट्रॅफिक जॅम अन सामाजिक वातावरण गढूळ केलंय या सार्वजनिक उत्सवाने !आचार विचारात काळानुसार बदल होऊन सुसंस्कृतपणा यायच्या ऐवजी त्याची दिशा भरकटली अन दशा दशा झाली की हे आवरायला गणेशालाच बोलवावे वाटतेय.

सामाजिक वातावरण पर्यावरण यांचा विचार आम्ही करत नसू तर मग कायदाच का करत नाहीत एक छोटे गाव एक गणपती, मोठे शहर एक गल्ली एक गणपती ? मोठ्या मूर्ती बनवणे कायद्याने बंद का केले जात नाही ? पर्यावरण पुरकच मूर्ती तयार करा म्हणून कायदा का होत नाही ? घरगुती, सार्वजनिक मूर्तींना ठराविक उंचीचे प्रमाण का दिले जात नाही ?कारण या सर्वांना खतपाणी घालायला राजकारणी मंडळी कारणीभूत आहेत. उत्सव जवळ येताच मंडळांना शर्ट, भरमसाठ देणगी दिली जाते अन ऐतखाऊ, चंगळवादी पिढ्याना सवय झालीय की उत्सव आला की राजकारण्यांकडे भीक मागून जगायचे, टोकाच्या अस्मिता अन श्रद्धाही ! सामाजिक जागृती अशा विचित्र, ओंगळ वळणावर आलीय, करोडो रु चा चुरा पाच ते सात दिवसात होतोय. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मंडळे सामाजिक बांधिलकी, सलोखा अन विधायक उपक्रम राबवतात, बाकी सर्व तेच ते जेवणावेळी, रोषणाई अन डॉल्बी !

खरे तर भारत हा कृषिप्रधान देश आहे  म्हणून सर्व सण उत्सव हे शेतकरी जीवनाशी निगडित होते.

देवाचा प्रसाद अन फुले फळे ही त्या त्या ऋतूनुसार ! चिखलाचे देव पाण्यात विसर्जित करायचे म्हणजे पुन्हा ते निसर्गात मिसळावेत. जसे मनुष्य जन्मास येतो अन शेवटी मातीत मिसळून एकरूप होतो ! तसेच या देवांच्या मूर्तीचे देखील ! बघा, नागोबा, बैल, मातीचेच अन गणपती ही मातीचाच ! बारा बलुतेदारांना वेगवेगळ्या सणाला महत्त्व होते अन त्यांचा चरितार्थ यातून होत असे म्हणून हे सण अन औपचारिक गोष्टींचे चक्र त्या गावगाड्याच्या गरजेनुसार फिरत असे ! आता ते सर्व सम्पले, शेती सम्पली, कृषिप्रधान देश व्यापार प्रधान अन नोकरीप्रधान झाला अन सगळे सण व्यापारी गणिते करू लागले ! शेतातून, परसातून फुले, पत्री, दुर्वा न मिळता थेट बाजारातून मिळू लागली, पाना फुलांचा, फांद्यांचा बाजार बसू लागला अन कसल्याही परस्थितीत ते केलेच पाहिजे ही मानसिकता वाढली.

अमुक सण अमुक स्पेसॅलिटी याचे स्तोम वाढले शेतात पिकापेक्षा तनकट फोपावल्यासारखे !

मला आठवतो माझ्या बालपणीचा गणेशोत्सव ! श्रावणातल्या झडीने अन भादव्याच्या उन्हाने पिकं तरारून यायची सोबत गवत तणही फोपवायचे पिकांशी स्पर्धा करत, रस्त्याच्या दुतर्फा तरवड, गवतफुल फुललेली असायची, परसदारी विविधरंगी गौरी फुलायच्या   रंगीबेरंगी फुलपाखरे सगळीकडे आनंदाने भिरभरायची, ज्वारी, मका कम्बरेला लागलेली असायची, मूग, काळा श्रावण, चवळीच्या शेंगा अंगणात ऊन खात पडायच्या, मुगातल्या लाल अळ्या अन  चवळीच्या पांढऱ्या अळ्या शेंगेतून बाहेर पडून वाट दिसेल तिकडं धवायच्या, उन्हात टरफल फुटून शेंगा चट चट आवाज करत फुटायच्या अन कडधान्य बाजूला पडायची, चिमण्या दिवसभर या आळ्या गट्टम करण्यात व्यस्त अन शेतकरीन धान्याची उगा निगा करण्यात ! इकडे शेतीच्या पिकांची लगबग अन सण चौकटीत ! पटपट ही काम आवरून सणाच्या तयारीला लागायची ! घराघरात देवळीला सोनेरी बेगड लावून मखर करून गणपती विराजमान व्हायचा क्वचितच तो टेबल किंवा तत्सम वस्तूवर स्थानापन्न व्हायचा. शेतात दुर्वा दव बिंदूंचे मुकुट परिधान करून पावसाची नव्हाळी लेऊन हिरव्या कंच लुसलुशीत पेहरावात मुबलकपणे हवेवर डुलायच्या, आघाडा रस्त्याच्या कडेला कुंपणात आपली डोकी उंचावत अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडायचा ! उदबत्ती, निरांजन, कागदाच्या झुरमुळ्या, दरवर्षी याच सणाला राखून ठेवलेले नवीन रंगीबेरंगी कापड टेबल वर बस्स इतकीच घरगुती गणपतीची आरास ! फार फार तर कागदाची  एखादी प्रभावळ ! पेढे, पेरू, केळ, चुरमुरे बत्तासे, शिरा, मोदक प्रसाद इतकाच माफक !

सार्वजनिक मंडळ गल्लीत एकच साधी मूर्ती, छोटासा मंडप, विद्युत रोषणाई स्टेरीओवर तेव्हढाच गल्लीपुरता गाण्यांचा आवाज घुमायचा अन मनात आनंदी आनंद भरायचा. आमची गल्ली गावाच्या एका टोकाला, खूप मोठी ! जणू छोटेसे एक गावच ! गल्लीतल्याच नाटक कंपनीचं एखादं नाटक किंवा विविध गुण दर्शन बस इतकेच मनोरंजन ! गावात वेगवेगळ्या पेठांचे वैशिष्ट्य पूर्ण आरास, देखावे कधी जिवंत देखावे अन तीच स्टेरिओवरील गाणी त्या त्या काळातील मराठी हिंदी चित्रपटातील ! वातावरण आनंदान भरून  जायचं ! वेगळं काही वाटत नव्हतं किंवा देव आणि गाणी यांचा काही संबंध असावा हे ध्यानी येत नव्हतं ! कुठेही धावपळ, ताण किंवा बोजा नसायचा. पाच दिवस घरोघरी विराजमान होऊन पुरणपोळी खाऊन, सार्वजनिक गणपती शिरा खाऊन त्यांच्या गावी जायचे मन हुरहूरते ठेऊन अन शेतकरी पुढील शेताच्या कामाच्या लगबगीत !

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-3 ☆ श्री राजीव ग पुजारी 

(या दलाने SLS च्या २१२ फूट उंचीच्या मुख्य टप्प्याच्या प्रतिकृतीचे (याचे नाव पाथ फाईंडर ठेवले आहे ) कंटेनर मधून उतरविणे, हाताळणे आणि जुळणी करणे यांचाही अभ्यास केला होता.) इथून पुढे —–

SLS प्रक्षेपक मानवरहित ओरियन अंतराळयानाला पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करेल. तेथून अंतरिम क्रायोजिनिक प्रणोदन टप्प्याच्या सहाय्याने यान चंद्राच्या रेट्रोग्रेड कक्षेत जायला सज्ज होईल. गुरुत्वाकर्षणीय सहाय्याने (gravity assist) ते चंद्राच्या सुदूर रेट्रोग्रेड कक्षेत जाईल. रेट्रोग्रेड म्हणजे, चंद्र स्वतःभोवती ज्या दिशेने फिरतो, त्याच्या विरुद्ध दिशेने यान चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. या कक्षेत यान सहा  दिवस राहील. नंतर परत गुरुत्वाकर्षणीय सहाय्याने यान पृथ्वीकडे झेपावेल. एकूण मोहीम २६ दिवसांची असेल. मोहिमेची पूर्तता यान ताशी २४,५०० मैल किंवा मॅक ३२ या अतिप्रचंड वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करुन पॅसिफिक महासागरात विसावण्याने होणार आहे. तत्पूर्वी त्याने  त्याच्या संपूर्ण प्रवासाचा विदा ( डेटा ) गोळा केलेला असेल. गुरुत्वाकर्षणीय सहाय्याने यानाचा परत प्रवेश ही या मोहिमेची प्राथमिकता आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतांना यानाच्या उष्णतारोधक कवचाचे तपमान ५००० डिग्री फॅरनहिट एव्हढे असणार आहे. या तपमानाला हे कवच टिकते का याचेही परीक्षण या निमित्ताने होईल.

या मोहिमेमध्ये अंतराळवीरांना आवश्यक असणाऱ्या उपकरणांऐवजी वैज्ञानिक आणि तांत्रिक माहिती गोळा करणारी उपकरणे असतील. समानव मोहिमेच्यावेळी कॉकपीट समोर असणारे दर्शक, नियंत्रक व जीवसंरक्षक उपकरणांऐवजी यानाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आवश्यक अशा विदा ( डेटा ) गोळा करणाऱ्या उपकरणांचा समावेश असेल. यामुळे यानाच्या कामगिरीचे उड्डाणापूर्वी तयार केलेले अंदाजी प्रारूप व प्रत्यक्ष विदेवरून मिळालेली माहिती यांचा तौलनिक अभ्यास केला जाईल. या चार ते सहा आठवड्यांच्या मोहिमेमध्ये यान चौदा लाख मैलांपेक्षा जास्त प्रवास करेल. यामुळे मानवांसाठी तयार केलेल्या यानाचा पृथ्वीपासून सुदूर प्रवासाचा अपोलो १३ ने केलेला उच्चांक मोडला जाईल. या मोहिमेशी अनेक विश्वविद्यालये, आंतरराष्ट्रीय सहयोगी व खाजगी कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांची संख्या पूर्वीच्या चांद्रमोहिमेशी जोडल्या गेलेल्या संस्थांपेक्षा जास्त आहे. आर्टिमिस-१ मोहिमेमध्ये १३ लघुउपग्रह सुद्धा सुदूर आंतरिक्षात सोडले जातील, त्यामुळे आपल्या सुदूर अंतरिक्षाच्या वातावरणाविषयीच्या ज्ञानात भर पडेल. हे उपग्रह नवीन वैज्ञानिक अन्वेषण करतील आणि नवीन तांत्रिक प्रत्यक्षिके देखील करतील.

आर्टिमिस-२:- ही स्पेस लॉंच सिस्टीम व ओरियन अंतराळयान यांची पहिलीच समानव मोहीम आहे. या मोहिमेद्वारा चार अंतराळवीरांना पन्नास वर्षांनंतर प्रथमच चंद्राच्या वातावरणात पाठविण्यात येणार आहे. ‘आर्टिमिस पिढी’ चा हा ‘अपोलो ८’ क्षण आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण अपोलो ८ यानाद्वारा इतिहासात प्रथमच मानव चंद्राच्या वातावरणात पोचला होता. यावेळी ओरियन यानातील अंतराळवीर पृथ्वीच्या पार्श्वभूमीवर चंद्राचा फोटो काढतील.

    आर्टिमिस १ च्या यशामुळे तसेच हजारो तास केलेल्या तयारी व तालमींमुळे मिळालेला आत्मविश्वास घेऊन हे अंतराळवीर SLS च्या टोकावर असलेल्या ओरियनमध्ये आरूढ होतील. ही मोहीम दहा दिवसांची असेल. या मोहिमेद्वारा चंद्राच्या विरुद्ध बाजूला जास्तीतजास्त लांब जाण्याचा व असंकरीत मुक्त प्रत्यागमन विक्षेपमार्गाने (hybrid free return trajectory) परत येण्याचा समानव यानाचा विक्रम प्रस्थापित होईल.        

आर्टिमिस ३:- आर्टिमिस-२ प्रमाणेच आर्टिमिस-३ मोहिमेमध्ये देखील चार अंतराळवीर असतील. पण यावेळी पहिल्यांदा एक स्त्री व नंतर एक पुरुष चंद्रभूमीवर पाऊल ठेवतील. आर्टिमिस-३ मोहिमेपूर्वी चंद्राभोवती अंतराळस्थानक उभे करण्याचा प्रयत्न आहे. त्याला गेट वे म्हणून संबोधले जाईल. ओरियन अंतराळयान या स्थानकाशी जोडले जाईल. अंतराळवीर या स्थानकावर उतरतील. नंतर ह्यूमन लँडिंग सिस्टीम (HLS) द्वारे ते चंद्रावर उतरतील. चंद्रावरील काम संपल्यावर HLS च्या मदतीने ते पुन्हा स्थानकावर येतील. या स्थानकाचा उपयोग फार महत्वाचा आहे. कारण एकाच चंद्रमोहिमेत अंतराळवीर अनेकदा चंद्रावर उतरून काम करू शकतील. जर आर्टिमिस-३ मोहिमेपर्यंत स्थानकाचे काम पूर्ण झाले नाही तर आर्टिमिस योजनेच्या पुढील मोहिमांसाठी याचा वापर केला जाईल. या अंतराळ स्थानकासारखेच भविष्यात मंगळाभोवती देखील अंतराळ स्थानक उभारण्यात येईल. या स्थानकात अंतराळवीर थांबून अनेकवेळा ते मंगळावर उतरून काम करू शकतील. म्हणजेच चंद्राभोवतीचे अंतराळ स्थानक म्हणजे मंगळावर मनुष्य भविष्यात कशा पद्धतीने काम करू शकेल याची रंगीत तालीमच म्हणायची!!

जर अंतराळ स्थानक आर्टिमिस-३ मोहिमेपर्यंत पूर्ण झाले नाही तर, अंतराळवीर ह्यूमन लँडिंग सिस्टिम वापरून चंद्रावर उतरतील. या परिस्थितीत चंद्रकक्षेतच अंतराळवीर ओरियन मधून HLS मध्ये स्थलांतरित होतील. चंद्रावरील त्यांचे काम संपल्यावर HLS मध्ये बसून पुन्हा ते चंद्रकक्षेत येतील, तेथेच ते पुन्हा ओरियन यानात स्थलांतरित होतील. नंतर ओरियन यान अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतेल.

क्रमशः …

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाडगेभर निर्जीव अन्न… वैद्य रूपाली पानसे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆ वाडगेभर निर्जीव अन्न… वैद्य रूपाली पानसे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

वाडगेभर निर्जीव अन्न : आजची फॅशन “🍲🍜🍚

“अ बाउल ऑफ डेड फूड” या माझ्या wordpress च्या ब्लॉगबद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी ही पोस्ट अजून विस्तृत करून मराठीमध्ये लिहिली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल, असे वारंवार सुचवले. ही पोस्ट त्या वाचकांना समर्पित !

आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात फूड इंडस्ट्रीमध्ये अफाट, आमूलाग्र technical क्रांती झाली आहे. गमतीने आपण म्हणतो, काही धंदा चालो ना चालो पण वडापावची गाडी आणि खाण्याचे दुकान याला मरण नाही. किती खरे आहे हे.आज सर्वात जास्त नफा फूड इंडस्ट्री, हॉटेल आणि फूड manufacture सेक्टर कमावतंय. उद्याही हेच चित्र असेल किंबहुना अजून विस्तार वाढला असेल.

ज्या वेगात हा ‘रेडी टू ईट’ पदार्थांचा उद्योग फोफावतोय, त्याच वेगात lifestyle disorders औषधी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातही वाढ होतेय. याचा अर्थ असा तर नाही ना की, फूड इंडस्ट्री औषधी मार्केटसाठी कस्टमर तयार करतेय? दुर्दैवाने काही अंशी ते खरेही आहे. काही घरात ‘रेडी टू ईट’ पदार्थ हे अगदी रोज, खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी लहान मुलांनाही दिले जातात. (हो, कारण जाहिरातीत टार्गेट ऑडियन्स लहान मुले व त्यांच्या आयाच असतात )

‘रेडी टू ईट’ पदार्थांची यादी भली मोठी आहे. आज उदाहरणादाखल आपण घेऊ ….

कॉर्न फ्लेक्स, ओट मिल, चॉकोस, मुसेली इत्यादि :

अति उच्च तापमानात, अति दाबाखाली मूळ धान्यातील पाण्याचा अंश काढून हे पदार्थ तयार होतात. उष्णता, अति दाब यामुळे यातील नैसर्गिक पोषणमूल्ये जवळजवळ नष्ट होतात. राहतो तो निर्जीव पोषणमूल्यरहित चोथा! आता हा चोथा कोण खाणार म्हणून मग त्यात टाका कृत्रिम व्हिटॅमिन, कॅल्शिअम,  लोह इत्यादि, जे शरीरात नीट शोषले जाईल याची काही शाश्वती नाही.

किती गम्मत आहे नाही? आधी त्या धान्याचा जीव घ्या आणि मग त्यात परत जीव आणण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यात मूळ पदार्थांपेक्षा processing कॉस्ट वाढलेली असते तसेच टिकवणे, चव वाढवणे,  दिसायला आकर्षक असावे या गोष्टीतून त्यात वेगवेगळी रासायनिक preservatives, रंग, मीठ, साखर आणि फ्लेवरची भर पडते. काही ब्रॅण्ड्समध्ये तर वाळवलेल्या भाज्या, फळेही असतात. समस्त पिरॅमिड रिटर्न mummy, मृत शाक, फल, धान्य संमेलनच जणु !

असे पदार्थ वारंवार खाण्यात असणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता, हे पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांमध्ये स्थूलता, अतिउच्चरक्तदाब, तसेच मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. कमालच आहे! पण जाहिरातीत तर सुडौल कमरेची बाई हे ३ आठवडे खा आणि वजन कमी होईल असे सांगत असते. वरून टाकलेल्या मीठ,  साखरेचे परिमाण दुसरे काय. आयुर्वेदानुसार असे निर्जीव, अति उष्णतेचा संस्कार झालेले, कोरडे अन्न हे वात दोष वाढवून शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करण्याचे एक मुख्य कारण मानले जाते.

ओट हे तर अतिशय निकृष्ट धान्य वर्गात गणले जावे, इतके याचे पोषणमूल्य कमी आहे. ओटचा ग्लायसिमीक इंडेक्स (म्हणजे हे पचवताना रक्तातील वाढलेली साखरेची पातळी) ही जास्त असते. मी प्रत्यक्षात मात्र खूप मधुमेही रुग्णांना, “डॉक्टर, म्हणजे मी अगदी नियमित ओट मिल घेते, unhealthy असे काहीच खात नाही हो.” असे भक्तिभावाने सांगताना पाहते. बसतोय ना धक्का एक एक वाचून. असो !

ओट meal नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कुपोषणाचे सगळी लक्षणे आढळून येतात, ज्यामुळे हाडे, सांधेदुखी, थकवा, पचनाच्या तक्रारी,  मलबद्धता, अहो, इतकीच नाही ही गोष्ट! अगदी आतड्यामध्ये मार्गावरोध होणे (intestinal obstruction, जी सिरिअस स्थिती असते) इतपत आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. याला डेटा,  research, सगळ्याचा आधार  आहे. गुगल करा.

मूळ म्हणजे पोषणरहित अन्न खाऊन शरीराचे हाल करा, वजन आपोआप कमी होईल ही विचारसरणीच किती भयानक आहे. सत्य आहे – आजच्या मनी ओरिएंटेड सोसायटीचे ! दुसरे काय?

‘रोज रोज ताजा नाश्ता बनवणे शक्य नसते हो’, ‘खूप सवय झाली या पदार्थांची, आता मुले ऐकत नाहीत’, ‘असे कसे चालते मार्केटमध्ये, जर एवढे दुष्परिणाम असतील तर?’

 – या सगळ्याला एकच उत्तर आहे, ‘ब्रॅण्डिंग’! 

‘ब्रॅण्डिंग’ची माया जी मला, तुम्हाला,आपल्या मुलांना बरोबर जाळ्यात ओढते. जाहिरात, सुंदर सुंदर मॉडेल आणि भ्रम निर्माण करणारे मोठे मोठे दावे! यात अगदी आयुर्वेदिक, आयुर्वेदिक म्हणून झेंडा फडकवणारे शांतंजली किंवा इतर हर्बल कॉर्न फ्लेक, मुसेलीवाले पण येतात बरं का!

आयुर्वेद वेगळा, स्वदेशी वेगळे, गल्लत नको.

अरे हो हल्ली ‘रेडी टू ईट व मेक’ पोहे, खिचडी, सांजा अशीही पाकीटे  मिळतात बरं का! तेही याच गटातले आहेत, विसरू नका.

अगदी क्वचित कधीतरी, पर्याय नाही, म्हणून हे पदार्थ खाणे समजू शकते.  परंतु अगदी वारंवार, खूप प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तीस हे खाण्यास देत असाल तर, नक्की परत विचार करा.

आपल्या आजूबाजू सहज मिळणाऱ्या ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, साळीच्या लाह्या ह्या वरील पदार्थाना उत्तम पर्याय ठरू शकतात. बाकी, ताज्या नाश्त्याच्या पदार्थांबाबत मी मागेच एक पोस्ट सविस्तर लिहिली आहे.

आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीला, शरीराला उपकारक व अनुसरून आपले पारंपरिक पदार्थ असतात. आळीपाळीने असे पारंपरिक व ताजे पदार्थ खाण्यात ठेवणे कधीही उत्तम.

ताजे खा, साधे खा, निरोगी राहा.

लेखिका – वैद्य रुपाली पानसे –

मो 9623448798 ईमेल [email protected]

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द व्हावे सारथी… भाग-1 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ 📘शब्द व्हावे सारथी… भाग-1 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

‘‘लंगडीच राह्य़चंय का तुला आयुष्यभर?’’ डॉ. बेडेकर मला विचारीत होते.

‘‘आयुष्यभर म्हणजे?’’ मी विचारलं.

‘‘आईएवढी, माझ्याएवढी झालीस तरी!’’

‘‘नाही नाही. मला धावायचंय, पळायचंय. सायकल चालवायचीय.’’

‘‘मग साठ इंजेक्शने घ्यावी लागतील न रडता. मुंगी चावल्यागत वाटेल.’’

माझे वय साडेपाच वर्षांचे होते. आधी वर्षभर माझ्या पायात मांडीपासून टाचेपर्यंत बूट होता. आईने वाचायला शिकविले होते नि मला न हसणारे, न चिडवणारे दोस्त आणून दिले होते- पुस्तकं! तेव्हापासून मला साथ देणारे माझे जिवाभावाचे सोबती.

‘‘मी घेईन. न रडता घेईन.’’

अशी साठ इंजेक्शने या बारक्या, काटकुळ्या पोरीने शूरपणे घेतली, न रडता आणि ती दोन पायांवर उभी राहिली. आईचा हात धरून सातव्या वर्षी एकदम दुसरीच्या वर्गात बसली नि ‘हुश्शार’ म्हणून गोडांबेबाईंची लाडुकली झाली. ती मी. विजया नरसिंह दातीर. माझे बाबा वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी गेले. मी केवळ अकरा वर्षांची होते. बाबा पुण्याचे सिटी मॅजिस्ट्रेट होते. डॉ. अमीन कलेक्टर होते. ते म्हणाले, ‘‘मिसेस दातीर, तुम्हाला पाच मुलं. गृहिणी आहात. दातीरांना पेन्शन बसणार नाही. मी दोन्ही मुलांना नोकरी लावून देतो. घर स्वाभिमानाने चालेल.’’

असे दादा, नाना, बाबांचं तेरावं करून नोकरीवर रुजू झाले. दादाला जेलर म्हणून येरवडय़ाला क्वार्टर्स मिळाल्या. दोन्ही बहिणींनी लग्ने केली सहा महिन्यांत. नाना राहुरीस होता. घर फक्त तिघांचं. मी, दादा, आई. माझ्यात नि भावंडांत फार अंतर होते. आठ, नऊ, तेरा वर्षांचे; पण दादा माझा बाप झाला नि माझे जीवन त्याच्यामुळे फार सुकर झाले.

‘‘कोणी विचारले, बाबा काय करतात तर रडायचे नाही. सांगायचे, जेलर आहेत.’’ इतुके प्रेम-इतुकी माया. माझे बीएस्सीपर्यंतचे शिक्षण, लग्न, बाळंतपण सारे सारे दादा, नाना यांनी केले. आक्काही जबाबदारी उचले.

पण तेव्हा ना, अतिमध्यम परिस्थितीचे काही वाटायचे नाही. आई मला कॉलेजात जाताना स्कर्ट घालू देई, पण घरी आल्यावर साडीच! केमिस्ट्री प्रॅक्टिकल्सला कपडय़ांना भोके पडतात म्हणून स्कर्ट हो! के.जे. सोमैय्यांतून मी बीएस्सी होता होता टेबल टेनिस, बुद्धीबळ या स्पर्धात आंतरकॉलेज स्पर्धात नि बुद्धीबळमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. मला ‘बेस्ट गर्ल स्टुडंट’चा गौरव ज्युनिअर बीएस्सीला मिळाला; पण या नादात माझा फर्स्ट क्लास गेला. ‘‘आता लग्न करा.’’ आईने आदेश दिला. मी रेल्वे क्लबवर  ‘टे टे’ खेळायला जायची. तिथला माझा मित्र दोन दिवस मला घरी सोडायला आला. तेव्हा आईने त्याला दम भरला, ‘‘मी रोज गणपतीला जाते. मला कोणी घरी पोचवायला येत नाही. कळलं का? विजूला सोडायला यायचं नाही. ती फक्त लग्न ज्याच्याशी करेल.. त्याच्याबरोबरच येईल- जाईल.’’ तो इतका घाबरला. मला दुसऱ्या दिवशी म्हणाला, ‘‘बाप रे! तुझा भाऊ जेलर नि आई जगदंबा.’’ पण मला त्याच्याबद्दल काही मृदू वाटत होते. आमचे पासपोर्ट साइज फोटो आम्ही एकमेकांस दिले होते, पण बस्! त्या कोवळिकीचे अ‍ॅबॉर्शन हो! रेल्वे क्लब बंद.. बंद!

लग्न ठरले. कॅप्टन विजयकुमार वाडांना मी म्हटलं.. ‘‘असं प्रेम जडलं होतं.’’

‘‘आता नाही ना?’’

‘‘छे हो!’’

‘‘अगं, काफ लव्ह ते. तो फोटो टाकून दे. माझा ठेव.’’

संपलं. ओझंच उतरलं.

मला एका गोष्टीचे फार दु:ख होई, की माझा नवरा मला बॉर्डरवर नेत नाही. ‘‘मला पीस पोस्टिंग नाही. फिल्ड पोस्टिंगला कसे नेणार?’’ या उत्तराने माझे कधीही समाधान झाले नाही; पण मग दोघी मुलींनी जन्म घेतला चौदा महिन्यांच्या अंतराने आणि मी आयुष्यातला सर्वोच्च आनंद उपभोगला. मुली बापासारख्या नाकेल्या नि सुरेख निपजल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  ‘मुलगा हवा’ असे ना सासू-सासऱ्यांनी म्हटले ना पतीने. मला पंचविशीत करियर करायची होती, शिकायचे होते, लिहायचे होते. निशूच्या (निशिगंधा वाड) जन्मासोबत माझी पहिली कादंबरी ‘मेनका प्रकाशन’ने प्रकाशित केली होती. ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’ नि रविवार पुरवण्या यांत माझे लेख जसे येऊ लागले तसे ‘विजया वाड’ या नावाला लोक ओळखू लागले.

अनेक वर्तमानपत्रांच्या संपादकांनी मला सातत्याने लिहायला दिले. लेखन प्रसिद्ध केले. एका वर्तमानपत्रात तर सलग साडेपाच वर्षे मी लिहीत होते. ‘आकाशवाणी’वर मी तेरा तेरा भागांच्या पंधरा बालमालिका लिहिल्या, तर ‘दूरदर्शन’वर आबा देशपांडे यांच्याकडे शालेय चित्रवाणी सतत अकरा वर्षे नि ‘ज्ञानदीप’चे कार्यक्रम खूप केले. एक दिवस अशोक (‘डिंपल प्रकाशन’चा) माझ्याकडे दिलीप वामन काळे यांना घेऊन आला नि सुरू झाला दर चार-पाच महिन्यांनी एका पुस्तकाचा सिलसिला. दिलीपने माझी ३१ पुस्तके दहा-बारा वर्षांत काढली. १२४ पुस्तकांची आई आहे. अजूनही लिहितेच आहे..

क्रमशः…

लेखिका – डॉ. विजया वाड 

संग्राहिका –  सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆`

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-2 ☆ श्री राजीव ग पुजारी 

(तसेच अंतरिक्षयान परत आल्यावर अंतराळवीरांना सुखरूपपणे यानातून बाहेर काढले जाते.) इथून पुढे —–

४) गेट वे :- हे चंद्राभोवती भूस्थिर कक्षेत फिरणारे एक अंतराळ स्थानक असून येणाऱ्या भविष्यात त्याची उभारणी केली जाईल. भविष्यातील आर्टिमिस मोहिमांतील अंतराळवीर ओरियन यानातून या स्थानकावर येतील. येथून ते आवश्यक सामान घेऊन ह्युमन लॅंडींग सिस्टिममध्ये(HLS) जातील. त्यांना घेऊन HLS चंद्रावर उतरेल. अंतराळवीर चंद्रावर त्यांना सोपवलेली कामगिरी बाजावून HLS मध्ये बसून गेट वे वर येतील. तेथून ओरियन यानाद्वारे ते पृथ्वीवर परततील. यात फायदा हा आहे की एकाच चंद्रमोहिमेमध्ये अंतराळवीर एकापेक्षा जास्त वेळा चंद्रावर उतरून काम करू शकतात अथवा चंद्राभोवतीच्या कक्षेत विविध प्रयोग करू शकतात. हा गेट वे एका दशकाहून जास्त काळ कार्यरत असेल. 

५) ह्युमन लॅंडींग सिस्टम (HLS):- ही चंद्रमोहिमेमधील अंतिम वाहतूक प्रणाली आहे. याद्वारे चंद्राच्या कक्षेतून अंतराळवीरांना चंद्रावर उतरविले जाईल व काम संपल्यावर पुनः त्यांना चंद्रकक्षेत नेले जाईल. 

६) आर्टिमिस बेस कॅम्प :- अंतराळवीरांना चंद्रावर राहणे व काम करणे यासाठी याची निर्मिती केली जाईल. यामध्ये आधुनिक चांद्रकार्यकक्ष(Cabin), एक बग्गी(Rover) व एक फिरते घर (Mobile home) असणार आहे.

आता आपण आर्टिमिस योजनेच्या पहिल्या तीन मोहिमांविषयी माहिती घेऊ :

आर्टिमिस १ :-आर्टिमिस १ द्वारा मानवरहित ओरियन यानाला चंद्राच्या ४०,००० मैल पलीकडे किंवा पृथ्वीपासून २,८०,००० मैलाच्या कक्षेत पाठविण्यात येईल. ही मोहीम म्हणजे SLS, ओरियन व एक्सप्लोरेशन ग्राऊंड सिस्टिम (EGS) यांचे समानव मोहिमेआगोदरचे एकत्रित परीक्षण आहे. 

SLS प्रक्षेपकाची चार RS-25 इंजिन्स, दोन अनुवर्धि प्रक्षेपक व अंतरिम क्रायोजिनिक प्रणोदन टप्पा या सर्वांचे वेगवेगळे व संयुक्त परीक्षण झालेले आहे, पण त्याचे अंतराळातील हे पहिलेच उड्डाण आहे. त्यामुळे या मोहिमेद्वारा त्याच्या कामगिरीचे परीक्षण केले जाईल. 

ओरियन यानाचे साडेचार तासांचे प्रत्यक्ष उड्डाण परीक्षण ५ डिसेंबर २०१४ ला झाले आहे. याद्वारे या यानाने ते पृथ्वीच्या सुदूर कक्षेत अंतराळ उड्डाणयोग्य आहे हे सिद्ध केले आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतांना त्याच्या उष्णताप्रतिबंधक कवचाचे थोड्या प्रमाणात का होईना परीक्षण झाले आहे. यान समुद्रात उतरल्यावर त्याच्या कोषाला (capsule) यशस्वीरीत्या बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिकही झाले आहे. ओरियन यानाच्या या प्रत्यक्ष उड्डाण परीक्षणाला एक्सप्लोरेशन फ्लाइट टेस्ट-१ असे संबोधण्यात आले आहे. हे परीक्षण मानवरहित होते.

नासाने ओरियनच्या पॅरेशूट्सचे परीक्षण सप्टेंबर २०१८ ला यशस्वीरीत्या पर पाडले. या प्रणालीत ११ पॅरेशूट्स असणार आहेत. यान समुद्रसपाटीपासून ५ मैल आल्यावर ती उघडली जातील.

२०१९ ला नासाने असेंट अबॉर्ट -२ परीक्षण पार पाडले, त्याद्वारे उड्डाणाच्यावेळी ओरियन यानाच्या टोकावर असणारी  संकटकालीन यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे याची खात्री करण्यात आली. उड्डाणाच्या वेळी  काही अनपेक्षित घडलेच, तर ही यंत्रणा ओरियन यानाला आतील अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून बाजूला काढेल व अटलांटिक समुद्रात त्याला उतरविण्यात येईल. 

ओरियन यानाचा दल विभाग (crew module) हा युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने बनविलेल्या सेवा विभागाशी (service module) पूर्णपणे जोडला आहे. हा सेवा विभाग दल विभागाला लागणारे जास्तीत जास्त प्रणोदन (propulsion), ऊर्जा आणि शीतकरण (cooling) पुरविणार आहे. मोहिमेदरम्यान अंतराळवीर दल विभागात राहतील व काम करतील. जगातील सर्वांत मोठ्या निर्वात खोलीत व टोकाचे विद्युतचुंबकीय क्षेत्र व तपमान (-२५० ते २०० डिग्री फॅरनहिट) असणाऱ्या परिस्थितीत यानाचे परीक्षण करण्यात आले आहे. अशी परिस्थिति अंतराळात असते म्हणून हे परीक्षण करण्यात आले. 

नासाच्या भू प्रणाली विभागाने (ground system team) पायाभूत सुविधांमध्ये (infrastructure) व भू समर्थन उपकरणांमध्ये (ground support equipments) योग्य ते बदल केले, जेणेकरून आर्टिमिस मोहिमेचे उड्डाण व ओरियन यानाचे अवतरण यांना मदत होईल. वाहन जुळणी इमारतीत (vehicle assembly building) तसेच नवीन पुनर्निर्मित 39-B प्रक्षेपण तळावर फिरत्या लॉंचरचे परीक्षण करण्यात आले व सुविधा प्रणाली (facility system) व भू प्रणाली (ground system) यांचेशी तो उड्डाणाच्यावेळी संवाद साधू शकेल याची खात्री करण्यात आली. 

एक्सप्लोरेशन ग्राऊंड सिस्टिम दल (EGS team) हा विभाग उड्डाणाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जबाबदार असतो. या दलाच्या सदस्यांनी फायरिंग रूम -१ मध्ये उड्डाणाचे प्रारूप निर्माण करुन अभ्यास केला आणि शिक्कामोर्तब केले की, हे दल उड्डाणसज्ज आहे आणि प्रत्यक्षात उड्डाणाच्यावेळी येणाऱ्या कोणत्याही अडचणींना तोंड देण्यास समर्थ आहे. या दलाने SLS च्या २१२ फूट उंचीच्या मुख्य टप्प्याच्या प्रतिकृतीचे (याचे नाव पाथ फाईंडर ठेवले आहे ) कंटेनर मधून उतरविणे, हाताळणे आणि जुळणी करणे यांचाही अभ्यास केला होता.

क्रमशः …

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

? विविधा ?

☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

सद्गुरू कशासाठी हवा ?

महाभारतातलीच एक कथा आहे.

द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे, युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते.

पणही विलक्षणच होता!

उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला. ते चक्र फिरत असतांना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा.

उ:! एवढंच?

नाही! ते तर कुणीही करेल! इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते!

अन् स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं! सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले!

पऱंतु खरी मेख पुढेच होती!!

नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हता. खाली भलंमोठं तसराळं पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असतांना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता अन् माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता!

इथेच सर्वांचा हिरमोड झाला होता. नीट नेम धरणारे भले भले पाण्याच्या तरंगांमुळे चक्क पराभूत झाले होते. एकेक धुरंधर हताश होऊन परतलेत.

लक्ष्यभेद करायला अर्जुन पुढे सरसावला. एक क्षण त्याने कृष्णाकडे बघितलं.

कृष्णानी खूण करून त्याला निकट बोलावलं.

सूचना केली,

“हे बघ, मन शांत ठेव.

नीट वीरासन घाल. धनुष्यावर बाण चढव, प्रत्यंचा ओढल्यावर हात स्थिर ठेव. पापणी सुध्दा लवू देऊ नकोस! नेमक्या क्षणी तीर सोड – बाकी मी पाहून घेईन.”

अर्जुन हासला.

“काय झालं? कां हसलास?”

“कृष्णा, वीरासन मी घालणार, नेम मी धरणार, तीर पण मीच सोडणार. तुला करायला बाकी उरलं काय रे?”

आता स्वत: कृष्ण हसलेत.

“पार्थ, हे सर्व तुलाच करायचंय. मी फक्त तेवढंच करणारे जे तुला नाही जमणार.”

“हु:! अन् ते काय असणारे?”

“सांगू? जमेल तुला?”

“सांग बघु…”

“त्या तसराळ्यातलं पाणी स्थीर ठेवण्याचं काम माझं”

एक क्षण विचार केल्याबरोब्बर अर्जुन शहारला! सावध झाला!

दुस-याच क्षणी डोळे मिटले. मनोमन कृष्णाला वंदन करून पण जिंकायला आत्मविश्वासाने पुढे सरसावला. पुढे काय झालं सर्वांनाच माहितीये!

हरिकृपेचा महिमाच असा असतो! त्याची सोबत होती म्हणुन पाचांच्या केसालाही धक्का लागला नाही. अन् त्याचीच सोबत नव्हती, तर शंभरातला एकही वाचला नाही…………

संकलन – मनोज लिंग्रस

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाळ वांगं – लेखिका – सुश्री कस्तुरी ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? मनमंजुषेतून ?

☆ डाळ वांगं – लेखिका – सुश्री कस्तुरी ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

“उद्या डाळ वांगं खाणार का? “–हा प्रश्न किमान ५ व्यांदा आईने विचारला. मी नेहमीप्रमाणे चिडून बोलण्यापेक्षा फक्त हो म्हणणं पसंत केलं.

परवा भेंडी खाणार का हा प्रश्न सकाळी ३ एक वेळा तरी तिने विचारला त्यावर मी वसकन बोलल्यावर अर्थात वातावरण तापलं.

‘नाही रहात आमच्या लक्षात, त्यात काय एवढं ? म्हणायचं तू– खायची आहे म्हणून ‘ इतकं साधं तिचं argument होतं.

त्याच्यावरून धडा घेऊन आज प्रत्येक वेळी मी ‘ हो हो हो ‘असंच उत्तर दिलं. मग माझ्या लक्षात आलं तिला माझ्याकडून फक्त response हवा आहे. तिची बोलण्याची भूक आहे. तिला संवाद कायम सुरू रहावा असं वाटतं  पण दुर्दैवाने ते होत नाही. असं नाही की संवाद नसतो. पण बऱ्याचदा एक तर मी बाहेर असते आणि घरात आल्यावर मोबाईलमध्ये अथवा माझ्या विचारात किंवा लिखाण, डान्स, or साधना. ती तुटके दुवे सांधण्याचा प्रयत्न चालू ठेवते.

भेंडी खाणार का, डाळ करू का? भात खाणार का?भाकरी टाकू का? आज काय करणार आहे? आज कोर्टात काय आहे? डान्स क्लासला जाणार का? हे आणि असे तेच तेच  प्रश्न १०० वेळा जरी आले तरी त्याला न चुकता हो म्हणायला शिकलं पाहिजे हे मला कळून चुकलंय.

संपूर्ण आयुष्य बोलण्यात गेलेल्या मागच्या पिढीला मोबाईलमध्ये रुतून बसलेली नव्या पिढीची शांतता नाही सोसवत. ते त्रागा करत राहतात. त्यांना चीड येते. त्यांना संवाद हवा असतो.  तो unfortunately तुमच्या माझ्याकडून जास्त घडत नाही. मुद्दामून आपण करत नाही तरीही दरी पडतेच. यावर विचार झाला पाहिजे.

तुमच्या आईने, वडिलांनी एकच प्रश्न १० वेळा विचारला तरी प्लीज त्यांच्यावर वसकन बोलू नका. नाहीतर नंतर या आठवणींची  आठवण कायम आपल्याला रक्तबंबाळ करत राहील. आणि तिथे अश्रू पुसायला कोणीही येणार नाही !

ले.  कस्तुरी 

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares