मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 2 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 2 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

(“पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली… ) इथून पुढे —–   

सैनिक पुढे म्हणाला, ” मी म्हणालो, ” त्यांचा गोळीबार चालूच राहील… वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही… मी हे उरलेले तीस फुट अंतर जिवावर उदार होऊन जातो, म्हणजेच मी शत्रूला सामोरे जात त्याच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांच्या खंदक (बंकर) कडे पळत जातो आणि हातबाॅम्ब (ग्रेनेड) टाकून तो उध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या.” 

मी हातात हातबाॅम्ब (ग्रेनेड) घेऊन शत्रूच्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होताच तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहिले व म्हणाला ‘ तू वेडा आहेस का..? तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत…. आणि मी अद्याप अविवाहित आहे. मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण (कव्हरिंग) दे,’– आणि उत्तराची वाट न पाहता, जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकरच्या दिशेने पळत सुटला.”

“ पाकिस्तानी हेवी मशीनगन (H.M.G.) च्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले. हेवी मशीनगनमधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.”

“ सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. सर. मी त्यांचे डोके हातात धरले, त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला. “ 

“ मी आपल्या वरिष्ठांना, तुमच्या गावी त्याचे पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी मला देण्याची विनंती केली.  परंतु सर., मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कामगिरीवर मला पाठविण्यात आले.”

“कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतिम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहिली असती. ते मी करू शकलो नाही. पण मला ही फूलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली सर. ” आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला.

शिक्षकाची पत्नी साडीचा पदर तोंडावर लावून मूक अश्रू ढाळीत होती. शिक्षक रडले नाहीत. त्यांनी त्या सैनिकाकडे गांभीर्याने पाहिले आणि सैनिकानेही अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले.

शिक्षकाने नक्की काय विचार केला हे माहित नाही. आपल्या खांद्यावरील पिशवीतून त्याने एक पुडके बाहेर काढले आणि त्या सैनिकाला दिले व ते म्हणाले, “ माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी सदरा विकत घेतला होता. पण तो आला नाही. आणि आली… त्याच्या वीरमृत्यूची बातमी…”

“आता तो सदरा कोण घालेल ? … जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला तेथे ठेवण्यासाठी मी तो सदरा घेऊन आलो होतो. कदाचित माझ्या मुलाचा आत्मा याठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा घालेल अशी माझी श्रद्धा होती. परंतू आता मला माहित आहे की हा सदरा कुणी घालायचा आहे ते. नकार न देता कृपया हा घ्या.”

त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा असलेले पुडके स्विकारले.

त्या कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते “ जय हिंद ।” 

आत्ता हे जाणण्याची वेळ आली आहे …..

कारगिल हिरोचे नाव: कॅप्टन विक्रम बत्रा.

हिरोच्या वडिलांचे नाव: गिरधारी लाल बत्रा.

हिरोच्या आईचे नाव: कमल कांता.

माझ्या प्रिय मित्रांनो, हे लोक आमचे वास्तविक नायक आहेत.

या बलिदानाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवू या.

Celebrate the Real Activists and not Just Celebrities.

हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा, आम्हाला तुमचा अभिमान आहे. 

जयहिंद. 

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ते, ती आणि मी कुकरी क्लासेस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 ते, ती आणि मी कुकरी क्लासेस !😅💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“पंत, पंत, पंत हे आता तुम्हीं नवीन कुकरी क्लासच काय काढलंय मधेच ?”

“अरे मोऱ्या थांब थांब, असं ओरडायला काय झालं तुला एकदम आणि आमचा पेपर आणलास का ते सांग आधी ?”

“आणलाय, हा घ्या आणि बोला !”

“काय बोलू मोऱ्या ? मस्त पावसाला सुरवात झाल्ये ! वाटलं नव्हतं की हा परत इतक्या लवकर येईल !”

“पंत, मी तुम्हांला तुम्हीं चाळीत चालू करणार असलेल्या कुकरी क्लास बद्दल विचारतोय आणि तुम्ही पावसाचं काय सांगता आहात मला !”

“अरे मोऱ्या मला वाटलं असा मस्त पाऊस पडतोय तर तुला काकूच्या हातचा आलं घातलेला चहा हवा असेल आधी, म्हणून म्हटलं !”

“पंत चहाच नंतर बघू ! आधी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या !”

“कुठला प्रश्न मोऱ्या ?”

“तुम्ही चाळीत कुकरी क्लास चालू करणार आहात आणि त्याला लेले काका, जोशी काकांच ऑब्जेकशन आहे आणि चाळीचा सेक्रेटरी या नात्याने त्या दोघांनी माझ्याकडे तशी लेखी तक्रार पण केली आहे !”

“मोऱ्या, त्या घाऱ्या जोशाला आणि त्या बिनडोक लेल्याला काडीची नाही  अक्कल, तेव्हा तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देवू नकोस !”

“असं कसं पंत, चाळीचा सेक्रेटरी या नात्याने मला त्यांच्या तक्रारीची दखल घेणं भाग आहे !”

“बरं बरं, काय तक्रार आहे त्यांची?”

“तुम्ही हा कुकरी क्लास चाळीत सुरु करू नये असं त्यांच म्हणणं आहे आणि त्या लेखी तक्रारीवर पाठिंबा म्हणून 23 चाळकऱ्यानी सह्या पण केल्या आहेत !”

“अरे पण का ?”

“पंत, कारण मागे तुम्हीं चाळीत योगासनाचे फुकट वर्ग चालू केलेत, त्यात जोशी काकूंचा पाय फ्र्याक्चर झाला होता, आठवतंय ना ?”

“नं आठवायला काय झालंय मोऱ्या ? अरे ही गेल्या महिन्यातच घडलेली गोष्ट ! अरे मी त्या बयेला सांगितल, की हे विचित्रासन तू करू नकोस, तुझं वजन जास्त आहे ! तरी ऐकायला म्हणून तयार नाही ती बया आणि घेतलान पाय फ्र्याक्चर करून, त्याला मी काय करणार ?”

“आणि लेले काकूंच्या हाताचं काय ?”

“अरे मोऱ्या मी त्या महामयेला म्हटलं, हे मयुरासन तुला जमेल असं वाटत नाही तर तू ते करू नकोस, त्या ऐवजी मी तुला दुसरं आसन सांगतो !”

“मग ?”

“मग काय मग मोऱ्या ? अरे लेल्याची बायको शोभयला नको ती महामाया, तो एक हट्टी तर ही दहा हट्टी !”

“म्हणजे ?”

“अरे हट्टास पेटून केलेन तीन मयुरासन आणि घेतलान हात मोडून, त्याला मी कसा जबाबदार सांग बरं मला ?”

“बरोबर आहे तुमच पंत, पण तुम्ही हा कुकरी क्लास चालू करू नये असं त्यानी तक्रारीत म्हटलंय, म्हणून मी तुमच्याकडे आलो !”

“अरे पण मोऱ्या, हा कुकरी क्लास सुद्धा मी योगाच्या क्लास सारखा फुकट चालू करतोय, तर त्याला त्यांच का ऑब्जेक्शन हे सांगशील का मला जरा ?”

“सांगतो ना पंत, हा कुकरी क्लास चाळीत सुरु करून तुम्ही चाळीत हिंसेचा प्रचार आणि प्रसार करणार आहात, असं त्यांच म्हणणं आहे !”

“हिंसा ?”

“हॊ, आता तुम्ही कुकरीचे क्लास घेतांना, ती कशी चालवायची, कसे वार करायचे, कशी फेकून मारायची हेच शिकवणार नां? मग एक प्रकारे हा हिंसेचा प्रचार आणि प्रसारच नाही का ?”

“बघितलंस, बघितलंस काय अकलेचे दिवे पाजळतायत तुझे लेले काका आणि जोशी काका !”

“म्हणजे ? मी नाही समजलो पंत !”

“मोऱ्या, अरे त्या दोन बैलांना वाटलं मी कुकरी क्लास घेतोय म्हणजे नेपाळी गुरखा लोकं जी कुकरी वापरतात, ती कशी चालवायची हे मी त्या क्लास मध्ये शिकवणार म्हणून !”

“हॊ, मला पण तसंच वाटलं, म्हणून मी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नां पंत !”

“मोऱ्या गाढवा, अरे तू तर चांगला शिकला सवरलेला आजचा तरुण आणि तुला कुकरीचा तोच एक अर्थ माहित आहे ? दुसरा अर्थ माहित नाही ?”

“आहे ना पंत, जेवण बनवणे !”

“अरे बैला, मग त्या दोन नंदी बैलांना सांगितलं का नाहीस तसं ?”

“सॉरी पंत, पण तेंव्हा लक्षात आलं नाही माझ्या.  पण मग तुम्ही तुमच्या क्लासच नांव ‘ते, ति आणि मी कुकरी क्लासेस’ असं विचित्र का ठेवलंय ?”

“मोऱ्या, जेवण करतांना अत्यावश्यक असलेल्या तीन पदार्थांच्या नावांचे शॉर्टकट आहेत ते !”

“म्हणजे काय पंत ?”

“अरे बल्लवा, तू…”

“पंत मी मोरू, हा बल्लव कोण आणलात तुम्ही मधेच ?”

“मोऱ्या, अरे मला तुला बैला म्हणायचं होतं पण चुकून बल्लवा असं तोंडातून बाहेर पडलं !”

“ठीक आहे पंत, पण ते तुम्ही तुमच्या कुकरी क्लासच्या नावाच्या शॉर्टकटच काहीतरी सांगत होतात !”

“हां, म्हणजे असं बघ, कुठलही जेवण करतांना आपल्याला तेल, तिखट आणि मीठ यांची गरज लागतेच लागते, हॊ की नाही ?”

“बरोबर पंत !”

“मोऱ्या, म्हणूनच आजच्या तुमच्या जमान्यात शोभेल असं ट्रेंडी नांव मी माझ्या कुकरी क्लासला दिलं आहे !”

“धन्य आहे तुमची पंत !”

© प्रमोद वामन वर्तक

०८-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे 

सर्वसाधारणपणे घराच्या बाहेरच्या भिंतींवरून इमारतीचे आकारमान,  घरमालकाची आर्थिक सुस्थिती आणि बांधकामाचे कौशल्य व्यक्त होते. खरी ओळख असते ती, घरातल्या आतल्या भिंतींची,.

पूर्वी भिंतीवर पूर्वजांचे फोटो, अर्थात ब्लॅक अॅड व्हाईट.  देवांचे फोटो,  राजा रविवर्म्याची चित्रे ओळीने लावलेली असत. आता एखादी कलाकृती,  नैसर्गिक देखावा यांच्या फ्रेम्स असतात. हल्ली चायनीज शुभचिन्हे लावायची फॅशन आहे. भिंतीवर ची अशी प्रतिके घरातल्यांची मनोवृत्ती व्यक्त करतात.

हल्ली खूपशा घरात वास्तुशास्त्रानुसार फ्रेम्स आणि पिरॅमिड्स असतात. जास्त करून बहुमजली सदनिकांमध्ये अशा प्रकाराच्या वस्तू असतात. सहाजिकच आहे, कष्टांनं मिळवलेल्या वास्तूमध्ये सुख, शांती, समाधान,  प्रगती असावी असे वाटणे नैसर्गिक आहे आणि तसे उपाय करणे, आवश्यक आहे.

मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते.  तिच्या घरात एकदम सुने सुने वाटत होते. एकाही भिंती वर एकही चित्र, फोटो, फ्रेम्स काहीच नाही.  भिंती अगदी ओक्याबोक्या दिसत होत्या. मला तिची मनःस्थिती माहीत होती. 5-7 वर्षापूर्वी तिचे यजमान गेले. मुले लहान होती. बिचारी कशीबशी संसार पुढे रेटत होती. त्या भिंतींच्या मुकेपणाने तिचं मुकेपण व्यक्त होत होतं.

काही वर्षांपूर्वी भिंतीवर कॅलेंडर असायचेच. एकच नव्हे तर अनेक दिनदर्शिका लावल्या जायच्या. पण आता कॅलेंडर मोबाईल वर उपलब्ध आहे.  त्यामुळे कॅलेंडर भिंतीवरून हातात आले आहे.

ठराविक भिंती ला ठराविक रंग देणे याचाही नियम आहे. अंतर्गत सजावट करणारे व रंगारी लोकां ना ते बरोबर माहीत असतं. भिंतींच्या रंगाचा तिथे रहाणा-या लोकांवर व त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो.

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Mother’s day – एक शोकांतिका… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ Mother’s day – एक शोकांतिका… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

खरं तर एक स्त्री रोग तज्ञ म्हणून हे प्रसंग मला नवीन नाहीत.  पण हे सगळे मागच्या तीन ते चार दिवसात एकत्रित घडलेत . Mother’s day च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आईप्रती भावनांचा जो काही धुमाकूळ घातला जातोय, आजचा लेख त्यावर शोकांतिका म्हणून नक्की वाचा ! एकच वाटतं, अजूनही २०२२ साली, नको तो जन्म बाईचा….

प्रसंग १

१९ वर्षाची पहिलटकरीण,  बाळाचे ठोके कमी होताहेत  म्हणून सिझरला शिफ्ट करत असताना, नवरा हात जोडून, ” मॅडम, बाळ वाचेल ना? लवकर करा सीझर ….” तोच नवरा मुलगी झाली हे कळल्यावर तोंडावर सांगून गेला, ” आधीच्या दोन बायकांना मुलीच झाल्या म्हणून तिसरं लग्न केलं होतं, हिलाही मुलगीच झाली. माझा आणि हिचा काही संबंध नाही….” 

तिसरं लग्न त्याचं, हिचं पहिलं? कोणी लावलं? इतकी लग्न officially कसं  करू शकतं कोणी? आता ही काय करणार? सगळे प्रश्न अनुत्तरित ठेवून तो माझ्या डोळ्यासमोर निघून गेला.

प्रसंग २

प्रचंड सुजलेली , BP वाढलेली, दिवस पूर्ण भरलेली बाई आणि नवरा लेबर रुमला आले. येताच पहिलं वाक्य, पैसे नाहीत, करायला कुणी नाही. हॉस्पिटल मॅनेजमेंटला फोन करून बिलात सवलत मिळवून घेतली. डिलिव्हरी झाल्यावर गुंतागुंतीमुळे पेशंटला ICU त ठेवले. पैशाची सोय करून येतो म्हणून तिला लेबर रूममध्ये सोडून गेलेला नवरा अजूनही परत आलेला नाही. तिला घरच्यांचा नंबरही पाठ नाही. हॉस्पिटलने, डॉक्टरांनी कशी आणि किती जबाबदारी घ्यायची ? आहे उत्तर ? 

प्रसंग ३

२७ वर्षीय बाई, परवा रात्रीपासून ब्लिडिंग होतंय म्हणून अर्धवट बेशुद्ध अवस्थेत दाखल. नाडी १३०, bp ८०/५०, पांढरीफटक पडली होती. हिमोग्लोबिन रिपोर्ट आला ३ ग्रॅम. योग्य ते उपचार, रक्त देऊन तिला सेटल केल्यावर रागावले, ” इतकं कशाला अंगावर काढायचं? यायचं ना लगेच… जीवावर बेतलं असतं .” तिचं त्यावर उत्तर, ” ताई, नवऱ्याला दोन दिवस सांगते आहे, दारूला पैसे असतात पण मला दवाखान्यात न्यायला नाही. चक्कर येऊन पडले म्हणून उचलून आणली “

–  काय बोलणार, आहे उत्तर ?

प्रसंग ४

गर्भनलिकेत राहिलेला गर्भ फुटून ( ectopic pregnancy ) पोटात रक्तस्त्राव झाला होता. Emergency ऑपेरेशन करून त्या बाजूची गर्भनलिका काढून टाकली आणि बाईचा जीव वाचला. नवऱ्याची प्रतिक्रिया, ” दुसऱ्या नळीवर प्रेग्नन्सी राहीलच असं लिहून द्या, तरच बिल भरतो. नाहीतर एवढ्या बिलात तर दुसरं लग्न होईल माझं….” 

— चूक डॉक्टरची, तिची की नवऱ्याच्या प्रवृत्तीची ? 

काल २४ तासांची ड्युटी करून हा लेख लिहिण्याचा अट्टहास मी एवढ्यासाठी केला की उद्या mother’s day म्हणून खूप कौतुक करतांना ह्या असहाय्य आयांची तुम्हाला आठवण यावी. अरे, नका देऊ आईला लाखोंचे गिफ्ट्स, द्या एका स्त्रीला सन्मान, काळजी घ्या तिच्या आरोग्याची. बदला दृष्टिकोन तिला creation आणि recreation चे साधन म्हणून बघण्याचा !

एक कळकळीची विनंती, आजूबाजूला अशी महिला दिसली तर जरूर मदत (उपकार नाही) करा. Mothers day ला घ्या ना विकत १०० लोहाच्या गोळ्या आणि वाटा तुमच्या घरातल्या कामवाल्या बायांना, सिक्युरिटीच्या बायकांना किंवा साईटवर काम करणाऱ्या महिलांना. घेऊन जा एखाद्या प्रेग्नन्ट गरीब महिलेला दवाखान्यात किंवा द्या तिला सकस आहाराचं पॅकेट !

— प्रत्येक स्त्री मध्ये आई बघा, आई बघा….

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर (स्त्री रोग तज्ञ)

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 1 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 1 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

( ही घटना साधारण २२ वर्षांपूर्वीची आहे याची कृपया नोंद घ्यावी. ) 

जवळपास एक वर्ष उलटले आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आले. पत्र लिहिणाऱ्याने स्वत:चा परिचय शाळेतील एक शिक्षक म्हणून करून दिला होता …..

पत्रात ते लिहितात, की त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीरमरण आले होते, आणि त्याचा पहिला स्मृतिदिन काही दिवसातच, म्हणजेच ०७/०७/२००० रोजी येत आहे, आणि जर शक्य असेल तर त्याच्या या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, त्याला जेथे विरमरण आले ती जागा त्यांना व  त्याच्या पत्नीला बघायची इच्छा आहे. जर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे शक्य होणार नसेल तर ते आपली विनंती मागे घेण्यास तयार आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला होता. 

हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्याने विचार केला की मंत्रालयाकडून तर अशा भेटीच्या खर्चाची परवानगी मिळणार नाही, परंतू या वीरमाता- वीरपित्याच्या भावना व त्याग बघता त्यांच्या या प्रवासाचा व भेटीचा खर्च या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारातून करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आदेश जारी केला.

या शूरवीराच्या हुतात्मादिनाच्या दिवशी या वयोवृद्ध वीरमाता- वीरपित्याला त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला जेथे वीरमरण आले त्या जागेवर सन्मानाने आणण्यात आले. तेथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या सन्मानार्थ कडक सलामी दिली.

तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खूप फुलं होती. त्याने शिक्षकांच्या पायांवर डोके ठेवले आणि फुलं वाहिली. त्याने आपले डोळे पुसले आणि नंतर तो इतरांसारखाच सावधान उभा राहून त्यानेही कडक सॅल्यूट ठोकला.

शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले… “ तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात… तुम्ही माझ्या पायांना का स्पर्श केला व पाद्यपूजा का केली ..? तुम्हीही इतरांप्रमाणे सलामी देऊ शकला असतात आणि मी त्या सॅल्युटला प्रतिसाद दिला असता..! ”

“नाही सर. येथे मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, म्हणजे येथे प्रत्येकजण ड्यूटीवर सज्ज आहे आणि मागील एक वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात येथे नियुक्त झालेले आहेत.”

 “मी तुमच्या शूरवीर मुलाबरोबर त्याच रेजिमेंटमध्ये होतो , त्याच डोंगराळ भागातील कड्यावर पाकिस्तानी शत्रूसमवेत लढा दिला होता, आणि स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरतापूर्ण पराक्रम बघितला होता. आणि फक्त हेच नाही….. ” तो काही क्षण बोलायचं थांबला …..

शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले, “ मला सांगा… जे काही मनात असेल ते  कुठलाही किंतु न बाळगता मला सांगा… मी रडणार नाही…..”

“ मला माहित आहे तुम्ही रडणार नाही सर… पण मीही रडायला नको ना ….” तो सैनिक पुढे म्हणाला….

“ त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीनगनने मिनिटाला शेकडो गोळ्या झाडत होते. आम्ही पाच जण सावधपणे साधारण तीस फुटांच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि त्या मोठ्या दगडाच्या आडोशाला कानोसा घेत कसेबसे उभे राहिलो. पाकिस्तानी सैनिकांची आमच्यावर नजर होती. त्यांना बहुधा आमच्या हाता- पायांचा किंवा पाठीवरील सामानाचा थोडाफार भाग दिसत असेल व ते आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यास तत्पर होते. अजून ब्रिगेडच्या इतर सैनिकांची कुमक येण्यास विलंब होत होता. काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते.. !! मग …. ” त्या सैनिकाने एक सुस्कारा सोडला.

” पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली…    

क्रमशः…

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे 

औद्योगिकीकरण, शहरीकरण,  पाश्च्यात्यांचे अनुकरण यांच्या प्रभावाने पुढे पुढे जाणारा काळ नवी नवी स्थित्यंतरं घडवू लागला. सामाजिक आणि कौटुंबिक जीवन झपाट्याने बदलले. नवीन बदलांना आत्मसात करताना काही आधीच्या गोष्टी,  वस्तू,  चालीरीतींची जागा नवीन बदलांनी घेतली.

वाडांच्या जागी चाळी आल्या. घरे आली, अपार्टमेंट्स आली. बंगले बांधले गेले. बहुमजली इमारती आल्या. या बदलात एक घटना प्रकर्षाने जाणवली.  ती म्हणजे घरांची संख्या वाढली.  भिंती वाढल्या. तशाच नात्यातही भिंती आल्या. हे कालानुरूप घडणारच होतं.

त्याचबरोबर एक चांगली गोष्ट ही घडली,  ती म्हणजे प्रत्येक भिंती प्रमाणे त्या घरात रहाणा-या प्रत्येक व्यक्तीला स्वतःची ओळख मिळाली. भिंत म्हणजे व्यक्तिचं प्रातिनिधिक रूप असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.  प्रत्येक भिंतीला, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं व्यक्तिमत्व प्राप्त झाले. शतक ओलांडताना झालेला हा बदल अपरिहार्य होता.

कुठलाही बदल होताना सुरवातीला विरोध होणे, धुसफूस, भांडणे,  नाराजी,  असहकार व्यक्त होणे असतेच. इथेच मनावर झालेले संस्कार आपला प्रभाव दाखवतात. घडणारे बदल स्वीकारताना,  त्यानुसार स्वतःत बदल करताना मानसिक क्षमता गरजेची असते. ती नसेल, तर अशा व्यक्तीच्या मनात नेहमीच असुरक्षितता असते.

पूर्वी चे एकत्र कुटुंब अलग होऊन प्रत्येकाचे घर वेगळे,  संसार वेगळा,  राहणीमान वेगळे झाले. एकत्र असण्याचे संस्कार असलेलीच मने अशा प्रसंगी न दुरावता, प्रत्येकाच्या अस्तित्वाची प्रतिष्ठा जपत,  आपुलकीने घट्ट बांधलेली असतात. पण दुस-याच्या मनाचा विचार करण्याचा मोठेपणाही घरातल्या वडीलधा-या व्यक्तींच्या जवळ असला तरच हे शक्य होते.

अशा मनांचे,  व्यक्तित्वांचे प्रातिनिधिक रूप म्हणजेच या भिंती,  काही बोलक्या,  काही मुक्या !

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग – 5 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग – 5 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

निखळ, मोकळा आणि अर्थपूर्ण संवाद ही आनंदाची पर्वणीच म्हणायला हवी!

मी एकटी जेव्हा विचार करते तेव्हा एका टप्प्यावर येऊन मला थांबल्यासारखे वाटते. पुढचे दिसत नाही. जेव्हा मी मला काय वाटतं आहे, समजलं आहे ह्या बद्दल मी इतरांशी बोलते तेव्हा माझ्या विचारांमध्ये अगदी वेगळी, अनपेक्षित अशी भर पडू शकते. किंवा माझ्या विचारांमधली तृटी दाखवणारा एखादा मुद्दादेखील हाती लागू शकतो. माझ्या विचारांना चालना मिळते. थांबलेले विचार प्रवाही होतात. अशा देवाणघेवाणीतून, मंथनातून जे आकलन आकार घेते त्याची अनुभूती चकित करणारी असते.

एकाच अनुभवासंदर्भात देखील त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचा प्रतिसाद वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक माणूस हा एकमेवाद्वितीय असतो. त्याचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, दृष्टीकोन वेगवेगळा असतो. हे वेगळे पण कुठून येते? 

माणूस ज्या सामाजिक – सांस्कृतिक परिवेशात वाढतो आणि त्या अनुभवांचा अर्थ तो त्या त्या वेळी कसा लावतो यावर हे वेगळेपण अवलंबून असते. या Cultural Capital बद्दल जेव्हा मी पहिल्यांदा वाचले होते तेव्हा मला बरेच काही उलगडले होते.

माणूस हा सामाजिक प्राणी आहे, तो एकटा जगू शकत नाही. इतरांच्या साथीनेच तो समृद्ध बनत जातो. एकमेकांना पूर्ण करणारे हे परस्परावलंबन सर्वांच्याच  आयुष्यात आनंद फुलवते.

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ती आणि लाॅकडाऊन… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ती आणि लाॅकडाऊन… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

कोरोना आला, आणि स्वयंपाकघर हे केवढं कला दालन आहे हे कळलं. 

 एवढ्याशा ओट्याच्या मंचावर किती मैफिली रंगतात. कढया,पातेल्या,झारे,पळ्या,शेगडी,तेल,डाळी,पीठं मुके नाहीत. ते बोलतात ,पण त्याची रूचिर भाषा आपण इतके वर्ष ऐकली नाही. कारण त्या रंगदेवतेकडे, स्त्रीकडे आपण दुर्लक्ष केलं. राजाचा मुकूट प्रधान घालत नाही आणि प्रधानाचा मुकूट राजा ! तसं हात, भांडी, ओटा पुसायचे फडकेही वेगळे असतात.  स्वच्छता हेच ध्येय पण भूमिका वेगवेगळ्या !  

पट्टीचा गायकीवर हुकूमत असलेला गायक जसा जरा असंबद्ध होत नाही. तसं कितीही मोठी तान घेऊनही, भांडी पुसायचं फडकं ती हात पुसायला वापरत नाही. साधी बाटल्यांची बुचंही अदलाबदल करायला घाबरतात तिच्या प्रेमापोटी ! उकळत्या दूधाचं भांडं पकडीत पकडून, दुसऱ्या हातानं साय अडवून, दूध कपाबाहेर न सांडता चहा नितळ ठेवण्याएवढी मोठी कला नाही. आपल्याला चहा पुन्हा गाळावा लागेल नि ओटा पुन्हा एकदा पुसावा लागेल. एकाच वेळी दुधाला उतू जाऊ न देणं नि लेकराला धडपडू न देणं,  ही विश्वाला थक्क करणारी सर्कस वा कसरत तीच करते. पाणी प्रमाणात झेपेल एवढा घोट घेतला तर तहान भागवतं नाहीतर ठसका लागतो. तसा गॅसही ! तो गरजेप्रमाणे कमी जास्त ठेवावा लागतो.  त्याच्या ज्वालेचं प्रमाण बटणावर नसतं. अन्नपूर्णेच्या प्रतिभेवर असतं.

प्रत्येक गोष्ट ती खाऊन पहात नाही. रंग,वास यावरून तिला अंदाज येतो. अंदाज हा माझा पुरुषी अहंकार. अंदाज नसतो, खात्रीच असते ती. आमचा असतो तो अंदाज आणि त्याना असते ती खात्री. अंदाज आणि खात्री यात दडलेली बाई आपण पहात नाही, तेवढा वेळ या कलामंदिरात रहात नाही.

 नेहमी लागणाऱ्या वस्तू मंचावर नि कधीतरी लागणाऱ्या उंचावर, हे तिचं शहाणं नि व्यवहार्य व्यवस्थापन असतं.

ती स्टूलही आणून ठेवते, नि हाक मारते, “अहो,एवढं काढून द्याल का?” आज्ञा आणि विनंतीतलं अंतर म्हणजे माया.  ते ती जपते, पण हातातला पेपर नि त्यातल्या उठाठेवीत ही मायेची ठेव विसरत आपण कुरकुरतो. ती कुरकूर तिच्या तरल संवेदनांना कळते.  आपल्याला फक्त पापडाची कुरकुर कळते.  स्वयंपाकघर ही खोली किती खोल आहे ते ज्याला कधीच कळत नाही, तो पुरुष.  

सर्वात लहान खोली स्वयंपाकाची, त्याहून लहान देवाची.  

एक विश्वाचा स्वयंपाक करते तर दुसरीचं विश्वच स्वयंपाक!

दिवाणखाना मात्र मोठा….परक्यांसाठी. आपल्यांसाठीचा विचार आपण घर बांधतानाही करत नाही. म्हणून नंतर तिला स्मरत नाही !

बेल दिवाणखान्यात वाजते, पण ती फोडणीच्या आवाजातही ऐकू जाते ती याच स्त्रीला. कारण ती पूर्ण घर आतून आपलं मानते.  सारखं करणं या शब्दात * सारखं म्हणजे सतत वा सारखं म्हणजे नीट करणं.*  पण तीच सगळं सतत नीट करत असते.  नुसतं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता जाता ती दरवाज्यावरचा टॉवेल सारखा करते, गादीवरचा पलंगपोस सारखा करते. 

पसरणं नि आवरणं, ही क्रियापदं नाहीत, कृती नाही. तर ती वृत्ती आहे –पहिली आपली, दुसरी तिची ! 

आपण पसरायचं, तिनं आवरायचं !

तिच्या दमण्याचा आवाज कधी ऐकणार आपण? लक्षात ठेवा, असं मुलांचं वेळापत्रक, होमवर्क, नवऱ्याचे कपडे, गोळ्या आणि गाड्यांच्या वेळाही लक्षात ठेवणारं स्वयंपाकघर घराबाहेर पडतं , तेव्हा खरं लॉकडाऊन होतं !

” बाहेर ऊन, तर घरात चूल ” , ही फक्त घामाची वेगवेगळी कारणं !  

ठेच लागली तरी डोक्यावरची घागर, आणि ” कमरेवरचं भविष्य ” जी खाली ठेऊ शकत नाही, तिच्याहून मोठी विवेकाची नि सहनशीलतेची कला कुणाला जमणार? 

—-ती थांबेल, तेव्हा पृथ्वीच नाही, त्रैलोक्य लॉकडाऊन होईल !

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे 

भिंतीला कान असतात.  हो, खरंय! आणि त्या दोन कानांमधला चेहराही असतो. त्यावर नाक, डोळे,  गाल, कपाळ,  ओठ  सर्व असतं. त्यामागे अव्यक्त मनही असतं.

लहानपणी आम्ही वर्षातून एकदा बाबांच्या आजोळी जायचो. मोठ्ठा वाडा होता. पडवीतून पाच सहा पाय-या चढून गेलो की सोपा होता, तिथे  एक मोठा कडीपाटाचा झोपाळा होता. भिंतीवर खुंट्या,  आणि कोनाडे होते. कलाकृतींच्या फ्रेम्स होत्या. बटणांचे बदक आणि कापसाचा ससा.  कुणाची कलाकुसर कोण जाणे! खूप जुनी वाटत होती.

त्याकाळी भिंतीवरच्या खुंट्या हे टोप्या, पगड्या, फेटे,आजोबांच्या काठ्या,  कोट, बंड्या, छत्-या, यांचे निवासस्थान असे. शेतक-याच्या घरात खुंट्यावर टोपल्या, इरली,  कोयते, विळे, चाबूक,  शेतातली गोफण टांगलेली असे. जमीनदारांच्या घरात खुंट्यांवर,  भिंतींवर बंदुका,  घोड्यावरचे जीन, वाघाचे तोंड, हरणाचे कातडे,सांबराची शिंगे अशा वस्तू मालकांच्या शौर्याची व मर्दुमकीची ओळख देत. माजघरातल्या खुंट्यांवर लुगड्यांचे वळे, परकर, पोलक्यांच्या घड्या टांगलेल्या असायच्या. काचेच्या बांगड्या ही असत. परसदारीच्या सोप्याला खुंट्यांवर कोयता, रहाट, विळे  असत. एका खुंटीवर कै-या, चिंचा, पेरू पाडायची लगोरी रहाटाच्या मागे लपवून ठेवलेली असे. पालेभाजीच्या बुट्ट्या ही खुंटीवर असत. स्वयंपाकघरात खुंटाळीवर झारा, उलथने, डाव, चिमटा अडकवून ठेवत.

शहरातल्या घरातून खुंट्या छत्री, रेनकोट,  पिशव्या, मुलांची दप्तरे सांभाळत.

भिंतीतले कोनाडे ही नित्य लागणा-या वस्तू ठेवण्याची जागा. सोप्यातल्या कोनाड्यात चकचकीत पितळेचं तांब्याभांडं गार पाणी भरून ठेवलेलं असे. दुस-या कोनाड्यात पानदाणी,  माजघरातल्या कोनाड्यात फणेरपेटी,  सागरगोटे,  बिट्ट्या,  भातुकलीचा खेळ ठेवले जात.

अशा प्रकारे प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असल्याने घरातल्या प्रत्येकाला शिस्तीची सवय असे. कारण, घरातील जेष्ठ आजोबा आणि आज्जी यांची कडक, करारी, तितकीच प्रेमळ नजर सर्वांवर असे.

पूर्वीच्या भिंतींना मातीचा गिलावा असे. त्यामुळे नैसर्गिक रित्या घरात गारवा असे.

अशा शिस्तीच्या,  स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असलेल्या पण तितक्याच एकमेकांच्या सहवासात प्रेमळपणे रहाणा-या अनेक सदस्यांचा परिवार प्रत्येकालाच साहचर्य,  सुखवस्तुपणा, याबरोबरच शारिरीक, मानसिक व भावनिक सुरक्षितता देत असे. जे पुढील काळात दुर्मिळ झाले.

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साडेसाती – एक चिंतन – भाग 2 – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साडेसाती – एक चिंतन – भाग – 2 … अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

(अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे. ) इथून पुढे —–

कधी कधी अचानक पाऊस येतो, जवळ छत्री, रेनकोट काहीच नसते. पाऊस पडणे कोणाच्याच हातात नसते, त्यामुळे न चिडता थांबायचे किंवा भिजायचे, हे दोनच पर्याय असतात —– वेळ नसेल तर भिजत जायचे,—-

वेळ असेल तर थांबायचे,—- ही निर्णयक्षमता साडेसातीत येते.

चिडचिड करून त्रास करून घ्यायचा नाही, हे शहाणपण येते. 

भिजत जातांना किंवा वाट बघतांना चहा, भजी, कणीस असे काही खायचे, हे कळते.

चांगल्या वाईट घटना आयुष्यभर घडत असतात. कधी इतरांची साथ मिळते, कधी नाही. आपला आनंद आपण मिळवायचा, आपली वाट आपण आत्मविश्वासावर चालायची, कुबड्या घेऊन चालायचे नाही हे माणूस शिकतो. 

`मला वाटले,` `माझ्या लक्षात आले नाही ` ` इतकं चालतं,` अशी वाक्ये मनात आणायची नाहीत. नाही तर महाराज पिच्छा पुरवतात. 

शरण जाणे, हा सोपा मार्ग आहे, पण अहंकार आड येतो. अहंकार मनात धरून मारुती, पिंपळ, कोणालाही फेऱ्या मारून उपयोग होत नाही. अंगी नम्रता असेल तरच शांत राहता येते. गुरूला शरण जाणे, हा सर्वात उत्तम मार्ग आहे. 

गुरूकडे गेलं की बरीचशी तयारी गुरू करून घेतात. 

शाळेत असताना शिकवणी लावून अभ्यास करा किंवा आपापला करा, अभ्यास करावा लागतो, परीक्षा नको, अभ्यास नको असे म्हणून चालत नाही.

हॉटेलमध्ये खाल्लं की बिल द्यावे लागते, नाहीतर भांडी घासावी लागतात.

डोकं शांत, मन प्रसन्न, काम चोख असेल तर काय चुकतंय, काय करायला हवं हे लक्षात येतं. 

स्वतः च्या चुका ऐकूनही घेत नाही म्हणून माणसात सुधारणा होत नाही. कोणी सांगितले तरी माणूस चुका स्वीकारत नाही आणि सुधारतही नाही. चूक मान्य केली तर सुधारायची थोडी तरी शक्यता असते.

घाबरावे असे शनी काही करत नाही—-

आरोग्य आणि अध्यात्म या दोन गोष्टीचे माणसाला महत्त्व पटवण्याचे आणि पैसा, संपत्ती, मीपणा यावरचे लक्ष कमी करण्याचे काम शनी महाराजांकडे सोपवले आहे. 

त्यांचा अनुभवावर, कृतीवर, शिस्तीवर भर आहे, समजवण्यावर नाही . ते उपदेश करत नाहीत, थेट अनुभव देतात.

माणसाला असणारी धुंदी / गुर्मी उतरवण्याचे काम शनी महाराजांना दिले आहे. 

गीतेत “ कर्मण्येवाधिकारस्ते “ असे सांगितले आहे, त्याचा वस्तुपाठ शनी करून घेतात. 

गीता, आणि एकंदरीतच  संतसाहित्यात असलेला उपदेश शनी प्रत्यक्ष कृतीत आणायला लावतो. 

ज्या माणसांना कष्ट, शिस्त, नम्रपणा आवडत नाही त्यांना साडेसातीत त्रास होतो. 

खरं तर राग आणि अहंकाराने माणसाचे पूर्ण आयुष्यच खडतर जाते, त्रास होतो.

 अतीचिकित्सा न करता काही गोष्टी सोडून देतात ती माणसे समाधानी, आनंदी असतात.

आयुष्य पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट कधीच नसते —- फक्त साडेसातीत नाही , तर एकूण आयुष्यातच…

“ मी म्हणेन ते,—- मी म्हणेन तसे, —-मी म्हणेन तेव्हा —-” असे वागणाऱ्या माणसांना मानसिक त्रास जास्त होतो.

माणूस जे ठरवतो ते होतेच असे नाही .– होईल ते त्याच्या मनाप्रमाणे असते असे नाही .—तो करेल त्याचे श्रेय त्याला मिळते असेही नाही . तो ज्यांना आपले समजतो ते त्याच्याशी आपलेपणाने वागतील असे तर मुळीच नाही. 

——  एका मुलाला त्याची आई स्वतःची कामे कर असे सांगत असते. आई एकदा त्याला कपडे धुवायला सांगते. तो कसेतरी धुतो. आई कपडे मातीत टाकून परत धुवायला लावते. तू नीट कपडे धुतलेस तरच जेवायला मिळेल, असे सांगते. मुलगा कपडे नीट धुतो, पण वाळत कसेतरी घातले म्हणून आई ते कपडे परत धुवायला लावले.—

त्या मुलाने नंतर आयुष्यभर कपडे स्वच्छ धुतले आणि नीट वाळत घातले. 

ही सत्य घटना आहे. याला शिस्त म्हणणार की छळ? 

हे वळण / शिस्त वाटत असेल तर शनी वाईट वागवतो असे वाटणार नाही. चूक न सुधारता नुसती सांगून  उपयोग नाही.

साडेसाती ही माणसाला सुधारण्यासाठी दिलेली संधी असते, त्या संधीचे सोने करावे. 

ज्ञानी, कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, धीरगंभीर शनी महाराज माणसाला खंबीर बनवतात. काहीही आयते देत नाहीत. काही मिळवायचे असेल तर कष्ट करायला लावतात . माहिती हवी असेल तर अभ्यास करावा लागतो, आराम करून चालत नाही. 

साडेसाती म्हणजे नुसता त्रास नसतो, त्याची रसाळ फळे नंतर नक्की मिळतात.

साडेसातीसाठी आध्यात्मिक उपाय या लेखात नाहीत, तो उद्देशही नाही. साडेसातीमागची मनोभूमिका मांडली आहे. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे उत्तम. 

सांगा बरं, साडेसाती चांगली की वाईट????

शुभं भवतु !

— समाप्त —

लेखक : अज्ञात

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares