मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “श्रावण महिन्यातील पर्यावरण व्रते” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ “श्रावण महिन्यातील पर्यावरण व्रते” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. निसर्ग हिरवा गार, श्रावणाच्या रिमझिम सरी व ईश्वर आराधना याच सोबत, पर्यावरणाशी तादात्म्य राखणे, यासाठी काही व्रते सुचवीत आहे—-

 १-  रोज किमान एका झाडाची निगा राखेन. 

 २-  रोज किमान पंधरा मिनिटे झाडांच्या सानिध्यात राहीन. 

 ३-  श्रावण महिन्यात एक तरी झाड लावीन.  

 ४-  श्रावण महिन्यात एकातरी मित्राला किंवा मैत्रिणीला झाड लावायला प्रवृत्त करेन. 

 ५-  सणानिमित्ताने दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू या पर्यावरण-पूरक आणि पर्यावरणाला अनुकूल ठरतील अशाच देईन. 

   —-(नो प्लास्टिक) 

 ६-  श्रावण महिन्यात एकदा तरी वनविहार करीन.  

 ७-  श्रावण महिन्यात मी वापरलेले सर्व प्लास्टिक एकत्र करीन व महिना संपल्यानंतर त्याचे वजन करीन.  

 ८-  श्रावण महिन्यात किमान अकरा औषधी वनस्पतींची माहिती करून घेईन.  

 ९-  घरातल्या पाणी वापराची समीक्षा करेन- ऑडिट करेन.  

१०-  घरातील खरकटे, भाजीपाला, देठं, इत्यादी कचऱ्यापासून खत करीन.  

११-  खरेदीसाठी खिशात कापडी पिशवी ठेवीन.  

१२-  घराबाहेर असताना कचराकुंडी व्यतिरिक्त  इतरत्र कोठेही कचरा टाकणार नाही.  

१३-  रोज जास्तीत जास्त एक तास मोबाइलचा वापर करेन.  

१४-  व्हाट्सअप फेसबूक ट्विटर इंस्टाग्राम इत्यादी दिवसातून फक्त एकदाच पाहिन.

१५-  लिफ्टचा वापर कमी करेन व रोज किमान दोन मजले जिना चढून जाईन.

 

अशीच काही व्रते आपल्याला सुचली तर आपण यात भर घालू शकता. 

व्रत म्हणून या गोष्टी अंगिकारल्या तर त्या सहजपणे रुजतील व त्यांचा कायमस्वरूपी प्रभाव आपल्या जीवनावर राहील.

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रंगभूमीवरील शिलेदारांची ‘शिलेदारी’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ रंगभूमीवरील शिलेदारांची ‘शिलेदारी’ ☆ सुश्री त्रिशला शहा 

(संगीत रंगभूमी गाजवणारी गायिका अभिनेत्री आणि संगीत नाटकाला अवघ जीवन समर्पित करणारी गानसम्राज्ञी किर्ती शिलेदार यांचा जन्मदिवस नुकताच झाला. त्यानिमीत्त हा लेख)

मराठी रंगभूमीला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस दिसले ते नटसम्राट बालगंधर्व आणि दिनानाथांच्या कसदार अभिनयाने आणि संगीत नाटकातील बहारदार गानशैलीमुळे. या दोन्ही नाट्यकर्मीं मुळे संगीत नाटकाला उत्तुंग शिखरावरील मानाचे स्थान मिळवता आले. बालगंधर्वांच्या तालमीत तयार होऊन त्यांच्याबरोबरीने संगीत नाटकात काम करणारे जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार या व्दयींनी तर संगीत नाटकाला आपले आयुष्य वाहिले. मराठी रंगभूमी हिच आपली कर्मभूमी आणि हाच आपला देव मानून आपल संपुर्ण जीवन संगीत नाटकासाठीचं समर्पित केल.

लहानपणापासून जयराम शिलेदार यांना संगीताची आवड होती, त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना गाणं शिकण्याची अनुमती दिली. गाणं शिकता शिकता अभिनयामधेही त्यांना आवड निर्माण झाली आणि बालगंधर्वांबरोबर त्यांना नाटकात काम करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान त्यांची, नायिका म्हणून काम करणाऱ्या प्रमिला जाधव यांच्याशी त्यांची ओळख झाली,प्रमिला जाधव याही संगीतामधे प्रविण आणि अभिनयातही   निपुण होत्या.जयराम शिलेदार आणि प्रमिला जाधव यांची संगीत नाटकातील वाटचाल अत्यंत यशस्वीपणे चालली होती. याच दरम्यान प्रमिला जाधव या जयमाला शिलेदार बनून जयराम शिलेदार यांच्या आयुष्याच्या जोडीदार बनल्या.

या नंतरच्या काळात दोघांच्याही संगीत नाटकाचा आलेख चढतचं गेला. लता आणि किर्ती अशा दोन गोंडस मुलींमुळे संसारही बहरत गेला. बालपणापासूनच कानावर पडणारे संगीत आणि रंगभूमीवरील आईवडिलांचा अभिनय पाहून नकळत त्यांच्याही मनावर याचा प्रभाव पडत गेला. दोघीही चार पाच वर्षाच्या असताना नाटकातील पात्रांच्या नकला करीत असत, ते पाहून जयराम शिलेदारांनी त्याना अभिनयाचे आणि जयमालाबाईंनी संगीताचे शिक्षण देण्यास सुरु केले.

अशा तालमीत तयार होऊन वयाच्या दहाव्या, बाराव्या वर्षी लता,किर्ती आणि त्यांचा भाऊ सुरेश यांनी ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग रंगभूमीवर सादर केला. यानंतरची संगीत रंगभूमी, लता आणि किर्तीच्या अभिनयाने खूपचं गाजली. जयमाला बाईंनी अतिशय उत्तम अशी तयारी करुन घेतल्यामुळे संपूर्ण शिलेदार कुटूंबाच्या नाट्यप्रयोगाने संगीत रंगभूमीची भरभराट झाली. या आपल्या लहान लेकींचा संगीताचा प्रवास पाहून शिलेदार पतीपत्नी मनोमन सुखावले. बहिणाबाई चौधरी यांनी एका कवितेत म्हटले आहे,’ माझ्या गं लेकीला, काय देऊ खेळायला, सोन्याची सुपली देते,मोती देते घोळायला ‘ या कवितेप्रमाणे जयमालाबाई म्हणायच्या ‘माझ्या गं लेकींना, काय देऊ खेळायला, नाटकांची सुपली देते, सूर देते घोळायला.’ आणि खरोखरचं या शिलेदारांच्या दोघी लेकींनी नाटकाच्या सुपलीतून सूर अक्षरशः घोळले, खेळवले. सं. सौभद्र, सं. स्वयंवर, सं. मानापमान, एकचं प्याला, सुवर्णतुला, भावबंधन, सं. शारदा, संशयकल्लोळ द्रौपदी वस्त्रहरण अशी एकाहून एक सरस नाटक या शिलेदारांनी रंगमंचावर सादर करुन संगीत रंगभूमीचे भविष्य उज्वल केले. अतिशय उंची गाठणारा लताचा आवाज, थोडासा पुरुषी बाजाचा असल्यामुळे नाटकातील पुरुषप्रधान भूमिका  ती करीत असे. तर अतिशय लिलया असा फिरणारा आवाज आणि अत्यंत उत्कृष्ट साभिनय सादरीकरणाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारा किर्तीचा आवाज, यामुळे संगीत नाटकाला परत एकदा सोन्याचे दिवस आले. किर्ती शिलेदार यांच्या या संगीत नाटकाच्या अपुर्व कामगिरीमुळे त्यांना समोर ठेऊन ‘स्वरसम्राज्ञी’ हे संगीत नाटक लिहले गेले आणि किर्तीताईंनी या नाटकाचे अक्षरशः सोने केले. संपुर्ण भारतभर तसेच इंग्लंड, अमेरिका असे विदेशातही संगीत नाटक पोहोचविण्यात शिलेदार भगिनींचा मोठा वाटा आहे. किर्तीताईंचे नाट्यसंगीत आणि खुमासदार शैलीत केलेल दिप्ती भोगले(लता शिलेदार)यांच निवेदन अशा उत्कृष्ट कार्यक्रमाचे हजारो प्रयोग त्यांनी केले.संगीत नाटकाशिवाय किर्तीताई उत्तम प्रकारे तबला वाजवतात, अशा तबला आणि संगीतावर आधारित ‘ स्वर ताल शब्द संगती ‘नावाच पुस्तक किर्ती शिलेदार यांनी लिहले.अनेक पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या किर्ती शिलेदार यांना २०१८ च्या ९८ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान मिळाला. दिल्लीमधील संगीत अकादमीच्या त्या सदस्य आहेत. अतिशय तन्मयतेने आयुष्यभर शिलेदार  कुटूंबाने संगीत रंगभूमीची सेवा केली अस म्हणायला काही हरकत नाही.

काही काही नाट्यगीतांमुळे किर्तीताईंनी प्रेक्षकांना इतकी भुरळ घातली की त्यांच्या कोणत्याही मैफिलीत ही पद त्यांनी सादर करावीत अशी रसिकांची मागणी असायचीच. संगीत कान्होपात्रामधील ‘अवघाची संसार सुखाचा करीन’, सं. स्वयंवरमधील ‘एकला नयनाला विषय तो झाला ‘, नरवर कृष्णासमान’, स्वरसम्राज्ञीमधील ‘कशी केलीस माझी दैना’,अशी कितीतरी पद गाऊन त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.’ जोहार मायबाप जोहार ‘ या गाण्याशिवाय तर मैफिल पुर्णच होत नाही.

संगीत रंगभूमीची सेवा करीत असताना किर्तीताईंना अनेक चित्रपटांच्या आँफर आल्या,त्यांचा अभिनय पाहून भालजी पेंढारकर यांनी त्यांना छ.शिवाजी या चित्रपटात जिजाबाईंची भूमिका देऊ केली पण त्यांच मन संगीत रंगभूमीवर इतक जडलं होत की त्यांनी या गोष्टीला नकार दिला आणि आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोघी बहिणी नाट्यजगतातच रमल्या. आयुष्यभर संगीत रंगभूमीचीच सेवा करीत आहेत. लता आणि किर्ती, दोघीही सध्या संगीताचे क्लास घेतातच शिवाय संगीतनाटक यावर किर्तीताई व्याख्यानेही देतात. तर अशीही रंगभूमीवरची शिलेदारांची बहरलेली ‘ शिलेदारी ‘

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रावणसरी ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

??

☆ श्रावणसरी ☘️ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

वालचंदनगर म्हटलं की बालपणीच्या आठवणी जागवतात. बालपणीचा पाऊस तर मनाला चिंब भिजवतो…. आपलं बालपण जपत..!आखिव -रेखीव असं हे निमशहरी गाव. माझं बालपण ,शालेय शिक्षण इथेच झालं. आमची शाळा घरापासून बरीच लांब. पावसाळ्यात छत्री असे पण ,कधी मुद्दाम विसरलेली ,पावसात चिंब भिजण्यासाठी.! पावसाळ्यात बऱ्याच वेळा शाळेला सुट्टीच असायची. नीरा नदीला पूरही येत असे. तो पहायला जाण्यात एक वेगळच थ्रिल असायचं. पाण्याच्या उंचच उंच लाटा, नदीवरचा मोठा पूल पाण्याखाली बुडालेला, हे सगळं पाहताना सारंच तेव्हा आश्चर्यजनक वाटायचं. पावसानं थोडी विश्रांती घेतली की सुट्टीच्या दिवशी शेजारपाजारचे सगळे मिळून नदीकाठच्या देवीला दर्शनासाठी जायचं. तेव्हा एकच बैलगाडी करायची त्यात जेवणाचे डबे अन चिल्लीपिल्ली कंपनी असायची . देवीचे दर्शन घेऊन जेवणाची पंगत बसायची .घारग्या, मटकीची उसळ ,तिखट मिठाच्या पुऱ्या,  शेंगदाण्याची चटणी , तांदळाची खिचडी आणि दही या मस्त बेताची छान अंगत पंगत व्हायची. जेवणानंतर नदीकिनारी एक फेरफटका व्हायचा नंतर मुलांची पतंगांची काटाकाटी नदीकाठी चालायची. पुरुष मंडळी ही त्यात सहभागी व्हायची. नाहीतर पत्त्यांचा डाव रंगायचा .बायका आणि मुली देवीची,पंचमीची गाणी म्हणायच्या. आम्ही मुली आणि मुलं पावसाची गाणी, कविता म्हणायचो. खूप मजा यायची .त्यातच एखादी श्रावण सर आली की इंद्रधनुष्य फार सुरेख दिसायचं. मग श्रावणसर अंगावर घेतच घाईघाईनेच घराकडे प्रयाण. खरंच श्रावणातलं पर्जन्यरूप किती सुंदर आणि वेगळच ..! जाई जुईचे झेले हातात घेऊन सुवास घ्यावा असे.. ऊन पावसाचा लपंडाव खेळणारा हा श्रावण..

त्यावेळी अगदी घरोघरी श्री सत्यनारायण ,जिवतीची पूजा असे. मंगळागौर तर नव्या नवरीला उत्सवच वाटायचा . सकाळी सकाळी फुलं ,पत्री, दुर्वा ,आघाडा,गोळा करायला जायचं .कुणाच्या दारातल्या फुलांवर डल्ला मारायचा.  कुणी मनानेच हौसेने फुलं द्यायचेही .त्याचा आनंद आजच्या फुलपुडीत कुठला?

श्रावण म्हटलं की आठवतो दारातल्या निंबाच्या झाडाला दादांनी बांधलेला दोरांचा झोका ..मैत्रिणींबरोबर घेतलेले उंचच उंच झोके ,मंगळागौरीचे खेळ, नागपंचमीची फेर धरून म्हटलेली गाणी,माईच्या हातची पुरणाची दिंड, नारळी पौर्णिमा- राखी पौर्णिमा, भावांना बांधलेली राखी ,गोकुळाष्टमीचे किर्तन. ..!

लग्नानंतर दौंडला आम्ही बंगल्यासमोर छान बाग जोपासली. आता सगळ्याच आठवणीत रंगताना दारातली बागच नजरेसमोर उभी राहिलीय…. कंपाऊंडच्या भिंतीलगत अबोली ,कर्दळीचे विविध प्रकारचे ताटवे ,प्राजक्ताचा सडा, टपोऱ्या विविधरंगी गुलाबांची झाडं, जाई- जुईचे फुलांनी डवरलेला वेल, वाऱ्यावर डोलणारा कृष्णकमळाचा वेल अन् फुलं, वृंदावनातील तुळशीच्या पानाफुलांचा सुगंधी दरवळ, दारातील झाडाला टांगलेल्या झोपाळ्यावर मैत्रिणींबरोबर झुलणारी माझी फुलराणी झालेली फुलवेडी लेक..!

– आता किती काळ गेला आयुष्य॔ बदललं .आताही श्रावण येतो, ऊन पावसाचा खेळ खेळतो .आणि मनांतला श्रावण मनांत पिंगा घालतो. मग…. आठवांच्या सरीवर सरी डोळ्यांतल्या श्रावणसरींबरोबर अलगद बरसू लागतात. …!

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बंधने… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? विविधा ❤️

☆ बंधने… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

बंधनात रहाणे कोणाला आवडते? अर्थातच कोणालाच नाही. एखादी गोष्ट करायची नाही असे बंधन आले की तीच गोष्ट करण्याची अगदी आबालवृद्धांची प्रवृत्ती असते. मधुमेह जडण्यापूर्वी माणसाला गोड खाणे आवडतही नसेल कदाचित, परंतु मधुमेहीअवस्था झाली की त्याला गोड खाण्याचीच लालसा होते. कधी कधी तर तो चोरूनही खातो. सांगायचा उद्देश बंधने झुगारणे ही माणसाची मानसिकता आहे. पिंजर्‍यातला पक्षी फडफड करतो, मग तो पिंजरा सोन्याचा का असेना!साखळीने बांधलेला कुत्रा त्याला सोडविण्यासाठी भुंकून भुंकून त्याच्या धन्याला हैराण करतो. बंध तोडून स्वैर, स्वच्छंद विहार करण्यासाठी प्रत्येकच सजीव आतूर असतो.

ही झाली नाण्याची एक बाजू, परंतु दुसर्‍या बाजूला जीवन जगताना त्यात शिस्त, नियमन असावेच लागते नाहीतर सर्वत्र सावळा गोंधळ आणि अराजक माजेल.

अगदी पार वेदिक कालात आपण पाहीले तर चातुर्वण्य पद्धतीने समाजाची रचना केली गेली होती. ब्राम्हणांनी यज्ञयाग, जपजाप्य, वेद पठण ह्या गोष्टी करायच्या, क्षत्रियांनी रणांगणावर आपली कामगिरी बजवायची, वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्रांनी नगरात स्वच्छता राखायची. कामांची वाटणी केल्याने समाजात सुख, शांती, समाधान नांदेल हा त्यामागील उद्देश. कोणी उच्च, कोणी नीच ही भावना वर्णाश्रम पद्धति अंमलात आणताना नव्हती.

आजही आपण सर्व आवश्यक ती बंधने पाळून जगत आहोत. विद्यार्थीदशेतील बंधने~वेळेत शाळेत गेले पाहीजे, अभ्यास केला पाहीजे, परीक्षा दिलीच पाहीजे, खेळलेही पाहीजे.

विवाह बंधन, आईमुलांचे नाते, भावंडांतील परस्परांचे नाते, मित्रमंडळींशी नातेही सर्व नाती निभावताना काही ठराविक बंधने पाळणे आवश्यक आहे. लग्नाशिवाय स्त्री~पुरुषाचे एकत्र रहाणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत बसणारे नाही. संसार हेच कितीतरी मोठे प्रिय बंधन आहे. ही बंधने हसत हसत पाळून आपण कर्तव्य पालन करावे.

वेळेचे बंधन पाळणे ही तर यशाची पहिली पायरी आहे. कोणतेही कार्य करताना नियोजन फार महत्वाचे असते. नियोजन नसेल तर कामात सुसुत्रता निच्छितच रहाणार नाही.

निर्मात्याने मानवाआधी निसर्गनिर्मिती केली. त्या निसर्गाचा आणि आपला फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आपल्याला आवश्यक असलेला प्राणवायू देतो, अन्न देतो, पाणी देतो, जीवन देतो. निसर्गाचा आणि मानवाचा समतोल त्या विधात्याने राखला आहे. एका आवर्तनाच्या बारा महिन्यात उन्हाळा, पावसाळा आणि हिंवाळा असे तीन मुख्य ऋतू त्या निर्मात्याने तयार केले. किती नियमबद्धता आहे त्यात!माणसाने नंतर त्याचे सहा ऋतू केले. पण वातावरणाचे बंधन पाळल्यामुळेच माणसाचे आरोग्य राखले जाते. त्या विश्वंभराची ही योजना आहे. शिशिरात पानगळ झाली की वसंतात  पुन्हा बहर येतो. ऊष्णतेने प्राणीमात्रांची लाही लाही झाली की वर्षा येते आणि सर्वत्र गारवा निर्माण होतो, शुष्क झालेल्या नद्या पुन्हा दुथड्याभरून वाहू  लागतात. निसर्गाने माणसाला आयुष्यातले चढउतार दाखवून दिले आहेत.

बंधने जाचक मात्र कधीही नसावीत. आजही रूढी परंपरा याच्या नावाखाली कित्येक स्त्रियांवर अन्याय होताना आपण पहातो. समाजहितासाठी कायदे केले गेले असले तरी त्यांना धाब्यावर बसवून अत्याचार घडत आहेत. हुंडाबळी अजूनही पूर्णपणे थांबलेले नाहीत. स्त्रीभृणहत्येचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडोपाडी अजूनही त्या होतच आहेत. हे सर्व पूर्णतया थांबावयास हवे.

बंधने हवीतही आणि नकोतही!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पोएम – लेखक – विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पोएम – लेखक – विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

भारताच्या इसरो म्हणजेच Indian Space Research Organisation (ISRO) ने अवकाशात एका नवीन ‘पोएम’ ची सुरूवात केली आहे. पोएम चा इंग्रजी अर्थ हा कविता असा होतो. त्यामुळेच एखाद्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेने अवकाशात पोएम लिहीण्याचा श्रीगणेशा केला हे वाचून अनेक भारतीय बुचकळ्यात पडू शकतात. ३० जून २०२२ ला इसरोच्या रॉकेटने अंतराळात उपग्रहांना त्यांच्या योग्य कक्षेत प्रक्षेपित करताच इसरोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी यशस्वी प्रक्षेपणानंतरच्या भाषणात एक वाक्य म्हटलं, जे खूप अर्थाने महत्वाचं होतं. त्यांचे शब्द होते, 

“Write some poems in orbit” –ISRO Chairman S Somanath. 

राजकीय विषयांवर एकमेकांच्या झिंज्या ओढणाऱ्या, जातीवरून, धर्मावरून एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या आणि एकमेकांच्या खाजगी आयुष्यात अतिशय रस असणाऱ्या भारतीयांकडून इसरोच्या चेअरमनचे शब्द कानावर पडणार नाहीत हे सर्वश्रुत होतं. अर्थात ते पडले असते तरी एका कानातून जाऊन दुसऱ्या कानातून बाहेर पडून विसरले गेले असते. पण त्यामुळे त्या शब्दांचं महत्व कमी होत नाही. अमेरिका, चीन, युरोपियन युनियन देशांच्या तगड्या अवकाश संस्थांना मात देताना आणि जे भारतीय इसरोने करू नये यासाठी अमेरिकेने सगळ्या साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला, तेच भारताच्या इसरोने ३० जूनच्या चाचणीत करून दाखवलेलं आहे. यासाठीच इसरोच्या चेअरमनचे शब्द भारतासाठी आणि भारतीयांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. 

तर पोएम म्हणजे नक्की काय? पोएम चा अर्थ होतो PSLV Orbital Experimental Module  (‘POEM’). पोएम समजावून घ्यायला आपल्याला एकूणच रॉकेट कशा पद्धतीने काम करते हे थोडक्यात समजावून घ्यावे लागेल. कोणतेही रॉकेट टप्प्याटप्प्याने उड्डाण करते. या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी इंजिने, फ्युएल आणि इतर तंत्रज्ञानाचा समावेश असतो. ज्याला आपण स्टेज असं म्हणतो. रॉकेटने उड्डाण केल्यावर आपण अनेकदा रॉकेट स्टेज १, स्टेज २, स्टेज ३ आणि स्टेज ४ मधले टप्पे गाठत असताना ऐकलेलं असेल. तर त्याप्रमाणे भारताचे PSLV (Polar Satellite Launch Vehicle) हे ४ टप्प्यांत उड्डाण करते. याचा अर्थ जमिनीवरून उड्डाण करून एखाद्या उपग्रहाला साधारण ४०० ते ६०० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करायला या रॉकेटमध्ये ४ स्टेज वापरण्यात येतात. 

आजवर PSLV (Polar Satellite Launch Vehicle) ने उड्डाण केल्यावर त्याच्या पहिल्या तीन स्टेज आपलं काम पूर्ण झाल्यावर मुख्य रॉकेटपासून विलग होऊन समुद्रात कोसळत होत्या. राहिलेली चौथी स्टेज ही अंतराळात कचरा म्हणून जमा व्हायची आणि कालांतराने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून नष्ट व्हायची. भारताच्या वैज्ञानिकांनी या चौथ्या स्टेजचा वापर आपण करू शकतो का यावर संशोधन सुरू केलं. कारण पृथ्वीपासून लो ऑर्बिट वरून या स्टेज अनेकवेळा पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालून मग नष्ट होत होत्या. मग जर रॉकेटचा भाग म्हणून फुकट अवकाशात प्रक्षेपित झालेली ही स्टेज आपण जर वापरू शकलो तर त्याचे दूरगामी परिणाम आपण साधू शकतो हे भारताच्या म्हणजेच इसरोच्या लक्षात आलं. PSLV हे रॉकेट ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपित करते म्हणजे जे उपग्रह पृथ्वीच्या दक्षिणोत्तर ध्रुवांकडून प्रवास करतात. आपले रिमोट सेन्सिंग उपग्रह, हेरगिरी करणारे उपग्रह, जमिनीवर चालणाऱ्या गोष्टीचं मॅपिंग करणारे उपग्रह याच कक्षेत परिभ्रमण करत असतात. मग जर भारत या आयत्या प्लॅटफॉर्मचा वापर करून घेऊ शकला तर त्याचे आर्थिक आणि सैनिकी परिणाम खूप दूरगामी असणार होते. 

२०१९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या PSLV C ४४ मिशन मध्ये पहिल्यांदा या चौथ्या स्टेजचा वापर करून कलामसॅट व्ही २ या विद्यार्थ्यांच्या उपग्रहाला प्रक्षेपित करण्यात आलं. याचा अर्थ काय होता तर रॉकेटने आपलं मिशन फत्ते केल्यावर संपलेल्या आणि अवकाशात अधांतरी फिरत राहणाऱ्या ४ थ्या स्टेजच्या प्लॅटफॉर्मवर इसरोने हा उपग्रह ठेवलेला होता. लिथियम आयन बॅटरीचा वापर करून त्याची कक्षा योग्य ती करत विद्यार्थ्यांचा हा उपग्रह अवकाशात काम करायला लागला. त्यामुळे इसरोला असे वैज्ञानिक किंवा नमुना म्हणून उपग्रह फुकटात पाठवण्याचा ‘प्लॅटफॉर्म’ मिळाला. लक्षात घेतलं पाहिजे एखादा उपग्रह निर्माण करायला सोपे असते, पण त्याला प्रक्षेपित करण्याचा खर्च हा कैक पटीने जास्त असतो. इसरो इकडे थांबली नाही. नुसत्या बॅटरीवर न थांबता जर यात आपण सौर पॅनल बसवले तर या बॅटरी रिचार्ज होत राहतील आणि आपण अधिक काळ या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकू हे इसरोला लक्षात आलं. 

अश्या पद्धतीने इसरोने आपल्या ४थ्या स्टेजचा वापर करू नये यासाठी अमेरिका दबाव टाकत होती. याचं कारण होतं हा प्लॅटफॉर्म दुहेरी तलवार आहे हे त्यांना चांगलं माहित होतं. जसे याचे आर्थिक आणि वैज्ञानिक फायदे आहेत त्यापेक्षा अधिक सैनिकी फायदे आहेत. भारत उद्या अश्या पद्धतीने अवकाशात मिसाईल स्थापन करू शकतो आणि वेळ पडल्यास तिकडून डागू शकतो. हे अमेरिकेला रुचणार नव्हतं. भारताने आधीच ‘ए सॅट मिसाईल’ ची निर्मिती करून आपण लो अर्थ ऑर्बिट मधील उपग्रह नष्ट करू शकत असल्याची जगाला वर्दी दिलेली होतीच. त्यात आता अवकाशातून अवकाशात किंवा अवकाशातून जमिनीवर मिसाईल डागण्याची क्षमता अशा प्लॅटफॉर्ममुळे भारताला उपलब्ध होणार होती. आपण लक्षात घेतलं पाहिजे की येणाऱ्या काळात अवकाशात युद्धाची बीजे पेरलेली असणार आहेत. अशावेळी भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने इसरोने घेतलेली ही उडी अतिशय महत्वाची होती. 

३० जून २०२२ च्या PSLV उड्डाणात इसरोने यशस्वीरित्या PSLV Orbital Experimental Module  (‘POEM’) अवकाशात स्थापन केलेलं आहे. ज्यात सौर पॅनल बसवलेले होते. उपग्रहाने आपलं काम फत्ते केल्यावर म्हणजे उपग्रह प्रक्षेपित केल्यावर काम संपलेल्या ४थ्या स्टेजच्या टाक्यांना जोडलेले सौर पॅनल उघडले गेले. हा प्लॅटफॉर्म Navigation Guidance and Control (NGC) ने जोडला गेलेला होता. याचा अर्थ होतो की या प्लॅटफॉर्मला आपण पृथ्वीवरून आपल्या हव्या त्या कक्षेत स्टॅबिलाइझ म्हणजेच स्थिर करू शकत होतो. त्याची जागा, कोन, उंची हे सगळं इसरो नियंत्रित करू शकणार होती. तसेच यावर हेलियम गॅस थ्रस्टर बसवलेले आहेत. जे चालवून आपण आपल्याला हवं तिकडे हा प्लॅटफॉर्म नेण्यास सक्षम झालो आहोत. याचा अर्थ जर का आपण यावर एखादं मिसाईल भविष्यात बसवलं तर त्याला आपण आपल्या मर्जीप्रमाणे गरज वाटल्यास शत्रू देशांचे उपग्रह किंवा जमिनीवरील इतर टार्गेट कोणाच्याही लक्षात न येता भेदू शकतो. ३० जूनच्या मिशनमध्ये अजून एक गोष्ट महत्वाची भारताने साध्य केली आहे ती म्हणजे या प्लॅटफॉर्मवर असणारे दोन उपग्रह हे Indian National Space Promotion and Authorization Center (IN-SPACe) च्या माध्यमातून भारतातील खाजगी कंपन्यांकडून बनवलेले होते. दिगंतरा आणि ध्रुव स्पेस या दोन खाजगी कंपन्यांचे उपग्रह या प्लॅटफॉर्मवर प्रक्षेपित करण्यात आलेले आहेत. यातून भारताने एक नवं क्षेत्र भारतीयांसाठी खुलं केलेलं आहे. ज्याप्रमाणे स्पेस एक्स सारख्या कंपनीचा अमेरिकेत उदय झाला त्याच धर्तीवर भारतात खाजगी स्पेस इंडस्ट्री उभी करण्याच्या दृष्टीने ही खूप मोठी मजल आहे. 

PSLV च्या ‘पोएम’ ने एका नव्या क्रांतीची बीजं ३० जून २०२२ च्या उड्डाणात रोवली आहेत. ज्याची फळं येत्या काळात आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळेच इसरोचे चेअरमन एस. सोमनाथ यांचे वाक्य अनेक अर्थाने महत्वाचे ठरते. इसरोचे या यशासाठी अभिनंदन. या मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्व अभियंते, वैज्ञानिक, कर्मचारी आणि खाजगी कंपन्या त्यांचे कर्मचारी या सर्वांचे आभार. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!   

फोटो शोध सौजन्य :- गुगल, इसरो  ( PSLV सी ५३ आकाशात उड्डाण घेताना ३० जून २०२२ ) 

शब्दांकन :  विनीत वर्तक ©️ (कॉपीराईट आहे.) (साभार) 

माहिती संकलन : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्राद्वारे मनोगत — अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆`

? वाचताना वेचलेले ?

☆ पत्राद्वारे मनोगत — अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

प्रिय सखी, 

माझे  मनोगत पत्राद्वारे व्यक्त करते कारण भेट दुरापास्त झालीय. 

आधी थोडी प्रस्तावना —

मनोगत म्हणजे विचार शेअर करणे, पुष्कळ वेळा आपल्याला मनमोकळेपणाने  काही  सांगायचं असतं ,कधीकधी समोरासमोर सांगणं अवघड असतं. अर्थात समोरासमोर मनातले विचार, भावना सांगताना ,मांडताना वाटतं हा शब्दांचा गैरअर्थ तर काढणार नाही, दुखावला तर जाणार नाही .हिरीरीने मुद्दा मांडताना कधीकधी वाद वाढत जातात आणि रूपांतर भांडणात होते. अशा वेळेस कागदावर उतरलेले शब्द जास्त प्रभावी ठरतात .पत्राद्वारे व्यक्त केलेले मनोगत जितके रंजक असू शकते तितके ते भावनाप्रधान, मनापर्यंत पोचणारे  देखील असते. असो. प्रस्तावना पुरे.

मध्यंतरी आपला ग्रुप जमला होता .हसणं खिदळणं गप्पाटप्पा अनेक विषय हाताळून  झाले .प्रवास, बालपण, गमती जमती, वाचन, देव ,सत्संग वगैरे वगैरे. हळूहळू पुरुष राजकारणावर आणि आम्ही मैत्रिणी कुकिंग या आवडत्या विषयावर आलो. टिप्सची देवाण-घेवाण झाली. मला एक गंमत वाटते, हे पुरुष राजकारणावर  इतके हिरीरीने मुद्दे मांडत असतात, यांचा सगळा आवेश चार भिंतीतच. कोण चूक कोण बरोबर– काहीच कळत नाही. पण खरं सांगू,  राजकारण हे मला थोडीफार माहिती असण्याइतपतच मर्यादित आहे. कितीही राग आला, वाईट वाटलं तरी माझी धाव कुंपणापर्यंतच.  मग कशाला वाफ दवडवा.  

सध्या सत्संग, देव देव यांचे प्रस्थ पण फारच वाढले आहे. सारखे उपदेशानुरुप मेसेजेस. अरे चांगलं बोला, चांगलं वागा ,चांगला विचार करा– हाच खरा सत्संग– माझ्या घरातच देव आहे अशी श्रद्धा बाळगणं हेही तितकेच महत्वाचे 

नं ! तासन्तास रांगेत उभे राहून मंदिरात जायचं ,देव दिसतो न दिसतो तोच  हकालपट्टी. दान पेटीत पटकन दान करायचे– त्यापेक्षा सत्पात्री दान करावं .विशेषतः विद्यार्थी वर्गाची मला गंमत वाटते. चार-पाच तास रांगेत उभा राहून कधीकधी अनवाणी सिद्धिविनायक किंवा कुठल्याही मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं, त्यापेक्षा तोच वेळ अभ्यासासाठी सत्कारणी लावला तर जास्त उपयोगी नाही का पडणार ! 

—-हळूहळू गप्पांचा ओघ आजच्या पिढीवर आला आणि ठेवणीतलं वाक्य ‘ आमच्या वेळेस असं नव्हतं ‘, या समेवर येऊन थांबला. 

तुला काय वाटतं , आजची पिढी म्हणजे नातवंडं फार हुशार आहेत ,चौकस आहेत. माहितीची महाद्वार दररोज उघडत आहेत, त्यामुळे जास्तच डोळस होण्याची गरज आहे. एखादी गोष्ट सांगितली तर पटकन विश्वास ठेवणार नाहीत ,  प्रश्न विचारतील समजून घेतील आणि मगच ते काम करतील

आपल्या पिढीत असं नव्हतं. एखादी गोष्ट सांगितली तर ती बरोबरच असेल, मग ती करायची, प्रश्न विचारायचे नाहीत   असा अलिखित नियम— अर्थात यामुळे आपलं काही वाईट झालं नाही, बिघडलं नाही.  पण आता माहितीच्या कक्षा इतक्या रुंदावल्यात आणि  सर्व प्रकारची माहिती सहज उपलब्ध होत आहे. 

आपण नाही का गं  एखादं औषध आणलं की त्याचे कंटेंट्स, साईड इफेक्ट याचा शोध घेतो. मग ही तर पुढची पिढी यांची चौकसवृत्ती जरा जास्तच. 

खरं सांगू,  आता नात्याची चौकट बदलली आहे .आधी नात्याचा पाया भावनेवर उभारलेला होता. आता माहिती हा नात्याचा पाया झाला आहे. काळाचा महिमा.

माझी या पिढीबद्दल तक्रार नाही. पण यांच्या खर्चिक वृत्तीबद्दल जरा प्रश्नचिन्ह आहे. हातात मुबलक पैसा असल्याने मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्या आहेत. या पिढीला आपल्यापेक्षा खूप टेन्शन्स, प्रेशर आहेत. सगळ्यांची तारेवरची कसरतच आहे. या सर्व गोष्टींशी लढता-लढता जीवनात अनावश्यक आहारांचा कधी शिरकाव झाला आणि तो अमर्यादित कधी झाला हे लक्षातच आले नाही किंवा येत नाही. जंक फुडचा अतिरेक आणि त्यात स्विगी ,झोमॅटो यासारख्या सुविधा आळशीपणात भर घालत आहेत .वाचन संस्कृतीचा ओघ कमी होतोय. असो, धिस इज लाईफ.

शंकराचार्यांच्या गुरूने दिलेला ,’ कोणत्याही परिस्थितीत आनंदात रहा ‘ हा मंत्र आत्मसात करायचा प्रयत्न करून तर बघू या.

मी माझं मन छान मोकळं केलं. अगं मैत्रिणी असतातच कशाला — गुपितं आणि मनातले विचार व्यक्त करायलाच 

ना ! चल लवकर  भेटूया.—– बाय . 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कृष्णा, बंदिवासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदिवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्या बरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास ! इतर गोकुळवासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करताच तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला ! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध,दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडली. सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं !थोडा मोठा झाल्यावर  सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुऱेचे राज्य मिळवलेस !

 तारुण्यसुलभ भावनेने स्वयंवरासाठी गेलास ,तुला द्रौपदीची आस होती पण पुढे काय घडणार याचे दृश्यरूप बहुदा तुला दिसले असावे!त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा सखा बनलास !दुर्गा भागवत म्हणतात की मित्र या नात्याला ‘सखा ‘हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील  हे नाते तू अधिक उदात्त केलेस ! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव-पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास योद्धा म्हणून नाही तर   सारथी बनून !एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘ सूतपुत्र ‘म्हणून नाकारले!सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर  असतो हे तिने दाखवून दिले पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी  पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्वाचा असतो हे  द्रौपदीला दाखवून  दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच  देवरूप  आणि  मानव  रूप यांच्या सीमेवर होतं!  जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगाचा रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ मथुरा सोडून  द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलंस म्हणून तुला रणछोडदास नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्याशी विवाह करून

तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना

एका भिल्लाच्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा, तुझे नाव घेतले की आपोआपच गुणा दोषातून मुक्ती मिळते असं वाटतं !कारण आपण काहीही घडलं तरी ‘कृष्णार्पण’ असा शब्द वापरून ते संपवतो .सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या

स्मरणात! तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो ,तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा जन्म होणार असतो .आजचा गोपाळ काला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात !पावसाच्या सरी बरोबरच  पुढील वर्ष आनंदात जाऊदे हीच इच्छा! आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण – ना किंवा परमेश्वराचे अस्तित्व न माणणारे आता ‘करोना’ पुढे शरणागत झाले आहे आणि आणि त्यावरून विज्ञानाने कितीही मात केली तरी  एक हातचा तुझ्याकडे , परमात्म्याकडे आहे हे मात्र मान्य केले पाहिजे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विचारांचे आऊटपुट… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ विचारांचे आऊटपुट…  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

आपण जो जो विचार करतो तो आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होत असतो…… त्यामुळे त्याच विचाराचे आऊटपुट आपल्याला मिळत असते…

हे माझ्याने होणार नाही असे म्हणण्याचा अवकाश…. अंतर्मन तुम्हाला तसेच आऊटपुट देऊन ते तुमच्या हातुन कधीच होऊ देणार नाही अशी व्यवस्था करते….

किंवा, मला नशापाणी केल्याशिवाय चैन पडत नाही, त्याशिवाय झोप येत नाही असले विचार केल्यावर अंतर्मन तसेच फळ आपल्याला बहाल करत असते….

अमकी एखादी गोष्ट मी सहजच करुन दाखविन असे विश्वासाने म्हणण्याचा अवकाश….. मग ती गोष्ट कितीही अवघड असो….अंतर्मन ती गोष्ट सहजच करुन दाखवते…. 

हा अंतर्मनाचा चमत्कार होय…. 

अण्णा हजारेंनी जे विश्वासाने उपोषण चालवले आहे, त्या साऱ्या गोष्टीत त्यांचे अंतर्मनच त्यांच्या पाठीशी आहे… 

हा अंतर्मनाचा मोठ्ठा चमत्कार आपण व सारे जग पाहतच आहे…

आपण सतत नकारात्मकच विचार करत आलो आहोत व आपल्या मुलाबाळांनाही आपण असेच नकारात्मक पणेच वागवत आलो आहोत………  

हे तुझ्या हातून होणारच नाही…

तू अजून बच्चा आहे…. 

असले धंदे करुन काय  तुझे पोट भरणार आहे का…. 

तू अगदी बावळटच आहेस ….. गधा आहेस…. तुला अक्कल नाही… 

उगाच मोठ्या मोठ्या गप्पा मारु नकोस…

तुला कवडीचे ज्ञान नाही….

उगाच बकवास करु नकोस……

मुर्ख कुठला…तुझी  लायकी नाही…. 

मोठे झाल्यावर कळेल तुला….

मुकाट्याने तुझा अभ्यास कर….

नको तो उपदव्याप  करु नको…त्यात तुला यश येणार नाही….

उगाच मोठेपणाचा आव आणू नकोस…..

वगैरे बोलून आपण आपल्या पाल्यास अगदी नकारात्मक विचारांचा असा नेभळट करुन टाकतो….. 

त्यांचे अंतर्मन आपण अंकुरीत होण्याच्या अगोदरच कोमजून टाकतो…. 

मग त्याला तसेच आऊटपुट मिळाल्यास नवल नाही….

 

मित्रांनो… 

असे काही करु नका… 

मुलांना तेजस्वी व कणखर मनाचे घडवण्यात आपलाच सहभाग असला पाहिजे… 

कारण आपला पाल्य खूप काळ आपल्या संपर्कात असतो, त्याला मनाने समृद्ध व बलवान बनवा…

त्याला देशाचे कणखर नागरिक बनवा… 

त्याचे अंतर्मन बलवान कसे होईल याकडे लक्ष द्या…

आपल्या चिमुकल्याला अंतर्मन जागृतीच्या साधना करायला सांगा….

जप तप, तीर्थाटण आदिंपेक्षा अंतर्मन कसे जागृत होईल याकडे लक्ष द्या… 

त्याच्या हातून काहीही वाईट होणार नाही हे ही आवर्जून पहा…

 

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ शालन, मालन आणि मोरू ! (भाग 1) ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

😂 शालन, मालन आणि मोरू ! (भाग 1) 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“पंत, पंत, पंत हे तुम्ही काय चालवलं आहे ?”

“अरे मोऱ्या मी काय चालवलं आहे ते नंतर, आधी मला सांग, किती दिवस झाले आपल्याला भेटून, काय पत्ता काय तुझा?”

“माझा पत्ता तोच आहे, जो गेली पाच वर्ष आहे तो. पंत तुम्हीच सासू सुनेच्या गोष्टीत रमला होतात गेले काही महिने, त्याच काय ?”

“ते जाऊदे रे ! पण आता इतक्या दिवसांनी आलास ते बरंच झाले.”

“का ?”

“हा प्रसाद घे, कालच श्रावणातली सत्यनारायणाची पूजा केली होती, घरातल्या घरात.”

“मी प्रसाद घ्यायला नंतर येतो पंत, माझी अजून अंघोळ व्हायची आहे.”

“मोऱ्या गाढवा, दुपारची जेवायची वेळ झाली तरी अजून तुझी अंघोळ नाही झाली ?”

“हॊ !”

“कारण कळेल मला मोऱ्या ?”

“तुम्ही !”

“अरे मी काय तुला रोज अंघोळ घालायला घरी येतो की काय तुझ्या ?आणि आज आलो नाही म्हणून अजून पारोसा राहिलायस ते ?”

“तसं नाही पंत, पण सकाळ पासून आम्ही नवरा बायको भांडतोय नुसते, त्यामुळे वेळच नाही मिळाला मला अंघोळीला.”

“अरे मोऱ्या पण तुमच्या भांडणाचं कारण काय ?”

“तुम्ही !”

“परत तुम्ही ! अरे काय सारखं तुम्ही, तुम्ही लावलंयस, नीट काय सविस्तर सांगशील की नाही ? आणि असा नुसती लुंगी लावून कसा आलास ? पावसामुळे कपडे वाळले नाही का तुझे ?”

“पंत इथे माझं लग्न मोडायची वेळ आल्ये आणि तुम्ही मला माझ्या कपड्याबद्दल विचारताय ?”

“बरं बाबा नाही विचारात, आता मला सांग तुझं लग्न मोडायची वेळ कुणी आणली बाबा तुझ्यावर ?”

“तुम्ही !”

“मी ? आणि ती कशी काय बुवा ?”

“सांगतो, आपल्या सोसायटीची पावसाळी पिकनिक जाणार आहे १२ सप्टेंबरला, बरोबर ?”

“हॊ, मीच सगळी व्यवस्था करतोय त्याची, जवळ जवळ ६० लोकांचे प्रत्येकी १,५००/- रुपये पण जमा झालेत ! आणि तुमच्या दोघांचे पैसे सुद्धा आलेत बरं का पावसाळी पिकनिकचे.”

” हॊ ना, मग हे सगळं शालनला सांगा !”

“मी कशाला सांगू सुनबाईला, तू नाही  सांगितलंस ?”

“सांगितलं ना ! पण तिचा विश्वास बसायला तयार नाही.”

“का ?”

“अहो आज सकाळी उठल्या उठल्या  मला म्हणते १,५००/- रुपये द्या आधी, मला सोसायटीच्या पावसाळी पिकनिकला जायचं आहे !”

“अरे पण तू तर सुनबाईचे आणि तुझे पिकनिकचे पैसे कधीच भरलेस, हे मी तुला आत्ताच सांगितलं ना ?”

“हॊ पंत, पण ती मला म्हणाली, तुम्ही माझे कुठे पैसे भरलेत पिकनिकचे ? तुम्ही तर त्या सटविला घेवून जाणार आहात ना पिकनिकला आणि लागली भांडायला.”

“आता ही सटवि कोण मोऱ्या ?”

“मालन !”

“कोण मालन ?”

“मला काय ठाऊक ?”

“अरे तू आत्ताच तीच नांव सांगितलंस ना मला मालन म्हणून ?”

“हॊ पंत, पण तुम्ही ते मला सांगितलंत म्हणून, मी ते नांव तुम्हाला सांगितलं.”

“असं कोड्यात बोलू नकोस मोऱ्या गधडया. मी कधी तुला सांगितलं मोऱ्या?”

“अहो पंत, तुम्ही या पावसाळी पिकनिकसाठी व्हाट्स अपचा एक वेगळा ग्रुप बनवला आहे आपल्या सोसायटीचा, हॊ की नाही ?”

“हॊ !”

“त्यात ज्या, ज्या लोकांनी पावसाळी पिकनिकसाठी पैसे दिलेत त्यांची नांव आणि इतर माहिती दिली आहे, बरोबर ?”

“अगदी बरोब्बर मोऱ्या !”

“इथंच लफड झालं पंत !”

“कसलं लफड ?”

“अहो पंत, तुम्ही माझ्या नावापुढे माझ्या बायकोच नांव म्हणून मालन असं टाकलं आहे, शालनच्या ऐवजी!”

“अच्छा, अच्छा असा घोळ झालाय तर !”

“पंत नुसता घोळ नाही, महाघोळ घातलाय तुम्ही. तुमच्या एका ‘शा’च्या ऐवजी ‘मा’मुळे ध चा मा करणाऱ्या आंनदीबाईच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात आणि मला आता ‘पंत मला वाचवा वाचवा’ असं गार्द्याऐवजी, शालन माझ्या मागे लाटण घेवून लागल्यामुळे ओरडायची वेळ आल्ये माझ्यावर, त्याच काय ?”

“त्यावर माझ्याकडे एक उपाय आहे मोऱ्या.”

“कोणता पंत ?”

“मी एक काम करतो, सुनबाईला फोन करून माझी चूक कबूल करतो आणि तू दुसरं एक काम कर.”

“काय ?”

“बायकांचा वीक पॉईंट काय सांग बघू.”

“नवीन साडी खरेदी, दुसरं काय.”

“बरोब्बर, म्हणून तू माझ्या चुकीमुळे तुला झालेला त्रास कमी करायला सुनबाईला नवीन साडीच प्रॉमिस करून टाक, म्हणजे बघ तिचा राग कुठल्या कुठे पळून जाईल ते !”

“म्हणजे हे बरं आहे पंत, चूक तुम्ही करायची आणि माझ्या खिशाला खड्डा !”

“खड्डा ? कसला खड्डा ?”

“अहो आता नवीन साडी घ्यायची म्हणजे तीन चार हजार गेले ना.”

“मोऱ्या, मी तुला काय सांगितलं ते तू नीट ऐकलं नाहीस.”

“अहो तुम्हीच सांगितलंत ना शालनचा राग घालवायला तिला नवीन साडी घे म्हणून ?”

“बघ तू परत चूक करयोयस.”

“कसली चूक पंत ?”

“मोऱ्या मी म्हटलं तिला नवीन साडी घ्यायच ‘प्रॉमिस’ कर, नवीन साडी कुठे घे म्हटलं ?”

“म्हणजे ?”

“अरे फक्त प्रॉमिस करायच, आपल्या नेत्यां सारखं ! त्याने सुद्धा सुनबाईचा राग जावून ती खूष होते की नाही बघ.”

“कमाल झाली तुमची पंत, आत्ताच घरी जातो आणि तुमचा उपाय अंमलात आणतो. येतो मी पंत. “

“जा वत्सा, तुजप्रत कल्याण असो !”

© प्रमोद वामन वर्तक

१९-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मूलाधार जगण्याचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ मूलाधार जगण्याचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

कांही शब्द अगदी सहज जरी कानावर पडले तरी आपल्या मनाला होणाऱ्या त्यांच्या स्पर्शाने मनात भावनांचे तरंग उमटतात. पण एखादाच शब्द असा असतो की त्याच्या स्पर्शाने मनात उमटणारे असे भावतरंग विविधरंगी असतात. रस हा शब्द भावनांचे असे अनेक रंग स्वतःत सामावून घेतच आकाराला आलेला आहे आणि म्हणूनच तो अल्पाक्षरी असला तरी अनेक अर्थाने बहुरंगी, बहुपेडी शब्द आहे असे मला वाटते.

रस म्हणजे चव, रुचि, गोडी, आवड. रस म्हणजे औत्सुक्य, कुतूहल, जिज्ञासाही. रस म्हणजे द्रव या अर्थाने जलांश, चीक, स्त्राव,अर्क, पाक असंही बरंच कांही. एका दोन अक्षरी छोट्याशा शब्दातल्या सहज सुचणाऱ्या अर्थांच्या या विविध रंगछटा !

रसद हा ‘अन्नपदार्थ’ किंवा ‘साधन’ या अर्थाचा शब्द रस या शब्दावरुनच तयार झाला असावा असे मला वाटते ते रस या शब्दाच्या अनेक अन्न/खाद्यपदार्थांशी असलेल्या जवळीकीमुळे. रस या शब्दाचं अन्नपदार्थांशी असणारं थेट नातं ध्वनित करणारी ‘रसगुल्ला’, ‘आमरस’ ,’सुधारस’ या सारखी मिष्टान्ने आणि सामीष आहारामधला सर्वप्रिय असा कोल्हापूरी तांबडा-पांढरा ‘रस्सा’ ही कांही प्रातिनिधिक उदाहरणे ! यातील मिष्ट पदार्थ असोत वा सामिष त्यांच्याशी चव, रुचि, गोडी,आवड यासारख्या रस या शब्दाच्या अर्थांचे थेट नाते तर चटकन् जाणवणारेच.

रस या शब्दाचं मला जाणवलेलं वेगळेपण हे की त्याच्या चव ,रुचि, गोडी, आवड या अर्थांची रसनातृप्तीशी असणारी सांगड ही एक बाजू असली तरी चव, रुचि, गोडी, आवड या अर्थांचा संबंध फक्त रसनेशीच नाहीय.  एखादा छंद आवडीचा असेल तर तो जोपासण्यात ‘रस’ असतो म्हणजेच ‘गोडी’ वाटते,एखाद्या कामात ‘रुचि’ असेल तर ते काम करणे कटाळवाणे म्हणजेच ‘बेचव’ वाटत नाही.जगणं असं आनंदी, तृप्त करणारं होण्यासाठी जगण्यात  ‘चव’, ‘रुचि’, ‘गोडी’, ‘आवड’ या अर्थाने ‘रस’ हा असायलाच हवा. एरवी ते ‘निरस’च होईल. यामुळेच रस हा जसा जिव्हेचा विषय आहे तसाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त तो जगण्याचा विषय आहे !

रस या शब्दाच्या अर्थांमधील अशा विविध छटांमुळे या शब्दातून निर्माण झालेली रसदार, रसरशीत, रसपूर्ण, रसभरित, रसहीन, निरस, रसाळ अशी अनेक विशेषणे भाषेचे सौंदर्य खुलवणारी आहेत.

गुणग्रहण, गुणदोष विवेचन, रसास्वाद, रसविमर्श, मूल्यमापन, परीक्षण, आलोचना, समीक्षा, टीका अशा विविध अर्थछटांनी युक्त असा ‘रसग्रहण’ हा शब्द, तसेच रसज्ञ (रसिक), रसपरिपोष किंवा रसवत्ता (कवित्व), रसज्ञता (अभिरुचि), रसवंती(वाणी), रसायन (सरमिसळ, औषध), रसभंग (विरस), रसोत्कर्ष (बहर) यासारखे विविधरंगी शब्दही रस या शब्दातूनच आकाराला आलेले आलेले आहेत. 

शृंगार, वीर, करुण, अद्भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र, शांत  हे मनातल्या भावना व्यक्त करणारे नवरसच नाहीयेत फक्त तर जीवनाशी असं अतूट नातं असलेले जीवनरसच आहेत. ही अशी रसयुक्त विविधता नसती तर जगणं निरस, कंटाळवाणंच झालं असतं. या अर्थाने हे वैविध्यपूर्ण, अनेकरंगी रस हे आपल्या जगण्याचे मूलाधारच म्हणायला हवेत!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares