मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्र क्षणांचे… सुश्री स्वाती महाजन -जोशी ☆ सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ मैत्र क्षणांचे… सुश्री स्वाती महाजन -जोशी ☆ सुश्री मीनल केळकर ☆ 

मैत्र क्षणांचे लिहून बरेच महिने उलटून गेले असतील. लोकलमध्ये भेटलेल्या काहीजणींच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न. या भेटलेल्या प्रत्येकीमुळे माझ्यात काही ना काही बदल झाला हे नक्की. बावीस वर्षांचा रोज सरासरी साडेतीन तास एवढे माझ्या लोकल प्रवासाचे आयुष्य आहे. आपण अजून जिवंत आहोत ना हे बघायचे असेल तेव्हा मी सरळ उठते आणि लोकलने कुठे तरी जाऊन येते. जाताना गर्दी नसेल अशी वेळ निवडायचे पण येताना अगदी चेंगराचेंगरीत लोकलमध्ये चढायचे. असा प्रवास आणि लोकलमधले वातावरण याने पुढील काही महिने जगण्याची ऊर्जा मिळते. पण करोनाने सर्वसामान्यांसाठी ट्रेनचा प्रवास बंद होता. तेव्हा काही कारणाने रेल्वे स्थानकाच्या आसपास जावे लागले. ती ओकीबोकी स्टेशनं बघून खरच भडभडून आले. 

लोकल बंद मग त्यावर अवलंबून असलेल्या फेरीवाल्या कुठे गेल्या असतील हा विचार मनात येत असतानाच डोळ्यांसमोर उमा आली. तिला अगदी ती तीन-चार महिन्यांची असल्यापासून मी ओळखते. एका अंध जोडप्याची मुलगी. ते जोडपे लोकलमध्ये भीक मागायचे. त्या दोघांची प्रेमकहाणी आणि लग्न या सर्वांची मी साक्षीदार होते. पण ते दोघे जरा तिरसट असल्याने इतरांप्रमाणे त्यांच्याशी कधी संवाद व्हायचा नाही. त्यांना मुलगी झाली. मग ती बाई त्या छकुलीला घेऊनच लोकलमध्ये येऊ लागली. फार गोंडस मुलगी होती. सर्व प्रवासी महिलांसाठी अगदी कौतुकाचा विषय होती. तिची आई खूप प्रोटेक्टिव्ह होती. तुमची मुलगी खूप गोड आहे हो असे मी एकदा तिला म्हटलं त्या क्षणी तिने आपल्या मुलीभोवतीची मिठी अजूनच आवळली. उमा नाव ठेवल्याचे थोडे दिवसांनी तिने मला आपणहूनच सांगितले. एक दिवस उमाच्या वडिलांनी विचारले, आमची उमा गोरी आहे का काळी? ‘ छान गोरी आहे. आणि तिचे डोळे खूप बोलके आहेत.’ हे ऐकताच ते दोघेही खूप खूष झाले. उमा मोठी होत होती. दोन वर्षांची असल्यापासून ती आईवडलांना कोणते स्टेशन आले ते सांगू लागली होती. आम्हालाही फार गंमत वाटायची. ती अतिशय हुशार होती. तीन वर्षांची झाल्यावर लोकलमधल्याच प्रवाशांनी आग्रह करून तिला शाळेत घातले. दोन वर्षे नियमित शाळा सुरू होती. तिला भाऊ झाल्यानंतर आईवडलांच्या मदतीसाठी उमाची  शाळा सुटली. भाऊ झाल्याचा तिला खूप आनंद झाला होता. गणेश नाव ठेवल्याचे तिने पूर्ण डब्यातल्या बायकांना सांगितले होते. तिच्या वयापेक्षा जास्त मोठी बनून ती  आपल्या भावाला सांभाळत होती. सोबत आणलेल्या बाटलीतले दूध नासले नाही ना हेही ती तपासायची. उमा-गणेश लोकलमध्येच मोठे होत होते. उमा पुन्हा शाळेत जाऊ लागली. पण काही महिन्यात शाळा सुटली. नेरूळचे तिचे घर पडले. ते घणसोलीला रहायला गेले. मग शाळा सुटली ती सुटलीच. आईवडलांना तर शाळा हा विषय बिनमहत्त्वाचा होता. पण उमाला शिकायची आवड होती. ती जेवढं शिकली होती, त्याचा ती सारखा सराव करायची. एक दिवस मला म्हणाली, “ मॅडम मला एबीशी शिकवा ना. तिला मी ए टू झेड अक्षरे एका कागदावर लिहून दिली आणि मग गिरवून घेतली. दोन दिवसांनी भेटली तेव्हा तिला अक्षर येऊ लागली होती.  मग लोकलवर चिकटवलेल्या जाहिरातीतील अक्षर ओळखण्याचा तिला नादच लागला. तिचे पालक भीक मागत तेव्हा ती दारात शांतपणे बसून  असे. एक दिवस रुमाल विकायला आणले.  सात-आठच होते पण ती आनंदात होती. मी विचारले कुठून आणले ग. एका ताईने तिच्याकडचे दिले. मला पैसे देणार आहे. एवढं सांगून घाईने निघून गेली. परत भेटली तेव्हा म्हणाली मला सगळे भिकाऱ्याची पोरगी म्हणून चिडवतात. मला आवडत नाही. काही माल विकायचा तर पैसे नाहीत. मग मी असाच माल विकून पैसे जमवणार आणि मी पण  वेगवेगळा माल विकणार. त्यावेळी तिचे वय फक्त आठ होते. मला खूप कौतूक वाटले. उमा खूप दिवसांनी भेटली. गणेशला आश्रमशाळेत घालणार असल्याचे सांगितले. तळेगावच्या  आश्रमशाळेची  माहिती तिला गाडीतल्याच कोणी तरी दिली होती. खूप खूष होती. काही दिवसांनी मी पण शिकायला जाणार, असेही तिने सांगितले. मध्येच एकदा सगळे तळेगावला जाऊन आले. जूनपासून दाखला झाला होता. भावाचे शिक्षण मार्गी लागणार याचा तिला खूप आनंद झाला होता. आपलेही शिक्षण सुरू होईल ही आशा होती. काही दिवस ती गाडीला दिसायची. नंतर ते सर्वचजण गायब झाले. गाडीत येणे बंद झाले. नक्की कुठे गेले कोणत्याच फेरीवाल्यांना माहित नव्हते. गणेशचे शिक्षण सुरू झाले असेल का? उमाच्या स्वप्नाचे काय? या प्रश्नांनी मी अस्वस्थ होते. जरी शिक्षण सुरू झाले असले तरी लॅाकडाऊनमध्ये पुन्हा बंद पडलं असेल. खरंच एक हुषार मुलगी, आपल्या भावावर आईसारखी माया करणारी बहीण, आणि वयापेक्षा जास्त प्रगल्भ असलेली मुलगी परत कधीच बघायला मिळाली नाही. आता एकदा जाऊन उमाला शोधणार आहे हे नक्की.  

लेखिका – सुश्री  स्वाती महाजन -जोशी

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोपीचंदन… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ गोपीचंदन… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

रुक्मिणी कृष्णाला विचारते ,” आम्ही तुमची येवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही. असे का ? “

कृष्ण काहीही उत्तर देत नाही.

एकदा कृष्णाच्या छातीत जळजळ होत असते. कृष्ण अस्वस्थ असतात. सगळे उपचार करूनही बरे वाटत नाही. वैद्यही हात टेकतात. रुक्मिणी कृष्णाला शरण जाते. “आता तुम्हीच उपचार सांगा. आम्ही ताबडतोब अमलात आणू.”

श्रीकृष्ण म्हणतात, ” जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ छातीवर लावा. मला बरं वाटेल. “

महालातील सर्व जण आपल्या पायाची धूळ द्यायला नाही म्हणतात. रुख्मिणी म्हणते, ” मी खरी भक्त आहे.पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ ? माझी योग्यताच नाही, सात जन्म मी नरकात जाईन.”

हळूहळू वार्ता द्वारकेत पोहचते. इकडे वेदना तर वाढतच आहेत. सर्वजण रुख्मिणीसारखाच विचार करतात. आणि चरणरज राजवाड्यावर पोहचत नाही. 

दवंडी पिटणा-यांना गावं वाटून देतात. सर्वदूर दवंडी पिटणारे जातात. एक जण गोकुळात जातो.

दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात, “ काय करायला लागेल ते सांगा ! “

“ एका घमेल्यात बारीक रेती आणलेली आहे .त्यात उभे रहायचे आणि सारी माती तुडवायची. आम्ही ही माती घेऊन प्रभूंच्या वक्षस्थळी लावू. मात्र माती तुडवणारा प्रभूंचा खरा  भक्त असला पाहिजे. यानेच दाह मिटेल.”

गोपी विचारतात, “ मग  रुख्मिणीमातेने असे नाही केले ?”

दवंडीवाला सांगतो,  ” प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईन. सात जन्म नरकात रहावे लागेल  असं त्या म्हणाल्या.”

सर्व गोपी तात्काळ म्हणाल्या, ” जर  श्रीकृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्ही सात जन्मच काय, शंभर जन्मही नरकात राहू. द्या ती माती  इकडे.” आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते.

पुढे ही माती श्रीकृष्णाच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह शमतो.

मित्रांनो हेच ते “गोपीचंदन”.  याने दाह कमी होतो.

संग्रहिका – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 7 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 7 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

वाली सुग्रीवचे युध्दाचं आव्हान स्विकारण्यास बाहेर येऊ लागला, त्यावेळी मात्र तारा निश्चयाने वालीला अडवण्याच्य दृष्टीने त्याच्या समोर आडवी येऊन, अत्यंत केविलवाणेपणाने, दिनवाणीपणाने यावेळी न जाण्याबद्दल त्याला विनवून अडवू  लागली. म्हणाली, “ही वेळ युध्दासाठी योग्य नाही. उद्या प्रातःकाळी युध्दास जावे, आता धोका आहे.” वाली हेटाळणीच्या स्वरात म्हणाला, ” सुग्रीवापासुन मला धोका….? अगदी हास्यास्पदच गोष्ट आहे. सुग्रीवासारख्या यतःकिंचित भेकडाचे जर मी आव्हान स्विकारले नाही तर संपुर्ण त्रिखंडांत भेकड वाली म्हणुन नामुष्की, दुष्किर्ती होईल. हे तुला चालेल का?”

तारा कळवळून वालीला म्हणाली, “स्वामी! आज सुग्रीव एकटा नाही. त्याच्या बरोबर अयोध्येचे वीर, पराक्रमी, सत्शील राजपुत्र राम-लक्ष्मण आहेत, ज्यांनी अनेक बलाढ्य राक्षसांचा वध करुन नायनाट केला. त्यांनी सुग्रीवाला त्याच्या कार्यात मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तुम्ही सुग्रीवाला कमी लेखू नका. तो सबल आहे. म्हणूनच विनवते, ही वेळ टाळावी. ह्या अशुभ वेळी जाऊं नये.”

वाली म्हणाला, “शुभ-अशुभ मी काही मानत नाही. सुग्रीवाने युध्दाचे अव्हान दिले, ते स्विकारणे माझे कर्तव्य आहे. त्याच्यामागे प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी त्याचा मागच्यासारखा पराभव करुन, त्याला लोळवून नक्की परत येईन.”

तारा म्हणाली, “सुग्रीव तुमचा लहान बंधु आहे. विनाकारण कशाला त्याच्याशी शत्रृत्व ठेवायचे? त्याचे तुमच्यावर किती प्रेम होते जाणत नाही का? त्याने राज्य परत केल्यावरही त्याचेवर आकसाने गैरसमजाने उगीचच संघर्ष कां वाढवायचा? निदान आतां तरी प्रेमाने, समझोत्याने त्याची रुमा त्याला परत करुन गुणागोविंदाने राहावे.”

वाली म्हणाला, “आता ते शक्य  नाही. त्याचा पराभव करुन रुमाला दाखवुन देतो की, तिचा पती किती नालायक आहे.”

त्यावर तारा म्हणाली, “असे नका हो वागू..! असे वावगे वागल्याने अनर्थ मात्र अटळ आहे. इतिहास साक्ष आहे, अहंकार व अत्याचाराची  अनेक उदाहरणे आपल्यापुढे आहेत. असे घडले आहे की, जय तर दूरच राहिला पण शेवटी मानहानी व पराभव पत्करुन धुळीस मिळावे लागले आहे.’

परंतु दुराग्रही, हटवादी वाली बधला नाही. उलट जास्तच चेकाळल्यासारखा होऊन पुढे जायला निघाला. ताराचे प्रयत्न विफल झाले, नाइलाज झाला तिचा. शेवटी म्हणाली, “जाताच आहात तर माझी एक इच्छा पुर्ण करुन तरी जा.”

ताराने आसन मांडले. त्यावर वालीला बसवुन पंचारतीने त्याचे औक्षण करतेवेळी तीने अपाद्विनाशक मंत्र म्हटला, पण तिच्या मंत्रातुन आज शक्ती निर्माण झाली नाही. पुढील घडणारे भविष्य तिला कळून चुकले. हे औक्षण अखेरचेच ठरेल याची तिला कल्पना आली. मोठ्या कष्टाने, विकल मनःस्थितीने वालीला निरोप दिला. वाली त्वेषाने निघून गेला.

ताराने अत्यंत शोक करीत मंचकावर धाडकन अंग टाकले. या पतिव्रतेला भविष्यांतील घडणार्यात घटनांची काळाने सूचना तीला दिली असावी.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पदर…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ पदर…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली 

आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या पदराची ओळख झाली.

पाजताना तिनं पदर माझ्यावरून झाकला,

आणि मी आश्वस्त झालो …

तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला

आणि मग तो भेटतच राहिला … आयुष्यभर… … 

शाळेच्या पहिल्या दिवशी –तो रुमाल झाला

रणरणत्या उन्हात –तो टोपी झाला,

पावसात भिजून आल्यावर –-तो टॉवेल झाला

घाईघाईत खाऊन खेळायला पळताना –तो नॅपकीन झाला

प्रवासात कधी –तो अंगावरची शाल झाला 

बाजारात भर गर्दीत कधीतरी आई दिसायची नाही

पण पदराच टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचो …

मग त्या गर्दीत –तो माझा दीपस्तंभ झाला

गरम दूध ओतताना –तो चिमटा झाला

उन्हाळ्यात लाईट गेल्यावर –तो पंखा झाला

निकालाच्या दिवशी –तो माझी ढाल व्हायचा.

बाबा घरी आल्यावर, चहा पाणी झाल्यावर, तो पदरच प्रस्ताव करायचा ….

‘छोटूचा रिझल्ट लागला…चांगले मार्क पडले आहेत.. एक-दोन विषयात कमी आहेत, 

पण …पण आता अभ्यास करीन असं म्हणतोय..बाबांच्या संतापाची धार बोथट होताना

मी पदराच्या आडून पाहायचो.. हाताच्या मुठीत पदराच टोक घट्ट धरून !

त्या पदरानेच मला शिकवलं…… कधी – काय – अन कसं बोलावं

तरुणपणी जेव्हा पदर बोटाभोवती घट्ट गुंडाळला तेव्हा त्याची खेच बघून आईने विचारलंच,

“ कोण आहे ती…नाव काय?? ”

लाजायलाही मला मग पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला.

 

रात्री पार्टी करून आल्यावर … जिन्यात पाऊल वाजताच,  दार न वाजवता … पदरानेच उघडलं दार.

कडी भोवती फडकं बनून …कडीचा आवाज दाबून …त्या दबलेल्या आवाजानेच  नैतिकतेची शिकवण दिली

पदराकडूनच शिकलो सहजता

पदराकडूनच शिकलो सौजन्य

पदराकडूनच शिकलो सात्विकता

पदराकडूनच शिकलो सभ्यता

पदराकडूनच शिकलो सहिष्णुता

पदराकडूनच शिकलो सजगता

काळाच्या ओघात असेल, अनुकरणाच्या सोसात असेल, किंवा… स्वतःच्या “स्व”च्या शोधात असेल,

साडी गेली… ड्रेस आला 

पँन्ट आली… टाॅप आला

स्कर्ट आला… आणि छोटा होत गेला

प्रश्न कपड्याचा नाहीच आहे ,

प्रश्न आहे तो,……  आक्रसत जाऊन , गायब होऊ घातलेल्या पदराचा !

कारण पदर हे पद नसून , जन्मभराची फक्त आणि फक्त  जबाबदारी आहे . आणि ती जाणीवपूर्वक व नि:स्वार्थपणे – पेलू शकते केवळ आई ! 

खरं तर – शर्टालाही  फुटायला हवा होता पदर …

पण खरं सांगू … शर्टाला तो झेपणार नाही !!!

 

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वारकर्‍याची श्रीमंती… ☆ संग्राहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वारकर्‍याची श्रीमंती… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆ 

वारकर्‍याची काळजी पांडुरंग घेतो असे म्हणतात. खरोखर हे खरे असेल का ? नेमकी  वारकर्‍याची श्रीमंती कोणती ? तर ती असते त्याची पांडुरंगावरची श्रद्धा.

नोकरी निमित्त फिरतीवर असायचो. तेव्हा कंपनीच्या गाडीने महाराष्ट्रात  फिरण्याचा योग यायचा.

असाच एकदा सोलापूर -जत मार्गे  कोल्हापूरकडे येत होतो. आषाढी एकादशी संपून ५-६ दिवस झालेले  होते. वारकरी मंडळी आपापल्या मार्गाने घरी परतत होती. सकाळी  सोलापूरहून लवकर निघालो होतो. सांगोला सोडलं होतं. भूक लागलेली होती. बरोबर दोघे assistant होते. त्यांनी सुचवलं एखाद्या ढाबा वजा टपरीवर नाष्टा चहा चांगला मिळेल. ९.३० चा सुमार. मंडळींनी गाडी एका ढाबा वजा टपरी जवळ थांबवली. उतरलो, पाय मोकळे केले आणि नाष्ट्याला काय विचारपूस केली. कांदे पोहे, उसळ पाव आणि चहा काॅफी अशी ऑर्डर दिली. २०-२५  मिनिटे लागणार होती. ऊन खात उभे होतो.

तेव्हढ्यात एक  60 – 65 वयाचं वारकरी जोडपं चालत चालत  आमच्याच टपरीपर्यंत आलं. अंगावरचा एकही कपडा धड नाही. बाईंच्या डोक्यावर तुळस आणि खाकेत एक बोचकं. बाबांच्या डोकीवर एक बोचकं नी खांद्यावर एक भली मोठी पिशवी. पायताणं यथा तथाच .बरीच दमलेली वाटत होती. टपरीच्याच बाजूला सारं सामान उतरवून ठेवत  जमिनीवरच बसले.

मी आपलं सहज कौतुकाने विचारपूस केली. मंडळी वारी वरूनच परतत होती. मी विचारलं नाष्टा करणार का  ? बाबांनी एकदा बाईकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. मी सहज सुचवलं- बाबांनो पोटभर खाऊन घ्या. मला उगीचच वाटलं, चला तेव्हढच पुण्य . मी बाबांना विचारलं,” वाटेत चालता चालता काय करता ?” ते म्हणाले,

“ कधी अभंग तर कधी पाडुरंगाचं नाव घेत जातो. म्हनजे अंतर कसं पार झालं उमगत नाय. “

मी आपली विनंती केली की एखादा अभंग ऐकवाल का  ? बाबांनी क्षणाचा विलंब न लावता अभंगाला सुरुवात केली आणि बाईंनी टाळावर साथ दिली. खरंच वेळ कसा गेला समजलंच नाही.

नाष्ट्यावर ताव मारला. त्या वारकरी जोडप्याला आग्रहानी आमच्या बरोबर बसवलं. सहज चौकशी केली की अजून यांना घरी पोहचायला किती दिवस .लागतील ? तर कळले की अजून ४-५ दिवस. निरोप घेण्याची वेळ आली. आम्ही त्यांचे आणि त्यांनी आमचे  आभार मानायचे सोपस्कार पार पडल्यावर निघालो.

सहज मनात आले की यांना घरी पोचायला अजून ४-५ दिवस आहेत. त्यांना काहीतरी मदत करूया. वारकरी बाबा आणि बाईंना थांबवलं आणि 100 रुपयांची नोट त्यांना मदत म्हणून पुढे केली. बाबांनी अदबीने मदत नाकारली. मला आश्चर्य वाटले. न राहवून मी विचारले, “ का ?”

बाबांनी उत्तर दिलं –

“वारीला निघताना घरून एक छदाम घेतला नाही. आत्ता या क्षणालाबी खिशात छदाम नाही. पूर्ण वारी तो पांडुरंगच आम्हा जिवांची काळजी घेतो की. त्यापुढे दादा तुमची ही १०० रुपयांची नोट आमच्या काय हो कामाची. “

मी अवाक झालो. क्षणभर काय react व्हावं मला सुधरत नव्हतं. केवळ सुन्न. क्षणात मला माझी लायकी समजली, डोळ्यातून खळ्ळं आसू आले आणि मी त्या माउलीच्या पायावर डोकं ठेवलं.

सुमारे 30 वर्षांनंतर………

आज जवळपास 30 वर्षांनी ही घटना आठवली आणिक सारा क्रम आणि संवादातील शब्द नी शब्द परत ताजे तवाने होउन डोळ्यासमोर फिरू लागले.

त्या वारकरी बाबा आणि बाईंच त्यावेळचं वय आज माझं होतं. आज माझ्याकडे सगळं आहे. घर, गाडी, उर्वरित आयुष्य बर्‍यापैकी सुखात पार पडेल एव्हडी व्यवस्था. तरीही मला उद्याची निश्चिंती नक्कीच नाही. पण मग त्या वारकरी बाबांना अंगावर धड कपडे नाहीत, धड अंथरूण पांघरूण बरोबर नाही. वेळ पडली तरी खिशात छदाम नाही. असं असून सुद्धा एक emergency साठी म्हणून मी पुढे केलेले १०० रुपये सुद्धा हा भला माणूस अव्हेरतो, आणि प्रचंड आत्मविश्वासानी सांगतो की माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी तो पांडुरंगच करेल. त्याला आयुष्यात कसलीही पुंजी  करून ठेवावं असं नाही वाटलं कारणं त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी. त्यामुळे त्याला ना उद्याची भ्रांत ना आयुष्याची चिंता.

ती त्याची श्रीमंती पाहिली आणि  नजर स्वतः कडे वळली. त्यांनी शाश्वत श्रद्धेची नी भक्तीची पुंजी जमवली आणि मी अशाश्वत पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिलो.

— हे परमेश्वरा अजूनही वेळ गेलेली नाही. त्या वारकर्‍याची श्रद्धा आणि भक्ती मला सुद्धा जमवता यावी अशी बुद्धी मला दे, हीच कळकळीची प्रार्थना तुझ्या चरणी.

संग्रहिका –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ सासूचा हॅपी बर्थडे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 सासूचा हॅपी बर्थडे ! 😂💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“अगं काय हे सुनबाई ? निदान आज तरी माझ्या चहात साखर घालायलाचीस ! आज काय आहे विसरलीस वाटतं ?”

“माझी अजून तुमच्या सारखी साठी थोडीच झाल्ये विसरायला ?”

“नाही नां, मग ?”

“आई, आज तुमचा एक्सष्टावा  वाढदिवस आहे, हे माझ्या चांगलं लक्षात आहे आणि म्हणून तर रोजच्या अर्ध्या कप चहा ऐवजी तुम्हांला आज चांगला पाऊण कप चहा दिला आहे ! अर्ध्या कप चहावर पाव फ्री ! एंजॉय युअर बर्थ डे !”

“अगं पण सुनबाई मला तर पाव कुठेच दिसत नाही या चहा बरोबर !”

“आई, मला असं म्हणायचंय की रोजच्या अर्धा कप चहावर पाव कप चहा फ्री !”

“पण त्या पाव कप एक्सट्रा चहा ऐवजी, थोडी साखर घातली असतीस आज चहात, तर तुझे हात काय मोडणार होते का गं ?”

“अजिबात नाही आई, पण डायबेटीसमुळे मी तुम्हांला रोज इन्शुलीनच इंजेकशन देते, हे विसरलात वाटतं तुम्ही ?”

“मी बरी विसरेन ! माझ्या सासूबाई होत्या, तेंव्हा मला येता जाता टोचून टोचून बोलायच्या आणि आज माझी सून मला तोंडाने नाही पण इंजेकशनच्या सुईने रोज टोचत्ये ! काय माझं मेलीच नशीब ! मला कोणाला टोचून बोलायचं भाग्यच मिळाल नाही या जन्मात !”

“पण तुम्ही मला अधून मधून जे तीरकस बोलता, ते आणखी काय वेगळं असतं का हॊ आई ?”

“ते जाऊदे, मला सांग निदान आज तरी माझ्या चहात थोडीशी एक दोन चमचे साखर का नाही घातलीस ?

तेवढ्याने का होईना, पण माझ्या आजच्या स्पेशल डेची सुरवात गोड झाली असती !”

” ए sss क  दो sss न चमचे साखर  मी तुमच्या कपात घालायची आणि विलासचा ओरडा खायचा ?”

“अगं त्याला कसं कळेल तू माझ्या  चहात साखर घातल्येस ते ? ती तर विरघळून जाणार नां कपात !”

“ते जरी खरं असलं, तरी माझ्या मनांत ते कसं राहील आई ? आपल्या बायकांची जीभ पोटात कमी आणि ओठात जास्त ठेवते, हे, मी का तुम्हांला सांगायला हवं ?”

“म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सुनबाई ? माझ्या पोटात काही रहात नाही म्हणून ?”

“मी तुमच्या पोटात असं कुठे म्हटलं ? एकंदरीत बायकांच्या बाबतीत एक जनरल स्टेटमेंट केलं इतकंच !”

“पुरे झालं तुझं पोटात आणि ओठात ! मला सांग आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय सरप्राईज देणार आहात तुम्ही सगळे ?”

“बघा, स्वतःच म्हणता सरप्राईज आणि वर विचारता पण कसलं सरप्राईज म्हणून ?”

“अगं सांग गपचूप तू मला ते सरप्राईज. ते मिळाल्यावर मी चकित झाल्याचा अभिनय नक्की करीन, तू अजिबात काळजी करू नकोस !”

“बघा हं, नाहीतर मला तोंडघाशी पाडालं.”

“तू काळजीच करू नकोस सुनबाई, कसा मस्त अभिनय करते बघ संध्याकाळी ! हां आता सांग काय सरप्राईज आहे ते !”

“आजच्या तुमच्या एकसष्टीच्या निमित्त, या वर्षीच्या तुमच्या बर्थडे केकवर ६१ मेणबत्या लावायचं आम्ही ठरवलंय आणि तो केक दरवर्षी सारखा शुगरलेस नसणार ! काय, कसं वाटलं आमचं सरप्राईज ?”

“चुलीत घाला त्या सरप्राईजला !”

“म्हणजे काय आई, आवडलं नाही का  सरप्राईज ?”

“अगं त्यातली एकच गोष्ट बरी आहे म्हणायची !”

“कोणती ?”

“या वेळचा केक शुगरलेस नसणार आहे, ती !”

“मग झालं तर !”

“अगं हॊ, पण त्या केकवरच्या ६१ मेणबत्या फुकर मारून विझवता विझवता माझा म्हातारीचा जीव जाईल त्याच काय ?”

“अहो आई तुम्हीं अजिबात काळजी करू नका त्याची, आम्ही सगळे तुम्हांला मदत करू नां त्या मेणबत्या विझवायला !”

“नकोच ती भानगड सुनबाई ! त्या पेक्षा तुम्हीं या वर्षी माझी तुला करा !”

“हां ही आयडिया पण छान आहे, मी सुचवते विलासला तसं. पण कशानं करायची तुला तुमची ?”

“अगं सोप्प आहे, ६१ किलो वजनाची मिठाई सगळ्या सोसायटीत वाटून टाका, म्हणजे झालं !”

“अहो पण आई, तुला म्हणजे वजन काट्याच्या एका पारड्यात तुम्हीं बसणार आणि दुसऱ्या पारड्यात तुमच्या वजना इतकी मिठाई तोलायची बरोबर नां ?”

“हॊ बरोबर !”

“पण मग ते कसं जमणार आई ?”

“का, न जमायला काय झालं?”

“अहो आई तुमचं वजन आहे ८५ किलोच्या आसपास आणि मिठाई तोलायची ६१ किलो ! हे गणित काही जुळत नाही ! शिवाय एवढा मोठा वजन काटा आपल्याला फक्त लाकडाच्या वाखारीतच मिळेल आणि अशी लाकडाची वखार आता मुंबईत शोधायची म्हणजे…… “

“सुनबाई कळली बरं तुझी अक्कल आणि तुझं गणित पक्क आहे ते !”

“आहेच मुळी! मग आई आता कसं करायच म्हणता तुमच्या वाढदिवसाचं ?”

“काही नाही, माझ्या बाबुला म्हणजे तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि सांग  या वेळचा केक पण शुगरलेसच आण हॊ आणि त्यावर एकही मेणबत्ती नको म्हणावं !”

© प्रमोद वामन वर्तक

२२-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 5 आणि 6 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 5 आणि 6 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

भाग – ५

वालीचे अन्यायाचे वागणे पाहुन, तारा वालीला म्हणाली, “स्वामी! मतंगऋषींचा शाप आधीच डोक्यावर आहे, त्यात पतिव्रता रुमाचा शाप कां घेता? या मोठ्या पापातून सुटका होऊ शकणारा नाही. हा अविचार सोडून द्या.” पण वालीला ऐकायचे नव्हते, ऐकलेच नाही त्याने. विनाश काले विपरीत बुध्दी..

तारा ही अत्यंत सुंदर, गुणी स्त्री होती. वालीमधील शौर्य, पराक्रम, धाडस अशा त्याच्या अनेक चांगल्या गुणांवर लुब्ध होती. त्याच्यातील गुणांची तिला पारख होती. त्याबद्दल तिला अत्यंत सार्थ अभिमानसुध्दा वाटत असे. परंतु वालीचा आत्यंतिक संतापी, हेकट, अन्यायी, दुर्गुणाकडे कल असणार्याद स्वभावाने तिच्या मनाला सतत काळजी वाटे.  हे सर्व पाहुन तिच्या मनांत विचार आला, ‘सुग्रीवाला अधीक दुःख कशाचं झालं? राज्य गमावल्याचं की, पत्नी गमावल्याचं? रुमाच्या बाबतीत ते घडल! शेवटी दुर्दशा भोगावी लागते स्त्रीजातीलाच ना?

राक्षसांचा सम्राट लंकाधीश रावणाने सर्व  राजांना जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने प्रत्यक्ष देवराज इंद्रावर स्वारी केली. त्याच्या मुलाने, मेघनादने इंद्राला जिंकले. सर्व राजांना जिंकण्याच्या अभिलाषेने वालीवर देखील आक्रमण केले. पण वालीचा पराक्रम व अतुल ताकद, युध्दकौशल्य एवढे जबरदस्त होते की, रावणाला शस्त्र खाली ठेवुन त्याला शरण जाऊन शस्त्र खाली ठेवावे लागले.

रावणासारख्या बलाढ्य व प्रबळ शत्रुला देखील नमवून आपला पती वालीने त्याला शरण येण्यास भाग पाडले याबद्दल ताराच्या मनांत नितांत, आदर व कौतुक होते आणि म्हणूनच त्याच्या गुणांचे चीज व्हावे, तो सन्मार्गावर यावा यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची पण यश तिच्यापासुन नेहमीच दूर पळत असे. वाली तिचे कांहीच ऐकत नसे आणि आपल्या हेकट, दुराग्रही स्वभावात बादल करत नसे.

एकदा तारा आपल्या महालांत निवांत बसली असता तिचा पुत्र अंगद येऊन सांगू लागला की, “तो मित्रांसोबत मतंगवनाच्या आजुबाजुला हिंडत असतांना त्रृषमूक पर्वतावर सुग्रीव काका दिसलेत. त्यांच्या मागे वीर हनुमान उभे असुन दोन सुंदर तेजस्वी राजकुमार त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने गप्पा मारतांना दिसले. गुप्तहेरांकरवी चौकशी केली असतां दोन राजकुमार म्हणजे प्रत्यक्ष अयोध्या नरेश दशरथ यांचे दोन सुपुत्र असल्याचे कळले.       

श्रीरामाची पत्नी सीताचे हरण करुन लंकाधीशपती सम्राट रावणाने तिला लंकेत नेऊन ठेवले आहे.  तिच्या शोधार्थ हे दोन वीर हिंडत हिंडत तिथे आलेत. त्यांची सुग्रीव काकांशी मैत्री होऊन दोघांनी परस्परांना मदत करण्यासाठी अग्निसमोर आणाभाका, शपथ घेऊन वचनबध्द झालेत.

भाग – ६

श्रीराम-सुग्रीवाची युती झाल्याचे वृत्त ताराने ऐकले मात्र ती अतिशय संचित झाली. अंगदला म्हणाली, “अंगदा! तुझ्या वडलांना अनेक वेळा परोपरीने विनवून सांगीतले की, रुमादेवीला सुग्रीवाकडे पाठवुन द्यावे, परस्त्रीचे अपहरण करणे, तिची अभिलाषा धरणे फार मोठे पाप आहे. अशा पापाचे घोर प्रायश्चित्त भोगावेच लागेल. पण हटवादी स्वभावामुळे माझ्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.”

अंगद म्हणाला, “आई! श्रीराम देवासमान सुंदर, दयाळू, करुणामयी वाटतात.” ती म्हणाली, “श्रीरामाबद्दल सर्व माहित आहे मला.  श्रीराम हे आर्त, दुःखी जणांचे आश्रयदाते आहेत. ते यशस्वी, ज्ञानविज्ञान संपन्न, पित्याच्या आज्ञेत राहणारे आहेत.  हिमालय ज्याप्रमाणे अनेक रत्नांची खाण आहे, त्याप्रमाणे श्रीराम अनेक गुणांची खाण आहेत. असे श्रीराम सुग्रीवाचे झाले तर…. तुझ्या पित्याचा भविष्यकाळ फार गंभीर  आहे. भविष्यातील संकटाची चाहुल लागत आहे.”

तारा अतिशय विकल मनःस्थीतीत अंगदाला म्हणाली, “अंगदा! तुझ्या वडिलांमधे अनेक सद्गुण असून ते फार पराक्रमी, शूर, धाडसी आहेत. ते वानराचे राज्य उत्तम रितीने चालवत आहेत म्हणूनच आज ते सर्व वानरांचे सम्राट आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांनी कांही नीतिनियम पाळले असते, कांही धर्म मर्यादा मानल्या असत्या, तर त्यांच्यासारखा पुरुषोत्तम दुसरा कुणी नसता आणि माझ्या सारखी भाग्यवान स्त्री  त्रिभुवनात दुसरी कुणी नसती! परंतु  विधिलिखीत कुणाला टळले आहे? मातंग ऋषींचा अपमान व शाप, रुमासारख्या पतिव्रतेचा छळ, तिचा तळतळाट, माझ्या संसारसुखा भोवती एखाद्या काळसर्पाप्रमाणे वेटोळे घालुन बसला आहेसे वाटत आहे…..

सुग्रीवाने आपली अत्यंत करूणामय कर्मकहाणी श्रीरामांना सांगून म्हणाला, “हे प्रभु! तुझी पत्नी रावणाने पळवली आणि माझी पत्नी माझ्या मोठ्या भावाने वालीने! शिवाय राज्यातुन निष्कसित केले. माझी अवस्था दोर तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे.” श्रीरामाने सुग्रीवाला आश्वस्त केले. दोघांनी एकमेकांना मदत, सहाय्य करण्याच्या आणाभाका घेऊन आपापल्या समस्या सोडविण्याचे ठरविले.

सुग्रीव रामाला म्हणाला, “वाली भयंकर कोपिष्ट, शिघ्रकोपी, हट्टी व बलाढ्य आहे. त्याचा उच्छेद झाल्याशिवाय माझा मार्ग निष्कंटक होऊ शकणार नाही. तो सुखाने जगू देणार नाही.”

ताराला मिळत असलेल्या भविष्यातील घटनेच्या भाकिताप्रमाणे ती काळरात्र आलीच. रामाने द्वंद्व युध्दासाठी वालीला आव्हान द्यायला सुग्रीवाला सांगीतले. रामाच्या आज्ञेनुसार एका रात्री सुग्रीव किष्किंधेच्या परिसरांत येऊन दंड थोपटून मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत, सिंहनाद करत वालीला आव्हान देऊ लागला. यावेळी वाली ताराबरोबर अंतःपुरात होता. सुग्रीवाचा आव्हानात्मक आवाज ऐकुन प्रथम तर त्याला अतिशय आश्चर्य वाटले. सुग्रीव सारखी साधी, सालस, व्यक्ती युध्दाचे आव्हान देते, हेच मुळी त्याला खरे वाटत नव्हते. नंतर तो अत्यंत संतप्त होऊन, धडा शिकवण्याच्या निश्चयाने सुग्रीवाचे आव्हान स्विकारण्यासाठी अंतःपुरांतुन बाहेर येऊ लागला.

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 2 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 2 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

(तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!) इथून पुढे —-

थंडीच्या दिवसात बासुंदी…. उन्हाळ्यात श्रीखंड.. आम्ररस… असे. बदलत्या ऋतूप्रमाणे पदार्थ बदलत असत. त्या गंजाशेजारील वाटीत… मैदा दुधात भिजवून केलेल्या नाजूक “वळवटाच्या खिरीची” वाटी.. त्याच्याबरोबरच हाटून एकजीव केलेली “वरणाची” वाटी असायची.! त्याशेजारी ओल्या नारळाचं सारण घातलेल्या “करंज्या”… मुरडीचे पुरणाचे “कानवले”…. अन राहिलेल्या मोकळ्या जागेत… लाल तिखट- मीठ- ओवा घातलेली खुसखुशीत तिखट चव असणारी “भजी”.. अन त्याच पिठात थोडा चिंचगुळाचा कोळ घालून तळलेली हिरव्यागार पानांची “आळूवडी” …! या सर्व पदार्थांवर टप्पोरी तुळशीची पानं ठेऊन “शुद्ध” केलेला … “महानैवेद्य”.. !

या महाप्रसादानंतर हिरव्यागार पाच पानांचा, चुना- कात- सुपारी- बडीशेप- साखर- वेलदोडा- खोबऱ्याचा खिस- ज्येष्ठमध घालून, त्या पानांची विशिष्टप्रकारे घडी घालून लांबसडक लवंगेने बंद केलेला त्रयोदशगुणी “विडा” मुखशुद्धीसाठी असायचा…! असा पंचपक्वान्नाचा.. “साग्रसंगीत”… गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, कडू ..या “आयुर्वेद शास्त्रावर” परिपूर्ण अवलंबून असणारा “षडरस”युक्त.. “महानैवेद्य” खाण्याचं परमभाग्य अनेकवेळा वाट्याला आलं…!

हा “महानैवेद्य” खाण्याचा योग पंढरपूरात वास्तव्यास असणाऱ्या अनेकांच्या नशिबी आला… काहींनी याचा आनंद रोज घेतला असेल. हा नैवेद्य खाऊन संपल्यावर ती सर्व प्रासादिक भांडी मीठ- लिंबाने घासून लखलखीत करून त्या रेशमी कापडात गुंडाळून देतानाचा “भाव” एखादी षोडशोपचारे पूजा केल्याच्या तोडीचा होता.

पूर्वी “महानैवेद्य” बडवे- उत्पातांच्या घरी एखादी “माऊली” करायची… आता मंदिराच्या मुदपाकखान्यात हा “नैवेद्य” केला जातो..!

या “महानैवेद्या”च्या प्रसादाबरोबर.. सकाळच्या न्याहरीसाठी ..आंबूस-गोड तसेच लवंग-दालचिनीच्या चवीची हिंग- जिरे- कढीपाल्याची साजूक तुपाची फोडणी घातलेली गरमागरम “कढी” अन… मऊसूत मूगडाळ- तांदळाची…. वरून भरपूर कोथिंबीर- खोबरं… मधोमध साजूक तुपाची वाटी अन वर तुळशीचं पान घातलेल्या “खिचडी”ची चव… अवर्णनीय असायची. त्याचाही कित्येकवेळा लाभ झाला. कधी कधी मधूनच सकाळी ‘रामभाऊ बडवे’ सारख्या एखाद्या “सेवाधारी” मित्राचा फोन यायचा… “मन्द्या… आज “पांडुरंगाचा” दिवस घेतलाय … किटली घेऊन ये… महापूजेचं “पंचामृत” देतो..”… ते अस्सल दूध, दही, तूप, पिठीसाखर, मध, अन वरून तुळशीची पानं घालून केलेलं प्रासादिक ‘पंचामृत’ तांब्याभर प्यायल्यावर २ -४  तास भुकेची जाणीवसुद्धा व्हायची नाही. घरातल्यांनी पोटभर पिऊन राहिलेल्या पंचामृताचे “धपाटे” पुढे दोन दिवस टिकायचे… असा “प्रसाद”.. पोटभर पुरायचा. नुसत्या “महानैवेद्या”च्या ताटावरून कापड बाजूला केलं तरी… पहाटेपासून स्वयंपाकघरात स्वयंपाक केल्यासासारखा “सुवास” घरभर पसरायचा…! “पंचामृताच्या” किटलीचं झाकण उघडलं तरी त्यातील तुळशीच्या घमघमाटानं “गाभाऱ्यात” असल्याचा भास व्हायचा..!

एखाद्यावेळी थंडीच्या दिवसात थंडी बाधू नये म्हणून … “देवाला” दाखवलेला “सुंठ- लवंग- तुळशी”बरोबर अनेक औषधी वनस्पती घालून केलेला आयुर्वेदिक “काढा” घेऊन जायचा आग्रह एखादा मित्र करायचा…! उन्हाळ्याच्या दिवसात आपल्यासारखीच “देवाच्या” अंगाची ‘तलखी’ होऊ नये म्हणून भल्या मोठ्या “सहाणेवर” उगाळलेला “रुक्मिणी- पांडुरंगाच्या” मूर्तीला लेप दिलेला “चंदन उटीचा” चंदनाचा गोळा कागदात गुंडाळून एखादा मित्र द्यायचा. त्या गोळ्यातील एखादा तुकडा काढून पाण्यात कालवून कपाळावर थापल्यावर मिळणारा “थंडावा” बरेच वेळा अनुभवलाय. काही काळ मूर्तीच्या अंगावर थापलेला लेप औषधाइतकाच गुणकारी आहे. बऱ्याच जणांच्या देवघराच्या एखाद्या कोनाड्यात हा पांडुरंग-रुक्मिणीच्या मूर्तीवरील “थंडावा” कागदाच्या पुरचुंडीत गुंडाळून जपून ठेवलेला असेलही…! या सगळ्या गोष्टी आम्ही पंढरपूरकरांनी “महानैवेद्या” इतक्याच “प्रासादिक” मानल्या…!

एवढं वाचल्यावर … एखाद्या निर्जीव दगडाच्या मूर्तीसाठी एवढ्या पक्वान्नांचा सोस कशाला…? असा प्रश्नही एखादा उभा करेल. पण एवढं भरलेलं ताट बघून “किती… अन काय काय खावं..?”… असा प्रश्न न पडता… “काय खावं अन कसं खावं..”… याचं  उत्तर मिळालं.

ते भरलेलं “नैवैद्या”चं ताट बघून “डाव्या” बाजूचे आंबट- तुरट- खारट- तिखट- कडवट पदार्थ कमी प्रमाणात खावे… अन “उजव्या” बाजूकडील गोड पदार्थ “डाव्या”पेक्षा थोड्या जास्त प्रमाणात खावे, हे सूत्र या ताटावरून सांगितल्यासारखं वाटतं…!

समाजामध्ये वावरताना “डावं-उजवं” समजण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो…. हे आपलं माझं अडाणी तत्त्वज्ञान…! सांप्रत परिस्थितीत आपल्याला जे शक्य आहे त्याचा “नैवेद्य” दाखवावा या मताचा मी पण आहे. त्यासाठी अट्टाहास करायची गरज नाही. नुसत्या “शर्कराखंडखाद्यानी…” एवढ्या एखाद्या साखरेच्या दाण्यावर… भक्तवत्सल “विदुराच्या” हुलग्यावर… “चोखोबारायांच्या” शिळी भाकरी अन गाडग्यातल्या दह्याच्या दही- भाकरीच्या “काल्यावर” ही प्रसन्न होणारा आमचा “वासुदेव” आहे..! फक्त “नामदेव- चोखोबां”च्या ठायी असलेली आर्तता आपल्या अंगी आणण्याची गरज आहे. तेवढी आर्तता यायला आपल्यासारख्या मर्त्य जीवांना हजारो जन्म घ्यावे लागतील. तोपर्यंत …. ताटातली पोळी श्वानाच्या वेशात असणाऱ्या “भगवंताने” हिसकावून नेली तरी … नुसत्या कोरड्या पोळीने पोट दुखेल म्हणून.. त्याच्यामागं तुपाचं तामलं (एक भांड्याचा प्रकार) घेऊन पळत सुटणाऱ्या “संतश्रेष्ठ नामदेवरायांच्या” इतकी भाबडी सजगता अंगी आली की… एकमेकांच्या “भुकेशी” तरी आपण एकरूप झाल्याचं समाधान लाभेल…!

बाकी आपण दाखवलेला “नैवेद्य” प्रत्यक्ष “भगवंतानं” जेवण्याइतकी आपली “हाक” मोठी नसली तरी… आर्त भावनेने… कधीतरी सणावारी केलेलं साग्रसंगीत “नैवेद्याचं” ताट उचलून देवाच्या तोंडापुढं धरून खाली ठेवताना … वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेनं म्हणा…  किंवा धक्क्यानं म्हणा…  देवाच्या डोक्यावर असणारं टप्पकन खाली पडणारं  एखादं फुल असू दे..  किंवा.. एखादी ढासळणारी भाताची मूद…  अथवा त्या मुदेवरून खाली घरंगळणारं  “तुळशीचं पान”… जरी पडलं तरी…  “खाल्ला बाबा देवानं नैवेद्य…!” —  अशी “देऊळ सताड उघडं” असतानाही…  अन “देऊळ बंद” असतानाही आपली भाबडी समजूत करून घेणारा … आधुनिक काळातील पाडगावकरांच्या भाषेत… “भावभोळ्या भक्तीची ही एकतारी…. भावनांचा तू भुकेला रे मुरारी…”.. म्हणणारा… भगवंतापुढं त्याच्या इतकीच गेली “अठ्ठावीस युगं” त्याच्या पायाशी बसणारा….. साधा-भोळा…”पंढरीचा वारकरी” आहे…  असा विचार मनात चमकून जातो … अन अंगावर शहारे येतात…!

— समाप्त —

लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर

पंढरपूर, मो. 9422380146

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानोबा तुकाराम –भाग– 3–लेखक– श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 3 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

(आश्चर्यमुग्ध महर्षी नारदाचा भाव त्या महान व्यक्तीच्या मुखावर आता प्रगटला होता. ) – इथून पुढे —-

देव भक्ताची पूजा करतो हे ज्ञात होतं. देव भक्तासोबत नाचतो, गातो, खेळतो हेही ज्ञात होतं. कारण कृष्णावतारात वृंदावनी गोपगोपिकांबरोबर त्याने महा रासगरबा केला होता. गोपांसवे यमुनातटी अन् विष्णुपदी शिदोऱ्या एक करून काला करून खाल्ला. एकमेकांना खावू घातला होता, हे सगळ्यांनाच माहीत होतं. सारे लोक नवविधभक्तीतून भगवंत पूजन करतात. पण भगवान भक्तीचा भुकेला, भक्तांचा भुकेला आहे.  तो भक्तांचे पूजन करतो.. त्याचे गुणवर्णन ऐकतो. नव्हे स्वतः त्याचे नाव घेऊन भावविभोर होऊन नाचतो, हे त्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांनी पाहिलं. डोळ्यांवर विश्वास बसेना. आपण काय पाहतो ते समजेना. पण ते सारं डोळ्यासमोर घडत होतं .नारदांनी केवळ बसून भक्ताची पूजा करताना पाहिलं होतं. आपण भक्ताचा नामघोष करत नर्तन करताना पाहतो आहोत  याचा आनंद झाला.  देव नाचतो याची गंमत वाटली. आणि तेही भक्तनावाचा जप करीत नाचतो याचं आश्चर्य वाटलं. 

मगापर्यंत आजचे देवदर्शन चुकले याची चुटपुट होती, पण आता सगळे बदलले. आनंद, परमानंद झाला. सुखाच्या अत्युच्च शिखरावर स्वार झाल्यासारखं वाटू लागलं. आपण काही आगळेवेगळे पाहिल्याची ऐकल्याची भावना हृदयात प्रज्वलित झाली. जीव तृप्तला. समाधान पावला. अमृतपानाहूनही हे भक्त-नामामृत रसपान अद्भुत होतं. ते पाहिल्याचं समाधान होतं. ते अनुभवल्याचा आनंद होता. परमानंद होता..

आज देवदर्शन मुकले नाही तर खरं देवदर्शन घडलं. खरं देवदर्शन झाल्याचा आनंद झाला. 

किती वेळा ते दृष्य पाहिलं माहित नाही, कळलं नाही. त्या तंद्रीतच ती व्यक्ती नाचू लागली. तीही व्यक्ती तोंडाने म्हणू लागली —

“ज्ञानोबा – तुकाराम”, 

“ज्ञानोबा  – तुकाराम”. 

खरंच संतांच्या नामस्मरणाचा काय आनंद होतो ते ती व्यक्ती अनुभवत होती.  

आता तिचं भान हरपून गेलं होतं. पहाट झाली. काकडआरतीसाठी मंडळी मंदिराकडे आली आणि त्यांनी तिला हलविले अन् ती व्यक्ती भानावर आली. शरीराने ऐहिक जगातील नित्यक्रम करू लागली. पण मन मात्र सुखाच्या कारंजाप्रमाणे नाचत होतं. ‘भक्तभजन’ रंगात दिवसभर मन तिकडेच होतं. दुसरीकडे चिंतन सुरु झालं- हे काय अद्भुत? ज्या भगवंताच्या नामस्मरणाने काय साध्य होते ते आपण वाचतो, ऐकतो, त्याचे महात्म्य सांगतो, तो स्वत:च संतनामात एवढा दंग होतो? ‘ याचा अर्थ त्याला स्वतःच्या नावापेक्षा भक्तनामघोष अधिक आवडतो . म्हणून आपणही तोच नामजप करावा. तोच आपल्यासाठी भक्तीमंत्र आहे. तोच आपल्यासाठी शक्तीमंत्र आहे. तोच आपल्यासाठी तारकमंत्र आहे. त्याचाच प्रसार झाला पाहिजे, नव्हे तो केला पाहिजे आणि तो मी केला पाहिजे. मला ते दर्शन घडले. मला ते ऐकायला मिळाले. तोच वारकऱ्यांचा तारक मंत्र आहे.’ 

आणि मग साऱ्या भक्तमंडळींना जमवून त्याबद्दल सविस्तर कथन केलं. 

काहींनी मानलं, काहींनी विरोध केला. आम्हाला अनुभुती आल्याशिवाय आम्ही का ऐकावे म्हणून काहींनी विरोध केला. त्यांच्या भजनावेळी टाळ पखवाज वाजवले तरी आवाज बाहेर येईना. कितीही प्रयत्न करून, अक्षरश: बडवूनही स्वर येईना. मग भजनरंगी भक्तरसात येऊन संत स्तवन झालं, ” ज्ञानोबा – तुकाराम ” बोल तोंडातून बाहेर पडले अन् मगच टाळ आणि पखवाज पुन्हा घुमु लागले. ” ज्ञानोबा – तुकाराम.” 

—हाच मंत्र आज साऱ्या वारकरी संप्रदायाला शक्ती प्रदान करणारा, भक्तिरसात चिंब करणारा, शक्ती- भक्ती- मंत्र म्हणून प्रचलित आहे. तोच नामजप केल्याशिवाय कुठलीही दिंडी निघत नाही. कुठलेही भजन सुरू होत नाही.  कुठलेही कीर्तन संपत नाही. 

कोणाही थकल्या मरगळलेल्या व्यक्तीलाच नव्हे, तर मृत्युशय्येवरच्या व्यक्तीलाही “ज्ञानोबा” ऐकलं की “तुकाराम” शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडतात “ज्ञानोबा तुकाराम” हीच महाराष्ट्राची खरी भक्तीधारा आहे. हीच खरी शक्तीधारा आहे. हीच खरी विचारधारा आहे. भगवंतापासून प्रवाहित होवून ती समस्त वारकरी बांधवांपर्यंत आणून त्यांना त्यात सुस्नात करणारी ती महान व्यक्ती म्हणजे ‘ श्री संत प्रल्हाद महाराज बडवे ‘ होत. भक्तनाम गात नर्तन करणाऱ्या भगवंताचे दर्शन त्यांना घडले. ” ज्ञानोबा-तुकाराम ” हे भगवंतोद्गार पहिल्यांदा त्यांनी ऐकले. पाहिले. ते त्यांनीच पुढे प्रचारित केले. त्यामुळे सकल वारकरी भक्तांच्या मनात त्यांचे विषयी ममत्व आहे. वारकरी त्यांचे चरणी लीन होतात. त्यांना सन्मानित करतात. 

शके १५४२ मधे विठूरायाच्या परंपरागत पूजा-अर्चन करणाऱ्या बडवे कुळात जन्म घेतलेल्या प्रल्हाद महाराजांचा शके  १६४० (सन १७१८) हा समाधी काळ आहे. म्हणजे सुमारे ३५० वर्षे या घटनेला झाली.  तरी आजही नामदास महाराज फडावर, वासकर फडावर, आजरेकर फडावर, शिरवळकर फडावर, धोंडोपतदादांचे फडावर, बाबा महाराज सातारकरांचे फडावर तसेच दस्तापुरकरपासून ते कान्हेगांवकरांपर्यंतच्या साऱ्या महाराज मंडळात अन् विदर्भ, खानदेश, मराठवाड्यापासून ते कोकणापावेतोच्या सकल वारकरी सप्ताहात ही सत्यकथा, मंत्रकथा, दिव्यकथा, देवानुभुती कथा, देवलीला म्हणून सांगितली जाते. अन् लोक प्रल्हाद महाराजांचे चरणी नतमस्तक होतात.

— समाप्त —

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवघा रंग एक झाला – भाग १ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ अवघा रंग एक झाला – भाग १ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

‘माई मी निघते, पोळी भाजी करून ठेवली आहे, दुपारी मावशी येतील, त्यांना वरण भाताचा कुकर लावायला सांगा, रात्रीचं मी बघेन आल्यावर…’

माई मख्ख चेहेऱ्याने अनुजाच्या सुचना ऐकत होत्या. त्यांच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, म्हणजे आजपण दिवसभर त्या एकट्याच असणार. नात काय शाळेतून आली की जेवेल आणि क्लासला जाईल. तिथून आली की खेळायला मैत्रिणीकडे पळेल.

अनुजाचं त्यांच्या कडे लक्ष गेलं.

काय झालं माई ? नाराज आहात का ? कसला राग आलाय का ?माझं काही चुकलंय का ?”

‘तुझं काही चुकलं नाहीये ग बाई, माझंच चुकलंय. मीच एक अडगळ होऊन राहिले आहे  तुमच्या घरात…” बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला.

आज काहीतरी वेगळाच नूर दिसतोय माईंचा, त्या सहसा असा त्रागा करत नाहीत. अनुजाने पर्स खाली ठेवली त्यांच्या जवळ बसत तिने विचारलं,

‘काय झालं माई ? मनात काय असेल ते बोलून मोकळ्या व्हा म्हणजे तुम्हाला हलकं वाटेल’.

माईंनी एकदा अनुजाकडे बघितले, तिच्या आवाजात, नजरेत आर्जव होतं, त्यांना एकदम अपराधी वाटलं. खरं तर त्यांना तक्रार करायला काही जागा नव्हती. घरात सगळ्या सोयी होत्या, मुलगा, सून, नात सगळी त्यांच्याशी नीट वागत होती. त्यांचं औषधपाणी, व्यवस्थित होत होतं. फक्त प्रश्न होता तो त्यांच्या समोर अजगरासारख्या पसरलेल्या वेळेचा…

“कंटाळा येतो गं दिवसभर, काही काम न धाम, टिव्ही बघितला की डोकं दुखतं, तुम्ही सगळी आपापल्या व्यापात…. दिवस खायला उठतो बघ… पण हे बघ तुम्हा कोणाची काही चूक नाहीये…. तुम्ही माझं सगळं व्यवस्थित करता… ‘सुख दुखतं’ म्हणतात ना तसं झालंय माझं…

अनुजा जरा विचारात पडली. मग म्हणाली, “तुम्हाला वाती करायला जमतील का ?

“हो… बोटं दुखतात त्याने सुद्धा… पण थांबून थांबून करीन.”

“ठीक आहे, मी कापूस आणून ठेवीन तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही वाती करत जा.”

अनुजा लहान मुलीची समजूत काढावी तशी बोलत होती. माईंनी मान डोलावली तशी अनुजा म्हणाली,

“निघू मग मी आता ? रात्री लवकर येते….”

अनुजा गेली आणि त्या घरात एकट्याच उरल्या….इतक्यात बेल वाजली….

त्यांनी दार उघडलं…. खालच्या वाण्याच्या दुकानातला मुलगा कापूस घेऊन आला होता.

अनुजाच्या तत्परतेचं त्यांना कौतुक वाटलं… त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली जेवण झाल्यावर त्यांनी  पिशवीतून कापूस पुढे काढला… तो फुटबॉल एवढा गोळा बघून माईंना हसूच फुटलं… एवढ्या कापसाच्या हजार-दीड हजार वाती होतील… आणि घरात वर्षात एखादं दुसऱ्या वेळी निरांजन लावलं जातं… काय उपयोग इतक्या वाती करून ?

विचार मागे सारत त्यांनी वाती वळायला सुरवात केली. इतक्यात ऋत्विका तिथे आली.    ‘आजी मी पण करू ? नको तुला नाही जमणार.

“तू शिकवं ना मला.”

त्या दाखवतील त्याप्रमाणे ऋत्विका पण प्रयत्न करू लागली आणि विशेष म्हणजे तिला जमायलाही लागल्या

तिने केलेल्या वाती माई थोड्या सुधारून घेत होत्या….पुढचे दहा बारा दिवस माईंना एक उद्योगच झाला. वाती वळण्याचा… पण वेळही चांगला जात होता… वैषम्य एवढंच होतं की, एवढ्या वातींपैकी चार वातीसुद्धा घरात वापरल्या जाणार नव्हत्या…

एवढी कशी अश्रद्ध माणसं ? एकही परंपरा पाळावी असे वाटू नये यांना ?

अनुजा रोज सकाळी बाहेर पडत असे ती संध्याकाळीच परते…. आज तर सात वाजून गेले तरी अनुजाचा पत्ता नव्हता… शेवटी ७.३० ला आली… खूप थकलेली वाटत होती, हातात कसली तरी गुंडाळी होती…आल्या आल्या तिने माईंना हाक मारली…

माई आल्या… अनुजाने गुंडाळी उलगडली… आणि…. माईंच्या अंगावर काटा उभा राहिला… ते विठ्ठलाचे चित्र होते… मूर्तिमंत  पांडुरंग. त्यांच्या कडे फ्रेम होती… अगदी तसाच विठोबा रेखाटला होता… वत्सल, आश्वासक… माईंचे हात जोडले गेले.  स्वतःच्याही नकळत….

कोणी काढलं हे चित्र ? भानावर येत माईंनी विचारलं….

माई तुम्ही ऐकून थक्क व्हाल, हे चित्र करुणा नांवाच्या एका अनाथ, दिव्यांग मुलीने काढलंय… तिला दोन्ही हात नाहीयेत… पायाने काढलंय तिने हे चित्रं… तिलाच चित्र काढायला शिकवायला जात होते पंधरा दिवस…

“अगं किती सुरेख चित्र काढलंय… आपल्याकडे एक तसबीर होती पांडुरंगाची… अगदी हुबेहूब तसंच चित्र आहे.”

“अगदी बरोबर, कारण त्या फ्रेम वरूनच तिने हे चित्र काढलंय… मीच नेली होती तिला दाखवायला…  तिने काढलेल्या ह्या चित्राला स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं…

“आता ह्या चित्राचं काय करणार ?”

“काही नाही… खास तुम्हाला दाखवायला आणलंय.”

‘मी काय म्हणते हे चित्र आपण सोसायटीच्या लॉबी मध्ये लावूया, बाजूला चित्र कोणी काढलं त्याची माहितीही लिहू… नाहीतरी उद्या एकादशी आहे…’

“अरे वा ही आयडिया माझ्या डोक्यातच नाही आली…..फक्त सेक्रेटरींची परवानगी घेऊ म्हणजे झालं.”

झालं… सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं… बाजूला करुणाची माहिती… आणि बाजूला एक वही ठेवली… त्यात अभिप्राय लिहायचे होते…

क्रमश:…

लेखक – अज्ञात   

संग्राहिका – सुश्री प्रतिमा जोशी– संवादिनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares