मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 19 – विवेक दे ! वैराग्य दे ! ज्ञान दे ! ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 19 – विवेक दे ! वैराग्य दे ! ज्ञान दे !  ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आईची अवस्था, आजूबाजूच्या लोकांची वागण्याची रीत, पितृछत्राचं  दु:ख या सगळ्यांमुळे नरेंद्र अंतर्मुख झाला. गरीब आणि दु:खी लोकांचं आक्रंदन भगवंतांना दिसत नाही की काय? नुसता कमरेवर हात ठेऊन, ही निष्ठुर दानवी लीला तो निर्विकारपणे बघतोय? त्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही? नरेंद्रचा ईश्वरावरचा विश्वासच उडू लागला होता.

आपल्या मित्रांनाही तो हे कधी कधी बोलून दाखवे. त्यावरून त्यांचाही समज दृढ झाला की नरेंद्र आता नास्तिक झालाय. तसच त्याच्या बद्दल शिष्यवृंदांमध्ये आणखी अपप्रचार होऊन तो रामकृष्णांपर्यंत पोहचे. त्यांचा तर नरेंद्रवर पूर्ण विश्वास होताच. खात्री होती. नरेन्द्रबद्दल असे काहीही ऐकून न घेता त्यांनाच ते दटावत असत. पण हेच तर आपली परीक्षा घेत नसतील ना? अशी शंका नरेन्द्रनाथांना आली खरी.      

घरगुती कारणांमुळे नरेंद्र दक्षिणेश्वरला श्रीरामकृष्णांकडे जाऊ शकत नव्हते. रामकृष्ण त्यांच्या शिष्यांकरवी नरेंद्रला भेटायला येण्याचे निरोप देत. पण नाही. मनात त्रागा होताच. ईश्वराचा मनातून राग आला होता. पण प्रेमळ अशा रामकृष्णांची आपल्या हृदयातली मूर्ती ते काही केल्या पुसू शकले नव्हते. त्यांच्या बरोबर आलेल्या आतापर्यंतच्या आध्यात्मिक अनुभवामुळे त्यांनी कल्पिलेली नास्तिकता दूर होऊ लागली होती. एका क्षणी त्यांना स्वत:चेच आश्चर्य वाटले की मी हे काय करतोय? त्यांना जाणीव झाली आपल्या अस्तित्वाची.

‘केवळ पैसा मिळवून, कुटुंबाचं अटीतटीने पोषण करत आयुष्य कंठीत राहायचं? आणि एक दिवस मरून जायचं? नाही, नाही माझा जन्म यासाठी झाला नाही. माझ्या जीवनाचं उद्दीष्ट महान आहे. अखंड सच्चिदानंदाचा लाभच माझे लक्ष्य आहे’. असे मनाशी ठरवून, नरेन्द्रनाथांनी  कुणालाही नकळत एक दिवस घरादारचा त्याग करण्याचा दिवस निश्चित केला.

गृहत्याग करण्यापूर्वी एकदा  गुरूंना वंदन करून मग कायमचा निरोप घ्यायचा असं ठरवलं. त्याच दिवशी गुरु कलकत्त्यात आपल्या एका भक्ताकडे आले आहेत हे कळल्याने नरेंद्रनाथ त्याच्याकडे गेले. तर श्रीरामकृष्णांनी त्यांनाच आग्रह करून दक्षिणेश्वरला नेले. रात्रभर गुरुशिष्यांमध्ये अद्भुत असा संवाद घडत राहिला.

अत्यंत करुण नेत्रांनी श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांकडे बघून म्हणले, बेटा, कामिनी-कांचनचा त्याग केल्याखेरीज काहीही व्हायचे नाही. श्रीरामकृष्णांना भीती होती की न जाणो हा संसारात गुरफटून बसेल. त्यांनी नरेंद्रनाथांना एका बाजूला नेऊन परोपरीने सांत्वन केलं. सांगीतलं की, माझा देह असेपर्यंत तुला या जगात राहावे लागेल. आणि विशिष्ट कार्यासाठीच हा देह तू धारण केला आहे, याचं रहस्य ते सांगत होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी नरेंद्रनाथ दक्षिणेश्वरहून घरी आले. मनावरचं एक मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. आता, रामकृष्ण त्यांचे आदर्श, गुरु, पिता आणि सर्वस्व झाले होते. नातेवाईकांनी कटकारस्थान करुन त्यांच्या विरोधात केलेली केस हाणून पाडण्यासाठी त्यांनी कंबर कसली. ‘अन्याय, असत्यापुढे काहीही झालं तरी मान झुकविणार नाही’. हा त्यांचा बाणा होता. नामांकित बॅरिस्टर उमेशचंद्र बंडोपाध्याय यांनी नरेंद्रनाथ यांच्याकडून केस लढवली. 

कोर्टात लोकांना नरेन्द्रनाथांचे प्रसंगावधान,चारित्र्याची दृढता आणि सद्गुण्णांची चुणूक दिसलीच. पण विरोधी पक्षाचे वकील, उलट तपासणीत नरेंद्रनाथांची निर्भयपणे, स्पष्ट, धीरगंभीर, उत्तरे ऐकून आश्चर्य चकित झाले. न्यायमूर्तिंनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन, शेवटी नरेन्द्रनाथ यांच्या बाजूने निकाल दिला. नरेन्द्रनाथ हे ऐकताच धावतच घरी आले आणि आईला म्हणाले, “आई घर बचावले”. त्याक्षणीच, भुवनेश्वरी देवींनी अत्यानंदाने विजयी पुत्राला हृदयाशी धरले. दोघांचा आनंद गगनात मावेना.

दिवसांमागून दिवस जात होते. पण आता आर्थिक दृष्टीने काहीतरी सोय व्हायला हवी होती. श्रीरामकृष्णांच्या कृपेने यावर काही तरी उपाय नक्की निघेल असे वाटून, नरेन्द्रनाथ ताबडतोब दक्षिणेश्वरास गेले. नरेंद्रनाथांना बघून रामकृष्ण आनंदित झाले. नरेंद्रनाथांनी म्हटले, “ महाराज माझ्या आईच्या आणि भावंडांच्या दोन घासांची कशीतरी तरतूद होईल असे तुम्ही आपल्या जगन्मातेजवळ धरणे धरावे. माझ्यासाठी”.

श्री रामकृष्णांनी उत्तर दिले, “काय सांगू रे? मी आईला असे चुकूनही कधी काही मागितलेले नाही. तरीपण तुम्हा लोकांची काहीतरी सोय व्हावी म्हणून आईची विनवणी केली होती. पण काय करू? तू तर आईला मानत नाहीस. म्हणून तीही तुझ्याबद्दलच्या सांगण्याकडे लक्षच देत नाही”. कट्टर निराकारवादी नरेंद्रची साकारावर तीळमात्र निष्ठा नव्हती. म्हणून ते गप्प राहिले. बोलायला जागाच नव्हती आणि आईच्या कृपेखेरीज काहीही घडणार नाही असे ठाम मत गुरूंचे होते.

ते एक प्रकारे नरेंद्रनाथांची परीक्षाच घेत होते. शेवटी ते म्हणाले, “बरं, आज मंगळवार आहे. मी सांगतो तुला, आज रात्री कालीमंदिरात जाऊन, आईला प्रणाम करून तू जे मागशील ते आई तुला देईल”. आणि विश्वास असो की नसो श्रीरामकृष्णांची ‘दगडी’ जगन्माता आहे तरी कशी हे एकदा पाहिलंच पाहिजे, म्हणून नरेंद्रनाथ काली मातेच्या देवालयात भारल्यासारखे गेले. आज श्रीरामकृष्णांच्या कृपेने त्यांच्या सांसारिक दु:ख दारिद्रयाचा अंत होणार या उत्कंठेने त्यांना भरून आले होते.

ते गेले तिथे त्यांना दिसले की, जगदंबेच्या रूपाने मंदिर प्रकाशित झाले आहे. दगडी मूर्ती नव्हे, ‘मृण्मय आधारी चिन्मयी जगन्माता’  वर आणि अभय देणारे कर वर करून, असीम अनुकंपापुर्ण, स्नेहमय मंदस्मित करीत आहे. ते पाहून नरेन्द्रनाथ सर्वकाही पार विसरून गेले. फक्त भक्ताप्रमाणे प्रार्थना करू लागले. “ आई विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे. भक्ती दे. आई जेणेकरून तुझ्याच कृपेने तुला सर्वदा पाहू शकेन असं कर”.

नरेंद्र परत आले तसे रामकृष्णांनी विचारले काय रे काय मागितलंस? तेंव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की अरेच्च्या खरच की हे काय करून बसलो मी? मागायचं ते राहूनच गेलं की. गुरूंच्या आदेशानुसार पुन्हा गेले. पुन्हा तेच. दोनतीन वेळा जाऊनही काहीच मागितले नाही . नरेंद्रनाथांना सारं लक्षात आलं. गुरु म्हणाले, ज्या अर्थी तू मागू शकला नाहीस त्याअर्थी तुझ्या कपाळी ऐहिक सुख नाही. तरी पण तुम्हाला अन्नवस्त्राची ददात पडणार नाही. नरेंद्रनाथ आश्वस्त झाले. त्यांना कुठे हवे होते ऐहिक सुख? पण त्या दिवसापासून नरेंद्रनाथांच्या जीवनातल्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गजरा का माळावा ? ☆ संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ गजरा का माळावा ? ☆ संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

गजरा का माळावा ? त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ? याची छान माहिती जरूर वाचा.

 स्त्री चे  आरोग्य सांभाळतो गजरा—

गजरा हा “old fashioned” आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?…

गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रिया आजही रोज गजरा माळल्याशिवाय नोकरीला जात नाहीत.

‘गजरा – सौंदर्य’ या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिलं तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातच केली गेली आहे हे लक्षात येतय का ? 

आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.

स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या ‘pituitary gland’ च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथीचे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते. परिणामी स्त्रियांच्या आरोग्यामधील संतुलन रहाण्यास मदत होते..

मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रियांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण “concentration”, “moto development” करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत ?- फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.

पण कसंय… घर की मुर्गी….

भरगच्च पैसे देऊन पाश्च्यात्यांप्रमाणे अरोमा थेरपी घेऊ, पण भारतीय पद्धतीप्रमाणे गजरा माळून घेतल्यावर “old fashioned” म्हणवून  घेण्यात लाज का वाटून घ्यावी ? 🌹

संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अगरबत्ती …!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अगरबत्ती …!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ती…!

मला भेटली फुटपाथवरच… भीक मागत…! वय वर्षे 70 च्या आसपास… दिसायला काळीसावळी आणि अंगावर अक्षरशः अर्धा इंचाची घाण…

तीन फुटांच्या अंतरावर गेलो तरी विचित्र, अतिशय घाणेरडा एक वास येतो… 

अंगावर नाही म्हणायला एक मळकी साडी… (मळकी हा शब्द खूप थिटा आहे)

याला साडी का म्हणावं ? हाच मुळात प्रश्न आहे… अक्षरशः पाच साडेपाच फुटाचं हे कापड ती अंगावर गुंडाळते… जे झाकायला जावं तेच उघडं पडतं… आणि दुर्दैव असं की तिला ते कळत नाही… जाणवत नाही… कारण डोळ्याच्या कसल्याशा प्राॕब्लेममुळे तिला काही दिसतच नाही…! 

एकूण अवस्था अशी, की या आज्जीजवळ कुणी जावुच नये… तिच्याजवळ कुणी बसूच नये…! तरीही मी जातो, बसतो तिच्याजवळ .. याचं कारण तिचं लाघवी बोलणं… 

हिच्या गोबऱ्या गालातुन एक एक शब्द असा बाहेर पडतो, जसा शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या अभिषेकपात्रातुन थेंब थेंब अभिषेक व्हावा, त्या पिंडीवर  …! अतिशय शुद्ध आणि सात्त्विक ! 

भीक मागतांना  म्हणते… “बाळा तुला जमलं काही तर मला दे, स्वतःला अडचणीत टाकून मला काही देवु नकोस… आधी तू  घे, प्रसन्न हो, त्यातून काही उरलं आणि तुला जर मला द्यावंसं वाटलं तरच दे… अन्यथा नको !” 

गोळ्या मागतांना म्हणते, “डाॕक्टरसाहेब, मला देणं शक्य असेल तरच गोळ्या द्या. अहो माझ्यापेक्षा जास्त त्रास असणारे खूप आहेत अजून, त्यांना आधी द्या… मी काय, करेन थोडं सहन… !”

दुस-याचा विचार करण्याच्या तिच्या या वृत्तीमुळे मी हिच्याकडं आपसुकच ओढला गेलो होतो… 

तिच्याजवळ बसलं की, तिचं बोलणं ऐकता ऐकता बोलण्यातूनच सुगंध इतका घमघमायला लागतो की अंगावरुन येणाऱ्या घाण वासाची जाणिवच होत नाही आपल्याला… 

शेजारी बसलं की विचारते, “मी एक श्लोक म्हणू … ?” आणि आपल्या उत्तराची वाट न पाहता, ही “विश्वप्रार्थना” म्हणायला सुरुवात करते… “सर्वांना चांगली बुद्धी दे… आरोग्य दे…..आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे…!”

या विश्वात ज्याच्याकडे सर्व काही आहे, तो स्वतःला अजून काही तरी मिळू दे म्हणून “लाचार” होतोय… आणि सर्वस्व गमावून बसलेली ही आज्जी ‘दुसऱ्याला सुखात ठेव’ म्हणून “प्रार्थना” करत्येय…! 

स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी, आणि दुस-यासाठी मागणं ही झाली प्रार्थना… दोन्हीतला फरक मला या आज्जीमुळेच समजला…! 

ही आज्जी, एका मॕनेजरची बायको. भरपूर श्रीमंती आणि खानदानी संस्कार. रास्ता पेठेत यांचा जुना बंगला होता. सगळं काही होतं, पण घरात कुणी चिमुकलं नव्हतं. दोन वेळा पोटातच बाळ गेलं. मरता मरता वाचली. तिसऱ्या वेळी डाॕक्टरांनी सांगितलं, “आता तुम्हाला बाळ होणे नाही. दत्तक घ्या.” 

मधल्या काळात यजमान गेले. इतके दिवस “दूर” असलेले सगळे नातेवाईक “जवळ” आले. आठवतील ती नाती सांगून घराची वीट न् वीट घेऊन गेले.

सगळी “नाती” बरोबर येताना “पोती”  घेऊन आली होती. या पोत्यांतुन सर्वस्व वाहून नेलं हिचं… हिच्याच डोळ्यांदेखत… 

असलेली सगळी “नाती” हिंदकाळत “गोती” खात गेली, आणि वाड्याची ही खानदानी मालकीण आता फुटपाथची राणी म्हणून जगत्येय, गेली १५ वर्षे… विश्वप्रार्थना गात… ‘सर्वांना सुखी ठेव’ म्हणत…! आपल्या अंगावर धड कापड नसतांनाही गात असते… ‘सर्वांना ऐश्वर्यात ठेव…!’ सगळ्यांनी लुबाडून घेतलं तरी आर्त प्रार्थना करते…. ‘सर्वांचं भलं कर…कल्याण कर….’ 

ऐकणारा “तो” तिचं ऐकतोय की नाही माहित नाही… तरीही गोबऱ्या गालांतुन हसत, वर बघत विश्वासानं म्हणत असते ‘आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे…!’

मी एकदा चाचरत हिला म्हटलं, “मावशी तू मनानं इतकी सुंदर आहेस पण इतकी अस्वच्छ का राहतेस?” 

ती म्हटली, “अस्वच्छ …? मी कुठंय अस्वच्छ …???” 

“अगं हा वास…?” मी आवंढा गिळत, नजर चोरत बोललो….

ती म्हटली, “हा वास घाणेरडा वाटतो का रे बाळा तुला ? लहान आहेस तू बाळा अजुन…. अरे रस्त्यावर या घाणेरड्या वासानंच माझ्या, रक्षण केलंय माझं… !” ती हसत बोलली…!!! 

“म्हणजे…?” 

कानाजवळ येऊन बोलली, “तुला माहीत आहे ? कापूर पेटवला की आजुबाजुला किडे येत नाहीत… मच्छरची अगरबत्ती पेटवली की मच्छर आसपास येऊन चावत नाहीत… 

ही घाण नाही बाळा, हे माझं कापूर आहे… माझी अगरबत्ती आहे… या कापरामुळंच आणि अगरबत्तीमुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वाऱ्यालाही येत नाहीत…”

क्रमशः… 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ || देहोपनिषद सिद्ध झाले…. || पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ || देहोपनिषद सिद्ध झाले…. || पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज 7 मे.. विदुषी दुर्गाबाई भागवत यांचा स्मृतिदिन! ..मला लाभलेल्या त्यांच्या सहवासातील काही हृदयस्पर्शी आठवणी….

हिरवीकंच साडी, हिरवागार परीटघडीचा ब्लाऊज, मनाचा ठाव घेणारी नजर, ताठ बांधा, छोटासा गोंडस अंबाडा आणि त्यावर हौसेनं माळलेला घमघमीत मोगरीचा गजरा! अहाहा! काय तेजस्वी ते रूप आणि ओजस्वी ती वाणी! आणि तेही वयाच्या ८६व्या वर्षी! या रूपाला पाहण्यास आणि ही लख्ख वाणी ऐकण्यास पार्ल्यातील ‘दीनानाथ नाट्यगृह’ त्यादिवशी चोखंदळ साहित्यिक, संगीतज्ञ आणि रसिकांनी खचाखच ओसंडून वाहात होतं. प्रसंग होता – माझ्या पहिल्यावहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हा कॅसेटचा प्रकाशन सोहळा – या ज्ञानदेवीच्या शुभहस्ते! ही ज्ञानदेवी म्हणजे दुर्गादेवीचा आणि शांतादेवीचा सुरेख संगम! ती स्वतःच ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ होती! तिच्या येण्यानंच प्रत्येकाच्या मनात उत्साह, आनंद, कुतूहल आणि उत्सुकता भरून वाहात होती! गझल सम्राट जगजीत सिंह यांनाही तिच्या शेजारी बसण्याचं, मोठं अप्रूप वाटत होतं. 

२६ मे, १९९६ हा तो दिवस!  याच दिवशी सकाळी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘जागविला सुखांत एकांत’ हा ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ कॅसेटमधील प्रत्येक गाण्याचं, समर्पक रसग्रहण करणारा लेख लिहून, दुर्गाबाईंनी अनेकांना धक्काच दिला होता! प्रकाशनाच्या वेळी त्यांच्यावर झालेल्या गुलाब पाकळ्यांच्या वर्षावानं, बाई आधीच मोहरून गेलेल्या! त्या बोलल्याही अप्रतिम! आणि पूर्व वयात विरघळून जाऊन चक्क ‘केदार’ रागातली बंदिशही  लाजवाब गायल्या! कुठचाही विषय त्यांना वर्ज्य नव्हता! दुर्गाबाई म्हणजे अर्वाचीन काळातली गार्गी – मैत्रेयीच! त्या केवळ साहित्य विदुषीच नव्हे तर दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ! स्वातंत्र्य सेनानीपासून ते स्वयंपाक, विणकाम, भरतकामापर्यंत कुठल्याही क्षेत्रात दुर्गाबाई अग्रेसर! ज्या क्षेत्रात हात घातला, त्याचं सोनं केलं त्यांनी!

एकदा, बहीण कमला सोहोनींबरोबर त्या एक इंग्रजी चित्रपट पाहत होत्या. त्यातील नायिका, आपण नेहमी घालतो, त्यापेक्षा वेगळया पद्धतीने टाके घालून, स्वेटर विणत होती. हे बारकाईनं निरीक्षण करून, त्यांनी एका व्यक्तीचा एक स्वेटर एका दिवसात तयार होतो, हे स्वतः विणून सिद्ध केलं.. वयाच्या नव्वदीलाही त्यांची कुशाग्र बुद्धी तोंडात बोटंच घालायला लावी! या वयातही नवनवीन गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा त्यांचा ध्यास पाहून आश्चर्य वाटे! त्यांच्या ९०व्या वाढदिवसाला, त्यांनी मला भेट दिलेला, त्यांचा आवडता, निवृत्तीनाथांचा एक अभंग मी गायले. त्यावेळी बरीच जाणकार मंडळी तिथं होती. गाणं संपल्यावर, दुर्गा आज्जींनी या ‘नातीचा’ पापा घेतला आणि हातही हातात घेतला. माझे ‘थंडगार’ हात पाहून त्या गोड हसल्या आणि पट्कन म्हणाल्या, – “Cold from outside, Warm from inside… !” 

बाईंनी अनेकांना घडवलं. प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं. त्या अनेक भाग्यवंतांपैकी मीही एक आहे!

काही वर्षांपूर्वीची गोष्ट… मी इतरांच्या चालीत नवीन बसवलेल्या काही कविता, बाईंसमोर नेहमीप्रमाणं म्हणून दाखवायला गिरगांवात त्यांच्या घरी गेले त्यावेळी त्या म्हणाल्या, “अगं पद्मजा, फार बरं झालं तू आलीस. आज नवलच घडलं! आज शाकंभरी पौर्णिमा. पहाटे, चंद्रबिंब अस्त होताना, माझ्या वडिलांनी, त्यांच्या स्मृतिदिनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि ‘देहोपनिषद’ माझ्या पुढ्यात आले, ते असे…

|| देहोपनिषद ||

‘आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत ||१||

भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे ||२||

अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले ||३||

फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे ||४||

मरणा, तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज ||५||

पायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट ||६||

सुखवेडी मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले… ||७||

पुढे त्या म्हणाल्या, “आजवरच्या माझ्या कविता, मलाच न आवडल्यानं मी फाडून, जाळून फेकून दिल्या. ही माझी मला आवडलेली एकमेव कविता! याला तू चाल लाव, आणि उद्या माझी दूरदर्शनवर मुलाखत आहे, त्यात तू ते गा!” 

मी प्रथम ते ‘देहोपनिषद’ वाचूनच भांबावले. परंतु दुर्गाआज्जीला नाही म्हणण्याची माझी प्राज्ञाच नसल्यामुळे मी आजवर, कधीही न केलेला संगीत दिग्दर्शनाचा प्रयत्न, परमेश्वरी कृपेनं सफल झाला. त्यांनीच संगीत दिग्दर्शनाची माझ्या ‘मनी’ अंतर्ज्योत पेटवली!

दुसर्‍या दिवशी दुर्गाबाईंनी दूरदर्शनवर “आता ‘नारददुहिता’ माझी कविता सुंदर गाणार आहे,” असं म्हणून माझं मोठ्या मनानं कौतुक केलं, प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मात्र मला आत्मविश्वास आला आणि मी जवळजवळ दीडशेहून अधिक कवितांना, अभंगांना धडाधड चाली लावत गेले. केवढी भव्य आणि सुंदर दृष्टी दिली मला दुर्गाबाईंनी!!

एकदा सुप्रसिद्ध कवयित्री वंदना विटणकरांना (त्यांच्या लहानपणी) ‘पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर’ यांच्या विषयी लेख लिहिण्यासाठी कुठेही माहिती मिळेना. तेव्हा दुर्गाबाईंना त्यांनी एशियाटिक सोसायटीच्या भव्य ग्रंथालयात गाठलं आणि दुर्गाबाईंनी तात्काळ त्यांना अहल्याबाईंचे पन्नास एक संदर्भ पूर्ण माहितीसकट दिले. शिवाय, “ग्रंथालयाच्या एका कोपर्‍यात ‘होळकरांची बखर’ बांधून ठेवलीय, ती मुद्दाम वाच.” असंही सांगितलं. हे सर्व सांगण्यात कुठेही गर्वाचा, उपकाराचा लवलेशही नव्हता. उलट, कुणीही न निवडणारा, वेगळा आणि उत्तम विषय घेतल्याबद्दल छोट्या वंदनेचं अभिनंदन आणि कौतुकही केलं. शिवाय दुपारच्या उन्हातान्हातनं आलेल्या या मुलीला प्रेमानं, आपल्या डब्यातली रुचकर चटणी आणि थालीपीठ खाऊ घातलं! त्याची चव वंदनाबाईंच्या जिभेवर अखेरपर्यंत होती. 

दुर्गाबाईंना जसं साहित्याचं प्रेम, तसंच निसर्ग आणि तत्त्वचिंतनाचंही! तत्त्वचिंतक थोरोच्या निसर्गप्रेमामुळं बाईंचं त्यांच्यावर मनस्वी प्रेम! याच थोरोवर इंदिरा गांधींनी केलेली कविता वाचून बाईंनी इंदिरेच्या आतील ‘कलावंताला’ सलाम केला आणि इंदिरा गांधींमुळे  आणीबाणीत भोगाव्या लागणार्‍या हालअपेष्टा विसरून, त्यांच्या अक्षम्य चुकाही माफ करून टाकल्या. केवढं पारदर्शक आणि आभाळाएवढं मन दुर्गाबाईंचं! हाच प्रांजळपणा त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनातही दिसतो, म्हणून त्यांचं लेखन हे बुद्धीला आणि अंतःकरणाला थेट भिडणारं वाटतं. ते वाचताना त्या प्रत्यक्ष समोर बसून बोलताहेत असंच वाटतं.

त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मी कधीच विसरणार नाही. एक म्हणजे – ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे…’ आणि म्हणूनच मला वाटतं, इतक्या विविध विषयांवर त्या प्रभुत्व मिळवू शकल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ‘कुठलंही काम करताना, त्यात जीव ओतून केल्यास ते  १०० टक्के यशस्वी होतं, त्यात उत्स्फूर्ता आणि उत्कटता मात्र हवी!’ 

७ मे, २००२… दुर्गाबाई निवर्तल्याची बातमी ऐकली आणि काळजात चर्र झालं. त्यांच्या घरी जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या सुनेनं – चारुताईनं मला ‘देहोपनिषद’ म्हणायला सुचवलं. शेवटी त्यांच्या पार्थिवाशेजारी बसून, माझ्या या आज्जीच्या डोक्यावरून कुरवाळत कुरवाळत मी ‘देहोपनिषद’ गायले. त्याक्षणी ती नेहमीसारखीच प्रसन्न आणि तेजस्वी दिसली. जणू काही डोळे मिटून तिला आवडणारं देहोपनिषद, ती अत्यंत आनंदानं ऐकत होती.. 

‘देहोपनिषद सिद्ध झाले..’ हीच भावना तिच्या चेहर्‍यावर विलसत होती…

लेखिका – पद्मजा फेणाणी जोगळेकर

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अस्थायी सूर… सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

??

☆ अस्थायी सूर… सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

कोणालाही हेवा वाटेल अशी चाळीस वर्षांची आमची घट्ट मैत्री .जीवश्च कंठश्च अशा आम्ही दहा मैत्रिणी महिन्यातून एकदा अख्खा दिवस एकत्र घालवतो. गप्पांना उधाण येतं. हास्याचे फवारे उडत असतात .सुखदुःखाची देवाणघेवाण होते .. डाएट,डायबेटीस रक्तदाब सगळं त्या दिवसा पुरतं थोडं शिथिल करीत जेवणावर ताव मारला जातो ..पुन्हा भेटण्याची तारीख ठरवून ताज्यातवान्या होऊन घरी परततो .

 गप्पांचा फड जमवताना आम्हाला एकही विषय वर्ज्य नसतो .सासू ,नवरा ,मुलं,घरातले वाद,असे टिपिकल बायकी विषय ..तोंडी लावण्यापुरतेच ..

गाॅसिपिंगला तर थाराच नाही .

पण प्रवासातले अनुभव ,पाहिलेलं नाटक किंवा सिनेमा ,वाचलेलं काहीही ..खवय्या असल्यामुळे रेसिपीज् ..भटकंती …कश्शा कश्शावरही बोलायला वेळ पुरत नाही आम्हाला. 

गेल्या दोन तीन भेटीत एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आमचा एक सूर अस्थायी लागतोय का ..?

हसत हसत ,सहजपणे आमच्या तोंडून यायला लागलय ..”ए ..आपल्याला आता पाच सहा वर्षच बास आहेत हं ..” सत्तर परफेक्ट आहे बाय बाय करायला ..”

खरं तर आर्थिकद्रृष्ट्या सुस्थितीत ,खूप काही गंभीर आजार नाहीत ,मुलं सेटल्ड ..जबाबदाऱ्या  संपलेल्या ….

असं असताना आम्ही हा सूर का आळवतो ..

शिक्षक असलेले माझे वडील नव्वदाव्या वर्षी निवर्तले . गरीबी ..वारावर जेवण .शिक्षणासाठी अपार कष्ट …अंगावर बऱ्याच जबाबदाऱ्या..अशात मध्यम वय संपलं, तरी एकही दिवस मी त्यांच्या तोंडून नव्वदाव्या वर्षी सुद्धा “बास झालं आता जगणं “असं ऐकलं नाही ..

मग आम्ही का अशा कंटाळलो ?

अडीअडचणी ,संकटं ,चढउतार, काळज्या ,तणाव हे सर्व जरी प्रत्येकीच्या आयुष्यात असलं, तरी संघर्षमय जीवन नव्हतं ..मग तरी सुद्धा ..?

काय असेल कारण ?

ऐंशीच्या घरातली जवळची माणसं विकलांग होताना पहावी लागली म्हणून ?

की तसं धावपळीचं दगदगीचं जीवन जगावं लागलं ..लागतय म्हणून??

स्त्रीने घर सांभाळायचं आणि पुरूषांनी कमाई आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या उचलायच्या , अशी कामाची विभागणी वडिलांच्या पिढीत होती .म्हणून दोघंही थकले नाहीत का ?

आम्ही हिरीरीने ,मनापासून घरची – दारची जबाबदारी उचलून थकलो ?

की त्यांच्या ठायी असलेलं समाधान,.संतुष्टता आमच्यात नाही .?

की त्यांची मुलंबाळं त्यांच्याजवळ असल्यामुळे उत्साहाचा झरा अखंड वाहता होता .रोज काहीतरी उद्देश असायचाच तो दिवस पार पडायला ?.

या विचाराशी येऊन मात्र मी थोडीशी चमकले .

दहाजणींपैकी  आम्हा आठ जणींची मुलं नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात किंवा परदेशी आहेत .हे तर कारण नसेल ..?

दोघं दोघं रहातो म्हणून कंटाळतो?

…कारण मुलांबरोबरअसतो तेव्हा “सत्तरी बास “काय ..दुखणं खुपणं ही आठवत नाही … 

थोडी सटपटले …असला रडा सूर लावणं म्हणजे जरा self pity त जाणं वाटलं मला.

 माझाच मला राग आला ..हे कसलं भरल्या ताटावरचं रडणं ..

इतकं मजेत आयुष्य जगण्याचं भाग्य लाभलय .आणि कसले हे “सत्तरी बास चे डोहाळे “

पुढच्या वेळेला भेटू तेव्हा एकीलाही असा “अस्थायी “सूर लावू द्यायचा नाही ..बजावूनच टाकलं मी स्वतःला ..

 

लेखिका : नीलिमा जोशी

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुलपाखरू.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ फुलपाखरू.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆ 

दुकानात असताना वैशालीचा फोन वाजला. आईंचा कॉल संध्याकाळी 7:30 ला कसा काय आला या विचारातच तिने फोन कानाला लावला.

“हॅलो वैशाली! खूप कामात आहेस का ग?”

“नाही आई! बोला न?”

“अग पियुने वरच्या रूममध्ये खूप गोंधळ घातलाय! कोणाशीतरी फोनवर जोरजोरात बोलत होती… रडत होती. मग वरच्या रूममधून वस्तू फेकल्याचे आवाज आले म्हणून मी वर गेले तर माझ्या अंगावर ओरडली.. ‘पहिली खाली जा तू.. अजिबात वर येऊ नकोस.’ आणि आता दरवाजा लॉक करून बसलीये. नक्की काय झालंय ते कळत नाही ग!”  वैशालीच्या सासूबाईंनी चिंतीत स्वरात पण एका दमात सांगितलं.

“बरं बरं, मी येते. तुम्ही आणि पप्पा अजिबात काळजी करू नका आणि कुणीच वरती जाऊ नका. स्वराला ही जाऊन देऊ नका वरती.”

“येशील न लवकर.”

“निघालेच.१५-२० मिनिटात येतेच.”

घरापासून जवळच वैशालीचं कपड्यांचं छोटंसं बुटीक होतं. तिचे मिस्टर कामावरून येताना दुकानातून तिला घेऊनच घरी येत. प्रियांका आणि स्वरा तिच्या दोन मुली. पियू नववीत तर स्वरा सहावीत.

संदीपला कॉल करून हाताखालच्या माणसांवर दुकान टाकून ती रिक्षात बसली. बंगल्याच्या जवळ येताच स्वरा धावत बाहेर आली. “ताईने खोलीची वाट लावलीये बहुतेक.” ती बोलली. स्वराच्या चेहेऱ्यावर वरती नक्की काय घडलंय याची उत्सुकता होती तर आजी आजोबांचे चेहेरे पडलेले होते.

“ओके. नो प्रॉब्लेम. मी बघते नं काय झालंय ते..” वैशालीने तिच्या मागून वरती चढणाऱ्या स्वराला थांबवत म्हंटले. “तुम्ही सर्वजण मस्त tv बघा. मी आलेच.”

“पियू…!” दरवाज्यावर टकटक करत वैशालीने हाक दिली. “दरवाजा उघडतेस न बाळा?”

दरवाज्याचं लॉक उघडल्याचा आवाज येताच वैशाली दरवाजा ढकलून आत गेली. खोलीत वादळ आलं होतं. टेबलावरची पुस्तकं, नोटस् जमिनीवर आल्या होत्या. पलंगावरच्या उशांनीही जमिनीवर उड्या मारल्या होत्या आणि चक्रीवादळ पलंगावर हुंदके देत पडलं होतं.

“काय झालं माझ्या सोनूला?” तिने खोलीत शिरत विचारलं. पियुने अजूनच डोकं उशीत खुपसले. “तू नीट उठून बसलीस तरच आपल्याला बोलता येईल नं राणी.” पियूच्या बाजूला बसत वैशाली बोलली.

हुंदके देतच ती उठून बसली. हुशार, गोरीपान, दिसायला ही गोड असणारी पियु आता मात्र रडूनरडून लाललाल झाली होती. “He left me. He said आता आपलं breakup झालंय” रडतरडत पियु बोलली.

“म्हणजे?” बसलेला आश्चर्याचा धक्का लपवत वैशाली बोलली. “मला काही कळेल अस नीट बोलशील का तू?”

“मम्मा.. थोड्या वेळापूर्वी राजने मला कॉल केला होता. तो मला बोलला की यापुढे I am not your boyfriend.  आपलं ब्रेकअप झालय.”

“अगं, पण राज तुझा फक्त friend होता नं?”

“Friend होता, पण 4 months पासून boyfriend होता.” पियुने रडक्या आवाजात उत्तर दिलं. “मम्मा, मी आता school ला कशी जाऊ. सर्वजण हसतील मला… चिडवतील.. मी स्कूलमध्ये कोणासोबत बोलू? मी काय करू मम्मा?” वैशालीच्या मांडीत पडत हुंदके देत देत ती बोलली.

चौदा वर्षाच्या मुलीला पडलेले गहन प्रश्न ऐकून हसावं, रडावं की चिडावं हेच वैशालीला कळत नव्हतं. मनात विचारांचं चक्र चालू झाले. हे काय वय आहे का पियुचं boyfriend असण्याचं. हिच्या वयाची मी असताना घरात असं काही बोलले असते तर घरातल्यानी माझं काय केलं असतं देवास ठाऊक. हिला चांगलं दमात घ्यावं असं वाटतंय.. पण याक्षणी तिच्यावर रागावले तर ही परत कधीही कोणतीही गोष्ट मला विश्वासात घेऊन सांगणार नाही.

‘आजपर्यंतचे सर्वच प्रश्न आपण समजुतीने, संवाद साधूनच सोडवलेत आणि म्हणूनच विश्वासाने पियुने ही गोष्ट माझ्याशी share केली. मग हा प्रश्नही शांतपणेच हाताळला पाहिजे.’ क्षणार्धात वैशालीच्या मनात हे सर्व विचार येऊन गेले.

तिने पियुकडे बघितले. तिच्या केसांमधून हात फिरवत थोडा विचार करून ती बोलली.. “पियू तुला माहीतच आहे पप्पांचं आणि माझं lovemarriage आहे. पप्पा नोकरीला लागले तेव्हा त्यांनी मला लग्नासाठी विचारलं.. मी घरी सांगितलं आणि दोन्ही घरच्या संमतीने आमचं लग्न झाले. त्यामुळे boyfriend वगैरे या गोष्टीबद्दल मला थोडं कमीच कळते. मला काही शंका आहेत, तू समजावून सांगशील का मला काही गोष्टी.”

“हो. विचार की.”

“मग पहिलं मला सांग, boyfriend आणि bestfriend मधला फरक काय?”

“अगं bestfriend म्हणजे फक्त मित्र, आणि बॉयफ्रेंड म्हणजे…  love. आपण त्याच्यासोबत सतत राहतो. Lunch time, free periods, school मधला जास्तीत जास्त वेळ आपण त्याच्यासोबतच घालवतो. आणि न मम्…

 –  अनामिक 

संग्राहिका –  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रक्तातही प्लॅस्टिक…! – डॉ. व्ही.एन. शिंदे ☆ संग्रहिका – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

? इंद्रधनुष्य ?

☆ रक्तातही प्लॅस्टिक…!  – डॉ. व्ही.एन. शिंदे ☆ संग्रहिका – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जपानच्या एका भागामध्ये लोक लंगडत चालू लागले. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या; मात्र, लोकांच्या आजाराचे कारण सापडले नाही. त्यानंतर संशोधकांनी लोकांच्या आहाराचे पृथक्करण केले. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. ते लोक ज्या भागात राहात, त्या भागात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कचरा टाकण्यात येत असे. त्यातील कॅडमियम पावसाच्या पाण्याबरोबर भाताच्या शेतात येत असे. ते भाताच्या पिकातून भातात आणि भातातून लोकांच्या पोटात जात असे. ते रक्तात उतरून लोकांचे सांधे दुखू लागत. सांधेदुखीमुळे ते लंगडत. आज ही घटना आठवण्याचे कारण म्हणजे नजीकच्या काळात पक्षाघाताचे रूग्ण वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे आणि याला कारण ठरतेय- प्लॅस्टिक.

सर्वसामान्य निसर्गावर प्रेम करणाऱ्या नागरिकांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वजण प्लॅस्टिकचा वापर थांबला पाहिजे, असे म्हणतात. प्लॅस्टिक बंदीचे कायदे होतात. कडक अंमलबजावणीकरिता मोहीम राबवतात. तरीही प्लॅस्टिकचा वापर थांबत नाही. थांबवणे सोपेही नाही. १८५५ साली अलेक्झांडर पार्क यांनी सर्वप्रथम प्लॅस्टिक शोधले. त्याचे नाव पार्कसाईन ठेवले. पुढे त्याला सेल्युलाईड नाव मिळाले. प्लॅस्टिक कुजत नसल्याने, निसर्गात तसेच राहते. त्याचे विघटन करण्याच्या पद्धती शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कार्यक्षम पद्धती शोधता आलेली नाही. त्यामुळे निसर्गात तसेच पडलेले राहते. अलेक्झांडर पार्क आज हयात असते, तर त्यांनी निर्माण केलेल्या भस्मासूराचा त्यांना पश्चाताप झाला असता.   

पार्क यांच्या प्लॅस्टिकच्या शोधानंतर अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक शोधले. १८९७ साली डब्ल्यू क्रिशे यांनी दुधापासून प्लॅस्टिक बनवले. बेकलंड या संशोधकाने रेझिन्स शोधले. १९५२ साली झिग्लरने पॉलिस्टर बनवले. पॉलिइथिलीन टेरेफइथलेत(PETE)चा वापर सर्रास आणि मोठ्या प्रमाणात होतो. उच्च घनता पॉलिइथिलीन(HDPE)चा वापर दूध, फिनाईल, शांपू, डिटर्जंटच्या पॅकिंगसाठी, पाईप बनवण्यासाठी होतो. पॉलिविनाईल क्लोराईड(PVC)चा वापर गाड्यांचे भाग, पाईप्, फळांसाठी क्रेट, स्टिकर्स इत्यादीसाठी होतो. निम्न घनता पॉलिथिलीन(LDPE)चा वापर दुकानात वापरल्या जाणाऱ्या पिशव्यांसाठी होतो. पॉलिप्रोपिलीन(PP)चा वापर फर्निचर, खेळणी, दही इत्यादींसाठी होतो. पॉलिस्टिरीन(PS)चा  उपयोग खेळणी, कॉफीचे कप, मजबूत पॅकेजींगसाठी होतो. याखेरीजही अनेक प्रकार आहेत, ज्यांचा अक्रेलीक, नायलॉन, फायबर ग्लास, बॉटल्स बनवण्यासाठी वापर होतो. त्यातील काहींचा पुनर्वापर करता येतो. मात्र प्लॅस्टिकचा धोका आहे, तो मानवी निष्काळजीपणामुळे. स्वस्त मिळणाऱ्या प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर आणि पुनर्प्रक्रियेसाठी न पाठवता कोठेही टाकून देण्याचा वाईट परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. गाय, म्हैस आणि इतर जनावरांच्या पोटात जाऊ लागले. ते न पचल्याने जनावरांचे जीवन धोक्यात आले. सहल, सफारीवर जाणारे जंगलातही प्लॅस्टिकचा कचरा फेकू लागले. याचा परिणाम एकूण जीवसृष्टीवर होऊ लागला.

वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुवून पुनर्प्रक्रियेसाठी करण्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. मात्र असे होत नाही. स्वस्त उत्पादन होत असल्याने पुनर्प्रक्रियेपेक्षा नव्या निर्मितीमध्ये उद्योजक व्यस्त असतात. लोकांनीही वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुण्याचे कष्ट नको असतात. त्यामुळे अन्न पदार्थासाठी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, साहित्य तसेच फेकून दिले जाते. जनावरांचे खाद्य पुरेसे उपलब्ध नसल्याने आणि प्लॅस्टिकला अन्नपदार्थांचा वास असल्याने जनावरे ते खातात. ते त्यांच्या पोटात जाते. परिणामी त्याचा अंश जनावरांच्या पोटात उतरतो. 

मानव थेट प्लॅस्टिक खात नाही. मात्र प्लॅस्टिकचा वापर अनेक कारणांसाठी विशेषत: अन्न पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी केला जात असल्याने प्लॅस्टिकचा अंश आपल्या पोटात जाऊ शकतो, याचे मानवाला भान राहिलेले नाही. कॉफी, चहा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचे कप वापरले जातात. शुद्ध पाणी म्हणून बाटलीतील पाणी वापरले जाते. हे पाणी असते मात्र प्लॅस्टिकच्या बाटल्यात. बाटल्यांचे क्रेट्स अनेक दुकानांच्या दारात सूर्यप्रकाशात ठेवले जातात. त्यामुळे बाटल्यातील प्लॅस्टिकचा अंश पाण्यात उतरतो. ते पाणी आपण शुद्ध पाणी म्हणून पितो. 

नुकत्याच झालेल्या संशोधनात संशोधकांच्या लक्षात असे आले, की जगातील ८० टक्के लोकांच्या रक्तात मायक्रोप्लॅस्टिकचे अंश आहेत. अन्न पॅकिंगसाठी वापरले जाणारे पॉलिस्टिरीन एक तृतियांश लोकांच्या रक्तात आढळले. मायक्रोप्लॅस्टिक रक्तातून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाते. शरीराच्या एका भागात साठू शकते. यामुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. प्लॅस्टिकचे अंश हवेतही पसरतात. हवेतूनही मानवी शरीरात जातात. मायक्रोप्लॅस्टिक हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या खोल तळापर्यंत मानवी कर्तृत्त्वाने पोहोचले आहे. आपण त्याचा अनिर्बंध वापर केल्याने ते आपल्या अस्तित्त्वावर उठले आहे. रक्तात हे कण आढळण्याचे गांभीर्य आता तरी ओळखायला हवे. प्लॅस्टिकचा वापर थांबायला हवा! 

ले.: डॉ. व्ही.एन. शिंदे 

संग्राहिका :  सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनाचा संयम ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मनाचा संयम ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे, तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर  पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते. 

त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, ‘ही साडी केव्हढयाला द्याल ?’

विणकर उत्तरला – ‘अवघे दहा रुपये !’

त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला – ‘माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?’

अगदी शांत भावात विणकर बोलला – ‘फक्त पाच रुपये !’

त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, ‘आता याची किंमत किती ?’

प्रसन्न वदनी विणकर म्हणाला – ‘अडीच रुपये !’

तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला. विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला. 

तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला – ‘आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.’

यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. तो म्हणाला – ‘बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस…’

त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला. 

तो खिशात हात घालत म्हणाला – ‘महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो. बोला याचे काय दाम होतात ?’

विणकर म्हणाला – ‘अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस… मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?’

आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला

मुलगा म्हणाला, ‘महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा… मी ताबडतोब अदा करतो.. ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !’    

त्या मुलाचं पैशाची मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला –  “हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. तू नुसती कल्पना करून पहा की, एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत, कपाशी मोठी होईपर्यंत, तिची काढणी होईपर्यंत, किती श्रम घ्यावे लागले असतील. त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सूत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले . मग कुठे ही साडी तयार झाली. इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे, कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा.’ मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू !

त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली.😔आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले. पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 👏’हे महात्मा मला माफ करा. मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटते आहे. मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.’

पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला 👋आणि म्हणाला, ‘हे बघ मुला. तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. एक साडी वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन. पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं

 करणार ? तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.’……

आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खुळखुळतोय, आपल्या घरीही आपण पैसा अडका बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे. आपल्यातल्या काहींना त्याच्या ‘ग’ ची बाधाही झालीय. ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही. आजकाल जो तो कसल्या न कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. अशा सर्व सज्जनांना शीतल, सौम्य शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये. तुमच्यापैकी कुणाला तो दिसला तर माझ्यासकट अनेकांच्या पत्त्यावर त्याला पाठवून द्या किंवा त्याचा पत्ता सांगा म्हणजे त्यांना भेटून आपले पाय कशाचे आहेत हे प्रत्येकाला नक्की उमजेल. दृष्टांतातले विणकर म्हणजे संत कबीरदास आहेत.. हे वेगळे सांगणे नको…

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पावसाच्या धारा… अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

पावसाच्या धारा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

“काय रे,काय करतोयस ?”

“काही नाही रे,बसलोय निवांत,”

“निवांत”?

“होय,खिडकीपाशी बसलोय पाऊस बघत!”

“पाऊस बघतोयस? काय लहान आहेस काय?”

“लहान नाहीय रे,पण लहान झालोय”

“आता शहाणा की खुळा?”

” म्हण  खुळा हवं तर.पण मी झालोय लहान.तू बसला असशील मोबाईल घेऊन बोटं बडवत.पण इथं खिडकीपाशी बसून पाऊस बघताना,रस्त्याच्या कडून वाहणारं पाणी बघताना,वाहून गेलेलं सगळं आठवतं बघ.पावसाच्या पाण्यानं खिडकीच्या काचा पण झाल्यात स्वच्छ!म्हणून की काय,सगळं स्वच्छ दिसतय बघ.आठवतंय तुला,आपल्या वेळेला पाऊस आणि शाळा एकदमच सुरू व्हायचं.जणू काही पावसाचीपण उन्हाळ्याची सुट्टी संपायची आणि त्याची जाणीव झाली की तो  एकदम धावत यायचा.ज्या आठवड्यात शाळा सुरू,त्याच आठवड्यात पाऊस सुरू.मग आपले नवे कोरे युनिफॉर्म,दप्तर आणि वह्यापुस्तकं जपत,सांभाळत,रेनकोट घालून अवघडत चालत चालत शाळा गाठायची.शाळाही सगळी ओलीचिंब! बाहेरून आणि बरीचशी आतूनही.पण बरेचसे शिक्षक मात्र आतून कोरडेच असायचे.पावसात सुद्धा थोडासा उशीर झाला तरी पट्टीचा एक फटका बसणारच हे नक्की.

फटका आठवला आणि भानावर आलो बघ.ते बघ,ती चिखल तुडवणारी पोरं.एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणारी पोरं.ते बघ,तिकडून आली  ती दोघं, कागदाच्या होड्या घेऊन.आता या मोठ्या पावसात काय टिकणार या होड्या?पण केव्हा एकदा होडी सोडतोय पाण्यात असं झालंय त्यांना.ते बघ तिकडं रंगीत पट्टयापट्टयाची छत्री घेऊन कोण आलय.सुटलं वारं आणि झाली छत्री उलटी.आता काय,नुसती रडारड.पावसाच्या मा-यापेक्षा   घरच्या माराचीच भीती जास्त.ती बघ अंगणातली छोट्यांची फौज.गोल गोल फिरत सुरू झालीत गाणी पावसाची.”पावसाच्या धारा,येती झरझरा…”पलिकडे बघ   जरा.शेजारच्या काकू आल्या धावत आणि पडल्या धबक्कन चिखलात.सगळी पोरं हसताहेत

फिदीफिदी. आता वाळत टाकलेले कपडे एवढ्या पावसात भिजल्याशिवाय राहणार आहेत का? कशाला घाई करायची? जाऊ दे,आपल्याला तर मजा बघायला मिळाली की नाही !अशा सगळ्या गमतीजमती डोळ्यासमोर उभ्या राहतात चित्र बनून असा पाऊस बघायला लागल्यावर.म्हणून थोडा वेळ तरी लहान व्हायचं असतं.नाहीतर उद्या पेपर आहेच की ,कुठं झाडं पडली,कुठं नुकसान झालं,कुठं दुर्घटना घडली हे सगळं वाचायला.हे सगळं घडू नये असं वाटतं पण तरीही घडत असतंच.मग असं थोडं मागचं आठवाव,मनाच्या पुस्तकाची पानं फडफडावीत आणि जरा ताजं तवान व्हावं.हे सगळं आठवता आठवता पावसाचा जोर ओसरला बघ.चला,आता जरा गरमागरम चहा मिळतोय का बघूया.सारखं खिडकीत बसून कसं चालेल?येतोयस का चहाला?तू कशाला येशील म्हणा?तिकडे भजावर   ताव मारत असशील,होय ना?

चला, दुसरी सर यायच्या आत चहाची एक फेरी होऊन जाऊ द्या !

©  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोणता रंग घेऊ हाती… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

? कोणता रंग घेऊ हाती ? सौ राधिका भांडारकर ☆

“द स्काय इज पिंक”, या चित्रपटातला तो मुलगा, मला सहज आठवला.  त्याने एक चित्र काढले होते आणि त्या चित्रातले आकाश त्यांनी गुलाबी रंगाने रंगवले होते. त्यावेळी त्याची शिक्षिका त्याला रागावली होती. म्हणाली होती…

…”तुला कळत नाही का? आकाश निळे असते गुलाबी नसते”

मुलाचे म्हणणे सूर्य उगवतांना आणि सूर्य मावळतांना आकाश गुलाबीच असते ना? पण तरीही त्याने काढलेले ते चित्र रद्द ठरले.

त्याच्या आईने त्याला समजावले आणि म्हटले “तुला आकाश गुलाबी दिसते ना मग तू ते गुलाबी रंगानेच रंगव, बक्षिस नाही मिळाले तरी चालेल.”

मनात पटकन विचार आला की खरंच आपल्या दृष्टीला जे रंग दिसतात तेच खरे. कुणी कोणता रंग हाती घ्यावा ही ज्याची त्याची मर्जी.

कधी वाटतं, आयुष्य म्हणजे रंगपंचमी आहे.  जन्माला येतानाच ईश्वराने आपल्यासोबत एक रंग पेटी दिली आहे.

“ता ना पि ही नि पां जा” — या सप्तरंगाची पेटी घेऊनच आपण या पृथ्वीतलावर आलो. या सप्तरंगांच्या मिश्रणाने आणखी कितीतरी रंगांच्या छटा नकळत आपल्या आयुष्यासोबत झिरपत असतात का?

“पानी रे पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिला दो लगे उस जैसा।

गंगा से जब मिले तो बनता गंगाजल ।बादल से तू मिले तो रिमझिम बरसे सावन।।”

जन्मतः  कुठलाच रंग नसतो जीवनाला,  ते असते पाण्यासारखे नितळ, रंगहीन पण निर्मळ जगण्याच्या प्रक्रियेमध्ये मग रंग भरत जातात. कधी नकळत कधी आपण ते जाणीवपूर्वक भरत राहतो. मग त्यात प्रेमाचा गुलाबी रंग असतो, मनाच्या ताजेपणाचा हिरवा रंग असतो, कधी  लाल रंगाचा अंगार असतो, तर कधी शौर्याची नारिंगी छटा असते, भक्तीचा निळा शांत प्रकाश असतो, पांढऱ्या रंगाची स्थिरता असते, तर पिवळ्या रंगातला आनंद असतो. पण कधी द्वेष मत्सर यांचा हेवा दाव्याचा, तीव्र स्पर्धेचा, मान  अपमानाचा भयानक काळाभोर रंग व्यापून उरलेला असतो.

कधी अंतरंगात डोकावून पाहिलंय का? कोणता रंग दिसतो? काळाच काळा. मग बाकीचे पेटीतले इतके सुंदर रंग गेले कुठे? का पण ते कधी हाती घेतलेच नाही? या काळ्या रंगातच रेघोट्या मारत बसलो? असं म्हणतात कावीळ झालेल्या माणसाला सगळे जगचं पिवळे दिसते तसं झालं का आपलं? फक्त या काळ्या रंगाने आपल्यावर कुरघोडी केली का ? इंद्रधनुष्यातील सात रंग  कुठे हरवले? आनंदाने नाचणाऱ्या मोराचा निळा रंग, वर्षा ऋतूतील धरेचा हिरवा रंग, बहाव्याचा पिवळा सुखद रंग, पिकलेल्या रानाचा सुवर्ण रंग, याने कां नाही भुलवले आपल्याला?

बरं !!काळ्या रंगातही आपण पाहिला तो कावळा…

…विठ्ठल नाही पाहिला, पाणी देणारा मेघ नाही पाहिला. आपण रंग पाहिला तो अंधाराचा. या काळ्या रंंगाने आपल्या आयुष्याला भीषण केलं, गढूळ केलं. मुळातच कुठला रंग हाती घ्यावा हे ठरवायच्या आधीच या काळ्या रंगाने प्रवेश केला अन मग सारंच काळवंडलं कां?

सुरेश भट यांची एक गझल आठवते—

।।  रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा.

गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा.

माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी,

माझियासाठी न माझा, पेटण्याचा सोहळा.

रंग माझा वेगळा ।।”

एका कलंदर माणसाच्या आयुष्याचं व्यक्तिमत्व कसं असतं तर साऱ्या रंगांच्या, दुःखाच्या, अपमानाच्या, फसवणुकीच्या झळा सोसूनही तो सूर्यासारखा तळपतो आणि वेगळ्या रंगाचा सोहळा साजरा करतो आणि म्हणतो रंग माझा वेगळा. —  कोणता रंग घेऊ हाती याचे उत्तर जणू या काव्यपंक्तीत सापडतं.

चला तर मग ईश्वराने दिलेली रंगपेटी उघडू या. सप्तरंगांनी आपले जीवनचित्र रंगवूया. हा काळा रंग पार बाजूलाच ठेवूया—

— असा रंग हाती घेऊ या की, ज्याने “ अवघा रंग एक झाला,” ही भावना मनावर स्वार होईल.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares