मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’नारी शक्ती दिवस…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नारी शक्ती दिवस…☆ सुश्री शोभा जोशी ☆

राणी मां गाईदन्ल्यू

“नारी शक्ती दिवस …”

हम इस देश की नारी है!

फूल नही चिंगारी है

असं गर्वाने सांगणार्‍या या पराक्रमी स्रियांचा सन्मान करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे २६ जानेवारी हा दिवस ‘नारी शक्ती दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. आपला पराक्रम सिध्द करणार्‍या अनेक स्रिया आपल्या देशात होऊन गेल्या. अगदी देवी देवतांपासून अलिकडच्या स्रियांपर्यंत. अगदी जनजातीतील स्रिया सुध्दा याला अपवाद नाहीत.

२६ जानेवारी हा दिवस ‘ नारी शक्ती दिवस ‘ म्हणून का निवडला?जी महिला ब्रिटिशांविरूध्द लढा देताना ऐन तारूण्यात १४ वर्षं ब्रिटिशांच्या कैदेत राहिली, त्या राणी मां गाईदन्ल्यूंचा २६ जानेवारी हा जन्मदिवस.

पूर्वेकडील मणीपूर राज्यात, काला नागा पर्वतांची रांग आहे. तेथील लंकोवा गावामध्ये,रोंगमै जनजातीतील लोथोनाग व करोतलीन्ल्यू या दांपत्त्याच्या पोटी,२६ जानेवारी १९१५ ला गाईदन्ल्यूचा जन्म झाला. ७ बहिणी व १ भाऊ असा त्यांचा परिवार होता. गाईदन्ल्यूचा अर्थ चांगला मार्ग दाखविणारी. ‘ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ या म्हणीनुसार,गाईदन्ल्यू लहानपणापासूनच स्वतंत्र विचाराच्या,दृढ इच्छाशक्ती असलेल्या,प्रतिभासंपन्न आणि चिंतनशील होत्या. आपल्या संस्कृतीवर, धर्मावर होणारं ख्रिश्र्चनांचं आक्रमण त्या पाहात होत्या. म्हणून आपल्या संस्कृतीचं, धर्माचं इंग्रजांपासून संरक्षण करणं,रूढी परंपरा टिकवून ठेवणं,अंधश्रध्दा दूर करणं,तसंच ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलवून लावणं हे ध्येय त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षांपासून उराशी बाळगलं होतं.

‘हेरका’ या धार्मिक आणि नंतर स्वतंत्रता आंदोलनाकडे झुकलेल्या आंदोलनाचा प्रणेता,गाईदन्ल्यूंचा चुलत भाऊ,हैपोऊ जादोनांगला ब्रिटिशांनी फासावर लटकावले आणि वयाच्या १६ व्या वर्षी या लढ्याचे नेतृत्व गाईदन्ल्यूंकडे आले.

इंग्रजांना टॅक्स न देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. साथीदारांच्या साथीने,गनिमी काव्याने इंग्रजांवर हल्ले केले. असे करून त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला. त्यांना पकडण्यासाठी आधी २००/- रू. आणि नंतर ५००/- रू. बक्षीस जाहीर केलं पण त्या इंग्रजांच्या हाती लागल्या नाहीत.

१६ फेब्रु. १९३२ रोजी आसाम रायफल्सच्या सैनिकांबरोबर त्यांची लढाई झाली. त्यावेळीही इंग्रजांना त्यांना पकडता आले नाही. पण पोलोमी गावी आऊट पोस्ट बनवत असताना,एका बेसावध क्षणी त्या पकडल्या गेल्या. त्यांनी १४ वर्षं तुरूंगवास भोगला.

१९३७ साली पं. नेहरूंनी शिलाॅंगच्या तुरूंगात त्यांची भेट घेतली. त्यांचा पराक्रम पाहून, ‘ आपण तर नागांची राणी आहात ‘या शब्दात त्यांचा गौरव केला. राणी माॅं गाईदन्ल्यूची तुरूंगातून सुटका करावी,ही नेहरूंची मागणी ब्रिटिशांनी धुडकावून लावली. स्वातंत्र्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली.

सूर्याला तात्पुरते ग्रहण लागले म्हणून तो कायमचा निस्तेज होत नाही. तसेच तुरूंगातून सुटल्यावर राणी माॅं पुन्हा झळाळून उठल्या. त्यांनी स्वतःला समाजकार्याला वाहून घेतलं. १९८५ साली वनवासी कल्याण आश्रमाच्या भिलाई येथे झालेल्या पहिल्या महिला संमेलनास त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. १७ फेब्रु. १९९३ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकारने एक टपाल तिकिट काढले. त्यांचे देशासाठीचे योगदान पाहून त्यांना ताम्रपट देऊन गौरवण्यात आले होते.

जनजातीमध्ये इतरही अनेक स्रियांनी मुघलांविरूध्द आणि इंग्रजांविरूध्द लढताना परा क्रम गाजवला आहे. वेळप्रसंगी प्राणांचे बलिदान दिले आहे. उदा.

महाराणी दुर्गावती. – ५ आॅक्टोबर १५२४ ला गोंंडवनातील कालिंजर किल्ल्यात जन्मलेली दुर्गावती पुढे गढमंगला राज्याची राणी झाली. या कुशल प्रशासक,पराक्रमी, शूर वीर राणीने अकबराच्या सैन्याचा युध्दात दोनदा पराभव केला. तिसर्‍या वेळी हार समोर दिसत असताना,ती बादशहा अकबराला शरण गेली नाही. तिने स्वतःच्या छातीत खंजीर खुपसून मरण जवळ केले.

झलकारीबाई – 

‘दैवायत्त कुले जन्मं

मदायत्तं तु पौरूषम् ‘

माझा जन्म कुठल्या कुळात व्हावा हे हातात नसलं तरी जन्म कसा घालवावा हे आपल्याला ठरवता येतं. ही उक्ती खरी करून दाखवली ती झलकारीबाईंनी. बुंदेल खंडातील भोजला गावामध्ये जनजातीतील एका निर्धन कोळी कुटूंबातील,खांदोबा आणि धनिया या दाम्पत्यापोटी २३ नोव्हेंबर १८३० रोजी जन्मलेल्या झलकारीबाई पुढे राणी लक्ष्मीबाईंच्या ‘दुर्गा ‘ नावाच्या सेनेच्या महिला तुकडीच्या सेनापती झाल्या. तलवारबाजी,बंदुका, तोफा चालविण्यात त्या पटाईत होत्या. झाशीच्या किल्ल्यावर इंग्रजांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी,राणी लक्ष्मीबाईंच्या जीवाला धोका आहे हे झलकारीबाईंच्या लक्षात आले. त्यांनी राणींच्या दत्तक पुत्राला घेऊन,किल्ल्यातून बाहेर पडण्याचा सल्ला राणींना दिला.

झलकारीबाई आणि राणींच्या चेहर्‍यात खूप साम्य असल्याने त्या राणींच्या वेशात इंग्रज सैन्याला सामोर्‍या गेल्या आणि राणी लक्ष्मीबाईंचे प्राण वाचवले.

फुलो आणि झानो – संथाल परगण्यातील सिध्दो – कान्होंच्या या बहिणी कुर्‍हाडीने शत्रूला मारण्यात तरबेज होत्या. त्यांनी इंग्रज आणि जनतेच्या शोषणकर्त्या जमीनदारांविरूध्द सशस्र संघर्ष केला.

अंदमानची लीपा,मिझोरामची राणी रोपुईलियानी,अरूणाचलच्या सीमावर्ती भागातील नीरा आणि सेला,छत्तीसगड मधील दयावती कंवर, राजस्थानची कालीबाई,उत्तराखंडची गौरादेवी,गोंडवनाची राणी फुलकंवर इ. या निरनिराळ्या राज्यातील सर्व स्रियांनी इंग्रजांविरूध्द लढा दिला आहे. जनजातीतील अशा अजून कितीतरी स्रिया आहेत.

या अधुनिक काळातील महिलाच पराक्रमी होत्या असं नाही. तर वारसा अगदी आपल्या देवी देवतांपासून चालत आला आहे. महिषासूर मर्दिनी,काली माता,चंडिका अशा अनेक देवता ज्यांनी आपल्या शक्तीने आणि पराक्रमाने अनेक राक्षसांचा नाश केला.

इतिहासात डोकावले तर राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर,राणी ताराबाई,राणी चेन्नम्मा अशा कितीतरी स्रियांची नावं समोर येतील. या झाल्या युध्दभूमीवर पराक्रम गाजवणार्‍या स्रिया. पण बौध्दिक क्षेत्रातही स्रिया मागे नाहीत. पुराणातील गार्गी, मैत्रेयी,लोपामुद्रा इत्यादींनी आपल्या बुध्दीचातुर्याने मोठ्या मोठ्या विद्वान पंडितांना हरवले होते. विद्वत्तेच्या बाबतीत डाॅ. आनंदीबाई जोशी,डाॅ. रखमाबाई राऊत,पंडिता रमाबाई,सावित्रीबाई फुले इ. स्रियांनी आपली विद्वत्ता अशा काळात सिध्द केली की, ज्या काळात स्रियांना घराबाहेर पडण्याची देखील बंदी होती.

या स्रियांचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन पिढीतील महिलांना प्रेरणा देण्यासाठी,पराक्रमी राणी गाईदन्ल्यूंचा २६ जानेवारी हा जन्मदिवस ‘नारी शक्ती दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. 💐🙏

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फ्यूज उडालेले बल्ब… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

फ्यूज उडालेले बल्ब... 💡 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

फ्यूज उडालेले सगळे बल्ब एकसारखेच असतात !!

एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महाला सारखे सरकारी घर सोडून एका हाउसिंग सोसायटीत, त्यांच्या स्वत:च्या फ्लॅट मध्ये राहायला गेले.

ते सेवा निवृत्त असले तरी, स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं.

ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्क मध्ये फिरत असतानासुद्धा, दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहात असत.

एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा-गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत.

प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत.

ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, “सेवा निवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो, की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही, केवळ नाइलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे. ” आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत.

बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली, तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली.

ते म्हणाले,“सेवा निवृत्त झाल्यावर, आपण सगळे फ्यूज वुडलेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची वॉट क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला. “

पुढे ते म्हणाले……

” मागील 5 वर्षांपासून मी ह्या सोसायटीत रहात आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो.

.. तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत, जे भारतीय रेल्वेत महाप्रबन्धक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत….. तिकडे सिंग साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते.

.. तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रो (ISRO) च्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

 — – आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मलासुद्धा, पण मला माहीत आहे.

सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता एक समानच आहेत – त्यांची वॉट क्षमता काहीही असो – 0, 10, 40, 60, 100 वॉट – आता त्याने काहीही फरक पडत नाही.

.. आणि यामुळे सुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता – एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा.

.. आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते. ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल… उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात. परंतु, खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते. इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही.

….. ही गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके चांगले आहे. “

आपलं वर्तमान पद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात.

या गोष्टींबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता, आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो.

लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात.

आपल्या जवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा. हवा तर समाज कार्यास वेळ द्या !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – गीता आणि समत्व – भाग – ५ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… – गीता आणि समत्व – भाग – ५ ☆ सौ शालिनी जोशी

आपले जीवन विरोधी गोष्टींनी युक्त आहे. इथे सुख आहे आणि दुःखही आहे. तसेच राग- द्वेष, लाभ-अलाभ, जय- पराजय, शीत- उष्ण असे द्वैत आहे. यापैकी एक गोष्टच एका वेळी साध्य असते. आपली स्वाभाविक ओढ सुखाकडे. ते हातात आल्यावर निसटून जाईल की काय भीती आणि सुख मिळवण्यासाठी केलेले श्रम दुःखच निर्माण करतात. सुखाचे दुःख कसे होते कळतच नाही. जयाच्या उन्मादात पराजय पुढे ठाकतो. साध्याच्या वाटेवर अडचणी येतात, सध्याचे असाध्य होते. असा हा लपाछपीचा खेळ म्हणजे जीवन. माणूस यातच गुंततो आणि खऱ्या शाश्वत सुखाला मुकतो. अशा वेळी या दोन्ही गोष्टी कशा सांभाळाव्या आणि आनंदी जीवन कसे जगावे याचा उपाय गीता सांगते. तो म्हणजे समत्व,समानता.

सुख म्हणजे इंद्रियांना अनुकूल आणि इंद्रियांना प्रतिकुल ते दुःख. (ख- इंद्रिय). या दोन्हीचा परिणाम मनावर होऊ द्यायचा नाही. मन स्थिर असेल तर बुद्धी ही स्थिर राहते. कार्याविषयी दृढभाव निर्माण होतो. इंद्रियांच्या प्रतिक्रिया नाहीत. हळहळ नाही, हुरळून जाणे नाही. सुखदुःख येवो, यश मिळो अथवा न मिळो अशा विरुद्ध परिस्थितीतही मनाची चलबिचल न होता स्थिर राहणे हेच गीतेत सांगितलेले समत्व. गीता म्हणते,’ सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यतेl’ म्हणजेच ‘सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जयाजयौl’ अशी ही स्थिती. शीत- उष्ण, शुभ -अशुभ, राग- द्वेष, प्रिय-अप्रिय, निंदा-स्तुती, मान- अपमान असे प्रसंग येतच असतात. कोणतीही वेळ आली तरी जो सुखाने हर्षित होत नाही. दुःखाने खचून जात नाही त्यालाच समत्व साधले. अशा बुद्धीने केलेले कर्म हे निष्काम होते. कर्मातील मनाचा असा समतोलपणा हाच निष्काम कर्मयोग आणि हे ज्याला साधलं तोच श्रेष्ठ भक्त, गुणातीत, जीवनमुक्त.

हेच समत्व वस्तू व प्राणीमात्रांविषयी, सर्व भूतान् विषयी असावे असे गीता सांगते. वस्तू विषयी म्हणजे ‘समलोष्ठाश्मकांचन:’ (६/८)अशी स्थिती. दगड,माती आणि सोन या तीनही विषयी समत्व. माणसाला सोन्याची आसक्ती असते. ती नसणे म्हणजे ‘धनवित्त आम्हा मृत्तिके समान’. असा माणूस अनासक्त असतो. तसेच व्यक्तीविषयी समत्व ही गीता सांगते ‘सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबंधुषु l साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यतेl(६/९). निरपेक्ष मित्र,उदासीन, मध्यस्थ, द्वेष करणारा, हितकारक बंधू, पापी आणि साधू पुरुष यांचे विषयी समभाव असणारा ब्राह्मण, गाय, कुत्रा, चांडाळ यातही समत्व पाहतो. कुणाच्या द्वेष करत नाही. वरवर ते भिन्न दिसले तरी सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे या भावनेने सर्वांचा योग्य आदर करणे हीच समत्वबुद्धी. भगवंत स्वतःही समत्त्वाचे आचरण करतात. ‘समोsहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योsस्ति न प्रिय:l’ ‘सर्व भूतात मी समभावाने व्यापून आहे. मला कोणी अप्रिय नाही आणि प्रिय नाही. हा भेद माझ्या ठिकाणी नाही. आत्मरूपाने मी सर्वांना व्यापून आहे.

सर्व भूतात भगवंत तोच माझ्यात आहे आणि मी त्यांच्यात हा सर्व भुतात्मभाव. ‘ जे जे देखे भूत ते ते भगवंत’ मान्य झाली की राग द्वेष कुणाच्या करणार ? सर्वत्र एकच परमात्मा पाहणे हेच समत्व. असे समत्व प्राप्त झाले की दृष्टिच बदलते. गत काळाचा शोक नाही, भविष्याची चिंता नाही. वर्तमानात सर्वांशी समत्वाने व्यवहार. प्राप्त कर्म उत्कृष्टपणे करणे हाच स्वधर्म होतो. शत्रु- मित्र आणि लाभ-अलाभ इत्यादी सर्व भेद स्वार्थापोटी. पण जेथे स्वार्थच नाही तिथे सर्वच समत्व. दोषांची निंदा नाही, गुणांचे स्तुती नाही दोन्ही सारखेच. आपपर भाव नाही. अशीही भेद रहित अवस्था म्हणजे सर्व सुख, मोक्ष.

असा हा जीवनाला आवश्यक विचार गीता सांगते. त्रासदायक गोष्टी टाळून शांत व सुखी जीवनाचा मार्ग दाखवते. अध्यात्माची दृष्टी देते. अर्जुनालाही युद्धातील जय पराजया विषयी समत्व सांगितले. युद्धात समोर येणारा कोणीही असला तरी शत्रूच असतो. ही समत्वबुद्धी सांगून अशा समत्व योगाने कर्म हेच कौशल्य असेही सांगितले. असे निष्काम बुद्धीने केलेल्या कर्माचे अकर्म होते. ते पाप पुण्य द्यायला शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे अर्जुनाबरोबर सर्वांनाच गीता नवीन विचार देते. सत्कर्म, स्वधर्म, समत्व हा गीतेचा पायाच आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुझे आहे तुजपाशी – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “तुझे आहे तुजपाशी – –” ☆ श्री जगदीश काबरे

मोगो नावाचा एक चिनी मुलगा. तो बिचारा दगड फोडायचं काम करायचा. हाताला फोड यायचे. उन्हातान्हात दगड फोडून अंगाला घामाच्या धारा लागायच्या. लोकांना कसली भन्नाट कामं करायला मिळतात आणि आपल्याच नशिबी काय ही दगडफोडी, असं तो नेहमी मनात म्हणे आणि दुःखी होई.

एकदा त्याचं दुखणं एका देवदुतानं ऐकलं. त्याचे दयावून त्याने त्याला विचारलं की, “का तू इतका उदास?”

मोगो म्हणतो, “देवानं माझ्यावर अन्याय केलाय. हे असलं काम दिलंय मला. तू विचार देवाला की, का त्यानं असं केलं?” 

देवदूत देवाकडं जातो विचारतो, “का या तरुणावर अन्यायकेला तुम्ही?” 

देव म्हणतो, “ठीक आहे. आजपासून त्याला जे काम आवडेल ते त्याला मिळेल. “

त्याच दिवशी मोगो दगड फोडताना एक श्रीमंत माणूस पाहतो. तो असतो हिर्‍यांचा व्यापारी. मोगोला वाटतं, ‘असं नशीब पाहिजे होतं आपलं. ‘ 

देवदूत तथास्तू म्हणतो आणि मोगो एकदम बडा व्यापारी होतो. एका महालात हिरे-जवाहरात लोळू लागतो. पण नेमका त्या वर्षी उन्हाळा फार असतो. काही दिवसात तो कंटाळतो. त्याला वाटतं, ‘या पैशाला काही अर्थ नाही. आपण थेट सूर्याइतकं पॉवरफूल व्हायला हवं. ‘

त्याच क्षणी त्याचं सूर्यात रूपांतर होतं… सर्वोच्च स्थान! सारं जग त्याच्याभोवती फिरू लागतं. उन्हाळा सरून पावसाळा येतो. ढग सूर्याला ग्रासून टाकतात. मोगोला तर पृथ्वीही दिसेनाशी होते. त्याला वाटतं, ‘सूर्यापेक्षा ढग जास्त पॉवरफूल आहे. ‘ 

मग काय तो ढग होतो… बरसतो. पण पाहतो तर काय, सगळं जग भिजतंय पण एक टणक खडक मात्र कोरडाच. पाण्यानं तो न फुटतो न हलतो. मोगो म्हणतो, ही खरी ताकद. त्याक्षणी तो खडक होतो.

काही दिवसांत एक माणूस येतो खडक फोडायला लागतो. मोगो पुन्हा ओरडतो आणि म्हणतो, ‘देवा मला खडक फोडणारा कर, तो खरा स्ट्राँग!’ 

झालं, मोगो पुन्हा दगडफोड्या होतो.

मग मोगो देवदुताला विचारतो, “म्हणजे मीच खरा पॉवरफूल आहे की काय?”

देवदूत हसतो आणि म्हणतो, “तुला मनापासून तुझं काम आवडलं, त्यात सुख वाटलं तर तूच खरा पॉवरफूल. नाहीतर तू कुणीही झालास तरी असमाधानीच राहशील. “

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चल अकेला… चल अकेला… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ चल अकेला… चल अकेला… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ओ. पी. नय्यर

“मी कंपोजर म्हणून जन्माला आलो.. कंपोजर म्हणुनच देह ठेवणार”

हे उद्गार आहेत ओ. पी. नय्यरचे. ओपीचा जन्म लाहोरचा. जगण्याची ऐट बघावी तर लाहोरमध्ये असा तो काळ. मदन गोपाल नय्यर या सरकारी हुद्देदाराच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा संगीत क्षेत्रात नाव काढील असं खरं तर कोणालाही वाटलं नसेल. लाहोरच्याच शाळेत तो शिकला. माध्यम उर्दू. अभ्यासात त्याचं लक्ष कधीच नव्हतं. छंद गाणी म्हणण्याचा.

असंच एकदा लाहोर रेडिओ वर गाणं म्हणण्याची त्याला संधी मिळाली. तेव्हा त्याचं वय होतं अवघं आठ.

… आणि मग त्याला रेडिओवर कामं मिळतंच गेली. कधी लहान मुलांच्या कार्यक्रमात तर कधी कोरसमध्ये. त्याकाळी लाहोर फिल्म इंडस्ट्री जोरात होती. त्याला एक दोन चित्रपटात कामेही मिळाली. घरच्यांचा अर्थातच विरोध. पोरगं वाया गेलं.. गाणं बजावण्याच्या मागे लागलं ही भुमिका.

तो मॅट्रीक झाला. जेमतेमच मार्क मिळाले. लाहोरमधल्या यथातथा कॉलेजमध्ये एडमीशन मिळाली. आता त्याला वेड लागले इंग्रजी चित्रपट बघण्याचे. त्यातील पात्रांचे रहाणीमान,स्टाईलच्या तो प्रेमात पडला. त्यानेही आपली स्टाईल बदलली. सिल्कचा फुल स्लीव्ह शर्ट, ट्राऊजर,पायात चकचकीत शुज,आणि डोक्यावर हैट.

देशाची फाळणी झाली आणि सगळंच बदलुन गेलं. तो मुंबईत आला. काही चित्रपट मिळत गेले. पण हवं तसं यश काही मिळत नव्हतं. पण ‘आरपार’ आला आणि ओपीचं नशीब बदललं. एकामागोमाग एक हिटस्. फिल्म इंडस्ट्रीने अक्षरशः त्याला डोक्यावर घेतलं. यश.. पैसा.. किर्ती कशालाच कमी नाही. मोती माणकांचा पाऊस पडत होता. ओपी म्हणतो..

माझ्या पुरुषार्थावर नियती भाळली. तिच्या जुगारी, लहरी स्वभावावर मी फिदा. आमचं हे ‘लव अफेअर’ दहा वर्ष टिकलं. ही दहा वर्ष मी अक्षरशः सोन्याचे मढवुन काढली. यश.. पैसा.. किर्ती.. सुंदर, बुध्दिमान ललनांचा सहवास.. सगळं सगळं उपभोगलं. यथेच्छ.

आणि मग त्याच्या लक्षात येत गेलं. मोठे निर्माते आपल्याला टाळताहेत. काही बी ग्रेड.. सी ग्रेड चित्रपट मिळाले. त्यातही एखाद दुसरं गाणं हिट जायचं.

ओपीने काळाची पावलं ओळखली. काही प्रॉपर्टीज विकल्या. शेअर्स मध्ये पैसे अडकवले. मरीन ड्राईव्ह वरचा प्रशस्त फ्लॅट ठेवला. देवाला विनवले..

शेवटपर्यंत माझी ऐट सांभाळ.

आणि मग तो फिल्म इंडस्ट्रीपासुन अलगदपणे दुर झाला. नवीन आयुष्य सुरु झाले. सकाळी जरावेळ हार्मोनियम घेऊन बसायचे. त्यानंतर देवाचा जप. एका वहीत तो ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ असं लिहीत. पण उर्दूत. ओपीला देवनागरी लिपी लिहीता वाचता येत नव्हती. कारण शिक्षण झालेलं उर्दू माध्यमात.

संध्याकाळ तो पेशंट तपासे. हो तो आता किंचितसा डॉक्टर झाला होता. झालं काय कि.. एकदा त्याला कसलासा त्रास होत होता. आशा भोसले आणि सुधीर फडके त्याला घेऊन गेले डॉ. फाटकांकडे. डॉ. फाटक होमिओपॅथीत निष्णात. त्यांच्या औषधाने ओपींना आराम वाटला. ओपीने डॉक्टरांचे शिष्यत्व पत्करले. होमिओपॅथीची ओळख झाली. आणि मग संध्याकाळी दोन तीन पेशंटस् तपासु लागले. पण मोफत.

फी साठी नाही.

कधी रात्री जेवण झाल्यावर मरीन ड्राईव्ह वर जाऊन बसावे.. तर कधी इंग्रजी चित्रपटाला. रिगल.. लिबर्टी.. इरॉस ही आवडती थिएटर्स. जायचं ते थाटात. एकदम चार पाच तिकिटं खरेदी करायची. आजुबाजुच्या खुर्च्या रिकाम्या. त्यावर कोट.. हॅट ठेवायची. पाय लांब करायचे.. आणि चित्रपट एंजॉय करायचा.

१६ जानेवारी म्हणजे ओपीचा जन्मदिवस. आदल्या दिवशी भरपूर मिठाया.. ड्राय फ्रुटस् आणुन ठेवायचा. दिवसभर चाहत्यांची गर्दी. पहिला बुके येणार एच. एम. व्ही. कडुन.

संध्याकाळी गाण्यांची मैफल जमायची कोणी कोणी येत.. ओपीची गाणी म्हणत. कधी सुरात.. कधीच बेसुरातही. पण ओपीला ते आवडे.

असेच एकदा एका नवोदित गायकाने गाणं म्हणायला सुरुवात केली.

‘चल अकेला.. चल अकेला.. ‘

आणि ओपीला तो दिवस आठवला……

एस. मुखर्जी ‘संबंध’ बनवत होते. गाणी होती कवी प्रदिप यांची. संगीत ओपी. त्यादिवशी प्रदिप यांनी गाणं लिहुन आणलं. हेच ‘चल अकेला.. चल अकेला.. ‘ आणि मुखर्जींकडे हट्ट धरुन बसले. याला चाल मीच लावणार.. गाणारही मीच.

ओपीने ते गाणं वाचलं. आणि त्यांच्या लक्षात आलं. प्रदिप या चांगल्या गाण्याचा विचका करणार. ते चिडले. आणि घरी निघून आले. ते गाणं डोक्यात घोळत होतंच. शब्द कसदार होते. अर्थ प्रवाही होता. पियानोवर बसले आणि एक अफलातुन चाल त्यांच्याकडून तयार झाली.

थोड्या वेळाने त्यांच्या मागोमाग प्रदिप आणि मुखर्जी ओपींकडे आले. त्यांची समजूत घालायला. आल्यानंतर प्रदिप यांनी ते गाणं.. ती चाल ऐकली आणि म्हणाले..

“ओपी तुम्ही माझ्या गाण्याचं लखलखतं झुंबर करुन टाकलंय”

ओपीने नंतर ते गाणं रेकॉर्ड केलं. मुकेशच्या आवाजात. वास्तविक मुकेश ओपीकडे फारसा गायला नाही. पण या गाण्यासाठी मुकेशच हवा हा आशा भोसलेचा हट्ट.

“या गाण्याचं मुकेश सोनं करील” 

हा आशाचा अंदाज सहीसही खरा ठरला.

————————————-

या गीतातील शब्द खरे ठरतील.. तेही आपल्या आयुष्यात हे ओपीला ठाऊकच नव्हते. निवृत्तीनंतरचं सुखासीन आयुष्य सुरु होतं. पण नशीब पालटलं. कौटुंबिक वाद सुरु झाले. प्रत्यक्ष बायको, मुलांनीच इस्टेटीवरुन त्याच्यावर दावा ठोकला. आणि ओपी कोसळला.

कोणताही विरोध न करता त्याने आपला फ्लॅट सोडला. अंगावरच्या कपड्यानिशी ओपी बाहेर पडला. सोबत घेतला फक्त हार्मोनियम.. जो त्याने लाहोरला पहिल्या कमाईतून घेतला होता. आणि घेतल्या नोटेशन्सच्या वह्या.

सगळं सोडुन दुर विरारला एका साध्या तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये रहायला आला. दुर तिकडे लाहोरला पर्वत पहाडांच्या मुलखात जन्माला आलेला.. मुंबईत सागर किनारी स्थिरावलेला.. यश,किर्ती सगळं काही मिळवलेला ओंकार प्रसाद नय्यर. शेकडो गाणी ज्याने आपल्या सुरांनी मढवली.. त्याच्या आयुष्याची आता संध्याकाळ झाली होती. अगदी 

‘लागले नेत्र रे पैलतीरी’

ही अवस्था. वारंवार जुने दिवस आठवताना त्याच्या लक्षात आले..

मागे नसतं पहायचं आठवणीत शिरताना..

पावलं जड पडतात

तिथुन मागे फिरताना.

आणि मग साऱ्या जुन्या आठवणींना त्याने मागे सारले. आपला जुना.. लाडका हार्मोनियम पुढे ओढला. आणि तेच गीत पुन्हा पुन्हा आळवु लागला…

‘चल अकेला चल अकेला चल अकेला…

तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला.. ‘

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मला जरा आराम हवा आहे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मला जरा आराम हवा आहे” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

“आई मला जरा आराम हवा आहे.. “

शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली.

“अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामच करायचा आहे.. “

मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला.

“आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिस च्या कामातून थकून गेलीये मी पार.. “

अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामच करायचा आहे..

मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो इतकी काय घाई आहे, एखादा वर्ष थांबू ना जरा.. “

“अगं मुलं होऊन गेली वेळेवर की टेन्शन नाही, नंतर आरामच करायचा आहे… “

मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला..

“अगं तुलाच जागरण करावं लागेल, मला ऑफिस आहे उद्या.. थोडे दिवस फक्त, मुलं मोठी झाली की आरामच करायचा आहे.. “

ती बाळासाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो मुलं आता शाळेत जायला लागली, जरा निवांत बसू द्या की मला.. “

“मुलांकडे नीट लक्ष दे, त्यांचा अभ्यास घे, नंतर आरामच करायचा आहे… “

ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला..

“आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, आता जरा निवांत झाले मी.. “

“आता यांच्या लग्नाचं पाहावं लागेल, ती एक जबाबदारी पार पाडली की मग आरामच करायचा आहे.. “

तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहून गेला..

“मुलं संसाराला लागली, आता मी आराम करणार.. “

“अगं आपली सुधा गर्भार आहे, माहेरी बाळंतपण करायचंय ना तिचं.. “

मुलीचं बाळंतपण आवरलं आणि आराम करायचा राहून गेला..

“चला, ही पण जबाबदारी पार पडली, आता आराम. “

“सासूबाई मला नोकरी परत जॉईन करायची आहे.. आरव ला सांभाळाल का?”

नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला..

“चला नातू मोठा झाला, आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या.. आता मी आराम करणार.. “

“अगं ऐकलं का, गुडघे दुखताय माझे, उठवलं जात नाही.. Bp वाढलाय वाटतं, डायबिटीस पण आहे.. डॉकटर ने वेळेवर पथ्यपाणी करायला सांगितलंय बरं का.. “

नवऱ्याची सेवा करायला उरलं सुरलं आयुष्य गेलं.. आणि आराम करायचा राहूनच गेला..

एक दिवशी देवच आला खाली, आराम करायचाय ना तुला? तिने हात जोडले आणि देव घेऊन गेला.. अखेर तिला आराम मिळाला, अगदी दिर्घकाळाचा.. !!!

सर्व स्त्रियांना समर्पित
👌💐 👍💐👌

लेखक  : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “काटे नसलेला गुलाब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “काटे नसलेला गुलाब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

…आम्ही भाजी मंडईतून घरी निघालो होतो… अर्थात आम्ही म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको… गद्दे पंचवीशीचा माझा बहर लग्नाच्या दशकपूर्ती दरम्यान केव्हाच उतरलेला… आणि हिचा गरगरीत बहरलेला… तिच्या हाताला पैश्याने भरलेल्या पाकिटाचाच भार तेव्हढाच सहन व्हायचा आणि माझा  पैश्याचं पाकिट सोडून बाकी सगळ्याचा भारच उचलून उचलून हर्क्युलस झालेला…त्या भाजीने भरलेल्या दोन जड पिशव्यांचे बंदानीं  माझ्या हाताला घातलेले आढेवेढे …तर  माणसानं सुटसुटीत कसं जगावं याचाच आर्दश जगापुढे ठेवायला हिचं पाऊल नेहमीच पुढे पुढे…. आणि हो भाजीवरुन आठवलं अहो त्या भाजी बाजारात मला ये पडवळ्या नि हिला ढब्बू मिरची या नावानेच  ओळखतात.. अहो त्यांना मी सतत डोळे मिचकावून ‘ असं निदान आमच्या समोर तरी म्हणून नका ‘ असं ज्याला त्याला डोळ्यांच्या सांकेतिक भाषेत सांगू पाहत राही.. पण  ते टोमणे ऐकून ज्याला त्याला  हि मात्र रागाने डोळे वटारून बघत असते.. आणि चुकून माकून त्याचवेळी मी करत असलेल्या नेत्रपल्लवीकडे  तिचे लक्ष गेलेच तर डोळे फाडून फाडून बघते हा काय पांचटपणा चालवलाय तुम्ही असे कायिक आर्विभाव करते… आता एकदा हिच्या बरोबर लग्न करून पस्तावा पावल्यावर लग्न या गोष्टीवरचा माझा विश्वासच उडाला असताना आणि इथून तिथून बायकांची जात शेवटी एकच असते तेव्हा खाली मान घालून चालणं ठरवल्यावर पुन्हा मान वर करून दुसऱ्या स्त्री कडे बघण्याचा सोस तरी उरेल का तुम्हीच सांगा! तरी पुरूष जातीचा स्वयंभू चंचलपणा कधीतरी डोकं वर काढतोच… आणि तशी एखादी हिरवळ नजरेला पडलीच तर माझा मीच अचंबित होतो…  अहो तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या त्या घराच्या वाटेवर एक सुंदरशी बाग आहे… रोज संध्याकाळी तिथं प्रेमी युगुलांचा नि कुटुंब वत्सलांचा जथ्था जागोजागी प्रेमाचे आलाप आळवताना दिसतात ना डोळ्यांना.. अगदी सहजपणे… कितीतरी मान वळवून दुसऱ्या दिशेला पाहायचा प्रयत्न केला तरी… मनचक्ष्चू तेच तेच चित्र दाखवत राहतात… मग वाटायचं आपलं मनं शुद्ध भावनेचं आहे यावर आपला विश्वास असताना कशाला उगाच दिसणाऱ्या सृष्टीला दृष्टिआड जबरदस्तीने करा… प्रत्येकाची आपापली तर्हा असते आपलं प्रेम व्यक्त करण्याची… करू देत कि बिचारे… आपल्याला हे सुख मिळालं नाही याची खंत  करण्यापेक्षा ते प्रेमी युगुल किती नशीबवान आहे.. कि त्यांच्या वाट्याला काटे नसलेला गुलाब आला… आणि आपल्याला गुलाब तर कधीच कोमेजून, सुकून गळून गेला आणि हाती फक्त काटेच काटे असणारा देठ मिळाला… असा मी काहीसा मनातल्या मनात विचार करत तिथून चाललो असताना मधेच हिने माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहिले आणि ती सुद्धा मनात विचार करू लागली… काय पाहतायेत कोण जाणे आणि कसल्या विचारात पडलेत काही कळत नाही.. इथं कशी जोडप्यानं बसलेले प्रेम करतात ते बघून घ्या म्हणावं.. अगदी तसच नसलं तरी बायकोवर कसं प्रेम करावं ते बघून तरी माणसानं शिकायला करायला काय हरकत आहे म्हणते मी… आणि मी एव्हढी घरात असताना जाता येता दुसऱ्यांच्या बायकांकडे बघणं शोभतं का या वयाला…

बराच वेळ मी माझ्या तंद्रीत होतो हे पाहून हिने माझी भावसमाधी कोपराची ढूशी देऊन भंग केली आणि वरच्या पट्टीत आवाज चढवून म्हणाली…  “बघा बघा तो नवरा आपल्या बायकोवर  मनापासून  कसं प्रेम करतोय आणि ती देखील छान प्रतिसाद देतेय… तुम्हाला कधी माझ्याबाबतीत असं जमलयं काय?… नेहमीचं एरंडाचं झाड असल्यासारखं तुमचं वागणं… “

माझ्यातल्या पुरूषार्थाला तिने चुनौतीच दिली…मग मीही ती संधी  साधली तिला म्हटले ” तुला जे दिसते ते कुठल्याही बाजूनें  खरं नाहीच मुळी… एकतरं  ते खरे नवरा बायको नसावेत, आणि  दुसरे  त्यांचे दोघांचे आपापले जोडीदार कुणी वेगळेही असू शकतात…प्रियकर प्रेयसीचं युगुल प्रेम करत आहेत तेच उद्या त्यांचं लग्न झाल्यावर आपल्या जागेवर ते नक्कीच दिसतील… भ्रभाचा भोपळा फुटायाचाच काय तो अवकाश… आणि शेवटचं लांबून कोणीतरी त्यांच्या या लवसिनचं शुटींग करत असणार.. कि या सिनसाठी त्यांनी पैसे घेतले असणार… हे विकतचं दिखाऊ बेगडी प्रेम पडद्यावर दाखवतात त्यावर तू भाळून जाऊ नकोस.. आणि तुला जर मी अगदी असच   तुझ्यावर प्रेम करावसं वाटत असेल तर मला थोडी तुझ्यापासून सुटका कर बाहेर प्रेमाचे धडे गिरवायला मला नवी प्रेयसीचा शोध घेतो  ते धडे शिकल्यावर मग तुझ्यावर प्रेमच प्रेम करत राहिन… “

माझं म्हणणं तिच्या पचनी पडणारं नव्हतचं मुळी.. तिने इतक्या झटक्याने मला म्हणाली “काही नको बाहेर वगैरे जायला तुम्ही जितकं प्रेम सध्या दाखवताय ना तितकसचं पुरेसे आहे मला… घरी तरी चला मग बघते तुमच्या कडे…म्हणे मला नव्याने प्रेयसी शोधायला हवी.. “

आमचा सुखसंवाद चालत असताना माझ्या मनाला सारखी ‘काटे नसलेला गुलाब मात्र दुसऱ्यांना मिळतो आणि मला मात्र गुलाब हरवलेला टोकदार काट्याचा देठच हाती यावा..’ हि सल सतत बोचत राहिली…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ८. – राहतो त्या परिसराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ९. राहतो त्या परिसराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

काही व्यक्ती अशा दिसतात की, आपण राहतो ते घर व सोसायटी, परिसर याची निंदा करताना दिसतात. पण ज्या परिसराने आपल्याला समाज,शेजार दिला त्या जीवनाधार असलेल्या परिसराची व घराची कधीही निंदा करू नये.

आपली नोकरी,व्यवसाय जिथे असेल त्या ठिकाणी आपल्याला रहावेच लागते. त्या स्थाना बद्दल मनात नेहेमी कृतज्ञता असावी. त्याला नावे ठेवू नयेत. आपण कितीही संकटात असलो तरी आपल्या घरा जवळच्या परिसरात आपल्याला सुरक्षित वाटते. मानसिक आधार मिळतो. बऱ्याच जणांचे बालपण त्या परिसरात गेलेले असते. त्या वेळी याच ठिकाणी आपण किती आनंदी होतो, किती काळ येथे व्यतीत केला आहे अशा चांगल्या आठवणी आठवाव्यात.

जरी काही गोष्टींची कमतरता असेल तरीही त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. गैरसोयी कायम स्वरुपी नसतात. जेथे राहतो त्या परिसरा विषयी आनंदी असावे. परिपूर्ण तर कोणीच नसते. आपल्यातही दोष असतातच. त्या परिसरात काय आहे या कडे लक्ष द्यावे. सदैव दोष, न्यूनत्व बघू नये. हे चराचर जग हे ब्रह्म आहे. त्या विषयी ममत्व,आपुलकी बाळगावी. म्हणजे दोष दिसत नाहीत आणि परकेपणा वाटत नाही.

प्रत्येकाने स्वतःशी विचार करून बघावा मी परिसराला नावे तर ठेवत नाही? आणि याचे उत्तर हो आले तर स्वतःची मनस्थिती बदलावी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ज्वारी… लय भारी…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

??

☆ ‘ज्वारी… लय भारी…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

सध्या भाकर ही पंचतारांकित झाली आहे. ती आता श्रीमंताची झाली आहे. हुरडा देखील असाच item झाला आहे वगैरे गुणगान करणारी एक क्लिप wapp वर आली होती. ती वाचून मी देखील व्यक्त झालो खालीलप्रमाणे… 

ज्वारी लयभारी… तुम्हाला प्यारी तर आम्हाला सगी सोयरी… तरी सुखी असे माहेरी.

मटणाच्या रश्याबरोबरची तर मला ज्ञात नाही ( तुम्हालाही नसेलच ही खात्री ) पण रात्रीच्या जेवणासाठी तयार केलेल्या आणि रात्री बेरात्री अतिथी आलाच तर वेळेवर पिठलं करून वेळ साजरी व्हावी म्हणून आवेलाच्या मागे ताठ उभ्या असलेल्या भाकरी जर शिल्लक राहिल्या तर सकाळच्या लोणचं, कढवलेलं तेल व हाताने फोडलेल्या कांद्याबरोबरच्या चविष्ट न्याहरीची गोष्टच न्यारी.

उमरीच्या घरच्या गोदामाकडील अंगणात अखंड अग्निहोत्रासम धगधगणाऱ्या चूल-माऊलीच्या उदरात असलेल्या तप्त निखाऱ्यावर ज्वारीच्या पिठाच्या पानग्याला दोन्हीकडून पळसाची पाने लावून झोकून दिल्यावर तावून सुलाखून बाहेर आलेल्या पानग्याची चवच जगावेगळी.

शिळ्या भाकरी त्यावर तिळाची चटणी, तेल, आंब्याचं रायतं, दोन तीन कांदे स्वच्छ पालवात बांधून कुंभीपट्टीकडील झोरमळ्यावर ( नदीवर ) जाऊन त्या अन्नपूर्णा देवीच्या प्रसादावर ( भाकरीवर ) ताव मारण्याचा स्वर्गीय आनंद अपारच. जन्मांध असलेल्या आबईने केलेल्या चुलीवरील बेदाग, शुभ्र भाकरीचे देखणे पहात रहावेसे रूप अवर्णनीय.

रात्री नुकतीच सामसूम झालेली असायची. तसेच बारभाईचं ( धबडक्याचं) घर सोडलं तर इतरत्र उमरीला रात्री आठ म्हणजे निरव शांतता असायची. उकंडबाऱ्याच्या वाडीकडील गावकुसातून अनवाणी पायाने हळुवार चालत आलेली सखू शांतपणे फरसावरून आवाज द्यायची, ” भाकर हाय का मायजी ? “

तिचा हा अगतिक स्वर तिच्या घरातील त्यादिवशी उपाशी असणाऱ्या कुणासाठी तरी असायचा.

काकी किंवा माई सखूची हाक ऐकून चुलीच्या बाजूला उभ्या ठेवलेल्या भाकरीपैकी एक, दोन भाकरी कोरड्यासासोबत ( वरण, भाजी किंवा लोणचं) डेलजी ओलांडून फरसावर येऊन सखूने पसरलेल्या लुगड्याच्या पदरात हळुवार वाढून देत असत. याचक म्हणून आलेली सखू पण माऊली.. आणि तिची झोळी रिकामी न जाऊ देणारी पण माऊलीच. एकीकडे अगतिकता दुसरीकडे संपन्नतेचा अहंकार नाही.

अशी ही भाकर.

… अशीच एक संध्याकाळ संपून उगवलेली रात्र. सर्वांची जेवणं आटोपलेली. जेवणाची ओसरीला पोतेरं लागलेलं. दिवसभर कष्ट सोसलेली हाडं ( विशेषतः बायकांची ) सातरीवर पहुडण्याची वेळ झालेली.

दूरवरून कुत्र्यांचे भुंकणे कुंद असलेल्या शांततेचा भंग करणारे. अशात मारुतीच्या पाराजवळील शुभ्र दाढीधारी ‘ मलंग ‘ नावाचा फकीर पांडेबुवांच्या अंगणात, एका हातात लांब काठी, खांद्यावर झोळी दुसऱ्या हातात कंदील घेऊन उभा ठाकलेला. अंगणातील प्रचंड कडुलिंबाच्या पानांची सळसळ थांबलेली आणि

” हाज़ीर है तो दे दे मां ” असं आर्जव.

… परत पांडे बुवांच्या घरातील लक्ष्मीच्या कानावर पडलेले ते शब्द. चुलीवर ठेवलेली भाकर परत फकीराच्या झोळीत समाऊन गेलेली.

” तुमची जेवणं झालेली आहेत, काही शिल्लक असेल तरच द्या “, अशी अपेक्षा असलेला मलंग फकीर. त्यांच्या किंवा त्याच्या कुंटुंबीयांच्या पोटात जाणारी ही मोलाची भाकर.

… ईश्वरदत्त भूक. याचनेतही विनय. सहज भावनेने, निर्लेप मनाने दिलेली ही “भाकर”.

© श्री अ. ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

देवळांचे आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे..

पुणे नांवातच पुण्यभूमी आहे आणि पुण्याचा वेगळा असा स्वतंत्र इतिहासही आहे. कारण या शहराच्या अंगा खाद्यावर ऐतिहासीक खुणा आहेत. त्या काळात पुणे म्हणजे पेन्शनरांच शहर म्हणून ओळखल जायच. ‘ संध्या छाया भिवविती हृदया ‘ त्याला कारण एकटेपणा, पण अहो!अशी आजची पण तीच परिस्थिती आहे, पण वेळ कसा? कुठे? कुणाबरोबर? घालवायचा हा राक्षसासारखा भेसूर पणे ‘आ ‘ वासलेला प्रश्न, तेव्हां इतका बिकट नव्हता, कारण जिवाभावाच्या मित्रांबरोबर सुखदुःखाच्या गोष्टी सदाशिव पेठेच्या कट्ट्यावर आणि देवळांच्या पायरीवर बसून शेअर व्हायच्या. विद्येच माहेरघर म्हणून ओळखल जाणार हे शहर देवदेवतांच्या देवळानी भरगच्च भरलेल होत. कथा कीर्तन, काकड आरती, भजन यात माणसं एकरूप व्हायची. त्यामुळे गुंडगिरी खून दरोडे अशा कुविचारांचा ‘खच ‘कमी होता. शक्यतोवर सातच्याआत पोरी घरी पळायच्या. मवाली मुलांच्या मनांत शिवाजी महाराजांचा ‘परस्त्री मातेसमान’ हा बाणा ठसलेला होता.

नाना वाड्यावरून, हुतात्मा चौकातून पुढे गेल्यावर एक पुरातन मंदिर दुकानांच्या गर्दीत लपलय. गर्द केशरी कोरीव नक्षीकाम केलेल्या दरवाजामुळे आपली नजर तिथे स्थिरावते. आत पाऊल टाकल्याबरोबर समोर मारुतीच्या शेंदूरचर्चित मूर्तीचं दर्शन होत. शेंदुराच्या असंख्य पुटांमुळे मूळ मूर्तीचा अंदाज येत नाही. पुण्यातील चित्रविचित्र नांवात या मारुतीची गणना होते. कारण पूर्वी ह्या परिसरात ‘भांग’ विकली जायची म्हणून या मारुतीरायाच नामकरण झाल, ‘ भांग्या’ मारूती. पुण्यात ‘करळेवाडी, ‘ प्रसिद्ध होती खूप बिऱ्हाड होती तिथे, सोमणांच्या हॉटेलवरून ‘फिम्को शू’ दुकानावरून पुढे गेल की कमानदार दरवाज्याची ‘करळेवाडी’ लागायची. तिथून शिरल की एकदम दक्षिण मुखी मारुतीच्या पुढ्यातच आम्ही पोहोचायचो. आणखी पुढे गेल की यायचा शनिवार वाडा, अस वाटायचं मस्तानी महाल, पेशव्यांची बैठक, दिवाणखाना, पेशवीण बाईंचे दागिने, थाटाच्या वस्तू बघायला मिळतील पण कसल काय! आतला सगळाच नक्षा बदललेला होता. तिथून बाहेर पडल्यावर म्हणूनच मन खट्टू व्हायच. कारण पेशवाई थाटाचे काहीच अवशेष तिथे आढळले नाहीत. नारायण महालातून बाहेर पडतांना आम्ही कानांत बोटे घालायचो, असं वाटायचं नारायणाच्या किंकाळ्या ऐकू येतील की काय! हीच दहशत बालमनांत ठसली होती. वसंत टॉकीजला त्यावेळी नेहमी ऐतिहासिक पिक्चरच लागत असत. नारायणाच्या खुनाचा, सगळा इतिहास आठवत डोळे पुसतच आम्ही बाहेर पडायचो.

मग शनिवार वाड्याच्या बुरुजाला वळसा घालून यायच ते शनी मंदिरापाशी. शनीच्या मंदिरात सगळी कडे तेलच तेल होत, मूर्ती, भिंती, जमीन, कठडे हात लावीन तिथे तेलच तेल असायचं त्यावेळी’ हात लावीन तिथे सोनं ‘हा पिक्चर गाजला होता. आम्हाला मोठ्या माणसांनी बजावलं होतं की शनीचं दर्शन अगदी त्याच्या समोरून घेऊ नये, नाहीतर फटका बसतो. लहानपणी बालमनाला वाटायचं प्रत्यक्ष शनीच मूर्तीतून बाहेर येऊन फटका मारतो की काय! आता हंसू येतेय पोरकट वयातले विचारही पोरकटच असतात नाही का. आम्ही मैत्रिणी एकमेकींना ढकलत कोपऱ्यात सरकायचो जमिनीवर सांडलेल्या तेलामुळे घसरगुंडी झालेली असायची. माझी मैत्रीण सुनंदा सटकन घसरली. ‘घालीन लोटांगण वंदिन शनिदेवा तुझे चरण. ‘अशीस्थिती झाली तिची. आणि तिने डोळे पांढरे केले, दोघी तिला धरायला आणि दोघी शनी महाराजांच्या विनवण्या करायला धावल्या, शनीदेव पावले. आणि सुनंदा शुद्धीवर आली. पण नंतर मात्र ती शनीमंदिराला ‘ दुरून डोंगर साजरे’ असं म्हणून रस्त्यावरून नमस्कार करायला लागली. आता मंदिर खूप स्वच्छ झालंय. पण त्यावेळी मात्र ‘आवजाव मंदिर तुम्हारा, असं होत. सगळेच अगदी मूर्ती जवळ जाऊन शनीला तैलस्नान घालायचे. भक्तांची ही श्रद्धा पुजाऱ्यांना फार महागात पडायची. कारण तिथे बसून तेही तेल्या मारुती झालेले असायचे. त्यामुळे मंदिरात बसताना गणवेशासारखा त्यांचा ड्रेस ठरलेला असायचा. त्यांच्या तुंदीलतनु अवताराकडे बघून आम्हाला हंसू यायचं. पाय घसरून पडणाऱ्या लोकांकडे बघितल्यावर तोंडावर हात ठेऊन हंसू दाबाव लागायचं पोटात मात्र हंसण्याच्या उकळ्या फुटलेल्या असायच्या. ‘जपून टाक पाऊल गडे’ असे म्हणत आम्ही एकमेकींचा हात धरत पुढे सरकायचो. तर मित्र-मैत्रिणींनो अशी होती ही शनि मंदिरा तुझी कहाणी.  शनिमहाराज की जय.

– क्रमशः …  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares