मराठी साहित्य – विविधा ☆ आई☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ विविधा ☆ आई☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

आज घरी लक्ष्मीपूजनाची गडबड चालू होती.  लक्ष्मीची तसवीर ठेऊन पिवळ्या शेवंतीचा हार घातला. घरातल्या प्रत्येकाने पूजेला आपले पैशाचे पाकीट ठेवले.बँकांची पासबुक्स,  चांदीची नाणी, सुवर्ण अलंकार,  हळदी कुंकवानं भरलेले करंडे, पाच फळांची परडी,  फुले, पंचामृत, धण्याच्या अक्षता, गूळ, पेढे सर्व तयारी जय्यत झाली. आदित्य,  माझा मुलगा,  सोवळे नेसून,  कपाळी केशरी नाम ओढून तयार झाला. नारळ पानसुपारीचा विडा ठेऊन पूजा सुरू करणार, तोच मला आठवण झाली,  अरे, तो लाल मखमली बटवा ठेवायचा राहिला की…. मी कपाटातला बटवा आणला आणि पूजेला ठेवला.

रीतसर पूजा झाली. आरती झाली. लक्ष्मीची स्तोत्रे म्हणून झाली. सर्वांनी कुंकू, फुले अक्षता वाहिल्या. तीर्थप्रसाद दिला. लक्ष्मीपूजन छान झाले.

न राहवून आदित्य नं विचारले, ” आई, त्या लाल बटव्यात काय आहे?” मी म्हटलं,  ” सांगेन नंतर.”

परवा सहज आदित्य ला आठवण झाली.  तेव्हा मी त्याला बटवा उघडून दाखवला.

” दहा रुपयाची नोट आईनं दिलेली.”  चेह-यावर प्रश्नचिन्ह घेऊन गडबडीत तो ऑफिसला गेला. पण माझ्या मनातून आज ते दहा रुपये हटेनात. रात्री अंथरूणावर पाठ टेकली तसे सर्व प्रसंग video बघावा तसे डोळ्यांसमोरून सरकू लागले.

ह्यांच्या, ( आदित्य च्या पप्पांच्या) अकाली निधनानंतर मला नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. दोन्ही मुलांचा सांभाळ आणि शिक्षण हे माझं पहिलं कर्तव्य होतं. सुरवातीला अगदी तुटपुंजा पगार ( रू.975/- फक्त) होता. ह्यांच्या पश्चात आलेली रक्कम हात न लावता ठेवायची, असं ठरवूनही वापरावी लागे. माझी एकूण सगळी ओढाताण आई बाबांना न सांगताच समजत असे. आईची तळमळ मला जाणवत होती.  बाबा नेहमीप्रमाणे ‘ हेही दिवस जातील,  धीर धर, म्हणून पाठिंबा देत होते.  ” फिरते रूपयाभवती दुनिया” याचा पावलो पावली प्रत्यय येत होता.

स्वतःच्या मेरीटवर घेतलेलं शिक्षण,  मेरिटवर मिळालेली नोकरी, मेहनत करून मिळवलेला पैसाच खरा, तोच आपले चारित्र्य ठरवत असतो.  हे आधी बाबांचे आणि नंतर ह्यांचे संस्कार.  हाता- तोंडाची जुळवणी करता करता वर्षे उलटली.

आई आजारी होती म्हणून तिला बघायला गेले होते माहेरी. तेव्हा आईनं माझ्या हातात ती पुडी दिली. उघडून बघते तर एक दहा रूपयांची जुनी नोट. काय आई तरी! क्षणभर विचार आला, आईकडे कुठून आले हे पैसे? कारण आता धाकटा भाऊ आणि भावजय सगळे व्यवहार बघत होते.  तिच्या समाधानासाठी घेतले मी ते पैसे. घरी आल्यावर कपाटात ठेऊन दिले.

पुढे 15च दिवसात आईनं या जगाचा निरोप घेतला. मला तिकडं पोचेपर्यंत पाच तास गेले. आईला तशी झोपलेली बघून मी तरी कोसळलेच.

” अशी कशी गेलीस ग आई? ” माझ्यातल्या वासरानं हंबरडा फोडला.

सर्व सोपस्कार झाल्यावर दुस-याच दिवशी परतावं लागलं. दिवसाला सुद्धा जायला जमलं नाही. तिचीच शिकवण, ” कर्तव्यात चुकारपणा करायचा नाही. कर्तव्य आपुलकीने करायचे. कर्तव्य आणि आपुलकी ची सांगड जबाबदारीने घालायची.” हे तिने आयुष्य भर केले, आम्ही ही नकळत तेच शिकलो.

आई गेली. सवाष्ण असतानाच गेली. गळ्यात दोन सुवर्ण वाट्या असलेली काळ्या मण्यांची पोत,  हातात दोन दोन काचेच्या बांगड्या,  कपाळावर लाल कुंकू इतके अहेव लेणे आयुष्य भर लेवून अखंड सौभाग्यवती राहून गेली. तिचा पार्थिव देह हिरव्या साडीत  झाकलेला होता.  मुखावर डोळे दिपवून टाकणारे तेज पसरले होते. येणारे लोक आश्चर्याने बघत होते.  देवीप्रमाणे नमस्कार करत होते. लोकांची गर्दी जमली होती.  चेह-यावरून नजर हटत नव्हती.

इतकी वर्षे कुणाची नजर लागू नये म्हणून आम्हां मुलांवरून, नातवंडांवरून  मीठमोह-या आईनं कितीतरी वेळा उतरल्या होत्या.आज मला तिची दृष्ट काढावीशी वाटली.

आई गेली.  घर माणसं असून सुनं सुनं झालं. डोळ्यातलं पाणी पापण्यातून परतवत मी परतले. दुसरे दिवशी जड मनाने पुडी उघडून नोट हातात घेतली. ती देताना आई मला बोलली होती. ” बेटा, खूप अवघड डोंगर चढलीस, खूप त्रास,  खूप दु:ख झेललेस.  पण तोंडातून चकार शब्द काढला नाहीस. ” मी म्हटलं  , ” आई तुझीच ना ग मी लेक, तुझ्याकडूनच शिकले.” तिनं माझ्या हातात पुडी दिली. जपून ठेव म्हणाली. ती नोट मी देवीसमोर ठेवली , नमस्कार केला आणि परत कपाटात ठेवली.

आईच्या जाण्याच्या दुःखानं मन आणि शरीर कमजोर आणि हळुवार झालं होतं. त्यातून बाहेर निघणं आम्हां भावंडांना जड जात होतं. महिनाच झाला जेमतेम, तोच बाबाही आम्हाला सोडून गेले. उरलासुरला आधार गेला. मातृछत्र,  पाठोपाठ पितृछत्र ही हरवलं.  आम्ही पार ढासळलो.  मूकपणे एकमेकाला सावरू लागलो.  दिवसामागून दिवस गेले.  दुःखावर काळ हाच उपाय असतो.

आई  गेल्यानंतर दोनच महिन्यात ध्यानी-मनी नसताना माझं प्रमोशन झालं. कमाईत थोडी सुधारणा झाली. डगमगणारी आर्थिक गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. पुढे पुढे तर कधीच आर्थिक चणचण जाणवली नाही. हा त्या दहा रुपयाच्या नोटेचा चमत्कार आणि आईचा आशीर्वाद. जाताना आई मला श्रीमंत करून गेली.

सहा फेब्रुवारी ला आईला जाऊन 13 वर्षे होतील. ती दहा रुपयांची नोट हीच आज माझी ताकद आहे आणि तीच माझी श्रीमंती.

मला आईच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं. बदलणारी परिस्थिती सहजपणे आणि सकारात्मकतेने स्वीकारण्याचे बाळकडू मला आईने पाजले. तिच्या विचारांच्या आणि मनाच्या श्रीमंतीने मलाही खूप शिकवले. आयुष्यात पैसाअडका,  दागदागिने कशाचाच हव्यास न धरता तिने अनेक आयुष्ये घडवली.

दहा रूपयांच्या रूपात आईने लक्ष्मी माझ्या हातात दिली. लक्ष्मीच्या तसबिरीकडे पहाताना मला आईचाच भास होतो.

आईचं दुसरं रूप लक्ष्मी?

की लक्ष्मीचंच सगुण रूप आई?

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘जाणिवा’.. मनाच्या मार्गदर्शिका! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ ‘जाणिवा’.. मनाच्या मार्गदर्शिका! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

विविध अनुभवांनी मनाला केलेल्या स्पर्शातूनच निर्माण होत असतात जाणिवा. विचार म्हणजे जाणिवा नव्हेत.विचारांची ये जा सुरुच असते अखंड, अव्याहत मनात. विचार कधीकधी आले तसे निघून जाणारे नसतातही. कांही रेंगाळतही रहातात. कांही ठाण मांडून बसणारे असतात. कांही रुतणारे, सलणारेही असतात काट्यांसारखे. अशा विचारांना अलगद काढून दूर भिरकावत असतात त्या जाणिवाच. त्या विचारांना शिस्त लावतात. योग्य दिशा देतात आणि अयोग्य विचारांना अटकावही करतात. मनाला योग्य विचारांचा मार्ग दाखविणाऱ्या मार्गदर्शिकाच असतात त्या मनाच्या..!

जाणिवा म्हणजे भावना नव्हेत. भावनांना लगडलेली भावफुले असतात जाणिवा आणि त्या फुलांमधले मधुघट परागकणही..!

जाणिवा अनेकरंगी असतात. त्या ‘जबाबदारीच्या’ असतात.’कर्तव्याच्या’असतात. कृतज्ञतेने भारलेल्या जशा, तशाच जगणं कृतार्थ करणाऱ्या असतात जाणिवाच!

नेणिवेतल्या गूढ अंधारकणांना प्रकाशाचा स्पर्श करतात जाणिवा. योग्य अयोग्याचा सद् असत् विवेक जागवतात जाणिवाच.

त्या तीव्र असतात तेव्हाच आपण जबाबदारीने वागतो, कर्तव्याचे महत्त्वही जाणतो. समाजाकडून या ना रुपात कांहीतरी घेत असणाऱ्या आपल्याला समाजाला आपण लागत असलेल्या देण्याची आठवण करुन देत असतात त्या या जाणिवाच.जाणिवा अलगद जागत्या ठेवणाऱ्यांचं आयुष्य कृतार्थ तर होतंच आणि तेच आनंददायीही होत रहातात इतरांसाठीही. ज्यांच्या जाणिवा अशा प्रगल्भ नसतात ते मात्र जगत रहातात स्वत:पुरतंच फक्त स्वतःसाठी. प्रकाशाचा स्पर्शच न झालेलं त्यांचं एकेरी जगणं ओझंच बनून रहातं त्यांच्या स्वतःच्याच शिरावरचं. जाणिवा अलगद जाणिवपूर्वक जपायला हव्यात ते यासाठीच. कारण क्षणभर थांबून स्वतःचा मार्ग योग्य दिशेचा आहे ना हे पहायला प्रवृत्त करीत असतात त्या निगुतीने जपलेल्या या मनाच्या मार्गदर्शिकाच..!!

 

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 18 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 18 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

नवरत्न परिवारामध्ये माझा प्रवेश झाल्यापासून नृत्याबरोबर माझी साहित्याची आवड दिवसेंदिवस वाढत गेली. फोफावत गेली. आम्हा मैत्रिणींचा काव्य कट्टा अधून मधून रंगतदार होत असल्यामुळे, मला ही आपोआप काव्य स्फुरायला लागले.

असं म्हंटल जात – संगती संगे दोषा. माझ्याबाबतीत मात्र” संगती संगे काव्य”असे घडत गेले. आणि नकळत छान छान कविता मला सुचत गेल्या. त्यामध्ये विशेष करून आमच्यातील सौ जेरे मावशी (वय वर्षे ७७) यांनी मला खूप मार्गदर्शन केले.

माझी पहिली कविता”मानसपूजा”,मी विठ्ठलाची संपूर्ण षोडशोपचार पूजा काव्यामध्ये गुंफली. कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा मी आईबरोबर घराजवळील विठोबा देवळामध्ये पहाटे पाच वाजता काकड आरती ला जात होते.तिथले अभंग,आरत्या दिवसभर माझ्या मनामध्ये रेंगाळत रहात आणि त्यातूनच मला हे काव्य स्फुरत गेले.

एकामागून एक प्रसंगानुरूप अनेक कविता लिहिल्या गेल्या.मी मनामध्ये कविता रचून लक्षात ठेवत असे आणि सवडीनुसार फोनवरून गोखले काकूंना सांगत असे.आमची फोनची दुपारी तीनची वेळ ठरलेली होती.मी माझ्या घरा मधून फोन वरून कविता सांगत असे आणि त्या कागदावर उतरवून घेत असत.माझी फोनची घंटा वाजायचा अवकाश,पेन आणि कागद घेऊन त्या तयारच असत. अशा अनेक कविता झरझर कागदावर उतरत गेल्या. माझ्या मनाला आणि मेंदूला एक खाद्य मिळत गेलं आणि मन आणि मेंदू सतत कार्यरत राहिले.

माझा विजय मामा हिमालय दर्शन करून आला होता.त्याने मला आणि आईला प्रवासाचे संपूर्ण रसभरीत वर्णन ऐकवले.ते मला इतके भावले की माझ्या मनामध्ये ठसले आणि मेंदूमधून काव्य रचना अशी ओघवती होत गेली की साक्षात हिमालय माझ्या नसलेल्या डोळ्यापुढे उभा राहिला आणि ती कविता तयार झाली.जी सगळ्यांना खूपच आवडली.

अशा प्रसंगानुरुप आणि कविता बनत गेल्या इथून पुढे मी तुमच्यासमोर सादर करणार आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

या सूर्यालाही खग्रास ग्रहण लागले.स्वतःच्या बचावाचे जे भाषण टिळकांनी कोर्टापुढे केले, ते जवळजवळ साडेचार दिवस चालले.पण गेंड्याचे कातडे पांघरलेल्या त्या ज्युरी आणि न्यायाधिशांवर त्याचा शून्य  परिणाम झाला. त्यांना राजद्रोही ठरवले. त्यांना सहा वर्षाचे काळे पाणी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सारा महाराष्ट्र या शिक्षेचे वृत्त ऐकून हादरून गेला. मी तर पूर्ण कोसळून गेले. मधुमेहाने शरीर आतून पोखरले होते, या बातमीने ते कोलमडून गेले. अंथरूणावर उठून बसण्याचे  त्राण माझ्या मध्ये राहिले नाही.

तुरुंगवासातल्या एकांताचा टिळकांनी फार चांगला सदुपयोग केला. त्यांनी गीतेवर टीका लिहिली आणि गीतारहस्य हा हा साडेआठशे पानांचा ग्रंथ लिहिला. पाली, हिब्रू, फ्रेंच, जर्मन या भाषाही ते तिथे शिकले. वयाच्या 52 व्या वर्षी ते विद्यार्थी होते.

तिकडून येणाऱ्या पत्रांवरून आम्हाला त्यांचे वर्तमान कळे. मुलेही त्यांच्या इच्छेप्रमाणे आज्ञेप्रमाणे वागत. कोणीतरी मला पत्रातील मजकूर वाचून दाखवे. त्यांच्या अचाट आणि अफाट बुद्धिमत्तेचे मला आश्चर्य वाटे. त्यांनाही मधुमेह होता. पण त्यावर ही ते कशी मात करत होते, ते आणि परमेश्वर जाणे. मी मात्र त्यांच्या कुठल्याच राष्ट्रकार्यात मदत करू शकत नसे म्हणून मला फार वाईट वाटे. पण साधी अक्षर ओळखही नसलेली मी, चार भिंती बाहेरचे जग न पाहिलेली मी, बाहेरच्या जगाचा थोडाही अनुभव नसलेली मी काय करणार होते? मुलांकडे पाहत कशीतरी दिवस अन रात्र ढकलत होते. रात्र-रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. शरीराचा डोलारा कोलमडतोय हे मला जाणवायला लागले होते. या जन्मी पुन्हा त्यांचे दर्शन होणार नाही, ते भेटणार नाहीत, याची खात्री पटली होती. गळ्यातले मंगळसूत्र सोडून सगळे दागिने मी काढून ठेवले. रोज काळे साडी नेसायला सुरुवात केली. आजूबाजूचे काही समजेनासे झाले. कोणी काही बोललं तरी तिकडे लक्ष देण्याचा  मी टाळायला लागले. फक्त “भक्त विजय” हा ग्रंथ कोणी वाचून दाखवला तर मात्र मनःपूर्वक भक्तिभावाने ऐकत होते. त्यांच्या कार्याला यश मिळो, अशी परमेश्वराला आळवणी करत होते. मुलांच्यावर निदान त्यांचे कृपाछत्र राहो म्हणून प्रार्थना करत होते. भारतातल्या जनतेला भविष्यात तरी शांतता,  सुख समृद्धी आणि स्वातंत्र्य लाभो अशी आळवणी करत होते. देशाला स्वातंत्र्याचा सूर्य लवकर पहायला मिळवून म्हणून त्या मातृ देवतेला अश्रूंचा अभिषेक करत होते. अशातऱ्हेने का होईना, स्वातंत्र्याच्या यज्ञकुंड यामध्ये माझ्या देहाची समिधा अर्पण करायला मी आतुर झाले होते.

अखेर तो दिवस उगवला. त्यांची भेट झाली नाही, तरी सौभाग्यलेणं  लेवून,अहेवपणी समाधानाने,दोन्ही मुलांना आशीर्वाद देत मी या जगाचा निरोप घेतला.

टिळकांना या बातमीचा जबर धक्का बसणार याची खात्री होती. पण आहे आघात धीराने, शांतपणे ते पचवतील हेही माहीत होते. कारण डगमगून जायला ते सर्वसामान्य होते काय ? ते तर प्रखर तेजस्वी सूर्य पुत्र होते आणि मी त्यांची तेजशलाका!

समाप्त 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २१) – ‘तंतुवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २१) – ‘तंतुवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

वाद्यांचा आणखी एक महत्वाचा प्रकार म्हणजे तंतुवाद्यं! तत्‌म्हणजे तार, ह्यावरून आपल्या लक्षात येईल कि ज्या वाद्यामधे तार/तारा वापरल्या गेलेल्या असतात त्याला तंतुवाद्य किंवा तत्‌वाद्य असं म्हणतात. ह्या वाद्यांच्या शोधाची कहाणी खूपच रंजक आहे. प्राचीन काळी निसर्गाच्या सान्निध्यात राहात असताना जंगली श्वापदांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी आणि नंतर शत्रूंपासूनही स्वसंरक्षण करण्यासाठी मानवप्राणी ‘धनुष्य-बाण’ हे शस्त्र वापरत असे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. बाण सोडताना धनुष्याची प्रत्यंचा खेचावी लागते तीही किती अंतरावर बाण गेला पाहिजे हा अंदाज घेऊन! एकदा बाण सोडला कि ही खेचलेली प्रत्यंचा त्याच्या पूर्वस्थितीत येईतोवर कंप पावते आणि त्या कंपनांमुळं त्या प्रत्यंचेतून नादनिर्मिती होते.

तंतू कंपन पावल्यावर त्यातून नादनिर्मिती होते हे ह्यातून बुद्धिमान मानवप्राण्यानं हेरलं. त्यापूर्वी पोकळ वस्तूवर चामडं ताणून बांधलं तर आवाजाची गुणवत्ता आणि पातळी वाढते हे ज्ञान तालवाद्यांच्या निर्मितीप्रक्रियेतून त्याला मिळालेलंच होतं. मग ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करून त्यानं लाकूड धनुष्याकारात कोरून त्यावर चामडं घट्ट बांधलं आणि त्याला तारही जोडली. अशाप्रकारे ‘वीणा’ जन्माला आली.

असं म्हणतात कि अगदी पूर्वी वीणा ही एकच तार असलेली होती जिच्या दांडीच्या वरच्या व खालच्या बाजूच्या भागात प्रत्येकी एकेक भोपळा होता. हिला ‘घोषा’ किंवा ‘घोषिका’ असं म्हटलं जातं. हिचा उल्लेख भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र’ ह्या संगीताच्या आद्यग्रंथात आढळतो. पुढं संगीत रत्नाकर ग्रंथात उल्लेखिली गेलेली ‘एकतंत्री वीणा ’ही एक तार असलेलीच होती! तिलाच ‘मूलवीणा’ किंवा ‘ब्रम्हवीणा’ असंही म्हटलं जातं. ही सर्व वीणांची जननी मानली गेली आहे आणि ह्या वीणेचं दर्शन किंआ स्पर्श मोक्ष देणारा असतो असंही मानलं गेलं आहे. ह्यातून एक गोष्ट नक्कीच दिसून येते कि, मानवानं त्याच्या आयुष्यात संगीताला दिलेलं भक्तीचं, अतीव श्रद्धेचं, आदराचं स्थान! आज आपल्याकडं भजनसंप्रदायात आवर्जून वापरली जाणारी एकतारी डोळ्यांपुढं आणली कि थोड्याफार फरकानं पूर्वीची एक तार असलेली वीणा कशी असेल ह्याची कल्पना येऊ शकते.

असं म्हणतात कि, एकतारीवर गाणं सर्वात कठीण असतं आणि जो एकतारीवर रियाज करतो तो नेमकेपणी अगदी सुरेल गाऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे, एकाच तारेमुळं तिच्यातून गाणाऱ्याला फक्त आधारस्वर मिळत असतो आणि त्या एकाच सुराच्या आधारे इतर सगळे सूर लावणं हे कठीण काम! आणि हे कठीण काम जमतं तेव्हां गायकाचा सूर साधला जातोच कारण इतर सुरांचा त्या आधारस्वराशी तेव्हांच मेळ बसतो जेव्हां ते अगदी नेमकेपणी लागतात. म्हणूनच आजही असे एकतारीवर गाणारे कित्येक गायक (भले त्यांनी शास्त्रोक्त संगीताचं शिक्षण घेतलेलं असो किंवा नसो) सुराला एकदम पक्के असतात, त्यांचा गाणं ऐकलं कि केवळ प्रचंड सुरेलपणाच्या किमयेनं आपण वेगळ्याच विश्वात पोहोचतो, इतर कसलाही दिखावा, तंत्रज्ञानाची साथ, बाकी कोणतेही साथीदार नसतानाही! ह्या वीणेला मोक्षदायिनी म्हणण्याचं कारण ह्यातच दडलं असावं.

पुढं हळूहळू वेगवेगळे प्रयोग होत तारांच्या वेगवेगळ्या संख्या व रचनेतील इतरही काही बदलांनुसार अनेक वीणा अस्तित्वात आल्या. आलापिनी वीणा, धनुकलीने वाजवली जाणारी धनुष्याकृती ‘पिनाकी वीणा’ (आधुनिक व्हायोलीनचं प्राथमिक स्वरूप), एकवीस तारांची मत्तकोकिला वीणा, सात तारांची चित्रवीणा, नऊ तारांची विपंची, सारिकायुक्त अशी किन्नरी वीणा, तीन तारा असणारी त्रितंत्री वीणा(जिला सतारीचं प्राथमिक रूप मानलं जातं), भरपूर म्हणजे शंभर तारा असलेली ‘शततंत्री’ वीणा, कात्यायनी वीणा अशा वेगवेगळ्या रचना व तारसंख्या असलेल्या अनेक वीणांचा उल्लेख आपल्या जुन्या ग्रंथांमधे आढळतो. वेदिक काळात ‘वनस्पती’, ‘बाण’, ‘औडंबरी’, ‘क्षोणी’ इ. वीणा अस्तित्वात असल्याचाही उल्लेख आढळतो. राजा समुद्रगुप्त जी वीणा वाजवायचा ती सात तारांची ‘परिवादिनी’ नामक वीणा सुवर्णमुद्रांनी मढवलेली होती असाही उल्लेख आढळतो.

सतार ह्या तंतुवाद्याबद्दल एक महत्वाचा उल्लेख आढळतो कि, ख्यालगायनाला लोकप्रियता मिळवून देण्यात यशस्वी ठरलेल्या महम्मद शाह रंगीलेंच्या दरबारातील सदारंग-अदारंग- महारंग ह्या त्रिमूर्तींपैकी सदारंग म्हणजे ‘नियॉंमत खॉं’साहेबांचा धाकटा भाऊ ‘आमीर खॉं’ हा तीन तारा असलेल्या एका पर्शियन वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीतातील राग वाजवून पाहात असे, ते सतारीचं प्रारंभिक रूप! त्याने आणि पुढं इतरांनीही त्या वाद्यावर वेगवेगळे प्रयोग केले आणि आजची पूर्ण विकसित सतार जन्माला आली. नावाच्या साम्यामुळं ‘आमीर खुस्रो’ ह्यांना सतारनिर्मितीचं श्रेय दिलं जातं मात्र त्यात तथ्य नाही, कारण कागदोपत्री पंधराव्या शतकापर्यंत कुठंही ह्या वाद्याचा उल्लेख आढळत नाही.

तंतुवाद्यांमधे ते वाद्य वाजवण्याच्या पद्धतीवरून तत आणि वितत असे दोन प्रकार आढळतात. तत वाद्यं म्हणजे ज्या वाद्यांच्या तारा बोटांनी, नखांनी किंवा ‘नख्खी/मेजराब’ अशा गोष्टींनी वाजवल्या जातात. उदा. तानपुरा, एकतारी, तुणतुणं, सतार, वीणा, स्वरमंडल, सरोद, संतूर इ.

वितत वाद्यं म्हणजे जी वाद्यं बो किंवा गजाच्या सहाय्याने वाजवली जातात. उदा. इसराज, सारंगी, दिलरुबा, व्हायोलीन, आपल्या राजस्थानमधे आढळणारं ‘रावणहाथा’ हे वाद्य इ.

ह्या सर्व वाद्यांच्या रचनांमधे पोकळ भाग (ध्वनिवर्धक व अनुनाद निर्मिती करणारा) म्हणून वाळवून आतून पोकळ केलेले विविध आकारांचे, प्रकारचे भोपळे, नारळाची करवंटी इ. गोष्टींचा वापर होतो. व्हायोलीनमधे असे काही वापरले गेले नसले तरी साऊंडबॉक्स म्हणून लाकडाचाच ‘पोकळ भाग’ तयार केलेला असतो.

निसर्गाकडूनच मिळालेल्या जादूई तत्वांचा वापर करून मानवानं आपल्या बुद्धीकौशल्यानं, अभ्यासूवृत्तीनं आणि नैसर्गिकरीत्या लाभलेल्या शक्तींच्या आधारे कायकाय किमया घडवून आणली हे जाणून घेताना एकीकडं अभिमानानं ऊर भरून येतो आणि त्याचक्षणी निसर्गाच्या महान, अद्भुत शक्तींपुढं नतमस्तकही व्हायला होतं.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

समाज कार्य, शिक्षण प्रसार असे करताना त्यांनी, कुटुंबाकडे दुर्लक्ष केले असे मात्र नाही बर ! मोठ्या मुलींची लग्ने, चांगली घरे पाहून करून दिली.. त्यांच्याहून धाकटी तीन मुले शिकत होती. थोरला कॉलेजचे शिक्षण घेत होता. – – – – पण —

त्यावर्षी महाराष्ट्रावर दोन मोठ्या आपत्ती कोसळल्या. दुष्काळ आणि प्लेग. माणसे पटापटा मरत होती. दुर्दैव म्हणजे आमच्या थोरल्या लाही ही प्ले ग ची लागण झाली आणि आम्हा वर दुःखाचा डोंगर कोसळला.पण टिळक त्याही परिस्थितीत लोकांना मदत करत होते. सगळीकडे हाहाकार उडाला,पण सरकार मात्र थंड होते. घरे स्वच्छ करण्याच्या नावाखाली गोऱ्या सैनिकांनी प्रजेचे अतोनात हाल केले. छळ केला. त्याबद्दल टिळकांनी “केसरी” वृत्तपत्रात खूप कडक शब्दात लेख लिहिले. त्याचे परिणाम भलतेच होत होते. जनमानसात प्रचंड असंतोष होता अन तशातच गोर्‍या रॅन्ड साहे बां चा खून झाला. धर पकड दंड धमक्या अशाप्रकारे सामान्य जनतेचा जास्तच छळ सुरू झाला.तेव्हा टिळकांनी केसरीत अग्रलेख लिहिला, “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे.” त्यामुळे त्या खु ना मागे टिळकांचा हात आहे, असा इंग्रज सरकारचा कयास होता, पक्की खात्री होती. त्यामुळे वॉरंट काढून त्यांना अटक केली गेली. खटला मुंबईला चालला. सरकारने त्यासाठी विशेष न्यायाधीश नेमला आणि त्यांना अठरा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

या शिक्षेने मी मात्र पुरती कोसळले, मोडून गेले. यांचा काही अपराध नसताना, केवळ संशय, शंका म्हणून एका बुद्धिवान तपस्व्या ला एवढी घोर शिक्षा? मुलाच्या जाण्याचे दुःख आणि हे मोठे संकट, त्यामुळे सभोवताली घरामध्ये काय चाललंय हेच मला कळत नव्हते. जे थोडे कानावर पडत होते ते क्लेशकारक होते. एल एल बी, केसरी कार, प्राध्यापक टिळकांना तुरुंगामध्ये काथ्याकु टावा लागत होता. गुन्हेगारां बरोबर वावरावे लागत होते. जाड भाकरी आणि कांदा घातलेले कालवण खायला मिळत होते. त्यांना कांदा आवडत नसल्यामुळे कोरड्या भाकऱ्या खाव्या लागत. ऐकून माझ्याही घशाखाली घास उतरत नसे.

मात्र पुष्कळ प्रयत्न करूनही इंग्रज सरकारला त्या खुनाशी टिळकांचा संबंध जोडता आला नाही. त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली आणि अखेर काही अटींवर, सरकारने कोणालाही कळू न देता, गुपचुप त्यांना घरी आणून सोडले. या तुरुंगवासात त्यांची तब्येत खूपच खालावली. त्यांचे 137 पाउंड वजन 113 पाउंड झाले होते. डोळे खोल गेले होते. चेहऱ्यावर तेलकट पणा आला होता त्यांच्याकडे पाहूनच पोटामध्ये ढवळून येत होते.

सुटून आल्यावर  राष्ट्र कार्यामध्ये त्यांनी पुन्हा झोकून दिले. त्यांचे वाचन, लिखाण, अधिवेशन, भाषण, प्रवास हे अव्याहतपणे सुरूच होते. त्यांची लोक मान्यता वाढत होती. “टिळक बोले आणि जनता  चाले” असे काही चालले होते.

देशातील वातावरणअधिक गरम गरम होत चालले होते. त्यातच बंगालमध्ये बॉम्बचा स्फोट झाला. “तरुणांनी हा मार्ग पत्करला हे देशाचे दुर्दैवच आहे. पण या  मुलांना या मार्गावर जायला कोणी भाग पाडले? सरकारने!या गोष्टीसाठी सरकारच जबाबदार आहे.” असे  आणि देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टिकाऊ नाहीत हे दोन जळजळीत लेख केसरीमध्ये लिहिल्यावर इंग्रज सरकारने त्यांच्यावर राजद्रोहा चा खटला चालू केला. कोर्टामध्ये आपले काम टिळक स्वतः चालवत असत. तेजस्वी सूर्याला दुसर्‍या कोणाचा आधार घेण्याची जरुरी काय?

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दाखला – भाग – 1 ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆ जीवनरंग ☆ दाखला – भाग – 1 ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

…….सकाळपासून तानीबाईची लगबग चालू होती…

“लवकर लवकर आवराया हवं.”

नळाला पाणी आलं, तसं पटकन् अंग तोंड धुतलं.

रात्रीची खरकटी भांडी घासली. लुगडं धुतलं. झाडपूस केली. रात्रीचं कोरडं बेसन ऊरलं होतं. एक भाकर थापली अन् खाऊन घेतलं. एकटा जीव. शरीर थकलंय्. पण जगणं आहेच ना?

कालच तांबड्या येऊन गेला. म्हणत होता, “म्हातारे काळजी नको करू. रेशनकार्ड हायना तुझ्याकडे?

मग ग्रामपंचायतीत जा… तिथे दाखव. तू निराधार आहेस.

म्हातारी आहेस.. तुला महिन्याच्या महिन्याला पैकं मिळेल.

नवं सरकार चांगलं आहे. गरीबांचं वाली हाय. निराधार, म्हातार्‍यांसाठी कसलीसी योजना हाय म्हणे… तुला महिन्याला सहाशे रुपये मिळतील… रग्गड हाय की.. तुला रोजचा घास मिळेल. औषधपाण्यालाही दिडक्या राहतील….. ग्रामपंचायत फार लांब नव्हती.. तरी पायीपायी जायाचं.. म्हणून ऊन्हं चढायच्या आत निघाया हवं… रात्रीच तिनं झोपण्यापूर्वी रेशनकार्ड शोधून ठेवलं होतं

तिला ना लिहीता येत होतं ना वाचता….

खूप वर्षापूर्वी कधीतरी असंच, कुणा पक्ष्याच्या कार्यकर्त्याने काढून दिलं होतं. त्यांत काय लिहीलं होतं, तेही तानीबाईला माहीत नव्हतं… त्या कार्यकर्त्याने तिला विचारले होते,

“म्हातारे, कोणकोण राहातं घरात?”

तानीबाईने सांगितले  होते,  “मी अन् मोतीराम…..”

निघताना लुगड्याच्या केळ्यात तिनं एक छोटंसं कापडी पाकीट ठेवलं. त्यात काही सुटी नाणी होती.

चहापाण्यापुरती…… एका कापडी पिशवीत तिनं रेशनकार्ड गुंडाळलं आणि ते हातात घट्ट धरुन ती निघाली…

रस्त्यांत एक दोन जण भेटले.

“कुठं निघालीस गं म्हातारे…?” म्हणून चौकशीही केली. ऊत्तर न देता ती चालतच राह्यली.

ग्रामपंचायतीत ती पोहचली तेव्हां तिला तिथे गर्दी दिसली. बरीच रांग होती. एकदोन डोकी ओळखीचीही होती. पण तानी बाईला कुणाशीच बोलायचं नव्हतं….

एक छोटं टेबल होतं… भींतीवर गांधीजींचा फोटो होता.

आणखीही कुणाकुणाचे फोटो होते. काहीबाही लिहीलेलंही होतं… टेबलापाशी दोन माणसंही बसली होती. आणि ते समोरच्या चोपडीत काही लिहुन घेत होते.

रांगेतला एकेक माणूस पुढे सरकत होता… प्रत्येकाचं वेगळं काम… वेगळी कागदपत्रं…

तानीबाई गपगुमान रांगेत उभी राहिली. तिचा नंबर आल्यावर टेबलाजवळच्या माणसानं विचारलं,

“बोला आजी…..”

क्रमश:….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

 ☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-1☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

नमस्कार.

ओळखलं का मला? इंग्रजांना ज्यांनी ठणकावून सांगितलं,” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”

त्या सूर्यपुत्राची मी पत्नी. सत्यभामा .

आमच्या काळामध्ये पतीला आम्ही इकडची स्वारी असेच म्हणत होतो. इ.स. १८७१च्या वैशाख महिन्यात लग्न होऊन मी टिळकांच्या घरी आले. त्यावेळी ३कडची स्वारी होती पंधरा वर्षाचीआणि मी तर त्याहूनही लहान. गंगाधर पंतांच्या पत्नी, म्हणजे बाळ टिळकांची आई म्हणजेच माझ्या सासुबाई जाऊन पाच वर्षे झाली होती. त्यामुळे दापोली तालुक्यातून मी टिळकांच्या घरी लग्न करून आले आणि सत्यभामा झाले.

माझ्या माहेरची एक आठवणीतली गोष्ट सांगते.आमचं घर पैशाने खूप श्रीमंत नसलं तरी मनाची खूप श्रीमंती होती. एके दिवशी सकाळी दारावर एक भिक्षेकरी आला. कणगी तुन ओंजळभर तांदूळ घेऊन मी ते भिक्षेकऱ्याला घातले. त्याने तांदूळ घालताना खणकन आवाज ऐकला. म्हणून त्यांनी हात घालून पाहिले तो सोन्याची बांगडी. त्याने ती बाहेर काढली आणि म्हणाला, “अहो, ही सोन्याची बांगडी चुकून भिक्षेत पडली पहा. हे घ्या. नीट ठेवा.” ही गडबड एकू न माझे वडील आले आणि म्हणाले, “जे एकदा दिले ते परत घेण्याची आमची, आमच्या घराण्याची रीत नाही. तू ती घेऊन जा आणि सुखाने तिचा काय वाटेल तो उपयोग कर.”

तिकडे टिळकांकडे ही राहणी साधी होती. मी साधं लुगडं आणि साध्या कापडाचे झंपर वापरी. मी काही शिकले-सवरले नव्हते बरं !मला साधी अक्षरओळखही नव्हती.पण इकडची स्वारी खूप हुशार आहे,मोठी मोठी पुस्तके वाचते, एवढे मला माहिती होते. कॉलेज का काय म्हणतात, तिथे जाऊन ते वकील झाले, एवढे माझ्या कानावर आले होते.

आमच्या घरी भरपूर काम असे. उसंत म्हणून मिळायची नाही. तुम्हाला सांगते, मरेपर्यंत क्वचितच घराचा उंबरठा मी ओलांडला असेल. आमच्या घरातलं जेवण ही साध होतं. सकाळ संध्याकाळ होणारा चहा हीच तेवढी श्रीमंती होती.

इकडच्या स्वारीचे स्वतःचं सामान म्हणजे ड्रॉवर असलेलं डेस्क, दोन खुर्च्या आणि पुस्तकाचं कपाट. नाही म्हणायला त्यांची आराम खुर्ची त्यांना खूप प्रिय होती. आलेल्या लोकांशी बोलणं या आराम खुर्चीतच होई. वर्तमान पत्रांचा मजकूर ते स्वतः लिहीत नसत, तर ते या आराम खुर्चीतच लेख नीकाला सांगत. सांगताना मधून मधून सुपारी कातरून खात. फक्त महत्त्वाची पत्र ते स्वतः लिहीत.

आडकी त्यानं सुपारी कातरण्यात ही त्यांचं कौशल्य होत बर का!.. आत्ताच्या पिढीला अडकीता म्हणजे काय हाच प्रश्न पडायचा !

एकदा सुपारी हातात घेतली, की इतक्या सुबकपणे कातरत, ती पूर्ण कातरून झाल्यावर ही अख्ख्या सुपारी प्रमाणे त्यांच्या हातात असे.

आम्हाला दोघांनाही मधुमेहाची व्याधी जडली होती. त्यांना करावा लागणारा प्रवास, दगदग, मानसिक त्रास, तुरुंगवास यामुळे माझे मन सतत चिंतेने ग्रासलेले असे. तुरुंगामध्ये त्यांना करावे लागणारे कष्ट, निकृष्ट दर्जाचे अन्न याबद्दल कोणी माझ्यासमोर बोलत नसत पण मला न सांगता हि ते समजत असे.

टिळक अत्यंत बुद्धिमान, तेजस्वी विचारांचे आणि शब्दाला जागणारे होते. इतके की मित्राला दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी कारण नसताना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांनी अपार कष्ट झेलले. किती पैसा, वेळ, दगदग, धावपळ, मानहानी आणि अपमान झाले त्याला काही गणतीच नव्हती.

आमची मुले ही टिळकां प्रमाणेच बुद्धिमान आणि प्रखर विचारांची होती. मुले आपल्या वडिलांबरोबर धिटपणे बोलत. एकदा मुलीने इतर मुलींप्रमाणे झगझगीत कापडाच्या परकराचा हट्ट धरला.मात्र टिळकांनी ठामपणे नकार दिला.एकदा मुलांना त्यांनी संध्या केली का म्हणून विचारले.त्यांचाच मुलगा! त्याने विचारले, “तुम्ही कुठे करता रोज संध्या?”तेव्हा टिळक त्याला म्हणाले,”  मी वेद पठण करतो. त्यामुळे संधेची जरूरी नाही.”.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अहल्या – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ अहल्या – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

(मागील भागातइंद्रासारख्या देवराजाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोण दाखवणार? त्यापेक्षा अहल्येला दोषी ठरवणं, अपराधी ठरवणं जास्त सोपं होतं. जास्त सोयीचं होतं. त्यामुळे त्यांनी तिच्याशी बोलणं टाकलं असेल. नातं तोडलं असेल. तिच्याबरोबर कुठलाही व्यवहार करणं टाळलं असेल. ती अगदी एकटी, एकाकी पडली असेल, रस्त्यावरच्या शीळेसारखी. ….. इथून पुढे -)

श्रीरामाने अहल्येचा उद्धार केला, याचा अर्थ एका बाजूने अहल्येच्या मनातली अपराधीपणाची भावना दूर केली असेल. संवेदनाशून्य आणि बधीर मनोवस्थेतून बाहेर यायला तिला मदत केली असेल. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायला मदत केली असेल. तिच्यात संवेदना, चेतना निर्माण केल्या असतील. त्याचवेळी सामाजिकदृष्ट्या, अहल्या निरपराध आहे, हे ठामपणे सांगून, तिच्या कुटुंबियांनी आणि समाजाने तिचा स्वीकार करावा, असे आवाहन केले असेल.

‘नरेंद्र कोहली’ या हिन्दी लेखकाने रामायणावर आधारलेल्या आपल्या ‘दीक्षा’ या कादंबरीत ‘अहल्योद्धारा’चा हाच सामाजिक आशय उलगडून दाखवलेला आहे. राम हा युवराज. सम्राट दशरथाचा पुत्र. भावी सम्राट. तेव्हा त्याची मान्यता, ही सर्वसामान्य प्रजेच्या दृष्टीने महत्वाची ठरली. अनुकरणीय ठरली. अहल्येला रामाने समाजमान्यता मिळवून दिली. तिचं निर्दोषत्व ग्राह्य धरलं. तिला एक प्रकारे न्याय मिळवून दिला. या अर्थाने रामाने अहल्येचा उद्धार केला.

केव्हा तरी ‘विनय राजाराम’ या हिन्दी कवयित्रीची ‘तुम अहल्या नहीं हो’ ही कविता वाचली आणि ‘अहल्या’ या शब्दाचा एक वेगळाच अर्थ मनाशी उलगडला. इथे ‘अहल्या’ ही सामाजिक नीति-नियमांच्या, कल्पना- धारणांच्या प्रस्ताराखाली दबल्या गेलेल्या स्त्रीची प्रतिनिधी म्हणून यते. या स्त्रीला ना स्वत:चं मन, ना इच्छा-आकांक्षा, ना कल्पना-भावना, ना संवेदना-चेतना. म्हणून कवयित्री म्हणते, ‘समाजाच्या प्रतारणेच्या, फसवणुकीच्या प्रस्तराखाली दबलेल्या हे नारी, तू प्रस्तर ( दगड) नाहीस. तू परमाणू आहेस. (या विश्वाचे सृजन परमाणूपासून झाले, असे मानणारे एक तत्वज्ञान आहे.) त्यादृष्टीने तू विश्वाची जननी आहेस. निर्माती आहेस. ऊठ. जाग. स्वत:ला ओळख. आपल्या स्वत:च्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी तू स्वत:च राम बन.

आपल्या स्वत:च्या विकल परिस्थितीला आपण स्वत:च अनेकदा कारणीभूत असतो, नाही का सख्यांनो? आपल्यातील ऊर्जेची, कार्यशक्तीची आपल्यालाच ओळख नसते. म्हणूनच आपली सखी कवयत्री ‘विनय राजाराम’ आपल्याला सांगते, ‘तू निश्चय कर, तू निश्चल नाही, चल बनशील.

‘अहल्या नहीं, हल्या बनोगी

मन-मस्तिष्क और कर्मशक्तीसे

अनुर्वरा नहीं, उर्वरा बनोगी’

हल म्हणजे नांगर. ‘हल्या’ म्हणजे नांगरण्यायोग्य, अर्थात सुपीक जमीन. ‘अहल्या’ म्हणजे बरड जमीन. ज्या जमिनीत नांगरणी-पेराणी करता येणार नाही अशी जमीन. ज्या जमिनीवर संस्कार करताच येणार नाहीत, ज्याच्यावा पडलेलं बीज, तसंच निष्फळ राहील, अशी अहल्या तू नाहीस. मन-बुद्धी, कर्म- शक्तीच्या योगाने तू ‘अनुर्वरा’ नाही, ‘उर्वरा’ बनशील. म्हणजे सुफलीत, सृजनशील बनशील. चांगल्या विधायक विचारांचं बी तुझ्या मन-बुद्धीत वाढेल. विकासेल. चांगलं कार्य तुझ्या हातून घडेल. नवसृजन होईल. ‘तू अहल्या नाहीस… अहल्या नाहीस…’

सखयांनो, आपल्या आसपास, जवळच्या- दूरच्या परिवारात एखाद दुसरी शिळेतील अहल्या आढळते. तिला दिलासा देणं, तिचा आत्मसन्मान जागृत करणं, तिला क्रियाशील बनवंणं, एवढं तरी आपल्याला करायलाच हवं नाही का?

समाप्त 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत- भाग – 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत – भाग – 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

समकालीनच नव्हे तर आजच्या स्त्री समोरही माणूस म्हणून स्वतःचे अधिकार खेचून आणण्यासाठी संघर्ष कसा करायचा याचे उत्तम उदाहरण रखमाबाईंनी घालून दिले. आज एकविसाव्या शतकातही स्त्री बद्दलचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. फक्त त्याची तीव्रता कमी झाली आहे. स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी साऱ्या जगभर आहेतच. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही स्त्रियांना त्यांच्या कामाच्या कौशल्यापेक्षा कमी वेतन दिले जाते. शेतमजुरी करणारया स्त्री  पासून उच्चपदस्थ स्त्रियां पर्यंत हीच परिस्थिती आढळते.  स्त्री-पुरुष समानता कागदावरच आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या कठिण काळातील रखमाबाईंचा एकांगी लढा हा निश्चितच प्रेरणादायी, स्फूर्तिदायी आहे. रखमाबाईंनी इतिहास घडविला. समकालीन स्त्रियांमध्ये विद्रोहाची ठिणगी निर्माण झाली. आजही त्यांचा इतिहास स्फूर्तीदायक आहे. त्यांना विनम्र प्रणाम.

समाप्त

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print