मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

आज जागतिक महिला दिन! ‘आजचा दिवस माझा’ असं म्हणत प्रत्येक महिलेनं स्वतःच्या हक्कासाठी लढायचा हा दिवस!! सध्या प्रत्येक गोष्टीला अधोरेखित करण्यासाठी एक दिवस ठरवण्याची पद्धत आहे. जागतिक महिला दिन हा सुद्धा एक असा दिवस! महिलांप्रती पुरुषांनी सजग करण्याचा दिवस!!

पदोपदी महिलांच्या आकांक्षांचा विचार करून आपल्या बरोबरीने समाजामध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे एवढी सजगता पुरुषांमध्ये यावी याची जाणीव करून देणारा हा दिवस!

पुरुषांची शारीरिक शक्ती जास्त असेल परंतु स्त्रीची मानसिक आणि आंतरिक शक्ती अतुलनीय आहे. शक्ती म्हणजे पाशवी शक्ती असेल तर ती पुरुषाकडे अधिक आहे परंतु नैतिक शक्ती अनंत परीनी स्त्रीजवळ जास्ती आहे हे विसरता कामा नये.या शक्तीला त्रिवार वंदन केलं पाहिजे.

जे जे उत्तम,उदात्त, उन्नत, महन्, मधुर ते ते सर्व स्त्री मध्ये आहे. तिच्याकडं जीवनाचं गांभीर्य आहे. स्त्री प्रेरणादायी आहे. तिच्या सर्व गुणांची कदर केली पाहिजे.

स्त्री विना अस्तित्व नाही. ती उद्याची माता आहे. ती स्वतः जन्म घेऊन नाते जोडते आणि जन्म देऊन नाते निर्मिते…. म्हणून ती विश्वाचा प्राण आहे असे म्हणायला हरकत नाही. तसा तिचा सन्मान व्हायला हवा.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं गेलं आहे. एक सुशिक्षित माता सुसंस्कृत समाज उभा करते म्हणून महिलांच्या साक्षरतेला प्राधान्य दिलं पाहिजे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी घराचा उंबरठा ओलांडून जाणारी स्त्री ‘सावित्रीबाई’ हिची आठवण या दिवशी व्हावी असा हा दिवस!

स्त्री ही समाजाच्या नीतिमत्तेचा कणा आहे.त्यामुळे समाज तिला कसा वागवतो यावर समाजाचं आरोग्य अवलंबून आहे. सध्या स्त्रीला समाजाची वागणूक ‘बंदिनी… स्त्री ही हृदयी पान्हा नयनी पाणी’ अशी आहे. हे दुर्दैव आहे.हा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

स्त्री जन्माच सार्थक मातृ रूपात आहे. शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ,मुलाला पाठीला बांधून लढणाऱ्या ‘लक्ष्मीबाई’ यासारखा मातांचं स्मरण आजच्या दिवशी व्हायला हवं.

आज जगाच्या लोकसंख्येचा मोठा भाग महिलांनी व्यापलेला आहे.कर्तबगारी असूनही उपेक्षित असा हा महिला समाज… त्यांच्या सक्षमतेची जाणीव सर्वांना व्हावी हे या दिवसाचे प्रयोजन आहे आहे. महिलांच्या वाट्याला आलेलं अर्ध आभाळ अजून काळवंडलेलं आहे. हे मळभ घालवण्यासाठी तिचा निकराचा लढा चालू आहे. या तिच्या लढ्याला पुरुष वर्गाची उत्तम साथ हवी याची जाणीव आजच्या दिनी पुरुषांना झाली पाहिजे.

जगणं हे तिच्यासाठी एक आव्हान आहे.जगातल्या सर्वात सुरक्षित अशा जागी म्हणजेच आईच्या उदरात तिला नखं लागताहेत. त्यात दुर्दैवाने तिचे जन्मदाते आई-वडील सामील आहेत.

अर्थात आईला हे मान्य नाही. तिचं स्त्रीमन तिला साद घालतं, पण ती इथे अबला ठरते. तिच्या मनाविरुद्ध गोष्ट घडते.तिच्या वात्सल्याचया, प्रेमाच्या चिंधड्या होताहेत. हे दुर्दैवी आहे.

मुलीने या जगात प्रवेश केलाच तर…’ भय इथले संपत नाही’ अशा अवस्थेत ती जगते. अगदी अनोळख्या व्यक्ती पासून ते अगदी घरातल्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांची ती शिकार होते. शिवाय तोंड दाबून बुक्क्यांचा मार तो निराळाच…..

या सर्व संकटातून सहीसलामत सुटलेली पोर नशीब घेऊनच जन्माला येते म्हणायची…..खूप खबरदारीनं तळहातावरच्या फोडासारखं जपलेली ही पोर एक दिवस लग्न होऊन आपल्या घरी जाते. आईवडिलांची जबाबदारी कमी होते पण तिची वाढते.

सासू ही स्त्री असूनही तिच्याशी व्यवहारांनं वागते.संवेदना प्रेम यांची उणीव तिच्या वागण्यात जाणवते.सून आपल्या मुलीसारखी असं वारंवार म्हणते पण मुलगी म्हणायला तयार होत नाही.

ज्याच्या प्रेमाला ती आसुसलेली असते तो पुरुष…. नव्हे त्या पुरुषाची मानसिकता हा तिचा शत्रू आहे. आपल्या फायद्यासाठी तो तिला कशीही वापरतो. त्याचा पुरुषी अहंगंड त्याच्या भाषेत ही उतरला आहे. हेही ती पचवत आली आहे.

हा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तिच्या वर होत असणाऱ्या अन्यायाची जाणीव होणं हे या दिवसाचं महत्त्व आहे.

तिच्या डोळ्यात अन्याया विरुध्द लढण्याचा अंगार आहे. फक्त त्याला कायद्याचे कवच हवं…. ते आहे पण ते आणखी सुरक्षित हवं.मग तो अंगार अगदी सगळी दुष्कृत्ये जाळून टाकेल.

महिलांच्या सबलीकरणापासून इतरही सर्व कायद्यात आज पर्यंत काहीच बदल झाले नाहीत असं माझं म्हणणं नाही पण त्याची गती कमी आहे. महिलांच्या बाबतीतले कायदे आणखी कडक व्हायला पाहिजेत जेणेकरून हे गुन्हे आटोक्यात येतील. आजच्या दिनी या गोष्टीचा परामर्श घेतला पाहिजे.

आजच्या या जागतिक महिला दिनी तिच्या या अर्धा आभाळात विश्वासाचा सूर्य कधी न मावळो ही इच्छा!

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

ज्या प्रमाणे  कळीमधून कमळ हळू हळू उमलत जावे, त्याममाणे माझा सर्वांगीण विकास हळूहळू होत होता. माझ्या व्यक्तिमत्वातील सूप्त गुण फुलत होते. नवरत्न दिवाळी अंकाच्या माध्यमातून आमचा छोटासा महिला वाचन कट्टा तयार झाला. त्यामध्ये आम्ही कविता वाचन हिरीरीने करतो. त्यातीलच सौ.मुग्धा कानिटकर यांनी त्यांच्या घरी हॉल मध्ये माझ्या एकटीचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींना आमंत्रित केले होते. त्यामध्ये मी भरतनाट्यम चा नृत्याविष्कार सादर केला आणि कविताही सादर केल्या नाट्य सादर केले.त्या सर्वांनी माझे तोंड भरुन कौतुक केले.त्यांच्या शाब्बासकी मुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले.

त्यापाठोपाठ तसाच कार्यक्रम मिरजेतील पाठक वृद्धाश्रमात मला आठ मार्च महिला दिनी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. सर्व आजी कंपनी मनापासून आनंद देऊन गेल्या आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले.

5 जानेवारी 2020 रोजी आमच्या नवरत्न दिवाळी अंकाच्या पुरस्कार वितरण सोहळा, सेलिब्रिटी श्रीयुत प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याप्रसंगी मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते हे गीत नृत्य रुपात सादर करायला मिळाले.विशेष म्हणजे सुरवाती पासूनच सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा ठेका धरला होता आणि नृत्य संपल्यावर सर्वांनी त्या गाण्याला आणि नृत्याला उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले. अर्थात हे मला नंतर सांगितल्या वर समजल. विशेष म्हणजे श्री प्रसाद पंडित यांनी कौतुकाची थाप दिली आणि मला म्हणाले, ” शिल्पाताई, आता आम्हाला तुमच्या बरोबर फोटो काढून घ्यायचाय.”

माझ्यातील वक्तृत्वकला ओळखून मी सूत्रसंचालन ही करू शकेनअसे वाटल्याने लागोपाठ तीन मोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला दिली गेली. एका नवरत्न दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन गोखले काकू यांच्या मदतीने मी यशस्वी करून दाखवले.ते अध्यक्षांना नाही इतके भावले की त्यांनीच माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.त्यानंतर माझा भाऊ पंकज न्यायाधीश झाल्यानंतर आई-बाबांनी एक कौतुक सोहळा ठेवला होता. त्याचेही दमदार सुत्रसंचलन मीच केले ज्याचे सर्वांनी खूप कौतुक केले. दुसऱ्या दिवशी पंकज दादा मला म्हणाला, ” शिल्पू ने समोर कागद नसतानाही काल तोंडाचा पट्टा दाणदाण सोडला होता.” तसेच माझी मैत्रिण अनिता खाडिलकर हिच्या “मनपंख” पुस्तकाचे प्रकाशनझाले त्यावेळी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन ही मी यशस्वी रित्या पार पाडले.

माझ्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी फक्त आणि फक्त गडद काळोख असूनही मी माझ्या परिचितांच्या कार्यक्रमांमध्ये सुत्रसंचलन रुपी प्रकाशाची तिरीप आणू शकले याचे मला खूप समाधान आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

डॉक्टर रखमाबाई राऊत

ही गोष्ट आहे डॉक्टर रखमाबाई राऊत यांची.गोष्ट तशी जुनी, दीडशे वर्षांपूर्वीची. पण आजही भारतीयच नव्हे तर जगातील स्त्रियांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरली आहे. भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर हा मान निश्चितच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आहे. दुर्दैवाने डॉक्टर आनंदीबाई भारतात  परतल्यावर आजारी पडल्या व मृत्यू पावल्या. भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग स्त्री डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमा बाईंची इतिहासात नोंद आहे पण याहून खूप मोठा इतिहास त्यांनी स्वकर्तृत्वाने घडविला आहे. स्त्री शिक्षण,स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री शक्ती, स्त्रीमुक्ती असे शब्द उच्चारणे हे ही पाप समजले जाई, त्याकाळात वीस वर्षांच्या कोवळ्या रखमाबाई संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहिल्या.अजाणत्या वयात लादलेल्या  लग्नापासून मुक्त होण्यासाठी,व्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्या कायदेशीर लढाई लढल्या. आणि आणि स्वतःवरील  बालविवाहाचे संकट त्यांनी निग्रहाने परतवून लावले. 18 87 साली रखमाबाई कायदेशीरपणे विवाह बंधनातून मुक्त झाल्या. बॉम्बे हायकोर्टामध्ये चार वर्षे चाललेला हा खटला ‘विवाह प्रस्थापित करण्याकरीताचा खटला’ म्हणून जगभरात गाजला.

रखमाबाई चा जन्म 22 नोव्हेंबर 1864  साली झाला. त्यांच्या आईचे नाव जयंतीबाई व वडिलांचे नाव जनार्दन सावे होते. जनार्दन सावे हे व्यवसायाने कंत्राटदार होते. रखमाबाई यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील हरिश्चंद्र यादव जी चौधरी हेही शिक्षित व आधुनिक विचारांचे होते.म्हणून मुलीचा विवाह त्यांनी उशिरा म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी केला. रखमाबाई यांच्या जन्मानंतर अल्पावधीतच जनार्दन सावे यांचा काविळीने मृत्यू झाला. रखमाबाई यांचे आजोबा हरिश्चंद्र यांनी पुन्हा एकदा प्रथेविरोधात जाऊन जयंती बाईंचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा त्या काळातील एक धाडसी निर्णय होता.

जयंती बाईंचे दुसरे पती म्हणजे डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत. डॉक्टर सखाराम हे जे जे हॉस्पिटल मध्ये असिस्टंट सर्जन होते. अचाट बुद्धिमत्ता आणि संशोधक वृत्ती यामुळे वैद्यक शास्त्रावरील त्यांनी लिहिलेले ग्रंथ महत्त्वाचे मानले जातात. जयंती बाईबरोबर आलेली चिमुकली रखमाबाई डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्या घरी वाढू लागली. हा रखमाबाई बाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारा काळ होता. रखमाच्या जडण-घडणीत डॉक्टर सखाराम  या दुसऱ्या पित्याचा मौलिक वाटा आहे. प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत डॉक्टर बनण्याचे स्वप्न रखमा ने बघितले. हे धाडस त्या डॉक्टर सखाराम राऊत यांच्यामुळेच करू शकल्या. म्हणून तर रखमाबाईंनी जन्मदात्या ऐवजी डॉक्टर सखाराम राऊत यांचे नाव लावले. जन्मदात्यापेक्षा जन्‍म घडविणार्‍याला त्यांनी थोरपण दिले.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

डॉ. शोभा अभ्यंकर —- भारतीय शास्त्रीय संगीतविश्वात ‘गानगुरू’ म्हणून ख्यातनाम असलेले एक अतिशय उमदे आणि सतेज व्यक्तिमत्व.

प्रचंड जिद्द, आश्चर्य वाटावं अशी चिकाटी, आणि कौतुक वाटावं असा आत्मविश्वास यांची जन्मजात देणगी लाभलेल्या शोभाताईंबद्दल किती आणि काय काय लिहावं?

एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात २० जानेवारी १९४६ रोजी शोभाताईंचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा समजूतदार, विचारी आणि अभ्यासू स्वभाव इतरांना प्रकर्षाने जाणवत होता. त्या वयातही राहण्या-बोलण्यातला, वागण्यातला पोच, नेमकेपणा,आणि स्वच्छतेची, नीटनेटकेपणाची आवड वेगळेपणाने उठून दिसावी अशीच. पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत त्यांचे ११ वीपर्यंतचे शिक्षण झाले. तेव्हाही अभ्यासाइतकीच आवड होती ती गाण्याची. तेव्हाच्या हिंदी-मराठी चित्रपटातली बरीचशी गाणी शास्त्रीय संगीताशी नाते सांगणारी असायची,आणि शोभाताईंना ती बहुतेक सगळी गाणी त्यातल्या दोन कडव्यांच्या मधल्या म्युझिकसकट अगदी जशीच्या तशी म्हणता यायची याचे ऐकणाऱ्याला कमालीचे कौतुक वाटायचे. का कोण जाणे, पण त्या वयात शास्त्रीय संगीत शिकण्याचा म्हणावा तसा योग त्यांच्या आयुष्यात आला नाही. पण तरीही त्या संगीताशी त्यांची नाळ जन्मतःच जोडली गेलेली होती हे नक्की.

११वी उत्तम तऱ्हेने पास झाल्यावर त्यांनी स.प. कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला. कारण शास्त्र विषयात त्यांना गाण्याइतकीच गती होती. पुढे बायोकेमिस्ट्री या विषयात त्यांनी पुणे विद्यापीठाची एम.एस्सी. पदवी मिळवली.

तेव्हाच्या रीतीनुसार, आता पुरेसे शिक्षण झाले असे गृहीतच असल्याने, मग पुण्याच्याच श्री विजय अभ्यंकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. स्वतः श्री. विजय आणि त्यांचे सगळेच कुटुंबीय संपन्न-समजूतदार-प्रेमळ आणि शिक्षणाचा आदर व कदर करणारे होते. त्यात शोभाताईंचे व्यक्तिमत्त्वही असे होते की अगदी  लगेचच आपल्या वागण्याने त्यांनी तिथल्या सर्वांची मने जिंकून घेतली. बायोकेमिस्ट्रीतच पुढे पी.एचडी करावी या त्यांच्या विचाराला सगळ्यांनीच उचलून धरले, आणि अभ्यासही सुरु झाला. पण सासूसासरे, आजेसासूसासरे, लहान दीर-नणंदा अशा मोठ्या एकत्र कुटुंबात सगळ्यांसाठीची सगळी कामे उरकून दिवसभर विद्यापिठात जाणे फार कष्टप्रद होत होते. त्यात एका नव्या जीवाची चाहूल लागली,आणि त्यांनी आपणहून, अतिशय सारासार विचार करून तो अभ्यास थांबवण्याचा अवघड निर्णय घेतला.

पण फक्त उत्तम रीतीने संसार करणं ही आयुष्याची इतिकर्तव्यता नाही हे त्यांना, आणि विशेष म्हणजे श्री विजय यांनाही प्रकर्षाने जाणवत होतं. कारण शोभाताई खरोखरच सर्वगुणसंपन्न आहेत, जिद्दी आहेत, ध्यासवेड्या आहेत, हे त्यांना मनापासून पटलं होतं. आणि नेमक्या अशावेळी शोभाताईंची संगीताची आवड त्यांना वारंवार साद घालायला लागली…. इतकी आर्ततेने, की आता यापुढे शास्त्रीय संगीत हा एकच ध्यास घ्यायचा, हा निर्णय त्यांच्या मनाने,बहुदा त्यांच्याही नकळत घेऊन टाकला आणि मग त्यांचे शास्त्रीय-संगीत शिक्षण नियमितपणे सुरु झाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे जोमाने शिकायला सुरुवात झाली. आणि एकीकडे त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापिठात संगीत विषयात एम.ए चा अभ्यासही सुरू केला. अंतिम परिक्षेत त्या विद्यापिठाच्या भारतभरातल्या सर्व केंद्रांमधून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला, आणि याच यशासाठी त्यांना विद्यापिठातर्फे सुवर्णपदक, “गानहिरा” पुरस्कार, आणि “वसंत देसाई पुरस्कार” हे मानाचे तीनही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुढे संगीतमार्तंड पं. जसराजजी यांचे शिष्यत्व त्यांना लाभले. एकीकडे पं. वि. रा. आठवले यांच्याकडे अनवट, म्हणजे फारसे प्रचलित नसलेले, आडवाटेचे राग शिकण्यास जाणेही सुरु झाले होते. त्यांना अफाट स्मरणशक्तीचे केवढे मोठे वरदान लाभले होते, हे या सगळ्या शिक्षणादरम्यान, त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला प्रकर्षाने जाणवत होते.  कारण राग-स्वर-आरोह-अवरोह या सगळ्यांची, एकाही रागाच्याबाबतीत कुठेही लेखी नोंद करण्याची गरजच त्यांना कधीही पडत नसे.त्यांच्या डोक्यातच अशा प्रत्येक गोष्टीची कायमस्वरूपी तंतोतंत नोंद अशी घेतली जात असे की कित्येक वर्षांनी जरी त्यातला एखादा लहानसा संदर्भ जरी कुणी त्यांना विचारला तरी क्षणार्धात त्या योग्य उत्तर देत असत. “यांचा मेंदू आहे की कॉम्प्युटर “ अशीच विचारणाऱ्याची प्रतिक्रिया असायची.

 क्रमशः….

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हरवले ते…. ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ हरवले ते…. ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

सतत पूर्वीचे दिवस आठवणे,त्या आठवणीत गुंतून पडणे,वर्तमानातल्या सगळ्याच गोष्टीना सतत नावे ठेवणे हे खरंतर माझ्या स्वभावाचा भाग कधीच नव्हते. पण…..!

पण गेलं वर्षभर ठाण  मांडून बसलेला आणि अद्यापही जायचं नाव न घेणारा कोरोना, त्याचा विषारी प्रसार, आणि त्यामुळे झालेली जीवघेणी पडझड, परके होऊन गेलेले आपलेच जगणे, प्रत्येकाच्या मनावरचं भितीचं सावट, आणि अपरिहार्यतेमुळे मनात भरुन राहिलेली अस्वस्थता हे वास्तव स्विकारायला आणि पचायलाही जसजसं जड होत चाललं तसतसं वर्तमानात जगणारं माझं मन हरवलेल्या भूतकाळाचा वेध घेऊ लागलं. हे असं सार्वत्रिक, तीव्रतर हताशपण यापूर्वीच्या आयुष्यात मी कधी अनुभवलंच नव्हतं. आजची ही आपल्या आस्तित्वाचीच अनिश्चितता मला विचार करायला प्रवृत्त करणारी ठरलीय.

माझं बालपण, कॉलेज जीवन, नंतरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सगळं कित्येक वर्षांपूर्वीचं, पण कालपरवाच घडून गेल्यासारखं मला लख्ख आठवतंय. तेव्हाचा मी आणि आजचा मी कोणीतरी वेगळ्याच दोन व्यक्ती असल्यासारखी दोघांचीही जीवनशैली दोन ध्रुवांवरची वाटावी एवढी परस्पर भिन्न असल्याचं अगदी ठळकपणे जाणवतं आणि त्याचं आश्चर्यही वाटतं रहातं. अर्थात माझ्यापुरतं सांगायचं तर जीवनशैलीतले हळूहळू होत गेलेले हे सगळे बदल मी त्या त्या वेळी डोळसपणे स्वीकारलेले असल्यामुळे पूर्वीच्या जीवनशैलीची महत्वाची तत्त्वं आजही मी दुर्लक्षित केलेली नाहीयत.त्यामुळे त्याबद्दल स्वतःचं काही चुकल्याची रुखरुख नाही आणि समाधानवृत्तीतही काही फरक पडलेला नाही. पण तरीही आजूबाजूचे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही ही बोच मात्र मनात सलते आहेच.

तेव्हा ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ आणि ‘ऋण काढून सण साजरे करू नयेत’हीच वृत्ती प्रत्येक घराचा, संसाराचा भक्कम पाया असे. कारणपरत्वे कुणाकडून नाईलाज म्हणून हात उसने पैसे घ्यायला लागलेच तर ते दिलेल्या वेळेत परत करता यावेत म्हणून हजार काटकसरी आणि तडजोडी करून आधी ते पैसे परत करायला प्राधान्य दिले जाई. तोवर जीवाला घोर असेच आणि शांत झोपही नसेच. अखेरचा श्वास घेताना कुणाचं ‘पै’चंही देणं नसावं म्हणजे तो जिंकला’ हा विचार आयुष्यभर प्राणापलिकडे जपला जाई. कर्ज काढून सण साजरे करणं तर खूप दूरची गोष्ट٫ पण नित्योपयोगी वस्तूंची खरेदीसुद्धा काटकसर करून पै पै साठवून मगच केली जाई. सुवर्णालंकार घालून मिरवण्याची हौस दर गुरूपुष्याला गूंजभर सोनं विकत घेऊन, ते विकत घेता आल्याच्या आनंदातच परस्पर भागवली जाई.

खरं तर हे सगळं कालबाह्य कधी झालं हे जगण्याच्या व्यापात कधी लक्षातच नाही आलं. बदल हळूहळू घडत गेले पण बहुतांश जणांनी ते फारसा विचार न करता सरसकट स्वीकारले. या बदलांना ठळकपणे सुरुवात झाली ती जागतिकीकरणानंतर बाजारयुग अवतरलं त्या क्षणापासून. या बाजारयुगाने निर्माण केलेला उपभोगाचा रंगीबेरंगी भुलभुलैय्या आणि ऐष आरामाचा हव्यास यांनी एक वेगळेच गारुड समाजमनावर निर्माण केलं. मग पूर्वीच्या काळातल्या चैनी गरजा केव्हा होऊन बसल्या समजलंच नाही. त्यामुळे पाय पसरायला अंथरूण खूपच कमी पडतंय असं वाटू लागलं. त्या अंथरुणाची लांबी वाढवण्यासाठी सहज उपलब्ध असणारी कर्जं काढून सुख आणि समाधान शोधण्याचा सहजसोपा मार्ग बिनदिक्कतपणे अनुसरला जाऊ लागला. ‘मूर्ख माणसं घरं बांधतात आणि शहाणी माणसं त्यात भाड्याने रहातात’ असं पूर्वी म्हणायचे. आता कर्ज काढून घर बांधणारे सूज्ञ आणि कर्जं न काढणारे मूर्ख समजले जाऊ लागले. कोरोना हे एक निमित्त, पण ती कर्जं आणि परतफेडीचे हप्ते म्हणजे ‘घी देखा लेकीन बडगा  नही देखा’ या उक्तीचा प्रत्यय देणारे ठरले. त्याक्षणी झालेला तूप-रोटी मिळाल्याचा क्षणिक आनंद कोरोना काळात काळवंडूनच गेला.आणि मग दरमहा मानगुटीवर बसलेलं हप्त्यांचं ओझं तथाकथित समाधानावर बसलेल्या बडग्यासारखंच वाटायला लागलं.

या सगळ्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रवेश झाला आणि कर्जांच्या हप्त्यांचं ओझं वाहणारं गाढव ठरला तो ‘सामान्य माणूस’, पूर्वीच्या काळी स्वतःच स्वतःभोवती आखून घेतलेल्या वर्तुळात समाधानी रहायचा. त्या सामान्य पण सुखी माणसाच्या सदऱ्याला या कर्जांच्या हप्त्यांमुळे जागोजागी ठिगळं लावावी लागल्याचं तीव्रपणे जाणवू लागलं.

पूर्वीच्या काळीही जीवघेणी संकटं येत होतीच. पण जगण्यातल्या अनपेक्षित अडचणींनी निर्माण केलेल्या त्या गंभीर परिस्थितीतही तग धरून रहाता येईल असं नीटनेटकं नियोजन वैयक्तिक पातळीवरच असायचं. सध्याच्या जीवनशैलीत ते नियोजनच गृहीत न धरल्यामुळे घेताना किरकोळ वाटणारे कर्जाचे हप्ते आता फेडताना मात्र डोईजड होऊन बसलेत.

आजच्या जगण्याला प्रचंड वेग आहे ते खरंच.पण किती आणि कुठवर धावायचं आणि तेही किती वेगानं हे स्वतःच योग्य वेळी ठरवण्याचं भान जीवघेण्या स्पर्धेत होणाऱ्या दमणूकीमुळे असं हरवूनच जातंय ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्यासाठी जगायचं तो जगण्यातला आनंद हरवून आपला जगण्याशीच झगडा सुरू होतो आहे.

अशा परिस्थितीत जगण्याचं नेमकं भान न हरवता स्वतःचे प्राधान्यक्रम पुन्हा एकदा नीट तपासून पहाणं अगत्याचं आहे. हे झालं तरच हरवलेले आपले मोकळे श्वास पुन्हा अलगद गवसतील अन्यथा त्या श्वासांसारखाच जगण्याचा आनंदही हरवूनच नाही फक्त,तर विरुनच जाईल.

————————

अरविंद लिमये,सांगली.

(9823738288)

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

छंद नव्हे संगत पुस्तकाचे अंतरंग भाग ३

पुस्तकाच्या शेवटी एक श्वानधर्माचे उदाहरण वाचताना खरोखरच अचंबा वाटतो. ती गोष्ट

अरुणाचल प्रदेश ते‌ काराकोरम खिंड हे आठ हजार कि.मि. अंतर पार करण्यात सेनादलातील तीन अधिकाऱ्यांना कुत्र्याने कशी साथ दिली! गिर्यारोहण चालू झाले. भूतानमधील डोंगररांग दरीतून जाताना मॅस्टिफ जातीचे कुत्र्याचे पिल्लू त्यांच्या मागे लागले. दया आली आणि अधिकाऱ्याने त्याला आपल्या बरोबर घेतले त्याचे नाव द्रुग, (घोडेस्वार) ठेवले गेले. सिक्कीम मधून जाताना द्रुग वेगळ्या मार्गाने पळत जायला लागला. आणि बर्फ उकरायला लागला. पाहिले तर एका माणसाचे प्रेत होते. अधिकाऱ्यांनी हात जोडून पुन्हा त्यावर बर्फ टाकला. पुढे प्रवास गौरी शंकरच्या बेस कॅम्प जवळून २१ हजार फूट उंचीवरून झाला. नेपाळ पार करून कुमाउला पोहोचले. जानेवारी ते नोव्हेंबर त्यांचा प्रवास द्रुगच्या सहवासात आनंदात झाला.

शां. ना. दाते यांच्याकडे श्वान विश्वकोश आहे. कोणत्याही जातीच्या कुत्र्या बद्दल त्याच्या सर्व गुणधर्मांसह संपूर्ण माहिती ते क्षणात देत असत. त्यांचा 50 वर्षांचा परिचय व इतिहास आहे. त्यांच्या परिश्रमाचे आणि तपश्चर्येचे मूर्त रूप हे पुस्तक आहे.

कुत्र्याला बघून पळून जाणारी माणसे हे पुस्तक वाचून कुत्रा पाळण्याचा विचार करू लागले. आणि अनेकांनी प्रत्यक्षात आणले ही. आज दाते हयात नाहीत. पण त्यांचे ९६ पानांचे पुस्तक या रूपाने अमर आहेत.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-२०) – ‘सुषीरवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-२०) – ‘सुषीरवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मागच्या लेखात एक उल्लेख अनावधानाने राहून गेला त्याविषयी…

तालवाद्यांपैकी ज्या वाद्यांमधे प्राण्यांचं कातडं वापरलेलं असतं त्यांना ‘अवनद्ध वाद्ये’ किंवा ‘चर्मवाद्ये’ असं म्हणतात, त्याचं कारण ‘अवनद्ध’ ह्या शब्दाचा अर्थच ‘कातड्याने मढवलेले’ हे आपण पाहिलं. मात्र तालवाद्यांपैकी इतर वाद्यं, ज्यामधे धातूचे, लाकडाचे दोन तुकडे किंवा चकत्या किंवा नळ्या/काठ्यांचा एकमेकांवर आघात झाल्याने नादनिर्मिती होते त्या वाद्यांना घनवाद्ये असं म्हणतात. दोन्ही प्रकारातली वाद्यं ही तालवाद्यंच आहेत आणि दोन्हींतही नादनिर्मिती ही आघातानेच होते… फरक आहे तो फक्त कातड्याचा वापर त्या वाद्यात झाला आहे कि नाही, इतकंच!

सुषीर वाद्यांकडं वळायचं म्हटलं कि पटकन आपल्या डोळ्यांसमोर उभा राहातो मनमोहन मुरलीधर कृष्ण… आपल्या मुरलीवादनानं अवघ्या जगताला संमोहित करणारा! त्याचं वाद्य म्हणजे ‘बासरी’ ज्यात फक्त एका आकारबद्ध पोकळीत फुंकर मारल्यानंतर निर्माण होणाऱ्या कंपनांतून नादनिर्मिती होते. सर्व सुषीर वाद्यांमधे हे एकच तत्व लागू आहे. मात्र मुळात ह्या तत्वाचा शोध कसा लागला असावा? ह्या तत्वानुसार माणसाकडून अंत:प्रेरणेनं घडणारी गोष्ट म्हणजे शीळ! कोणत्याही वाद्याचा आधार न घेता गोड, मधूर शीळ कशी घातली जाते? तर तिथं असतं ते फक्त एकच तत्व, फुंकरीतून म्हणजेच हवेच्या साहाय्यानं केली जाणारी नादनिर्मिती! शीळ घालत असताना आपसूक निर्माण होणाऱ्या आपल्या तोंडाच्या आणि ओठांच्या स्थितीचा विचार केला असता लक्षात येईल कि, ह्या प्रक्रियेत घशातून येणारा हवेचा झोत तोंडाची पोकळीतून मार्गस्थ होऊन ओठांच्या एका विशिष्ट आकारामुळे योग्यप्रकारे नियंत्रित होत असल्यानं नेटकी व सुंदर नादनिर्मिती होते.

जुन्या ग्रंथांमधे उल्लेख आढळतात कि, प्राचीन काळी ‘अन्न’ म्हणून प्राण्यांची शिकार केल्यावर त्यांचं मांस खाल्यानंतर उरलेले अवयव शिल्लक तसेच राहात असतील. कधीतरी गमतीतच कुणीतरी प्राण्यांच्या शिंगांमधे फुंकर मारून पाहिली असेल आणि असं केलं तर त्यातून छान आवाज येतो हे लक्षात आलं असेल. हळूहळू पुढं हेही लक्षात आलं असेल कि शिंगांचा आकार, लांबी बदलली कि आवाजाची जात बदलते. नंतर ह्या गोष्टीचा उपयोग माणूस एखाद्या कारणासाठी सगळ्यांना एकत्र जमवण्यासाठी किंवा एकमेकांना काही संकेत देण्यासाठी करू लागला.

सर्वांना माहीत असणारी ह्याबाबतीतली काही उदाहरणं म्हणजे… ‘रणशिंग’ हे युद्ध सुरू होत असल्याचा संकेत देणारं वाद्य!… काही मंगल प्रसंगाच्या सुरुवातीला वाजवलं जाणारं व सैन्यसंचालन, मिरवणुकी ह्यातही आढळून येणारं अर्धचंद्राकृती ‘शृंग’ हे वाद्य, शिवाय ‘तुतारी’ हे वाद्यही बऱ्याच जणांना माहिती असेल. ह्या वाद्यांना मंगलवाद्यं मानलं जातं. कारण ही वाद्यं म्हणजे प्राण्यांची शिंगं, म्हणजे नैसर्गिकरीत्या अस्तित्वात आलेली!… पुढं मग इतर वाद्यांप्रमाणं वेगवेगळे प्रयोग ह्यात झाले. आज धातूचीही ह्या प्रकारची वाद्यं आपल्याला पहायला मिळतात, काही थोडा भाग धातूचा आणि उर्वरित भाग लाकडाचा अशीही असतात, मात्र त्यांचं मूळ हे प्राण्यांचं शिंग आहे.

ह्याच बरोबर बांबूसारख्या पोकळ नळकांडीत फुंकर मारून बघितली असतानाही आवाज येतोय हेही लक्षात आलं आणि त्यातून हळूहळू पावा, अलगूज, वेणू, बासरी ह्यांनी जन्म घेतला. झाडाच्या पातळ पानाची गुंडाळी (ज्याला बहुधा आपण पुंगळी म्हणायचो) करून त्यात फुंकल्यावरही सुंदर आवाज येतो हे आपण सर्वांनीच लहानपणी करून पाहिलं असेल. ही पिपाणीची शिशुअवस्था म्हणता येईल.

त्याचबरोबर झाडांची पानं एकावर एक ठेवून ती ओठांत धरून त्यात फुंकर मारून आवाज काढण्याचा उद्योगही आपण सर्वांनीच केला आहे. दोन पानांच्यामधे आपसूक तयार होणाऱ्या हवेच्या छोट्याशा पोकळीत फुंकर मारली गेल्यानंच त्यातून आवाज निघत असतो. आज ज्या वाद्यांमधे ‘रीड’ ही संकल्पना वापरलेली दिसून येते तिचा जन्म ह्या प्रकारातूनच झाला असावा.

अशाप्रकारे नादनिर्मिती होऊ शकते हे एकदा लक्षात आल्यावर ‘शंख’ हेही एक नैसर्गिक वाद्य माणसाला सापडलं. प्राचीन काळापासून हे वाद्य पवित्र मानलं गेलं आहे त्याचं कारणच कदाचित ‘परमशक्तीकडून झालेली ह्या वाद्याची निर्मिती’ हे असावं! नैसर्गिक शक्तीनं तयार स्वरूपातच आपल्याला बहाल केलेलं हे वाद्य वाजवताना मानवाला फक्त त्यात फुंकर मारण्याशिवाय काहीच करायचं नसतं आणि ‘परमोच्च शक्तीनं’ तयार केलेलं वाद्य म्हणजे त्यात काहीतरी शक्ती असणंही अपरिहार्यच! म्हणूनच जिथं शंख फुंकला जातो त्या जागेतील सर्व नकारात्मक शक्ती नाश पावून तिथलं वातावरण शुद्ध होतं असं आपल्याकडं विश्वासानं मानलं जातं. घराघरांतून पूजाविधीच्या वेळी शंखपूजन आणि शंख फुंकण्याचं कारणही हेच असावं.

गारुड्याची पुंगी म्हणजेही सुषीर वाद्यच! छोट्या आकाराच्या भोपळ्याच्या खालच्या भागात एकसारख्या लांबीच्या बांबूच्या दोन नळ्या प्रत्येकी एकेरी जिव्हाळीसहीत (रीड) मेणाने घट्ट बसवलेल्या असतात. त्यातल्या एका नळीला छिद्रं असतात व दुसरी नळी एकच आधारस्वर निर्माण करत राहाते. वरती भोपळ्याच्याच निमुळत्या भागातून फुंकर मारली कि नादनिर्मिती होते.

ह्या प्रकारच्या वाद्यांपैकी शास्त्रीय संगीतनिर्मिती करू शकण्याइतपत विकसित, प्रगत अवस्थेला पोहोचलेली वाद्यं म्हणजे बासरी, शहनाई, सुंद्री आणि दक्षिण प्रांतातील नादस्वरम्‌ ! ह्या प्रकरातील वाद्यं वाजवण्याच्या दोन पद्धती आहेत. काही वाद्यांचं निमुळतं टोक ओठांत धरून मग त्यात फुंकर मारली जाते, उदा. शहनाई, सुंद्री, पुंगी, पावा इ. आणि काही वाद्यांमधे बाहेरून फुंकर घालून नादनिर्मिती केली जाते. उदा. बासरी, शंख इ.!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंगण ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

परिचय

बी.एससी, बीएड. २१ वर्षे हायस्कूल मध्ये नववी दहावी ला बीजगणित व सायन्स विषय शिकवले. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले.

बोर्डाच्या बीजगणित परीक्षक व शास्त्र प्रात्यक्षिक परीक्षा परीक्षक एसएससी बोर्ड सेंटर कंडक्टर तीन वर्षे

छंद  वाचन, लेखन व पर्यटन

दरवर्षी दोन तीन दिवाळी अंकात कथा छापून येतात

☆ विविधा ☆ अंगण ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆ 

ये ग ये ग चिऊताई! बाळाच्या अंगणी! तुला देईल चारा पाणी! माझी सोनुली राणी! असं म्हणताच माझा ५ वर्षांच्या नातवाने विचारले अंगण‌ म्हणजे काय ग आजी? फ्लॅटमध्ये रहात असल्यामुळे प्रश्न पडणे स्वाभाविकच.

अंगण म्हणजे काय हे सांगताना मी बालपणी अंगणात रमून गेले.

अंगण म्हणजे घराची शोभा. अंगणातील तुलसी  वृंदावन म्हणजे घराचं पावित्र्य. रेखीव रांगोळी काढलेल्या तुळशी समोर उदबत्तीचा सुगंध दरवळायला.याच अंगणात उंच मोरपिसाची टोपी घालून वासुदेव यायचा,माकडांचा खेळ रंगायच्या.बाहुला बाहुलीचे लग्न अंगणात लागायचे, वरमाई कोण आणि कोणाला वरमाईचा मान कोणाला द्यायचा याचं भांडण अंगणात जुंपायचे. दुपारी मुलींचे गजगे,काचकवडया,टिकरया तर संध्याकाळी मुलांचे  गोटया, विटीदांडू, लगोरी हे खेळ रंगायचे.अबोली चे गुच्छ,तळहाताएवढे जास्वंदीचे फूल, मंजिऱ्या मुळे घमघमणारी तुळस अंगणात असायची. गुढीपाडव्याला गुढी, आषाढीला पालखी सजवून वारी निघायची.नागपंचमीला उंच झोक्याची चढाओढ चालायची. अंगणात हंडी फोडली जायची. काल्याचा प्रसाद खायचा काय सुरेख चव असायची काल्याची!

नवरात्रात फेर धरून हादगा चालायचा, उंच स्वरात हादगा गाणी चालायची. खिरापत हातात पडताच मुली शेजारच्या अंगणात धावत जात.

दिवाळीत किल्ला तयार करून त्यावर शिवाजी महाराज विराजमान व्हायचे. सर्व मुले आपल्या घरातील मावळे किल्ल्यावर उभे करायचे व किल्ला सजवायचे.

उन्हाळ्यात अंगणात पथारी पसरून गप्पा.विनोद, गाणी यांना ऊत यायचा.. मन भरलं की रातराणीचा,मोगरयाचा सुगंध घेत झोपी जायचं.

मी अंगणाच्या आठवणीत एवढी रमून गेले की “आजी मला दूध दे ना गं!” असे तो म्हणताच मी एकदम भानावर आले.

 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पटलं तर… ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

Author: Hemant Bawankar - साहित्य एवं कला विमर्श

 ☆ विविधा ☆ पटलं तर… ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

आपण कधी कधी अगतिक आणि अहसाय होतो ना? त्या दिवशी माझी तशीच अवस्था झाली होती. डेंटिस्ट डॉक्टरांकडे त्या खुर्चीत मी बसले होते आ  ऽ ऽ वासून. माझ्या दाढेच्या पोकळीचे ख ss र करून कोरीव काम चालले होते. तेवढ्यात डॉक्टरांचा एक मित्र आला. माझ्या दाताचे ड्रिलिंग करता करता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.

त्या मित्राचा मुलगा नुकताच M.B.B.S झाला होता आणिलगेच एका सरकारी दवाखान्यात जॉबही मिळाला होता. त्या आनंदा प्रित्यर्थ्य या मित्राला पेढे द्यायला तो आला होता.

बातमी चांगली होती म्हणजे काय खूपच चांगली होती. डिग्री मिळताच जॉब? वॉव! या मध्ये मी अस्वस्थ होण्यासारख – काहीच नव्हते. पण त्यांचे पुढचे बोलणे ऐकून माझा मेंदू हादरायला लागला.” आता काही काळजी नाही बघ. अरे, सरकारी दवाखान्यात काम असते कुठे आता? पण पगाराची निश्चिंती. अरे असा जावई मिळवायला आमच्या घरी रांग लागल रांग ! कपाटापासून गॅस शेगडी पर्यंत सगळ देतात जावयाला. आम्हाला काही चिंता नाही बघ.”

हे ऐकल्यावर त्याची मेडिकल कॉलेजला अॅडमिशन कशी झाली असेल ? तो पास कसा झाला असेल याहीपेक्षा त्याच्याकडे पेशंट आला तर त्याचे कसे व्हायचे या विचाराने माझ्या दाढेची पोकळीच काय मेंदूही हादरायला लागला.

मुलाचे बारावीचे वर्ष म्हणजे सगळे घरदार अलर्ट. मुलांवर घारीसारखी नजर असते पालकांची. त्याचे कॉलेज किती ते किती? कलासच्या वेळा कोणत्या? त्यानुसार आई आपल्या कामाचे नियोजन करत असते. एका मैत्रिणीच्या मुलाचा हा अनुभव. क्लासच्या एका परीक्षेमध्ये त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले होते. पण त्या सरांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्याचा तपासलेला पेपर त्याला न दाखवता त्याला त्यांनी ही उत्तरं बघून लिहिलीस हे कबूल कर नाहीतर तुला घरी सोडणार नाही अशी तंबी दिली. तो सारखे सांगत होता मी अभ्यास करून, नबघता पेपर सोडवलाय. पण सरांना ते काही केल्या पटत नव्हते. तासभर बिचारा उभा! सर काही केल्या त्याला घरी जाऊ देईनात. त्याला खूप भूक लागली होती. शेवटी कळवळून तो सरांना म्हणाला,” सर, तुम्ही सांगता म्हणून म्हणतो मी पेपर बघून सोडवला.” कॉपी न करता त्याला तसे बोलावे लागल. इकडे मुलगा घरी आला नाही म्हणून आई काळजीत. आल्यावर त्याने खरे कारण सांगितले तरी तिलाही ते पटेना. या मानसिक दोलायमान अवस्थेत त्याचे आठ दहा दिवस अस्थिरतेत गेले. आता तोच मुलगा आपल्या मेरिटवर हिमतीवर चांगली नोकरी मिळवून परदेशात स्थिर झालाय. काय विचार करायचा आपण आणि काय निष्कर्ष काढायचा यातून?

आपण मोठ मोठे अभिनेते इतके पाहतो की त्यांनी मेडिकलच शिक्षण पूर्ण केले आणि नंतर ते सोडून देऊन अभिनया कडे वळले आणि ते क्षेत्र गाजवल. कोणी इंजिनियरींगची डिग्री मिळवून गायनाकडे वळले आणि प्रसिद्ध गायक बनले. या लोकांनी सांगितलेले समर्थन न पटण्यासारखे असते. एका गरीब, हुशार, होतकरू मुलाला तुमच्या शिक्षणाचे पैसे तरी द्यायचे ना, त्याचे आख्खे घर वर आले असते. त्याची बुद्धि आणि वेळ धडपड करण्यात जाऊन त्याचे आयुष्य कष्टात काळजी करण्यात गेले नसते. कितीतरी मुली सुद्धा बारावीला चांगले मार्क्स पडले म्हणून मुलींच्या कोट्यामधून इंजिनियरींगला अॅडमिशन मिळवतात आणि लग्न झाल्यावर आमच्याकडे नोकरी केलेली आवडत नाही म्हणून घरी बसतात. हे आधी नाही का समजत? पण कोण, कुणाला आणि कसे सांगणार ?

असे आपल्या अवती भोवती कितीतरी प्रश्न निर्माण होत असतात. डोक्याभोवती पिंगा घालून आपल्याला त्रस्त करत असतात. आपणच का विचार करत रहातो असेही वाटते. कितीतरी गोष्टी काही केल्या पटत नाहीत. तरी आपण गप्प बसतो.

बघा, पटलं तर

व्हय म्हणा.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ११) – राग~मधूवंती ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग ११) – राग~मधूवंती ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूरसंगतराग~मधूवंती

“रंजयती इति राग” असे संगीतांतील रागांविषयी म्हटले जाते. कोणताही राग घ्या, रसिकांचे मनोरंजन करणे हेच त्याचे काम!राग म्हणजे तरी नेमके काय? तर कमीत कमी पांच व अधिकाधिक सात शुद्ध/कोमल स्वरांची गुंफण!

मधूवंती हा त्यामानाने आधुनिक असा सुमधूर राग.

कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांचे फार जवळचे स्नेहसंबंध होते.वसंतराव कुमारांना गुरू मानत असत.काही कारणांमुळे दोघांत वाद होऊन थोडा दुरावा निर्माण झाला होता,त्यावेळी मनाच्या विमनस्क अवस्थेत वसंतरावांनी

“मैं आऊ तोरे मंदरवा

पैय्या परत देहो मनबसिया”

अशा अस्थाईच्या दोन ओळी लिहून पाठविल्या.त्यावर कुमारांनी ताबडतोब “अरे मेरो मढ्ढैया तोरा आहे रे।काहे धरो चरन मोरे मनबसिया।।” असा अंतरा लिहून पाठविला व बंदीश पूर्ण केली. तीच पुढे मधूवंतीतील बंदीश म्हणून प्रसिद्ध झाली.

“मी तुमचाच आहे, माझे घरही तुमचेच आहे, असे असतांना माझे चरण धरण्याची काय गरज? असा या ओळींचा अर्थ आहे. दोघांच्या मैत्रीतील सामंजस्य जसे यांत दिसून येते तसाच मधूवंती हा शूद्ध मैत्रीचा राग आहे. याच्या नावांतच मधू आहे, तेव्हा या रागांतील माधूर्याविषयी वेगळे सांगावयास नको.

तांत्रिक द्दृष्ट्या हा राग तोडी थाटांतून निर्माण झाला आहे, परंतु तोडीप्रमाणे रिषभ/धैवत कोमल नसून शुद्ध आहेत. ह्याचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे या रागाचा जनक तोडी थाट असावा असे वाटते.

जाति~ओडव/संपूर्ण

वादीपंचम, संवादीषडज्, राग सादर करण्याची वेळ दिवसाचा तिसरा प्रहर. सहाजिकच मध्यम तीव्र आणि गंधार कोमल. वैचित्र्यासाठी कधीकधी अवरोही रचनेत कोमल निषाद वापरण्याची पद्धत आहे.

नि सा (ग)(म)प नि सां

सां नि ध प,(म)प (नि)ध प,(म)(ग)रे सा असे याचे आरोह नि अवरोह.(ग) (म) प नि सां नि ध प,(म) प (ग) (म)प (नी) ध प,(म)प (ग) (म)(ग) रे सा या स्वरसमूहावरून मधूवंतीची ओळख पटते.

सांझ भई,अजहूॅं नही आये प्रीतम प्यारे ही विलंबीत तीनतालमधील अश्विनी भिडे~देशपांडे यांची बंदीश प्रचलित आहे.बैरन बरखा रितू आई ही कुमारांची मध्यलय तीनतालमधील बंदीश वर्षाऋतूचे चित्र डोळ्यासमोर उभे करते.

असे म्हणतात की कोल्हापूरच्या पाध्येबुवांनी अंबिका असा राग तयार केला,पुढे विलायतखाॅंसाहेबांनी त्याचे मधूवंती असे गोजिरे नामकरण केले.

सुमन कल्याणपूर यांचे मधूवंतीच्या सुरासुरांतून आळविते मी नाम। एकदां दर्शन दे घनश्याम।।हे गीत रसिकजनांचे आवडते आहे. गीत रामायणांतील श्रीराम जेव्हा वनवासाला निघण्यापूर्वी सीतेचा निरोप घेण्यासाठी तिच्या महाली गेले तेव्हा काकूळतीने सीतेने हट्ट केला व ती म्हणाली, “निरोप कसला माझा घेता।जेथे राघव तेथे सीता।।” बाबूजींनी ही रचना मधूवंती या रागांतच निबद्ध केली आहे.

वरील गीतांतील शब्दांवरून मधूवंतीच्या स्वरांत विनवणी, नम्रता या भावना साकार होत असल्याचे आपणांस दिसून येते. बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी हे माणिक वर्मांचे गाजलेले गीत मधूवंतीच्या सुरांवरच आधारलेले आहे. मनमंदीरमे आयो शाम, रस्मे उल्फतको निभाये, पायलिया बावरी ही काही सिनेगीते मधूवंतीचीच झलक दाखवितात.

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print