मराठी साहित्य – विविधा ☆ इथे साहित्याचे साचे मिळतील ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ इथे साहित्याचे साचे मिळतील ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

पत्ता: माझी टवाळखोरी  मॉल, हास्यदा रोड, टवाळपूर, ४२०४२०

‘हॅलो, नमस्कार, बोला ….

‘टवाळखोरी मॉल’ आहे ना हा?’

‘हो, हो. बोला की’

‘आम्हाला  मॉल  बघायला यायचे होते आज. प्रसिध्द्व ’फॉरवर्डकार’ खेळकर यांनी त्यांचा  रेफरन्स देऊन तुम्हाला  फोन करायला सांगितलय. आम्ही  त्यांचे जवळचे स्नेही.  अपॉईनमेंट  घेऊन यावे लागते ना तुमच्या मॉलला  म्हणून फोन केला.’

‘बरं बरं. पण शनिवार/रविवार बुकींग फुल्ल आहे हो. सोमवार नंतर नाही का जमणार?’

‘बघा ना  प्लिज.’

‘खेळकरांनीच  सांगितले, माझे नाव सांगा, देतील अपॉईमेंट.’

‘आता तुम्ही एवढं मोठं नाव घेतलय. नाही कसं म्हणणार?  या दुपारपर्यत!’

………………………………………..

‘नमस्कार!  आम्ही तुम्हाला  सकाळी फोन केला होता.’

‘हो हो, या या.’

बोला, काय पाहिजे तुम्हाला ?

आम्हाला पूर्ण मॉल  कसा आहे,  म्हणजे कुठे काय आहे, कुठे कोणत्या प्रकारचे साचे आहेत, हे  सांगाल का, मग आम्ही ठरवू.’

‘ठीक आहे.  हे  बघा  आमच्या कडे  सर्व प्रकारचे, सर्व विषयावरील  लेखन – साचे मिळतील.  तुम्हाला ते  कुठल्या सोशल मीडियावर पोस्ट करायचे आहेत, त्यानुसार ते ठरवावे लागतील.’

‘म्हणजे?

म्हणजे असं बघा, तुम्हाला  व्हाट्सअप/सिग्नल/टेलिग्राम साठी पाहिजे असेल तर पहिला मजला. फेसबुक/ब्लॉग या मंचासाठी दुसरा मजला.  या दोन्ही मजल्यावर जाण्यासाठी  काही फी नाही म्हणजे ’विंडो शॉपिंग’ सारखं नुसतं फेरफटकाही मारू शकता.  तिथे  प्रत्येक मजल्यावर परत  वेगवेगळे विभाग आहेत.  वाढदिवस शुभेच्छा/ आभार/व्हिडीओ, दिन विशेषानुसार लेखन ( स्मृती दिन/जन्म दिन ), गुड मोर्नीग  ते शुभ  रात्री  – गुलाबाची फुले/निसर्गचित्र सोबत एखादा  मराठी/हिंदी/इंग्रजी सुविचार, धार्मिक दिन विशेष,सण, परंपरा, प्रासंगिक  घटनेवर मिम्स, तसेच इतिहासातील  कोण कुणास, केव्हा काय म्हणाले/लाव रे तो व्हिडीओ, लघुकथा, रहस्य  कथा, बालगीते, विडंबन,  असे हटके विभाग  आहेत. सध्या दोन्ही मजल्यावरचे ’राजकारण’विभाग मात्र एकदम  फुल्ल आहेत. तिथे मात्र तुम्हाला किमान १० दिवस आधीच  नाव नोंदवून यावे लागेल.’

‘एक मिनिट हं….  हा  बोला  राम भाऊ.’

‘काय म्हणता  कंप्लेंट करायची आहे ?   अहो मग  ग्राहक सेवा विभागाला  फोन करून तक्रार  नोंदवा.  हा घ्या  नंबर ४२०४२०४२०….  काय? मी ऐकून तरी  घेऊ?  बर  सांगा…..  काय म्हणता? या विनोदाने  अपमान होतोय ?  कुठला विनोद?   रामभाऊ  तुम्ही आमचे नियम वाचलेत का?  ? एकदा विकत घेतलेल्या साहित्यावर काही आक्षेप असल्यास २-३ तासात बदल करून घ्यावेत, नंतर तक्रार चालणार नाही ? असं स्पष्ट  लिहिलंय आम्ही.  आता हा विनोद एव्हढा व्हायरल झाला, कुण्या ज्ञानवंताने तुम्हाला जाब विचारला मग जागे झालात तुम्ही?  तरी देखील तुम्ही तक्रार नोंदवा आम्ही योग्य तो बदल करून देऊ’

‘हा! सॉरी हं… मधेच फोन आल,  हे  रामभाऊ आमचं नेहमीचं गि-हाईक.’

‘असू दे असू दे, पण तिसर्‍या मजल्यावर काय आहे?

‘हा तिथे जाण्यासाठी मात्र तुम्हाला आमचे ’प्राईम कस्टमर’ असणे आवश्यक आहे. तो खास लोकांचा ’ट्विटर’ विभाग आहे.  ट्विट बद्दलची सर्व माहिती’अ’पासून’’ज्ञ’ पर्यत, ट्विट्स वगैरे आम्ही सर्व शिकवतो. कमी शब्दातील अनेक’ट्विट’तिथे तुम्हाला सहज मिळतील.  ते कसे पोस्ट करायचे त्यावर  रिट्विट कसे करायचे,  ते व्हायरल कसे करायचे,  इतरांना फाँलो कसे करायचे, फाईल अपलोड करून डिलीट कशी करायची इ इ इ…. तिथे मेंबरशीप घेण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरून द्यावा लागेल.’

‘आणखी एक प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक विभागात  भाऊ, अण्णा, आक्का, तोडकर, काटकर  असे अनेक  मार्गदर्शक आहेत, ते तुम्हाला हवे तसे साहित्य, हव्या त्या शब्दात/प्रकारात लगेच करून देतील. आणि हो  १००० रु च्या खरेदीवर  एक’ऑनलाईन स्पर्धेसाठी  तुमचा एक व्हिडीओ’आम्ही  फ्री मध्ये बनवून देऊ,  ही स्पेशल ऑफर फक्त काही दिवसासाठी बर का… बरं मग येताय मॉल पाहून?’

‘हो हो…’

………………………………………

मंडळी, एक चिमटा काढा स्वतःला.  अहो हळू हळू  किती जोरात काढलात? दुखलं ना?

अहो, स्वप्नात नाही आहात हे  सांगण्यासाठी सांगितलं चिमटा काढायला.  होय स्वप्न नाहीय हे येत्या  गुढीपाडव्याला हा ‘टवाळखोरी मॉल’ सुरु होतोय तेव्हा अवश्य भेट द्या

(टवाळखोर मालक) अमोल टवाळपूरकर 

*आमची ’टवाळपूर’ सोडून कुठेही शाखा नाही 

 

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्वान प्रेम – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

संक्षिप्त परिचय 

संप्रत्ति – प्रथम रिजर्व बैंक ऑफ इंडिया व नंतर आई डी बी आई,  डेप्युटी मैनेजर म्हणून स्वेच्छानिवृत्ति

आवड – वाचन, लेखन, संगीत व प्रवास

प्रसिद्ध साहित्य – लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ, श्री दीपलक्ष्मी, ललना, विवेक, भटकंती, रूची, मेनका, अथश्री , ब्रह्मवार्ता, चार चौघी वगैरह

दिवाळी अंक – मानिनी, अनुराधा, उत्तम कथा, हेमांगी यामध्ये प्रवासवर्णन वर लेख

इतर – ललित लेख, कथा, टी व्ही व रेडिओवर कार्यक्रम, परिक्षक म्हणून तसेच अनेक मंडलमध्ये विविध  विषयांवर भाषणे

पुस्तके – देशोदेशींचे नाभांगण  (माननीय यशवंतराव चव्हाण वांग्मय परितोषिक प्राप्त), चला आसामापासून अंदमान पर्यंत, निसर्गरम्य सातारा, सफर अलीबागची (शालेय विद्यार्थ्यासाठी), ओंजळीतली चांदणफुळे

 ☆ विविधा ☆ श्वान प्रेम – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

लग्न होऊन मी आगाशी ला म्हणजे विरारच्या पुढे राहायला गेले. कोकणातल्या सारखे मागे पुढे अंगण विहीर छोटी वाडी असलेले ते घर होते. साहजिकच घरात विठू नावाचा लाडका कुत्रा  सोबतीला होता.

लहानपणापासून माझं कुत्रा या जमातीशी अजिबात पटत नाही. पण विठू म्हणजे सासर घरचं इमानी श्वान होतं. मी विठू बरोबर सुरक्षित अंतर राखून राहिले. त्यानेही माझी फारशी दखल घेतली नाही .माझा अलिप्तपणा एखाद्या सूज्ञ वृद्धा सारखा त्याने सहन केला. एक-दोन वर्षातच  वृद्धत्वामुळे विठू  ‘विठू चरणी’ विलीन झाला. त्यानंतर अर्थातच घरात पुन्हा श्वान प्रवेश झाला नाही.

जोगेश्वरीला रहायला आल्यावर रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांमुळे माझ्या त्यांच्याविषयीच्या नाराजीत भरच पडली. दिवसभर झाडाखाली नाहीतर मातीच्या खळग्यात डाराडूर झोपणारे हे प्राणी रात्र झाली की ताजेतवाने होतात. आणि अपरात्री तारस्वरात चित्र विचित्र आवाजाने आपल्या झोपेचे खोबरे करतात. अनेक श्वानप्रेमी रस्त्यावरच्या कुत्र्यांना इतकी बिस्किटे खायला घालतात की नंतर ही बिस्कीटही त्या कुत्र्यासारखीच ठिक ठिकाणी लोळत पडलेली असतात. अशाच एका श्वानप्रेमी बाईला मी एकदा म्हटले की ‘अहो,आता तो मारी खाऊन खाऊन कंटाळला आहे. क्रिमची बिस्किट घाला त्याला. माझा उपहास लक्षात न घेता ती म्हणाली, ‘नही उसे मारी ही प्रिय है. आज शायद उसकी तबियत ठीक नही है.’

आमच्या लहानपणी भटके कुत्रे पकडून नेण्यासाठी म्युनिसिपालिटीची गाडी येत असे. पण हे हुशार प्राणी आधीच तिच्या वासाने पळून लपून बसत. नंतर त्यांच्या नसबंदी ची योजना आली. कागदोपत्री या योजनेवर लाखो रुपयांचा खर्च झाला. पण मूळ समस्या रस्तोरस्ती आरामात वाढत राहिली आणि अशा भटक्या कुत्र्यांच्या चावण्यामुळे मृत्यू  झाल्याच्या बातम्यात आणखी भर पडली.

अनेक श्वानप्रेमी त्यांच्या लाडक्याला गळ्यात पट्टा बांधून रस्त्यावर फिरवीत असतात. त्यावेळी रस्त्यांवरील कुत्रे त्यांच्या अंगावर भुंकून भुंकून आपल्या हद्दीत अतिक्रमण  केल्याबद्दल त्यांना तंबी देतात. हे पाळीव लाडके हमखास रस्त्याच्या मधोमध विधी उरकतात. आणि साखळी हातात धरून श्वानप्रेमी ती बाललीला कौतुकाने पहात असतात. अशा एका श्वान प्रेमी तरुणीला मी एकदा  हटकले .तेव्हा रागारागाने माझ्याकडे पहात ती म्हणाली,

‘Surely we have a right to bring  our pets to the streets.’

‘Definitely. But  you  also have a duty to clean up after your  pet.’

माझ्यासारख्या पिकल्या केसांच्या बाईकडून तिला तिच्याच भाषेतल्या उत्तराची अपेक्षा नव्हती. ती आश्चर्याने माझ्या कडे पहात असताना आमचा वाद विवाद ऐकून, माझ्यासारखे फिरायला बाहेर पडलेले व इतर लोक गोळा झाले. त्यांनी माझ्या सुरात सूर मिळवला

‘What she says is right.’

‘हा. बराबर है. ध्यान नही रहता तो  वो गंदगी चप्पल बूट के साथ हमारे घर तक आती है.’

तेवढ्यात मी पर्स मधली प्लास्टिक पिशवी काढून तिच्यासमोर धरली आणि म्हटलं,

‘Use  this for  to-day and  don’t forget  next time. ‘

नाईलाजाने तिला ते काम करणं भाग पडलं. मला तात्पुरतं समाधान मिळालं. कारण सगळ्या श्वान  प्रेमींच्या वेळा सांभाळून त्यांना प्लास्टिक पिशव्या देणं अशक्य होतं.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग-6 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग- 6 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

अशी व्याख्याने, मूल्याधिष्टित कार्यक्रमांना आम्हां मुलांना घेऊन जाणे, आपल्या संस्कृतीची  ओळख करून देणे ह्या बाबतीत आईबाबा नेहमीच सतर्क होते.

विद्यापीठ हायस्कूलच्या ग्राउंडवर राष्ट्र सेविका समितीच्या पूज्य लक्ष्मीबाई केळकर ऊर्फ मावशी यांची रामायणावर प्रवचने होती. ती पण रात्रीचीच.   विद्यापीठ हायस्कूल घरापासून खूपच लांब होतं. चालतच जावं-यावं लागणार होतं. सहदेव म्हणून हाॅस्पिटलचेच  एक कर्मचारी,  त्यांना विनंती करून आईने त्यांना व त्यांच्या पत्नीला सोबतीला बरोबर घेतले.

वंदनीय मावशी यांची वाणी झुळुझुळु वहाणारं गंगेचं पाणी.  शांत चेहरा, शांत बोलणं, स्पष्ट उच्चार, जमिनीवर आसनावर पालथी मांडी घालून बसलेल्या, शुभ्र नऊवारी लुगडे, दोन्ही खांद्यावरून पदर घेतलेला, शुभ्र रूपेरी केस, नितळ गौरवर्ण.

रोज प्रवचनाच्या सुरवातीला प्रार्थना केली जात होती.

“ही राम नाम नौका भवसागरी तराया

मद, मोह, लोभ सुसरी, किती डंख ते विषारी

ते दुःख शांतवाया मांत्रिक रामराया ।।

सुटले अफाट वारे मनतारू त्यात विखरे

त्या वादळातुनिया येईल रामराया ।।

भव भोव-यात अडली नौका परि न बुडली

धरुनी सुकाणु हाती बसलेत रामराया ।।

आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूरदेशी

तो मार्ग दाखवाया अधिकारी रामराया ।।

प्रभु ही तुझीच मूर्ती चित्ती सदा ठसू दे

मनमानसी या कृपा तुझी असू दे ।।

एकदा बोलायला सुरुवात केली की ऐकताना दीड तास कधी संपला कळतच नसे. अफाट जनसमुदाय,  pin drop silence.

व्यासपीठावर प्रभु रामचंद्रांचा हार घातलेला ‘ पंचायतन’ फोटो. उदबत्तीचा वातावरणात भरून राहिलेला दरवळ आणि मावशींचं ओघवतं, निर्मळ वक्तृत्व.  सग्गळा परिसर रामनामाने भारलेला असे.

प्रवचनात रामायणातल्या व्यक्तिंची,  त्यांच्या स्वभावांची , वर्तणुकीची आणि घडलेल्या घटनांची गोष्टीरूप ओळख करून देताना,  मावशी जीवनातल्या प्रत्येकाच्या जबाबदारी पेलण्याचे, वागण्याचे,विचारांचे स्वरूप कसे असावे यावरही बोलत असत. त्यावेळी हे सर्व कळण्याचं आमचं वय नव्हतं. खूपसं कळायचं नाही. राष्ट्रसेविका समितीचे कार्य हे व्यक्ती आणि कुटुंबापासून देशसेवेपर्यंत व्यापलेले होते. हे कार्य करताना व्यक्तिविकास, कुटुंबातली प्रत्येकाची कर्तव्ये आणि समाजातला आपला वावर हा देशसेवेसाठीच असला पाहिजे,  हे शिकवणारे.

राजूनं,  माझ्या भावानं  या संदर्भातली एक आठवण सांगितली.  एकदा प्रवचनाच्या आधी आई मावशींना भेटायला गेली. मी बरोबर होतो. आईनं विचारलं,  मावशी,  मी कशाप्रकारे देशसेवा करू शकते? त्यावर मावशी म्हणाल्या,  तू घरचं सगळं सांभाळतेस, पतीला योग्य सहकार्य देतेस, भविष्य काळातली चार आयुष्ये घडवते आहेस, हेच निष्ठेने करत रहा, हीच देशसेवा.

त्या दिवशीच्या प्रवचनात मावशींनी हाच विचार उलगडून दाखवला.  प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने,  आपुलकीने आणि जबाबदारी ने करणे, हीच रामायणाची शिकवण आहे.

काही वर्षानंतर, राष्ट्र सेविका समितीच्या शिबिरात माझे व माझ्या बहिणीचे नाव आईने नोंदवले. 21 दिवसाच्या शिबिरात स्वावलंबन, स्वसंरक्षण, देशाभिमान, अशा अनेक मूल्यांवर आधारित बौद्धिके, खेळ, आणि परस्पर संवाद यातून व्यक्तिमत्व विकास घडवण्याचे  संस्कार नकळत आमच्यात रुजले.  खरंतर हे त्यावेळी कळले नाही, पण पुढे अनेक प्रसंगात आपोआप बुध्दी तसाच विचार करू लागली. हळूहळू खरेपणा  आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे, ह्याची जाणीव झाली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे तडफदार, अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व.  जणु दुसरे शिवराय अशी देहयष्टी,  पेहराव, दाढी, डोळ्यांत तीच चमक आणि अस्खलित वाणी.

तर मावशी अतिशय नम्र, आणि केवळ आदर करावा अशा. माया, ममता, प्रेम हे सगळे शब्द एकाठिकाणी सामावलेलं व्यक्तिमत्व. शिस्त आणि करारीपणा ही त्यांची दुसरी बाजू.

श्रोत्यांवर नकळत संस्कार घडत होते. व्याख्याने,  प्रवचने ऐकून दुस-या दिवशी त्यावर गप्पा मारत जेवणे, हा आमचा आवडता छंद म्हणा किंवा काही, पण त्यावर बोलायला आवडायचे. कधी कधी न समजलेलं आई समजून सांगायची. त्यावेळी ह्याचं मोठंसं महत्व जाणवलं नाही. ते सहजरित्या होत होतं.

पुढे आयुष्यात कळलं की ते किती छान आणि महत्वाचं होतं.

बालपणीच्या आठवणी लिहिता लिहिता परत लहान झाल्यासारखे वाटले.

खरंच किती सुंदर असतं नाही बालपण! आई बाबा,  बहीण भाऊ, , छोटंसं जग. इथे स्पर्धा नाही, स्वार्थ नाही, राग नाही.

“या बालांनो या रे या” कवितेतली खरी

“सुंदर ती दुसरी दुनिया”

“बचपन के दिन भी क्या दिन थे”

“उडते बन की  तितली”

समाप्त

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विदुषक ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ विदुषक ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

मोठं लालबुंद नाक, लिपस्टिकने गालावर बनवलेले दोन मोठे लाल गोळे भरपूर पावडर लावून गोरापान बनवलेला चेहरा, लालचुटुक ओठ, फ्रीलचा झगा, मोठ्या पट्यांची विजार आणि गोंडे असलेली मोठी टोपी. चेहर्‍यावर वेगवेगळे हावभाव, मिश्कील हास्य, आणि विचित्र उचापती करत जेव्हा हा विदुषक रिंगणात उतरतो तेव्हा हा सगळा अवतार पाहीला की नकळत मोठ्यांच्या चेहर्‍यावर हसू आणि लहान मुलांच्यात हलकल्लोळ माजतो.

एखादा बुटका आणि दुसरा अतिउंच अशी जोडी जेव्हा क्रिकेट खेळते आणि मुद्दामून आपला चेंडू मुलांच्यात फेकत बॅट टाकून पाळायला लागते तेव्हा सारे अगदी पोटभरून हसतात.

एखाद्या सायकल स्वाराची सायकल चोरतात किंवा रिंग मास्टरलाच घाबरवण्यासाठी मुद्दाम वाघाची डरकाळी काढून पळून जातात. अश्या अनेक मनोरंजक उचापती करत लोकांना मनमुराद हसवतात. त्यांचे काही क्षण का असेना आनंदात घालवतात सगळे टेंशन विसरायला लावतात.

लहानमुलांच्या टाळ्यांच्या गजरात स्वतः ला विसरून जगाला हसवतात.

लोकांसाठी हा केवळ एक विदुषक असतो चित्र विचित्र रूप घेऊन हसवणारा. पण माझ्या मते तो एक उत्तम कलाकार असतो. किती सहजपणे तो सार्‍यांना हसवून जातो. स्वतःची दुःख बाजूला सारून, सतत चेहर्‍यावर स्मित हास्य ठेवत उत्तम अभिनय पार पाडतो. त्याच्या चेहर्‍यावरुन त्याच्या मनात चाललेली तगमग तो अजिबात जाणवून देत नाही कोणाला.

फक्त सर्कशीतच विदुषक असतो असं नाही बरं का, तर पूर्वीच्या काळी कामाचा ताण कमी व्हावा आणि मनाचे मनोरंजन व्हावे म्हणून राज्याच्या दरबारी विदुषकाला मानाचे स्थान होते. त्यातले कृष्णदेवराय ह्यांच्या दरबारातील तेनालीराम हे खूप प्रसिद्ध झाले ज्यानी मनोरंजना बरोबर राज्याचा मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली आणि अनेक अडचणींवर तोडगे काढले.

सध्या वर्तमानपत्रात व्यंगचित्र काढून व्यंगचित्रकार  विदुषकाचीच भूमिका बजावतो. ते वेडेवाकडे चित्र पाहून सकाळच्या वेळी आपल्या चेहर्‍यावर हास्य उमलवतो.

आपल्या तान्हुल्यांसाठी बरेचदा आई विदुषक बनते, स्वतःची सारी दुःख, तणाव बाजूला ठेवून सुंदरसा विदुषकाचा मुखवटा घालत दुःखाचा लवलेश ही चेहर्‍यावर न आणता उत्तम अभिनय साकारते फक्त त्याच्या चेहर्‍यावर हास्य उमलावे म्हणून.

मला आठवतं माझी एक मैत्रीण होती, ती कायम अशी विदुषकासारखी वागत होती. काहीतरी विचित्र करून हसवायची सगळ्यांना, आम्ही तिला जोकर म्हणूनच ओळखत होतो. आत्ता कळतं की तो अभिनय करून ती अनेक ठिगळं लपवण्याचा प्रयत्न करत होती.

आयुष्यात विदुषकाचा मुखवटा घालून किरदार निभावणे फार अवघड आहे. आज समाजात असे अनेक जण आहेत जे ह्या विदुषकांना हिणवतात त्यांना कमी दर्जा देतात पण हे फार महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. विदुषकांमुळे आपण काही काळ का होईना आपली सारी दुःख विसरून पोटभर हसू शकतो.

जरा बघा प्रयत्न करून जमतं का हसवायला त्यांच्या सारखे. जे ओठ बोलू शकत नाहीत ते त्यांचे डोळे बोलून जातात. बघा त्यांच्या डोळ्यात काही समजते का?? कदाचित ते अस सांगत असतिल की आम्ही पण माणूस आहोत आम्हाला हिणवू नका.

मी एवढच म्हणेन त्यांना हिणवण्या पेक्षा त्यांचा मुखवटा घालून तुम्हालाही त्यांच्या प्रमाणे सगळ्यांना हसवता येतं का पहा… काहीकाळ का होईना सारी दुःख विसरायला लावून काही आनंदाचे क्षण कोणाला देता येतात का ते पहा..

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

28.01.2012

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बालपण देगा देवा – भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

 ☆ विविधा ☆ बालपण देगा देवा – भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

माझी तिच्याच एवढी आणखी एक चिमुकली मैत्रीण!… तिचा जास्तीत जास्त मुक्काम आमच्या बागेत असतो. सकाळी- सकाळी हातात एक कुंडा घेऊन आमच्या बागेत बकुळीची फुलं वेचायला जेव्हा ती येते तेव्हा तिला स्वेटर घालण्यासाठी परत पाठवावं लागतं. थंडीने नुसती कुडकुडत असते बिचारी. मला जेव्हा रिकामा वेळ मिळतो तेव्हा बकुळीच्या फुलांचे गजरे  करणं हे आमचं आवडतं काम असतं.काही झाडांच्या मोठ्या पानांना काड्या टोचून पत्रावळी, द्रोण बनवणं तिला खूप आवडतं….तिच्याआजीकडून ती शिकलीय ते करायला…. मग खोटी खोटी देवपूजा आणि पाठोपाठ पत्रावळीवर नैवेद्य ठेवणं हे तर आलंच.

ती परी कल्पनात मग्न असते. परिकथा तिला फार आवडतात.खूप घेराचा छानसा फ्रॉक घातलेली ,मोकळ्या कुरळ्या केसांवर  फुला फुलांचा हेअर बँड लावलेली ,बागेत फुलं, पानं निरखत कल्पनेतल्या फुलपाखरांबरोबर ,पक्षांबरोबरहितगुज करणारी ही वनकन्यका खूपच लोभस दिसते.

“तू मोठेपणी कोण होणार?” ” परीराणी” तिचं उत्तर असतं. तर इतर दोघींची उत्तरं असतात, “मी तिचल होनाल, “मी आई होनाल. असाच एक माझा छोटा मित्र, तो जरा याबाबतीत कन्फ्युज्डच असतो. “मी बार्बर होणार ..नाही नाही मी मेकॅनिक…नाहीतर प्लंबरच होणार.” तो सांगतो. उच्चारात बोबडे पणा नाही, स्पष्ट साफ आवाजात तो आपल्या भावी करिअरचा प्लॅन सांगतो….. अजाणतेपणाने!

.. त्याला राजा राणीच्या गोष्टी नाही आवडत.चिऊ-काऊच्या गोष्टीची तो वाट लावून टाकतो.”शेण म्हणजे काय?मेण म्हणजे काय?म्हातारीआजी भोपळ्यात कशी मावेल?” असे त्याचे प्रश्न असतात. पक्षी, प्राणी, जनावरे बोलतात,यावर त्याचा विश्वास नाहीय. त्यामुळे  इसापाच्या नीतिकथा फेल! त्याला अगदी व्यावहारिक म्हणजे फुगेवाला,ट्रॅफिक पोलीस,रस्त्यावर भटकणारा कुत्रा अशा कुणाचीही जुळवून रंजक केलेली गोष्ट आवडते.

त्याचे सगळे खेळ मैदानी असतात. त्याच्या बरोबर मला फुटबॉल,बास्केटबॉल, क्रिकेट असले खेळ खेळावे लागतात… आणि कायम त्याला जिंकुनही द्यावे लागते. मुद्दामच थकल्याचं नाटक करत मी खाली बसले की “तुझे पाय चेपून देतो” म्हणत पाय चेपता चेपता हळूहळू माझ्या मांडीवर डोके ठेवून तो झोपी जातो. त्याचा चेहरा पाहताना सुख सुख म्हणजे दुसरे काय? ते हेच असा विचार मनात येऊन मला आनंद वाटतो.

छोट्या मुलांना माझ्याबरोबर खेळायला आवडते आणि मलाही त्यांच्याबरोबर खेळायला. ते आपल्या भावविश्वात मला घेऊन जातात .त्यांची सुखदुःखे माझ्याबरोबर शेअर करतात आणि त्यांच्या सहवासात मी माझी प्रापंचिक शारीरिक-मानसिक दुःखं विसरून जाते.

वयाने सत्तरी ओलांडलेली मी मनाने लहान होऊन जाते. कधी वास्तवाची जाणीव झाली की माझं म्हातारपण मला डिवचू लागतं. पण त्याला न जुमानता देवाजवळ मी हेच मागणे मागते, ‘देवा मनानं का होईना मला बालपणातच ठेव. मला बालपण उपभोगू दे. ते सुख तू माझ्यापासून कधीही हिरावून  घेऊ नकोस.’

समाप्त

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१८) – ‘मान अन्‌  भान’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१८) – ‘मान अन्‌  भान’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मागच्या लेखात आपण तामिळनाडू प्रांतात प्रचलित असलेल्या अंत्ययात्रेतील जोशपूर्ण तालवाद्यवादनाच्या प्रथेची कारणमीमांसा केली. अर्थातच आज सुशिक्षित समाज ही प्रथा पाळताना दिसत नाही, त्याचं कारणही संयुक्तिक आहेच. आज वैद्यकशात्र प्रचंड विकसित पावलेलं आहे. ईसीजी मशीनमुळं ह्या प्रथेमागचा उद्देशच सफल होत असताना ह्या प्रथेची गरज नाही हे त्यांना समजलं असावं. मात्र तळागाळातले लोक ही प्रथा धर्मिक समजून श्रद्धेनं/अंधश्रद्धेनं अजूनही पाळत असावेत… पण त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे हे तरी समजलं. ज्याला आपण परंपरा म्हणतो त्या गोष्टी का आणि कशा अस्तित्वात येत असाव्यात हे तरी माहीत होऊन आपला ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक व्हायलाही नक्कीच मदत होते. शिवाय ही गोष्ट त्यातल्या उपयुक्ततेसोबत त्याकाळच्या समाजव्यवस्थेचाही भाग असावी असंही वाटून गेलं. वाद्यवादनात पारंगत असणाऱ्या कलाकारांना पोटापाण्यासाठीची ही एक व्यावसायिक संधी म्हणायला हरकत नाही. इतर सांस्कृतिक समारंभांमधे मांगल्यदायी वातावरणनिर्मिती करणे आणि अशा दु:खद क्षणी त्या कलेची ताकद मृत्यूच्या खात्रीसाठी वापरणे ह्या उपयुक्तता झाल्या आणि दोन्ही प्रसंगी कलाकाराला आपलं कसब पणाला लावून अर्थार्जनाची संधी ही झाली समाजव्यवस्था!

मला दक्षिणेकडच्याच केरळ राज्यातील चेंडामेलम्‌  हा प्रकार आठवला.  चेंडामेलम्‌  म्हणजे चेंडा ह्या वाद्याचे अनेक वादकांनी एकत्र येऊन केलेलं समूहवादन म्हणता येईल. आज ही गोष्ट केरळची भावाभिव्यक्ती आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जात असलं आणि केरळमधील सर्व सांस्कृतिक उत्सवांमधे चेंडावादन अपरिहार्य असल्याचं सांगितलं जात असलं तरी अचानक वाटून गेलं कि जंगली भाग असलेल्या केरळमधे पूर्वीच्या काळी माणूसप्राणी समूहानं एकत्र येऊन काही धार्मिक उत्सव किंवा काही सणसमारंभ साजरा करत असताना जंगली श्वापदांना दूर ठेवण्याचा हा उत्तम मार्ग असावा. इतक्या धडामधुड आवाजाकडे कोणतंही जंगली श्वापद फिरकण्याची शक्यताच नसल्याने निश्चिंत मनानं माणसाला उत्सव पार पाडता येत असेल ही उपयुक्तता आणि कलाकारासाठी रोजगारनिर्मिती हा समाजव्यवस्थेचा एक भाग! मनात आलं कि अशा उपयुक्ततेच्या कसोटीवर पारखून घेतलेल्या, समाजव्यवस्था भक्कम ठेवणाऱ्या, मात्र सर्वसामान्य माणसासाठी धार्मिक, सांस्कृतिक परंपरेच्या आवरणात सजवून ठेवलेल्या कित्येक गोष्टी आपल्या सर्वार्थाने वैविध्यपूर्ण देशात असतील. आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होताना प्रत्येक नागरिक सुशिक्षित, सुजाण व्हावा, जातीपातींचे निकष संपावेत, मात्र परंपरा जाणीवपूर्वक जपल्या जाव्यात… कला-संस्कृतीचं जतन, मान आणि समाजव्यवस्थेचं भान म्हणून म्हणूनही!

आपल्या मूळ विषयाकडं वळताना आणखी एक प्रथा आठवते. आपल्याकडं बहुधा लिंगायत समाजात (कदाचित इतरही काही समाजात असू शकेल) टाळ-मृदंगाच्या साथीत लोक अंत्ययात्रेत भक्तीपदं म्हणतात… अशी एक अंत्ययात्रा थोडी अंधुकशी माझ्या लहानपणच्या आठवणींच्या कुपीत आहे… आम्ही घरातले कोणत्यातरी कार्यक्रमाहून घरी परतत होतो. अचानक समोरून एक अंत्ययात्रा येऊ लागली. मला आठवतंय अगदी पालखी नव्हे पण साधारण त्याप्रकारचा आकार असलेल्य़ा एका डोलाऱ्यात शव ठेवलं होतं. अर्थातच काही लोकांनी त्या डोलाऱ्याला खांदा दिला होता. अंत्ययात्रेच्या पुढच्या भागात एखाददुसरा आणि मागच्या बाजूला काही लोकांनी दोन तीन छोटे कंदील धरले होते आणि लक्षात राहिलेली मुख्य गोष्ट म्हणजे अगदी नाजूक अशा टाळ आणि मृदंगाच्याही हलक्या आवाजात काहीजण भक्तीपद गात होते. साहजिकच त्या गायन-वादन दोन्हींतही खूप जोश नव्हता. म्हणजे इकडं दक्षिण प्रांतात पाहिलेल्या प्रकाराचा उद्देश काही तिथं लागू होत नाही.

आज ह्या गोष्टीचा विचार करताना वाटतं कि ह्या सर्वोच्च गंभीर क्षणी जीवनाचं सार, सत्य सांगणाऱ्या भक्तिरचना मनाला आधार देत असाव्या. केवळ जगन्नियंत्याच्या हाती असणारी आपल्या आयुष्याची सूत्रं, आपलं फक्त निमित्तमात्र असणं, आयुष्याचं क्षणभंगुरत्व ह्या गोष्टींची मनाला जाणीव करून ह्या क्षणापेक्षा योग्य क्षण कोणता असेल!? ते मंद सूर दु:खी मनावर थोडीशी फुंकर घालत असतील, त्या रचनेच्या शब्दांतून होणारी ‘सगळं ‘त्याच्या’ हाती, आपल्या हाती काही नाही’ ही जाणीव ते दु:ख सहन करायची ताकद देत असेल, शिवाय आपल्या जगण्यात षड्रिपूंमधे आपण किती गुंतून पडायचं ह्या विचाराला चालना देत असेल! विचार करता एकूण सुदृढ समाजमन घडवण्यासाठी अशा गोष्टी केवढी मोलाची भूमिका बजावत असतील!!

‘श्रीराम जयराम जय जय राम’ किंवा ‘राम नाम सत्य है’ चा गंभीर सुरांतला लयबद्ध जप तर अंत्ययात्रेत बहुतेक ठिकाणी केलेला दिसून येतो. अशाक्षणीच्या अतीव दु:खानं गेलेल्यांच्या आप्तेष्टांचं पिळवटणारं काळीज त्या लयबद्धतेत नकळत गुंगून जात असेल आणि मन शांतावायला त्याची मदत होत असेल. मन आणि मेंदूवर होणारा संगीताचा परिणाम प्रत्येकवेळी प्रत्येकाला जाणवतोच असं नाही, मात्र तो होतो नक्कीच! म्हणून अशा छोट्याछोट्या प्रथांमधला तर्कशुद्ध आणि सूक्ष्म विचार पाहिला कि आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेपुढं नतमस्तक व्हावसं वाटतं!!

मध्यंतरी एक इंग्रजी लेख वाचनात आला ज्यात चीनमधील ‘कुसांग्रेन’ म्हणवल्या जाणाऱ्या स्त्रियांविषयी माहिती होती. ह्या स्त्रिया म्हणजे ज्यांना अंत्येष्टीच्या आधी साग्रसंगीत वाद्यवृंदासह गायन-नर्तन करायला बोलावलं जातं. अर्थातच अशावेळची गीतंही विशिष्ट प्रकारचीच असणार जी ऐकताना गेलेल्या व्यक्तीच्या आप्तेष्टांच्या भावना उफाळून येत त्यांना भरपूर रडू येऊन त्यांच्या दु:खी भावनांचा निचरा व्हायला मदत होईल. काहीवेळा अशा अघटिताच्या धक्क्यानं एखादी कुणी व्यक्ती स्तब्ध होऊन जाते आणि तिला रडायलाही येत नाही. मात्र संगीताच्या प्रभावच असा असतो कि अशी व्यक्तीही धक्क्यातून बाहेर पडून तिच्या भावना प्रवाही होत रडू लागते!

ह्या प्रथेविषयी वाचताना मला आपल्या देशातल्या राजस्थान प्रांतातली रुदाली आठवली! प्राचीन रोम, ग्रीस, युरोप, अफ्रिका, एशियामधे अनेक ठिकाणी अशा प्रथा आहेत. प्र्त्येक ठिकाणच्या प्रथेत काही ना काही फरक असणार, मात्र उद्देश एकच असावा कि संगीतासारख्या अत्यंत प्रभावी गोष्टीचा वापर करून दु:खी भावनांचा निचरा व्हायला मदत करणं! आणि… अर्थातच पुन्हा समाजव्यवस्था हा भागही आलाच!

प्रथांचा गैरफायदा घेतला जाऊन काही व्यक्तींचं होणारं शोषण हा वेगळा मुद्दा आहे! मात्र मला असं प्रामाणिकपणे वाटतं कि कोणत्याही प्रथेमागचा मूळ उद्देश हा वाईट नसावा. शेवटी काही ना काही काम मिळून प्रत्येकाच्या पोटपाण्याची व्यवस्था होणं हा उदात्त विचारच त्या ठिकाणी असावा! मात्र हे करत असताना ‘संगीत’ हे ‘अत्यंत प्रभावी’ माध्यम प्रत्येक ठिकाणी वापरण्याची चतुराई मात्र फारच कौतुकास्पद वाटते! संगीतकलेचा, तिच्या आपल्या जाणिवांशी असलेल्या नात्याचा वापर मानवी आयुष्यातल्या जन्मापासून अंतिम क्षणापर्यंत प्रत्येकक्षणी केला गेलेला पाहाताना अक्षरश: थक्क व्हायला होतं.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बालपण देगा देवा – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

 ☆ विविधा ☆ बालपण देगा देवा – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

“लाजू दंगा नको कलू… आनि त्या गुबूगुबू बालाला धक्का का देतोछ…पलेल ना तो” काही वर्षांपूर्वी आमच्या घरात या आणि अशा पूर्ण बोबड्या वाक्यांची तोफ झाडली जायची. वर्गातल्या बाई… एक ओढणी ची साडी नेसलेल्या…. म्हणजेच माझी चार वर्षाची चिमुरडी मैत्रीण शाळा शाळा खेळत असायची. हॉलच्या मध्यभागी वर्तमानपत्रा सोबत येणाऱ्या वीस-बावीस पुरवण्या उभ्या आडव्या रांगेत व्यवस्थित लावून वर्ग सजलेला असायचा. एकीकडे कोपर्‍यात देवघरातील घंटा आणि एक-दोन वह्या पण ठेवलेल्या असायच्या.ज्या पुरवणीवर जे चित्र असेल ते त्या मुलाचे किंवा मुलीचे नाव.मी सुद्धा त्या वर्गातील एक विद्यार्थिनी असायचे.पण माझे स्टेटस जरा वेगळे.. त्यामुळे मला सोफ्यावर बसणे अलाऊड  असायचे आणि मधून मधून इकडे तिकडे जाणे पण!

घंटा वाजायची.. शाळा सुरू व्हायची. नंतर “छुनिता तू छगल्यांना प्लालथना छांग.” बाईंची ऑर्डर यायची. प्रार्थनेनंतर मग आमच्या बाई हजेरी घ्यायच्या

“व्यायाम कलनाला मुलगा.. झोपाल्यावल बछलेली मुलगी…. छोतं गुबुगुबू बाल… छोनाली.. लाजू…..” अन् सगळ्यात शेवटी “छुनीता गदले!”

सर्वांची मी हजर- हजर म्हणत प्रॉक्सी हजेरी लावायचे.

सकाळची ऑफिस, कॉलेज वाल्यांची गडबड संपलेली असायची आणि मी निर्धास्तपणे मोबाईल मध्ये गर्क व्हायचे. इकडे बाईंचा बोबड्या बोलात अभ्यास, बडबड गीते असं रुटीन चालू असायचं. पण मध्येच

“छुनीता, नो मोबाईल.. अभ्याछ कल अभ्याछ..! पलिच्छा तोंदावल आलीय.” असा ओरडा पण मला खावा लागायचा.

मग मधली सुट्टी व्हायची. डबा खात बसलेल्या मुलांच्या डब्यातील पदार्थ चेक करताना बाईंच्या तोंडाचा पट्टा चालू असायचा. “लोज छांगते ना, पोली भाजी आना.. छक्ती देनाले पदाल्थ आना म्हनून!… हे कुलकुले, मॅगी अछले जंकफूद आनू नका… उद्यापाछून मी तुमाला छिक्छाच कलनाले.”

कधी शाळा लवकर सुटायची. तर कधी दोन -तीन तास चालायची. बाईंची गुंजणारी अधिकारवाणी ऐकू न आल्यामुळे जरा हॉल मध्ये डोकावून पाहिलं तर बाई आपली साडी सोडून त्याचे पांघरूण करून सोफ्यावर आरामात झोपून गेलेल्या असायच्या. आता ती मैत्रिण मोठी झाली आणि आमच्या मैत्रीत अंतर पडले.

माझी एक दुसरी बाल मैत्रिण कायम स्वयंपाक घरातच घुटमळते. नेहमी आजी जवळ राहते. शनिवारी-रविवारी आई-बाबांकडे! तिचे खेळ वेगळेच असतात. ती कधी भाजीवाली… कधी हॉटेल वाली.. कधी इस्त्री वाली.. कधी धुणीभांडी करणारी मावशी… तर कधी आई -बाबां- बाळ खेळातलीआई ! तासन् तास ती या खेळात रमते. कधी माझ्या ऑर्डर प्रमाणे साउथ इंडियन.. चायनीज.. इटालियन.. पंजाबी जेवणाचे पार्सल मला पाठवून देते. मोजून पैसे घेते. कधी माझं संबोधन आजी, कधी काकू, तर कधी वहिनी, मॅम…. वगैरे वगैरे… ते तिच्या व्यवसायाप्रमाणे बदलत असते. अगदी बोबड-कांदा  नाहीये, पण र, ट, ठ,ड वगैरे कठिण अक्षर जरा वर्जच!

“वयनी लादी पुसते.पण आज कपले नाही धुनाल.आज माझं अंग थनकतंय… घली जाऊन औषध घेऊन झोपनाल… काल माझ्या नवल्यानं मला माललं बघा…उगीचच… आमतीत मीथ कमी पललं तल मालतात काअशं?”… तिच्या चेहऱ्यावरचे भाव,शब्दातून प्रकट होणारं व्यथित मन, मला फार काही सांगून जात असतं. ती वठवणाऱ्या सगळ्याच भूमिकेतील तिचा अभिनय, कल्पनाशक्ती खरंच दाद देण्यासारखीच असते. मोठेपणी ती छान अभिनेत्री बनेल असा मला विश्वास वाटतो.

पण तिच्या आईला केवढं टेन्शन!”काकू हिला कधी कळणार हो. एक दिवशी तिनं आपलं रडगाणं सुरू केलं. “हिला कित्ती पोएम, बडबड गीतं मी शिकवलीत. नको तेव्हा म्हणते. पण आमच्या दोघांच्या ऑफिसातले सहकारी.. चार-पाच जण.. आले होते. हिला पोएम म्हणण्यासाठी किती आग्रह झाला. पण ही पठ्ठी त्यांच्यासमोर चक्क झाडू- फरशी करायला लागली. खेडवळ भाषेत बोलायला लागली.आम्हाला इतकं लाजल्यासारखं झालं. दोन्ही घरात ढिगानं खेळणी आहेत. पण ही त्यांना हात पण लावत नाही.

“मग तिनं काय करायला हवंअशी तुझी अपेक्षा आहे?

अगं या लॉक डाऊनमुळं तिनं अजून शाळेचे तोंड सुद्धा पाहिलेले नाही.तिला मित्र-मैत्रिणी नाहीएत. आजी कडं मजेने राहते.कधी हट्ट नाही कि रडणं नाही आणि सगळीच मुलं आपण गाणं म्हण म्हटलं की म्हणतातच असं नाही. नाही तिला निर्जीव खेळण्यात इंटरेस्ट. पण तू तिची स्मरण शक्ती, तिचा अभिनय पाहिला नाहीस का? समोर जी माणसे दिसतात,जसे वागतात,त्याला कल्पनाशक्तीची जोड देऊन.. त्या भूमिकेत शिरणं ही साधीसुधी गोष्ट नाही. तिचा हा गुण तुला कधी जाणवला नाही? हे असं कायम नाही राहणार. चिंता करू नको. मोठी झाली की ती आणखी वेगळ्या वेगळ्या भूमिकेत वावरु लागलेली दिसेल. तिच्या कलागुणांना प्रोत्साहन दे. आणि तिला सायकॉलॉजिस्टकडं घेऊन जाऊन कौन्सलिंग करुन घेण्याचा वेडा विचार सोडून दे. तू स्वतःचं बालपण आठव आणि आईच्या भूमिकेत शिरुन तिला समजून घे.”माझं

बोलणं बहुतेक तिला पटल्या  सारखं वाटलं.

            … क्रमशः

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-5 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-5 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आता आमच्या ट्रिपचा शेवटचा टप्पा होता. सकाळी साॅ मिल बघायला गेलो. जंगलातील सांगवान सारखे पालव लाकूड तोडून त्याच्या फळ्या समुद्रावरील जहाजातून इंग्लंडला  नेण्याच्या दृष्टीने ब्रिटिशांनी ही मिल उभारली होती.तिथे रेल्वे मार्ग ही ब्रिटिशांनी केला होता. अजूनही ती मिल चालू आहे. पाल्लव लाकूड खूप टिकाऊ आणि वाळवी न लागणारे असल्याने त्याला खूप किंमत आहे. आम्ही मिल पाहिली आणि बाहेर असलेल्या लाकडी वस्तूंच्या दुकानात थोडीफार खरेदी केली. आत्तापर्यंतचा प्रवास समुद्रावर झाला होता.इतका समुद्रप्रवास मी तर प्रथमच केला होता. मन सतत समुद्रावर तरंगतच होतं जणू! प्रसन्न हवा होती, त्यामुळे फिरणे कंटाळवाणे वाटले नाही.

परतीच्या प्रवासात पाॅंडेचरी बीचवर राहायला मिळाले. तेथेही पोंगल सणाच्या सुट्टी मुळे माणसांचा समुद्र च होता! उत्साही तरुणाई येथे एन्जॉय करत होती.. ऑरोव्हिलाची छोटीशी ट्रीप करून आम्ही चेन्नई ला जाण्यासाठी निघालो.

वाटेत महाबलीपुरम चे मंदिर आणि इतर मंदिराचे भग्नावशेष पाहून भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे हे दिसून येत होते. तिथून चेन्नई ला आलो. एक दिवस चेन्नई मुक्काम होता.

या दहा-बारा दिवसात समुद्राची किती रुपे डोळ्यासमोर येत होती!  कॅमेरात स्वतःला बंदिस्त करून त्या प्रत्येक ठिकाणाची साक्ष आम्ही इथे आल्यावर पाहू शकत होतो.

अंदमानच्या ट्रीपचे ध्येय जरी ‘सावरकरांचा सेल्युलर जेल’ बघण्याचे असले तरी निसर्गाचा हा समुद्रावरचा नजारा बघणे हे सुद्धा अवर्णनीय सुख होते. रोज बघितलेल्या त्या समुद्राच्या  लाटा माझ्या मनात विचारांच्या असंख्य लाटा उमटवत असत! त्या लाटा मनाच्या किनार्या वर आपल्या पाऊलखुणा उमटवत होत्या, त्यांना थोडं कोरीव रुप देण्याचा हा माझा प्रयत्न!

समाप्त

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

जे मनामनाला जोडते ते नाते

जे चराचराला जोडते ते नाते !!

असंख्य वेगवेगळी नाती जन्मापासून आपल्याला अवघ्या विश्वाशी बांधून टाकतात. या प्रत्येक नात्याचे

रूप वेगळे,भाव वेगळा,

रीत वेगळी प्रीत वेगळी !

आपण आयुष्यात असंख्य नात्यांनी एकमेकांशी बांधले गेलेलो असतो. या प्रत्येक नात्याचे स्थान, त्याचे महत्व, त्याची गरज, त्याचे निभावणे हे वेगवेगळे असते.

सर्वात प्रथम आपण ईश्वरीतत्त्वाशी बांधले गेलेलो असतो. त्यानंतर आयुष्यात महत्त्वाचे असते ते आई-वडिलांचे श्रेष्ठ आणि पवित्र नाते.

 माय-बाप असती

 सर्वस्व या जन्माचे

 त्यांच्यामुळेच होई

 सार्थक या जीवनाचे !!

आई-वडील आपल्याला उत्तम आरोग्य, उत्तम संस्कार, उत्तम विचार, उत्तम शिक्षण यांची मौल्यवान शिदोरी देऊन या विश्वाच्या प्रवासाला सोडतात. त्यामधे आपल्या आयुष्याची भावनिक बाजू ही आईने तर व्यावहारिक बाजू वडिलांनी व्यापलेली असते. व्यवहार म्हटले की रूक्षपणा आलाच. पण सर्वच गोष्टी नुसत्या भावनेवर चालत नाहीत तर व्यवहार हा पहायलाच लागतो. त्यामुळेच वडील थोडे कठोर वाटतात. पण नारळातले पाणी किंवा फणसातल्या गऱ्यांप्रमाणे त्यांचे मन असते.

‘दुधावरची साय’ म्हणजे तर संसाराचे संचित असते. नातवंडे ही आजी-आजोबांचे सुख निधान असतात, तर नातवंडांना आजी-आजोबा अतिशय प्रिय असतात. आजच्या बदलत्या वातावरणात नातवंडे पाळणाघरात तर आजोबा वृद्धाश्रमात हे दुर्दैवी वास्तव आहे.तरीही दोघांना एकमेकांची ओढ असते म्हणूनच ते एकमेकांना भेटायची कारणेही हुडकत असतात.

आपल्या आयुष्यातले आणखी एक लोभस नाते आहे मैत्रीचे. मैत्री अखंड विश्वासाची साथ देते, कायम मदतीचा आधाराचा हात देते, निरपेक्ष प्रेम देते. असे मैत्र  ज्यांना लाभते ते खरच भाग्यवंत असतात. मैत्रिणीने,’ मी आहे ना? काळजी करू नको,’ असे नुसते म्हटले तरी हे शब्द आपल्याला संजीवनी सारखेच वाटतात.

आपल्या वाटचालीत आपल्या मदतीला येते ती आपली कामवाली सखी. अनेक वर्षांच्या सहवासाने आपणही तिच्याशी एखाद्या मैत्रिणी सारखे वागू लागतो.तिच्याजवळ मन मोकळे करू लागतो. ती पण स्वत:ची सुखदुःखे आपल्याशी वाटून घेते आणि कामाबरोबरच जीवाला विसावा शोधत रहाते.

अशी असंख्य नाती आपण रोजच्या जगण्यात निभावत असतो.

निसर्गाशी आपले नाते हे तर जिवाभावाचे असते. निसर्ग आपला माय बापच आहे. तो आपले पालनपोषण करतो, रक्षण करतो. त्यामुळे त्याचेही संवर्धन, रक्षण करणे हे आपले महत्त्वाचे  कर्तव्य ठरते.

आपण अशा रीतीने आपल्या आयुष्यात घरातल्या, घराबाहेरच्या,निसर्गातल्या घटकांशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधले गेलेले असतो. या प्रत्येक नात्याचा रंग वेगळा, गंध वेगळा, प्रत्येकाची नजाकत वेगळी आणि त्यामुळेच त्यातून मिळणारी अनुभूती पण वेगळीच असते.

“पैशाने श्रीमंत होणे खूप सोपे असते.

नात्यांनी समृद्ध होणे तितकेच कठीण असते.”

म्हणूनच आपल्याला लाभलेल्या नात्यांची समृद्धी आपण जपली पाहिजे. एकमेकांना वेळ देणे, एकमेकांचे ऐकून घेणे, मदत करणे, एकमेकांचे विचार नाही पटले तर सोडून देणे, माफ करणे अशा अनेक गोष्टींनी ही नाती जपणे शक्य आहे. असे म्हणतात ज्यांना आयुष्यात शांती हवी असेल  त्यांनी वादविवादात एक पाऊल मागे घ्यावे. पण इतरांकडून ती अपेक्षा करू नये. त्यामुळे आपण नात्यांचा आनंद घेऊ शकतो आणि इतरांच्याही आनंदात भर घालू शकतो.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘रथसप्तमी’ धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी

डॉ. व्यंकटेश जंबगी

संक्षिप्त परिचय

शिक्षा – बी.ए.एम्.एस्. एम्.ए.(संस्कृत), आयुर्वेदाचार्य, पी.जी.डी.एच्.ए., निवृत्त प्राध्यापक

प्रकाशित साहित्य –
पावसाचं वय..काव्यसंग्रह, तुझं घर माझं घर..कथासंग्रह, व्रात्यकथा….विनोदी कथासंग्रह, पाच प्रयोगक्षम एकांकिका, बालमंच..बाल एकांकिका, विषय विविधा(निबंध), बीसीजीपासून इसीजीपर्यंत…आरोग्य लेखसंग्रह.

पुरस्कार – 1. उत्कृष्ट वाड्मय निर्मिती..महाराष्ट्र शासन 2018. 2. बाल साहित्य परिषद,कोल्हापूर. 3. उत्कृष्ट एकांकिका लेखन..नाट्यदर्पण,मुंबई. 4. उत्कृष्ट नाट्यछटा लेखन.. नाट्यसंस्कार,पुणे. 5 . आरोग्य लेख..शतायुषी,पुणे. 6. कविभूषण..फ्रेंडस् सर्कल,पुणे. 7. जीवन गौरव..ज्येष्ठ नागरिक वाचनालय,जयसिंगपुरस्कार

अन्य – 
माजी अध्यक्ष..चंद्रकिरण काव्यमंडळ,तळेगाव दाभाडे / माजी अध्यक्ष..संस्कार भारती,सांगली
शिवाजी विद्यापीठ युवक महोत्सवात एकांकिका स्पर्धा परिक्षक / आकाशवाणी, सांगली, विविध साहित्यिक सादरीकरण.

 ☆ विविधा ☆ ‘रथसप्तमी’ धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆ 

* धार्मिक महत्त्व *

“यद्यज्जन्यकृतं पापं मया सप्तसु जन्मसु ।
तन्मे रोगं च शोक॑ च मा करी हन्तु सप्तमी ।।”

अर्थात “गेल्या सात जन्मात मी जे काही पाप केले असेल, त्याचे फळ (परिणाम) म्हणून रोग, दुःख इत्यादि काहीही होऊ नये, माझ्या पापाचा नाश व्हावा” अशी सूर्याला
प्रार्थना करतात, तो दिवस म्हणजे माघ शु. सप्तमी म्हणजेच ‘रथसप्तमी’ !

मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण सुरु होते. सूर्य आपल्या सात घोडे जोडलेल्या रथाने ‘अरुण’ या सारथ्यासह उत्तरेकडे प्रयाण करु लागतो. हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. आदिती आणि काश्यप ऋषी यांचा पुत्र असलेला हा सूर्य …. याचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी ! या दिवशी सूर्याला अर्ध्य देतात. सूर्योदयापूर्वी उठून फुले, चंदन, कापूर इ. अर्पण करतात. कोणी सूर्याची प्रतिमा रथात ठेवतात. कोणी सूर्याच्या रथाची रांगोळीकाढतात. पूजा करुन खिरीचा नैवेद्य दाखवितात. मकरसंक्रांतीपासून सुरु झालेले कार्यक्रम हळदी कुंकू, लुटणे इ. रथसप्तमीला समाप्त होतात. रथसप्तमी दिवशी व्रत म्हणून काहीजण उपवासही करतात. सूर्य ही तेज, उर्जा देणारी देवता आहे. सूर्यदेवता
वर्षमर आपल्याला प्रकाश देते. वनस्पती, अन्नधान्य, फुले, फळे उत्पन्न करण्यास सहायभूत ठरते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. ”गायत्री मंत्र” हा सूर्याला उद्देशून असलेला प्रार्थनास्वरुप मंत्र आहे. बुध्दीला प्रेरणा देण्याची त्यात प्रार्थना आहे.

* वैज्ञानिक महत्व *

‘आरोग्य’ हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वैज्ञानिकदृष्ट्या आहे. कारण सूर्याची सकाळची कोवळी उन्हे (Ultraviolet rays) ‘ड’ (D) जीवनसत्व देणारी आहेत. हे सर्वपरिचित आहे. उत्तरायणात सूर्यापासून निघणारी लंबरुप किरणे हवेतील व मातीतील जंतूंचा नाश करतात. वनस्पतीमध्ये जी कर्बग्रहण (Photosynthesis) ही अन्न निर्माण करण्याची क्रिया असते. त्यामध्ये सूर्याची मदत मोठ्या प्रमाणात होते. सर्व ग्रह परप्रकाशी असून त्याना प्रकाश देणारा सूर्यच आहे. आजकाल ‘सोलर’ सिस्टीम भरपूर प्रमाणात वापरली जाते. ती उर्जा सूर्याचीच ! आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सूर्याचेच स्थान अग्रगण्य आहे. एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे –

“आदित्यस्य नमस्कारान्‌ ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्रेशु दारिद्र्यं नोऽपजायते ।।”   

अर्थ – “जो नित्यनेमाने रोज सूर्यनमस्कार घालतो त्याला सहस्र जन्मापर्य॑त दारिद्र्य येत नाही.” याचा मतितार्थ असा की सूर्यनमस्काराने बुध्दी, बल, क्रीयाशक्ती (Stamina) वाढतात. मग अर्थातच मनुष्य कष्ट करतो .. मग तो दरिद्रि कसा राहील ? थोडक्यात वैज्ञानिकदृष्ट्या सूर्य ही जीवसृष्टीची उर्जा आहे. सूर्य प्रकाश देतो. (पण कघीही ‘लाईट
बिल’ पाठवीत नाही.) त्याला कृतज्ञता म्हणून रथसप्तमी साजरी करावी. कोणी नुसता चहा पाजला तरी आपण Thanks म्हणतो.. हा सूर्यनारायण वर्षभर इतके काही करतो
मग एक दिवस कृतज्ञता व्यक्त करायला नको ? म्हणून रथसप्तमीलाच “आरोग्यसप्तमी” असेही म्हणतात.

जाता जाता भगिनींसाठी एक ‘टीप’ देतो. जर रथसप्तमीदिवशी नवी साडी मिळली, तर सात साड्या मिळतात म्हणे … !

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print