मराठी साहित्य – काव्यानंद ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

स्व विंदा करंदीकर

 ☆ काव्यानंद ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

रसग्रहण 

“चुकली दिशा तरीही  हुकले न श्रेय सारे….”ही कविता वाचताना मनात एक आकृती आकारते. एका मुक्त, बंधनात न अडकलेल्या, स्वत:च्याच धुंदीत, बेफिकीर, अखंड चालत राहणार्‍या मुशाफिराची… हा मुशाफिर वेगळ्याच वृत्तीचा आहे.

आणि कवी या मुशाफिराची सफर एका तटस्थ दृष्टीकोनातून पहात आहेत.. समाजाने नाकारलेल्या अथवा समाजाने स्वीकारलेल्या अशा कुठल्याच मार्गावरुन वाटचाल न करणारा…भले इतरांसाठी दिशा चुकलेला अथवा भरकटलेला पण स्वत:साठी मात्र सगळेच मार्ग खुले ठेवणारा हा वेडा मुशाफिर कवीला मात्र त्याच्या याच विशेषत्वाने आकर्षित करतो.त्याच्यात एक सामर्थ्य जाणवतं…

मला नेहमी असं वाटतं की विंदांची काव्य वृत्ती ही प्रहारक आहे.प्रहार प्रस्थापित वैचारिकतेवर. प्रहार प्रचलिततेवर… म्हणूनच त्यांचे शब्द वेगळ्या वाटेवर वणव्यासारखे फुलतात…

“डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवांचे..

हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे,..”

लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल हीच भिती बाळगून जगणार्‍यांना कवी रूढी ,परंपरेचे दास मानतात.

ही गतानुगतिक माणसं त्यांना डरपोक वाटतात.भित्री,भेदरट अरुंद छातीची वाटतात…शीड तोडणारीच माणसं प्रिय  वाटतात. झपाटलेली, झोकून देणारी या मुशाफिरा सारखी माणसंच इतिहास घडवतात,

“मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा…”

नशीबावर विश्वास ठेवणारी वा नशीबाला दोष देत जगणारी माणसं नाकर्तीच असतात.ग्रह तार्‍यांची गणितं मांडून सावधानतेने फुंकर मारत जीवन जगणारा, कवीला मर्द वाटत नाही, त्यापेक्षा, मग्रुर प्राक्तनाचा नकाशा फाडून, ईशारे झुगारणारा असा एखादा ,अधिक बलवान निग्रही,घट्ट मनोधारणेचा वाटतो.

“चुकली दिशा तरीही आकाश एक आहे….”

चुकतमाकत ,चाचपडत चालाणारा हा मुशाफिर नाही.

दिशा चुकेल याचं भय त्याला  नाही.कारण त्याच्यासाठी आकाश एकच आहे.इथे कोलंबसची आठवण येते. त्याचीही दिशा चुकली पण त्याला अमेरिका सापडली. माघार न घेता पुढे जाणं हेच सामर्थ्याचं लक्षण..

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे बेसावधास कैसे डसणार हे निखारे…?

इथे बेसावध याचा अर्थ जागरुक नसणारा असा नकारात्मक नसून ,जो बेसावध तोच शूर आणि तोच खरा वीर.कारण आशा निराशेचे निखारे त्याच्यातलं झपाटलेपण नाही जाळू शकत.

हा वेडा,दिशा चुकलेला, निराळ्या वाटेवरुन बेधडक चालणारा, बेसावध, झोकून देणार्‍या मुशाफिरांत  विंदाना एक तळपतं सामर्थ्य  दिसतं अन् ते भावतं.

त्याच्या  झपाटलेपणाला त्यांना या कवितेतून दाद द्यावीशी वाटते…

ही संपूर्ण कविता, अर्थाची ऊलगड करत, वाचत असतांना, विंदांच्या वैचारिक प्रतिभेला, पुरोगामीत्वाला, सच्चेपणाला वंदनीय दाद द्यावीशी वाटते.

एक सुंदर संदेश घेऊन ही कविता मनात रुजते…

व्हा वेडे..द्या झोकून..फाडून टाका सारे बुरखे…

शोधा वेगळे रस्ते…..नव्या वाटा तयार करा…जुन्या इतिहासातील जुन्याच चुकांना ग्लोरीफाय करण्याऐवजी,

नवा ऊज्वल इतिहास घडवा…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूक ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ विविधा ☆ भूक ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.कारण तो परावलंबी आहे. आपल्या गरजा भागविण्यासाठी बुध्दिचा वापर करून तो कोणत्या ही थराला जावू शकतो.तो स्वार्थी आहे. गरजे पेक्षा जास्त घेण्याची आणि साठवण्याची त्याला सवय लागली आहे.ही सवय निसर्गातील कोणत्यांच सजीवात दिसत नाही. खरं तर वनस्पती सोडल्या तर कोणच स्वत:चे अन्न स्वत:करू शकत नाही.निसर्गात प्रत्येकाच्या अन्नाची सोय आहे.”जीवो जीवस्य जीवनम्”या साखळीत सजीव जगत आहे.आपले अन्न तो शोधतो मिळवण्याचा प्रयत्न करतो.याचा प्रत्यय निसर्गात पावलो पावली दिसतो.

पाखरांच्या किलकिलाटाने मी बाहेर आले.रस्त्यावर चिमण्या आनंदाने दाणे टिपत होत्या, उडत होत्या.इकडून तिकडे जात होत्या. त्या स्वछंदी होत्या.हलचाली मोहक होत्या.सकाळी सकाळी तो चिवचिवाट प्रसन्न वाटत होता.आपल्या नादात होत्या. एवढ्यात… गल्लीतली दोन तीन कुत्री तिथे आली.चिमण्यांना बघून ती हरकून गेली.त्यांच्या जिभेला पाणी सुटले.आज आपली चांगली मेजवानी होणार, या आविर्भावात ते होते. दबा धरून राहीले. हळूहळू पुढे झाले. आता ते चिमण्यावर  झडप घालणार..त्या बळी पडणार. असे मला वाटले,. त्यांना मी हाताने  उसकवणार… तेवढ्यात सगळ्या चिमण्या भूर्र…कन्…उडाल्या. कुत्री… भुंकली चरफडली.मागे फिरली.चला चिमण्या वाचल्या… म्हणून मी खुश झाले, मागे फिरले ,तो पुन्हा चिमण्यांचा थवा दाणे टिपायला  आला.चिमण्यांची चाहूल लागताच कुत्र्यांची झुंड पुन्हा मागे फिरली. पुन्हा आशा पालवल्या.पुन्हा दबा धरून राहिले. चिमण्या वर  झडप टाकणार… तेवढ्यात चिमण्या उडाल्या.आता मात्र कुत्रे मुक झाले.त्याच्या डोळ्यात आता भूक  दिसू लागली.मला त्याची कीव आली.मी पडले शाकाहारी. घरातल्या पावाचे तुकडे कुत्र्यांना टाकले.चिमण्याना  दाणे टाकले.

दोघे ही भूक भागवण्याचा आपला मार्ग सोडत नव्हते.रोजच हे हेच दृश्य बघत होते.

निसर्गत: आपलं रक्षण करण्याचे ,भूक भागवण्याचे सामर्थ्य सर्वाना बहाल केले आहे.तरी मझ्या मनात आले या कुत्र्यांना माणसांसारखी  बुध्दी असती तर….भूक भागविण्यासाठी, त्यांनी या चिमण्यांनसाठी जाळे टाकले असते.त्यात दाणे पेरले असते.अगतिक चिमण्या फसल्या असत्या,तडफडल्या असत्या.कुत्र्याची भूक भागली असती.पण एवढी बुध्दी निसर्गाने कुत्र्याला दिली नाही,हे बरेच झाले, नाही का?

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ 2020 – 2021 – हरवलं….गवसल…. ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆2020 – 2021 – हरवलं….गवसल…. ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

2020….. या वर्षी हरवले: 

खूप जवळची माणसे, मनःशांती,  मुक्त वावर, मंदिरातून देवदर्शन,  प्रवास, भेटीगाठी, असं खूप खूप..

हाती राहिलं:

भीती, सावधपणा, अलिप्तता,  उदासी.

हरवलेलं मिळालं:

  • -स्वच्छतेचे, आत्मनिर्भरतेचे आणि कुटुंब व्यवस्थेवर ठाम उभ्या असलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीचे आचारविचारांचे संस्कार.
  • आपल्यातलेच  हरवलेले, विसरलेले, दुर्लक्षित केलेले कलागुण .

नवीन मिळालं:

विश्वासाठी प्रार्थना करण्याची इच्छा, रक्ताच्या एका थेंबाची किंमत, एका श्वासाची किंमत, आणि आपल्या माणसाच्या अस्तित्वाची किंमत आणि अनमोल असा ई-अभिव्यक्ती चा सहवास.

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.  संपादक मंडळाचे आभार.

सर्व लेखक- लेखिका, कवी- कवयित्री ना 2021 च्या शुभेच्छा!

2021 सर्वांना मनसोक्त लेखनाचे, आनंदाचे, आरोग्याचे व सुरक्षिततेचे असो.  हीच सदिच्छा!!

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ११) – मारवा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ११) – मारवा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

‘निरोपाच्या क्षणातही सौख्याचा सहभाग आहे

आत्ता दूर गेलो तरी पुनर्मिलनाची आस आहे’….

असं कधीतरी लिहून गेले होते. तार्किकदृष्ट्या लिहायला सोपं आणि सत्यही, मात्र प्रत्यक्ष असे क्षण निभावणं हे फार कठीण, आतून हलवून सोडणारे! एक काहीतरी जे काही काळ आपल्यासोबत असतं ते मागे सुटत चाललंय ही आर्तता आणि नवीन काहीतरी आपल्याशी जोडलं जाणार असल्याची जाणीव असं काहीतरी पराकोटीच्या वेगळ्या गोष्टींच्या संमिश्रतेत भरून गेलेले हे क्षण… म्हणूनच मन कातर करणारे! निसर्गसुद्धा ह्याला अपवाद नाही… म्हणून तर अशा वेळेला कातरवेळा म्हटलं जातं! आपल्या जाणिवा जागृत असतील तर ‘संधिप्रकाशातील’ ह्या क्षणांत मनाचं आपसूक कातर होणं जाणवतंच! मानवाच्या अशा सूक्ष्म जाणिवांच्या आधारेच रागगायनाच्या शास्त्रनिर्धारित वेळा निश्चित केल्या गेल्या आहेत.

वातावरणातली ही जिवाला वेड लावणारी ‘अपूर्णतेची गोडी’ घेऊनच अवतरणारा ‘मारवा’… कातरवेळचा म्हणजे संध्याकाळचा संधिप्रकाशी राग! षाडव जातीचा हा राग… पंचमवर्जित… नि (रे) ग म(तीव्र) ध नि सां, (रें) नि ध म(तीव्र) ग (रे) सा असे मारव्याचे आरोह-अवरोह आहेत… अर्थातच आपण मारवा थाटाचे सूर पाहिलेत त्यानुसार रे कोमल आणि म तीव्र आहे आणि थाटाचंच नाव रागाला आहे त्यामुळं हा मारवा थाटाचा जनकराग आहे…

ह्या रागाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण रागाचा डोलारा हा रिषभ व धैवत ह्या दोन सुरांच्या आधारे पेलला जातो… रे व ध च्या तुलनेमधे आधारस्वर षड्जालाही कमी महत्व असणारा असा हा राग म्हणूनच अत्यंत आर्तभावना जागृत करतो… म्हणूनच कदाचित मनाची कासाविशी जशीच्या तशी उतरते ती मारव्याच्या सुरांतून! अर्थातच दोनच सुरांनी राग नाही उभा राहू शकत त्यामुळं इतर सुरांना टाळता येत नाहीच, परंतू विशेषत: ह्या रागात इतर सूर हे फक्त रे आणि ध ला जोडण्याइतपतच वापरले जातात म्हटलं तर वावगं ठरणार नाही… थांब्याची जागा ही फक्त रे आणि ध हेच सूर आणि अर्थतच हेच त्याचे अनुक्रमे वादी आणि संवादी सूर आहेत.

सुमन कल्याणापुरांचं ‘शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलापरी’ हे गीत त्यातला नेमका भावार्थ ज्या सुरांतून स्पष्ट होईल त्या मारव्याच्या सुरांतच विश्वनाथ मोरे ह्या संगीतकारांनी बांधलेलं आहे आणि जीवनातलं एक मोठं तत्वज्ञान अधोरेखित करणारं ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ हेही हृदयनाथांनी मारव्याच्या सुरांत चपखलपणे सजवलं आहे. ‘मावळत्या दिनकरा’ किंवा ‘मायेविण बाळ क्षणभरी न राहे’ ही गीतं मात्र मारव्याची आठवण करून देतादेता पुढे इतर सुरांना सामावून घेत वेगळा रंग निर्माण करतात.

साज और आवाज ह्या चित्रपटातलं  ‘पायलिया बावरी’ आणि कोतवाल साब मधलं ‘ना फूलों की दुनिया’ ही गीतंही वेगळ्या ढंगानं जवळपास ह्याच सुरांत रंगलेली! साथी रे भूल ना जाना मेरा प्यार हे गाणं मात्र मारव्याच्या सुरावटीतून उमलताना पुढे मात्र इतर सुरांच्या सोबतीने इतकी प्रचंड वेगवेगळी वळणं घेतं कि गायकासाठी ते ‘चॅलेंज’ ठरावं!

सुरवातीच्या भागांमधे चर्चा केल्यानुसार भारतीय शास्त्रीय संगीताची सूक्ष्मतेतून उलगडत जाणारी महानता आपल्याला मारवा, पुरिया आणि सोहनी ह्या तीन रागांमधूनही जाणवेल. तीनही रागांचे आरोह अवरोह अगदी तेच, मात्र प्रत्येक राग संपूर्ण वेगळा दिसतो.

मारव्याचा संपूर्ण डोलारा पेलून धरणारा रे व ध हे पुरियामधे अगदी दुर्बल होऊन जातात, ग वरून सा वर येताना आणि नि वरून म वर येताना अनुक्रमे रे आणि ध ला अलगद स्पर्श करायचा इतकंच त्यांचं स्थान! प्रवासात काही गावांच्या नावाची पाटी दिसते पण आपली गाडी त्या गावाकडे वळून तिथे थांबत नाही, फक्त मधे ते गाव लागतं म्हणून तिथून गाडी न्यावी लागते तसाच हा प्रकार! ग आणि नि हे पुरियाचे वादी संवादी स्वर! थोडक्यात दोंहीतले महत्त्वाचे आणि दुर्बल स्वर हे अगदी विरुद्ध आहेत.

सोहनीचं चलन तर आणखीनच वेगळं! त्याचं केंद्रस्थान हे वरचा म्हणजे तारषड्ज आणि विस्तारक्षेत्रही मुख्यत्वे त्याच्या आसपासच! शिवाय रागाच्या चलनामधेही मारवा व पूरियापेक्षा भिन्नता आहेच. ह्या तीनही रागांचा थाट मारवाच आहे मात्र मारवा व पुरिया हे संध्याकाळचे संधिप्रकाश राग तर सोहनी हा मध्यरात्री नंतरचा राग आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतातील हे बारकावे अनुभवता आले तर त्याहून मोठा आनंद नाही.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी 

☆ विविधा ☆ मन ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

मन उधाण वा-याचे गूज पावसाचे

शंकर महादेवनच्या ह्या गाण्याचे सूर कानावर पडले. किती छान गाणं, आवाज,  आशय. आणि विचार आला,  मन किती छोटा, सरळ शब्द. ज्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार, नाही. पण त्यात किती काहीही सामावण्याची शक्ती आहे.

खरंच त्याचा वेग किती आहे?क्षणात इकडे तर क्षणात आणि कुठे भरकटेल त्याचा नेम नाही. त्याला कुठलेच बंधन नाही. थोडाफार  आपण लगाम घातला तरच.

बहिणाबाईच्या भाषेत सांगायचे तर आता होते भुईवर गेलं गेलं आभाळात.  त्या मनाला फिरायला त्रिखंड पण कमीच.

त्याला फिरायला स्थळ, काळ, वेळ कसलं बंधन नसतं.  कघी ते बालपणीच्या रम्य आठवणीत रमतं तर कधी ते तारुण्यातील स्वप्न पाहतं. सासुरवाशीण कधी मनाने माहेरी आईच्या कुशीत शिरेल. तर एखादी माऊली परदेशी असलेल्या आपल्या वासराकडे मनानेच फेरफटका मारून  येईल.   5, 6वर्षाच्या मुलाला बॅट कशी धरायची ते शिकवताना  एखादा बाबा आपला मुलगा सचिन झाल्याचे मनात चित्र रंगवेल. मनाच्या भरा-या मोठ्या असतात. जिवाला थोड्या वेळासाठी का होईना सुखावणा-या असतात.

मनांत  काय सामावत नाही? राग लोभ प्रेम,  इर्षा, द्वेष. सकारात्मक,  नकारात्मक विचार.  आणि एकदा का ह्या मधला कोणत्याही प्रकारचा विचार आला की मग ते त्याच्या पाठपुरावा करतच. अशावेळीच त्याला लगाम घालण्याची आवश्यकता असते.

मन असले तरी ते इतर अवयवां सारखे दिसत नाही. पण खूप नाजूक असते. म्हणून जपावे लागते. आपले आणि समोरच्या व्यक्तीचे. एकदा का ते दुखावले गेले तर कितीही फुंकर मारली तरी सुखावणं कठीण असतं म्हणून शब्द आणि कृती जपून विचारपूर्वक करावी. जो समोरच्याच मन जपतो, जिंकतो तो खरा माणूस.

आपलं स्वतःचे मन पण आपल्या शरीरासारखंच जपायचं असतं त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. ‘ मी शरीर कमावलं, मेनटेन केलं’ तसच मानसिक संतुलन सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. बाहेरुन छान मेकअप केला आणिचेहरा ओढून ताणून हसरा ठेवला, पण मन दुःखी असले तर तो आनंद तात्पुरता. जीवनातील आनंद हा मनस्थितीत अवलंबून असतो. त्यात जास्त नकारात्मक भावनांना थारा द्यायचा नसतो. त्या साठवणं तर दूरच. मनाची पाटी ताबडतोब पुसून टाकायची.  नाहीतर मानसिक,  शारीरिक दोन्ही त्रास होतात.  आपल्याला,  स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना.  परिणामी वातावरण बिघडवून सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. आठवणी पण चांगल्या गोष्टीच्या ठेवायच्या.

या मनांत एखादा काळजीचा, चिंतेचा किडा शिरला कि मग संपलचं. तो मन आणि त्याच्या बरोबर शरीर पण पोखरुन कमकुवत करतो. येणा-या प्रत्यक्ष संकटापेक्षा मन कल्पनेनेच भयानक चित्र रेखाटत आणि त्या विचाराच्या डोहात खोल खोल जाते. आणि त्रास करुन घेते. त्याला वेळीच लगाम घातला पाहिजे.

हे मन कधी, कुठे, कोणात, केवढे गुंतवायचे त्यावर प्रत्येकानी नियंत्रण ठेवायला पाहिजे.  आपण आपल्या मुलांमध्ये गुंततो.  कधीकधी जरुरीपेक्षा जास्त.  मग त्यांच्याकडून अपेक्षा पण जास्त ठेवतो. त्याचा त्यांना पण त्रास होतो आणि अपेक्षा पूर्ण नाही झाल्या कि आपल्या मनाला त्रास होतो. आपण मनाने  एखाद्याला आपले मानण्याआधीच त्याला पारखून घ्यायचे. नाहीतर त्याच्याकडून पण आपल्या भावनिक अपेक्षा पूर्ण न झाल्याने मानसिक त्रास होतो.

त्या मनाला कसे, कुठे, किती वळवायचे

काय मनांत ठेवायचे, काय सोडून द्यायचे

ह्याची सुंदर योग्य ती शिकवण आपल्याला समर्थानी मनाचे श्लोकाद्वारे दिली आहे.

आपण मनांने खूप स्वप्न रंगवतो ती योग्य वेळीच पूर्ण होतात. आंणि जर नाही झाली तर सोडून द्यायची असतात. ती नाही झाली  कारण ती न होण्यातच आपलं हित आहे असा सकारात्मक विचार करायचा.

सुखी समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली

ठेविले अनंते तैसेची रहावे

चित्ती असावे समाधान!

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मिरजेतील एकमुखी दत्तमूर्तींची ऐतिहासिक परंपरा ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर

श्री मानसिंगराव कुमठेकर

☆ विविधा ☆ मिरजेतील एकमुखी दत्तमूर्तींची ऐतिहासिक परंपरा ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर ☆ 

मिरज आणि म्हैसाळमध्ये एकमुखी दत्तमूर्ती

निरंजन रघुनाथांनी सुरू केली परंपरा

मिरज तालुक्यात एकमुखी दत्तमूर्ती असलेली तीन ऐतिहासिक मंदिरे आहे. उत्तर पेशवाईत मिरजेत आलेल्या निरंजन रघुनाथ या थोर दत्तभक्तांनी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिरात एकमुखी दत्तांची मूर्ती स्थापना केली. त्यानंतर म्हैसाळ आणि मिरजेत अशाच पध्दतीच्या हुबेहुब मूर्ती अन्य दत्तभक्तांनी स्थापन केल्या. एकमुखी दत्तांच्या या मूर्ती दुर्मिळ असून, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मिरज आणि म्हैसाळ येथील एकमुखी दत्तमंदिरात दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात.

पेशवाईच्या उत्तर काळात निरंजन रघुनाथ नावाचे थोर दत्तभक्त होऊन गेले. त्यांनी गिरनार पर्वतावर कठोर तपश्चर्या केल्यानंतर साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले, असे सांगण्यात येते. हे दर्शन सहा हस्त आणि एकमुख अशा स्वरूपाचे होते. निरंजन रघुनाथांनी दत्तभक्तीपर काही ग्रंथ आणि काव्यात्मक रचना केल्या. पुढे रघुनाथ निरंजन हे मिरजेत आले. त्यावेळचे मिरज संस्थानचे अधिपती श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन (दुसरे) यांनी त्यांना आश्रय दिला. निरंजन रघुनाथांनी मिरजेत मठ स्थापना केली. सध्याच्या अंबाबाई तालीमसमोर शिराळकर (बेकरीवाले) यांच्या वाडय़ात आजही हा मठ आहे.

निरंजन रघुनाथांचा अनुग्रह श्रीमंत बाळासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे त्यांनी सन 1853-54 मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱ्या माधवजी मंदिरात दत्त मंदिर बांधले. या मंदिरात निरंजन रघुनाथांच्या हस्ते काळ्या पाषाणातील एकमुखी दत्तांची सुंदर अशी मूर्ती स्थापन करण्यात आली. ही मूर्ती त्याकाळी मिरजेच्या पंचक्रोशीत प्रसिध्द होती. निरंजनबावांनी सन 1855 मध्ये मिरजेत कृष्णानदीत जलसमाधी घेतली. त्यांचे पुत्र योगीराजबावा यांना श्रीमंत बाळासाहेबांनी जमिन इनाम दिल्या होत्या. मिरज किल्ल्यातील या दत्तमंदिर स्थापनेसंदर्भातील आणि निरंजनबावांच्या मुलांना दिलेल्या इनामाबाबतची कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.

निरंजबावांच्या हस्ते स्थापन झालेली किल्ल्यातील दत्तमूर्ती पाहून तत्कालीन अन्य दत्तभक्तांनीही त्याच कारागिराकडून हुबेहुब अशा मूर्ती तयार करवून घेतल्या. या तीनही दत्तमूर्तींना एक मुख असून, सहा हात आहेत. या सहाही हातांपैकी दोन हातात विष्णूंची शंख आणि चक्र ही आयुधे, शिवाची डमरू आणि त्रिशुल ही आयुधे आणि ब्रम्हाचे कमंडलू आणि माळ अशी रचना आहे. पायात खडावा आहेत. मूर्तीभोवती कोरीव नक्षीकाम असलेली सुंदर प्रभावळ असून, त्यावर मध्यभागी कीर्तिमूख आहे.

मिरजेतील भुईकोट किल्ल्याच्या बाहेर उत्तर बाजूला असणाऱया मोकळ्या मैदानात दत्तभक्त असणाऱ्या वेदमूर्ती सीतारामभट आपटे यांनी 1881 सालच्या माघ शुध्द पंचमीला एकमुखी दत्त मूर्तीची स्थापना केली. किल्ल्याच्या मैदानातील मंदिर म्हणून त्याला ‘मैदान दत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

याच काळात मिरजेजवळच असणाऱ्या म्हैसाळ गावातील देवल नामक दत्तभक्ताने आपल्या घरालगत एकमुखी दत्तमूर्तीचे मंदिर बांधले. त्यामुळे मिरज तालुक्यात 19 व्या शतकात एकसारख्या दिसणाऱ्या तीन एकमूखी दत्तमूर्ती होत्या. त्यांचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येत. सन 1948 साली मिरज संस्थान हे स्वतंत्र भारतात विलीन झाले. त्यानंतर मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराच्या आवारात असणाऱ्या दत्तमंदिरातील एकमुखी मूर्ती स्थलांतरीत करण्यात आली. सध्या मैदान दत्त मंदिर आणि म्हैसाळ येथील दत्त मंदिरात या मूर्ती पहावयास मिळतात.

एकमुखी दत्तमूर्ती या महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळतात. मैदान दत्त मंदिरात नैमित्तिक कार्यक्रमांबरोबर कार्तिक महिन्यात होणारा दीपोत्सव प्रेक्षणीय असतो. दत्तजयंतीचा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा होतो. पूर्वी येथे राज्यातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकारांची प्रवचने होत असत. या मंदिराचे शतकमहोत्सव आणि शतकोत्तर रौप्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले होते.

 

© श्री मानसिंगराव कुमठेकर

मिरज

मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अपार.. अपरंपार… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ अपार.. अपरंपार… ☆ श्री अरविंद लिमये ☆

क्षण क्षणकाळासाठी येतो. क्षणात विरुनही जातो. सर्वसामान्य माणसं येईल, होईल ते स्विकारत जगत असतात. कालपटलावर अशा सर्वसामान्यांची नावे पुसटशीही उमटलेली नसतात. एखादे स्वप्न, एखादं ध्येय उराशी बाळगून, त्यासाठी सर्वस्वाची आहुती देत झपाटल्यासारखी जगणारी माणसे मात्र त्यांच्या पश्चातही कधीच न पुसणारा अमीट ठसा कालपटलावर उमटवून जातात आणि म्हणूनच दीर्घकाळानंतरही जनमानसावर अधिराज्य गाजवत स्मृतिरुपात अमर रहातात. प्रत्येक क्षेत्राचा आढावा घेतला, तर त्या त्या क्षेत्रातल्या किर्तीरुपाने उरलेल्या अशा अनेक महान व्यक्तिंचा महिमा आदर्शरुपात पुढील पिढ्यांना जगण्याची दिशा दाखवणारा दीपस्तंभ बनलेला

आपल्याला दिसून येईल. इथे प्रत्येक क्षेत्रातल्या वानगीदाखल कांही नावांचा  उल्लेख करायचा ठरवलं, तरी त्या त्या क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींची असंख्य नावे मनात गर्दी करु लागतील आणि यातली कांही मोजकी नावे निवडणे म्हणजे इतरांवर अन्याय केल्याची रुखरुख मनाला लागून राहील. चित्रपटक्षेत्र, नाट्यक्षेत्र,  गायन, वादन, नृत्यादी कला, लेखन, वक्तृत्त्व, शिक्षण, क्रिडा समाजसेवा… कोणतंच क्षेत्र याला अपवाद नाही. झोकून देऊन काम केलेल्या आणि दर्जाच्या बाबतीत कधीच कसली तडजोड न करता आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्या या क्षेत्रांतील असंख्य व्यक्तिंचा महिमा कालातीत आहे हीच त्यांची महानता..!

राजकारण हे क्षेत्र तसं दलदलीचं. भल्याभल्यानाही लोकानुनयासाठी तडजोडी करीतच इथे श्वास घेता येतो यावर विश्वास ठेवायला भाग पाडणारं हे क्षेत्र..! पण याही क्षेत्रात वीर सावरकर, म.गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, लालबहादूर शास्त्री अशी मोजकी का होईना चटकन् आठवणारी नावे आहेतच. क्षेत्र कोणतेही असो महानतेच्या निकषावर खरी उतरतात ती तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, ध्येयाने पछाडलेली चांगल्या अर्थाने ‘वेडी’ माणसे..! आणि त्यांचाच महिमा निर्विवाद महान ठरतो.

अर्थात हा सगळा व्यक्तिगत महिमा लौकिकार्थाने, रुढार्थाने दखल घ्यावी असाच आहे.  पण माझ्यामते खरा ‘अपार’ महिमा काळाचाच..! अल्पकाळ, प्रदीर्घकाळ या अनेक काळरुपांच्या पलिकडचा हा ‘काळ’..! ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ म्हणतात त्यातला ‘काळ’नव्हे, तर ‘काळासारखं दुसरं औषध नाही’ म्हणतात ना, तो ‘काळ’..!

क्षण क्षणकाळासाठी येतो. क्षण क्षणात विरुन जातो. या विरुन गेलेल्या अविरत क्षणांचा बनतो तो हाच ‘काळ’..! दु:ख वियोगाचं असो, कांहीतरी निसटल्याचं, हरवून गेल्याचं असो, असह्य असो वा न विसरता येणारं असो, सगळ्या दु:खांवरचं काळ हेच एकमेव रामबाण औषध..! क्लेशकारक, दु:खदायी आठवणींची तिव्रता जसा हा काळ कमी करतो, तसंच सुखद, समृध्द आठवणी आपल्या कूपीत अलगद जपून ठेवत त्या आठवणींचा सुगंध वृध्दींगत करत असतो तोही हाच काळ..! एरवी महान वाटणार्या व्यक्तिंच्या कार्यकर्तृत्वाचा कस घासून पहातो

तो हा काळच आणि त्याच्या निकषावरच खरा महिमा, खरी महानता टिकून तरी रहाते किंवा विरुन तरी जाते. कोण चूक कोण बरोबर याचं उत्तर काळाच्याच उदरात दडलेलं असतं. काळाचा महिमा अपार, अपरंपार म्हणतात ते यासाठीच..!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रकाश ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ मनमंजुषेतून ☆ प्रकाश ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

प्रकाश हा अखंड उर्जास्त्रोत आहे. चैतन्याचा झरा आहे. ज्ञानाचा दीपक आहे. आपल्या सभोवतीचा प्रकाश हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे त्याचे वेगळे अस्तित्व जाणवतही नाही.

आपल्याला सहसा अंधाराचा सामना करायची वेळच येत नाही. त्यामुळे संध्याकाळी प्रकाश कमी झाला की आपण उदास होतो. ती वेळ ‘कातरवेळ’ असते. तसेच ढगाने सूर्य झाकला गेला की अंधारते. आपण बेचैन होतो. मळभ दाटून आले म्हणतो. त्यामुळे पूर्ण अंधाराची आपण कल्पनाच करू शकत नाही.

आम्ही दोघे पती-पत्नी १३-१४ वर्षे एका नेत्रपेढीसाठी ‘नेत्रमित्र’ म्हणून काम करत होतो. त्यावेळी अंधत्वाचे विविध पैलू लक्षात आले. दृष्टिदान संकल्पने विषयी अज्ञान, गैरसमज, अपुरी माहिती या गोष्टी विशेषत्वाने लक्षात आल्या. पण प्रकाशाचे महत्त्व जास्ती लक्षात आले ते एका खास कार्यक्रमात‌.

एका वर्षी जागतिक दृष्टिदान दिवसाच्या निमित्ताने नेत्रदानातून दृष्टीलाभ झालेल्या तीन जणांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली.

त्यांना समक्ष भेटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंदच त्यांच्या भावना सांगत होता. एक वीस-बावीस वर्षांची विवाहित मुलगी स्वतःच्या मुलाला डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येते हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे हे सांगताना रडू आवरू शकत नव्हती. एक पन्नाशीच्या बाई आणि ६५ वर्षांचे आजोबा हे खूप भारावले होते. घरातली स्वतःची कामे स्वतः करणे, स्वयंपाक करणे, एकटे फिरायला जाणे, बाजारहाट, बँकेतली कामं या सर्व गरजेच्या गोष्टी स्वतः करताना मिळणारा आनंद शब्दांबरोबर त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. आपल्या दृष्टीने किती क्षुल्लक कामे, पण त्यासाठी त्यांना परावलंबित्व आले होते. थोडक्यात निरुपयोगीपणाची अगतिक भावना त्यांच्या मनातून आता दूर झाली होती.

त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांना पण समाधानाचा आनंद मिळाला होता आणि मन वेगळ्याच प्रकाशाने भरून गेले होते. आम्ही आमच्या कुटुंबातील पाच जणांचे नेत्रदान करवून त्यांच्या जगण्याची सफल सांगता करताना या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे आणि अमूल्य समाधानाचे वाटेकरी झालो आहोत.

आपले आयुष्य आनंदात घालवल्यानंतर आपल्या पश्चात आयुष्याचे  सार्थक करण्याचा नेत्रदान हा अतिशय महत्त्वाचा सोपा उपाय आहे. त्यामुळे दोन अंधांची आयुष्य प्रकाशमान होतात. त्यासाठी नेत्रदाना बाबत जागरूक असायला हवे. आपण तर नेत्रदानाचा संकल्प करायचाच पण जवळपास, ओळखीत कुणाचा मृत्यू झाला तर अगदी शांतपणे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना नेत्रदाना विषयी सुचवायचे. कारण दु:खामुळे त्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येईलच असे नाही. तेव्हा अशी जागृती करीत प्रत्येक जण नेत्रमित्र बनू शकतो.

आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. त्याचा आनंदाने उपभोग घेतला. आपल्या पश्चात या छोट्या कृतीने आपण आनंद वाटू शकतो. मग काय हरकत आहे. हीच आपल्या माणुसपणाची जाणीव जागृती आहे.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सरले वर्ष ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ सरले वर्ष ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

जे ऊगवते ते मावळतेच हा निसर्गाचा नियमच!!

पण मावळतानाही पाऊलांचे ठसे ऊमटून जातात..

२०२० हे वर्षही आता मावळतीवर टेकलंय्…

कसं गेलं हे वर्ष?  फार नकारात्मक गेलं…या वर्षीच्या आठवणी जरुर राहतील  पण त्या भेदक,  भयावह,  भकास असणार आहेत….

म्हणावं तर सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारा पण आक्राळविक्राळ अस्तित्व बजावणार्‍या या विषाणुने सर्‍या जगाला विळखा घातला… त्याची ऊत्पत्ती कशी झाली, त्याचं ऊगमस्थान कोणतं हे वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचं असलं तरी ज्या पद्धतीनं त्याने समस्त मानवी जीवनालाच वेठीला धरलं ते अनुभवत असताना, नेमकी आपली भूमिका काय याचे आत्मसंशोधन अधिक महत्वाचे वाटते…… करोडो लोक बाधित झाले आणि लाखो बळी पडले…. आणि या सालाबरोबरचा हा थरारक संहार नव्या सालाचे ही बोट पकडूनच ठेवणार का हाही प्रश्न आहेच….

तशा जगात अनेक गोष्टी घडल्या…

जाॅर्ज फ्लाॅईड या कृष्णवर्णीय नेत्याचा मिनीआपाॅलीस अमेरिका या शहरात, अमानुष पोलीस कारवाईत मृत्यु झाला…

धर्मद्वेषाचे अघोर परिणाम सोसूनही पुन्हा पुन्हा तेच घडावे याचेच वैषम्य वाटते..

अमेरिकेत ट्रंप यांची सत्ता गेली. बायडेन नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले…भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची ऊपराष्ट्रपती म्हणून निवड झाली….

आपल्या देशातही ठिकठिकाणी निवडणुका झाल्या..

घोडेबाजार झाले ..पक्षांची,  नेत्यांची अदलाबदल झाली.. देशहितापेक्षा मतलबी राजकारणाचेच वारे वाहिले.

बळीराजाचे बळी गेले .. निसर्गानेही झोडपले आणि राजकारणानेही पीडले…अंदोलने चालूच आहेत…

हाथरस सारख्या घटना घडतच आहेत…

कोरोनाच्या हकालपट्टीसाठी, दिवे लावले, टाळ्या वाजवल्या, थाळ्या बडवल्या, घंटानाद केले…

सीमेवर जवान शहीद झाले…श्रद्धांजल्या वाहिल्या….

पण या सगळ्या गदारोळात आर.के. लक्ष्मणचा, मानवजातीचा प्रतिनिधी मात्र होरपळून निघालाय…. पण २०२० या सरत्या सालाचा लेखनप्रपंच मांडताना केवळ घटनांचाच ऊहापोह करणे इतकाच हेतु नाही.

भल्याबुर्‍या घटना अव्याहत घडतच असतात.. पण या वर्षी  एका विषाणुने दिलेला भयावह, थरारक अनुभव हा केवळ न भूतो न भविष्यती..!!

जीवन स्तब्ध झाले! बंदीस्त झाले…भयाण डोहात बुडाले….तांडवी मंथनात घुसळून गेले… कलीयुगाचा हा अंतीम काळ… जगबुडीच ही.. महाप्रलय म्हणतात तो हाच… शंकराने तिसरा डोळाच ऊघडला…महेशाचं हे संहार सत्रच… मग इथे येउन मन थबकतं…संपलं नाही सारं.  संपणारही नाही .. हा सृष्टीचा नियमच नाही….बंदीस्ततेत, स्तब्धतेतही एक दार ऊघडतं.. अगदी आत, मनातलं..आणि अनादी काळाच्या पळापळीत खूप हरवलेलं पुन्हा गवसतं….

हरवलेली संसकृती, नीती, वाढलेला हव्यास, तुटलेली नाती, संवाद, गोडवे, माणूसपण, विनाकारण वाढलेल्या गरजा… या सर्वांचा नव्याने विचार करावासा वाटतो.

एक विषाणु येतो आणि विश्वाला संदेश देतो”

“घरात बसा… सुरक्षित रहा.”

नकारात्मक पार्श्वभूमीवर २०२० सालाने जर काही दिलं असेल तर आत्मसंशोधनाचं आवाहन…

म्हणून नव्या वर्षाचं स्वागत करताना मनाची मरगळ नको.

सृष्टीनं अंजन घातलंय् ..या संजीवन दृष्टीने नववर्षाला सामोरे जाऊ…

मानव कधीच निसर्गाहून श्रेष्ठ नाही .पण मानवाने निसर्गाची अनेक रौद्र रुपे पचवली आहेत… लढाऊ, अहंकारी वृत्तीने नव्हे तर शरणागत होऊन निसर्गाची पूजा बांधूया आणि येणार्‍या नव्या वर्षाचे स्वागत करुया…..!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन (भाग ४) – उपशास्त्रीय गायन~ नाट्यसंगीत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग ३ )  – उपशास्त्रीय गायन~ नाट्यसंगीत ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

उपशास्त्रीय गायनांत नाट्य~संगीत हा एक स्वतंत्र आणि अतिशय महत्वाचा विषय मानावा लागेल. मराठी माणूस हा संगीत नाटकवेडा! ह्या संगीत नाट्य क्षेत्रांत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे नांव फार मोठे आहे.त्यांनी पुण्यांत १८८० साली पारसी नाटके पाहीली आणि त्यांना मराठीत नाटके रचण्याची स्फूर्ती मिळाली. त्यांतूनच संगीत शाकुंतल या नाटकाचा जन्म झाला.”पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधी नमितो” ह्या मंगलाचरणाने नाटकास सुरवात झाली. संगीत शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगाने मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकाचे युग सुरू झाले. त्यावेळचे मंगलाचरण किंवा नमनाचे पद्य हे नंतर नांदी म्हणून ओळखले जावूृ लागले. आजही शाकुंतलातील या नांदीने नाट्यसंगीताच्या मैफीलींना सुरवात होतांना आपण ऐकतोच. १८८२ मध्ये सौभद्र हे दुसरे संगीत नाटक किर्लोस्कर नाटक मंडळींनी रंगभूमीवर आणले. १८८२ ते ९० हा आठ वर्षांचा काळ किर्लोस्कर संगीताचा काळ गणला जातो. त्यांच्या ह्या नाटकांत पदांची रेलचेल होती.

नाटकाच्या अर्थाला आणि कथानकाच्या अनुषंगाने पोषक अशी पदे साकी,दिंडी,कामदा अशा जातिवृत्तांत त्यांनी रचली व सादर केली.त्यावेळच्या लोकप्रिय गीतांच्या आधारावर नाट्यपदांना चाली लावल्या व ती पदे श्रोत्यांच्या विलक्षण लोकप्रियतेस उतरली.सौभद्रांतील नाट्यसंगीत आजतागायत टिकून राहिले ते त्यांतील संगीताचा ताजेपणा,अण्णासाहेबांची सरस,प्रासादिक आणि सुबोध पद्यरचना ह्यामुळेच.सामान्य प्रेक्षकांच्या तोंडी ही गाणी सहज बसली व ती महाराष्ट्रांतील घराघरांत पोहोचली. “नच सुंदरी करू कोपा”, पांडूनृपती जनक जया” यासारख्या पदांच्या चाली मूळ कानडी पदांवरून घेतल्या आहेत.खाडिलकरांच्या मानापमान या नाटकांतील”दे हाता या शरणागता” या पदाची चालही मूळ कानडी पदाचीच! यमन, भूप, ललत, जोगीया, पिलू, आसावरी, भैरवी यासारखे लोकप्रिय राग तर अण्णासाहेबांनी वापरलेच परंतु “वद जाऊ कुणाला शरण ग” किंवा “बलसागर तुम्ही वीरशिरोमणी” अशा पदांना लावणीची चाल देउन लावणीला मराठी कुटुंबांत प्रतीष्ठा मिळवून दिली.

१९०५ साली नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बाल गंधर्व ह्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळींत प्रवेश केला आणि सतत पन्नास वर्ष्ये त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. गोविंदराव टेंबे त्यांच्याविषयी लिहितात, “जवारीदार सुरेल आवाज,अत्यंत लवचिक गळा, ताल व लय यांचा उपजत पक्केपणा, एकंदरीत गाण्यातील संथपणा आणि संयम त्यांच्याइतका क्वचितच पहावयास मिळेल.” गातांना सर्वसामान्य रागांतील पदांत ते एखादा विसंवादी, अशास्त्रीय स्वर असा काही लावायचे की त्यामुळे त्या रागाला नाही पण चालीला काही नवीनच शोभा येत असे.

गंधर्वांच्या संगीताचा परिपक्व आविष्कार गंधर्व नाटक मंडळीत रसिकांना पहायला मिळाला.बाल गंधर्वांनी कृ.प्र.खाडिलकरांच्या मानापमान नाटकाला यथार्थ न्याय दिला आणि मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाचे एक नवे युग निर्माण केले.

स्वयंवर नाटकांतील पदांनी उच्चांक गाठला.रागदारी संगीतावर आधारलेली ही पदे गायक नटांसाठी आव्हानच होते. नाट्य संगीताचा दर्जा उंचावला आणि संगीत नाटकाला

नाट्यसंगीताच्या बैठकीचे स्वरूप येऊ लागले.

प्रेक्षकांचे ones more घेतां घेतां रात्रभर नाटके रंगू लागली. भास्कर बुवा बखले आणि वझेबुवा यांच्यासारखे स्वर रचनाकार नाट्यकलेला लाभल्यामुळे महाराष्ट्रीय समाजाला उच्च शास्त्रीय संगीताची ओळख झाली. देसी, खोकर,बरवा असे अनवट राग प्रथमच महाराष्ट्रांत अवतरले.

आजच्या पीढीला बाल गंधर्व अंगाचे गाणे ऐकावयास मिळते ते श्री आनंद भाटे(आनंद गंधर्व) आणि सौ मंजूषा पाटील कुळकर्णी यांच्याकडून.

एक अनोख्या पद्धतीचे नाट्य गायन रंगभूमीवर आणले ते मो.ग.रांगणेकर यांच्या नाट्य निकेतन या संस्थेने. ज्योत्स्नाबाई भोळे यांच्या सुमधूर गळ्यांतून “क्षण आला भाग्याचा”,”मनरमणा मधुसूदना” ही पदे ऐकतांना मन लुब्ध होते.मा.कृष्णरावांच्या या चाली अवीट गोडीच्या आहेत.

साधारण १९६०च्या दशकापासून गंधर्व ढंगांतील गाण्यांत बदल दिसू लागला. छोटा गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली”अंगणी पारिजात फुलला”,”रतिहुनी सुंदर मदनमंजीरी,”राम मराठ्यांची “जयोस्तुते उषादेवते,” किंवा “सोsहम् हर डमरू बाजे,”वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली”नयन तुझे जादुगार,””नारायणा रमा रमणा,” पं.जितेंद्र अभिषेकींची “नको विसरू संकेत मीलनाचा,” “तव भास अंतरा व्हावा,” “तेजोनिधी लोहगोल,” “घेई छंद मकरंद” ही नाट्यपदे ह्या बदलाची उदाहरणे देता येतील.

शास्त्रीय रागांवरील हे नाट्यसंगीत नाटकांतील प्रसंगानुरूप असल्यामुळे अतिशय भावपूर्णही आहे आणि ते श्रोत्यांच्या पूर्ण पसंतीस उतरले आहे.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print