मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “महा⭐तारे” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “ महातारे ” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

मित्रहो..

आजकाल समाजात वृध्द म्हणजे ज्येष्ठ नागरीक म्हणजेच “म्हातारे” म्हणण्याचा प्रघात आहे.

परंतु एका कवीने या शब्दाची फारच सुंदर आणि यथार्थ फोड केली आहे.

‘म्हातारे’ म्हणजे “महा तारे” !

 

…. जे कर्तव्यपूर्तीच्या जीवनानुभवाने समृध्द असतात म्हणून ते खरोखरच स्वयंप्रकाशी व त्यांच्या बृहन्कुटुंबीय, समाजासाठीसुध्दा प्रकाशमान व मार्गदर्शक असतात. मात्र आपल्या संस्कृतीत असलेला

“थोरांना वयाचा मान देण्या”चा प्रघात तितकासा पाळला जातोय का ?

 

After all, respect is not to be demanded, but commanded ! 

Here is how..

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

पहाटे पाच वाजता उठतात

सगळं आवरून फिरायला जातात

व्यायाम करुन उत्साहात परततात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

धडपडतात, पडतात, परत उठतात

एवढंसं खातात, काही औषधं घेतात

रात्री निशाचरागत जागत बसतात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

पेपर वाचतात, बातम्या पाहतात

राजकारणावर हिरीरीने बोलतात

नाटक सिनेमा आवडीने पाहतात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

दूध, भाजी, किराणा आणतात

नातवंडाना शाळेतही सोडतात

संध्याकाळी त्यांना खेळायला नेतात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

नातवंडाशी खेळून मस्ती करतात

घरभर पळून उच्छाद मांडतात

नव्या नव्याच्या शोधात रमतात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

लग्नसमारंभात थाटात मिरवतात

लहानथोरांची खुशाली विचारतात

आनंदी, ताजेतवाने घरी परततात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत ! 

 

ते कधीच थकणार नाहीत,

कारण ते म्हातारे नाहीत..

ते तर महा 🌟 तारे आहेत !

 

महा 🌟 ताऱ्यांनो,

🌃 लुकलुकत रहा.. 🎇 चमकायला बिल्कुल बिचकू नका

कवी : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

हिंदू संस्कृतीतील इंग्रजी तारखे प्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे ‘ मकर संक्रांत ‘. पौष महिन्यातला हा महत्त्वाचा सण. संक्रमण याचा अर्थ ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे. संक्रांतीच्या सण म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे असे म्हणायला हरकत नाही. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने, निसर्गाशी, शेतीशी, पर्यावरणाशी, आयुर्वेदाशी निगडित असणारा असा हा उत्सव आहे. 22 डिसेंबर पासून सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात झाली तरी, सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, संक्रमण करतो तो दिवस 14 जानेवारी. मकर संक्रांत ही सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी दर आठ वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. आणि 15 जानेवारीला तो सण उत्सव साजरा केला जातो. मकर राशीतील प्रवेशानंतर सूर्याचे तेज वाढत जाते. दिवसाचा काळ मोठा आणि रात्रीचा काळ लहान व्हायला सुरुवात होते. संपूर्ण देशभर हा उत्सव किंवा सण साजरा केला जातो. पौराणिक, भौगोलिक, अध्यात्मिक, संस्कृतिक, ऐतिहासिक अशा सर्व दृष्टीने या सणाचे महत्त्व आहे. पुढे येणाऱ्या रथसप्तमी पर्यंत तो साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशानुसार या सणाची नावे आणि साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात ‘संक्रांत, ‘ तामिळनाडूमध्ये ‘पोंगल’, कर्नाटक आणि केरळ मध्ये ‘संक्रांति’, उडपी भागात ‘संक्रमण, ‘ तर काही ठिकाणी या दिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली म्हणून त्यास ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. तसेच शेतात धान्याची कापणी चालू असते म्हणून ‘कापणीचा सण’ असेही म्हणतात. तेलुगु लोक त्याला ‘बेंडा पाडुंगा ‘, तसेच बुंदेलखंडात ‘सकृत ‘, उत्तर प्रदेश बिहारमध्ये खिचडी करून ती सूर्यदेवाला अर्पण करून दानही दिले जाते, त्यामुळे या दिवसाला ते ‘खिचडी ‘असेच म्हणतात. हिमाचल आणि हरियाणा मध्ये ‘मगही ‘ आणि पंजाब मध्ये ‘लोव्ही, ‘ मध्यप्रदेशात ‘सक्रास, ‘ जम्मूमध्ये ‘उत्तरैन ‘, काश्मीरमध्ये ‘ शिशुर सेन्क्रांत ‘, आसाम मध्ये ‘ ‘भोगाली बिहू ‘असे म्हणतात. ओरिसामध्ये आदिवासी लोक या दिवसापासून नवीन वर्ष सुरू करतात. केरळमध्ये तर हा उत्सव ७, १४ २१ किंवा ४० दिवसांचाही करून, संक्रांती दिवशी त्याची सांगता करतात. गुजरात मध्ये आजही तिळाच्या लाडू मध्ये दान घालून, गुप्त दान देण्याची प्रथा आहे. तसेच तेथे पतंग उडविण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामागील शास्त्र म्हणजे पतंग उडविण्यासाठी मैदानात जावे लागते. आणि आपोआप सौरस्नान घडते. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. त्या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या ही खूप महत्त्व आहे. संपूर्ण देशभर हा सण साजरा होत असल्याने विविधतेत एकता (युनिटी इन डायव्हर्सिटी )आणणारा असा हा सण आहे असे म्हणायला हरकत नाही. केवळ भारतातच नाही

तर थायलंड, लाओस, म्यानमार येथेही हा सण साजरा करतात. या दिवसानंतर हळूहळू ऋतूतही बदल होतो.

सूर्याचा (पृथ्वीचा) धनु रास ते मकर रास या प्रवासाच्या काळाला ‘धनुर्मास ‘ किंवा ‘धुंधुरमास ‘ म्हणतात. (१३ डिसेंबर ते १३ जानेवारी). मकर संक्रांतीचा आदला दिवस ‘भोगी’ हा धनुर्मासाचा शेवटचा दिवस. या काळात एक दिवस पहाटे स्वयंपाक करून उगवत्या सूर्याला नैवेद्य दाखविला जातो. संक्रांतीचा तीन दिवसांचा उत्सव असतो. भोगी, संक्रांत, आणि किंक्रांत.

भोगी दिवशी सुगडाच्या (मातीचा घट) पूजेला महत्त्व असते. मातीचे नवीन घट (दोन किंवा पाच) आणून त्यामध्ये छोटी बोळकी (ज्याला चिल्लीपिल्ली म्हणतात.) ठेवून, या ऋतूत आलेले घेवडा, सोलाणा, गाजर, ऊस, बोरं, गहू, तिळगुळ असे जिन्नस त्यात भरून ते देवापुढे ठेवून त्याची पूजा करतात. एका सुपामध्ये बाजरीचे पीठ, कांदा, शेंगा, मुंगडाळ, वांग, वस्त्र, विड्याची पानं, दक्षिणा, सुपारी, इतकच नाही तर स्नानासाठी, खोबरेल तेल, शीकेकाई, असे सर्व ठेवून ते स्नानापूर्वी सुवासिनीला वाण (भोगी) देण्याची पद्धत आहे. त्या दिवशीच्या स्वयंपाकात तीळ लावून बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, खिचडी, सर्व भाज्या एकत्र करून मिक्स भाजी, (त्या भाजीला लेकुरवाळ म्हणतात) भरपूर लोणी, दही असा आरोग्यदायी थाट असतो.

यानंतरचा मुख्य दिवस ‘संक्रांत’. या दिवसाची एक पौराणिक कथाही सांगतात. संक्रांत देवीने शंकरासुर दैत्याचा वध केला. तो हा आनंदाचा दिवस मानला जातो. संक्रांति म्हणजे ‘ सम्यक क्रांती’. क्रांती मध्ये हिंसेला महत्त्व असेल, पण सं – क्रांतीमध्ये, मानवी मनाचे संकल्प बदलण्याचा विचार असतो. संक्रांती म्हणजे ‘संघक्रांती ‘. प्रत्येकाने मुक्त, आनंदी जीवन जगणाऱ्या लोकांशी संघयुक्त होऊन षड्रिपूं पासून दूर राहण्याचा संकल्प करायला हवा, असा एक विचार आहे. संक्रांती म्हणजे ‘संघक्रांती, ‘संघे शक्ति कलौयुगे’. संघामध्ये शक्ती विपुल प्रमाणात एकत्र आल्याने कठीण कार्यही सहजगत्या पार पडते. हा सण- उत्सव लोकांना जोडण्याचे काम करतो. म्हणून आनंद, सुसंवाद आणि ऐक्य तसेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग (तमसोमा ज्योतिर्गमय ) असा मानला जातो. या दिवशी रात्र आणि दिवस समसमान असतात. हळूहळू नंतर दिवस मोठा व्हायला लागतो आणि रात्र लहान व्हायला लागते.

संक्रांतीला तीळ (स्नेह ) गुळ (गोडी) याला महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसात रुक्ष झालेल्या शरीराला स्निग्धतेची आणि उष्णतेची गरज असते. ती गरज भागवणारे तीळ आणि गूळ हे सर्वोत्तम खाद्य आहे. या दिवशी तीळयुक्त पाण्याने स्नान करतात. अध्यात्मानुसार तिळामध्ये इतर तेलांपेक्षा सत्व लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने, सूर्याच्या संक्रमण काळात साधना चांगले होते. तिळाचे तेल पुष्टीप्रदही असते. या दिवशी ब्राह्मणांना तीळ दान, आणि शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे लावतात. पितृश्राद्ध करून, तिलांजली देऊन, तर्पण करतात. तिळामुळे असुर श्राद्धात विघ्न आणत नाहीत अशी समजूत आहे. जेवणात गुळाच्या किंवा पुरणाच्या पोळ्या हे मुख्य पक्वान्न असते. आप्तेष्टांना तीळ- गुळाची वडी- लाडू देऊन, ” “तिळगुळ घ्या गोड बोला” असे शब्द उच्चारले जातात. तिलवत वद स, स्नेह गुडवत मधुरं वद/ उभयस्य प्रदानेन स्नेहवृद्धी: चिरंभवेत “अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. काही जण पुण्यकाळाच्या मुहूर्तावर सूर्य देवाला आर्घ्य देऊन, आरती करून, सूर्य मंत्र (चांगल्या भविष्यासाठी २१ किंवा १०८ वेळा पठण करतात. पूजेच्या वेळी काही भाविक १२ मुखी रुद्राक्ष धारण करतात. त्यामुळे चेतना व वैश्विक बुद्धिमत्ता बऱ्याच पातळ्यांपर्यंत वाढून कामे यशस्वी होतात, असा समज आहे. शनिदेव मकर राशीचे स्वामी असल्याने जप, तप, ध्यान अशा धार्मिक क्रियां नाही महत्त्व आहे.

नवीन लग्न झालेल्या मुलीला सासरचे लोक काळी साडी, हलव्याचे दागिने आणि तिळगुळ आणतात. तसेच जावयाला हार. गुच्छ वाटीत ( चांदी किंवा स्टील ऐपतीप्रमाणे) तिळगुळ घालून देतात. त्याचप्रमाणे लहान बाळालाही, काळे कपडे व हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे. कोणी कोणी बाळ पाच वर्षाचा होईपर्यंत दरवर्षी बोरन्हाण घालतात. दिवस थंडीचे असल्याने, काळ्या रंगाने उब येत असल्याने काळे कपडे घालण्याची प्रथा असावी. तसेच काळ्या रंगाची वस्त्रे नेसून काळोख्या मोठ्या रात्रीला निरोप दिला जातो.

भगवान विष्णूनी राक्षसांचा वध करून, त्यांची मस्तकं मंदार पर्वतात पुरून टाकली. त्यामुळे नकारात्मकता दूर झाली. त्याचे प्रतीक म्हणून, “तिळगुळ घ्या गोड बोला” असं म्हणून अबोला, नकारात्मकता, राग, द्वेश दूर व्हावेत असे विचार केले जातात. या दिवशी गंगा, गोदावरी, प्रयाग, अशा नदीस्नानाचे महत्त्व जास्त आहे. तरी त्यातही, अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ यासारखे पुण्य संक्रांतीला गंगासागराच्या स्नानाने प्राप्त होते असे समजतात. या दिवशी गंगा स्नान करून दानधर्म केल्यास चांगले फळ मिळते.

वैदिक पंचांगानुसार यावर्षी १४ जानेवारी मंगळवार रोजी ९ वा ३ मी. यावेळी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत आहे. गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त ९ वा. ३ मि. ते ५ वा ४६ मी. पर्यंतचा आहे. यावर्षीचा शुभकाळ ८ तास ४२ मिनिटे तर पवित्रकाळ १ तास ४५ मिनिटे आहे. या काळात सूर्यदेवाची पूजा करावी. यावर्षीचे संक्रांत देवतेचे वर्णन असे केलेले आहे की, तिचे वाहन वाघ, आणि उपवाहान घोडा असून, तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. तिच्या हातात गदा हे शस्त्र असून, कपाळावर केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारी व बसलेली स्थिती आणि वासासाठी जाईचे फुल घेतलेले आहे. ती पायस प्राशन करत आहे. सर्प जातीची असून तिचे भूषण – अलंकार मोत्याचे आहेत. वार आणि नक्षत्र नाम ‘महोदरी’ असे आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य कडे पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात खोटं, कठोर बोलू नये. गवत, वृक्ष तोडू नये. गाई म्हशींची धार काढू नये. दान करताना नवीने भांड, गोग्रास, अन्न, तिळगुळ घालून पात्र, भूमी, सोन, वस्त्र यथाशक्ती दान करावे. सूर्याच्या उत्तरायाणात मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, अशा समजुतीने भीष्मानीही बाणाच्या शैयेवर पडून उत्तरायणाची वाट पाहिली. आणि नंतर संक्रांतीच्या दिवशी देवांना आपला देह दान केला. म्हणून दानाला महत्त्व जास्त आहे. संक्रांतीची सर्व माहिती काल महात्म्यानुसार होणाऱ्या बदलाला अनुसरून असते. हा दिवस भूगोल दिन असून कुंभमेळा प्रथम शाही स्नान दिवस असा आहे.

 संक्रांतीच्या दुसरा दिवस किंक्रांत. या दिवशी देवीने किंकरासुर राक्षसाला

ठार मारले. या दिवसाला ‘करी दिन ‘असेही म्हणतात. भोगी दिवशी पूजा केलेली सुगडी या दिवशी हळदीकुंकू देऊन दान देतात. तसेच भोगीला केलेली बाजरीची भाकरी झाकून ठेवून यादिवशी खाण्याची पद्धत आहे.

 संक्रांतीच्या अशा शुभ, पवित्र आणि गोड दिवशी सर्वांना शाब्दिक तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणूया.

“भास्करस्य यथा तेजो/ मकरस्थस्य वर्धते/

तथैव भवतां तेजो वर्धतामिती कामये/

मकर संक्रांती पर्वण: सर्वेभ्य: शुभाशया://

 ज्याप्रमाणे मकर राशीतील प्रवेशाने सूर्याचे तेज वाढते, त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, आरोग्य, धनधान्य रुपी तेज वाढविणारी ठरो.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनजागृतीच्या मार्गावर – भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ जनजागृतीच्या मार्गावर – भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे

वयाच्या साठाव्या वर्षानंतर म्हणजेच ज्येष्ठ नागरिक (सीनियर सिटीजन झाल्यानंतर) समाजकार्याच्या तळमळीमुळे मी अवयव दानाचे क्षेत्र हे स्वतःचे कार्यक्षेत्र म्हणून निवडले.

अवयवदानाच्या क्षेत्रात कार्य करायचे ठरवल्यानंतर मी माझ्यापरीने अभ्यास करून व्याख्याने व स्थानिक कार्यक्रम यामधून लोकांपुढे जाऊन हा नवीन विषय त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु नंतर लक्षात आले की या बाबतीत जनजागृती करायची असेल तर स्थानिक स्तरावरील तोटके प्रयत्न उपयोगाचे नाहीत. या विषयाला मोठ्या जनजागृतीची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे पदयात्रा या संकल्पनेचा उगम माझ्या मनात झाला. त्यादृष्टीने मी प्रयत्न सुरू केले. फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या संस्थेत सहभागी होऊन या आमच्या संस्थेमार्फत आजपर्यंत एकूण चार पदयात्रा यशस्वी रीत्या पूर्ण केल्या. माझ्या वयाच्या ६६व्या वर्षापासून ७० वर्षापर्यंत या चार पदयात्रां मधून जवळपास ४००० किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन, एकूण पन्नास हजार पेक्षा अधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवू शकलो. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हे पायाखालून घातले. या सर्वांचा अनुभव मिश्र स्वरूपाचा असला तरी एकूण अनुभव उत्साहजनक होता हे नक्की. त्यामुळे माझ्या मनाप्रमाणे काही करू शकलो याचं समाधान आहेच. पण आता सत्तरी पार केली आहे. हळू हळू डोळे आणि कान सहकार्य करण्यासाठी कुरकुरत आहेत. प्रकृती चांगली असली तरी पदयात्रेचा मार्ग कितपत चालू ठेवता येईल याबाबत साशंक आहे. तरीही कार्य चालूच राहील. राहणार आहे आणि राहिले पाहिजे. पण हे प्रयत्न खूपच तोटके आहेत आणि अत्यंत तुटपुंजे आहेत याची नम्र जाणीव मला या पदयात्रांनी नक्कीच करून दिली आहे.

 अवयवदान प्रबोधनाच्या कार्यासाठी अनेक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण होऊन ते मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजेत. आता याचसाठी कार्य करायचे आहे. त्यासाठी या विषयाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या विषयाचे प्रबोधक व कार्यकर्ते निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध स्थानिक स्तरावरील संस्थांमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून या क्षेत्रातील कार्यकर्त्यांची संख्या आणि ज्ञान याची वृद्धी करणे आवश्यक आहे. आम्ही फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या संस्थेतर्फे व केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील रोटो-सोटो च्या सहकार्याने विविध प्रशिक्षण कार्यक्रम व या विषयावरील प्रबोधनपर साहित्य प्रकाशित करणे असे उपक्रम आयोजित करीत आहोत. त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण कार्यक्रमांचे प्रारूप तयार केले गेले आहे.

आता याच कार्यावर भर देण्याचे निश्चित केले आहे. वास्तविक पाहता कोरोनाच्या प्रकोपामुळे व परिस्थितीमुळे एक धडा सर्वांनी शिकणे आवश्यक आहे.

इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये सरकार, सर्व सरकारी यंत्रणा, सर्व मोठे उद्योग व्यवसाय, सर्व स्वयंसेवी संस्था, सर्व प्रसार माध्यमे आणि सर्व सोशल मीडिया या सर्वांमार्फत कोरोना, कोरोना आणि फक्त कोरोना, हाच विषय आणि त्याबाबतची माहिती आणि जागृती याचे सतत प्रयत्न सतत दोन वर्षे चालू आहेत. त्याच्या कायदेशीर अंमलबजावणीसाठी सर्व कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा तसेच आरोग्य यंत्रणा कार्यरत होत्या आणि तेही 24 तास. पण एवढे असूनही असे दिसून येते की लोकांमध्ये जागृती समाधानकारक होत नाही.

आपण बातम्यांमध्ये रोज पाहतच होतो की एवढी प्रचंड जागृती मोहीम चालू असून सुद्धा स्वतःला सुशिक्षित (?) म्हणवणारे परंतु खरे सुशिक्षण नसलेले फक्त विद्याविभूषित असे पांढरपेशे व मध्यमवर्गीय हे सुद्धा या सर्व जागृती मोहिमेपासून फारसा चांगला धडा शिकताना दिसत नव्हते. मग अशिक्षित व हातावरचे पोट असणारे यांची काय स्थिती असेल ही कल्पनाच करावी. त्याचप्रमाणे सांपत्तिक उच्च स्थितीमध्ये असणारे किंवा राजकारणी आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष अशांसारख्या काही व्यक्तीसुद्धा स्वतःच्या संबंधित अथवा वैयक्तिक समारंभाचे आयोजन व नियोजन करताना आणि त्यात सहभाग घेताना दिसत. अशा वेळेला सरकारी यंत्रणांचीही पंचाईत होते. त्यांना यावर काय कारवाई करावी हेच समजेनासे होते. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी त्यांची बिकट अवस्था होऊन जाते. यावरून समाजाला जागृत करणे हे किती प्रचंड अवघड आहे हे लक्षात येते. पदयात्रेच्या निमित्ताने बऱ्याच वेळा हे लक्षात आले आहे की महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांच्यामध्ये सुद्धा बर्‍यापैकी जागृती होऊ शकेल असे दिसते आहे. त्यामुळे एकंदरीत अवयवदानाच्या विषयासंबंधी जनजागृति व्हावयाची असेल तर किमान दोन-तीन पिढ्यांमध्ये तरी सातत्याने हे कार्य चालू असले पाहिजे. जेव्हा तरुण या कार्यात कार्यरत असताना, सामील होताना दिसतात तेव्हा पुढील पिढीत काहीतरी आशादायी घडेल अशा समजुतीला बळ मिळते. म्हणूनच तरुण आणि विद्यार्थी वर्ग यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणे उपयोगी ठरेल. त्या स्पर्धांमध्ये भाग घेणारे तरी निश्चित या विषयाचा अभ्यास करतातच. बऱ्याच वेळेला मी असे पाहिले आहे की शालेय विद्यार्थी जेंव्हा स्पर्धेमध्ये भाग घेत असतात तेव्हा त्या विषयाच्या अभ्यासामध्ये त्यांचे आई वडील सुद्धा सामील झालेले असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांमधून संपूर्ण कुटुंब या विषयाच्या अभ्यासाकडे वळवता येईल.

तरुणांना या विषयाच्या अभ्यासाकडे वळवण्यासाठी या विषयासंबंधीच्या स्पर्धा काही संस्थांनी आयोजित केल्या होत्या. त्या मधूनही आजचे तरुण या स्पर्धेच्या निमित्ताने या विषयाचा अभ्यास करून त्याचे चांगल्या प्रकारे सादरीकरण करू शकतात हे लक्षात येते.

आजकालच्या तरुणांना या विषयाचे योग्य प्रकारे प्रशिक्षण देऊन चांगल्या प्रकारे समाजामध्ये या विषयाचे प्रबोधन करता येऊ शकेल याबाबत शंका नाही. त्यामुळे प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुण कार्यकर्ते तयार करणे हे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे. या गरजेपोटी फेडरेशनचे पुढचे पाऊल हे प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या जागृतीचे असल्यास अवयवदानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागृती घडवून आणता येईल असा विश्र्वास वाटतो.

जनजागृती ज्या समाजपरिवर्तनासाठी करावयाची आहे त्याची दिशा काय असली पाहिजे हे प्रथम ठरवायचे आहे. तरुणांच्या डोळ्यात असलेली भविष्याची स्वप्ने जाणून घ्यायची आहेत. ती स्वप्नं साकार करण्यासाठी त्यांच्या हातांना श्रममूल्यांची जाणीव करून देऊन त्याची जपणूक केली पाहिजे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या त्यांच्या मनात कार्याचं पाखरू हळू हळू फडफडवलं पाहिजे. आकाशी भरारी मारणाऱ्या त्यांच्या मनाबरोबर त्यांच्या पायांना जमिनीशी असलेलं नातं घट्ट करायला शिकवलं पाहिजे.

जमिनीवर रोवून पाय 

आभाळ धरता आलं पाहिजे 

उंच होता आलं पाहिजे 

आभाळ खाली आणलं पाहिजे 

मनात जिद्द धरली पाहिजे

कोणत्याही कार्यासाठी ही जिद्द निर्माण व्हायला हवी. त्या जिद्दीसाठी प्रयत्नशील राहण्याची जाणीव निर्माण केली पाहिजे. या जाणिवेतूनच समाजासाठी कार्य करणारी मने तयार होतील. त्यांचे कडूनच परिवर्तनाला दिशा मिळेल. परिवर्तनाची ही दिशा देण्यासाठी मग इतर समाज घटकांनीही आपापले योगदान देणे आवश्यक आहे.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील देशपांडे 

 उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल. : – organdonationfed@gmail. com;  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “८० वर्षांची तरुणी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “८० वर्षांची तरुणी…☆ श्री जगदीश काबरे ☆

98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांना सांगलीत काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा पार पडला. काकासाहेब गाडगीळ हे नुसतेच राजकारणी नव्हते तर साहित्यिकही होते. ‘ग्यानबाचे अर्थशास्त्र’ लिहिणाऱ्या काकासाहेब गाडगीळ यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार हा लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांना देण्यात एक औचित्य साधले आहे. याप्रसंगी काकासाहेबांचे नातू अनंत गाडगीळ यांनी काका साहेबांच्या आठवणी जागवल्या, त्याच वेळेला ताराबाईंच्या साहित्याचे मर्मही सांगितले.

याप्रसंगी ताराबाई बोलताना अनेक आठवणीत रमल्या. त्यांच्या भाषणात त्यांनी एक महत्त्वाचे उद्घृत केले. ते म्हणजे ‘शिक्षणाने माणूस साक्षर होतो, शिक्षित होतो, पण सुशिक्षित होईलच असे नाही. माणसाला शिक्षणामुळे शहाणपण येईलच असेही नाही. याची बरीचशी उदाहरणे आज आपण अवतीभवती पाहत आहोत. बहिणाबाई निरक्षर होत्या पण त्यांच्यात जे शहाणपण होते ते आजच्या उच्च शिक्षित माणसातही सापडणे दुर्मिळ आहे. मराठीला नुसता अभिजाततेचा दर्जा मिळून उपयोगी नाही तर मराठी माणसाने मराठी भाषा जगवली पाहिजे. याप्रसंगी त्यांनी संस्कृतीची सोपी सुटसुटीत व्याख्या सांगितली. ती म्हणजे ‘मी माझ्या भोवतीचे लोक जसे वागतात ती संस्कृती होय. ‘ 

या 80 वर्षाच्या तरुणीने आपल्या खणखणीत आवाजात जवळजवळ तासभर उत्तम ओघवत्या भाषेत भाषण करून श्रोत्यांना भरभरून वैचारिक मेजवानी देऊन मुग्ध केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. याप्रसंगी त्यांना मिळालेल्या सत्काराची रक्कम त्यांनी संवेदना वृद्धाश्रम, आकार फाउंडेशन या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना दिली. यात त्यांच्या मनाचे मोठेपण तर दिसून येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणही किती खोलवर रुजली आहे हे प्रकर्षाने जाणवते. या नेत्र सुखद आणि मेंदूला वैचारिक खाद्य देणाऱ्या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे…

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आईशी खोटं बोलणारा सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“आईशी खोटं बोलणारा सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कान्हा गोपगड्यांसह एखाद्या गवळणीच्या घरात चोरपावलांनी शिरून शिंक्यावर टांगलेलं लोणी फस्त करायचा! गवळणी यशोदेकडे गाऱ्हाणं मांडायच्या… ती बाळकृष्णाचा कान धरायची… पण मेघःश्याम म्हणायचा… ‘मैं नहीं माखन खायो!’ आणि त्या भोळ्या माउलीला तेच खरं वाटायचं… ती उलटून गोपिकांना म्हणायची… ‘तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी!’

याचीही आई अशीच भोळी यशोदा… पोरगं नुकतंच फौजेत गेलं आहे. काही महिन्यांसाठी त्याला विशेष लढाऊ विभागात पाठवलं गेलं आहे… अतिरेक्यांशी प्रत्यक्ष लढण्याचा अनुभव यावा म्हणून. हा कालावधी लवकरच पूर्ण होणार आहे. तिथून तो माघारी आला रे आला की त्याला चतुर्भुज करण्याचा चंग यशोदेने बांधला आहे.

ती रोज त्याला विडिओ कॉल करून त्याची याची देही याची डोळा ख्यालीखुशाली विचारल्याशिवाय झोपायची नाही.

त्या दिवशीच्या रात्रीही तिने त्याला फोन लावलाच. आधुनिक सोय आहे आणि शक्य आहे तर का नाही बोलायचं लेकाशी? तो बालवर्गात जायचा तेंव्हा ही त्याची शाळा सुटेपर्यंत व्हरांड्यात बसून राहायची शाळेच्या. एकुलता एक, नवसाने झालेला मुलगा तो.. नाव दीपक ठेवलं होतं… कुलदीपक. दोन मुलींच्या पाठीवर झालेला दीपक!

फोन लागला… दीपक बनियान वरच निवांत बसलेला दिसला तिला. नेहमीचा संवाद सुरू झाला मायलेकात.

“दीपक, बेटा, सब ठीक?”

“हां मां, सब ठीक! शांती है!”

“खाना खाया?”

“हां मां!”

आणि असंच बोलणं होत राहिलं… “लवकर सुट्टीवर ये.. तू मामा झाला आहेस… भाचा वाट पाहतोय मामाची! तुझ्या विना घर सुनेसुने वाटते!”

“हां मां.. बस यहाँ का काम पुरा होते ही घर आऊंगा! बस, अब देर हो रही है! तुम सो जावो!”

“और, तुम बेटे? कब सोने जावोगे?”

“बस मां, अभी सोने ही जा रहा था! अच्छा, गुडनाईट!”

कॅप्टन दीपक, राष्ट्रीय रायफल्स. जम्मू – काश्मीर मध्ये तैनात. २०२० मध्ये भरती. वय चोवीस. वडील उत्तराखंड मध्ये पोलिस अधिकारी.

आईशी दीपक विडिओ कॉल वर असताना लांबून स्क्रीनमध्ये डोकावणाऱ्या वडिलांच्या नजरेतून काही गोष्टी सुटायच्या नाहीत! दीपक जरी बनियान घालून बसलेला दिसत असला तरी मागे त्याचे मळलेले बूट दिसताहेत… रायफल टेकवून ठेवलेली असली तरी वापरलेली दिसते बरीच! मागे त्याचे सहकारी थकून भागून बसलेले दिसत आहेत!.. दिपकच्या डोळ्यांत लालसर झाक दिसते आहे आणि आवाजात काहीसा कंप.

दीपक खोटं बोलतोय आईशी! दिवसभर मोहिमेवर होता… आणि आज रात्रीही निघायची तयारी सुरू आहे… आणि आईला म्हणतोय… झोपायला निघालो आहे!

दिपकच्या वडिलांनी पोलिसातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. ते आपल्या मुलाला पुरते ओळखून आहेत… दीपक धाडसी आहे, पुढे होऊन नेतृत्व करणारा आहे. स्वतः प्रयत्न करून सैनिक अधिकारी झाला आहे. काश्मीर मध्ये गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी अतिरेक्यांची घुसखोरी वाढली आहे.. काही सैनिक व अधिकाऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे.

दीपकचे वडील टीव्हीवर काश्मिरच्या बातम्या लागल्या की टीव्ही बंद करून टाकायचे दीपकची आई खोलीत आली की!

त्याच रात्री कॅप्टन दीपक अतिरेकीविरोधी शोध आणि नाश मोहिमेवर गेला… अतिरेक्यांना शोधले… पुढे होऊन एका अतिरेक्याच्या मेंदूत चार गोळ्या डागल्या… पण बदल्यात आपल्या छातीवर तीन गोळ्या झेलल्या… आणि तरीही लढत राहिला… मोहिमेचे नेतृत्व करीत राहिला!

साथीदारांनी इस्पितळात पोहचवले…. रात्री आईला सांगितल्याप्रमाणे झोपी गेला… कायमचा! एका कुळाचा एक कुलदीपक विझून गेला!

रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे काश्मिरात. या काळोखात जीव तळहातावर घेऊन तरुण कोवळे अधिकारी, जवान मृत्युला आव्हान देत असतात! त्यांना तुमचे आशीर्वाद पाहिजेत!

स्वातंत्र्यदिनाच्या आधल्या रात्री कॅप्टन दीपक सिंग हुतात्मा झाले ! भावपूर्ण श्रद्धांजली !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझी पूजा अपूर्ण आहे !!! – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझी पूजा अपूर्ण आहे !!!… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो !

पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो ! 

पण त्या पांढर्‍या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो ! 

पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज मी देवाजवळ दिवा लावतो ! 

पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो ! 

पण संसारतापाने मंदपणे जळत असताना 

चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही 

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो !

पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो !

पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो !

पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो ! 

पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो ! 

पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद

परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उत्तरायण… लेखिका : सुश्री धनश्री लेले ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ उत्तरायण… लेखिका : सुश्री धनश्री लेले   ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

उत्तरायण… 

नवीन वर्ष सुरु होताना आनंद तर असतोच मनात पण

काळाच्या माळेतला एक एक वर्षरुपी मोती घरंगळत चाललाय…हाही विचार मनात येतो… . खरंतर रोजच दिवसाचा मोती घरंगळतो….  मावळणारा सूर्य रोजच एक मोती घेऊन जातो… आयुष: खंडं आदाय रवि: अस्तं गमिष्यति || हे जितकं खरं तितकंच रवींद्रनाथ म्हणतात तसं, रोजचा सूर्य नवीन, त्याचा लालिमा नवीन, त्याच्या दिशेने आकाशात झेपावणारी पक्ष्यांची रांग नवीन…..

 

जगातली प्रत्येक गोष्ट नवीन आहे , क्षणाक्षणाला बदलणारी आहे,

नाविन्य हा जगाचा प्राण आहे. आकाश जुनं आहे पण त्यावर येणारे मेघ नवीन आहेत. समुद्र शतकानुशतकं तोच आहे पण त्यावर येणारी प्रत्येक लाट नवीन आहे. वृक्ष तेच आहेत पण पालवी नवीन आहे. आणि अध्यातामातलं उदाहरण द्यायचं तर आत्मा तोच आहे , देह मात्र नवीन आहे. हा जुन्या नव्याचा संगम आहे..

 

शायरा संगीता जोशी यांची ओळ आठवते …

तू भेटशी नव्याने …. बाकी जुनेच आहे …

 

सगळं तेच आहे पण दररोज आपण नवीन आहोत का नाही? आपलं मन नवीन आहे कि नाही? आपला उत्साह नवीन आहे का नाही?

 आपण नव्या दमाने नवीन दिवसाचं स्वागत करायला तयार आहोत का नाही?

आपण नवीन होऊन या जगाला भेटायला तयार आहोत का नाही?  हे तपासून पाहायला हवं ….

 

नवीन वर्षाचं स्वागत नव्या उत्साहाने, नवीन आशेने, नवीन स्वप्नांनी आणि नवीन संकल्पांनी करायला हवं …. जणू मागचं विसरून पुन्हा नवीन  होण्याची संधी. . नवीन संकल्पांची नवीन संधी …

 

उत्तरायण सुरु झालंय… या उत्तरायणाचा महिमा केवढा .. इच्छामरणी भीष्म थांबले होते प्राण सोडायचे.

 उत्तरायणात मरण आलं तर चांगली गती मिळते म्हणे … मरणानंतर कशाला ? जगताना हि चांगली गती मिळण्यासाठी उत्तरायणच हवं…

 

 हे उत्तरायण भोगोलिक नाही तर मानसिक हवं. उत्तर किती सुंदर शब्द .. तृ म्हणजे तरणे आणि उद् म्हणजे वरच्या दिशेला वरच्या दिशेने तरुण जाणे म्हणजे उत्तर आणि असा कायम वरच्या दिशेने चालायचा मार्ग {अयन) म्हणजे उत्तरायण सतत वरच्या दिशेने, सतत प्रगतीशील, सतत आपल्यात सुधारणा करीत उच्च ध्येयाच्या उत्तर दिशेने एक एक पाउल टाकणे म्हणजे मानसिक उत्तरायण ! असं उत्तरायण दर दिवशी , दर क्षणी ही होऊ शकतं.

 

मानसिक उत्तरायण घडलं की चैतन्याच्या नद्या प्रवाहित होतात, निरुत्साहाचं बर्फ वितळतं, हिरव्यागार विचारांची पालवी फुटते… आणि मुख्य म्हणजे आनंदाचा सूर्य उगवतो….

 

आनंद हा आपला स्थायीभाव आहे. कारण आपल्या अध्यात्म संकल्पनेनुसार आपल्यात वास करणारं ते चैतन्य म्हणजे सत् चित् आनंद आहे …

आपण आहोत म्हणजे सत्, आपण चैतन्ययुक्त आहोत म्हणजे चित् … आणि आपल्या सगळ्यांना हवा असतो तो आनंद …

 प्रत्येकाच्या आनंदाचं कारण वेगळं, त्याचं प्रमाण वेगळं…. पण सगळ्यांना आपली ओंजळ आनंदाने भरून जावी असंच वाटत आणि .

.हा आनंद आपला आपल्यालाच मिळवायला लागतो… छोटे छोटे खडे भरलेल्या माठात पाणी घातलं तर आधी ते पाणी खाली जातं आणि मग खड्यांच्या फटीतून वाट काढत काढत ते हळूहळू पृष्ठभागावरती येतं.. आनंदाचंही असंच आहे..

 प्रश्न, समस्या, शंका, अडचणी, अडथळे या सा-या खडकांच्या फटीफटीतूनच तो शोधावा लागतो..

मग तो आपसूक मनभर पसरतो, चेह-यावर दिसतो… स्वानंद हाच खरा आनंद …

आपल्या अंगणातलं आनंदाचं झाड सतत बहरात राहो हि शुभेच्छा … नवीन वर्षाच्या शुभेच्छांसहित!

लेखिका सुश्री धनश्री लेले

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मय्यत… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मय्यत… ☆ सुश्री शीला पतकी 

सकाळीच साडेसात वाजता मोबाईल वाजला.  खरं तर हल्ली पहाटे छान झोप लागते आणि मग उठायला जरा उशीरच होतो… दिवसभर करायचं काय? त्यामुळे जरा निवांतपण चालू आहे…. मी फोन घेतला … कामवाल्या बाईचा फोन …बाई शेजारी मयत झाली, मी येत नाही ….मी रागाने  फोन बंद केला.  सकाळी उठून कसले फोन करतात …  बरं कोणाचं तरी कुणीतरी मेलेलं असतं, पण ह्यांना तिथे जाणं अगदी जरुरीचेच आहे .मी नवीन कामवाली बाई ठेवताना तिला पहिला प्रश्न विचारला .. ‘ तुझं नाव काय आणि कुठे राहतेस? ‘ कारण तिचा आमचा पाण्याचा वार एक येऊ नये यासाठी ही धोरणात्मक हुशारी …दुसरा प्रश्न विचारला ‘ महिन्यातून मयत किती? ‘ ….. तिला काही कळलं नाही.  ती गोंधळून गेली .. ‘ म्हणजे मयत झाले असे सांगून किती वेळा जाणार आहेस.’ . त्यावर तिचं केविलवाणं उत्तर.. ‘ आम्हाला जावंच लागतं बाई .. ते काय असंच आता सांगता येतं का.’ .. मी म्हटलं ‘ का ग तुम्ही गेला तर ते काय उठून उभारणार आहे ? का काम करावीत मग ?  जावं …. तिथे जाऊन काय करता तुम्ही ? काहीच नाही … एकाला एक आवाज काढून रडत बसायचं.  त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम सुद्धा नसतं,  मग असं का वागता ? पहिल्यांदा कर्माला महत्व द्यावं …..! ‘ डोंबलाचं कर्म … तिला काहीच कळत नव्हतं.  ती म्हणाली, ‘ बाई आम्ही जर गेलो नाही तर आम्हाला कोण येणार ? ‘ .. ‘ अग तुला कुठे दिसणार आहे ..? ‘  हा वाद खूप वेळ चालला ती आपल्या उत्तरावर ठाम होती की मयत झालं तर मला जावं लागणार …  सगळेच तसे …  त्यामुळे मी तिला नाकारू शकत नव्हते .

मग त्या शब्दावरून लहानपणीचा एक प्रसंग मला आठवला.  सहा-सात वर्षांचि मी असेन.  वडिलांबरोबर कार्यक्रमाला जात असे.  वडील एका सायकलवर आणि आमच्याकडे साथीदार असलेला डोके नावाचा मुलगा दुसऱ्या सायकलवर होता… त्याच्या सायकलवर मी डबल सीट बसलेली.  वडील थोडे पुढे निघून गेले, आम्ही थोडे मागे होतो.  एके ठिकाणी पोलिसांनी डबल सीट म्हणून आम्हाला पकडले आणि दंड काढा म्हणून सांगितले.  याच्याजवळ पैसे नव्हते, मला तर काहीच कळत नव्हते.  मी त्यांच्या तोंडाकडे बघत होते.. आधी पोलीस म्हणल्यावर मी घाबरून गेले.. तो डोके म्हणाला ‘ नाही हो बच्चे की मा मर गई है .. मयत मे जाना है .. बच्चे को मावशी की घर से लाया हु ‘ …. पोलीस हळहळला .. ‘ अरे अरे कितने छोटी बच्ची ‘ .. त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि आम्हाला सोडून दिलं … मला काही हा प्रकार कळला नाही.  फक्त एवढं कळलं की त्याने मयत हा शब्द वापरला होता.. माझ्या मनात त्या शब्दाविषयी कुतूहल होते.  असा या शब्दाचा काय अर्थ होता की सरकारी पोलीस सुद्धा हळहळला .. त्याने माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि आम्हाला दंड न करता सोडून दिले.  म्हणजे काहीतरी महान शब्द असावा.  दोन दिवस मी त्याच्यावर विचार करत होते.  दोन दिवसांनी मी वडिलांना एकदा विचारलं.. ‘ दादा मयत म्हणजे काय हो? ‘ वडील म्हणले ‘ तुला काय करायचे, कोणी सांगितलं तुला हे ‘ .. मग मी झाला प्रसंग सांगितला.  वडील म्हणाले ‘ काही तसं नसतं.  तुझ्या आईकडे तू निघाली आहेस अस त्याने सांगितलं.’ पण मला ते काही फारसं पटलं नाही.  

पुढे दोन चार दिवसांनीच आमच्या तिथल्या मशिदीवरून अनाउन्समेंट झाली….’ इनके घर मयत हो गयी है और मयत दो बजे निकलेगी ‘ .. मला कळेना की मशिदीतला माणूस आईला भेटायला जायचे हे माईक वरून सगळ्यांना का सांगतो आहे आणि त्या दिवशी मला मयतचा खरा अर्थ कळला.  मयत म्हणजे माणूस मेलेले असणे.  मात्र मला खूप वाईट वाटले की आमच्या त्या डोके नावाच्या माणसाने माझ्या आईला मारले …. केवळ दंड भरावा लागू नये म्हणून.  मग मी त्याला मात्र लहान असूनही बोलले व ‘ तुम्ही आमच्या आईला मारता काय ‘ आणि मी आईला गच्च मिठी मारली !… 

कुठल्या शब्दाचे अर्थ संदर्भ आपल्याला कधी आणि कसे लागतील ते काही सांगता येत नाही.  अगदी 70 व्या वर्षी सुद्धा काही शब्द नव्याने कळले आहेत.  असो … ‘ मयत ‘ या एका शब्दावरून आज खूप काही आठवलं आणि तेच समोर लिहिलं.  असला विषय आवडला का म्हणून विचारलं खरं ..  नाही ना,  असो….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ राष्ट्रमाता जिजाबाई… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ राष्ट्रमाता जिजाबाई… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

आज विलक्षण योगायोग आहे. आज एका ‘वीरमाते’चा आणि एका ‘संन्यासी योद्धा’ यांचा जन्मदिन आहे. आपल्या लक्षात आलेच असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. हो, आपल्या मनात आहे तेच ..  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई आणि बंगालमधील भुवनेश्वरी देवींच्या पोटी जन्माला आलेले नरेंद्र दत्त .. अर्थात ज्यांनी पारतंत्र्याच्या काळात आपल्या उण्यापुऱ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात हिंदू धर्म साऱ्या जगाला समजावून सांगितला ते स्वामी विवेकानंद !!!

जिजाबाईंचा काळ लक्षात घेतला तर सुलतानी आणि अस्मानी संकटाचा. जिथे जिजाबाईंच्या जाऊबाईंना (सरदार शहाजीराजांच्या वहिनीला) गोदावरीच्या घाटावरून मुसलमान सरदारांनी पळवून नेली होती, तिथे सामान्य मनुष्याची आणि त्या काळातील आयाबहिणींची अवस्था काय असेल याची कल्पना केली तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो. “मोगलाई आहे का ?” असा प्रश्न जिथे दमनशाही होते, तिथे विचारला जातो. पण त्याकाळापासून हा शब्द प्रचलित आहे म्हणजे त्या शब्दाची दाहकता त्यावेळेला किती असेल, याची आपण कल्पनाच केलेली बरी. आजच्या पिढीला ‘मोगलाई’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यांना बाराव्या शतकापासूनचा इतिहास अभ्यासावा लागेल.

संत ज्ञानेश्वरांपासून भागवत धर्माची, म्हणजेच भक्तिमार्गाची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली गेली… .. 

…. “ज्ञानदेवें रचिला पाया, तुका झालासे कळस।” 

सात्विक शक्तीचे बीज संवर्धन करण्याचे काम एका अर्थाने बाराव्या शतकापासून सुरु झाले. त्या काळातील संतांनी राजकीय सुधारणांच्या मागे न लागता व्यक्तिगत साधना (पारमार्थिक), शुचिता, भक्तिमार्गातून समाजाचे संघटन, किर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन, कुरुढींचे उच्चाटन करण्याचे महत्त्वाचे कार्य केले… .. त्या काळात ‘शंभर वेळा थुंकणाऱ्या यवनाला प्रतिकार न करता तुझ्यामुळे मला शंभरवेळा गोदावरीचे स्नान घडले’ असे म्हणणारे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज त्या काळात होऊन गेले .. 

तसे  ” नाठाळाच्या माथी हाणू काठी” म्हणणारे संत तुकाराम देखील झाले. 

तसेच “शक्तीने मिळती राज्ये, शक्ती नसता विपन्नता” असे म्हणणारे समर्थ रामदास सुद्धा समकालीन संत होत… ..  शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यावेळेस प्रतिकार करु शकत नसतील असे वाटत नाही, पण त्या काळातील संतांचे चरित्र बघितले तर प्रत्येकाचे जीवन हे त्यावेळेच्या समाजपुरुषाचे प्रतिबिंब दाखविणारे होते. संत एकनाथांच्या काळात एका अर्थाने निद्रिस्त असलेल्या हिंदू समाजाचा स्वाभिमान संत तुकारामया आणि समर्थ रामदासांच्या काळात थोडा अधिक जागृत झालेला होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. या सर्व संतांच्या मांदियाळीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि म्हणूनच आपण आज हिंदू म्हणून अभिमानाने जगत आहोत. 

नारळाचे रोप कोंब फुटून वरती यावयास सहा महिने लागतात, त्यांनंतर ते रोप जमिनीत लावले तर नारळ (फळ) यावयास सामान्यपणे दहा वर्षे लागतात. इथे तर सामान्य मनुष्य अतोनात हालआपेष्टा सहन करीत जीव मुठीत धरून जगत होता. ‘स्वाभिमान’ नावाचा एखादा गुण असतो, हे सामान्य मनुष्याच्या ध्यानीमनीही नव्हते. अशा निद्रिस्त मनात भक्तिमार्गाच्या सहाय्याने संतमंडळींनी स्वत्वाचे, सात्विकतेचे बीज आधी पेरले, रुजवले आणि मग विकसित केले आणि याचे मूर्तीमंत, तेज:पुंज उदाहरण म्हणजे श्रीमानयोगी छत्रपती शिवाजी महाराज !!!

अंगी पराक्रम असताना आपले सरदार जहागिरी आणि वतनासाठी आपल्याच भाऊबंदाना छळत होते आणि परक्या मोगलांची चाकरी करीत होते. या सर्वाला प्रतिकार करणारा कोणी तरी सुपुत्र तयार करावयास हवा. जिजाबाईंनी ही सर्व परिस्थिती अभ्यासली आणि आपल्या मनाशी पक्की खूणगाठ बांधली. हिंदूंचे स्वतःचे सिंहासन असावे, हिंदू राजा होऊ शकतो हे साऱ्या भरतवर्षाला कळावे असा संकल्प जिजाबाईंनी केला आणि ‘याची देहि याचीडोळा’ सत्यात उतरवला. जरी तो काळ मोगलाईचा होता तरी आपला पूर्व इतिहास हा विजयाचाच होता.  त्यांनी विजयाचा इतिहास आपल्या मुलाला शिकविला. रामाने पत्नीला पळवणाऱ्या रावणाला वानरांची सेना संघठीत करून स्वसामर्थ्याने  युद्धात मारले, अर्जुनाने युद्ध करून आपले धर्माचे राज्य मिळविले, हे शिकविले. कोणतीही गोष्ट किमान दोन वेळा तरी नक्की घडते. त्या प्रमाणे जिजाबाईनी ‘शिवाजी’*ला प्रथम आपल्या मनात जन्मास घातले आणि त्याप्रमाणे आपल्या मुलास घडविले. एक *’आई*ने मनात ठरवले तर काय करु शकते ते छत्रपतींकडे बघितले की लक्षात येते. अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस “मेलास तरी चालेल पण शत्रूला मारल्याशिवाय परत येऊ नकोस” असे म्हणणारं आईचे मन किती कर्तव्यनिष्ठुर असेल. माझ्या अनुमानाप्रमाणे त्याकाळात प्रत्येक घरात एकतरी ‘जिजाऊ’ नक्की असेल. कारण ज्याप्रमाणे वर्गात एकाचाच प्रथम क्रमांक येतो, त्याप्रमाणे *एकच शिवाजी झाला आणि बाकीचे त्यावेळेच्या गरजेनुसार कोणी सरदार झाले तर कोणी मावळे झाले. शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार होणारे मावळे हे अर्धपोटीच होते, पण त्याच्या माता ह्या जिजाबाईंप्रमाणे शूर होत्या, म्हणून त्यांना आपल्या मुलाच्या ‘करिअर’ची चिंता नव्हती. हिंदवी स्वराज व्हावे ही जशी श्रींची इच्छा होती तशी ती सामान्य मनुष्याची देखील होती. आणि ही ‘ईच्छा’ सामान्य मनुष्याच्या अंतरात प्रकट करण्याचे श्रेय निश्चितच जिजाबाईंना द्यावे लागेल. आणि म्हणूनच त्या काळातील सामान्य आई देखील स्वराज्य हेच मुलाचे ‘करिअर’ मानू लागली. आणि जिजाबाईंप्रमाणे ती देखील लेकराला स्वराज्यासाठी खुशाल बलिदान दे आणि घाबरुन पळून आलास तर मला तोंड देखील दाखवू नकोस असे ठणकावून सांगू लागली. 

आजची परिस्थिती फार वेगळी आहे अशातला भाग नाही. फक्त आक्रमकांचे मुखवटे आणि स्वरुप बदलले आहे. सर्वांचे ध्येय एकच आहे ते म्हणजे हिंदुस्तानचा, हिंदूधर्माचा नाश. आज ‘आई’ होणे हे ‘चूल आणि मूल’*ह्या चौकटीत अडकणे, अशा पद्धतीने समाजात प्रस्तुत केले जात आहे. खरंतर ‘आई’ होणे हा प्रत्येक स्त्रीचा निसर्गदत्त विशेषाधिकार आहे. स्त्री जातीचा *’आई’ असणे हा खूप मोठा गौरव आहे. स्त्रीच्या अर्धनग्न देहाचा विविध उत्पादनांच्या जाहिरातीसाठी उपयोग करणाऱ्या तथाकथित पुढारलेल्या समाजाला मुलींनी ‘आई’ व्हावं, आईपण आयुष्यभर निभवावे, चूल आणि मूल सांभाळावे हे मागासलेपणाचे निदर्शक वाटते. याला काय म्हणावे ? स्त्रीच्या कर्तृत्वाबद्दल निदान भारतात तरी कोणी संशय घेऊ नये. कारण ती यमावर विजय मिळवणारी ‘सावित्री’  झाली , ती ‘गार्गी’ झाली, ती ‘मैत्रेयी’ झाली, ती ‘झाशीची राणी’ झाली, ती ‘अहिल्याबाई होळकर’ झाली, ती ‘अरुणा असफली’ झाली, ती ‘इंदिरा गांधी’ झाली. ती काय झाली नाही असे नाहीच. पण ती चूल आणि मूल यातच अडकली होती किंवा अडकवली गेली होती असे म्हणणे मात्र फार मोठी शोकांतिका आहे.  आपल्याकडे कर्तृत्ववान स्त्रियांची महान परंपरा आहेच.  पण त्यापेक्षा मोठी परंपरा आपल्याकडे जिजाबाईंसारख्या मातांची आहे. स्वामी विवेकानंदांची आई, सरदार भगत सिघांची माता, स्वा. सावरकरांची आई, चाफेकर बंधूंची आई, सर्व क्रांतीकारकांच्या माता, डॉ. रघुनाथ माशेलकराची आई, थोडक्यात सर्व महान पुरुषांच्या माता. कारण चांगल्या प्रतीच्या झाडासच रसाळ आणि मधुर फळे येतात. इकडे शिवजयंतीला  महाराज !! तुम्ही परत या, असं म्हणायचं ? आणि दुसरीकडे स्त्रीभ्रूणहत्या करायची, स्त्रियांवर, लहान लहान मुलींवर अत्याचार करायचे, असं आता चालणार नाही.  समजा छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न झाले आणि मी जन्म घेतो असे म्हणाले तर आपल्याकडे जिजाबाई कुठे तयार आहेत?

आजच्या शुभदिनी आपण सर्वांनी आपल्या घरात, परिवारात ‘जिजाबाई’ कशा घडवता येतील असा संकल्प करुया. मग शिवाजी महाराज आणि मावळे नक्कीच जन्माला येतील यात शंका नाही. 

राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या चरणी माझे साष्टांग दंडवत… 

छत्रपती शिवाजी महाराजकी  जय।।। 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “थेंबे थेंबे… वीजही वाचे…” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “थेंबे थेंबे… वीजही वाचे…”  ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

‘मोबाईल चार्जर मोबाइलला लावला नसेल, पण बटन चालू असेल तर वीज वापरली जाते का? ‘ 

…हाच प्रश्न टीव्ही, एसीसारख्या उपकरणांसाठी लागू होतो. ज्यांचे बटन चालू असते, पण वापर सुरू नसतो, तर वीज वापरली जाते का?

वीजनिर्मिती होते त्या ठिकाणी एसी वोल्टेज तयार होते आणि ते आपल्या घरापर्यंत त्याच रूपात पोहोचते. जवळ जवळ सगळीच आधुनिक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरणे डीसी वोल्टेजवर काम करतात. मग या उपकरणांना एसी वोल्टेजपासून डीसी वोल्टेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी काही कन्व्हर्टर सर्किट वापरले जाते. यामध्ये रोहित्र (Transformer), रेक्टिफायर, फिल्टर या तिघांचा वापर होतो.

आता चार्जरचं उदाहरण घेऊ. हे कसं काम करते?  ….                                     

चार्जर ५ वोल्ट डीसी आपल्या मोबाईलला देतो. आपण चार्जरला २३० वोल्ट एसी देतो. मग रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) या २३० वोल्ट एसीचे १२ वोल्ट एसीमध्ये रूपांतर करतो. कमीत कमी विजेचे नुकसान करून हे रूपांतर करणे रोहित्राचं (ट्रान्सफॉर्मर) काम. मग रेक्टिफायर नावाचे सर्किट डायोड वापरून एसीचे डीसी वोल्टेजमध्ये रूपांतर करते. चार्जर मोबाईलला लावले नसेल तर रेक्टिफायर, फिल्टर व बाकी सगळं काही काम करत नाही व ऊर्जाही वापरत नाही, पण रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) मात्र आपलं काम करत राहतो. कारण रोहित्रामध्ये (ट्रान्सफॉर्मर) प्राथमिक आणि दुय्यम वायडिंग असतात. प्राथमिक वायडिंमधून विजेचा प्रवाह चालूच असतो. मग तुम्ही चार्जर वापरात असाल किंवा नसाल.

१ साधा ५ वॅटचा चार्जर जर बटन बंद न करता दिवसभर चालू राहिला, तर १ वॅट ऊर्जा वाया जाते. चार्जर सुमार दर्जाचा असेल, तर २०% अजून ऊर्जा वाया जाते. वर्षभर असं होत राहीलं, तर ३६५ वॅट ऊर्जेचं नुकसान. ६ रुपये एका युनिटची किंमत पकडली तर जवळपास २००० रुपयांची वीज वाया जाते. पैशामध्ये मोजलं तर जास्त वाटत नाही. पण कित्येक घरांमध्ये असे कित्येक चार्जर चालू सोडले जात असतील. १ किलोवॅट ऊर्जा वातावरणात १ पाउंड कार्बन डायॉक्सिड उत्सर्जित करते. जगात फक्त या चार्जरमुळे लाखो किलोवॅट ऊर्जा वाया जाते आणि त्याजोगे हरित वायूंचे नाहकच उत्सर्जन होते.

मोबाईलच्या चार्जरचे बटन बंद न करणे, हे अज्ञान किंवा आळस असू शकतो. आळसाला काही पर्याय नाही, पण तुम्हाला आतापर्यंत वाटत असेल, की चार्जर न लावता बटन चालू ठेवल्यामुळे ऊर्जा वापरली जात नसेल, तर तो तुमचा गैरसमज आहे, म्हणून आतापासून चांगली पर्यावरणपूरक सवय अंगीकारूया व चार्जरचे बटन बंद ठेऊ या.

जुने चार्जर ५ वॅटचे आहेत, पण नवीन येणारे चार्जर ३० वॅटपर्यंत येतात. ६ पट ऊर्जा म्हणजे ६ पट नुकसान. आधी घरात सगळ्यांचे मिळून एक चार्जर असायचे, पण आता प्रत्येकाचा एक किंवा आळशी लोकांचा प्रत्येक खोलीमध्ये एक चार्जरसुद्धा असतो. त्या हिशेबाने प्रत्येक व्यक्तीकडून किती ऊर्जेचा अपव्यय होतो, याचा विचार करण्याची गरज आहे. भारतात नेहमीप्रमाणे हा उपेक्षित विषय आहे. पण युरोपियन देशांनी १ वॅट धोरण अवलंबले आहे, म्हणजे उपकरणाचे बटन बंद नसेल केलं तर १ वॅटच्या वर ऊर्जा वापरू नये. तसे कायदे आहेत. विजेची मागणी आणि वापर वाढतच आहे.  त्या अनुषंगाने आपल्याला या गोष्टीचा भविष्यात गांभीर्याने विचार करावा लागेल, हे नक्कीच.

मोबाईल चार्ज करत नसाल, तर बटनसुद्धा बंद करा. कारण तो थोडी का होईना वीज वापरतोच. म्हणून शक्य तेवढ्या सर्व उपकरणांना हा नियम लागू करू या. ऊर्जेचा अपव्यय टाळू या, कारण ‘उर्जा बचत’ हीच उर्जा निर्मितीही असते.

चार्जर एक उदाहरण आहे. सर्व इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, लॅपटॉपसाठी वरील नियम लागू आहे. बटन बंद करणे अथवा शटडाऊन करणे, हाच पर्याय आहे.

*आजवर माहीतच नव्हतं हे ठीक आहे! पण आता हे माहित झालं आहे ना? तर किमान आपण आजपासून ठरवूया की, काम नसेल तेव्हा बटन बंद करुया. असा निर्धार केला तर पहा किती मोठा बदल घडू शकेल. थेंबाथेंबातून फक्त तळेच साचत नसते, तर वीज देखील वाचत असते !                            

विचार करा !!…     

(महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) तर्फे ) 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares