मराठी साहित्य – विविधा ☆ फिरूनी नवी जन्मेन मी ☆ सौ. अंजली गोखले

☆ विविधा ☆  फिरूनी नवी जन्मेन मी ☆ सौ. अंजली गोखले ☆

सकाळपासून गल्लीमध्ये काहीतरी विचित्र हालचाल जाणवत होती. त्या वृक्षाच्या आसपास ज्यांच्या गाड्या होत्या त्या हलवण्यासाठी सगळ्यांना फोन केले गेले. कुऱ्हाडी, मोठाले दोर घेऊन माणसे झाडाभोवती गोळा झाली होती.. सगळेजण  वर बघून बघून निरीक्षण करत होते.  अन ते दृश्य बघून माझ्या मनात चर्र झाले.संशयाची पाल मनात चुकचुकली. आम्हा  मैत्रिणींना जे होऊ नये असे वाटत होते तेच घडणार होते.

काही वर्षापूर्वी मुद्दाम कोणीही वृक्षारोपण न करता समोरच्या बिल्डींगच्या बाहेर एक इवलेसे झाड वाढायला लागले होते. ना कोणी त्याला पाणी घालत होते, ना कोणी त्याची निगा राखत होते.बघता बघता त्याचे खोड गलेलठ्ठ झाले,वेगाने त्याच्या फांद्या इतस्ततः फैलावत गेल्या. छोट्या-छोट्या हिरव्यागार पानांनी डोळ्यांना गारवा दिला.ते झाड अलगदपणे सावली द्यायला लागलं. रखरखीत उन्हामध्ये जाणा येणाऱ्या ला दोन मिनिटांचा का होईना. पण शांतपणा जाणवायला लागला.

झाडाच्या टोकाला झिप्री गुलाबी नाजूक नाजूक फुले डोलायला लागली. आमच्या मनाला ते झाड आनंद,विसावा,गारवा द्यायला लागलं. पण त्याच वेळी याच वाढलेल्या फांद्या मुळे बिल्डिंग मध्ये अंधार पडायला लागला. झाडाच्या पानांची पानगळ होऊन घरामध्ये उडून येऊन कचरा व्हायला लागला. झाडणार्‍या म्युनिसिपालिटीच्या कामगारांनाही त्या वाळक्या पानांचा कचरा त्रासदायक व्हायला लागला. रोज त्या झाडाला शिव्या घालत घालत, झाडून वाळलेली पाने त्याच झाडाच्या बुंध्यापाशी जाळायला सुरूवात झाली. बिचारे झाड ते चटके सहन करत होते. आपला देण्याचा स्वभाव ते सोडत नव्हते  की चटके देणाऱ्याला शिव्याशाप मुळीच देत नव्हते.

एकदा अशीच एक माकडांची टोळी आली. त्या झाडावर उड्या मारुन मारुन धुमाकूळ घालायला सुरुवात केली. बिल्डिंगच्या गॅलरीमध्ये त्यांनी हैदोस घातला आणि झाडाबद्दल चा लोकांचा दुस्वास वाढायला लागला. सगळ्यांना ते नकोसे झाले. त्या झाडाच्या सावली पेक्षा,त्या शीतल गारव्या पेक्षा लोकांच्या डोळ्यांमध्ये तिरस्काराचे अंगारे फुलत गेले.

अखेर बहुमताचा विजय झाला आणि त्या आमच्या लाडक्या,डेरेदार हिरव्यागार वृक्षावर सपासप कुऱ्हाड चालवायला सुरुवात झाली.बघता बघता झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळत होत्या.वेदनांचे घाव झेलत तो वृक्ष निर्दयी माणसापुढे शरण येऊन आपली होणारी कत्तल मुकाट्याने सहन करत होता. ज्या इवल्याशा रूपाचे डेरेदार वृक्षा मध्ये रूपांतर व्हायलाअनेक वर्षे लागली,तोच डेरेदार वृक्ष बिना फांद्यांचा बोका बोका दिसायला लागला काही तासांमध्ये!

हाच तो वृक्ष होता जो हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेत होता आणि आम्हाला हवा असलेला ऑक्सिजन फुकट देत होता. जो आपल्या हिरव्या पानांच्या मदतीने आपले अन्न आपणच बनवत होता. त्यांनी आमच्याकडे कधीही भीक मागितली नव्हती, “द्या हो आम्हाला खायला. द्या हो आम्हाला पाणी प्यायला”. आपल्या मुळां वाटे आपल्यालालागणारे पाणी आपल्या पण तो मिळवत होता. उंच उंच गेलेल्या फांद्यांच्या शेवटच्या पानापर्यंत ते पाणी पोहोचवत होता.

त्याच उंचीपर्यंत पाणी घेण्यासाठी आम्हाला इलेक्ट्रिक मोटर लागते. त्यासाठीचे बिल आम्ही भरतो. एक पैसाही खर्च न करता आपली गरज तो आपणच पूर्ण करत होता. आम्हाला सावली देत होता पण आम्हाला त्याचे हे फायदे, तो उपयोग कधीच दिसला नाही.

एक मताने झाडावर कुऱ्हाड मारून मारून संध्याकाळपर्यंत त्या महान वृक्षाचे होत्याचे नव्हते झाले. रस्त्यावर मोठमोठाल्या लाकडांचा खच पडला होता. निष्प्राण पाने जमिनीवर झोपली होती. पानांचे, फांद्यांचे, खोडाचे श्वास घेणे पूर्णपणे थांबले होते. आता फक्त निर्जीव लाकडे झाली होती.संध्याकाळ पर्यंत टेम्पो मधून लाकडाचे ओंडके भरून भरून नेले गेले. निर्जीव हिरवी पाने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांनी आणखीनच मारून टाकली.

अंधार पडला, रात्र झाली. झाडाच्या त्या रिकाम्या रिकाम्या जागेला मी मनोमन श्रद्धांजली वाहिली. “किती जरी तुझा त्रास झाला तरी तू आम्हाला सावली दिली होतीस रे! आमच्या डोळ्यांना तुझ्या हिरवाईने गारवा दिला होतास.”

रात्री लवकर झोप लागेना. तो प्रचंड वृक्ष डोळ्यासमोरून हलत नव्हता. तेवढ्यात माझ्या कानाशी कोणी कुजबुजले, “अगं वेडे,.. नको मनाला लावून घेऊ. आमचे संपूर्ण आयुष्यच तुमच्याच साठी आहे. आम्ही हवा शुद्ध करतो, तुम्हाला फुले फळे देतो, सावली देतो. थोडं स्पष्ट बोलतो वाईट वाटून घेऊ नको, टेम्पो मधून जी सगळे लाकडे भरून ने ली गेली ना, ती सुद्धा तुमच्या शेवटी तुम्हालाच उपयोगी पडणार आहेत. तुला एक सांगतो तुझ्या घरी एक फुलझाड लाव ना ! येईनच मी तुला भेटायला फुलांच्या रूपात.

इवलेसे रोप माझ्या स्वप्नांमध्ये रुजले आणि वाढायला लागले.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ६) – भैरव ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ६) – भैरव ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

रागांविषयी एक पौराणिक कथा अशी आहे कि, भगवान शंकरांनी पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण आणि (आकाश)ऊर्ध्वदिशा अशा पाच दिशांकडे मुख केले असताना त्यांच्या मुखातून अनुक्रमे भैरव, हिंडोल, मेघ, दीपक व श्री ह्या पाच रागांची उत्पत्ती झाली आणि ‘कौशिक’ ह्या सहाव्या रागाची उत्पत्ती देवी पार्वतीच्या मुखातून झाली. ह्यापैकी ‘भैरव’ ह्या रागाविषयी आज थोडेसे जाणून घेऊया.

मागच्या भागात दहा थाटांविषयी जाणून घेताना ‘भैरव’ हा एक थाटही असल्याचे आपण पाहिले. ज्यावेळी एखाद्या थाटाचे नावच रागाला दिले जाते तेव्हां त्या रागास जनकराग किंवा आश्रयराग असे म्हणतात आणि त्याच थाटातून निर्माण होणाऱ्या इतर नाव असलेल्या रागांना त्या थाटाचे जन्यराग असे म्हणतात. त्यामुळे भैरव हा भैरव थाटाचा जनकराग म्हणता येईल.

भैरव रागाचे आरोह-अवरोह अनुक्रमे, सा (रे) ग म प (ध) नि सां आणि सां नि (ध) प म ग (रे) सा. अर्थात, थाटातल्याच स्वरांनुसार रे आणि ध कोमल व बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत. रागाचा वादी स्वर ध आणि संवादी स्वर रे असून हा प्रात:कालीन ‘संधिप्रकाश’ राग आहे. ह्या रागाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अवरोहात ग वरून रे वार येताना मधे म ह्या सुराला स्पर्श करून यावं लागतं. म्हणूनच भैरवच्या इतर प्रकारांमधेही हा नियम पाळलेला दिसून येतो. दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ह्या रागातील रे आणि ध हे दोन सूर आंदोलित आहेत, त्यामुळेच ह्या रागाची गंभीर प्रकृती अधोरेखित होते असं मला वाटतं.

मुळात आंदोलन म्हणजे काय? पूर्वीच्या काळचं जितके वाजले तितके ठोके देणारं लंबकाचं घड्याळ सर्वांनाच माहिती असेल. त्यातल्याह दोन ठोक्यांच्या मधे तो लंबक एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत फिरायचा. ती दोन टोकं म्हणजे दोन सूर असं आपण समजूया. तर, जो सूर आंदोलित असेल त्याच्या मागच्या/पुढच्या (रागानुसार मागच्या कि पुढच्या सुराला स्पर्श होतो हे बदलते) स्वराला स्पर्श करून पुन्हा त्या सुरावर यायचं, अशा प्रकारे तो सूर गायला जातो. भैरवात ‘रे’ गाताना ‘ग’ ला स्पर्श करून आणि ‘ध’ गाताना ‘नि’ ला स्पर्श करून तो पुन्हापुन्हा गायला जातो. भैरवच्या चलनानुसार वरती जाताना बहुतेक वेळा गमधनिसां असं ‘प’ ला उल्लंघून गायलं जातं.

‘भैरव’ म्हणून त्या रागाची बारीक-सारीक वैशिष्ट्ये सूक्ष्मपणे मांडायची झाली तर अजूनही बरंच काही लिहिता येईल. परंतू, फक्त श्रवणानंद घेणाऱ्या श्रोत्यांना एकदम खूप बारकावे लिहून गोंधळात टाकायला नको म्हणून तितक्या खोलात शिरणे मी मुद्दाम टाळतेय.

कर्नाटकी संगीतात तर मूळ सप्तक हे आपल्या भैरव रागाचे स्वर आहेत. त्यामुळेच कि काय, त्यांच्या पद्धतीत विद्यार्थ्यांना ह्याच रागापासून शास्त्रीय संगीत शिकवायला सुरु करतात. कर्नाटकी संगीतपद्धतीत ह्या रागाचं नाव ‘मायामालवगौळा’ असं आहे. शास्त्रीय संगीतकारांचा हा आवडता राग असला तरी थोडा गंभीर प्रकृतीचा असल्याने सुगम संगीतात ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर आढळून येत नाही.

संसार चित्रपटातील ‘अम्मा रोटी दे’ हे गीत ऐकताना अंगावर काटा येतो इतका भैरवचा प्रभावी वापर तिथं झाला आहे. ‘जागो मोहन प्यारे’ हे गीत भैरव रागाची आठवण करून देते असं मी म्हणेन कारण इतर काही स्वरांचा वापर काही ठिकाणी रचनेत झाला आहे. संगीत स्वयंवर मधील ‘गवळण होऊनिया फिरता’ आणि ‘धाडिला राम राम तिने का वनी?’ह्या नाटकातील ‘मंद मंद ये समीर’ ह्या रचनांचीही ‘भैरव’निमित्ताने आठवण होते… नुसती आठवण म्हटलं कारण रचनेत सगळंच अगदी भैरवबरहुकूम नाही!

अगदी हेच आरोह-अवरोह असणारा परंतू वादी ‘प’ आणि संवादी स्वर ‘सा’ असणारा आणि अर्थातच इतर रागस्वरूप, रागचलन भैरवहून भिन्न असणारा राग म्हणजे ‘कालिंगडा’! ह्या रागात रे आणि ध ला आंदोलन घ्यायचं नाही, असं हा राग शिकवायला सुरू करण्यापूर्वीच गुरुजन सांगतात आणि इतरही बारकाव्यांसहित कसं गायचं व कसं गायचं नाही, हे गाऊनही दाखवतात. पुस्तकात दोन्ही रागांचे आरोह-अवरोह सारखेच दिसतील मात्र गुरुजन त्यात जाणीवपूर्वक राखायचा फरक सांगत त्या-त्या रागाची तालीम देतात. अशी ‘गुरुमुखी विद्या’ मिळाली तरच आपण रागाची शुद्धता राखू शकतो.

कालिंगडा रागावर आधारित मात्र बऱ्याच रचना आढळून येतात. संगीत स्वयंवर नाटकातील ‘मम मनी कृष्णसखा रमला’ हे सुंदर पद ह्याच रागातले! ‘जाळीमंदी पिकली करवंदं’, ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘बुगडी माझी सांडली गं’ अशा प्रसिद्ध लावण्यांमधे ह्या रागाचा वापार दिसून येतो. गंभीर भैरवहून अगदी भिन्न अशी ह्या रागाची चंचल प्रकृती अशा रचनांसाठी पोषक ठरली असावी. बैजू बावरा मधील ‘मोहे भूल गए सावरिया’ ही रचनाही ह्या रागावर आधारित म्हणता येईल. त्याच स्वरांच्या विशिष्ट वापरानुसार बदलत जाणारी दोन्ही रागांची प्रकृती ह्या रचनांच्या आधारेही थोडीफार उमजू शकेल.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आधुनिक शाळेतील एक दिवस ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ आधुनिक शाळेतील एक दिवस ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(सर्व पात्रे आणि लेख काल्पनिक)

चांगली हायस्कुलच्या  ७ वी तील एक वर्ग. शनिवारचा  सकाळचा दिवस. शनिवारची अर्धीच शाळा असल्याने सगळे तसे आनंदातच होते.  हनुमान पूजेचा सेक्रेटरी  लवकरच आला होता. द्रोणागिरी पर्वत उचलून घेऊन जात असलेला हनुमानाचा फोटो  त्याने पेन ड्राईव्ह वरून मेन सर्व्हर  वर उतरवूनन घेतला होता. जे वर्गात येत होते त्यांच्या कडून  डेबिट / क्रेडिट कार्ड घेऊन  तो वर्गणीच्या मागे लागला होता. हळूहळू एक एक जण वर्गात येत होते  आणि आल्या आल्या आपला लॅपटॉप चालू करत होते. संगणक चालू होता क्षणी लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकला की आपोआप हजेरी लागायची.

बंड्या आल्यापासून लॉगीन करण्याचा प्रयत्न करत होता पण  ते होत नव्हते. २-३ दा  तसे झाल्यावर त्याच्या लक्षात आले या महिन्याची फी भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्याने फी भरली नव्हती. शेवटी स्पेशल परमीशन घेण्यासाठी तो तडक मुख्याध्यापकांकडे पळाला.

जग्गू वर्गात आला तेच जरा रागावत. त्यात ‘स्वाइप से  (मशीन) करेंगे सबका स्वागत’ असे म्हणत जेंव्हा मारुती पूजेचा सेक्रेटरी त्याच्या जवळ पोचला  तेव्हा  तो म्हणाला  नाही देत वर्गणी जा.  काल गुरुजींनी रात्री उशीरा व्हाटसप ग्रुप वर घरचा अभ्यास  म्हणून निबंध लिहायला सांगितला होता  ‘व्यसन शाप की वरदान’. जग्गूने या सेक्रेटरीला  मेसेज टाकून  हिंट/मुद्दे  देण्यास सुचवले होते पण त्याचा रिप्ल्याय न आल्याने तो रागावलेला होता.

इकडे चंपा आज लँपटाॅप चा चार्जर आणायला विसरली होती. तिने राणीकडे मागताच तिने नकार दिला. म्हणाली तू माझ्या मेसेजना ग्रुपवर एकदा तरी लाईक देतेस का? मग मी का म्हणून देऊ CHARGR? प्रश्न रास्त होता.

या सगळ्या गडबडीत  वर्ग शिक्षक आले. रिमोट कंट्रोल ने त्यांनी डिजिटल फळा खाली घेतला आणि त्यांचा संगणक चालू करून प्रोजेक्टर  वरून  डिजिटल फळ्याशी लींक केला.  सर्वाना ३०/१२ तारखेवर क्लिक करायला सांगितले.  तत्क्षणी मारुती राया आले. त्यांची डिजिटल पूजा झाली, भीमरूपी स्तोत्र mp3  वर वाजू लागले, आरती झाली  आणि नंतर प्रसाद म्हणून ( प्रत्यक्ष ) खोबरे दिले गेले. त्यानंतर प्रत्येकाच्या संगणकावर आजचे वेळापत्रक पॉप -अप झाले.

पहिलाच तास गणिताचा निघाला. आज सर शिकवणार होते चक्रवाढ जीएसटी आणी रोजचे बदल हे कोष्टक. फळ्यावर दिसणारे आकडे आले तसे गेले. यात मोजक्या हुशार मुलां शिवाय कुणाला काहीही कळले नाही

दुसरा तास होता संस्कृत.  आफळे सर वर्गात आले  आणि त्यांनी भगवद्गीतेतील एक श्लोक  शिकवायला घेतला.  त्यातले ‘सोमरस’ चे वर्णन वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या.. आफळे सरांनी ही मग  मुलांच्या मनातील सर्व प्रश्णांचे वेगवेगळी उदाहरणे सांगून  शंकानिरसन केले.हा तास संपूच नये असं पहिल्यांदाच सगळ्यांना वाटत होते. पण तेवढ्यात संगणकावर  नागरिकशास्त्र  तास पॉप-अप झाला. पण आज कुलकर्णी सर न आल्याने अचानक ‘अमरधाम’ खेळ म्हणून बदल आला.

इंडियन पिनल कोड पासून सुटका झाली म्हणून  मुल आनंदली आणि अगदी  फ़टाफ़ट  त्यांनी डेस्टोप वरचे  ‘अमरधाम अँप’ चालू केले. आज दोन ग्रुप करून पोकेमॉन  खेळायचे यावर वर्गातील तमाम  मुला – मुलींचे  एकमत झाले आणि हा तास कसा संपला ते कळलेच नाही

नशीब महिना अखेर आणि त्यात शनिवार म्हणून  तुम्हाला एवढेच वाचायला मिळालं, पूर्ण  दिवसाचा वर्ग भरला असता तर?  माझं/तुमचं काय खरं नव्हतं

पण  हे वाचतांना एकदा तरी मनाने शाळेत  जाऊन आलात ना?

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नशा ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ नशा ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

नशा म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो एकच प्याला. हे एक अस व्यसन आहे जे बरेचदा जस्ट फॉर फन चालू होते. कधी मित्रांसोबत कधी पार्टी मधे, तर कधी आपण किती निगरघट्ट आहोत हे दाखवण्यासाठी, तर कधी आपले दुःख लपवण्याचे उत्तम साधन म्हणून. मधे एक एड आली होती A cigarette in my hand and I felt like a man. अरे म्हणजे तुम्ही सिगरेट ओढली नाहीत तर तुम्ही पुरुष नाहीत का?का फक्त सिगरेट ओढणारेच पुरुष असतात ? हा आता अर्थात नशा फक्त पुरूषच करतात अस नाही बरका. महिला तर आघाडीवर आहेत इथे ही अगदी कंधेसे कंधा मीलाकर. ही एक नशा झाली जी आपल्याला स्पष्ट दिसते. कारण ह्यात माणूस आपले संतुलन बिघडून बसतो. त्याच्या मेंदू वरचा ताबा उडतो, आणि त्याला आपण काय करतो आहे चूक बरोबर काही कळत नाही. पण अश्या अनेक नशा असतात ज्यांच्या आहारी बरेच जण गेलेले असतात आणि ती गोष्ट केल्या शिवाय त्यांना चैनच पडत नाही.

मला चहाची तल्लफ आली आहे अस तुम्ही बरेचदा बरेच जणांकडून ऐकले असेल. ती काय एक नशाच की. चहाची नशा. माझी आजी ना दर एक दोन तासांनी घोट भर चहा प्यायची, घोटभरच बरका, कधीही कप भर नाही. तिला विचारले असे का पीतेस, तर म्हणायची तल्लफ येते मग तेवढा पुरतो .काहीजणांना खाण्याची नशा असते. आणी खाणे तरी काय तर पिझ्झा, बर्गर, वेफर्स ,. आठवड्यातुन दोन तीनदा तरी ते लागतेच त्यांना. नाही मिळाले तर अगदी मिस करतात ते, म्हणजे नक्की काय मिस करतात हे अजून कळले नाही मला.

आत्ताच्या मुलांना एक भयंकर व्यसन लागले आहे, ते म्हणजे मोबाईल गेम्स खेळायचे. ते खेळता खेळताच त्यांच जेवण होत. आणि जर नाही मिळाला फोन हातात तर चक्क बेचैन होतात ती मुले मग हट्ट, रडारड, बेचैनी. पण मला सांगा त्यांना हे व्यसन लावायला कारणीभूत कोण? त्यांचे पालकच ना, सुरुवातीला मुलं एका जागेवर बसुन जेवावीत म्हणून आईच हातात हे खेळणे देते, का, तिला त्यांच्या मागे मागे फिरायचे नसते म्हणून, आमच्या लहानपणी आया गोष्टी सांगत भरावयच्या. रामायण, महाभारत भीमाची, कृष्णाची म्हणजे मुल एका जागी पण बसतं आणि गोष्टी रुपात त्यांना माहिती रुपी ज्ञान पण मिळत.

काही लोकांना कामाचे व्यसन असते, पैसे मिळविण्याचे व्यसन. पैश्यांशिवाय दुसर काही सुचतच नाही त्यांना, फक्त पैसा मिळवणे आणि त्यासाठी खूप काम करणे हेचव्यसन.वरकोहाॉलीक असतात ही माणसं. एखादा दिवस काम केल नाही तर बेचैन होतात.

अस्वस्थत होतात ही लोकं जणू सारे जग ह्यांच्या कामामुळेच चालू आहे अस वाटत असते ह्यांना.

थोडक्यात काय नशा ही नशाच असते मग ती कशाची ही असो. काही ना कामाची, तर काहींना मोबाईलची, काहीना ड्रग्सची असते तर काहीना आणि कशाची असते.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीची आस ☆ श्रीमती सुधा भोगले

download.jpg

☆ मनमंजुषेतून ☆ भक्तीची आस ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

भक्ती संप्रदायाचा इतिहास जेव्हां वाचनात आला तेंव्हा साहित्याचे मुकुटमणी, संतांचे गुरु ज्ञानेश्वर यांना माऊली कां संबोधतात याची जाणीव झाली. भागवतधर्म म्हणजे काय? शैव व विष्णुरूपी पांडुरंग जो सर्व जातीपातीच्या, उच्चनीच, श्रीमंत, गरीब, विद्वान, सामान्य, सर्वांना एकाछत्राखाली सामावून घेतो.तो साक्षात ईश्वर संतांचा मायबाप, प्रसंगी, दिनांचा कनवाळू विठोबाराया!

आषाढी, कार्तिकीचे महत्व पूर्वापार चालत आले आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी पालख्या घेऊन पंढरपुरला जातात. वर्षाचे बारामहिने एकादशी असतेच, पण या दोन एकादशीना विशेष महत्व आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या सुमारास सूर्याचे दक्षिणायन असल्याने, देवांची रात्र सुरु होते. इथून पुढचे चार महिने चातुर्मास सुरु होतो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आहे.

उदा.कामिका,पुत्रदा,पाशांकुशा,षट्तिला,स्मार्त,भागवत,परिवर्तिनी,इंदिरा,रमा,प्रबोधिनी,मोक्षदा,सफला, आमलकी,वरूथिनी,मोहिनी,पापमोचीनी,निर्जला,योगिनी अशी नावे आहेत.

एकादशी म्हणजे विष्णूचे व्रत.आषाढी,कार्तिकीला पंढरपुरच्या विठोबाचे महत्व! पुंडलिकाची गोष्ट लहानपणी ऐकलेली,वाचलेली होती.पण प्रत्यक्ष पंढरपूर,तेथील मंदिर पाहण्याचा योग सासरघरी आल्यावरच  आला.नाहीतर एकाद्शी दिवशी उपवास करायचा फराळाचे पदार्थ खायचे एवढेच करायचो.

वयाबरोबर जाणतेपण येते,तसे मन प्रगल्भ होते आणि मग इतर गोष्टींची जाण येते. सासरघरचे वातावरण धार्मिक होते.दरवर्षी सासूबाई आळंदीला प्रस्थानाला जात.एकदा पुण्याला पालखी सोहळा पाहिला  होता. शाळेतल्या क्रमिक पुस्तकात संतांची अभंगवाणी समाविष्ट असे.त्यातून जी काही थोडी  बहुत तोंडओळख या ईश्वरभक्तीशी झाली तेवढीच! पण मनातून ईश्वरभक्तीच्या ओढीचे प्रेम जागृत व्हायला आवधीच लागला.

एकदा आमचेकडे,सासूबाईंनी,पंढरपुरला मोठी महापूजा घालायचे ठरवले.मी तशी या साऱ्यालाच नवखी होते.कशाला इतका घाट घालताहेत? असे आपले मला वाटले. सर्वानीच जायचे ठरले.

महापूजा सकाळीच असल्याने भीमेकाठी जाऊन, चंद्रभागेत स्नान करून तयार झालो.मी या सर्व गोष्टी खरोखर आलीप्तपणे  करत होते. पुजेची वेळ झाली.घरचे यजमान पूजेच्या अग्रभागी सोवळे नेसून सिद्द होते.आम्हीही सर्वजण गाभाऱ्यात जमलो.पंच्यामृताच्या कळश्या एकेक हाती घेऊन पुजाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे देवाला स्नान घालणे सुरु होते.सासूबाई मला सांगत होत्या,”अग हात पुढे कर,तू पण देवाचे अंग चोळ,हाताने अंघोळ घाल”!त्यावेळी थोडे उचंबळून आले.साक्षात भगवंताला न्हाऊमाखूघालत होतो. पण जितका आनंद व्हावा तेवढा काही होत नव्हता.भक्तीची आस,भक्तीची कास देवभेटीची आळवणी,श्रद्धा ही सुद्धा जागृत व्हावी लागते. ईश्वराविषयीचे आकर्षण काही कोणी सांगीतल्याने,ऐकल्याने ओतले जात नाही.ते निर्माण व्हावे लागते,मनाच्या खोल गाभाऱ्यातून! जो ईश्वर, जे परब्रह्म,मूळ तुमच्यात वास करुन आहे, जे अंतस्थ आहे, अदृश आहे त्या मूळ जीवात्म्याला,निर्गुण निराकार परब्रहमाशी जोडण्याकरिता मनाचा हुंकार तुमच्या अंतस्थ ह्रदयातून उमटावा लागतो.तो अंतस्थ हुंकार, भक्तीची प्रेमनदी,भक्तीचा पान्हा,साक्षात भगवंताला न्हाऊ घालताना मजजवळ नव्हता,’मी रीतेपणीच गेले आणि रीतेपणीच आले’! म्हणून मला ईश्वरासमीप जाऊनही ते साक्षात ‘परब्रह्म’ भेटले नाही.भाव तेथे देव.भाव तो मनीच नव्हता, मग देव कसा भेटावा?

काही वर्षांनी पुन्हा पंढरीला जाण्याचा योग आला.यात्रा नव्हती.एरवीची एक संध्याकाळ होती.गर्दी तुरळकच होती. थोडा वेळ बारीत उभे राहून दर्शन झाले. गाभारा जवळ जवळ येऊ लागला, या वेळेसमात्र मागच्यापेक्षा मनात भक्तीची, देवाला प्रेमाने भेटण्याची ओढ होती. त्या तरंग लाटा मनात उचंबळू येऊ लागल्या. त्या आनंदाच्या भेट सोहळ्यात, पूर्वीच्या स्मृतीत मी हात वर उंचावून देवाला पाहू लागले, त्याच्या कायेला स्पर्शू लागले. एवढ्यात पुजार॒याचे दम भरलेले शब्द ऐकू आले, ‘बाई, पायाशीच हात लावा !’ अरे बापरे ! महापुजेवेळी साक्षात भगवंताला न्हाऊमाखू घालताना त्याचे अंग चोळले, अंघोळ घातली. बाळकृष्णाला, गोपाळाला पण आता तसा हा उंचावायचा नाही. बरोबर आहे, ‘बा, विठ्ठला, माझे पामराचे डोके तुझ्या चरणी लीनच व्हायला हवे. ते अशावेळी तुझ्या कायेला हात लावून आशीर्वाद का बरे घेणार !’ चूक झाली मायबापा चूक झाली. !’ असे मनाशी म्हणत मी पांडुरंगाच्या चरणी आपले मस्तक लीन केले, टेकवले. पुजाऱ्याने घाई चालवली होती. मी डोळेभरून ईश्वर पहिला. मनी त्याचे रूप आकंठ साठवून माझ्यावर प्रेमाची पाखर घालण्यास विनवले आणि पुन्हा आपल्या संसारी येऊन मग्न झाले. यावेळेस मला ईश्वराच्या सत्चीदानन्दाची जाणीव होऊ लागली. हृदयी ईश्वर भेटीचा प्रकाश होऊ लागला.

अशी ही ईश्वराची भक्ती, हृदयी भाव नसलेल्यांना वेडं करणारी ! भक्तीचा झरा वाहू लावणारी, असीम, उत्कट, अविनाशी ! दरवर्षी आषाढी येते. यावर्षीही आली आहे. पण यावर्षी मनाच्या गाभाऱ्यात वरील रहस्यमय अनुभवांचे गुंजन चालू आहे. जिकडे तिकडे पंढरपूरला पालखी निघाल्याच्या वार्ता कानावर येत आहेत. मन तिकडे हळूहळू ओढ घेत आहे.

शैशवात मनात नसलेला भक्तीचा उगम. हा काही नंतर एकाकी झालेला नाही. बहिर्चक्षूंनी पाहिलेला देव. अंतरमनात वास करीतच होता. परंतु बौद्द्धिक पातळीवर त्याचा विचार केलेला नव्हता. ती अंतरमनातील भक्ती जागृत झाली. बुद्धीने मनाची जागृती एका उंच स्तरावर नेऊन ठेवली. ह्यालाच भक्ती म्हणावं कां? देवाची भक्ती, त्याची आळवणी, त्याचे नामस्मरण सामान्यांनी करावे. हाच खरा सुखाचा मार्ग संतांनी शतकानुशतके दाखविला आहे. भक्तीच्या अशा नवविध पद्धती सांगितल्या जातात. देह हा इंद्रिय सुखाच्या पिंजऱ्यात अडून पडलेला आहे. त्या देहातील जीवात्म्याला त्या परिपूर्ण, अनादी अनंत परब्रह्माशी जोडून जिवाचे सोने होईल तेच खरे अंतिम सुख ! ‘देह जावो अथवा राहो ! पांडुरंगी दृढ भावो ! नुरो मस्तक ! कुटो हे शरीर ! नामाचा गजर सोडू नये ! नामाच्या गजराने, भक्तीने तो कृपाळू ईश्वर भक्तावर आपली कृपादृष्टी करतो. भक्ताच्या चिमुकल्या नामघोषाने फुल नाही फुलाची पाकळीसुद्धा त्याला पुरते. इतका तो दयानिधी कृपाळू आहे. त्याच्याकडे देण्यासाठी खूप आहे, पण आपली झोळी फाटकी असता कामा नये.

म्हणूनच ‘पुंडलिके वरदा हरिविठ्ठल, द्यानोबा तुकाराम,’ ह्या नामघोषात लाखो वारकऱ्यांनी भक्तीची ही उज्ज्वल परंपरा जागृत ठेवली आहे. हजारो वर्षे हे विठ्ठलाचे पाईक अखंड मुखी हरिचे नाम घेत. उन्हापावसाची, दगडाधोंड्यांची पर्वा न करता जिवाचे, देहाचे कवतीक सोडून, मैला मैलांचा प्रवास करीत, आपल्या मनातील नाद्ब्रम्हाला त्या परब्रम्हाशी एकरूप करण्या, भेटवण्या, पंढरपूरला त्या विठूरायाच्या दर्शनाला जातात आणि आपले मस्तक लीन करतात. आपल्या अंतरमनातील उर्जा देवाच्या दर्शनाने तृप्त करून परतात.

वारीला जातो तो वारकरी होतो. आपण पांडुरंगाच्या दर्शनाची आस ठेवली. भक्तीचा भाव ठेवला आणि वारीत मनाने जरी सहभागी झालो तरी आपणही वारकरी होऊ. प्रत्येकाच्या मनातले भक्तीचे स्वरूप जरी वेगळे असले तरी भाव तेथे देव आहेच ! भक्ती तेथे कृपा ! ईश्वराने अनेक प्रसंगी केलेली आपण पाहिली वाचली आहे. म्हणून या आषाढी निमित्त एकादशीला पंढरपूरला जाणार्या वारकऱ्याच्या स्वरात आपलाही स्वर मिसळून म्हणूया टाळी वाजवावी ! गुढी उभारावी !वाट ही चालावी ! पंढरीची.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ तसदी (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ तसदी (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

सृजनाचा क्षण कधी कुठे उगवेल हे खरंच सांगता येणार नाही. दुसऱ्या दिवशी अँजीओप्लास्टी करायची ठरल्याने मी आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. स्पेशल रूम मिळाली नाही म्हणून मला जनरल वार्ड मध्ये दाखल केले गेले. गच्च भरलेला तो मोठा हॉल….. जवळ जवळ मांडलेले बेडस, पेशंटसोबत असणाऱ्याला बसायला एक स्टूल एवढीच सोय. इतक्या लोकांसाठी फक्त २-३ नर्सेस आणि २ वॉर्ड बॉय. साहजिकच नर्सेसची धावपळ आणि जोडीला चिडचिड .. वॉर्डबॉयचा हाकांकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न…. स्वतःला नेमकं काय झालंय आणि काय करणार आहेत हे न कळल्याने घाबरलेले पेशंट, आणि डॉक्टरांशी नेमकं काय बोलायचं हे कळत नसल्याने बावरलेले, उपचारांसाठी पैसे कसे कुठून उभे करायचे ही मोठीच चिंता चेहेऱ्यावर सतत बाळगणारे नातेवाईक… भीती, चिंता, हतबलता, नैराश्य अशा-सारख्या भावनांनी तिथलं सगळं वातावरण व्यापून टाकलं होतं…….. संध्याकाळी रूम मिळाल्याने मला तिथे शिफ्ट केलं आणि ते हॉस्पिटल म्हणजे फिरता रंगमंच आहे असं वाटलं …..७-८ खोल्यांसाठी ४-५ नर्सेस, ३ वॉर्डबॉय, वरचेवर खोलीची साफसफाई, परीट -घडीच्या चादरी, सोबत आलेल्याला वेगळा बेड …… लागूनच असलेल्या सुपर स्पेशल खोल्यांची ऐट तर आणखी कितीतरी जास्त …… परिस्थितीची ही दोन टोकं पहाताना मनात दाटलेली ही कविता……उठून बसायला परवानगी नसल्याने, गुडधा उभा करून, त्यावर कागद ठेवून अक्षरशः कशीतरी खरडलेली…

☆ तसदी ☆

भेदभाव मुळी नसतो म्हणती

कधीही त्या भगवंत कृपेला

दीन नि धनवंतांना त्याचा

न्याय एकची ठरलेला ………

 

खरे न वाटे मला कधी हे

अवतीभवती जग हे बघता

कुठे पूर पैशाचा नि कुठे

गरिबीला ती नाही तृप्तता……..

 

कुठे शिंकला श्रीमंत तरी

दहाजण पहा जाती धावत

आणि कोठे रस्त्याकाठी

कोणी मृत्यूशी त्या झुंजत ……

 

कितिकांना फसवूनही येथे

गणले जाती किती मान्यवर

घाम स्वतःचा गाळूनही पण

कितीकांना ना मिळते भाकर….

 

रंक आणखी रावामधली

खोल खोल ही दरी वाढती

तशी झुंड नि पुंडशाहीची

जरब वाढती संस्कृतीवरती……

 

मरणामध्ये जगता क्वचितच

कधी कुणाला आम्ही पहावे

जगता जगता सततच आणि

कितिकांनी ते रोज मरावे……..

 

आता वाटते एकदाच त्या

रामाने अल्लासह यावे

डोळे आपले आणखी उघडूनी

राज्य स्वतःचे पाहून जावे …….

 

अंदाधुंदी येथ माजता

राहू कसे ते शकती शांत

किती भक्त ते रंकच त्यांचे

दोन वेळची ज्यांना भ्रांत ………

 

मरणानंतर देऊ म्हणती

स्वर्ग तयांना नक्की अगदी

नंतर काय करू स्वर्गाचे

आत्ता घ्यावी त्यांनी तसदी…….

 

आत्ता घ्यावी त्यांनी तसदी..

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोरीगड ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆कोरीगड ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

रविवार १७ मार्च २०१९ रोजी आम्ही कोरीगडचा ट्रेक ‘केला’ असे म्हणण्यापेक्षा तो ‘घडला’ असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. काही गोष्टी आपण करायच्या म्हणून ठरवतो पण त्या तशा न होता घडते काही भलतेच! इतिहासात आपल्याला अशी अनेक उदाहरणे सापडतील. असे म्हणतात की ख्रिस्तोफर कोलंबस खरे तर निघाला होता इण्डिज बेटांच्या आणि मसाले व्यापाराच्या शोधात पण अपघाताने पोहोचला अमेरिकाला. त्या दिवशी आमच्याही बाबतीत थोड्याफार फरकाने असाच प्रकार घडला होता. म्हणजे “जाना था जापान, पहुंच गये चीन। समझ गये ना?”  नसेल समजले तरी हरकत नाही, पुढील वर्णन वाचा म्हणजे “समझ में आयेगा”! JJ

मोहन बरोबर पहाटे ५:४५ वाजता माझ्या घरी कार घेऊन पोहोचला. तिथून आम्ही हायवे ने पोहोचलो म्हाळुंगे गावात संदीपला घ्यायला. मोहन दातार, संदीप पाटील आणि मी असा आम्हा त्रिकुटाचा बेत होता ‘घनगड’ चा ट्रेक करण्याचा. म्हाळुंगेहून एका भलत्याच खडबडीत रस्त्याने नांदे-चंदे गावातून घोटावडे फाट्याला पोहोचलो. तेथून पुढे पौड-कोळवण रोड ने हाडशीला पोहोचलो. तिथे आम्हाला एक हिरवी मारुती जिप्सी पुढून येताना दिसली ज्यामध्ये विक्रम गोखले गाडी चालवताना दिसले. कदाचित ‘गिरीवन’ मधून परत येत असावेत. असो. तिथून तुंगा-तिकोना ह्या दोन गडांच्या मार्गाने पुढे निघालो. काही परदेशी पाहुणे सकाळसकाळी तुंगी गावाच्या त्या जंगलात जॉगिंग करताना दिसले. तुंगच्या बाजूने पुढे गेल्यावर असे लक्षात येत गेले की आम्ही मार्ग कुठे तरी चुकतोय. मग वाटेत एक-दोन जणांना घनगडाचा मार्ग विचारला तर त्यांनी “सरळ जात रहा!” असे सांगितले. एका फाट्याला डावीकडे वळलो तर पुढे ‘अम्बी व्हॅली क्लब’चे गेट लागले पण तिथे गेट असल्याने मार्ग बंद झाला. मग पुन्हा उलटे फिरून  फाट्यापाशी आलो व उजवीकडे वळून निघालो. वाटेत आम्हाला चार-पाच Harle Davidson मोटरसायकलस्वार प्रचंड वेगाने आडवे गेले तेव्हा हळूहळू लक्षात आले की आम्ही लोणावळ्या कडे निघालो आहोत. वाटेत एकाला विचारले तर तो म्हणाला “घनगड कुठाय माहीत नाही. पण तुम्हाला ‘कोरीगड’ ला जायचे का? इथून सरळ गेलात तर पेठ शहापूर गाव लागेल तिथे ‘कोरीगड’ दिसेल. आम्ही तिघांनी तसाही ‘कोरीगड’ पहिला नव्हताच. मग सरळ तिकडेच ट्रेक करायचा तडकाफडकी निर्णय घेतला. सरतेशेवटी कोरीगड दिसला. गडाच्या पायथ्याशी कार लावून आम्ही चौकशी केली तेव्हा कळाले की घनगड तिथून पुढे १६ किमी दूर आहे. असो. पण तो विषय आता संपला होता.

आता ’कोरीगडा’ कडे वळूयात… हा गड कोराईगड, शहागड (गडाची पेठ शहापूरला असल्याने)ह्या नावानेही ओळखला जातो. पायथ्याच्या गावाचे नाव ‘आंबवणे’ आहे. ह्या नावावरूनच त्याच्या भोवतीने सहारा ग्रुपने वसवलेल्या अतिश्रीमंतांच्या वसाहतीचे नाव ‘अंबी व्हॅली’ पडले आहे. त्याबद्दल अधिक माहिती पुढे…

प्रथमदर्शनी कोरीगडाचा आकार आकाशात तिरप्या गेलेल्या  सुळक्यांमुळे थोडा विचित्र दिसतो. पण माथ्यावर मात्र चांगलेच विस्तीर्ण पठार आहे. गड तसा खूप उंच नसला तरी रेखीव तटबंदीने मढवलेला आहे. आंबवणे गावातून चढण्याची वाट जरा जिकिरीची आहे पण मुख्य वाटेने चढल्यास पाऊणेक तासात सहज चढाई होते. सुरुवातीलाच पुरातत्वखात्याने उभारलेला गडाचा इतिहास सांगणारा फलक आपले लक्ष वेधून घेतो. पुढील वाट एका घळीतून आणि नंतर जंगलातून जाते. वळसा घालून गेल्यावर एक छोटी सपाटी लागते.

निम्या वाटेच्या वरपासून तर पायर्‍याही बांधल्या आहेत.  उजवीकडे एक प्राचीन गुहा आणि गणपतीची मूर्ती दिसते.

वरती पोहोचल्यावर गणेश दरवाजा लागतो आणि मग तुम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचता.

सभोवतालचा परिसर एकदम विलोभनीय दिसला, पावसाळ्यात गेले तर खरेच हिरवेगार दृष्य पाहायला मिळेल, हे नक्की. आम्ही गडाच्या उजव्या तटबंदीवरून चालायला सुरुवात केली तेव्हा तटबंदीची डागडुज्जी करण्याचे व चिरे बसवण्याचे काम चालू पाहून सुखद धक्का बसला.

गडाच्या मध्यावर श्रीकोराईदेवीचे ना छत, ना भिंती असे प्राचीन पण उजाड अवस्थेतील मंदीर आहे. दोन मोठी पाण्याची तळीही दिसली. एका तळ्याजवळ दगडांच्या ढिगार्‍यामध्ये एक भग्न मूर्ती पाहून वाईट वाटले. मंदिराचा गुरव आमची चाहूल घेऊन बाहेर आला व गडावर काय पाहण्यासारखे आहे त्याची माहिती दिली. गडावरील भगवे निशाण असलेल्या बुरूजावरून पहिले तर खूप मोठा टापू नजरेस दिसला. समोर तिकोना, मोरगड, तोरणा ओळखता आले.

पुढे वळसा घालून आंबवणे गावाच्या बाजूच्या तटबंदीवरून खाली पहिले तर दोन भग्नावस्थेतील दरवाजे एकाखाली एक असे दिसले पण तिथे उतरण्याची वाट मात्र दगड कोसळून बंद झाल्यासारखी दिसली. त्याखालील वाट मात्र घनदाट जंगलात हरवलेली दिसली. महितगाराच्या मदतीशिवाय उतरणे अवघड वाटले.

त्याच तटबंदीवर एक तोफही उत्तम स्थितीत दिसली. येथपर्यंत चालून आम्हाला कडाडून भुका लागल्या असल्याने तिथेच एका झाडाच्या सावलीत बसून डब्यांवर मनसोक्त ताव मारला.

आमच्या बसल्या जागेवरून ‘अंबी व्हॅली’चा देखावा खूप छान दिसत होता. आता हयाविषयी थोडे…

सहारा ग्रुप ने विकसीत केलेल्या ह्या छोटेखानी नगरामध्ये मुंबईतील आणि देशभरातील बडेबडे उद्योगपती, सिने-नटनट्या, क्रिकेटपटू अशा घनाढ्याची आलिशान रो-हाऊसेस आहेत. त्याची खाजगी विमानाने येण्याजाण्याची सोय व्हावी म्हणून खास धावपट्टी बांधली आहे. आतमध्ये युरोप-अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते बनवले आहेत. पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या बांधल्या असून, जलशुध्दीकरण केंद्रही उभारले आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याला बांध घालून पाण्यावर तरंगते रेस्टॉरंट उभारले आहे. बोटिंगची सोय केली आहे. आम्हाला पूर्वी आडवी गेलेली मोटरसायकलस्वार मंडळी विमानाच्या धावपट्टीवरून एका टोकाकडून दुसरीकडे गाड्या उडवीत फिरताना दिसली. एम्ब्युलंस धावपट्टीच्या बाजूने फेर्‍या मारीत होती. तिथून कोणीतरी एरोमोडेलिंगची पांढरी लांब पंख असलेली विमाने अतिशय कौशल्याने उडवीत हवाई प्रात्यक्षिके करीत होते.

‘शिवलिंग’ पॉइंट

प्रदक्षिणा पूर्ण करून 3:30 च्या सुमारास आम्ही गड उतरायला प्रारंभ केला व पाऊणेक तासात उतरून आलो सुद्धा! खाली एक सरबत विक्रेता आणि त्याची बायको भेटले. लिंबू सरबत पिता-पिता त्यांच्या कडे मी सहज चौकशी केली. त्यांना विचारले की “इथे सचिन तेंडुलकरचा बंगला आहे का? इतर कोणकोण फेमस लोकांना आलेले पाहिले आहे?” तेव्हा काही धक्कादायक माहिती त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली…. नवराबायको म्हणाले, “अहो इथे येक-दोन दिवसापुरते कोण येते अन् कोण जाते आम्हाला काही कल्पना नाही. एकतर विमानाने येतात, परस्पर विमानाने जातात. कारने आले तरी बंद काचेआड कोण बसलेले असते आम्हाला पत्याच लागत नाही. शिवाय खाजगी मालमत्ता असल्याने आम्हा स्थानिक ग्रामस्थांना आत प्रवेशच देत नाहीत. पूर्वी धुण्याभांड्याची, साफसफाईची कामे तरी मिळायची आता कोर्टाच्या आदेशाने मालमत्ता खरेदी-विक्री बंद आहे. इतकेच नव्हे तर पूर्वी केलेल्या 8-10 महिन्यांच्या कामाचे आमचे पैसेही मालकांनी बुडवले आहेत. स्थानिकांना रोजगार देत नाहीत पण मुंबई वरून बिहारी कामगारांना आणून त्यांना मात्र कामे देतात. तुम्ही सांगा हे योग्य आहे का?” कसे तरी बोलून मी आपलं त्यांचे सांत्वन केले व माहितीबद्दल आभार मानून निघालो.

परतीचा प्रवास आता लोणावळा मार्गे करायचा हे ठरवून मोहनने गाडी गियरमध्ये टाकली. परतीच्या मार्गावर ‘शिवलिंग’ पॉइंट लागला. तिथे विक्रेत्यांनी छोटीशी चौपाटी वसवलेली होती. थोडा वेळ तिथे फोटो काढून पुण्याच्या दिशेने कूच केले ते आयएनएस शिवाजीच्या बाजूबाजूने लोणावळामार्गे थेट घर येईपर्यंत विनाथांबा आलो.

एकंदरीत कोरीगडाची आमची आकस्मिक भेट श्रीकोराई मातेच्या कृपेने आनंदात पार पडली. “कोरीगड झाला, पण घनगड राहीला…” ही सल मात्र मनात बोचत आहे. आमची घनगड भेटीची पाटी अजून तरी कोरीच आहे. त्यावर “श्री गणेश” कधी लिहिला जाणार ते आता श्री गजाननाच्या घन-कृपेवरच अवलंबून आहे!

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

वारक-यांची पावले आषाढ आला की संसारातून बाहेर पडून पंढरीची वाट का चालू लागतात, ते कळलं.’ ग्यानबा तुकाराम च्या तालावर चालत विठुरायाच्या पायावर माथा टेकण्याचा आनंद आणि सुख काय असतं ते कळलं. किती भाग्यवान ते वारकरी…..

विठ्ठल दर्शनानंतर रखुमाई कडे गेलो.

श्रीराम-सीता, श्री शंकर- पार्वती, श्री विष्णू -लक्ष्मी, आणि विठ्ठल-रखुमाई ही चार देव- दांपत्ये. रामसीता म्हटलं की सतत रामाबरोबर असणारी सीता,  शंकर पार्वती कैलासावर बसलेले, विष्णू शेषशायी आणि लक्ष्मी त्यांचे पायाशी असे द्रुष्य समोर येते. विठ्ठल रखुमाई हे जोडपं आपल्यातलं वाटतं. सा-या जगाचा संसार समर्थ पणे सांभाळणारा विठ्ठल आणि सगळे भक्त “विठ्ठला, पांडुरंगा” म्हणत त्यांनाच आळवतात, म्हणून जणु रुसून दुसरीकडे जाऊन आपणही कमरेवर हात ठेऊन उभी असलेली रखुमाई.  घराघरातल्या गृहस्थ- गृहिणी सारखे विठ्ठल रखुमाई.

दर्शनाला रखुमाई जवळ पोचले, कित्ती गोड रूप ते! अगदी विठ्ठलाला साजेसे.

विठ्ठलाच्या उंचपु-या मूर्ती समोर ही गोड गोजिरी रखुमाईची  अतिशय लोभसवाणी मूर्ती. जगत्जेठी आणि जगतजननी.  पिवळा शेवंतीचा हार तिच्या हिरव्यागार शालूवर छान शोभत होता. काळीशार तेजस्वी मूर्ती,  नाकात नथ, कर्णफुले,  आणि कपाळी मळवट. हेच ते दैवी, अलौकिक सौंदर्य.  अनिमिषतेने बघतच रहावे अशी रखुमाई. नमस्कार केला आणि भारावलेल्या मनाने बाहेर आले.

बाहेर दुकाने गजबजलेली होती. पण विठूमाऊलीच्या दर्शनापुढे मला बाकी सगळे गौण वाटत होतं. अतिशय शांत मनाने आणि जड अंतःकरणाने तिथून निघालो.

40 वर्षांपूर्वी ची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. किती आभार मानावेत विठूरायाचे!

आभार तर मी मित्र मैत्रिणींचे  मानते, ज्यांनी मला त्यांच्या बरोबर सामील होण्याची संधी दिली. मी शतशः त्यांची ऋणी आहे. त्यांच्यामुळेच हा ” सोनियाचा दिनु ” मला दिसला. नकळत मनात अभंगांचे स्वर रुंजी घालू लागले.

“जातो माघारी पंढरी नाथा

तुझे दर्शन झाले आता ।।

तुझ्या नादाने पाहिली

ही तुझीच रे पंढरी

धन्य झालो आम्ही जन्माचे

नाव घेऊ तुझे आवडीने ।।

दिपविली तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी ।

तुका म्हणे भक्ती करा सोपी

जाती पापे जन्माची पळूनी ।।

।। समाप्त  ।।

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत 5 – राग~ देस ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  5 – राग~ देस ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

सूर संगत या सदरांत गेले काही दिवस एकेका रागाविषयी लिहितांना माझ्या मनांत आले राग म्हणजे नक्की काय? तर त्याविषयी असे म्हणतां येईल की ज्याप्रमाणे मुलामुलींची विकास, रमेश, सुरेश किंवा पुष्पा, शुभदा, रेवती अशी वैयक्तिक ओळख पटण्यासाठी नावे ठेवण्यांत येतात त्याचप्रमाणे यमन, भूप, पुरिया, मारवा आणि बागेश्री, रागेश्री, कलावती अशी राग~रागिण्यांची नावे आहेत. बाकी प्रत्येकच राग शुद्ध व विकृत अशा एकूण बारा स्वरांतूनच तयार झाला आहे. शास्रानुसार वेगवेगळ्या प्रकारांची पांच ते सात स्वरांची रचना म्हणजे राग. त्याचबरोबर ‘रंजयति इति रागः’ अशी रागाची व्याख्या आहे. याचाच अर्थ असा की तुम्ही कशीही स्वररचना करा त्यांतून श्रोतृवृंदाचे मनोरंजन होणे महत्वाचे आहे.मग राग कोणताही का असेना!

राग देस हा त्याचपैकी एक! शास्रीय विवेचनानुसार सा रे म प नी सां/ सां नी (कोमल) ध प मग, रेग, सा असे आरोहांत ग व ध वर्ज्य आणि शुद्ध स्वर तसेच अवरोहांत कोमल नी व सातही स्वर असलेला ओडव संपूर्ण जातीचा

खमाज थाटोत्पन्न राग!साधारणपणे रात्रीच्या दुसर्‍या प्रहरांत हा राग सादर करायचा असतो, परंतु उपशास्रीय व सुगम संगीतांत ह्याचा जास्त वावर असल्यामुळे वेळेचे बंधन नाही. पंचम व रिषभ यांचा वारंवार प्रयोग होत असल्यामुळे या रागाचे वादी व संवादी स्वर अनुक्रमे पंचम व रिषभच आहेत. त्यांतील रिषभ हे एक अजब रसायन आहे.मध्यमांतून गंधारमार्गे रिषभाकडे येतांना जी मींड आहे त्यांत देसचे सगळे सौंदर्य सामावलेले आहे. उदा. मsगरेगsसा. लहांनापासून मोठ्यांपर्यंत आणि नवशिक्यांपासून ते कसलेल्या गायकांपर्यंत सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे सामर्थ्य ह्या देस रागांत आहे.

एखाद्या युवतीच्या गालावरील पडणार्‍या खळीमुळे जसे तिचे सौंदर्य खुलते तद्वतच सर्व शुद्ध स्वरांच्या विहारांत अवरोही रचनेत येणार्‍या कोमल निषादामुळे देस ऐकायला फार हळुवार आणि गोड वाटतो. पदांतील काव्यरचनेनुसार स्वररचना केली तर एकाचवेळी ईश्वरभक्ति, देशभक्ति, शृंगार अशी विविध भावनिर्मीति करणारा हा राग आहे.

गले भुजंग भस्म अंग यातला देस शंकर पार्वतीच्या प्रेमाचा आविष्कार दाखवितो. मुंबई दूरदर्शनने ‘देस राग’ ही धुन राष्ट्रीय एकात्मता दर्शविण्यासाठी तयार केली होती. वन्दे मातरम् हे राष्ट्रगीत अनेकविध चालीत बांधले असले तरी मूळ देस रागातीलच वन्दे मातरम् सर्वमान्य आहे.

एकच प्याला नाटकांतील ‘प्रभू मजवरी कोपला’ हे सिंधूच्या तोंडचे पद करूण भावना व्यक्त करणारे आहे. किंवा विद्याहरण नाटकांतील ‘मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला’ हे ही पद देसमधीलच ज्यांत आपल्याला शृंगार दिसतो. अगदी अलीकडील उदाहरणे द्यावयाची झाल्यास ‘कोई कहे कहता रहे’~ दिल चाहता है, ‘हर घडी बदल रही है रूप जिन्दगी’~कल हो ना हो ह्या चित्रपट गीतांचा उल्लेख करतां येईल.

शास्रीय संगीताच्या बैठकीत ठुमरी दादरा या स्वरूपांत हा राग अधिक सादर केला जातो.ख्याल किंवा धृपद गायकीत क्वचितच आढळतो.अपवाद म्हणून रोशनआरा बेगम, पं. रातंनजनकरबुवा, उल्हास कशाळकर यांनी बांधलेल्या’होरी खेलनको चले कन्हैया, ‘घन घन घन’ या देसमधील बंदिशी आज यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. शास्रीय अंगाने उपशास्रीय संगीताच्या आविष्काराला अनुकूल अशा मध्य व द्रृतलयीतील बंदिशी गायल्या जातात. माणिक वर्मांच्या एका मैफिलीत’हो श्याम मोरी बैंय्या गहो ना’ ही देसमधील द्रृत एकतालांतील बंदिश म्हणजे शास्रीय व उपशास्रीय शैलीचा बेमालूम मिलाफ होता असे म्हणतात.

शेवटी कलाकाराला हेच लक्षांत ठेवायचे असते की कोणताही राग घ्या, स्वरांशी कसरत करून आपले ज्ञान दाखवायचे नसते तर त्यांच्याशी लीलया खेळून रसिकांचे मन जिंकायचे असते.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जरा विसावू या वळणावर ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ जरा विसावू या वळणावर☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

असं म्हणतात की संधी आपल्या दाराबाहेरच उभी असते. दार उघडता क्षणी ती आत येते अन्यथा ती दुसरेच दार ठोठावते. संधीच सोनं करणं हा प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षेचा भाग ठरू शकतो.

बालपण तारुण्य आणि वार्धक्य अशा वळणांवरून जाणाऱ्या जीवन प्रवासात अनेक विसाव्याचे क्षण येतात. तसेच अनेक संधीही उपलब्ध होतात. दूरदृष्टी असलेला त्या संधीचं सोनं करतो. म्हणजेच त्या वळणावर तो जरा विसावतो. या गोष्टीचा झालेला फायदा त्याच्या जीवनपटावर प्रतिबिंबित होतं.

आज संपूर्ण मानव जातीला एकत्र या वळणावर थोडसं थांबायची वेळ आली आहे. एरवी आपण वैयक्तिक रित्या या वळणांवर आपापले निर्णय घेत असतो पण आता एकत्रित चिंतन करण्याची वेळ आली आहे.

करोना नावाच्या अस्मानी संकटाने गेले कित्येक महिने आपण सारेजण सैरभैर झालआहोत .सर्व थरातील, सर्व वयातील, सर्व व्यवसायातील लोकांना एकाच वेळी वेठीस धरले गेले आहे.इतकेच नव्हे तर सर्व देशांवर आणि सर्व जाती धर्मावर एकाच वेळी संकट ओढवण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. लहानापासून थोरापर्यंत रावा पासून रंका पर्यंत सामान्यांपासून ते शास्त्रज्ञ प्रंतप्रधान यासारख्या असामान्यांपर्यंत सर्वांना आव्हानात्मक असेच हे आहे .

हे अवघड आव्हान आपण संधी म्हणून स्वीकारले पाहिजे आणि या संधीचं स्वागत आपण आपली मनाची कवाडं उघडी ठेवून केलं पाहिजे

सध्या आपण सर्वजण जणू स्टॅच्यू झालो आहोत. आर्थिक गती चक्र थांबले आहे. प्रत्येकाचं मन लॉक झालंय .आता आपण अनलॉक व्हायला हवं. करोनाने दिलेल्या या तथाकथित विसाव्याच्या क्षणी काही गोष्टीचा परामर्श घ्यायला हवा.

आत्मनिर्भर भारताची हाक आपल्या रोमारोमात पोचली आहे. त्याची आता आपण कास धरायला हवी .कोणावरही अवलंबून असणे ही अगतिकता आहे हे विसरून चालणार नाही. महात्मा गांधींनी स्वावलंबनाची शिकवण आपणास दिली आहे तिचे विस्मरण होता कामा नये. कोणतेही काम हे मानव निर्मित असतं त्यामुळं ते मानवाला सहज साध्य असंच असतं. याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी.

गृहिणी पासून व्यावसायिकांपर्यंत लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनी हातात हात घालून ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही भावना स्वतःत रुजवून भारत विकसनशील कसा होईल हे सामाजिक भान राखले पाहिजे.

‘मेक इन इंडिया, मेड इन इंडिया’ यावर खूप सखोल विचार केला पाहिजे. परदेशी कंपन्यांच्या वस्तूंवर अवलंबून राहता कामा नये. आपल्या देशातील कुटिरोद्योग लघुउद्योग आणि मोठ्या इंडस्ट्रीज यांना लागणारा कच्चामाल आणि त्यातून तयार होणारे सामान याची व्यवस्था आपणच करू शकतो.आपल्या देशातील खेळणी ही आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करणारी अशी आहेत मग चीनवर अवलंबून का ?

करोनाने आपल्याला आरोग्यम् धनसंपदा हा मूलमंत्र दिला आहे.’ सर सलामत तो पगडी पचास’ हे आता सर्वांना पटलेलं आहे .आपल्या शरीरावर प्रेम करायचं करोनाने आपल्याला शिकवलं आहे. आपल्या देशातील पूर्व परंपरागत योग साधना त्याचे अनुकरण इतर देशातील मंडळी करत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशातील आयुर्वेद हे महत्त्वाचे ठरत आहे.’चरक संहिता’ आता पुन्हा आठवू लागली आहे.

इतर देशांच्या लाईफ स्टाईल चे अनुकरण करता करता आपण आपल्या देशातील आपल्या हक्काच्या सर्व गोष्टी विसरत चाललो आहोत हे जाणवतयं .आपल्या पूर्वजांनी आपल्यावर घडवलेले संस्कार आणि वागण्याच्या पद्धती स्वच्छतेचे नियम आपण धाब्यावर बसून इतरांचं अनुकरण करायला शिकलो. ही आपल्याकडून मोठी घोडचूक झालेली आहे.

आपलाच नमस्कार आपलं स्वागत करतयं. हस्तांदोलन करणं किंवा गळाभेट घेणं या गोष्टी चुकीच्या ठरू लागल्या आहेत. वरील सर्व गोष्टी लक्षात घेता आज आपण या वळणावर क्षणभर विसावा घेऊन आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं असं वाटतयं .

आपण हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागलोयं असे नाही का वाटत?…….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print