मराठी साहित्य – विविधा ☆ आळी मिळी गुप चिळी ☆ सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ आळी मिळी गुप चिळी ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

लहानपणी छोटेमोठे कित्येक गुन्हे केले आणि ते लपवण्यासाठी आळी मिळी गुप चिळी हे शस्त्र बिनबोभाट वापरले.घड्याळ फुटलं,बरणीतला खाऊ संपवला,कधी शाळा सुटल्यावर परस्पर मैत्रीणीकडे खेळायला गेलो,कधी वहीत लाल रंगातला शेरा मिळाला, कधी वर्गाच्या बाहेर ऊभं राहण्याची शिक्षाही भोगावी लागली…पण सगळे अपराध कबुल करायलाच हवेत कां?  काही अवश्यकता नाही .”आळी मिळी गुपचिळी..” हेच मस्त. मला वाटते ,अभिनयकला ही जन्मजात देणगी प्रत्येकालाच मिळालेली असते. म्हणूनच “मला काय माहीत?” “मी काय केले.?.”असे निरागस भाव चेहर्‍यावर वागवून आळी मिळी गुप चिळी यशस्वी करता येते… पण एक प्रसंग मात्र खूप कठीण होता.

माझे आजोबा म्हणजे अतिशय शिस्तीचे.नीटनेटके.  स्वच्छता ,टापटीप वाखाणण्यासारखी असली तरी अत्यंत त्रासदायक. वस्तुंच्या जागा ठरलेल्या. एक पेन्सील जरी इकडची तिकडे झाली तरी त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटायचे नाही. मग त्यांच्या कोर्टात आरोपी म्हणून आम्हाला ऊभं रहावं लागायचं… किरकोळ शिवणकामासाठी लागणारी आजोबांची एक सुई होती.सांगितलं तर खोटं वाटेल, अतिशयोक्ती वाटेल! ती एकच सुई ते ३३वर्ष वापरत होते..वापरुन झाल्यावर लहानशा दोर्‍यासकट ते सुताच्या गुंड्यात टोचून ठेवत. त्याचीही विशीष्ट पद्धत होती आणि विशीष्ट जागाही…

एक दिवस मला काय बुद्धी झाली कोण जाणे! आजोबा घरात नसताना मी रूमाल शिवण्यासाठी ती सुई घेतली.

माझा मावसभाऊ रंजन होताच तिथे. त्याने मला फटकारलेही. भांडणच ऊकरुन काढलं आणि त्याच्याशी वाद घालता घालता ती सुई तुटुनच गेली…बाप रे!!

आता काय होणार? खालच्या मजल्यावर माझी मैत्रीण रहायची .तिच्याकडे धावत गेले.तिला सर्व सांगितले.

ती म्हणाली ,”हात्तीच्या! इतकी काय घाबरतेस..ही घे सुई.

आणि ठेवून दे तिथे..सुयांसारख्या सुया…काही कळणार नाही आजोबांना..आळी मिळी गुप चिळी…

रंजनने जमेल तशी ती गुंड्यात खोचून जागच्या जागी ठेवलीही..तेव्हढे बंधुप्रेम दाखवले त्याने….

ही आळी मिळी गुप चिळी मात्र आजोबांच्या मृत्युपर्यंत टिकून राहिली.मैत्रीणीच्या सुईने ३३वर्षांची परंपरा सांभाळली…

पण आज आठवण झाली तरी वाईट वाटतं. अपराधीही वाटतं. महत्व वस्तुचं नसतं.शिकवणीचं असतं.

संस्काराचं असतं. सांभाळणं, जपणं, बारीकसारीक गोष्टींबाबतही निष्काळजी नसणं,जबाबदारी जाणणं, हा मौल्यवान संस्कार आजोबांच्या वागणुकीतून ,अगदी सहज रुजला होता….

धन्यवाद!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

१६/१०/२०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनात घर करुन राहिलेल्या कधीच न हरवणार्या आठवणीची गोष्ट….. ‘निसटून गेलेलं बरंच कांही….’ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ मनमंजुषेतून ☆ मनात घर करुन राहिलेल्या कधीच न हरवणार्या आठवणीची गोष्ट….. ‘निसटून गेलेलं बरंच कांही….’ ☆ श्री अरविंद लिमये☆

‘c/o जानकीबाई बापट, दुसरा मजला, नूर बिल्डिंग रेल्वे स्टेशनसमोर, दादर(पश्चिम) मुंबई’ हा माझ्या आयुष्यातल्या कधीकाळच्या अडीच एक वर्षांसाठीचा पत्रव्यवहाराचा पत्ता ! जुनी महत्वाची कागदपत्रे जपून ठेवतानाच अगदी जीर्ण झालेली पन्नास वर्षांपासूनची अनेक पत्रेही मी जपून ठेवलेली आहेत. नोकरी निमित्ताने प्रथमच घर सोडून मुंबईला जातानाच्या अनेक हळव्या अस्वस्थ आठवणी यातील प्रत्येक पत्राला या ना त्या रुपाने लगडलेल्या आहेत. जेमतेम वीस वर्षाचं माझं वय. घरापासून पहिल्यांदाच दूर जातानाचं हळवेपण आणि आयुष्यात मुंबईला प्रथमच आणि तेही दीर्घ वास्तव्याला जाताना असणारं अपरिहार्य दडपण सोबत घेऊन घराबाहेर पडल्यानंतरच्या पुढच्या अडीच एक वर्षातल्या असंख्य आठवणी सामावून घेतलेली मला घरुन येणारी ती जुनी पत्रे. त्या पत्रांवरचा ‘c/o जानकीबाई बापट. . . . ‘ हा पत्ता जेव्हा जेव्हा नजरेस पडतो, तेव्हा कधीच विसरता न येणार्या बापट काकूंच्या आठवणी उसळी मारुन वर येऊ लागतात.

बॅंकेत जाॅईन झाल्यानंतर काही दिवसांनंतरचा आमचा संपर्क न् सहवास पुढे माझी कोल्हापूरला बदली होईपर्यंत अबाधित राहीला,तरी त्यांचा निरोप घेऊन निघताना घरी ओढ घेणारी माझी पावलं त्यांच्या दारात अडखळली होती एवढं मात्र खरं. माझ्या नेमक्या गरजेच्या वेळी मला मदतीचा हात द्यायला त्या माझ्या आयुष्यात आल्या आणि स्वत:ची दुखरी आठवण मागे ठेऊन निघून गेल्या.

काकूनी त्यांच्या लग्नानंतर नूर बिल्डिंग मधल्या चाळीतील  दोन रुम्सच्या त्या ब्लाॅकमधेच गृहप्रवेश केला होता. आता उतारवयात तो ब्लाॅकच त्यांच्या चरितार्थाचं साधन बनलेला. त्या ब्लाॅकमधे माझ्यासारखी मुंबईत नोकरीनिमित्ताने आलेली मुलं त्या पेईंग गेस्ट म्हणून ठेऊन घ्यायच्या.  एकावेळी जास्तीतजास्त चार.  फक्त रहाणं,सकाळचा चहा, अंघोळ अशी सोय माफक दरात व्हायची. त्या दोनशे रुपयात त्याकाळी त्यांचा चरियार्थ जेमतेम चाले. त्यातही काटकसरीची सवय अंगी बाणवून त्या चार पैसे बाजूला ठेवीत.

तिथे माझ्यासाठी ओळख करुन घ्यायला आणि नीट सगळी चौकशी करायला मीच आग्रह केला म्हणून माझी डोंबिवलीची मावशीच आधी त्याना भेटून आली होती.

“त्याला सवय नसल्याने डोंबिवलीहून रोज लोकलच्या गर्दीतून ये जा करणे त्याला त्रासाचे वाटतेय हो. त्यामुळे इथे यायचं म्हणतोय. तो इथे राहील,दोन्हीवेळचा जेवणाचा डबा त्याच्यासाठी डोंबिवलीहून  मी पाठवीन. इथं तुमच्याकडे त्याची जेवणाची सोय होऊ शकली असती तर हा प्रश्न नव्हता. जमेल का तुम्हाला. . . ?”

“अडकून पडायला होतं हो. शिवाय मुलांच्या आवडीनिवडी फार असतात. म्हणून मी ते गळ्यात घेत नाही. ”

“त्याच्या काहीही आवडीनिवडी नाहीयेत हो. हवं तर चार दिवस करुन बघा. नको वाटलं तर बंद करा. सोय झाली तर त्याला निदान रात्रीतरी गरम जेवण मिळेल. म्हणून गळ घालतेय. शेवटी तुम्ही म्हणाल तसं”

आमचे ऋणानुबंधच असे की काकू राजी झाल्या. आमचं ना नातं ना गोतं. पण काकूनी मला त्या एका होकारात घरचं जेवणच नाही फक्त तर घरपणही देऊ केलं होतं. त्यामुळे अगदी थोड्या दिवसातच मी त्या घरचाच होऊन गेलो होतो जसा कांही. त्या काळी मोबाईलच काय घरोघरी फोनही नव्हते. वडील आजारी. घरुन पाठवलेलं साधं चार ओळींचं खुशालीचं पत्रही आठ दिवसांनंतर हातात पडायचं. घरच्या काळजीने न् आठवणींनी मन व्याकुळ होत असे. आधी मावशीने आणि नंतर या बापटकाकूनी दिलेलं घरपण त्या मनोवस्थेत तर माझ्यासाठी लाखमोलाचं होतं. त्याकाळी घरोघरी गॅस नव्हते.  अल्युमिनियमच्या कुकरमधे वातीच्या स्टोव्हवर रोजचा डाळभात शिजायचा. सकाळी बरोब्बर साडेआठ वाजता वाफाळलेला गरम भात माझ्या पानात असायचा. भात संपेपर्यंत  तव्यावर मऊसूत पोळी तयार असायची. स्वैपाक साधाच पण अतिशय रुचकर असायचा. प्रत्येक घासागणिक तृप्ततेबरोबरच कृतज्ञतेची जाणिव मनात झिरपत रहायची.

त्या आनंदी,हसतमुख होत्या. समाधानी होत्या. त्या मुखवट्याआड एखादं बोचरं दु:ख लपलेलं असेल अशी शंकाही मला कधी आली नाही. त्यांच्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी सुखात होती. ती, जावई, नातवंडं सगळेच यांना ‘ब्लाॅक विकून टाका.  आमच्याकडे या. आरामात रहा’ म्हणायचे. आणि या ‘होईल तितके दिवस रहाते. ‘म्हणत हसण्यावारी न्यायच्या. काकूंचा भाऊ पूर्वापार नागपूरला. तेच यांचं माहेरघर.  दिवाळीनंतर दरवर्षी न चुकता एक महिना त्या माहेरघरी जाऊन राहून यायच्या. एका वर्षी त्या नागपूरहून परत आल्या न् लगेच दुसर्या दिवशी चारधाम यात्रेची चौकशी करुन बुकींग करुनही आल्या. आठ दिवसानी यात्रेचा प्रवास सुरु होणार होता. त्या रात्री पान वाढता वाढता त्यानी हे सांगितलं

“काकू,लांबचा प्रवास करुन कालच तर आलायत.  पुन्हा इतक्या लगेच चारधामची दगदग कशाला? पुन्हा नंतर जा कधीतरी”

“नंतरचं कुणी पाहिलंय आला दिवस आपला” त्या कसनुसं हसत म्हणाल्या. एरवी देवधर्म, सोवळं-ओवळं या कशाचं कधी अवडंबर न करणार्या त्यांची चारधामची ओढ आश्चर्य वाटावं अशीच होती. शिवाय लेक जावयालाही बुकींगपूर्वी त्यानी विश्वासात घेतलेल़ं नव्हतं.

“बरोबर कोण मग?” काळजीपोटी मी विचारलं.

“यात्राकंपनी बरोबरच तर जातेय. मग वेगळी सोबत ती कशाला?” त्या बोलल्या खर्या पण का कुणास ठाऊक जाताना स्वस्थचित्त नव्हत्या एवढं खरं. ट्रीपहून परतल्या ते तीच अस्वस्थता बरोबर घेऊन.

“काकू, प्रवासात कांही त्रास झाला का? तब्येत बरी नाहीय तुमची. “रात्री त्यानी अगदी घासभरच भात घेतला ते पाहून जेवताना मी विचारलं. त्यांचे डोळे भरुन आले. त्या मानेनेच ‘नाही’ म्हणाल्या.

“काकू, मला सांगा बघू काय झालंय. मोकळेपणानं बोललात तरच समजेल ना मला ?” मी काकुळतेने हे बोललो न् त्याचाच धक्का लागल्यासारखा त्यांचा बांध फुटला. त्याही परिस्थितीत उचंबळून आलेलं मनातलं सगळं त्यानी कसंबसं थोपवलं. स्वत:ला सावरलं.

“तुझं जेवण होऊ दे. मग सांगते. आत्ता बोलले तर घास अडून राहील उगीचच. . “त्या शांतपणे म्हणाल्या. त्या रात्रीचं ते सुग्रास जेवणही मला बेचवच वाटत राहीलं. ऐकलं ते मला उध्वस्त करणारं तर होतंच आणि त्या माऊलीची किंव वाटावी असंही. इतके दिवस त्यांच्या आयुष्यातली ही पडझड त्यानी मनातच कोंडून ठेवली होती. पण आज. . . . ?

त्याना एक मुलगीच नव्हती फक्त. एक मुलगाही होता. थोड्याशा आजाराचं निमित्त होऊन त्यांचा नवरा गेला तेव्हा ही दोन्ही भावंडं शाळकरी वयाची होती. आल्या परिस्थितीला तोंड द्यायला आपल्या मुलांकडे पाहूनच तर त्या पदर खोचून उभ्या राहिल्या. शिक्षण जेमतेम.  स्वैपाकपाण्याची कामं करुन पुढे मुलांच्या शिक्षणाच्या वाढत्या खर्चाचं काय करायचं?मग त्यानी नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. एका ओळखीच्या डाॅक्टरांच्या हाॅस्पिटलमधे त्यांना नोकरीही मिळाली. दोन्ही मुलांचं सगळं व्यवस्थित करता यावं म्हणून त्यांनी कायमची ‘नाईट ड्युटी’च घेतलेली होती. मुलांची रात्रीची जेवणं आवरुन त्या ड्युटीवर जायच्या. पहाटे परत यायच्या.  दिवस मुलांसाठी मोकळा ठेवायच्या. मुलं शाळेत गेली की दुपारी थोडा आराम. मग घरची सगळी कामं. मुलीनं समजुतीनं घेतलं. पण मुलाची आदळआपट हट्ट दिवसेंदिवस वाढत चालला. तो असा बिथरत का चाललाय याना समजेचना. त्या रात्री तर कहरच.

“तू आजपास्नं नाईट ड्युटीवर जायचं नाही बघ. ”

“का?”

“रात्रीच कशाला हवी ड्युटी? तू  दिवसाची ड्युटी घे बघ. ”

“वेडा आहेस का तू? मग घरची कामं कुणी करायची? आणणंसवरणं, स्वैपाक, धुणीभांडी कमी कामं असतात का?”

“मुलं शाळेत चिडवतात गं मला. त्या डाॅक्टरांचं नाव घेऊन चिडवतात. मला आवडत नाही ते” ऐकलं आणि त्या संतापल्याच.

“मला नावं सांग त्यांची.  उद्याच शाळेत येते तुझ्या. आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईबाबांनाही भेटते. गुडघ्याएवढी पोरं तुम्ही,अकला आहेत का तुम्हाला?”

मुलगा न जेवता घुसमटत रडत राहीला. त्याच मन:स्थितीत त्या रात्री ड्युटीवर गेल्या. सकाळी घरी आलो की त्याला जवळ घेऊन शांतपणे समजवायला हवं हा सुज्ञ विचार मनात डोकावून गेलाच. पहाटे घरी आल्या तर दार लोटलेलेच होतं. तेही किलकिलं.  दार ढकलून आत आल्या न् पाहिलं तर मुलगी एकटीच झोपलेली. मुलाचं पांघरुण तिथं तसंच विस्कटलेलं. मुलगा नव्हताच. खूप शोधाशोध,पोलीस कम्प्लेंट,पेपरमधे जाहिराती सगळं झालं पण मुलगा सापडला नाहीच.

काळजाला चरे पाडणारं हे दु:ख तसंच मनाच्या तळाशी दडपून ठेऊन काकू दिवस ढकलत राहिल्या. कांहीतरी चमत्कार घडेल आणि मुलगा दत्त म्हणून समोर येऊन उभा राहिल या एकाच आशेवर त्या इतकी वर्षं दिवस ढकलत राहिल्या. यावेळी त्या नागपूरला नेहमीप्रमाणे भावाकडे गेल्या तेव्हा तिथल्या कुणी ओळखीच्या एकानं त्याना सांगितलं होतं. . ,’आम्ही चारधामला गेलो होतो नुकतेच.  तेव्हा तुमच्या मुलाला आम्ही पाहीलं होतं. साधूवेशात होता.  तरीही ओळख पटली होती.  अंदाज घेत आम्ही त्याला नावाने हांक मारली तेव्हा त्याने दचकून मागे वळूनही पाहिलं होतं आणि मान फिरवून तरातरा निघून गेला. गर्दीत दिसेनासा झाला. ”

नेमका कुठे दिसला, भेटला काकूनी त्याना विचारुन घेतलं होतं. त्या तातडीनं चारधाम यात्रेला गेल्या होत्या ते मुलगा भेटेल या आशेने. एक नवी आशा मनात पालवली आणि क्षणात कोमेजूनही गेली. मुलगा भेटलाच नाही. कसं नशीब म्हणायचं हे ?मला हे समजलंच नसतं तर बदलीनंतर काकूंचा निरोप घेऊन निघताना माझा पाय अडखळला नसता.

आज बापट काकू हयात नाहीयेत. पूर्वी कारणपरत्त्वे कितीही धावपळीत मुंबईला जाणं होई तेव्हा त्याना आवर्जून भेटून तरी येत होतो. त्याना जाऊनही तीस वर्षं उलटून गेलीयत. पण त्यांच्या या सगळ्या दुखर्या आठवणी मात्र कालपरवाच सगळं घडून गेलं असावं इतक्या ताज्या आहेत. मला हवं ते भरभरुन द्यायलाच आल्यासारख्या त्या माझ्या आयुष्यात आल्या होत्या. मला असं उपकृत करुन ठेऊन गेलेल्या त्यांची कधीतरी अचानक आठवण येते आणि मला जेवतानाचा तो प्रसंग आठवतो.

“तू आल्यापासून मला दोन घास जास्त जायला लागलेत” एकदा त्या म्हणाल्या होत्या.

“सं का म्हणताय? उलट दोघांचा स्वैपाक करायचा तुमचा त्रास मी वाढवलाय” मी चेष्टेने म्हणालो होतो. ऐकलं आणि त्या गंभीरच झाल्या होत्या क्षणभर. का ते मला तेव्हा कुठं माहित होतं?

“त्रास कसला रे?कितीक वर्षात कुणासाठी तरी रांधायचं, त्याची जेवणासाठी वाट पहायची हे मी विसरुनच गेले होते. तू आलास तेव्हापासून हरवलेलं ते सगळं पुन्हा परत मिळाल्यासारखं वाटतंय”  त्या म्हणाल्या होत्या. . . .  त्यांच्या तेव्हाच्या त्या बोलण्याचा खरा अर्थ मला त्या चारधाम यात्रेहून परत आल्या त्यानंतर समजला होता. पुढे सगळं निसटूनच गेलं. त्यांच्या हातून आणि माझ्याही. इतकी वर्ष मनात जपून ठेवलेल्या त्याच्या या आठवणी त्यांच्या नसण्यामुळे अधिकच केविलवाण्या वाटतायत मला….

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची मुलं ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ विविधा ☆ आमची मुलं ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

मिरजेच्या पासून जवळ असलेल्या आरग या रेल्वे स्टेशन वर माझं लहानपण गेल. आसपास काहीच नव्हतं. पण मागच्या बाजूचा गाई-म्हशींचा गोठा त्यांची लहान पिल्ल कुत्री मांजर अशा प्राणिसंग्रहालयाच्या सहवासातच लहानपण गेल. शिक्षणानिमित्त मिरजेला आलो. प्राणिमात्रांची आवड फक्त मांजरावरच भागवावी लागली. मी अभ्यास करताना आमची सोनाली मांजरी माझा अभ्यास होईपर्यंत मांडीवर जागत बसायची. माझ्या यशाचा वाटा माझ्या या मुलीला दिल्याशिवाय रहात नसे.

लग्नानंतर आमची गावाबाहेर पोल्ट्री आणि त्याला लागून घर होत. टॉमी आणि बंड्या दोन कुत्र्यांच्या आधारावरच आम्ही रहात होतो म्हणा ना! ओसाड परिसर साप विंचू गोम मुंगूस बेडूक आणि चोर अस चित्र होत. एकदा रात्री अकरा वाजेपर्यंत कोणीच घरी आले नाही. लाईट गेले काय कराव सुचेना. अखेर माझ्या बाळाला घेऊन मी बाहेर टॉमी आणि बंड्या यांच्याजवळ येऊन बसले. 100% खात्रीचे अंगरक्षक. बाळाला नवख्या कोणी घेतले आणि तो रडायला लागला की दोघे बेचैन व्हायचे. “बाळ रडतोय लक्ष आहे की नाही” अस नजरेतून मला सांगायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाला मीत्यांच्याजव,ळ ठेवायची. काम होईपर्यंत जबाबदारपणे दोघे त्याला सांभाळायचे. टॉमी, मी साडी बदललेली दिसली की, “मी पण येणार” असं म्हणून मागं मागं यायचा. दोघांच्या भुंकण्यातून साप आहे की चोर आहे की त्याला काही हवंय, हे बरोबर समजायचं. आठ नऊ वर्ष या मुलांनीच आम्हाला सांभाळलं म्हणायला हवं. टॉमीला कॅन्सर झाला. ऑपरेशन झाले. निमूटपणे तोंड वर करुन औषध घ्यायचा. दिवाळीचा सण साजरा झाला. दिवाळीचा लाडू थोडासा खाल्लान आणि दुसरे दिवशी स्वर्गवासी झाला. बंड्या ही किरकोळ दुखण्याने गेला. दोन मुलांची उणिव सतत भासू लागली. लवकरच आपण होऊन छानशी गोंडस कुत्री पिंकी आपण होऊन आली. आणि आमचीच झाली. पहिल्या वेळेला दहा पिल्ले झाली. तिला कोणीतरी पळवून नेल.तीन आठवड्यानी पोट खपाटीला गेलेलं, अंगावर गोमाशा भरलेल्या अशा अवस्थेत परत आली. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. प्रथम पिलानी आईला ओळख ले नाही. नंतर मात्र आनंदाने नाचायला लागली. कोरडीच आचळ ओढायला लागली. नाईलाजाने एक पिल्लू ठेवून घेतलं. टोनी. दिसायला पिवळाबारीक, गोरा रंग ,उंच, कायम ताठ बसणारा असा टोनी नौ वर्षे  साथ दिलीन त्यानं. त्याला फिरायला मीच न्यावं असा त्याचा हट्ट असायचा. “तूच चल” अस म्हणून माझ्या मागे लागायचा. मुलांबरोबर चेंडू खेळायचा. एकदा मुलांच्या मागे लागून शाळेत ही गेला. शेवटी त्याला घेऊन मुलं परत आली. किती अनुभव सांगावे तितके कमीच. चिमा मांजरी पिलांना शिकार शिकवण्यासाठी काहीना काही घेऊन यायची. एक दा तर जिवंत साप घेऊन आली. पिलांसाठी उंदीर पाली किडे सगळ्यांचा फडशा पाडायची. मागे बांधलेली जयू नावाची गाय ही एक मुलगी. तीच शिंगाचा ऑपरेशन झालं होतं. डॉक्टरांनी सांगितले की तिच्या जखमेवर रोज औषध घालायला हव ती माझ्याशिवाय कोणालाच घालून देत नव्हती. आपल्या सूक्ष्मातल्या भावभावना ही तिला कळत असाव्यात याची खात्री झाली. या सगळ्या मनाच्या नात्याच्या मुला-मुलींनी अनेक  संकटांपासून चोर, विंचू, साप, यापासून वाचवलंयआम्हाला. आता आमच्याकडे चिंगी आणि गोल्डी ही श्वान जोडी काळूराम सुंदरी आणि टिल्ली हे मार्जार त्रिकूट मस्त मजेत राहून आम्हालाही खूप आनंद देतात. या मुलांशी मी गप्पा मारत असते. म्हणजे आपण त्यांच्याशी बोलायचं ,प्रश्न विचारायचे, आणि उत्तरही आपणच द्यायचं. बाहेरून घरी आलो की पहिलं स्वागत तेच करतात  किती आनंद वाटतो ना! ही सगळी आमची मुलं आणि आम्ही त्यांचे आई वडील अस नातं आहे म्हणाना. रस्त्यात जखमी झालेल्या प्राण्यांनाही “राहत “,पीपल फॉर अनिमलच्या” मदतीने उपचार करतो. निपचित पडलेल्या बैलाच्या पोटाचे ऑपरेशन झाले. आणि चार बादल्या प्लास्टिक पिशव्या काढल्या. पिशव्यातून खरकटे टाकणाऱ्यांना काय सांगावे?बऱ्या झालेल्या प्राण्यांच्या डोळ्यातले भाव पहाताना जे समाधान मिळते ते शब्दात सांगता येत नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं “जीव सेवा हीच ईश्वरसेवा” हे तत्व मनोमन पटत.

कर्मयोग, ज्ञानयोग, आणि भक्ती मार्गाद्वारे आमची मुलं-मुली, (प्राणिमात्र )यांच्यामधील परमेश्वराच्या रूपात पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. त्यांच्या सहजीवनाच्या धाग्यांच्या गुंफणीतूनच माझ्या जीवनाच सुंदर वस्त्र विणलं गेलंय. किती सुंदर  म ऊ मुलायम उबदार आणि रंग बिरंगी.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 

 ☆ विविधा ☆ बदलता दृष्टीकोन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

ऐका सख्यांनो, ‘तिची’ कहाणी. ‘ती’ तुमचीच एक सखी. तिची कहाणी पण संसार, मुलं-बाळं, जिवलग, निसर्ग, कुटुंबाचे हीत, परमार्थ, व्रत,त्याग,साफल्य या भोवतीच फिरणारी.

तिचे माहेर छोट्याशा गावातले.  घरी धार्मिक,अध्यात्मिक, पारंपारिक, आधुनिक अशा सर्व विचारांचा मेळ. सर्व देवधर्म, पूजाअर्चा, परंपरा श्रद्धेने जपणारे आई-वडील. इतरांच्या मदतीला धावणारे, सर्वांच्या उपयोगी पडणारे, गावाचा आधारस्तंभ होते. धार्मिक व्रतवैकल्यांबरोबर सामाजिक व्रताचा वसा तिला त्यांच्याकडूनच मिळाला. वारीची परंपरा, त्यातले मर्म समजले.

लग्नानंतर ती मोठ्या शहरात, मोठ्या गोतावळ्यात गेली. तिथले वातावरणही पूर्ण श्रद्धाळू, धार्मिक. तिच्या सासूबाई त्या काळाप्रमाणे कमी शिकलेल्या, सण-वार,परंपरांच्या धबडग्यातल्याच.पण तरीही अतिशय प्रगल्भ विचारसरणी असलेल्या. असंख्य पुस्तकांच्या वाचनाने विचारात, आचारात काळानुरूप बदल केलेल्या. जुन्या कालबाह्य गोष्टी त्यांनीच सोडून दिलेल्या होत्या. त्यामुळे सुनांना त्यांनी कसलीच बंधने कधी घातली नाहीत. ती घरात सर्वात लहान. त्यामुळे सासूबाई नंतर कुळधर्म मोठ्या घरी सुरू झाले. सर्वांनी आपापल्या घरी करण्याऐवजी एका घरी करताना सर्वांनी एकमेकांकडे जाणे, या निमित्ताने नाती जपणे हे तिने कटाक्षाने पाळले. घरामध्ये, नातलगांमध्ये मिळून-मिसळून, सर्वांना धरून राहण्याचे व्रत ती अखंडपणे जपते आहे. या व्रतवैकल्यांचा अंतिम उद्देशच सर्वांचे हित,कल्याण हा आहे. ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे खरे आहे.

तिने पुढच्या पिढीला श्रद्धा जपायला शिकवले आहे. प्रथेचे अवडंबर न करता काळानुसार जे शक्य आहे ते मनोभावे करा. माणसातला, स्वत:च्या मनातला देव जपा. त्याच्याशी प्रामाणिक राहा. तो सदैव पाठराखण करतो हेच मनी बिंबवले आहे.

सण उत्सव, व्रतवैकल्ये हवीत. नियम, बंधने, संयम अवश्य हवा. पण या सर्वांसाठी निसर्गाला हानी पोहोचवू नये असे तिचे ठाम मत आहे. फुलं- पानं, फांद्या हव्यात म्हणून झाडांना ओरबाडायचे, निर्माल्य नदीत सोडायच्या निमित्ताने सगळा कचरा, घातक रंगांच्या प्लॅस्टरच्या मूर्ती पाण्यात सोडून जलप्रदूषण करायचे, उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करायचे ही कसली आलीय श्रद्धा ? यामुळे उत्सवांच्या मूळ उद्देशालाच दूर सारले जाते ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. उत्सवाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करायला हवे असे तिला वाटते.

या सणावारांना ऋतू बदलानुसार योग्य खाद्य पदार्थ प्रसाद म्हणून केले जातात. ही गोष्ट आहारशास्त्राशी निगडित आहे. ती निश्चितपणे पाळावी. चातुर्मासाच्या निमित्ताने अनेक नेम धरले जातात. जे आरोग्यास योग्य ते अवश्य करावे. पण या जोडीला आणखी काही नवीन नेम धरता येतील. जास्ती समाजाभिमुख होऊन काही वेगळे संकल्प करावेत असे तिला वाटते.

असे उपक्रम म्हणजे — हॉस्पिटलमधील अॅडमिट पेशंटना भेटणे.एखादे फूल, फळ देऊन ‘लवकर बरे व्हा’ सांगत मानसिक उभारी देणे.

अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील लोकांना भेटणे.त्यांना चांगली गाणी, गोष्टी ऐकवून मनमोकळ्या गप्पा मारणे.

शाळा-शाळांतील मुलांना चांगली गाणी, गोष्टी, कथा ऐकवणे. त्यांचे वेगवेगळे खेळ घेणे.

घराबाहेर पडू न शकणार्‍या ज्येष्ठांना आवर्जून जाऊन भेटणे.

दर आठवड्याला एका नातेवाईकाला जाऊन निवांतपणे भेटणे.जवळीक वाढवणे.

सर्वांनी मिळून देऊळ, बागा अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे.

झाडे लावून ती काळजीपूर्वक वाढवणे. यासारख्या कितीतरी उपयोगी गोष्टी करता येतील.

“मनी वसो रामनाम, हात करो पुण्यकर्म” हेच तर ब्रीद असावे.  पुढच्या पिढीला पण अशा विचारांची दीक्षा देऊन त्यांना या कामात सहभागी करून घ्यायला हवे. ज्याला ज्या मार्गाने जमते त्या मार्गाने त्याने समाजसेवा करावी.

तिने समाजसेवेचा वसा आई-वडिलांकडून घेतला आहे. तो ती वेगवेगळ्या मार्गाने अमलात आणते. आपण ‘समाजाचे देणे’ लागतो ते फेडायचा ती यथाशक्ती प्रयत्न करते. शेवटी समाज म्हणजे कोण?  तुम्ही आम्हीच ना! म्हणून या चांगल्या कामांची स्वतःपासून सुरुवात करायला हवी असे तिचे मत आहे.

तिला ‘खुलभर दुधाची’ कहाणी फार आवडते. प्रत्येकाने आपल्या श्रद्धा जपत उत्सवाच्या निमित्ताने थोडा थोडा हातभार लावला तर समाज प्रबोधन, समाजरक्षण, पर्यावरण रक्षण यांचा हा गोवर्धन निश्चितपणे उचलला जाईल.

तेव्हा मैत्रिणींनो आनंदात समाधानात सण साजरे करूयात.धन्यवाद.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ सरींवर  सरी (कवितेची  जन्मकथा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

 ☆ क्षण सृजनचा ☆ सरींवर  सरी (कवितेची  जन्मकथा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी  ☆ 

जून  महिन्यातील  असाच  एक  दिवस. संध्याकाळचे  चार वाजून गेले असावेत . आज सकाळपासूनच  आभाळ जड  झालयं. काळंभोर, घनबावरं झालयं. कोसळू पाहतंय  पण  कोसळत नाहीय. इथं , कोईमतूर मध्ये मी घरी एकटीच . मुलगा  आणि  सून  ऑफिसला गेलेत. नातूही दुपारचा झोपलाय . खिडकीतून दिसणारे काळे जडावलेले ढग बघत बसलेय मी . मोरही अगदी  सहज  फिरताना दिसतात या बाजूला . त्यानंही केकारव केला . अरे! हा तर थिरकू लागला !! बघता बघता पावसाचे टपोरे टपोरे  थेंब येऊ  लागले . थेंबांच्या सरी झाल्या . धो धो कोसळू लागल्या . मन  तर बालपणीच्या  अंगणात  जाऊन गारा  वेचून आलं . . . . परकरपोलक्यातून केंव्हाच सटकलं . . . मैत्रिणींच्या बरोबर नाचू लागलं. . .

सरींवर सरी कोसळू लागतात

आठवणींचे मोती सरीत गुंततात

अगबाई . . लग्नंही  जूनमधलचं. . त्याही दिवशी असाच  पाऊस . . .  आता सरींचे  हिंदोळे झाले . चांदणफुलांनी त्याची माझी ओंजळ  भरली. . . थांब, थांब ना जरा. . .

अंबरातून सावळघन बरसताहेत

मनजलधित तरंग उठताहेत

आता अनेक आठवणी, अनेक साठवणी. . .

उडून गेलेली छत्री, झालेली फजिती. .

ऊटीच्या थंडीतही पावसात भिजत खाल्लेलं आईस्क्रीम. . . .

आठवणींचे तरंगावर तरंग. पाण्यात दगड टाकल्यावर ऊठावेत तसे.

मनाच्या डोहात किती वलयं उठतायत. एकात एक, पुन्हा त्यात एक.. . एकाच केंद्राभोवती. . . की. . की प्रत्येकाचा केंद्र बिंदू निराळा? माझं मन हे केंद्र बिंदू प्रमाणं समजलं तर समकेंद्री . पण असंख्य जीवनाभुवानं वेगवेगळ्या क्षणी मला बहाल केलेल्या स्मृती . . विकेंद्री!!

आठवणी काही आनंदाच्या,  काही माझ्याच जीवनवेलीवरील फुलांनी दिलेल्या समाधानाच्या. .

हे काय सरीतील मोती अजूनही ओघळतच आहेत. . . . स्वैर. . . . बेबंद. . . आणि हा वेडापिसा झालेला मोर तर , मान उंचावून; निळाभोर होऊन; आनंदघनात चिंब झालाय.

. . . . . . मी ही एक गिरकी घेतली. मीच मला टाळी दिली. गदिमांच्या थुई थुई नाचणारा निळा सवंगडी मनाच्या अंगणात पदन्यास करु लागला.. . . . .

तशी मी बाथरूम सिंगरही नाही. पण आज या आठवणींच्या सुरावटीनं माझं गाणं ही सुरेल झालंय. माझ्या नकळत माझ्या चेहऱ्यावर उठणारे तरंग आजूबाजूला ऊबदार, सुखद तशाच ‘Positive vibes’ पसरवताहेत. . . . माझं आनंदगान घननील  नभापर्यंत उंच उंच झेपावतय.

सरींवर सरी

सरींवर सरी कोसळत  राहतात,

आठवणींचे मोती सरीत गुंततात,

सरींचे हिंदोळे अंबरी झुलतात,

चांदणफुले वेचून मने डोलतात,

अंबरातले सावळ घन बरसतात

मनजलधित तरंग ऊठतात,

तरंगांची वलये तनमनात झरतात,

वलयांची कंपने झंकारतात,

सरींचा ताल पकडून,

थेंबांचा ठेका धरून,

हिंदोळ्यांच्या लयीत,

आठवणींच्या सरीतील थेंबांचे मोती,

स्वैर बेबंद ओघळत राहतात __. . . . . .

मनमोरही आता धरतो ताल

ऐटीत लहरते एक अल्लड चाल

केकावलीची तानही थिरकते सुरेल

सरींची लकेर घेऊन मनगीत भिजते सचैल !!!!

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

? – 9665669148

[email protected]

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आविष्कार एका सृजनाचा ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले

 ☆ विविधा ☆ आविष्कार एका सृजनाचा ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆ 

आविष्कार एका सृजनाचा

छान किती दिसते फुलपाखरू

मी धरु जाता येई न आता…. फुलपाखराचं असं यथार्थ वर्णन एका कवितेत केलेलं आहे. रंगीत फुलपाखरांची दुनिया मोठी अजब असते. काही दिवसांचे छोटेसे आयुष्य असणारी फुलपाखरं जन्म घेतात ती एकदम मोठी होऊनच! इतर प्राण्यांसारखा ‘बालपण’ हा टप्पाच नसतो त्यांच्या आयुष्यात; आणि या कीटकवर्गी जीवाचा जन्म सुद्धा अगदी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने होतो. अंडी-अंड्यातून अळी-अळीचा कोष आणि कोषातून फुलपाखरू असा तो प्रवास! मागे एकदा एका फुलपाखरू उद्यानात फुलपाखराच्या या जीवनावस्था जवळून प्रत्यक्ष पाहता आल्या होत्या. झाडांची कुरतडलेली, अर्धवट खाल्लेली पानं ही बरेचदा फुलपाखराच्या अळीचा प्रताप असतो हेही तेव्हा कळलं होतं. तेव्हापासून अशी पानं पाहिली की ही कोणत्या बरं फुलपाखराच्या अळीने खाल्ली असतील या विचाराने कुतूहल जागृत होऊ लागले..  भविष्यात एका सुंदर फुलपाखराला जन्म देण्यासाठी झाडाची पानं विद्रूप करणाऱ्या अळीला पानावरून झटकून टाकण्याची भावना नाहीशी झाली.. असो..

गवतावर बागडणारी पिवळी फुलपाखरे प्रत्येकाने पाहिली असतील. ‘ग्रास यलो’ फुलपाखरे म्हणतात त्यांना. यातही बरेच प्रकार आहेत. याच प्रकारच्या एका फुलपाखराच्या जन्माची ही गोड कहाणी….

माझ्या घरातल्या कुंडीतील शिरीषाच्या रोपावर एक दिवस तीन चार हिरव्यागार उदबत्तीच्या पातळ काडी सारख्या जेमतेम एक सेंटीमीटर लांबीच्या अळ्या दिसल्या. जेमतेम अर्धा फूट उंचीचे ते रोप आणि त्याला चार-पाच चिंचेच्या पानासारखी संयुक्त पानं, छोटी छोट पर्णदलं असणारी.. या एवढ्याच विश्वात या अळ्या दोन-चार दिवस मनसोक्त हुंदडत होत्या; बाजूच्या इतर झाडांकडे ढुंकूनही पाहत नव्हत्या. त्या इटुकल्या झाडाच्या पानांचा फडशा पाडत होत्या आणि दिवसागणिक लठ्ठ होत होत्या. ‘खादाड’ हाच शब्द अगदी बरोबर लागू पडतो त्यांना. मी वाट बघत होते आता पुढे काय होणार? ही अळी कोष कुठे बनवणार? रोज सकाळी उठल्यावर आधी झाडाचे निरीक्षण करत होते. एके दिवशी पाहिलं तर एकही अळी दिसेना! म्हटलं कोष बनवायला दुसरीकडे गेल्या की काय? म्हणून आजूबाजूची झाडं न्याहाळू लागले पण काsही दिसेना.. मग पुन्हा शिरीषाच्या रोपाचंच पान अन् पान बारकाईने पाहू लागले; आणि काय? अगदी पानासारखे दिसणारे, पानाच्या आकाराचे दोन हिरवे कोश मला दिसले आणि एका हिरव्या देठाला बिलगून असलेली एक लठ्ठ अळी, हालचाल न करता अगदी निपचीत पडून असलेली; पटकन दिसणारच नाही अशी! तिच्याकडे पहात मी तशीच उभी राहिले अन् तेवढ्यात अळीची जोरदार हालचाल सुरू झाली!! अळीच्या  शरीराचे एक टोक देठाला चिकटून राहिले आणि दुसरे टोक  अधांतरी लोंबकळत; त्यातून भराभर स्त्राव पाझरू लागला आणि त्यात अळी गुरफटली जाऊ लागली. वीस-पंचवीस सेकंदांचा खेळ!! अळी ‘अळी’ राहिलीच नाही, त्या ठिकाणी हिरव्या रंगाचा त्रिकोणी आकार दिसू लागला. त्रिकोणाचे अधांतरी टोक तेवढ्यात वर देठाकडे सरसावले आणि पुन्हा खाली आले. पाहते तर काय? एका बारीक धाग्याने आता ते टोकही देठाला जोडले गेले होते! विस्फारलेल्या नजरेने मी हा सगळा प्रकार पाहत होते. अगदी अद्भुत!!! हुबेहूब पानासारखा दिसणारा तिसरा कोष आता त्या इवल्याशा रोपावर लटकत होता; खादाड अळी कोषात बंदिस्त झाली होती….

आता रोज मी त्या कोषाचे निरीक्षण करू लागले. चार दिवस उलटले. प्रत्येक दिवसागणिक कोषाचा रंग पालटताना दिसत होता. हिरवा कोष सुरुवातीला पिवळसर होत गडद पिवळा झाला. आणखी एक-दोन दिवसांनी त्या पिवळ्या कोषात काळी कडा उमटलेली दिसली. मी निरखून पाहत होते काही हालचाल दिसते का ते आणि माझे अहोभाग्य की निसर्गाच्या सृजनाचा एक मनमोहक आविष्कार माझ्या डोळ्यासमोर साजरा झाला. एका क्षणात या कोषाच्या, धाग्याने जोडलेल्या टोकातून पिवळी पिवळी लड खाली घरंगळली. रेशमी कापडासारख्या त्या पिवळ्या गुंडाळीतून ताबडतोब दोन काळ्या अँटिना(स्पृशा) उंचावल्या आणि आणि दोन इवल्या पायांची पकड कोषावर घट्ट बसली. पिवळा अपारदर्शी कोष आता रिकामा होऊन पारदर्शक झाला. पिवळी गुंडाळी आता हळूहळू मोकळी होऊ लागली आणि काही सेकंदात काळ्या किनारीचे ठिपकेदार पिवळे पंख पसरले गेले. आपल्या पायांच्या तीन जोड्यांच्या आधाराने कोषाला बिलगलेले, पूर्ण वाढ झालेले ग्रास यलो फुलपाखरू या जगात अवतरले होते.

अर्ध्या-एक मिनिटात घडलेले हे अद्भुत पाहून मी आनंदाने ओरडायचीच बाकी होते. एक बाय अर्धा सेंटीमीटर आकाराच्या कोषातून चांगले तीन सेंटीमीटर लांब पंख असलेले फुलपाखरू बाहेर आले होते. जवळ जवळ तासभर ते तसेच रिकाम्या कोषात पाय रोवून होते; अधून-मधून पंखांची उघडझाप करत होते. एका क्षणी ते झटकन कोष सोडून उडून गेले आणि दूर पसार झाले…

दिवाळीच्या मुहूर्तावर अशाप्रकारे दोन सुंदर जीवांचा आमच्या घरी जन्म झाला होता, दिवाळीचा आनंद त्यांनी दशगुणित केला होता.

 

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 3 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –3 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझे कॉलेजला जाणे माझ्यासाठी अनेक प्रकारे आव्हानात्मक होते.  मी एकटी जाऊ शकत नव्हते.  कोणीतरी मैत्रिण बरोबर असेल तरच नियमीत घडे.  समजा कोणी आली नाही, तर वाट पहाण्याशिवाय मी काही

च करू शकत नसे.  मात्र माझी ही अडचण बाबांनी ओळखली आणि उशीर होतोय हे लक्षात आल्यावर ते मला लुनावरून कॉलेज पर्यंत सोडायला यायचे, वर्गापर्यंत सोडायची त्यांची तयारी असायची, पण मी दिसले की कॉलेज मधली कुठलीही मैत्रिण, ओळख असो वा नसो, मला हात द्यायला यायची.  त्यामुळे सगळ्याच माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या.

शाळे मध्ये माझ्या बाबांचे माझ्यावर protective कवच होते.  सगळेजण सरांची मुलगी म्हणूनच मला ओळखत होते.  मात्र कॉलेज मध्ये आल्यावर घरट्यातून पक्षी कसा भरारी मारतो, तसे मी माझ्या पंखांनी भरारी मारते आहे असेच मला वाटले.  सगळे नवीन , मैत्रिणी नवीन, प्राध्यापक नवीन, वातावरण नवीन.  सुखातीला फार बावचळल्यासारखे झाले, पण नंतर मीच जुळवून घ्यायला सुरवात केली.  प्राध्यापक जे  बोलतात, शिकवतात ते लक्षपूर्वक ऐकायचे, ते सांगतील ते आणि तसेच करायचे हे मी पक्के ठरवले. .

१२वीच्या बोर्डाच्या परीक्षेला थोडे tension आले होते.  रायटर ची मदत घ्यायची हेतर नक्की हेतेच.  माझ्यासाठी एक वर्ग रिकामा ठेवला होता.  मी आणि माझी रायटर एका बाकावर आणि सुपरवायझर मागच्या बाकावर बसल्या होत्या.  त्यांनी त्यांचे काम चोख बजावले.  रायटर कडे पुस्तक, कागद नाही ना, हे त्यांनी तपासले.  त्यावेळी थोडे दडपण आले, पण माझा अभ्यास व्यवस्थित तयार होता.  एक वेगळा अनुभव मिळाला आणि मला १२वी आर्टस ला ६१% मार्क्स मिळाले.

FY B.  A.  चे वर्ष सुरळीत पार पडले.  पण SY मध्ये माझ्या दोन्ही बहिणींची पाठोपाठ लग्ने झाली.  त्यामुळे घरी मला वाचून दाखवणे कमी झाले आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला.  मला A T K T मिळाली, माझा English विषय राहिला.  मला फार वाईट वाटले.  पण बाबानी धीर दिला.. ” अग, एवढे काय त्यात ? ऑक्टोबर ला सोडव”.  त्यांनी माझा अभ्यास घेतला.  पुनः रायटर शोधायला पाहिजे होती.  माझ्या वर्गात अमीना सार वान नावाची मुलगी होती.  ती मला खूप मदत करायची.  तिच्या हाताला पोलीओ झाला होता.  त्यामुळे स ह वेदना ती जाणायची.  मला चांगला राइटर पाहिजे आहे हे समजल्यावर तिने तिच्या लहान बहिणीशी माझी ओळख करून दिली. समीना,बारावी मध्ये होती.ती तयार झाली.रोज संध्याकाळी सहा वाजता,प्रॅक्टिस म्हणूनजुने पेपर्स आम्ही सोडवले.समीना नं खूप छान काम केलं,पेपर मध्ये स्पेलिंग मिस्टेक्स केल्या नाहीत,मी सांगितलं तसं तिनं लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे मला शंभर पैकी अष्टयाहत्तर मार्क्स मिळाले.

अभ्यासाबरोबरच कॉलेजमध्ये मी वक्तृत्व स्पर्धेत आणि गॅदरिंग मध्येही भाग घेतला. अकरावीमध्ये सायोनारा हा डान्स प्रतिमान माझा बस वला. डान्स ची सगळे ड्रेपरी पांढरी मॅक्सि,ओढणी,पंखा सगळं सगळं सांगली मधुन आणलं होतं.डान्स खूप छान झाला.सगळ्या मुलींनी डोक्यावर घेतलं.माझा डान्स संपल्यावर”यही है राईट  चॉईस बेबी”असा ठेका धरला होता घोषणा देत होत्या. ते मला अजूनही छान आठवते. माझे वक्तृत्व चांगले असल्यामुळे मैत्रिणी माझ्याकडून गाईडन्स घ्यायच्या. मी पण त्यांना मला जे येत असे ते बिनदिक्कत सांगत असे. आमच्यामध्ये निरोगी.  कॉम्पिटिशन होती.

मी कॉलेजमध्ये रमले होते. खूप मैत्रिणी मिळाल्या,सगळ्या प्राध्यापकांची ओळख झाली,अडचण अशी काही आली नाही.सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि मी सुद्धा माझ्यापरी नं सांभाळून घेतलं.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझ्या डायरीतले एक पान ☆ सुश्री संगीता कुलकर्णी 

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ माझ्या डायरीतले एक पान ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

सकाळची वेळ…टि.व्ही वर लागलेली जुनी गाणी …बाहेर सुटलेला वारा

वादळाची चाहूल देणारा..पण मन मात्र बैचेन घुसमटलेले..मनात विचारांचे वादळ घोंघावत होते. मनातले विचारांचे हे वादळ काही शमत नव्हते. तेवढ्यात हवेच्या झोक्यानी एक पान माझ्या पायाशी येऊन पडले. ते मी उचलून हातात घेतले. अरे !! हे तर माझ्या डायरीतले एक पान….

मान उंचावून बघितले तर समोरच्या टेबलावरच्या माझ्या डायरीतली पाने वा-याने फडफडीत होती त्यातलेच हे एक पान निसटून माझ्या पायाशी येऊन पडले होते..

कळत-नकळत… त्यातल्या दोन ओळी नजरेत पडल्या…जणू काही देवानेच माझ्या मनातले हे वादळ शमवण्याकरता ते पान माझ्या पायाशी पाडले असावे असे मला मनोमन वाटले…

माझे मन जरा स्थिरावत असतानाच माझ्या मनाने पुन्हा अनपेक्षित असे वळण घेतले व नव्या वाटेची साद घातली….पण हे अनपेक्षित वळण मात्रं माझ्या आयुष्यात” ओंजळीतले सोनेरी क्षण” बनून आले. तेच मी आता तुमच्या समोर उलगडते….

प्रत्येक दिवस हा उगवत असतो तसा तो मावळतही असतो. क्षणोक्षणी आपले वय कमी न होता वाढतच जाते. कितीतरी माणसे जन्माला येतात व मृत्यूही पावतात. पण असे कितीतरी लोक आपल्या मृत्यूला हुलकावणी देऊन परत मागे फिरतात आपले उरलेले आयुष्य व्यतित करण्यासाठी…आयुष्य म्हणजे काय? आपला जन्म कशासाठी झाला आहे? आपण काय करतो?आपले जीवन खरचं काय आहे? असे प्रश्न मनात सतत येत होते पण त्याचे उत्तर काही सापडत नव्हते.याचा सतत विचार करता करता मला त्याचे उत्तर मिळाले..

आयुष्य म्हणजे ” जीवनातील सोनेरी क्षण ” हे ओंजळीत भरून जगण्यासाठी आहे. सुंदर, आनंदी, निरागस जीवन जगण्यासाठी आहेत. आपले जीवन काय आहे? हे ख-या अर्थाने समजून घेण्यासाठी आहेत. जीवन हा एक अनंत सुखाचा झरा आहे. या सुखाला झुल्यावर बसून आपण आनंदाने त्यावर बसून झुलण्यासाठी आहे. तसेच जीवनगीत गाण्यासाठीही आहेत…

प्रत्येकाच्या जीवनात सुख, दुःख, वेदना, नशीबाचा निर्णय, चुकीचा निर्णय, सत्यता अशा अनेक गोष्टी येतच असतात पण त्यातून आपण शहाणं होणं अत्यंत आवश्यक असतं.

स्वतःमध्ये भावतरंगाचे अनेक पैलू असतात ते आपण स्वतः उलगडून पाहिले पाहिजे. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. तसचं योग्य तो विचार- विनिमय सुद्धा केला पाहिजे.

“जीवन ही एक उदात्त उर्जा आहे व ती ईश्वराने आपल्याला दिलेली एक अमूल्य अशी देणगी आहे.”  असे मला विचाराअंती पटले. ते मी माझ्या मनावर पूर्णपणे बिंबविले व स्वतःमध्ये लगेचच अमुलाग्र बदल घडवायला लागले..

बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाला दिसेल असं आपलं कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. आपण आपल्याला योग्य माणूस म्हणून घडविले पाहिजे. एक चैतन्य मूर्तीही बनलं पाहिजे. दुस-यांना मदत करण्यासाठी सदैव तप्तर ही रहायला पाहिजे. हे सर्व करत असताना आपल्या वैयक्तिक कटकटींना तिलांजली दिली पाहिजे. हे मी सर्व लक्षात ठेवले.

माझ्याशिवाय यांच्यावर प्रेम करणारं दुसरं-तिसरं कुणीही नसून फक्त मीच त्यांची आहे. मला त्यांना भरभरून सुख आनंद समाधान द्यायचा आहे. त्यांच्या चेह-यावर निरागस हास्य फुलवायचे आहे. असा विचार मी माझ्या मनावर पूर्णपणे ठसवला व या कामाला मी लगेचच सुरूवातही केली.. “ओंजळीतले सोनेरी क्षण ” मला सुखद अनुभवता आले. मनाला अतिशय आनंद झाला. या सर्व गोष्टी करत असताना मी माझं मन मात्रं निःस्वार्थी ठेवलं. फळाची अपेक्षा न करता सदैव मदतीचा हात पुढे केला. सगळ्यांशी प्रेमाने वागले -बोलले ..

थोरामोठ्यांचा सन्मान केला. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो आपण ते त्यांना दिले पाहिजे हे लक्षात ठेऊन निःस्वार्थी भावनेने समाजकार्य केले. दुस-यांना आनंद कसा देता येईल याचा सुद्धा विचार केला..

खरचं किती साध्या सोप्या या गोष्टी आहेत. आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला त्या कळत नसतात. पण मला त्या कळल्या म्हणून मी देवाचे मनोमन आभार मानले..

खरोखरचं एका अनपेक्षित वळणाने माझं आख्खं आयुष्याचं बदलून टाकलं…चेह-यावर आपोआपच हसू तरळलं…

किती वेळ गेला कुणास ठाऊक ?  मी  तंद्रीतून बाहेर आले व मनातल्या मनात खुदकन् हसत माझ्या कामाला लागले…

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शशीबिंब उतरले धरेवरी ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

☆ विविधा ☆ शशीबिंब उतरले धरेवरी ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

शारदीय नवरात्रानंतर  येणारी ही शरद ऋतूतील पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा जणू हिरेजडित मुकुट आहे! पावसाचे चार महिने संपल्यानंतर शरदाचे सुखद चांदणे आणि पूर्ण चंद्रासह ही पौर्णिमा येते तेव्हा सर्वांच्याच मनात नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. पौर्णिमेचा चंद्र बघता बघताच मनातले की तसं तर प्रत्येक मराठी महिन्यात येणारी पौर्णिमा ही नवीन काहीतरी घेऊन येते आणि असा विचार मनात येताच माझे मन चैत्री पौर्णिमे कडे वळले.

चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा हा हनुमंताचा जन्मदिन आहे. बुद्धीमंत, शक्तिमान असा मारुती चैत्री पौर्णिमेला उगवत्या सूर्या बरोबरच जन्म घेतो आणि आपल्याला शक्तीची उपासना करण्यात प्रवृत्त करतो. चैत्रा नंतर वैशाखात सूर्याचे तापमान वाढू लागते आणि उन्हाचा चटका बसू लागतो. अशावेळी येणारी वैशाखी पौर्णिमा उत्तरेत पंजाब, दिल्ली या सारख्या भागात बैसाखी म्हणून साजरी होते. निसर्गात मिळणारी लिंबू ,कलिंगड, खरबूज यासारखी फळे व त्यांचे रस इथे मुबलक प्रमाणात वापरतात.

त्यानंतर येणारी ज्येष्ठ पौर्णिमा आपल्याला निसर्गाकडे नेते. पावसाची सुरुवात होऊन सृष्टी हिरवीगार होण्याचा हा काळ! या दिवशी स्त्रियांच्या वडपोर्णिमा व्रताचे नाते आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्यास शिकवते !

आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आई ,गुरुजन, ग्रंथ असो वा निसर्ग आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या प्रत्येका प्रती आपला कृतज्ञ भाव व्यक्त करणारी ही आषाढातील पौर्णिमा! कधीकधी चंद्राचे दर्शनही होत नाही या पौर्णिमेला! तरीही ही पौर्णिमा आपल्या मनाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते.

श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेपासून पाऊस हळूहळू कमी होऊ लागतो. खवळलेला समुद्र शांत होऊन समुद्रावर कोळी लोकांना आपले व्यवहार करता यावे ,यासाठी समुद्राला नारळ अर्पण करून आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो!

भाद्रपदात येणारे गौरी गणपतीचे सण साजरे करून येणारी भाद्रपद पौर्णिमा ही पुढे महालया चे दिवस सुरु करते.आपल्या पूर्वजांचे स्मरण या काळात केले जाते.

या काळात पाऊस कमी होऊन पिके, भाजीपाला याची नवनिर्मिती दिसू लागते.

अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा मुकुट मणी वाटतो मला! पाऊस संपल्याने सारी सृष्टी हिरवेगार झालेली! दिवाळीसारखा सण तोंडावर आल्याने सगळीकडे उत्साह भरलेला! आकाश निरभ्र होऊन चांदण्यांनी भरलेले तर त्यांचा सखा चंद्र,त्याच्या   शांत, स्निग्ध प्रकाशाने सृष्टीला सौख्य देणारा! या दिवशी चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून आपण जागरण करतो. या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कारण नवीन भात आले असल्याने पौर्णिमेला खिरीचा नैवेद्य केला जातो.

कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा! संध्याकाळच्या शांत वातावरणात त्रिपुर लावून त्याची शोभा पहाण्याचा आनंद वेगळाच! त्रिपुरासुराचा वध केला तो हा दिवस म्हणून त्रिपुरी पौर्णिमेचे महत्व!

आल्हाददायक वातावरणात येणारी मार्गशीर्ष  पौर्णिमा! या पौर्णिमेचा चंद्र आकाराने थोडा मोठाच वाटतो. हळूहळू दिवस मोठा होत जाणार आणि रात्र लहान याची जाणीव करून देणारा! सर्व सृष्टीचे तारणहार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा दत्तावतार मार्गशीर्ष पौर्णिमेला होतो.

माघी   पौर्णिमेचे  वैशिष्ट्य जाणवते ते माघ स्नानात! या काळात, तीर्थक्षेत्री नद्यांच्या काठी मोठे मोठे मेळे भरतात आणि लोक पवित्र नदी स्नानाचा आनंद घेतात!

अशा तऱ्हेने वर्ष संपत येते आणि फाल्गुन पौर्णिमा येते.  सर्व वाईट गोष्टींचे अग्नि समर्पण करून चांगल्याचा उदय व्हावा म्हणून होळी पेटवली जाते!

यानंतर आपण पुन्हा नवीन वर्षाचे स्वागत करायला सज्ज होतो.

हिंदू संस्कृतीत निसर्गातील पंचमहाभूतांचा संबंध आपण सणांशी जोडला आहे. पृथ्वी ,आप, तेज, वायु ,.आकाश या सर्वांशी निगडीत असे आपले सण वार आहेत. पौर्णिमा हे भरतीचे प्रतीक आहे.कोणताही आनंद हा पौर्णिमेच्या चंद्रासारखा भरभरून घेता आला पाहिजे! भरतीनंतर ओहोटी हा निसर्ग नियमच आहे. जसे पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी येणारी अमावस्या! अमावस्या नंतर दुसऱ्याच दिवसापासून कलेकलेने चंद्रकला वाढताना आपल्याला दिसते. मनावर आलेली अमावस्येची काजळी दूर होत होत होत पौर्णिमे कडे वाटचाल चालू होते. आपलं जीवन हे असंच असतं!सुखदुःखाच्या चंद्रकला नी व्यापलेले! कधी दुःखाचे क्षण येतात पण त्यांची तीव्रता काळाबरोबर कमी कमी होत जाते आणि सुखाची पौर्णिमा दिसू लागते. पण कायमच पौर्णिमा राहिली तर तिचे काय महत्त्व! तसेच पूर्णत्व हेही कायमचे नसते!’ पूर्णत्वाच्या पलीकडे नष्टत्त्वाचे  उभे कडे’ अशी एक उक्ती आहे. त्याप्रमाणे सुखदुःखाची भरती ओहोटी आयुष्यात येत राहते. पुर्ण चंद्राचे या भरती ओहोटीशी कायमचे नाते असते. असा हा पूर्ण चंद्र प्रत्येक पौर्णिमेला आपण बघतो पण निसर्गाच्या अत्युत्तम अविष्काराचा दिवस कोजागिरी ला आपण पहातो.या दिवशी चंद्रप्रकाशात आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून दुधाचा आस्वाद घ्यावा.आणि चांदणी रात्र आपण आनंदात घालवू या असाच विचार कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने मनात आला!

© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

मो.नं . 8087974168

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अन्नपूर्णा ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ अन्नपूर्णा ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

आज ललिता पंचमी! म्हणूनच मी तुम्हाला हळदी-कुंकवाला बोलावते आहे. आज मी तुम्हाला आमच्या अन्नपूर्णेची ओळख  करून देते. तशी तर अन्नपूर्णा सर्वांबरोबर माहेरुनच आलेली असते, पण ही अन्नपूर्णा थोडी वेगळी आहे. पण आधी मस्त चहा घ्या.

“काकू, चहा फक्कड झाला आहे”. हो ना? तोही ह्या आमच्या अन्नपूर्णेनच बनवलेला आहे. तर ह्या आमच्या कडील कर्मयोगी! सौ चंदा  दिघे. आमची अन्नपूर्णा.

तशी त्यांची जन्मभूमी पुणे आणि कर्मभूमी पण पुणेच ! लहानपणी आपल्या आई बरोबर कर्मयोगच करत होत्या पण त्याच बरोबर शाळेतही जात होत्या. पुढे लग्न झाले आणि सुखावल्या. दोन मुले एक मुलगी, सासूबाई सर्वच कष्ट करत. छान मजेत होते. त्यावेळी त्या ब्युरोत सेवा कर्म करत होत्या. मुलीचे लग्न झाले. एका मुलाचे लग्न झाले. सर्व काही ठीक ठाक चालेले होते. घरात एक चिमुकली नात आली. चंदाबाई सुखाने कष्ट करत होत्या पण संसाराकडे पाहून विसरत होत्या. असेच दिवस चालले होते.

आणि एक वादळ आले. वादळात सगळेच कोलमडले. त्यांचा मोठा मुलगा पोहायला गेला असताना बुडाला आणि पाठचा तो त्याला वाचवताना बुडाला. काय हाहाकार! एकाच वेळी काळाने दोन्ही मुले हिरावली. दोघेही पती पत्नी खचले. खोल निराशेत गेले. सगळीकडे नुसता अंधार. पण काहीच दिवसात बागडणाऱ्या चिमुकलीकडे त्यांचे लक्ष गेले. तरुण सुंदर विधवा सून दिसली. आणि त्या अन्नपूर्णेने पदर खोचला. “पुनःश्च हरी ओम” करत कामाला सुरुवात केली. त्याच वेळी आमच्या सोसायटीत पोहोचल्या. सुविचारी अश्या ह्या दुर्गेने अजून एक निर्णय घेतला. तरुण सुनेचा पुनर्विवाह लावून दिला. आणि नातीची जवाबदारी स्वीकारली. तिला मोठी केली, शिकवली आणि तिचे लग्न करून ती नीट पार पडली.

केवढे मोठे मन !! पण मनातली ही सर्व दुःखे एका गाठोड्यात घरीच ठेवून येतात. जसे मन तसे अन्न  बनते. त्यामुळे नेहमी प्रसन्न. इथे फक्त कामाचाच विचार. त्यामुळे सगळे सुग्रास आणि राहणीमान पण तसेच. एवढी कामे करतात पण नेसलेल्या साडीला दिवसभर सुरकुती पण नसते. नवरात्री मध्ये तर रोज त्या त्या रंगाच्या साड्या नेसतात. सगळे सणवार आठवणीने साजरे करतात. आम्हालाही उत्साह देतात. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे स्मार्ट फोन त्या सहजपणे वापरतात. वॉट्सअँप , फेसबुक वर त्या छान सक्रिय आहेत.

आमच्या सर्वांकडे येताना, प्रत्येक सणावारानुसार त्या काहीतरी घेऊन येतात. यात्रेला गेल्या की एखादा फोटो घेऊन येतील. नागपंचमीला वैदेहीला बांगड्या, मेहंदी आणतील . दुःखात सुद्धा सुख शोधायला ह्या माउलींकडून मिळते. १३५ कोटी लोकांचे सुख सारखेच असेल, दुःख मात्र वेगवेगळी !! अशा माउली प्रत्येकीकडे आहेत, त्यांची उणीव आपण lockdown मध्ये अनुभवली आहे . तर चला आज मी तुमच्या सर्वांसमवेत त्या माऊलीची साडी, खणा-नारळाने ओटी भरते.

तुम्ही पण घरी जाऊन तुमच्या तुमच्या माऊलीची ओटी भरा!

या देवी सर्व भूतेषु क्षुधा रुपेण संस्थितः, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

 

© सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares
image_print