मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दोन ज्योती” – – श्रीमती अनुराधा फाटक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ दोन ज्योती  – श्रीमती अनुराधा फाटक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तकाचे नाव – दोन ज्योती  

लेखिका – श्रीमती अनुराधा फाटक

प्रकाशन -श्री नवदुर्गा प्रकाशन

 

दोन ज्योती (पुस्तक परिचय)

‘दोन ज्योती’ हा अनुराधा फाटक यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला कथासंग्रह. त्यांचा हा 13 वा कथासंग्रह. राज्य पुरस्कारासकट ( भारतीय रेल्वेची कहाणी – भौगोलिक ) त्यांच्या विविध पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले आहेत. वास्तव आणि कल्पनारंजन यांच्या दुहेरी विणीतून त्यांची कथा गतिमान होते. कल्पनारंजन असं की समाजात ज्या गोष्टी घडायला हव्यात, असं त्यांना वाटतं, त्या त्या गोष्टी त्यांच्या कथांमधून घडतात. ‘पालखीचे भोई’ मधील बाबा गावातील विविध धर्मियांची एकजूट करून माणुसकीची दिंडी काढतात. त्यांच्याकडे  भजनाला विविध जाती-धर्माचे लोक येतात. सकाळी तिरंग्याची पूजा करून व त्याला प्रणाम करून पालखी निघते. त्यात सर्व धर्माचे धर्मग्रंथ ठेवलेले असतात. आपआपल्या धर्माचा पोशाख केलेले वारकरी ‘पालखीचे भोई’ होतात.

श्रीमती अनुराधा फाटक

‘झेप’ मधील सायली हुशार पण घरची गरीबी म्हणून ती सायन्सला न जाता आर्टस्ला जाते. संस्कृत विषय घेते. दप्तरदार बंधूंकडे जुन्या औषधांची माहिती असलेली त्यांच्या आजोबांची दोन बाडं असतात. सायली त्यांचा मराठीत अनुवाद करून देते. पुस्तक छापलं जातं. कुलगुरूंच्या हस्ते त्याचं प्रकाशन होतं. वेगळ्या दिशेने झेप घेतलेल्या सायलीचं कौतुक होतं. कथेचा शेवट असा- भारतीय ज्ञान, बुद्धी, यांना साता समुद्रापार नेणारी ही झेप’ नव्या पिढीचा आदर्श ठरणार होती.

‘बळी’ ही ‘यल्ली ’ या जोगतीणीची व्यथा मांडणारी कथा. ती म्हणते, नशिबानं मलाच यल्लम्मा बनीवली आणि दारोदर फिरीवली. तिचा विचार करणारा, तिला चिखलातून बाहेर काढू इच्छिणारा, तसं केलं नाही, तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग असं म्हणणारा एक स्वप्नाळू तरुण तिच्याशी लग्न करतो. एकदा रस्त्यावरील  एका गाडीच्या अपघातात तो मरतो. शिक्षण नसलेल्या यल्लीला जगण्यासाठी पुन्हा जोगतीणच व्हावं लागत पण आपण मूल जन्माला घालायचा नाही , असं पक्कं ठरवते. कथेचा शेवट असा- ‘यल्लूचे डोळे गळत होते. त्या अश्रूतून मातृत्वाची बांधून ठेवलेली ओल वहात होती. कुणाचा बळी न देण्याचा निर्धारही. ती म्हणते, माझ्या आयुष्याचं बुकच वेगळं हाय. त्यात फाकस्त बकर्‍यावाणी बळीची गोष्ट.’ सजलेली –धजलेली यल्लम्मा  जग डोक्यावर घेऊन  निघाली. तिचाही बळी घेतला होता, समाजातील दुष्ट रुढींनी. खरं तर त्या अश्रूतून बांधून ……. न देण्याचा निर्धारही … इथेच कथा संपायला हवी होती. पण लेखिकेला स्वतंत्रपणे भाष्य करण्याचा मोह आवरत नाही, हे त्यांच्या अनेक कथांमधून दिसते.

दोन ज्योती, घर, कलंक,पुरस्कार या कथा वृद्धाश्रमाच्या पार्श्वभूमीवरच्या. ‘दोन ज्योती’मधल्या सुमतीबाई, ‘घर’मधल्या कुसुमताई, कलंक’ मधल्या मीनाताई सगळ्या वेगवेगळ्या कारणांनी आश्रमात आलेल्या. त्या तिथे केवळ रूळल्याच नाहीत, तर रमल्याही.त्यांचा आत्मसन्मान तिथे त्यांना मिळालेला. कुसुमताई सुनेच्या वागणुकीला कंटाळून आश्रमात आलेल्या. त्या म्हणतात, ‘नवरा गेल्यापासून आजपर्यंत घरात आश्रमासारखी राहिले, आता या आश्रमात घरासारखी रहाणार आहे.’ मीनाताईंच्या मुलाने हाती लागलेल्या बनावटी पत्रांच्या आधारे, त्याची शहानिशा न करता आईवर लावलेल्या बाहेरख्यालीपणाच्या आरोपाने व्यथित होऊन त्या आश्रमात आल्या आहेत. शेवटी मुलाला आपली चूक कळते. तो त्यांना घरी न्यायला येतो, पण त्या ‘तुझ्या पश्चात्तापाने माझा कलंक पुसला, तरी मनाची जखम ओली आहे.’असा म्हणत पुन्हा घरी जायला नकार देतात. आत्मकेंद्रित, अहंमन्य, पैशाच्या मागे लागलेले, बायकोला गुलामासारखं वागावणारे वसंतराव. त्यांच्या वागणुकीला कंटाळून आश्रमात आलेल्या सुमतीबाई नवरा न्यायला येणार, म्हंटल्यावर धास्तावतात. त्यावेळी आश्रमाच्या व्यवस्थापिका वसंतरावांनाच इथे ठेवून घेऊन हा पेच सोडवण्याचे ठरवतात. त्यावेळी पती-पत्नी यांच्या नात्याबद्दल खूप काही बोलतात. भाषण दिल्यासारखं. वाटत रहातं, लेखिकाच त्यांच्या तोंडून बोलतेय. कथासंग्रहात असं वाटायला लावणार्‍या खूप जागा आहेत.  लेखिकेचा अध्यापणाचा पेशा असल्यामुळे कुठल्याही घटना-प्रसंगावर भाष्य करण्याचा लेखिकेला मोह होतो आणि अनेकदा संवाद भाषणात रूपांतरित होतात.

पुस्तकात पाहुणेर, गोफ, नवजीवन, मंगला, माणुसकी इ. आणखीही वाचनीय कथा आहेत. शब्दमर्यादेचा विचार करता, मासिका- साप्ताहिकातून चित्रपट परीक्षणे येतात, त्यात शेवटी म्हंटलेलं आसतं, ‘पुढे काय होतं, ते प्रत्यक्ष पडद्यावरच पहा.’ तसंच म्हणावसं वाटत, ‘कथांचा प्रत्यक्ष पुस्तक वाचूनच आनंद घ्या.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींचे ऋतू ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा ☆ आठवणींचे ऋतू ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

खूप वेळा मनात येत की काही काही आठवणींचे ऋतू असतात. त्या त्या ऋतूत, दिवसात काही आठवणी ताज्या होतात. याचा अर्थ इतर वेळी काही आठवे नसतात अस नव्हे… पण आठवांचे ऋतू काही औरच!

आत आत मनात घर करून बसलेली आठवे कधी कधी खूप उत्साही अन आनंदी करतात…. कधी हेच दिवस पुन्हा यावेत ही मागणीही करतात!

निसर्गाचे जरी तीनच ऋतू असले तरी माझ्या आठवांचे हजारो ऋतू असतात. ‘शब्दांनी’ बहरणारा नी धुंद करणारा माझ्या आठवणीचा…फक्त माझाच….हक्काचा वसंत ऋतू! अस मी म्हणेन…. मला जास्त भावतो. मग तो बाराही महिने असू शकतो. पण…. अस कस होणार!

कुठेतरी चढ उतार असतोच न….

नको असलेले मळभ झटकून टाकणारा, स्वच्छ धूणारा अन परत निरभ्र होणारा.… मनाचा वर्षा ऋतू !

होय! सगळं हलकं हलकं करणारा तन आणि मन चिंब करणारा …. आठवांचे तरंग .. नवतरंग होऊन मिरवणारा! असे अनेक उपऋतु माझ्या आठवणी जाग्या करतात.

कधी मनोमन लाजवतात! रोमांच अंगी उठवतात!

कधी थरारक आठवेही अंग थरथरून टाकतात… हे असे ऋतू मात्र नको वाटतात, पण त्यातून धडे मिळालेले असतात आणि जीवनाला नवी वाटाही … त्यामुळे नको वाटणारे ऋतू खर तर नकळतच एक नवे आव्हान ठरलेला असतो.

एक अवर्णनीय आनंद आणि समाधान देणारा….डोळे बंद केले तरी सगळं हिरवं हिरवं दाखवणारा..मखमल भासवणारा !शांत करणारा…

गुलाबी थंडीतही शब्दांची ऊब माझे ऋतू देतात , शब्दांची चादर अन गोधडी! एक नवं सृजनाचं, सर्जनशील ….सृजन नेहमीच प्रसवत! आणि मन नवे गाणे गाऊ लागत!… हिरव्या ऋतूच…आठवांच्या ऋतूच!

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

24/8/2020

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीचा महिमा ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ भक्तीचा महिमा. … ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

भक्ती म्हणजे काय? केवळ देव देव करणे म्हणजे भक्ती नव्हे. देवावरील प्रेम म्हणजे भक्ती. संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर,

भक्ती ते कठीण । सुळावरची पोळी   

निवडी तो बळी । विरळाशू

वेदपुराणात आपण बघितले की, धाडसी व्यक्तीनेच भक्ती केली आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद. त्याचे वडील हिरण्यकाश्यपू यांना देवही घाबरायचे. अशा भक्त प्रल्हादाने भगवान श्री विष्णूंची भक्ती केली. त्याने आपल्या वडिलांना पटवून सांगितले की, भक्ती काय असते.

भक्ती आणि व्यवहारातील लौकिक प्रेम यांतील फरक असा :- लौकिक प्रेम हे सापेक्ष, सहेतुक, दुतर्फी व कार्य-कारणांनी युक्त असते. भक्ती ही मात्र निरपेक्ष, निर्हेतुक, व अखंड असते. प्रेमाची पराकाष्ठा हीच भक्ति. नारायणास /देवास आवडेल तेच करणे हेच त्याचेवरचे प्रेम होय. भगवंताचे प्रेम अखंड हवे.

देवाच्या नामाचा प्रेमाने उच्चार म्हणजे भक्ती. देवाला स्मरणे हीच भक्ती. एका दृष्टीने भक्ती ही सोपी तर एका प्रकारे ती कठिण आहे. जीवनातील सर्व गोष्टी भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी भक्तीचे नऊ प्रकार आहेत. त्यांना नवविधा भक्ती म्हणतात.

भक्तीचे आकर्षण असे आहे की ते भगवंतालाही खेचते. आणि न घडे ते घडते असा अनुभव येतो. प्रभू रामचंद्रही भिल्लिणीच्या उष्ट्या बोरांना भुलले.  असे भक्तिप्रेमाचे माहात्म्य आहे. भक्ति-भावाचे धन पदरी असले की सुखाला तोटा नाही. भक्तीचे रूपांतर अद्वैतात म्हणजे एका ब्रह्मस्थितीतच होते.

भक्तीचा हिशोब करता येत नाही. भक्ती कधी कमी-अधिक होत नाही.

व्यवहारात काय, परमार्थात काय सदा चैतन्याचे स्मरण असावयास हवे. आपली वृत्ति चैतन्याकडे वळविणे हीच भक्ती. चैतन्याशी तादात्म्यस्थिति हीच भक्ती. चैतन्याचे द्वारा चैतन्याशी तादात्म्य होऊन चैतन्याची अनुभूति घेणे हीच निखळ भक्ती आहे. चिद्वायूचे लहरीकडे व लहरीचे वायूकडे आकर्षण हीच शुद्ध भक्ती किंवा भक्तिप्रेम. भक्ती जीवास सुख प्राप्त करून देणारे उत्तम रसायन आहे.

‘भक्त’  या शब्दात मोठी गंमत आहे. मुळात भक्त म्हणजे काय?  तर जो विभक्त नाही. ‘विभक्त’ म्हणजे ‘डिपार्टेड’ म्हणजेच दूर गेलेला,  तर ‘भक्त’ याचा अर्थ एकरूप झालेला असा होतो. अर्थात भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया. एकरुप होण्याकरता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी समजू. अर्थात हे ‘जवळ येणं’ म्हणजे काय?  तर अंतर नाहीसं करणं. हे अंतर दोन प्रकारचं असतं. एक जे डोळ्यांना दिसतं, ज्याला ‘फिजिकल डिस्टन्स’ असं म्हणतात.

देवळासमोरच्या रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभाऱ्यातली मूर्ती यांच्यात अंतर आहे. रांग संपली, तो गाभाऱ्यात पोहोचला. शारीरिक अंतर कमी झालं. पण आंतरिक अंतर?  ज्याला आपण ‘इनर स्पेस’ म्हणतो, त्याचं काय? रांगेच्या शेवटच्या टोकाला येऊन तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभाऱ्यात पोचण्याचं, देवाला पाहण्याचं. तो त्या टोकाला उभा होता, पण मनाने मात्र गाभाऱ्यात होता. मग रांगेत रमला. तिथल्या लोकांशी रुळला, राजकारणावर चर्चा केली. रांगेतला एकजण त्याचा व्यवसायबंधूच  निघाला. मग काय!  एक महत्त्वाचा व्यवहार ठरला.. तासाभरात जर बाहेर पडलो, तर आजच हा व्यवहार साध्य होईल. आता तो घड्याळाकडे पाहतो. गाभाऱ्यातल्या देवाला विनवतो, रांग संपू दे! लवकर हा व्यवहार, हे ‘डील’ होऊ दे! पाच किलो पेढे देईन!……. साध्य बदललं !!!

मघाशी त्याचं साध्य होतं ‘देव’.  आता साध्य आहे ‘व्यवहार’!  देव हे फक्त साधन आहे. म्हणजे शरीराने  जेव्हा तो गाभाऱ्यात पोहोचलाय, तेव्हाच मनाने तिथून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या व्यवहाराच्या  ठिकाणी पोहोचलाय. भेट झाली, पण भक्त आणि भगवंताची नाही. कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त झाला….

प्रेम आणि भक्ती यातलं हेच साम्य आहे. दोन्हीचं अंतिम रूप हे विरघळून जाणं आहे. मीपण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 1 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 1 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

 (सुश्री शिल्पा मैंदर्गी यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारी लेखमाला सुरू करत आहोत.  धन्यवाद – सम्पादक मंडळ (मराठी))

(हम आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी  के ह्रदय से आभारी हैं। उन्होंने हमारे आग्रह पर अपने जीवन की अब तक की लड़ाई पर विमर्श हम सबके साथ श्रृंखलाबद्ध साझा करना स्वीकार किया है।  आप हम सबके लिए प्रेरणा स्रोत हैं। हम आदरणीया सौ अंजली गोखले जी के भी आभारी हैं। ई-अभिव्यक्ति ऐसी प्रतिभाओं को नमन करता है – ब्लॉग सम्पादक – हेमन्त बावनकर )

मी अजून लढते आहे

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

मी शिल्पा. शिल्पा मैंदर्गी. ई अभिव्यक्तिच्या साहित्यिकांमध्ये मला सामावून घेतल्या बद्दल सर्व प्रथम हेमंत बावनकर सर, सुहास पंडित सर आणि उज्वला तांईचे मनापासून आभार !

मी जन्मतः पूर्ण अंध नाही. साधारण तिसरी पर्यंत मला धूसर दिसत होते. अगदी लहान असताना आजीला शंका आली आणि माझ्या आईबाबांची डोळ्याच्या डॉक्टरांकडे धाव सुरू झाली. डॉक्टरांनी खूप तपासण्या केल्या. खूप स्पेशलिस्टना दाखवले. पण सर्वांचे म्हणणे एकच होते, ते म्हणजे हिची दृष्टी जाणार.

घरी मी दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्याबरोबर मोठी होत होते. बरोबरीने खेळत होते, दंगा करत होते. जेवढे दिसत होते, तेवढ्यावर माझे सगळे सुरु होते. मला गांभीर्य काही नव्हतेच कारण मला काही समजतच नव्हतेना! मला कमी दिसते, तेही मला कळत नव्हते. सगळ्यांचेच असे असते, असेच मला वाटे. आईच्या बोटाला धरुन शाळेत जायची, यायची त्यामुळे माझ्यात काही कमी आहे असे कधी जाणवले नाही.

तिसरीमध्ये गेल्यापासून माझ्या डोळ्यांची बरीच ऑपरेशन्स झाली. आई बाबा खूप धिराने घेत होते. एकाही ऑपरेशनचा उपयोग झाला नाही. जवळ जवळ ८ – १० ऑपरेशन्स झाली पण काही फरक नाही. मात्र शाळा अभ्यास नियमित सुरु होते. माझे बाबा विद्यामंदिर शाळेमध्ये शिकवत होते. माझ्यावर त्यांचे पूर्ण लक्ष होते. ते मला खूप गोष्टी सांगत. पाचवी मध्ये गेल्यापासून मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.पहिल्या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे मी सादर केले आणि आश्चर्य म्हणजे मला पहिल्या नंबर चीढाल मिळाली.

अभ्यास, शाळा, वक्तृत्व स्पर्धा, घरी दंगा, डोळ्याचे इलाज सगळेच सुरु होते. दिसणे अंधूक अंधूक होत पूर्ण बंद झाले होते. पण डोळ्या मधून सतत पाणी येत होते. ते थांबवण्याचे ही ऑपरेशन झाले. ते झाले मद्रासला म्हणजे आत्ताच्या चेनईला. डॉक्टरांनी आई बाबा ना आता डोळ्याच्या बाबतीतले सर्व प्रयत्न थांबवायला सांगितले. नाहीतर विनाकारण मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता होती. आई बाबांनी ते मान्य केले आणि माझा अभ्यास, वक्तृत्व इकडे लक्ष द्यायचे ठरवले.

मला घरी अडगळीत टाकले नाही किंवा तेही हताश झाले नाहीत. मला सतत प्रोत्साहित करत राहिले. घरी मी खेळत होते, भांडत होते. दंगा ही करत होते. हिला दिसत नाही, म्हणून माझे फाजील लाडही केले नाहीत.

ऑपरेशन्स झाल्यामुळे माझे डोळे म्हणजे नुसत्या पांढऱ्या खोबण्या झाल्या होत्या. दुसऱ्यांना भयावह दिसू नये म्हणून ऑपरेशन करून बुब्बुळ बसवले. तेही एकाच डोळ्याला बसले. डॉक्टरांनीच मग अथक् प्रयत्नांनी मला कृत्रिम डोळा बनवून दिला. जो मी अजूनही वापरते, काढते, घालते. अर्थात मला त्याचा काहीच उपयोग नाही. माझे डोळे फवत समोरच्या साठी आहेत. त्यांना भिती वाटू नये, त्रास होऊ नये म्हणून. थोडक्यात काय माझे डोळे अर्थात कृत्रिम तुमच्या साठी’, माझ्यासाठी नाहीत बरं !

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भुलाबाई….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ भूलाबाई….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

भूलाबाई हे पार्वतीचे भिल्ल म्हणजे आदिवासी स्त्री चे रुप.  आपण अनेक कथांमध्ये पार्वतीने शंकरासाठी केलेले तप ऐकले आहे पण इथे शंकराच्या रुपातले भूलोजी राणे पार्वतीचा अनुनय करताना दिसतात. त्यांची  पार्वती राणी रुसून बसते मग ते शंकर तिला स्वतः न्यायला जातात.  तिला झोपण्यासाठी सोन्याचा पलंग आणि मोत्याची मच्छरदाणी असते. तिच्या डोहाळ्यासाठी नाना रंगाच्या भरजरी चोळ्या शिवून त्यावर अत्तरे शिंपलेली असतात.  डोहाळे पुरवण्यासाठी सासू, सासरे, दिर जावा आणि नणंदा धावपळ करत असतात. एवढ्याने काय होणार म्हणून रुसलेल्या पार्वतीकडे शंकर महादेवाची रदबदली करण्यासाठी पहिल्या दिवसांपासून दस्तुर खुद्द खंडोबा, भैरोबा, सूर्य, चंद्र, बृहस्पती असे देव येतात सर्वात शेवटी गणेश आणि कार्तिकेय ही बाळे आल्यावर ती आपला रुसवा एकदाचा सोडते.

हे सगळं त्या भूलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होते.  या काळात ती शंकरदेवांवर पण यथेच्छ तोंडसुख घेते.. त्याने घडवलेला दागिना कसा धड नाही,  त्याने आणलेले लुगडे कसे पोतेरे, फूले वेचून आणली तीही शिळी आणि बिनवासाची.. त्याला संसाराची कशी आच नाही… सतत डमरू वाजवणे किंवा गणांबरोबर नाचणे आणि तप करणे,  याशिवाय त्याला कसे काहीच येत नाही… अशा प्रकारची वैताग व्यक्त करणारीही काही गाणी आहेत.

शेवटी बिचारा शंकर विष्णू देवांकडून प्रपंचाची कौशल्ये शिकतो तेव्हा कुठे ही भूलाबाई त्याच्याबरोबर जायला तयार होते. भूलाबाई स्वयंप्रज्ञ आहे,  तिला काय हवे ते तिला स्पष्टपणे सांगता येते.  ती अन्याय सहन करत नाही. प्रसंगी वांड नव-याला धडा शिकविण्यासाठी माहेरी किंवा माहेरी भावजया बोलल्या तर सख्यांबरोबर किंवा थोडे दिवस एकटीने फिरून यायचीही तिची तयारी आहे.

मुलींना आत्मसन्मानाची कल्पना यावी आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी निर्भिडपणे वागावे यासाठीच कदाचित पहिली मुलगी असेल त्या घरी प्रामुख्याने भूलाबाई  बसवली जाते.  काही जणांकडे भूलाबाई घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेपर्यन्त बसवतात. तर काही जणांकडे भाद्रपद ते शरद पौर्णिमा अशी महिनाभर भूलाबाई बसलेली असते. भूलाबाई म्हणजे खरे तर ‘शंकर पार्वतीची मूर्ती’ घराच्या दर्शनी भागातल्या कोनाड्यात बसवतात.  या काळात रोज तिला संध्याकाळी हळदी कुंकू आणि अक्षत लावून पूजा करतात.  त्यावेळी  बहुधा त्या दिवसात मिळणाऱ्या किंवा गुलबक्षी, चमेली किंवा जाईच्या फूलांचे बारीक मोरपंखीच्या पानांसकट बनवलेल्या माळा रोज पूजेच्या वेळी घालतात. या माळांमध्ये फूले,  पाने आणि बिया गुंफाव्याच लागतात. गोंड या आदिवासी जमातीत मात्र सगळ्या गावातल्या मुलींची एकच भूलाबाई बसवतात आणि रोज सगळ्याजणी  तिच्यासाठी रानफूलांच्या माळा घेऊन येतात.  त्यांची भूलाबाई म्हणजे मातीची पार्वतीची मूर्ती असते.

भुलाबाईच्या काळात मुली घरोघरी जाऊन टाळ्या वाजवून गाणी म्हणतात. खिरापतही चढती असते म्हणजे पहिल्या दिवशी एक,  दुसर्‍या दिवशी दोन अशा प्रकारच्या..आणि अर्थातच ओळखायच्याही असतात.

शेवटच्या म्हणजे बोळवणाच्या दिवशी मात्र तीस आणि तीन अशा खिरापती करायची पध्दत आहे.  एवढ्या खिरापती एकट्याने करण्याच्या ऐवजी सर्व मुली मिळूनही त्या भुलाबाईची सांगता करतात. जिच्या घरी भूलाबाई बसवतात तिला पांढरे किंवा निळे कपडे घेतात आणि मोत्याचा एखादा दागिनाही करतात.  खिरापतीमध्येही पांढ-या पदार्थांचे  प्राबल्य अधिक असते.

भूलाबाई देवी असली तरी तिला मानवी स्त्री च्या भावभावना आहेत. तिला नव-याचा राग येतो,  माहेरच्या अगदी शेणगोठ्यावरही तिचे प्रेम असते, तिच्या सख्या,  तिची मुले,  भाऊ बहिणी,  आई वडील…सासर माहेर हेच तिचे विश्व… पण त्यातही तिला तिचे स्वतःचे स्थान असले पाहिजे ही जाणीव आहे.. त्यामुळेच भूलाबाई  आपल्याला जवळची वाटते आणि खरं सांगायचं तर ईश्वराचे हे स्त्री- रूप फारच विलोभनीय आहे…

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सार्थक ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ विविधा ☆ सार्थक ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर 

‘अगं आई, बास कर आता… काय बारीकबारीक पाकळ्या वेचतीहेस… चांगली फुलं पण निघालीत भरपूर.. दे आता पिशवी.. बाकी कचरा टाकून देते’ असं माझं जरा वैतागलं वाक्य! मागं एकदा आई माझ्याकडं आली असताना फुलांच्या छोट्या पिशवीतून देवपूजेसाठी फुलं काढत होती. बरीच फुलं पारच बावली आहेत असं लक्षात आल्यावर म्हटलं, ‘संध्याकाळी नवी फुलं आणूया. आज आता चांगली सगळी घेऊन टाक पुजेला आणि खराब झालेली टाकून देते. फार कुजली तर वास येत राहातो फ्रिजमधेही!’ ‘हो, तसंच करते’ म्हणत ती फुलं निवडू लागली. मी माझ्या उद्योगातून मधेच स्वयंपाकघरातून बाहेर आले तरी ही अजून अगदी शेवंतीच्या फुलांच्या गळलेल्या अतीबारीक पाकळ्यांतूनही चांगल्या पाकळ्या निवडतच होती. मुळात चार-सहा देव आणि चार-सहा फोटो इतकंच काय ते देवघर! बाजूला निघालेल्या चांगल्या फुलांचा बऱ्यापैकी ढीगच देवांच्या मानानं खूप होता आणि आई उगीच जीव का शिणवतेय ह्या विचारानं मी वैतागून तिला ‘बास कर’ म्हटलं. त्यावर ती मानही वरती न करता शांतपणे पाकळ्या निवडत स्निग्धपणे म्हणाली, ‘त्यांचा पण जन्म वाया जाऊ नये गं! अगदी बावलेलं काही वाहाता येणार नाही देवाला, पण ज्या पाकळ्या अजून जरा टवटवीत आहेत त्या तरी वाहाते.’ ‘जाऊदे, आपल्याला कुठं काय तोशीस आहे, करुदे काहीतरी’ असं मनाशी म्हणत मी परत स्वयंपाकघराकडं वळले… मात्र नंतर कधीतरी असे आपल्याही नकळत रुजलेले क्षण तरारून उगवून येतात अचानक!

तसंही काही गोष्टी ह्या आपल्याकडं अपरिहार्य असतातच… अगदी रट्टे देऊन गळी उतरवलेल्या! पान इतकं स्वच्छ असलं पाहिजे कि माणूस त्यात जेवलं आहे कि नाही कळू नये, भांडी घासायला टाकताना ती स्वच्छ निपटलीच पाहिजेच… अन्नाशी मस्ती करायची नाही म्हणजे पर्यायाने अन्नाच्या एकेका कणाचा जन्म सार्थकी लागला पाहिजे. साडी जुनी झाली कि पूर्वी त्याची गोधडी व्हायची, फाटलेल्या कपड्यांच्या पिशव्या व्हायच्या… धाग्याचा जन्म पूर्णपणे सार्थकी लागायचा.  वहीतल्या उरलेल्या कोऱ्या कागदांची दाभण-दोऱ्यानं विणून वरती छान कोरा कागद चिकटवून त्यावर नक्षी रेखून दिमाखदार होममेड वही व्हायची. त्यातही कोरे कागद प्रत्येकी चार भागांत कापून गृहपाठ उतरवून घ्यायला केलेली पिटुकली वही तर काळजाच्या फारफार जवळची असायची. आज पाच ते पंचवीस ते शंभर रुपयांपर्यंत किमान दर्जापासून बऱ्या, मध्यम ते उत्तम दर्जापर्यंत वह्या सहजी बाजारात मिळतात… पण मला त्या भावत नाहीत. कागदाचा पर्यायानं वृक्षराजाच्या काळजाचा एकेक कण सार्थकी लावताना त्याचे जे नकळत आशीष लाभायचे ते ह्या वह्यांमध्ये कुठून यायचे आणि त्याशिवाय आपलं काळीज त्याच्याशी कसं जोडलं जायचं!?

गतिमानतेची अपरिहार्यता, त्यातून बंद झालेली मनाची कवाडं, अती बरकतीसोबत येणारा अहंकार, कोडगेपणा आणि कोरडेपणा, काळजाची गुंतवणूक हरवलेली स्पंदनं.. ह्या सगळ्यातून जुन्या सोन्यांतलं झळाळलेपण मागं पडत गेलं, आपणं अंतर कोरडंठक्क झालंय, स्वत: किती दर्जेदार जगतोय असा विचारही मनात येत नाही तर हळवे धागे गुंफत दुसऱ्याचा जन्म सार्थकी लावण्याचा विचार फारच दूर! त्यातून भाळी येणारं नैराश्य, वैफल्य, एकाकीपणही आपण सोसत होतो्च… मात्र वेगानं फिरणाऱ्या जगण्याच्या ‘मेरी गो राऊंड’ला थोपवायचं कसं हाही प्रश्न होताच. काही ओढवून घेतलेली आणि काही काळानुरूप स्वीकारावी लागलेली अपरिहार्यता कळसावर पोहोचून खदाखदा हसून आपला अंत पाहात होती आणि एका क्षणी अनपेक्षितपणे हे ‘मेरी गो राऊंड’ थांबलं… थोड्याश्या भयशंकांमधेही जगणं किंचित स्वस्थावलं आणि काही अवधीनं जेव्हां चक्र उलट दिशेनं फिरू लागलं तेव्हां अंतरी नकळत रुजलेल्या जाणिवांना पालवी फुटू लागली. स्वस्थावलेपण विरत जात कुठंतरी क्षणांचा जन्म सार्थकी लागतोय असं मनात आलं आणि आईच्या वाक्याची आठवण झाली.

ज्या मृगजळामागे वेड्यासारखे धावत होतो ते अख्खं मृगजळ अचानक लुप्त झालं, धावणं थांबलं तरी जगणं थांबलं नाही, उलट ते मोहरू लागलं… जन्म सार्थकी लागल्या क्षणांचे भरभरून आशीर्वाद मिळूनच कदाचित तृप्तावलं, शांतावलं, सुखावलं. पुरवूनपुरवून वापरताना अन्नाच्या एकेका कणाला जपलं जाऊ लागलंय, घरट्याच्या कानाकोपऱ्याला गोंजारलं जाऊ लागलंय, बेदरकारपणे टाकाऊ म्हणून फेकल्या जाणाऱ्या गोष्टींतलं सौंदर्य टिपायला नजर सरावतेय आणि त्यातून सृजनाचे रंग उधळले जाताहेत, माळ्यावरच्या अडगळीतली अनमोल हिरे-माणकं खाली येत त्यांना पैलू पाडून कोंदणात सजवण्याचा नाद लागला आहे, देवघरातली बेगडी माळ दूर सारली जात सांजवात उजळू लागलीये, शुभंकरोतीच्या सुरांनी तिन्हीसांज सजू लागलीये. दूरस्थ नात्यांशी संवाद घडू लागलेत… सर्वांना सुखी ठेव म्हणताना त्यांच्यासाठी आठवणीनं हात जोडले जाऊ लागलेत. सोय असूनसुद्धा आता व्हिडिओ कॉल नको वाटू लागलाय, लवकरात लवकर एकदा ग्रहण सुटून जिवाशिवाच्या भेटीचीच जीव वाट पाहू लागलाय. बहुधा काळजचं रितेपण, संवेदनांचं शुष्कपण जाऊन घराचं घरपण, जगण्यातलं जिवंतपण परत येऊ लागलंय!

खरंतर हे सगळंसगळं अस्तित्वात होतंच.. मात्र त्याचं अस्तित्व जाणवून घ्यायला ना आपल्याकडे वेळ होता, ना मनाच्या बंद कवाडांना त्याची चाहूलही लागत होती. सुरेश भटसाहेबांच्या, उरले उरांत काही आभास चांदण्याचे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली…. ह्या ओळींप्रमाणं आज आपण जेव्हां रिते झालो आहोत…. त्यावेळी मनाच्या कप्प्यात खोलवर रुजलेल्या ह्या गोष्टी आपल्यासाठी चांदण्यांचे आभास होऊन सामोऱ्या आल्यात. आज त्यातल्या तारकांची आभा आपल्याला जाणवायला लागली आहे. आता हे जपायला हवं असं कुठंतरी आत जाणवू लागलं तशी मी प्रहार ह्या अप्रतिम हिंदी सिनेमातल्या मंगेश कुलकर्णींच्या अप्रतिमच शब्दांशी पोहोचले…

हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा

कभी ना ढले जो, वो ही सितारा, दिशा जिससे पहचाने संसार सारा

वाटलं, हाती येऊ लागलेलं आकाश आता मुठीत घट्ट पकडून ठेवायला हवं. त्यातल्या आपल्याच जिवाला लुभावणाऱ्या चांदण्या, तारका, नक्षत्रही हातून निसटता कामा नये. नैराश्याचा झाकोळ दूर करणारी ही रत्नमाला जपायला हवी. त्यातून संवेदना जिवंत होताहोता जगण्याला भान येईल… जे आजूबाजूलाही संवेदनशील डोळसपणे पाहायला शिकवेल… ज्यातून ज्ञानोबारायांच्या,

हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपणची जाहला ॥…. ह्या शब्दरत्नांच्या तेजार्थाचीही कदाचित अनुभूती मिळेल.

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मंगळसुत्र ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ मनमंजुषेतून ☆ मंगळसुत्र ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

लग्नात सप्तपदी चालून सातजन्म एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतात दोघेजण, तेव्हा खोलवर मनात रुजते ती आपुलकीची, प्रेमाची, आणि त्याच बरोबर जबाबदारीची जाणीव. एकमेकांची सुख, दुःख,आता दोघांची होऊन जातातआणि नकळत माझे, तुझे हे आपले होऊन जाते. कोणते ही संकट आले, तर त्याला दोघांनी मिळून सामोरे जाऊन त्या संकटाशी दोन हात करायचे आहेत ह्याची जाणीव होते.

काळ्या मण्यांचा सुरेख दागिना जेव्हा आपला जोडीदार आपल्या गळ्यात बांधतो तेव्हा पावित्र्याची, कर्तव्याची, प्रेमाची जाणीव होते. सगळ्या दागिन्यात हा उठून दिसत असतो. मुहूर्तावर बांधलेला तो मुहूर्त मणी सगळ्या अलंकाराना मागे टाकतो आणि सौभाग्याचे लेणे म्हणून दिमाखात सजतो.

त्याचे पावित्र्य घेऊन जेव्हा नववधू घरचा उंबरठा ओलांडते तेव्हा ती घरची लक्ष्मी म्हणून गृह प्रवेश करते. तांदुळाने भरलेले मापटे जेव्हा ती ओलांडून आत येते तेव्हा माझे हे घर आनंदाने समृद्धीने सुखशांतीने भरून जाऊदे हीच मनोकामना करत असते.

ती ह्या नवीन घरात रूळायचा मनोमन प्रयत्न करत असते. फक्त हे करत असताना तिला साथ हवी असते ती आपल्या जोडीदाराची. त्याने समजून घेण्याची. ज्याच्या विश्वासावर ती आपली सारी माणसे, आपले माहेर मागे सोडून आलेली असते. नवीन घरात नवीन माणसांचे स्वभाव आवडीनिवडी समजून घेण्यासाठी तिला साथ हवी असते आता आपल्या मित्राची. म्हणजेच आपल्या नवर्‍याची.माझ्या मते जर आपला जोडीदार उत्तम मित्र बनू शकला तरच उत्तम जोडीदार बनू शकतो. नाही तर तिथे पुरुषी अहंकार डोकावतो.

एका गाडीची आता आपण दोन चाक आहोत आणि आपल्याला आता बरोबरीनं जायचे आहे हे जर त्याला उमगले तर खरच सुखी संसार होण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. पण हे त्याला खरच उमगत असते का? का फक्त मणी गळ्यात बांधले म्हणजे आता ती आपल्या मालकीची झाली, आता तिने त्याच्या होला हो म्हणून फक्त चालत रहायचे त्याच्या बरोबर त्याची साथ नसतानाही?

त्या काळ्या मण्यांनां खरा अर्थ तेव्हा मिळतो जेव्हा नवरा आपल्या बायकोला आपल्या बरोबरीचा दर्जा देतो, मान देतो.मान देणे म्हणजे तिच्या प्रतेक म्हणण्याला होला हो करणे नव्हे, पण तिच्याही मनाचा, मतांचा आदर करणे, तिलाही भावनां आहेत ह्याची जाणीव ठेवणे .खांद्याला खांदा लावून जेव्हा दोघ संसाराचा गाडा ओढतात तेव्हा होतो खरा सुखी संसार.

आता नेहमी मला प्रश्न असा पडतो की ह्याची जाणीव खरच नवऱ्याला असते का?का असूनही तो डोळेझाक करतो सोईस्कर रित्या? कित्येक घरं अजूनही अशी आहेत जिथे अजुनी पुरुष प्रधान संस्कृती आहे. मी म्हणीन तेच आणि तसेच, जिथे बायकोच्या भावनांना शुन्य किंमत असते. की एकदा काळे मणी बांधले गळ्यात की तिच्यावर हक्क गाजवायला मोकळा होतो तो ?आपण जे सांगू ते तिने करायचे,तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून?

जो हे गळ्यात बांधतो त्याला हीआपली सहचारिणी, अर्धांगिनी आहे ह्याची जाणीव असते का? आता तीची सुख दुःख ही आपली आहेत ह्याची कल्पना असते का?तिच्या भावनांची कदर खरच केली जाते का?

मंगळसूत्र नुसते काळे मणी नसून शक्ति असते तिची. दागिना नसून सौभाग्य असते तिचे. तिचा अभिमान असतो. ज्याच्या जिवावर ती आपले घर, आई, वडील सगळे सोडून आलेली असते ते फक्त त्याच्या विश्वासाच्या आधारावर. हा विश्वास टिकून द्यायचा की नाही हे सर्वस्वी जोडीदाराच्या हातात असते. तस झाल नाही तर तो नुसताच एक दागिना म्हणून गळ्यात राहतो.

एक सामान्य दागिना. फक्त काढता येत नाही म्हणून गळ्यात अडकवलेला.

सहज मनाच्या कोपऱ्यातून? 

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

(19.8.2020)

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ।।श्री।। नवरात्र…..☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ विविधा ☆ ।।श्री।। नवरात्र….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार’☆

चला मंडळी मी तुम्हाला आता माझ्या माहेरीच घेऊन जाते, नवरात्राच्या … पुजे साठी…! हो पण मी आता ९/१० वर्षांची मुलगी आहे बरं का .. तुम्ही ही थोडे लहान व्हाच माझ्या बरोबर ..म्हणजे कशी मजा येईल नाही का..?

तेंव्हा फारसे कळत नव्हते याचे आता वाईट वाटते .. आई राबायची . काही काम सांगायची नाही. दसरा यायच्या आधी १५ दिवस तिची लगबग सुरू व्हायची.

आता ते लहानपणी पाहिलेले सारे.. डोळ्यांसमोर लख्ख दिसते मला . हो .. खेड्यातले घर .. मातीच्या भिंती, चूल नवरात्र सुरू होतांना घट बसवायच्या आधी सारी साफसफाई झाली पाहिजे . रोजच्या कामांचा धबडगा त्यात घराला पोतेरे करणे, चुनखडीची पांढरी माती आणवून पूर्ण घर ती लख्ख करायची, सर्व घर शेणाने सारवून घ्यायची, नि मग बाकीची तयारी सुरू व्हायची .

गहू ओले करणे. हो सांजोऱ्या पुऱ्यांचा नैवेद्य लागतो ना ? मग गहू ओलणे, ते बांधून ठेवणे ते स्वत: जात्यावर दळणे, त्याची रवा पिठी वेगळी करणे … ही…..कामांची झुंबड  उडायची विचारू नका .. म्हणून आता आठवले की, डोळे भरून येतात .. काहीच का उपयोगी पडलो नाही आपण आईच्या ? का तिने कामाला लावले नाही मला …? ह्या आया  असतातच अशा …स्वःताच झिजतात …

मग दारावर कुंभारीण डोक्यावर मडक्यांचा मोठा हारा घेऊन यायची  . हो तेव्हा गावचे १२ बलुतेदार गावची  सेवा करायचे नि दाम रोख न मागता सुगीत खळ्यावर येऊन धान्याच्या रूपात मोबदला न्यायचे . कुंभारीण दारात ऐसपैस बसायची नि आई तिच्या पसंतीची मडकी निवडून घ्यायची घटा साठी ! एक मोठे व दोन छोटी .. त्याला लोटा म्हणायचे आमच्याकडे खानदेशात .. तरी आई तिला भाजी भाकरी, गहू बाजरी द्यायची . कुंभारीण खूष होऊन जायची . मी तिथेच आई जवळ 11लुडबुड करत असायची . मग आई त्या कोऱ्या मडक्याला धुण्यासाठी त्यात पाणी ओतायची नि मस्त खरपूस वास सुटून हलकीशी वाफ त्यातून निघत सुर सुर असा आवाज येत ते मडके पाणी शोषून घ्यायचे कारण ते भट्टीतून भाजून काढलेले असायचे ना ?

मग प्रथमेला एका विशिष्ट जागी जिथे फारशी वर्दळ नाही अशा खोलीत देव्हारा लख्ख करून त्याच्या समोर जमिनीवर गहू बाजरी गोल अंथरून पाण्याने भरलेला घट त्याच्यावर बसे व त्याच्यावर तो छोटा घट -ठेवला जाऊन दोन्ही घटांना फुलमाळा लटकत .

अहो त्या काळी ६० वर्षांपूर्वी फुले कसली खेड्यात …? तर शेतात असणाऱ्या रुई च्या झाडांची फुले सालदार गडी शेतातून येतांना घेऊन यायचा नि त्यांची माळ बनायची ..ती माळ दोरीने वर पर्यंत टांगलेली असायची . आणि हो .. एक मोठा पावशेर तेल मावेल असा दगडाचा खोल दिवा ती घासून पुसून ठेवायची निमोऽऽऽऽठी वात करून त्यात भरपूर तेल ओतून पेटवायची ..किती प्रसन्न नि छान वातावरण निर्माण व्हायचे ! घरोघर घट बसायचे . त्याच चर्चा व्हायच्या .. आई रात्री १० दिवस घटा जवळच गोधडी टाकून झोपायची .. हो, दिवा १० दिवस अखंड तेवत ठेवायचा ना … ! म्हणून रात्रीतून चार वेळा उठायची .. वात सारखी करायला … हे सारे आठवले म्हणजे त्यांच्या निष्ठेचे कौतुक वाटते.

१० व्या दिवशी काय मज्जा ! किती पदार्थ बनवायची .. आताही मला जाळीदार स्टॅण्डला तो टांगलेला फराळ दिसतो आहे .. टम्म सांजोऱ्या . गरगरीत पुऱ्या .. अहा बघूनच मन तृप्त होत असे .. मी तेव्हा किती काय खाल्ले आठवत नाही पण तो टांगलेला फराळ कायमचा स्मृतीत दडलेला आहे …. तो नजरे समोरून हटत नाही ..देव्हाऱ्याजवळ मुटकुळ करून झोपलेली आई दिसते … आणि हो या दहा दिवसात घटा खालच्या गहू बाजरीला भरगच्च हिरवेगार धान जवळपास ९/१० इंचापर्यंत वाढून सुंदर दिसायचे …! रोज फुलमाळा बदलल्या जायच्या… पवित्र नि मंगल वातावरणाने घर भरून जायचे …!

आता मी नवरात्रीचा विचार करता … असे वाटते की …काळानुसार स्वरूप बदलले आहे ..  उत्साह मात्र प्रचंड आहे ..घराघरातूनअंगणातून गर्बा आता खुल्या मैदानात आला आहे.. तरूणाई थिरकते आहे, आनंद लुटते आहे . अबालवृद्ध मोठ्या चवीने गरबा बघतात आनंद लुटतात .. रस्तो रस्ती चैतन्य सळसळतांना दिसते ..नवरात्र ते दिवाळी आनंदाला नुसते उधाण येते ..

नवरात्रात घरोघरी बसलेल्या घटा खाली उमललेले हिरवे धान हे…. हे देवीच्या  ……. सृजनशीलतेचे प्रतिक आहे ..घरोघर तिची पूजा अर्चा होते, गणेश चतुर्थी पासून सुरू झालेल्या सणांची दिवाळी नंतर सांगता होऊन  हे उत्साहाचे पर्व समाप्त होते … ते हिवाळ्याच्या दुलईत गुडूप होऊन शांत होते…

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि . २३/०९/२०२० वेळ : रात्री ११:२५

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भोंडल्याची सोळा गाणी ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भोंडल्याची सोळा गाणी ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

‘सूर नवा ध्यास नवा ‘ या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी किमान दोन वर्षापूर्वी प्रश्ण विचारला होता पण त्यानिमित्याने सुरु झालेला  ‘भोंडल्याची१६ गाणी’ चा प्रवास अजूनही सुरु आहे आणि मुख्य म्हणजे तो खूप सुखावह आहे. अनेक जण बालपणीच्या आठवणीत दुनियेत रमत आहेत

तर जरा यात बदल म्हणून

‘दिवस नवा, टवाळखोरी पून्हा ‘ या आमच्याच एकतर्फी कार्यक्रमात ही ‘अमल्याची काही गाणी’ ?

(टीप : मनोरंजन हा हेतू)

 

करोना करोना, इथे तिथे देवा

ऑनलाईन खेळूनच, यंदा तुझी सेवा

झूम आयडी ठरला  दुपारच्या पारी,

पासवर्ड धाडला व्हाटसपवरी

मेसेज वाचल्याचा पाहिला टिक्का

आमच्या ग्रुपच्या हुश्शार बायका

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

एक मास्क घेऊ बाई, दोन मास्क घेऊ

दोन मास्क घेऊ बाई तीन मास्क घेऊ

रंगीत मास्क घेऊ बाई,डिझाईन पाहू

आठवड्या भराचा साठा

भारी फोटो स्टेटसला टाका

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

अक्कल बातमी, बक्कळ बातमी,रिपोर्ट तो खणावा

अस्सा रिपोर्ट सुरेख बाई,ट्विट ते रोवावं

अस्सं ट्विट सुरेख बाई, चर्चा ती करावी

अश्शी चर्चा सुरेख बाई, चॅनेल ते बघावं

अस्सं चॅनेल सुरेख बाई, पैशाचं जमावं

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होता बत्ता

लोकशाहीला लेक झाला, नाव ठेवा सत्ता

 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होती भाकर

भक्त असो वा चमचे सगळेच आपले चाकर

 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होता पाटा

पाच वर्षात निवडणूक आली, आश्वासनं परत वाटा

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

‘कार्डशेडचा’  वेल लाव गं सुने, लाव गं सुने

मग जा आपुल्या माहेरा माहेरा

कार्डशेडचा’  वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘काढ्याचा’  डोस वाढू दे गं सुने, वाढू दे गं सुने

मग जा तू  आपुल्या माहेरा माहेरा

‘काढ्याचा’  डोस वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘पार्ल्याचे’ बिस्कीट खा गं सुने, खा गं सुने

मग जा तू  आपुल्या माहेरा माहेरा

‘पार्ल्याचे बिस्कीट’ खाल्ले हो सासुबाई खाल्ले  हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘आरेची’ दृष्टं काढ ग सुने, काढ ग सुने

मग जा तू आपल्या माहेरा माहेरा

‘आरेची दृष्ट काढली हो सासुबाई काढली हो सासुबाई

आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा

आणा जेसीबी,वापरा जेसीबी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

वाच बाई वाचुनी

वाचुन पुढे ढकलुनी

‘टवाळखोर’ नशीब दमला

टुकार भोंडला  संपला ?

 

टीप:  निवडक गाणी ☝️

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘दिवनाली’ कवितेचं रसग्रहण ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ काव्यानंद ☆ ‘दिवनाली’ कवितेचं रसग्रहण ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

रसग्रहण:

व्यक्तीच्या स्वभावाच्या, आचारविचारांच्या साधेपणाचे उत्कृष्ट प्रतीक जर दाखवायचे तर ते म्हणजे, कवयित्री इंदिरा संत. खरंतर त्यांचा फोटो बघितल्यावर जाणवतं की,  यांचं आडनाव फक्त आणि फक्त ” संत” च योग्य आहे. त्यांच्या कविता म्हणजे अतिशय साध्या सोप्या शब्दात गुंफलेला उत्कट भावनांचा रम्य आविष्कार.

इंदिरा संत आणि त्यांचे पती, दोघेही कवी मनाचे .

आयुष्यात अवेळी अचानक कोसळलेल्या पतिनिधनाच्या आघातामुळे त्यांची कविता नेहमीच वेदना, विरह, स्मृति यांतून गुंतून राहिली. आणिे  स्वाभाविक होते.

पण ” दिवनाली ” ही कविता बहुतेक त्यांच्या संसाराच्या सुरवातीच्या काळातली असावी.

नव्या नवतीच्या विवाहोत्तर काळात सगळं जग त्याच्याच ठिकाणी एकवटलेलं असतं.केंद्र बिंदू तोच.त्यानं सतत जवळ असावं, प्रेमानं त्याच्याकडे काही मागावं, आणि त्यानंही ते भरभरून द्यावं , ही स्त्री सुलभ चिरंतन भावना.

शब्द इतके साधे, सोपे की वाचू लागताच अर्थ उमलू लागतो. वाचक इतका समरस होतो की ही कविता आपल्यासाठीच आहे असे वाटू लागते. तीच तल्लीनतेची तद्रूपतेची भावना व्यक्त करणारी कविता “दिवनाली”.

तू नेहमी जवळ असावास किंवा तू जवळ असल्याचा भास व्हावा म्हणून तुझ्याकडे एकच फूल मागितले,  म्हणजे त्याच्या सुगंधी दरवळाने तू जवळ असल्यासारखे वाटेल, तर तू…….माझ्या अंगणातले हिरवेगार वृक्षच तिन्ही त्रिकाळ बहरत ठेवलेस !

कानात कायम तुझा आवाज गुंजत रहावा म्हणून मी एक शब्द हवा म्हटले , तर तू……समुद्राच्या लाटांची फेसाळ थेंबांची कर्णफुले माझ्या कानांवर गुंफलीस !

तुझा स्पर्श,  तुझा रोमांचित करणारा स्पर्श मला हवा म्हणून मी मान जरा उंचावून धरली तुझ्यासमोर,  तर तू……स्पर्शाने अशी लाली पसरवलीस की कपाळावर ज्योतशी उमटली.

अशा तुझ्याकडून भरभरून मिळालेल्या सुखाने मी इतकी सुखावले, आणि भारावून गेले की नखशिखांत उजळून निघाले. जणू काही निरंतर तेवणारी दिवनाली झाले. प्रकाशमयी समई झाले.

तिनं इतकंसं मागावं, त्यानं भरभरून द्यावं. ह्या सगळ्या सुखात न्हाऊन, प्रेमरंगात रंगून ती ज्योती प्रमाणेच तेजाळली. स्वतःच ज्योत झाली. ज्योतीची दिवनाली झाली.

पती-पत्नीच्या प्रेमाचं इतकं उत्कट, इतकं ऐश्वर्यी रूप दैवी अलौकिक आहे.

नवीन लग्न झालेल्या मुलीच्या प्रेमभावना इतक्या साध्या सोप्या शब्दात पण अतिशय समर्पकतेने व्यक्त करणं हेच इंदिरा संतांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. अतिशय स्वाभाविक,  जे हवे ते मागून घ्यायचं, आणि त्यानं उधळलेलं सुख तन मन भरून आणि भारून व्यक्त व्हायचं,  हा कवितेचा साधा सरळ अर्थ. शब्द कसे? तर थेट इच्छा प्रकट करणारे.लपवाछपवी नाही कि लाजरेबुजरेपणा नाही. पण तरीही कुठेच उथळपणा नाही.  उच्छृंखलता नाही. जे व्यक्त करायचे ते अगदी हळुवारपणे, ओंजळीतून फुले हलकेच ठेवावीत तसे.

कवयित्रीला जे सांगायचं आहे, जे मनातले भाव पोचवायचे आहेत ते अगदी अलवारपणे ह्रुदयापर्यंत पोचतात, कुठेही तोल न ढळता.

कविता वाचताना सुरवातीपासून एक अव्यक्तअर्थ डोकावत रहातो. देवघरातील देव आणि तेवत असणारी समई यांचं अजोड नातं आहे.  समईचं प्रकाशणं हे देवाचं देणं, आणि त्या ज्योतीप्रकाशात देवांचं तेज उजळून दिसतं, हा तन्मयतेचा भाव  आहेच. स्त्रीच्या स्थानी एका समईची कल्पना केली तर, उत्कटता तीच आहे. समईचं  निरंतर तेवणं आणि ईश्वराने भरभरून वरदान देणं.  दिवनालीच्या ज्योतीची तेवत राहणारी, ईश्वरी प्रचीतीच्या अपरूपात रंगून नित्य तेवणारी दीपशिखा,  तीच दिवनाली.

असा दुहेरी गोफ उलगडून दाखवणारी आणि मनात कायम रुंजी घालणारी कविता  ” दिवनाली “ .

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print