मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ लघुकथा संग्रह “संवेदना” अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

निवेदन –

आपण अनेक पुस्तके वाचतो. त्यातील काही पुस्तकं आपल्याला आवडतात. त्यावर बोलावं, इतरांना सांगावं, असं आपल्याला वाटतं.  कित्येकदा आपल्या पुस्तकाबद्दल इतरांशी बोलावं, आपली त्यामागची भूमिका मांडावी, असंही काही वेळा  वाटत. या वाटण्याला शब्द देण्यासाठी एक नवीन सादर सुरू करत आहोत,पुस्तकांवर बोलू काही.’  आज त्यातील पहिला लेख  सुश्री संगीता कुलकर्णी यांचा.

संपादक मंडळ – ई – अभिव्यक्ती 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ लघुकथा संग्रह “संवेदना” अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

अनुवादित पुस्तक – संवेदना

मूळ हिंदी लेखक – डाॅ. कमल चोपडा

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

समकालीन हिंदी प्रस्थापित लेखकांमध्ये  डॉ कमल चोपडा हे एक महत्वाचं नाव. त्यांच्या हिंदीतील निवडक लघुत्तम कथांचा अनुवाद  संवेदना या नावाने श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी केला आहे..

आपल्या सभोवतालचं जीवन त्यातील सहजता, गंभीरता, तर कधी कधी भयावहताही ते सहजतेने पाहतात व अनुभवतात. तसेच आपल्या भोवती घडणारे घटना- प्रसंग, ते घडवणा-या विविध व्यक्ती, त्यांचे विचार, विकार, वर्तमानात जाणवणारी सुसंगती- विसंगती, स्वार्थ, त्याग, सांमजस्य ताठरता यांचे ते सूक्ष्म निरीक्षण करतात.

श्रीमती उज्ज्वला केळकर

या त्यांच्या पुस्तकातील कथांत लक्षणीय विविधता आहे. कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक व्यवहार, सांप्रदायिक दंगे, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील अनेक पैलू या कथांमध्ये आहेत. कौटुंबिक नात्यातील अनेक प्रकारचे भावबंध त्यांनी उलगडलेले आहेत. मुलं, त्यांचे आई-वडील भावंड, सासवा- सूना या नात्यातील आत्मियता, प्रेम, जिव्हाळा त्यांच्यातील ताण-तणाव त्यातून प्रगट झालेले भाव- भावनांचे कल्लोळ या सा-याला चिटकून राहिलेले दारिद्रयाचे अस्तर त्यातूनच झरणारी आत्मीयतेची माणुसकीची जाण हे सर्व या कथांमधून प्रगट होते.

सासू-सुनेचे संबंध तर जगजाहीर… पण इथे मुलगा आणि सून यांच्यातील बेबनाव दूर करणारी सासू आहे. “ओठांत उमटले हसू– मूळ कथा छिपा हुआ दर्द ” या कथेत तर गावाहून सासू-सास-यांना भेटायला आल्यावर घरात फक्त मक्याचचं पीठ शिल्लक आहे बाकी काही नाही हे कळल्यावर…आम्ही फक्त तुमच्याच हातच्या मक्याच्या रोट्या खायला आलो आहोत पण त्या सोबत दूध, लोणी, तूप, साखर असं काहीही घालू नका. डाॅक्टरांनी आम्हाला खाऊ नका म्हणून सांगितलयं…असं म्हणत सासूचा आत्मसन्मान जपणारी समंजस सून आहे.

पतीचा अन्याय सहन करणारी स्त्री हे चित्र तर आपल्याला जागोजागी दिसतं. ” पती परमेश्वर–मूळ कथा- पालतू ” या कथेत तर दुस-या बाईकडे जाण्यासाठी बायकोकडे पन्नास रुपये मागणा-या नव-याचे पाय सुपारी देऊन गुंडाकडून निकामी करणारी व नंतर त्याला औषधोपचार करून भाजीच्या गाडीवर बसवून त्याला कामाला लावणारी व माझा पती ” पती परमेश्वर ” असेही म्हणणारी विरळा बायको भेटते…. दारूडा नवरा मेल्यानंतर आठ दहा वर्षांचा मुलाला सोडून दुसरा घरोबा करणा-या आईचं दुःख समजून घेणारा..आपल्याला सोडून गेल्यावरही आपल्यात कटुता येऊ न देणारा ” असेल तिथे सुखी असो– मुळ कथा– जहाँ रहे सुखी रहे ” अशी इच्छा बाळगणारा मुलगाही येथे आपल्याला भेटतो..

सांप्रदायिक दंग्याच्या पार्श्वभूमीवरच्या अनेक कथांही यात आहेत. पण प्रत्येक कथेचा रंग वेगळा सांगण वेगळ…” विष-बिज ” मूळ कथा विष-बिज मधील म्हातारी म्हणते लूटमार, आगं लावणं यामुळे तुमच्या धर्माची प्रतिष्ठा कशी वाढेल? उलट अशा प्रत्येक घटनेतून तुमच्या शत्रूंची संख्याच वाढत जाईल आणि मग ही आग तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मुलांबाळांपर्यंत पोचेल….

तर “तपास–मूळ कथा- शिनाख्त ” या कथेत पोलिसांची कुत्री त्या भागातला एक कुख्यात गुंड एक आमदार एक गुन्हेगार यांच्यापर्यंत पोचतात. इन्स्पेक्टर आझाद आपल्या अधिका-याला अहवाल सादर करतो. खरे गुन्हेगार कोण? हे कळल्यावर तो अधिकारी म्हणतो तुला ‘ तपास ‘ नाही ‘ तपासाच नाटक ‘ करायला सांगितलं होतं. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो माझा तपास पूर्ण झालाच नव्हता. चौथ्या गुन्हेगारापर्यंत मी पोचलोच नव्हतो. चौथा गुन्हेगार पोलिस म्हणजे आपण..

आजारी मुलाच्या औषधपाण्यासाठी पैसे हवे असलेला एक सामान्य माणूस..पैशासाठी बस मध्ये बाँम्ब ठेवायला तयार होतो. उतरता उतरता त्याला एका लहान मुलाचं रडणं ऐकू येतं. त्याला ते आपल्याच मुलाचं वाटतं व तो बस मध्ये बाँम्ब आहे हे सगळ्यांना सांगून खाली उतरायला लावतो. लहान मुलाचे रडण्या- हसण्याचे आवाज आपल्याच मुलासारखे कसे वाटतात? मग ते कुठल्या का धर्माचे असेनात…कथा– ‘धर्म– मूळ कथा– धरम ‘

‘सफरचंद– मूळ कथा– फल’ व ” पैसा आणि परमेश्वर — मूळ कथा–पैसा और भगवान ” या कथांत तर मुलांचे मन, त्यांना पडणारे गमतीदार प्रश्न मांडले आहेत. ” पैसा व परमेश्वर ” या कथेत तर देवाला पैसे टाकताना पाहून ‘ देव भिकारी आहे का? ‘ त्याला पैसे टाकून त्याच्याकडे भिका-यासारखं काही का मागतात? त्याला जर पैसे हवे असतील तर तो आपल्या जादूने पैशाचा ढिग निर्माण करणार नाही का? असं विचारणारा व विचार करायला लावणारा निरागस पिंकू इथे आहे…

अशा अनेकविध कथांतून सांप्रदायिक कट्टरतेच्या दरम्यान सद्भभावना आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीचा आशय अतिशय सुंदररित्या मांडलाय..विविध पातळ्यांवर विविध अंगाने होणा-या शोषणाचे अनेक रूपरंग त्यांच्या या कथांतून प्रगट झाले आहेत..

डाॅ. कमल चोपडा यांच्या कथा जीवनातील, लोक व्यवहारातील, आचार-विचारातील विसंगतीवर नेमकं बोट ठेवते व मोजक्याच शब्दांतून त्यांचं मार्मिक दर्शनही घडवतं..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

मो 9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुख म्हणजे काय ☆ सौ. राधिका भांडारकर

 ☆  विविधा ☆ सुख म्हणजे काय ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

माझ्या आजोबांच्या घरात दर्शनीच भिंतीवर एक मोट्ठी पाटी होती. त्यातलं पहिलं वाक्य चांगलच ध्यानात आहे!

समाधान हेच खरे सुख! गंमत म्हणजे लहानपणी, मोठे होत असताना सुखाविषयीची अनेक सुभाषिते ,श्लोक ऐकले अन् अभ्यासिले.

जगी सर्वसुखी असा कोण आहे? किंवा,

अलसस्य कुतो विद्या

अविद्यस्य कुतो धनम्

अधनस्य कुतो मित्र

अमित्रस्य कुतो सुखम्

कधीतरी माझ्या मनात, हाश्लोक आठवला आणि आले, आळशी असुनही शिकलोच की! पदवी मिळाली! नोकरी मिळाली..

मित्रपरिवार तर लहानपणापासून विस्तारलेलाच!

म्हणजे हा श्लोक आपल्याला लागू होत नाही!

मग हे सगळे ऊदात्त सिद्धांत मी जरा बाजुलाच ठेवले आणि माझ्या सुखाच्या ,आनंदाच्या व्याख्या तपासून पाहिल्या. शाळेत असताना ,मे महिन्याच्या सुट्टीत अडीचकं (आता हे पाढे वगैरे प्रकरण संपुष्टातच आलय्) म्हटलं की वडील अडीच आणे द्यायचे आणि मैदानात भाड्याची सायकल चालवायची परवानगी द्यायचे.. केव्हढा आनंद व्हायचा!

अबोला धरलेली जीवलग मैत्रीण एकदम एके दिवशी गळामीठी द्यायची!तो असायचा परमोच्च सुखाचा क्षण!

छोटे छोटे सुखाचे अनंत क्षण!

बसच्या भल्यामोठ्या रांगेत ऊभे असताना, आपल्याला हवी असलेल्या नंबरची बस आली की,सगळ्यांना ओलांडून बसमधे शिरताना होणारा आनंद कसा सांगू?

रेल्वेने प्रवास करत असताना आपल्या आरक्षित जागेवर कुणीही आगंतुक बसलेले नाहीत म्हणून भांडण टळल्याचा तो आनंद माझ्रासाठी विलक्षण असतो!

माझ्यासाठी वरसंशोधन चालु असताना, वडीलांनी विचारले,”तुझ्या जोडीदाराबद्दल काय अपेक्षा आहेत?”

मी लगेच ऊत्तर दिले,”जेवताना भुरके मारणारा आणि ताटात अन्न सांडणारा नवरा नको मला!”

आणि खरोखरच पुरुषांत अभावानेच अढळणारा व्यवस्थितपणा असलेला जोडीदार मिळाला अन् मी भरुन पावले!

पुढेपुढे माझ्या सुखाच्या व्याख्या बदलतच राहिल्या.

म्हणजे मदतनीस वेळेवर आली तर होणारा आनंद अन् त्यातून जाणवणारं सुख !

प्रभातसमयी नवर्‍याने दिलेला गरमागरम वाफाळलेला चहा! वा! क्या बात है! It makes my day!

अमेरिकास्थित मुलींशी बोलताना त्यांच्या आवाजावरुन जाणवणारी त्यांची ख्यालीखुशाली हाही एक सुखदु:खाचा विषय असतो.त्या मजेत तर मी मजेत त्यांचा आनंद माझा आनंद!

लाॅकडाउनमुळे सगळंच बंद! पण नवर्‍याने वाढदिवसाचे गिफ्ट काय दिले? कुंडीतल्या झाडावर ऊमलललेलं टवटवीत गुलाबाचं सुंदर फुल! अन् नजरेतली गाढ प्रीत!

किती सुखाचा क्षण!

एकीकडे म्हणतात, Sky is the limit. ध्येय बाळगा. जीवनात लक्ष्य हवं. Low ambition is crime. तर वडील म्हणायचे माणसांनी फार महत्वाकांक्षा बाळगु नयेत——नव्हे महत्वाकांक्षाच नसाव्यात!

गोंधळ व्हायचा माझा. पण कुठेतरी आता पटतं. गीतेतलाच ना हा सिद्धांत.

कर्म करा फळाची अपेक्षा न ठेवता! महत्वाकांक्षे सोबत अपेक्षा येते अन् मग अपयशातून दु:ख नैराश्य!

मग मनांत येत, सुशांत सिंगने आत्महत्या का केली? अधिक पैसा अधिक ग्लॅमर अधिक कीर्ती———— आणि मनाविरुद्धच्या परिस्थितीत टिकुन राहण्याचं नसलेलं मनोबल!

म्हणुनच सुखाच्या व्याख्या तपासल्या पाहिजेत. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण! पण मोठेपणातही छोटेपण जपता आलं पाहिजे! म्हणूनच छोट्याछोट्या क्षणातलं सुख मुठीत सांभाळून ठेवते मी. मला मेडीकलला जायचं होतं .पण नाही जाऊ शकले. झाले होते मी निराश, दु:खी! पण दुसरे पर्याय मिळाले आणि यश मिळालं! जीवन थांबलं नाही.

हंं..!! म्हणजे परवा संपूर्ण भारत देशाने जेव्हां डाॅक्टरांना अभूतपूर्व सलामी दिली तेव्हां नकळत वाटलंही “आज आपणही या समुहात असतो…!!”

असो तर मंडळी सुखाची व्याख्या करता येत नाही. दोन अधिक दोन बरोबर चार असे ते गणित नाहीच! पुन्हा तत्वंआलीच..सुख मानण्यावर आहे!

प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या. सुख प्रेमात आहे .सुख त्यागात आहे .सुख अहिंसेत आहे.

सुख देण्यात आहे! वगैरे वगैरे खूप काही…!सुख म्हणजे काय रे भाऊ? ——या प्रश्नाला काहीच ऊत्तर नाही.

मी मात्र एव्हढच म्हणेन, सुख—सुखी असणं ही वृत्ती आहे कदाचित असे तर नाही ना, तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी,..!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आटपाट नगर…. साठा उत्तरांची कहाणी….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ आटपाट नगर…. साठा उत्तरांची कहाणी….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

आपल्या बहुधा सगळ्या कहाण्यात…श्रावणातल्या जवळ जवळ सगळ्या वारांची, त्याचबरोबर मार्गशीर्ष, सत्यनारायण…सत्यविनायक…कोणत्याही कहाणीची सुरुवात…  एक आटपाट नगर होतं, अशी असते.

हे कोणतं आटपाट नगर… कुठे असते ते..?  याचा अर्थ  असा आहे की त्या ज्या कहाण्या आहेत त्या कोणत्याही शहरात घडू शकतील अशा आहेत. आपण त्या कहाण्यांना  ‘भौगोलिक दृष्ट्या न्यूट्रल’ कहाण्या म्हणू शकतो.  त्यामुळेच त्या नगराला  विशिष्ट नाव असायची  गरज नाही. अमुक तमुक नगर होतं असं म्हणण्याऐवजी आटपाट नगर… त्याचा अजून एक अर्थ  सांगता येतो तो म्हणजे आटापासून पाटापर्यन्त म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत…

या कहाण्यांमध्ये असलेल्या त्या नगरात तळी असतात,  त्यावरून शंकर पार्वती जातात,  शेते असतात… हे सगळीकडेच असते… म्हणूनच ते नगर म्हणजे आटपाट नगर.. समजा नारळी पौर्णिमेच्या समुद्र पूजेची कहाणी असेल तर ती आटपाट नगराची कहाणी असणार नाही तर त्या कहाणीत त्या नगराचे विशिष्ट नाव असेल.

आता आपल्याला वाटेल…  आटपाट गाव का नाही?  यातल्या ब-याच कहाण्यांमध्ये राजा राणी असतात,  प्रतिष्ठित  व्यापारी असतात… ज्यांच्या घरी व्रतवैकल्ये केली जाऊ शकतात अशी संपन्न घरे असतात… त्यामुळे  ती ठिकाणे म्हणजे छोटी गावे नसून सधन नगरे असतात.

या सर्व कहाण्यांचा शेवट ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण असा असतो.

अनेक ठिकाणी याचा अर्थ…’ही साठ उता-यांची कहाणी पाच उता-यात सारांशाने सांगितली आहे आणि ही कहाणी ऐकून आता व्रताची सांगता होईल आणि व्रताचे सुफळ मिळेल असे सांगितले आहे.

पण मला असं वाटतं… माणसे काहीतरी इच्छा धरून ही व्रतवैकल्ये करतात.

या इच्छा म्हणजे… घरातले लग्न,  नोकरी,  परीक्षेत यश, स्वतःचे घर,  आरोग्य, नावडतीचे आवडते होणे,  मोटार गाडी, ध्येयपूर्ती …परदेश प्रवास… या प्रकारच्या असतात.   आपण जर काळजीपूर्वक या इच्छांची मोजदाद केली तर या सर्व इच्छांची संख्या साठ पेक्षा जास्त नसते… अगदी माणसांचे सरासरी आयुर्मान साठ वर्षांचे धरले आणि इच्छा मनात निर्माण  होण्याच्या वयाचा विचार केला तर आपल्यालाही हे पटेल… त्यामुळे ही साठ उत्तरांची कहाणी… पाचा उत्तरी संपूर्ण  होते… म्हणजे काय… तर त्याची फलश्रुती ही पाच ज्ञानेंद्रियांना किंवा पाच कर्मेंद्रियांना सुखावणारी असते.  खरं तर आपल्या संस्कृतीत ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांपेक्षा अधिक महत्व आहे…

त्यामुळे  ते व्रत त्यात सांगितलेल्या नियमाने पूर्ण झाले  असले तरी प्रत्यक्षात त्याचे सुफळ  मिळाल्यावरच ते संपूर्ण  होणार आहे असा गर्भित संदेश…ज्याचे किंवा जिचे व्रत केले आहे त्या देवतेला ..ज्याने किंवा जिने व्रत केलेले आहे त्यांनी  दिलेला असतो.

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चितळे मास्तरांनी शिकवलेला धडा ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ चितळे मास्तरांनी शिकवलेला धडा ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

गेल्या रविवारचाच प्रसंग…

आम्ही नवरा-बायको बिबवेवाडी रोडवरील चितळे मास्तरांच्या दुकानात थांबलो होतो. मिठाई घेऊन बाहेर निघत होतो. तेवढ्यात एक गिर्‍हाईक दांपत्य दुकानाच्या मालकांशी हुज्जत घालू लागले, त्या आवाजाकडे लक्ष गेले. त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे १२००-१३०० रुपयांची खरेदी तर केली होती, पण घरून पिशवी आणायला विसरले होते! आता बाहेर उभ्या मोठया, पॉश कारपर्यंत सामान नेणार तरी कसे? दुकान मालकाकडे त्यांनी ’कॅरी बॅग द्या!” अशी मागणी चालवली होती. मध्यमवयीन, चांगले टापटिपीत कपडे घातले असले तरी बोलण्याचा बाज उध्दट वाटत होता. गृहस्थ बहुदा पुण्याबाहेरील पाहुणे असावेत. कारण चितळे मास्तरांकडे कॅरी बॅग मागण्याचा गधडेपणा दुसरं कोण करणार? आता मालक काय उत्तर देतात, हे ऐकायला आम्ही ’अनुभवी पुणेकरांनी’ कान टवकारले.

मालक: (कपाळावरची रेषही ढळू न देता) “सॉरी, आम्ही कॅरी बॅग देऊ शकत नाही.”

गिर्‍हाईक: अहो, पण मग मी माल बाहेर कार पर्य़ंत नेणार कसा?

मालक: पिशवी आणली नाहीत वाटतं?

गिर्‍हाईक: अहो, ती जर असती तर मागितली असती का कॅरी बॅग?

मालक: हे बघा, कॅरी बॅग देणे कायद्याने गुन्हा आहे, तुम्हालाही ह्याची पूर्ण कल्पना आहे. कायदा मोडणे आम्हाला परवडणारं नाही.

(गिर्‍हाईकाने आता अंधारात एक तीर मारला.)

गिर्‍हाईक: आणि तुमच्या गावातल्या दुकानात कशी देतात मग?

मालक: तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. आमचे नियम सगळीकडे सारखेच असतात. दुकान बदलले म्हणून नियम बदलत नाहीत आणि कॅरी बॅग देणे हे आमच्या नियमांत बसत नाही. (दुकानातील गिर्‍हाईकांमध्ये हलकासा हशा पसरतो.)

(तीर फुकट गेल्याने गिर्‍हाईक वैतागते. पण मागे न हटता दुसरा गुगली टाकते. गृहस्थांना बहुदा ’You Can Negotiate Anything’ सारखी मॅनेजमेंटची bestseller  पुस्तके नुकतीच वाचून त्याचा ज्वर चढला असावा. चितळे मास्तरांच्या दुकानात त्याचा यशस्वी वापर करायचाच ह्या हट्टाने पेटल्यासारखे बोलत होते. मधूनच अकारण इंग्रजीही पाजळत होते.)

गिर्‍हाईक: एवढ्या खरेदीवर तर तुमच्या पलिकडील ’जोशी’ वाले हव्या तेवढ्या कॅरी बॅग्ज देतील. मी त्यांच्याकडे जातो ना मग!

मालक: हे पहा, आमचे दुकान कॅरी बॅग्ज देण्याबद्द्ल प्रसिध्द नसून मालाच्या क्वालिटीबद्दल प्रसिध्द आहे!

गिर्‍हाईक: हे बघा मिस्टर, तुम्ही मुद्दाम विषय बदलता आहात. तुमच्या दुकानात आलेल्या गिर्‍हाईकाला मदत करण्याची मालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की नाही? तुम्ही माझ्यासारख्या गिर्‍हाईकाला काय मदत करीत आहात, ते सांगा बरं मला.

मालक: हं, आता तुम्ही मदत मागत आहात म्हणून सांगतो, पिशवी आणायला विसरलेल्या गिर्‍हाईकांसाठी आम्ही कापडी पिशव्यांची सोय केली आहे. हे एवढे सामान नेण्यासाठी मी तुम्हाला आमच्या दुकानातील दोन कापडी पिशव्या देऊ शकतो.

(आता गिर्‍हाईकाच्या चेहर्‍यावर मंद स्मित पसरते आणि तो विजयी मुद्रेने आपल्या बायकोकडे सूचकपणे पाहतो. “कसा आणला लाइनीवर?” पण हा आनंद पुढचे वाक्य ऐकून मावळतो!)

पिशव्यांचे तुम्हाला २० रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील.

गिर्‍हाईक: (संतापलेल्या स्वरात) अहो पण एवढी मोठी खरेदी केल्यावर तुम्ही पिशव्यांचे कसले पैसे चार्ज करताय?

मालक: (शांतपणे) हे पहा, मी तुम्हाला पिशव्यांची मदत करू शकतो, पैशांची नव्हे. शिवाय आमच्या पिशव्यांचीही क्वालिटी उत्तम आहे, मी स्वत: वापरतो. तुम्हालाही पुढे चांगल्या उपयोगी पडतील.

….

…..

ह्या घडीला आम्ही दोघे दुकानातून बाहेर पडलो, त्यामुळे पुढील संवाद काही ऐकले नाही. बाईकवर बसलो आणि बटण-स्टार्ट केली. बायकोही मागे बसली. आता गियर टाकून निघणार त्याआधी उत्सुकतेपोटी मान वळवून दुकानाकडे नजर टाकली. त्याची बायको आधीच गाडीत येऊन बसली होती आणि नवरोबा हातात चितळे मास्तरांच्या मिठाईने भरलेल्या दोन कापडी पिशव्या घेऊन, मान खाली घालून आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत बाहेर येताना दिसले. अर्थात विजय कोणाचा झाला हे वेगळं सांगायला नको.
आम्ही दोघेही गालातल्या गालात हसलो आणि मार्गस्थ झालो.

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अद्वैत ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

परिचय

  • एम. ए. (म्युझिक), SNDT विद्यापीठात प्रथम क्रमांक
  • संगीत अलंकार (अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय) विशेष योग्यता प्राप्त.
  • एम. कॉम. (अकाउंट्स अँड कॉस्टिंग)
  • PHD student (ABGMVM)
  • सध्या चेन्नईस्थित असून ऑस्कर विजेते संगीतकार  ए. आर. रहमान ह्यांच्या KM College of Music & Technology मधे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्राध्यापिका आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायनाचे कार्यक्रम सादर करतात.
  • गेल्या दहा वर्षांपासून मराठी मासिकांमधे, दिवाळी अंकामध्ये सातत्याने लेखन.
  • पूर्वी शब्दबंध हा कथासंग्रह, गवतूचं गाणं आणि घनिष्ठ मैत्री हे बाल कथासंग्रह व कल्पवृक्ष कन्येसाठी ही काव्यसंवादरुपी पुस्तिका प्रकाशित झाली आहे.
  • गेल्याच महिन्यात निरभ्र  व भूपातला निषाद हे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
  • कालच जाहीर झालेल्या डॉ. सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय कथस्पर्धेच्या निकालानुसार ‘ज्याचं त्याला’ ह्या कथेस विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

☆ विविधा ☆ मनमंजुषेतून ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

असतील लाख कृष्ण कालिंदिच्या तटाला

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला

अर्थातच कविवर्य ग्रेस!

आज अचानक ह्या ओळी सामोऱ्या आल्या आणि नव्यानं भेटल्या! पूर्वी हे वाचल्यावर काय उमटलं होतं मनात आठवत नाही… मात्र आज राधा आणखी खोलवर रुतली…! खरंतर पदोपदी मोहवणाऱ्या, भूल पाडणाऱ्या ह्या गोष्टी तरीही सगळ्याचे अर्थ लागणं तितकं सोपं नाही.. पण माणूसपणातला न आवरणारा हाही एक मोह… आपल्या नजरेतून सगळं पाहाण्याचा!.. म्हणून अक्षरं मांडणं अनावर झालं!

राधा स्वतः कृष्णमय होऊन गेली आणि कृष्णाला तिच्याजवळ असण्या-नसण्याचा  पर्यायच तिनं ठेवला नाही… तिनं त्याला कधी स्वतःपासून वेगळं केलं/मानलं नाही आणि ना कधी स्वतः त्याच्यापासून वेगळी झाली… त्यामुळं तिच्याजवळ नुरण्याचा पर्यायच त्याच्याकडे उरला नाही… म्हणूनच तो तिला पुरून उरला… आजही तो उरलाय तो फक्त राधेसोबत… राधाकृष्ण होऊन!

इतकं अतूटपण निभावणं म्हटलं तर खूप सोपं आणि म्हटलं तर क्षणोक्षणी चटके सोसत निखाऱ्यावर चालत राहाणं… त्यातला सोपं वाटण्याचा पर्याय विश्वासाशी जोडलेला… अंतरी तो आहेच ह्या अढळ विश्वासाशी… जगण्यातल्या क्षणांत त्याच्या असण्या-नसण्याशी तसूभरही संबंध नसलेला…! अपार मोह पडला तरी हे निभावणं सोपं नाही… पण हे जमलं तर मिळवण्यासारखं काही  उरतच नाही… तोच मोक्ष तीच मुक्ती म्हणजेच ‘राधा’ अनुभवणं!

तुलना मनात उभी राहातेच राहाते… ग्रेस प्रभृतींनीही ह्या रचनेत रूक्मिणी-सत्यभामा आणि राधा ह्यांच्यातलं तुलनात्मक वेगळेपणच इतकं अचूक मांडलंय की वाचताक्षणी राधा नेमकेपणी कडकडून भेटावी… त्यांनी म्हटलंय रुक्मिणी-सत्यभामेला साध्यापेक्षा साधन महत्वाचं वाटलं आणि राधेला साध्य कळलं होतं, तिचं लक्ष फक्त साध्याकडं होतं… फक्त कृष्ण, कृष्ण आणि कृष्ण… म्हणूनच त्यानं त्यांना साधन दिलं आणि स्वत: राधेला साध्य झाला!

मनात आलं की  रुक्मिणी-सत्यभामेला कृष्णापेक्षा  कृष्णाचं आपल्यावरचं  प्रेम आणि आपला त्याच्यावरचा हक्क जगासमोर सिद्ध होणं जास्त गरजेचं वाटलं आणि राधेनं त्याला ते सिद्ध करून दाखवायचा पर्यायच ठेवला नाही, अर्थात तिला त्याची गरजही भासली नाहीच… कारण तो आपल्याजवळ च असल्याचा तिचा विश्वास!… तसंही आपणच पर्याय निर्माण न करणं किती चांगलं! आपल्याला मिळणार असलेल्या गोष्टीवर आणि ती मिळणारच ह्यावर अतूट विश्वास ठेवणं हा एकच पर्याय, हे एकच ध्येय आणि हा एकच ध्यास… कुठल्या अडथळ्याला मधे येण्याचा पर्यायच उपलब्ध नाही… आणि त्यातूनही काही आलंच आड तरी विश्वासाच्या भक्कम तटबंदीसमोर ते दिसणार नाही आणि टिकणारही नाही!… केवढं प्रचंड आत्मबल, केवढा दुर्दम्य आशावाद आणि किती अर्थपूर्ण जगणं… कृष्णानं राधेला बहाल केलेलं कि राधेनं कृष्णमय होऊन अल्लद ओंजळीत पाडून घेतलेलं!?

सत्यभामा-रुक्मिणीच्या बाबतीत तो लौकिकार्थाने त्यांचा होऊनही त्यांच्याजवळ उरला नाही आणि राधेजवळ नुरण्याचा पर्यायच त्याच्याकडं नव्हता!… भूल पडते ह्या अशा आयुष्याची… त्याच्याशिवायही त्याच्यासोबत त्याचं होऊन जात जगण्याची आणि खरंतर राधेचं गारूड पसरत जातं मनभर… पण ती स्वतः उरलीच कुठं होती म्हणून मग तिच्या अवघ्या अस्तित्वावरचं त्याचं गारूड आपल्यातही भिनत जातं आणि आपल्या दृष्टीनं सर्वव्यापी ठरतो तो! तसा तो आहेच सर्वसाक्षी, सर्वव्यापी.. पण राधेचा होऊन अंतरी ठसला, तिच्या नेत्रांतून दिसला, तिच्या जाणिवांनी अनुभवला की परिपूर्णतेचं एक वेगळं वलय त्याच्याभोवती तेजाळतं आणि कसलाच किंतू मनात न उरता त्याच्या अस्तित्वाचीच खात्री पटते!

अस्तित्वाची खूण ही अंतरीच पटावी… प्रतिकांतून नाही, दृश्य स्वरूपात नाही! बाह्यरूपात भुलावण होऊ शकते, अंतरी नाही! त्याच्या प्रीतीच्या प्रतिकाचा ध्यास घेतलेल्यांना साधं ते प्रतीकही पूर्णपणे मिळालंच नाही आणि फक्त त्याचा ध्यास घेतलेल्या राधेसोबत तो युगानुयुगे उरलाय! एका दृष्टीनं हाही त्याच्या अस्तित्वाचा पुरावाच… ज्याला जे हवं त्याला ते देणारा ‘तो’… राधेला ‘तो’च हवा होता तर फक्त त्या एका जन्मी नाही तर युगानुयुगे तिची साथ निभावणारा!

कुणाची आस धरण्यापेक्षा कुणाचं तरी होऊन जाणंच खरं… कारण ती आपली स्वत:ची अनुभूती, कुणावरही अवलंबून नसलेली… हे ढळढळीत सत्य राधा जगली आणि अनंतयुगे त्याच्यासोबत अमर झाली!

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लक्ष्मण रेषा ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

शिक्षण  B.A . मराठी

नोकरी EDC, A Semi Govt Financial Institution.

निवृत्ति नंतर मराठी लेखनास सुरवात. अनेक कविता प्रकाशनाच्या मार्गावर, दिवाळी अंकांमधून कथा, कविता प्रकाशित. वाचन लिखाण यांची आवड.

‘स्मृति कलश’ या ज्योती देशपांडे यांच्या पुस्तकाचे शब्दांकन, संपादन.

☆ विविधा ☆ ल्क्ष्मण रेषा☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

प्रभु श्रीराम कस्तुरीमृगामागे गेले, रामाची ‘धाव लक्ष्मणा धाव’ अशी आरोळी ऐकून सीता घाबरली. तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी जाण्यास भाग पाडले.  सीतेच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मणाने आश्रमाभोवती आपल्या बाणाच्या टोकाने एका रेषेचे कुंपण घातले आणि त्या बाहेर पाऊल न टाकण्याचा इशारा सीतामाईला देऊन तो रामाच्या आवाजाच्या दिशेने गेला.

पुढे काय झाले, हे आपण सर्वचजण जाणतो. त्याचे कारणही जाणतो. तेव्हापासून हेच कुंपण ‘लक्ष्मणरेषा’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिथे सीतामाई होती, तिचं अपहरण झालं,  म्हणून लक्ष्मणरेषा फक्त स्त्रियांसाठीच असते, असा सोयीस्कर अर्थ नोंदवला गेला.

लक्ष्मणरेषा ही एकदाच ओढली गेली आणि तिचे उल्लंघन केल्याने जो अनर्थ घडला, त्यामुळे पुराणातील एक शिकवण किंवा एक इशारा म्हणून ती अजरामर झाली.

लक्ष्मणरेषा म्हणजे आत्मसंयमन, लक्ष्मणरेषा म्हणजे स्वत्वाचे रक्षण, लक्ष्मणरेषा म्हणजे आचारविचारांसाठी एक नियम,  लक्ष्मणरेषा म्हणजे चारित्र्य, शील यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक सुरक्षित कवच.

चारित्र्य आणि शील यांचे जतन आचार-विचार, आहार-विहार, याच्या माध्यमातून व्यक्त होते. आचार म्हणजे आपले वागणे,बोलणे, समाजात वावरणे, पोषाख, दुस-याला मान देणे, आदर करणे.

विचार म्हणजे पूर्वकाळातील अनुभव आणि संस्कार यातून आपल्याला झालेले ज्ञान व त्याचा सद्यः परिस्थिती साधलेला समन्वय.

आहार म्हणजे शरीराला आवश्यक,  प्रकृतीला अनुरूप असा आणि गरजेपुरताच करावयाचा अन्नपुरवठा.

विहार म्हणजे शरीर व मनाला उत्साह,  आनंद,  तरतरी देणारा अनुभव. तो व्यायाम असेल, पर्यटन असेल किंवा स्थलपालट असेल.

वरील चारही गोष्टी करत असताना,  सृष्टीवर त्या जगन्नियंत्याचे अधिपत्य आहे,  हे जाणून कर्म करणे. चांगले- वाईट दोन्ही कर्मे तो पहात आहे, याची जाणीव सतत ठेवणे. हे संस्कार मनावर असावे लागतात. यश, आनंद, समाधान ही चांगल्या कामाची फलश्रुती असते तर वाईट कृतीची शिक्षा ही भोगावीच लागते. हे ध्यानात ठेवून चांगले कर्म करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.

भारतीय संस्कृतीचा हा अलिखित पण अधोरेखित नियम आहे. समाजात वावरताना देहबोली ही महत्त्वाची असते.  ही एक अलिखित बोली आहे.ती व्यक्तीच्या व्यवहारातून, चालण्या बोलण्यातून राहणीमानातून, पोषाखावरून, व्यक्त होते.  ही संयमाची लक्ष्मणरेषा अतिशय काटेकोरपणे पाळावी लागते. जरासं सुद्धा रेषेबाहेर पडलेलं पाऊल पाय घसरायला कारणीभूत ठरू शकते. हे केवळ नीतीमत्तेच्या संदर्भात नाही तर सर्व बाबतीत आहे.

हा नियम स्त्री-पुरूष,  गरीब-श्रीमंत, लहान-मोठे,  सर्वांना लागू असतो. स्थलकाल, वर्णजाती,  याचे परिमाण न राखता, पृथ्वीवरच्या मनुष्याला सर्व समान लागू असतो. प्रत्येकाचे वर्तन, उपजीविकेचे व्यवहार यासाठी ही आहे.

ह्याची जाणीव घराघरातून वडीलधा-यांनी स्वतः सांभाळावी, तरूण वर्गाला करून द्यावी. शिक्षण संस्थांनी याबाबतीतले नियम कडक केले पाहिजेत. अनेक संस्थांनी अशी पावले उचलली आहेतही.

प्रत्येकानेआपल्या मनात लक्ष्मणरेषेचे भान ठेवलेच  पाहिजे. प्रत्येक वेळी,  प्रत्येक ठिकाणी आपले रक्षण करण्यासाठी आईवडील, भाऊ,दीर, मित्रमैत्रिणी, पोलिस बरोबर असतीलंच असं नाही,  पण मनातली लक्ष्मणरेषा आपल्याला संरक्षण नक्कीच देते.

धुंद होऊन जगताना संयम हवा. बोलताना संयम हवा.विचार करताना लक्ष्मणरेषेची जाणीव असावी. लक्ष्मणरेषा प्रत्येकाने आपल्या पुरती सीमित केली तरी खूप आहे.

छोटे-मोठे अनर्थ घडूच नयेत म्हणून लक्ष्मणरेषेचा आदर करावा, स्वतःच्या आणि दुस-यांच्याही.

 

© सौ. अमृता देशपांडे

पणजी

9822176170

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हॅप्पी स्पून डे….☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ विविधा ☆ हॅप्पी स्पून डे…. ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

नमस्कार मंडळी…जागतिक चमचा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… ‘सेम टू यू‘ तरी म्हणा.. निदान अंगठा तरी….. काय? तुम्हाला‘ चमचा दिन‘ माहितीच नाहीये? आत्ताच “स्वयंपाक दिन” नाही का साजरा झाला व्हॉटस् अप वर?  ..म्हणजे माहिती असणारच… तरीही चमचा दिनाबद्दल नाही माहिती? आश्चर्य आहे. बरं ऐका …. हल्ली चमच्याशिवाय कुणाचेच पानही हलत नाही… बरोबर? विदेशी पदार्थ तर चमच्याशिवाय खाताच येत नाहीत अनेकदा. मग त्यांचे अनुकरण केलेच पाहिजे. म्हणून हल्ली घरोघरी “प्लेट-बाऊल-ग्लास” या जेवणाच्या सरंजामामध्ये चमचाही असतोच असतो. का काय?

आवडत्या आमटीची वाटीच उचलून तोंडाला लावणं आता अशिष्ट समजलं जातं. अळूच फतफत सगळ्या बोटांनी गोळा करून तोंडात घालून सूर्र् ss  आवाज करत तृप्त व्हायचं, बासुंदी-खिरीच्या वाट्याच्या वाट्या मनसोक्त तोंडाला लावत मनमोकळी ढेकर द्यायची, हा तर चक्क गावंढळ पणाच ठरतो हल्ली. त्या ऐवजी बोटांची देखणी हालचाल करत चमचा हळूवारपणे अशा पदार्थांच्या अर्ध्या पाऊण भरलेल्या बाऊलमध्ये बुडवून, एकही थेंब न सांडता ओठाला लावायचा, आणि फूर्र.. बीर्रा असला कुठलाही असभ्य आवाज न करता जिभेवर रिकामा करायचा… तोपर्यंत तो पदार्थ गार होऊन जातो, चव कळत नाही, असले वायफळ आरोप अजिबात करायचे नाहीत. शेवटी sophisticated दिसणं महत्वाचं.

याचं बाळकडू आताशा लहानपणापासूनच पाजलं जातं. बाळाला बाटलीतून दूध पाजणे आरोग्याला घातक असल्याने ते चमच्याने पाजावे असा विचार पुन्हा प्रचलित झाला आहे. त्यामुळे तान्हेपणा पासूनच बाळाची चमच्याशी ओळख होते. पुढे त्याला  “आत्मनिर्भर” करण्याच्या उदात्त हेतूने, “हायचेअर” वर बसवून, समोर पोळीचे तुकडे व भाजी ठेवली जाते. बाळ एक तुकडा महत्प्रयासाने चमच्यातउचलते. मग तो भाजीत टेकवून पुन्हा उचलण्याचे कष्ट करण्यापेक्षा ते हुशार पिढीतले मूल, फक्त पोळीचा तुकडा तोंडामध्ये कोंबून, मग चमच्यात भाजी घेतल्यासारखे करून तो तोंडाला लावतो. हीच — “आत्मनिर्भरता”. इथे पोटात भाजी किती जाते हा मुद्दा गौण ठरतो. पण चमच्याने जेवण्याच हे नाटक मुलं इतकं लांबवतात की शेवटी मम्मी वैतागून त्याला हाताने भरवून टाकते, हे इथे महत्वाचे नाही.

तर अशा रीतीने “चमचा” आपल्या आयुष्यात लहानपणापासूनच महत्वाची  भूमिका बजावायला लागतो. आणि हे महत्त्व लक्षात घेऊनच त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा “चमचा डे” साजरा केला जातो…. बरोब्बर…. Mother‘s डे, father‘s डे कसे वर्षातून एकदा साजरे केले की इतिकर्तव्यता होते.. तसंच. पण एक फरक आहे. मदर-फादर प्रत्येकाला एकेकच असतात. पण चमचे?…. प्रत्येक घरात इतके वेगवेगळ्या प्रकारांचे, आकारांचे आणि उपयोगाचे चमचे असतात की,  “माझ्याकडे सगळे मिळून इतके चमचे आहेत”, असं कमालीची गृहकृत्यदक्ष स्त्रीही १००% खात्रीने सांगू शकणार नाही हे मी खात्रीने सांगू शकते.

याशिवाय घराबाहेरही कित्ती चमचे असतात. शेजारच्या दारापासूनच त्यांची जी रांग सुरू होते, ती थेट फक्त दिल्लीपर्यंतच नाही, तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलेली आहे. आणि त्यांचं काम इतकं वैशिष्ट्यपूर्ण असतं की ” चमचेगिरी” हा शब्द त्यांच्यासाठी पुरेसा नसतो. विशेष म्हणजे हे चमचे अदृश्य असतात. त्यांचे रंग-रूप- आकार आणि कामाचा आवाका, अगदी मुरब्बी मातब्बरांनाही समजू शकत नाही. तरीही सगळ्याच प्रकारच्या कार्यक्षेत्रात ते सतत वापरले जातात. अहो घरातले चमचे एकवेळ चिकाटीने नेमके मोजता येतील, पण हे घराच्या बाहेरचे चमचे?….ते चमचे आहेत हेच मुळात कितीदा समजत नाही, मग मोजणं तर लांबच… म्हणजे बघा, चमचा कुठल्याही प्रकारचा असला , तरी त्याचं काम कुणासाठी तरी गरजेचं आणि महत्वाचं असतंचना? मग त्याच्याबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त करणं हा औपचारिक रिवाज पाळायला हवाच …. पटतंय ना? मग म्हणा तर ….”जागतिक चमचा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ” …….

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मधली पिढी ☆ सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ मधली पिढी ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

ती आईला आणि नातवाला भेटायला निघालीय. म्हातारपण लहान मुलासारखं अस तं  म्हणून आईला काय खाऊ न्यायचा, नातवाला काय न्यायचा याचा ती विचार करते. आता तीही थकलीय पण दोन्ही ठिकाणी काळजाचे घड होते. त्यांच्यासाठी काहीही करण्यासाठी तिला उत्साह येतोच. नवऱ्याच्या रिटायरमेंटनंतर  ते गावाजवळ राहत होते। मुलगा नोकरिमित्त शहरात। माहेर जवळच होतं तिथून.  आईला भेटून तसंच मुलाकडे जायचं.  दोघांनाही काहीतरी न्यायला हवं हे सतत आतून वाटतं. मोकळं जाणं बरं वाटत नाही. विकतचे खाण्याचे पदार्थ घेणे पटत नाही. भले ही भेट महिन्या दोन महिन्यातून का असेना.  विकतचे काही नेणं तिला आवडतच नाही.  विकत त्याचं ते घेऊ शकतातच की.  आपलं माया, प्रेम त्यात उतरणार आहे का?

आईसाठी बिनतिखटाची चार थालीपीठ केली.  नातवाला एक घेतल. खजूर आईसाठी तर काजू बदाम नातवासाठी खडीसाखर दोघांना आवडते.  रव्याचे लाडू लेकासाठी बेसनाचे सुनेला आवडतात.  माहेरी भाऊभवजयीला, भाचरांना लाडू. असा सगळा हिशोब करत तिची आवरा आवरी चाललेली.  नवऱ्याचा दोन्ही वेळेचा सैपाक करायचा.  उद्यासाठी मदतनि

साला सांगायचं कसा कसा सैपाक कर…  नवऱ्याला बजावलं, चारदा जेवण झालं की, नीट झाकून ठेवा। चपतीचा डबा पाण्याच्या ताटात ठेवा, नाहीतर मुंग्यांनी लगेच भरतो। वेळेत गोळी खा आणि तसा मेसेज करा. हे सगळं करुन नऊच्या गाडीने निघायला हवं. नाहीतर गाडी चुकली कीं बारालाच एकदम. तिची घाई चाललेली.

नवऱ्याच्या सूचना ऐकयला लागत होत्याच.  परवा लवकर निघ. वगैरे, वगैरे…

तिला आईजवळ दोन दिवस आणि नातवाजवळ चार दिवस राहावं वाटत होतं, पण नवऱ्याला एकटं सोडून नकोही वाटत होतं. ती म्हणायची आपण मुलाजवळच राहू पण नवऱ्याला हे पटत नाही.  स्वातंत्र हवं प्रत्येकाला.

एकत्र राहून नाही का मिळत????  कुणाच्या जगण्यात ढवळाढवळ नाही करायची.  आपापली कामे करायची.

तिला मात्र एकत्र राहण्यामुळे सुरक्षित वाटतं. तसं एकेकट नाही वाटत. आतापासून सवय लागली एकमेकांची तर पुढे सेवा करतील. तिला मुलांपासून दूर राहणं पटतच नाही. मुलांच्या स्वातंत्र्याच्या गप्पा करणाऱ्या नवऱ्याला बायकोच्या भावना का कळू नयेत???

ती एसटीत बसली तेव्हा तिला विसावा मिळाला. शांतपणे ती डोळे मिटून बसली.  काय घेतलं, काय राहिलं तर नाही ना याची मनोमन उजळणी करत असताना तिचं मन भरून आलं.  का कुणास ठाऊक तिला रडावस वाटलं.  दुःख नाही राग नाही तरी असं का व्हावं????

ती विचार करत असताना जाणवलं,  आपली आई असच सगळ करायची.  नको म्हटलं तरी ऐकायची नाही. तिचा त्रास बघून रागवायचेही, तरी ती करत राहायची॰  एकदा दिवाळी झाल्यावर आम्ही गेलो होतो आणि तिचे लाडू संपलेले. लेक आली आणि लाडू नाहीत म्हणजे काय….

आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी परतायचे होते. ती पहाटे उठली,  जात्यावर डाळ दळली.  कारण बेसनही संपले होते। आम्ही उठायच्या आत तिचे लाडू तयार झाले होते. किती वाजता उठली होतीस असं विचारलं तर म्हणाली,  झोपले कुठे होते ?…

आत्ता कळू लागलंय ती हे सगळं का करत होती?  हे करण्यात तिला केवढी ऊर्जा मिळत होती. कष्टाचं तिला काहीच वाटत नव्हतं. यालाच तर प्रेम माया जिव्हाळा म्हणतात.

हे प्रेम एकत्र राहून नातवाला शिकवायला हवं.  सहवासातील प्रेम त्याला नाही मिळालं तर तो माणूसघाणा होईल, असं तिला वाटायचं. पण नवरा ऐकत नाही.

तिला नातवापासून दूर राहावं लागतं.  त्यामुळे तिला वाईट वाटतं….

आई फोनसाठी जीव तोडते. सतत फोन कर म्हणते,  तेव्हा कळते की आपल्या माणसाचा आवाज ऐकण्यासाठी जीव किती आसुसलेला असतो.

ही असोशी कशानेही मिटत नाही. नातवाचा आवाज ऐकण्यासाठी तीही अशीच व्याकुळ होते.  आत्ता तिला आईचं मन कळू लागलंय.  ती आजी झाल्यानंतर……

 

© सौ. सावित्री जगदाळे

१४/२/१९

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्र फुलांची ओंजळ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ ? मैत्र फुलांची ओंजळ ?☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आम्हा दोघा पती-पत्नींना माणसे जोडायची आवड आहे. याच ओढीतून पंधरा वर्षांपूर्वी आम्ही सांगलीत आमच्या घरी एका ग्रुपची स्थापना केली. सोमवारी जमतो म्हणून ‘सोमवार ग्रुप’. १२-१५ जणांचा हा ग्रुप ५० जणांचा कधी झाला हे कळलेच नाही. ज्ञान- विज्ञान- माहिती, छंद आवडीनिवडी, सुखदुःख, जिवाभावाचे सर्व काही एकमेकांशी वाटून घेत हा ग्रुप एक मोठे कुटुंब बनले आहे. आज आम्ही तिथून पुण्यात आलो तरी या ग्रुपशी नाळ घट्ट बांधलेली आहे. नित्य संवाद सुरू असतो.

काही वर्षांपूर्वी माझ्या मिस्टरांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या या ‘सोमवार ग्रुप’ साठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची रूपरेषा अशी काहीच ठरवलेली नव्हती. एकत्रित गप्पा सुरू होत्या. एका मैत्रिणीची बहीण आमच्या ग्रुपचा कार्यक्रम पाहायला आलेली होती. पुण्याची ही पाहुणी मैत्रीण सुरेल गायिका निघाली. तिने आग्रहाखातर गाणे म्हटले ‘ओवी आणि अभंगाने भुई सारी भिजे ‘, आणि पाहता पाहता सगळ्यांचा मूडच पालटला.

कोणीतरी ह्यांना मागच्या आठवणी विचारल्या. आमच्या लग्नाच्या संदर्भातील प्रश्नांनी मन भूतकाळात गेले. असंख्य आठवणींनी पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. मैत्रिणींच्या चेष्टामस्करीला जोर चढला. जणू सगळ्यांच्यातच तरूणाईचे चैतन्य संचारले होते. आमच्या सदस्यांचा वयोगट साधारणपणे ३५ते ८२-८३ वर्षांचा आहे. जवळजवळ पंचवीस तीस जण हजर होते. हास्यविनोदात वय विसरून सर्व जण मन मोकळे झाले होते.

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी इतर गोष्टींबरोबरच प्रत्येकापाशी मुखावरचा निर्मळ आनंद आणि मनापासून भरपूर शुभेच्छा होत्या; ज्यामुळे खूपच भारावून जायला झाले. शेवटी मैत्री ही आयुष्यातील मोठी मिळकत असते. एका मैत्रिणीने तर आम्हा दोघांना दोन ओंजळी भरून अतिशय सुवासिक अशी तिच्या बागेतली जुईची फुले दिली. तिची ही सुगंधी भेट तर फारच अनमोल अशी होती. शेवटी मैत्रीत ‘देणं-घेणं’ काही नसतंच. असतो फक्त एकमेकांना आनंद वाटायचा. ह्या फुलांनी आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद दिला. सारा हॉल सुवासाने भरून गेला. एका मैत्रिणीने एक छानशी कविता वाचली. या छोटेखानी कार्यक्रमाचा हा एक मनोहारी आनंद मेळावा झाला. आमच्यासाठी हा आयुष्यातील एक सुखद क्षण ठरला आणि याची सांगता झाली पाहुण्या मैत्रिणीच्या गाण्याने ” जीवनात ही घडी…… !”

खरोखरच ‘ही घडी’ मनात जपून ठेवावी अशीच होती. आपण आयुष्यात एकमेकांशी अनेक नात्यांनी बांधलेले असतो. पण त्यात मैत्रीचं नातं हे अतिशय मोलाचं असतं. हक्क-जबाबदाऱ्या  यांच्या कसल्याही फूटपट्ट्या नसणारी निरपेक्ष मैत्री ही आयुष्यातील वाटचालीची शिदोरी असते. सर्व सुख-दु:खात, कठीण प्रसंगात, हास्यविनोदात साथ देते ती मैत्री. या मैत्रीमुळे ‘एकला चलो रे ‘चा एक तांडा बनतो. या मैत्रीच्या जोरावरच आपण आयुष्याची वाटचाल यशस्वीपणे करत असतो. अशी निखळ मैत्री ज्यांना लाभली ते खरोखरच भाग्यवान. या मैत्रीचा स्नेह सुगंध मनात सदैव दरवळत राहतो आणि आपली आयुष्य निश्चितच पुलकित होतात.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ थोरवी ज्ञानेश्वरीची ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

संक्षिप्त परिचय 

शिक्षण – BA मराठी, M. A. भरत नाट्यम

नृत्या मध्ये पारंगत, कविता, लेख, दिवाळी अंकांमधून प्रकाशित . स्वतःचा कथा, नकला, नृत्य यांचा कार्यक्रम प्रसारणाच्या टप्यावर.

आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणा स्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। आदरणीय सौ अंजली गोखले जी का आभार। ई- अभिव्यक्ति ऐसी प्रतिभाओं को नमन करता है – ब्लॉग एडिटर – हेमन्त बावनकर 

 

☆ विविधा ☆  थोरवी ज्ञानेश्वरीची ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौअंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

 

‘ज्ञान देव बाळ माझा, सांगे गीता भगवंता

लक्ष द्या हो विनविते .

मराठी मी त्याची माता’

माझे हे सगळ्यात आवडते गाणे आहे. B.A. ला मराठी शिकत असताना ज्ञानेश्वर माउलींची ओळख झाली आणि मनोमन मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांच्याबद्दल जे जे ऐकायला मिळालं ते सगळं माझ्या हृदयावर, मनावर कोरले गेले. त्यातलीच एक छोटी आठवण सांगते.

ज्ञानदेवांनी आपल्या गुरूंच्या, निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून भावार्थ दीपिका लिहिली. तीच पुढे ज्ञानेश्वरी म्हणून उदयाला आली. त्यावेळी लोकांना ज्ञानेश्वरी इतकी भावली इतकी भावली की लोकांनी ज्ञानदेवांची हत्तीवरून मिरवणूक काढायची ठरवली. ज्ञानदेवांच्या संमतीशिवाय हे होणे अशक्य. म्हणून सगळेजण ज्ञानदेव आंकडे परवानगी मागायला गेले. पण ज्ञानदेव कसले ऐकत आहेत? नम्रपणे त्यांनी सांगितलं, “अहो, हे केवळ गुरुकृपेने घडलं आहे. त्यांचाच तो मान आहे”. झालं सगळे निवृत्तिनाथ कडे आले. तेही निस्पृह.अजिबात ऐकायला तयार नाहीत.

कोणी म्हणाले सोपान लहान आहे, त्याला हा मान देऊया. मुक्तालाही लोकांनी विचारले. मुक्ता म्हणाली, “अहो,आम्ही संन्यासाची मुले, ज्ञानोबांनी लिहिलेला हा ग्रंथच खरा श्रेष्ठ आहे. तोच सर्वांना पुढेही मार्गदर्शन करणार आहे. खरामान या ज्ञानेश्वरीचा आहे. आम्ही निमित्तमात्र आहोत.”

अखेर निश्चित झाले. ज्ञानेश्वरीचा हत्तीवरून सन्मान करायचा, मिरवणूक काढायची. धन्य ती भावंडे ज्यांनी ज्ञानेश्वरीची थोरवी लिहिली गायली पटवली अन्न आचरणात आणून धन्य केली.

ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांचे मोठेपण आजही टिकून आहे. सातशे वर्षानंतरही ही ही ग्रंथसंपदा तोलामोलाचे आहे. आजही त्याची थोरवी, महत्व, मार्गदर्शन आपल्याला अनमोल ठरते आहे.

 

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print