मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सुजाता असं काही करणं शक्यच नाही. मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन जाळत राहिला. ) 

“आता प्रॉब्लेम मिटलाय सर. पैसेही वसूल झालेत”

सुहास गर्देनी सांगितलं आणि मी दचकून बघतच राहिलो क्षणभर.

“प्रॉब्लेम मिटलाय? पैसे वसूल झालेत? कसे?कुणी भरले?”

“मी ‘लिटिल् फ्लॉवर’ ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. त्यांनी लगेच पैसे पाठवले. “

ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं मला समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसीव्हर ठेवून दिला. माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देनं बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलंय असंच वाटू लागलं. माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयीत नजरेनं माझ्याकडेच पहात आहेत असा मला भास झाला आणि मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो. माझ्या अस्वस्थ मनात अचानक अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक विचार चमकून गेला आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो. )

“सुजाता, त्यादिवशी निघताना मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ची कॅश तुला दिली तेव्हाच ‘ती मोजून घे’ असं सांगितलं होतं. हो ना?” तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. ” ते पैसे मी स्वतः मोजून घेतले होते. एखादी नोटही कमी असणं शक्यच नाही. खात्री आहे मला. ती तशी असती तरीही मी एकवेळ समजू शकलो असतो. पण पन्नास रुपयांच्या चक्क १७ नोटा? नाही.. हे शक्यच नाही. कांहीतरी गफलत आहे. “

भेदरलेल्या सुजाताचे डोळे भरून आले. माझा चढलेला आवाज ऐकून सर्व स्टाफ मेंबर्स चमकून माझ्याकडे पहात राहिले. सुहास गर्देंची बसल्या जागी चुळबूळ चालू झाल्याचं मला जाणवलं.

“सुहास, कॅश शॉर्ट आहे हे तुमच्या केव्हा लक्षात आलं होतं?”

“टोटल कॅश रिसीट टॅली करताना सुजाताच्याच ते लक्षात आलं होतं सर. ” 

“पण म्हणून फरक ‘लिटिल् फ्लॉवर’च्या कॅशमधेच कसा ? इतर रिसीटस् मधे असणार नाही कशावरून?”

सुजातानं घाबरुन सुहासकडं पाहिलं.

“सर, तिच्या काउंटरला शनिवारी खूप गर्दी होती. त्यामुळे तुम्ही दिलेली कॅश आणि स्लीपबुक दोन्ही सुजातानं न मोजता बाजूला सरकवून ठेवलं होतं. गर्दी कमी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तिनं ती कॅश मोजली तेव्हा त्यात पन्नास रुपयांच्या १७ नोटा कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. “

“आणि म्हणून तुम्ही लगेच मिस् डिसोझांना फोन केलात. “

“हो सर”

आता यापुढे त्यांच्यासमोर डोकं आपटून घेण्यात काही अर्थच नव्हता. मिस् डिसोझांना मी तातडीने फोन करणं गरजेचं होतं पण माझं धाडस होईना. स्वतःच एखादा भयंकर गुन्हा केलेला असावा तसं मलाच अपराधी वाटत राहिलं. त्याना फोन करण्यापेक्षा समक्ष जाऊन भेटणंच योग्य होतं. तेही आत्ता, या क्षणीच. पण जाऊन सांगणार तरी काय? रिक्त हस्ताने जाणं पण योग्य वाटेना. त्यासाठीआठशे पन्नास रुपये अक्कलखाती खर्च टाकून स्वत:च ती झळ सोसण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्याकाळी ८५० रुपये ही कांही फार लहान रक्कम नव्हती. आपल्या खात्यांत तेवढा बॅलन्स तरी असेल का? मला प्रश्न पडला. मी आमचं स्टाफ लेजर खसकन् पुढं ओढलं. माझ्या सेविंग्ज खात्याचा फोलिओ ओपन केला. पाहिलं तर नेमका ८५५/- रुपये बॅलन्स होता!

त्याकाळी मिनिमम बॅलन्स पाच रुपये ठेवायला लागायचा. मागचा पुढचा विचार न करता मी विथड्राॅल स्लीप भरून ८५०/- रुपये काढले. पैसे घेतले आणि थेट बाहेरचा रस्ता धरला.

“मे आय कम इन मॅडम?”

मिस् डिसोझांनी मान वर करून पाहिलं. त्यांच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी दिसली. चेहऱ्यावरचं नेहमीचं स्मितहास्य विरुन गेलं. एरवीची शांत नजर गढूळ झाली.

त्यांनी समोर बसण्याची खूण केली.

“येस.. ?”त्यांनी त्रासिकपणे विचारलं.

“मी मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलो होतो मॅडम. आज पहाटे आलो. सकाळी ब्रॅंचमधे गेलो तेव्हा सगळं समजलं. माय स्टाफ शुड नॉट हॅव रिकव्हर्ड दॅट अमाऊंट फ्रॉम यू. आय एॅम रिअली सॉरी फॉर दॅट”

त्यांच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या.

“सोs? व्हॉट मोअर यू एक्सपेक्ट नाऊ फ्रॉम अस?”त्यांनी चिडून विचारलं.

मी कांही न बोलता शांतपणे माझ्या खिशातले ८५० रुपये काढले. ते अलगद त्यांच्यापुढे ठेवले.

“व्हाॅट इज धिस?”

“त्यांनी तुम्हाला फोन करून तुमच्याकडून ते पैसे रिकव्हर करायला नको होते. आय नो. बट दे वेअर इनोसंट. प्लीज फरगीव्ह देम. त्यांची चूक रेक्टिफाय करण्यासाठीच मी आलोय. तुमच्याकडून पैसे मोजून मी माझ्या ताब्यात घेतले त्या क्षणीच आपल्यातला व्यवहार पूर्ण झालेला होता. त्यामुळे पुढची जबाबदारी अर्थातच माझी होती. ती मीच स्वीकारला हवी. सोs.. प्लिज एक्सेप्ट इट‌. “

“बट व्हॉट अबाउट दॅट शाॅर्टेज? समबडी मस्ट हॅव प्लेड अ मिसचिफ. “

“नाॅट नेसिसरीली. ती एखादी साधीशी चूकही असू शकेल कदाचित. आय डोन्ट नो. त्याचा शोध घ्यायला हवा आणि मी तो घेईन”

“दॅट मीन्स यू आर पेईंग धिस अमाऊंट आऊट ऑफ युवर ओन पॉकेट. इजण्ट इट?”

“येस. आय हॅव टू. “

त्या नि:शब्दपणे क्षणभर माझ्याकडे पहात राहिल्या. त्याच्या कपाळावरच्या आठ्या अलगद विरून गेल्या. गढूळ नजर स्वच्छ झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मी समाधानानं उठलो. त्यांचा निरोप घेऊन जाण्यासाठी वळणार तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं.

“सी मिस्टर लिमये. फॉर मी, हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो ऑफ फंडस् फ्रॉम अॅब्राॅड रेगुलरली. सो एट फिफ्टी रुपीज इज अ व्हेरी मिगर अकाऊंट फाॅर अस. पण प्रश्न प्रिन्सिपलचा होता. ते इंम्पाॅर्टंट होतं. तरीही विथ एक्स्ट्रीम डिससॅटीस्फॅक्शन त्या दिवशी मी त्यांना त्यांच्या मागणीनुसार ८५० रुपये पाठवून दिले. कारण त्याक्षणी आय डिडन्ट वाॅन्ट टू मेक इट अॅन बिग इश्यू. इट्स नाईस यू केम हिअर परसनली टू मीट मी. सो नाऊ द मॅटर इज ओव्हर फाॅर मी. आय रिक्वेस्ट यू… प्लीज हे पैसे घ्यायचा मला आग्रह नका करू. तुम्ही ते मला ऑफर केलेत तेव्हाच ते माझ्यापर्यंत पोचले असं समजा आणि पैसे परत घ्या. यू डोन्ट वरी फॉर माय लॉस. आय ॲम शुअर माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे आॅर अदर”

त्या अगदी मनापासून बोलल्या. त्यात मला न पटण्यासारखं कांही नव्हतंच. पण पटलं तरी मला ते स्वीकारता मात्र येईना.

“मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास आहे मॅडम. माय गाॅड ऑल्सो वील स्क्वेअर अप माय लाॅस इन हिज ओन वे. मी आत्ता हे पैसे स्वतः देतो आहे ते केवळ कर्तव्यभावनेने आणि फक्त माझ्या स्वतःच्या समाधानासाठी. प्लीज एक्सेप्ट इट मॅडम. प्लीज. फाॅर माय सेक. “

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बहीण… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ बहीण… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

 

आईनंतर सर्वात जवळचे नाते कोणते असेल तर ते बहिणीचे. बहीण लहान असावी की मोठी यावर वाद होऊ शकतो पण बहीण असावीच असे प्रत्येकाचे मत असेल असे खात्रीने वाटते. ताई आणि माई. – घरात मोठी मुलगी असेल तर घराला आपसूक वळण लागते असे माझे मत आहे. जे आपण आई किंवा बाबांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या बहिणीला नक्की सांगू शकतो. मन मोकळं करण्यासाठी सर्वात खात्रीचे, जवळचे कोण असेल तर बहीण, कारण तिच्यात आणि आपल्यातील वयाचे अंतर फार नसते त्यामुळे ती आपली मनःस्थिती अधिक सजगतेने समजून घेऊ शकते. कधी ती आपली ‘ढाल’ बनते तर कधी ‘तलवार’!!

बहीण लग्न होऊन प्रथम सासरी जायला निघते तो क्षण भावाच्या आयुष्यातील सर्वात कसोटीचा !! जरी ती सासरी गेली तरी तिची नजर कायम आपल्या भावंडांवर असते. पुढे कालांतराने आई वडील नसले तरी बहिणीमुळे भावाला एकाकीपण येत नाही. ती आपल्या आयुष्यात सावलीसारखी असते. ती शीतल छाया जरुर देते पण आपल्या आयुष्यात अडसर बनत नाही. द्रौपदीने हरीला चिंधी बांधली आणि तिच्या आयुष्याचे ‘सोने’ झाले. *’बहिण अथवा भावासाठी आपल्या आयुष्याची ‘चिंधी’ करणाऱ्या अनेक बहिणी या जगात आहेत. आज आपण त्यांना वंदन करू.

सर्वांस पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!!!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

? मनमंजुषेतून ?

पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

झी मराठीवर होममिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झालेला होता. रोज संध्याकाळी हा कार्यक्रम बघण्यात आमचं कुटुंब एकत्र बसलेलं असायचं. आणि आमच्या वहिनीला इथंच स्वप्नं पडायला सुरुवात झाली. की, होम मिनिस्टर माझ्याही घरी यावा. मलाही पैठणी मिळावी. आणि आपणही टीव्ही वर दिसावं. आणि वहिनी कार्यक्रम संपल्यानंतर आदेश भावजी जो नंबर सांगायचे त्यावर ती रोज मेसेज करू लागली. मी म्हणायचो तिला, “अगं वहिनी ते कशाला येतील आपल्या घरी एवढ्या दूर, ते फक्त पुणे मुंबईतल्याच घरी जात असतात. तू हा नाद सोडून दे. ” त्यावर वहिनी म्हणायची, “नितीन भावजी, बघा एक ना एक दिवस आपल्या घरी होममिनिस्टर येणारच असं म्हणून ती तिच्या कामात व्यस्त व्हायची. आणि मी त्यावर थोबाड बघावं आपलं आरशात” असं बोलून पळून जायचो. त्यावर ती मागून ओरडायची. ” या गिळायला मग बघते कोण देतंय ताट वाढून असं चिडून बोलायची. “आणि घरातले सगळेच खळखळून हसायचे. पण वहिनी अगदी पार त्यात गुंतून गेलेली असायची. प्रत्येक कार्यक्रम तो जवळ बसून बघायची. एकटीच उगाचच हसायची, मोठ्याने खिदळायची. मला गम्मतच वाटायची.

माझी बारावी झाली. आणि मी पुण्यात आलो. काम करून शिकायला लागलो. अधून मधून फोनवर दादाशी आणि वहिणीशी बोलणं व्हायचं. तिला कधी करमत नसलं की ती मला फोन करायची. मला करमत नसलं की मी तिला फोन करायचो. कारण तिच्याच मायेच्या पदराखाली मी मोठा झालो. सुनिता वहिनी माझ्यासाठी आई होती, मोठी बहीण होती, आणि मनातलं सगळं मनमोकळेपणाने बोलण्यासाठी हक्काची जागा होती.

मला तो दिवस आठवतोय. मी कंपनीमध्ये बसलो होतो. आणि समोर लँडलाईन फोन होता. चला म्हणलं वहिनीची जरा गंमत करूया. असं म्हणून मी रुमाल तोंडाला लावला आणि वहिनीला फोन केला, हा लँडलाईन चा नंबर बघून तिने तो कट केला. मी परत लावला मग तिने उचलला. मी जरा मोठ्या आवाजात रुमाल तोंडाला लावून अगदी शुद्ध पुणेरी भाषेत बोललो, “हॅलो, नमस्कार सुनिता चंदनशिवे यांच्याशी आम्ही बोलतोय का?”वहिनी घाबरत होय म्हणाली, मी लगेच पुढचं वाक्य बोललो, “ह आम्ही झी मराठी मधून होम मिनिस्टर या कार्यक्रमामधून बोलतोय आणि आम्ही उद्याच तुमच्या घरी कवठेमहांकाळ ला म्हणजे सांगलीला येतोय. आपली परवानगी आहे असे आम्ही समजावे का?” त्यावर वहिनी मोठ्याने तीन वेळा ” या या या” असं म्हणली. बाकीचं जरा इकडंच तिकडचं बोललो, आणि “उद्या संध्याकाळी आम्ही बरोबर पाच वाजता आपल्या घरी येत आहोत” असं म्हणून मी फोन कट केला. नंतर मी कामात व्यस्त होऊन गेलो. वहिनीला फसवलं याचा मनात आनंद झालेला होता. पण आनंदाने उड्या मारण्याचं माझं वय आता निघून गेलेलं होतं.

गावी मात्र सुनिता वहिनीने सगळीकडे बोंबलत ही बातमी आनंदाने पसरवली. भावाला कामावरून सुट्टी काढून बोलावून घेतलं. तिचा आनंद बघून सगळेच आनंदी झाले. साफसफाई सुरू झाली. नव्या दोन साड्या आणल्या. ही बातमी बायकांच्या जवळची असल्यामुळे आपोआप सगळ्या गावभर झाली. आणि सुनिता वहिनी एकदम सेलिब्रिटी झाली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. वहिनीने तिच्या तीन बहिणी, तिचे दोन भाऊ, माहेरची सगळी माणसं आई वडील, तिच्या मावशी, सगळ्यांना ताबडतोब गाडीला बसायला सांगितलं. बघता बघता बातमी ग्रामपंचायतपर्यंत पोहचली. आपलं गाव टीव्ही वर दिसणार म्हणून सरपंच, उपसरपंच इतर सदस्य आणि विरोधी पक्षातले पण सगळ्यांची मिटिंगसुद्धा बसली. आणि बघता बघता आमचं घर आणि आमच्या सुनिता वहिनीची चर्चा वाऱ्यागत पसरत राहिली. सेलिब्रिटी असल्यागत आमची वहिनी वागू लागली. अचानक तिचं ग्रामीण बोलणं अगदी शुद्ध झालं. तिचं चालणं तिचं बोलणं सगळं बदलून गेलं. आमचा दादाही तिच्या आनंदात हरवून गेला. आणि लग्नात सुद्धा एवढं मेकअपचं सामान आणलं नव्हतं त्याहून कितीतरी जास्त आणि महाग सामान दादाने तिला आणून दिलं. दोन तासात त्याने आणि त्याच्या मित्रानी घर ही रंगवून काढलं. आणि सगळ्या गावात होमिनिस्टरचं वातावरण तयार झालं. बिश्या फोडून आमच्या घरातल्या सगळयांना नवीन कपडे घेतले गेले. मला यातलं एक टक्काही काही माहीत नव्हतं. मी माझ्याच नादात इकडं रमून गेलो. आणि आपण वहिनीला होममिनीस्टर बोलतोय म्हणून फोन केला होता हे ही विसरून गेलो. कारण अशा गमती जमती करणं हा माझा रिकामा उद्योगच होता.

त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या माहेरहून वीस पंचवीस माणसं लहान लेकरं वेगळीच. अस सगळं गणगोत गोळा झालं. आणि फार मोठा उत्सव असल्यागत वातावरण झालं. नुसतं आमच्या घरातच नाही तर गल्लीतसुद्धा सगळ्यांच्या तोंडात एकच चर्चा एकच विषय आणि तो म्हणजे होममिनिस्टर आणि सुनिता. आणि आमच्या सुनिता वहिनीचा रुबाब म्हणजे काय सांगावं. तिच्यासमोर इतर बायका म्हणजे चिल्लरच. एकटीचीच बडबड, सगळ्यांना आदेश सोडत होती. ये असं करायचं, तसं करायचं कुणी दंगा करायचा नाही. मध्ये मध्ये बोलायचं नाही. आणि सगळेजण तिचा आदेश नम्रपणे ऐकून घेत होते. आणि सुनिता वहिनी एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेली होती.

सायंकाळचे चार वाजून गेले. घरासमोर गर्दी झाली. सुनिता वहिनी बघावं आणि बघतच राहावं अशी नटली होती. सगळे नातेवाईक नटून थटून बसलेले होते. अजून कसं कुणी आलं नाही म्हणून हळूहळू वातावरण काळजीचं होऊ लागलं. दादाने तिच्या मोबाईलवर आलेल्या म्हणजे मी केलेल्या नंबरवर परत परत फोन करायला सुरुवात केली. पण फोन काही कुणी उचलत नव्हतं. कारण रविवार होता आणि ऑफिस बंद होतं. मी रूमवर झोपलो होतो. काय झालं कुणास ठाऊक, वडिलांना शंका आली आणि त्यांनी मला फोन केला. मी वडिलांचा नंबर फादर म्हणून सेव्ह केला होता. मी फोन उचलला तसे वडील म्हणाले, ” हे बघ मी तुझा बाप आहे, मी जे विचारीन त्याचं एकाच शब्दात उत्तर द्यायचं आणि खरं द्यायचं. “मी घाबरलो, अण्णा असं का बोलतायत म्हणून मी उठुनच बसलो. फोन कानाला आवळून धरला. आणि वडील म्हणाले, ” ते कोण टीव्ही वाले येणारयत म्हणून सुनिताला काल तूच फोन केला होता का?”मी गप्प झालो, वडिलांनी आवाज वाढवून पुन्हा विचारलं आधीच धमकी दिली होती मी पटकन म्हणलं ” होय अण्णा मीच काल आवाज बदलून वहिनीला फोन केला होता. “त्यावर अण्णांनी असल्या शिव्या दिल्या मला की बस्स. आपोआप डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी फोन कट केला. आणि माझ्या बहिणीला फोन केला, म्हणलं “तायडे, काय सुरुय ग घरी, ?'” त्यावर माझी बहिण इतक्या आनंदाने तिथल्या वातावरणाबद्दल सांगत होती. आणि माझ्या छातीत चमकत चाललं होतं. आणि डोळ्यासमोर हातात हिरव्यागार बांगड्या, तळहातावर मेहंदी काढलेली, आणि नटलेली सुनिता वहिनी दिसू लागली. मी फोन कट केला. आणि मला दम लागला.

तिकडे वडिलांनी सुनिता वहिनीला आणि इतर लोकांना कसं सांगितलं माहीत नाही. पण सुनिता वहिनी मात्र हे सगळं नितीन भावजीने केलं आहे. आपली इतकी मोठी फसवणूक झालीय या धक्क्याने गपकन खालीच बसली होती. ती रडत ही नव्हती कुणाशी बोलत ही नव्हती. एकटक ती दातात ओठ पकडून भिंतीकडे बघत बसली होती. सगळं वातावरण काही काळ शांत झालं होतं. सुनिता वहिनीला हा फार मोठा धक्का बसला होता. आणि सगळ्यांच्या तोंडात एकाच नावाने शिव्या सुरू झाल्या होत्या आणि तो ग्रेट माणूस नितीन चंदनशिवे म्हणजे मी होतो. तिच्या माहेरून आलेल्या तिच्या बहिणी तर वाट्टेल तसं बोलत होत्या. सगळेजण सुनिता वहिणीला एकच वाक्य बोलत होते

” घे तुझा लाडाचा नितीन भावजी. लै बोंबलत होतीस माझा नितीन भावजी माझा नितीन भावजी. कर अजून लाड त्याचा. बस ताटात घेऊन त्यालाच. चांगलं पांग फेडलं बघ तुझ्या भावजीने. ” … समोर भिंतीच्या फळीवर माझा फोटो मी एका काचेच्या फ्रेममध्ये बनवून ठेवला होता. वहिनी अचानक उठली आणि तिने तो फोटो जोरात फरशीवर आपटला. सगळ्या घरात काचा झाल्या. कुणीच काही बोललं नाही.

माझ्या मोबाईलवर सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली. मी उचलायचो कानाला लावायचो आणि शिव्या खायचो. तोंडातून आवाज निघत नव्हता. वहिनीची केलेली मस्करी चांगलीच महागात पडली होती. आनंदाने उत्साहाने भरलेलं घर एका क्षणात शांत झालं. सगळेजण आपल्या आपल्या गावी निघून गेले. आणि सुनिता वहिनी आजारी पडली. चार दिवस घराच्या बाहेर आली नाही. तिने टीव्ही लावला नाही. कुणाशीच बोलली नाही. आईने आणि बहिणीने मला बजावून ठेवलं. दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढू नकोस. तिचा राग शांत झाला की मग ये. पण माझं धाडसच होत नव्हतं.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जो प्राप्त है, पर्याप्त है.’ – लेखिका : सौ. रेखा जेगरकल ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘जो प्राप्त है, पर्याप्त है.‘ – लेखिका : सौ. रेखा जेगरकल ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

 

कधी कधी आपल्या आवडीच्या विषयावर लिहायची संधी मिळते तेंव्हा खूप सारे विषय फेर धरू लागतात. मला मात्र नेहमी एखाद्या वेगळ्या म्हणजे विषय देऊन त्यावर लिहिण्यापेक्षा आपल्या मनाला भावलेला विषय किंवा एखाद्या व्यक्तीचा आवडलेला पैलू, ज्यामुळे आपल्याला विचार करायला लावलं जातं त्याविषयी लिहायला आवडतं.

कौन बनेगा करोडपती हा बौद्धिक, मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. आपल्या बुद्धीत भर पडते. जेंव्हा जेंव्हा माझं उत्तर बरोबर येतं तेव्हा मला खूप आनंद होतो. परवाच्या भागात फास्टेस्ट फिंगर मध्ये अव्वल ठरलेले नीरज सक्सेना हाॅट सीटवर आले. एकदम शांत रीतीने बसले. किंचाळत, डान्स करत, रडत, हात उंचावत, अमिताभला जोरात मिठी मारत यातलं त्यांनी काहीही केलं नाही. ओळख सांगायची तर ते सायंटिस्ट आहेत. पीएचडी आहेत व कोलकत्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. अतिशय प्रसन्न, साधं व्यक्तिमत्त्व. डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलामांसोबत काम करायला मिळालं हे जीवनातील भाग्य ते समजतात. त्यांनी सांगितलं की प्रथम मी माझाच विचार करत होतो परंतु कलामांच्या सान्निध्यात राहून मी माझ्याबरोबर दुसऱ्यांचा व राष्ट्राचा विचार करू लागलो.

नीरजजी खेळू लागले. एकदा ऑडियन्स पोल घेतलं परंतु दुगुनास्त्रमुळे त्यांना ती लाईफ लाईन पुन्हा मिळाली. सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी सफाईदारपणे दिली. त्यांच्या बुद्धीमत्तेची चुणूक पाहून थक्क व्हायला झालं. तीन लाख वीस हजार जिंकून, बोनस तेवढीच रक्कम मिळविली मग ब्रेक झाला.

ब्रेकनंतर अमिताभ बोलू लागले… चलिए डाॅक्टरसाब अब आप के सामने आ रहा है ग्यारह वा प्रश्न… ए रहा प्रश्न… इतक्यात नीरजजी म्हणाले… सर मैं क्विट करना चाहता हूँ.. अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले. इतकं चांगलं खेळणारे, तीन लाईफ लाईन जीवित असताना. करोड रुपये सहज जिंकतील असं असताना खेळ सोडत आहेत का? विचारलं… आज तक ऐसा कभी हुआ नहीं..

नीरजजी शांतपणे म्हणाले… माझ्या शिवाय आणखी खेळाडू वाट पहात आहेत व ते माझ्या पेक्षा लहान आहेत. त्यांनाही संधी मिळाली पाहिजे तसं तर मला खूप पैसे मिळाले आहेत. मला वाटतं जो प्राप्त है पर्याप्त है. अधिक की आशा नहीं है.

अमिताभ बच्चन अवाक् झाले. सर्वत्र शांतता पसरली. एक सेकंद स्तब्धता होती. नंतर सर्वांनी खूप वेळ उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. अमिताभ म्हणाले… खूप काही शिकायला मिळालं. नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती आज पहायला मिळाली.

खरं तर एवढी संधी समोर असताना केवळ दुसऱ्यांना संधी मिळावी व जे मिळालं तेवढं खूप आहे असा विचार करणारी पहिलीच व्यक्ती माझ्या पाहण्यात आली. मनातून मी त्यांना नमस्कार केला.

आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही. हाव कमी होत नाही. कमीच पडतो. या पैशा मागे लागून घर, झोप, ननाती, प्रेम, मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही. अशा वेळी डॉ. नीरज सक्सेना सारखी देव माणसं येतात व बोध देऊन जातात. या कलियुगात अशा समाधानी, अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे.

त्यांनी खेळ सोडल्यानंतर एक मुलगी हाॅट सीट वर येऊन बोलू लागली… तीन मुली झाल्या म्हणून वडिलांनी आई सहित आम्हाला बाहेर काढलं. आम्ही एका आश्रमात राहतो…

मी विचार केला की नीरजजींनी खेळ सोडला नसता तर शेवटचा दिवस असल्याने कुणालाही संधी मिळाली नसती. आज त्यांच्या त्यागाने एक गरीब मुलीला चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली. जगात इस्टेटीतला एक पैसा सोडायची तयारी नसते. त्यासाठी भांडणे. खून खराबा होताना आपण पाहतो. स्वार्थ बोकाळलाय सर्वत्र. परंतु हे उदाहरण अपवाद आहे.

देव माणसात असतो. ते नीरजजी सारख्या दु ऱ्याचा, देशाचा विचार करणाऱ्या माणसात. मी आयुष्यात कधीच या थोर माणसाला विसरणार नाही. आज माझ्या आवडीच्या विषयावर म्हणजेच अनोख्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहायला मिळालं याचा आनंद आहे.

गरज भागली की माणसानं थांबावं व दुसऱ्यांना संधी द्यावी. स्वार्थाचा त्याग करावा. सर्व सुखी होतील. हा धडा शिकायला मिळाला. मला नेहमीच अशा. व्यक्तींविषयी आदर वाटतो व लिहावं वाटतं.

लेखिका : सौ. रेखा जेगरकल

दापोली.

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दिवाळी… की हॅलोविन ???” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “दिवाळी… की हॅलोविन ???” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

आमच्या पुण्याच्या घरी सोसायटीतील काल‌ काही लहान मुलं हॅलोवीनचे भुतांचे चेहरे रंगवून “ट्रिक ऑर ट्रीट” असं म्हणत कँडीज मागायला आली‌ होती. त्यावर सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर त्यांच्यातल्या काही मातांनी, “अवर हॅलोवीन गँग, सो क्यूट!” असे‌ फोटो टाकले.

आज सकाळी त्याच ग्रूपवर त्याच फोटोंच्या खाली एका पुणेरी एकारान्त काकांनी हा मेसेज फॉरवर्ड केला. शेवटचे दोन परिच्छेद तर विशेष धमाल‌ आहेत.

असं मनोरंजन फक्त पुण्यातच मिळू शकतं!

“हल्ली गेल्या काही वर्षात हॅलोविन नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरतो आहे…

हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ ह्यांचे चेहरे, जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे happy haloween!!  🤦‍♀️

हिंदूंचा आनंदमय दीपोत्सव साजरा करताना घरातले अमंगल, दारिद्र्य बाहेर जावो.. मंगलमय, लक्ष्मी सोनपावलांनी घरात येवो असे म्हणायचे आणि 

दिवाळी नंतर हॅलोविनच्या मूर्खपणाच्या नावाने तीच घाण घरात परत घरात आणायची.. ??

आधी सर्वांगसुंदर सुख- समृद्धीचे प्रतीक नवीन कपडे घालून लक्ष्मी पूजन करायचे पाडव्याच्या दिवशी देवळात जाऊन 

“अज्ञानत्व हरोनी बुद्धि मती दे आराध्य मोरेश्वरा

चिंता, क्लेश, दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी”

अशी प्रार्थना म्हणायची नंतर थोड्या दिवसात भुतखेतांचे ड्रेस घालून हिंडायचे आणि त्यांना घरात घेऊन यायचं ही कसली अवदसा आहे??

मुलांना मुंज केल्यावर दोन घरी भिक्षेला जायला लाज वाटते आणि भुतांची चेहरे रंगवून घरोघरी चॉकलेट मागत फिरतात.. ही कसली विकृती साजरी करत आहोत??

आपली मुले हे प्रकार करत असतील त्याचं मूर्खासारखे कोडकौतुक न करता चांगले बदडून काढा.. आणि जे कोण हे करायला उद्युक्त करत असतील त्यांना चांगला दम द्या.. आणि आठवण करुन घ्या आपण थोड्या दिवसांपूर्वी हिंदू धर्मात होतो म्हणून मंगलमय दिवाळी साजरी केली..

परत जर हे प्रकार मुलांकडून करायला लावले तर तुमच्या दारात श्राद्धाचा स्वयंपाक, मिरची लिंबू, काळी बाहुली, पत्रावळीवर गुलाल घातलेला भात असं सगळं आणून ठेवू. हिंदूंमध्ये भुताखेतांची कमी नाही जी विदेशी भूत आयात करायची गरज पडते आहे” 🤣

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिवाळीचा सांगावा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “दिवाळीचा सांगावा…–☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा,

हाच या दिवाळीचा सांगावा.

 

हजारो वर्षापासून मेंदूवर चढलेली अज्ञानाची काजळी खरडून काढण्याचा प्रयत्न ज्यांनी केला 

त्यांनाच या अंधाऱ्या संस्कृतीने संपवून टाकले आहे.

त्यांनी दिलेला विचार गिळंकृत करून समाजाला मोडून-तोडून सांगितला जात आहे.

विज्ञान तंत्रज्ञानात जगाने अभूतपूर्व मुसंडी मारलेली असताना – – – 

भारतात आताच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी धर्मग्रंथांची पाने चाळली जात आहेत.

 

डार्विन, न्यूटन, आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग या सगळ्यांना वेड्यांच्या पंक्तीत बसविण्याची सत्तेला घाई झाली आहे.

शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे सोवळे परिधान करून मंदिरात घंटा बडवत बसले आहेत.

राफेल सारख्या अत्याधुनिक फायटर विमानांवर निंबू-मिरची उतरवल्या जात आहेत.

गाय, गोमुत्र आणि गोपालनाला राष्ट्रीय स्वरूप आले आहे.

 

अशा काळात अज्ञानाची काजळी अधिक घट्ट होताना दिसत आहे.

विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना शत्रुस्थानी मानले जावून नवे अभ्यासक्रम तयार केले जात आहेत.

 

विवेकाचा एक मंद दीप घेवून मूठभर व्यक्ती चार्वाकाच्या काळापासून चालत आहेत,

पण त्यांना ध्येय गाठता आले नाही.

कारण अविवेक आजही प्रभावीच आहे.

 परंतु विवेकाने पराभव अजून पत्करला नाही.

 

तुमचाही विवेक धडका देतोय 

… मेंदुतील अंधश्रद्धांच्या पोलादी तटबंदींना…

त्याला बघा एकदा मोकळे करून…

… विवेकाचा दीप पेटवून तर बघा, हृदयाच्या एखाद्या कोनाड्यात…

… मग बघा सारं विश्व कसं प्रकाशमान होतेय ते…!

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुटुंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ कुटुंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

ll वसुधैव कुटुंबकमं ll

… कुटुंब हा शब्दच एक व्यापक अर्थ घेऊन येतो. कोणत्याही देशाची प्रगती ही कुटुंबाच्या प्रगतीवरच अवलंबून आहे. अनेक कुटुंबाची गल्ली, अनेक गल्यांचं गाव किंवा शहर. अनेक शहरांचे राज्य आणि अनेक राज्यांचा देश.

मुळात मी वैयक्तिक कुटुंबाचा विचार न करता, मला वसुधा म्हणेज सृष्टी कुटुंबाचा विचार करावा वाटतोय! 

श्री समर्थानी लहानपणी म्हटले होते, , , ” चिंता करतो विश्वाची !” आणि ते खरेही आहेच. भारतीय संस्कृतीत 

सर्व संतांनी विश्वाची गणना कुटुंब म्हणूनच केली ! 

वैयक्तिक कुटुंबाबद्दल न बोलणे हेच श्रेयस्कर वाटते. कुटुंब व्यवस्थेचा ढसाळता पाया बघून, काळजी दसपट वाढली आहे. ह्या व्यवस्थेला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले आहे. त्याचा उहापोह नकोच. जीवन हेच यांत्रिकी झालं आहे. इलेक्ट्रॉनिक युगात सोशल मीडियाने पूर्ण कुटुंब व्यवस्थेला ग्रहण लागले आहे. एकत्र कुटुंब पद्धती केव्हाच नामशेष झाली आहे.

माणूस हाच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे ! गरज ही शोधाची जननी, असं जरी असलं तरी, कुटुंबाच व देशाचं पर्यावरण ढासळले आहे. माणसाचा वाढलेला, शहराकडील ओढा … त्यामुळे अनेक शहर नुसती फुगत चालली आहेत. जीवन हे आता संघर्षमय झाले आहे. जो तो स्वार्थी झाला आहे. आपुलकी, सहानभूती हे शब्द फक्त पुस्तकात दिसून येतात ! 

प्रत्येक देशात चढओढ लागली आहे. ग्रोथ रेट हे करन्सीमध्ये मोजलं जात आहे! कुटुंबाचा व त्याच्या आपुलकीचा प्रश्न मोडीत निघाला आहे. मोबाईल, लॅपटॉप, वायफाय सिग्नल हे परवलीचे शब्द झालेत! माणूस पुढे गेला म्हणून त्याची प्रगती होते का ? त्याच्या भावभावनेच काय! 

हल्ली सगळीच नोकरीं करतात, त्यामुळे दुपारचं जेवण ऑफिस मध्ये. तर रात्रीच जेवण हे टी व्ही किंवा मोबाईलसह! लहान मुलांना पाळणाघर तर वृद्धाना वृद्धाश्रमात! मुलांच्यावर संस्कार करणारे वाड वडील आजी आजोबा घरात नसतील तर, त्यांच्यावर संस्कार कसे होणार! रविवारी घरातील कामे. लहान मुलावर कसे संस्कार होणार. सतत अठरा तांस घराबाहेर, झोपायला भाड्याच्या घरात! 

गेली दोन वर्षे बघतोय युक्रेन व रशिया युद्ध कांही थांबेल असं वाटतं नाही. मध्य पूर्व एशियात हुती हिजबुल्ला हमास इराण एकीकडे आणि इस्त्राईल एकीकडे. जो तो आपल्या शस्त्र अस्त्र बाहेर काढून आपण किती श्रेष्ठ आहोत याची चढा ओढ पाहायला मिळते. तुमचं सगळं काही कबूल. पण अगणित कुटुंबाची वाताहत ही उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते त्याच काय!!

मानवताच नसेल तर, तो देश त्या देशातील कुटुंब संस्था प्रगतीचे बळी ठरत आहेत, असं नाही काय तुम्हाला वाटतं?? अगणित कुटुंब बेचिराख झाले. लांब नको आपल्या जवळच असलेल्या बांगलादेशच काय चाललंय हे आपण बघत आहोतच. आपले शेजारीच जर आजारी असतील तर आपले कुटुंब सुरक्षित राहील काय ? असं असंख्य प्रश्न, मंजूषेतून निघतात.

… सुसंस्कारच जर कुटुंबात नसेल तर तो देश टिकेल का? 

 सुखी कुटुंब सुखी देश, कुटुंबच हा जीवनातील व जगण्यातील खरा पाया आहे, असं नाही का तुम्हाला वाटतं. तसे अनेक मुद्दे उहापोह करण्यासारखे आहेत. पण विस्तार भयास्तव मी इथेच थांबतो व आपली रजा घेतो.

llसर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ll 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘औषध नलगे मजला !’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

☆ ‘औषध नलगे मजला !’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

नमस्कार प्रिय मैत्रांनो ! 

दिवाळीच्या ‘उपहाराचा’ मनमुराद आनंद आपणास घेता यावा म्हणून हा ताजा लेखन प्रपंच! आपल्या आवडीनुसार याला तिखट अथवा गोड (किंवा दोहोंचे कॉम्बो) म्हणून स्वीकारावे.

‘ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले |

औषध नलगे मजला, औषध नल गे मजला | 

परिसुनि माता ‘बरे’ म्हणूनी डोले ||

… नलाच्या विरहामुळे आजारी पडलेल्या दमयंतीला औषधोपचार देण्यासाठी वैद्य आले असता, तिने “औषध नलगे मजला” असे उत्तर दिले त्यावरून इतरेजनांनी “तिला औषध नको (नलगे)” असा अर्थ काढला. मात्र तिच्या मनांतील खरी भावना “मला नल हेच औषध (नल गे)” हीच होती. पण संकोचाने ती तसे व्यक्त करू शकत नव्हती. हा सदाबहार श्लेष काव्यालंकार रचणारे पंडित मोरोपंत (कवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मयूर पंडित १७२९-१७९४) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी होते. हे पुराण-काव्य अंमळ जुने झाले. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या मधुमती या गाजलेल्या चित्रपटातील वैजयंतीमालाच्या गावरान नृत्यकलेने सजलेल्या ‘चढ़ गयो पापी बिछुआ’ या गाण्यात नायिका म्हणते- ‘मंतर झूठा, बैद भी झूठा, पिया घर आ रे ! सरतेशेवटी ‘सैंया को देख के जाने किधर गयो बिछुआ ‘ असे सर्व श्रेय प्रियकराला देऊन मोकळी होते.

मंडळी, आजारामुळे घरात बसायचा जाच सहन करीत लहान मुले रडत-रडत नेमके हेच सांगतात, ‘मला औषध नको ग आई!’ पण त्याचे नाक वगैरे दाबून मधाळ औषधीयुक्त सिरप त्याच्या घशाखाली उतरवल्याशिवाय आईचे इतिकर्तव्य समाधानपूर्वक पूर्णत्वाला जात नाही. आमच्या लहानपणी कोजागिरीच्या पर्वाला लागून महिनाभर ‘भुलाबाईच्या गाण्यांना’ ऊत यायचा. त्यात पुन्हा खाद्य-संस्कृतीला जागत प्रत्येक घरी गाणी म्हटल्यानंतर स्वादिष्ट फराळाचा रतीब असायचा. त्याची सुंदर सांगता कोजागिरीला केशर-मेव्याने युक्त आटीव दुग्धपानाने व्हायची. त्यातले एक गाणे आठवणीत राहिले. आधी तर दोडक्या सासरच्या वैद्याचे वर्णन येते, ‘आला ग सासरचा वैद्य’, अपेक्षेप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व ‘फाटके तुटकेच’ असते. मग येणार लाडक्या माहेरचा वैद्य, त्याचे व्यक्तिमत्व साहजिकच राजेशाही असणार… या गाण्यांमधून सासरच्या मंडळींनी वर्षभर केलेल्या छळावर उतारा म्हणून ही गोड गाणी असायची. मात्र या गाण्यातील संदेश असेच सांगतो की – ‘ वैद्य असो वा डॉक्टर, त्याची पर्सनॅलिटी पेशंटसाठी कायमच कौतुकाचा विषय असते. ’ 

मैत्रांनो, आपले सणवार जेवून-खाऊन समाधानाने साजरे करायची आपली अक्षय परंपरा आहे. इतकंच काय, नावालाच निराहारी अशी एकादशीची परंपरा आपण निर्जळा एकादशी म्हणून सुरु ठेवतो. (कोणी तरी म्हटलंय, ‘निर्जळा एकादशीला इतका वैविध्यपूर्ण फराळ करावा की जळाला सुद्धा पोटात जागा असू नये!’) आम्हां भारतीयांचे सेलेब्रेशन खाण्यापिण्याभोवती रिंगण घालत असते. कोणी रुजू होऊ दे नाही तर निवृत्त, पार्टीला पर्याय नाहीच. गेलाबाजार असा कुठलाच प्रसंग मला आठवत नाही जेव्हा खाण्यापिण्यापासून वेगळे होत आपण कांही साजरे करीत असू.

मैत्रांनो, असे कधी होईल कां की आपण मळलेल्या वाटा सोडून अनवट रानवाटा धुंडाळीत एखादे समाजाभिमुख कार्य करू? खात्यापित्या घरच्या लाडक्या आप्तांची अन मैत्रमंडळींची पोटे आधीच तुडुंब भरलेली आहेत. त्यांना पार्टी देण्याऐवजी ज्यांची पोटे खपाटीला गेली आहेत अशा भुकेल्या व्यक्तींना दोन घास खाऊ घालता येतील कां, यावर आपण विचार करायला हवा. त्यांची दारिद्र्याच्या तमाने झाकोळलेली उदासीन दिवाळी उजळायला आपल्या दानाचे दीपदान त्यांचे आयुष्य नक्कीच सुसह्य करील.

तुम्हाला काय वाटतं?

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती परतली… ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? मनमंजुषेतून ?

☆ ती परतली…  ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

… जिच्या येण्याअगोदरच आनंद येतो.

… जिच्या स्वागतासाठी अनंत तारे आकाशमार्ग सोडून भूतलावर अवतरतात.

… जिच्यामुळे सारा आसमंत उजळून जातो, गंधाळलेले वारे वाहू लागतात, सारी सृष्टी आनंदाने बेभान होते.

… जिच्या येण्याने नात्यातले अवघडलेपण संपते.

… जिच्या गोजिरवाण्या स्पर्शाने सारी नाती जवळ येतात.

… जिच्यामुळे हळवे प्रेम आणखी गहिरे होते.

… जिच्यामुळे ओंजळभर सुख पासरीभर होते.

… जिच्याकडे कोणताही थिल्लरपणा नाही, फक्त नात्याचंच कोडकौतुक नाही तर मातृत्वाची पूजा आहे, श्रमाची पूजा आहे, व्यापारातील सचोटीची पूजा आहे.

… जिच्यामुळे नात्यांना दीर्घायुष्य लाभते.

… जिच्यामुळे बाजाराला नवचैतन्य लाभते.

… जी, असेल एखादी रुसणारी बहीण, पत्नी पण रुसवा काढण्यातला गोडवा सांगते.

… पर्यावरण प्रेमी बेचैन होतात, पण बाळ गोपाळांचे फुलबाजी पेटवल्यानंतर चमकणारे डोळे, भुईचक्र फिरायला लागले की डोळ्यातून ओसंडून वाहणारे कुतूहल हे तर शब्दातीत आहे. जगात शत्रुत्व वाढवणारे इतके बॉम्ब फुटताहेत, एक बॉम्ब इथेही फुटतो, पण जीविताला संजीवनी देणारा, वित्ताला उभारी देणारा, मित्रत्वाचा, प्रेमाचा संदेश देणारा !

भावनांचा ओलावा पापणीतून पाझरताच ती परतली—-

— पुढच्या वर्षी याहून जास्त आनंद घेऊन येण्याचं वचन देऊन !

… थोडी हुरहूर, थोडी कुरबुर, थोडी हुडहुड मागे ठेऊन !

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘टाटा‘ ही केवळ दोन अक्षरे नाहीत – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री जमशेटजी टाटा

? इंद्रधनुष्य ?

 टाटा‘ ही केवळ दोन अक्षरे नाहीत – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मित्रांनो, आपण मुंबई पुणे रेल्वेने प्रवास करतांना खोपोली जवळ मोठमोठे पाइप खाली गेलेले बघतो, हे काय आहे त्यामागची कथा !!

नुसेरवान टाटा आपला मुलगा जमशेट व कुटुंबासह नवसारीहून व्यवसाय करण्याकरिता मुंबई येथे १८४७ साली आले. तेव्हां जमशेट ८ वर्षांचा होता. दूरदृष्टी हा टाटा घराण्याचा वारसाच, पुढे कशाची गरज पडेल, काय केले पाहीजे हे त्यांना फार आधीच कळते.

१९०२ च्या नोव्हेंबरमधे जमशेटजी टाटा लॉर्ड हँमिल्टन यांना वळवण वीज प्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन भेटले. मुंबईची विजेची वाढती मागणी, गरज या सर्वाचा यांत विचार केला होता. परंतु या प्रस्तावास परवानगी मिळून काम चालू करण्यांस १९१० साल उजाडले. १९१० साली जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ ला कामाला सुरवात केली. ७फूट व्यासाच्या पाइप मधून खंडाळा, लोणावळा येथे पडणारे तुफान पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइप लाइन टाकुन आणायचे, तेथे जनित्राद्वारे विज निर्माण करावयाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधून पाणीसाठा वाढवायचा की जेणेकरून वर्षभर विज निर्मिती चालु राहील.

१९११ मधे शुभारंभ झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ७ हजार मजुर खंडाळा-लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यांत रात्रंदिवस कामाला लागले. सरळ सुळके, गर्द झाडी यातुन पाइप वर चढवणे, उतरवणे, परत योग्य जागी जोडणे असे सर्व उच्च दर्जाचे काम चालु झाले. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपातुन पाणी येत आहे व विज निर्मिती होत आहे. हे पाइप जर्मनीहून आणले होते, जनित्राची चक्रे स्वित्झर्लडहून आणली, जनित्र अमेरिकेहून, विज वाहुन नेणाऱ्या तारा इंग्लडहून आणल्या. हे सर्व टाटा कंपनीच्या लोकांनी ४ वर्षात पुर्ण केले. १९१५ मधे लॉर्ड विलींग्टन यांनी खोपोलीत कळ दाबल्यानंतर मुंबईच्या सिप्लेक्स गिरणीत दिवे लागले. १९११ साली दळणवळणाची साधने, उपजत टेक्नॉलॉजी, परिस्थिती, कम्युनिकेशनच्या सोयी या सर्वांचा विचार केला तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.

टाटा, ही भारतीयांसाठी केवळ दोन अक्षरे नाहीत. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते.

देशवाद टाटांच्या रोमारोमात मुरलेला आहे. जे जे उदात्त, उत्तम आहे ते ते मी या देशासाठी घडवीन असा ध्येयवाद आहे. पैशाची उधळपट्टी नाही, भपका नाही, सवंग प्रसिद्धी नाही पण कर्तव्य आणी गुणवत्ता यात सर्वोच्च असण्याची उत्तुंग ध्येय आहेत. २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या पाकिस्तानबरोबर त्यांनी व्यापार बंद केला. वाटेल ती किंमत देऊन टाटांच्या गाड्या खरेदी करण्यास आलेल्या पाकिस्तानी राजदूताला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. आताही असहिष्णुतेच्या वादाचा केंद्रबिंदू असलेल्या त्यांचा ब्रँड अँबेसेडर असलेल्या आमिरखानला त्यांनी तडकाफडकी काढुन टाकले आहे. देशाभिमान व देशवाद ओतप्रोत भरलेल्या टाटांना या देशात मात्र सरकारकडुन स्वागत होत नाही कारण टाटा काम मिळण्यासाठी कोणताही भ्रष्टाचार करत नाहीत व गुणवत्ता तिळभरही कमी करण्यास नकार देतात!!

हिंदुस्तानातल्या कारखानदारीच्या या पितामहांना…

कोटी कोटी प्रणाम

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares