मराठी साहित्य – विविधा ☆ – जोगवा – ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ – जोगवा – ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

आदिशक्ती, आदिमातेच्या उपासनेचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव !

पूर्वी कुटुंब मोठे होती.  रोजचा देवाला नैवेद्य, सप्तशती पाठ, आरती’, नऊ दिवस सवाष्ण, रितीप्रमाणे कुमारिका जेवायला असायची. देवापुढे  अखंड दिवा तेवत असायचा आरती पूजा पाठ यात सगळं घर रंगून जायचं. नऊ दिवस उपास कधी धान्य फराळ अष्टमीला विशेष असं महत्त्व असायचं आणि सगळ्या घरात वातावरण अगदी पवित्र मंगलमय असायचं. 

घरोघरी घटस्थापना असायची. त्याची दसऱ्याला सांगता होऊन ‘दसरा सण मोठा … नाही आनंदा तोटा’ असा दसरा साजरा व्हायचा. अजूनही आपण ही संस्कृती परंपरा जपतो. … देवीला म्हणतो ‘सांभाळून घे आई! चुकलं तर योग्य मार्ग दाखव.’  या आदिशक्तीला आपली संस्कृती स्त्रीरूपात पाहते. आपण तिला माता ..  आई ..  असं संबोधून पूजा करतो, अन् घरातली ‘स्त्री ‘..ती घरासाठी आपल्या मुलांसाठी सगळ्यांसाठीच देवीकडे काहीतरी मागणं मांडतेच….  आणि स्वतःसाठी अखंड सौभाग्य ! 

पण आज स्त्रीला एवढेच मागून चालणार नाही.  तिने देवीपुढे हात जोडावे ते तिचा आधार मागण्यासाठी .. प्रार्थना करण्यासाठी, सगळं काही सोसण्याचं बळ मिळवण्यासाठीच नव्हे, तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, अत्याचाराला प्रतिकारशक्ती, लढा देण्याची शक्ती लाभावी यासाठी.  तसेच या आदिशक्तीची शक्ती मिळावी यासाठीही.! 

त्यामुळे ‘मी- माझ्या पुरतं’ या वर्तुळाचा परीघ वाढवून समाजासाठी, रंजल्या गांजलेल्या स्त्रियांसाठी, तिला काही भरीव वेगळं असं करता येईल. आणि प्रत्येक गोष्टीसाठी इथं तिथं जोगवा मागण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने स्वतः ‘स्त्री ‘ही स्वयंभू शक्तीच व्हावं, म्हणून “वाढ ग माय जोगवा$ ” म्हणत हात जोडून फक्त देवीपुढे ‘जोगवा’ मागावा.! इतर कुणाकडे नाही. आज त्याचीच गरज आहे. 

देवी माता नक्कीच हा जोगवा देईल.व खऱ्या अर्थानं हा देवीचा नवरात्रोत्सव व दसरा साजरा करता येईल. 

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

विडा घ्या हो अंबाबाई

‘ठेविले अनंते तैसेची रहावे ‘  अशी  आईची समाधानी, आनंदी वृत्ती होती. हातात कांचेच्या बांगड्या, गळ्यात काळी पोत आणि चेहऱ्यावरचे समाधानी हास्य हेच होते आईचे दागिने आणि वैभव.. शेवटपर्यंत सोने कधी आईच्या अंगाला लागलंच नाही. आई गरीबीशी सामना करणारी, आहे त्यात संसार फुलवणारी होती . नानांच्या पिठाला तिची मिठाची जोड असायची. मसाले करून देणे. सुतकताई, पिंपरीला कारखान्यात काम करायला पण जायची . विद्यार्थ्यांना डबा करून देणे अशी छोटी मोठी कामे करून मिळणारी मिळकत हाच तिचा  महिन्याचा पगार होता. 

माहेरी मोकळ्या हवेत हेलावणारा तिचा पदर सासरी आल्यावर पूर्णपणे बांधला गेला .वेळात वेळ काढून महिला मंडळ, एखादा सिनेमा हाच तिचा विरंगुळा होता. त्यावेळी सिनेमाचे तिकीट 4 आणे होतं. प्रभात टॉकीज मध्ये (म्हणजे आत्ताच कीबे)   माझे काका विठू काका ऑपरेटर होते. त्यांचा आईवर फार जीव.  ते आईला कामात खूप मदत करायचे.  तिला मराठी सिनेमाचे पास आणून द्यायचे. तेवढाच तिच्या शरीराला आणि मनाला विसावा.  

तिचा कामाचा उरक दांडगा होता. घरच्या व्यापातून वेळ काढून घरी पांच पानांचा सुंदरसा गोविंदविडा (हा सुंदरसा विडा करायला माझ्या वडिलांनी तिला शिकवलं होतं.)देवीसाठी तयार करून ती रोज जोगेश्वरीला द्यायची. हा नेम तिचा कधीही चुकला नाही.रात्रीच्या आरतीच्या वेळी तबकामध्ये निरांजनाशेजारी सुबक आकाराचा, पिरॅमिड सारखा गोविंदविडा विराजमान व्हायचा. “विडा घ्या हो अंबाबाई” म्हणून अंबेला  रोज विनवणी  असायची.  एक दिवस कसा कोण जाणे विडा द्यायला उशीर झाला. (गुरव )भाऊ बेंद्रे आणि भक्त विड्याची वाट बघत होते.  तबकात जागा रिकामी आहे हे सगळ्यांनी ओळखलं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.  विडा विसरला असं कधीच झालं नव्हतं. विड्याची वाट बघत सगळेजण थांबले होते.  भाऊ बेंद्रे तबक घेऊन उभेच राहयले.भक्त आईची विडा घेऊन येण्याची  वाट बघत होते… 

आणि इतक्यात लगबगीने आई पुढे धावली, विडा देवीपुढे ठेवला गेला. आणि टाळ्यांच्या गजरांत  आरतीचा   सूर मिसळला…              

“विडा घ्या हो अंबाबाई,  ही विनंती तुमच्या पायी.”  

… आई अवघडून गेली. आपल्याकडून उशीर झाला म्हणून आईला अगदी अपराध्यासारखं झालं होतं. तिने देवीपुढे नाक घासले. त्यानंतर कधीही तिचा हा नियम चुकला नाही. आम्ही नंतर पेशवेकालीन मोरोबा दादांच्या वाड्यात राहायला गेलो, तरीसुद्धा आईने हा नियम चालू ठेवला होता. ती म्हणाली, “ जोगेश्वरी आईनी आपल्याला पोटाशी होतं ते पाठीशी घालून तिच्याच परिसरात  तिच्या नजरेसमोरच ठेवलंय.”  कारण मोरोबा दादांचा पेशवेकालीन वाडा जोगेश्वरीच्या  पाठीमागेच…  म्हणजे आप्पाबळवन्त चौकातच होता.

 – क्रमशः भाग ४

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संकटनाशन स्तोत्रातले बारा गणपती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “संकटनाशन स्तोत्रातले बारा गणपती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आपण असंख्य वेळेला हे…”गणपती स्तोत्र” …. “संकटनाशन स्तोत्र” म्हणतो, परंतु यामध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नाहीत…

नारदकृत  ‘ संकटनाशन ‘ स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे व त्यांची सद्य स्थाने….

प्रथमं वक्रतुण्डं च 

एकदन्तं द्वितीयकम् 

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं 

गजवक्त्रं चतुर्थकम्

लम्बोदरं पंचमं च 

षष्ठ विकटमेव च 

सप्तमं विघ्नराजेन्द्रं 

धूम्रवर्णं तथाष्टकम्

नवमं भालचन्द्रं च 

दशमं तु विनायकम् 

एकादशम् तु गणपति 

द्वादशं तु गजानन: 

१. वक्रतुण्ड :- मद्रास राज्यातील कननूरजवळ

२. एकदन्त :- पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ.

३. कृष्णपिंगाक्ष :- मद्रास राज्यातील कन्याकुमारीजवळ.

४. गजवक्त्र :- ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे.

५. लंबोदर :- ह्याची दोन स्थाने उल्लेखिली जातात.

          (१) रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे क्षेत्रात,

          (२) मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाजवळ असलेला पंचमुखी गणपती.

६. विकट :- हिमालयाच्या पायथ्याशी हृषीकेश येथे.

७. विघ्नराजेन्द्र :- कुरु क्षेत्रात कौरव-पांढवांच्या युद्धभूमीजवळ.

८. धूम्रवर्णं :- १) दक्षिणेकडील केरळ राज्यात कालिकतजवळ. 

                  २) तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर.

९. भालचंद्र :- रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे मद्रास राज्य.

१०. विनायक :- काशी क्षेत्रातील अन्नपूर्णा मंदिराजवळचा धुण्डिराज गणेश.

११. गणपती :- क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती.

१२. गजानन :- हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळील ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे.

समर्थ रामदास स्वामींनी ही बाराही गणेशस्थाने शोधून काढून सर्व गणपतींचे दर्शन घेतले होते, असे म्हणतात

।। जय श्री गणेश ।।

माहिती संकलक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ याला म्हणतात कृतज्ञता!… लेखक : डॉ. मिलिंद कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ याला म्हणतात कृतज्ञता!… लेखक : डॉ. मिलिंद कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

आज एक डोळे ओलावणारा आणि कोकणी माणसाला सलाम करावासा वाटणारा प्रसंग घडला…

त्याचे झाले असे…

दुपारी 3 वाजता खारेपाटणहून डॉ. बालन उमेश यांचा मला मेसेज आला ..की तुमचा gpay नंबर बदलला आहे का?

मी या आधुनिक जगाला घाबरून असल्याने पहिला संशय आला की झाली काही तरी गडबड..

आधी balance चेक केला..तो तर ओके होता…मग उमेशजी ना फोन केला…ते म्हणाले अहो 1400 रुपये पाठवायचे होते…

आणि नंतर मी, त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून उडालोच…

आयला! या कलियुगात असले काहीतरी ऐकायला ..पाहायला..अनुभवायला मिळणे म्हणजे सॉलिड धक्काच होता..

मिथिला मनोहर राऊत. गाव बेरले…ही मुलगी डॉ. नितीन शेट्ये सरांकडे 2006  साली टायफॉइडसाठी ऍडमिट होती…ती बरी झाली आणि तिच्या वडिलांची आर्थिक स्थिती काही बरी नव्हती…सरांनी, जे काही 3 हजाराच्या जवळपास बिल होते, त्यात त्यांनी जे काही पैसे दिले ते शांतपणे स्वीकारले आणि त्यांच्या दृष्टीने तो विषय संपला…त्यानंतर आज 2024…..18 वर्षांनी ती मुलगी कमावती झाली….तिचा पहिला पगार झाला आणि तिला तिचे वडील नेहमी जे हळहळून सांगायचे की बायो त्या डॉक्टरांचे 1400 देऊचे हत…त्याची आठवण आली…बेरले खारेपाटण जवळ आहे..

ती मुलगी 1400 रुपये घेऊन तिच्या फॅमिली डॉक्टर म्हणजे बालन सरांकडे गेली आणि तुम्ही हे पैसे सरांना पोचवा म्हणाली…

18 वर्षे….एक कोकणी माणूस राहिलेले देणे, डॉक्टरांचे देणे आठवणीत ठेवतो…पहिल्या पगारातून आठवणीने पोच करतो….हा कोकणी माणूस आहे. प्रामाणिक, सच्चा,मनाचा श्रीमंत आणि जाण ठेवणारा..डॉक्टरने पोरगी बरी केली हा उपकार मानणारा कोकणी माणूस…कृतज्ञ असणारा कोकणी माणूस…

डॉक्टर म्हणजे देव असे आतून मानणारा कोकणी माणूस..आणि ती मुलगी ….खरेतर पुढच्या पिढीतील…पण तीही अस्सल कोकणी निघाली…बापाची रुखरुख लक्षात ठेवणारी..पहिल्या पगारातून 1400 रुपये बाजूला काढणारी…अस्सल कोकणी कन्या..

ती जेव्हा बालन सरांकडे गेली तेव्हा तिने तिचे आजारपण…राहून गेलेले देणे…डॉक्टरांचा मोठेपणा ..बापाची रुखरुख हे सगळे सांगितलेच…पण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला…..सर..त्यावेळचे 1400 म्हणजे आत्ताचे किती होतील हो?…उमेश बालन सरांना याचे उत्तर देणे जड गेले…ते म्हणाले आजचे खूप होतील पण तुझी भावना ही त्याचे व्याज भरूनसुद्धा वरती उरेल…

मी शेट्ये सरांना हा किस्सा सांगायला फोन केला तेव्हा तेही अवाक झाले…..त्यांना आठवत नव्हते की असे कोणाचे येणे आहे..असे कोणी नंतर देतो, सांगून गेले आहे…

पण ते आतून हलले…त्यांच्यासाठी

डॉक्टर होण्याचा…पेशंट बरे करण्याचा …पैसे नसतील तर राहू देत किंवा नंतर द्या म्हणण्याच्या प्रवासाचा हा एक कृतार्थ क्षण होता….

आम्ही तिघेही अवाक होतो…..

या लाल मातीत हा प्रामाणिकपणा, कृतज्ञता,जाण,आठवण…..भाव असा रुजलेला आहे…हा खरा सुगंध या मातीला आहे…

इतक्या वर्षांनी पहिला पगार हाती आल्यावर आज ती ज्या भावनेने देणे परत द्यायला गेली…ती भावना खूप मोठी आहे…शेट्ये सर तर म्हणाले, पैसे नकोच पण तिला सलाम करणारे काहीतरी करूया…

हे लिखाण हा त्या मुलीला…तिच्या वडिलांना…त्यांच्या अस्सल कोकणी संस्कारांना….कोकणी वृत्तीला…इथल्या मातीला आणि अजून जिवंत असणाऱ्या माणुसकीला सलाम करण्यासाठी आहे….

लेखक: डॉ.मिलिंद कुलकर्णी

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “रुलाके गया सपना मेरा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “रुलाके गया सपना मेरा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

पौर्णिमेचं  शशीबिंब आज माझ्या गवाक्षाशी बराच वेळ थबकलं.. तिथून न्याहाळलं होतं त्याला मी त्या गवाक्षात उभी असताना… आणि पुढे जाताना एक मंद स्मित रेषा आपल्या चेहऱ्यावर फुलवून निघायचं ठरवलं… अन मी नकळतपणे  आलेही… नव्हे नव्हे ओढले गेले.. त्या गवाक्षापाशी… हळूच मान लवून बघत राहीले… रस्त्यावरती सांडलेला चांदणचुरा चमचमताना किती गोड नि मोहक दिसत होता… हरपून बसले भान माझं..वेडं लावलं मला त्यानं स्वत:चं… नजर मिटता मिटत नव्हती नि कितीही पाहिलं तरी तृप्ती होत नव्हती… तरी बरं त्यावेळी आजुबाजूला.. खाली रस्त्यावर कुणी कुणीच नव्हते.. माझ्याकडे पाहत.. प्रेमात पडलीस वाटतं असचं एखाद्याला मला चिडवायला मिळालं असतं…

मी पण छे.. काही तरीच काय तुमचं…नुसत्या नजरेने पाहिलं तर ते का प्रेम असतं… असं मी स्वतःशीच म्हणाले… हो स्वतःशीच.. तिथं माझं ऐकायला तरी कोण होतं… पण मी ते सांगताना खूप लाजले तेव्हा गालावरची खळी खट्याळपणानं सारं काही सुचवून गेली… असा किती वेळ माझा.. माझाच का आम्हा दोघांचाही.. गेला.. नंतर रोजचा तसाच जात राहिला… भेटण्याची वेळ नि भेटण्याचं ठिकाणं ठरून गेलेलं….

नंतर हळूहळू त्याचं येणं उशीरा उशीरानं होऊ लागलं… माझी चिडचिड होऊ लागली… आधीच भेटायचा वेळ तो किती थोडा .. त्यात याच्या उशीरानं येण्यानं भेटीचा क्षण संपून जाई…तो नुसता जात नसे तर माझ्या मनाला चुटपूट लावून जाई.. हुरहुर लागे जीवाला ..  उद्यातरी  भेटायला वेळ भरपूर मिळेल नं… छे तसं कुठं घडायला दोन प्रेमी जीवांच्या आयुष्यात… नाही का…

आणि एक दिवस त्याचं येणचं झालं नाही… विरहाचं दुख काय असतं ते त्या दिवशी कळलं… मी गवाक्षात उभी होते नेहमी सारखी.. पण आज चंद्र प्रकाश नव्हता ..  होता तो काळोख सभोवताली… डोळे भिरभिरत होते त्याची वाट पाहताना…रस्त्यावरचा मर्क्युरी दिव्याचा प्रकाश माझी छेड काढू पाहताना  नारळाच्या झावळीतून तिरकस नजरेने बघत होता… आमच्या आठवणींच्या सावल्यांचा खेळ माझ्या नजरेसमोर मांडताना.. इतकंच कानात सांगून गेला…’ वो जब याद आये बहूत याद आये…’  आणि आणि माझं वेडं मन गुणगुणत होतं… ‘ रूला के गया सपना मेरा.. ‘

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (पूर्वसूत्र– माझी यापुढची उत्कर्षाची वाट वळणावळणाची असणाराय असं सर म्हणाले ते अनेक अर्थांनी खरं ठरणार होतं आणि त्या वाटेवरचं पहिलं वळण हाकेच्याच अंतरावर माझी वाट पहात तिष्ठत थांबलेलं. पण आता मी निश्चिंत होतो. मनात उत्सुकता होतीच पण ना कसलं दडपण ना अस्वस्थता. कारण सर म्हणाले तसं ‘तो’ होताच माझ्या सोबत आणि त्या वळणवाटेवरही तो असणारच होता सोबतीला.. !)

प्रमोशन प्रोसेस अपेक्षेपेक्षा लवकरच आवरलं आणि जुजबी आवरावर करायलाही पुरेसा वेळ न देताच एक दिवस अचानक मला प्रमोशन मिळाल्याची बातमी आली आणि पाठोपाठ माझी ट्रान्सफर ऑर्डर! 

माधवनगरला झालेली माझी बदली पुढच्या उत्कर्षाच्या वाटेवरचं एक छोटसं वळणंच होतं पण ते इतकं हाकेच्या अंतरावर उभं असेल असं मात्र मला वाटलं नव्हतं. इथं येऊन कसंबसं एक वर्षच होत आलेलं आणि लगेचच निरोप घेऊन बाहेर पडायचा क्षण असा पुढे ठाकलेला!

या एका क्षणाने आमच्या छोटेखानी संसाराची सगळी घडीच विस्कटून जाणार होती. पण त्याचा विचार करायलाही आता फुरसत नव्हती. माझं पोस्टिंग ‘सोलापूर कॅंप’ ब्रॅंचला झालं होतं. गुरुवा‌री ४ आॅगस्टला आॅर्डर आली आणि दोनच दिवसांत म्हणजे शनिवारी रिलीव्ह होऊन मला सोमवारी सोलापूरला हजर व्हायचं होतं!इथल्या ऑफिसरुटीनमधल्या बारीकसारीक गोष्टी मार्गी लावण्यातच दोन दिवस कापरासारखे उडून गेले आणि बॅग भरून मी सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.

सोलापूर कॅम्प ब्रॅंचला अनेक आव्हाने माझी वाट पहात होती. मी तिथे जॉईन झालो ती तारीख होती ८ऑगस्ट १९८८!

८-८-८८ हा तारखेतला एकाच संख्येचा विचित्र योगायोग मला गंमतीचा वाटला होता! पण त्यामुळेच माझ्या सर्विस-लाइफ मधे बदलीनंतर विविध कार्यस्थळी मी जॉईन झालो त्या सर्वच तारखा विस्मरणात गेलेल्या असल्या तरी सोलापूर ब्रॅंचमधली ही तारीख मात्र या अपवादात्मक योगायोगामुळे जशी माझ्या कायमची लक्षात राहिलेली आहे तसेच ती 

ब्रँचसुद्धा तिथे घडलेल्या माझी कसोटी पहाणाऱ्या एका प्रसंगामुळे आणि मी त्या कसोटीला उतरल्याची प्रचिती देणाऱ्या नंतर अल्पकाळातच आलेल्या एका अकल्पित, अतर्क्य अशा गूढ अनुभवामुळे माझ्या कायमची लक्षात राहिलेली आहे! त्या अनुभवाने मला स्पर्शून गेलेल्या, चित्तवृत्ती प्रफुल्लित करणाऱ्या आनंदाचे माझ्या मन:पटलावर कोरले गेलेले अमीट ठसे आज पस्तीस वर्षांनंतरही मी आवर्जून जपून ठेवलेत!

‘सोलापूर कॅम्प’ ही पोस्टल कॉलनी, कृषीनगर, विकासनगर या रेसिडेन्शियल एरियापासून हाकेच्या अंतरावर असणारी आमची ब्रॅंच. माझं वास्तव्य कृषीनगरमधे होतं.

 माधवनगरहून सांगलीला फॅमिली शिफ्ट करून शक्यतो सलिलचं माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी बदली होईल तिथे जमेल तितके दिवस मी एकट्यानेच जायचं असं, तातडीनं निर्णय घेणे आवश्यक होतं म्हणून, आम्ही ठरवलं ते सर्वांच्याच दृष्टीने सोयीचं होतं. त्यावेळी आई भावाकडे सातारला होती. रुटीन बसेपर्यंत सोबत म्हणून आमच्या सांगलीच्या बि-हाडी ती येऊन राहिल्यामुळे मला तिकडची काळजी नव्हती. कृषीनगरपासून ब्रॅंच फार तर चालत पाच मिनिटांच्या अंतरावर. रहिवासी क्षेत्रातल्या नागरिकांच्या सोयीसाठी ब्रॅंच सकाळी ८. ३० ते १२. ३० आणि दुपारी ३ ते ६ अशी दोन शिफ्टमधे कार्यरत असे. त्या भागात व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाचे प्रमाण जवळपास नसल्यासारखेच. त्यामुळे ठेवी-संकलन आणि कर्ज वितरण या दोन्ही आघाड्यांवर यश मिळवणं हे ब्रॅंच-मॅनेजर म्हणून खूप अवघड आणि आव्हानात्मकच होतं. मी चार्ज घेतल्यानंतरचे चार-सहा दिवस ही पार्श्वभूमी अंगवळणी पडण्यातच गेले. स्टाफ तसा पुरेसा होता आणि चांगलाही. जवळजवळ सगळेचजण अनुभवी होते. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅशिअर म्हणून काम करणाऱ्या सुजाता बोबडेचा!

सुजाता बोबडे तशी नवीन होती. तिचा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरियड नुकताच संपलेला होता. त्यामुळे ती बँकरुटीनमधे अद्याप रुळलेली नव्हती. तरीही या अल्पकाळात अपेक्षित असणारी कार्यकुशलताही ती दाखवू शकत नव्हती. कसलंतरी दडपण असल्यासारखी सतत गप्प गप्प असायची. हेडकॅशिअर श्री. सुहास गर्दे स्वतःकडचं वर्कलोड सांभाळून तिला हातभार लावायचे म्हणून तिचं रुटीन बऱ्यापैकी व्यवस्थित सुरू असे एवढंच. त्यामुळेच सुजाताच्या वर्क-परफॉर्मन्सबद्दल मी फारसा समाधानी नव्हतो. अर्थात अशा कुठल्याच व्यक्तीबद्दलचे पूर्वग्रह मी जाणीवपूर्वक नेहमी तपासून पहात असल्यामुळे माझ्याकडून तोवर कोणतीच कडवट प्रतिक्रिया व्यक्त होणार नाही याची मला काळजी घेणे आवश्यक होते.

त्यानंतर हळूहळू मला मिळत गेलेली सुजाताबद्दलची माहिती मात्र तिच्याबद्दलचे माझे पूर्वग्रह थोडे सौम्य व्हावेत अशीच होती!

रिझर्व्हड कॅटेगरीतून निवड होऊन साधारण वर्षांपूर्वी ती या ब्रॅंचला जॉईन झाली होती. त्याआधीच तिचं नात्यातल्याच एका मुलाशी परस्पर लग्नही ठरलं होतं. मुलगा एम. बी. बी. एस करत होता. त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न करून घ्यायला त्याच्या घरचे तयार नव्हते आणि तोवर वाट पहायला तिच्या घरचे. यातून काहीच मध्यममार्ग निघत नाहीय हे लक्षात येताच खूप दिवस वाट पाहिल्यानंतर या दोघांनी घरच्या विरोधाला न जुमानता नुकतंच परस्पर रजिस्टर लग्न करून टाकलं आणि दोन्ही घरच्यांनी या लग्नाला ठाम विरोध केला. प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून दोघांनाही बेदखल केलं. त्यामुळे सुजाता नेहमीच दडपणाखाली असायची. तिने नवऱ्याच्या शिक्षणाची आणि घरखर्चाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन वेगळं बि-हाड केलं. नवऱ्याचं शिक्षण आणि हिची नोकरी अशी तारेवरची कसरत सुरू झाली. मी जॉईन झालो त्याच दिवशी तिचा मॅटर्निटी लिव्हचा अर्ज माझ्या टेबलवर होता! 

हीच सुजाता बोबडे मला लवकरच येणाऱ्या त्या अतर्क्य अशा गूढ अनुभवाला निमित्त ठरणार होती याची त्या क्षणी मला कल्पना कुठून असायला?

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “देवीचे नवरात्र…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “देवीचे नवरात्र” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आज देवीचे नवरात्र बसले आहे. ती देवी कशी आहे ? – – –

केसापासून पायाच्या नखा पर्यंत सर्वांग सुंदर आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत. कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी, प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. ती विश्वाची स्वामिनी, जगतजननी आहे. अशी ही देवी सुंदर, कोमल, शांत, नाजूक आहे. , , पण इतकच तिच वर्णन आहे का? नाही….. ती अष्टभुजा आहे. तिच्या हातात गदा, चक्र, शंख, धनुष्य बाण, शुल, पाश, खड्ग अशी अनेक शस्त्रे आहेत. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे. ती चंडिका आहे. प्रत्यक्ष देवांनीही तिची स्तुती केलेली आहे… अत्यंत नाजुक, शांत, कोमल पण वेळप्रसंगी भयानक रूप धारण करून दृष्टांचा नाश करणारी आहे. राक्षसांना शिक्षा करणारी आहे. निरनिराळ्या रक्षसांना शासन करून तिने यमलोकात धाडलेले आहे.

या देवीकडे फक्त देवी म्हणून न बघता…. एक स्त्री म्हणून बघूया… ती पण आपल्यासारखीच आहे. अशा या देवीचा अंश आपल्याही शरीरात आहे.

आपण तिची प्रार्थना करूया. प्रार्थना करून झाली की आपण तिच्याकडे काहीतरी मागतो.

आता असा विचार करा की काय मागायचे?… लौकिकात जे हवे आहे ते सगळे मागून झालेले आहे. आता थोडं वेगळं काही मागू या…

राक्षस म्हटलं की अति भयंकर, क्रूर, अक्राळ विक्राळ असं काहीस स्वरूप आपल्यासमोर येतं…

पण लक्षात घ्या की…

राक्षस ही एक वृत्ती आहे… ती विचारात, कृतीतही असू शकते.

ते प्रचंड, मोठेच असतात, त्यांचे आकार भयानक असतात असे नाही… काही मनाला नकळत सूक्ष्मपणे सतत त्रास देणारेही असतात… काही बहुरूप्यासारखे असतात… वरून गोड गोड बोलून फसवणारे ही असतात. त्यांच्यातला राक्षस ओळखायला शिकुया…..

आपण त्यांच्याशीही लढू या… अशा बारीकसारीक लढाया रोजच लढाव्या लागतात. त्यासाठी देवी सहाय्य करेलच. पण आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायची आहे हे लक्षात ठेवायला हवे.

त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे आहेत.

अगदी साध्या साध्या गोष्टींचा विचार करा. एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायला पण अंगी सामर्थ्य यावं लागतं. ते यायला हवं….. तसंच वेळ प्रसंगी शांत राहण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक असते. ” मौन” ही आपली आपण आपल्याशीच लढलेली लढाई असते. ती पण जिंकता आली पाहिजे.

पण आता तेवढ्याने भागणार नाही. आता परिस्थिती अशी आहे की आपल्या अंगात जोश ही यायला हवा…. शत्रूला भ्यायचं नाही तर… त्याच्याशी सामना करायचा.. निकरानी आणि सर्व शक्तीनिशी.. लढायचं… असं ती आपल्याला शिकवते… शत्रूला नामोहरम करून मगच देवी थांबते… विजय मिळेपर्यंत झुंजायचं ही तिची वृत्ती आपणही अंगी बाणू या.

देवीच गुणगान करा. श्री सूक्त. कुंकुमार्चन, देवी अथर्वशीर्ष, सप्तशतीचा पाठ हे सर्व काही करा.

मात्र आता तिच्याकडे ही प्रार्थना करा…..

हे देवी मला निर्भय आणि सबल कर… आज जगात वावरताना प्रत्येकीला.. प्रत्येकीला असं बनायला हवं आहे. तसेच तिला आश्वासन द्या की मी पण माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीन आणि तो मनापासून करा.

देवी यश देईलच..

दोन भुजा असलेल्या अनेक जणी अष्टभुजा असल्यासारख्या अनेक आघाड्यांवर लढत असलेल्या माझ्या आसपास आहेत.. त्यांच्या इतक आपल्याला जमलं नाही तरी चालेल… पण थोडा आपण प्रयत्न जरूर करूया. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या. आईसाहेबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेलच.

त्या मातृरूपेण संस्थिता, लक्ष्मी रुपेण संस्थिता इत्यादी वर्णनानंतर देवीच वर्णन ” शक्ति रूपेण संस्थिता ” असेही आहे… हे आपण निश्चित लक्षात ठेवूया.

अशा या देवीला माझा नम्रपणे नमस्कार.

एका मागणीचा जोगवा तुझ्यासमोर पदर पसरून मागते ग आई…….

 “ आम्हाला अंतरीक बळ दे शक्ती दे. ”.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुंदाची फुलं… ☆ सुश्री सुनीता पाटणकर☆

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ कुंदाची फुलं… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

माझ्या अंगणात एक कुंदाच झाड आहे. जाई, जुई, मोगरा, गुलाब, जास्वंदि यांच्या दिसण्याचा आणि सुवसाचा मोह सगळ्यांना, बिचाऱ्या कुंदाकडे कुणाचंच लक्ष नाही.

आता थंडी सुरू झाली, दरवळणारी जाई आणि जुई नाजूका गारठली, मलूल झाली. पण कोणताही गंध नसणारी, शुभ्र पांढरी कुंदकळी भरून आली. एकदम मस्त ताजीतवानी, भरभरून बहरली.

टपोरी, स्वच्छ, निर्मळ फुल परडीत विसावली. दातांच्या शुभ्र कुंदकळ्या अशी उपमा देतात, त्याचीच आठवण आली.

तिच्याकडे पाहिलं आणि वाटलं किती साधी, सरळ आहे ही, एरवी फारसं लक्ष देत नाही, म्हणून रागवत नाही, फुगत नाही, रडवेली होत नाही, आणि अजिबात उन्मळूनही पडली नाही.

खरचं खूप शिकता येईल हिच्याकडून … आपलं काम आपण चोख बजावत रहायचं, मग इतरेजन कसे वागतात, काय करतात त्याचा कशाला विचार करायचा !

मी सकाळी उठून देवासमोर उभी होते, तर लक्षात आलं, काल देवाला वाहिलेली कुंदाची फुलं काल होती तितकीच आज अजूनही शुभ्र आणि टवटवीत आहेत. अशी ही कुंदाची फुलं…… खरचंच खूप प्रेरणादायी वाटली…..

……. म्हणून हा लेखनप्रपंच.

© सौ. सुनीता पाटणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘वंदे भारत ट्रेन’ चे निर्माते : श्री. सुधांशु मणी ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

वंदे भारत ट्रेन’ चे निर्माते : श्री. सुधांशु मणी ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

या देशात असे अनेक रियल हिरो आहेत जे आपल्याला माहिती नाहीत..

सुमारे ८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, २०१६ची. सुधांशु मणी नावाचे रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे. पेशाने इंजीनियर होते. यांच्या रिटायरमेंटला केवळ दोन वर्षे बाकी होती.

सहसा रिटायरमेंटच्या वेळी जेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्‍याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी की कर्मचार्‍याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्‍याने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.

ICF म्हणजे Integral Coach Factory …. रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना….

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, ‘ काय करणार?’

ते इंजीनियर म्हणाले, ‘ आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे…. ‘

ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनीच्या डब्यांची चाचणी सुरू होती. चाचणी सफल होती पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५० कोटी रुपये मागत होती शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती. अशा परिस्थितीत या इंजीनियरने संकल्प केला की आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले…

“ Are You Sure, We Can Do It ? “

उत्तर होते….. ” Yes Sir !”

“ किती पैसे लागतील R&D साठी ?”

“ फक्त १०० कोटी रु सर !”

रेल्वेने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.

त्या अधिकार्‍याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले. दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले त्याला आपण ‘ ट्रेन १८ ‘ म्हणजेच वन्दे भारत रॅक नावाने ओळखतो.

आपल्याला ठाऊक आहे का… या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला? केवळ ९७ कोटी ! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती. ट्रेन १८ भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हिरा आहे.

या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे की या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण की हिचा प्रत्येक डबा स्वतःच ‘सेल्फ प्रोपेल्ड’ आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.

दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक “ वन्दे भारत ट्रेन “ या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.

या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे सुधांशु मणी.

सुधांशु मणी यांच्यासारख्या देशाच्या प्रगतीसाठी ध्येयवेड्या विभूतीला त्रिवार सलाम !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “व्यापार आणि दया…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “व्यापार आणि दया…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक

 भाजीवाली रोजच्यासारखी दुपारी दारात आली आणि तिने ओरडून विचारले, “भाजी घ्यायची का मावशी?”

आई आतून नेहमीसारखी ओरडली, “काय आहे भाजी?”

“गवार हाय, तंबाटी, पालक,…. ” एवढे बोलताच आई म्हणाली, “थांब आले. “

दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, “पालक कसा?”

“रुपयाची गड्डी, ” – भाजीवाली.

“पन्नास पैशाला दे, चार घेते, ” – आई.

“नाय जमणार, मावशी, ” – भाजीवाली.

“मग राहू दे, ” – आई.

भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. “बारा आण्याला दीन, “- भाजीवाली.

“नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते, ” – आई.

“नाय जमणार, ” – भाजीवाली म्हणाली

आणि पुन्हा गेली.

थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तिला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून पारखून चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले.

भाजीवाली भारा उचलायला लागताच तिला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, “जेवलीस का नाही?”

“नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेऊन, मग सैपाक, मग जेवण, “- भाजीवाली.

“थांब जरा. बस इथं. मी आणते. ” म्हणत आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळे दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.

मला राहवलं नाही. मी आईला विचारले, “तू एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केलीस, पण नंतर, जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तिला खायला दिलेस. “

आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले…

“व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये. “

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares