मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बावरा मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

??

☆ बावरा मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बावऱ्या बाल मनात काय कल्पना व विचार येतील सांगू शकत नाही. आज आवरताना एक कॅसेट सापडली आणि त्यातच त्यातील रिबन प्रमाणे तिने गुंडाळून घेतले. माझ्या लहानपणी ज्याच्या कडे रेडिओ, टेप रेकॉर्डर, टिव्ही असेल, घरात नळ असेल, गॅस असेल, झोपायला कॉट आणि त्या वर गादी असेल, तर त्या घराकडे फार श्रीमंत आहेत, त्यांचे काय बाबा! अशा आविर्भावात बघितले जायचे.

तर अशा काळात वडिलांनी एक बॉक्स घरी आणला. ( बॉक्स उघडणे ही पण एक दिवाळीच बरं का! ) तर त्या बॉक्स भोवती वाड्यातील सगळे बालवीर जमले. अगदी आनंद व उत्सुकता चेहेऱ्यावर घेऊन! मोठी माणसे कडेकडेने उभी राहिली. त्यातील स्त्रियांच्या चेहेऱ्यावर नानाविध भाव! कौतुक, आसुया, उत्सुकता, थोडी इर्षा, थोडी हळहळ असे संमिश्र भाव! तर विविध सूचनांच्या भडिमारात बॉक्स उघडला. आणि आतून मस्त काळा, चमकदार अनेक बटणं असलेला एक पाहुणा घरात प्रविष्ट झाला. तो म्हणजे टू इन वन

प्रथम त्यातले काहीच कळेना. हळूहळू त्याच्याशी परिचय वाढत गेला आणि नवनवीन गुपिते कळू लागली. रेडिओ तसा थोडा फार परिचित होता. पण त्यातील कॅसेट प्लेअर हा नवीनच होता. अगदी कॅसेट फिरते कशी याचे पण निरीक्षण झाले.

त्याचा आवाज, हवी तीच गाणी ऐकणे सगळेच नवीन!

त्यात माझी बाल बुध्दी गप्प बसू देईना! या बाल कुतूहलाने कोणी नसताना खूप वस्तू खोलून बघायचे प्रताप केले आहेत.

ती कॅसेट वाजते कशी? मग घरात कोणी नसताना ती कॅसेट उलट सुलट बघितली. त्याला A व B बाजू असते. आणि दोन्हीकडे वेगळी गाणी कशी वाजतात? हा मोठाच प्रश्न होता.

आणि एका गाफील क्षणी त्यातली काळी रिबन बाहेर आली. आणि आता ओरडा मिळणार म्हणून मी घामाघुम झाले. पण कॅसेटच्या चाकात करंगळी घालून ती फिरवली आणि रिबन आत गेली. आणि मी श्वास सोडला. पण कुतूहल होतेच! मग अशी हव्या त्या कार्यक्रमाची कॅसेट मिळते हे समजले. त्या कुतूहलाने दुकाने फिरले. त्यातून हे समजले की, आपल्याला हवी ती गाणी त्यात भरून मिळतात. मग काय कोरी कॅसेट घ्यायची घरातील सर्वांनी एकत्र बसून प्रत्येकाच्या आवडीची गाणी निवडायची, त्याची यादी करायची आणि ती दुकादाराकडे सोपवायची. हा एक नवीनच खेळ मिळाला. नंतर हेही समजले की आहेत ती गाणी पुसून नवीन गाणी पण त्याच कॅसेट मध्ये भरून मिळतात. मग तर अजूनच आनंद! त्यावेळी TDK आणि SONY च्या कॅसेट सर्वात उत्तम असतात हे ज्ञान पण मिळाले. आणि जे कथाकथन, गाण्याचे कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकावे लागत, ते या कॅसेट मुळे घरात आले. एकदा घ्या आणि परत परत ऐका याचा खूप आनंद व्हायचा. पु. ल. , व. पु. , शंकर पाटील, हे सगळे जणू घरातच आले आहेत असे वाटायचे. विशेष म्हणजे ती कॅसेट विशिष्ट बटणे वापरून मागे पुढे करून हवे ते गाणे पुन्हा ऐकता यायचे. रेडिओ ऐकण्याची सवय असणाऱ्यांना आपल्या बोटावर आवडते गाणे वाजवताना फारच छान वाटायचे.

असे आनंदात ऐकणे चालू असताना अचानक खटक असा आवाज येऊन तो टेप बंद पडला. आणि सगळ्यांची नजर माझ्याकडे वळली. मी शक्य तितका निरागस की बावळट चेहरा करुन माझा त्यात काही हात नाही, मी आज टेपला हातही लावला नाही हे पटवून दिल्या नंतर ती कॅसेट बाहेर काढण्यात आली. तर त्यातून खूप लांब रिबन बाहेर आलेली. तिथे माझा पूर्वानुभव उपयोगी पडला फक्त या वेळी करंगळी ऐवजी त्या स्पूल मध्ये पेन्सिल घालून ती रिबन गुंडाळून पुन्हा आत बसवली. एकदा तर ती रिबन तुटलीच! पण ती सेलोटेपचा बारीकसा तुकडा घेऊन ती रिबन सरळ करुन, त्या वर तो तुकडा चिकटवणे हे पण काम मी करत असे. हे काम ज्यांनी केले असेल त्यांना डॉ ऑपरेशन किती टेन्शन मध्ये करत असतील याचा अनुभव आला असेल.

आता या ढगात (क्लाउड), तू नळी (यू ट्यूब), आपले गुगल बाबा यावर मागाल ते एका टिचकी (क्लिक) वर मिळते. आणि प्रत्येकाला हवे ते कानात हेड फोन घालून हवे ते ऐकता येते. पण आज काय ऐकायचे असा जेवणाचा आणि कॅसेट ऐकण्याचा मेन्यू एकदमच ठरायचा. त्या सहभोजन व सहश्रवण यात जी गंमत होती, ती हे सगळे ज्यांनी अनुभवले त्यांनाच माहिती! 

 तर हे सगळे एका कॅसेट मुळे पुन्हा अनुभवले.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अगदी सरळ रेषेत… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ अगदी सरळ रेषेत… ☆ श्री सुनील शिरवाडकर

दारावर टकटक झालं म्हणून मी दार उघडलं.. समोर लॉंड्रीवाला उभा होता.. हातात दोन तीन पिशव्या.. त्यात इस्त्री केलेले कपडे.

मी हिला हाक मारली.. अगं.. लॉंड्रीवाला आलाय.. काही कपडे द्यायचे आहे का?

हिने आतुन कपड्यांचा गठ्ठा आणला.. तो धोब्याला दिला.. इस्त्री केलेले कपडे ताब्यात घेतले.. मोजले.. त्याचं काय बील झालं ते ट्रान्स्फर केले.. मी दरवाजा बंद केला आणि आत आलो.

सहजच विचार मनात आला.. हा माणूस धोब्याचा व्यवसाय करतो.. लॉंड्री वगैरे शब्द आत्ताचे.. मुळ शब्द धोबीच.. तर हा धोब्याचा धंदा किती जुना आहे ना! अगदी रामायणात पण धोब्याचा उल्लेख आहे.. गुरुचरित्रात पण आहे. कपडे धुण्याचा हा व्यवसाय खुप जुना.. पण त्याकाळी इस्त्री करत असतील?

जुन्या लोकांकडुन ऐकलेलं.. अमुक अमुक हे.. त्यांची फार गरीबी होती.. इस्त्रीला पण पैसे नसायचे.. तांब्यात पेटलेले निखारे घालून इस्त्री करायचे वगैरे.

मी तर इस्त्रीचे कपडे वापरायला सुरुवात केली ती कॉलेजला जायला लागल्यावर.. शाळेत असताना फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला शर्ट चड्डी वरुन इस्त्री फिरवली जायची. मग कॉलेजला जायला लागल्यावर मीच माझी शर्ट पँट इस्त्री करायला लागलो.

कपडे लॉंड्रीत टाकण्याची वेळ कधीतरीच यायची.. लग्न कार्य वगैरे असलं तर.. एबीसी लॉंड्रीत कपडे टाकायला जायचो. तिथला माणूस प्रत्येक कपडा उलगडून बारकाईने बघायचा.. कुठे फाटला आहे का.. कुठे काही डाग आहे का.. असला तर त्याचे वेगळे पैसे होतील का.. कुठे रफु करायचं का.. सगळं बघून मग पावती करणार..

मग चार दिवसांनी पावती घेऊन जायचं.. ती पावती घेऊन तो आत जायचा.. हॅंगरला सतराशे साठ कपडे लटकवलेले.. त्यातुन तो नेमकेपणाने आपले कपडे घेऊन यायचा. मोठ्ठा ब्राऊन पेपर काऊंटरवर अंथरायचा.. त्यावर कपड्यांचा गठ्ठा.. मग कुठुन तरी दोर्याचं टोक पकडायचा आणि व्यवस्थितपणे तो गठ्ठा बांधायचा. एखादं लहान मुलं हातात घेऊन आपण सांभाळुन घेऊन जातो.. तसं ते कपडे घरी घेऊन जायचो.

आमचे दादा.. म्हणजे वडील कपड्यांच्या बाबतीत फार काटेकोर.

पॉपलीनच्या कापडाचा शर्ट.. त्याच कापडाचा पायजमा.. आणि गांधी टोपी. त्यांचे कपडे इस्त्री साठी नेहमी लॉंड्रीतच असायचे. टोपी खादीची. ती खादी पण ठरलेली. चांदवडकर लेन मध्ये खादी भांडार आहे. तिथे ते जायचे. त्यांना कुठल्या प्रकाराची खादी हवी असते ते तेथील माणसांना माहीत होतं. कधी ती स्टॉक मध्ये नसायची.. मग चार दिवसांनी ते परत जायचे.

खादीचं ते पांढरं कापड घरी आणलं की एक रात्र पाण्यात टाकायचं.. सकाळी दोरीवर वाळत टाकायचं.. मग त्याच्या टोप्या शिवायच्या. त्यांचा शिंपी ठरलेला होता. असंच घरात शिवणकाम करणारा होता तो.

आता टोपीत कसले आले मापं.. पण नाही.. दादांना ते पटायचं नाही. पहीले सॅम्पल म्हणून तो एक टोपी शिवायचा. दादांना आणुन दाखवायचा‌. दादा ती घालुन बघायचे.. ‌इंचपट्टीने लांबी रुंदी उंची बघायचे. पुढे असणारं टोक त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे.. त्याला दिवाल म्हणत.. ती दिवाल अगदी त्यांना हवी तशी लागायची.. थोडेफार फेरफार करून मग ते फायनल करायचे.

दुसऱ्या दिवशी टोप्या शिवून तो शिंपी यायचा. दादा एकदम डझनभर टोप्या शिवायचे. त्याची धुलाई.. इस्त्री घरीच.. त्यांचं टोप्यांना इस्त्री करणं बघत रहावं असं.

पांढऱ्या शुभ्र टोप्या ते घेऊन बसायचे.. सगळ्या डझनभर.. त्याला पाणी मारुन ठेवायचे.. टोपीला तीन घड्या असतात.. मग एक एक स्टेप.. त्या ओलसर टोपी वरुन दाबुन इस्त्री फिरवली की अशी वाफ यायची.. त्याचा एक वेगळाच वास असायचा. मग एक एक घडी.. शेवटी पुर्ण दाब देऊन इस्त्री फिरवायचे.. खास करून पुढच्या टोकावर.. ते टोक खुप महत्वाचं.

अश्या डझनभर टोप्या इस्त्री झाल्या की त्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून काळजीपूर्वक कपाटात ठेवायचे.. दर दोन दिवसांनी संपूर्ण ड्रेस बदलायचे.

सकाळी देवपूजा झाली की ते देवदर्शन करण्यासाठी. ‌भाजी आणण्यासाठी बाहेर पडायचे. पांढरा शुभ्र पायजमा.. शर्ट आणि टोपी. ती टोपी डोक्यावर ठेवायचे.. कपाळावर गंधाचा लाल टिळा.. आरश्यासमोर उभे रहायचे… टोपीची पुढची बाजु.. त्यांच्या भाषेत ‘दिवाल’.. एकदम सरळ हवी.. अगदी नाकाच्या सरळ रेषेत.. एकदा मान डावीकडे फिरवायचे.. ‌‌एकदा उजवीकडे.. त्यांच्या दृष्टीने ती केवळ कडक इस्त्री केलेली टोपी नव्हती.. तर तो एक शिरपेच होता..

त्या काळातील पिढीचं जगणं असंच होतं ना.. स्वच्छ.. कुठेही डाग नसलेलं.. इस्त्री केल्यासारखं प्लेन.. आणि डोक्यावरच्या टोपीसारखी सरळ.. एका रेषेत असलेलं..

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुवर्णवेध… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सुवर्णवेध… ☆ श्री संभाजी बबन गायके 

(भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्सचा अचूक लक्ष्यवेध !) 

तिचे डोळे भेदक आहेत… तिच्या पायांतील धनुष्याची प्रत्यंचा प्रचंड आवेगाने ताणलेली असते तिने… श्वास रोखून धरलेला असतो तिने आणि ते पहात असलेल्या माणसांनी सुद्धा. बाण निघतो.. वा-याशी गुजगोष्टी करीत… जणू एखाद्या सुंदर कवितेतील शब्द त्यांच्यातून अपेक्षित अर्थासह ऐकणा-याच्या कानांवर पडत राहावेत… तसा बाण अचूक जाऊन स्थिरावतो लक्ष्याच्या काळजात… मधोमध! हा सुवर्णवेध असतो! 

नोव्हेंबर, २०१६. बंगळूरू. दोन नवे कोरे करकरीत हात बसवल्यावर “तू सर्वांत आधी काय करशील?” असा प्रश्न निष्णात अस्थिशल्य चिकित्सक डॉक्टर शिवकांत यांनी तिला विचारला… त्यावर तिने उत्तर दिले, ”मला माझ्या या हातांत बांगड्या घालायच्या आहेत!” 

पंधरा वर्षांची नवतरुण पोर ती… या वयात तिला चारचौघींसारखं नटायला आवडणं साहजिकच होतं. ती जन्मलीच मुळी दोन्ही हातांविना. Phogomelia नावाचा एक अत्यंत दुर्मिळ विकार तिला झाला होता. आईच्या गर्भातच बाळाच्या हातांची वाढ खुंटते. हात खांद्यापाशी सुरु होतो आणि तिथेच संपतो. पण तिच्या आई-वडिलांनी याही स्थितीत तिला जगवलं, वाढवलं आणि शाळेतही घातलं. मुलली हाताशी नसते तेंव्हा आईला अगदी हात मोडल्यासारखं वाटतं.. इथे तर या मुलीला हातच नव्हते. ती तिला कशी मदत करणार घरात, शेतात? आणि तिचं तिला स्वत:चं सुद्धा तसं काहीच करता येत नव्हतं. पण पोटाचा गोळा… आई-बाप कसा बारा टाकून देतील? 

जम्मू-कश्मीर मधल्या ज्या अत्यंत दुर्गम अशा किश्तवाड जिल्ह्यातील लोईधार गावात ही पोर जन्माला आली तो भाग डोंगर द-यांनी वेढलेला. ही आपल्या कोवळ्या पायांनी दुडूदुडू धावायला शिकली आणि तिला सर्व डोंगर पायांखाली घालायचे बाळकडू मिळाले. केवळ पायांच्या साहाय्याने ती चक्क झाडांवर चढू उतरू लागली… पण तिच्या भविष्याच्या वाटेवर खोल दरी होती… आणि त्या दरीत ती आज न उद्या कोसळणार होती.

तिच्या राज्यात राष्ट्रीय रायफल्स ही तिच्याच देशाची मोठी लष्करी तुकडी तैनात आहे. तिच्या राज्यातली काही माणसं इतरांच्या सांगण्यावरून आपल्याच देशाविरोधात उभी राहीली तेंव्हा देशाने त्यांच्या बंदोबस्तासाठी हे सैनिक तिच्या राज्यात पाठवले होते. पण हे सैन्य केवळ बंदुकीच्या जोरावर मतपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत नाही, तर ‘सदभावना’ जागृत करून चुकीच्या मार्गाने जाऊ पाहणा-या युवकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करीत असते. राष्ट्रीय रायफल्स, डोग्रा रेजिमेंटने मुघल मैदान येथे आयोजीत केलेल्या अशाच एका सद्भावना कार्यक्रमात अत्यंत चपळ, उत्साही असलेली ‘ती’ लष्करी अधिका-यांच्या नजरेस पडली… आणि वर वर कठोर भासणा-या सहृदयी लष्कराने तिला आपल्या पंखांखाली घेतले आणि आकाशात भरारी मारण्यास उद्युक्त केले!

देशासाठी प्राणार्पण केलेल्या मेजर अक्षय गिरीश साहेबांच्या मातोश्री मेघना गिरीश ह्या आपल्या शूर मुलाच्या स्मरणार्थ मदत संस्था चालवतात. लष्कराने त्यांच्याशी या मुलीच्या पुनर्वसनासंदर्भात संपर्क साधला. त्यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्याही कानांवर ही बाब घातली. The Being You नावाने NGO (बिगर शासकीय संस्था) चालवणा-या समाजसेविका प्रीती राय यांनीही तिच्या केस मध्ये समरसून लक्ष घातले.

तिच्या शरीराची रचनाच अशी होती की कृत्रिम हात बसवूनही फारसा उपयोग होणार नव्हता. पण तरीही त्यांनी हा प्रयत्न करून पाहिला. आणि त्याचवेळी प्रीती राय यांनी तिचा परिचय दिव्यांग जलतरणपटू शरथ गायकवाड, अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधार शेखर नाईक यांच्याशी करून दिला. दिव्यांग व्यक्ती क्रीडा प्रकारांत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होऊ शकतात, हे तिला नव्याने समजले. तिचे सर्वांग या नव्या साहसासाठी आतुर झाले.

प्रीती राय यांना मार्क स्टूटझमन नावाचा एक ऑलिम्पिक विजेता धनुर्धर माहित होता. दोन्ही हात नसताना केवळ पायांच्या साहाय्याने मार्क अगदी बिनचूक लक्ष्य वेधण्यात निष्णात होते. त्यांच्याच पावलांवर हिने पाऊल टाकले तर ही कमाल करून दाखवेल असा विश्वास सर्वांना वाटला. वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टने तिची प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दोन प्रशिक्षक तिथे तिला लाभले.. कुलदीप वैधवान आणि अभिलाषा चौधरी. वैष्णोदेवी जवळच्या कटरा येथे प्रशिक्षण केंद्र होते. घरापासून कधी फारशी दूर न गेलेली ती.. आता तिच्या घरापासून तब्बल दोनशे किलोमीटर्सवर असलेल्या या अनोळखी ठिकाणी काहीतरी करून दाखवण्याच्या भक्कम इराद्याने आली… सोबत तिची आई शक्ती देवी सुद्धा आली होती. वडील आणि मोठी बहीण गावी शेती पाहण्यासाठी थांबली. सराव सुरू झाला. दोन पाय, दोन खांदे एवढेच काय ते तिच्यापाशी होते… धनुष्याची प्रत्यंचा ताणायला आणि बाण सोडायला. पायांत पेन्सिल धरून लिहायला ती शाळेत शिकली होतीच. तिला धनुष्याची दोरी चढवणे अवघड गेले नाही. पण बाण सोडायचा कसा? तिच्या प्रशिक्षकांनी स्वत: एक छोटे उपकरण विकसित केले.. जे तोंडात धरले की त्याच्या साहाय्याने बाण सोडता येतो! एकलव्याला अंगठा नव्हता… आणि हिला हात. पण काहीही अडले नाही. ती एका पायाने दोरी ओढते… जबड्याखाली दाबून धरते… एक डोळा मिटून घेते… ती अर्जुन बनते! अल्पावधीतच तिचे बाण नेमके लक्ष्यवेध करू लागले. अशा प्रकारे बाण मारू शकणारी ती… जगातली पहिली महिला ठरली… आणि या धनार्विद्येच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. सराव सुरू केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत ती आंतरराष्ट्रीय धनुर्धर बनली. आशियाई स्पर्धेत चीन मध्ये, नंतर युरोपमध्ये झालेल्या दिव्यांग खेळाडूंच्या स्पर्धांत ती चमकली. एक नव्हे तर दोन सुवर्णपदके तिने पटकावली. एका स्पर्धेत तर ती प्रचंड आजारी असताना, सलाईन लावावे लागले अशा स्थितीत खेळली आणि जिंकली… यामागे तिची मेहनत, प्रशिक्षकांची चिकाटी आणि भारतीय लष्कराचे पाठबळ यांसारख्या अनेक बाबी होत्या… यश असे सहजासहजी मिळत नसते! 

ती भारतात परतली प्रचंड आत्मविश्वास घेऊन. आपण जिंकू शकतो याची जिद्द बाळगून. भारत सरकारने माननीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते तिला अर्जुन हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्रदान करून गौरविले. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही तिला विशेष प्रोत्साहन दिले.

तिच्या यशाचे श्रेय तिने सर्वप्रथम तिच्या आईला दिले…. मां है तो मुमकीन है.. असे ती म्हणते. शक्ती देवी हे तिच्या आईचे नाव. ही निरक्षर आई तिच्या सोबत शक्ती बनून उभी राहिली! तिची कामगिरी पाहून प्रचंड प्रभावित झालेले उद्योगपती महिंद्र यांनी तिला दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष रचना असलेली मोटार कार भेट देण्याची घोषणा केली. तेंव्हा तिने ‘मी १७ वर्षांची आहे.. सज्ञान झाल्यावर आपली भेट स्वीकारेन.. ’ असे महिंद्र यांना नम्रपणे कळवले!

ही म्हणजे Paris दिव्यांग ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत यश संपादन करून देशाला पदक मिळवून देणारी शीतल मानसिंग देवी! 

भारतीय लष्कराने या बलशाली मुलीला खेड्यातून थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले. राष्ट्रीय रायफल्स आणि लेखात उल्लेख केलेल्या इतर सर्व संबंधित व्यक्ती, संस्थांचे आणि अज्ञात सहका-यांचे हार्दिक अभिनंदन! जय हिंद!  🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बावन पत्ते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बावन पत्ते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

५२ पत्ते … या बद्दल आजवर वाईट किंवा फार तर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल. पत्त्यांचा खेळ म्हटला, की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही… म्हणजे यापलीकडे आपण विचारही करत नाही. पण त्यापलीकडे पत्त्यांविषयी खूप काहीही जाणून घेण्यासारखे आहे………

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे किंवा प्लॅस्टिकचे बनविलेले असतात.

बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो. पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात. तर…….

1) हे 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे.

2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतू….. प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.

3) या सर्व पत्त्याची बेरीज 364

4) एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.

5) 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.

6) 52 पत्यातील 12 चित्र पत्ते. म्हणजे 12 महिने

7) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश.

2) तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश

3) चौकी म्हणजे चार वेद  (अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद)

4) पंजी म्हणजे पंच प्राण  (प्राण, अपान, व्यान, उदान, समान)

5) छक्की म्हणजे षड रिपू  (काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ)

6) सत्ती- सात सागर

7) अटठी- आठ सिद्धी

8) नववी- नऊ ग्रह

9) दसशी- दहा इंद्रिये

10) गुलाम- मनातील वासना.

11) राणी- माया.

12) राजा-सर्वांचा शासक.

13) एक्का- मनुष्याचा विवेक.

14) समोरचा भिडू – प्रारब्ध.

 मित्रांनो, लहानपणा पासून पत्ते बघितले असतील. काहींनी खेळले असतील; परंतु त्या पत्त्यांच्या संचाबद्दल माहिती होती का ? 

त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!

नवरा बायको — पहिली पिढी

2) मुलं (सख्खी भावण्डं) — दुसरी पिढी —आई वडलांकडून 50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसूत्रे share करतात.

3) तिसरी पिढी — नातवंडे — पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसूत्रे share करतात.

4) चौथी पिढी — पहिल्या पिढीचे 12. 5% गुणसूत्रे share करतात.

5) पाचवी पिढी — पहिल्या पिढीचे 6. 25% गुणसूत्रे share करतात.

6) सहावी पिढी — पहिल्या पिढीचे 3. 12 % गुणसूत्रे share करतात.

7) सातवी पिढी — पहिल्या पिढीचे 1. 56% chromosome share करतात.

8) आठवी पिढी —पहिल्या पिढीचे < 1% share गुणसूत्रे करतात.

म्हणून मूळ पुरुष, जोडप्यापासून सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्यजात गुणसूत्रीय आजारांची शक्यता असते. अनेक समाजात मामाच्या मुलीशी विवाह करतात. पण धार्मिक/ वैज्ञानिक दृष्टीने निषिद्ध आहे.

आठव्या पिढीपासून नातं, भाऊबंदकी मानत नाहीत.

म्हणून पती-पत्नी चं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.

तीन पिढ्या सपिंड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.

आणि सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात. !!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ बाळकृष्ण गोजिरा… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ बाळकृष्ण गोजिरा… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

प्रथमच मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा स्त्रीच्या मनात अनामिक भावनांचा सागरच उसळतो. स्त्रीत्व आणि मातृत्व या स्त्री जीवनातल्या अनमोल बाबी आहेत. मातृत्व जणू काही स्त्रीत्व सिद्ध करतं. मातृत्व म्हणजे एक प्रकारे तिच्या स्त्री जीवनाची सफलता असते. “आपण आई होऊ शकतो किंवा आपण आई होणार” ही भावनाच स्त्रीसाठी त्रिभुवनातला आनंद देणारी असते. एकाच वेळी हर्ष, हुरहूर, जबाबदारीच्या जाणिवेनं आलेलं भय, देहात होणारे बदल आणि हे “गुपित कुणाला सांगू कसे?” अशा एका निराळ्याच मानसिकतेत ती असते पण सर्वप्रथम हे गोड गुपित तिला “त्यालाच” सांगायचे असते कारण निर्मितीच्या या सुखद वाटेवरचा प्रवास हा केवळ त्या दोघांचाच असतो म्हणूनच या आनंदाच्या क्षणाचा खरा भागीदार तोच असतो. अशाच अर्थाचं एक द्वंद्व गीत म्हणजे बाळकृष्ण गोजिरा जे डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सहज उतरलेलं आहे. मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर स्त्रीच्या अंतरंगातले तरंग त्यांनी अत्यंत जाणतेपणाने आणि हळुवारपणे टिपले आहेत. स्त्री जीवनातला असा हा अनमोल क्षण, आणि त्यातला जोडीदाराचा सहभाग नेमकेपणाने वेचणारे हे एक गोड युगुल गीत आहे.

*

वसविला बाळकृष्ण गोजिरा

 वसविला बाळकृष्ण गोजिरा”ध्रु।।

*

 ती: दान घेऊनी तव तेजाचे

 सार्थक झाले या ओटीचे 

 उजविण्या ज्योत अपुल्या घरा

 वसविला बाळकृष्ण गोजिरा।।१।।

*

 तो: प्रेमरज्जुंचे धागे अपुले

 ती: रेशीमगाठी बंध जाहले 

 तो : गुंफिला नवा साजिरा 

 ती :वसविला बाळकृष्ण गोजिरा।।२।।

*

तो: मुकुंद अथवा आदिशक्ती 

ती :कलिका अपुल्या वेलीवरती 

 माझ्या पोटी उमलु लागली 

 वसविला बाळकृष्ण गोजिरा।।३।।

*

कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री. (निशिगंध काव्यसंग्रह)

तीन कडव्यांचं, फक्त पंधरा ओळींचं काव्य पण किती अर्थपूर्ण किती बोलकं! मातृत्वाशी गोड धागा विणला जात असतानाच तिच्या मनातलं अगाध आंदोलन आणि तिच्या स्वप्नरंगात दंग झालेल्या “त्याचे” मन.. किती साध्या आणि सोप्या शब्दांतून या गीतात उलगडलं आहे!

 वसविला बाळकृष्ण गोजिरा

 या ध्रुवपदातला बाळकृष्ण हा शब्दच मनाला हळुवार मोरपिसाचा स्पर्श करतो. लहान बालकांसाठी बाळकृष्णाची ही एक सुंदर उपमा नेहमीच दिली जाते. कृष्ण, कन्हैया, कान्हा या शब्दातच लडिवाळपणा आहे. कृष्णाला कोणी पाहिले आहे? पण त्याचं लडिवाळ, बाळपणीचं रूप सगुणात्मक आहे आणि ते अत्यंत सुंदर गोजीरं आहे म्हणूनच उदरात वाढणाऱ्या गर्भाला या बाळकृष्णाचं रूप लाभावं ही प्रत्येक स्त्रीची मनोकामना असते आणि सहजपणे ती म्हणते, स्वतःशी आणि त्याला सांगताना,

 वसविला बाळकृष्ण गोजिरा

 *मला दिवस राहिलेत किंवा आता आपण आई-बाबा होणार बरं का?” याच भाष्याला सौंदर्याने सजविणारी,

वसविला बाळकृष्ण गोजिरा ही ओळ किती काव्यात्मक आहे! इथे बाळकृष्ण हा रुपकात्मकही आहे.

 ती: दान घेऊनी तव तेजाचे 

 सार्थक झाले या ओटीचे 

 उजविण्या ज्योत अपुल्या घरा

 वसविला बाळकृष् गोजिरा।१।

द्वंद्वगीत म्हणजे एक संवाद असतो. हाही एक आनंददायी संवाद आहे. या चार ओळी वाचताना वाचकाच्या मनात एक सहजीवनाचे सुंदर चित्र साकारते. “ती अगदी सुखाने त्याच्याजवळ बसलेली आहे. जे गुपित तिला त्याला सांगायचं आहे त्यासाठी हवा असलेला एकांत आणि निवांतपणा दोन्हीही आहे आणि तिला काहीतरी सुखाचं, आनंदाचं आपल्याला सांगायचं आहे पण नक्की काय याचा अंदाज घेत उत्सुकतेने तोही तिच्याजवळ तितक्याच उत्कट प्रेमभावनेने आलेला आहे. ”

ती पण पटकन त्याला काही सांगत नाही. म्हणते, दान घेऊनी तव तेजाचे… “तुझ्या बीजाचं दान तू मला दिलंस ते फळलं आहे. आता माझी ओटी भरली आहे आणि माझ्या देहातल्या गर्भाशयाच्या अस्तित्वाचे, पर्यायाने माझ्या स्त्रीत्वाचे आता सार्थक झाले आहे. अरे! एक नवा पाहुणा येतोय बरं का आपल्या अंगणी आणि त्याच्या आगमनाने आपल्या घरात नवा प्रकाश उजळणार आहे. असा हा बाळकृष्ण माझ्या उदरात वाढत आहे. ”

संपूर्ण कडवं तसे रूपकात्मक आहे.

दान, तेज, ज्योत, बाळकृष्ण या सर्वच शब्दांवर भावनांचा सौंदर्य साजआहे. मिलनाच्या क्षणी स्त्री ही धारक असते आणि पुरुष हा दाता असतो म्हणून स्त्रीसाठी तिला त्याच्याकडून मिळालेलं शुक्रबीज हे जणू काही पवित्र दानासारखे असते. दान शब्दाची उत्प्रेक्षा खूपच भावनिक आणि सुंदर वाटते. शिवाय हे दान असंतसं नसून तेज:पुंज आहे. इथे तेज हा शब्दही खूप अर्थपूर्ण आहे. घेणे आणि देणे या प्रक्रियेत जेव्हा उदात्तता असते तेव्हा त्या दानाला एक वेगळंच तेज प्राप्त होतं आणि अशा तेजाचं दान मिळालेलं बीज अंकुरताना प्रकाशमय असणार याची खात्री असते.

बाळकृष्ण या शब्दात गोजिरेपण, लाडिकपण, सौंदर्य तर आहेच पण त्याचबरोबर एक सात्विकता, मंगल्य, पावित्र्य, देवरुपत्व आहे आणि प्रत्येक स्त्रीला जन्माला येणारं आपलं बाळ असं गुणसंपन्न असावं असं वाटत असतं.

 तो: प्रेम रज्जूचे धागे अपुले 

 ती :रेशीमगाठी बंध जाहले

 तो : गुंफिला गोफ नवा साजिरा

 ती: वसविला बाळकृष्ण गोजिरा।२।

किती प्रेमळ संवाद! या संवादात झुळझुळ निनादणारा सूर आहे. या ओळी वाचताना सहजच कवी बी यांच्या काव्यपंक्ती मनात गुणगुणल्या.

*हे विश्वाचे आंगण 

आम्हा दिले आहे आंदण

उणे करू आपण दोघेजण

शुद्ध रसपान करण्याच्या भावनेतून जणू काही त्याला ती गर्भवती झाल्याचे कळताच तो म्हणतो, “आपलं नातं प्रेमाच्या धाग्यात विणलं आहे”. त्यावर तीही म्हणते “आता मात्र आपल्या नात्याची वीण माझ्या उदरात वाढणाऱ्या गर्भामुळे अधिकच घट्ट होणार आहे. ”

त्यालाही तिचेही भाष्य मनोमन पटते आणि तोही त्यास दुजोरा देऊन सहज म्हणतो, ” खरोखरच आपल्या प्रेमाचं हे प्रतीक आहे. हा एकमेकात गुंफलेला सुंदरसा गोफच आहे. ”

गोफ हा शब्दही नात्यांच्या संदर्भात मला खूप आवडला. विणलेल्या गोफात धाग्यांचा सहज न सुटणारा पीळ असतो. तिच्या उदरातल्या बीजाशी त्याने दिलेल्या अंशाचा संयोग झाल्यामुळे त्यांचे नाते विणलेल्या गोफासारखे घट्ट झाले आहे.

कडव्यातला एक एक शब्द मोत्यासारखा पाणीदार आणि गोजिरवाणाही आहे. दोघांच्या नात्याला दिलेली “प्रेमरज्जुचे धागे” ही उपमा अगदी निखळ आहे. रेशीमगाठी बंध जाहले … देवाधर्माच्या साक्षीने प्रेमाची एक रेशीमगाठ बांधली तर जातेच पण या गाठीचा बंध तेव्हाच होतो जेव्हा दोघांच्या मिलनातून झालेल्या निर्मितीच्या क्षणाची अनुभूती मिळते. स्त्री —पुरुषांचं नातं, प्रीत आणि प्रणयाचं फलित या स्त्री जीवनातल्याच नव्हे तर सहजीवनातल्या किती महत्त्वाच्या पायऱ्या आहेत यावर डॉ. श्रोत्री अगदी सहजपणे भाष्य करून जातात.

 तो: मुकुंद अथवा आदिशक्ती 

ती: कलिका अपुल्या वेली वरती 

 माझ्या पोटी उमलू लागली

 वसविला बाळकृष्ण गोजिरा।३।

मातृत्वाची चाहूल लागताक्षणीच दोघांच्याही मनात तेव्हाच एक उत्सुकताही सहजपणे जागृत होते. मुलगा होणार की मुलगी?

या काव्यपंक्तीत उल्लेख असलेला “तो। मात्र अत्यंत समतोल, समंजस वृत्तीचा आहे अथवा विनाकारणच ताण देणारा किंवा घेणाराही नाही. त्याला गर्भधारणेच्या प्रक्रियेतील नैसर्गिकता पूर्णपणे ज्ञात आहे आणि त्या बाबतीत त्याची मनापासून स्वीकृती आहे म्हणून तो तिला म्हणतो,

मुकुंद अथवा आदिशक्ती या संज्ञा किती सुरेखपणे साधल्या आहेत! युगंधराचं तत्व घेऊन जन्माला येणारा मुलगा असो अथवा शक्तीचं साक्षात रूप घेऊन जन्माला येणारी मुलगी असो दोघांचे स्वागतच आहे. मुकुंद आणि आदिशक्ती या दोन्ही शब्दातून, जन्म घेणाऱ्या नवजाताचा अत्यंत सात्विकपणे आणि महात्म्य अधोरेखित करून गौरवच केलेला आहे आणि तीही त्याच्या विचारांना अनुमोदन देऊन स्वीकृत भावनेने म्हणते, “खरोखरच आपल्या संसार प्रीतीच्या वेलीवर उमलणारी ही कलिका आता माझ्या उदरात वाढत आहे आपण दोघेही तिचे स्वागत करूया. ?

असं हे अत्यंत गोजिरवाणं आणि भावनिक गीत ! छोटसं, साध्या शब्दातलं! उपमा उत्प्रेक्षांनी सजवलेलं प्रतीकात्मक रूपकात्मक असं गोड गोजिरंगाणं! या गाण्यांमध्ये जाणवतं ते नात्यातलं मांगल्य, साफल्याची भावना, सार्थकतेचा अनुभव आणि स्त्री जीवनाचा मातृत्वाशी जोडलेला एक अभंग भावनांचा बंध आणि या सर्वांशी एकरूप, समरस होऊ शकणारं कवीचं संवेदनशील मन!

या गीतात साधलेली तेजाचे/ ओटीचे घरा/ गोजिरा/ साजिरा/ अपुले/ जाहले आदिशक्ती/ वेलीवरती ही सहजयमके गीताला एक ताल आणि लय प्राप्त करून देतात*

डॉक्टर श्रोत्रींच्या काव्यातले एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे शब्दांचा अजिबात नसलेला फापटपसारा, नगण्य काठिण्य, अलंकारांचा अवजडपणा टाळून सहजपणे फुलणारा शब्दांचा साज! डॉ. श्रोत्री तुमच्या काव्यप्रतिभेला माझा मनापासून प्रणाम!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पांगळेपण… ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ पांगळेपण… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

भारत विकास परिषदेच्या सांगली शाखेने परवाच घेतलेल्या शिबिरात 138 दिव्यांगाना अत्याधुनिक मोड्युलर हात व पाय बसविले. अर्थात यात बऱ्याच इतर संस्था पण सहभागी होत्या. पण सांगलीतल्या या संस्थेत माझा भाऊ कार्यरत असल्याने माझी कॉलर जरा ताठ झालीच. त्याने सांगितलेल्या दिव्यांगांच्या एकेक गोष्टी ऐकून थोडं हळवं मन उदास झालं. पण ही माणसं किती चांगलं काम करताहेत याचं कौतुकही वाटलं.

सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने त्याच वेळी माझ्या हातात आशा बगे यांचा मारवा कथासंग्रह होता. त्यातली पांगळी ही कथा वाचली. पांगळेपण फक्त शरीराचं नसतं ते मनालाही येत असतं. ग्रेस यांनी ते फार छान सांगितलं आहे. सत्यभामा व रुक्मिणी दोघीही मनाने पांगळ्या होत्या. कृष्णाचं प्रेम पारिजातकात शोधत होत्या. एकीला वाटलं मूळ असून काय उपयोग, फुलेच मिळाली नाहीत तर ! दुसरीला वाटले मूळच मिळाले नाही तर ही बेभरवशाची फूले काय कामाची! राधेला मात्र असं प्रेमाचं प्रतीक शोधावं लागलं नाही, ती स्वत:च कृष्णमय होऊन प्रेमाचं प्रतीक बनली.

आशा बगे यांच्या कथेत एक प्रथितयश कवी, त्याला भेटलेल्या एका उदयोन्मुख तरुण कवियित्रिला पुढे येण्यासाठी आधार द्यायचा असं ठरवतो. देतोही!आणि एका क्षणी तो तिला आपलं बोट सोडायला सांगतो, कारण त्याला वाटतं कि तिला आता आपल्या आधाराची गरज नाही. पण जेंव्हा ती प्रत्यक्षात बोट सोडून जाते, तेंव्हा त्या कवीला इतकं एकटेपण येतं कि तो विचार करू लागतो, नेमकं आपण तिचं बोट सोडलं कि तिनं आपलं बोट सोडलं ? पांगळेपण आपल्याला कां आलं ? 

ही अवस्था प्रत्येकजण अनुभवत असतोच. ज्या मुलांचं बोट धरून आपण त्यांना चालायला शिकवतो, त्यांचं बोट सुटतं तेंव्हा आपण पांगळे झालेलो असतो. आणि मग लाखभर अपेक्षांचं ओझं त्या मुलावर टाकतो. खरंतर आपण बोट ज्या हातानं धरलेलं असतं, तो हात हळूहळू त्याच्या खांद्यावर न्यावा. कारण मैत्र कधीच कुणाला पांगळं करत नाही. प्रेम, सहानुभूती, कणव या भावना पांगळेपण वाढवणाऱ्या असतात. अहंकार, मोठेपणा जपण्याची हौस, अधिकार गाजवण्याची गरज, दुसऱ्याच्या कमतरतांवर बोट ठेवण्याची सवय, दुसऱ्याचे दोष अधोरेखित करण्याचे प्रयत्न स्वतःलाच एक दिवस पांगळं बनवतात.

शरीराचं पांगळेपण घालविणारं कोणीतरी नक्की भेटेल पण मनाचं पांगळेपण आपलं आपणच घालवावं लागेल किंबहुना ते येणारच नाही याची काळजी घ्यावी लागेल, तसे आधीच प्रयत्न करावे लागतील.

मनके हारे हार है, मनके जीते जीत। 

कहत कबीर हरी पाइये, मनही की परतीत॥

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आम्ही पाच – १

हाताची पाच बोटं सारखी नसतात. खरं आहे. आम्ही पाच बहिणी पण दिसण्यात, वागण्यात, स्वभावात आणि एकंदरच आम्हा पाच बहिणींच्या पाच तर्‍हा होत्या. तसं पाहिलं तर आम्हा बहिणींच्या वयातली अंतरही जरा जास्तच होती. म्हणजे पहा ना.. माझ्यात आणि ताई मध्ये (मोठी बहीण) पाच वर्षांचं अंतर. छुंदा माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आणि उषा— निशा या जुळ्या बहिणी, यांच्यात आणि माझ्यात दहा वर्षांचे अंतर.
एक सांगते भावंडांची संख्या जास्त असली की आपोआपच त्यांच्यात ग्रूपीजम होऊन जातो. छुंदा, उषा, निशा यांचा एक ग्रुप होता. मी आणि ताई मोठ्या बहिणी म्हणून आमचं घरातलं स्थान जरा वेगळं असावं, पण या मोठेपणातही पुन्हा वयातल्या अंतरामूळे भागीदारी झाली होती. कधी मला वाटायचं मी ना इथली ना तिथली पण त्यातल्या त्यात छुंदा जरा माझ्या गोटा मधली असायची. त्यामुळे तिचं आणि माझं एक निराळंच सख्य होतं.

ताईची आणि माझी कधी भांडणं वगैरे झाली नाहीत पण मला तिचा रागच यायचा. कारण ती अतिशय हट्टी होती आणि तरीही पप्पा तिला “बाबी” म्हणायचे. कसली बाबी.. आईला वेण्या घालताना भंडावून सोडायची. जिजी ला तर नकोसं करायची. बस ! तिच्या मनात काही आलं की ते “आत्ताच्या आत्ता” झालंच पाहिजे. जिजी तिचं सगळं ऐकायची. म्हणेल तेव्हा तिच्याबरोबर सागर गोटे, पत्ते खेळायची. बाहेर रणरणीत ऊन असायचं पण हिला मैदानात सायकल फिरवायला जायचं असायचं. जिजी बिचारी त्या उन्हातही तिला सायकल चालवायला घेऊन जायची. घरात तिचा पाय काय स्थिरावयाचा नाही. मी तर तिला “भटक भवानी”च म्हणायचे. आज तिचं वय ८२ आहे पण अजूनही ती तशीच आहे बरं का ? कुठून येते तिच्यात इतकी ऊर्जा देव जाणे !

पण ताई मॅट्रिक झाली. आमच्या वेळेला अकरावीला एसएससी बोर्डाची परीक्षा असायची. अकरावी पास म्हणजे मॅट्रिक पास. जणू काही एक पदवीच असायची आणि मग पुढे कॉलेजगमन.

तर ताई मॅट्रिक झाली आणि ग्रँटरोडला आजोबांकडे कायमची राहायला गेली. आमची मावस बहीण संध्या जन्मल्यापासूनच आजोबांकडे राहत होती. आता ताई आणि संध्या ज्या एकाच वयाच्या होत्या.. या जोडीने आजोबांच्या आयुष्यात एक वेगळीच हिरवळ निर्माण केली. असो ! तो एक संपूर्ण वेगळा विषयच आहे पण ताईचे असे इमिग्रेशन झाल्यामुळे आमच्या घरात एक प्रकारचे सत्तांतर झाले म्हणा ना. आता या घरात मी मोठी होते. या मोठेपणात एक पॉवर होती आणि मला ती पॉवर माझ्या लहान बहिणींवर वापरायला नक्कीच आवडायचे पण त्याही काही बिचाऱ्या वगैरे नव्हत्या बरं का ? चांगल्याच कणखर, सक्षम आणि फायटर होत्या. त्यातल्या त्यात छुंदा जरा सौम्य होती. तिला नक्की काय वाटायचे कोण जाणे पण तिची अशी एक मनोधारणा असायची की बिंबा (म्हणजे मी) सांगते ना म्हणजे ते तसंच असलं पाहिजे. तिचं ऐकायलाच पाहिजे. माझा स्वभाव तसा जरा खट्याळ, फिरक्या घेणारा आणि काहीसा वात्रटच होता.

एकदा छुंदाच्या हातून बरणीतलं मीठ सांडलं. मी तिला म्हटलं.. गमतीनेच बरं का ?

“छुंदा ! मीठ सांडलंस ? पाप केलंस. आता पाण्यात घालून पिऊन टाक. नाहीतर देवाच्या दरबारात तुला डाव्या डोळ्याच्या पापणीने मीठ उचलावं लागेल. ”

बिच्चारी छुंदा !

तिला सगळं खरंच वाटायचं. ती खूपच घाबरली. तिने लगेच ग्लासात मीठ घातलं, पाणी ओतलं आणि ती खरोखरच पिऊ लागली. मी कोपऱ्यातून मज्जा बघत होते पण तिला भली मोठी उलटी झाली म्हणून जीजी लगेच धावली. जीजीला सगळा प्रकार कळल्यावर तिने माझ्या पाठीत बुक्केच मारले. सगळा गोंधळ.

“मस्तवाल कार्टी, वात्रट कुठली.. ” म्हणून मला ओरडणे, माझे जीजीचा मार चुकवत निलाजरे हसणे आणि छुंदाचे रडणे असा एक मोठ्ठा सीन झालेला. आजही जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. गंमत वाटते पण वाईटही वाटते. या आठवणी बरोबरच त्यावेळी न म्हटलेलं आज ओठावर येतं. “सॉरी छुंदा. अगदी मनापासून सॉरी !”

डावीकडून.. उषा छुंदा निशा ताई (अरुणा) आणि मी

उषा निशा तर फारच लहान होत्या. मी अकरा वर्षाची असताना त्या एक वर्षाच्या होत्या. माझ्यासाठी तर त्या खेळातल्या बाहुल्याच होत्या. घरातली शेंडेफळं म्हणून आई— पप्पा— जीजी आणि सर्वांच्या अत्यंत लाडक्या. सगळ्यांचं सतत लक्ष या दोन बाळांवर असायचं. मला तर कधी कधी दुर्लक्षितपणाचीच भावना यायची आणि त्यामुळे मी खरोखरच कधी कधी त्यांच्यावर, मला जन्मानेच मिळालेली मोठेपणाची पॉवर वापरायची पण या मोठेपणाच्या बुरख्यामागे माझ्या मनात त्यांच्याविषयी अपार मायाही होती. जणू काही त्यांचं या घरात आमच्याबरोबर मोठं होणं ही माझीच जबाबदारी असंही मला वाटायचं. त्या झोपल्या का, त्यांनी वरण-भात खाल्ला का, त्यांची आंघोळ झाली का, त्यांना कपडे घालायचे, पावडर लावायची.. बापरे ! केवढी कामं पण मला ती माझीच कामं वाटायची. छुंदाची पण मध्ये मध्ये शांतपणे लुडबुड असायचीच कित्येक वेळा मी आणि ताईने त्यांना मांडीवर घेऊन शाळेच्या परीक्षेचा अभ्यास केला आहे.

आमचं घर लहान होतं. फारसं सोयीसुविधांचही नव्हतं. वास्तविक आमच्या घराच्या खालच्या मजल्यावर, जी दोन, एक खणी घरं होती ती भाड्याने का दिली होती ? नाहीतर आमच्यासाठी खालीवर मिळून एक मोठं घर नसतं का झालं ? पण हा विचार आता येतो. तेव्हा कधीच आला नाही. आम्ही पाच, आई पप्पा आणि जीजी असं आमचं आठ जणांचं कुटुंब, तीन खोल्या, एक गॅलरी आणि मागची मोरी एवढ्या परीघात सुखनैव नांदत होतं. “स्पेस” नावाचा शब्द तेव्हा डिक्शनरीत आलाच नव्हता.
आमच्या या गोकुळात सगळं होतं. खेळणं, बागडणं, भांडणं, रुसवे—फुगवे, दमदार खाणं पिणं, आईची शिस्त, टापटीपपणा, पप्पांचा लेखन पसारा आणि जीजीचं तुडुंब प्रेम! काय नव्हतं त्या घरात !

पप्पा पहाटे उठून सुरेल आवाजात ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामाचे अभंग गात. आई, जीजी अंग तोंड धुवून लगबगीने घर कामाला लागत. चहापाणी, स्वयंपाक, घरातला केरवारा, झटकफटक, आमच्या शाळेत जाण्याच्या वेगवेगळ्या वेळा, वेण्याफण्या, कपडे, डबे, पप्पांची कधीही न चुकलेली ठाणे ते व्हीटी (म्हणजे आताचे सीएसटी. ) दहा पाचची लोकल, त्यांचे जेवण, त्यांची बॅग भरणे आणि त्यांना ऑफिसात जाण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी खिडकीतल्या मोठ्या लक्षवेधी महादेवाच्या फोटोला, ”नमस्कार केलास का ?” म्हणून न चुकता जीजीचा केलेला प्रश्न आणि हमखास नमस्कार न करता निघून गेलेल्या पप्पांच्या मागे जीजीनेच मग खिडकीतल्या महादेवाला नमस्कार घालत पुटपुटणे.

या सगळ्याच्या दरम्यान सकाळची साडेसात ते साडेआठ ही पप्पांची आम्हा बहिणींसाठी घेतलेल्या शिकवणीची वेळही कधी चुकली नाही. आमच्या वयानुसार या पप्पांच्या शिकवणीत बदल घडत गेले. सुरुवातीला मी आणि ताई असायचो. पप्पा मध्ये आणि पप्पांच्या डाव्या उजव्या हाताला चौरंग मांडून भारतीय बैठकीत आमचा अभ्यास चालायचा. एक राहिलं.. आमचा चौथीपर्यंतचा अभ्यास आई घ्यायची आणि पाचवी नंतर पप्पांच्या ॲडव्हान्स अभ्यास वर्गात आम्ही जायचो. मी पाचवीत असताना ताई दहावीत होती. हा असा वेगवेगळ्या इयत्तांचा अभ्यास पप्पा कसा काय घेत होते ? पण मुळातच त्यांचा अभ्यास पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित नसायचा. त्यांच्याबरोबर आम्ही तरखडकारांचे इंग्लिश व्याकरण, हितोपदेश, मोरोपंतांच्या आर्या, गोखलें अंकगणित, हँन्स अंडरसनच्या फेरी टेल्स, साॅमरसेट मॉमच्या कथांचं वाचन, शेक्सपियरची नाटके, संतवाङ्मय तर होतंच… तर पप्पांबरोबरचा अभ्यास हा असा चतुरंगी होता. शाळेतल्या माझ्या अनेक हुशार मैत्रिणी गाईडचा वापर करून अभ्यास करत. वरचा नंबर पटकावत पण पप्पांचा गाईड वापरून केलेल्या अभ्यासाला जोरदार विरोध असायचा. अभ्यास परीक्षेपुरता करायचाच नाही. तो सखोल असला पाहिजे. विषयाच्या गाभ्यापर्यंत झाला पाहिजे असे त्यांचे ठाम मत. गाईड सारखे शॉर्टकट त्यांना कधी पटलेच नाहीत. तरीही पप्पांनी त्यांची मतं आमच्यावर कधीच लादली नाहीत पण पप्पांच्या विरोधात जाण्याची आमच्यातही हिम्मत नव्हती. खरं म्हणजे माझा स्वभाव लहानपणापासून, सौम्यपणे असला तरी विरोध करणारा, रीव्होल्टींग, काहीसा विद्रोही होताच पण पप्पांपुढे मात्र तो पार लुळापांगळा होऊन जायचा. आज जेव्हा या सगळ्या आठवणी येतात तेव्हा प्रकर्षाने जाणवते आम्हा पाचही जणींना दिलेली ही पप्पांची शिकवण आयुष्यभर साथ देत राहिली.

आता मी इथेच थांबते कारण का कोण जाणे हे सारं लिहीत असताना अचानकच मला प्रचंड ठसका लागला आहे आणि तो थांबत नाहीये. हातातलं पेनही गळून पडले आहे. कदाचित ब्रम्हांडात कुठेतरी अस्तित्वात असलेल्या, ज्यांच्या छत्राखाली आम्ही पाच जणी वाढलो त्या आई, जीजी आणि पप्पांनाही या क्षणी आमचीच आठवण झाली असेल का ?

— क्रमश: भाग १२

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वारूळ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ वारूळ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 चल गं सये वारुळाला, वारुळाला

 नागोबाला पुजायला पुजायला

 नागपंचमीच्या अनेक लोकगीतातील हे एक गीत शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, शेताच्या एका कडेला किंवा पडीक माळरानात आपल्याला वारूळ दिसते. या(आयत्या) वारुळात साप, नाग राहतात ते शेतकऱ्यांचे मित्र असतात म्हणून वारुळांची पूजा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केली जाते. तसेच वारुळात असणाऱ्या मुंग्यांना देखील लाह्या खायला देतात. याचे कारण पावसाळ्यात त्यांना वारुळाच्या बाहेर येऊन अन्न गोळा करणे शक्य नसते. यावरूनच शेतकऱ्यांच्या शेती जीवनातील वारुळाचे महत्त्व आपणास कळते. पूर्वीच्या माणसांना विज्ञान माहीत नव्हते मात्र अनुभवाचे ज्ञान दररोजच्या निरीक्षणातून पक्के होते. तो निसर्गातील वेगवेगळ्या चमत्काराबद्दल, किमयेबद्दल, सूक्ष्म बदलाबद्दल परिचित होता म्हणूनच निसर्गाबद्दल तो कृतज्ञ होता. पूर्वजांच्या सर्व चालीरितींचे अनुकरण आणि परंपरांचे पालन करत होता. निसर्गाचा कोप होऊ नये म्हणून निसर्ग जपत होता, त्याची पूजाही करत होता.

निसर्ग आपला नेहमीच मार्गदर्शक असतो, निसर्गातील प्रत्येक घटक मानवास एक उपदेश, संदेश देत असतो. मुंगी निसर्गातील एक छोटासा घटक पण तिचे जीवन आपल्यापुढे एक आदर्श आहे. त्यांचे घर, एकोपा, परस्पर साहचर्य, नियोजन, चिवटपणा, जिद्द सर्वच गोष्टी माणसाने शिकण्यासारख्या आहेत.

मुंग्यांच्या घराला वारूळ असे म्हणतात. इंग्रजीत anthill. मातीचे कण आणि तोंडातील चिकट द्रवाला एकत्र करून मुंग्या वारूळ बांधतात. वरून साधे सोपे वाटणारे वारूळ आतून मात्र खोल खोल गुंतागुंतीच्या कप्प्यांचे असते. म्हणूनच पूर्वीच्या दंतकथामध्ये वारुळांच्या खाली भुयार, राजमहाल असल्याचे काल्पनिक उल्लेख आहेत. वारुळांची रचना अशी गूढच असते. वारुळाची रचना टोकाकडे निमुळती असल्याने कितीही पाऊस पडला तर पाणी वरून वाहून जाते आणि वारूळ आतून कोरडी राहतात. इतकेच नव्हे तर कारखान्याचा धूर जसा धुराड्यामार्फत उंचावर सोडला जातो त्याचप्रमाणे वारुळातील उष्णता या ढिगाऱ्यामुळे हवेत सोडली जाते. वर्षभर मिळेल तितके धान्य, अन्नकण वेचून मुंग्या वारुळात नेऊन धान्य कोठारात साठवतात आणि नडीआडीला हे धान्य वापरतात. माणूस जसे घराची साफसफाई करून घर स्वच्छ ठेवतो तसेच मुंग्याही आपल्या कोठारांची साफसफाई करतात. कचरा, निरुपयोगी धान्याचे कण, मेलेल्या कीटकांचे अवशेष त्या वारुळाबाहेर आणून टाकतात. कणसात दाणे भरले की पाखरे कणसांवर तुटून पडतात. पाखरांच्या चोचीतून खाली पडलेले असे धान्य तसेच खळ्यात पडलेले धान्य, मळणी करताना इकडे तिकडे पडलेले धान्य- बाजरी, ज्वारी, गहू मुंग्या वारुळात नेतात. सुगीचा काळ हा मुंगीपासून जनावरे, माणसे सर्वांनाच आनंददायी असतो. वेगवेगळ्या मुंग्यांची वारुळे वेगवेगळी असतात. मुंग्यांच्या जिद्दीचा अनुभव मी बरेचदा बघितला. रस्त्याच्या कडेला एकदा मुंग्यांनी वारूळ खोदायला सुरुवात केली. थोडीफार जमीन भुसभुशीत होताच मोठा पाऊस आला आणि वारूळ मुजुन गेले. मला वाटलं मुंग्या आता दुसरीकडे वारूळ करतील पण दुसऱ्या दिवशी पाऊस उघडल्यानंतर त्याच जागेला वारूळ खोदायला सुरुवात केली. बरेचदा एखाद्या प्राण्याने किंवा किटकाने त्यांच्यावर हल्ला केला की एकजुटीने त्या शत्रूस कडकडून चावतात अगदी सापाला सुद्धा!

वाळव्याची सुद्धा वारुळे असतात. असे म्हणतात की वारुळाच्या साहाय्याने भूगर्भातील पाणी शोधण्यास मदत होते. तसेच वारुळाच्या मातीचा औषधासाठी, शेतीतील उत्पादनवाढीसाठी होतो म्हणून शेतकऱ्यांना वारुळे फायद्याची असतात. गांडूळे जशी जमीन भुसभुशीत करतात तसेच मुंग्यासुद्धा जमीन भुसभुशीत करायचे काम करतात. मुंग्या माती फिरवतात आणि वायू देतात ज्यामुळे पाणी आणि ऑक्सिजन वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचू शकतात. मुंग्या बियांचा भाग असलेल्या पौष्टिक इलिओसोम्स खाण्यासाठी त्यांच्या बोगद्यात बिया घेतात. या बिया अनेकदा उगवतात आणि नवीन रोपे वाढतात, पसरतात यासाठीच वारुळांचे संवर्धन केले जाते. आतमध्ये वारूळ जितकी खोल तितकेच उंच वर आणलेले मातीचे निमुळते ढिगारे असतात. एक मीटर ते पाच-सहा मीटर पर्यंत त्यांची उंची असते. हिरवाईत लपलेले एखादे उंच वारूळ लांबून एखाद्या मंदिराप्रमाणे किंवा पर्वताच्या सुळक्यासारखे सुंदर दिसते. इयत्ता सातवीत आम्हाला बालभारतीमध्ये कवी श्रीकृष्ण पोवळे यांची ‘वारूळ’ नावाची अतिशय सुंदर कविता होती. त्यात कवीने वारुळाला हीच उपमा दिली आहे.

 वारूळ वारूळ मुंग्यांचे वारूळ

 कृमी कीटकांनी बांधले देऊळ

 शेतकऱ्यांच्या जीवनात असलेले वारुळांचे महत्व आता शेतकरीच विसरू लागले आहेत. कधी साप, नाग पकडण्यासाठी तर कधी अंधश्रध्दापायी तर कधी शेतीचे क्षेत्र कमी होईल म्हणून वारूळ खोदून नष्ट केली जात आहेत. लहानपणी आम्हाला बाई वारुळाची पूजा करायला नेत असत. सोबत आणलेल्या लाह्या वारुळावर विस्कटायला लावत. त्यावेळी तो फक्त उपचार वाटत होता पण आज त्यामागील उपयुक्तता व सहसंबंध लक्षात येतो. जुनाट, कालबाह्य, निरुद्धेश्य रूढी म्हणून आपण चांगल्या गोष्टी, परंपरांचा त्याग करत आहोत, निसर्गाचा ऱ्हास करत आहोत पण निसर्ग आणि माणूस परस्परावलंबी आहेत. निसर्गाचा ऱ्हास हाच मानवाच्या विनाशाचे कारण ठरत आहे पण माणूस कधी डोळे उघडणार?

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकटेपणा – लेखक : ऐश्वर्य पाटकर – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ एकटेपणा – लेखक : ऐश्वर्य पाटकर – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(‘थिंक पॉझिटिव्ह’ नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे “एकटेपणा”. पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे. या दिवाळी अंकातील “एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज!” हा श्री ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी आहेत आणि त्यांची ‘भुईशास्त्र’ आणि ‘जू’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे…)

“मला आमच्या इथं गावातील बियावाल्या बाईची गोष्ट आठवते. बियावाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं. हा तिचा हात गुण होता की झाडा-कोडावरची माया? माहित नाही.

मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं. ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती. पण तिने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही.

बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही. तिला एकदा आई म्हणाली होती, “आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झाले असतं तर आता नातू-पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!”

तेव्हा तिचे उत्तर होतं, “नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोरं कुणी सांभाळली असती ?”

“कसा जन्म जावा ओ आत्याबाई तुमचा ?”

तेव्हा ही बिया वाली बाई म्हणाली, “जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का ? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती ? होती गं.. पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली. म्हणाली, “आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना… !”

दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला.. अन् तसही, किती लेकरा बाळावाल्या आया बाया होत्या माझ्या भवतीच्या. पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे. माझ्या या लेकरा बाळांना पाय नाहीत, हे एका अर्थी बरंच झालं. ! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. “

खूप अंतर्मुख केलं बियावाल्या बाईंच्या या छोट्याश्या कथेने. वर उल्लेखलेल्या बियावाल्या बाईंना अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं ? एकटेपणाच्या जाळ्यात सापडू नये यासाठी तीन सूत्र नकळत आपल्या वागण्यातून देऊन जातात त्या…

पाहिलं सूत्र म्हणजे, “आपल्यातील पॅशन ओळखा, त्यात व्यस्त रहा. ” 

दुसरं, “आपलं दुःख कुरवाळणं थांबवून, जे आहे त्यातही माझ्या दृष्टीने कसं चांगलंच होतंय असा दृष्टिकोन ठेवा. “

आणि तिसरं, खूप महत्वाचे सूत्र म्हणजे, “आपण लावलेल्या झाडांवर कधीही आपली मालकी सांगू नका, थोडक्यात, detach राहायला शिका, दुसऱ्यांसाठी काही करण्याची सेवावृत्ती अंगी असू द्या. “

लेखक : ऐश्वर्य पाटकर 

संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पर्णाच्छादित वाट… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ पर्णाच्छादित वाट… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

अतीतातून काही चित्रे डोकावतात. काबुलीवाला.. तो तर आपल्याला खास. त्यातल्या मिनी साठी दाखवला होता. काबुली वाल्याला ती मिनी विसरून जाते. तशी मीही तो चित्रपट विसरले.

थोड्या मोठेपणी मामा वरेरकर यांनी अनुवादित केलेल्या टागोरांच्या कथा वाचल्या.

पोस्टमास्टर, नष्ट नीड, एक रात्र, क्षुधित पाषाण, गुप्त धन, रासमनी चा मुलगा, दृष्टिदान, समाप्ती…. अशा कितीतरी.. त्यांनी मनाचा ठाव घेतला होता. पण कालांतराने त्या वर विस्मरणाचे धुके जमले….

टागोरांच्या कथा कालांतराने पुन्हा हाती पडल्या तेव्हा झपाटल्या सारख्या पुन्हा वाचल्या. पुन्हा पुन्हा वाचल्या. त्यातल्या अंतरंगाशी पुन्हा मन जडले.

तुरुंगातून सुटून आलेल्या रहमत पठाणला लहानपणी त्याच्याशी खूप बोलणारी मिनी भेटतच नाही. ती एक नववधू झालेली असते….

टागोरांची कथा इथे संपत नाही. मिनीचे वडील पठानाच्या मनाला जाणतात. दूरदेशी असलेल्या त्याच्या मुलीला त्याने भेटावे म्हणून मोठी रक्कम त्याला देतात.

उत्सव समारंभाच्या यादीतल्या हिशोबात, दान दक्षणेच्या आकड्यात काटछाट करावी लागते. पूर्वी ठरल्या प्रमाणे विजेचे दिवे लावता येणार नव्हते. वाजंत्री वालेही आले नव्हते. बायका मंडळी ही नाराज झाली होती.

पण मंगल प्रकाशाने आमचा शुभोत्सव अधिक उज्ज्वल झाला असे वाटले….

बलराज साहनी ने काबुली वाला अजरामर तर केला होताच. पण कथेचे सूत्र मिनीच्या वडिलांच्या मनोगतात किती रेखीव झालं होत.

पोस्ट मास्तर या कथेतील एक पोरकी पोर रतन.. गावातल्या पोस्टमास्टर साठी किरकोळ कामे करीत असे. मास्तर एकदा आजारी पडल्यावर ही मुलगी मोठी झाल्यासारखी त्यांची शुश्रुषा करते.

पोस्टमास्टर बरे झाल्यावर नोकरीचा राजीनामा देऊन जायला निघाल्यावर त्या मुलीचा निःशब्द दुःखावेग बाहेर पडतो.

दोनच पात्रे असलेल्या या कथेत काही हृदय पिळवटून टाकण्यासारखे असे काही नाही. म्हणूनच त्या मुलीचे दुःख आपल्या मनात खोलवर जाते…. या कथेची पार्श्वभूमी बंगालच्या ग्रामीण भागातला मलेरियाग्रस्त कोपरा आहे. पण तो तसा उरत नाही. तो रतनची मूक भाषा होतो. तिची असीम निष्ठा होती

…. ते होडीत बसले आणि होडी चालू लागली. पावसाळ्याने उसळलेली नदी धरणीच्या उमाळलेल्या अश्रुंच्या पाझरासारखी चारी बाजूने सळसळू लागली. त्यावेळी त्यांच्या हृदयात एक अत्यंत बिकट वेदना जाणवली एक सामान्य गावंढल बालिकेचा चेहरा जणू काही एक विश्वव्यापी प्रचंड अव्यक्त मर्मकथा प्रकाशित करत होता…

मूळ बंगाली भाषा सौंदर्याची जान नव्हती पण अनुवादित मराठी भाषेच्या आधाराने मी ते पुन्हा अनुभवले. महाकवीच्या प्रतिभेच्या पाऊलखुणा पुन्हा शोधल्या.

खुद्द गुरुदेव टागोरांनी या कथा पुन्हा वाचल्या तेव्हा 32 सालच्या एका पत्रातून ते लिहितात…. जेव्हा मी बंगालच्या खेड्यातल्या निसर्गाला सामोरा गेलो तेव्हा माझ्या सुखाला पारावार उरला नाही… या साध्या कथात हाच आनंद भरून राहिला आहे.. ग्रामीण बंगालच्या त्या प्रेमळ आतिथ्य शीलतेला मी आता मुकलो आहे. त्यामुळे मोटारीतून मिरवणाऱ्या माझ्या लेखणीला त्या साहित्याच्या पर्णाछादित शीतल वाटा चोखळणे या पुढे शक्य होणार नाही….

1891 ते 1895 तर काही 1914 ते 1917 या काळात म्हणजे त्यांच्या निर्मितीच्या ऐन बहराच्या काळात लिहिलेल्या या कथा आहेत.

ऐन तारुण्यात वडिलोपार्जित जमिनीची व्यवस्था पाहण्यासाठी ते सियालढा, पटिसार, शाजाद पूर, अशा खेड्यातून, तर पद्मा मेघना नद्यांतून, हाऊस बोटीतून प्रवास करीत आपल्या रयतेला भेटायला जात. बंगालचे अनुपम सृष्टी सौंदर्य न्याहाळता, त्यांच्या सुखदुःखाच्या कथा ऐकत. त्याचं प्रतिबिंब या कथात पडलेलं आहे.

1895 च्या 25 जूनला लिहिलेल्या एका पत्रात ते सांगतात, मी आता गोष्ट लिहायला बसलो आहे आणि जसजसे शब्द पूढे सरकता आहेत तसतसा भोवतालचा प्रकाश, सावल्या आणि रंग बेमालूम मिसळत आहेत. मी जी दृश्य घटना कल्पित आहे, त्यांना हा सूर्य हा प्रकाश हा पाऊस, नदीकाठचा वेळू, पावसाळ्यातले आकाश, हिरव्या पानानी आच्छादलेले खेडे, पावसानी समृध्द केलेली शेते यांची पार्श्वभूमी मिळून त्याचं वास्तव अधिक चैतन्यपूर्ण होत आहे….. या खेड्यातली निःशब्द ता जर मी वाचकांपुढे उभी शकलो, तर. माझ्या कथेतील सत्य क्षणार्धात त्यांना पूर्णपणे उमगेल…

फारा वर्षाने का होईना, महाकवी चे शब्द माझ्या समवेत घेते. त्यांच्या लेखणीच्या पर्णाछादित लेखणीच्या वाटा चालू लागते………. मृण्मयी चारुलता कादंबिनी यांच्या खेळात मीही सामील होते….

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares