मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया —  लेखक : अज्ञात ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

विश्वेश्वरैया यांचे वंशज —  लेखक : अज्ञात ☆ श्री सुनील देशपांडे

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

अभियंता दिनाच्या निमित्ताने आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचं स्मरण करतो.

या निमित्ताने आजवर अनुभवलेल्या.. विश्वेश्वरैया यांच्या काही खास अशा वंशजांची ओळख करून देत आहे.

() २०१६ साली कोल्हापुरात डॉ डी. वाय. पाटील यांना भेटायला एक VIP व्यक्ती हेलिकॉप्टरने आली होती. भेट झाल्यावर निघतांना हेलिकॉप्टर काही सुरु होईना. पायलट हेलिकॉप्टर कंपनीच्या टेक्निकल टीमशी बोलले पण  त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या VIP नां तत्काळ पुढे निघायचं होतं, त्यात कंपनीच्या टेक्निकल टीमला दुरुस्तीसाठी जागेवर यायला ३ दिवसांचा वेळ लागेल असं कळवलं.

परिसरात दुसरं हेलिकॉप्टरसुद्धा उपलब्ध नव्हतं. मग डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव श्री संजय पाटील यानी कोल्हापुरातील एका कार मिस्त्रीला तिथं बोलावलं. या मिस्त्रीने आयुष्यात कधी हेलिकॉप्टरला हातही लावला नव्हता. पण त्या अवलियाने अर्ध्या तासात हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला. पायलटने खात्री केल्यावर आलेली VIP मंडळी सुखरूपपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली. गंमत म्हणजे बेकायदा हेलिकॉप्टर दुरुस्ती केली म्हणून नागरी उड्डान मंत्रालयाने या मिस्त्रीची चौकशी लावली होती.

याच मिस्त्रीने २००६ साली भंगारात गेलेल्या एका कारमध्ये बदल करून ती कोल्हापुरात रंकाळ्याच्या पाण्यावर चालवून दाखविली होती… फिरोज मोमीन हा तो अवलिया.

()  विजार-शर्टातला ITI शिकलेला इचलकरंजीमधला एक तरुण ५० वर्षापूर्वी ४ सीटर इलेक्ट्रिक कार तयार करून शहरातून चालवत होता. सर्वजण कुतूहलाने पहात असतांना.. ” ही कार खंडाळ्याचा घाट चढणार का ?” असा टोमणा त्यातील एकाने मारला.. त्या तरूणाने कार चार्ज केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कार मुंबईत मंत्रालयासमोर उभी केली.

पुढे त्यांनी किमान जवळपास ५०  नवे शोध लावले, प्रत्येकाची एक इंडस्ट्री उभी केली, त्यातील काही कंपन्या जागतिक पातळीवर सुद्धा गेल्या.

१९७६ साली एका प्रख्यात जापनीज कंपनीला आपल्या एका प्रोडक्टच्या निर्मितीसाठी २० सेकंद लागणारं Cycle Time याने इचलकरंजीमध्ये  १२ सेकंदात बसवून दाखवलं.

जगप्रसिद्ध फाय ग्रुपचे संस्थापक श्री पंडितराव कुलकर्णी हे या अभियंत्याचं नाव.

()  युरोपमध्ये फिरता रंगमंच पाहून “तो मी नव्हेच” या नाटकासाठी तो महाराष्ट्रात बनवायचं स्वप्न घेवून नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आले होते. बऱ्याच अभियंत्यांना, रचनाकारांना आणि कंपन्यांना भेटून सुद्धा त्यांना हवं तसं डिझाईन मिळत नव्हतं. कोल्हापुरात एकदा प्रयोग संपल्यावर त्यांच्या एका मित्राने पणशीकरांना  एका लोहाराच्या पालावर नेलं.. पणशीकरांनी अगदी अनिच्छेने आपली संकल्पना त्याला समजावून सांगितली. त्या लोहाराने दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या फिरत्या चाकावर पुली आणि लिव्हर गिअर वापरून फिरता बहुमजली रंगमंचाचा मॉडेल चालवून दाखविला, जो पुढे पणशीकर आणि इतर सर्वच नाटककारांनी आपल्या वापरता आणला.

किर्लोस्करांनी डिझेलवर चालणारा जनरेटर मार्केटमध्ये आणला तेव्हा या लोहाराने कोळश्यावर चालणारा जनरेटर बनवला, जो डिझेल जनरेटरच्या दुप्पट कार्यक्षमतेने चालणारा आणि फक्त ३० % किमतीत बनवला होता.

ही असामी म्हणजे इयत्ता दुसरी शिकलेले म्हादबा मिस्त्री अर्थात महादेव शेळके.

()  उद्योगाची आणि अभियांत्रिकी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला, पाथरवट (वडार समाजातील एक उपजात) समाजातील एक तरुण दगड फोडता-फोडता, धरणाच्या कालवा खुदाईची कंत्राटे घेऊ  लागला. पुढे बंधारे, धरण, रस्ते, पाईपलाईनची कामे घेत, वस्त्रोद्योग, ऊर्जा, महामार्ग, बांधकाम यासारख्या क्षेत्रात त्याने आपला उद्योगविस्तार १००० कोटींच्याही पुढे नेला.

कित्येक उच्चशिक्षित अभियंत्याना घडवणारा बंडी, धोतर, गांधीटोपी वेशातला हा अशिक्षित पण विद्वान अभियंता म्हणजे रामचंद्र मारुती मोहिते 

()  सांगली जिल्ह्याच्या पेड गावातील चांभार कुटुंबातील एक युवक, मुंबईतील माझगाव डॉकवर वेल्डरचं काम करणाऱ्या आपल्या मोठ्या भावासोबत शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू झाला. तिथे काम करता-करता इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. देश-विदेशात काम करून व्यावसायिक अनुभव मिळवला. पुढे स्वतःची कंपनी सुरु केली (त्या कंपनीच्या नावात आपल्या सर्व भावांच्या नावाचा समावेश आहे) जिथे ४५०० लोक काम करतात आणि आजचा टर्नओवर ५०० करोड आहे.

२०१४ ला आपल्या भावाला मिरजेचा आमदार बनवला. बालपणी जाती-व्यवस्थेचे चटके खात ज्या गाव-विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायला मनाई होती त्याच गावात त्यांनी सार्वजनिक विहीर खोदून दिली.

हे आहेत मुंबईतील DAS Offshore चे श्री अशोक खाडे….

आणि DAS चा फुल्लफॉर्म आहेदत्ता, अशोक, सुरेश.

() टाटा मोटर्स मध्ये काम करणाऱ्या एका इंजिनीअरने टाटा एस्टीम या गाडीच्या निर्मिती प्रक्रीयेमध्ये आपलं कौशल्य वापरून कंपनीचे २. ५ करोड रुपये वाचविले. त्याच्या बक्षीसापोटी मिळणारं प्रमोशन नाकारून आपल्या गावाकडच्या अल्पशिक्षित तरुण मित्रांना कंपनीत नोकरी देण्यासाठी विनंती केली.

टाटा मोटर्सने ती आनंदाने मान्य केली आणि अल्पावधीत याद्वारे ३०० तरुणांना रोजगार मिळाला. यातूनच २००१ साली सेवा क्षेत्रातील एका नव्या व्यवसायाचा उदय झाला ज्याची मजल आज ७५, ००० लोकांच्या रोजगारापर्यंत येऊन पोचली आहे. पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, संसद भवन, सुप्रीमे कोर्ट, १०० एक महत्वाच्या खाजगी कंपन्या, १५ महत्वाची विमानतळे, ५० महत्वाची मंदिरे आणि अजून बरंच काही…..

२२ राज्यातील ७० शहरात कार्यालये उघडली. सोबत शेती, Life Science, महाराष्ट्र आणि जम्मू मधील १०८ Emergency Medical Service, मेगा फूड पार्क, न्यूक्लिअर सायन्सचे Peace Applications, शहरी कचरा व्यवस्थापन या आणि अशा अजून बऱ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली.

आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी या युवकाने आपल्या देशाच्या विकासाच स्वप्नं पाहून त्याच नावाने कंपनी स्थापन केली होती. आज याची वार्षिक उलाढाल २००० कोटींच्या पुढे आहे.

महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगतीत गेल्या ६० वर्षात महत्वाच योगदान दिलेल्या (हयात असलेल्या) ६० व्यक्तींमध्ये यांचं नाव अग्रक्रमावर येतं.

आपल्या व्यवसायामुळे १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले पाहिजेत, १० लाख लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपली कंपनी १०० देशात कार्यरत असली पाहिजे या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे, मानवता जपणारे आणि जगणारे, अत्यंत संवेदनशील आणि सदैव हसतमुख असणारे, मूळचे रहिमतपूरचे आणि VIT कॉलेजचे Electronics इंजिनिअर असणारे BVG म्हणजेच भारत विकास ग्रुपचे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड —-

— या सगळ्यांनी आम्हांला प्रेरणा दिली, आमचं जीवन सुखकर केलं आणि देशाच्या निर्मितीत भरीव योगदान दिलं.

हितीत असलेल्या, नसलेल्या अशा विश्वेश्वरय्यांच्या सगळ्याच खऱ्याखुऱ्या वंशजांना अभियंता दिनाच्या निमित्ताने मानाचा सलाम !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सीता सेतू ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सीता सेतू ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सीतामातेला सोडविण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या साहाय्याने लंकेपर्यंत पोहोचणारा सेतू बांधला म्हणून त्या सेतूला रामसेतू म्हणतात. आधुनिक काळातील एका सीतेनेही असाच एक सेतू उभारला…. त्याला “ सीता सेतू “ म्हणूयात का?  

दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट. केरळ राज्यातील वायनाड नावाच्या डोंगराळ भागातील काही गावे त्यांच्या पाठीशी असलेल्या डोंगरांनी आपल्या पोटात घेतली आणि नकाशातून ही सारी गावेच नाहीशी झाली… शेकडो लोक मातीच्या खाली गाडले गेले कायमचे. पावसाचे प्रचंड थैमान सुरु होते. सकाळी ही बातमी इतरांना समजली. सुरालमाला गावाजवळच्या मुन्दाकाई खेड्याच्या आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती. आणि मुख्य म्हणजे या गावांशी संपर्क करणयासाठी असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता. या गावांतील बचावलेल्या नागरीकांना मदत पोहोचवण्यासाठी काहीतरी तातडीने करणे गरजेचे होते. या गावांच्या जवळ पोहोचण्यासाठी पुलाची उभारणी करायला पाहिजे होती. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली आणि लष्कराला माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळूरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपने आपले सत्तर जवान आणि पुलासाठी अत्यावश्यक सारे साहित्य सुमारे २० गाड्यांमध्ये भरून रवाना केले.

या तुकडीचे नेतृत्व दिले गेले होते या तुकडीतील एकमेव महिला अधिकारी मेजर सीता अशोकराव शेळके या शूर महिलेकडे. या सीता ‘माई ‘ह्या अहमदनगर जिल्ह्यातील केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या गाडीलगाव या गावात अशोक भिकाजी शेळके या वकिलाच्या पोटी जन्मलेल्या चार अपत्यांपैकी एक. लोणी येथील प्रवरा इंजीनियारींग कॉलेजमधून त्यांनी (मेकॅनिकल)अभियांत्रिकी मधील पदवी प्राप्त केली. त्यांना अंगावर अभिमानाची, अधिकाराची आणि सन्मानाची वर्दी घालायची होती. म्हणून आधी त्यांनी आय. पी. एस. होण्यासाठी प्रयत्न केले. त्याच जोडीला भारतीय लष्करात दाखल होण्याचे प्रयत्न सुरूच होते. तिस-या प्रयत्नात त्या एस. एस. बी. परीक्षेत यशस्वी झाल्या आणि थेट गेल्या त्या चेन्नई मध्ये. ना प्रदेश ओळखीचा ना भाषा. परंतु सीतामाई डगमगल्या नाहीत. त्यांनी अत्यंत नेटाने कठीण लष्करी अभ्यासक्रम पूर्ण केला. व मद्रास इंजीनियरिंग ग्रुप मध्ये अधिकारी झाल्या. २०१२ पासून त्या सेवेत असून मेजर पदावर पोहोचल्या आहेत.

मेजर सीता शेळके यांनी आपल्या जवानांसोबत सतत ३६ तास पावसात, चिखलात उभे राहून काम केले. आपले सारे शिक्षण, ज्ञान, लष्करी प्रशिक्षण पणाला लावले. जवानांना त्या थंबी म्हणजे भाऊ म्हणतात! त्या सर्व भावांना प्रोत्साहित करत केवळ १६ तासांमध्ये हा १९० फूट लांबीचा लोखंडी पूल बांधून घेतला. या कामाच्या वेळी प्रचंड पाउस सुरू होता. पुराचे पाणी वाढत होते. मेजर जनरल व्ही. टी. थॉमस हे प्रमुख अधिकारी होते. मेजर अनिश मोहन कष्ट घेत होते. प्रमुख सर्वत्र चिखल, पुराचे वाढते पाणी, बघ्यांची गर्दी आणि पूल लवकरात लवकर बांधण्याचा ताण. सत्तर पैकी एकाही जवानाने तीन मिनिटांपेक्षा जास्त विश्रांती घेतली नाही, की आपले भिजलेले, चिखलाने माखलेले कपडे बदलण्यात वेळ घालवला नाही. जेवण, झोप हे त्यांच्या शब्दकोशातून त्यादिवशी गायब झाले होते…. निसर्गाशी त्यांची लढाई सुरू होती… Indian army never gives up! … १९० फूट लांबीचा, पुरेशा रुंदीचा, अवजड वाहनांचे वजन पेलू शकणारा मजबूत सेतू तयार झाला होता… मदतकार्य जोमाने सुरू होऊ शकले !

मेजर सीता अशोकराव शेळके… महाराष्ट्र कन्या.. तुम्हाला मानाचा मुजरा… salute officer! 

जय महाराष्ट्र ! जय हिंद ! जय हिंद की सेना !🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “OUTLET – –.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “OUTLET – –.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

… लाखो जीव घेणार्‍या क्रूर “हिटलरने” शेवटी आत्महत्या केली !.

सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.

मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे “स्वामी विज्ञानानंद”     मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे “ भैय्युजी महाराज ”    आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही “सुशांत सिंग राजपुतनं” नैराश्यातून आत्महत्या केली.

आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या “शीतल (आमटे) करजगी” आपलं जीवन संपवतात.

आजची नागपूरची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या डोक्यावर सुमारे १८० कोटी रुपयांचे कर्ज झाल्यामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केली.

 

– –  या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातून काय शिकायचं आपण?……..

पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरून शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.

माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय.. ? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.

 

भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्यानंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती. त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र – श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. “ भैय्यूजी महाराज ” स्वतः एक “ अध्यात्मिक  गुरू होते.. परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला त्याच्या जवळ outlet नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात – त्याचंही अगदी भैय्यु महाराजासारखं झाले.)

 

इतकं महत्वाचं असतं का हे outlet? …. तर होय.

कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outletच दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir 

… मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीर रूपी धरण फुटेल की राहील?

 

मुंबई का तुंबते? कारण पुरेसे outlets राहिले नाहीत  

म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet  वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध… वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा….. पिस्तुलाच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का?

          

म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट outlet परिवार आणि मित्र! 

हसा ! बोला ! रडा ! भांडा !व्यक्त व्हा !!  मुक्त व्हा.. !!  

 

काळजी घ्या – – 

सोडून गेल्यावर  ” ᴍɪss ʏᴏᴜ”  म्हणण्यापेक्षा ….

सोबत आहे तोपर्यंत ” ᴡɪᴛʜ  ʏᴏᴜ ” म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

बघता बघता गणपतीचे दहा दिवस संपत  येतात. दरवर्षी गणपती बाप्पा चे स्वागत आपण जोरात करतो आणि दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला त्याला निरोप ही देतो! “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात गणपतीचे विसर्जन होते. तो पाहुणा गणपती आपल्याला इतका लळा लावतो की त्याचे विसर्जन करताना खूप वाईट वाटते!

कोरोनामुळे गणपती उत्सवावर आलेल्या मर्यादा संपल्या आणि पुन्हा एकदा ढोल ताशांच्या गजरात, डॉल्बी म्युझिक मध्ये गणपतीचे आगमन झाले! तसाही माणूस उत्सव प्रिय असतो. त्यातून महाराष्ट्रात तर सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. तसेच कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणरायाला वंदन केले जाते. बुद्धी दाता गणेश आणि शक्ती स्फूर्तीदायी शिवाजी महाराज या दोन्हीचा जयजयकार महाराष्ट्रात होतो. या दोन्हीचा उद्देश समाजात स्फूर्ती राहावी, जिवंतपणा राहावा, समरसता यावी असाच आहे!

पण अलीकडच्या काळात या उत्सवांना काही वाईट गोष्टींची किनार लागलेली होती. कित्येक तास चालणाऱ्या मिरवणूका, सजावटी मधील अतिरिक्त स्पर्धा तसेच गुंडगिरी, दारू पिऊन नाचणे यासारख्या अनेक गोष्टी गणेशोत्सवा दरम्याने होऊ लागल्या.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की परमेश्वर तिथे हस्तक्षेप करतो असं मला मनापासून वाटतं!हे आपल्या ला कोरोनाच्या निमित्ताने बघायला मिळाले. अजूनहीघरगुती गणपती बसवतात तिथे गणपतीचे पावित्र्य टिकवले जाते.. सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी ही गणेशाचे पावित्र्य रहावे यादृष्टीने अनेक गोष्टी केल्या जातात. तरीही

काही वेळा स्वच्छतेसंबंधी गोष्टी लोकांकडून पाळल्या जात नाहीत. महानगरपालिका विसर्जनासाठी विविध ठिकाणी निर्माल्य कुंडआणि  विसर्जनासाठी पाण्याचे टॅंक  ठेवते, त्यामुळे आपोआपच एक प्रकारची शिस्त लोकांना लागली आहे. पुण्याचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर असतो आणि महाराष्ट्रातच काय तर देश परदेशातही त्याचे महत्त्व फार आहे!

दरवर्षी अनंत चतुर्दशी येते, गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी! पण काही वेळा हा दिवस अगदी लक्षात राहण्याजोगा गेला आहे,. जसे की लातूर, किल्लारीचा मोठा भूकंप अनंत चतुर्दशीच्या पहाटे झाला, हजारो लोक बेघर झाले, घरे कोसळली, लोक मृत्युमुखी पडले, पण त्या ठिकाणी सर्व समाजाने भरभरून मदत पाठवली. कधी कधी या काळात अतिरिक्त पावसामुळे पूर येणे, गावंच्या गावे पाण्याखाली जाणे यासारख्या घटनाही घडल्या. विघ्नहर्ता गणेशाने अशा काळात लोकांमध्ये एकमेकाबद्दल सहभावना निर्माण केली की ज्यामुळे लोकांना समाजभान आले. कित्येक ठिकाणी अशी संकटे येऊन गेल्यावर उत्सव खर्च कमी करून मदतीसाठी पैसा पाठवला गेला. श्री गजानन अशा गोष्टींना प्रेरित करत असतो असे वाटते..

वैयक्तिक पातळीवर गणेशाचा उत्सव हा घराघरात साजरा होतोच. त्यानिमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येते. एकमेकांबद्दल चे राग, द्वेष, मतभेद याचे विसर्जन माणूस करतो. यासाठी दुर्वा या प्रतीकात्मक आहेत. दूर्वा किंवा हरळी जशी जमिनीला चिकटून वाढत वाढत जाते, तसेच कुटुंबाने एकमेकांशी चांगले संबंध ठेवून हरळी प्रमाणे आपल्या समाज जीवनाचा विस्तार केला पाहिजे. दुर्वांप्रमाणेच चांगल्या भावना वाढीला लावल्या पाहिजेत! शाडू मातीचा गणपती आपण पाण्यात विसर्जन करतो पण ती माती विरघळून जशी पाण्यात तळाशी पुन्हा एकत्र येते, पुढच्या वर्षी नवीन निर्माणासाठी उपयोगी असते. तशीच आपली वृत्ती अधिकाधिक एकत्र येण्याची आणि चांगले निर्माण करण्याची राहण्यासाठी हा गणराया आपल्याला शिकवत असतो!

जाता जाता गणराया आपल्याला किती गोष्टी शिकवत असतो. इतर देवतांपेक्षा गणपती आपल्याला जवळचा वाटतो. त्याची प्राणप्रतिष्ठा करून आपण त्याला सजीव रूप देतो. लहान मुलाबाळां पासून सर्वांनाच गणपती बाप्पा जवळचा वाटतो. अलीकडे शाळांमध्ये सुद्धा गणपती स्थापन करतात. त्यानिमित्ताने अथर्वशीर्ष, गणपतीच्या आरत्या आणि काही स्पर्धांचे ही आयोजन करण्यात येते. नकळतच मुलांवर चांगले संस्कार घडतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण हा काही ना काही कारणाने धार्मिकते बरोबरच समाजाशी ही जोडलेला आहे. गणपतीचा संबंध बुद्धीशी जोडलेला असल्यामुळे सहाजिकच मुलांना बुद्धीदात्या गणपती बद्दल खूप प्रेम असते!

गणपती  विसर्जनासाठी उचलल्यानंतर ती जागा रिकामी राहू नये म्हणून त्या जागी एखादे देवाचे पुस्तक ठेवायचे प्रथा आमच्या घरी होती. प्रत्येक गोष्टीबाबत आपल्या पूर्वजांनी इतका बारीक विचार केला आहे याचे विशेष वाटते!

असा हा गणपती बाप्पा विसर्जन करताना  सर्वांनाच वाईट वाटते. यावरून मला महादेव शास्त्री जोशांची “मोरभट” म्हणून वाचलेली एक कथा आठवते. त्यातील कथेतील मोर भटजी गणपतीचे इतके भक्त होते की गणपती विसर्जनासाठी पाण्यात सोडला की त्यांना अक्षरशः रडू येत असे आणि तो रिकामा पाट घरी घेऊन येताना त्यांचे मन विषण्ण होत असे. पाट रिकामा घरी येऊ नये म्हणून त्या रिकाम्या पाटावर वाळू किंवा विसर्जनाच्या ठिकाणची माती घरी आणून तो पाट गणपती च्या जागी ठेवण्याची प्रथा आहे…

गणपतीचे विसर्जन म्हणजे त्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीला आपण पुन्हा त्याच्या मूळ अवस्थेला म्हणजेच पाण्यामध्ये, मातीत रूपांतर करून सोडून देतो. गणपतीचे हे विसर्जन आपल्याला थोडे विरक्त व्हायला शिकवते. या गणपती प्रमाणेच आपल्याला सुद्धा एक दिवस या माती आणि पाण्यात विसर्जित होऊन जायचे आहे, हे जग सोडून जायचे आहे याची जाणीव मनापासून होत राहते! अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन होताना खरोखरच अंतरीचा उमाळा भरभरून वाहतो आणि आपण म्हणतो, “गणपती बाप्पा मोरया” पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला!”

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘पितृपक्ष : कृतज्ञता पर्व‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

पितृपक्ष : कृतज्ञता पर्व ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

जगातील सर्वाधिक प्राचीन संस्कृती कोणती असा प्रश्न आपण google वर search केला तर त्याचे स्वाभाविक आणि एकमेव उत्तर येईल हिंदू संस्कृती!! आपली हिंदू संस्कृती नुसती पुरातन नाही तर ती सर्वसमावेशक, विज्ञानाधिष्ठीत, सनातन ( याचा खरा अर्थ नित्यनुतन असा आहे ), पर्यावरणाचे रक्षण करणारी (इको फ्रेंडली), ऐहिक सुख प्राप्त करून देऊन पारमार्थिक सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लावणारी, थोडक्यात सांगायचे तर ‘आपले घर ते संपूर्ण विश्व’ असा वैश्विक (global) विचार करायला प्रवृत्त करणारी शांतताप्रेमी संस्कृती आहे. आपली संस्कृती आपल्याला वेगवेगळे गुण विविध सणांच्या माध्यमातून नकळत शिकवीत असते, फक्त आपण आपले डोळे, कान उघडे ठेवायला हवेत. हल्ली आपल्याकडे संस्कार वर्ग घ्यावे लागणे किंवा संस्कार करावे लागणे हा एक सामाजिक आजार आहे, ही एक प्रकारची सामाजिक वेदना आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये. पूर्वी संस्कार घराघरातून आणि समाजाकडून आपसूक (नकळत) व्हायचे. संस्कार पानपट्टीवर विकली जाणारी वस्तू आहे का ? हजारो वर्ष परंपरा पाळूनझ एकप्रकारे तपश्चर्या करून  ते संस्कार मागील पिढी पूढील पिढीकडे ते संक्रमित करीत असते. ती साखळी तोडण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. मागील पन्नास-साठ वर्षात मात्र आपण हे संस्कार पुढील पिढीत संक्रमीत करण्यात अयशस्वी झालो की काय ? असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे, असे वाटते.

राम’दास’ असलेल्या हनुमंताला त्याच्या शक्तीचा विसर पडला होता, पण जाबुवंताने स्मरण करून दिल्यावर हनुमंताला त्याच्या शक्तीचा शोध लागला आणि तो पुन्हा आपल्या पूर्वीच्या विराट क्षमतेने कार्यरत झाला. आपल्याला ही आपल्या विराट हिंदुतेजाचा विसर पडला आहे, आजच्या काळातील जांबुवंत यथाशक्ती आपल्याला आपल्या शक्तीची आठवण करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण गंमत अशी आहे की आजचे समाजकंटक किंवा हितशत्रू विविध शक्कली लढवून त्या जांबुवंतालाच आणि पर्यायाने हिंदू समाजालाच तुच्छ लेखण्याचे काम इमाने इतबारे करीत आहेत. याचा परिणाम म्हणजे आपल्या परंपरा पाळण्याची आपल्याच मुलाना लाज वाटू लागली आहे. आपल्या श्रद्धास्थानांबद्दल आपल्याला लाज वाटणे ही आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे. काही रूढी काळाच्या ओघात चुकीच्या पद्धतीने रुजल्या असतील, काही कालबाह्य झाल्या असतील, पण त्याचा तपशीलात जाऊन अभ्यास न करता नुसती दूषणं देणं आणि अक्रियाशील राहणे हे आजच्या सुशिक्षित समाजास शोभणारे आहे का? आपण काय खावे ? कधी खावे ? दंत मंजन कोणते वापरावे इथपासून ते अंगाला कोणता साबण लावावा हे सुद्धा आजचे तथाकथित अभिनेते (idol) आणि अभिनेत्री ठरवतात आणि आपली तरुण पिढी त्याची री ओढते, याला स्वातंत्र्य म्हणायचे ? साधा विचारही आपल्याला सुचू नये की आपण उष्ण कटिबंधात राहतो, त्यानुसार आपली पोशाखरचना राहिली आहे आणि असायलाही हवी, पण आजची आपली पोशाख रचना पूर्णपणे पाश्चात्य झाली आहे. काय योग्य आणि काय अयोग्य, याचा विचार करायला आपल्याकडे वेळच नाही. आपण नुसते अंधानुकरण करीत आहोत, नाही का?

आपल्या संस्कृती उत्सवप्रधान आहे. प्रत्येक उत्सवातून योग्य तो सामाजिक संदेश देण्याचे काम केले गेले आहे. होळी आपल्याला वर्षभरातील वाईट विचार, वाईट आठवणी, वाद, हेवेदावे जाळून नष्ट करायला शिकविते, गुढी पाडवा चांगल्या गोष्टीची मुहूर्तमेढ रोवण्यास सांगतो, गोपाळकाला संघटन करायला आणि सर्वांची सुखदुःख वाटून घ्यायला (sharing) शिकवितो. हाच खरा समाजवाद आहे, ( कालमार्क्स ने बहुतेक श्रीकृष्ण चरित्र वाचलेलं असावं). गणपती नेतृत्वगुण शिकविणारा (leadership) आणि बुद्धिदाता आहे. पण, सध्या आपले उत्सव कसे साजरे करायचे हे आपण ठरवत नसून आजची प्रसारमाध्यमे ठरवत आहेत असे दिसते आणि त्याचे खापर मात्र आपल्या सनातन हिंदुधर्मावर फोडतात. आपणही हे स्वातंत्र्य अगदी सहजपणे मीडियाच्या हातात सुपूर्द केलं आहे. एखाद्या चित्रपटातील लोकप्रिय गीत आपण होळी, गणपती, गोविंदा कुठेही लावतो, त्या गीताचे बोल काय आहेत, त्याचा अर्थ काय आहे, संगीत कोणत्या दर्जाचे आहे, याचं थोडेही सामाजिक भान आपण पाळत नाही. कोणत्याही धार्मिक उत्सवाचा मूळ हेतू हा समाजातील सात्विकता वाढावी, मनुष्याच्या सृजनशक्तीला चालना मिळावी, सामाजिक ऐक्य वाढावे आणि एकूणच वातावरण मंगलमय व्हावे असा असतो. पण काही सन्माननीय अपवाद सोडल्यास  सध्याच्या सार्वजनिक उत्सवांचे किंवा अगदी खासगी उत्सवांचे स्वरूप बघितले तर तो सोहळा ( event) आहे की उत्सव आहे, हेच पटकन कळत नाही. त्यामुळे आपल्या सारख्या सामान्य मनुष्याचे मन मात्र सुन्न होत आहे. उत्सवाच्या निमित्ताने होणारी आर्थिक  ‘उलाढाल’ बघितली तर कोणताही देव त्या मंडपाच्या आसपास देखील फिरकेल असे वाटत नाही. आपण सर्वांनी निरक्षीर विवेक बुद्धीने आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे.

गणपती गावाला गेले की येणारा काळ मम्हणजे पितृपक्ष. लौकिक अर्थाने हा काही उत्सव नाही किंवा उत्सवाचा, सणांचा काळ नाही. पण या पितृपक्षात आपल्याकडे मृत्यू पावलेल्या पूर्वजांचे स्मरण करून सश्रद्ध अंतकरणाने श्राद्ध करण्याची पद्धती आहे. श्राद्ध करण्याची विशिष्ठ पद्धती पूर्वी विकसीत केली गेली. Hardware कोणतेही असले तरी त्यातील software एकच आहे आणि ते म्हणजे आपापल्या पुर्वजांबद्दल विनम्रतेने कृतज्ञता व्यक्त करणे. आपला जन्म होणं किंवा तो कोणाच्या घरी होणं हे आपल्या हातात नाही, माता पित्यांची निवड आपल्या हातात नाही, ती आपल्या पूर्वजांनी, आईवडिलांनी केलेली आपल्या वरील एक कृपाच आहे. ज्या घरात आपण जन्मास येतो त्या घराचं नाव, ऐश्वर्य, परंपरा आणि अशा सर्वच गोष्टी आपल्याला वारसाहक्काने मिळतात. त्या ऋणातून अंशतः मुक्त होण्याचा कालावधी म्हणजे पितृपक्ष. या कालावधीत जाणीवपूर्वक इतर शुभ कार्य करु नये असा संकेत अनेक वर्षे पाळला जायचा. खरं तर ह्या पितृपक्षास ‘निषिद्ध’ समजणे साफ चुकीचे आहे. वर्षातील ३६५ दिवसातील जेमतेम १५ दिवसांचा हा कालावधी आहे. एका अर्थाने हा कालावधी ‘आरक्षित’ आहे. या  काळातील वातावरण सुद्धा विशिष्ठ गोष्टीसाठी लाभदायक असते, आयुर्वेदातील तज्ञ आपल्याला आणिक माहिती देऊ शकतील. या काळात पित्त प्रकोप होतो आणि त्यासाठी भाताची ( तांदळाची ) खीर ही पित्तशामक आहे.

या पितृ पंढरवड्याचा आणखी एक अर्थ आहे, तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मागे वळून पाहताना आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करूयाच पण आपल्या व्यक्तिगत आयुष्याचे सिंहावलोकनही आपण या निमित्ताने करू शकतो. गुढीपाडव्याला जर आपण एखादा नवीन नियम केला असेल किंवा नवीन उद्योग सुरु केला असेल, तर हा कालावधी हिंदू वर्षाचा साधारणपणे मध्य आहे. मागच्या सहा महिन्यात आपण काय केले?, करू शकलो?, काय चुकलं?, काय बरोबर झालं ? या सर्वांची वस्तुनिष्ठ उजळणी आणि आढावा घेऊन आपण आणखी  नव्या उमेदीने कार्यास लागलो तर यशाची दसरादिवाळी नक्कीच आपल्या आयुष्यात येईल. समर्थानी अखंड सावधान राहावे’ असे सांगितले आहे ते यासाठीच. दैनंदिन आयुष्यात आपल्याला बऱ्याच लोकांची हस्ते परहस्ते मदत होत असते. आपण विमान, ट्रेन, रिक्षा, बस, टॅक्सी अशा विविध वाहनांनी गरजेनुसार प्रवास करीत असतो. त्या वाहनांच्या चालकाचे नाव देखील आपल्याला माहित नसते, पण हे सर्व जण आपल्याला आपल्या गंतव्य स्थानी सुखरूप नेऊन सोडत असतात, तसेच आपला दूधवाला, फुलपुडी देणारा, डॉक्टर, किराणा माल पुरविणारा, वकील, मोची, भाजीविक्रेता आणि समाज जीवनाचे विविध घटक आपले जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी सतत झटत असतात. या सर्वाप्रति कृतज्ञता असणे आणि किमान वर्षातून एकदा ते  व्यक्त करणे आपले आद्यकर्तव्यच नव्हे काय ?

सर्वसाधारणपणे अमुक एक गोष्ट केली की काय फळ मिळते असा प्रश्न प्रत्येक कर्म करताना सामान्य मनुष्याच्या मनात येतो. वरील लेख वाचताना हाच प्रश्न आपल्या सारख्या सुजाण वाचकांना पडू शकतो. मलाही हे सांगताना आनंद होत आहे की वरील लेख वाचून काय होईल ते माहित नाही पण त्यानुसार आपल्याला कृती करता आली तर मात्र ज्ञानेश्वर माउलींनी पसायदानात 

सांगितल्याप्रमाणे  “भूतां परस्परे पडो। मैत्र जीवांचे।।” याची अनुभूती येईल आणि आत्यंतिक मानसिक समाधानाचा लाभ होईल यात तिळमात्र संदेह नाही.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गणराज आला… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ गणराज आला … ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

सकाळी जाग आली ती या ओळी गुणगुणतच…

दोन ओळी सुचल्या त्या काम करता करता गुणगुणत राहिले. आणि पुढे इतकं काही सुचू लागलं की काम बाजूला ठेवून मला त्या लिहून काढाव्या लागल्या. पूजा करतानासुद्धा इतकी तन्मयता झाली असेल की नाही माहिती नाही, पण या ओळी लिहिताना मात्र एक विलक्षण तन्मयता, आनंद, चैतन्य जाणवत होतं. लिहिल्यावर जाणवलं की ही एक साधीसुधी आरती म्हणता येईल अशी रचना आहे. गणपतीची विविध नावं यात गुंफली गेली आहेत.

गणेशाने हे काम करून घेतलं असावं.

अबीर गुलाल उधळीत आमुचा ‘गणराज’ आला|

आमुचा ‘गणपती’ आला||

*

ढोल, ताशे, झांजांचा नाद ‘विनायका’ तव त्रिभुवनी निनादला|

नाद तव त्रिभुवनी निनादला||

*

दारी सडा रांगोळी तोरण सजले ‘गजानना’ तुज स्वागतासाठी|

गजानना तुज स्वागतासाठी||

*

धूप, दीप, अत्तर, गुलाब ‘हेरंबा’ तुज वाहतो दुर्वांच्या राशी|

वाहतो मस्तकी दुर्वांच्या राशी||

*

मोदक लाडू पेढे ‘लंबोदरा’ पंगत प्रसादाची,

वाढली पंगत प्रसादाची|

*

म्हणू आरती करु प्रार्थना ‘एकदंता’ तव चरणापाशी|

प्रार्थना तव चरणापाशी||

*

बुद्धी, शक्ती अन् कलेचे ‘विनायका’ लाभो वरदान आम्हाला|

देशी वरदान आम्हाला ||

*

‘भालचंद्रा’ तव कृपेने सौख्य- सुख-शांती लाभो भक्तांना|

लाभो आम्हा भक्तांना||

*

जळो भेदभाव नुरो वासना ‘विघ्नेशा’ अहंकाराला दे आमुच्या मुक्ती|

आम्हास दे आता मुक्ती ||

*

चराचरातील तुझ्या रूपाशी ‘गजवक्रा’ राहो सदा प्रीती||

‘गौरीपुत्रा’ राहो सदा प्रीती||

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गौरीमायला निरोप…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गौरीमायला निरोप…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सोन्या रुप्याच्या पावलांनी गौरी घरात आल्या. प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींच आगमन होतं घरी… किती भाग्याची गोष्ट आहे ना… सगळं घर त्यांना फिरून दाखवलं. दोघींना  नीट बसवलं. दागिने हार घातले. आरती, मंत्रपुष्पांजली झाली. आल्या दिवशी साधी भाजी भाकरी ती दाखवून झाली. दूध देऊन दोघींना आराम करायला सांगितलं.

दुसऱ्या दिवशीची लगबग सुरू झाली. पुरणावरणाचा स्वयंपाक, भाजी, कोशिंबीर, भात वरण, दोघींचा चेहरा तृप्त दिसत होता. गौरी  प्रसन्न हसतमुख दिसत होत्या. घरात आनंद उत्साह  भरला होता.

तो दिवस गडबडीतच गेला. रात्री निवांत  दोघींसमोर बसले… मनातलं तिला ओळखता येतच…. तरी सांगितलं… तिच्याशी बोललं की मन  शांत  होत.

तीन दिवसांच्या पाहुण्या म्हणून  आलेल्या गौरी….. निघाल्या की परत…. मुरडीचा कानवला, दहीभाताचा नैवेद्य दाखवला. अक्षता टाकल्या… जाता जाता  निरोप देताना म्हटलं..

…. “ आई… क्षणभर जरा थांब ग.. तुझ्या लेकीबाळींचा निरोप सांगते तुला…  गौरी माय तू यायच्या आधीच आम्हाला शहाणं केलं होतंस.. त्यामुळे तुझं सांगणं  सगळ्यांनी ऐकलं बरं का… त्यामुळे आम्ही अन्न वाया  नाही घालवलं.. मोजकच केलं.. खूप जणींनी  मला हे सांगितलं. त्यांचा  स्वयंपाक  लवकर झाला. एका ताईंची सवाष्ण दरवर्षी अडीच वाजता  जेवायची. यावर्षी त्यांनी तुला बारालाच नैवेद्य दाखवला. तुझी आरती करून साडेबाराला घरच्यांना जेवायला वाढलं. खूप आनंदानी ताईंनी मला हे सांगितलं.

लेकी सुनाच घरच्या लक्ष्मी आहेत ते सर्वांना  फार  पटलं बघ… किती जणींनी पहिल्यांदाच तुझ्यासमोर बसून श्रीसूक्त, देवी अथर्वशीर्ष, नवीन नवीन आरत्या म्हटल्या. तुझी गाणी गायली.. तू  ऐकली  असशीलच  तरीपण सांगते ग आई…

…. बऱ्याच जणी शहाण्या आणि सुज्ञ झाल्या. तू सांगितलं तसंच वागल्या… घरचे पण आनंदित झाले.

हळूहळू  जमेल तसा थोडा थोडा बदल करत आहेत.. सगळ्याजणी…. रूढी, परंपरा, रीती, रिवाज यांचा पगडा मनावर अजून खूप आहे. नव्हे.. त्याचे दडपण  आहे. बदल करताना  मनात अजून  भीती मात्र आहे ग……

… काय होतं आई खरं सांगू का… बदल केला आणि काहीतरी विपरीत घडलं की वाटतं आपण बदल केला म्हणूनच  हे असं झाल. लगेच मनात संशय येतो देवी  किंवा देव आपल्यावर  कोपला तर नसेल…

आमचं कसं आहे.. आमची प्रगती, भरभराट झाली, चांगल्या गोष्टी घडल्या की आम्हाला वाटतं ते आमचं कर्तृत्व….. माझ्यामुळेच ते झालं.. मी कष्ट केले म्हणून ते झालं.. अस आम्ही म्हणतो..

तेव्हा” ही देवाची कृपा “अस क्वचितच म्हणतो….. पण विपरीत काही झालं की आम्ही आपलं देवावर  ढकलून देतो… हे अगदी खरखुर आमच्या मनातल आज तुला सांगते बरं का…

…. पण आता नाही…. आता आम्ही शहाणे होऊ… तू सांगितलं आहेस तसेच वागू…. तसं  तुला आश्वासन देते…. भेटूया आता पुढच्या वर्षी….. पुनरागमनायच…. “ 

.. असं म्हणेपर्यंत डोळे भरून आले होते. घर शांत झालं होतं. त्यांचं येणं आनंदाचं, सुखाचं समाधानचं असतं. घर भारुन टाकणार असतं. इतर कशाचीच आठवण या तीन दिवसात येत नाही. त्याच्याभोवतीच मन फिरत असतं. हे दिवस झटकन  जातात..

…. आता लक्षात येतं… त्यासाठीच गौरी घरी येतात.. मन तृप्त करायला.. भरपूर सुख आनंद द्यायला…

 राहिलेले दिवस त्यांच्या आठवणी काढत  जातात.. सुखदुःख, राग, लोभ, करत  संसार चालूच राहतो……

हात जोडून तिला सांगितलं…… “ गौरीमाय तू अपार सुख देणारी आहेस. तुझा आशीर्वादाचा हात  सदैव आमच्या पाठीवर असू दे. हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना. तू  साथीला असलीस की आम्हाला बळ येतं ग माय… “ 

.. तुझ्याच लेकीबाळी…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गणपतीच्या आराशीत नाट्यसृष्टीचं मिनिएचर – लेखक – श्री महेश कराडकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ गणपतीच्या आराशीत नाट्यसृष्टीचं मिनिएचर लेखक – श्री महेश कराडकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

परवा मी आणि आशा शिवाजी मंडईत भाजी आणायला गेलो होतो. तो  गणपती उत्सवाचा सहावा दिवस होता. तिथं शिरीष रेळेकर नेहमीप्रमाणे हमखास भेटायचाच. अतिशय शिस्तबद्धपणे आपली ट्रॅव्हल एजन्सी चालवणारा शिरीष आज लवकर शटर ओढून लगबगीने कुठं चाललाय म्हणून मी त्याला टोकलं. तर म्हणाला, संजय पाटलांच्या घरी गणपतीचा देखावा बघायला चाललोय, आम्ही सगळे मित्र. !फेसबुक वर त्यांनी टाकलंय ते बघा…

संजय पाटील म्हणजे कसदार लिहिणारा, उत्तम अभिवाचन करणारा, नाटक चळवळीत अतिशय गांभीर्यानं आणि जबाबदारीनं वावरणारा, आकाशवाणीतून स्वेच्छा निवृत्त होऊन आपल्याला हवंय तसं कलंदर जगणारा आमचा मनस्वी दोस्त! गेली तीन-चार वर्ष तो आणि त्याचा मुलगा सारंग आपल्या घरातल्या गणपतीची आरास खूप वेगळ्या पद्धतीने सजवतात. गेल्या वर्षी त्याने सांगली संस्थानच्या गणपती पंचायतन मंदिराची प्रतिकृती केली होती. त्याच्या आधीच्या वर्षी विठ्ठल आणि तुकाराम हा विषय घेऊन आरास मांडलेली. त्याही आधी कॅमेरा ही संकल्पना घेऊन घरातलं गणपती डेकोरेशन केलेलं. यावेळी नक्कीच काहीतरी खास असणार म्हणून तिथूनच त्याला फोन लावला. म्हटलं, ‘संजयराव सगळा गाव संस्थानच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक बघायला… नाहीतर सार्वजनिक मंडळांचे देखावे बघायला झुंडीने जातो हे माहित होतं. पण ही सगळी गर्दी तुझ्या घराकडे का चालली आहे, बाबा!… तुझी परवानगी असली तर आम्ही पण येतो रात्री.’

रात्री चिन्मय पार्कमधल्या त्याच्या घरातल्या हॉलमध्ये दहा बाय सहाच्या अडीच फूट उंचीच्या त्या स्टेजवर अवघी नाट्यपंढरी साकारलेली पाहिली आणि थक्क झालो. तिथं महाराष्ट्राच्या  नाट्य इतिहासातले गाजलेले नऊ रंगमंच दोन टप्प्यात बसवले होते. त्यातील प्रत्येक रंगभूमीवर विष्णुदास भावे यांच्या पहिल्या नाटकाच्या खेळातल्या नांदी पासून मराठी नाटक परंपरेच्या समृद्ध प्रवासात मैलाचा दगड ठरलेल्या नऊ नाटकातले नऊ प्रसंग, त्यातल्या हुबेहूब नेपथ्यासह आणि पात्रांसह मांडलेले होते… आणि हे सगळं प्रत्येकाला नीट समजावं, म्हणून बारा मिनिटांचा एक शो प्रदर्शित होत होता.

सुरुवातीला खोलीत अंधार व्हायचा. आणि फक्त मधला गणपतीची शाडूची मूर्ती असलेला रंगमंच उजळायचा. दीड बाय दोन फुटांच्या त्या बॉक्स मधल्या रंगमंचावर शाडूच्या मूर्तीसमोर संगीत नाटकातली असंख्य पात्रं एकत्रितपणे नांदी म्हणत असलेला प्रसंग डोळ्यासमोर आला. नांदीतील त्या गणेश स्तवनाने क्षणात मन शे-दीडशे  वर्षांची संगीत नाटकांची सफर करून आलं. संजय पाटलांच्या निवेदनातून एकेक गुपित उघड व्हावं तसं एक एक नाटक उलगडायचं… आणि तो रंगमंच उजळून निघायचा. तिथल्या प्रवेशानुसार असलेले संवाद ऐकू यायचे. पहिल्या रंगमंचावरील प्रकाश मंद होत बंद व्हायचा आणि दुसरा ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा. ‘नटसम्राट’मधील दृश्याबरोबरच श्रीराम लागूंचा पल्लेदार आवाज कानावर यायचा. त्या रंगमंचावरील संवाद संपता संपता तिसरा दामोदर हॉल, मुंबईचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा आणि सखाराम बाईंडर मधील निळू फुले बोलू लागायचे. त्यानंतर यशवंत नाट्यमंदिर, मुंबईच्या रंगमंचावर ‘गेला माधव कुणीकडे’ दिसू लागायचं. ऐकू यायचं. ते संपता संपता रवींद्र नाट्य मंदिरचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा… आणि ‘अश्रूंची झाली फुले’मधील काशिनाथ घाणेकर लाल्या होऊन बोलू लागायचे. मग नुकत्याच जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातला पूर्वीचा रंगमंच प्रकाशमान होत श्रीमंत दामोदर पंतांच्या भूमिकेतला भरत जाधव बोलू लागायचा. मग ‘चार चौघी’तला तो जळजळीत डायलॉग कानात शिरत पुण्यातलं बालगंधर्व  नाट्यमंदिर उजळून निघायचं. त्यानंतर पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वाडा चिरेबंदीचा सेट दिसायचा, पात्रं बोलू लागायची. पुढे सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रा. अरुण पाटील दिग्दर्शित ॲमॅच्युअर ड्रामॅटिक असोसिएशनच्या ‘तू वेडा कुंभार’ या व्यंकटेश माडगूळकरांच्या नाटकातील प्रसंग उभा रहायचा. आणि सगळ्यात शेवटी संजय पाटील यांचा सुपुत्र सिनेमॅटोग्राफर, नेपथ्यकार ज्याला नुकतंच एका शॉर्ट फिल्म साठी जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक प्रतिष्ठेच्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये एका शॉर्ट फिल्मसाठी विशेष अवार्ड मिळालं आहे… अशा सारंग पाटील यांनी केलेल्या व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘वाटसरू’ या नभोनाटयाचं नाट्यमंचीय रूपांतर सादर व्हायचं.

हे सगळंच अद्भुत होतं. जणू अवघी नाट्यसृष्टीच त्या एका छोट्याशा स्टेजवर साकार झाली होती. दीड बाय दोन फुटाच्या प्रत्येक रंगमंचावरची पात्र, त्या पात्रांच्या प्रमाणात असलेल्या रंगमंचावरील

 नेपथ्यामधील वस्तू, इमारतींचे भाग… सगळंच अद्भुत! लहानपणी आपण किल्ले करत आलो, त्या किल्ल्यांच्या पलीकडले खूप    ॲडव्हान्स्ड, प्रगत असं रूप म्हणजे संजय पाटलांच्या घरात गणपतीच्या आराशीतून काळाच्या पडद्याआड गेलेला पण मिनीएचर सारख्या एका लघु रंगमंचावर प्रसन्नपणे आविष्कृत होणारे ते नऊ देखावे. जणू एखाद्या व्यापारी पेठेतील प्रमुख रस्त्यावरच्या, भव्य-दिव्य सार्वजनिक गणपती मंडळाचा देखावाच त्या दहा बाय सहा च्या घरगुती स्टेजवर साकार झाला होता. संकल्पक सारंग पाटील, नेपथ्यातील वस्तू तयार करणारा त्याचा मित्र आकाश सुतार, स्टेज  तयार करणारा राजू बाबर, प्रकाशयोजना करणारा कौशिक खरे आणि सारंग चे आई वडील म्हणजेच संजय पाटील आणि सौ. जाई पाटील हे हौशी आणि प्रयोगशील दांपत्य या सर्वांनीच हा गणपती उत्सव आजच्या घडीला कसा साजरा करायला हवा याचा एक नवा आदर्श धडाच समाजाला घालून दिला आहे… आज  गोंगाटात उद्देश हरवून बसलेल्या, विकृतीकडे झुकलेल्या, उत्सवांच्या बदलत्या स्वरूपातून बाहेर पडून तुमच्या आमच्यासारख्यांना दाखवलेला आशेचा समृद्ध असा नवा किरण आहे. त्याबद्दल पाटील परिवाराचे खूप खूप आभार!

लेखक – श्री महेश कराडकर

प्रस्तुती : श्री अमोल केळकर 

#माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.in,

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

kelkaramol.blogspot.com 

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्यात नवीन निनावी व्हायरस – लेखिका – सुश्री प्रिया माळी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्यात नवीन निनावी व्हायरस – लेखिका – सुश्री प्रिया माळी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

हा प्रसंग माझ्या घरातच घडला आहे. सोमवार दि. 29/7/2024 रोजी सकाळी 8. 00 वाजताच माझ्या आईचा फोन आला. मला कसे तरी होत आहे. मी लगेच चिंचवडवरून आईला पुण्यात आणले. डायरेक्ट जहांगीर हाॅस्पीटल गाठले. वरवर पहाता आईला विशेष काही झाल्याचे जाणवत नव्हते. डाॅक्टरांनी जुजबी औषधे दिली. आता 29, 30, 31 जुलै त्या औषधांवर उपचार चालू होते. पण या काळात  खाल्लेले अजिबात पचत नव्हते अगदी औषधेही पचत नव्हती. शुगर व डायबेटीसच्या गोळ्या अख्ख्याच्या अख्खया उल्टीवाटे बाहेर पडत होत्या. परत 1 ऑगस्टला जहांगीर हाॅस्पिटल गाठले. हाॅस्पीटलमध्ये अक्षरश पाय ठेवायलाही जागा नव्हती. रूम शिल्लक नाही, डे केअर काॅट शिल्लक नाही….

सगळ्यात विदारक परिस्थिती म्हणजे आठ दिवसांपुर्वी बायपास झालेल्या एका रूग्णाला घेऊन त्यांचे नातेवाईक आले होते. पण त्या पेशंटसाठीही बेड शिल्लक नव्हता. त्यालाही हाॅस्पीटल ॲडमिट करून घेत नव्हते. त्यामानाने आमची केस वरवर फार सोपीच वाटत होती. डाॅक्टरांनी आम्हाला सांगितले तुमचा पेशंट दुसरीकडे कुठेही न्या. आम्ही इथे औषध उपचार करणार नाही…

आता ओळखीने कोणत्या हाॅस्पीटलमध्ये बेड शिल्लक आहे का हे पहाणे सुरू झाले. रूबी, मंगेशकर, पुना हाॅस्पीटल, जोशी कुठेच बेड शिल्लक नाही. शेवटी काॅरपोरेशनचे एक डाॅक्टर त्यांच्या ओळखीने वडगाव शेरी येथील सिटी केअर मध्ये ॲडमिट करता येईल असे कळाले….

तो पर्यंत केस हातातून निसटत चालली होती. आईची शुध्द हरपली. ॲम्ब्युलन्सला बोलावूनही ॲम्ब्युलन्स आलीच नाही. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. शेवटी मलाच गाडी काढून हाॅस्पीटलपर्यंत आईला न्यावे लागले. आय. सी. यू. त दाखल करावे लागले. तिथे एम. आर. आय. व इतर टेस्टची सोय नाही मग डाॅक्टरच्या चिठ्ठ्या घेत आमची यात्रा सुरू झाली. मोठ मोठे हाॅस्पीटल पण पेशंट आपल्या दवाखान्यात येत आहे हे नुसते बघणारा स्टाफ. शेवटी एकेकाला कामाला लावत सगळ्या टेस्ट पुर्ण केल्या. कशातच काही आढळले नाही. परत आय. सी. यू. सलाईन N. S इत्यादी सोपस्कार चालूच होते. रात्रंदिवस आम्ही दवाखान्यात थांबलेलो. काय झाले  हे कळत नव्हते. थोडे फार सोडियम कमी झाले होते पण त्याने मेंदूवर अटॅक झाला होता. लोक ओळखण्यात अडचण येत होती. रात्र दिवस कळत नव्हते, खाण्या पिण्याचे भान नव्हते. जेवायला दिले तरी आत्ताच तर जेवले ना मी असे सांगत आई चालढकल करू लागली. नंतर नंतर बोलणेही दुरापास्त झाले. दवाखान्यात आजूबाजूला पाहिले तर असेच सगळे पेशंट. सत्तरच्या पुढचे सगळे. उलट्या व विस्मरणाने हैराण पेशंट…..

डाॅक्टरांना खोदून खोदून विचारल्यावर व्हायरल आहे एवढीच माहिती देत होते. पण व्हायरस unknown आहे हे सांगत होते. एवढ्यात….

दोन पेशंट दगावले व ओळखीमधले दोन जण दगावले. आता डाॅक्टरही अंदाजाने औषधे म्हणजे फक्त सलाईन व सोडियम सलाईन लावत होते. एका हाताला एकाच वेळेला दोन बाटल्या या प्रमाणे दोन हातांना चार बाटल्या चालू होत्या. नंतर तर पायातूनही सलाईन चालू केले. बरेच सलाईन कॅथेटरमार्फत युरिनवाटे बाहेरच पडत होते. आता कोणत्याच टेस्ट शिल्लक राहिल्या नव्हत्या.

आता अधून मधून शुध्दीवर आल्यावर आईचा घोषा सुरू झाला तुझ्या घरी मला ने. मी तुझ्या पाया पडते अशी विनवणी सुरू झाली. शेवटचा उपाय म्हणून काहीतरी सांगायचे म्हणून सांगितले तू चालल्याशिवाय डाॅक्टर  घरी सोडणार नाही म्हणाले आहेत. त्यासाठी तुला थोडे खावे लागेल हे सांगितल्यावर जिवाच्या निकराने आईने नारळपाणी एकदाचे संपवले आणि दोन तासांनी पाच सहा पावले एकदाची चालली. हट्टाने घरी आली. येताना मणिपाल हाॅस्पिटलमध्ये न्युरोसर्जनची अपाॅईंमेंट घेतली. तिथेही सगळे ओ के च रिपोर्ट आले. एकदाचे घरी आल्यावर एक दोन दिवसात एकदम ओ के झाली. आत्ता बरी आहे. पण…..

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजही डाॅक्टर खाजगीत हेच सांगत आहेत की  हा unknown virus आहे. यावर अजून तरी औषध नाही. सलाईन हाच मार्ग अवलंबावा लागत आहे. तसेच यापुढे गौरी गणपती व इतर सणांच्या काळात ह्या व्हायरसचे संक्रमण वाढणार आहे. पण सरकारी यंत्रणेने जी घोषणा करणे आवश्यक आहे ती केली जात नाही. तरी…….

सगळ्यांनी मास्क लावा, अनावश्यक गर्दीत जाणे टाळा. अंगावर दुखणे काढू नका. हे माझे नाही तर डाॅक्टरांचे सांगणे आहे. फक्त हे सांगणे खाजगीत बोलले जाते हे लक्षात घ्या….    

लेखिका : सुश्री प्रिया माळी

पुणे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्ण — एक विचार… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

कृष्ण — एक विचार… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी

हे नाथ नारायण वासुदेव

कृष्ण नामाचा हा जप मुखाने गात राहिले की भरकटलेल्या मनाला एकदम उभारी येते असा माझा नित्याचा अनुभव आहे. का बरे असे होत असावे? याचे उत्तर एकच!

कृष्ण ही एक अद्भुत शक्ती आहे, आत्मतत्त्व आहे, परब्रह्म आहे.

 परित्राणाय साधुनाम्

 विनाशायाच दुष्कृताम्

 धर्मसंस्थार्पनार्थाय संभवामि युगे युगे

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी पार्थ अर्जुनास असे वचन दिले आहे. संत जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्याकरता आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी मी युगानुयुगे येतच राहणार, अवतार घेतच राहणार.

बंदीवासात टाकलेल्या देवकीची एकापाठोपाठ एक सात मुले तिच्या भावाने, कंसाने मारल्यानंतर या कंस मामाचा, या दुष्ट शक्तीचा विनाश करण्यासाठी आठव्या कृष्णाचा जन्म झाला. श्रावण वद्य अष्टमी, मुसळधार पावसाने या बाळकृष्णाचे स्वागत केले. याच वेळी गोकुळात नंद आणि यशोदेस कन्यारत्न प्राप्त झाले. वसुदेवाने या आठव्या बाळाला वाचविण्यासाठी टोपलीत घालून भर पावसात पूर आलेल्या यमुना नदीतून गोकुळात नेले. बाळाच्या पावलाच्या अंगठ्याचा पाण्याला स्पर्श होताच यमुना नदी दुभंगली आणि रस्ता तयार झाला. यशोदेच्या पुढ्यातील कन्या, नंदा हिला घेऊन वसुदेव परत येऊन दाखल झाला. कंस त्या बाळाला आपटून मारणार एवढ्यात त्या बालिकेचे विजेत रुपांतर झाले आणि कडकडून आकाशवाणी झाली, ” हे कंसा! तुझा काळ गोकुळात वाढत आहे. ” ही कथा आपण सर्वजण जाणतो. सांगायचा मुद्दा हा की ही किमया त्या ईश्वरी शक्तीचीच आहे. कृष्णाचीच आहे. देवकीच्या उदरी जन्माला आलेले हे बाळ सामान्य नसून दैवी आहे.

आपण म्हणतो,…..

 कुठे शोधिसी रामेश्वर अन्

 कुठे शोधिसी काशी

 हृदयातील भगवंत राहिला

 हृदयातून उपाशी

भगवंत आपल्या हृदयात आहे असे समजूनही, मान्य करूनही हृदयस्थ परमेश्वराची पूजा करणे आपल्याला जमत नाही. यासाठीच या भगवंताची विविध सगुण रूपे आपण समोर ठेवतो आणि त्याची भक्ती भावाने पूजा करतो. या हृदयातील भगवंताला आपण कधी बाळकृष्णाच्या रूपात पाहतो. ते बाळ लेणी घातलेले गोड गोंडस रूप पाहून मन प्रसन्न होते. गोपाळांसंगे गाई चरायला नेणारा, दह्यादुधाची मडकी फोडून चोरून नवनीत खाणारा, उपरांत मैया मै नही माखन खायो असे म्हणणारा, कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण आपण पाहतो आणि उल्हसित होतो.

राधेचा कृष्ण, मीरेचा कृष्ण, यमुनाजळी गोपींसंगे रासक्रीडा करणारा कृष्ण, गोपींची वस्त्रे पळवणारा कृष्ण आणि बासरीच्या सुराने आसमंत धुंद करणारा मुरलीधर कृष्ण, कोसळणाऱ्या पावसापासून नगरजनांचे रक्षण करणारा गोवर्धन गिरीधारी कृष्ण आणि बंदीवासातील सोळासहस्त्र स्त्रियांचा उद्धारक कृष्ण अशी कृष्णाची विविध रूपे आपण पाहतो आणि हरखून जातो. सत्यभामेच्या अंगणात पारिजातकाचे झाड लावून त्याच्या सुगंधित फुलांचा सडा रुक्मिणीच्या महालात पडावा अशी किमया करून एकाच वेळी दोन्ही राण्यांना

संतुष्ट करणाऱ्या कृष्णाला काय म्हणावे? या कृष्णाच्या लीलाच अगम्य! खरं सांगायचं तर हे तत्त्वच अत्यंत दुर्बोध आहे.

दुर्योधनाचा अत्याचार थांबविण्यासाठी पांडवांच्या पाठी उभा असलेला कृष्ण तर संपूर्ण वेगळा. दुर्योधनाला शस्त्रास्त्रे पुरवून हा श्रीकृष्ण जातीने पांडवांसोबत उभा राहिला. या द्वारकेच्या राण्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले.

कुरुक्षेत्रावर मध्यभागी रथ उभा केल्यानंतर आपल्याच भाऊ बंधाना, पितामह भीष्मांना, गुरु द्रोणाचार्यांना समोर पाहून अर्जुन संभ्रमित झाला, आणि मी यांना कसे मारावे? त्यापेक्षा भिक्षान्न सेवन करणे मी पसंत करेन असा विचार अर्जुनाच्या मनात आल्यावर त्याला गीता सांगणारा कृष्ण कोण होता? कृष्ण हा परमोच्च कोटीचा विचार! मारणारा तू कोण? या ठिकाणी गीतेच्या उपदेशाचा प्रारंभ होतो. शरीर आणि शरीरी यातील फरक श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला. शरीर हे विनाशी आहे तर शरीरी अविनाशी आहे. तेव्हा समोर असलेल्या या शरीरांचा नाश ठरलेलाच आहे. तुझे काम फक्त विहित कर्म करण्याचेच आहे.

 अविनाशी तु तत्विद्धी ये न सर्वमिदं ततम्

 विनाशमव्यव्स्याय कश्चितकर्तुमर्हति 

 त्या अविनाशी तत्वाला समजून घे. संपूर्ण संसार याच तत्त्वाने व्यापलेला आहे. या तत्त्वाचा कोणीच विनाश करू शकणार नाही हे फार मोठे सत्य श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि पर्यायाने आपल्यालाही सांगितले आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन अर्थात कर्तव्य कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, त्यापासून मिळणाऱ्या फळात नाही. कर्म फळाचा हेतू कधीही मनात आणू नकोस, या अशा उपदेशाने आपल्या सामन्यांनाही कृष्णाने जागृत केले आहे.

गीतेच्या अकराव्या अध्यायात श्रीकृष्णाने पार्थास विश्वरूप दर्शन दिले. ते पाहून पार्थ भयभीत झाला. यातून इतकेच समजायचे की जनतेच्या रक्षणासाठी संपूर्ण विश्वात, चराचरात हे कृष्णतत्व सामावलेले आहे.

कृष्ण हे एक सत्य आहे. सत्य हे अखंड आणि अविनाशी आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात…

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ

श्रीकृष्णाने हे तत्व आचरणात आणले. रामाला राज्याभिषेक आणि वनवास सारखाच होता. सोन्याची द्वारका आणि त्याचा विनाश हे सारखेच होते. उद्धवाला त्याने सांगितले होते की मी भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्व काळात एकाच स्वरूपात असतो हे सत्य आहे. काम, क्रोध, लोभ यांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नसल्यामुळे तो कायम आनंद रूपच आहे.

अशा या सत्याची, परब्रम्हाची निष्काम भक्ती केल्याने भगवंताची प्रत्यक्ष भेट होणे सहज शक्य आहे. अखंड नामजप हे या भक्तीचे अत्यंत समर्थ असे साधन आहे. चला गाऊया

 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी

 हे नाथ नारायण वासुदेव

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares