दरवर्षाला सांगत असतो ना लवकर येशील पुढच्या टायेमाला..
अन तसा तू येत असतोच न विसरता दर वर्षाला… लालचावलास तू सारखा सारखा इथं यायला… भलामोठा मंडपात, सुशोभित मखरात, बसतोस ऐषआरामात… घरच्या, दारच्या यजमानांची उडते किती त्रेधातिरपिट… तूझ्या आगमनाच्या आधीपासून ते तुला निरोपाचा विडा देईपर्यंत.. असते का काही तुला त्याची कल्पना… फक्त भिरभिरते डोळे तुझे शोधती नैवेद्याचे मोदक ताट भरून आहेत ना.. सुपाएवढे कान तुझे आरत्या, पूजाअर्चा, तारस्वरातल्या ऐकून घेती… छचोर गाण्याचा शंख कर्णा त्या फुंकती.. नवल वाटे मजला अजूनही बहिरेपण तुजला कसे न आले… आल्यापासून जाईपर्यंत डोळे टक्क उघडे ठेवशी… साधुचे नि भोंदूचे भाव अंतरीचे जवळूनी पाहशी.. जसा ज्याचा भाव तसा त्याला पावशी… मिस्किल हसू आणून गोबरे गाल फुगवून बसशी… तथास्तू चा हात आशिर्वादाचा तव मात्र सगळ्यांच्या मस्तकी ठेवशी… ज्याची त्याची मनातली मागण्यांची माळेची मोजदाद तरी तु किती करशी… करोडोंची होतसे इथे उलाढाल ती दिखाऊ भक्तीचा भंडारा उधळून देण्यास.. देखल्या देवा दंडवताच्या उक्ती नि कृतीला तूही आजवरी ना विटलास… चौदा विद्या नि चौसष्ट कलांचा तू अधिपती… कसा विसरलास भक्तांना अंतर्यामी खऱ्या भक्तीची, सश्रद्ध बुद्धी देण्यास ती… दहा दिवसाचा तो सोहळा रात्रंदिन आमचाच कोलाहलाचा गलका… कधीही चुकूनही नाही तू सोडले मौनाला शब्दाने एका.. जे चालले ते सगळेच चांगलेच होते भावले आहे का तुला?… निदान हे तरी सांगशील का मला!……
.. आणि आणि हो.. माझं ना तुझ्या जवळ एक मागणं आहे!.. या वर्षी तू इथं आलास कि तू मौन बाळगून बसू नकोस… जे जे तुला दिसतयं ते तुला आवडतयं, नावडतयं ते स्पष्ट सांगायचं!.. घडाघडा बोलायचं!… मनात काही ठेवायचं नाही.. नि पोटात तर काहीच लपवायचं देखिल नाही!… तुला काय हवयं ते तू मागायचं.. अगदी हट्ट धरून… आम्ही नाही का तुला नवस सायास करतो तुझ्या कडे हक्कानं!.. मग तु देखील आमच्याकडे मागणी करण्याचा हक्क आहेच कि… टेक ॲन्ड गिव्ह हि पाॅलिसी चालतेय ना श्रध्देच्या बाजारात… मगं कसं सगळा व्यवहार पारदर्शी होईल…. पण त्यासाठी तुला बोलावेच लागेल… मौन धरून गप्प बसण्यात काही मतलब नाही.. आणि आम्हालाही कळेल कि आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत कि नाहीत… आणि समजा मागुनही मिळणार नसेल तर तर दोन हस्तक नि एक मस्तक तुझ्या पायी ठेवून.. ठेविले अनंते तैसेची राहावे.. चित्ती असु द्यावे समाधान अशी मनाची समजूत घालून पुढे चालू लागू… तरी पण यावेळे पासून तू आमच्या बरोबर बोलणार, संवाद साधणार आहेस… अरे तु दिलेल्या चौदा विद्या नि चौसष्ट कलांचा आम्ही मानवांनी काय आविष्कार केलाय हे तु पाहिलसं पण ते तुला जसं हवं होतं त्याच अपेक्षेप्रमाणे झालयं का कसं… का तुला काही वेगळचं अपेक्षित होतं.. हे तुला आता सांगावच लागेल… निदान उशीर होण्यापूर्वी चुक दुरुस्ती तर करता येईल…. नाहीतर नाहीतर आम्ही पण तुझ्याशी बोलणार नाही.. एकाही शब्दांनं… कट्टी कट्टी घेणार तुझ्याशी… आणि आणि आरतीच्या, पूजाअर्चाच्या वेळेला तुला दाखवलेला नैवेद्य, प्रसाद आम्ही सगळाच खाऊन टाकू… तुला बिल्कुल देणार नाही… हिच तुला आमच्याकडून पेनल्टी… कितीही गाल फुगवून रूसून बसलास तरी… मग मनात आणूही नकोस फिलिंग स्वत:ची गिल्टी वाटल्यावरी…
(पूर्वसूत्र- स्टॅंडच्या बाकावर बसून रात्र जागून काढताना सलगच्या धावपळीच्या प्रवासानंतरचा अपरिहार्य असा थकवा होताच पण त्याचा त्रास मात्र जाणवत नव्हता. पौर्णिमा अंतरली नसल्याचं समाधान माझ्या थकल्या मनावर फुंकर घालत होतं! त्याच मन:स्थितीत मी कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मला आठवले…
‘निश्चय केला तरी त्या निश्चयापासून परावृत्त करणारे प्रसंग सतत समोर येत रहातात, तेच आपल्या कसोटीचे क्षण! जे त्या कसोटीला खरे उतरतील तेच तरतात.. !’
त्या रात्री स्टॅंडवरच्या एकांतात बाबांच्या या शब्दांचा नेमका अर्थ मला माझ्या त्या दिवशीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने समजला होता!!) इथून पुढे —-
एरवी अविश्वसनीय आणि अतर्क्य वाटावीत अशी यासारखी अनेक घटीतं पुढे प्रत्येक वेळी मला मात्र ‘तो’ आणि ‘मी’ यांच्यातलं अंतर कमी होत चालल्याची आनंदादायी अनुभूती देत आलेली आहेत!
यावेळी पौर्णिमेची तारीख बघण्यात माझी नकळत झालेली चूक आणि त्यामुळे पौर्णिमेचं दर्शन अंतरण्याची निर्माण झालेली शक्यता हा बाबा नेहमी म्हणायचे तसा माझ्या कसोटीचाच क्षण असावा आणि केवळ अंत:प्रेरणेनेच मी सलग दोन रात्रींचं जागरण करून भुकेल्यापोटी आंतरीक ओढीने ‘त्या’च्याकडे धाव घेत कसोटीला खरा उतरलो असेन. कारण त्यानंतरच्या महाबळेश्वरमधील पुढच्या साधारण पावणेतीन वर्षांच्या कालावधीत अशी कसोटी पहाणारे क्षण कधी आलेच नाहीत. या प्रदीर्घकाळात ब्रॅंचमधील सगळी कामे, जबाबदाऱ्याच नव्हेत फक्त तर प्रत्येक पॅरामीटर्सवरील माझा परफॉर्मन्सही वरिष्ठांकडून मला शाबासकी मिळवून देणारा ठरत होताच, शिवाय दर पौर्णिमेलाही जाणिवपूर्वक नियोजन न करताच सगळं कांही निर्विघ्नपणे पार पडत होतं!आश्चर्य हे कीं या पौर्णिमेनंतरच्या पुढच्या अडीच-तीन वर्षातल्या कुठल्याच पौर्णिमेच्या प्रवासासाठी मला ना कधी रजा घ्यायला लागली ना कधी प्रवासासाठी कसला खर्चही करावा लागला. कारण नेमक्या त्यावेळी अचानक असं काही घडून जायचं की पौर्णिमेच्या जवळपास जसंकांही बँकेमार्फत दत्तमहाराजच मला बोलावून घ्यायचे!दरवेळी निमित्तं पूर्णत: वेगळी असत पण ती निर्माण होत ती मात्र पौर्णिमेच्या सलग आधी किंवा नंतर. आमचं रिजनल ऑफिस कोल्हापूरलाच होतं. तिथे कधी हिंदी वर्कशॉपसाठी ब्रॅंचतर्फे मला जावं लागे, कधी ब्रॅंच-मॅनेजर्स मीटिंगसाठी, कधी कोर्टात सुरू असलेल्या वसुली केसेसमधे साक्षीदार म्हणून कोल्हापूरच्या कोर्टात उपस्थित रहावं लागे किंवा कधी छोटे-मोठे ट्रेनिंग प्रोग्रॅमस्… कांही ना कांही कारण निघायचं आणि त्या त्या वेळच्या रुटीनचाच एक भाग म्हणून रिजनल-ऑफिसकडून मला बोलावणं यायचं आणि त्या निमित्ताने माझं पौर्णिमेचं दत्तदर्शन तर व्हायचंच शिवाय सगळे प्रवास खर्च आणि टीए डीए बँकेकडून मिळायचे.
खरंतर सहज घडलेल्या एका साध्या प्रसंगाच्या निमित्ताने सलग बारा वर्षांचा दीर्घकाळ दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला नियमित दत्तदर्शनाला यायचा मी केलेला तो संकल्प! ‘आपल्याला या पौर्णिमेला जायला जमेल ना? काही अडचण येणार नाही ना?’अशी टोकाची साशंकता या बारा वर्षांच्या दीर्घकाळात मनात कधीच निर्माण झालेली नव्हती. या एवढ्या वर्षांमध्ये माझ्या आयुष्यात आणि ‘सर्विस लाइफ’ मधेही प्रचंड उलथापालथ आणि स्थित्यंतरं व्हायचे अनेक प्रसंग आले. पण त्यावेळीही मन कधीच साशंक झालेले नव्हते. या दरम्यानच्या काळात मला मिळत गेलेली सलग प्रमोशनस् मला प्रगतीपथावर नेत असायची. त्या प्रत्येकवेळी प्रमोशन मिळालेल्या सर्वांच्याच मनात सेंट्रल-आॅफीसची ‘प्रमोशन पोस्टिंग पॉलिसी’ काय ठरते याच्या उत्सुकतेइतकेच दडपणही असायचेच. या प्रत्येक प्रमोशनच्यावेळी असणारी अनिश्चितता काय किंवा एरवीही वेळोवेळी कधीही होऊ शकणाऱ्या माझ्या बदल्या काय, त्या प्रत्येकवेळी माझ्या संकल्पपूर्तीत अडथळे निर्माण होऊ शकलेही असते, पण आश्चर्य म्हणजे तसं कधीही झालं नाही!आज मागे वळून बघताना मला तीव्रतेने जाणवते की त्या त्या प्रत्येकवेळी ‘त्या’नेच मला अलगदपणे अनपेक्षित आधार दिला होता, सांभाळलं होतं आणि त्यानेच एक अदृश्य, अभेद्य असं ‘संरक्षक कवच’च माझ्याभोवती तयार करून ठेवलं होतं जसंकांही!अशा अनुभवांपैकी एखाददुसरा प्रातिनिधिक प्रसंग लिहिण्याच्या ओघात पुढे कधीतरी येईलही. अशा प्रसंगी अगदी अचानकपणे मिळालेल्या अकल्पित कलाटणीने थक्क झालेल्या माझ्या मनाला ‘माझी संकल्पपूर्ती हा माझ्याइतकाच त्याचाही आनंद असणाराय’ असा भारावून टाकणारा विचार मनाला स्पर्श करुन जात असे. आज त्या कल्पनेनेसुध्दा मन भरून येते!
महाबळेश्वरनंतर माझ्या झालेल्या बदल्या आणि नंतरच्या प्रमोशन्सनंतर झालेली पोस्टिंग्ज् यावरून नजर फिरवली तरी माधवनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या ब्रॅंचेसमधला कार्यकाळ मला आपसूक आठवतो. प्रत्येकवेळी प्रमोशननंतरही मला एकाच रिजनमधे असा सलग बारा वर्षांचा काळ व्यतीत करायला मिळाला आणि तोही कुणाच्याही खास ओळखी आणि जवळीक न वाढवता हे आमच्या बँकेपुरता विचार केला तरी माझे एकमेव उदाहरण असावे.. !
पण या सगळ्या खूप नंतरच्या गोष्टी. महाबळेश्वपुरतं बोलायचं तर महाबळेश्वरला फॅमिली शिफ्ट होईपर्यंतचा साधारण वर्षभराचा काळ हा अशा अनेकविध अनुभवांमुळे मला दिलासा देत आला होता. हा एक वर्षाचा काळ आम्हा उभयतांच्या दृष्टीने खरंच कसोटी पहाणारा होता. इकडे माझ्या रुटीनमधे मला कराव्या लागणाऱ्या तडजोडींपेक्षाही काॅलेज, प्रॅक्टीकल्स, अभ्यास यांचं श्वास घ्यायलाही फुरसत नसणारं ओझं आणि जोडीला लहान मुलाची जबाबदारी यांचा विचार करता माझ्या बायकोने, आरतीने केलेल्या तडजोडी निश्चितच कणभर कां होईना अधिक कौतुकास्पद होत्या असंच मला वाटतं. कारण लग्नानंतर तिला सहज योगायोगाने मिळालेली राष्ट्रीयकृत बॅंकेतली नोकरी सलिलचा जन्म झाल्यानंतर तशीच परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बालसंगोपनाला प्राधान्य देत कर्तव्यभावनेने तिने पूर्ण विचारांती सोडलेली होती. तिला शैक्षणिक क्षेत्राची आवड होती आणि सलिल थोडा सुटवांगा झाला की त्यादृष्टीने काहीतरी करण्याचे तिने ठरवलेही होते. त्यानुसार योगायोगाने याच वर्षी तिला कोल्हापूरच्या सरकारी बी. एड् कॉलेजमधे ऍडमिशनही मिळालेली होती. माझी महाबळेश्वरला बदली झाली ती या पार्श्वभूमीवर! या सगळ्याचा लिहिण्याच्या ओघात आत्ता संदर्भ आला तो तिच्या करिअरला आणि आमच्या संसारालाही विलक्षण कलाटणी देणाऱ्या आणि त्यासाठी माझी महाबळेश्वरला झालेली बदलीच आश्चर्यकारकरित्या निमित्त ठरलेल्या, सुखद असा चमत्कारच वाटावा अशा एका घटनेमुळे !
तिच्या या वाक्याने मी भानावर आलो आणि बशीत सांडेस्तोवर च्या तिच्या कपात “वतला”.
समाधानाने तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हसल्या.
यानंतर बशीत सांडलेला चहा तिने घरातल्या तुळशी वृंदावनाच्या मातीत टाकला, थोडा चहा एका प्लेटमध्ये टाकून ती प्लेट तीने घराबाहेर ठेवली.
आता कपात पुन्हा निम्माच चहा उरला.
हा निम्मा चहा तिने बशीत ओतून समाधानानं भुरके मारत पिला.
म्हातारीला मी पुन्हा वैतागून म्हणालो, ‘म्हातारे, मी तुला आधी कपात निम्माच चहा दिला होता, तू इकडे तिकडे ओतून निम्माच चहा पिलास…. मग मला मघाशी संपूर्ण कप सांडेपर्यंत का भरायला लावलास ?’
यावेळी ती, न चिडता भावुक होत म्हणाली… ‘माज्या बाळा, आपून इतकं कमवायचं… इतकं कमवायचं… की ते सांडून कपाभायेर येऊन बशीत पडलं पायजे… पन बशीत जे पडंल त्ये मात्र आपलं नसतंय… त्ये आस्तय प्राणी, पक्षी, गुरांचं… त्ये त्यांना वाहायचं… ‘
… माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत तिनं माणुसकीची व्याख्या सांगितली.
“ कुठं गं शिकलीस ही जगण्या आणि जगवण्याची कला…. ??? “ माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले…
मला तिचे पाय धरायचे होते… पण मला हे नक्की माहीत होतं, की मी तीचे पाय धरताना; पाठीत धपाटा घालून ती मला म्हणेल, ‘ न्हाई भजं खायाला मी तुला आट आनं द्येनार न्हाई हां मुडद्या, लय नाटकं नगों करुस… ‘
पाच लाख दरमहा कमावणारा मी….
तरीही आज “भजं खायाला” माझ्याकडे आठ आणे नाहीत… गरीब कोण… ? श्रीमंत कोण… ?
माझ्याकडे पैसा होता; पण तिच्याकडे लक्ष्मी… !!!
गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!
एकदा ती मला म्हणाली होती, ‘मेल्यावर बिन बोलवता बी “खांदा” द्यायला समदं गाव जमतंय, पन भुकेजलेल्या जित्त्या माणसाला आणि जनावराला आपल्या जवळची कोरभर भाकर आणि “कांदा” कुनी देत न्हाय… ‘ खांदा दिवून पुन्य मिळवन्या पेक्षा… जित्या मानसाला “भाकर आनं कांदा” दीवून पुन्य मिळव
आंतरराष्ट्रीय संस्थेचा प्रमुख मी… Management आणि Humanity या विषयावर माझ्याकडे पारितोषिके आहेत. Doctor for Beggars या कामामध्ये मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून एकूण 3000 पेक्षा जास्त पुरस्कार आहेत.
माझे हे सर्व पुरस्कार आणि पारितोषिके एका पारड्यात…. आणि माझ्या म्हातारीचे विचार एका पारड्यात…. !
कसं कोण जाणे… पण तीचंच पारडं खाली जातं… ! तिच्या विचारांचं वजन नेहमीच जास्त भरायचं.
“ओझं” “भार” आणि “बोजा” हे; वरवर “वजन” या शब्दाचे समानार्थी शब्द वाटतात. खरंतर तिघांचेही अर्थ वेगळे आहेत.
मनाविरुद्ध अंगावर पडतं ते ओझं…
नाईलाजाने वाहिला जातो तो भार…
इच्छा नसतानाही लादला जातो तो बोजा…
पण, मनापासून आणि आनंदाने खांद्यावर वागवलं जातं ते वजन… !
माझी अशिक्षित म्हातारी, विचारांचं धन डोक्यावर घेऊन… खऱ्या अर्थाने लक्ष्मी होते…
आणि, इतकं सर्व मिळवून माझी झोळी रिक्त राहते…. आणि हातात काही नसून, माझी म्हातारीच श्रीमंत होऊन जाते… !!!
अशीच एकदा ती मला म्हणाली होती, ‘नारळाच्या झाडागत बोंबलत उच्च नगो होवूस… शेळ्या मेंढ्या ह्यांच्या तोंडाला तुजी पानं लागून त्यांची भूक भागंल, असं दोन फुटाचं बुटकं झाड हो… ‘
“दुसऱ्यासाटी तू किती झुकतोस, यावर आपली उंची ठरत्ये माज्या सोन्या… ”
….. तिची ही वाक्ये ऐकून माझ्या अंगावर शहारे आले होते… !
डाव्या हाताने मग मी चड्डी सांभाळत, उजव्या हाताने नाकाचा शेंबूड पुसत… मी पुन्हा लहान होतो आणि पुन्हा तिच्या पदराखाली जातो… पुन्हा पुन्हा तिच्या पदराखाली जातो… आणि दरवेळी हा पदर मला माणुसकीच्या रस्त्यावर घेऊन येतो, एखाद्या दिशादर्शकासारखा… !!!
तिच्या फाटक्या पदराची हि पताका; हेच माझं भरजरी वस्त्र आहे… !!!
गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!
ती जायच्या अगोदर काही दिवस मला म्हणाली होती… ‘खेड्यातली ल्वोकं फुलपात्रातून च्या देत्यात यात तुला गावंडळपना वाटतू ना… ?’
मी खाली मान घालून गप्प बसलो.
यावर तिने तिच्या भाषेत, फुलपात्र या शब्दाचा व्यापक अर्थ सांगितला तो असा…
… प्रत्येकाजवळ स्वतःचं असं एक भांडं… एक पात्र असतं. हे पात्र कधी रिकामं असतं… तर कधी भरलेलं असतं. ज्याच्याकडे हे रिकामं पात्र असतं त्याला हिणवू नये कधीच… कदाचीत स्वतः कडचं सर्वस्व पोरा बाळांना देऊन माघारी फिरला असेल तो… कधी आई होऊन… कधी बाप होऊन… आई बापाचं भांडं दिसायला रिकामं दिसलं तरी ते पात्र कायम Full च असतं… ! आपल्या ताटातली भाकरी जेव्हा आपण दुसऱ्याला देतो… तेंव्हा दिसायला ताट रिकामं दिसतं… पण खऱ्या अर्थाने ते तेव्हाच भरलेलं असतं… आणि तुमचं पात्र आपोआप Full होतं… घेण्यात आनंद आहे बाळा… पण देण्यात समाधान… ! आपण घ्यायचं सुद्धा असतं आणि द्यायचं सुद्धा… ,… कधीतरी एखाद्याची भूक उसनी घेऊन, त्याच्या चेहऱ्यावरचा “आनंद” आपण घ्यायचा… आणि त्याला भाकर देऊन, आपल्या मनातलं “समाधान”, त्याच्या मुखात ठेवायचं…. !
‘हितं तुजं भांडं रिकामं दिसंल… पन तवाच तुजं पात्र Full होतंय गड्या… !’
गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!
खाटेवर पडलेल्या आजीचे क्षीण झालेले, सुरकुतलेले हात मी माझ्या दोन्ही हातात घेतले…
या हातांवर आपोआप अश्रूंचा पाऊस झाला… आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भेगाळलेल्या जमिनीवर, एक अंकुर उगवून आला…. “डॉक्टर फॉर बेगर्स… !!!”
माझी हि आजी… “लक्ष्मी” होऊन माझ्या पदरात आली… अक्षय विचारांचे धन देऊन मला श्रीमंत बनवून; अक्षय होऊन गेली… !
ती गेली तो दिवस होता “अक्षय तृतीया”…. हा योगायोग नक्कीच नव्हता… !!!
ती माझं पात्र… फुल्ल करून गेली… अक्षय्य करून गेली… !
आता चेंबलेलं का असेना… जुनं का असेना… फुटकळ का असेना… पण हेच “फुलपात्र”; मी रोज याचकांच्या चरणी रीतं करतो…
परतताना मात्र माझं हे पात्र तुम्ही सर्वजण पुन्हा Full करता… परत परत Full करता…
आणि Full झालेलं हे “फुलपात्र”; मी जपून ठेवतो, दरिद्री नारायणाची उद्याची पूजा मांडण्यासाठी… !!!
आणि म्हणून आजचा हा लेखाजोखा आपल्या पायाशी सविनय सादर !
या महिन्यात झालेल्या कामाचा आढावा आता विस्तृत सांगत नाही… फक्त इतकंच सांगेन, या महिन्यात जे अंध, अपंग – विकलांग, भिक मागणारे लोक सापडले, अशांना हातगाडी, वजन काटे, कापडी पिशव्या विकायला देऊन, छोटे छोटे व्यवसाय काढून देऊन व्यवसायाचं एक साधन त्यांच्या चरणी अर्पण केलं आहे… हाच मी वाहिलेला नैवेद्य… !
भीक मागणाऱ्या पालकांची मुलं किंवा खुद्द भीक मागणारी मुलं, यांना एकत्र करून सॉक्स बुट आणि युनिफॉर्म पासून शाळा कॉलेजेच्या त्यांच्या फिया भरल्या आहेत. 15 जुलैला जेव्हा ही मुलं दप्तर – रेनकोट घेऊन शाळेत निघाली, त्यावेळी मला त्यांच्यात, आयुष्यातला “विठ्ठल” शोधायला निघालेला वारकरी दिसला…
इथेच झाली माझी वारी,
आणि म्हणून विठ्ठला मी आलोच नाही पंढरपुरी… !!
रस्त्यावरील याचकांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा दिल्या, रस्त्यावर जे जमत नाही अशा गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.
आषाढी एकादशीला पंढरपुरात हातातले टाळ तिकडे दुमदुमत होते… मला इथे ते आजारी याचकांच्या धडधडणाऱ्या हृदयात ऐकायला आले… माझा स्तेथोस्कोप आज टाळ झाला… !
काय गंमत आहे पहा, “वि-ठ्ठ-ल” नाम स्मरण हे हृदयाशी निगडित आहे… शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या नामस्मरणास “विठ्ठल क्रिया” असं म्हटलं जातं.
पंढरीच्या राजा, आम्ही इथेच बसून रोज “विठ्ठल क्रिया” केली… !
“हात हे उगारण्यासाठी नाही… उभारण्यासाठी असतात… ” हे ज्या वृद्ध याचकांनी मला रस्त्यावर शिकवलं, मी त्यांनाच गुरु मानुन त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो… !
त्यांच्या विचारांच्या उजेडात, माझी प्रत्येक अंधारी रात्र मग “पौर्णिमा” झाली… !
आज खूप वर्षांनी विचार करतो…. भिकाऱ्यांच्या डॉक्टर /भिक्षेकर्यांचा डॉक्टर/डॉक्टर फॉर बेगर्स… याचं बीज नेमकं आहे कशात… ?
खडकाळ जमिनीत सुद्धा तृण उगवतं… कुणीही बीज न रोवता बांधावर एखादं बाभळीचं / रानफुलाचं झाड उगवतं… याला ना खत लागत ना मशागत… तरीही ते फोफावतं… सावली देण्याची त्याची पात्रता नसेलही, पण शेळ्या मेंढ्यांचं खाद्य होण्यात ते धन्यता मानतं… !
*खडकाळ… भेगाळ का असेना…. पण माझी म्हातारीच माझी जमीन झाली… आणि माझं बीज इथेच अंकुरलं…*
माझ्याच म्हातारीच्या भाषेत सांगायचं तर; मला अफाट, पण खारट समुद्र व्हायचंच नाही… मला व्हायचंय एक छोटंसं, पण गोड पाण्याचं तळं… जिथं कोणाची तरी तहान भागेल… शेतकऱ्याचं बीज पिकेल… !
त्यावेळी माझ्या थेंबा थेंबाने गाणं म्हणावं…. बीज अंकुरे अंकुरे… !!!
तो एक लेखक होता. मराठी कादंबरीकार. १९७० ते १९९० हा त्याचा लेखनकाल. या काळात त्याने साधारण हजार कादंबऱ्या लिहिल्या. त्याचा खप अक्षरशः तडाखेबंद होता. ‘अश्लील कादंबरीकार ‘ म्हणुनच त्याची ओळख होती. पण त्याने कधी पर्वा केली नाही.
जन्म सांगलीचा. सुरुवातीच्या काळात त्याने काही मासिकं काढली. नट नट्यांची लफडी.. आणि त्याला साजेशी चित्रे असं त्यांचं स्वरुप असायचं. मासिकाची नावही तशीच.. राणी.. प्यारी.. मस्ती अशी.
ही माहिती तो कुठुन गोळा करायचा ते कधीच समजलं नाही. मासिकांवर त्याने टाकलेले पत्ते नेहमी खोटेच असायचे. तो नेमका कुठं रहातो.. अंक कुठून प्रकाशित करतो.. प्रिंट कुठून करतो हे कधीच समजायचं नाही.
पण त्यांची विक्री अफाट होती. महाराष्टातील सगळीच रेल्वे स्टेशन.. बस स्टॅण्ड.. आणि गावागावांत असलेले विक्रेते एजंट अंकाची आतुरतेने वाट पहात. आलेले अंक हातोहात खपत. कधी दुप्पट तिप्पट किमतीतही ती विकली जात.
काही काळ हा उद्योग चालला.. आणि मग बंदही पडला. मग त्यानं कादंबरी लेखन सुरू केलं. त्याच्या कादंबऱ्या म्हणजे रहस्यकथा असत. त्या नावाखाली पानोपानी कामुक वर्णने.. जोडीला खुन. दरोडे.. बदले हा मसाला.
त्याच्या लेखनाचा झपाटा विलक्षण होता. महीन्यात २०-२५ कादंबऱ्या सहजपणे तो लिहून काढायचा.
एक बाहेरगावचा प्रकाशक त्याच्याकडं आला होता…. कबुल करुनही अजुन का कादंबरी लिहीली नाही म्हणून जाब विचारण्यासाठी.
त्याने मग स्वतःला खोलीत कोंडुन घेतलं. दुपारपासुन तर रात्रीपर्यंत अखंड लेखन करुन कादंबरी त्या प्रकाशकांच्या हातात ठेवली.
याच काळात आशु रावजी.. दिनु कानडे या नावांनी लिहिलेल्या अश्लील कादंबऱ्या पण वाचकांमध्ये गाजत होत्या. हे दोन लेखक कोण हे कधीच समजलं नाही. पण बऱ्याच जणांच्या मते ह्या कादंबऱ्या तोच टोपण नावाने लिहीत होता.
त्यानं लेखन सहायक म्हणुन सुंदर मुलींचा तांडाच ठेवला होता. पुण्यात आल्यावर त्याला भेटायला गर्दी लोटे.
सुहास शिरवळकर एकदा त्याला भेटायला गेले होते. तो पुण्यात एका आलिशान हॉटेलमध्ये उतरला होता. त्याला भेटायला आलेल्या प्रकाशकांची गर्दी.. त्याच्या सेवेत असलेल्या सुंदर ललना.. आणि मद्याचा महापूर हे सगळं बघुन ते चकीतच झाले. ‘सु. शि. ‘सांगतात… या माणसाकडे पाहील्यावर एक गोष्ट लक्षात आली. या माणसानं आयुष्य खुप ‘उपभोगुन’ घेतलं आहे.
या अश्या लिखाणामुळे त्याच्या मागे कोर्ट कचेरी खटले मागे लागले. एक वेळ तर अशी होती की ऐंशी खटले त्यांच्यावर दाखल झाले होते.. मग त्यानं एक कायमस्वरूपी वकील पगारावर ठेवला.
जितका पैसा त्यानं मिळवला.. तो सगळा दारु.. स्त्रिया.. कोर्ट.. आणि पोलिसांची सरबराई यात घालवला. ऐषोरामी जीवन. विलासी जगणं यात आलेली कमाई उधळली.
सुभाष शहा हे या लेखकांचं नाव. त्यांची पुस्तक वाचणं.. अगदी उघडपणे बाळगणं हेही अप्रतिष्ठतेचं.. अभिरुचीहिनतेचं लक्षण मानलं जातं होतं. तरीदेखील लपुन छपुन सगळेचं जण सुभाष शहांच्या पुस्तकांकडे आकर्षित होत असत.
पण या सगळ्याला उतरती कळा लागणं नैसर्गिक होतं. काळ बदलला.. लोकांच्या आवडी बदलल्या.. करमणुकीची साधनं बदलली.. त्यांच्या पुस्तकांचा खप खाली आला. दारु.. व्यसनं करता करता पैसा संपत गेला. शरीर पोखरत गेलं. देवानं सुभाष शहांना अपार प्रतिभा बहाल केली होती. लेखन शैली असुनही त्यांनी ती चुकीच्या कामांसाठी वापरली. त्यांना कधी मानसन्मान मिळालेच नाही. स्वत:च्याच अश्या सवयींमुळे एक उमदा लेखक संपून गेला.
या पार्श्वभूमीवर आठवतात लेखक रवींद्र पिंगे.. आणि त्यांचे विचार. ते म्हणतात..
“पन्नास वर्षे मी जीव लावून गोमटं आणि घाटबध्द लेखन केलं. दैवानं जे काही आणि जेवढं आपल्या ओंजळीत टाकलं, तेवढंच आपलं असतं. अधिकासाठी जीव पाखडायचा नाही. माझं मन नेहमीच वखवखशुन्य असतं. जे सुखदुःख मिळालं ते भोगलं.. तक्रार नाही. माझी ठाम श्रद्धा आहे की..
उत्सुकता सर्वच जीवांचे वैशिष्ट्य आहे. नाक नावाचा अवयव हा श्वास घेण्यास दिला गेला असला तरी खुपसण्यास जास्त वापरला जातो. आपले झाकून ठेवताना दुसऱ्याचे वाकून पाहण्यासाठी डोळे आहेतच. तोंड तर free to air वृत्तवाहिनी! बघ्यांचे डोळे म्हणजे सीसीटिव्ही… खरं तर शी!शी! टीव्ही!
जंगलात झाडांच्या फांद्या उभ्या कापण्याचे काम करीत असलेल्या कारागिरांचे काम एक माकड पहात होते… आणि ते लोक नेमकं काय करत आहेत? याची त्याला उत्सुकता होतीच. पण एवढ्यावरच त्याने थांबले पाहिजे होते. करवतीने फांदीच्या मध्ये काप घेत असताना जर कापणे मध्येच थांबवले तर करवत लाकडाच्या दाबाखाली येऊन अडकून बसते आणि मग ती निरुपयोगी ठरते. म्हणून ती काढून घेण्याआधी कापलेल्या भागाच्या आत लाकडाचा एक उभट तुकडा ठेवला जातो.. त्याला पाचर म्हणतात! कारागीर जेवण करण्यास निघून जाताना त्यांनी ही पाचर नीट मारली होती… पण ती काढली तर काय होईल? हा प्रश्न माकडाला सतावत होता. त्याने ती पाचर काढण्याचा प्रयत्न केला.. ती निघालीही… पण त्याची शेपटी कापलेल्या झाडाच्या मध्ये अडकली… आणि मग कारागिरांनी माकडास बेदम झोडपून काढले! ही गोष्ट तशी लोकांच्या माहितीची आहे!
गोष्ट राहू द्या… कारण ते तर माकड होते! पण माणसांना कायदा ठावूक नसावा हे फार झाले!
एकतर हल्ली फेसबुक हे बातमीपत्र बनले आहे. स्वयंघोषित बातमीदार बऱ्याच लोकांना आधीच माहीत झालेल्या सबसे तेज बातम्या सांगण्या, दाखवण्यात धन्यता मानतात!
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर आलेला प्रसंग शत्रूवर ही येऊ नये. मुळात बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. यात पीडित व्यक्ती सर्वाधिक त्रास सहन करते. त्यामागे आपली सामाजिक मानसिकता मोठी भूमिका बजावते. गुन्हेगार उजळ तोंडाने आणि पीडित तोंड झाकून फिरतात.. असे दृश्य आहे. उपचार म्हणून पोलिस गुन्हेगारांची थोबाडं पिशव्यांनी झाकण्याचा प्रयत्न करतात हे ही खरे. पण ते चेहरे लोकांनी आधीच पाहून ठेवलेले आणि कॅमेऱ्यात कैद करून ठेवलेले असतात. पण हे चेहरे झाकण्यामागे न्यायालयीन प्रक्रियेतला एक महत्वाचा उद्देश दडलेला असतो.
बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या खटल्यातील सुनावण्या in camera अर्थात अतिशय मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत घेतल्या जातात. पण हल्ली लोकांना सर्वच on camera पाहिजे असते! अपघात, हल्ले, आत्महत्या यांत dead झालेल्या लोकांची live चलतचित्रे जास्त पसंत केली जातात. यात खूप पैसे मिळत असल्याने हे प्रदर्शन विशेष लक्ष देऊन केले जाते!
एका तथाकथित शैक्षणिक चित्रपटात बलात्कार शब्दाच्या मदतीने विनोद निर्मितीचा चमत्कार खूप गाजला. पण तो चित्रपट गाजत असताना आणि आजवरही त्यातील बलात्कार – चमत्कार शब्दाच्या वापराबाबत, त्याच्या दुष्परिणामांबाबत कसे कुणाला काही वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते! लहान मुले या दृश्याचा आनंद घेत असताना पाहणं ही खूप दुःखाची बाब म्हणावी लागेल!
खूप काम पडल्यावर एका सुमार अभिनेत्याने मला माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्यासारखे वाटते! अशी प्रतिक्रिया देणे सुद्धा अनेकांच्या कानांतून सुटून गेले! अनेक चित्रपटात बलात्काराच्या प्रसंगात उत्तम अभिनय करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याने सुद्धा ” मी आताच दोन बलात्कार करून आलो.. असे वाक्य फेकून मित्रमंडळींना हसवले होते, असे ऐकिवात आहे. यातून बलात्कार शब्दास एक सहजपणा प्राप्त होत जातो, हे समाजाच्या मानसास कधी समजेल? …. हाच समाज The Rape of the lock नावाच्या इंग्रजी नाटकाच्या मुखपृष्ठावरील rape हा शब्द वाचून तुमच्याकडे तुम्ही अश्लील वाचता आहात, अशा नजरेने पाहू शकतो! असो.
बलात्कार पीडितेचे नाव, छायाचित्र इत्यादी माहिती प्रसिद्ध करू नये, असा न्यायालयाचा आदेश असताना काही अज्ञानी लोक नेमके असेच का करत सुटलेत? हा कायदेभंग केल्यास तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे, याचे अज्ञान हा बचाव ठरणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षाही सदर पीडित आपलीच कुणी सख्खी असती तर आपण अशी प्रसिद्धी दिली असती का? हाही विचार व्हावा! उलट कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून गुन्हेगारांच्या कृत्यांना, अर्थात त्यांची भलावण होणार नाही अशा पद्धतीने प्रसिद्धी देण्याचं जमते का ते पाहावे! यात मग.. त्याचा गुन्हा कुठे सिद्ध झालाय अजून? असे cross जाण्याची गरज नाही!
जिचा काहीच गुन्हा नाही तिला जिवंतपणी आणि मरणानंतर शिक्षा का देता?
आणि माननीय न्यायालयाने याबाबतीत वेळोवेळी तसा आदेश दिलेला असतानाही लोकांनी असेच वागावे, याला काही अर्थ?
काही वर्षांपूर्वी एक मोठी अभिनेत्री इमारतीवरून पडून गतप्राण झाली होती.. त्यात तिचे शरीर अनावृत होते… ते ‘ पाहण्या ‘ साठी मुंबईमध्ये हजारो लोक जमले होते!
काय झाकून ठेवायचे आणि काय वाकून बघायचे यातील विवेक कुणी कुणाला शिकवावा? हाच प्रश्न आहे!
बाकी एक महिला जिवानिशी गेली… तिच्या प्रकरणात कोलकात्यात जो हैदोस सुरू आहे.. ते पाहून डोळे, कान आणि मनाचे दरवाजे बंद करून बसावे, असे वाटते!
… ती मेली आणि तिला मारणारे अजून काही वर्षे जगणार आहेत, व्यवस्था त्यांना जगवणार आहे हे चित्र भयावह आहे.. की हेच आपले प्राक्तन आहे, न कळे!
माझं सर्व बालपण सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड नावाच्या छोट्याशा खेडेगावात आजीच्या सहवासात गेलं.
इथे घडलेल्या गमती – जमती, कथा – व्यथा आणि माझ्यावर झालेले भले – बुरे परिणाम; हे सर्व मी माझ्या पुस्तकात काहीही न लपवता मांडलं आहे.
माझ्या आजीचं नाव लक्ष्मीबाई… !
नावाप्रमाणेच ती होती. कपाळावर जुन्या रुपयाच्या कॉइन एवढं भलं मोठं कुंकू, नाकात बांगडीला लाजवेल एवढी मोठी नथ, काठापदराचं लुगडं घालून ती अशी चालायची; जसा राज घराण्यातला हत्ती निघाला आहे… ! म्हणायला अशिक्षित, पण व्यवहार चातुर्य PHD झालेल्या माणसाला लाजवेल असं…
तोंडानं फटकळ, पण मायेचा जिवंत झरा हृदयात घेऊन फिरायची… गावात जबरदस्त दरारा… !
एके दिवशी तिकडे तिचे वडील वारले आणि इकडे माझा जन्म झाला…
त्यावेळच्या भाबड्या कल्पनेनुसार, एका माऊलीने तिला सांगितले, ‘आगं लक्साबया… रडु नगो बाये, पांडुरंगाचे पोटी तुजा बापच जलमाला आलाय… !’ … पांडुरंग माझ्या वडिलांचे नाव… !
झालं, तेव्हापासून माझी आजी मला तिचा बापच समजायला लागली, आणि तेव्हापासून माझे विशेष लाड आणि कोड कौतुक सुरू झालं.
अख्खा गाव तिला मामी म्हणायचा, तिला घाबरायचा…. पण तिच्या प्रेमाने लाडावलेला मी तिला लहानपणी “ए लक्षे” म्हणून हाक मारायचो…. आजीचे वडील तिला याच नावानं हाक मारायचे, नातू पण त्याच नावाने हाक मारतो, म्हणजे खरोखरच आपला बापच नातवाच्या रूपाने जन्माला आला आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं… !
तिचा “बाप” असण्याचा, मग पुढे मी पुरेपूर फायदा घेतला.
करारी आणि कठोर बाई हि, परंतु कोणत्याही गरिबाच्या अडल्या नडल्या मदतीला ही सर्वात प्रथम पुढे येई.
सर्वांनाच हिच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. गावातल्या श्रीमंतापासून ते गरिबातल्या गरीब घरापर्यंत कोणाच्याही घरात ती डायरेक्ट घुसायची… घरात जिथे उंच जागा सापडेल तिथे ती पायावर पाय टाकून बसायची…. आणि इकडे तिकडे पहात, पदराची दोन टोकं हाताच्या चिमटीत पकडत, स्वतःला वारा घालत, घरातल्या लोकांची हजामत करायची.
हतरून पांगरून आजुन काडली न्हाईत ?
शेळ्याच्या लेंड्याच हित पडल्यात…
घरच नीट सारवलं न्हायी…
गाई म्हशीचं श्यान उचलायला का तुजा बा येणार हाय का ए… ?
……. तिची टकळी चालू असायची… तिच्या तावडीतून कुणीच सुटायचं नाही. येणारा जाणारा प्रत्येक जण तिची नजर चुकवून जायचा… !
यावेळी मी तिचा पदर धरून, डाव्या हाताने चड्डी सावरत शर्टाच्या उजव्या बाहीला शेंबूड पुसत सर्व काही पहात असे. चड्डी माझ्या मापाची मला कधीच मिळाली नाही.
‘ थोडी मोटी दे… वाडतं वय हाय… अजून मोटी दे…. हांग आशी… ‘ म्हणत दुकानदाराला माझ्या चड्डीची ऑर्डर आजीच द्यायची…
डावा हात हा फक्त चड्डी सांभाळण्यासाठी असतो आणि उजवा हात शेंबूड पुसण्यासाठी… त्या वयात हाताचे इतकेच उपयोग मला माहित होते.
तर सर्व उणीदुनी काढून झाल्यानंतर, पदरानं घाम पुसत, म्हातारी बिनदिक्कतपणे त्या घरात ऑर्डर सोडायची… ए टवळे, च्या टाक जरा मला… तुमाला आक्कल शिकवून दमले बया मी, तुमच्यापेक्षा गाडव बरं… वर तीच कांगावा करायची… !
चहा येईपर्यंत, माझी नाकाची फुरफुर चालूच असायची…
समद्या गावाचा शेंबूड तुलाच आलाय का काय मुडद्या ? असं म्हणत वैतागून उठत; ती मला दरा दरा ओढत घराबाहेर नेत, माझं नाक पदरात धरून असं शिंकरायची, की मृत्यु परवडला…. !
अजून थोडा जोर लावला असता, तर तीने माझा मेंदूच बाहेर काढला असता…
तुजं आसं हाय, शेंबूड आपल्या नाकाला, आन् रुमाल देतंय लोकाला… असं स्वतःशी पुटपुटत, मला कडेवर घेऊन ती परत घरात यायची.
यानंतर कान नसलेल्या, फुटक्या कपात, किंवा चार ठिकाणी चेंबलेल्या फुलपात्रात चहा यायचा. बऱ्याच वेळा जर्मन च्या “भगुल्यात” च्या यायचा… बशी नसली तर… आम्ही मग हा “च्या” गोल ताटात भरून भुरके मारत प्यायचो… आज जाणवतं, हा खऱ्या अर्थाने सोहळा होता… !!!
….. आता कुठे आहे हे फुलपात्र ? ते जर्मनचं भांडं आणि तो कान नसलेला फुटका कप ???
मी शोधतोय… ! आईच पत्र हरवलं… हा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो, हे फुलपात्र… ते जर्मनचं भांडं आणि कान नसलेला फुटका कप सुद्धा तसाच हरवलाय… !
माणसं शिकत गेली आणि या जुन्या गोष्टी पुस्तकाच्या पानात दबून गेल्या… आठवण म्हणून ठेवलेल्या पिंपळाच्या जाळीदार पानासारख्या… !
आता या गोष्टी दिसतात फक्त जुन्या बाजाराच्या दुकानात… नाहीतर, चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी घेऊन, अंताकडे वाटचाल करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांच्या मनात… !!!
तर; बऱ्याच वेळा फुलपात्रातून किंवा फुटलेल्या कपातून, बशीत चहा सांडेस्तोवर दिला जायचा…
फुलपात्र आणि कप सोडून बशी सुद्धा चहानं भरलेली असायची… ! डाव्या हाताने चड्डी, उजव्या हाताने नाक सांभाळताना…. मला चहा प्यायलाच जमायचं नाही, मग माझी म्हातारी एक घोट स्वतः प्यायची, एक घोट मला पाजायची… ! हा चहा पिताना, माझ्या घशातून घुटुक घुटुक आवाज येत असावा… मला माहित नाही. पण यातही माझ्या आजीला कौतुक…
‘ बगा गं बायांनो, “माजा बाप” कसा घुटुक घुटुक च्या पितो, तुमाला दावते… ‘ म्हणत ती अजून चार फुलपात्रे नाक दाबून मला चहा पाजायची…
पुढे डोक्यावरून पाणी गेलं…
रडत खडत शिकलो…. त्यानंतर मोठ्या मुश्किलीने डॉक्टर झालो… पुढच्या खाचखळग्यातून वाटा काढत चालत राहिलो… आयुष्यातली सगळी पानीपते हरलो… तरीही पुढे कष्ट करून मनातला “विश्वासराव” जिवंत ठेवला… !
आयुष्याच्या एका टप्प्यावर आंतरराष्ट्रीय संस्थेत कामाला लागलो… आर्थिक स्थैर्य आलं. मग अनेक उच्चभ्रू लोकांशी / ऑफिसशी संपर्क येऊ लागला. सुरुवातीला… “खेड्यातनं आलंय येडं, आन भज्याला म्हनतंय पेडं…. ” अशी माझी अवस्था होती. खेड्यातला येडा मी…. तिथले मॅनर्स आणि एटिकेट्स शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. चकचकीत आणि महागड्या कपांमध्ये चहा मिळू लागला… भल्या मोठ्या कपामध्ये / मगमध्ये सांडणार नाही, अशा पद्धतीने निम्माच चहा किंवा कॉफी असायची… !
पुढे मी सरावलो…
एकदा हि माझी खडूस म्हातारी… बऱ्याच वर्षांनी माझ्या घरी आली….
आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्राचा प्रमुख मी….
तिला एका मोठ्या पांढऱ्या स्वच्छ कपामध्ये मी तिला चहा दिला…
कपाला सोन्याचीच वाटावी, अशी सोनेरी रंगाची नक्षी होती…
शिकलेले मॅनर्स सांभाळत, भल्या मोठ्या कपामध्ये; सांडणार नाही अशा पद्धतीने तिला निम्मा चहा दिला होता. विहिरीत वाकून बघावं, तसं तीनं कपात वाकून बघितलं… कपातला अर्धा चहा बघून ती खवळली…. तिच्या स्वभावानुसार ती बोलली…. ‘येवडासा च्या ? ल्हान पोरगं हेच्यापेक्षा जास्त मुततंय… तू कंनच्या कंपनीत काम करतूय रं… ? सायबाला म्हणावं पाच धा रुपय पगार जास्त दे… घरात आलेल्या पावण्यांना कप भरून च्या पाजू दे… !’
पाच लाख रुपये दरमहा कमावणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या तोंडात माझ्याच म्हातारीने सणसणीत चपराक हाणली. मलाही राग आला, गावाकडे चेंबलेल्या फुलपात्रात आणि फुटक्या कपात च्या पिणारी माजी म्हातारी, आज इतक्या मोठ्या, सुंदर सोनेरी नक्षीच्या कपात चहा पीत आहे, नातवाचं हिला काहीच कौतुक नाही… ??? मी तिला हे बोलून दाखवलं.
यावर जोरदार पलटवार करत म्हातारी म्हणाली, ‘ गप ए शेंबड्या… तूजा कप किती छोटा हाय, का मोटा हाय…. त्याला सोन्याची का चांदीची नक्षी हाय, त्याला किंमत नसती… या कपातून तू काय देतू, किती देतू, कोनच्या भावनेनं देतू त्याला जास्त किंमत आसती… !’
आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये दरवर्षी “मॅनेजमेंट” या विषयावर किमान चार सेमिनार असतात… असे मागील दहा वर्षात मिळून मी 40 सेमिनार अटेंड केले असतील… तू काय देतो, किती देतो, कोणत्या भावनेनं देतो त्याला जास्त किंमत असते… ! सेमिनार मध्ये किती कळलं मला माहित नाही… पण माझ्या म्हातारीने दोन मिनिटात मॅनेजमेंटचं सर्व सार सांगितलं… ! हातातला कप माझ्या हातातच राहिला… तिच्याकडे भारावून मी पाहत राहिलो… “कपावरची” सोनेरी नक्षी आता तिच्या “कपाळावर” उमटलेली मला भासली… !!!
महर्षी बालखिल्य हे महर्षी कृतु आणि सन्नीता यांचे पुत्र. प्रजोत्पादनासाठी आणि तपस्या करण्यासाठी महर्षी कृतु यांनी आपल्या केसांपासून त्यांना निर्माण केले. ते साठ हजार होते. त्यांचा आकार अंगठ्या इतका लहान होता. ते सूर्याचे उपासक होते. ते सूर्य लोकात रहात. पक्षांप्रमाणे एक एक दाणा वेचून ते आपला उदरनिर्वाह करत असत. ते सदैव सूर्याकडे तोंड करून फिरत असत. त्यांच्या तपस्येचे तेज सूर्याला मिळत असे. ते सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेडियमच्या तीव्रतेपासून जगाचे संरक्षण करीत असत.
बालखिल्य हा दैवी ऋषींचा समूह आहे. ते शरीराने लहान पण तपस्वी म्हणून महान आहेत.
एकदा महर्षी कश्यप यांनी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यांनी कृतु ऋषींना सांगितले तुम्ही माझ्या यज्ञात ब्रह्माचे स्थान ग्रहण करा व आपल्या सर्व पुत्रांना घेऊन या. महर्षी कृतुंनी आमंत्रण स्वीकारले. देवराज इंद्रही त्या ठिकाणी होते. महर्षी कश्यप यांनी सर्वांना यज्ञासाठी समिधा आणण्यास सांगितले. इंद्राने खूप समिधा आणल्या. पण बालखिल्य थोड्याच समिधा आणू शकले. इंद्राने चेष्टा केली. विचारले, हे वीतभर लाकूड घेऊन कशाला आलात? हा यज्ञ तुमच्या आकाराप्रमाणे छोटा असेल असे तुम्हाला वाटले का? बालखिल्ल्यांना उपहास समजला. तरीही कश्यप ऋषींसाठी शांत राहून ते म्हणाले, “आम्ही यज्ञासाठी समिधा आणल्या आहेत. त्यांच्या आकाराकडे न पाहता आमचा समर्पण भाव पहा. ” इंद्र म्हणाला, “ तुम्ही देवराज इंद्राशी बोलत आहात लक्षात आहे का? “
बालखिल्यांना खूप राग आला. इंद्राला धडा शिकवण्यासाठी ते म्हणाले, “ तुला इंद्रपदाचा गर्व आहे म्हणून आम्ही संकल्प करतो की आम्ही आमच्या योगबलाने तुमच्यापेक्षा कैक पटीने शक्तिशाली, बुद्धिमान आणि सद्गुणी इंद्र निर्माण करू. ” इंद्र घाबरून कश्यपांकडे गेला. कश्यपांनी बालखिल्यांची समजूत घातली व सांगितले, “ जगात इंद्र एकच असणार तेव्हा त्याला क्षमा करा. ” बालखिल्यांना आपला संकल्प परत घेणे कठीण होते. ते म्हणाले, “ आम्ही संकल्प परत घेऊ शकत नाही. पण बदल करू शकतो. तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत आहात. तुमचा पुत्र अतिशय पराक्रमी, शक्तिशाली असा प्राणी असेल जो पक्षांचा इंद्र होईल. आमचा संकल्पही पूर्ण होईल आणि इंद्र पदाचे महत्व ही कमी होणार नाही. ”
कश्यपांची पत्नी विनता हिने गरुडाला जन्म दिला आणि गरुड भगवान विष्णूचे वाहन बनले. तसेच त्याला पक्षांचे इंद्र असे नाव पडले.
त्यांनी बालखिल्य संहिता रचली. ते केदारखंडमध्ये तपस्या करीत होते. तिथे एक नदी आहे तिचे नाव बालगंगा.
ऋग्वेदाच्या आठव्या मंडलाच्या शेवटी एक परिशिष्ट आहे. त्याला बालखिल्यसूक्त असे म्हणतात.
एकदा गरुडाला खूप भूक लागली. त्याने वडिलांना विचारले, ‘ मी काय खाऊ?’ तेव्हा ते म्हणाले, “समुद्रात एक मोठे कासव आहे आणि वनामध्ये एक महाभयंकर हत्ती आहे. दोघेही खूप क्रूर आहेत. तू त्यांना खा. ” गरुडाने दोघांना पकडले व तो सोमगिरी पर्वतावर गेला. तिथे एका उंच वृक्षावर काही ऋषी उलटे लटकून तपस्या करत होते. गरुड त्याच फांदीवर बसला. त्याच्या वजनाने ती फांदी तुटू लागली. गरुडाने आपल्या चोचीत ती फांदी पकडली आणि कश्यप ऋषींकडे आला. कश्यप ऋषी म्हणाले, “ हे बालखिल्य ऋषी आहेत. त्यांना त्रास दिलास तर ते शाप देऊन तुला भस्म करतील. ” गरुडाला वाचवण्यासाठी त्यांनी बालखिल्य ऋषींना प्रार्थना केली की ‘ तुम्ही फांदीवरून खाली या. ’ बालकिल्ल्यांनी कश्यपांची प्रार्थना ऐकली. ते खाली आले आणि हिमालयात तपस्या करण्यासाठी निघून गेले.
असे हे आकाराने लहान पण कर्तृत्वाने महान असे तपस्वी बालखिल्य ऋषी. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पिठोरी अमावस्या अर्थात वैश्विक ‘मातृत्व’ दिन…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
आज श्रावण अमावस्या !! बैलपोळा, पिठोरी अमावस्या आणि मातृदिन असा त्रिवेणी संगम असलेला पावन दिवस !!!
अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती द्यूत खेळत होते. पंच (परीक्षक) म्हणून नंदी महाराज होते. खेळात माता पार्वती जिंकल्या होत्या. पण पंचाने म्हणजे नंदीने भगवान शंकर जिंकले असे जाहीर केले. याचा पार्वतीमातेला राग आला व तिने नंदीला शाप दिला की तुझ्या मानेवर लोकं जोखड ठेवतील आणि तुझा उपयोग शेतीच्या कामासाठी व इतर कामासाठी केला जाईल. नंतर नंदीने क्षमा मागितली तेव्हा पार्वतीमातेने त्याला वरदान दिले की श्रावण अमावस्येच्या दिवशी तुला काहीही काम सांगणार नाहीत, तुझी पूजा केली जाईल, तुला गोडधोड खाऊ घातले जाईल, तुझे कौतुक केले जाईल आणि तेव्हापासून आपल्याकडे ‘बैलपोळा’ हा सण साजरा करण्यात येतो. आपल्या संस्कृतीप्रमाणे घरात अगदी नवीन संगणक आणला तरी त्याची पूजा केल्याशिवाय आपण तो सुरु करत नाही, अशा निर्जीव वस्तूंचीही पूजा होते, तिथे जन्म देणाऱ्या मातेला ही संस्कृती कशी विसरेल? माता, जननी, मातृभूमी आणि जमिनीतून धान्य पिकायला सहाय्यकारी ठरणाऱ्या बैलाचीही आपल्याकडे पूजा होणे क्रमप्राप्त नव्हे काय?
या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची. त्यांना ऊन पाण्याने आंघोळ घालायची, पुरणावरणाचा स्वयंपाक करून आधी त्याचे तोंड गोड करायचं. खूप ठिकाणी ‘ “शिंगे रंगविली, बाशिंगे बांधिली, चढविल्या झुली ऐनेदार ‘ असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात बैलपोळा सामूहिकरीत्या साजरा केला जातो.
श्रावण अमावास्येला ‘पिठोरी अमावास्या’ असेही म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान असे – श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन ‘कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे. पूर्वी घराघरात ‘पिठोरी’ची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. या दिवशी महिला उपवास करतात. सायंकाळी स्नान करून घरातल्या मुलाला किंवा मुलीला खीरपुरीचे जेवण देतात. या दिवशी ६४ योगिनींच्या चित्राची महिला पूजा करतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ‘अतीत कोण?’ असा प्रश्न विचारायचा असतो. त्याचे उत्तर म्हणून आपल्या मुलाचे नाव घ्यायचे. म्हणजे पुत्र किंवा कन्या दीर्घायुषी होतात, अशी श्रद्धा आहे. घरातली कर्ती स्त्री डोक्यावर ‘पिठोरी’चं वाण घेऊन ‘माझ्यामागे कोण आहे?, चा घोष करत असे. घरातील मुलं तिला ‘मीच, मीच’ म्हणत प्रतिसाद दिला जात असत. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.
मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वत:च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावास्या करून देते. म्हणून ही अमावास्या महत्वाची आहे. आजच्या पावन दिनी दिवशी वंशवृद्धीकरिताही पूजा केली जाते. म्हणून यास ‘मातृदिन’ असेही म्हणतात. पण आज याला आणखी एक संदर्भ जोडला तर आणखी सयुक्तिक होईल असे वाटते. आपण आजच्या दिवसाला ‘मातृत्वदिन’ म्हणू शकतो. ‘माता’ होणे हे जन्म देण्याशी निगडित आहे तर मातृत्वभाव हा फक्त जन्म देण्याशी निगडीत नाही. हा तर वैश्विक भाव आहे. आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर समाजाला आज ‘मातृत्वभावा’ची विशेषत्वाने गरज आहे असे जाणवते.
‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’, ‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’; ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’ अशा विविधप्रकारे प्रतिभावंत कवींनी/मुलांनी आपल्या आईचे गुणवर्णन केले आहे. जरी असे वर्णन जरी केले असले तरी ते वर्णन पूर्ण आहे असे कोणताच कवी ठामपणे म्हणू शकत नाही. ज्या प्रमाणे भगवंताचे वर्णन करता करता वेद हि ‘नेति नेति’ असे म्हणाले, (वर्णन करणे शक्य नाही), अगदी तसेच आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाचे / प्रतिभावान कवीचे होत असावे असे वाटते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत पहिला नमस्कार आईला करण्याचा प्रघात रुजवला गेला असावा.
आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीकडे ‘मातृत्वभावाने पाहण्याचे संस्कार आपल्यावर बालपणीच केले जात असतात, त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून ‘भूमाता’, ‘गोमाता’, ‘भारतमाता’ अशा विविध भावपूर्ण संज्ञा आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. ही पद्धत अकृत्रिम पद्धतीने आचरली जात होती, त्यामुळे ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकवावी लागत नव्हती की त्याची जाहिरात करावी लागत नव्हती. मनी रुजवलेल्या मातृत्वाभावामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी नकळत घडत होत्या आणि त्याचा फायदा सर्व समाजाला, पर्यायाने देशाला होत होता. आज पुन्हा एकदा आईचे ‘आईपण’ (प्रत्येक गोष्टीतील मातृत्वभाव) जागृत करण्याची गरज जाणवत आहे. “छत्रपती शिवाजी शेजारणीच्या पोटी जन्माला यावा’ ही मानसीकता सोडून ‘मीच माझ्या बाळाची ‘जिजामाता’ होईन” हा विचार मातृशक्तीत रुजविण्याची गरज आहे असे जाणवते. भले मला माझ्या मुलास ‘शिवाजी’ बनवता आले नाही तर त्याला शिवरायांचा ‘मावळा’ बनवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन करेन असा पण प्रत्येक आईने करायला हवा. हा प्रयत्न थोड्या प्रमाणात जरी यशस्वी झाला तरी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रणाम मोठ्या प्रमाणात कमी होतील.
आज ‘आंतरराष्ट्रीय मातृत्वदिन’ आहे. आपल्या आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मला असा जाणवलं की नुसती कृतज्ञता व्यक्त करून आपले कर्तव्य संपेल ? नक्कीच नाही. तर एक मुलगा म्हणून माझं काही कर्तव्य नक्कीच आहे. मी माझ्या जन्मदात्रीचा मुलगा आहेच, भारतमातेचे पुत्र आहे, समाजपुरुषाचा पुत्र आहे. प्रत्येकासाठी माझी वेगवेगळी कर्तव्ये आहेत, ती योग्य रीतीने पार पाडता यावीत म्हणून मी माझ्या जीवनात प्राधान्यक्रम कशाला देणार हे ठरवावयास हवे. माझ्या अंगातील कौशल्ये अधिकाधिक समाजाभिमुख कशी होतील याचा विचार करावयास हवा. ‘मी आणि माझे’ यातून बाहेर पडून संपूर्ण समाज ‘माझा’ आहे ही भावना बळकट व्हावयास हवी. आज त्याचीच नितांत गरज आपल्या मातृभूमीस आहे, असे वाटते.
जसे भक्तामुळे देवास ‘देवपण’, अगदी तसेच लेकरांमुळे आईला ‘आईपण’ प्राप्त होते. भक्तच आपल्या भक्तीतून देवाचे देवपण सिद्ध करतो, तसेच प्रत्येकाने यथाशक्ती चांगले वागून, चांगली कर्म करून आपल्या आईच्या आईपणास गौरव प्राप्त करून दिला पाहिजे. मग ती आई असो, गोमाता असो कि भारतमाता !!. दैनंदिन व्यवहार करताना आपल्या अंगी ‘मातृभाव किंवा पुत्रभाव’ ठेवता आला तर देशातील भ्रष्टाचार, सामाजिक भेदभाव आणि इतर सर्व अनैतिक गोष्टी तात्काळ बंद होतील, यात बिल्कुल संदेह नाही.
आज आईचे स्मरण करताना बऱ्याच गोष्टी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत गेल्या. माझी आई ही एखादवेळेस जिजामाता नसेल, ‘श्यामची आई’ नसेल पण ती ‘आई’ होती हेच माझ्यासाठी पुरेसे होते. आज या नश्वरजगात आई नाही, पण तिने जे काही शिकविले ते ‘श्यामच्या आई’च्या शिकवणीपेक्षा कणभरही कमी म्हणता येणार नाही. ‘देवाला सर्व ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली’* याची अनुभूती आपण सर्वच जण नेहमीच घेत असतो. सर्व संत मातृभक्त होते. सर्व क्रांतिकारक मातृभक्त होते आणि म्हणूनच अनंत हालअपेष्टा सोसूनही क्रांतीकारकांनी स्वराज्य प्राप्तीसाठी अथक प्रयत्न केले. आपणही आपल्या आईसाठी यथामती काहीतरी करीतच असतो. आपल्या आईची समाजातील ‘ओळख’ ‘सौ. अमुक अमुक न राहता ती अमुक अमुक मुलाची आई आहे’, अशी करून देता आली तर आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा यापेक्षा चांगला उपाय नसेल..
मी इथे प्रत्येकाच्या मनात असलेली ‘आई’बद्दलची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुकभुल माफी असावी.
चार मातीच्या भिंती
त्यात राहे माझी आई
एवढे पुरेसे होई
घरासाठी….. !!
जगातल्या सर्व मातांस आणि मातृभावनेने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांस ही शब्दसुमनांजली सादर अर्पण!! श्रीरामसमर्थ।
आम्ही राहत असलेल्या गल्लीत शिरतानाच उजवीकडे एक खूप मोठा ओटा सदृश मोकळा चौथरा होता ज्यास आम्ही “घटाणा” असे म्हणत असू. हा घटाणा म्हणजे एक प्रकारचे गल्लीतले ‘ॲम्फीथिएटरच” होते. तिथे नाना प्रकारचे पारंपरिक, लोककलेचे आणि लोक कलाकारांचे कार्यक्रम विनामूल्य चालत. जसे की डोंबाऱ्याचा खेळ, मदारी, माकडांचा खेळ, डब्यातला सिनेमा, टोपलीतले नाग नागिण, पोतराज आणि असे कितीतरी. त्यातल्या सगुणा, भागुबाई, गंगुबाई, अक्का, माई, जंगल्या, आण्णा, आप्पा अशी नाना प्रकारची पात्रे आजही आठवली तरी सहज हसू येते. डोंबारीचा खेळ पाहताना हातात काठी घेऊन दोरीवर चालणारी ती लहान मुलगी पाहताना छाती दडपून जायची. पुढे आयुष्यात केलेल्या अनेक लाक्षणिक कसरतींचा संदर्भ या लहानपणी पाहिलेल्या खेळांशीही जोडला गेला ते निराळे पण आम्हा मुलांसाठी घटाण्यावरचे खेळ म्हणजे एक मोठे मनोरंजन होते. या पथनाट्यांमुळे आमचे बालपण रम्य झाले.
एक चांगलं लक्षात आहे की या खेळांव्यतिरिक्त मात्र आम्हा मुलांना त्या घटाण्यावर जाण्याची परवानगी नसायची कारण त्या घटाण्याच्या मागच्या बाजूला ट्रान्सजेंडर लोकांची वस्ती होती. ती चेहऱ्यावर रंग चढवलेली स्त्री वेशातील पुरुषी माणसे, त्यांचं टाळ्या वाजवत, कंबर लचकवत सैरभैर चालणं, दोरीवर वाळत घातलेले त्यांचे कपडे पाहताना विचित्र असं भयही जाणवायचं. कधीकधी घटाण्यावर रात्रीच्या वेळी ढोल वाजवत गायलेली त्यांची भसाड्या सूरातील गाणी ऐकू यायची. त्या गाण्यात अजिबात श्रवणीयता अथवा गोडवा नसायचा. आज विचार करताना वाटतं, त्यांच्या जीवनातील भेसूरता ते अशा सूरांतून व्यक्त करत असावेत.
पण तरीही मनात प्रश्न असायचे. ही माणसं अशी कशी? ही वेगळी का? यांचे आई वडील कोण? यांची वस्ती हेच यांचं कुटुंब का? या प्रश्नांची उत्तरे त्यावेळी कधीच मिळाली नाहीत पण आजही त्यावेळी उत्तर न मिळालेले अनेक प्रश्न मनात आहेतच.
एकदा बोलता बोलता जीजी म्हणजे माझी आजी म्हणाली, ”मालु गरोदर असली आणि मी घरात नसले की शेजारची काकी बिब्बा मागायला यायची. मालु भोळसट. ती काकीला द्यायची बिब्बा. ”
बिब्बा नावाचं एक काळं, औषधी, सुपारी सारखं ‘बी’ असतं जे स्नायूंच्या दुखण्यावर उपयोगी ठरतं. हे बिब्बे वगैरे विकणाऱ्या बाया “बुरगुंडा झाला बाई बुरगुंडा झाला” अशाप्रकारे काहीतरी गाणी गात सुया, मणी, बिब्बे वगैरे विकत. जीजी पुढे सांगायची, ”म्हणून तुझ्या आईला तुम्ही पाच मुलीच झालात. ”
मालु — मालती हे माझ्या आईचं नाव. मला जीजीचं हे बोलणं अजिबात आवडलं नाही. मी तिला लगेच म्हटलं, “आम्ही मुली म्हणून तुला आवडत नाही का ?” तेव्हा मात्र जीजी फार खवळली आणि तिने माझे जोरात गालगुच्चे घेतले पण मग दुसऱ्या क्षणी प्रेमाने जवळ घेऊन म्हणाली, ” नाही ग ! तुम्ही तर माझे पाच पांडव. ”
पण माझ्या मनात जे उत्तर न मिळालेले अनेक प्रश्न आहेत त्यापैकीचा एक प्रश्न कुमुदताई या आकर्षक व्यक्तिमत्वाभोवती गुंतलेला आहे. घटाणा ओलांडून गल्लीतून बाहेर पडताना उजवीकडे एका जराशा उंच प्लिंथवर दोन बैठी पण वेगवेगळी घरे होती. एक समोरची खोली आणि आत एक स्वयंपाक घर. एक खिडकी हॉलची आणि एक खिडकी स्वयंपाकघराची. परसदारी दोन्ही घरांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे होती आणि पुढे मागे थोडा मोकळा परिसर होता. त्यातल्या एका घरात लैला आणि कासिमभाई हे बोहरी दाम्पत्य आपल्या इबू आणि रफिक या लहान मुलांसोबत राहत आणि दुसऱ्या घरात चव्हाणकाका आणि कुमुदताई हे नवविवाहित दांपत्य राहत असे. अतिशय आकर्षक असे हे दांपत्य. दोघेही गौरवर्णीय, उंच आणि ताठ चालणारे. त्यांच्याकडे पाहता क्षणी जाणवायचं की धोबी गल्ली परिसरातल्या जीवनशैलीशी न जुळणारं असं हे दाम्पत्य आहे. त्यांचा क्लासच वेगळा वाटायचा. चव्हाणकाका हे उत्तम वकील होते. अर्थात ते नंतर कळलं जेव्हा ते आमचे चव्हाणकाका झाले आणि त्यांच्या पत्नी आमच्यासाठी कुमुदताई झाल्या. आम्हा मुलांना नसेल जाणवलं पण ते नवविवाहित दांपत्य असलं तरी ते प्रौढ होते पण महत्त्वाचे हे होतं की सुरुवातीला काहीसे निराळे, वेगळ्या क्लासमधले ते वाटले तरी तसे ते असूनही खूपच मनमिळाऊ, हसरे आनंदी आणि खेळकर होते. आमच्याशी त्यांचे सूर फारच चटकन आणि छान जुळले. दोघांनाही लहान मुले फार आवडायची. शेजारच्या बोहरी कुटुंबातल्या रफिक आणि इबु वर तर ते जीवापाड प्रेम करत आणि कुमुदताई आम्हा मुलांना तर प्रचंड आवडायच्या.
मी प्रथम त्यांच्याशी कधी बोलले ती आठवण माझ्या मनात आजही काहीशी धूसरपणे आहे. मी आणि माझी मैत्रीण त्यांच्या घरावरून जात होतो. जाता जाता कुतुहल म्हणून त्यांच्या घरात डोकावत होतो. तेवढ्यात त्यांनीच मला खुणेने बोलावलं. खरं सांगू तेव्हा मला इतका आनंद झाला होता! कारण मला त्यांच्याशी नेहमीच बोलावसं वाटायचं पण भीडही वाटायची. आता तर काय त्यांनी स्वतःहूनच हाक मारली होती मला. मी धावतच गेले. “तुझा फ्रॉक किती सुंदर आहे ग !” हे त्यांच्याशी झालेल्या संभाषणातलं पहिलं वाक्य. मग मी फुशारकीत सांगितलं, “माझ्या आईने शिवलाय माझा फ्रॉक. ” “अरे वा ! तुझी आई कलाकारच असली पाहिजे. ” “होयच मुळी. ” आणि मग त्या दिवसांपासून कुमुदताईंची आणि आमची घट्ट मैत्री झाली.
उठसूठ आम्ही त्यांच्याच घरी. रविवारच्या सुट्टीत तर आम्हा सवंगड्यांचा त्यांच्याकडे अड्डाच असायचा. त्यांच्याबरोबर आम्ही खूप पत्ते खेळायचो. पत्त्यातले अनेक डाव. पाच तीन दोन, बदामसत्ती, नॉट ॲट होम, लॅडीस, झब्बू, ३०४ वगैरे. आम्ही आमच्या वयातलं अंतर कधीच पार केलं होतं शिवाय नुसतेच खेळ नसायचे बरं का. कुमुदताई उत्कृष्ट पाककौशल्य असणार्या गृहिणी होत्या. खेळासोबत कधीकधी कांदाभजी, सोडे किंवा अंडे घालून केलेले पोहे, वालाची खिचडी असा बहारदार चविष्ट मेनूही असायचा.
माझी धाकटी बहीण छुंदा त्यांना फार आवडायची. ती सुंदर म्हणून तिला चव्हाणकाका लाडाने “प्रियदर्शनी” म्हणायचे. त्यांचंही आमच्या घरी जाणं-येणं होतं. चव्हाणकाकांचं आणि पप्पांच अनेक विषयांवर चर्चासत्र चालायचं आणि “कुमुदताई” माझ्या आईची खूप छान मैत्रीण झाल्या होत्या. अर्थात यातही मैत्रीचं पहिलं पाऊल त्यांचंच होतं. आईकडून आणि जिजी कडूनही शिवणकामातल्या अनेक कौशल्याच्या गोष्टी अगदी आत्मीयतेने त्यांनी शिकून घेतल्या. आईने त्यांना कितीतरी पारंपारिक पदार्थही शिकवले. जसे कुमुदताईंकडून आमच्याकडे डबे यायचे तसेच आमच्याकडूनही त्यांना डबे जात. मग एकमेकींनी बनवलेल्या पदार्थांची चर्चाही घडे.
कुठल्याही अडचणीच्या वेळी कुमुद ताई आईची मदत घेत आणि हे दोन्हीकडून होतं. आम्हा मुलांना तर त्यांच्यासाठी काहीही करायला आवडायचे. त्या एकट्या असल्या तर अभ्यासाची वह्या पुस्तके घेऊन आम्ही त्यांना सोबत करायचो. असं खूपच छान नातं होतं आमचं. त्यांच्याबरोबर गाणी ऐकली, सिनेमे पाहिले. कितीतरी वेळा— बालमन कधी दुभंगलं तर त्यांच्यापुढेच उघडं केलं आणि त्यांनी आमच्या डोळ्यातलं पाणी वेळोवेळी टिपलं.
मग नक्की काय झालं ? कुमुदताई गर्भवती झाल्या, चव्हाण काका आणि कुमुदताईंना ‘बाळ’ होणार म्हणून खरं म्हणजे सारी गल्लीच आनंदली. दुसऱ्यांच्या मुलांवर जीवापाड प्रेम करणारं, मुलांमध्ये रमणारं हे जोडपं आता स्वतः “आई-बाबा’ होणार ही केवढी तरी आनंदाचीच गोष्ट होती पण कळत नकळत का होईना जाणवायला लागलं होतं ते पडत चाललेलं अंतर, त्यांच्या वागण्या बोलण्यातला अधोरेखित फरक. बालमन बारकावे टिपण्याइतकं परिपक्व नसतं पण कुठेतरी आत संवेदनशील नक्कीच असतं.
आजकाल रोज येणाऱ्या कुमुदताई आमच्याकडे येईनाशाच झाल्या होत्या. अत्यंत तुटकपणे बोलायच्या. नंतर तर बोलणंही संपलं. गल्लीतल्या बाकीच्यांशी मात्र त्यांचं काही बिनसलं नव्हतं.
प्रश्नांची खरी उत्तरं फक्त “जीजी” कडे मिळायची. जीजी आपणहूनच म्हणाली एक दिवस, “ तुझ्या कुमुदताईंना विसर आता. आता नाही येणार त्या आपल्याकडे. ” “पण का ?” माझे डोळे तुडुंब भरले होते. कुमुदताईंसारख्या आवडत्या व्यक्तीला तोडणे कसे शक्य होते ? “त्यांना भीती वाटते की तुझ्या आईचा चेहरा त्यांनी पाहिला तर त्यांनाही मुलगीच होईल. त्यांना मुलगी नको मुलगा हवाय. ”
हा मला बसलेला ‘मुलगी’ विषयीचा अनादर दाखवणारा एक प्रचंड धक्का होता. त्या क्षणी मी माझ्या आईला घट्ट मिठी मारली आणि तेव्हा एकच जाणवलं, ”माझ्यासाठी या जगात माझ्या आई इतकी महान व्यक्ती दुसरी कुणीच नव्हती. एक वेळ मी परमेश्वराची आरती करणार नाही पण माझ्या आईची महती गाणारी आरती जन्मभर करेन.”
आई आणि जीजीमध्ये सासू—सून नात्यातले वाद असतील पण अशा कितीतरी भावनिक, संवेदनशील संघर्षामय क्षणांच्या वेळी जीजी आईमागे भक्कमपणे उभी असायची.
शेतात उंचावर बसवलेल्या बुजगावण्यासारखं माझ्या मनातलं कुमुदताईंचं स्थान एकाएकी कोसळलं आणि रात्रीच्या भसाड्या आवाजातल्या ट्रान्स जेंडरांचं गाणं अधिक भेसूर वाटलं.
त्यानंतर चव्हाणकाका आणि कुमुदताईंनी घरही बदललं. ठाण्यातल्याच “चरई’ सारख्या प्रतिष्ठित भागात त्यांनी स्वतःचं मोठं घर घेतलं. चव्हाणकाकांची वकिली जोरात चालू होती. ठाण्यातील नामांकित वकील म्हणून त्यांची ओळख निर्माण होत होती. घटाण्या समोरची त्यांच्या घराची खिडकी कायमची बंद झाली आणि आमच्यासाठीही तो विषय तिथेच संपला.
आमच्याही आयुष्यात नंतर खूप बदल झाले. आम्ही मोठ्या झालो. भविष्याच्या वाटेवर आम्हा बहिणींची— आई वडील आणि आजीच्या प्रेम आणि मार्गदर्शनाखाली आयुष्ये फुलत होती. ’ मुलगा नसला तरी.. ’ हे वाक्य सतत कानावर पडत राहिलं तरीही कधी कधी ते चांगल्या शब्दांबरोबरही गुंफलेलं असायचं. “मुलगा नसला तरी ढग्यांच्या मुली टॅलेंटेड आहेत. ढग्यांचे नाव त्या नक्कीच राखतील. ” तेव्हा त्या व्यक्तिंबद्दल “ही माणसं आपल्या विचारांची” असंही काहीसं वाटायचं.
अनपेक्षित पणे एक दिवस, ध्यानीमनी नसताना आमच्याकडे चव्हाणकाका आणि कुमुदताई आले. मध्ये बर्याच वर्षांचा काळ लोटला होता. काळाबरोबर काळाने दिलेले घावही बोथट झाले होते. आमच्यावर लहानपणापासून झालेला एक संस्कार म्हणजे, “ झालं गेलं विसरून जावे, कोणाही विषयी विचार करताना केवळ त्यांच्या आनंदाचा, सुखाचा, अथवा त्यांच्याच भूमिकेतून विचार करावा. कुठलाही आकस मनात ठेवून टोकाची प्रतिक्रिया कधीही देऊ. नये. ”
कुमुदताईंना तीन मुली झाल्या. सुंदर गुणी, त्यांच्यासारख्याच आकर्षक. मुलगा झाला नाही. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर चव्हाण दांपत्य पेढे आणि बर्फी दोन्ही घेऊन आमच्याकडे त्या दिवशी आले होते. कुमुदताईंनी माझ्या आईला घट्ट मिठी मारली. एक अबोल पण अर्थपूर्ण मीठी होती ती! एका वैचारिक चुकीची जणू काही कबुलीच होती ती. त्यानंतर कृष्णमेघ ओसरले. आकाश मोकळे झाले.
आज प्रातिनिधिक स्वरूपात विचार केला तर वाटते यात ‘कुमुदताईंना’ दोष देण्यात काय अर्थ आहे? सामाजिक वैचारिकतेचा हा पगडा असतो. अजून तरी समाज पूर्णपणे बदलला आहे का ?