मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुटलेला थर्मामिटर आणि वारी… लेखक : श्री राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुटलेला थर्मामिटर आणि वारी… लेखक : श्री राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री मंगेश जांबोटकर ☆

आज आमच्याकडे असलेला पाऱ्याचा थर्मामीटर चुकून फुटला. आणि त्यातला पारा जमिनीवर बारीक बारीक थेंब होऊन पसरला. थर्मामीटरच्या काचांचे तुकडे नीट व्यवस्थित गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावल्यानंतर माझा मोर्चा मी पाऱ्याकडे वळवला. मी हळू हळू एकेक थेंब एकत्र करायला लागलो. पाऱ्याची एक विशेषता असते. पाऱ्याचा एक थेंब दुसऱ्याजवळ नेला की क्षणार्धात ते दोन थेंब एकत्र येऊन त्याचा एक मोठा थेंब बनतो. या पद्धतीने मी एकेक थेंब करून सगळा पारा एकत्र केला आणि शेवटी एका कागदाच्या पुडीत हळुवारपणे ठेऊन दिला.

पाऱ्याचा संदर्भात निरीक्षण करताना काही गोष्टी लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे पाऱ्याचा एक थेंब दुसया थेंबाव्यतिरिक्त इतर कुठल्याही पदार्थाला चिकटत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन थेंब जेव्हा क्षणार्धात एकत्र येतात त्यानंतर त्यांचं वेगळं अस्तित्वच राहात नाही. दोन थेंब मिळून एक मोठा थेंब तयार होतो, पुन्हा त्याच गुणधर्माचा. तिसरी गोष्टअशी की पुन्हा त्या थेंबावर अगदी हलका प्रहार केला तरी त्याचे अनंत थेंब होऊन ते पुन्हा सगळीकडे पसरतात आणि गंमत म्हणजे प्रत्येक पसरलेल्या थेंबाचे गुणधर्म पुन्हा तेच असतात.

मला हा पाऱ्याचा खेळ बघताना पंढरीच्या वारीचं आणि वारकरी मंडळींचं कोड थोडं सुटलं आणि काही गोष्टी लक्षात आल्या.

१. पाऱ्याचा त्या विखुरलेल्या थेंबांसारखे सगळे वारकरी सगळीकडे पसरलेले असतात. छोटे छोटे थेंब असले तरी त्यांचा गुणधर्म सारखा असतो तो म्हणजे विठ्ठलप्रेम.

२. वारीची वेळ झाली की इतर कुठल्याही गोष्टीला न चिकटता ते पंढरीच्या वाटेवर निघतात आणि दुसरा थेंब म्हणजेच दुसरा वारकरी दिसला की क्षणार्धात एक होऊन विठ्ठलभक्तीचा एक मोठा थेंब तयार होतो. वारीच्या वाटेवर असे एकेक थेंब मिळत जाऊन विठ्ठलभक्तांचा इतर कुठेच न लिप्तळणारा एक मोठा थेंब शेवटी पंढरपुरात निर्माण होतो.

३. त्या मोठ्या थेंबात प्रत्येक छोट्या छोट्या थेंबाचे गुणधर्म वेगळे दिसतच नाहीत. तिथे ना जात ना पात. तिथे असतो विठ्ठलनामाचा आणि विठ्ठलप्रेमाचा एकच गुणधर्म.

४. वारी नंतर विठ्ठलभक्तीच्या त्या मोठ्या थेंबातून पुन्हा बारीक बारीक थेंब निर्माण होऊन आपापल्या गावी परतत असले, तरी ते पसरतात त्या विठ्ठलप्रेमाचा एकच गुणधर्म घेऊन.

वारीचं हे कोडं उलगडल्यावर अजून एक गोष्ट लक्षात आली की वारकरी होणं सोपं नाही. कारण त्यासाठी विठ्ठलनामाचा आणि विठ्ठलप्रेमाचा गुणधर्म अंगी बाणायला लागेल आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे पाऱ्यासारखं विठ्ठलनामाव्यतिरिक्त इतर सगळ्या सांसारिक कचऱ्यापासून पूर्ण अलिप्त व्हावं लागेल. जमेल ते मला?

लेखक :श्री. राजेंद्र वैशंपायन

प्रस्तुती :श्री. मंगेश जांबोटकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

थैमान  या शब्दातच रौद्र रसोत्पत्ती आहे.  थैमान निसर्गाचे असो,  एखाद्या विषाणूचे असो, सामाजिक राजकीय घडामोडींचे असो  किंवा  व्यक्तीच्या मनात उसळलेल्या विचारांचे असो पण थैमान  या शब्दात एक भयानकता आहे, हिंसाचार आहे.  कुठलाही सौम्यपणा अथवा सौंदर्य त्यात जाणवत नाही.  तांडव आणि थैमान हे तसे एकाच अर्थाचे दोन शब्द.  थैमानात  तांडव असते आणि तांडवात थैमान असते. एकच तीव्र सुरावट घेऊन ते अंगावर आढळतात.  थैमान बाहेरचे असो किंवा आतले असो ते काहीही करून ओसरावे याची आस लागून राहते.  थैमान म्हणजे नको असे काहीतरी आणि त्यापासून दूर जाण्यासाठी चाललेली झुंज म्हणजेच नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याची धडपड. 

सुश्री अरुणा मुल्हेरकर

साधारण अशाच अर्थाची  थैमान या शीर्षकांतर्गत, माननीय कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची एक गझल वाचण्यात आली आणि त्यातल्या भावभावनांचा मागोवा घ्यावासा वाटला.

अगोदर आपण कविता वाचूया.

☆ – थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

काळोख दाटलेला काहूर माजलेले

अस्वस्थ का असे मन माझेच जाहलेले

*

नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी

सुख नेमके समोरी होतेच ठाकलेले

*

दिन सारखेच सांगा असतात का कधीही

होणार अस्त नक्की ऋतुचक्र चाललेले

*

अर्ध्यावरीच माझा संसार का तुटावा

कोडे कधी न सुटले मज तूचि घातलेले

*

घन दाटतात गगनी दिसते धरा सुहासी

दावानलात एका सर्वत्र जाळलेले

*

आयुष्य शिकविते मज खोटे नि काय असली

पाऊस शांत होतो  विश्रांत भागलेले

*

आता मला कळाले हे सार जीवनाचे

सारे पळून गेले थैमान दाटलेले

*

कवयित्री : सुश्री अरूणा मुल्हेरकर

आनंदकंद  वृत्तातील ही संपूर्ण गझल वाचताक्षणीच मनात आले की हे कवयित्रीच्या मनात चाललेलं विचारांचं थैमान आहे.  विचारांचं ओझं पेलवेनासे झालं की माणूस हतबल होतो आणि नकळतपणे गतायुष्याच्या आठवणीत खेचला जातो आणि त्या क्षणापासून आठवणींशी मनाचा संवाद सुरू होतो. 

अरुणाताई गझलेतल्या मतल्यात म्हणतात,

 काळोख दाटलेला काहूर माजलेले अस्वस्थ का असे मन माझेच जाहलेले

 ही एक मनाची बेचैन स्थिती आहे. काहीशी उदास,  निराश. मनातले

विचारांचे काहूर,  विचारांचे वादळ अजिबात स्वस्थता मिळू देत नाहीत.  वरवर,  दर्शनी जरी एखादी व्यक्ती स्थिर आणि शांत भासत असली तरी अंतर्मनातल्या वादळी लाटा धक्के  देत असतात आणि मग सहजपणे मनात येतं की का घायाळ माझे मन? कशासाठी मी अस्वस्थ आहे? बेचैन आहे? 

 एकदा का मनाशी संवाद सुरू झाला की अनेक भेंडोळी उलगडायला लागतात…

 नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी   सुख नेमके समोरी होतेच ठाकलेले

 आयुष्यात जपलेल्या सुखाच्या कल्पना काही अवास्तव  नव्हत्या आणि विशेष म्हणजे सुख माझ्या दारातच होते.  ते शोधण्यासाठी मला कधी धावाधाव करण्याची गरजच पडली नाही. अरुणाताईंनी लिहिलेल्या या पहिल्या शेरातच आनंदी राहण्याची,  आहे त्यात समाधान आणि सुख वेचण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. 

 नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी हा उला फार अर्थपूर्ण आहे.   आयुष्यभर माणूस सुख समजून मृगजळापाठीमागे  धावत राहतो कारण खरं सुख कशात आहे हेच त्याला उमगलेल नसतं आणि परिणामी त्याच्या पदरी दुःख आणि निराशाच येते पण कवयित्री आपल्या या शेरात स्वतःबद्दल खात्रीपूर्वक सांगतात की “उंबरठ्यावरच्या सुखाला डावलून त्या पळत्याच्यापाठी कधीही गेल्या नाहीत.”

 घरात असता तारे हसरे 

मी पाहू कशाला नभाकडे?

*

 अशीच त्यांची वृत्ती असावी.

*

 दिन सारखेच सांगा असतात का कधीही

 होणार अस्त नक्की ऋतुचक्र चाललेले

 हा  तिसरा शेर अरुणाताईंच्या मनाची अध्यात्मिक बैठक दर्शवणारा आहे.  काळ स्थिर नसतो, तो बदलत असतो. जे आज आहे ते उद्या नसणार आहे  हा निसर्गाचा नियम आहे.  बदलणारे ऋतू म्हणजे निसर्गात घडणारी स्थित्यंतरे. मानवी जीवनातही अशी स्थित्यंतरे होत असतात.  सुखदुःखाचा लपंडाव चालू असतो.  हा शेर वाचताना असे वाटते की यात जीवनाविषयीची स्वीकृती आहे,  स्वतःच्या मनाला बजावणं आहे आणि मनाला समजवण्याच्या प्रक्रियेतूनच हे विचारांचं थैमान उठलेलं आहे.

अर्ध्यावरीच माझा संसार का तुटावा  कोडे कधी न सुटले मज तू चि  घातलेले

 मनात प्रचंड दुःख आहे, तीव्र घालमेल आहे.

 भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी 

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी

 या गीताची आठवण करून देणारा आहे. अरुणाताईंचा हा शेर मन कातरून टाकतो. 

सुखासमाधानात दिवस चालले होते, खाच— खळगे, काटेकुटे तुडवतही एकमेकांच्या साथीने हसऱ्या सुमनांची ओंजळ भरली होती मग मध्येच हात सोडून माझा जिवलग हे जग सोडून का गेला? 

काही प्रश्नांना उत्तरेच नसतात आणि म्हणून ते न सुटणारी कोडी बनून आयुष्य व्यापून टाकतात मग या कोड्याचं उत्तर कोणाला विचारायचं?  एका अज्ञात शक्तीला, आकाशातल्या त्या बापाला… “तू मला अनंत सुखं देता देता हे न पेलवणारे दुःख का माझ्या झोळीत टाकलेस?  असा मी काय गुन्हा केला होता?”

हा संपूर्ण शेर म्हणजे मनात तुडुंब भरलेल्या वेदनेचीच घागर आहे. कुठल्यातरी अलवार क्षणी ती डचमळते आणि मग मनातलं हे वादळ अधिकच थैमान घालू लागतं. 

घन दाटतात गगनी दिसते धरा सुहासी दावानलात एका सर्वत्र जाळलेले

ग्रीष्माने फाटलेली,  भेगाळलेली धराही  शांत होते जेव्हा आभाळात मेघ  दाटतात. एकाच वेळी वादळ आणि सांत्वन,  वेदना आणि शमन या भिन्न भावाविष्काराचे सुंदर वर्णन या ओळींमध्ये आहे.  हा संपूर्ण शेर रूपकात्मक आहे.  सानीमध्ये वापरलेला दावानल हा शब्द  मनासाठी रूपक म्हणून वापरला आहे.  शांत दिसणाऱ्या अर्णवाच्या उदरात वणवा पेटलेला असतो तसा मनाच्या सागरातही विचारांचा वणवा पेटलेला असतो.  भावनांचा उद्रेक झालेला असतो.  

 घन दाटतात गगनी

 दिसते धरा सुहासी

मनात शांत वारे अचानक वाहू लागतात,  सकारात्मक विचार येऊ लागतात,  हरवलं जरी असलं  खूप काही तरी अजूनही बरंच बाकी आहे. आठवणींच्या रूपात,  त्याच्या अंशांच्या रूपात.. जे आनंददायी आहे.  इथे या विचारांना घन  दाटले  गगनी  ही उत्प्रेक्षा म्हणजेच कवयित्रीची काव्यात्मकता ! 

मनातला नकोसा कचरा जळत आहे आणि पुन्हा सुखाचा भास होत आहे. नकळत थैमान ओसरत आहे.

आयुष्य शिकविते मज खोटे नि काय असली 

पाऊस शांत होतो विश्रांत भागलेले

आयुष्याच्या प्रवासात खूप काही शिकले.  खरं काय,  खोटं काय,  काय अस्सल काय हीणकस याची धक्के खात का होईना ओळख झाली आहे आता.

मनाची अशी एक स्थिती असते की आता साऱ्या लाटा ओसरून गेल्यात, किनाऱ्यावरचा गाळ,  कचराही त्या लाटांबरोबर वाहून गेलाय आणि आता किनारा स्वच्छ,  सुंदर आणि स्थिर झाला आहे. 

सहजच  केशवसुतांच्या या ओळी आठवतात. 

* शांतच वारे शांतच सारे*

 शांतच हृदयी झाले सारे

कवयित्रीचे मनातले वादळ आता असेच  शमत आहे.  मनातल्या विचारांच्या पावसाचे  थैमान आता ओसरत आहे कारण आता गतकाळातल्या सुखी जीवनाच्या आठवणीतच मन रमू लागलं आहे.  या शेरात अरुणाताईंनी त्यांच्या हृदयातला एक अव्यक्त सरगम  व्यक्त केला आहे.

 आता मला कळाले हे सार जीवनाचे

 सारे पळून गेले थैमान दाटलेले 

या शेवटच्या शेरामध्ये जीवन यांना कळले हो असा एक अध्यात्मिक विचारच जणू मांडला आहे. 

जीवन हे एक मंथन आहे. साऱ्या सुखदुःखाची घुसळण होते आणि मग हाती सार लागते.  सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख हा नियतीचा नियमच आहे.  दुःखातून सुखाचा मार्ग काढणे म्हणजे जीवन जगणे.  विचार करता करता कवयित्री अरुणाताईंना याची जाणीव झाली आहे आणि त्या म्हणतात,

 आता मला कळाले हे सार जीवनाचे 

“दुःख उगाळत राहण्यापेक्षा सुखाला दार उघडून द्यावे”  हे मी जाणते आणि आता हे मनातल्या काळोखातलं थैमान कसं ओसरत आहे याचाही अनुभव घेत आहे.

ही गझल म्हणजे मनाचा एक प्रवास आहे.

अस्वस्थतेकडून स्थैर्याकडे नेणारा.

मिटलेलं दार उघडून देणारा.

अस्तापासून उदयाकडे नेणारा.

अतिशय सुंदर, अर्थपूर्ण, अशी ही गझल.  साध्या साध्या पण सुंदर रूपकातून जीवनाविषयीचा एक सखोल संदेश ही गझल वाचत असताना मिळतो. वादळातून शांततेकडे,  नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारा एक विचार प्रवाह या गझलेत अतिशय नेमकेपणाने,  सुटसुटीत शब्दात मांडलेला आहे

 माजलेले,  जाहलेले,  ठाकलेले, चाललेले, घातलेले यासारखे लगावली साधणारे काफीया  शेरामधली खयालत आणि राबता यांची खोली दर्शवतात.

 थोडक्यात अरुणाताई मुल्हेरकर यांची थैमान म्हणजे एक सुंदर गझल,  एक सुंदर खयालत,  एक सुंदर संदेश.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ त्यांचा पाऊस… आमचा पाऊस… एक वेदना  – लेखक : हेरंब कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?  विविधा ?

☆ त्यांचा पाऊस… आमचा पाऊस… एक वेदना  – लेखक : हेरंब कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे

पाऊस धुवांधार कोसळतो आहे. सगळी धरणे वेगाने भरत आहेत. पावसाळी पर्यटनाला उधाण आले आहे. फेसबुकवर या ओल्याचिंब फोटोंचा खच पडलाय. शहरी भागाला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरल्यामुळे शहरी माणसे खुश आहेत.. धरणे भरताना धरणाच्या खालच्या लाभक्षेत्रातील माणसे क्रिकेटचा स्कोर बघावा तसे रोज किती पाणी वाढते ते बघत असतात आणि एकदा धरण भरले की ते सेलिब्रेट करायला धरणाकडे, धबधब्याकडे धाव घेतात… कोसळणारा पाउस, धबधबे आणि हातातील फेसाळती बिअर एकमेकात मिक्स होऊन जाते..

पण ही धरणे अवघ्या पंधरा दिवसात इतकी पटकन भरताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसात तिथे राहणाऱ्या आदिवासी गरिबांच्या जगण्याचे काय होत असेल ? याचा विचार तरी मनात येतो का ? धरणाच्या फेसाळत्या पाण्याबरोबर वाहत आलेले त्यांचे अश्रू धरणाच्या लाभक्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या लक्षात तरी येतात का ?

जवळपास सर्वच धरणाचे पाणलोट क्षेत्र हे दुर्गम भागात असते. तो पहाडी आणि जंगली भाग असतो. त्या परिसरात आदिवासी किंवा शेतकरी कष्टकरी लोक राहत असतात. पाउस जेव्हा नियमित असतो तेव्हा हळूहळू धरण भरते पण जेव्हा एखादे धरण अवघ्या काही दिवसात मुदतीआधी भरते तेव्हा त्या पाणलोट क्षेत्रात किती भयावह स्थिती असते याची कल्पना करता येणार नाही पण तो कधी चर्चेचा विषय होत नाही..

मी ज्या अकोले तालुक्यात राहतो. त्या तालुक्यात भंडारदरा धरण आहे. या धरणाची क्षमता ११ टीएमसी आहे. दरवर्षी हे धरण १५ ऑगस्ट ला भरते पण यावर्षी ते १५ दिवस अगोदर भरले आहे.. ज्या आदिवासी पाड्यातून हे पाणी या धरणात येते त्यांची अवस्था आम्ही बघतो, ती स्थिती जास्त पाऊस झाल्याने अधिकच विदारक होते.

त्यांची घरे काही आपल्यासारखी बंगल्याची सिमेंटची नसतात, त्यामुळे पावसात चहा घेत टीव्ही वर राजकारणाच्या बातम्या बघत निवांत ते राहू शकत नाहीत. आधीच त्यांचे घर झोपडीवजा असते. इतक्या वेगवान आक्रमक पावसात ती घरे नीट टिकाव धरत नाहीत. घरे गळत असतात. जनावरेही सततच्या थंडीत काकडून जातात त्यामुळे कधीकधी थंडीत मरतात. इतक्या पावसात चाराही आणता येत नाही त्यामुळे अनेकदा चांगला गोठा नसेल तर जनावरांना घरात आत घ्यावे लागते. एवढ्या छोट्या जागेत माणसे आणि जनावरे एकत्र राहतात. त्या दाटीत ते कसे राहत असतील ..?

पुन्हा पाउस एकदा सुरु झाला की वादळात वीज खंडित होते. अगदी महिना महिना वीज नसते अशी स्थिती अनेक पाड्यांवर असते. वीज नसल्याने जवळच्या गिरणीत धान्य दळून मिळायला अडचण होते. अंधारात महिनाभर ही माणसे राहतात .. मोबाईल चार्ज होणे तर दूरच.

भात लावणी होते पण या तीव्र पावसात इतर रोजगार बंद होतात.. घरात साठवणूक तरी या गरीब माणसांची किती असणार ? घरातून बाहेर निघणे मुश्कील होते. लाकूडफाटा गोळा करायला ही जाता येत नाही अशी बिकट स्थिती ….

पाऊस जर अतितीव्र असेल तर शेतीची मातीही वाहून जाते. ती थांबवणे हे आव्हान असते. आमच्या तालुक्यात एकदा एका शेतात डोंगर कोसळला आणि ती शेतीच करणे मुश्कील झाले.. दु:खाचा डोंगर कोसळतो म्हणजे काय ? याचा प्रत्यय त्या लोकांना आला असेल..

इकडे धरण भरण्याचा जल्लोष सुरु असताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील माणसे अशा रोजच्या जगण्याच्या प्रश्नाशी झगडत असतात…

याच माणसांच्या पूर्वजांनी जमिनी या धरणासाठी दिलेल्या असतात, यांचेच पूर्वज मजूर म्हणून या धरणावर मजूर म्हणून राबलेले असतात आणि आज धरण भरताना त्या पावसाची किंमत हीच माणसे चुकवत असतात… या माणसांना धरण काय देते ? पुनर्वसन कायदे आज आले पण फार पूर्वी बांधलेल्या धरणात ज्यांचे सर्वस्व गेले ते सर्वहारा आहेत…. नर्मदा जन आंदोलनात पुनर्वसन कसे होते ते किती फसवे असते आणि सरकार अगदी न्यायालयात सुद्धा किती धडधडीत खोटे बोलते हे आपण बघितले आहे.. मेधा पाटकर सारख्या एका प्रतिभावंत व्यक्तीचे आयुष्य खर्ची पडले तरी अजूनही प्रश्न त्याच गर्तेत फिरताना बघतो आहोत ..

सर्वात विदारक काळा विनोद हा असतो की उन्हाळ्यात यातील अनेक पाड्यावर पाणी टंचाई असते आणि हे लोक पाण्यासाठी वणवण फिरतात.

ही सारी वेदना दया पवार यांच्या कवितेत अगदी तंतोतंत उतरली आहे.. आमच्या तालुक्यात भर पावसात भिजणाऱ्या केविलवाण्या झोपड्या बघितल्या की ही कविता दया यांनी या पाड्यावर लिहिली का ? असे प्रश्न पडतात …

बाई मी धरण धरण बांधते

माझे मरण मरण कांडते

      पुढे दया म्हणतात…

वेल मांडवाला चढे

माझ्या घामाचे गं आळे…

माझ्या अंगणी अंगणी पाचोळा ग पडे….

      

खरेच या माणसांना काय मिळते ?

आज पुणे शहराला १७ टीएमसी पाणी लागते. त्या पाण्यावर ही समृद्धी उभी आहे. त्या पाण्याचा माणसे बेसुमार वापर करतात, स्विमिंग टॅंक पासून सारे काही मनोरंजन उभे राहताना त्या धरणांची आणि पावसाची भयावह किंमत चुकवणाऱ्या माणसांना व्यवस्था म्हणून आपण काय दिले याचा कधीतरी या आनंदात विचार करतो का ? किमान त्याबद्दल आनंद साजरे करताना संवेदना तरी ?

हे दोन जगातील अंतर इतके टोकाचे आहे की या जल्लोषात त्यांचे हुंकार पोहोचत सुद्धा नाहीत.

एकदा मी असाच पावसाळ्यात आमच्या भंडारदरा परिसरात गेलो होतो. पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पाउस थोडावेळ थांबला होता.. एक मुंबईची पर्यटक महिला वाहणाऱ्या छोट्या धबधब्यात पाय टाकून पाउस कधी सुरु होईल म्हणून आकाशाकडे आशेने बघत होती आणि पाउस थांबला म्हणून एक आदिवासी महिला घाईने लाकडे जळण म्हणून गोळा करत होती.. कडेचा हा जल्लोष तिच्या गावीही नव्हता… माझ्या मनात आले दोघीही महिला, पण दोघीचे भावविश्व किती वेगळे… एक पाउस येण्याची वाट बघणारी आणि दुसरी पाउस थांबण्यासाठी वाट बघणारी.

पावसातही भारत – इंडिया असतो तर ….

धरणे यावर्षी लवकर भरली.. कदाचित त्यात या पाणलोट क्षेत्रातील माणसांचे अश्रू असल्याने तर पाणी वाढले नसेल…?         

लेखक :  हेरंब कुलकर्णी

प्रस्तुती – मेघःशाम सोनवणे

मो – 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वातंत्र्य दिन 🇮🇳 ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

स्वातंत्र्य दिन 🇮🇳 ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

(१५.०८.२०२४)

आज भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिवस. 🇮🇳

मागील ७८ वर्षात भारताने लक्षणीय प्रगती केलेली आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यात राहूनही काही वर्षात अशी नेत्रदीपक प्रगती करणे हा पराक्रम म्हणावा लागेल….!

अनेक क्षेत्रातील प्रगतीची उंच शिखरे गाठत असताना, आपण माणुसकीच्या शिखरावरून खाली तर येत नाही ना याचाही विचार केला पाहिजे.

आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीने मागील हजारो वर्षात कोणावरही आक्रमण केले नाही, तर याउलट सर्व विचारधारांना आपल्या मध्ये सामावत माणुसकी धर्म वाढवण्याचा प्रयत्न केला.

*भगवंताने गीतेत सांगितलेला उपदेश प्रत्यक्ष आचरणात/कृतीत आणण्याचा कालावधी सुरू झाला आहे असे म्हणता येईल. देशातंर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आपल्याला आढळून येईल. भागवतांनी सांगितलेली गीता अर्जुनाने नुसती पाठ केली नाही, तर ती समजून घेऊन अधर्मी लोकांचा नाश केला. हा इतिहास आपण आजच्या पावन दिनी आठवूया.

अर्जुनाने शमी वृक्षावर ठेवलेली शस्त्रे काढून युद्ध केले. आज आमच्या घरात उंदीर मारायला काठी असेल असे सांगता येत नाही. आपल्या सर्व देवी देवतांच्या हातात शस्त्र आहे आणि ते चालवण्याची धमक आणि कुशलता देखील आहे. आपण याचे अनुकरण आणि अनुसरण करण्याची गरज आहे.

अधर्माचा नाश आणि धर्माची प्रतिष्ठापणा करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. भारत विश्विजेतेपदी विराजमान होण्यासाठी दुर्जन सक्रिय आणि सज्जन निष्क्रिय हे समीकरण उलट करावे लागेल.

यासाठी आरक्षणाची नाही तर स्वतः देशाचे, धर्माचे संरक्षण करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

आजच्या पावनदिनी आपण अशी प्रतिज्ञा करू की भारतमातेच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत, यापुढे माझी भारतमाता कधीही खंडीत होणार नाही…!!

“मोठा झालो तरी देखील

मी तुला विसरणार नाही

दे म्हटले तरी देखील

तुला अंतर देणार नाही

तू सुखी तर आम्ही सुखी

तुला सारे कळते आई

तुझ्या डोळ्यांत अश्रू येतील

असे कधी होणार नाही.”

भारत माता की जय!! 🇮🇳

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय!!!💐

*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Lee Kuan Yew – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ Lee Kuan Yew – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

Lee Kuan Yew

१९६७ मध्ये जेव्हा Singapore हे Malaysia पासून वेगळे झाले तेव्हा Singapore एक जंगल होते. Mumbai पेक्षा हि लहान असलेल हे एक बेट. Natural resources नाही, कोळश्याच्या किंवा aluminium च्या खाणी नाही, उद्योग धंदे नाही, इतकेच काय तर प्यायचे पाणी पण नाही. प्यायचे पाणी त्यांना Malaysia कडून ५ रुपये लिटरने विकत घ्यावे लागे. उद्योगाच्या नावावर फक्त मासेमारी.

ज्या दिवशी Singapore हे Malaysia  पासून वेगळे करण्यात आले, त्या दिवशी एक माणूस ढसढसा रडला. आता आपल्या देशाचे काय होनार ह्या चिंतेत त्याने स्वतःला १२ दिवस एका खोलीत कोंडून घेतले आणि बाहेर पडला तो एक निर्धार घेवुन. त्याने सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळात हुशार लोक नेमले आणि लोकांना सांगितलं कि तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. 

अत्यंत खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या ह्या एका माणसाने पुढील काळात मग Singapore  चा असा काही कायापालट केला कि आज Singapore  हे Asia  मधील सर्वात समृद्ध राष्ट्र म्हणून मानल जात. त्या एका माणसाच्या Vision , Policies आणि Determination मुळेच. Singapore चं आज जन्मलेलं मूल सुद्धा करोडपती आहे. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या रोज Singapore च्या दरवाज्यात उभ्या असतात, उद्योग सुरु करण्याचं application घेवुन. त्या एका माणसामुळे आज  सिंगापुर citizens ला एवढा मान आहे कि जगातल्या १७० देशात Singaporeans ना  VISA-Free एन्ट्री आहे ! त्या माणसाचे नाव आहे Lee Kuan Yew, Singapore चे पहिले पंतप्रधान.                   

वयाच्या ९१ व्या वर्षी आजाराने त्यांचे निधन काही वर्षांपूर्वीच झाले, त्यांच्या अंत्ययात्रेला 99% सिंगापूरवासी शामील होते, हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे..!!! केवळ एक माणूस एखाद्या संपूर्ण देशाचं भविष्य कसं बदलवू शकतो ह्याचं Lee Kuan Yew पेक्षा उत्तम उदाहरण कदाचितच असावे. 

बहुधा अशी लोकं प्रेरणा देण्यासाठीच जन्माला येतात…. त्यांचा एकच संदेश ……                     

“ धर्मवादी व जातीवादी राहण्यापेक्षा ध्येयवादी राहा. “

*

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्मृतिगंध… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ स्मृतिगंध…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

*

मला आठवतंय,…

खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा ….

भरपूर उपभोगलं त्यामुळे….

उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल

सर्वत्र पसरलेली असायची…

    

आता तसं नाही…

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं !

खूप महाग झालंय बालपण…. !

   

पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,

फुल टाईम आईच  असायची तेव्हा ती ……!

आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची….

 

आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय

जॉबला जातेय हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते….!

 

मामाचे गाव तर राहिलेच नाही ….

मामाने सर्वांना मामाच बनवलं ….

प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे….

आधी मामा भाच्यांची वाट पहायचे ….

आता सर्वांना कोणी नकोसे झालेत ….

हा परिस्थितीचा दोष आहे …

  

मित्रसुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा…

हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची….

शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी… !

 

आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,

“डोन्ट शेअर युअर टिफिन हं !”

मैत्री बरीच महाग झालीय आता.

  

हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते ….!

 

सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती…..

 

घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ…

इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे ….!

  

ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं…..

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची…..

वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची….

 

आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

  

एवढंच काय, तेव्हाचे

संसारसुद्धा किती स्वस्तात पार पडले….

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. ..

सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड…!

रात्री गरम खिचडी, की झाला संसार…

ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची…!

 

आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं…!

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय आपण ….मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं …..!

  

काल परवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं…..

पण आता ….

 तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय….

   

म्हणून म्हणतोय… जीव आहे तोवर भेटत रहायचं.. आहोत तोवर आठवत राहायचं……

नाहीतर आठवणीत ठेवायलासुद्धा कोणी नसणार ….ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो..

म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा ….

नाहीतरी ह्या स्मृतीगंधा शिवाय आहे काय आपल्याजवळ.. हो ना …..!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “अनंत आमुची ध्येयासक्ती…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “अनंत आमुची ध्येयासक्ती…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

जून महिना उजाडला तरी पावसाचा अजून पत्ता नव्हता..कडक उन्हाने मवाळपण धारण केले आणि आमच्या सावल्या आशेने शाळेला चालत निघाल्या… आम्ही जसे एकेक पाऊल पुढे पुढे टाकत निघालो तश्या तश्या त्या आमच्या पुढे पुढे चार पावलं पुढेच निघाल्या.. जणूकाही आमच्या पेक्षा त्यानांच जास्त शाळेला जाण्याची घाई लागली होती.. आनंद झाला होता.. आनंदाने त्या नाचत बागडत निघाल्या  होत्या.. आमच्या पायाला गुदगुल्या करून त्या म्हणत होत्या, …. ‘पोरावो  पायं उचला कि रे जरा पटापट.. करा जरा घाई बिगी बिगी जाण्याची… अजून शाळा बघा किती लांब राहिली ती मैला मैलाच्या अंतरावरती… ठावं हायं मला पायात तुमच्या पायताणं न्हाईत ते…उलंसं कुठं तरी पोळत असतील ते.. चुकार बारीक खडं नि वांड बाभळीचा काटा खुपत असणारं तुमची नदर चुकवून.. मगं कळ येउन शान आई गं म्हणाशाल कि भुलवलं तुम्हाला त्यांनी शाळेचा रस्ता चुकवाया… नगं शाळंत आज जायाला ,जाऊ उद्याला नाहीतर परवाला… शाळा कुठं पळून जातीया.. आम्ही पोरचं जर शाळंला गेलो न्हाई तर ती कुणाला बरं शिकवितीया… पाठीवर नि खाकंला पिशवीत ठूलेली पाटी नि पेन्सल.. पुस्ताकाची पुढची चार आणि मागची पाच पानंच कवाची फाटलेली  असलं मिळालेलं पुस्तक आमहास्नी त्या गरजू मदत केंद्राकडनं…योकच वही बानं घेउन दिल्याली  वरसाचा आभ्यास लिवायला.. अन वरनं दमात बोलला लै पैका खरच झालाय तुमच्या शाळंच्या शिक्षनाला.. खताला नि वैरणीला इथं पैका नसं द्यायला.. अन तुम्ही कुठं हुताय एव्हढं शिकून बॅरिस्टर नि फॅरिस्टर व्हायला.. गडी मिळनातं अव्वाच्या सव्वा पैका मोजून रानात राबायला… चारं पैसं तेव्हढचं शिलकीत राहत्यालं तुम्ही आलात रानात मदतीला…बालमजुरी हा कडक कायदा हाये कायद्याच्या पुस्तकात लिवलेला… तो कुठं घालतो पोटाला लेकराबाळांचा बारदाना असलेल्या घराला… आई जेऊ घालिना अन बा भिक मागू देईना असं सरकार डांबिस हाये.. तिकडं गुरूजी दारोदारी हिंडत्यात आईबांच्या पाया पडत्यात पोराला पोरीला शाळंत पाठवा महनत्यात माझ्या नोकरीचा सवाल हाये.. उगा गरीबाला उपाशी पाडू नगासा.. चारकच्चीबच्ची बी हायती मला… महिन्यानं फकस्त दोन येळा शाळंला येऊ द्या हाजरीला.. इन्स्पेक्टर होईल खूष पटावरची लिहिलेली हजेरी बघून… शाळा फसक्लास चालू हायं असा शेरा जाईल लिवून…बाकी सगळे दिस पोरं पोरी शाळंला नाही आली तरी चालंल… अ आ ई नि ग म भ न याच्या पलिकडं गाडी गेली नाही तरी चाललं…चौथीच्या पुढे शाळा वाढली नाही तरी चालंल…एक गुरूजी शाळा नि खडू फळा…बाकीचे गुरूजी शेहरातनं असत्यात.  पोकळ घोषणाबाजीत पुढाकार घेऊन म्हनत्यात शेहरातून खेड्याकडं वळा…शेतीप्रधान देश आपला… शेतकरी जगेल तर देश प्रगती करेल…तरच तरच आमची ध्येयासक्ती साध्य होईल..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जरा याद उन्हे भी करलो…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “जरा याद उन्हे भी करलो” ☆ सुश्री शीला पतकी 

गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातील……  

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक तरुणांनी या यज्ञात उडी घेतली ..सगळी तरुणाई देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे याच भावनेने काम करीत होती. आपले घरदार सोडले.. नातेवाईक सोडले ..खाणे पिणे कशाची पर्वा केली नाही….. 

त्यातलाच एक मुलगा होता चांदोरकर ! मूळचा अलिबागचा पण त्या ठिकाणी केलेल्या कारवायामुळे त्याच्यावर पकड वॉरंट होतं. तेथून तो अनेक ठिकाणी जागा बदलत बदलत सोलापुरात आला. सोलापुरात अशा भूमिगतांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे आमराई.  इथे ही स्वातंत्र्यवेडी मंडळी गावोगावी फिरून येत असत. तेथून संदेशाचे वहन व्हायचे.. निरोप जायचे.. योजना समजायच्या ! सोलापुरात हे ठिकाण अमराई मध्ये होते आणि आमराई ही रेल्वे स्टेशनला लागून होती. अर्थात सोलापूरच्या स्टेशनपासून बरीचशी लांब म्हणजे तीन चार किलोमीटर पुढे असलेलं बाळे स्टेशन जे आहे ते बाळे स्टेशन आणि सोलापूर स्टेशन याच्यामध्ये गाडीतून उडी मारून उतरून आमराईत घुसावे आणि माणूस कुठे गेला पत्ता लागू नये अशी ती घनदाट आमराई होती. या स्वातंत्र्य वीर क्रांतिकारकांना ही जागा म्हणजे मोठी पर्वणीच होती. अनेक क्रांतिकारक त्या ठिकाणी लपून राहत असत, तसाच हा चांदोरकर तेथे लपून राहिला. 

एके दिवशी त्याच्या एका मित्राने अलिबागवरून संदेश आणला की त्याच्या आईला उंदीर चावला असून ती त्या विषाने अत्यवस्थ आहे आणि अगदी शेवटचे क्षण मोजत आहे. पण आपला हा 20-22 वर्षाचा मुलगा भेटावा ही तिची शेवटची तीव्र इच्छा होती. हा निरोप ऐकल्यावर मात्र मातृभूमीची सेवा करायला निघालेला चांदोरकर माझ्या वडिलांच्या खांद्यावर मान ठेवून ढसाढसा रडला… माझे वडील तरी किती 25/ 26 वर्षाचे त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे.. त्याच्या थोरल्या भावाच्या वयाचे.  त्यांनी त्याची समजूत काढली. तो म्हणाला,” पत्की काही झाले तरी मला आईला भेटलेच पाहिजे रे.. मी आईला न भेटता राहिलो तर जन्मभर हे शल्य मला रुतून राहील “..वडील ही भावूक झाले.  ते म्हणाले मित्रा काळजी करू नकोस.  तुझ्यावर पकड वॉरंट आहे, तुला उघड प्रवास करता येणार नाही की. मग आता तू माझ्या घरात आलायस तेथून सुद्धा तुला बाहेर पडणे अवघड आहे, कारण पांजरपोळ चौकात पोलिसांच्या चौक्या बसलेल्या, त्याच्या आधी अलिकडे आमच्या घरापुढे असलेल्या चौकात ही चौक्या..  त्यामुळे तेथून बाहेर पडणे खरोखर अवघड होते ….पण वडील निरनिराळे वेशांतर करून काम करीत असत.  त्यामुळे त्यांनी लगेचच दोघांचे वेशांतर केले. 

स्वतःचे वेशांतर म्हाताऱ्या कानडी माणसात आणि तसेच मुलाचे वेशांतर कानडी मुलात केले म्हणजे लिंगायत मुलांमध्ये, आणि त्याला सांगितले की तू मुका आहेस हे लक्षात ठेव .कारण त्याला कानडी येत नव्हतं त्यामुळे तो मुका आहे हे सांगितले.  वडिलांना खूप छान कानडी येत होते .गळ्यामध्ये लिंग, डोक्याला मुंडासं असून झुपकेदार मिशा आणि किंचित  मेकअप करून ते दोघे संध्याकाळी आमच्या वाड्यातून बाहेर पडले.  संध्याकाळी थोडासा अंधार तो बराच गडद वाटत होता कारण त्या काळात लाईट नव्हते.  तेथून त्यांनी चौकी पार केली तरी पांजरपोळ चौकीत त्यांना एकाने विचारले की कुठे चालला आहात तर त्यांनी सांगितलं पोराला एसटीला बसवतो. त्याला बोलता येत नाही आणि मग त्यांनी खातरजमा करून त्यांना सोडून दिले.  

पुढे त्याच रस्त्याने ते दोघे चालत चालत 14 कमानी पर्यंत आले.  पूर्वी बाळ्याला एक ओढा होता आणि त्याला 14 कमानी होत्या. तिथे गुरांना चरण्याची शेती होती म्हणजे गुरांचा चारा त्या ठिकाणी पिकवला जात असे त्याच्यासाठी लागणारे पाणी आसपास असणाऱ्या मिलमधून सोडण्यात येत असे. पावसाळ्यात त्या 14 कमानीत पाणी आले की बाळ्याचा ओढा दुथडी भरून वाहत असे आणि मग वाहतूक बंद व्हायची.  परंतु तशी फारशी परिस्थिती नव्हती त्यामुळे त्या ओढ्यातून दोघांनाही चालत जाता आले. पुढे शेतातून रस्ता काढत काढत बाळे स्टेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. रात्रीची दहाची पॅसेंजर ती सोलापूरहून निघाली की पहिलं स्टेशन बाळे..  तिथे एक मिनिटभर थांबत असे तेवढ्यात एका वेशांतरीत पोराला चढवणे गरजेचे होते.  पण लक्षात आले की या मुलाने काही खाल्लेच नव्हते दिवसभर आणि पुढे अलिबागपर्यंतचा प्रवास कसा होईल ते सांगता येत नव्हते तो कुठल्या स्टेशनवर उतरणार हे ठरलेलं नव्हते.  पण मग त्याला काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था करावी या दृष्टिकोनातून विचार करता तिथे शेतामध्ये काही बकऱ्या खतासाठी बसवलेल्या होत्या.  त्या गुराख्याला आठ आणे देऊन वडिलांनी एक चरवी दूध विकत घेतले आणि त्याला म्हणाले ,”चांदोरकर एवढे दूध तू पी आणि यानंतर तुला घरी पोहोचेपर्यंत खायला प्यायला मिळणार नाही “..चांदोरकरांनी ती चरवी तोंडाला लावली आणि इतक्यात गाडीची शिट्टी ऐकू आली. 

शिट्टी ऐकल्याबरोबर चांदोरकरचे हात थरथरायला लागले त्याच्या हातून चरवी खाली पडली.  दूध शेतात सांडले.  तो म्हणाला “ पतकी ही गाडी गेली आता. आता मी माझ्या आईला भेटू शकणार नाही..” 

वडील म्हणाले “ धीर सोडू नको आपण जाऊ” .. आणि दोघेही पळत पळत बाळे स्टेशनच्या दिशेने गेले. स्टेशनच्या आसपास असतानाच त्यांच्यासमोरून धाड धाड धाड करीत एक गाडी निघून गेली पण सुदैवाने ती मालगाडी होती.  दोघांचाही जीव भांड्यात पडला.  सुमारे दहा मिनिटांनी पॅसेंजर गाडी बाळ्याला आली.  बाळे स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती.  अगदी तुरळ एखादा पॅसेंजर असे. वडिलांनी त्याचे पुण्यापर्यंतचे तिकीट काढले.  मुख्य म्हणजे याच्या नावाचे पोस्टर अनेक ठिकाणी लावल्यामुळे त्याचा चेहराही झाकूनच त्याला जावे लागले. चांदोरकर आपल्या आईला भेटण्यासाठी मार्गस्थ झाला….! 

वडिलांना ते समाधान वाटले.  त्यांनी वेशांतर सगळे पुसून आमराईत नेऊन टाकले आणि तेथून साधे कपडे घालून ते सोलापुरात परत आले. आमराईत कपडे बदलणे पेशांतर करण्याच्या सगळ्या सोयी आधीच करून ठेवलेल्या होत्या कारण अनेकांना  ते प्रयोग करावे लागत असत. वडील घरी पोहोचले त्यानंतर दोन दिवसाने अलिबागवरून संदेश आला …  चांदोरकर घरी पोहोचला.  तो मध्येच कुठल्यातरी स्टेशनवर उतरला आणि रातोरात ट्रकमध्ये बसून अलिबागला पोहोचला होता.  पहाटे घरी गेला .. आईला बघून त्याने हंबरडाच फोडला.  आईला मांडीवर घेतले ..  तिच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून तो हात फिरवत होता आणि आई त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती.  वीस बावीस वर्षाचा तो पोरगा ढसाढसा रडत होता आणि अर्ध्या तासात त्याच्या आईने प्राण सोडला……! वीस बावीस वर्षाचे ते पोर आईची सेवा करता आली नाही या दुःखाने निराश झाले होते, पण त्याने आईला वचनच दिले… की ‘ माते तुझी सेवा करता आली नाही तरी या मातृभूमीची सेवा मी मनापासून करेन.’  

नंतर चांदोरकरला अटक झाली तुरुंगवासही झाला. अशा वीस बावीस वर्षाच्या अनेक चांदोरकरांनी … अनेक तरुणांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या आयुष्यातल्या कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी गमावल्या होत्या पण त्यांना वेड होते की हा देश स्वतंत्र झाला पाहिजे.  त्यासाठी खूप हाल अपेष्टा सोसल्या, मारपिट सहन केली, निकृष्ट प्रतीचे तुरुंगातील अन्न खाल्ले, चाबकांचे फटके सोसले, तुरुंगात दोन दोन पायलीचे दळण दळले…. या सगळ्या यातना त्यांनी भोगल्या….  स्वातंत्र्याचा किती आस्वाद त्यांनी घेतला?… ठाऊक नाही.  पण एवढ्या कष्टाने मिळवलेल्या या स्वातंत्र्याची वाटचाल स्वराज्याकडून सुराज्याकडे होईल असे वाटले होते.  आज तसे होताना दिसत नाही ! टिळक आगरकरांचा महाराष्ट्र …  त्याऐवजी जाती-जातीत तेढ निर्माण करण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ही घोषणा दिली होती.  

टिळक आगरकर शाहू फुले आंबेडकर या सर्वांचेच कार्य महान आहे .. ते आपल्या सर्वांना अनेक पिढ्या मार्गदर्शन करणारे आहे .. सारेच वंदनीय.  पण हे जाती जातीत तेढ निर्माण करणारे राहील असे कधीच वाटले नव्हते.  राजकारण्याने मात्र त्याचा बरोबर फायदा घेतला.  राजकारणात सध्याचा चाललेला विचका पाहून .. या तरुणांनी का आपले प्राणार्पण केले..? का कष्ट भोगले …?असे प्रश्न निर्माण होतात.  पण तरुणाईचे ते वेड भारतातल्या रक्तारक्तात भिनले होते म्हणून ही भारतमाता आज सर्व शृंखला तोडून स्वतंत्र झाली आहे.  मला वाटतं तिलाही दुःख होत असेल .. ‘ मी स्वतंत्र झाले …पण हा देश मात्र पांगळा झालाय या विचाराने.. जातीयवादाने .. माणसा माणसातील दुराव्याने..’  

हा देश विखुरला जातोय की काय भीती वाटायला लागली.. विविध रंगाच्या फुलांचा जणू गुच्छ असावा तसा आपला देश आहे.  विविध संस्कृती- विविध भाषा- विविध चालीरीती- विविध प्रांत – तरीही ‘आम्ही सगळे भारतीय आहोत’ हा ध्यास मधल्या पिढीला होता..  तो आता लुप्त होताना दिसत आहे याचे वाईट वाटते.  गेल्या  15 ऑगस्टला मी वडिलांच्या फोटोसमोर हार घालताना म्हणाले होते, “ दादा तुम्ही पाहिलेले स्वप्न आमची पिढी सत्यात उतरू शकली नाही म्हणून माझ्या हातातला हा हार आहे की आमची हार आहे हेच मला कळत नाही “…. 

पण वडिलांच्या फोटोतून नकळत मला एक आवाज येत होता की ‘ बाळा हा देश इतका दुबळा नाही की कुणा दोन-चार राजकारण्यांच्या कुरापतीने ढासळून जावा.  लक्षात ठेव रात्रीनंतर रोज एक पहाट उगवत असते आणि ती सुराज्याची असेल अशी आशा आणि कामना कर देव तथास्तु म्हणत असतो ….! ‘ वडिलांच्या या वाक्यावर मी स्वतःलाच विचारले की का नकारात्मक विचार करावा आपण ? माझ्या देशात चांगले काही खूप आहे ते सकारात्मकतेने घेऊयात ना..  मग त्यात काय बिघडलं आणि ती सकारात्मकतेची ऊर्जा नक्कीच आपल्याला प्रगतीपथावर नेईल.  आता त्याची सुरुवात ही झालेली आहे नाही का?…..!

!! वंदे मातरम् !! .. !! जय हिंद !! 🇮🇳

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- महाबळेश्वरचा अखंड धुवांधार पाऊस हा माझ्या नित्यनेमात मुख्य अडसर ठरणाराय असंच वाटत रहायचं. कारण छत्री,रेनकोट, गमबूट हे सगळं दिमतीला असूनही हाकेच्या अंतरावरचं स्टॅंड गाठेपर्यंतही मी चिंब भिजून जायचो. संपूर्ण प्रवासात ते ओले कपडे अंगावरच थोडे सुकत आले तरी नृ. वाडीला पोचल्यानंतरही

त्यातला दमटपणा रेंगाळतच असायचा.

या सगळ्या कसोट्या पार करत पावसाळा कूर्मगतीने संपत चालला.आता सगळं सुरळीत सुरू राहील असं वाटत असतानाच प्रत्येक पौर्णिमेच्या वेळी नवीनच कसोटीचे क्षण अचानक माझ्यासमोर ‘आ ‘ पासून उभे रहायचे!)

महाबळेश्वरला गेल्यानंतरची जुलै महिन्यातली पहिली पौर्णिमा तशी निर्विघ्नपणे पार पडली. कोल्हापूरलाही घरी दोन-चार दिवस कां होईना रहाता आलं.परतीच्या प्रवासासाठी घराबाहेर पाऊल टाकलं न् ब्रॅंचमधल्या महत्त्वाच्या कामांच्या विचारांनी मनाचा ताबा केव्हा घेतला समजलंच नाही.

त्यानंतरचा एक महिना नेहमीसारखा धावपळीच गेला.

या महिन्याभरात दोन्हीकडच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना पगाराबरोबरच तोवरची जुजबी शिल्लकही संपून गेली होती. आॅगस्टमधल्या पौर्णिमेला दुपारच्या ३ वाजताच्या सांगलीच्या बसचे वेध आदल्या दिवसापासूनच लागले न् त्याचसोबत आर्थिक तरतूदीचं व्यवधानही.आदल्याच दिवशी पगार जमा झाला होता खरा,पण मेसचे पैसे देऊन,घरी देण्यासाठीचे एक हजार रुपये बाजूला काढून ठेवल्यानंतर हातात कशीबशी एक वेळच्या बस भाड्यापुरतीच जुजबी रक्कम शिल्लक रहात होती.सलिलसाठी सोबत थोडा खाऊ नेणं सोडाच,नृ.वाडीला

दर्शनाला जाण्यापूर्वी देवळाच्या वाटेवरील ओळखीच्या ‘अवधूत मिठाई भांडार’ मधून नारळ/कापूर घ्यायसाठीही पैसे उरले नसते.शिवाय परत आल्यानंतर पुढच्या पगारापर्यंतच्या महिनाभरातल्या माझ्या किरकोळ खर्चाचाही प्रश्न होताच.मेसमधे जेवून,महिन्याचं बील भागवून बाहेर पडलो,तेव्हा ब्रॅंचमधे पोहोचेपर्यंत हेच विचार मनात घोळत राहिले.या विचारांमधे हाच प्रश्न फॅमिली शिफ्टींगपर्यंत वर्षभर रहाणाराच होता याचंच दडपण अधिक होतं.कोल्हापूरला गेल्यावर घरी चर्चा करुन कांहीतरी मार्ग काढायला हवा हे ठरवलं खरं पण तिथली इतर व्यवधानं न् धावपळीत बायकोला हे सगळं सांगायची वेळ येऊच नये असंही तीव्रतेने वाटत होतं. बसला अजून तासभर वेळ होता.हेच सगळे विचार सोबत घेऊन मी घाईघाईने ब्रॅंचमधे गेलो.

ब्रॅंचमधे हेडकॅशिअर रांजणे माझीच वाट पहात होते.

“सर,हे सर्क्युलर बघा.गुडन्यूज आहे.”

मी उत्सुकतेने पुढे होत त्यांनी   कॅश विंडोमधून सरकवलेलं ते सर्क्युलर घेतलं. घाईघाईने त्यावरून नजर फिरवली आणि आश्चर्यानंदाने क्षणभर अवाक् होऊन ते सर्क्युलर पुन: एकदा वाचून खात्री करुन घेतली.माझ्यासाठी ती फक्त गूड न्यूजचं नव्हती तर त्या क्षणी माझ्या मनात रुतून बसलेले सगळेच प्रश्न चुटकीसाठी सोडवणारा, चमत्कार वाटावा असा तो एक योगायोग होता..!

राष्ट्रीयकृत बँकिंग स्टाफच्या वेज रिव्हिजन संदर्भातील ‘बायपार्टाईट सेटलमेंटच्या ‘इंडियन बँकज् असोसिएशन’ आणि ‘स्टाफ युनियन्स’ यांच्यामधील चर्चेच्या फेऱ्या बरेच दिवस सुरू होत्या. बोलणी यशस्वीरित्या पूर्ण होऊन पुढील पाच वर्षांसाठीचं ‘वेज रिवीजन ऍग्रीमेंट’ साईन झाल्याचं ते सर्क्युलर होतं. याच एॅग्रीमेंटनुसार ऑफिसर्सपैकी बॅंकांच्या सी.ए.आय.आय.बी च्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना एक अॅडिशनल इन्क्रिमेंट नव्याने मंजूर झालं होतं. माझ्यासाठीची खास गुड न्यूज होती ती हीच.

एखादी अनपेक्षित, अप्रिय, नुकसानकारक घटनाही त्यावेळी त्रासदायक ठरलेली असली तरी दीर्घकाळानंतर अचानक त्या घटनेतल्या तत्कालीन त्रासातही भविष्यकाळातील अनुकूलता कशी लपलेली असू शकते याची ही बातमी म्हणजे निदान माझ्यासाठीतरी नक्कीच एक दिलासा देणारी प्रचिती होती!

सी.ए.आय.आय.बी. पार्ट-१ ची परीक्षा मी नोकरीत कन्फर्म झाल्याबरोबर खूप अभ्यास करुन पास झालो होतो. अॅडिशनल इन्क्रीमेंटबरोबरच आॅफिसर प्रमोशनसाठीही मला त्याचा फायदा झाला होताच. पुढे ऑफिसर झाल्यानंतर नवीन जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच पार्ट-२चीही तयारी करून मी ती परीक्षाही जून ७९ मधे उत्तीर्ण झालो होतो. त्यामागे करिअरपेक्षाही तातडीने मिळणाऱ्या अॅडिशनल इन्क्रिमेंटच्या आर्थिक फायद्याचा विचारच प्रामुख्याने माझ्या मनात होता. पण १ जुलै १९७९ पासून अस्तित्वात आलेल्या वेज रिव्हीजनच्या नियमानुसार या परीक्षा नव्याने उत्तीर्ण झालेल्या माझ्यासारख्या ऑफिसर्सना मिळणारे जास्तीचे इन्क्रिमेंट बंद करण्यात आले होते. अर्थातच माझा तेव्हा खूप विरस झाला होता. आपल्या हक्काचं काहीतरी हिरावून घेतलं गेल्याचं  ते दुःख पुढे दीर्घकाळ माझ्या मनात घर करुन राहीलं होतं! तेव्हा हिरावलं गेलेलं सगळं मला अतिशय अनपेक्षितरित्या असं दामदुपटीने आता परत मिळणार होतं. १९७९ सालचा तो अन्यायकारक निर्णय बदलण्यासाठी ऑफिसर्स युनियनकडून तेव्हापासूनच सततचे प्रयत्न सुरू होते पण त्याला यश येत नव्हतं. त्यामुळे पाच वर्षानंतरच्या यावेळच्या व्हेज रिविजन संबंधीच्या मीटिंगमधे युनियनने तो प्रेस्टीज पाॅईंट बनवला होता. त्यामुळे तेव्हा नाकारलं गेलेले ते अॅडिशनल इन्क्रिमेंट पूर्वकालीक फरकासह आता मंजूर करण्यात आलं होतं.

बातमी अनपेक्षित आणि म्हणूनच अधिक आनंददायी होती पण त्या आनंदात मी गुंतून पडून चालणार नव्हतं.अडीच वाजत आले होते.घरी जाऊन बॅग घेऊन थेट स्टॅण्ड गाठायचं तर पाचदहा मिनिटांत मला निघालाच हवं होतं.

“सर,एक मिनिट…”

मी रांजणेंचा निरोप घेऊन जायला निघालो तेवढ्यात त्यांनी थांबवलं.

” सर,मी तुमच्या स्टाफ फाईल मधले सॅलरी डिटेल्स घेऊन तुमचे एरियर्स-कॅल्क्युलेशन करून ठेवलंय. चेक करून दिलंत तर लगेच तुमच्या अकौंटला क्रेडिट करतो.प्रवासाला निघालात म्हणून.हवे तर जास्तीचे थोडे पैसे बरोबर नेता येतील.”

माझी या क्षणीची नेमकी गरज रांजणेनी  न सांगता कशी ओळखली होती ते ‘तो’च जाणे.

मी कृतज्ञतेने रांजणेंकडे पाहिले.त्यांचे मनापासून आभार मानून अॅरीअर्सशीट चेक करायला घेतली. पाहिलं तर अॅरियर्सची   मला जमा होणारी रक्कम होती ५३४०/- रुपये. माझा पगार दरमहा १५००/-रुपये होता त्या काळातले ५३४०/-रुपये!मी थक्कच झालो. डिटेल्स चेक करुन ती फाईल आणि १००/-रुपयांची withdrawal slip रांजणेंकडे देऊन त्यांच्याकडून १००/-रुपये घेतले आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.

आज सकाळी बॅंकेत येताना आर्थिक नियोजनाचं केवढं प्रचंड दडपण माझ्या मनावर होतं आणि आता प्रवासाला निघण्यापूर्वीच ते ओझं ‘त्या’ने असं क्षणार्धात हलकं केलं होतं..!

ही अचानक मिळालेली एवढी रक्कम फॅमिली शिफ्टींग होईपर्यंतचे वर्षभर माझी जमाखर्चातली तूट भरुन काढायला पुरेशी ठरली.नेमक्या गरजेच्या क्षणी जादूची कांडी फिरावी तसा घडलेला हा योगायोग श्रध्देबरोबरच ‘त्या’च्याबद्दलची कृतज्ञता दृढ करणारा होता आणि

आता यापुढे दर पौर्णिमेच्या दत्त दर्शनाच्या बाबतीत कधीच कसलीच अडचण येणार  नाही असा विश्वास निर्माण करणाराही.पण पुढच्याच पौर्णिमेच्यावेळी एक वेगळंच आक्रित  माझी खऱ्या अर्थाने कसोटी पहायला समोर उभं ठाकणाराय याची मला याक्षणी कल्पना कुठून असायला?…

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘संध्याछाया –’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘संध्याछाया ’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

महात्मा फुले बसस्टॉप . बस मध्ये बायका मुले, वयस्कर मंडळी रिकाम सीट पकडण्यासाठी धावत पळत धडपडत वर चढत होती. हो बसायला जागा तर मिळायला हवी ना ! खिडकी जवळची सीट मिळाल्यामुळे मी अगदी खुशीत होते. इतक्यात ती आली आणि माझ्या शेजारचं सीट तिने चपळाईने पकडलं. हातातल्या भाजीच्या जड पिशव्या खाली ठेवताना, मी तिला न्याहाळलं. गोरापान गोल चेहरा धावत पळत आल्याने लाल झाला होता.

इतक्यात कंडक्टरचा कर्कश  आवाज आला “ओ दादा, किती वेळा सांगायचं तुम्हाला? धड  चालता येत नाही तर येता कशाला बस मध्ये धडपडायला? घरी पडा की  एका कोपऱ्यात आरामात . त्यातून हा पांगुळगाडा बरोबर. वर चढताना इतर पॅसेंजरना त्रास, आणि रोज रोज पुढच्या बस स्टॉप वर उतरवून देताना आम्हाला त्रास, आमचा वेळ जातोच की फुकट.”

आजोबांच्या केविलवाण्या  चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत कंडक्टर ओरडतच होता, “चला उतरा,  उतरा खाली. एकदा सांगून कळत  नाही का तुम्हाला? रोजची साली कटकट.”   

आजोबांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पायरीवर चढवलेला पांगुळगाडा आणि एकच पाय असलेलं पाऊल मागे सरकलं.

माझ्या शेजारी बसलेल्या तिच्या कानावर हा वरील संवाद पडला. ती ताडकन उठली. आता तिचा गुलाबी चेहरा रागाने लालीलाल झाला होता. मला तिचं सीट पकडायला सांगून ती आवेशाने खाली उतरली. आजोबांना बस मध्ये चढायला मदत करताना ती म्हणाली, “चढा हो आजोबा, मी उतरवून देईन तुम्हाला तुमच्या स्टॉप वर.”

कंडक्टर खेकसला,”ओ बाई, तुम्ही कशाला मध्ये पडताय? खाली पिली टाईम जातोय आमचा. तुमचा काय संबंध?”

ती कडाडली, “संबंध? माझा  काय संबंध ? माझा संबंध आहे माणुसकीशी. आणि काय हो ? वेळेच्या गोष्टी कुणाला सांगता? पानाच्या पिचकाऱ्या टाकत, टाळ्या देत इतका वेळ तुम्ही टाईमपास करीत बसला होतातच ना? बस सुटायची वेळ उलटून गेलीय. बस मधली वृद्ध माणसं, अवघडलेल्या बायका, ओझ्याने वाकलेल्या मावश्या आणि शाळा सुटल्यावर दमलेली, दप्तराच्या ओझ्याने  थकलेली भुकेलेली ही शाळकरी चिमणी पाखरं, किती जणांना ताटकळत ठेवलंत तुम्ही,? तेव्हां कुठे गेला होता तुमचा वेळ ?असंच काहीतरी कारण असल्याशिवाय हे आजोबा घरा बाहेर पडले नसतील. काहीतरी काम असेल, कुणाला तरी भेटायच असेल. त्यांनाही शारीरिक त्रास होत असेलच ना! एकाच पायावर भर टाकून चढताना. त्यांचा तरी काही विचार करा.” कंडक्टरच्या गुर्मीला न जुमानता तिने आजोबांना वर चढवून, माझ्या शेजारी, म्हणजे तिच्या सीटवर बसवलं आणि म्हणाली, “बाबा! तुमचं काय काम असेल तर मला सांगा. अगदी नाईलाजानेच तुम्हाला कुठे जाण्याची वेळ आली तर मला आधी फोन करा. मी रोज असते या बसला. माणुसकी सोडून, या लोकांनी बस सुरू केली तर मी बस अडवून तुम्हाला वर चढवीन. आणि हो,अहो बाबा कुणा करता?,  कुणाच्या ओढीने एवढा स्वतःला त्रास करून तुम्ही हा  बसचा अवघड प्रवास  कशाकरता? आणि का करताय ? तुमच्या परिस्थितीचा, वयाचा पण विचार करा ना जरा! रिक्षा करावी नां!”

दम लागल्याने डोळे मिटून शांत बसलेले आजोबा उत्तरले,”ते समद खरं आहे पोरी, पर रिक्षासाठी रोज  पैसा आणू कुठून?”

आता मलाही आजोबांची दया आली आणि प्रश्न पडला. न राहून मी विचारलं, “बाबा काही त्रास आहे का तुम्हाला? रोज कुणाला भेटायला जाता ? बरोबर तुमचा मुलगा का नाही येत?”

बाबा म्हणाले,”काय सांगू ताई माझी कर्म कहाणी? मुलगा नशेत असतो नेहमी. मोठ्या मुलाला अटॅक आला म्हणून त्याच्या आजारात पैका लावला.   अन धाकट्याचं डोकं फिरलं, भाऊबंदकी आडवी आली.”

आजोबांची गाडी वळणावर आणत  मी विचारलं,” सांगा ना बाबा, तुम्ही अशा परिस्थितीत रोज का आणि कुठे जाता?”

आता बस मधल्या सगळ्यांचे लक्ष बाबांच्या उत्तराकडे लागलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता  होती. अगदी कंडक्टर आणि ड्रायव्हर सुद्धा थबकले होते. आजोबा पुढे म्हणाले, “संपत्तीची जमिनीची, घराची, वाटणी होते. पण आमची, — आमची नवरा-बायकोची वाटणी केली, या आमच्या मुलांनी. मुलगा म्हणाला, ‘आम्ही नाही तुम्हाला दोघांना पोसू शकत.’ आईला हाकललं मोठ्याकडे आणि मी तुकडे मोडतोय धाकल्याकडं. घरात सारखी कचकच चालतीया. त्यातून कारभारीन जवळ नाही. दुखल्याखुपल्याला भाकर तुकड्याला, ह्या वयात जवळचं मायेचं माणूस  आपल्याजवळ हव़च ना हो ताई? ती तिकडं झुरतीया आणि मी बी इकडं कणाकणाने मरतोया. आज पंधरा दिवस झाले ती आजारी आहे. हातापायाच्या काड्या झाल्यात. सरकारी दवाखान्यात टाकलंय तिला. आज काही वंगाळ तर ऐकायला नाही ना मिळणार? या विचाराने धडधडत्या छातीने तिला भेटायला मी रोज जातो. तिला पाहून मला असं वाटतं माझी साता जन्माची सोबतीण,माझी  रोज वाट पाहतीय आणि मग मला पाहून तिच्या सुकलेल्या चेहऱ्यावर  हंसु उमटतं.. मायेने माझ्या हातावरून ती हात फिरवते. तिच्या डोळ्यात हसूं ही असतं आणि आसवंही असत्यात. पण मला पाहून ती खुलते, एवढं  मात्र खरं, आणि त्यासाठीच, फक्त तिला भेटण्यासाठी, तिच्या थकलेल्या सुकलेल्या चेहऱ्यावरचे हंसू बघण्यासाठीच  मी रोज तिथे जातो, तिच्याजवळ घडीभर बसतो. तिला चमच्याने चहा पाजतो, बिस्किटाच्या पुडा हातांत सरकवतो, घडीभर सुखा दुःखाच्या गोष्टी करतो आणि जड अंतकरणाने एका पायात मणा मणा चे ओझं बाळगून दवाखान्याच्या बाहेर पडतो. मागे वळून बघताना तिचे आसवांनी भरलेले डोळे बघत, माझ्या डोळ्यातलं पाणी लपवत या काठीचा, या पांगुळ गाड्याचा आधार घेत, मी परतीची वाट धरतो. या वयात मला तिची सोबत हवी असते. तिला माझा आधार हवा असतो. पण दुर्दैव माझं, मलाच या काठीचा आधार  घ्यावा लागतोय”.  आजोबा बांध फुटावा तसे घडाघडा डोळे मिटून अखंड बोलत होते.

अपंगत्वा बरोबर दुसरं आणखी एक दुःख त्यांच्या मनात सलत होतं. हे ऐकून बस मधले प्रवासी आणि मी पण निशब्द झाले. वरवर सामान्य दिसणाऱ्या या आजोबांची व्यथा ऐकून सगळे अंतर्मुख झाले होते.

माझ्या मनात आलं, प्राप्त परीस्थितीला सामोरं जाणं, आहे ते स्विकारून मार्ग काढणं, कठीणच आहे  किती कौतुक करण्यासारखं आहे आजोबांचं हे असं वागणं! दुःख प्रत्येकालाच असतं. पण प्राप्त परिस्थितीला सामोरं जाऊन नेटाने त्यांनी पुढचं पाऊल टाकलं होतं. कोंडलेली मनातली खळबळ कुणापाशी तरी त्यांना मोकळी करायची होती. पण ती व्यथा सांगताना त्यांचे डोळे मिटलेले होते. जणू काही पापण्यांच्या पडद्याआड ते आपले अश्रू लपवत असावेत.  काय सांगावं कदाचित मिटल्या डोळ्यातून ते आशेचा किरणही शोधत असतील. त्यांच्या मनात विचार येत असतील, ऋतू बदलतो,  हवामानही बदलतं. तसं आजचं हे परिस्थितीचं वादळही मिटेल.आणि आम्ही सगळे एकत्र येऊ. आज नाही उद्या मार्ग निघेल आणि नवरा बायकोची ही ताटातूट संपेल. ही आशा असेल त्यांच्या मनात.मला ‘तू तिथे मी’ सिनेमा आठवला. ते ही नवरा बायको        एकमेकांपासून दूर मुलांकडे राहण्याच्या व्यथेमुळे असेच कासाविस झाले होते. आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांची सोबत ही हवीच नाही का ?

मी विचारांच्या तंद्रीत होते. अचानक तीरा सारखा कंडक्टर पुढे आला. आजोबांना हात जोडून म्हणाला, ” बाबा चुकलं माझं! तुमच्या रोज येण्याचं कारण नव्हतं माहित मला! गर्दीच्या या ड्युटीमुळे आम्हीपण चिडचिडे झालो आहोत. तरी पण रागाच्या भरात असं टाकून बोलायला नको होतं मी तुम्हाला. मला माफ करा आजोबा.” 

आजोबा   कनवाळु होते. ते म्हणाले, “आरं माझ्या लेकरा,पोरासारखा आहेस तु मला!  माझ्या चढण्या उतरण्याचा त्रास बघवला नाही तुला! म्हणून तू रागावलास बाळा.”    

कंडक्टर पुढे म्हणाला, “या ताईंनी झणझणीत अंजन घातल्यामुळे माझे डोळे उघडले, आणि तुमचंही सांठलेलं दुःख मोकळं झालं. नाव काय तुमचं  ताई.?”

“अरे दादा तिचं नाव अहिल्या  आहे अहिल्या. सगळ्यांच्या सुखाचा विचार करून प्रत्येकाला मदत करते ती..” बस मधली एक मावशी ओरडून सांगत होती कंडक्टरला.  

अहिल्येचा राग केव्हाच पळाला होता. ती रोज येणाऱ्या प्रवाशांकडे वळून म्हणाली, “आपण बाबांना बसमध्ये चढा उतरायला मदत करायचीय बरं का! रोज दोन तरी फळं बाबां बरोबर त्यांच्या कारभारनी साठी द्यायची, म्हणजे त्यांची व बाबांची शक्ती भरून येईल. बाबांना बसमधून त्यांच्या स्टॉपला उतरवून दवाखान्यात पोहोचवण्याचं काम माझं. आणि हो! माझ्या मुलाचं कॉलेज दुपारी नसतं. बाबा आणि मी तिथे पोहोचेपर्यंत तो बसेल दवाखान्यात अभ्यास करत आजींजवळ, त्यांना हवं नको ते बघायला. आणि हो! बस मधल्या प्रत्येकाला मी विनंती करते, जमेल तशी जमेल तेव्हा बाबांना आपण मदत करायची आणि आर्थिक बाबतीतही थोडी मदत करू या. तुमच्यापैकी कुणाची ओळख आहे का सरकारी दवाखान्यात? म्हणजे डॉक्टरांना भेटून आपण आजींची चांगली देखभाल करायला सांगू, बाबांची  पण काळजी मिटेल, हो ना बाबा ?” एका दमात सगळं बोलणाऱ्या 

अहिल्येचा हात हातात घेत बाबा गहिवरून म्हणाले, “हो गं पोरी हो! मग तर माझी अख्खी काळजी मिटल. बसचं इंजिन बंद करून ड्रायव्हर उडी मारून पुढे आला आणि म्हणाला, “उद्या माझी रेस्ट आहे, सरकारी दवाखान्यात माझी ओळख आहे. उद्याच भेटतो मी डॉक्टरांना.  बाबा तुमच्या कारभारणीचं नांव सांगा. कॉट नंबरही सांगा,

 पुढचं मी बघतो. काळजी करू नका.” 

अहिल्या पण उत्साहाने   म्हणाली, “बाबा मी कामाला जाते शनि पाराजवळ. तिथे वरकामाला एक बाई हवीय. तुमच्या सुनेसाठी विचारू का? त्यांना वरकामासाठी बाई आत्ताच हवी आहे.” 

एक सदृहस्थ उठले आणि म्हणाले,”आमच्या रोटरी क्लब तर्फे बाबांच्या पायासाठी काही मदत नक्कीच मिळेल. खर्च बराच आहे पण शक्य तितकी मदत मिळेलच.”

अहिल्या म्हणाली, “आपण मदत केंद्राकडूनही मदत घेऊ शकतो. आमच्या मालकीण बाईची खूप ठिकाणी ओळख आहे. जगात नुसत्या पैशांनी नव्हे तर मनानेही श्रीमंत दानशूर आहेतच.

बाबांसाठी असा चहूबाजूनी पैशाचा ओघ आला तर, त्यांच्या पायाच्या मापाचा बुटही करता येईल. आणि हो! व्यसनमुक्ती केंद्रात माझ्या दादाची ओळख आहे. आता काळजी करू नका बरं का बाबा! तिकडे  गेल्यावर तुमच्या मुलाचं व्यसनही सुटेल “.

मी त्या चुणचुणीत व भराभर प्रश्न सोडवून मदत करणाऱ्या अहिल्याकडे बघतच राहयले. अहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी आपण नेहमी उत्साहाने साजरी करतो. त्यांच्यासारखीच लोककल्याणासाठी झटणारी ही समोर उभी असलेली सेवाभावी वृत्तीची आधुनिक अहिल्याच भासली ती मला.

मी आजोबांकडे बघितलं, मघाचा त्यांचा काळवंडलेला  दुःखी चेहरा आता या सगळ्याच्या दिलाश्याने उजळला होता. आधीसारखे डोळ्यातले अश्रु आता दुःखाचे नसून आनंदाश्रु होते. माझ्या मनातं आलं, आधार देणारा हात नेहमी श्रेष्ठच असतो. मग तो हात आधार देणारा असो की मानसिक बळ देणारा असो.     

60 मिनिटांचा  बसचा प्रवास होता तो. पण आम्ही सारे एक आहोत, समदु:खी आणि सम -सुखीही आहोत. ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. मनात विचारआला ‘आम्ही सारे भाऊ भाऊ, एक दिलाने सुखी राहू .l    

बाहेर बघितलं तर १५ ऑगस्ट चा  तिरंगा महात्मा फुले मंडईवर डौलाने फडफडत होता‌. सळसळणाऱ्या उत्साहाने तो आम्हाला संदेश देत होता ‘हर घर घर मे तिरंगाl हर मन मन मे तिरंगा l’ देशभक्तीपर गाणं रेकॉर्डवर लागलं होतं माझा हात सलामी साठी वर उचलला गेला.

‘ जयहिंद. भारत माता की जय. 🇮🇳 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares