मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हेचि दान देगा देवा… कवी : संत तुकाराम ☆ रसग्रहण – सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? काव्यानंद ?

☆ हेचि दान देगा देवा… कवी : संत तुकाराम ☆ रसग्रहण – सौ. वृंदा गंभीर 

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..

गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी..

नलगे मुक्ति धन संपदा. संतसंग देई सदा..

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी..

हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा

जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात देवा एक दान दे किंवा वरदान दे तुझा विसर कधी पडू देऊ नको.

मानव जन्म आला कि व्याप हाल अपेष्टा आल्याचं संसार आलाच कष्ट आलेच… संसारात गुंतून न राहता तुझी आठवण कायम असू दे तुझे गोड नाम मुखात असू दे दुसरं काही नको…

अमृताहूनी गोड नाम तुझे देवा

देवा तुझे नाम अमृताहून गोड आहे तुझ्या नामात शक्ती आहे तुझे नाम म्हणजे सत्य आहे. योग्य मार्ग आहे तेंव्हा देवा तुझा विसर पडू देऊ नको.

गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी

तुझे गुण मी आवडीने गाईन सत्कर्म करत राहील तुझे नाम अतिप्रिय आहे तुझं विस्मरण मी कधी होऊ देणार नाही देवा तू नेहमीच स्मरणात असावास म्हणून मी तुझे गोड गुणगान गात राहील.

घरादार मुलं बाळ धन संपदा जोडण्यापेक्षा मी पुण्य जोडत राहील धन जमा करण्याच्या नादात तुझा विसर पडतो तुझे कार्याचा विसर पडतो.

मानव जन्म मिळून पण जीवनाचे सार्थक करता येत नाही नाशिवंत सुखाच्या मागे धावून शाश्वत सुख विसरतो शाश्वत सुख तुझ्या नामात आहे म्हणून मी तुझ्या नामाशी जोडला जाणार आहे.

जीवनात अध्यात्मिक सुख पाहिजे कलियुगात भौतिक सुखाच्या मागे लागून दुःख प्राप्त होतं आणि तुझा विसर पडतो.

मला हे सुख नको आहे मला शाश्वत सुख जोडायचं आहे.

न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा

मला धन नकोय मुक्ती नकोय संतांची संगत हवी आहे.

मुक्ती मिळाली तर मी तुझ्या पासून लांब जाईल मला पुन्हा पुन्हा मानव जन्म दे मी तुझे गुणगान गाईल तुझी सेवा करत राहील.

तुझी सेवा घडावी म्हणून मला संतांची संगत दे संत सहवासात राहूदे * गुरु असावा महाज्ञानी गुरु महाज्ञानी असेलतर जीवनात मार्ग सापडतो म्हणून संत संगत दे… 

सुसंगतीने सुविचार प्राप्त होतात तर कुसंगतीने जीवन बरबाद होतं.

संगत जशी असेल तसं जीवन घडत असतं. जीवन सार्थकी लावायचे असेलतर संत संग आवश्यक आहे.

देवा, हे पांडुरंगा मला फक्त संत संग दे धन नको मुक्ती नको भक्ती दे.

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हीसी

तुकाराम महाराज म्हणतात आता सुखाने जाऊदे गर्भातून तुझी सेवा करण्यासाठी आलो होतो आता तुझी सेवा झाली माझे कार्य संपले आहे. तेंव्हा देवा मला आनंदात स्वर्गसूख मिळूदे जिथे फक्त तुझे चरण असतील.

“गर्भात असताना सोहंम सोहंम जप होतो, बाहेर आल्यावर कोहम कोहम सुरु होतं.

कोहम, म्हणजे का आणलंस तू इथे मला का दूर केल तुझ्यापासून ही आर्त हाक असते बाळाची.

म्हणून महाराज म्हणतात गर्भवासी होतो आता सुखाने स्वर्गवासी होऊ दे शेवटचा दिवस गोड व्हावा

जिथे नामस्मरण चालू असते तिथे देव नक्कीच भेटतो.

मुखी नाम हाती काम

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  विचारायला काय जातं ?… – लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ विचारायला काय जातं ?… – लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मागे बऱ्याच वर्षांपूर्वी टाटा स्कायच्या खूपच छान जाहिराती आल्या होत्या. काही जाहिराती खरच इतक्या नेमकेपणाने बनवलेल्या असतात की डायरेक्ट दिलातच घुसतात. त्यातल्या दोन माझ्या फारच आवडीच्या होत्या.

मिलिटरी परेड चाललेली असते, दोन मित्र इतरांप्रमाणेच ती परेड बघत असतात; त्यातल्या एकाला त्या परेड मधल्या मिलिटरी टँक मध्ये बसायची हुक्की येते, तो दुसऱ्याला मस्का मारत असतो विचार ना विचार ना…….. त्याचा मित्र त्याला हुर्रss करत उडवून लावतो.

आता त्या टँक मध्ये बसणं सोडा बाजूला तरी कोणी उभं राहू देईल का?

पण नाही………

त्याला आपली इच्छा मारणं अजिबात उचित वाटत नाही, तो म्हणतो बघूया विचारून आणि तो मग त्या उग्र चेहऱ्याच्या गाडीवानाला विचारतो,

Unclji, can I get a lift till Victoria hotel?

दुसऱ्या मित्राला वाटतं, झालं पडणार आता याला!

तो गाडीवान देखील याच्याकडे अचंबित नजरेने पाहतो आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्याला लिफ्ट द्यायला राजी होतो!

अन् मग तो आश्चर्याचा झटका कॅच करणाऱ्या म्युझिक सकट टॅग लाईन येते……..

पुछने मे क्या ज्याता है??

दुसरी ही अशीच भारी. ……..

नवरा एका गेटटूगेदरला जाण्यासाठी एकटाच निघत असतो आणि बाईसाहेबांच्या मनात येत एवढं छान वातावरण आहे तर पाच मिनिटं का होईना मस्तपैकी बाहेर चक्कर मारायला जावं. बया नवऱ्याला विचारतेही लगेच, तो म्हणतो ठिक आहेस ना? इथे दहा मिनिटात मला गेटटूगेदरला पोचायचयं आणि तुझं काय भलतंच? पंचवीस वर्षांपासून ओळखतेस मला मी कधी लेट पोचलोय कुठे?

पण नंतर मात्र कशी कोण जाणे बायकोची इच्छा त्याला पूर्ण करावीशी वाटते आणि तो तिला चक्क ड्राईव्ह वर नेतो…

नवरा यावेळी नेणं शक्य नाही हे माहीत असूनही ती मनाला त्या क्षणी वाटलं ते बोलते आणि फारशी अपेक्षा नसतानाही तिची इच्छा पूर्ण होते सुद्धा!

सही ना?

तुम्ही आहात का या येड्यांमधले! काही का असेना भला पुछने मे क्या ज्याता है म्हणणारे ? मी तर आहे बाबा!

खरंच काय जातं विचारायला?

काय जातं आपल्या इच्छा बोलून दाखवायला?

जात काहीच नाही, पण प्रत्येक ठिकाणी आपला संकोच आड येतो.

बघा जरा यावरही विचार करून……….

किती जणी बेधडक आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवतात सांगा?

बहुतेकदा मन मारूनच जगतात, ह्याला- त्याला काय वाटेल याचा विचार करत कुढतच बसतात. घरी कामाचा ढिगारा एकटा उपसतील, पण समोर नवरा रिकामा असेल; त्याला मदतीला बोलवावंही वाटत असेल; पण येईल का तो, असं कसं विचारायचं उगाच? जाऊ दे तिकडं! करत बसतील.

पण कधीतरी सांगूनही बघा की, तुम्हालाही गोड सरप्राईज मिळू शकतं, नाही येत कधी काही गोष्टी घरच्यांच्या लक्षात, म्हणून आपण आणून दिल्या तर चालतं, कोणाला माझी कदरच नाही करत रडण्यापेक्षा फार फार बरं!

या पुछने मे क्या ज्याता है चे रिझल्ट मला तर नेहमीच पॉझिटिव्ह मिळालेत ……

एकदा रात्री साडे अकरा वाजता घरातली चहा पावडर संपलीये, हे मला आठवलं. अन् तेव्हा मुलीची सकाळची शाळा होती, चहा तिच्यासाठी मस्ट होता. किराणा मालाची दुकान एव्हाना बंद झालेली होती. मी नवऱ्याला सांगितलं तर त्याने आता सगळं बंद झालं म्हणून मला वेड्यात काढलं. मी तरी त्याला जबरदस्तीने बाहेर काढलं.

म्हटलं चल पाहू तरी! 

एक मेडिकल जागं दिसलं. मी नवऱ्याला म्हणाले, विचारून बघूया ना!

तो म्हणाला, ठीक आहेस ना? मेडिकल मध्ये चहा कोण ठेवत का? जा तूच विचार, मी नाही येणार मुर्खपणा करायला!

मला पण कसंतरी वाटत होतं खरं, पण अगदी गरजच म्हणून मी मेडिकल मध्ये तोंड वर करून विचारुन बघितलं आणि फॉर माय सरप्राईज दहा रुपयाचं चहाचं पाकीट त्याने चक्क माझ्या हातात ठेवलं, अक्षरशः तिथल्या तिथे नाचत मी ते नवऱ्याला दाखवलं!

देखा? पुछनेमे क्या ज्याता है?

आपण आपलेच आराखडे बांधतो आणि त्याला धरूनच चालतो, काहीही म्हणा नकारघंटा वाजवायला जरा जास्तच आवडते आपल्याला.

एखाद्या मोठ्या दुकानात भाव करायला आपल्याला लाज वाटते, भाजीवाल्याकडे पुलाव मध्ये घालण्यासाठी फक्त चार फरसबी लागणार असतात, आपण पाव किलो घेतो (घरी भाजी आवडत नसली तरी) चार देईल का म्हणून, नॉनस्टॉप गाडी आपल्या गावावरून जाते, पण आपण दोन मिनीटं थांबवाल का विचारतच नाही, गप गुमान पुढे उतरुन मागे येतो.

खूप गोष्टी आहेत अशा ज्या आपण न विचारता सोडून देतो, आणि मन मारून जगत राहतो.

एकदा फक्त एकदा बोलून बघायला हवंच, नकोच ती रुखरुख मागे……

काय होणारे होऊन होऊन?

तसं तर आपण विनाकारण बरच बडबडत असतो पण जिथे बोलायचं तिथेच तोंड दाबून बसतो.

होणार नाही, मिळणार नाही वाटणारी unusual demand फक्त मनात न ठेवता विचारून, बोलून मला तरी खूप वेळा मिळालीये!

खरंतर हिच अनोखी डिमांड जेव्हा आश्चर्यकारक रित्या पूर्ण होते, तेव्हा तर एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते.

तर आता, आपण मनात उचंबळून येणाऱ्या लहरींचा गळा घोटण्याआधी थोsssडं थांबायचं आणि फिल्मी स्टाईलमध्ये स्वतःशीच (मनातल्या मनात) बोलायचं!

चलो पुछ ही लेतें है, आखिर पुछने मे क्या ज्याता है?

पूछ डाला तो लाईफ झिंगालाला…..

हे मी नाही ते ऍडवाले म्हणतात बरं का..

तुम्ही त्या टाटा स्कायवाल्या ऍड नक्की बघाच हं यूट्यूबवर “puchneme kya jata hai” टाईप करा आणि पाच-सहा मस्त ऍड एन्जॉय करा……..

त्यांचा होऱ्या कायम लक्षात ठेवून आपली लाईफ झिंगालाला करायला मुळ्ळीच विसरू नका !

लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाढे… लेखक : श्री सुनील भातंब्रेकर ☆ प्रस्तुती व प्रतिक्रिया – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ पाढे… लेखक : श्री सुनील भातंब्रेकर ☆ प्रस्तुती व प्रतिक्रिया – श्री सुहास सोहोनी ☆

पूर्वीच्या काळी पाहुणे किंवा नातेवाईक वगैरे घरी आले की पढवून ठेवल्यासारखा एक प्रश्न हमखास विचारीत, ‘पाढे पाठ आहेत का रे?’ आपण ‘हो’ म्हटलं की ‘कितीपर्यंत?’ असा पुढचा प्रश्न! ‘पंधरा पर्यंत!!’ असं अभिमानाने सांगितलं की ‘तेराचा म्हणून दाखव पाहू!!’ तो कसाबसा अडखळत संपवला की ‘आता ‘चौदाचा म्हणून दाखव’ असा प्रश्नोपनिषादाचा पाढा चालू होई. कशी तरी सुटका करून घ्यावी लागत असे.

पाढे पाठ करायची एक सुंदर प्रथा का कोण जाणे मागे पडली. ‘बे एके बे’ पासून सुरु होणारे पाढे ‘तीस दाहे तीनशे’ पर्यंत म्हणता येणे ही हुशारीची – पाठांतराची परिसीमा होती. सर्वसाधारण मुलं ‘बारा’पर्यंत तरबेज असत. तेराला पहिली थोडी पडझड व्हायची. चौदा, पंधरा, सोळा हळूहळू का होईना ठीक जायचे. सतरा पासून अजून काही बुरुज ढासळायचे आणि एकोणीसला शरणागतीच्या पांढरे निशाण फडकावले जायचे. वीसला अर्थ नसायचा आणि एकवीसच्या पुढचे पाढे म्हणण्याची हिम्मत करणाऱ्याला लोकोत्तर मुलांमध्ये गणले जातात जात असे.

पण ते काही असो, बाकी सारे गणित विसरले तरी पाढे मात्र आयुष्यभर साथ देतात! ‘आठी साती छप्पन’, ‘बार चोक अठ्ठेचाळ’, ‘पाचा पाचा पंचवीस’ ह्या संथा एखाद्या गाण्याच्या लयीसारख्या मनात कोरल्या गेल्या आहेत. ‘भीमरूपी’ नंतर ‘महारुद्रा’ यावं किंवा ‘सुखकर्ता’ नंतर ‘दुःखहर्ता’ यावं इतक्या सहजतेने ‘चौदा सक’ नंतर ‘चौऱ्यांशी’ येई. मराठी शिकलेल्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या चेअरमनच्या तोंडीही ‘अरे, सतरा लाखाला एक मशीन म्हणजे पाच मशीनचे – सतरा पाचा पंच्याऐंशी – म्हणजे एटी फाईव्ह लॅक्स होतील, ’ असा पाढा ऐकू आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

आजकाल इंग्लिश पाढे म्हणतात, पण ‘फोर सिक्स जा ट्वेंटी फोर’ मध्ये ‘चार सक चोवीस’ची सहजता नाही. बाकी जाऊ द्या, पण कमीतकमी पाढे तरी मातृभाषेतच हवेत हे आमचं प्रामाणिक मत आहे. अहो, ते आकड्यांची श्लोक आहेत हो! त्यांना तरी इंग्रजीपासून सोडा ना! पूर्वीच्याही पूर्वी पाढे ‘तीस’पर्यंत थांबत नसत. पुढे दिडकी – अडीचकी – औटकी असे. हे म्हणणे डोक्यापेक्षा जिभेसाठी त्रासदायक होते. ‘बे ते दहा’ – छान पायवाट, ‘दहा ते वीस’ – दोनचार खड्डे वाला साधा रस्ता, ‘वीस ते तीस’ – प्रचंड खडबडीत रस्ता आणि दिडकीबिडकी म्हणजे केवळ दगडं अंथरलेला रस्ता, असा तो प्रवास असे.

जर कोणाला स्वतःचं बालपण आठवायचं असेल तर बाकी काही न करता बेशक पाढे म्हणा – बे एक बे, बे दुने चार, बे त्रिक सहा… क्षणात पोहोचता की नाही ही बघा बालपणीच्या रम्य दुनियेत!

या लेखावरील प्रतिक्रिया – – – 

जुन्या आठवणींना उजाळा देणारा फार सुंदर लेख ! एका लयीत, एका सुरात, एका तालात एखादं समूहगीत म्हटलं जावं, तसंच पाढ्यांचं सुरेल गायन होतं असे. सवयीने, सरावानं, एकुणव्वदासे, त्रियोत्रिदोन, चवरोदरसे, बावनिदोन अशा अवघड शब्दांच्या सुद्धा नेमक्या संख्या कळत असत ! ती पाढ्यांची भाषा होती. तसे उच्चार करायला पण मजा वाटत असे. आताच्या काळांत आकलन, सुलभीकरणासाठी पाढ्यांतल्या संख्याही सरळसोट उच्चारल्या जातात, असं ऐकिवात आहे – नक्की माहित नाही. १ ते ३० पर्यंतचे पाढे आलेच पाहिजेत आणि रोज म्हटलेच पाहीजेत असा दंडकच होता. पुढे पुढे गणित, बीजगणित, भूमिती, क्ष+य, प्रमेय, साधन, सिद्धी, सिद्धता, रायडर्स, सूत्रे, गृहितके असे अनेक विषय विनाकारणच शिकलो असंच म्हणायला पाहिजे, कारण पुढच्या आयुष्यांत त्यांचं नांवही घेण्याची कधी वेळ आली नाही !… पण पाढे हा अपवाद !! ते पाठ असल्याचा फायदा पदोपदी अनुभवाला येतो. आजही फावल्या वेळात आठवतील त्या पाढ्यांचं गुंजन केलं, तर वेळ कसा जातो ते कळतंच नाही !

 

लेखक : श्री सुनील भातंब्रेकर 

लेख प्रस्तुती व प्रतिक्रिया : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ महाकाय कुंभलगड ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 मी प्रवासी 🌸

☆ महाकाय कुंभलगड ☆ प्रा. भरत खैरकर 

बनास नदीच्या काठावर वसलेलं हे माउंट आबू हिल स्टेशन.. खूप दिवसापासून माउंटआबूबद्दल ऐकलं वाचलं होतं.. अरवली पर्वतरांगात वसलेलं माउंट आबू हे सर्वात उंच शिखर!

भारतात उत्तरेला हिमालय.. दक्षिणेला निलगिरी आणि मध्यभागी अरवली म्हणजेच माउंट आबू आहे! तलहाथीवरून गाडी वळणवळण घेत माउंटआबूवर म्हणजे अरवली पर्वत रांगातून चालली होती. अप्रतिम सौंदर्य!

आम्ही सरळ ‘गुरुशिखर’ साठीच निघालो. तिथलं सर्वात उंच ठिकाण! सकाळी सकाळी ह्या ठिकाणी पोहोचल्याने गर्दी जमायला जेमतेम सुरुवात झाली होती. गाडी पार्क करून आम्ही भराभर पायऱ्या चढून दत्ताच दर्शन घेतलं. तिथल्या प्राचीन घंटेचा स्वर आसमंतात निनादला.. फोटो काढले आणि खाली आलो तर एवढ्या वेळात इतकी गर्दी झाली की गाडी काढायला जागा नाही. लोक वाटेल तशा गाड्या पार्क करून गुरुशिखरावर गेले होते. वर येणाऱ्या गाड्यांची अजूनच त्यात लगीनघाई चालली होती. मी शिताफीने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. अवघ्या अर्ध्या तासात पाच-सहा किलोमीटर लांब ट्रॅफिक जाम झालं होतं. आम्ही पटकन खाली येऊन गेलो, नाहीतर पुढचं सारं शेड्युल बिघडलं असतं.

वाटेवरचं दिलवाडा टेम्पल बघितलं. तिथे असलेल्या कल्पवृक्षासह फोटो काढले. दिलवाडा मंदिर हे संपूर्णपणे संगमरवरात बनविलेले उत्कृष्ट वास्तू रचना असलेले जैन मंदिर आहे. अकराव्या शतकात बांधलेलं हे मंदिर जैन लोकांशिवाय इतरांसाठी दुपारपासून सायंकाळी सहा पर्यंत खुलं असतं. जैन लोकांच्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रामध्ये याचा समावेश होतो.

तिथून आम्ही ‘नक्की लेक’ला गेलो. तोवर चांगलीच गर्दी वाढली होती. आम्ही नक्की लेक बघितला. तिथे राजस्थानी ड्रेसवर फोटो काढता येत होते.. सर्वांनी आपापले ड्रेस निवडले.. राजस्थानी ड्रेस वर फोटो सेशन झालं. फोटो मिळायला अर्धा तास असल्याने पुन्हा नक्कीलेकवर टाईमपास केला. मेहंदी काढली.. नचिकेतसाठी उंदीर आणि टमाटर हे खेळणे घेतले.. जोरात फेकून मारले की ते पसरायचे व परत हळूहळू ‘टर्मिनेटर’ सारखे मूळ आकार घ्यायचे.. खूपच मजेशीर होते! खेळणी बनविणाऱ्याच्या कल्पनाशक्तीच कौतुक वाटलं! मुलांना काय हवं, त्यांना काय आवडेल हे अचूक हेरणारे ते डिझायनर असतात.

आम्ही फोटो घेऊन माउंटआबूवरून खाली तलहाथीला आलो.. तिथे प्रजापिता ब्रह्मकुमारी यांचा आश्रम आहे.. तेथील कार्यकर्त्याने कार्य समजावून सांगितले.. वेळ कमी असल्याने मिळाला तो ‘गुरुप्रसाद’ घेऊन आम्ही कुंभलगडकडे रवाना झालो.. लांबचा पल्ला होता..

रानकापूर फाटा उदयपूरहून जोधपुरला जाणाऱ्या हायवेवर आहे‌. म्हणजे उदयपूर साईडला आपणास जावं लागतं. त्या रस्त्यावर भरपूर सिताफळाचे बन आहे. आजूबाजूच्या गावातली शाळकरी मुलं वीस रुपयाला टोपलीभर सीताफळ विकत होती. हायवेला असल्याने लोकही गाड्या थांबवून सीताफळ घेत होती. रस्ता खूपच मस्त होता.. ट्राफिक मात्र काहीही नव्हते.. कुंभलगड रानकापूर फाटा आला. सुरुवातीला कुंभलगड बघून घ्यावा म्हणून रानकापूर डावीकडे सोडून आम्ही सरळ कुंभलगड कडे निघालो..

हा रस्ता खूपच खराब होता.. शिवाय मध्येच गाडीच्या टपावर बांधलेली ताडपत्री उडाली.. घाटात गाडी थांबवून ती बांधून घेतली.. मध्ये एक शेतकरी राजस्थानी पद्धतीच्या मोटने शेताला पाणी देत होता.. ते बघायला गाडी थांबविली. एक छोटीशी क्लिप तयार केली. फोटो घेतले. मोटेचा जुना मेकॅनिझम बघून फार छान वाटलं.. अजूनही कुंभलगड यायचं नाव घेत नव्हता.. म्हणजे खूप दूर होता. अंतर जवळचं वाटायच पण नागमोडी आणि जंगलचा बिकट रस्ता शिवाय हळूहळू होणारा सूर्यास्त यामुळे खूप वेळ झाला की काय असं वाटायचं.. एवढ्यातच गाडीचा मागचा टायर बसला!

पूर्ण गरम झालेला टायर रस्त्यावरील खाचखडग्याने व अती घाई ह्यामुळे तापला व फाटला होता! आता जंगलात फक्त आम्हीच आणि सामसूम! भराभर मागच्या बॅगा काढून स्टेफनी काढली. चाकाचे नट काही केल्या ढिले होईना! गरम होऊन ते जाम झाले होते. शिवाय स्पॅनर ही स्लिप होत होता. गाडी चालवायला मस्त पण प्रॉब्लेम आल्यावर सगळी हवा ‘टाईट’ होते.

तेवढ्यात एक इनोव्हा मागच्या बाजूने दोन फॉरेनर टुरिस्टना घेऊन आली. तिला थांबण्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली. ड्रायव्हर तरुण पंजाबी मुलगा होता. कुठल्यातरी फाईव्ह स्टार हॉटेलमधील फॉरेनर टुरिस्टला कुंभलगड, रानकापूर आणि जंगल सफारी करण्यासाठी साठी घेऊन जात होता. त्याने पंधरा-वीस फुटावर गाडी थांबवली. त्यातील परदेशी पाहुण्यांना विचारून त्याने पंधरा मिनिटे मागितले. पटकन त्याचा ‘टूलबॉक्स’ त्याने काढला. सुरुवातीला त्यालाही नट हलेना! मग त्याने त्यावर पाणी टाकायला सांगितले. गरम झाल्याने एक्सपांड झालेले नट.. थंड झाल्यावर पटकन खोलल्या गेले. मग आम्ही आमची स्टेफनी टाकून गाडी ‘ओके’ केली. त्याचे आभार मानले. तोवर बऱ्यापैकी वेळ झाला होता. पण संकट टळल होतं. निदान आम्ही आमच्या गाडीत होतो. जंगलातून बाहेर पडू शकत होतो. किंवा शेजारच्या कुठल्यातरी गावात जाऊ शकत होतो. भगवंताने मदतीला पाठविलेला तो पंजाबी मुलगा आम्ही आयुष्यभर विसरणं शक्य नाही!

शेवटी कुंभलगडला आम्ही पोहोचलो. तो भव्य दिव्य किल्ला बघून डोळे दिपले. महाराणा कुंभाने बांधलेला हा गड.. त्याचे बुरुज कुंभाच्या म्हणजे मोठ्या मडक्याच्या आकाराचे म्हणून हा कुंभलगड! इथे जंगल सफारी व व्हिडिओ शो पाहता येतो. ह्या किल्ल्यावर बादलमहल, सूर्य मंदिर, भव्य परकोट, मोठमोठे कुंभाच्या आकाराचे बुरुज आहेत. एवढा भव्य किल्ला शाबूत अवस्थेत अजून पर्यंत आम्ही पाहिला नव्हता. इथे रात्री गडाची माहिती देणारा शो असतो. तो पर्यटकांमध्ये नवीन उत्साह भरतो. अरवली पर्वतरांगांच्या पश्चिमेकडे हा किल्ला आहे. उदयपूरपासून अंदाजे ८४ किमी अंतरावर असलेला हा किल्ला राणा कुंभाने १५ व्या शतकात बांधला आहे. कुंभलगडची भिंत ३८ किलोमीटर पसरलेली, जगातील सर्वात लांब अखंड भिंतींपैकी एक आहे. मेवाडचे महाराणा प्रताप यांचे हे जन्मस्थान आहे. भराभर फोटो काढले. जमेल तेवढा डोळ्यात साठवून घेतला. आतुर नेत्रांनी त्या किल्ल्याचा निरोप घेतला. कारण रानकापूर गाठायचे होते.

बऱ्यापैकी अंधार झाला होता. जंगलची रात्र होती. पण पुन्हा एवढ्या बिकट वाटेने आम्ही रानकापुर कडे निघालो होतो. एक वेळ वाटलं की इथून पुढे आता काहीच असणार नाही. ‘हेअर पीन टर्न’ एवढा शार्प होता की थोडा जरी बॅलन्स गेला तरी गाडी उलटणार.. पण आमचा ड्रायव्हर अमोलच.. त्याच्या वयाच्या मानाने ड्रायव्हिंग स्किल अप्रतिम होतं.. त्याने सही सलामत त्या अंधाऱ्या जंगलातून गाडी बाहेर काढली.. तर आम्ही रस्ता चुकलो!.. उजवीकडे जाण्याऐवजी डावीकडे लागलो.. पाच-सहा किलोमीटर गेल्यावर काहीतरी चुकतंय‌.. असं वाटलं.. पण विचारणार कोणाला? तेवढ्यात समोरून एक कार येताना दिसली. त्यांना थांबून विचारल्यावर त्यांनी सांगितले, ” तुम्ही उदयपूरकडे चाललात.. उलट जा किंवा आमच्या मागे या. ” मग आम्ही गाडी वळविली. आठ दहा किलोमीटर त्यांच्या मागे गेल्यावर आम्हीच मग पुढे निघालो.. शेवटी ‘सादरी’ गावातून रानकापूर या ठिकाणी आलो.. तेव्हा रात्रीचे साडेसात वाजले होते. जैन मंदिर असल्याने अशा अवेळी ‘उघडे’ असण्याची शंकाच होती. पण देवाच्या कृपेने आरती सुरू होती.. भगवान महावीरांना मनोमन नमस्कार केला व बिकट प्रसंगात वाट दाखविली म्हणून आभार मानले. दर्शन झाल्याने फार आनंद झाला रात्री दिव्यांच्या उजेडात मंदिराची भव्यता दिसत नव्हती पण जाणवत होती. दिवसाच बघावं असं हे जगातलं सर्वात सुंदर जैन मंदिर वर्ल्ड हेरिटेजचा भाग आहे. पण रात्री बघावं लागलं..

पंधराव्या शतकात राणा कुंभाने दान केलेल्या जागेत बांधलेलं हे कोरीव मंदिर खूपच सुंदर आहे. ४८००० चौरस फुटामध्ये पसरलेलं आहे. जैनांच्या जगातल्या पाच मंदिरांपैकी ते एक आहे. मंदिराला २९ खांब किंवा पिलर असलेला गाभारा आहे. मंदिराला एकूण १४४४ कोरीव स्तंभ आहेत. पण एकही स्तंभ एक दुसऱ्या सारखा नाही. मुख्य चौमुख मंदिरात आदिनाथाची मूर्ती आहे. जे प्रथम जैन तीर्थकर होते. हेही नसे थोडके.. म्हणून आम्ही मंदिरा बाहेर पडलो.

आता मुक्काम कुठे करावा? कारण आजचा मुक्काम जोधपुरला होता. जे इथून 130 किलोमीटरवर होतं आणि रस्ता तर असा.. पण तीस किलोमीटर नंतर ‘एन एच ८’ लागणार होता. तिथवर जावं मग जोधपुर गाठता येईलच हा विचार आला.

रणकापूरला आम्हांला पुण्याजवळील रांजणगावच्या तरुण मुलांचा एक ग्रुप भेटला. त्यांनाही जोधपुरला जायचे होते. पण एवढ्या रात्री अनोळखी रस्त्याने एका मागे एक आपण तिन्ही गाड्या काढू, असं त्यांनी सुचवलं.. त्यानुसार दहा-बारा किलोमीटर अंतरावर गेल्यावर ते दुसऱ्या रस्त्याने निघाले.. आम्ही दुसऱ्या.. अर्ध्या तासानंतर फोन केल्यावर ते पालीला हायवेला टच होणार होते. आम्ही अलीकडेच हायवेला टच झालो होतो.. ठीक झालं.. आलो एकदाचे हायवेवर.. अन् सुरू झाला जोधपुर कडे प्रवास! रात्री बारा वाजता घंटाघर ह्या जोधपूरच्या प्रसिद्ध भागात आम्ही पोहोचलो. सगळीकडे सामसूम.. गल्लीबोळातून गाडी हॉटेलच्या दिशेने चालली होती.

“कहा जाना है? चलो, हम हॉटेल दिखाते है” म्हणून जवळपास अंगावर आल्यासारखे दोन तरुण बाईकवर आमच्या गाडीपाशी आले. ते बराच वेळ गाडीचा पाठलाग करत होते. असं लक्षात आलं.. दरम्यान बरेचशे सीआरपीएफचे जवान गल्लीबोळात रायफलसह उभे होते.. असे भारतीय जवान मी काश्मीरमध्ये श्रीनगरला बघितले होते. वाटलं इथे सेन्सिटिव्ह एरिया असावा.. तरी हिंमत करून त्यातल्या एकाला विचारलं की “हॉटेल खरंच इकडे आहे कां?” तर तो “असेल. ” म्हणून मोकळा झाला.. ती दोघं मात्र त्यांना भीकही घालत नव्हती. मग एका जागी अरुंद मोड आली. गाडी पुढे नेता येईना!. मग “ईथेच गाडी थांबवा. माझ्यासोबत तुमच्यातला कोणीतरी या, हॉटेल दाखवीतो. ” म्हटल्यावर मी उतरलो. म्हटलं बघू करतात तरी काय? किंवा काय होईल? तेवढ्यात माझा एक सहकारीही गाडीतून उतरला. आम्ही एका हॉटेलच्या बंद दरवाजावर पोहोचलो. आत गेट उघडून गेलो तर मंद मंदसा प्रकाश.. हॉटेल सारखं काही वाटतच नव्हतं.. जुन्या वाड्यात आल्यासारखे वाटले.. फोन केला.. तर हॉटेल मालक फोन घ्यायला तयार नाही.. खूप वेळाने कसं बस त्याने एका नोकराला खाली पाठवलं.. त्या नोकरासोबत ते दोघेजण बोलले.. ” हमने लाया है!” वगैरे.. मग लक्षात आले की हे “दलाल” आहेत.. वर गेलो तर मालक पूर्ण टल्ली होता.. म्हणजे दारू पिऊन मग्न होता.. शिवाय अर्ध नग्नही होता.. चार फॉरेनर मुलं मुली आणि हा मालक एकमेकांशी अश्लील चाळे करत होते.. मला बघून “कमॉन सर!” म्हणत ते फॉरेनर आवाज देत होते.. माझं डोकं सटकलं.. पण मी सावरत मालकाला म्हटलं

“अरे, हमारा रूम किधर है?” तर तो म्हणाला, ” यहा पर कमरा वगैरे नही है !लेकिन मैने मेरे दोस्त को बोला है उसके हॉटेल मे आप रह सकते हो. ” असं म्हणत त्याने आपल्या नोकराला आमच्याबरोबर पाठविले.. नशीब!

परत गाडीजवळ येऊन त्याला गाडीत बसवून बाजूच्या गल्लीत असलेल्या हॉटेल ‘किंग्स रिट्रीट’ मध्ये आम्ही आलो.. तिथल्याही नोकरालाही धड माहिती नव्हती.. त्याने दार उघडलं. मग त्याने एका मोठ्याशा हॉलमध्ये आम्हांला सामान ठेवायला सांगितले.. हॉटेलमध्ये सगळीकडे फॉरेनर होते.. मिळाली एकदाची रूम.. आता रात्रीचे दीड वाजले होते.. गल्लीत गाडी दाबून लावली.. आणि झोपलो.. राजस्थान टूरच्या पहिल्याच दिवशी.. एकाच दिवसात आलेला खूप मोठा हा जीवनानुभव होता.. माणसांची किती प्रकारची रूपं आज आम्ही बघितली होती.. तरीही ‘रात गयी बात गयी’ म्हणून झोपी गेलो.

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ वेदना तुझ्या देई मला… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ वेदना तुझ्या देई मला… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

माझी प्रिय, पत्नी कै. अपर्णा हिच्या पोटातील कर्करोगाचे निदान झाले आणि माझ्या पायाखालील वाळूच सरकली. तरीही भावनांच्या आहारी खचून न जाता तिची सर्वतोपरी काळजी घ्यायचा निश्चय मी केला. वास्तविक आमचे दोन देह होते तरी आमच्या आत्म्यांनी केव्हाच अद्वैत साधले होते. आता तिला पुढे कधीतरी खूप वेदना होणार हे मी स्वतः डॉक्टर असल्याने समजून मी खूप विचलित होत असे. अशाच मानसिक अवस्थेतील एका क्षणी माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले:

☆ वेदना तुझ्या देई मला ☆

वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा

जगता जीवन अद्वैताचे विसरुयात आपदा||ध्रु||

*

सोडिली माहेरची माया सासरी तू येउनी

फुलविली तू प्रीत माझी हृदया जवळ कवटाळुनी

दाटल्या मळभावरी तू फुलविली सुमने कितीदा

वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा ||१||

*

फुलविली तू बाग संसारात माझ्या आगळी

दरवळोनी गंध धुंदी पसरली किती वेगळी

पुष्प अपुली फुलुनी आली मोद देती सर्वदा

वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा ||२||

*

एकेक पाकळी फुलावितांना भोग होते कष्टदा

हंसुनी तरी आनंदली तू पाहुनिया संपदा

संसार अपुला तू तयासी होतीस शुभ गे वरदा

वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा ||३||

*

जगतास साऱ्या स्मितमुखे झालीस गे तू ज्ञानदा

निरामयाची क्लेश मुक्ती झालीस तू आरोग्यदा

हंसत राही सर्वकाळी आहेस तू आशीषदा

वेदना तुझ्या देई मला सुखी राही तू सदा ||४||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळख…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ओळख…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

ओळख असणं आणि ओळखत असणं यातलं अंतर म्हणजे एक प्रवास आहे. हा एकमेकांनी सोबत करावा लागतो. या प्रवासात येणारे अनुभव, यात आपसात झालेली अनेक गोष्टींची देवाणघेवाण, वागणं, चालणं, बोलणं, विचार, आवडनिवड, व्यवहार यावरून आपण केलेले तर्क, आणि त्यावरुन घेतलेला निर्णय, या सगळ्या गोष्टींवरून ओळख असणं इथून सुरू झालेला प्रवास ओळखत असणं इथे थांबतो.

ओळख हि सुरुवात आहे. तर ओळखण याचे बरेच टप्पे आहेत. लहान मुलांना सुध्दा सुरुवातीला ओळख लागते. आणि ओळख झाली की मग ते ओळखायला लागतात.

ओळख निर्माण व्हायला काही कारण असावं लागतं. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींनी ओळख होते. आणि ओळखत असण्यात याच छोट्या छोट्या गोष्टींचा काही प्रमाणात, काही बाबतीत विस्तार असतो.

ओळख करावी का? दाखवावी का? असा संभ्रम ओळखीच्या सुरुवातीला असू शकतो. पण ओळखत असल्यावर बऱ्याच गोष्टीत आपलं स्पष्ट मत आणि ठाम निर्णय सांगू शकतो.

ओळख असणं आणि ओळखत असणं हा एक अभ्यास आहे. या अभ्यासाची सुरुवात सुध्दा इतर विषयासारखी तोंडओळख झाल्यावर सुरू होते. काही भाग समजायला सोपे आणि सहज वाटतात. तर काही भाग समजून घ्यावे लागतात. तर काही लक्षात सुद्धा येत नाहीत.

एखाद पुस्तक नुसतं चाळणं, आणि ते व्यवस्थित वाचणं यात जेवढा फरक आहे, तेवढाच ओळख असणं आणि ओळखत असणं यात आहे.

एखादा श्लोक किंवा स्तोत्र पाठ असणं म्हणजे ओळख असणं, तर त्याच्या शब्दाच्या अर्थासह तो, का? केव्हा? कसा म्हणावा…. हे माहिती असणं म्हणजे ओळखत असणं.

जवळपास सगळ्याच कार्यक्रमात प्रमुख पाहूण्यांची ओळख करून दिली जाते. बरेच जण त्यांना ओळखत असतात, तरीही ओळख करून देतांना काही विशेष गोष्टींवर भर दिला जातो. ज्यामुळे त्यांची ओळख नव्याने होईल असा प्रयत्न असतो.

एखादी गोष्ट, व्यक्ती, संस्था, वस्तू या सगळ्यांच्या बाबतीत ओळख असणं ते ओळखत असणं असा संबंध असतो. आणि ओळख जशी वाढत जाईल, तसं काही बारकावे समजतात आणि मग आपण ओळखायला लागतो.

ओळख असण कदाचित एकांगी असेल, पण ओळखण हे एकांगी नसतं, नसावं. ओळखण्यात अनेक गोष्टी, पैलू, आवड, सवयी, आणि मुख्य म्हणजे व्यवहार माहिती असतात किंवा माहिती असावे लागतात.

ओळख असणं याच रुपांतर ओळखत असण्यात होतं तेव्हा एकमेकांबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला असतो. आणि या विश्वासावरच ते ओळखत असणं किती काळ टिकेल हे ठरतं.

ओळख असण्यात सुखदुःखाची विचारणा असते. पण त्याच सुखदुःखाची जाणीव मात्र ओळखत असण्यात असते.

जेवणाच्या पानात अनेक पदार्थ असले तरी त्यांचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य असतं, आणि ते किती असावेत याच सुध्दा एक प्रमाण असतं. तसंच स्वभावात सुध्दा अनेक गोष्टी, वैशिष्ट्य असतात आणि स्वभावातली हि वैशिष्ट्य कोणती, आणि किती आहेत हे ओळखता आली तरच आपण म्हणतो, मी ओळखतो……….

अगोदर ओळख असणं आणि ओळखत असणं या दोघांमध्ये प्रत्यक्ष संबंध असायचा. पण आधुनिक काळात आणि वेगवेगळ्या साधनांमुळे बऱ्याच जणांशी आपली ओळख असते. पण आपण एकमेकांना ओळखत मात्र नसतो. त्यामुळे एकमेकांचा सहवास नसला, काही चांगले वाइट अनुभव आले नाही तरीही ओळख असू शकते. पण ओळखत असायला सहवास आणि अनुभव गरजेचे असतात.

कदाचित याच कारणामुळे ओळख असणं ही संकल्पना विस्तारित आणि संकुचित दोन्ही अर्थांनी असते. फेसबुक, व्हाॅटस्ॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर यामुळे आपण प्रत्यक्ष न पाहिलेल्या आणि बऱ्याच लांबच्या लोकांनाही ओळखतो.

पण चार घरं सोडून पलिकडे कोण राहत यांना मात्र आपण ओळखत नाही. या ओळखण्यात, कोण? वयस्कर व्यक्ती आहेत का? त्यांना कशाची गरज, मदत लागते का? अशा खूप गोष्टींचा संबंध आहे…..

एखादी गोष्ट नुसती बघणं, आणि खरेदी करण्यासाठी बघणं यात जितका फरक असतो तितकाच ओळख असणं आणि ओळखत असणं यात असू शकतो.

ओळख असण्याच ओळखत असण्याच्या प्रवासात काही टप्पे, पायऱ्या असतात. या व्यक्ती, स्वभाव, आवडनिवड, जमवून घेण्याची पद्धत, विश्वास, त्याग यावर अवलंबून असतात. आणि गरजेनुसार त्या कमीजास्त असू शकतात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

😅 रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“काय पंत आज तुमच्या घरातून t v चा आवाज नाही आला सकाळ पासून नेहमी सारखा.”

“अरे वैताग आणला आहे नुसता या tv वाल्यांनी!”

“काय केबल गेली की काय तुमची?”

“अरे केबलला काय धाड भरल्ये?  व्यवस्थित चालू आहेत सगळे चॅनेल्स.”

“मग तुमचा सखा सोबती आज मुका कसा?”

“अरे काय सांगू तुला, कुठलेही चॅनेल लावा सगळीकडे बजेट, बजेट आणि फक्त बजेट!  दुसरा विषयच नाही या लेकांना. नुसता उच्छाद आणलाय सगळ्या चॅनेलवाल्यांनी.”

“पंत, बजेट हाच सध्याचा गरम विषय आहे आणि त्यावर हे चॅनेलवाले आपली पोळी भाजून घेत असतील तर त्यात नवल ते काय?”

“तू म्हणतोस ते बरोबर आहे रे मोरू,  पण ज्यांना “अर्थसंकल्प” हा  शब्द सुद्धा नीट उच्चारता देखील येत नाही, असे लोक वायफळ चर्चा करून आपल्याला अर्थकारण समजावणार? “

“पंत, सध्या दिवसच तसे आलेत, त्याला आपण तरी काय करणार?”

“काय करणार म्हणजे, सरकारचा रिमोट जरी दिल्लीवरून चालत असला, तरी आपल्या t v चा रिमोट आपल्या हातातच असतो ना? मग ती वायफळ चर्चा ऐकण्यापेक्षा केला t. v. बंद!”

“पण पंत त्यात तुमचेच नुकसान नाही का?”

“त्यात कसले बुवा माझे नुकसान? उलट आता बजेटच्या आधीच विजेचे दर वाढलेत, मग t v बंद करून मी एक प्रकारे पैशाची बचतच नाही का करतोय?”

“पण पंत सरकारने कर सवलत किती दिली?  काय काय स्वस्त होणार? काय महाग होणार हे तुम्हाला कसे कळेल?”

“कसं म्हणजे, पेपर मधून, जो मी रोज सकाळी वाचायच्या आधी तूच लंपास करून वाचतोस!”

“काय पंत मी…. “

“अरे मस्करी केली मी तुझी. बर ते सगळे सोड, पण तुला माहीत आहे का, बजेट हा शब्द कुठून आला ते?”

“नाही खरच माहीत नाही पंत, मला कळायला लागल्या पासून अर्थसंकल्पाला इंग्रजी मधे बजेट म्हणतात एव्हढेच ठाऊक आहे!”

“तुला सांगतो ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’ शब्दा पासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा पूर्वी वापर करीत असत आणि या पिशवीला ते तेंव्हा ‘बुजेत’ असे म्हणत. पण अर्थशंकल्पला बजेट हा शब्द प्रचलित होण्या मागे एक गमतीदार किस्सा आहे बघ मोरू!”

“कोणता किस्सा पंत?”

 “अरे १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांच्या संसदेत आले होते. येताना त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणली होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी उघडतांना  त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला. मग काय, तेव्हापासून जगभरात बजेट हाच शब्द प्रचलित झाला.”

“पंत, फारच मनोरंजक आहे हा बजेट शब्दाचा इतिहास. बजेट शब्दा बद्दल तुम्हाला इतकी माहिती आहे, पण खऱ्या बजेट मध्ये तुम्हाला खरच इंटरेस्ट नाही याचेच जरा नवल….. “

“अरे इंटरेस्ट असला काय आणि नसला काय, रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे भाग आहे ना? आणि मला असे एक तरी उदाहरण सांग ना, की अमुक एका बजेट नंतर अमुक तमुक गोष्टींच्या किमती खाली आल्या म्हणून?”

“तसच काही नाही, काही काही गोष्टी खरच स्वस्त…… “

“होतात, होतात पण तात्पुरत्या, परत ये रे माझ्या मागल्या. नंतर तुझ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्याची सवय होवून जाते!  You know,  public memory is very short.”

“हो, पण पंत आपल्या बजेटची साऱ्या जगात चर्चा होते आणि……”

“त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होतो वगैरे, वगैरे, असेच ना? अरे मोरू म्हणून बजेट वाचतांना कविता वाचून आणि कथा सांगून कितीही साखरपेरणी केली, तरी प्रत्यक्ष महागाईचा सामना करतांना सामान्य माणसाचे  तोंड कडवट होतेच, त्याचे काय? “

“तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पण…… “

“पण बिण सगळे सोड, मला एक सांग, आपण कितीही संकल्प केले तरी आपल्या खिशातल्या अर्थाला ते झेपायला नकोत का? अरे आपल्या घरचे महिन्याचे बजेट  सांभाळतांना घरच्या फायनान्स मिनिस्टरची काय हालत होते हे तुला मी वेगळे सांगायची गरज आहे का?”

“हो बरोबर, या बाबतीत सगळ्याच आपल्या घरातल्या फायनान्स कम होम मिनिस्टरनां माझा सलाम! महागाईचा कितीही भडका उडाला तरी घरातले बजेट सांभाळणे त्याच  जाणोत! पंत पटल बुवा तुमच म्हणण.”

“पटल ना, मग आता आमचा तू नेलेला आजचा पेपर आणून दे बरं मुकाट, कारण t v बंद केल्याने तोच आता माझा सखा सोबती!”

“तरी पण तुमच्या सारख्या सिनियर सिटीझनने “बुजेत” मध्ये इंटरेस्ट न दाखवणे मला काही पटत नाही.”

“अरे त्यात न पटण्या सारखं काय आहे. सगळ्या बजेट मधे तेच तेच तर असत. एका हाताने दिल्या सारखे करायचे आणि दुसऱ्या दहा मार्गानी दोन हातांनी काढून घ्यायच! आता तो आकडयांचा खेळ खरंच नकोसा वाटायला लागलाय रे! अरे पूर्वी लाखावर किती शून्य सांगताना दमछाक व्हायची आणि बजेटचे सगळे आकडे लाख करोड मधे!  मग माझ्यासारख्या पामराचे काय होईल याची तू कल्पनाच केलेली बरी.”

“पंत, तरी पण माझा मुख्य प्रश्न उरतोच ना!”

“तू तसा ऐकण्यातला नाहीस माहित आहे मला. मोरू आता तुला शेवटचे एकच सांगतो, निर्मल मनाच्या कुठल्याही रामाच्या सीतेने जरी अर्थसंकल्प मांडला, तरी त्याला त्या त्या वेळचे विरोधक नांवच ठेवणार आणि त्या त्या वेळचे राज्यकर्ते मांडलेल्या बजेटची प्रशंसाच करणार, हा आजपर्यंतचा इतिहास आणि अलिखित नियमच आहे! त्यामुळे बजेट चांगले का वाईट या फ़ंदात न पडता, घरातले “बुजेत” सांभाळणाऱ्या घरच्या लक्ष्मीला माझे शतशः प्रणाम!”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मदतीचा त्रास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मदतीचा त्रास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

विशु आमची जवळची मैत्रीण.

स्वभावाने लाख, हुशार आणि मदतीस अगदी तत्पर.

गम्मत अशी, की विशूचा मनुष्य संग्रह अत्यंत मोठा… कोणतेही काम सांगा, हिच्याकडे त्यावर उत्तर तयार असते… बरं, यात तिला मोठेपणाही नको असतो… पण मदत करण्याची भारी हौस— 

हसू येईल सांगितले तर,.. पण हिच्या मदतीचा लोकांना त्रास होतो.

कसे म्हणताय?…… ऐका तर.

लेकाचे लग्न विशूने हौसेने केले. सूनबाईना वेगळा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला होता. सूनबाई घरी प्रवेश करायच्या आधीच, विशूने, आपल्या हौसेने घर अगदी मस्त लावून टाकले.

सूनबाईने बघितले, आणि म्हणाली, “ मला हा नको होता फ्रीज. आणि मला हा रंग नाही आवडत भिंतींना. मला तरी विचारायचे ना आधी. ” 

…. झाले. एवढा खर्च, कष्ट करूनही दोघीही नाराजच.

तरी विशूची जित्याची खोड जात नाही. ती इतकी भाबडी आहे ना, की, समोरचा रागावूही शकत नाही.

सहज वीणा म्हणाली, “ बाई ग परवा केळवण करणार आहे, १0 माणसे यायची आहेत. , काही सुचत नाही बघ, काय मेनू करू, आणि कसे करू. ” 

विशूने तिला न विचारता, तिच्या समोरच एका बाईना फोन केला, आणि मेनूही सांगून मोकळी झाली.

वीणा म्हणाली, “ अग हे काय,. मी आहे ना इथे, मला विचार की. पैसे मी देणारे ना… आणि तुला कुणी सांगितलं मला बाई हवीय ? मी बघीन काय करायचे ते “.

ते विशूच्या गावीही नव्हते..

हल्ली लोक तिला बोलवेनासे झालेत. आली की सर्व सूत्रे हाती घेतलीच म्हणून समजा. भिडस्त लोकांना हे आवडत नाही पण बोलताही येत नाही.

…. तिलाही फटके कमी नाही बसत.. या स्वभावाचे.

कामवालीच्या उनाड मुलाला हिने नोकरी लावून दिली. ४ दिवसात मालकाचा हिलाच फोन. “ बाई कसला मुलगा दिलात–. गेला की काम सोडून. ” 

हिने विचारले कामवालीला, तर फणकाऱ्याने म्हणाली, “काय व बाई. असली नोकरी देतात व्हय? दुधाच्या पिशव्या टाकायच्या- तर कोण तिसऱ्या तर कोण पाचव्या मजल्यावर राहत्यात. पोराचे पाय दुखले, दिली सोडून नोकरी “.

…. विशू हतबुद्ध झाली.

शेजारच्या मुलीचे लग्न जमता जमत नव्हते. विशूच्या ओळखीचा एक मुलगा होता. हिने लगेच, त्या मुलीला, त्याचे स्थळ सुचवले. दोघे, भेटले, बोलले.

ती मुलगी विशूला म्हणाली, “काकू, कसला मुलगा सुचवलात हो. सगळे एकत्रच राहतात. केवढी माणसे, घरात. आणि त्याला पगारही माझ्यापेक्षा कमी. नका बाई असले मुलगे सुचवू. ”

…. बिचारी विशू.

आनंदी गुणी आहे विशू.

मागच्याच महिन्यात तिच्या नातवाची मुंज होती. मुलगा सून विशूकडे आले. म्हणाले, “ आई, कृपा कर. पण आम्हाला तुझी कोणतीही मदत नकोय. आमचे आम्ही समर्थ आहोत सगळं करायला. तुम्ही दोघे फक्त मुंजीला आणि सगळ्या कार्यक्रमाला या. ”…. थोडक्यात, तू अजिबात लुडबूड करू नकोस ही गर्भित धमकीच होती.

विशूला वाईट वाटलं. आमच्या कट्टयावर हिरमुसून बसलेली विशू बघून इतर मैत्रिणींनी विचारलं,

“काय ग काय झालं? “

विशूने घडलेली हकीगत सांगितली. आमची दुसरी मैत्रीण माया म्हणाली,

“आता तरी शहाणी हो ग बाई. तू चांगल्या भावनेने करायला जातेस पण लोकांना तुझी मदत आवडत नाही.

करू देत ग सून मुलगा हवी तशी मुंज. तू फक्त गप्प बस आणि त्यांच्या आनंदात सहभागी हो. अजिबात लोकांना यापुढे नको असलेली मदत करायची नाही. जमेल का एवढं?”

विशू म्हणाली, “ हो ग. मी हे पथ्य नक्की पाळेन. बघालच तुम्ही. ” 

आश्चर्य म्हणजे आता आमची विशू खरोखर सुधारली. कोणी विचारलं तरी सुद्धा ती हल्ली न मागितलेली मदत करत नाही की सल्ले देत नाही…

… त्यामुळे तिला सुख झाले. विशूची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

©  डॉ. ज्योती गोडबोले 

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पुणे… खूप खूप पूर्वीचे…’ लेखक : श्री दिगंबर देशपांडे – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पुणे… खूप खूप पूर्वीचे…’ लेखक : श्री दिगंबर देशपांडे – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

पेशवाईच्या काळात पुणे हे ओढे, नाले, गर्द झाडी, अरूंद रस्ते, गल्ली-बोळ, बखळी, असंख्य मोठ्या बागा, मोकळी सपाट मैदाने यांनी वेढलेले होते. सदाशिव पेठ हे एक खेडे होते. त्याचे नाव “मौजे नायगांव” असे होते. हा भाग “कारकोळपुरा” म्हणुन ओळखला जात असे. अनाथ विद्यार्थी गृह, नृसिंह मंदिर, खुन्या मुरलीधर हा परिसर कारकोळपुऱ्यात येतो. चिमाजीअप्पांचे पुत्र “सदाशिवरावभाऊ” यांच्या स्मरणार्थ माधवराव पेशव्यांनी या पेठेचे नाव सदाशिव पेठ असे ठेवले.

त्या वेळी पुण्यात मोठमोठे वाडे होते. बहुतेक वाड्यांतुन एखादे झाड, विहीर / आड असे. तांबड्या जोगेश्वरीचे मंदिर हे पुण्याच्या वेशीवर होते. तांबडी जोगेश्वरी, हुजुरपागा, तुळशीबाग, बेलबाग या समोरून एक ओढा वाहत होता. पुण्यात हिराबाग, सारसबाग, मोतीबाग, माणिकबाग, रमणबाग, कात्रज बाग, नातुबाग, विश्रामबाग, बेलबाग, तुळशीबाग या सारख्या मोठ्या आणि विस्तीर्ण बागांचे “साम्राज्य” होते. फुले मंडईजवळ खाजगीवाल्यांची चकले बाग होती. बहुतेक ठिकाणी पेरू आणि बोरांची झाडे होती. भवानी पेठेत बोरांच्या झाडांची दाटी असल्याने या भागाला बोरवन असे म्हणत. पूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती भागात वड, पिंपळ, चिंच ही झाडे विपुल प्रमाणात होती.

सध्या पर्वतीच्या पायथ्याशी जो कॅनॉल वाहतो आहे, त्याच्या दोन्ही तीरांवर गर्द झाडी होती. तसेच द्राक्षांचे मळेही सगळीकडे होते. आंबा, केळी ही झाडे वाड्यातून असत.

तुळशीबागेत रामाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हिरवळीतुन पायवाट काढली होती. प्रभात रस्ता, डेक्कन जिमखाना या भागांत तर इमारती नव्हत्या. तेथे गवताच्या उंच गंजी होत्या. गायी म्हशींचे गोठे जागोजागी होते. सुरुवातीला शनिवारवाड्यासमोरील पटांगणात भाज्यांचा बाजार भरत असे. नंतरच्या काळात तेथे प्रवासी मोटार तळ झाला. चतु:श्रुंगीच्या मंदिर परिसरात घनदाट झाडी होती. विश्रामबागेच्या जागी हरिपंत फडक्यांची बाग, शनिपारापलीकडे नारोपंत चक्रदेवांची बाग, शिवाजी मंदिराच्या जागी सावकार गद्रे यांची बाग, पुणे विद्यार्थी गृहाच्या जागी सरदार रास्त्यांची बाग, त्याच्या अलीकडे नगरकरांची बाग अशी बागांची रेलचेल होती.

साधारण इ. स. १७००च्या आसपास पुण्याच्या आजुबाजूला मलकापुर, मुर्तजाबाद, शहापुर, शास्तापुर अशा छोट्या पेठा वसलेल्या होत्या. पुढे बाजीराव पेशव्यांनी मुर्तजाबादचे नाव बदलुन “शनिवार पेठ” असे ठेवले. शनिवार पेठेतल्या वीराच्या मारुतीच्या पुढे रस्ता नव्हता. इ. स. १७५३ मध्ये तळ्यातल्या गणपतीचे तळे नानासाहेब पेशव्यांनी मुद्दाम खणुन घेतले. या तळ्यातील पाण्यामुळे आजुबाजूच्या विहिरींना पाणी आले.

(सध्याच्या) टिळक स्मारक मंदिराच्या जागी पूर्वी पेशव्यांचा बंगला होता. त्याच्या आजुबाजुस मोठी बाग होती. या बागेला पाणी घालण्यासाठी विहीर खणली ती “खजिना विहीर” होय. नानासाहेब पेशव्यांनी १७५० साली हिराबाग बांधली. (येथे नाना साहेबांनी “मस्तानीला” नजर कैदेत ठेवले होते).

माती गणपतीच्या जागी सुद्धा घनदाट जंगल होते. मुठा नदीच्या किनारी असल्यामुळे तेथे मातीचे खूप ढिगारे होते. तेथे गुराखी, आपल्या गुरांना चारण्यासाठी आणत. हुजूरपागेच्या जागी घोड्यांची पागा / तबेले होते. नेहरू स्टेडियमच्या जागी तलाव होता. तो बुजवून तेथे स्टेडियम उभारले. (हल्लीच्या) लॉ कॉलेज रोडवरील फिल्म इन्स्टिट्यूटच्या जागी व्ही. शांतारामांचा “प्रभात स्टुडिओ” होता.

(“जुने पुणे आणि जुने वक्ते” या दिगंबर देशपांडे लिखित पुस्तकातुन साभार.)

लेखक : श्री दिगंबर देशपांडे

संग्राहक : अज्ञात 

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घराला स्पर्श कळतात ?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

घराला स्पर्श कळतात ?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जिवावरच येतं. एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून निरोप देताना. मग मनातल्या मनात आपणच घराला सांगतो, “येतो परत आठ दिवसांत. तोवर सांभाळ रे बाबा.. “

तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं.

मग कधी कधी आठ दिवसांचे आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजासमोर उभे राहतो, त्या वेळचे समाधान काही वेगळेच असते. प्रवासाचा अर्धा शीण नाहीसा होतो.

पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं. दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं. मलूलतेची छाया पसरलेली असते. घर आळसावलेलं, रुक्ष, निर्जीव भासतं.

जाताना बदललेले कपडे, गडबडीत न विसळलेल्या कपबश्या, वह्यापुस्तकं, खेळण्यांचा पसारा….. आरशावर एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो. रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते,

फ्रीज उघडल्यावर उरल्या सुरल्या भाज्या, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटोचा येणारा दर्प. सिंक वॉश-बेसिन बाथरूम सुकून गेलेले असतात. वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅनसारखाच टांगणीला लागलेला असतो. भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं.

आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!

रुसलेल्या, रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते, मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते.

दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं. ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा बहाल करते. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते..

त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं.

घराला स्पर्श कळतात? हो. कळतात! त्याला आपली माणसेही कळतात. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात. आठवून पहा. काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.

तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते, तेव्हा लाडात आलेल तिचं घर तिच्याकडे पाहत हसतं. तिलाही मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”… !

शेवटी “बाईच” घराची “आई” असते.. !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares