सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ दंगल… — भाग – ३ – लेखक – श्री रवी दलाल ☆ प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर ☆
(एक अखेरचा डाव)
(महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, कथाकार श्री रवी दलाल यांची नुकतीच दिल्लीतील रॉक्स पुरस्काराकरीता निवड झाली. मराठी साहित्यकाराने दिल्लीतील दंगल जिंकून बहुमोलाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. राॅक्स हा विविध आठ भाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा विशेषांक निघतो… या पुरस्कारासाठी त्यांच्या “आंगधुणी” या कथासंग्रहातील “दंगल“ या पुढील कथेची निवड झाली आहे.)
(आशाला नव्याने संसार करू द्या म्हणून आशाच्या मायने संताजीला समजावलं. संताजी तयार झाला पण एक अट घातली) – इथून पुढे —-
दुसऱ्या दिवशी लखन आणि प्रताप मारोतीच्या घरी आले. आबासाहेबांनी होकार पाठवला पण आबासाहेबांची एक अट आहे. मारोती गुजर बोलता झाला. कोणती अट घातली ? आबासाहेबांनी, आमचं पाटील कुटुंब म्हणजे खानदानी, आज्या – पंज्या पासून कुस्तीची वैभवशाली परंपरा जोपासणार कुटुंब आहे. आमच्या कुटुंबात आजपर्यंत पहेलवानचीच पोरगी मागण्याचा रिवाज आहे. ” माझ्या आज्या – पंज्यापासून ते आम्हा भावापर्यंत आम्ही पहेलवानाच्याच पोरी घरात करून आणल्या आणि आशाला पण बिहाडीला पहेलवानाशीच लग्न गाठ बांधली होती. पोरगी द्यायची तर मर्द माणसाच्या घरात आणि पोरगी करून आणायची तर मर्द माणसाची असा आमचा खानदानी रिवाज आहे. ” तुम्ही आबासाहेबांचे समकालीन वस्ताद पण बळवंताने कधीच मैदान मारले नाही, कधी कुस्ती खेळला नाही. आबासाहेबांचा आदेश आहे. आशा सोबत लगीन करायचं असेल तर मैदानात दोन हात करून जिंकावे लागेल. तेव्हा आशा सोबत लगीन करण्याचा मार्ग मोकळा होईल. आबासाहेबांची ही अट मंजूर असेल तर बोला आणि पानविडा समोर ठेवला. जर कुस्तीची अट मंजूर असेल तर विडा उचला नाहीतर आम्ही निघतो…..
मारोती बळवंताचे चेहरे पडले कारण बळवंता कधीच मैदानात कुस्ती खेळला नव्हता. संताजी पाटलाने अजब अट घालून पेचात पाडले होते. ” कुस्ती जिंकूनच आशा मिळवता येईल अन्यथा संबंध होणार नाही….. मारोती चुपचाप होता कारण पोरगा बळवंताला मैदानी कुस्तीची सवय नव्हती. समजा कुस्तीस होकार दिला तर भर मैदानात आत्महत्या करण्यासारखं होईल. जिंकू किंवा मरू या भावनेने बळवंताने विडा उचलला आणि कुस्ती लढण्यास होकार भरला. शाल – दुपट्टा देऊन संबंध पक्का झाला. “
पंचमीला यात्रा नुकतीच झाल्याने पुढच्या वर्षी पंचमीला लढत होणार. प्रतापने शाल – श्रीफळ देऊन सांगितले. बळवंत तुला एक वर्ष वेळ असून मेहनत घे, कसरत कर अन बापाकडून डावपेच शिकून तरबेज हो !आणि खुल्या मैदानात लखन ला आसमान दाखव. आता नंतरची भेट मैदानात होईल. प्रताप – लखन शाल – दुपट्टा घेऊन रवाना झाले आणि बळवंताने आखाडा पिसायला सुरुवात केली.
बलाढ्य मारोती आता जरी थकला असला तरी चेले त्याने तयार केले होते. मारोती नवीन डावपेचाचा जनक होता, बापाचा हात डोक्यावर असल्याने बळवंताची हिम्मत दुगुनी झाली होती. बळवंताने बापाच्या नजरेत खाली कसरत सुरू केली. आखाड्यातील तरबेज पहेलवानासोबत दंड – बैठका जोर अजमावणे सुरू झालं. पन्नास किलोमीटरवरची दौड सुरू आणि काजू -पिस्ता -बदाम – दूध – तुपाचा अलप सुरू केला. सूर्यनमस्कार दंड – बैठका, दोर -कसरत, पन्नास किलो वजन घेऊन पहाड चढणे सुरू केले. रात्रंदिवस व्यायाम करून शरीर आणखी भरदार होऊ लागलं. अधिक ताकदीच्या पैलवानासोबत खेळून जोर वाढवत होता. आखाड्यातील अनेक तगड्या पहेलवानीशी झुंज सुरू केली. पहेलवानकी हे बळवंताच्या रक्तात होती. फक्त त्याचा उपयोग केला नव्हता आणि फक्त पाच महिन्यातच बळवंता कुस्तीत तरबेज झाला.
पोराचा संसार थाटण्यासाठी मारोतीने वयाच्या 65 व्या वर्षी पुन्हा लंगोट कचली आणि मैदानात उतरला. बापासोबत पोराची तालीम सुरू झाली. आजपर्यंत कुणालाही न दिलेले डावपेच मारोतीने बळवंतावर आजमावले. अख्खा – डाव, बांगडी – डाव, धोबी – डाव, मानतोडी, उलटा – डाव, घिसा – डाव, मानगुटी – डाव, फसली – डाव बळवंताला शिकविले आणि प्रत्येक गावाची पद्धत समोरच्या पहेलवानाचा डाव ओळखण्याची कला मारोतीने शिकविली. एका वर्षात बळवंताने लेवल गाठली. बापाकडून शिकून चपळ आणि तरबेज झाला.
एका वर्षातच बळवंता सात पहेलवानाशी झुंजला. ” भंडाऱ्याचा हिम्मत पहेवानाला चित केले तर देवळीत जाऊन नबू शेख वस्तादाला आसमान दाखवले. मोठ्या पहेलवानाशी लढत देऊन हिंमत आणि ताकत दुप्पट केली. रामटेक थूगावच्या दंगलीत पंजाबी शेरा पहेलवान उतरला आणि लढत झाली पण बळवंता हरला. ज्या डावावर बळवंता पडला त्या अकली डावावर मारोतीने घिस्सा डाव शिकविला आणि पुन्हा पंजाबी शेरा सोबत लढत केली. दुसऱ्या कुस्तीत पंजाबी शेराला अवघ्या पाच मिनिटात भुईसपाट केलं.
यात्रेच्या आधीच बळवंता सात कुस्ती खेळला आणि जिंकला. इकडे लखन कुस्तीत आधीच नावाजलेला होता. त्याला मेहनत घेण्याची गरज नव्हती. पण संताजीच्या देखरेखित लखनची पिंढन चालू होती तर इकडे मारोती लंगोट कचून बळवंताला डावपेचात तरबेज करत होता. वीस वर्षापासून दंड – बैठका मारून लखनच शरीर दगडासारखं टणक होतं. लखनच्या वीस वर्षाच्या मेहनती पुढे बल्लूची एक वर्षाची मेहनत टिकणार नव्हती. लखनने बल्लूला हलक्यात घेतले आणि गाफील राहिला. पण मारोतीने कानमंत्र दिला. शक्तीवर युक्तीने विजय मिळवण्याची कला शिकविली.
आशाने बळवंताला कुस्तीत जिंकण्याचा वचन मागू नये म्हणून लखनने बहिणीकडून राखी बांधली नाही आणि दंगलीचा दिवस उजाडला. वर्षभराची प्रतीक्षा संपली. कुस्तीसाठी जनसागर उलटला होता पण यावेळी लोकांची भावना बळवंता सोबत जुळली होती. ” लखन हारावा व अशा चा संसार बसावा म्हणून अनेकांनी देवापुढे साकडे घातले होते. लखनला पराभूत करून आशाला मिळवायची होती तर लखनला बापाची पगडी शाबूत ठेवून ही कुस्ती जिंकायची होती.
कुस्तीला जातेवेळी आई पत्नी औक्षवंत करायचे पण यावेळी कुणीच ओवाळले नाही. लखन हरावा सर्वांच्याच मनात होतं. मैदान भरले पण यावेळी जोश नव्हता. भयानक शांतता पसरली होती. बळवंताची कुस्ती आशाला नवजीवन देण्यासाठी होती तर सख्खा भाऊ बहिणीला जीवनभर विधवा ठेवण्याच्या तयारीत होता.
लखन बळवंत मैदानात आमने- सामने आले. दोन माजी दिग्गज पहेलवान संताजी – मारोती पेंडॉलमध्ये विराजमान होते. लखन साठी ही लढत बहिणीला विधवा ठेवून घराणेशाहीच्या पारंपारिक सन्मानासाठी होती तर बळवंताची लढाई विधवेला नवजीवन देण्यासाठी होती. बळवंताने बापाचे पाय धरले. मारोतीने शांत राहण्यास सांगितले, घाई करू नको, तू आक्रमण करायचं नाही, आधी बचाव कर, लोकांची ताकद मोठी आहे आणि नंतर बळवंताने संताजीचे पाय धरले. ” संताजीने विजयी भव ” असा आशीर्वाद दिला. मग लखन बापाचा आशीर्वाद घ्यायला गेला ” पण बापाने पाय मागे घेतले.
आता संताजी जनभावना समजून चुकला होता. सर्व गर्दी बळवंताकडून होती. त्याला विधवेला न्याय द्यायचा होता तर लखनला बुरसटली परंपरा जोपासायची होती.
नामदेव सुताराने पहेलवानाचा परिचय करून दिला. कुस्ती सुरू झाली. ताकद आजमावने सुरू झाले. लखनच्या प्रचंड ताकतीपुढे बळवंत टिकाव धरत नव्हता. लखनच्या आडदांड शरीरापुढे बळवंताची ताकत कमी पडत होती. ही लढाई हळूहळू रंगात आली. लखनने वाकून बळवंताला घिस्सा डावात घेतले आणि बळवंताने दोन्ही पायाच्या फटीत लखनचा हात दाबला. पायाची कैची मजबूत केली तशी लखनने मानगुटी सोडली. पायाची आडी देऊन बळवंताला उघडा केला आणि मनगटाचा जबर वार मान्यवर केला. वार चुकवून बल्लू सुटून उभा झाला. लाल माती उडाली आणी जाध ठोकून बल्लू पुन्हा तयार झाला. मारोतीने सांगितलं होतं, लखन ताकदीने हरणे नाही युक्तीने हरवावे लागते. डावा मागून डाव सुरू झाले. लखनला वाटले, नोकरी करणाऱ्या नाजूक फुलाला मिनिटात कुचलून टाकू पण बळवंताला उमदा भरत होता. बळवंताला पाच मिनिटात चित करू हा भ्रम तुटला. लखनला आक्रमण करून बल्लूवर ताबा मिळवण्यासाठी खेळत होता. पण बल्लूने डाव फेल करून वेळ मारून नेली. कुस्तीचा रुख बदलला. आता लखन बल्लूच्या डावातून बचावात्मक पवित्रा घेत होता.
लखनने चढाई थांबवली. बल्लूचा प्रत्येक डाव लखनची धडकी भरवत होता. लखन कडून सर्व डाव खेळून झाले पण बल्लू चित होत नव्हता. ढोबी पझाड, घिस्सा – डाव, पटी – डाव, आतली टांग – बाहेरची टांग, बांगडी डाव मरून झाले. बल्लू मातीने न्हावून निघाला पण चित होत नव्हता. दात ओठ खाऊन लखन पुन्हा भिडला. लखन ताकदीच्या जोरावर लढत होता. बल्लू डावावर डाव मारत डाव परतवत होता. कुस्तीला अर्धा घंटा होऊन गेला पण कुणी कुणाला हात देत नव्हता. संताजीने ओरडून लखनला मोडी डाव मारण्यास सांगितले. योग्य टाइमिंग वेळ साधून गुघडी पोझिशन पाहून शांत बसलेला मारोती एकदम जोशात आला. त्याने लखनच्या डोळ्यातली भीती हेरली होती. शारीरिक थकवा दिसला. हीच योग्य वेळ साधून मारोती ओरडला ” बल्लू, ” मुडी डाव घाल पझाडू ” बापाचा आवाज ऐकून बल्लू पवित्रात आला. लखनला ” मुडी डाव ” माहीत असल्याने लखनने पायाची मोड केली. लखन गाफील झाला आणि बल्लूने मुडी डावाचा पवित्र घेऊन, मानेत हात घालून पायाने ” करठी डाव ” टाकला आणि लखन चीत झाला. नवख्या बल्लूने अखेरचा डाव साधला आणि लखलला आसमान दाखवले.
मैदानात हाहाँकार मचला पंचाने निर्णय दिला, बल्लूला विजय घोषित केले. बल्लूने लखनच्या शक्तीला न जुमानता युक्तीने विजय मिळविला होता. वीस वर्षाचा अनुभवी पहेलवाना समोर एक वर्षाची मेहनत जिंकली होती. मारोतीच्या युक्तीने बल्लूला जिंकविले होते. हा आनंद गावात साजरा करण्यात आला. प्रचंड ताकदीचा लखन घरच्याच मैदानात नवख्या पहेलवानाकडूनच चित झाला. मारोतीचा चेहरा आनंदला – फुलला……
बल्लूने लखनला हरवल्याची बातमी आशाला कळली. आईला कवटाळून आशाने मुका घेतला आणि आनंदाने घिरटी घेतली. बल्लू जिंकला ठरल्याप्रमाणे आशाच लग्न बल्लू सोबत होणार होतं…. विधवा आशा पुन्हा सौभाग्यवती होणार होती. आशाचा संसारवेल बळवंता सोबत फुलला आणि ठरल्याप्रमाणे संताजीने आशाचे लग्न बल्लू सोबत लावून दिले. ” कुस्तीच्या मैदानातील कट्टर हाडवैरी आता व्याही झाले होते. “
– समाप्त –
लेखक : श्री रवी दलाल
9960627818
प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈