मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांजवात…भाग 2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

☆ जीवनरंग ☆ सांजवात…भाग 2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

अनुराधा जोशी… तिची आई… हो, सावत्र असली तरी तिची आईच, तिची अनुआई. अन् नंदन… अनुआई चा सख्खा मुलगा, तिचा सावत्र भाऊ. तिला आणि अनुआई कधीही एकत्र न येऊ देणारा.

त्याला आईच्या प्रेमात आणि बाबांच्या इस्टेटीत वाटणी नको होती म्हणुन. अन् आता त्याने हा निर्णय का घेतला असेल?

खरं तर गेल्या २०,२२ वर्षांत… तिचे लग्न झाल्यापासून त्या कोणाशी च तिचा काहीच संपर्क नव्हता. स्वातीताईकडच्या लग्नात कदाचित भेट होईल असे वाटले होते, तिने स्वातीताईला तसे विचारलेही, ती म्हणाली तिने रितसर आमंत्रण दिले, फोन करुन पण सांगितले. नंदुदादाने मात्र बघतो, जमेल असे वाटत नाही, आईला पाठवणे पण अवघड आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली, म्हणुन येणे अपेक्षित नव्हते.

ज्योती फोटोकडे परतपरत बघत राहिली. आणि तिला ३५, ३६ वर्षांपुर्वीची अनुआई….. त्यांच्या घरी लग्न होऊन आलेली आठवली, बरोबर नंदुदादा होता. ज्योती तेंव्हा असेल ५, ७ वर्षांची. आणि तिच्यापेक्षा ७, ८ वर्षांनी स्वातीताई मोठी.

तिच्या जन्मानंतर सारखी आजारी असलेली त्यांची आई लवकरच गेली, बाबा मोठे व्यावसायिक, कामाचा व्याप खुप. नातेवाईकांचे फारसे संबंध नव्हते, म्हणुन तिचे सगळे स्वातीताईने नोकरमाणसांच्या मदतीने केले.

बाबांचे जवळचे मित्र, दुर्धर व्यक्तीने अचानकच गेले, त्यांची बायको आणि मुलगा अगदी निराधार. त्यांची जबाबदारी स्वीकारली, अन् लोकापवाद नको, म्हणुन हे लग्न केले, नंदनलाही कायदेशीर दत्तक घेतले.

वयाने लहान…. फारशी समज नाही म्हणुन ज्योतीलाच त्यात वावगे काहीच वाटले नाही. उलट आई दादा मिळाले म्हणुन आनंदच झाला. स्वातीताईला मात्र हे फारसे रुचले नव्हते, तिने ज्योतीलाच निक्षून सांगितले, “हे बघ ज्यो, ही आपली सख्खी आई नाही, अन् मुद्दाही नाही, तिला अनुआई च म्हणायचे, त्याच्याही फार जवळ जायचे नाही”.

तिने जवळ जायचा प्रश्णच ऊद्भवला नाही. कारण तोच त्या दोघींपासुन लांब.. अंतर ठेवुन.. अगदी तुसडेपणे वागे. तसा तो स्वातीताईपेक्षा २, ४ वर्षांनी मोठाच. त्यालाही हे लग्न मान्य नव्हतेच. पण अत्यंत चालाख आणि धूर्त. बाबांच्या इस्टेटीचे आकर्षण म्हणुन रीतसर तडजोड स्विकारली. त्याने हुषारीने, बाबांची मर्जी संपादन केली, अगदी त्यांचा उजवा हात झाला. पण त्या दोघींवर मात्र राग, अनुआईला मात्र त्या दोघींचे कौतूक, लाड करायला आवडे. पण ती जेंव्हा तसे करी तेंव्हा त्याची चिडचिड, धुसफुस सुरु होई, अन् अनुआईला त्याच्यासाठी माघार घ्यावी लागते.

स्वातीताईचे लग्न लवकरच झाले. नंदुदादाचेही. पण वहिनी तुसडेपणाच्या बाबत नंदुदादाच्या पुढे एक पाऊल. सावत्र नणंद हीच अंडी कायम मनात ठेवुन वागत असे.

बाबा होते तोपर्यंत जरा तरी ठीक. पण नंतर सर्वच कारभार त्या दोघांच्या हातात. आणि अनुआईचे दबावाखाली, सतत माघार घेऊन, घाबरुन वागणे. खरं तर ज्योतीलाच ते पटत नसे. निदान मनाप्रमाणे लग्न करायला तरी तिने पाठिंबा द्यावा असे तिला वाटत होते.

सत्येन तिच्या आयुष्यात आला तो ती MBA करत होती तेंव्हा. हुशार, दिलदार, तडफदार.  मुख्य म्हणजे त्याचे कौटुंबिक वातावरण अत्यंत हसतखेळते. म्हणुन साधारण परिस्थिती आणि काहीशी कनिष्ठ जात हे तिला अगदी गौण मुद्दे वाटले.

पण नंदुदादाने मात्र हलक्या जातीचा, पैशावर डोळा ठेवूनच लग्न करतो म्हणुन त्याचा अपमान आणि अपमानाच केला. कारण ज्योतीचे लग्न वहिनीच्या भावाशी लावुन देण्याचा बेत होता त्याचा.

त्याच दरम्यान अनुआईशी बोलावे म्हणुन ज्योती एकदा तिच्या खोलीत गेली. ती नव्हती खोलीत. पण तिची डायरी दिसली, डायरी वैयक्तिक असते, ईतरां नी वाचुन नये, हे खर तर ज्योतीलाच माहित होते, तिचा तो स्वभावाही नव्हता, पण त्या दिवशी ज्योती जरा चिडलेलीच होती, बघुया तरी म्हणुन सहज वाचायला घेतली. तर त्यातील शब्दांशब्दांमधुन अनुआईची अगतिकता, परावलंबित्व, याचीच दु:खद कहाणी तिने सांगितली होती. माहेरी वडिल, भाऊ,नंतर पहिला नवरा, दुसरा नवरा आता मुलगा सर्वांच्याच सतत दबावाखाली, त्यांचीच मर्जी राखत होत जगणे, सुरुवातीची गरिबी, आता पैसा असुनही स्वातंत्र्य नाहीच त्यामुळे सतत कुतरओढ.

ज्योतीचे डोळे पाणावले, पण अनुआईकडुन पाठिंब्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे तिला अडचणीत टाकणे हे जाणवून आपला मार्ग आपणच निवडला. कारण तिला तिचा जीवाभावाचा जोडीदार सत्येन गमवायचं नव्हता.

नंदुदादा विरुध्द जाऊन ती अनुआईसाठी काहीही करु शकणार नव्हती.

स्वातीताईच्या पुढाकाराने त्यांचे लग्न झाले, पण नंदुदादा आणि अनुआईशी ही संबंध संपले, ते कायमचे च दुरावले.

 

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांजवात…भाग 1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

☆ जीवनरंग ☆ सांजवात…भाग 1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

चप्पल पायात सरकवून.. ज्योती दार  बंद करणार… मनात शंका आली.. गीझर, गॅस,मायक्रो.. सर्व बंद केले ना? आत जाऊन खात्री केली. पर्समध्ये मोबाईल, किल्ली, सॅनिटायझर, आणि हो, चिवडा लाडुचे पुडे घेतलेत हे पण बघितले, मास्क अडकवून घाईघाईने स्कूटर काढली.

आवरायला जरा घाईच झाली होती. ८, १० दिवस स्वाती ताईकडे लग्नाला गेलेली ती.. सकाळच्या फ्लाईटने आली होती. आज एक हे कारण होते, पण हल्ली रोजच असे होते,. आई म्हणजे सासूबाई होत्या तोपर्यंत बरे होते, मागचे काही बघावे लागत नसे. पण मागच्या वर्षी त्या गेल्यापासून जरा ओढाताण च होते. दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेर होती, पण सत्येन.. अजिबात मदत नाही. उलट त्याचीच कामे करावी लागतात तशी तिची नोकरीसारखी नोकरी नव्हती म्हणा. आवड म्हणुनच.. समाजसेवा,. ९ मैत्रिणींच्या “नवविधा समुहा” तील संचालिका… कार्याशी कार्यकर्ती, ९ वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम… विशेषत: स्त्री समस्यांसंबंधी समूहाने हाती घेतले होते, त्यापैकीच एक ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीनिवास.. “सांजवात”. त्याचे कार्यालयीन आणि इतरही सर्वच कामकाज ज्योती बघत असे.

रोजच्याप्रमाणे आधी निवासातुन चक्कर न टाकता ती तडक ऑफिसमध्येच गेली. अपेक्षेप्रमाणे टेबलवर कागदपत्रांचा ढीग होता. कामाला सुरवात करणार तोच माया… तिची मदतनीस आली.

लग्न, प्रवास ई, जुजबी बोलणे सुरु असतांनाच ज्योतीलाच लक्ष मायाच्या हातातील पिवळ्या फाईलकडे गेले.

पिवळी फाईल म्हणजे नविन प्रवेश.

“काय ग माया.. नविन प्रवेशाचा अर्ज?” ज्योती

“ताई,नुसता अर्ज नाही, रहायला सुध्दा आल्यात, दुसर्या मजल्यावरची ती  स्पेशल रुम दिली रेखाताईंनी. तसे अजुन सायरन केले नाही, तुम्ही आल्यावर तुमचा सल्ला घेऊन निर्णय घ्यायचा म्हणत होत्या”

“माझा सल्ला? वेडी झालो के काय रेखा? अग, काही कागदपत्र अपुरी असतील,नाहीतर पैशाचा प्रॉब्लेम ?”

“”नाही हो, तसे काहीच नाही, बघाना फाईल. पण ही केस जरा वेगळीच आहे असे त्या अन् सुरेशदादा म्हणत होते”.

“अं? वेगळी केस? आहे तरी कोण?” ज्योती

“अनुराधा जोशी आहेत ७०, ७२ वर्षांच्या, पण एकदम छान आहेत हं आजी. अगदी शांत, डिसेंट,. बोलावू का त्यांना? का आपणच जाऊया खोलीत?

“माया अनुराधा जोशी… नाव ऐकुन ज्योती जरा चपापली, नावासारखी नावे खुप असतात. असतील दुसर्या कोणीतरी, तेवढ्यात मायाने फाईल समोर ठेवली, नावासारखे नाव अस शकते असे जरी ज्योतीला वाटले तरी फाईल ऊघडल्यानंतर अर्जावर.. नांव ::अनुराधा गोविंद जोशी दाखल करणार्यांना नाव:: नंदन गोविंद जोशी दोघांचे फोटो, आधार कार्ड पाहिल्यावर ज्योतीला धक्काच बसला.

डॉक्टर सर्टिफिकेट, शिफारसपत्र, हमीपत्र, सर्व व्यवस्थित,अन् चेक तोही २५ लाख रुपयांचा तिची खात्रीच पटली.

तेवढ्यात फोन, रेखाचाच, नेहमीचा ऊत्साही आवाज “हाय ज्यो! कशी आहेस? स्वातीताईनी बुंदीचे लाडू, चिवडा दिलाय ना माझ्यासाठी? पण sorry हं, मला यायला, जरा उशीर होईल, आल्यावर सापडते”

ज्योतीकडुन काहीच प्रतिसाद नाही म्हणुन पुढे तीच, “ज्यो…फाईल बघितली? पण Please don’t get upset तुला त्रास होईल असा कोणताच निर्णय आपण घेणार नाही.

आल्यावर बोलुया detail”.

रेखा आणि ती.. नुसत्याच सहकारी नव्हत्या, तर जीवाभावाच्या मैत्रिणी. म्हणुन ज्योतीचे पुर्वायुष्य बारीकसारीक तपशिलासह तिला माहित होते,. अजुनही धक्क्यातून न सावरल्यामुळे ज्योतीचे…. अर्जाकडे अन् फोटोकडे परतपरत पहाणे सुरुच होते.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पवित्र पैसा….भाग 3 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ जागतिक महिला दिना निमित्त – पवित्र पैसा….भाग 3 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

ताराचंद चे ते वाक्य “पैसे रत्ना नाम की वेश्या भेजती है” दिवसभर मला बेचैन करीत राहिले.  दुसऱ्या दिवशी मी पुन्हा ताराचंद च्या झोपडीचा दरवाजा ठोठावला. मला पाहून ताराचंद निर्विकार चेहऱ्याने म्हणाला सर मुझे पता था, आप जरूर आओगे, पैसे वापस करने आयेना सर आप….. इसीलिए मै नहीं बता रहा था….. मी काहिच बोललो नाही….. थोडा वेळ शांततेत गेल्यावर मी पलंगावर बसत म्हणालो….. ताराचंद तू सोच रहा है, मैं उनमें से नहीं हूँ, मै पैसे वापस नहीं करूंगा, और मै तुझ पर गुस्सा भी नहीं हूँ …….

ताराचंद ला आनंद झाला हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.

मी ताराचंद ला विस्वासात घेत म्हणालो क्यो आज चाय नही पिलाएगा….. क्यो नही सर म्हणत ताराचंद ने चहाची ऑर्डर दिली. मला थोड़ा वेळ हवा होता तो चहा मुळे मिळाला.

चहाचा कप खाली ठेवत मी विषयाला हात घातला. ताराचंद जी आप एक काम करो, मुझे उस रत्ना बाई से मिलना है, औंर ये काम आपको करना है. माझ्या या अनपेक्षित बोलण्याने ताराचंद अवाक झाला…. नहीं सर आपका उससे मिलना सही नहीं रहेगा. आपका रुतबा और पोस्ट क्या सर, नहीं….. सर मै ये काम नहीं करूंगा.

त्याच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हणालो ताराचंद डर मत जो महिला गरीब बच्चियों का पढाई खर्चा देती हैं, वह महान है, उसके वेश्या होने से मुझे फरक नही पड़ता, मिलवा मुझे।

ताराचंद ला माझे बोलणे पटले. काही वेळ विचार करून तो म्हणाला, सर मुझे समय दो उसी से बात करके मै बताता हूँ.

मै कोशिश जरूर करूंगा, पक्का.

त्याच्या कडे विश्वासदर्शक नजर टाकून मी निघालो.

बरोबर तिसऱ्या दिवशी ताराचंद चां फोन आला, सर कल दोपहर् को चलेंगे. पर सर मैं  अभी भी कहता हूँ, वहाँ आपका जाना सही नहीं है.

ताराचंद तू मेरी चिंता मत कर, मिलवा मुझे. ठीक है सर म्हणून त्याने फोन ठेवला.

ताराचंद ला कार मध्ये घेऊन मी निघालो गावच्या बाहेर निघाल्यावर ताराचंद म्हणाला सर अपने को वणी जाना है.

वणी हे गाव वीस किलोमिटर अंतरावर होते. गावाच्या आधी वेश्यांची वस्ती आहे हे मला माहीत होते. कार तिकडे वळविताच टीनेच्या छपराची काही घरे व झोपड्याची वस्ती दिसू लागली. वस्तीत शिरताच अनेक डोळे आमच्यावर रोखलेले जाणविले. एका टपरीवजा हॉटेल समोर गाडी उभी करण्याची खुण ताराचंद ने केली. खाली उतरताच हे लक्षात आले की अनेकांची ताराचंद शी ओळख आहे. अरे क्या मामु कहा थे, बहोत दिन हुये आये नहीं. हॉटेलच्या मालकाने ताराचंद ला आवाज दिला. ताराचंद आत जाऊन त्याचा कानाशी लागला. त्याबरोबर हॉटेल मालकाने मोठ्या अदबीने मला आत बोलाविले. तो पर्यंत नोकराने कपडा मारून बाकडे पुसले, मीही अंग चोरुन बसलो. सर आप बैठिए म्हणून ताराचंद समोरील वस्तीत दिसेनासा झाला. दोन तीन वारांगणानी तो पर्यंत माझा अंदाज घेतला पण हॉटेल मालकाने खुण करून, कामका नहीं हा संदेश दिला. दहा मिनिटांनी ताराचंद एका प्रौढ महिलेसोबत परत येताना दिसला. गोरा रंग व शरीराने स्थूल झाली असली तरी आपल्या तारुण्यात ती सुंदर होती हे जाणवत होते. जवळ येताच ताराचंद ने माझी ओळख करून दिली.

अम्मा येहीच सर है. जिसका मैने कल जिक्र किया था. दोन्ही हात जोडून ती म्हणाली गुरुजी मीच रत्ना हाये. ताराचंद ने तुमचे खूप गुणगान केले, तुमच्या बद्दल लई सांगितले त्यानं. म्हणूनच मी हो म्हणाली. काय बोलावे हे न सुचल्याने मी तिच्याकडे पहातच राहिलो. ताराचंद नेच समोरच्या बाकावर तिला बसविले. स्वतःला सावरून मी बोलणे सुरू केले. रत्नाबाई तुम्ही आमच्या महाविद्यालयातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करता म्हणून तुमचे आभार मानायला मी आलोय. मला तुमचा आदर वाटतो. रत्ना काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यासमोरून तिचा भूतकाळ सरकतो आहे हे मी ओळखलं.

एक निस्वास सोडून रत्ना बाई बोलू लागली…..गुरुजी तुम्हाला पाहून मला आमच्या खेडकर गुरुजींची आठवण झाली. बेळगाव जवळच्या वेश्या वस्तीत माझा जन्म झाला बाप कोण होता माहित नाही पण माझी आई सुंदर होती. ती वेश्या असली तरी मी शिकून मोठी व्हावं असं तिला वाटे. आमच्या वस्तीत एका संस्थेची शाळा होती त्यात आम्ही सर्व वेश्यांची मुलेच होतो. खेडकर गुरुजी तिथेच शिकवायला होते. आमच्यावर खूप जीव लावायचे. मी त्यात सर्वात हुशार, मी शिकून मोठी व्हावे म्हणून गुरुजींनी मला दहावीच्या परीक्षेला बसविले पण वस्तीतून विरोध सुरू झाला. गावातील शाळेच्या हेडमास्तरने ही विरोध केला. खेडकर सरांनी खूप मदत केली पण त्यांचे वस्तीपुढे चालले नाही. शेवटच्या पेपरला वस्तीने मला जावू दिले नाही कोंडून ठेवले. त्यादिवशी खेडकर सरांजवळ मी खूप रडली. माझी आई बिमार पडली टी. बी. होऊन ती महिण्याभरात मेली. माझ्या समोर जीवनाचा प्रश्न उभा राहिला या धंद्या शिवाय पर्याय नव्हता. पण शिक्षणाची आवड संपली नाही. आज माझा कोठा आहे. आठ दहा पोरी धंदा करतात. पैसे कमावले वाटते कुण्या गरीब पोरीचे शिक्षण सुटु नये. प्रयत्न सुरू केला. गावातील शाळेत जाऊन पैसे देण्याचा प्रयत्न केला हेड मास्तर बाई होती पण अंगावर धाऊन आली म्हणाली तुझा गंदा देह अन् गंदा पैसा उचल नी बाहेर हो. तुझी छाया शाळेवर नको. खूप वाईट वाटले. मी शरीर विकून पैसा मिळविला म्हणून तो अपवित्र होतो का गुरुजी. जमिनीत आपण अनाज पिकवितो. तीच जमीन अफु गांजा, जहर ही पिकाविते म्हणून जमीन अपवित्र होते का गुरुजी तुम्हीच सांगा. हा ताराचंद यायचा वस्तीवर ओळख झाली माणूस इमानदार आहे, त्याच्यासमोर मन मोकळं केलं शपथ दिली माझं नाव नाही सांगायचं, त्यानेही मदत केली गुरुजी तुमच्या कालेजात पाच पोरी. चंद्रपुरात दहा पोरींचा शाळेचा खर्च करते तीन पोरी नागपूरला नर्सिंग च ट्रेनिंग घेत आहे गुरुजी मी माझा धंदा बदलू शकत नाही. पण माझ्या शिक्षणाची माझ्या आईची इच्छा अशा रीतीने मी पुरी करतेय. तुम्हीच सांगा गुरुजी गरीब पोरींचे शिक्षण घडविणारा माझा पैसा खरंच अपवित्र आहे काय……. रत्ना बाईंचा डोळ्यात आलेलं पाणी गालावर ओघळल. आपल्या पदराने पुसत ती म्हणाली गुरुजी आणखी एक गोष्ट तुम्हाला शपथ आहे विद्येची, ही गोष्ट त्या पोरींच्या मायबापाला कळू देऊ नका. नाहीतर ते मुलींना घरी बसवतील पण माझा अपवित्र पैसा स्वीकारणार नाही. रत्ना बाई   हात जोडून उठली. मी म्हणालो बाई तुमचा पैसा कधीच अपवित्र ठरू शकत नाही गरीब पोरींना शिक्षणाची दारे उघडणारा पैसा गंगे सारखा पवित्र आहे. तो पवित्रच आहे. रत्ना बाई पलटून केव्हा निघाली कळलेच नाही, पण तिचे डोळे भरून आले हे पाठमोरी असूनही मला जाणवले. ती दिशेनाशी होई पर्यंत मी पाहत राहिलो. डोक्यात मात्र विचार सुरू होता रत्नाच्या पवित्र पैशाचा.

समाप्त.

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पवित्र पैसा….भाग 2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ जागतिक महिला दिना निमित्त – पवित्र पैसा….भाग 2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

आज महाविद्यालय पोहचताच मी रमेश शिपायाला बोलावून घेतले आणि ताराचंद ची माहिती घेणे सुरू केले. चौकीदार माणूस पाच मुलींचा शैक्षणिक खर्च करतो हे माझ्या अनुभवाला पटत नव्हते. त्याचा पगार किती असेल रे… मी शिपायाला विचारले… सर खूप झाले पाच हजार रुपये. अरे मग हा खर्च त्याचा मालक पाठवितो काय? कोण तो कोल डेपो वाला मालक….सर तो धड गणपतीची वर्गणी देत नाही….. तो काय पाठवितो सर.. अरे मग कोण पाठवितो रे पैसे. माझी खात्री आहे ते ताराचंद चे पैसे नक्कीच नाही… का जाणे सर पण पैसे दरवर्षी येते. तुम्ही याच वर्षी प्राचार्य झाले पण मागील चार वर्षांपासून पैसे नियमित ताराचंदच  देतो सर. आता माझे कुतूहल आणखी जागे झाले आणि सत्य शोधण्यासाठी मी बाहेर पडलो.

कोल डेपो समोर कार उभी करून मी एका ट्रक ड्रायव्हर ला विचारले, ताराचंद कहाँ मिलेगा? त्याने बोटानेच एका टीन पत्र्याच्या झोपडीकडे निर्देश केला. कोळशाची धूळ तुडवत मी त्या दिशेने निघालो.

झोपडी जवळ जाऊन ताराचंद जी अशी हाक देताच थोड्या वेळाने आत हालचाल सुरू झाली. बहुतेक रात्र पाळीमुळे तो झोपला असावा. टीनेचे दार उघडून ताराचंद आश्चर्याने माझ्याकडे पहातच राहिला….. सर आप यहाँ! क्या बात है सर? मुझे बुला लेते… त्याच्या बोलण्याची वाट न पाहता मी आत शिरलो आत एक लाकडी पलंग त्यावर कोळशाच्या धुळीने माखलेली गादी व एक ब्ल्यांकेट कोपऱ्यात एका लाकडाच्या पेटाऱ्यावर एक विजेरी त्यातच यफ एम ब्यांडचा रेडिओ, एक मजबूत लाठी,पाण्याचे मडके त्यावर मातीचे झाकण एक ग्लास. मला कुठे बसवावे हा त्याच्या समोर प्रश्न होता मीच पडलेले एक जुने वर्तमान पत्र पसरवून पलंगावर बसलो. ताराचंद ने बाहेर निघून चहा टपरी वाल्याला जोराने आवाज दिला.. गणपत दो स्पेशल कम शक्कर अद्रक डालकर जलदी भेजना. मी ही त्याला नाही म्हटले नाही. त्यानेच विषयाला हात घातला….. सर बात क्या है? क्या पैसे कम थे? रमेश को भेज देना था.आपने क्यो तकलीफ की सर? त्याला माझे येणे आवडले नव्हते हे मात्र खरे होते. तेव्हड्यात गणपत चहा घेऊन आला. दोन घुट चहा पिऊन मीच सुरवात केली. ताराचंद जी आप जो पाँच गरीब लाडकियों का खर्चा करते हो ये पैसे कौन भेजता है? मुझे जानकारी होना चाहिए.  सर ये मईच करता हुं जी खर्चा…….थोडा वेळ शांततेत गेल्यावर मी त्याला विस्वासात घेत. तले आप अच्छा काम कर रहे हो, पर मुझे विस्वास है,आप किसिके पैसे लाकर दे रहे हो. औंर आप नहीं बताओगे तो मैं पैसे वापस कर दूँगा. माझी मात्रा बरोबर लागू पडली. ताराचंद चरकला, सर एैसा मत करना. पैसे मेरे नही है ये सही हैं. पर किसके है मै बता नहीं सकता, मुझे कसम डाली है सर………. और सुनेंगे तो आप पैसे लेंगे नहीं………. त्याच्या खांद्यावर हात ठेऊन मी त्याला विस्वास दिला… तू बता मै पैसे लूंगा,पर सत्य बता……….

थोडा वेळ शांततेत गेला आणि ताराचंद ने जे सागितले ते ऐकून मी हादरलो. तो म्हणाला सर ये पैसे रत्ना नामकी वेश्या भेजती है…….

मी तडक बाहेर आलो व निघालो.

क्रमशः……

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झाडोरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

 ☆ विविधा ☆ झाडोरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆ 

आजची सकाळ नेहमीप्रमाणे खूप प्रसन्न होती. सोनेरी किरणांनी गुलमोहोर( तांबट) आणि शिरिषांच्या(जांभ्या आणि किऱ्या) दोन्ही झाडांना हलकेच कुरवाळले. तशी उंच फांद्यांवरील पोपटकंची पाने हसून उघडली. काल सुर्यास्तानंतर ती निद्राधीन झाली होती. त्यांच्या हसण्याची खसखस खालच्या फांद्यांवरील पानांनी ऐकली आणि तीही झोपाळू डोळे किलकिले करून बघू लागली. अजून रविकिरणे त्यांच्या पर्यंत पोहोचली नव्हती ना! उन्हं वर आली तरी डोक्यावरून चादर ओढून झोपणाऱ्या नाठाळ मुलांप्रमाणे त्यांनी आपले डोळे बंद केले.?? तरीही एक गोडसे स्मित पानापानांवर रेंगाळलेच. पलीकडील गल्लीतल्या आंब्याच्या झाडानेही आपली पाने किंचित हलवून दव शिंपडले आणि जागे होण्याची खटाटोप करु लागले.

जांभ्या आणि किऱ्या समोरासमोरच तर रहात होते. जांभ्याने त्याच्या लगतच्या घराचा टेरेस थोडा झाकूनच टाकला होता. त्या घराची मालकीण थोडी नाराज होती.हं….. जांभ्याच्या सावलीत तिच्या  छोट्या कुंड्यांमधील झाडे पुरेशी वाढत नसत ना!? पण जांभ्या काही ऐकत नसे.तो फांद्या विस्तारुन, हलवून तिच्या गुलांबांबरोबर गप्पा मारे, शेवंतीला गुदगुल्या करे आणि मधुमालतीला निवांत आपल्या

कडेखांद्यावर चढू देई. जांभ्या हळूहळू जागा होऊ लागला आणि फांद्या हलवून थोडी थोडी सूर्यकिरणे या सवंगड्यांना देऊ लागला.

किऱ्याचा पानपिसारा सगळीकडे छान पसरला होता. जांभ्या सारखी त्याच्याजवळ कोणती लतिका फुले वा फळंबाळं नव्हती. तोही तसा प्रेमळच होता. परंतु बिच्चारा! किऱ्या जवळच्या घरातील एक १७-१८ वर्षांची नवयौवना रोज बाल्कनीत येई. गुलमोहोर (तांबट)आणि शिरीष (जांभ्या आणि किऱ्या) यांच्या कडं प्रेमानं बघे.गालातच हसे. आज अचानक किऱ्याची फुलांनी बहरलेली एक फांदी तिच्या बाल्कनीत घुसली होती.किऱ्याला तिचेही गाल आरक्त झाल्यासारखे वाटले. फांदीला प्रेमानं कुरवाळून तिनं एक गिरकी मारली.

किऱ्या रोजच त्याच्यापासून काही फूटांवर असलेल्या तांबटा बरोबर गप्पा मारे. त्याच्या मोरपंखी पिसाऱ्याबरोबर खेळे. हं..  पण आता ग्रीष्म ऋतू सुरू झाला होता. त्याचा मोरपिसारा केंव्हाच गळून पडला होता. केवळ काड्यांचा किरीट. प्रकाशसंश्लेषण नाही. तांबट्याची चूल पेटत नसे ग्रीष्मात. नुसत्या साठवलेल्या अन्नावर तो पोट भरत असे. तसंही पर्णसंभार नसल्याने त्याला ऊर्जाही कमीच लागे.परंतु आत कुठेतरी काहीतरी धडपड चालू असावी बहुधा! ? तांबटाच्या एकाच फांदीला लालचुटुक फूल उमलले. जांभ्या आणि किऱ्या मान तिरकी करून त्याच्याकडं बघत राहिले.किऱ्यानं पानं हलवून दवबिंदूंचं अत्तर वाऱ्याबरोबर फवारलं. एक पिवळी पाकळी लाजत लाजत खाली झुकली आणि तिनं किऱ्याचं अत्तर आवडल्याचं सांगितलं. जांभ्या तांबटापासून थोडा लांब होता. काय बरं करावं? हो!हो!! त्यानं फांद्या हलवून शीतल हवेची झुळूक पाठवली. तांबट मनोमन हरखला आणि बघताबघता नावाप्रमाणेच तामस पिसाऱ्यानं फुलून गेला. काही दिवसातच त्याला पोपटी नाजूक पानंही फुटली. आपल्या छोट्या पर्णतलांच्या टाळ्या वाजवून. तो आनंद व्यक्त करु लागला. बघता बघता हिरव्या चपट्या शेंगांनी तो तरारला. गर्भार स्त्री सारखा जडावला. डोहाळे जेवणाच्या वेळी दिसणाऱ्या मातेसमान सजला. लाल, केशरी, पिवळ्या फुलांचे मोहोर; नाजूक मोरपिसांसारख्या पानांचे नृत्य!! जांभ्या आणि किऱ्या त्याच्याकडं बघतच रहात.

तिन्ही झाडांवर अनेक पक्षी विसाव्याला येत. अगदी पहाटे पहाटे दयाल शीळ घालून सगळ्यांसाठी भूपाळी म्हणे. कावळा, चिमण्या,मैना हळूहळू हजेरी लावत. बुलबूलाच्या जोडीनं बांधलेल्या घरट्यातून त्यांची पिल्लं चोची बाहेर काढून डोकावत. राघूंचा थवा विठू विठू चे भजन करे. थोडासा लांब असलेला, आता मोहरलेला अंबाही कोकीळकूजनात सामील होई. शेजारपाजारच्या खिडक्यांमधून, बाल्कनीतून छोटुले चेहरे डोकावत. त्यांच्या टाळ्या आणि हसरे चेहरे बघून तो झाडोरा कृतकृत्य होई.

पण…

पण….

…. पण हे काय? सूर्यदेव थोडेसे वर आले. माणसांची वर्दळ वाढली. ऑफिसला जाणारे टू व्हीलर वरुन पळू लागले. आणि झाडाखाली गर्दी जमू लागली. प्रथम खूष होत किऱ्यानं फांद्या हलवून गार वाऱ्याची झुळूक सोडली. सावली जास्त दाट केली. वाराही लकेर देत शीतलता पसरवू लागला. पण मग करवत, कुऱ्हाड, फावडी दिसू लागली.. भले मोठे जेसीबी आ वासून पुढं सरसावले. तसा किऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला. जांभ्याही भेदरलेला दिसत होता. तांबट तर भितीनं कापायलाच लागला. खाली माणसांची वर्दळ वाढली. आवाज चढले. जेसीबी चा स्टार्टर दाबला गेला आणि तांबटाच्या पायाखालची ज मी न हादरली. भूकंप झाल्याप्रमाणे सगळेच थरथरु लागले. जेसीबी नं चांगलंच सात-आठ फूट खणून काढले आणि….. आणि तांबट मुळासकट आडवा झाला..करवती, कुऱ्हाडीनं तांबटाच्या फांद्या तोडण्यात आल्या. खोडाचे मध्ये कापून तीन चार तुकडे केले गेले. तांबटाचे आक्रंदन जांभ्या आणि किऱ्या पर्यंत पोहोचत होते. पण त्यांची भाषा माणसांना कळत नव्हती.

फुललेल्या तांबटाची एक फांदी हातात धरून ती नवयुवती बाल्कनीत ऊभी होती. दोन्ही डोळ्यातून पाणी पाझरत होते.. तिचा मूक साथी पिसारा मिटून, जागीच जमीनदोस्त झाला होता.तांबटाचे रस्ताभर विखुरलेले अवयव गोळा करून टेंपो धूर ओकत निघून गेला…..

…… रस्ता मात्र लाल, पिवळ्या, केशरी गालिच्यानं आणि पोपटी पिसांनी मखमली झाला.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पवित्र पैसा….भाग 1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ जागतिक महिला दिना निमित्त – पवित्र पैसा….भाग 1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

अरे कोण आहेरे तिकडे…,रमेश…तुकाराम….गेले कुठे सगळे…

दोन तीन वेळा टेबलावरची बेल वाजवुन देखील कुणी आत आले नाही. त्यामुळे माझा आवाज चढला होता. शेवटी  बडेबाबु उठून आत आले.  .सर तुकाराम पोस्टात डाग द्यायला गेला आहे. आणि रमेश बाहेर गेला आहे, सर कोणी चपराशी नाही आहे  सर. काय असेल तर सांगा सर…. बडेबाबुच्या विनयशील बोलण्याने माझा आवाज बराच खाली आला. अहो बडेबाबू  दोन वाजायला आले, आज परीक्षा फी चा डी. डी.निघाला पाहिजे उद्या पाठवायचा आहे. आणि या रमेशचा पत्ता नाही केव्हा जाईल हा ब्यांकेत, मी चिंताग्रस्त स्वरात बडेबाबूना विचारले, मात्र बडेबाबुंची नजर रस्त्याकडे लागली असून ते कुणाचीतरी वाट बघत आहे हे माझ्या लक्षात आले. अहो बडेबाबु कुणाला शोधताय…. थोडा वेळ असाच गेला नी एक नीस्वास टाकून बडेबाबु बोलते झाले. सर मीच रमेशला पाठविले आहे. तो ताराचंदला शोधायला गेलाय. अरे कोण हा ताराचंद आणि रमेश चपराष्याला त्याचाकडे कशाला पाठविले. माझ्या प्रश्नार्थक नजरे कडे दुर्लक्ष करून बाडेबाबु शांतच राहिले. मला मात्र ब्यांकेत जायचे सोडून रमेश कोण्या ताराचंद ला शोधायला का गेला हे कोड उलगडतं नव्हतं.

माझी अस्वस्थता पाहून बडेबाबू सांगायला लागले, सर त्याच अस आहे, दरवर्षी पाच गरीब मुलींना हा ताराचंद दत्तक घेतो. त्यांची फी पुस्तके ड्रेस सर्व खर्च हाच करतो. मागील पाच वर्षांपासून तो हे करतोय सर. पण यावर्षी त्याने पैसे अजून आणून दिलेले नाही, त्यामुळे रमेश त्याला शोधायला गेलाय सर. त्या पाच गरीब मुलींचा परीक्षेचा प्रश्न आहे सर…. ऐकून मलाही चिंता वाटायला लागली. व कुतूहल ही जागृत झाले.

थोड्याच वेळात रमेश सोबत एक गृहस्थ येताना दिसले. पण मला अपेक्षित असलेले व्यक्तिमत्त्व मात्र दिसत नव्हते, पाच गरीब मुलींना दत्तक घेणारा म्हणजे एखादा श्रीमंत पालक असावा अशी माझी धारणा होती पण येणारी व्यक्ती मात्र अपेक्षाभंगाचा धक्का देणारी होती. एव्हाना दोघेही पायऱ्या चढून माझ्यासमोर उभे झाले. सर हाच तो ताराचंद, हाच पाच गरीब मुलींचा खर्च करतो. बडेबाबूनी मला माहिती दिली, ताराचंद नी ही मला नमस्कार केला व पैशाचे पाकीट काढून बडेबाबुंना पैसे देऊ लागला. ताराचंद कडे माझी नजर गेली, कोळशाच्या धुळीने भरलेले त्याचे कपडे, तेल न लावल्यामुळे उभे झालेले केस, बोट बोट दाडी किमान दोन दिवसापासून आंघोळ न केल्यामुळे घामाचा वास येणारे शरीर, रंग गोरा असूनही दिवसभर उन्हात व दगडी कोळशाच्या सहवासात राहून रापलेला त्याचा चेहरा. एकूण एक गबाळ व अस्वच्छ व्यक्ती असे रूप ताराचंद चे होते. पैसे देऊन ताराचंद गेला. रमेशला ब्यांकेत पाठवून मी बडेबाबुना आवाज दिला, कोण हो हा ताराचंद…..

बडेबाबुनी जी माहिती दिली ती ऐकून मी चाट पडलो….. सर हा ताराचंद.. अग्रवाल कोल डेपोचा चौकीदार कम सुपरवायझर आहे. तिथेच राहतो. एकटाच असतो. तोच पाच मुलींचा खर्च करतो. एक चौकीदार मुलींचा खर्च कसा उचलतो. माझा विस्वासच बसत नव्हता पण हे सत्य होते. व ते जाणून घेण्याचे मी ठरविले.        .

क्रमशः….

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शारदारमणांची सेटी – भाग 2 (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ शारदारमणांची  सेटी- भाग 2 (भावानुवाद)☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात – जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली.  आता इथून पुढे )

जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली. नंतर त्यावर चहा घेता घेता असं ठरलं की शारंच्या कवितांच्या १० – १५ प्रेस कॉपीज तयार करायच्या आणि आपल्या पुठ्ठयातल्या म्हणजे जवळीक असलेल्या प्रकाशकांना द्यायच्या. इतक्या ठिकाणी खडे मारल्यावर कुठे तरी लागणारच की. प्रत्येकाने खात्रीपूर्वक सांगितले के नवांकूर प्रतिभा मंडळाच्या अध्यक्षांचं काम म्हणजे मंडळातील प्रत्येक सभासदाचं स्वत:चं काम.

पुढच्या १५ दिवसात नवांकूर प्रतिभा मंडळाच्या सभासदांनी शारंकडून माफक प्रवासखर्च घेऊन त्यांच्या कविता आपआपल्या परिचयाच्या प्रकाशकांकडे पोच केल्या. त्यानंतर सहा महीने उलटले. कुणाचं तरी स्वीकृतीचं पत्र आलेलं असेल, या आशेने शारं रोज पोस्टात जाऊ लागले. पण पोस्टमन, त्यांनी कुठे कुठे पाठवलेलं आणि साभार परत आलेलं साहित्यच त्यांच्या हाती ठेवी आणि कधी तरी बदल म्हणजे कुठल्या कुठल्या मासिकाची वर्गणी संपल्याचे पत्र. शारंनी पुरं वर्षभर म्हणजे १२ x ३० x २४ इतके तास दम खाल्ला. मग मात्र त्यांचा धीर खचला. तेव्हा मग नवांककुरांनी ठरवले, दस्तुरखुद्द स्वत:चं प्रकाशकाकडे जाऊन चौकशी करायची. यावेळी त्यांनी शारंकडून प्रवासाचे निम्मेच पैसे घेतले. निम्मे स्वत:चे घालू म्हणाले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकाशकांकडे जाऊन आलेले वेगवेगळे अंकुर एकच गोष्ट सांगू लागले, ‘हल्ली आम्ही आमच्या खर्चाने कुणाचाच कवितासंग्रह  काढत नाही. अगदी ज्ञानपीठ विजेत्या कवींचासुद्धा. कवितासंग्रह काढायचाच असेल, तर सर्व खर्च कवीने द्यावा. आम्ही योग्य भावात संग्रह काढून देऊ.’

नअंप्रमचा ( नवअंकुर प्रतिभा मंडळाचा ) उपाध्यक्ष शरद साजणे म्हणाला, ‘खरंच शारंजी तुम्ही स्वत:चं का काढत नाही तुमचा कवितासंग्रह. म्हणजे काय की प्रकाशन संस्थेला तरी पैसे द्यायचेच. त्यापेक्षा आपणच आपल्या देखरेखीखाली अगदी चांगला, उत्कृष्ट, सुबक, सुंदर कवितासंग्रह काढू या कसं?’

‘ते खरं… पण पैसे…’ इति शारं.

‘किती पैसे लागतील असे? आठ नाही तर दहा हजार रूपये फक्त…’ के ज्ञानेश्वरन् याने की ज्ञानेश्वर केडगे, फक्त आठ किंवा दहा रुपये असावेत, अशा थाटात म्हणाला.

शेवटी ठरलं, नअंप्रमंतर्फे शारंजींचा कवितासंग्रह काढायचा. मंडळाचे ५० सभासद आहेत. प्रत्येकाने २०-२० प्रती खपवल्या तरी पुस्तके केव्हाच खपतील. जेवढे पैसे घालू, तेवढेच नव्हे, तर त्यापेक्षा जास्त पैसे मिळतील. एव्हाना शारंनी मनात गणित करायला सुरुवात केली होती. समजा हजार प्रती काढल्या, त्यासाठी दहा हजार खर्च आला, पुस्तकाची किंमत फक्त पंचवीस रुपये ठेवली, तरी पंधरा हजार रुपये फायदा. प्रॉव्हिडंड फंडातून पैशाची जुळणी करायचे त्यांनी मनोमन ठरवून टाकले. गिनीज बुकात ‘बहुप्रसव कवी’ म्हणून आपल्या नावाची नोंद व्हावी, यासाठी ज्या अनेकानेक कविता त्यांनी गिनीज बुकच्या ऑफिसकडे रवाना केल्या होत्या, त्याच्या पोस्टेजमधे त्यांच्या रमणीच्या दागिन्यांना वाट फुटली होती. त्यामुळे शारंना आता फक्त प्रॉव्हिडंड फंडाचाच काय तो आधार होता. त्यातून ते नॉन रिफंडेबल लोन घेण्याचा विचार करू लागले.

‘तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळ्या प्रती गेल्या तर..’

‘गेल्या तर… .म्हणजे जाणारच… म्हणजे गेल्यातच जमा आहेत. ’ नवांकुरांनी शारंना आश्वासन दिले.

नअंप्रमंच्या कार्यकारिणीने शारंचा कवितासंग्रह काढण्याचे काम युद्धापातळीवर हाती घेतले. संस्थेच्या अध्यक्षांचा कवितासंग्रह निघणं म्हणजे संस्थेच्या मानात पिसांचा तुरा… किंवा तुर्‍याचं पीस… किंवा काय असेल ते… समजून घ्या. योग्य असेल ते वाचतो, तो वाचक. कुणी डी.टी.पी. ची जबाबदारी स्वीकारली. कुणी चित्रकार शोधायला गेले.

चित्रकार कोण असावा, पुस्तक छापायला कुणाकडे द्यावं, याबद्दल सस्थेच्या अंकुरांमध्ये बरीच बाचाबाची व वादंग झाले. शेवटी नव्यानेच या व्यवसायात पडलेल्या पासलकरांकडे पुस्तक छापायला द्यायचे ठरले. तो धंद्यात नवा. पक्का मुरलेला नाही. . पैसे कमी घेईल, सवडी-सवडीने देता येतील अशी मंडळींची अटकळ, पण पुस्तक उघडताना शारंना अगदी कृतार्थ वाटत होतं. आपण लिहीलेल्या शब्दांच्या रूपाकडे पाहताना मात्र, ही कृतार्थता पार लोपून गेली. भात खाताना घासाघासाला खडे लागावेत, तसं त्यांना प्रत्येक कविता वाचताना वाटू लागलं. प्रत्येक कवितेत, छे: छे: कवितेतल्या प्रत्येक ओळीत, शुद्धलेखनाच्या चुका होत्या. प्रुफं तपासण्याची जबाबदारी पत्करलेला नामदेव गळ्याजवळची कातडी चिमटीत ताणून म्हणाला,

‘आईच्यान्… मी ओळ न् ओळ, शब्द न् एसएचबीडी करेक्ट केलेला… नंतर या लोकांनी काही तरी गफलत केलीय.’

त्यावर मधु कांडकेची मल्लीनाथी अशी-

‘आता कवितेच्या दारजाविषयी प्रसन्न उपस्थित झाला, तर प्रिंटिंग मिसतेक्समुळे दर्जा उनावल्यासारखा वाटतोय, असं म्हणून वेळ मारून नेता येईल.’

शारंनी पुस्तक बंद केलं. आता त्यांचं लक्स मुखपृष्ठाकडे गेलं.मुखपृष्ठाच्या उजव्या बाजूला दोन बोटे रुंदीची पांढरी पट्टी उभी होती. राखी रंगाच्या पार्श्वभूमीवर ठळक लाल रंगात लिहिलं होतं, ‘बकुळीची फुले’ बकुळीचे अर्धे झाड मुखपृष्ठावर होते, तर अर्धे झाड मलपृष्ठावर. एवढेच नव्हे, तर फुले वेचणारी तरुणीही, अर्धी मुखपृष्ठावर होती, तर अर्धी मलपृष्ठावर होती. पुस्तके स्टीच करणार्‍याने चक्क त्या तरुणीच्या काळजातच पीन खुपसली होती. चित्र दोन बोटे डावीकडे सरकल्यामुळे असं झालं होतं. पुढे दोन बोटांची अपांढरी पट्टी आली होती. याची जबाबदारी छपाईवाल्याने, स्कॅनिंगवाल्यावर, स्कॅनिंगवाल्याने चित्रकारावर आणि चित्रकाराने छपाईवाल्यावर टाकत त्यांच्या अकलेचे दिवाळे काढले आणि त्यांनी धंदा बंद करून घरी बसावं असा अनाहूत सल्लाही दिला.

क्रमश: – भाग ३ ….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शारदारमणांची  सेटी   क्रमश: भाग 1 (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ शारदारमणांची  सेटी   क्रमश: भाग 1 (भावानुवाद)☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

दोस्तांनो, आणि दोस्तीणींनो तुम्हीसुद्धा… अलीकडे आपल्या शारदारमणांकडे जाऊन आलात की नाही? नसाल तर एक चक्कर टाका आणि त्यांच्या 50,000 च्या सेटीवर बसून या. कोण शारदारमण? कमाल करताय बुवा तुम्ही? आपले तेच हो… गिनीज बुकात जास्तीत जास्त कविता लिहिणारी व्यक्ती म्हणून नाव छापून येण्यासाठी जंग जंग पछाडणारे आणि अखेर जास्तीत जास्त शब्द लिहिण्यासाठी का होईना, पण गिनीज बुकात नाव नोंदलं गेलं म्हणून खूश होणारे शारदारमण! तर त्यांच्या नऊ बाय आठच्या दिवाणखान्यात आता पन्नास हजाराची सेटी ठेवलीय. एकदा तरी या सेटीवर बसून धन्य होऊन या.

आता पन्नास हजाराची सेटीया एवढ्याशा जागेत काशी आली? तर ती करामत शारदारमणांच्या रमणीची. तो किस्सा त्यांच्याकडूनच ऐकायला हवा.  त्याचं काय झालं की शारंचं (शारदारमणांचं) नाव गिनीज बुकात आलं, तरी बुजुर्ग कवींनी त्याला धूप घातली नाही. त्यांचा म्हणणं असं की शारंच्या कविता या कविताचं नाहीत. म्हणून तर त्यांची नोंद गिनीज बुकात कवी म्हणून न होता, जास्तीत जास्त शब्द लिहिणारी व्यक्ती म्हणून झाली. तेव्हा गिनीज बुकात नाव आलं म्हणून त्यांना एवढं महत्व द्यायचं कारण नाही.’

आमच्या गावात एक प्रतिभा मंडळ आहे. त्यातल्या  नव्या अंकुरांना फारसं कुठे इकडे तिकडे लवलावायची संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी ‘नवांकुर प्रतिभा मंडळ’ नावाचा सावता सुभा मांडला. हे मंडळ नवोदित कवींचे असले, आणि शारंच्या १०, ००० हून जास्त कविता लिहून झालेल्या असल्या, तरी मंडळातील नवोदित कवींनी मोठ्या आदराने मंडळाचे अध्यक्षपद शारंना दिले. मुले म्हणाली, ‘आमच्या पोरा-टोरात कुणी अनुभवी नको का?’ लवलवत्या नवांकुरांनी शारंना हरभर्‍याच्या झाडावर चढवले आणि शार चढले. ५०० रुपये संस्थेचे आजीव सभासद म्हणून आणि ५०० रुपये अध्यक्ष झाले, इस खुशीमें मंडळाला देणगी म्हणून, मुलांनी त्यांच्याकडून वसूल केले. याशिवाय मंडळाच्या नावांकूरांना त्यांनी खुशीने चहा-वडा दिला, ते वेगळेच.

एक दिवस शरद नामे नवांकुराने म्हंटले, ‘शारदारमणजी, कविता संग्रह निघाला पाहिजे तुमचा. त्याशिवाय काही खरं नाही. संग्रह असल्याशिवाय या क्षेत्रात प्रतिष्ठा नाही.’

‘तुमच्याइतक्या कविता असत्या, तर आम्ही ५० कविता संग्रह काढले असते एव्हाना…’ दूसरा अंकुर उद्गारला.

‘ते खरय. पण कविता संग्रह काढणार कोण?’ कवी शारं उर्फ आरोळे सदाशिव शंकर  उसासत म्हणाले. आज-काल प्रस्थापित, प्रथितयश वगैरे… वगैरे… कवींच्या कविताही प्रकाशक लोक हातात धरत नाहीत.’

‘ते तुम्ही आमच्यावर सोडा हो…’ बाळा चौगुले खास कानडी ढंगात म्हणाला.

‘म्हणजे माझी काही खास मानधनाची अपेक्षा नाही.’ इति  शारं.

’का नाही? मी म्हणतो का नाही? एका कवितेला कमीत कमी ५०-१०० रु. तरी मिळायलाच पाहिजेत.’

‘हो ना! जास्तीत जास्त शब्द लिहिल्याबद्दल का होईना, गिनीज बुकात नाव आलंय तुमचं. म्हणजे तुम्ही तसे जागतिक कीर्तीचे…’

‘कसचं कसचं..’ म्हणत, शारंनी हंनुमांप्रसादमध्ये चहा – वडा सांगायला एका अंकुराला पाठवलं.

‘कशाला… कशाला… म्हणत चहा – वडा सांगायला गेलेल्या अंकुराने चक्क किलोभर जिलबीही सांगितली, तोंड गोड करायला म्हणून.

शरद साजणे म्हणाला माझा मावस आतभाऊ मेहतांच्या वर्तुळातला आहे. त्याच्याकडे कविता संग्रह देऊ या. ‘

‘पण मेहता कोण?’

‘सध्या माराठीतले अग्रगण्य प्रकाशक…’

‘अच्छा ते होय? म्हणजे पुण्यातले?’ शारंच्या विचारांची झेप  मेहता प्रकाशनपर्यंत कुठली जायला.

‘मी स्वत: जाऊन प्रेस कॉपी त्यांच्याकडे देऊन येतो.

‘किंवा आपण हा संग्रह मौजेकडे देऊयात. ही भागवत मंडळी आमच्या अगदी घरोब्यातली आहेत…. फॅमिली रिलेशन्स… ’ गोटू गटणे आपले आणि आपल्या घरच्यांचे मोठमोठ्या लोकांशी किती घरगुती संबंध म्हणजे फॅमिली रिलेशन्स आहेत, हे सांगायची एकही संधी सोडत नाही.

त्यापेक्षा ‘साकेत’शी कॉँटॅक्ट करूयात. ‘साकेत’ नवोदितांचे काव्यसंग्रह काढतात म्हणे. म्हणजे आपले शारं काही नवोदित नाहीत, पण त्यांचा अजून एकही काव्यसंग्रह निघाला नाही ना, म्हणून म्हणायचं!’

जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली.

क्रमशः ….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 5 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 5 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

“कोण टँली करून बघतय” हे सरांचं पालुपद सारखं चालूच होत. शेवटची ‘संकीर्ण ‘  नावाची फाईल होती. सरांची भाषणं, कुटुंब नियोजनाची केस करणं, साक्षरता प्रसार अशा कामांच्या बातम्या, फोटो, शीर्षकासह त्यात होत्या.

“तुम्ही ही जी कार्य करता तिथले फोटो कसे मिळतात?”

“फोटो काढतातच तिथे. एक दोन कॉप्या मागूनच टाकतो. शिपाई बरोबर असतो. तो मोबाईल वरुन फोटो मारतो. क्लार्क बातम्यांच्या चार पाच झेरॉक्स काढून ठेवतो. सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे.

“चार पाच झेरॉक्स? त्या कशाला?”

“म्हणजे बघा ,एकच बातमी-उदा. व्रुक्षारोपणाची बातमी शालेय विकास, मूल्य शिक्षण, नवोपक्रम ह्या सगळ्या फाईलीत टाकायची.”

“पण पुरस्काराचे तपासनीस हरकत नाहीत घेणार?”

“हरकत काय घेतात!फायलीचे नि फोटोंचे ढिगारे बघून डोळे दिपतात त्यांचे. कपाटभर कागदं बघून पार चक्रावतात.

“त्यानीन च सगळीकडे माझ्याबद्द्ल सांगितलंय्, “पाकुर्ड्याचे ढेकळे सर म्हणजे अफाट गावचा अचाट माणूस. डोंगरा एव्हढं काम केलय शाळेसाठी. पुराव्यासकट सगळं जिथल्या तिथं. ब्र काढायचं काम नाही.”

“पण एव्हढं सगळं करायला वेळ कसा काढता?निकालही चांगले लागतात बोर्डाचे, शिकवता कधी ?”

“माझा हिंदी विषय,तो सुधरायचं काम टीव्ही, सिनेमे करतात की. माझी सगळी पोरं हिंदीत पास. आता बोर्डपण हिथच. एखादी चक्कर मारायची. अधिकाऱ्यांना द्राक्ष बाग लावायची होती. लाऊन दिली. तोंडं गोड करावी लागतात. गेल्या वर्षी ग्रामीण भागात , मागासवर्गात तिसरा आणला.”फोटो, शीर्षक होतच. ‘शाळेचं भूषण !’

“आता ह्या फायली मी केल्या म्हणता? स्टाफ, पोरं काम करतात. अँडमिनिस्ट्रेशनच कडक आहे.”

“सर, तुम्ही मुख्याध्यापक कधी झालात? ह्या पदावर असल्याशिवाय एव्हढं अवाढव्य काम करणं शक्यच झालं नसतं.”

“नेमणूकच झाली त्या पदावर.” सर अभिमानाने म्हणाले.

कुणाला ठाऊक! आपल्याला ते पद मिळावं म्हणून शाळाच काढली असावी. माझ्या मनात आलं.

“मी परीक्षक असते ना तर तुम्हाला आणखी एक पुरस्कार दिला असता.”

“कोणता?” सर निरागस आशाळभूतपणे म्हणाले.

“प्रयत्न आणि चिकाटी पुरस्कार.” मी दिलखुलासपणे म्हटलं. सरानी माझं बोलणं  भलत्याच गांभीर्याने घेतलं. एक नक्षिदार कागद माझ्यासमोर  ठेऊन ते म्हणाले, “हां. ह्यावर लिहा मजकूर.”

सरांच्या कर्तृत्वपूर्ण कारकिर्दीने मी आधीच पुरती भारावून, भांबावून, चक्रावून वाकले होते. त्यामुळे त्या कागदाकडे दुर्लक्ष  करून मी म्हणाले “राष्ट्रीय पुरस्कारासाठी शुभेच्छा! “हसऱ्या बाईंसकट सर्वांचा निरोप घेऊन मी बाहेर पडले. सुटलेच तिथून.”

“शुभेच्छा लेखी कळवा.” सर हात हलवून मला मोठ्याने सांगत होते.

समाप्त 

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 4 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 4 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

तेव्हढ्यात एक तरूण मुलगा शाळेचं काही काम घेऊन सरांच्या सहीसाठी आला. “हे  आमचे क्लार्क. म्हणजे आमच्या मंडळींचा भाऊच आहे.”

महत्त्वाची ठाणी कशी सुरक्षित ठेवलेली होती हे माझ्या लक्षात आलं. कार्यकारी मंडळातही अशी नाती संभाळलेली होती. शिपाई तेव्हढे बाहेरचे. एक मुलगा नि मुलगी शिक्षक होते.

“तुमच्या नंतर पुढची पिढी हे. मा. होतील ना सर? म्हणजे सिनिऑरिटी आहे ना? मी विचारलं. मी त्यांच्यासारखच बोलायला लागले होते.

“यादीत बसवला. प्रयत्न करावे लागले, पण काम झालं.” “वा,वा” असं मी म्हणतेय तोवर सरांच्या सुविद्य पत्नी पोह्यांची डिश घेऊन बाहेर आल्या. “दमला असाल ना?  जरा नाश्ता करा” म्हणून माझ्या शेजारी बसल्या. मग घरगुती गप्पा सुरु झाल्या.

“तुमच्या सुना काय शिकल्यात?”

“एक बी.ए. एक बी.काँम झाली. नोकरी नाही करीत त्या. मुंबई पुण्यासारख्या आपल्याकडे नोकऱ्या कुठे मिळतात?”

“दोघीना बी. एड. करून सोडा की”.

“ते कसं? ती अँडमिशन पण अवघड झालीय् म्हणे.”

“मिळते. प्रयत्न करावे लागतील.” –सरच उत्साहाने म्हणाले.

‘प्रयत्ने वाळूचे’ हे सुभाषित मला पूर्वी खोटं वाटायच, पण आता मला ते पटल.

“सुनाना शाळेत चिकटवा. तुमचं नांव राखतील पुढे पर्यंत.”

“पण सर, बीकॉमवालीचा शाळेत काय उपयोग?” आणखी ज्ञान मिळवण्याच्या हेतुने मी विचारलं.

“आता आठवीला अर्थशास्त्र आहेच की. नाहीतर तिला प्रायमरीला घ्या. ”

“पण आमच्या शाळेत प्राथमिकचे वर्ग नाहीत” माझ्या शंका प्राथमिक होत्या, पण सरांकडे प्रत्येक प्रश्नावर तोडगा होता.

“आता तुम्हीच हे. मा. नाही का? पहिली ते चौथी काढून सोडा की.”

“परवानगी?”

” मिळत्येय की. प्रयत्न करावे लागतील.” वाकय मला पाठच झालं होतं.” न्हाई तर असं करा की.” आता सौ. ढेकळे सरसावून म्हणाल्या. त्या काय युक्त्या सांगतात ह्या उत्सुकतेने मी त्यांच्याकडे पाहिलं.

“अव, आमच्या वन्संच्या पोरीला आम्ही क्लार्क केली की. तसं करा बीकॉम वालीला. बी.एड. काय करायला नको” सर आपल्या कार्यवाहू पत्नीकडे कौतुकाने बघायला लागले. आपण आपल्या घरात शिक्षण प्रेमाच्या बिया पेरल्या त्या आता चांगल्या रुजून आल्या की. हा भाव त्यांच्या डोळ्यात होता.

“बाई,  तुमचे चिरंजीव? ते काय करतात?”

“एक वकील आहे नि दुसऱ्याचा पंपाचा बिझिनेस आहे. माझे मिस्वटर दोन तीन वर्षात रिटायर्ड होतील.” मी  सगळ्याचा प्रश्न मिटवून टाकला.

“चांगलय. तुमचं पहिलं पोरगं शाळेच्या बाबतींत कायदेशीर सल्ला देईल नि धाकट्या कडून शाळेत पंप बसवा. मिटिंगच्या वेळी मुलाची कार्ड वाटायची. म्हणजे त्यालाही तुमची मदत.”

सरांकडून मुख्याध्यापक ह्या विषयावर पी.एच्.डी करता येईल एव्हढा विश्वास मला मिळाला होता.

मग मी पुन्हा फायलींकडे वळले. व्रुक्षारोपन- न चा ण केलेला. आर.आर. आबा, सा.रे. कोरे सगळ्या नेते मंडळींचे झाडं लावतानाचे फोटो होते.

“बापरे. ही थोर माणसं आली होती शाळेत?”

“फोटो मिळतात की. “सरनी अंदरकी बात सांगितली. शै. करिअर -ह्या विषयात मात्र फार फोटो नव्हते. चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेला बसले इथपासून मध्यभारत युनिव्हर्सिटी ची बी,ए., बी.एड., बी.पी.एड्.अशी खूप सर्टीफिकिटांच्या झेरॉक्स फायलीत नीट लावलेल्या होत्या. सरांच्या नांवापुढे लांबलचक पदवी गिचमिड अक्षरात होती. ती वाचायच्या भानगडीत कोण पडणार?

क्रमशः ….

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares